॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ लंकाकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय १२ वा



Download mp3

बघत पतिशिरें मंदोदरी । मूर्छित विकल पडे भूवरी ॥
धावति युवति करित आक्रंदन । तिज उठवुनि आल्या जिथं रावण ॥
पतिगति बघती रडति विलपती । केश सुटति तनुभान विसरती ॥
नानापरिं करिती उर ताडन । रडतां करती प्रताप वर्णन ॥
नाथ ! बळें तव डोले धरणी । तेजहीन पावक शशि तरणी ॥
भार न शेष कमठ सहुं शकले । तें शरीर महिं मातिंत पडलें ॥
बवरुण कुबेर सुरेश समीर । कुणि रणि सन्मुख धृत नहिं धीर ॥
स्वामि ! भुजबळें विजित काल यम । आज इथें पडलां अनाथ सम ॥
तुमची प्रभुता विश्रुत जगतीं । सुत परिजन बल वर्णुं न शकती ॥
रामविमुख हे हाल जाहले । रडण्या कोणी कुळिं न राहले ॥
विधिनिर्मित सब तव वश नाथा । दिक्पति सभय नमिति नित माथा ॥
शिर भुज जंबुक खाति अतां ही । रामविमुख हें अनुचित नाहीं ॥
काळ विवश पति ! कथित न मानां । अग जगनाथ मनुज तुम्हिं जाणा ॥

छं० :- गणिला मनुज सम दनुजकाननदहन पावक हरि च जो ।
ज्या नमिति शिव विधि अमर ही प्रिय ! ना भजा करुणाब्धि तो ॥
आजन्म तव पापौघमय, रत परद्रोह तनु अयं ॥
निजधाम दत्त तुम्हांहि नमितें ब्रह्म राम निरामयं ॥ १ ॥
दो० :- अहह ! नाथ रघुनाथ सम कृपासिंधु नहिं आन ॥
योगिवृंददुर्लभगति देति तुला भगवान ॥ १०४ ॥

मंदोदरी विलाप - पतीची शिरे बघताच मंदोदरी व्याकुळ होऊन धरणीवर पडली. ॥ १ ॥ इतर स्त्रिया रडत आक्रोश करीतच तेथे आल्या व तिला उठवून ( शुद्धीवर आणून ) रावण जिथे पडला होता तेथे आल्या. ॥ २ ॥ पतीची ती दशा पाहून, त्या रडत विलाप करु लागल्या; त्यांचे केस सुटले व त्या देहभान विसरल्या. ॥ ३ ॥ मग त्या अनेक प्रकारांनी छाती बडवून घेवूं लागल्या व रडत रडत रावणाचा प्रताप वर्णन करु लागल्या. ॥ ४ ॥ हे नाथ ! तुमच्या बळाने पृथ्वी नेहमी डोलत होती व ( तुमच्या पुढे ) सूर्य-चंद्र, अग्नि हे निस्तेज झाले होते. ॥ ५ ॥ तुमचा भार शेष व कूर्म सुद्धा सहन करु शकले नाहीत आणि आता तेच शरीर मातीत पडले आहे. ॥ ६ ॥ वरुण, कुबेर, इंद्र, वायू, इ. कोणी तुमच्या समोर युद्धात धीर धरु शकले नाहीत. ॥ ७ ॥ स्वामी ! तुम्ही आपल्या भुजबळाने काळ व यम यांना सुद्धा जिंकलेत, पण तेच तुम्ही आज इथे अनाथासारखे पडले आहात. ॥ ८ ॥ तुमची प्रभुता सगळ्या जगात प्रख्यात होती आणि पुत्र परिवाराचे बळ सुद्धा कोणी वर्णन करणे शक्य नव्हते. ॥ ९ ॥ असे असता तुम्ही रामविरोधी झाल्यामुळे तुमचे हे असे हाल झाले व तुमच्यामागे तुमच्यासाठी रडायला सुद्धा कोणी ( पुरुष ) तुमच्या कुळात राहीला नाही. ॥ १० ॥ हे नाथ ! ब्रह्मदेवाने निर्माण केलेले सर्व तुम्हांला वश होते दिक्पाल तर भयभीत होऊन रोज तुम्हांला नमन करीत होते. ॥ ११ ॥ पण आता तुमची शिरे व बाहू कोल्हे कुत्रे इ. खात आहेत रामविमुख झालात त्यामुळे असे होणे अनुचित नाही (योग्यच आहे) ॥ १२ ॥ पती ! तुम्ही काळाला विशेष वश झाल्यामुळे माझे म्हणणे ऐकले नाहीत आणि जो चराचराचा नाथ आहे त्याला तुम्ही मनुष्य समजलांत. ॥ १३ ॥ निशाचरांच्या अरण्याला जाळून टाकणारा पावक असा जो हरी त्यालाच तुम्ही मनुष्य समजलांत ज्याला शंकर ब्रह्मदेव व सर्व सुर नमस्कार करतात, त्याला हे प्रिया ! तो करुणासागर असून तुम्ही भजला नाहीत तुमचा हा देह जन्मापासूनच पाप प्रवाहमय असून तुम्ही सदा परद्रोहरत होतात तरी तुम्हाला सुद्धा त्याने निजधाम दिले. अशा त्या रामाला ब्रह्माला जो निरामय आहे त्याला मी नमस्कार करते. ॥ छंद ॥ अहह ! नाथ ! रघुनाथासारखा कृपासिंधु दुसरा कोणी नाही. कारण योगी वृंदांना सुद्धा दुर्लभ असणारी गति त्या भगवंताने तुला दिली. ॥ दो० १०४ ॥

मंदोदरी वचन आकर्णित । सुर मुनि सकल सिद्ध सुख मानित ॥
अज महेश नारद सनकादी । जे मुनिवर परमार्थ सुवादी ॥
भरुन नयन रघुपतीं न्यहाळति । प्रेम मग्न सगळे सुख पावति ॥
रुदन करत बघतां त्याता नारी । जाइ बिभीषण दुःखी भारी ॥
बघुनि बंधुगति दुःखी झाला । आज्ञा देती प्रभु अनुजाला ॥
लक्ष्मण करी बहुतपरिं सांत्वन । येई तदा प्रभुकडे बिभीषण ॥
कृपादृष्टिनें प्रभु त्या पाहुनि । वदले क्रिया करा शुच सांडुनि ॥
क्रिया कृता प्रभु आज्ञा मानुनि । विधिवत देश काल मनिं जाणुनि ॥

दो० :- मंदोदरी आदि सब देति तिलांजलि त्यास ॥
भवनीं गत वर्णित मनिं रघुपति गुण वृंदास ॥ १०५ ॥

मंदोदरीचे शब्द कानी पडताच सगळे सुर, मुनी व सगळे सिद्ध यांना सुख झाले. ॥ १ ॥ ब्रह्मदेव, महेश, नारद व सनकादिक जे चांगले परमार्थवादी मुनीश्रेष्ठ होते. ॥ २ ॥ ते डोळे भरुन रघुपतीला न्याहाळून पाहू लागले व प्रेम मग्न होऊन सगळे सुखी झाले. ॥ ३ ॥ त्या सर्व रावण स्त्रिया रडत आहेत असे पाहून बिभीषण त्यांच्याजवळ गेला व फार दु:खी झाला. ॥ ४ ॥ भावाची दशा पाहून बिभिषण दु:ख करुं लागला; तेव्हा प्रभूंनी अनुजाला आज्ञा दिली. ॥ ५ ॥ त्याप्रमाणे लक्ष्मणाने नानापरींनी बिभीषणाचे सांत्वन केले, तेव्हा बिभीषण प्रभूंकडे आला. ॥ ६ ॥ कृपादृष्टिने बिभीषणाकडे पाहून प्रभू म्हणाले की शोक सोडून क्रिया करा. ॥ ७ ॥ प्रभूची आज्ञा मानून, देशकालांचा विचार करुन बिभीषणाने रावणाची दाहक्रिया यथाविधी केली. ॥ ८ ॥ मंदोदरी प्रमुख सर्व स्त्रियांनी त्याला तिलांजली दिली आणि रघुपतीच्या गुण समूहाचे मनात वर्णन करीत त्या घरी गेल्या. ॥ दो० १०५ ॥

येइ बिभीषण नमीं पदाब्जां । कृपासिंधु बोलाविति अनुजा ॥
तुम्हिं, कपीश अंगद नल नील। जांबवंत मरुति नयशील ॥
जा सब मिळुनि बिभीषण साथ । करा तिलक वदले रघुनाथ ।
पितृवचनें येउं न नगरासी । धाडूं मजशा कपि अनुजांसी ॥
प्रभुवचनें गत मंडळि सारी । करिति सकल अभिषेक तयारी ॥
सादर सिंहासनीं बसवुनी । केली स्तुति अभिषेका करुनी ॥
शिर नमिति जोडुनि कर सगळे । प्रभुपदिं बिभीषणासह वळले ॥
मग रघुवीर कपिस बोलाविति । प्रिय वचनें सर्वांनां सुखविति ॥

छं० :- केले सुखी त्यां वाक्सुधें तुमचे बळें रिपु मारले ॥
पावे बिभीषण राज्य, जगतीं सुयश तुमचें पसरलें ॥
मज सहित शुभ ही कीर्ति तुमची गाति जे प्रेमें अती ॥ १ ॥
दो० :- प्रभुच्या वचना ऐकुनी तृप्त नव्हति कपि पुंज ॥
पुनः पुन्हां नमिती शिर सकल धरिति पदकंज ॥ १०६ ॥

भूप-बिभीषण – बिभीषण ( क्रिया करुन ) आला व त्याने प्रभुच्या चरण कमलांस नमन केले. मग कृपासिंधु प्रभूंनी अनुजाला बोलावले. ॥ १ ॥ ( व म्हणाले ) तुम्ही, कपीश सुग्रीव अंगद, नल, नील, जाबंवंत आणि मारुती असे सर्व नीतीनिपुण मिळून सर्वांनी बिभीषणाबरोबर जावे आणि त्यांना राज्याभिषेक करावा. ॥ २-३ ॥ पितृवचनामुळे मी नगरात येऊ शकत नाही, पण माझ्याच सारखे कपि व अनुज यांना पाठवीत आहे. ॥ ४ ॥ प्रभुच्या सांगण्याप्रमाणे सारी मंडळी गेली व त्यांनी राज्याभिषेकाची सर्व तयारी केली. ॥ ५ ॥ बिभीषणाला आदराने सिंहासनावर बसवून राज्याभिषेक केला व त्याची स्तुती केली. ॥ ६ ॥ हात जोडून सर्वांनी मस्तक नमवून त्यास नमस्कार केला व बिभीषणासह सर्व जण प्रभूचरणीं परत आले. ॥ ७ ॥ मग रघुवीराने कपींना बोलावले व प्रिय वाणीने सर्वांना सुखी केले. ॥ ८ ॥ रघुवीराने अमृतवाणीने याप्रमाणे सुखी केले ( म्हणाले की ) तुमच्या बळाने मी रावणाला मारले, बिभीषणाला राज्य मिळाले, व तुमचे सुयश सर्व जगात पसरले, माझ्यासहित ही तुमची शुभ कीर्ती जे कोणी अति प्रेमाने वाचतील ते अपार संसार सागर श्रमावाचून तरुन जातील. ॥ छंद ॥ प्रभूची वचने ऐकून वानर समूह तृप्त झाले नाहीत, ते पुन:पुन्हा मस्तक नमवूं लागले व चरण कमल धरुं लागले. ॥ दो० १०६ ॥

प्रभु मग हनुमंता बोलावति । लंके जावे भगवान् सांगति ॥
समाचार जानकीस सांगुनि । तुम्हिं परतावें कुशल विचारुनि ॥
हनूमान तैं नगरीं पावति । कळत निशिचरी निशिचर धावति ॥
नानापरिनीं कपीस पूजिति । जनक सुता मग तया दाखविति ॥
केलें नमन दुरुन हनुमानें । रघुपति दूत जानकी जाणे ॥
तात ! वदा प्रभु कृपानिकेत । कुशल अनुज कपि सैन्य समेत ॥
सकलहि कुशल राज्य बिभीषण । हर्ष हृदयिं ऐकुनि कपि भाषण ॥
पावे अविचल राज्य बिभीषण । हर्ष हृदयिं ऐकुनि कपि भाषण ॥

छं० :- अति हर्ष मनिं, तनुं पुलक लोचनिं जल, वदे घडि घडि रमा ।
मी देउं तुज कपि काय ? नहिं जगिं किमपि या वाणी समा ॥
श्रुणु लब्ध माते ! अखिल मज जगराज्य आज न संशयं ।
रणिं विजित रिपु दल बंधु युत बघुनी किं राममनामयं ॥ १ ॥
दो० :- श्रुणु सुत सद्‌गुण सकल तव हृदिं वसोत हनुमंत ॥
कोसलपति अनुकूल तुज सहित असोत अनंत ॥ १०७ ॥

सीता रघुपति मीलन –मग प्रभूंनी हनुमंताला बोलावले व भगवंतानी सांगीतले की तुम्ही लंकेत जा. ॥ १ ॥ जानकीला समाचार सांगून तिचे कुशल विचारुन तुम्ही परत या. ॥ २ ॥ तेव्हा हनुमान नगरात आले व हे कळताच निशाचरी व निशाचर ( त्यांचे स्वागत करण्यास ) धावत आले. ॥ ३ ॥ त्यांनी नाना प्रकारांनी कपीची पूजा केली व जनकसुता त्यास दाखविली. ॥ ४ ॥ हनुमंताने दुरुन नमस्कार केला, तेव्हा जानकीने ओळखले की हा रघुपतींचा दूत आहे. ॥ ५ ॥ ( व म्हणाली की ) तात ! सांगा पाहू कृपानिधी अनुज व सैन्य यांसह कुशल आहेत नां ? ॥ ६ ॥ माते ! कोसलाधीश सर्व प्रकारे कुशल आहेत, त्यांनी दशशीर्षाला युद्धात जिंकला. ॥ ७ ॥ व बिभीषणाला अविचल राज्य मिळाले कपीचे हे भाषण ऐकून जानकीला हृदयांत हर्ष झाला. ॥ ८ ॥ जानकीच्या मनात अति हर्ष झाला आहे, देह पुलकित झाला आहे, व नेत्रांत अश्रू आले आहेत, अशी ती रमा पुन:पुन्हा म्हणते की हे कपि ! मी तुला देऊं तरी काय ? या वाणीसारखे जगात काहीच नाही. हनुमान म्हणाला की हे माते ऐक ! युद्धात शत्रुला व त्याच्या सैन्याला जिंकलेल्या रामचंद्रांस बंधूसह पूर्ण पणे कुशल स्थितीत मी पाहीले यातच मला सगळ्या जगाचे राज्य आज मिळाले ! ॥ छंद ॥ ( सीता म्हणाली ) हे सुता, ऐक ! सर्व सदगुण तुझ्या हृदयात वसोत हनुमंता ! अनंतासह कोसलपती सदा तुझ्यावर प्रसन्न असोत. ॥ दो० १०७ ॥

तात ! असा कर अतां किं यत्‍न हि । पाहिन नयनिं शाम मृदु गात्रहि ॥
मग हनुमान् आला रामासी । सांगे जनकसुता कुशलासी ॥
श्रवुनि निरोप भानुकुलभूषण । बोलाविति युवराज बिभीषण ॥
मारुतसुता सवे तुम्हिं जाउनि । सादर जनकसुते या घेउनि ॥
शीघ्र सकल गत जेथें सीता । सेविति सब निशिचरी विनीता ॥
त्यांस बिभीषण वेगें शिकवी । नानापरिनीं स्नान घालवी ॥
नानाविध भूषणें घातलीं ।सजवुनि शिबिका रुचिर आणली ॥
हर्षें तींत बसे वैदेही । स्मरुनि राम सुखधाम स्नेही ॥
वेत्रपाणि रक्षक दिशिं चारी । जाति सकल उल्हासें भारी ॥
दर्शनार्थ कपि भल्ल पावले । क्रोधें रक्षक वारु लागले ॥
तैं रघुवीर म्हणति मम माना । सखे ! पायिं सीतेला आणा ॥
जननी सम बघतिल कपि सगळे । स्वामि हसुनि रघुनाथ बोलले ॥
प्रभुवचनें कपि भल्ल हर्षती । गगनांतुनि सुर सुमन वर्षती ॥
सीता पूर्वी अनली रक्षित । अंतःसाक्षी प्रगटवुं इच्छित ॥

दो० :- यास्तव करुणानिधि वदति कांहि तदा दुर्वाद ॥
यातुधानि सब ऐकुनी करु लागल्या विषाद ॥ १०८ ॥

तात ! आता असा यत्‍न करा की मी श्यामल मृदु शरीरास या डोळ्यांनी पाहूं शकेन. ॥ १ ॥ मग हनुमान रामापाशी गेला व त्याने जनक सुतेचे कुशल निरोपासह सांगीतले. ॥ २ ॥ निरोप ऐकून भानुकुशलभूषण रघुपतींनी युवराज अंगद व बिभीषण यास बोलावून घेतले. ॥ ३ ॥ आणि सांगीतले की तुम्ही मारुत सुताबरोबर जाऊन जनक सुतेला आदराने घेऊन या. ॥ ४ ॥ नंतर जेथे निशाचरी विनम्रपणे सीतेची सेवा करीत होत्या तेथे ते सर्व सत्वर गेले. ॥ ५ ॥ बिभीषणाने त्या सर्व निशाचरींना त्वरेने शिकवले तेव्हा त्यांनी सीतेला अनेक प्रकारांनी स्नान घातले. ॥ ६ ॥ नाना प्रकारचे अलंकार वस्त्र भूषणे तिच्या अंगावर घातली, इतक्यात एक सुंदर मेणा उत्तम प्रकारे शृंगारलेला आणला गेला. ॥ ७ ॥ सुखधाम स्नेही रामचंद्राचे स्मरण करुन वैदेही हर्षाने त्यात बसली. ॥ ८ ॥ ( सीतेच्या मेण्याच्या ) चारी बाजूस भालदार चोपदार ( वेताच्या छड्या हातात घेतलेले ) संरक्षक फार उत्साहाने चालले आहेत. ॥ ९ ॥ सीतेच्या दर्शनासाठी भल्ल कपी जवळ येऊ लागले, तेव्हा रक्षक त्यांना क्रोधाने ( छडीमार देऊन ) हाकलूं लागले. ॥ १० ॥ तेव्हा रघुवीर म्हणाले की सखे ! बिभीषणा ! मी सांगतो ते ऐका ! माना सीतेला पायी चालतच आणा. ॥ ११ ॥ स्वामी रघुनाथ हसून म्हणाले की सगळे कपि तिला जननी समान पाहतील. ॥ १२ ॥ प्रभुवचनाने भल्ल कपींना हर्ष झाला व देव आकाशातून पुष्पवृष्टी करुं लागले. ॥ १३ ॥ सीतेला पूर्वी अग्नित गुप्त ठेवली आहे, तिला अन्त:साक्षी प्रभू प्रगट करुं इच्छित आहेत. ॥ १४ ॥ म्हणून करुणानिधी ( असूनही ) रघुनाथ काही( अपशब्द ) सीतेला बोलले ते ऐकून ( तिच्या बरोबर आलेल्या ) सर्व राक्षसी दु:खाने हळहळूं लागल्या. ॥ दो० १०८ ॥

प्रभुवचना शिरिं धरुनी सीता । वदली मनकृति वचनपुनीता ॥
लक्ष्मण व्हा तुम्हिं धर्मसहायक । वेगें प्रगट करा कीं पावक ॥
लक्ष्मण ऐकुनि सीता भाषित । विरह विवेक धर्मरति मिश्रित ॥
सजल विलोचन जुळुनि करांही । प्रभुस तोहि वदुं शके न काहीं ॥
बघुनि रामकल लक्ष्मण धावति । प्रगटुनि पावक काष्ठें आणति ॥
प्रबल बघुनि पावक वैदेही । हर्षित हृदिं भय नहिं कसलें ही ॥
जर मनवचकृतिं मम हृदयाही । गति रघुवीर विना दुजि नाहीं ॥
गति सर्वांची सुविदित अनला । तो होवो श्रीखंड सम मला ॥

छं० :- श्रीखंडसम पावकिं शिरे प्रभुला स्मरोनी मैथिली ।
जय कोसलेश महेशवंदितचरण रति निर्मल भलीं ॥
प्रतिबिंब नी लौकिक कलंक प्रचंड पावकिं दग्ध; तें ।
प्रभुचरित कोणि न जाणि, नभिं सुर सिद्ध मुनि बघतात ते ॥ १ ॥
मग मूर्त पावक धरुनि कर मा सत्य वेद जनीं श्रुता ।
जेवीं पयोनिधिं इंदिरा रामा समर्पी ती तथा ॥
ती राम वाम विभागिं राजत, रुचिर अति शोभा भली ॥
नव नील नीरज निकट जणुं कीं कनक कमळाची कळी ॥ २ ॥
दो० :- वर्षति हर्षित सुमन सुर वाद्य गजर गगनांत ॥
गाती किंनर सुरवधू नाचति नभयानांत ॥ १०९रा ॥
सहित जनकतनया प्रभु शोभा अमित अपार ॥
मुदित भल्लकपि बघुनी जय रघुपति सुखसार ॥ १०९म ॥

प्रभुचे वचन शिर सामान्य करुन मनाने कर्माने व वाणीने पुनीत असलेली सीता ॥ १ ॥ लक्ष्मणास म्हणाली की हे लक्ष्मणा ! तुम्ही माझे धर्म बंधू व्हा, तुम्ही त्वरेने पावक प्रगट करा. ॥ २ ॥ विरह, विवेक व धर्म प्रीती यांनी मिश्रित असे सीतेचे वचन ऐकून लक्ष्मणाचे डोळे अश्रूंनी भरले व त्याने दोन्ही हात जोडले, पण तो सुद्धा प्रभूला काही सांगू शकला नाही. ॥ ४ ॥ रामचंद्रांचा कल पाहून लक्ष्मण धावले व पावक प्रगट करुन पुष्कळ काष्ठे आणली. ॥ ५ ॥ पावक प्रबल झाला आहे असे पाहून सीतेला ( वैदेहीला ) हर्ष झाला, तिच्या हृदयांस कसलेही भय वाटले नाही, ती म्हणाली, जर मनाने, वाणीने, आणि कृतीने माझ्या हृदयास रघुवीरावाचून अन्य गति नसेल तर, ॥ ७ ॥ सर्वांची गति उत्तम जाणणारा अग्नि आहे, तो मला चंदनासारख शीतल होवो. ॥ ८ ॥ प्रभु रामचंद्रांचे स्मरण करुन, व ज्या चरणांना महेश वंदन करतात व ज्या चरणांच्या ठिकाणी सीतेचे उत्तम निर्मळ प्रेम आहे त्या कोसल पतींचा जय जय कार करुन मैथिलीने चंदनासारख्या शीतल पावकात प्रवेश केला, सीतेची प्रतिकृती आणि लौकिक कलंक त्या प्रचंड पावकात दग्ध झाले ते प्रभुचरित्र कोणी जाणले नाही, पण आकाशात असलेले देव, सिद्ध व मुनी ते पहात आहेत. ॥ छं१ ॥ मग मूर्तीमान अग्नीने वेदामध्ये व लोकात प्रसिद्ध असलेली जी सत्य सीता तिचा हात धरुन ती रामचंद्रांस समर्पण केली, जशी क्षीरसागराने विष्णूला लक्ष्मी, समर्पण केली ती सीता रामचंद्राच्या वामभागी विराजत आहे. त्यांची उत्तम शोभा अशी ती अति सुंदर आहे, की जणूं नविन फुललेल्या नीलकमळाच्या जवळ सोन कमळाची कळीच सुशोभित झाली आहे. ॥ छंद २ ॥ देव हर्षित होऊन पुष्पवृष्टी करुं लागले, आकाशात सुरवाद्यांचा गजर सुरु झाला किंन्नर गावूं लागले अप्सरा विमानात नृत्य करुं लागल्या. ॥ दो०१०९ रा॥ जानकीसहित प्रभुची अपरिमित अपार शोभा पाहून भल्ल व कपि आनंदित झाले व सुखसार रघुपतीचा जयजयकार करुं लागले. ॥ दो०१०९ म ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP