॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अयोध्याकाण्ड ॥

अध्याय २४ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

प्रेम मग्न अति पुर नारी नर । निमिषासम सरती ते वासर ॥
प्रतिसासू सीता घे वेषा । सादर सेवि तया अविशेषां ॥
जाणति राम कुणि न मर्मा या । सीता मायेमधिं सब माया ॥
सीता एवे-वश त्या सर्वहि । सुखी, देति शिकवण आशिसहि ॥
बघुनि सरल सीते दो भावां । राणिस कुटिल पुरा पस्तावा ॥
अवनि-यमां वागत कैकेई । महि न ठाव विधि मरण न देई ॥
लोकिं हि वेदिं विदित, कवि सांगति । राम विमुख थळ नर्किं न पावति ॥
हा संशय मनिं सर्वांना ही । राम येति विधि ! नगरिं किं नाहीं ॥

दो० :- निशिं न नीज ना भूक दिनिं भरत विकल शिचि शोचिं ॥
नीच चिखलि अडकत जसा मीन सलिल संकोचिं ॥ २५२ ॥

( याप्रमाणे) पुरवासी स्त्रिया व पुरुष अति प्रेममग्न झाले असून ( त्याचे) ते दिवस निमिषासारखे सरु लागले ॥ १ ॥ सीतेने सासूगणिक रुपे घेतली व सर्व सासवांची सेवा आदराने अगदी सारखी केली ॥ २ ॥ हे मर्म फक्त रामचंद्रांस कळले; इतर कोणालाही कळले नाही ( कारण) सगळ्या माया सीतेच्या मायेतच आहेत ॥ ३ ॥ सीतेच्या सेवेला त्या सर्व वश होऊन सुखी झाल्या व सगळ्या सासवांनी तिला शिकवण व आशीर्वाद दिले ॥ ४ ॥ सीता व दोघे भाऊ ( राम-लक्ष्मण) यांना अगदी सरळ स्वभावाचे पाहून कुटील राणीला पोटभर पश्चाताप झाला ॥ ५ ॥ कैकेयी अवनीला व यमाला प्रार्थना करुन मागू लागली पण मही आपल्या उदरांत ठाव देत नाही व विधी मरण देत नाही ॥ ६ ॥ लोकांत व वेदांत प्रसिद्ध आहे आणि सांगतात की रामविरोध करणार्‍याला नरकात सुद्धा स्थान मिळत नाही ॥ ७ ॥ सर्वांच्या मनांत संशय आहे व ( मनात म्हणतात की) हे विधी ! राम अयोध्या नगरांत परत येतात की नाही ? ॥ ८ ॥ भरत पवित्र चिंतेने व्याकुळ झाले असून त्यांना रात्री झोप नाही व दिवसा भूक नाही नीच चिखलांत अडकणारा मासा पाणी आटत चालले म्हणजे जसा व्याकुळ होतो तशी भरताची दशा झाली आहे ॥ दो० २५२ ॥

जननिमिषें करि काळ कुचाळी । ईति भीति जशि पिकतां साळी ॥
होइ कसें रामा अभिषेचन । मजसि आकळे उपाय एक न ॥
गुरुवच मानुनि अवश्य फिरतिल । बघुनि रामरुचि परि गुरु वदतिल ॥
मातृवचनिं रघुराज परतती । रामजननि कधिं करिल हट्टा ती ! ॥
मी अनुचर मम पाड काय ही । वाम विधी आणिक कुसमय ही ॥
हट्ट धरिन तरि परम कुकर्म हि । हर गिरिहुनि गुरु सेवक धर्महि ॥
एकहि युक्ति न मनांत टिकली । चिंता करतां रात्र संपली ॥
स्नान करोनी प्रभुला प्रणमति । वसतां, ऋषि बोलावूं धाडति ॥

दो० :- गुरुपद कमलीं प्रणमुनी आज्ञेनें बसतात ॥
विप्र महाजन सचिव सब सभासदहि जमतात ॥ २५३ ॥

साळीचे पीक पिकण्याच्या वेळी जे ईतीचे भय ( एकाएकीच) उपस्थित व्हावे त्याप्रमाणे जननीला निमित्त करुन काळाने कुचेष्टा केली ॥ १ ॥ रामाला अभिषेक कसा होईल या विषयांच्या एकाही उपायाचे आकलन मला होत नाही ॥ २ ॥ गुरुजींचे वचन ( आज्ञा) मानून राम अवश्य परत येतील, पण गुरु रामाची रुचि जाणूनच बोलणार ! ॥ ३ ॥ कौसल्या मातेच्या सांगण्याने राम परततील, पण रामजननीच ती ! ती कधी हट्ट करील कां ? ॥ ४ ॥ मी तर एक सेवक, माझी पाड तो काय ? त्यांतही काळ प्रतिकूल, आणि दैव फिरलेले ! ॥ ५ ॥ मी हट्ट धरुन बसलो तर त्याच्यासारखे कुकर्म नाही, ( कारण) सेवकधर्म कैलासाहून अधिक भारी ( जड, वजनदार = गुरु) आहे ॥ ६ ॥ एक सुद्धा युक्ती मनात टिकली नाही व भरत चिंता करीत असताच रात्र संपली (उजाडले) ॥ ७ ॥ ( नंतर) स्नान वगैरे करुन प्रभूला प्रणाम केला व भरत बसतात तोच ऋषींचे (वसिष्ठांचे) बोलावणे आले. ॥ ८ ॥
चित्रकूट येथील पहिली खाजगी सभा – ( २५३ ते २५७/४)
श्रीगुरुपदकमलांना प्रणाम करुन आज्ञा मिळाल्यावर भरत बसले ( इतक्यात) विप्र, महाजन, सचिव इत्यादी सर्व सभासद जमले ॥ दो० २५३ ॥

वदले मुनिवर समय ओळखुनि । सभ्य, भरत घ्या सुजाण ऐकुनि ॥
धर्म धुरीण भानुकुल भानू । राजा, स्ववश, राम, भगवानू ॥
सत्यसध, पाते श्रुतिसेतू । राम जन्म जग मंगल हेतू ॥
गुरु पितृ मातृ वचन अनुसारी । खलदलदलन देवहितकारी ॥
नीति प्रीति परमार्थां स्वार्था । कुणि न रामसम जाणि यथार्था ॥
विधि हरि हर शशि रवि दिक्पाळां । माये जीवां कर्मा काळा ॥
अहिपा महिपां प्रभुता जितकी । योगसिद्धि निगमादिगदित कीं ॥
पहा विचार करून मनासी । रामाज्ञाच शिरीं सर्वांसी ॥

दो० :- रामाज्ञा रुचि राखणें हितकर हें आम्हांस ॥
अतां सुज्ञ समजुनि करा संमत जें सर्वांस ॥ २५४ ॥

समय ओळखून मुनीश्रेष्ठ – वसिष्ठ म्हणाले की सुजाण सभासद सभ्य हो ! सुजाणा भरता ! मी सांगतो ते ऐका ॥ १ ॥ राम धर्मधुरीण, सूर्य कुलाचे सूर्य, राजा स्वतंत्र असून भगवान आहेत ॥ २ ॥ तो सत्यसंध, श्रुति सेतू पालक, आहे व रामजन्मच जगाचे मंगल करण्याच्या हेतूने झाला आहे ॥ ३ ॥ ते गुरु, पिता, माता यांच्या वचनानुसार वागणारे आहेत ( खरे) पण दुष्टांच्या समूहांचे संहारक व देवांचे हित करणारे आहेत ॥ ४ ॥ नीती, प्रीती, परमार्थ व स्वार्थ यांना यथार्थ जाणणारा रामासारखा दुसरा कोणी नाही ॥ ५ ॥ ब्रह्मा, विष्णू, महेश, चंद्र, सूर्य व सर्व दिकपाल, माया सर्व जिव, काळ, शेष पृथ्वीचे पालन करणारे राजे, योग व योगापासून मिळणार्‍या इतर सिद्धिंचे वेदशास्त्रांनी वर्णन केले आहे. त्या या सर्वाच्या ठिकाणी असलेली प्रभुता सामर्थ्य सत्ता – शक्ती इत्यादींचा मनाशी नीट विचार करुन पहा म्हणजे कळेल की रामाचीच आज्ञा सर्वांच्या शिरावर आहे ॥ ६–८ ॥ ( म्हणून मला वाटते की) रामाची आज्ञा व रुची ( इच्छा) राखणे हेच आम्हा सर्वांना हितकर आहे तरी आता आपण सर्व सूज्ञ मंडळींनी हे लक्षांत घेऊन सर्वानुमते जे ठरेल ते करावे ॥ दो० २५४ ॥

सकलां सुखद राम अभिषेकहि । मंगल मोद मूल पथ एक हि ॥
येतिल कसे नगरिं रघुरावहि । समजुनि सांगा करूं उपावहि ॥
सादर परिसुनि मुनिवर भाषत । नय-परमार्थें स्वार्थें मिश्रित ॥
उत्तर येना स्तंभित सगळे । भरतें शिर नमुनी कर जुळले ॥
भूप भानुकुळिं झाले कितितरि । जे एकाहुनि थोर एक जरि ॥
जन्म-हेतु सकलां पितृ मातां । कर्म शुभाशुभ देइ विधाता ॥
करि कल्याण दलुनि दुःखाला । असा अशीस विदित जगिं अपला ॥
स्वामि तेच जे विधिगति बाधिति । निश्चय केल्या कोण किं टाळिति ॥

दो० :- पुसतां अतां उपाय मज हें मम अभाग्य भूरि ॥
परिसुनि वचनां स्नेहमय गुरु अनुराग सुपूरिं ॥ २५५ ॥

श्रीरामास राज्याभिषेक करणे हा मंगल व मोद यांचे मूळ असलेला एक ( मुख्य) च मार्ग आहे ॥ १ ॥ रघुराज अयोध्यानगरीत परत कसे येतील याचा ( नीट) विचार करुन सांगा म्हणजे तो उपाय आपण करु ॥ २ ॥ नीतीने परमार्थाने व स्वार्थाने संयुक्त असे मुनिवरांचे भाषण सर्वांनी आदराने ऐकून घेतले ॥ ३ ॥ पण कोणाकडून काही उत्तर येईना ( उत्तर देता येई ना) सगळे स्तंभित झाले आहेत ( हे पाहून) मस्तक नमवून भरतानी हात जोडले ॥ ४ ॥ भानुवंशात असे कितीतरी भूप होऊन गेले की जे एकाहून एक मोठे होते ॥ ५ ॥ त्या सर्वाच्या जन्माचे निमित्त आईबाप होते; व कर्माचे शुभाशुभ फळ देणारा विधाताच होता ॥ ६ ॥ ( पण) दु:खांचा विनाश करुन ( सर्व) कल्याण करणारा आपलाच आशीर्वाद होता हे सर्व जगाला माहीत आहे ॥ ७ ॥ ज्यांनी विधीगतीला बाध आणला ते स्वामी आपणच आहांत ! आपण जर निश्चय केला तर त्याला कोण टाळू शकतील ? ॥ ८ ॥ ( असे असून) आता आपणच मला उपाय विचारता, तेव्हा हे माझे मोठे अभ्याग्यच ! या स्नेहमय वचनाला ऐकून गुरु अनुरागाच्या मोठ्या पुरांत सापडले ! हृदय प्रेमाने भरुन आले ॥ दो० २५५ ॥

रामकृपेंच तात तें सत्य हि । सिद्धि रामविमुखा स्वप्निंहि नहि ॥
एक वदत संकोच वाटतो । त्यजिति अर्ध बुध सर्व जात तों ॥
दोघे भ्राते तुम्हीं वना जा । फिरवुं सिता लक्ष्मण रघुराजा ॥
श्रवुनि सुवच दो बंधू हर्षित । झाल्या काया प्रमोद पूरित ॥
प्रमुदित मन तन तेजें भ्राजे । नृप सजीव जणुं राम हि राजे ॥
लाज जनां बहु हानि अल्प ती । सम सुखदुःखी राण्या रडती ॥
वदति भरत मुनि-वचना करतां । जग जीवां फळ इष्ट समस्तां ॥
करिन काननीं वास जन्मभर । याहुन अधिक न मजला सुखपर ॥

दो० :- रामसिता हृदयस्थही तुम्हिं सर्वज्ञ सुजाण ॥
नाथ ! कथित जर खरेंच किं निजवच करा प्रमाण् ॥ २५६ ॥

तात ! तुम्ही म्हणता ते सत्यच आहे, पण ते रामकृपेनेच ( घडले) रामविमुखाला सिद्धी स्वप्नांत सुद्धा मिळत नाही ॥ १ ॥ ( एक उपाय आहे, पण) सांगण्यास संकोच वाटतो, सर्व जात असता बुध ( ज्ञानी) अर्ध्याचा त्याग करतात ॥ २ ॥ तुम्ही दोघे बंधू वनात जा म्हणजे सीता, लक्ष्मण व रघुराज राम यांना परत फिरवूं ॥ ३ ॥ हे सुंदर वचन ऐकून दोन्ही भावांना हर्ष झाला व दोघांच्या काया ( देह) अति आनंदाने परिपूर्ण झाल्या ॥ ४ ॥ मन फार प्रसन्न झाले व देह तेजाने असे चमकू लागले की जणू दशरथ राजा सजीव झाले व राम राजे झाले ॥ ५ ॥ लोकांना फार लाभ झाला व ती हानि अल्प वाटली, राण्यांना सुख, व दु:ख सारखेच झाले व त्या रडू लागल्या ॥ ६ ॥ भरत म्हणाले की मुनींच्या सांगण्याप्रमाणे केल्याने जगांतील समस्त जीवांना इष्ट फळ मिळेल ॥ ७ ॥ ( १४ वर्षेच काय) मी जन्मभर अरण्यात राहीन ( कारण) यापेक्षा अधिक सुख, मला दुसरे नाही ॥ ८ ॥ राम व सीता माझ्या हृदयातच वास करतात व आपण सर्वज्ञ व सुजाण आहांत ( माझ्या हृदयातले जाणताच) तरी नाथ ! आपण सांगीतले ते खरेच सांगितले असेल तर आपण आपले वचन सत्य करावे ॥ दो० २५६ ॥

ऐकुनि वचन स्नेहा पाहुनि । होति विदेही सकलसभा मुनि ॥
भरत महा महिमा जलराशी । मुनि-मति उभी तटीं अबलाशी ॥
पार जावया उपाय पाही । नाव तराफा जहाज नाहीं ॥
वर्णि कोण पर भरत महत्ता । सर श्क्तिंत ये सिंधु किं भरता ॥
प्रिय मुनि मना भरत अति झाले । सह समाज रामाप्रति आले ॥
प्रभुनीं प्रणमुनि दिलें शुभासन । बसति मिळत सब मुनि अनुशासन ॥
वदले मुनिवर वचन विचारें । देश काल अवसर अनुसारें ॥
पहा राम ! सर्वज्ञ सुजाण हि । धर्म नीति गुण बोध निधान हि ॥

दो० :- सकल हृदंतरिं वसतसां जाणां भाव कुभाव ॥
पुरजन जननीं भरत हित होण्या वदा उपाव ॥ २५७ ॥

( भरताचे) भाषण ऐकून व स्नेह पाहून सर्व सभा आणि मुनी वसिष्ठ विदेही झाले ॥ १ ॥ भरताचा महा महिमा महासागर आहे व वसिष्ठ मुनींची मती अबलेसारखी तीरावर उभी आहे ॥ २ ॥ पार जाण्य़ाचा उपाय शोधीत आहे, पण होडी, तराफा, जहाज इ. काही ( मिळत) नाही ॥ ३ ॥ भरताची महती दुसरा कोण वर्णन करील ? ( शक्यच नाही कोणाला) तलावातील शिंपीमध्ये सागर कधी साठवता येईल कां ? ॥ ४ ॥
चित्रकूटावरील पहिला दरबार
मुनींच्या मनाला भरत अति प्रिय झाले वसिष्ठ समाजासह रामाकडे आले ॥ ५ ॥ प्रभूंनी प्रणाम करुन वसिष्ठांस शुभासन दिले व मुनींची आज्ञा मिळतांच सर्व मंडळी बसली ॥ ६ ॥ देशकाल व परिस्थीती यांच्या अनुसार मुनीश्रेष्ठ विचारपूर्वक म्हणाले ॥ ७ ॥ हे पहा रामचंद्रा ! तुम्ही सर्वज्ञ व सुजाण ( चतुर) आहांत, धर्म, नीती, गुण व ज्ञान यांचे सागर आहांत ॥ ८ ॥ आपणा सर्वांच्या हृदयांत निवास करतां व सर्वांचे भाव कुभाव जाणतां ( तरी आता) पुरवासी लोक, सर्वमाता व भरत यांचे हित होण्यास उपाय आपणच सांगावा. ॥ दो० २५७ ॥

आर्त कधीं न विचारें वदतो । डाव जुगार्‍या अपला दिसतो ॥
श्रुत मुनिवचन वदति रघुराव किं । नाथ आपले हातिं उपावकिं ॥
सर्वां हित तुमची रुचि रक्षण । आज्ञां करतां, मोदें पालन ॥
होइल आज्ञा प्रथम मला जी । शिरिं धरुनी ती पाळिन राजीं ॥
पुढें जया प्रभु जसें सांगतिल । तसें सर्वपरिं सर्व वागतिल ॥
रामकथित तुम्हिं सत्य, वदति मुनि । भरतस्नेह विचार नुरवि मनिं ॥
यास्तव पुनः पुन्हां वदतो, अति । भरत भक्तिवश झाली मम मति ॥
मम मत राखुनि भरत रुचीला । जें कराल, शुभ, शिव साक्षीला ॥

दो० :- भरत विनति घ्या ऐकुनी सादर करा विचार ॥
करा साधुमत लोकमत नृपनय निगम सुसार ॥ २५८ ॥

( कारण) आर्त कधी विचारपूर्वक बोलत नाही व जुगार्‍याला आपलाच डाव दिसत असतो ( तसे आमचे सर्वांचे आहे) ॥ १ ॥ मुनींचे वचन ऐकले व रघुराज म्हणाले की नाथ ! उपाय ( तर) आपल्याच हातात आहे की ॥ २ ॥ आपली इच्छा रक्षण करणे व आज्ञा केली की ती आनंदाने पालन करणे यांतच सर्वांचे हित आहे. ॥ ३ ॥ प्रथम मला जी आज्ञा होईल ती मी शिरोधार्य मानून राजीखुषीने पाळीन ॥ ४ ॥ पुढे प्रभु ज्यांना जसे सांगतील त्याप्रमाणे सर्व लोक सर्व प्रकारे वागतील ॥ ५ ॥ मुनी म्हणाले की राम ! तुम्ही सत्यच सांगीतलेत; पण भरताच्या स्नेहाने माझी विचार शक्तीच शिल्लक ठेवली नाही ॥ ६ ॥ एवढ्याच साठीच मी पुन:पुन्हा सांगतो की मी माझी बुद्धी भरताच्या भक्तीला अतिशय वश झाली आहे ॥ ७ ॥ ( त्यामुळे) माझे मत असे आहे की भरताची रुची रक्षण करुन ( करण्य़ास) जे काही कराल तुम्ही ते शुभच आहे, याला साक्षीला शिव आहेत ॥ ८ ॥ म्हणून तुम्ही प्रथम भरताची विनंती आदराने ऐकून घ्या, ( मग) त्यावर विचार करा आणि मग साधुमत, लोकमत, राजनीती व वेद यांचे जे उत्तम सार म्हणून वाटेल ते करा ॥ दो० २५८ ॥

गुरु अनुराग पाहुनी भरतीं । राम हृदयिं आनंदा भरती ॥
जाणुनि भरता धर्मधुरंधर । तन मन वच निजसेवक सुंदर ॥
वदले गुरुवचना अनुकूल हि । वचन मंजु मृदु मंगलमूल हि ॥
नाथ शपथ आणहि पितृचरणीं । भ्राता भरत समान न भुवनीं ॥
जे गुरु पद अंबुज अनुरागी । लोक वेद मतिं ते बहु भागी ॥
अपलें इतकें प्रेम जयावर । कोण वदेल भरतभाग्या वर ॥
बघुनि बंधु लघु, मति संकुचते । वदत मुखावर भरत महत्ते ॥
भरत म्हणति तें करत चांगलें । राम वदुनि हें स्तब्ध राहले ॥

दो० :- वदले मुनि भरता तदा त्यज संकोचा तात ॥
कृपांबुधी बंधुला प्रिय सांग कि जें हृदयांत ॥ २५९ ॥

गुरुजींचा भरतावरील अनुराग पाहून राम हृदयांत आनंदाला भरती आली ॥ १ ॥ भरत धर्मधुरंधर असून तनमनवाणीने आपला अंतरंग उत्तम सेवक आहे ॥ २ ॥ हे जाणून गुरुवचनाला अनुकूल आणि सुंदर, मृदु व मंगलमूल अशी वाणी ( राम) बोलले ॥ ३ ॥ नाथ ! आपली शपथ आणि पितृचरणांची आण घेऊन सांगतो की भरता सारखा भाऊ चौदा भुवनात नाही. ॥ ४ ॥ जे गुरुपद कमलांच्या ठिकाणी अनुरक्त असतात ते लोकमत – वेदमतानुसार महा भाग्यवान होत ॥ ५ ॥ ( मग) आपले ज्यांच्यावर इतके अपार प्रेम आहे त्या भरतांच्या श्रेष्ठ भाग्याचे वर्णन कोण करुं शकेल ? ॥ ६ ॥ धाकटा भाऊ आहे असे पाहून भरताची प्रशंसा त्याच्या तोंडावर करण्यास बुद्धीला संकोच वाटतो ( पण) मनाला फार आवड आहे ॥ ७ ॥ भरत म्हणतील ते करणेच चांगले असे म्हणून राम स्तब्ध राहीले ॥ ८ ॥ ( राम स्तब्ध झाले व भरत बोलत नाहीत असे पाहीले) तेव्हा मुनी भरतास म्हणाले की तात ! सर्व संकोच सोडून जे काही हृदयात असेल ते आपल्या कृपासागर प्रिय बंधूला सांग ( की एकदा) ॥ दो० २५९ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP