श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ त्रयोविंशत्यधिक शततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

अयोध्यां गच्छन् श्रीरामो सीतां मार्गस्थानान्यदर्शयत् -
अयोध्येची यात्रा करतांना श्रीरामांनी सीतेला मार्गांतील स्थाने दाखविणे -
अनुज्ञातं तु रामेण तद् विमानं अनुत्तमम् ।
हंसयुक्तं महानादं उत्पपात विहायसम् ॥ १ ॥
श्रीरामांची आज्ञा मिळताच ते हंसयुक्त उत्तम विमान महान्‌ शब्द करीत आकाशांतून उडू लागले. ॥१॥
पातयित्वा ततश्चक्षुः सर्वतो रघुनन्दनः ।
अब्रवीन् मैथिलीं सीतां रामः शशिनिभाननाम् ॥ २ ॥
त्या समयी रघुनंदन श्रीरामांनी सर्वत्र दृष्टि टाकून चंद्रम्याप्रमाणे मनोहर मुख असलेल्या मैथिली सीतेली म्हटले- ॥२॥
कैलासशिखराकारे त्रिकूटशिखरे स्थिताम् ।
लङ्‌कां ईक्षस्व वैदेहि निर्मितां विश्वकर्मणा ॥ ३ ॥
वैदेही ! कैलास शिखरासमान सुंदर त्रिकूट पर्वताच्या विशाल शिखावर वसलेली, विश्वकर्म्याने बनविलेली लंकापुरी पहा कशी सुंदर दिसत आहे. ॥३॥
एतदायोधनं पश्य मांसशोणितकर्दमम् ।
हरीणां राक्षसानां च सीते विशसनं महत् ॥ ४ ॥
इकडे ही युद्धभूमी पहा. येथे रक्त आणि मांसाचा चिखल गोळा झाला आहे. सीते ! या युद्धक्षेत्रावर वानर आणि राक्षसांचा महान्‌ संहार झालेला आहे. ॥४॥
अत्र दत्तवरः शेते प्रमाथी राक्षसेश्वरः ।
तव हेतोर्विशालाक्षि रावणो निहतो मया ॥ ५ ॥
विशालाक्षी ! हा राक्षसराज रावण राखेचा ढीग बनून झोपी गेला आहे. हा अत्यंत हिंसक होता आणि याला ब्रह्मदेवांनी वरदान देऊन ठेवले होते परंतु तुझ्यासाठी मी याचा वध करून टाकला. ॥५॥
कुम्भकर्णोऽत्र निहतः प्रहस्तश्च निशाचरः ।
धूम्राक्षश्चात्र निहतो वानरेण हनूमता ॥ ६ ॥
येथेच मी कुम्भकर्णाला मारले होते आणि निशाचर प्रहस्तही येथेच मारला गेला आहे आणि याच समरांगणावर वानरवीर हनुमानांनी धूम्राक्षाचा वध केला आहे. ॥६॥
विद्युन्माली हतश्चात्र सुषेणेन महात्मना ।
लक्ष्मणेनेन्द्रजिच्चात्र रावणिर्निहतो रणे ॥ ७ ॥
येथेच महामना सुषेणाने विद्युन्मालीला मारले होते आणि याच रणभूमीवर लक्ष्मणाने रावणपुत्र इंद्रजिताचा संहार केला होता. ॥७॥
अङ्‌गदेनात्र निहतो विकटो नाम राक्षसः ।
विरूपाक्षश्च दुर्धर्षो महापार्श्वमहोदरौ ॥ ८ ॥
येथेच अंगदाने विकट नामक राक्षसाचा वध केला होता. ज्याचेकडे बघणेही कठीण होते. तो विरूपाक्ष तसेच महापार्श्व आणि महोदरही येथेच मारले गेले आहेत. ॥८॥
अकम्पनश्च निहतो बलिनोऽन्ये च राक्षसाः ।
त्रिशिराश्चातिकायश्च देवान्तनरान्तकौ ॥ ९ ॥
अकंपन तसेच इतर बलवान्‌ राक्षसांना येथेच ठार मारण्यात आले होते. त्रिशिरा, अतिकाय, देवान्तक आणि नरान्तक येथेच मारले गेले होते. ॥९॥
युधोन्मत्तश्च मत्तश्च राक्षसप्रवरावुभौ ।
निकुम्भश्च कुम्भश्च कुम्भकर्णात्मजौ बली ॥ १० ॥
युद्धोन्मत्त आणि मत्त हे दोन्ही श्रेष्ठ राक्षस तसेच बलवान्‌ कुम्भ आणि निकुम्भ - हे कुम्भकर्णाचे दोन्ही पुत्र येथेच मृत्युला प्राप्त झाले होते. ॥१०॥
वज्रदंष्ट्रश दंष्ट्रश्च बहवो राक्षसा हता ।
मकराक्षश्च दुर्धर्षो मया युधि निपातितः ॥ ११ ॥
वज्रदंष्ट्र आणि दंष्ट्र आदि बरेचसे राक्षस येथेच काळाचा ग्रास बनले होते. दुर्धर्ष वीर मकराक्षाला याच युद्धस्थळी मी ठार मारले होते. ॥११॥
अकम्पनश्च निहतः द्शोणिताक्षश्च वीर्यवान् ।
यूपाक्षश्च प्रजङ्‌घश्च निहतौ तु महाहवे ॥ १२ ॥
अकंपन आणि पराक्रमी शोणिताक्ष येथेच मारले गेले. यूपाक्ष आणि प्रजङ्‌घही येथेच महासमरात मारले गेले. ॥१२॥
विद्युज्जिह्वोऽत्र निहतो राक्षसो भीमदर्शनः ।
यज्ञशत्रुश्च निहतः सुप्तघ्नश्च महाबलः ॥ १३ ॥
ज्यांच्याकडे पहावयासही भय वाटत असे तो राक्षस विद्युज्जिव्ह येथेच मृत्युमुखी पडला. यज्ञशत्रु आणि महाबली सुप्तघ्नलाही येथेच मारण्यात आले होते. ॥१३॥
सूर्यशत्रुश्च निहतो ब्रह्मशत्रुस्तथापरः ।
अत्र मन्दोदरी नाम भार्या तं पर्यदेवयत् ॥ १४ ॥

सपत्‍नीनां सहस्रेण सास्रेण परिवारिता ।
सूर्यशत्रु आणि ब्रह्मशत्रु नामक निशाचरांचाही येथेच वध केला गेला होता. येथेच रावणाची भार्या मंदोदरी हिने त्याच्यासाठी विलाप केला होता. त्यासमयी ती आपल्या हजारोहूनही अधिक सवतींनी घेरलेली होती. ॥१४ १/२॥
एतत् तु दृश्यते तीर्थं समुद्रस्य वरानने ॥ १५ ॥

यत्र सागरमुत्तीर्य तां रात्रिमुषिता वयम् ।
सुमुखी ! हे समुद्राचे तीर्थ दिसून येत आहे जेथे समुद्र पार करून आल्यावर आम्ही लोकांनी रात्र घालविली होती. ॥१५ १/२॥
एष सेतुर्मया बद्धः सागरे लवणार्णवे ॥ १६ ॥

तव हेतोर्विशालाक्षि नलसेतुः सुदुष्करः ।
विशाल लोचने ! खार्‍या पाण्याच्या समुद्रात हा मी बांधविलेला पूल आहे, जो नलसेतु नावाने विख्यात आहे. देवि ! तुमच्या साठीच हा अत्यंत दुष्कर सेतु बांधला गेला होता. ॥१६ १/२॥
पश्य सागरमक्षोभ्यं वैदेहि वरुणालयम् ॥ १७ ॥

अपारमभिगर्जन्तं शङ्‌खशुक्तिसमाकुलम् ।
वैदेही ! या अक्षोभ्य वरूणालय समुद्राला तर पहा जो अपारसा दिसून येत आहे. शंख आणि शिंपल्यांनी भरलेला हा सागर कसा गर्जना करत आहे ! ॥१७ १/२॥
हिरण्यनाभं शैलेन्द्रं काञ्चनं पश्य मैथिलि ॥ १८ ॥

विश्रमार्थं हनुमतो भित्त्वा सागरमुत्थितम् ।
मैथिली ! या सुवर्णमय पर्वतराज हिरण्यनाभाला तर पहा; जो हनुमानास विश्राम देण्यासाठी समुद्राच्या जलराशीला चिरून वर निघाला होता. ॥१८ १/२॥
एतत् कुक्षौ समुद्रस्य स्कन्धावारनिवेशनम् ॥ १९ ॥

अत्र पूर्वं महादेवः प्रसादमकरोद् विभुः ।
या समुद्राच्या उदरातच विशाल टापू आहे, जेथे मी सेनेचा (पडाव) तळ ठोकला होता. येथेच पूर्वकाळी भगवान्‌ महादेवांनी माझ्यावर कृपा केली होती - सेतु बांधण्यापूर्वी माझ्या द्वारा स्थापित होऊन ते येथे विराजमान झाले होते. ॥१९ १/२॥
एतत् तु दृश्यते तीर्थं सागरस्य महात्मनः ॥ २० ॥

सेतुबन्ध इति ख्यातं त्रैलोक्येन च पूजितम् ।
या पुण्यस्थळी विशालकाय समुद्राचे तीर्थ दिसून येत आहे, जे सेतु निर्मितिचा मूलप्रदेश असल्याकारणाने सेतुबंध नावाने विख्यात होईल तसेच तीन्ही लोकांच्या द्वारा पूजित होईल. ॥२० १/२॥
एतत् पवित्रं परमं महापातकनाशनम् ॥ २१ ॥

अत्र राक्षसराजोऽयं आजगाम विभीषणः ।
हे तीर्थ परम पवित्र आणि महान्‌ पातकांचा नाश करणारे होईल. येथेच हे राक्षसराज विभीषण येऊन मला भेटले होते. ॥२१ १/२॥
एषा सा दृश्यते सीते किष्किन्धा चित्रकानना ॥ २२ ॥

सुग्रीवस्य पुरी रम्या यत्र वाली मया हतः ।
सीते ! ही विचित्र वनप्रान्ताने सुशोभित किष्किंधा दिसून येत आहे, जी वानरराज सुग्रीवांची सुरम्य नगरी आहे. येथे मी वालीचा वध केला होता. ॥२२ १/२॥
अथ दृष्ट्‍वा पुरीं सीता किष्किन्धां वालिपालिताम् ॥ २३ ॥

अब्रवीत् प्रश्रितं वाक्यं रामं प्रणयसाध्वसा ।
त्यानंतर वालिपालित किष्किंधापुरीचे दर्शन करून सीतेने प्रेमाने विव्हळ होऊन श्रीरामांना विनयपूर्वक म्हटले - ॥२३ १/२॥
सुग्रीवप्रियभार्याभिः ताराप्रमुखतो नृप ॥ २४ ॥

अन्येषां वानरेन्द्राणां स्त्रीभिः परिवृता ह्यहम् ।
गन्तुमिच्छे सहायोध्यां राजधानीं त्वया सह ॥ २५ ॥
महाराज ! मी सुग्रीवांच्या तारा आदि प्रिय भार्यांना तसेच अन्य वानरेश्वरांच्या स्त्रियांना बरोबर घेऊन आपल्यासह आपली राजधानी अयोध्या हिच्यामध्ये जाऊ इच्छिते.(**)॥२४-२५॥
** - सीतेने येथे जी वानरांच्या स्त्रियांना बरोबर घेऊन जाण्याची इच्छा प्रकट केली आहे, यासाठी किष्किंधेमध्ये विमान थांबून सर्वांना एक दिवस तेथे थांबावे लागले. असे रामायणतिलककारांचे मत आहे. त्यांच्या कथनानुसार अश्विनशुक्ल चतुर्थीला किष्किंधेत राहून पञ्चमीला तेथून प्रस्थान केले गेले. भगवान्‌ श्रीरामांनी तेथे थांबून त्याच दिवशी अंगदाचा किष्किंधेच्या युवराजपदावर अभिषेक करविला होता. जसा की महाभारत, वनपर्व अध्याय २९१ श्लोक ५८-५९ यांत सूचित झाले आहे.)
एवमुक्तोऽथ वैदेह्या राघवः प्रत्युवाच ताम् ।
एवमस्त्विति किष्किन्धां प्राप्य संस्थाप्य राघवः ॥ २६ ॥

विमानं प्रेक्ष्य सुग्रीवं वाक्यमेतदुवाच ह ।
विदेहनंदिनी सीतेने असे म्हटल्यावर राघव म्हणाले - असेच होवो. नंतर किष्किंधेस पोहोंचल्यावर त्यांनी विमान थांबविले आणि सुग्रीवाकडे पाहून म्हटले - ॥२६ १/२॥
ब्रूहि वानरशार्दूल सर्वान् वानरपुङ्‌गवान् ॥ २७ ॥

स्त्रिभिः परिवृताः सर्वे ह्ययोध्यां यान्तु सीतया ।
तथा त्वमपि सर्वाभिः स्त्रीभिः सह महाबल ॥ २८ ॥

अभित्वरस्व सुग्रीव गच्छामः प्लवगाधिपः ।
वानरश्रेष्ठ ! तुम्ही समस्त वानरयूथपतिंना सांगा की ते सर्व लोक आपापल्या स्त्रियांसह सीतेबरोबर अयोध्येस येऊ देत तसेच महाबली वानरराज सुग्रीव ! तुम्ही ही आपल्या सर्व स्त्रियांना बरोबर घेऊन शीघ्र निघण्याची तयारी करा, ज्यायोगे आम्ही त्वरेने तेथे पोहोचू. ॥२७-२८ १/२॥
एवमुक्तस्तु सुग्रीवो रामेणामिततेजसा ॥ २९ ॥

वानराधिपतिः श्रीमान् तैश्च सर्वैः समावृतः ।
प्रविश्यान्तःपुरं शीघ्रं तारामुद्वीक्ष्य सोऽब्रवीत् ॥ ३० ॥
अमित तेजस्वी रामांनी असे म्हटल्यावर त्या सर्व वानरांनी घेरलेले श्रीमान्‌ वानरराज सुग्रीव यांनी शीघ्रच आंतःपुरात जाऊन तारेची भेट घेतली आणि याप्रकारे सांगितले - ॥२९-३०॥
प्रिये त्वं सह नारीभिः वानराणां महात्मनाम् ।
राघवेणाभ्यनुज्ञाता मैथिलीप्रियकाम्यया ॥ ३१ ॥

त्वर त्वमभिगच्छामो गृह्य वानरयोषितः ।
अयोध्यां दर्शयिष्यामः सर्वा दशरथस्त्रियः ॥ ३२ ॥
प्रिये ! तू मैथिली सीतेचे प्रिय करण्याचा इच्छेने राघवांच्या आज्ञेनुसार सर्व प्रधान महात्मा वानरांच्या स्त्रियांसह निघण्याची तयारी कर. आपण या वानर-पत्‍नींना बरोबर घेऊन निघू या आणि त्यांना अयोध्यापुरी तसेच महाराज दशरथांच्या राण्यांचे दर्शन करवू या. ॥३१-३२॥
सुग्रीवस्य वचः श्रुत्वा तारा सर्वाङ्‌गशोभना ।
आहूय चाब्रवीत् सर्वा वानराणां तु योषितः ॥ ३३ ॥
सुग्रीवांचे हे बोलणे ऐकून सर्वांगसुंदरी तारेने समस्त वानर-पत्‍नींना बोलावून म्हटले - ॥३३॥
सुग्रीवेणाभ्यनुज्ञाता गन्तुं सर्वैश्च वानरैः ।
मम चापि प्रियं कार्यं अयोध्या दर्शनेन च ॥ ३४ ॥

प्रवेशं चैव रामस्य पौरजानपदैः सह ।
विभूतिं चैव सर्वासां स्त्रीणां दशरथस्य च ॥ ३५ ॥
सख्यांनो ! सुग्रीवांच्या आज्ञेनुसार तुम्ही सर्व जणी आपले पति, समस्त वानरांसह अयोध्येला येण्यासाठी शीघ्र तयार व्हा. अयोध्येचे दर्शन करून तुम्ही सर्व जणी माझेही प्रिय कार्य कराल. तेथे पुरवासी आणि जनपदाच्या लोकांसह श्रीरामांचा जो आपल्या नगरात प्रवेश होईल, तो उत्सव आपल्याला पहावयास मिळेल. आपण तेथे महाराज दशरथांच्या समस्त राण्यांच्या वैभवाचेही दर्शन करू. ॥३४-३५॥
तारया चाभ्यनुज्ञाताः सर्वा वानरयोषितः ।
नेपथ्य विधिपूर्वं तु कृत्वा चापि प्रदक्षिणम् ॥ ३६ ॥

अध्यारोहन् विमानं तत् सीतादर्शनकाङ्‌क्षया ।
तारेची आज्ञा होताच सर्व वानर-पत्‍नींनी शृंगार करून त्या विमानाची परिक्रमा केली आणि सीतेच्या दर्शनाच्या इच्छेने त्या विमानावर चढल्या. ॥३६ १/२॥
ताभिः सहोत्थितं शीघ्रं विमानं प्रेक्ष्य राघवः ॥ ३७ ॥

ऋष्यमूकसमीपे तु वैदेहीं पुनरब्रवीत् ।
त्या सर्वांना घेऊन विमान शीघ्र वर उडालेले पाहून राघव ऋष्यमूकाच्या जवळ आल्यावर पुन्हा वैदेहीला म्हणाले - ॥३७ १/२॥
दृश्यतेऽसौ महान् सीते सविद्युदिव तोयदः ॥ ३८ ॥

ऋष्यमूको गिरिवरः काञ्चनैर्धातुभिर्वृतः ।
सीते ! तो जो वीजेसहित मेघासमान सुवर्णमय धातुंनी युक्त श्रेष्ठ तसेच महान्‌ पर्वत दिसून येत आहे, त्याचे नाव ऋष्यमूक आहे. ॥३८ १/२॥
अत्राहं वानरेन्द्रेण सुग्रीवेण समागतः ॥ ३९ ॥

समयश्च कृतः सीते वधार्थं वालिनो मया ।
सीते ! येथेच मी वानरराज सुग्रीवाला भेटलो होतो आणि मैत्री केल्यानंतर वालीचा वध करण्याची प्रतिज्ञा केली होती. ॥३९ १/२॥
एषा सा दृश्यते पम्पा नलिनी चित्रकानना ॥ ४० ॥

त्वया विहीनो यत्राहं विललाप सुदुःखितः ।
हीच ती पंपा नामक पुष्करिणी आहे जी तटवर्ती विचित्र काननांनी सुशोभित होत आहे. येथे तुझ्या वियोगाने अत्यंत दुःखी होऊन मी विलाप केला होता. ॥४० १/२॥
अस्यास्तीरे मया दृष्टा शबरी धर्मचारिणी ॥ ४१ ॥

अत्र योजनबाहुश्च कबन्धो निहतो मया ।
याच पंपेच्या तटावर मला धर्मपरायणा शबरीचे दर्शन झाले होते. येथे ते स्थान आहे जेथे एक योजन लांब भुजा असलेल्या कबंध नामक असुराचा मी वध केला होता. ॥४१ १/२॥
दृश्यतेऽसौ जनस्थाने श्रीमान् सीते वनस्पतिः ॥ ४२ ॥

जटायुश्च महातेजाः तव हेतोर्विलासिनि ।
रावणस्य नृशंसस्य जटायोश्च महात्मनः ॥ ४३ ॥
विलासिनी सीते ! जनस्थानात तो शोभाशाली विशाल वृक्ष दिसून येत आहे, जेथे बलवान्‌ तसेच महातेजस्वी पक्षिप्रवर जटायु तुझे रक्षण करतांना रावणाच्या हातून मारले गेले होते. ॥४२-४३॥
खरश्च निहतो यत्र दूषणश्च निपातितः ।
त्रिशिराश्च महावीर्यो मया बाणैरजिह्मगैः ॥ ४४ ॥
हे तेच स्थान आहे जेथे माझ्या सरळ जाणार्‍या बाणांच्या द्वारा खर मारला गेला, दूषण धराशायी झाला आणि महापराक्रमी त्रिशिराचाही अंत झाला होता. ॥४४॥
एतत् तदाश्रमपदं अस्माकं वरवर्णिनि ।
पर्णशाला तथा चित्रा दृश्यते शुभदर्शने ॥ ४५ ॥

यत्र त्वं राक्षसेन्द्रेण रावणेन हृता बलात् ।
वरवर्णिनी ! शुभदर्शने ! हा आपला आश्रम आहे तसेच ती विचित्र पर्णशाला दिसून येत आहे, जेथे येऊन राक्षसराज रावणाने बलपूर्वक तुमचे अपहरण केले होते. ॥४५ १/२॥
एषा गोदावरी रम्या प्रसन्नसलिला शिवा ॥ ४६ ॥

अगस्त्यस्याश्रमश्चैव दृश्यते कदलीवृतः ।
ही स्वच्छ जलराशीने सुशोभित मङ्‌गलमयी रमणीय गोदावरी नदी आहे. तसेच केळ्यांच्या बागेने घेरलेला महर्षि अगस्त्यांचा आश्रमही दिसून येत आहे. ॥४६ १/२॥
दीप्तश्चैवाश्रमो ह्येष सुतीक्ष्णस्य महात्मनः ॥ ४७ ॥

दृश्यते चैव वैदेहि शरभङ्‌गाश्रमो महान् ।
उपयातः सहस्राक्षो यत्र शक्रः पुरन्दरः ॥ ४८ ॥
हा महात्मा सुतीक्ष्णांचा दीप्तिमान आश्रम आहे आणि वैदेही ! तो शरभङ्‌ग मुनिंचा आश्रम दिसून येत आहे, जेथे सहस्त्रनेत्रधारी पुरंदर इंद्रही आले होते. ॥४७-४८॥
अस्मिन् देशे महाकायो विराधो निहतो मया ।
एते हि तापसावासा दृश्यन्ते तनुमध्यमे ॥ ४९ ॥
हे ते स्थान आहे, जेथे मी विशालकाय विराधाचा वध केला होता, देवि ! तनुमध्यमे ! हे ते तापस दिसून येत आहेत ज्यांचे दर्शन आपण पूर्वी केले होते. ॥४९॥
अत्रिः कुलपतिर्यत्र सूर्यवैश्वानरोपमः ।
अत्र सीते त्वया दृष्टा तापसी धर्मचारिणी ॥ ५० ॥
सीते ! या तापसाश्रमावरच सूर्य आणि अग्निसमान तेजस्वी कुलपति अत्रि मुनि निवास करतात. येथेच तुम्ही धर्मपरायणा तपस्विनी अनसूया देविचे दर्शन केले होते. ॥५०॥
असौ सुतनु शैलेन्द्रः चित्रकूटः प्रकाशते ।
यत्र मां केकयीपुत्रः प्रसादयितुमागतः ॥ ५१ ॥
सुतनु ! हा गिरिराज चित्रकूट प्रकाशित होत आहे. तेथेच कैकेयीकुमार भरत मला प्रसन्न करून परत घेऊन जाण्यासाठी आले होते. ॥५१॥
एषा सा यमुना रम्या दृश्यते चित्रकानना ।
भरद्वाजाश्रमः श्रीमान् दृश्यते चैष मैथिलि ॥ ५२ ॥
मैथिली ! ही विचित्र काननांनी सुशोभित रमणीय यमुना नदी दिसून येत आहे आणि हा शोभाशाली भरद्वाजाश्रम दृष्टिगोचर होत आहे. ॥५२॥
इयं च दृश्यते गङ्‌गा पुण्या त्रिपथगा नदी ।
नानाद्विजगणाकीर्णा सम्प्रपुष्पित कानना ॥ ५३ ॥
ही पुण्यसलिला त्रिपथगा गंगा नदी दिसून येत आहे जिच्या तटावर नाना प्रकारचे पक्षी कलरव करीत आहेत आणि द्विजवृन्द पुण्यकर्मांमध्ये रत आहेत. हिच्या तटवर्ती वनांतील वृक्ष सुंदर फुलांनी लगडलेले आहेत. ॥५३॥
शृंगवेरपुरं चैतद् गुहो यत्र सखामम ।
एषा सा दृश्यते सीते सरयूर्यूपमालिनी ॥ ५४ ॥

एषा सा दृश्यते सीते राजधानी पितुर्मम् ।
अयोध्यां कुरु वैदेहि प्रणामं पुनरागता ॥ ५५ ॥
हे शृङ्‌गवेरपुर आहे जेथे माझा मित्र गुह राहात आहे. सीते ! ही यूपमालांनी अलंकृत सरयू दिसून येत आहे, जिच्या तटावर माझ्या पित्याची राजधानी आहे. वैदेही ! तू वनवासा नंतर परत अयोध्येला आली आहेस. म्हणून या पुरीला प्रणाम कर. ॥५४-५५॥
ततस्ते वानराः सर्वे राक्षसाः सविभीषणः ।
उत्पत्योत्पत्य संहृष्टाः तां पुरीं ददृशुस्तदा ॥ ५६ ॥
तेव्हा विभीषणा सहित ते सर्व राक्षस आणि वानर अत्यंत हर्षाने उल्लसित होऊन उड्‍या मारमारून त्या पुरीचे दर्शन घेऊ लागले. ॥५६॥
ततस्तु तां पाम्डुरहर्म्यमालिनीं
विशालकक्ष्यां गजवाजिभिर्वृताम् ।
पुरीमश्यन्शुः प्लवगाः सराक्षसाः
पुरीं महेन्द्रस्य यथाऽमरावतीम् ॥ ५७ ॥
तत्पश्चात्‌ ते वानर आणि राक्षस श्वेत अट्‍टालिकांनी अलंकृत आणि विशाल भवनांनी विभूषित अयोध्यापुरीला, जी हत्ती-घोड्‍यांनी भरलेली आणि देवराज इंद्राच्या अमरावती पुरी प्रमाणे शोभत होती, पाहू लागले. ॥५७॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे त्रयोविंशत्यधिकशततमः सर्गः ॥ १२३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशेतेविसावा सर्ग पूरा झाला. ॥१२३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP