॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अयोध्याकाण्ड ॥

अध्याय २१ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

तीर्थराजिं तैं स्नाना करुनी । सहित समाज मुनिस शिर नमुनी ॥
आज्ञा आशीर्वच शिरिं धरिति । करुन दंडवत बहुत विनविति ॥
पथ-कुशलां सब लोकां घेउनि । निघति चित्रकुटीं मन देउनि ॥
धृत आधारा रामसखा कर । चालति जणुं अनुराग देहपर ॥
शिरि छाया ना पायिं पायतण । प्रेम नेम-धर्म-व्रतिं कपट न ॥
लक्ष्मण राम सिता पथ काहणि । पुसती सख्या वदति मृदु भाषणिं ॥
राम -वास-थळ-विटपां पाहत । उरिं अनुराग न रोधुनि राहत ॥
बघुनि दशा सुर वर्षति फूल । महि मृदु मार्ग हि मंगल मूल ॥

दो० :- करित जाति छा जलद सुखद वहत वर वात ॥
पथ न हि रामा तसा जैसा भरता जात ॥ २१६ ॥

( उजाडल्यावर) तीर्थराज - प्रयागात स्नान केले व सर्व समाजासहित मुनींना नमस्कार करुन, त्याची आज्ञा व आशीर्वाद मस्तकी धारण करुन, मग दंडवत नमस्कार केला व पुष्कळ विनंती केली ॥ १-२ ॥ उत्तम वाटाड्यांना व सर्व लोकांना ( आपला समाज) बरोबर घेऊन चित्रकूटावर लक्ष लाऊन निघाले ॥ ३ ॥ रामसख्याचा गुहाचा हात आधाराला धरुन असे चालत आहेत की जणूं अनुरागाने देह धारण केला आहे ॥ ४ ॥ डोक्यावर छाया नाही व पायांत पादत्राण नाही, प्रेमाच्या नेमात व सेवकधर्माच्या व्रतात कपट नाही ॥ ५ ॥ लक्ष्मण, राम व सीता यांच्या प्रवासाची कहाणी रामसख्याला विचारीत आहेत व ते मृदु भाषणाने सांगत आहेत ॥ ६ ॥ रामवासाचे स्थळ वृक्ष इ. पाहतांच अनुराग हृदयांत शोधूनही रहात नाही. ॥ ७ ॥ ही प्रेम दशा पाहून देव पुष्पवृष्टी करु लागले भूमी मृदु झाली व मार्ग मंगलमूल झाला ॥ ८ ॥ सजल मेघ छाया करित जाऊ लागले व सुखदायक ( शीतल, मंद, सुगंधी) सुंदर वारा वाहू लागला, जात असता भरतास मार्ग जसा सुखकारक होत आहे तसा राम स्वत: जात असता त्यांना झाला नाही ॥ दो० २१६ ॥

पथिं जड चेतन जिव बहु नाना । ज्यां बघती प्रभु दिसले ज्यांना ॥
ते सब परम पदा अधिकारी । भरत बघत गत भवरुज भारी ॥
ही महती भरता बहू नाहीं । राम मनीं स्मरती ज्यांना ही ॥
’राम’ जगीं एकदां हि वदती । तेहि तरुन नर तारक बनती ॥
रामप्रिय लघु बंधुस भरतां । कां न बने पथ मंगलदाता ॥
सिद्ध साधु मुनिवर असं म्हणती । भरता निरखुनि हृदिं मुद भरती ॥
महिमा बघुनि सुरेशा सोचहि । भल्या भलें जग नीचा नीच हि ॥
गुरुस म्हणें करणें प्रभू तैसें । राम भरत भेटति ना जैसें ॥

दो० :- प्रभु संकोची प्रेमवश प्रेम-पयोनिधि भाइ ॥
छल शोधुनि यत्‌ना करा सर्व साधलें जाइ ॥ २१७ ॥

मार्गात ( आजू बाजूस) असणारे पुष्कळ व नाना प्रकारचे जड व चेतन जीव आहेत व ज्यांना प्रभूंनी पाहीले किंवा प्रभू ज्यांना दिसले ॥ १ ॥ ते सर्व त्यावेळीच परम पदाचे अधिकारी झाले व आता भरतांनी त्यांस पाहताच त्यांचा मोठा ( महान) भवरोगच नाहीसा झाला ॥ २॥ पण यात भरतांचे मोठे महत्व आहे असे नाही, कारण त्यांचे स्मरण राम ( स्वत:) आपल्या मनात करीत असतात ॥ ३ ॥ जे एकदाच ‘ राम ’ म्हणतात ते सुद्धा स्वत: ( भवसागर) तरुन इतरांस तारक होतात ॥ ४ ॥ भरत तर रामचंद्रांना प्रिय आणि त्यांचे धाकटे भाऊ, मग त्यांना मार्ग मंगलदाता का होणार नाही ? ॥ ५ ॥ असे सिद्ध साधु व मुनीवर म्हणू लागले व भरतास निरखून पाहून ते आपले हृदय आनंदाने भरु लागले ॥ ६ ॥ भरताचा प्रभाव पाहून सुरेशाला चिंता लागली ! सज्जनाला जग सज्जन वाटते व नीचाला नीच वाटते ॥ ७ ॥ तेव्हा इंद्र गुरुला म्हणाला, की प्रभू ! जेणे करुन राम-भरत-भेट होणारच नाही असे करावे ॥ ८ ॥ ( कारण) प्रभु संकोची ( भिडस्त स्वभावाचे) व प्रेमाला वश होणारे आहेत व रामबंधु भरत तर प्रेमाचा ( क्षीर) सागरच आहे, म्हणून काहीतरी ( कपट) युक्ती साधून यत्‍न करावा, नाहीतर आत्तापर्यंत साधलेले सर्व फुकट जाणार ॥ दो० २१७ ॥

सस्मित सुरगुरु परिसुनि वचना । गणिति अलोचन सहस्रनयना ॥
मायापति-सेवकासि माया । करत उलटले ती सुरराया ॥
तैं कृत कांहिं रामरुचि बघुनी । हानि अतां कीं कुचाळि करुनी ॥
श्रुणु सुरेश रघुपति-स्वभवहि । निज अपराधें क्रोध कदा नहिं ॥
भक्तांच्या अपराधा करती । राम-रोष-पावकिं ते जळती ॥
लोकीं वेदिं विदित इतिहास । हा महिमा जाणति दुर्वास ॥
कोण भरत-सम रामस्नेही । जग जपि राम, राम जपि ज्यांहि ॥

दो० :- मनिंहि न आंआ अमरपति रघुवर-भक्त-अकाज ॥
अयश लोकिं परलोकिं अक शोका दिन दिन माज ॥ २१८ ॥

सुरेशाचे म्हणने ऐकून सुरगुरुंनी स्मित केले व त्यांना वाटले की त्याला हजार नेत्र असुन नेत्रविहीन आहे ॥ १ ॥ ( ते म्हणाले) सुरराजा ! मायापतीसेवकाशी कपटाचा प्रयोग केल्यास ती करणारांवर उलटते ॥ २ ॥ त्यावेळी जे काही केले ते रामाची रुची पाहून जाणून केले आता कुचाळी केली तर ( तुमचीच) हानी होईल ॥ ३ ॥ सुरेशा ऐक ! रघुपतीचा असा स्वभाव आहे की त्यांचा स्वत:चा अपराध केल्याने त्यांना कधी क्रोध येत नाही ॥ ४ ॥ पण जे भक्तांचे अपराध करतात ते रामाच्या शोकरुपी पावकात जळतात ॥ ५ ॥ लोकांमध्ये व वेदामध्ये हा इतिहास प्रसिद्ध आहे व हा महिमा दुर्वास ऋषींना चांगला माहीत आहे ॥ ६ ॥ भरतासारखा रामस्नेही कोणी आहे कां ? जग ‘ राम ’ नामाचा जप करते पण राम ज्यांच्या नांवाचा जप करतात ( असे भरत महान आहेत) ॥ ७ ॥ अमरपति ! रघुवरभक्ताचे अकार्य करण्याचे कधी मनांत सुद्धां आणू नका ( तसे कराल तर) सर्व लोकांत अकीर्ती व परलोकांत सुद्धा दु:खच भोगावे लागेल व दिवसे दिवस शोकाची वृद्धीच होत जाईल ॥ दो० २१८ ॥

श्रुणु सुरेश मम उपदेशाला । परम-प्रिय सेवक रामाला ॥
सेवक-सेवें राम सुखावति । सेवक वैरें वैर करिति अति ॥
उअदपि समान हि राग रोष ना । पाप पुण्य गुण दोष घेत ना ॥
कर्म-प्रधान विश्वा राखित । जो करि जसें तसें फळ चाखित ॥
तदपि करिति सम विषम विहारा । भक्त अभक्त हृदय अनुसारां ॥
अगुण अलेप अमान एकरस । राम सगुण ते भक्त-प्रेमवश ॥
राम सदा सेवक-रुचि राखिति । वेद पुराण साधु सुर साक्षिति ॥
मनिं जाणुनि हें त्यजा कुटिलपण । प्रीतिं भरतपदिं करा सुशोभन ॥

दो० :- रामभक्त परहित निरत परमदुख दुखी दयाल ॥
भक्त शिरोमणि भरत तों त्यां न भिणें सुरपाल ॥ २१९ ॥

सुरेश ! आमचा उपदेश ऐक - रामाला आपला सेवक परम प्रिय वाटतो ॥ १॥ रामसेवकाची सेवा केल्याने राम सुखी होतात आणि रामसेवकाशी वैर केले तर राम अधिक वैर करतात ॥ २ ॥ जरी प्रभु सर्वांशी समानच असतात त्यांच्या ठिकाणी आसक्ती व क्रोध नाही, ते कोणाचे पापपुण्य वा गुणदोष घेत नाहीत ॥ ३ ॥ कारण त्यांनी या विश्वाला कर्म प्रधान करुन ठेवले आहे व जो जसे कर्म करतो तो तसे फळ चाखीत असतो ॥ ४ ॥ तरीसुद्धा ते भक्त किंवा अभक्त यांच्या हृदयानुसार सम - विषम - विहारलीला करीत असतात भक्तांवर अपार प्रेम करतात. ॥ ५ ॥ अगुण, अलिप्त, अप्रमेय सदा एकरस असे जे राम तेच भक्तांच्या प्रेमाला वश होऊन सगुण होतात झाले आहेत ॥ ६ ॥ राम सदा सेवकाची आवड पुरवितात अशी वेद, पुराणे, साधु व देव साक्ष देत असतात ॥ ७ ॥ हे मनात नीट जाणून भरताशी कुटिलपण सोडा व भरतचरणी सुंदर निष्कपट प्रीती करा ॥ ८ ॥ रामभक्त दुसर्‍यांचे व शत्रूंचेही हित करण्यात सदा रत असतात, कारण ते दयालु व परदु:खाने दु:खी होणारे आहेत. भरत तर रामभक्त शिरोमणी आहेत म्हणून सुरपाल ! त्यांचे भय मुळीच बाळगूं नका ॥ दो० २१९ ॥

सत्यसंघ प्रभु सुरहितकारी । भरत हि रामाज्ञा-अनुसारी ॥
स्वार्थ विवश तुम्हिं विकल जाहलां । भरत दोष नहिं तुम्हीं मोहलां ॥
परिसुनि सुरवर गुरुवर-वाणी । प्रमुदित झाले गेली ग्लानी ॥
हर्षुनि सुमनें वर्षुनि सुरपति । भरताचा सुस्वभाव वानति ॥
असे भरत पथिं चालत जाती । बघुनि सिद्ध मुनि सेर्षा स्तविती ॥
’राम’ म्हणुनि जैं श्वासा घेती । प्रेमा पूर चारि दिशिं येती ॥
द्रवती परिसुनि पवि पाषाणहि । पुरवासी प्रेमा वदवत नहिं ॥
मध्यें वसुनी यमुने आले । निरखुनि नीर नयनिं जल भरलें ॥

दो० :- रघुवर वर्ण बघून वर वारि समेत समाज ॥
बुडत विरह-वारिधीमधिं धरिति विवेक जहाज ॥ २२० ॥

प्रभु सत्यप्रतिज्ञ असून सुरांचे हितकर्ते आहेत. आणि भरत रामाच्या आज्ञेनुसार वागणारे आहेत ( म्हणून राम परत जातील अशी भीती भरतामुळे बाळगण्याचे काही कारणच नाही) ॥ १ ॥ तुम्ही मात्र स्वार्थाला विशेष बळी पडून व्याकुळ झाला आहांत यात भरताचा दोष नसून तुम्हाला मोह वा भ्रम झाला आहे ॥ २ ॥ सुरवराने आपल्या गुरुवरांची वर ( सुंदर ! श्रेष्ठ) वाणी ऐकली व त्याची ग्लानी नष्ट होऊन तो प्रमुदित झाला ॥ ३ ॥ सुरपतीने हर्षित होऊन पुष्पवृष्टी केली व तो भरताचा सुस्वभाव वाखाणू लागला ॥ ४ ॥ अशा प्रकारे भरत मार्गाने चालत जात आहेत त्यांची ती दशा पाहून सिद्ध व मुनी ईर्षेने त्यांची प्रशंसा करीत आहेत ॥ ५ ॥ राम असा उच्यार करीत ज्यावेळी दिर्घ श्वास घेतात त्यावेळी जणूं चारी दिशांना प्रेमाला पूर येतात ॥ ६ ॥ तो ध्वनी ऐकून वज्र व पाषाण यांना सुद्धा पाझर फुटूं लागले, व पुरवासी लोकांचे प्रेम तर वर्णन करुन सांगता येत नाही ॥ ७ ॥ मध्ये एक वस्ती करुन यमुनेजवळ आले व ते नीर ( पाणी) पाहून भरतांने डोळे पाण्याने भरले ॥ ८ ॥ रघुवराच्या वर्णाचे ते सुंदर पाणी पाहून समाजासहीत विरह सागरात बुडत असता भरताने विवेक रुपी जहाजाचा आधार घेतला ( व ते त्यात बसले) ॥ दो० २२० ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP