॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ सुंदरकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय ७ वा



Download mp3

राम स्वभाव वानिति उघडहि । प्रेमें अति, विसरुनि निज कपटहि ॥
तैं रिपुहेर कपींनां कळलें । बांधुनि सब कपिपतिशि आणले ॥
सुग्रिव वदला ऐका वानर । धाडा भंगुनि अंगनिशाचर ॥
आज्ञा ऐकुनि वानर धावति । बांधुनि कटकिं धिंड सब काढति ॥
नानापरिं कपि हाणिति झोडिति । दीन वचनिं विनवितां न सोडिति ॥
हरतिल अमच्या नाका-कानां । कोशलपतिची आण तयानां ॥
श्रवुनि निकट त्यां लक्ष्मण अणविति । शीघ्र, दया ये, हसुनि सोडविति ॥
द्या रावण-करिं पत्र वदा त्या- । लक्ष्मण वचन वाच कुलघात्या ॥

दो :- मम संदेश उदार त्या मूढ-कानिं घालाल ॥
भेट सिता देउनि न तर तुमचा आला काळ ॥ ५२ ॥

ते रावणाचे हेर रामस्वभावाची अति प्रेमाने उघड उघड प्रशंसा करू लागले. अति प्रेमामुळे ते आपले कपट विसलेच. ॥ १ ॥ तेव्हा वानरांनी ओळखले की हे शत्रूदूत आहेत तेव्हा लगेच त्या सर्वांना बांधून सुग्रीवाजवळ आणले. ॥ २ ॥ सुग्रीवाने सांगितले वनरांनो, ऐका. या निशाचरांची अंगे भंग करून द्या पाठवून. ॥ ३ ॥ सुग्रीवाची आज्ञा ऐकून वानर धावत आले व त्या निशाचरांना पक्के बांधून त्यांची सर्व कपि-सैन्यात धिंड काढली. ॥ ४ ॥ कपी त्यांना अनेक प्रकारे मारझोड करू लागले तेव्हा त्यांनी दीनवाणीने विनवण्या केल्या; तरी कपींनी त्यांना सोडले नाही (जाक, कान कापून द्या सोडून असे कोणी म्हणू लागले). ॥ ५ ॥ तेव्हा ते दूत म्हणाले आमचे नाक कान कापतील त्यांना कोसलपती रामांची शपथ आहे. ॥ ६ ॥ ते ऐकून लक्ष्मणाने हेरांना जवळ आणवले, (त्यांची केविलवाणी दशा पाहून) लक्ष्मणाला दया आली व हसून त्वरित त्यांना लक्ष्मणाने बंधमुक्त केले. ॥ ७ ॥ (व त्यांना म्हणाले की) हे पत्र रावणाच्या हाती द्या व तोंडी सांगा की, हे कुलघातक्या, लक्ष्मणाचे पत्र वाचून बघ. ॥ ८ ॥ आणि माझा उदार संदेश त्या मूर्खाच्या कानी घाला की, सीता परत देऊन येऊन भेट, नाहीतर सर्व निशाचरांचा काळ आला आहे असे समज. ॥ दो. ५२ ॥

त्वरें नमुनि लक्ष्मणपदिं माथा । निघति दूत वर्णित गुणगाथा ॥
वदत रामयश लंके आले । रावणपदिं शिर नमते झालें ॥
दशमुख विहसुनि विचारि वृत्ता । वदसि न शुक आपली कुशलता ।
सांग वृत्त मग बिभीषणाचे । मरण निकट अति आलें ज्याचें ॥
राज्य करत शठ लंके त्यागी । यवकीटक होईल अभागी ॥
मग वद रीस कीश कटकें, तीं । प्रेरित कठीण काळें येतीं ॥
त्यांचे जीवन-रक्षणकर्ता । होइ चित्तमृदु तटिनी भर्ता ॥
तापस वार्ता वद मग सारी । ज्यांचे हृदयिं भीति मम भारी ॥

दो :- झाली भेट किं गत मम ऐकुनि सुयश अपार ।
वदसि न रिपुदल तेजबल चकित चित्त तव फार ॥ ५३ ॥

त्वरेने लक्ष्मणाच्या चरणांवर मस्तक नमवून ते दूत गुणगाथा वर्णन करीत परत निघाले. ॥ १ ॥ रामयशाचे गान करीत ते लंकेत आले व त्यांनी रावणास नमन केले. ॥ २ ॥ दशमुखाने मोठ्याने हसून हकीकत विचारण्यास प्रारंभ केला. हे शुक, तू आपली कुशलता का नाही सांगत ? ॥ २ ॥ ज्याचा मृत्यु अति जवळ आला आहे त्या बिभीषणाची हकीकत मला सांग. ॥ ४ ॥ (चांगले) राज्य करीत असता शठाने लंकेचा त्याग केला. आता अभागी यवातील किडा होईल (धान्यातील पोरकिड्याप्रमाणे भरडला जाईल - म्हणजे राम लक्ष्मण यवासारखे तुच्छ धान्य व त्यांच्या आश्रयाला गेलेला बिभीषण हा त्यातील किडा-कीटक). ॥ ५ ॥ कठीण काळाच्या प्रेरणेने आलेले ते ऋक्ष व वानर सैन्य कसे आहे सांग. ॥ ६ ॥ त्यांच्या जीवनाचे रक्षण करणारा कोमल चित्ताचा सागर आहे (म्हणून बरे). ॥ ७ ॥ ज्यांच्या हृदयात माझी भारी भिती असेल त्या तापसांची सर्व हकीकत मला सांग. ॥ ८ ॥ त्यांची भेट झाली की माझे अपार सुयश ऐकून गेले परत ? तू शत्रू, त्याचे सैन्य, तेज, बल इत्यादि विषयी काहीच कसे बोलत नाहीस. तुझे चित्त फार चकित झालेले दिसते, ते कां ? ॥ दो. ५३ ॥

नाथ कृपेनें पुसलें जेवीं । त्यजुनि कोप वच माना तेवीं ।
जाइ अनुज तुमचा भेटे जैं । राज्य टिळक त्या कृत रामें तैं ॥
रावण चर अम्हिं पडतां कानां । बांधुनि दुःख देति कपि नाना ॥
श्रवण नासिका कापूं लागति । राम शपथ घालूं तैं त्यागति ॥
पुसिली नाथ राम सेना जी । मुखीं कोटि शत वदवेना ती ॥
विविध-वर्ण कपिभल्ल सैन्य वर । विकटानन हि विशाल भयंकर ॥
जो पुर जाळी वधि तव तनया । सकल कपी मधिं अल्प बल तया ॥
अमित नाम भट कठिण कराल हि । अमित नाग बल विपुल विशालही ॥

दो :- द्विविद मयंद नील नल अंगद गद विकटासि ॥
दधिमुख केसरि निशठ शठ जांबवंत बलरासि ॥ ५४ ॥

नाथ ! आपण कृपेने जसे विचारलेत तसेच क्रोधाचा त्याग करूनच माझे सांगणे माना, त्यावर विश्वास ठेवा. ॥ १ ॥ तुमचा अनुज जेव्हा जाऊन भेटला तेव्हाच रामाने त्याला लंकेचा राज्याभिषेक केला. ॥ २ ॥ आम्ही रावणाचे दूत आहोत असे कानी पडताच कपींनी आम्हाला बांधून नाना प्रकारे दुःख दिले. ॥ ३ ॥ ते आमचे नाक-कान कापू लागले होते पण आम्ही रामशपथ घातली तेव्हा आम्हाला सोडले. ॥ ४ ॥ नाथ ! तुम्ही ज्या कपी सेनेविषयी विचारलेत ती शतकोटी मुखांनीही वर्णन करता येणार नाही. ॥ ५ ॥ ती वानर-भल्लांची सेना अनेक रंगांची व श्रेष्ठ असून ते भल्ल विक्राळ मुखाचे, विशालदेही व भयानक आहेत. ॥ ६ ॥ ज्याने लंकापुरी जाळली, व तुमच्या पुत्राचा वध केला, तो सर्व कपीत कमीत कमी बळाचा आहे. ॥ ७ ॥ अगणित योद्धे, त्यांची अगणित नावे आहेत. ते कठीण कराल (भयंकर) असून अगणित हत्तींचे बळ असलेले व अति विशाल आहेत. ॥ ८ ॥ द्विविद, मयंद, नील, नल, अंगद, गद, विकटासी, दधिमुख, केसरी, निशठ, शठ आणि जांबवान हे सर्व बलवान आहेत. ॥ दो. ५४ ॥

सुग्रीवासम हे कपि जाणा । असे कोटि किति अगणित नाना ॥
रामकृपें बल अतुल तयानां । तृण सम गणती त्रय लोकानां ॥
असें श्रवणिं आलें दशकंधर । अठरा पद्में यूथप वांदर ॥
नाथ ! कटकिं कपि ऐसा नाहीं । जो ना जिंकिल रणीं तुम्हांही ॥
परम रुष्ट सब चोळिति हात हि । परि आज्ञा देति न रघुनाथ हि ॥
व्याल झषांसह शोषूं सागर । भरूं भूधरीं विशाल ना तर ॥
मर्दुनि धुळीं मिळवुं दशशीसा । मी श्रुत असें वदत सब कीशां ॥
गर्जति तर्जति सहज अशंक हि । ग्रासूं बघति जणूं लंकेसहि ॥

दो :_ सहज शूर कपि भल्ल सब त्यांत शिरीं प्रभु राम ॥
जिंकिति रावण काळ ही कोटि करुनि संग्राम ॥ ५५ ॥

हे सगळे कपी सुग्रीवासारखे आहेत. आणि त्यांच्यासारखे कितीतरी कोटी अगणित आहेत, आणि अनेक प्रकारचे आहेत. ॥ १ ॥ शिवाय त्यांना रामकृपेने अतुल बल मिळाले आहे; त्यामुळे ते त्रैलोक्याला तृणासमान गणतात. ॥ २ ॥ हे दशकंधरा ! माझे असे ऐकण्यात आले आहे वानर अठरा पद्मे आहेत. ॥ ३ ॥ नाथ ! कपी सैन्यात असा एकही कपी नाही की जो तुम्हाला युद्धात जिंकू शकणार नाही. ॥ ४ ॥ अतिशय क्रुद्ध होऊन सगळेच हात चोळत आहेत पण रघुनाथ त्यांना आज्ञा देत नाहीत. ॥ ५ ॥ व्याल, मत्स्य यांच्यासह सागर शोषून टाकू नाहीतर विशाल पर्वतांनी भरून काढू. ॥ ६ ॥ दशशीर्षाचे मर्दन करून त्याला धुळीत मिळवू; असे सगळे कपी बोलत असलेले मी ऐकले आहे. ॥ ७ ॥ ते गर्जतात, दटावीत असतात व स्वभावतःच ते निःशंक (निर्भय) आहेत व जणूं लंकेलाच गिळूं पहात आहेत. ॥ ८ ॥ सर्व भल्लुक व कपी स्वभावतःच शूर आहेत, आणि शिवाय त्यांच्या शिरावर सर्वसमर्थ प्रभू राम आहेत. म्हणून ते युद्ध करून रावणालाच काय, कोटी काळांना सुद्धा जिंकतील यांत नवल काय ? ॥ दो. ५५ ॥

रामतेज बल वुद्धि-विपुलता । शेष लक्षही थकतिल वदतां ॥
एकचि शर शोषिल शत सागर । तव भावास पुसति नयनागर ॥
मानुनि तद्‍वच जलनिधिपासी । मागति पंथ कृपा चित्तासी ॥
श्रवत वचन विहसे दशशीस । अशि मति तरि सहाय कृत कीश ॥
सहज भीरुचीं मानुनि बचनें । वारिधिपाशीं धरलें धरणें ॥
मूढ ! मृषा महती कां गासी । पावूं रिपुबल मति-ठावासि ॥
सचिव सभीत बिभीषण ज्यासी । विजय विभूति कुठुनि जगिं त्यासी ॥
दूत-रोष खलवचें वाढला । समय बघुनि काढी पत्राला ॥
या पत्रा देई रामानुज । नाथ वाचवुनि उर निववा निज ॥
विहसुनि वाम करीं घे रावण । सचिवाकरविं करवि शठ वाचन ॥

दो :- शठ शब्दीं मन रिझवुनी कर न कुळाचा घात ॥
राम विरोधिं न जगसि विधि-हरिहर शरणहि जात ॥ ५६रा ॥
दो :- त्यजुन मान हो अनुजसा प्रभु-पद-पंकज भृंग ॥
कीं हो रामशरानलीं खल ! कुल सहित पतंग ॥ ५६म ॥

रामचंद्रांचे तेज, बल, बुद्धी इत्यादिंची विपुलता वर्णन करताना लाखो शेष सुद्धां थकतील. (तेथे मी एकमुखाने त्यांचे काय वर्णन करणार !) ॥ १ ॥ त्यांचा एकच बाण या एका सागरालाच काय, शंभर सागरांना शोषून टाकील. पण ते नीतिनिपुण असल्याने त्यांनी तुमच्या भावाला (मत/सल्ला) विचारले. ॥ २ ॥ आणि त्याच्या शब्दाला मान देऊन सागरापाशी मार्ग मागत आहेत. कारण त्यांच्या चित्तात कृपा आहे. ॥ ३ ॥ हे ऐकताच दशशीर्ष खो खो हसत सुटला आणि म्हणाला अशी बुद्धी आहे म्हणून तर वानरे साह्यास घेतली आहेत. ॥ ४ ॥ आणि स्वभावतःच भित्रा असलेल्याचे वचन मानून सागरापाशी धरणे धरले आहे. ॥ ५ ॥ मूर्खा ! शत्रूची खोटी महती का गात बसला आहेस ? शत्रूचे बल व बुद्धी यांचा ठाव आम्हाला लागला बरं ! ॥ ६ ॥ भयभीत बिभीषण ज्याचा सचिव आहे त्याला जगात विजय व विभूती कुठुन मिळणार ? ॥ ७ ॥ दुष्ट वचन ऐकून दूताचा रोष वाढला व योग्य वेळ आहे असे पाहून त्याने ते पत्र काढले. ॥ ८ ॥ नाथ ! हे पत्र रामानुजाने दिले आहे, ते वाचून/वाचवून आपली छाती निववा. ॥ ९ ॥ मोठ्याने हसून रावणाने ते पत्र डाव्या हाताने घेतले व तो शठ त्याचे सचिवाकडून वाचन करवूं लागला. ॥ १० ॥ लक्ष्मण पत्रात म्हणतात - हे शठा ! नुसत्या शब्दांनी आपल्या मनाला प्रसन्न करून कुळाचा घात करू नकोस. रामविरोध करून तू ब्रह्मा, विष्णू व हर यांना जरी शरण गेलास तरी सुद्धां वाचणार नाहीस. ॥ दो. ५६ रा ॥ गर्व सोडून धाकट्या भावासारखा प्रभुचरणकमल भृंग हो किंवा रे खला ! तूं आपल्या कुळासहित रामबाणरूपी अग्नीत पतंग हो. ॥ दो. ५६ म ॥

श्रवत सभय मनिं, सस्मित आनन । सांगतसे सर्वांस दशानन ॥
भुवीं पतित, करिं नभा जसा धरि । लघुतापस वाग्विलास हा करि ॥
नाथ ! म्हणे शुक सत्य चि वाणी । समजा, त्यजुनी प्रकृति अभिमानी ॥
मम वच ऐका त्यजुनि क्रोधा । त्यजा नाथ तुम्हिं राम-विरोधा ॥
अति कोमल रघुविरस्वभाव । जरी अखिल भुवनांचे राव ॥
भेटत तुम्हीं कृपा प्रभु करतिल । एकहि अपराध न मनिं धरतिल ॥
जनक सुता रघुनाथा द्यावी । प्रभु मम विनति इतकि ऐकावी ॥
यदा वदे द्यावी वैदेही । शठ लत्ते ताडी त्यातेंही ॥
चरणिं नमुनि शिर गत तो तिथें । कृपासिंधु रघुनायक जिथें ॥
प्रणमुनि कथा निवेदी अपली । रामकृपेनें निजगति मिळली ॥
कुंभज ऋषि-शापें किं भावानी । राक्षस बनला मुनि जो ज्ञानी ॥
घडि घडि वंदुनि राम-पदांला । गेला मुनि मग निजाश्रमाला ॥

दो :- विनति जलधि जड मानिना जरि गेले दिन तीन ॥
वदले राम सकोप तैं प्रीति न भीतीवीण ॥ ॥ ५७ ॥

पत्रातील मजकूर ऐकताच मनात भिती वाटली पण मुखाने मंद हास्य करीत दशानन सर्वांना समजावून सांगतो की - ॥ १ ॥ जमिनीवर उताणा पडलेल्या माणसाने हातांनी जसे आकाश धरावे त्याप्रमाणे हा लघुतापस (लक्ष्मण) प्रलाप (मिथा बडबड) करीत आहे. ॥ २ ॥ ते ऐकून शुक म्हणाला की नाथ ! ती वाणी अगदी सत्य आहे, असे देहाभिमानी स्वभाव सोडून समजा - ॥ ३ ॥ व क्रोध न करता माझे चांगले ऐका (करा). नाथ ! रामविरोध करणे सोडून द्या. ॥ ४ ॥ रघुवीर जरी सर्व भुवनांचे राजे आहेत तरी त्यांचा स्वभाव अति कोमल आहे. ॥ ५ ॥ तुम्ही जाऊन भेटताच प्रभू तुमच्यावर कृपा करतील व तुमचा एकही अपराध मनात ठेवणार नाहीत. ॥ ६ ॥ म्हणून जनकसुता रघुनाथास द्यावी. हे स्वामी ! माझी इतकी विनंती ऐकावीच. ॥ ७ ॥ ’वैदेही द्या’ असे जेव्हा म्हणाला तेव्हा त्या शठाने शुकाला लाथा मारल्या. ॥ ८ ॥ रावणाच्या चरणी मस्तक नमवून तो जिथे कृपासिंधु रघुनायक होते तेथे गेला. ॥ ९ ॥ प्रणाम करून त्याने आपली कथा निवेदन केली, व रामकृपेने त्याला आपली गती (पूर्वस्थिती) प्राप्त झाली. ॥ १० ॥ तो ज्ञानी मुनि होता पण अगस्ती ऋषींच्या शापाने राक्षस झाला होता. ॥ ११ ॥ पुन्हा पुन्हा रामचरणांना वंदन करून मग तो मुनी आपल्या आश्रमात गेला. ॥ १२ ॥ जरी तीन दिवस निघून गेले तरी जड सागर रामांच्या विनंतीस मान देईना, तेव्हा राम सकोप होऊन म्हणाले की, भितीशिवाय प्रीती उत्पन्न होत नाही. ॥ दो. ५७ ॥

लक्ष्मण आण शरासन सयक । सिंधु शोषितो विशिखें पावक ॥
शठा विनति कुटिलाशीं प्रीती । सहज कृपण ता सुंदर नीती ॥
मम ता निरता ज्ञान-कहाणी । अति लोभ्यास विरति वाखाणी ॥
क्रोध्या शम काम्या हरिकथा । उप्त बीज ऊषरीं फळ यथा ॥
कथुनि चाप रघुपतिनिं चढवलें । हें मत लक्ष्मण-मना अवडलें ॥
प्रभु संधानिति शरा कराला । उदधि-उदरिं उठल्या तों ज्वाळा ॥
मकर उगर झष वृंद विव्हळत । जळति जंतु, जैं जलनिधि जाणत ॥
कनक पात्रिं भरि मणि गण नाना । विप्ररूप ये त्यजुनी माना ॥

दो :- कोटि यत्‍नि शिंपा कदली कापुनि फळते तीच ॥
श्रुणु खगेश मानि न विनति धाकें नमती नीच ॥ ५८ ॥

लक्ष्मणा ! धनुष्य बाण आण पाहू, अग्नीबाणाने सागर शोषून टाकतो. ॥ १ ॥ शठाला विनंती करणे, कुटिलाशी प्रीती करणे, निसर्गतः कृपण असणार्‍याला नीती सांगणे, ॥ २ ॥ ममता निरताला ज्ञान कहाणी सांगणे, अतिलोभी माणसाला वैराग्याचा उपदेश करणे, ॥ ३ ॥ क्रोधी माणसाला शम शिकविणे आणि कामी व्यक्तीला हरिकथा सांगणे या सर्व गोष्टींचे फळ ऊखर (उजाड) भूमीत पेरलेल्या बीजाच्या फळासारखेच होय. ॥ ५ ॥ प्रभूंनी एक भयानक बाण धनुष्यावर लावला तोच सागराच्या पोटात आगीच्या ज्वाळा उठू लागल्या. ॥ ६ ॥ मकर, सर्प, मासे इ. जलचरांचे समुदाय विव्हळूं लागले. समुद्राने जेव्हा जाणले की आता सर्व जंतू जळणार - ॥ ७ ॥ तेव्हा त्याने सोन्याच्या ताटात नाना प्रकारची रत्‍ने भरली व अभिमान सोडून विप्ररूपाने आला. ॥ ८ ॥ केळीच्या झाडाला कितीही प्रकारे वाटेल तेथे पाणी घातले तरी ती कापल्यानेच फळते. तसेच हे खगेश ! ऐक, नीच विनंती मानीत नाहीत. ते धाकानेच नमतात. ॥ दो. ५८ ॥

सभय सिंधुनें प्रभुपद धरले । क्षमा नाथ ! अवगुण मम सगळे ॥
गगन समीर अनल जल धरणी । यांची नाथ ! सहज जड करणी ॥
त्वां प्रेरित मायेनें निर्मित । सृष्टि हेतु सद्‍ग्रंथीं वर्णित ॥
प्रभु आज्ञा ज्या जैसी आहे । तसें वागतां तो सुख लाहे ॥
प्रभो ! उचित मज केलें शासन । मर्यादा तरि निर्मित आपण ॥
ढोल गवार शूद्र पशु नारी । हे सब ताडनास अधिकारी ॥
प्रभु प्रतापें सुकेन मी जरि । जाइ कटक, नहि मम महती तरि ॥
प्रभु-आज्ञा श्रुति वदति अभंगा । करिन शीघ्र जें आपण सांगा ॥

दो :- वच सुनम्र परिसुनि वदति सस्मित कृपा-अगार ॥
तात उपाय असा वदा उतरे कपिदळ फार ॥ ५९ ॥

सागराने भयभीत होऊन प्रभूचे पाय धरले व म्हणाला की नाथ ! माझे सर्व दोष क्षमा करावेत. ॥ १ ॥ नाथ ! आकाश, वायू, तेज, जल व पृथ्वी यांची स्वाभाविकच जड करणी आहे. (ही पंचभूते स्वभावतःच जड आहेत). ॥ २ ॥ सद्‌ग्रंथात वर्णिले आहे की सृष्टी रचनेसाठी तुम्ही प्रेरणा दिलेल्या मायेने यांची निर्मिती केली आहे. ॥ ३ ॥ प्रभू ! ज्याला जशी तुमची आज्ञा आहे त्याप्रमाणे तो राहिल्याने वागल्याने सुखी असतो. हे जर स्वभाव सोडतील तर त्यांनाही दुःख, इतरांनाही दुःखच व अनर्थ ओढवतील. ॥ ४ ॥ हे प्रभो ! मला जे शासन केलेत ते योग्यच आहे. तरीपण आम्हाला जी मर्यादा घालून दिली आहे ती आपणच निर्मिलेली आहे. ॥ ५ ॥ ढोल, अडाणी मनुष्य, शूद्र, पशु आणि नारी हे सर्व ताडनाचे अधिकारी आहेतच. ॥ ६ ॥ प्रभू ! आपल्या प्रतापाने मी सुकून जाईन आणि सैन्य पार जाईल. तरीपण त्यात माझी महती (इभ्रत) राहणार नाही. ॥ ७ ॥ प्रभूच्या आज्ञेचा भंग कोणी करू शकत नाहीत असे श्रुति सांगतात. तरी आपण जे सांगाल, ते मी शीघ्र करीन. ॥ ८ ॥ अति नम्र वचन ऐकून कृपानिवास स्मित करून म्हणाले की तात ! असा उपाय सांगा की जेणे करून पुष्कळ कपिसैन्य उतरून जाईल. ॥ दो. ५९ ॥

नाथ ! नील नल कपि भावांला । बाल्यीं ऋषि-आशीस मिळाला ॥
त्यांच्या स्पर्शें सागरिं गिरिवर । तव प्रतापें तरति जलावर ॥
प्रभुची प्रभुता मी हृदिं धरुनी । साह्य यथाबल पाहिन करुनी ॥
नाथ ! बांधवा पयोनिधि असा । कीं त्रिभुवन या गाइल सुयशा ॥
या शरिं मग उत्तर-तट-वासी । वधा नाथ खल नर अघरासी ॥
सागर पीडा कृपालु जाणति । शीघ्र राम रणधीर निवारति ॥
भारि राम-बल पौरुष पाहुनि । सुखी पयोनिधि होई हर्षुनि ॥
कथिले प्रभुला चरित्र सगळें । प्रणमुनि पदीं पयोधि परतले ॥

छं :- निज भवनिं गत, मत सिंधुचें श्री रघुपतीनां मानले ।
हें चरित कलिमल हर, यथामति तुलसिदासें गाइलें ॥
सुख-भवन, संशय-शमन, दमन विषाद रघुपति गुणगणां ।
गा त्यजुनि आशा सब भरंवसा ऐक संतत शठ मना ॥ १ ॥
दो :- सकल सुमंगलदायक रघुनायक-गुण-गान ॥
सादर ऐकति तरतिे ते भवनिधि विण जलयान ॥ ६० ॥

सागर म्हणाला की नाथ ! नील व नल या दोघा कपिबंधूंना बालपणी ऋषींचा आशीर्वाद मिळाला आहे. ॥ १ ॥ त्यांनी स्पर्श केलेले मोठमोठे पर्वत तुमच्या प्रतापाने सागरात जलावर तरंगतील (बुडणार नाहीत). ॥ २ ॥ मी सुद्धा प्रभूचा प्रताप हृदयात धारण करून यथाशक्ती साह्य करून पाहीन. ॥ ३ ॥ नाथ ! या प्रमाणे सागराला असा बांधवा की जेणे करून त्रैलोक्य या सुयशाचे गान करील. ॥ ४ ॥ आणि नाथ ! या बाणाने माझ्या उत्तर तटावर राहणार्‍या पापी दुष्ट मनुष्यांचा वध करा. ॥ ५ ॥ सागराला होत असलेली पीडा कृपालु रणधीर रामचंद्रांनी जाणली आणि ती त्वरेने निवारण केली. ॥ ६ ॥ रामचंद्रांचे भारी बल व पौरुष पाहून सागर हर्षित होऊन सुखी झाला. ॥ ७ ॥ सगळे चरित्र प्रभुला सांगितले आणि पायांना प्रणाम करून सागर परत गेला. ॥ ८ ॥ सागर घरी गेला. सागराचे मत श्रीरघुपतींना आवडले, पसंत पडले. कलिमल हरण करणारे हे चरित्र तुलसीदासाने यथामति वर्णन केले. सुखाचे निवासस्थान असून संशयाचे शमन करणार्‍या, व विषादाचा विनाश करणार्‍या रघुपती गुण-समुहाला, हे शठ मना ! सर्व आशा व सर्वांचा भरंवसा सोडून सतत श्रवण कर व गा. ॥ छंद ॥ रघुनायकाच्या गुणांचे वर्णन सुमंगलास व सकल सुमंगलास देणारे आहे. जे कोणी त्याचे आदराने श्रवण करतील, ते जलयानावाचून (जहाजावाचून) भवसागर तरून जातील. ॥ दो. ६० ॥

इति श्रीमद् रामचरितमानसे सकल-कलि-कलुष-विध्वंसने
पंचमः सोपानः
॥ सुंदरकाण्ड समाप्त ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP