॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय ३१ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

पोंचति दूत रामपुरिं पावन । हर्षति नगरी पाहुन शोभन ॥
खबर भूपती-द्वारीं देती । तैं दशरथ बोलावुनि घेती ॥
करुनी प्रणमन पत्र अर्पती । मुदित उठोनी घेति महिपती ॥
पत्र वाचतां सजल विलोचन । छाति भरुनि आली पुलकित तन ॥
करिं सुपत्र, हृदिं राम नि लक्ष्मण । स्तब्ध, न वदवे अशुभ किं शोभन ॥
धीर धरुनि मग पत्रा वाचति । वृत्तें सत्य सभासद हर्षति ॥
खेळत असतां खबर मिळे ती । भरत स-मित्र, रिपुघ्नहि येती ॥
पुसलें स्नेहें अति संकोचुनि । तात ! पत्र हें ! आलें ! कोठुनि ॥

दो ० :- बंधु प्राणप्रिय उभय कुशल ! कुठें ! आहेत ॥
प्रेमळ वच परिसुनि पुन्हां नरपति वाचूं घेत ॥ २९० ॥

श्री रघुवीर वर्‍हाड प्रकरण -
जनकाचे दूत रामचंद्रांच्या पावन पुरीत पोचले व ती सुंदर नगरी पाहून त्यांस आनंद व उत्साह वाटला ॥ १ ॥ राजद्वारापाशी जाऊन त्यांनी (आपण जनक - पत्र (पत्रिका) घेऊन आल्याची) खबर दिली, तेव्हा त्यास दशरथांनी बोलावून घेतले ॥ २ ॥ त्यांनी प्रणाम करुन पत्र अर्पण केले ते मुदित महीपतींनी आनंदाने (मुदित) उठून (स्वत:) घेतले ॥ ३ ॥ पत्र वाचतां वाचतां डोळे पाण्याने डबडबले छाती भरुन आली व शरीर रोमांचित झाले ॥ ४ ॥ हृदयात राम-लक्ष्मण आहेत व हातात ते श्रेष्ठ पत्र आहे, राजे तटस्थ आहेत, शुभ की अशुभ वार्ता आहे, हे सुद्धा बोलवत नाही ॥ ५ ॥ मग धीर धरुन ते पत्र (मोठ्याने) वाचले तेव्हा तो सत्य समाचार ऐकून सभासदांस हर्ष झाला ॥ ६ ॥ खेळत असता ती खबर मिळाली तेव्हा भरत आपले मित्र व बंधू-शत्रुघ्नांसह आले ॥ ७ ॥ व अति स्नेहाने व अति संकोचाने विचारले की, बाबा, हे पत्र कोठून आले ? ॥ ८ ॥ प्राणप्रिय दोघे भाऊ कुशल आहेत नां? ते कुठल्या देशात आहेत ? ते प्रेमळ वचन ऐकून नरपतींनी ते पत्र (पुन्हा) वाचण्यास घेतले. ॥ दो० २९० ॥

पुलकित परिसुनि पत्रा भ्राते । प्रेम फार राहि न गात्रां तें ॥
प्रीति पुनीत बघुनि भरताची । सर्व सभा सुख विशेष सांची ॥
नृपें दूत मग निकट बसविले । वचना मधुर मनोहर वदले ॥
बाबा ! वदा कुशल मम बाळां- । नीट नेत्रिं निज तुम्हीं न्याहाळां ? ॥
श्यामल गौर विधृत-धनु-भाते । वय किशोर, कौशिक-सांगातें ॥
वदा स्वभावा जर ओळखले । नृपें प्रेमवश कितिदां पुसले ॥
घेउनि गेले ज्या दिनिं मुनिवर । आज कुशल कळलें तेथुनि खरं ॥
वदा विदेहें केविं जाणले । प्रिय वच परिसुनि दूत हासले ॥

दो० :- भूप-मुकुट-मणि तुम्हां सम ऐका धन्य न कोणि ॥
जयां राम लक्ष्मण तनय विश्व-विभूषण दोनि ॥ २९१ ॥

पत्र ऐकून दोन्ही भावांचे देह रोमांचित झाले व प्रेम फार झाल्याने ते गात्रांत मावेनासे झाले ॥ १ ॥ भरताची पुनीत प्रीती पाहून त्या सर्व सभेने विशेष सुखाचा संचय केला. ॥ २ ॥ मग राजाने दूतांना जवळ बसविले व मधुर मनोहर वचने बोलू लागले ॥ ३ ॥ बाबांनो, सांगा पाहूं माझ्या दोन्ही बाळांचे कुशल, तुम्ही आपल्या डोळ्यांनी माझ्या बाळांना नीट पाहीलेत नां ? ॥ ४ ॥ ते श्यामल व गौर वर्णाचे आहेत, धनुष्य व भाते धारण केलेले आहेत वयाने किशोर असून, कौशिक मुनींसमवेत आहेत. ॥ ५ ॥ ओळखले असलेत तर माझ्या त्या बाळांचा स्वभाव कसा आहे सांगा पाहू, असे राजाने प्रेमवश होऊन कितीदां तरी विचारले ॥ ६ ॥ ज्या दिवशी विश्वामित्र त्यांना घेऊन गेले तेव्हापासून आज त्यांचा समाचार कळला ॥ ७ ॥ विदेहाने त्यांना कशा प्रकारे जाणले ते सांगा पाहू हे प्रिय भाषण ऐकून दूत हसले व म्हणाले ॥ ८ ॥ भूपशिरोमणी ! ऐकावे, सर्व विश्वाचे विभूषण असणारे राम, व लक्ष्मण हे दोघे ज्यांचे पुत्र आहेत, असा आपल्या सारखा धन्य (विश्वात) कोणी नाही. ॥ दो० २९१ ॥

भवत्सुतां पुसणें कें अवश्यक । पुरुषसिंह जे जगत्प्रकाशक ॥
ज्यांच्या यशा-प्रतापा-पुढतीं । शशि मलीन रवि शीतल गमति ॥
’कसे विदित ते’ कीं प्रभु पुसती । रवि किं दीप करिं घेउनि बघती ॥
सीता स्वयंवरीं नृप सगळे । सुभट एक एकाहुनि जमले ॥
शंभु-शरासन कोणि न उचली । हरले सगळे वीर बहुबली ॥
त्रय-लोकांतिल जे भट-मानी । त्यांची शक्ति शंभु-धनु हाणी ॥
उचलुं शरासुर मेरु शके जो । चित्ती बिचकुनि परत फिरे तो ॥
जो शिवशैला सलील उचली । तोहि सभे त्या पराजित बली ॥

दो० :- तिथें राम रघुवंशमणि पहा महामहिपाल ॥
अश्रम चापा खंडिती यथेभ, पंकज-नाल ॥ २९२ ॥

महाराज ! जे पुरुषसिंह तिन्ही लोकांना प्रकाशमान करणारे आहेत त्या आपल्या पुत्रांबद्दल विचारण्याची आवश्यकताच काय ? (काहीच नाही) ॥ १ ॥ ज्यांच्या यशापुढे चंद्र मलिन व प्रतापापुढे सूर्य शीतल वाटतो, (त्यांच्या विषयी काय सांगावे ?) ॥ २ ॥ प्रभु ! ते कसे ओळखले म्हणून काय सांगावे - हातात दिवा घेऊन का सूर्याला पाहतात ? ॥ ३ ॥ सीता स्वयंवरात एकापेक्षा एक महावीर असलेले सगळे राजे जमले होते. ॥ ४ ॥ (पण) शिवधनुष्य कोणालाही (जरा सुद्धा) उचलता आले नाही. सगळे बलवान वीर हरले ॥ ५ ॥ तिन्ही लोकातील जे कोणी वीरतेचा अभिमान बाळगणारे होते त्या सर्वांची शक्ती शंभु धनुष्याने नष्ट केली ॥ ६ ॥ जो बाणासुर मेरु पर्वत सुद्धा उचलू शकतो, तो सुद्धा मनात बिचकून (हार खाऊन) परत फिरला ॥ ७ ॥ ज्याने सहज लीलेने शिवासह कैलास उचलला तो (रावण) सुद्धा त्या सभेत पराजित झाला. ॥ ८ ॥ अन् महाराज! राजाधिराज ! पहा तर खरे की रघुवंशमणी रामचंद्रांनी ते शिवधनुष्य इतके सहज मोडले की जसे हत्तीने कमळाचे देठ तोडावे ॥ दो० २९२ ॥

ऐकुनि आले सरोष भृगुपति । नानापरिं दाबिति धमकावति ॥
बघुनि रामबल निज धनु देती । स्तुति अति करुनि काननीं जाती ॥
राजन् राम अतुलबल जैसे । लक्ष्मण तेजनिधानहि तैसे ॥
त्यांनी बघतां कंपति भूपति । हरिशावक-अवलोकें गजपति ॥
देव ! बघुनि बालक तव दोनी । दृष्टिपुढें ये अतां न कोणी ॥
दूत-वचन-रचना प्रिय गमली । प्रेमैश्वर्य-वीर-रस भरली ॥
सभे सहित भूपति अनुरागति । दूतां बक्षिस देऊं लागति ॥
म्हणुन ’अनीति’ कान ते झाकति । धर्म विचारुनि सब सुख मानति ॥

दो० :- उठुनि पत्र मग देति नृप वसिष्ठांस जाऊन ।
गुरुसि सांगविति सादर कथा दूत आणवून ॥ २९३ ॥

धनुर्भंगाची वार्ता ऐकून भृगुपति क्रोधाविष्ट होऊन आले आणि त्यांना नाना प्रकारे डोळे वटारुन धमकावले ॥ १ ॥ पण रामांचे बल पाहून त्यांनी आपले धनुष्य रामांना दिले आणि रामांची अत्यंत स्तुती करुन ते वनांत निघून गेले ॥ २ ॥ हे राजन ! जसे राम अतुलबल आहेत तसेंच तेजनिधान लक्ष्मणही आहेत. ॥ ३ ॥ त्यांनी केवळ दृष्टी टाकली असता सिंहाच्या छाव्यास पाहून हत्ती जसे कापतात (भयभीत होतात) तसे राजे लोक कापू लागतात ॥ ४ ॥ हे देवा ! आपल्या दोन्ही पुत्रांना पाहिल्यानंतर आता अन्य कोणी दृष्टीसमोर येतच नाही ॥ ५ ॥ प्रेम, ऐश्वर्य व वीररस यांनी भरलेली दूताच्या वचनांची रचना प्रिय वाटली ॥ ६ ॥ सभेसहित राजा प्रेमात रंगले व दूतांना बक्षिस देऊं लागले ॥ ७ ॥ अनीती आहे असे म्हणून त्यांनी कानावर हात ठेवले तेव्हा विचार करुन सर्वांनी सुख मानले ॥ ८ ॥ मग दशरथांनी उठून वसिष्ठांकडे जाऊन ते पत्र त्यास दिले व दूतांना आदराने आणवून त्यांच्याकडून सर्व कथा सांगविली ॥ दो० २९३ ॥

ऐकुनि गुरु वदले सुखघूर्णिंत । मही पुण्य पुरुषा सुखपूरित ॥
सागरिं सरिता जाति जशा ही । जरी कामना तयास नाहीं ॥
तशि न मागतां सुख-संपत्ती । सहज धर्मशीलासी जमती ॥
तुम्हिं गुरु-विप्र-धेनु-सुर-सेवी । तशि पुनीत कौसल्या देवी ॥
जगीं तुम्हां-सम सुकृती काहीं । भूत न, नाही, होणें नाहीं ॥
पुण्य तुम्हांधिक महान् कुणाचें । राजन् रामसदृश सुत ज्यांचे ॥
वीर विनीरहि धर्मव्रत-धर । चारी गुणसागर बालक वर ॥
पावा तुम्हीं सतत कल्याणा । सजा वर्‍हाड पिटुनि डंक्यांनां ॥

दो० :- "चला शीघ्र" गुरुवचा श्रुत ’प्रभु ! बरं’ नमुनि पदांस ॥
भूपति गृहिं गत देववुनि मग दूतांनां वास ॥ २९४ ॥

(दूतांनी सांगितलेले सर्व) ऐकून गुरु सुखाने डोलत म्हणाले - की - पुण्यशील पुरुषाला सर्व पृथ्वी सुखाने भरलेली असते ॥ १ ॥ सागराला जशी इच्छा नसली तरी नद्या जाऊन त्यास मिळतात ॥ २ ॥ तशीच (सर्व) सुख व संपत्ती न मागता धर्मशील पुरुषाजवळ येतात, जमतात. ॥ ३ ॥ तुम्ही गुरु, विप्र, धेनु व देव यांची सेवा करणारे आहात आणि कौसल्यादेवीही तशाच पुनीत आहेत ॥ ४ ॥ तुमच्यासारखा सुकृती पूर्वी झाला नाही, आज विद्यमान नाही व पुढे होणार नाही. ॥ ५ ॥ राजा ! ज्याचा रामासारखा पुत्र आहे त्याच्यापेक्षा अधिक मोठे पुण्य कोणाचे असणार ? ॥ ६ ॥ वीर जितेंद्रिय, व विनम्र आणि धर्म हेच व्रत धारण करणारे श्रेष्ठ गुणसागर असे तुमचे चारी पुत्र आहेत ॥ ७ ॥ तुमचे सतत (सर्वकाळ) कल्याण होईल तरी डंके पिटून वर्‍हाडाची तयारी करा. ॥ ८ ॥ ‘ शीघ्र चला ’ या गुरुवचनास ऐकून ‘ प्रभु ! बरे आहे ’ असे म्हणून मग त्या दूतांना उतरण्यास जागा देऊन भूपती घरी गेले. ॥ दो० २९४ ॥

नृप राण्यांस सकल बोलाविति । जनक-पत्रिका वाचुनि दाविति ॥
पडतां कर्णीं सर्वहि हर्षति । अपर कथा सब नृप वाखाणति ॥
प्रेमें प्रफुल्ल राजति राणीं । श्रवुनि शिखिनि जणुं वारिदवाणी ॥
देति मुदित आशिस गुरुनारी । मोद-मग्न माता सब भारी ॥
प्रिय अति पत्र परस्पर घेउनि । निवविति छाती हृदयीं ठेउनि ॥
राम नि लक्ष्मण कीर्ती-करणी । वारंवार भूपवर वर्णी ॥
म्हणुनि ’मुनिकृपा’ द्वारीं निघती । राण्या भूदेवां आणवती ॥
देति दान आनंद-समेता । जाति विप्रवर आशिस देतां ॥

सो० :- ओवाळणी अपार याचक बोलावुनि दिधलि ॥
चिर जीवोतहि चार चक्रवर्ति दशरथ तनय ॥ २९५ ॥

राजाने सर्व राण्यांना एकत्र बोलावल्या व (सर्वांना) जनकपत्रिका वाचून दाखविली ॥ १ ॥ पत्र कानी पडताच त्या सगळ्या राण्यांना हर्ष झाला. (मग) बाकीची सर्व कथा राजाने विस्तारपूर्वक वर्णन करून सांगितली. ॥ २ ॥ प्रेमाने प्रफुल्लित झालेल्या राण्या अशा शोभू लागल्या की जणूं लांडोरींनी मेघगर्जना ऐकली असावी ॥ ३ ॥ गुरुनारींनी आनंदित होऊन आशीर्वाद दिले तेव्हा सर्व माता आनंदात फारच मग्न झाल्या ॥ ४ ॥ ते अत्यंत प्रिय पत्र एकमेकांनी एकमेकीं पासून (आळी पाळीने) घेऊन आपल्या हृदयाशी धारण करुन राण्या आपली छाती निववूं लागल्या ॥ ५ ॥ भूपश्रेष्ठ दशरथांनी रामलक्ष्मणांची करणी व कीर्ती वारंवार वर्णन केली ॥ ६ ॥ ही सर्व विश्वामित्र मुनींची कृपा आहे असे म्हणून दशरथ बाहेर गेले व राण्यांनी ब्राम्हणांस बोलावून घेतले ॥ ७ ॥ आनंदित होऊन त्यांना दाने दिली व विप्रश्रेष्ठ आशीर्वाद देऊन गेले ॥ ८ ॥ याचकांना बोलावून आणवून त्यांना अपार ओवाळणीचे पदार्थ दिले चक्रवर्ती दशरथ राजांचे चार पुत्र चिरंजीव होवोत (असे त्यांनी मनातून आशीर्वाद दिले). ॥ दो० २९५ ॥

वदत जाति घालुनिपट नाना । मुदित हणिति धम्‌धमां निशाणां ॥
समाचार कळला सकलांला । घरोघरी उत्सव सुरु झाला ॥
भुवन चतुर्दशभर उत्साहू । जनक सुता रघुवीर विवाहू ॥
श्रवुनि वृत्त शुभ, जन अनुरागति । पथ उपपथ गृह सजवूं लागति ॥
जरिहि अयोध्या सदौव शोभन । रामपुरी मंगलमय पावन ॥
तरी प्रीतिची रीतिच सुंदर । मंगल रचना करिति मनोहर ॥
ध्वज पताक पट चामर चारू । सजिति विचित्र परम बाजारू ॥
कनक-कलश तोरणं मणिजालां । हळद्-कुंकु, दधि, अक्षत, माला ॥

दो० :- मंगलमय निज निज भवन करिति लोक सजवून ॥
वीथि चतुरसम-सिक्त शुभ रांगोळ्या घालून ॥ २९६ ॥

‘ चक्रवर्ती दशरथांचे चार पुत्र चिरंजीव होवोत ’ असे म्हणत नाना प्रकारची वस्त्रे अंगात घालून हर्षाने परत चालले हर्षाने नगारे धमाधम वाजविले गेले ॥ १ ॥ (जनकसुता - रघुवीर विवाह ठरला असून त्यासाठी राजा वर्‍हाडासह शीघ्र निघणार) हा समाचार सर्व लोकांना कळला व घरोघरी अभिनंदनोत्सव सुरु झाले ॥ २ ॥ एवढेच नव्हे तर जनकसुता रघुवीर विवाहाचा उत्साह चौदाही भुवनात (ब्रह्मलोक ते पाताळ) भरुन राहीला ॥ ३ ॥ हा शुभ समाचार ऐकून सर्व लोक प्रेममग्न होऊन रस्ते, बोळ व घरे शृंगारु लागले ॥ ४ ॥ अयोध्या मंगलमय पावन रामपुरी असल्याने सदा सर्वदाच शोभन व सुंदर असते ॥ ५ ॥ तरी प्रीतीची रीतच अशी सुंदर आहे की, तिने विविध, मनोहर मंगल रचना केलीच. ॥ ६ ॥ सुंदर ध्वजा, पताका, पडदे चवर्‍या इत्यादिंनी सर्व बाजार परम विचित्र सजविले गेले ॥ ७ ॥ कनकाचे कलश, मोत्याची तोरणे, रत्नांच्या जाळ्या, हळद - कुंकू, दही, अक्षता, माळा इत्यादिनी. ॥ ८ ॥ (या मंगल द्रव्यादिकांनी) सर्व लोकांनी आपापली घरे सजवून मंगलमय बनविली आणि रस्ते ‘ चतुरसम ’ नावाच्या सुगंधी द्रव्याने शिंपून सुंदर रांगोळ्या काढून ठेवल्या. ॥ दो० २९६ ॥

जिथं तिथं मिळूनि थवांनीं भामिनि । सब नव सप्त सजुनि दुति दामिनि ॥
विधुवदनीं मृग-शावक लोचनि । निज सुरूपिं रतिमान-विमोचनि ॥
गाती सुस्वर मंजुल मंगल । लाज कोकिळे ऐकुनि रव कल ॥
भूप-भवन कसं जाइं वर्णिलें । विश्व विमोहक वितान रचिलें ॥
मंगलवस्तु मनोहर राजति- । विविधा विपुल नगारे वाजति ॥
कुठें ब्रीद बंदी उच्चरती । कुठें विप्र वेदध्वनि करती ॥
गाति सुंदरी मंगल गीतं नाम ’राम’ घे घेउनि ’सीता’ ॥
महोत्साह परि भवन थोकडें । पूर येइ जणुं भरे चौकडे ॥

दो० :- शोभा दशरथभवनिंची कुणि करि वर्णि किं पार ॥
जिथें सकल-सुर-शीर्षमणि रामें धृत अवतार ॥ २९७ ॥

विजेसारखी कान्ती असलेल्या, चंद्रासारखे मुख असलेल्या, हरिणीच्या पाडसा सारखे नेत्र असलेल्या, सोळा स्थानी शृंगारांनी सजलेल्या व आपल्या सुरुपाने रतीचे गर्वहरण करणार्‍या सुंदर स्त्रिया थव्याथव्यांनी जमून मंजुळ सुरावर मंगल गीते गाऊ लागल्या त्यांचा तो सुंदर स्वर ऐकून कोकिळाही लाजल्या ! ॥ १-२-३ ॥ जेथे विश्वाला विमोहित करणारा मंडप घातला गेला त्या राजवाड्याचे वर्णन कसे करणार ! ॥ ४ ॥ विविध मनोहर मंगल वस्तू शोभत आहेत व विविध विपुल नगारे वाजत आहेत ॥ ५ ॥ कुठे बंदी ब्रीदाचा घोष करीत आहेत तर कुठे विप्र वेदघोष करीत आहेत ॥ ६ ॥ कुठे (अंत:पुरात) सुंदर स्त्रिया राम व सीता यांची नांवे पुन:पुन्हा उच्चारुन मंगल गीतांतून गात आहेत ॥ ७ ॥ असा हा उत्साह फार मोठा झाल्याने - वाढल्याने त्याला राजवाडा थोकडा - अपुरा पडू लागला जणूं उत्साहाचा पूर चोहोंकडे वाहू लागला ॥ ८ ॥ सर्व देवशिरोमणीदेवाने - रामाने जेथे अवतार घेतला त्या दशरथ भवनाची शोभा पूर्ण वर्णू शकेल असा कवी कोण आहे बरे ? ॥ दो० २९७ ॥

घेति भूप भरता बोलावुनि । हय गज सजवा स्यंदन जाउनि ॥
चला शीघ्र रघुवीर-वर्‍हाडीं । बंधु-देहिं पुलकावलि जाडी ॥
भरत दरोगे आणवि सगळे । सांगत, उठुनि मुदित धावले ॥
जीन रचुनि रुचि तुरगां साजति । वर्ण-वर्ण वर वाजि विराजति ॥
सुभग सकल अति चंचल चरणीं । लोहिं लाल पडति किं पद धरणीं ॥
नाना जाति न येति वदाया । जिंकुनि पवन किं बघति उडाया ॥
सब शोकिन वर झाले स्वार । भरत सदृशवय राजकुमार ॥
सुंदर सकल सु-भूषणधारी । करिं शरचाप तूण कटिं भारी ॥

दो० :- शोकिन निवडक सुबक ते शूर सुजाण नवीन ॥
प्रतिस्वार पदचरयुगल जे असिकला-प्रवीण ॥ २९८ ॥

(मग) दशरथ राजांनी भरतास बोलावून सांगितले की, जाऊन घोडे, हत्ती, रथ, सजवा ॥ १ ॥ रघुवीराच्या वर्‍हाडात त्वरेने चला. (हे ऐकताच) त्या भावांच्या देहावर दाट रोमांच उभे राहीले ॥ २ ॥ भरताने जाऊन (त्या त्या खात्यांचे) सर्व दरोगे अधिकारी (व्यक्ति) बोलावून आणविले, आज्ञा देताच ते सर्व आनंदाने उठून धावत निघाले ॥ ३ ॥ त्यांनी तुरंगांवर यथा रुचि सुंदर जीन घालून त्यांना शृंगारले व विविध वर्णाचे श्रेष्ठ घोडे शोभू लागले ॥ ४ ॥ हे सर्व घोडे अति सुभग व गतीमान चालीचे आहेत; इतके की लाल झालेल्या लोखंडावर पाय पडावेत तसे यांचे पाय जमिनीवर पडत आहेत ॥ ५ ॥ यात इतक्या विविध जाती आहेत की त्या सांगता येणे शक्य नाही, पवनाला जिंकूनच जणू उडू पाहत आहेत ॥ ६ ॥ भरत व समवयस्क शोकिन राजकुमार त्यावर स्वार झाले आहेत ॥ ७ ॥ हे सगळे सुंदर व सगळी भूषणे घातलेले असून हातात मोठ मोठी धनुष्ये व कमरेला मोठ मोठे भाते बांधलेले (कसलेले) असे आहेत. ॥ ८ ॥ भरताबरोबर सर्व राजकुमार शोकिन, निवडक व रुपाने सुबक असून किशोर वयाचे असून शूर व सुजाण आहेत आणि प्रत्येक घोडे स्वाराबरोबर तलवार बहाद्दूर असलेले दोन - दोन पायदळ स्वार आहेत ॥ दो० २९८ ॥

वीरवेषिं रणधीर शोभले । निघुनि पुरी बाहेर थांबले ॥
फिरविति चतुर तुरग गतिं नाना । हर्षति ऐकुनि पणव-निशाणां ॥
रथां सारथी विचित्र साजति । ध्वज पताक मणिभूषण लावति ॥
चमर चारु, किंकिणि रव करती । भानुयान-शोभा अपहरती ॥
श्यामकर्ण हय होते अगणित । सारथि ते त्या रथांस जोडित ॥
सुंदर सकल अलंकृत शोभति । त्यास विलोकुनि मुनि-मन मोहति ॥
स्थलीं तसे जे जलीं चालती । अति वेगानें टाप न बुडती ॥
अस्त्र शस्त्र सब साज सजविले । सारथिनीं मग रथी जमविले ॥

दो० :- जमुं लागे बस-बसुनि रथिं पुरि-बाहेर वरात ॥
होति शकुन सुंदर तयां जे ज्या कार्या जात ॥ २९९ ॥

ते सर्व राजकुमार वीर वेषात सुशोभित झालेले रणधीर वीर निघून नगराच्या बाहेर जाऊन थांबले . ॥ १ ॥ तेथे ते चतुर वीर आपापल्या चपळ तुरंगांना विविध गतींनी फिरवूं लागले. ढोल नगार्‍याचा आवाज ऐकून उत्साह वाढला ॥ २ ॥ (इकडे) सारथ्यांनी ध्वजा, पताका, रत्ने भूषणे इत्यादि रथांना लावून ते उत्तम प्रकारे सुंदर सजविले ॥ ३ ॥ चवर्‍या (वार्‍याने) झुलताहेत, व घंटिका-घागर्‍यांचा मधुर कोमल ध्वनी निघत आहे, असे हे रथ जणू सूर्याच्या रथाच्या शोभेचा अपहार करीत आहेत. ॥ ४ ॥ (अश्वमेध यज्ञांत लागणारे) श्यामकर्ण घोडे अगणित होते ते सारथ्यांनी त्या रथांना जुंपले ॥ ५ ॥ (ते सर्व श्यामकर्ण) सुंदर असून सकल अलंकारांनी सजविल्यामुळे विशेषच शोभायमान झाले, त्यांना पाहून मुनींची मने सुद्धा मोहित होऊ लागली. ॥ ६ ॥ ते जसे जमिनीवर चालतात तसे पाण्यावरही चालतात व अतिवेग असल्यामुळे त्यांच्या टापाही पाण्यात बुडत नाहीत ॥ ७ ॥ अशी अस्त्रादी सर्व सामग्री सजवून सारथींनी रथींना बोलावून घेतले ॥ ८ ॥ आपापल्या रथात क्रमश: बसून नगराच्या बाहेर वरातीची मिरवणूकीची जुळणी सुरु झाली जे ज्या कार्यासाठी निघाले, त्यांना त्यांना तसे सुंदर शकुन होऊ लागले ॥ दो० २९९ ॥

अंबार्‍या सुंदर करिवरतीं । वदलें न जाइ न अशा सजवती ॥
जाति मत्त गज घंटा राजति । श्रावण-घन-राजी सुभगा अति ॥
दुसर्‍या नाना विपुल सुवाहनिं । शिबिकां सुभग सुयानिं सुखासनिं ॥
बसुनी निघती विप्रवृंद वर । श्रुति छंद चि जणुं सर्व वर्ष्मधर ॥
मागध सूत बंदि गुणगायक । वाहनिं निघति जसें ज्यां लायक ॥
खेचर उंट बैल बहु जाती । लादित अगणित पदार्थिं जाती ॥
गडी वाहती कोटि कावडी । वस्तु वदूं किति विविध परवडी ॥
सेवक सगळे समुदायानें निघति समाजांसह थाटानें ॥

दो० :- हर्ष परम सकलां मनीं पूरित पुलक शरीर ॥
कधिं पाहूं डोळें भरून राम नि लक्ष्मण वीर ॥ ३०० ॥

सुंदर हत्तींवर सुंदर अंबार्‍या अशा सजविल्या गेल्या की काही सांगता येत नाही ॥ १ ॥ घंटांनी सुशोभित असे मत्त हत्ती चालू लागले (तेव्हा असे वाटले की) जणूं अत्यंत सुंदर अशा श्रावणातील मेघांच्या रांगाच चालल्या आहेत. ॥ २ ॥ दुसर्‍या पुष्कळ व अनेक प्रकारच्या सुंदर वाहनात मेणे, सुंदर डोल्या व पालख्या इत्यादीत ॥ ३ ॥ बसून विप्रश्रेष्ठांचे समुदाय चालले (तेव्हा वाटले की) सर्व वेद व उपनिषदेच शरीरे धारण करुन जात आहेत. ॥ ४ ॥ मागध, सूत बंदी व गुणगायक आपापल्या योग्यतेनुसार योग्य वाहनावर बसून निघाले ॥ ५ ॥ अगणित पदार्थांनी लादलेली विविध जातीची खेचरे, विविध प्रकारचे उंट व नाना जातींचे बैल चालू लागले ॥ ६ ॥ गडी अगणित कावड्या घेऊन निघाले (एकेका) कावडीत विविध प्रकारचे किती पदार्थ भरले आहेत हे किती वर्णन करून सांगावे बरे ! ॥ ७ ॥ सगळे सेवक आपापल्या पत्‍न्यांसह समूहा - समूहाने थाटाने निघाले आहेत. ॥ ८॥ सर्वांच्या मनात परम हर्ष झाला असून, सर्वांचे देह रोमांचांनी फुलले आहेत व राम - लक्ष्मण या दोघा वीरांना कधी एकदा डोळे भरुन पाहूं (अशी सर्वांनाच उत्कंठा लागली आहे) ॥ दो० ३०० ॥

गज घंटा भीषण घण्‌घणती । रथ रव चहुँ दिशिं अश्व हेषती ॥
भेरि घनां निंदित घड्‌घडती । निज परशब्द न कानीं पडती ॥
गर्दी भारी द्वारिं नृपाचे । फेकत पीठचि पाषाणाचें ॥
नारि चढुन गच्च्यांवर पाहति । घेउनि पात्रीं मंगल आरति ॥
करिति मनोिहर मंगल-गायन । अति आनंद किं, वदला जाय न ॥
स्यंदन युग तव सुमंत्र साजी । जोडी रविहयनिंदक वाजी ॥
ते रथ रुचिर नृपाप्रति आणी । वानुं शके ना त्यानां वाणी ॥
राज-साज रथिं एका साजे । तेजःपुंज दुजा विभ्राजे ॥

दो० :- वसिष्ठांस रथिं रुचिर त्या चढविति मुदित नरेश ॥
स्वयें बसति रथिं चिंतुनी हर गुरु गौरि गणेश ॥ ३०१ ॥

हत्तींच्या घंटा घोर (मोठमोठ्याने) घणघणाट करीत आहेत, रथांचा खडखडाट व घोड्यांचे खिंकाळणे चोहोकडे चालू आहे ॥ १ ॥ मेघांना लाजवित डंक्यांचा घडघडाट चालू आहे व त्यामुळे आपला किंवा दुसर्‍याचा शब्द कानी येत नाही ॥ २ ॥ राजद्वाराजवळ तर इतकी भारी गर्दी झाली आहे की, (तेथे) दगड फेकला तर त्याचे पीठ होऊन जाईल ॥ ३ ॥ स्त्रिया गच्यांवर चढून तबकात मंगल - आरती घेऊन बघत आहेत. ॥ ४ ॥ आणि त्या मनोहर मंगल गीते गात आहेत. आनंद तर इतका अत्यंत आहे की वर्णन करणे अशक्य ! ॥ ५ ॥ दोन रथ सुमंतांनी सजविले व सूर्याच्या घोड्यांना लाजविणारे घोडे त्यास जोडले ॥ ६ ॥ ते दोन रुचिर रथ (त्याने) राजाजवळ आणले त्यांचे वर्णन शारदेलाही करता येणार नाही. ॥ ७ ॥ एका रथांत राजांची सर्व सामग्री सजविली असून दुसरा रथ तेज:पुंज व विशेष शोभायमान आहे ॥ ८ ॥ त्या सुंदर रथात राजाने आनंदाने वसिष्ठांस चढविले व आपणही शंकर, गुरु गौरी व गणेश यांचे स्मरण करुन त्याच रथावर आरुढ झाले. ॥ दो० ३०१ ॥

सह वसिष्ठ शोभति नृप तैसे । सुर-गुरु-संगिं पुरंदर जैसे ॥
करुनि वेद-कुल विधींस राजा । सज्ज सर्वपरिं बघुनि समाजा ॥
स्मरुनि राम गुरु-आज्ञा घेउनि । निघति महीपति शंख वाजवुनि ॥
विबुध वरात विलोकुनि हर्षति । सुमन सुमंगल-दायक वर्षति ॥
अति कोलाहल हय गज गाजति । व्योमिं वरातीं वाद्यें वाजति ॥
गाति सुमंगल सुर-नर-नारी । वाजति सणया सु-रागदारीं ॥
घंटी-घंटा ध्वनि न वर्णवे । सेवक करती खेळ नव नवे ॥
करिति विदूषक कौतुक नाना । हास्य-कुशल जे पटु कल गानां ॥

दो० :- तुरग नाचविति कुमरवर मृदंगादि अनुकूल ॥
नागर नट निरखिति चकित तालसमेंत न भूल ॥ ३०२ ॥

बृहस्पतींसह इंद्र शोभावा तसे वसिष्ठांसह राजा दशरथ शोभत आहे. ॥ १ ॥ वेदविधी व कुलरिवाजाप्रमाणे जो विधी करावयाचा तो करुन व (आपल्या बरोबर येणार्‍या) समाजाची सर्वप्रकारे सज्जता झाली आहे हे पाहून ॥ २ ॥ रामाचे स्मरण करून व गुरुजींची आज्ञा घेऊन, शंख वाजवून महीपतींनी प्रयाणास प्रारंभ केला ॥ ३ ॥ ती मिरवणूक पाहून देवांना हर्ष झाला व त्यांनी अतिमंगल अशी पुष्पवृष्टी केली ॥ ४ ॥ (तेव्हा) अत्यंत गोंगाट, गलबला सुरु झाला घोडे, हत्ती गर्जू लागले आणि आकाशात व मिरवणूकीत (वरातीत) वाद्ये वाजू लागली. ॥ ५ ॥ अप्सरा व अयोध्येतील स्त्रिया मंगलगान करीत आहेत व सनया वगैरे कोमल वाद्ये उत्तम रागदारीत वाजत आहेत ॥ ६ ॥ छोट्या - मोठ्या घंटाचा ध्वनी वर्णनातीत आहे सेवक (पैलवान) अनेक प्रकारचे कसरतीचे नव - नवे खेळ करीत आहेत. ॥ ७ ॥ विदूषक नाना प्रकारचे कौतुक करीत असून ते हास्यरस निर्माण करण्यात कुशल व सुंदर गायनात निपुण आहेत ॥ ८ ॥ सुंदर राजकुमार मृदंगादिकांच्या वादनानुसार आपापल्या तुरंगाना नाचवित आहेत व त्यांचे ताल - सम वगैरे मुळीच चुकत नाहीत हे निरखून चतुर नट सुद्धा आश्चर्यचकित होत आहेत. ॥ दो० ३०२ ॥

सज्ज वरात वदलि ना जाई । होति शकुन सुंदर शुभदाई ॥
चारा चास वाम दिशिं घेई । मंगल सकल किं सांगुन देई ॥
उजवा काक सुशेतीं दिसला । सकलां नकुल विलोकत बसला ॥
त्रिविध पवन अनुकूल वहतसे । सुस्त्री शिशुसह सघट येतसे ॥
भालु वळुनि दे दर्शन राजी । सुरभी सन्मुख वत्सा पाजी ॥
वळुनि उजवि मृगमाला आली । मंगल-गण जणुं दाविति झाली ॥
क्षेम विशेषहि वदे क्षेमकरि । दिसली श्यामा वाम सुरतरुवरि ॥
कुणि दधि मीनां सन्मुख आणी । विज्ञ विप्रयुग पुस्तकपाणी ॥

दो० :- मंगलमय कल्याणमय अभिमत फळ जे देत ॥
शकुन सत्य होण्या जणूं सर्व एकदां येत ॥ ३०३ ॥

ही वरात इतकी सुंदर सजली आहे की वर्णन करता येत नाही सुंदर शुभ - दायक शकुन (सर्वांना) होऊ लागले ॥ १ ॥ चासपक्षी डाव्या बाजूस आपले भक्ष्य खात आहे व जणू सांगत आहे की सर्व प्रकारचे मंगल होणार ॥ २ ॥ उत्तम शेतात उजव्या बाजूस कावळे दिसले व मुंगुस आपल्याकडे पुन:पुन्हा वळून बघत आहे असे सर्वांना दिसले ॥ ३ ॥ शीत, मंद व सुगंधित वारा अनुकूल वाहू लागला डोक्यावर पाण्याची घागर व कमरेला बालक घेतलेली सौभाग्यवती स्त्री समोरुन येताना दिसली ॥ ४ ॥ भालू (कोल्हाची मादी) वळून खुषीने दर्शन देत आहे व धेनू वत्साला समोरच पाजीत आहे ॥ ५ ॥ हरीणाचा कळप डावीकडून वळून उजवा आला व जणूं सर्व मंगल गणांचे दर्शन देता झाला ॥ ६ ॥ लाल घार (क्षेमकरी) विशेष सांगत आहे आणि शुभ वृक्षावर डाव्या बाजूस श्यामा - कोकिळा दिसली ॥ ७ ॥ कोणी दही व मासे समोरुन घेऊन आला व दोन विद्वान ब्राम्हण हातात पुस्तक असलेले येताना दिसले ॥ ८ ॥ जे शकुन मंगलमय, कल्याणमय व इच्छिलेले फळ देतात ते सगळे शकुन जणूं सत्य ठरण्यासाठी एकाच वेळी आले असे दिसले ॥ दो० ३०३ ॥

त्या सब शकुन सुगम मंगलकर । ज्याचा ब्रह्म सगुण, सुत सुंदर ॥
राम सदृशवर वधू सिताही । दशरथ जनक पूत हे व्याही ॥
ऐकुनि असें शकुन-गण नाचे । अतां विरंचि अह्मां करि साचे ॥
करि वरात यापरीं प्रयाणा । हय गज गाजति हणिति निशाणां ॥
जाणुनि येति भानुकुल-केतु । जनक बांधविति सरिता-सेतु ॥
मधें मधें वर वास विरचिले । सुर-पुर-सदृश संपदें खचिलें ॥
अशन शयन सुंदर वर वसनें । पावति सकल रुचे जें स्वमनें ॥
नव नव सुख अभिमत अवतरलें । सकल वर्‍हाडी मंदिर भुलले ॥

दो० :- जाणून येत वर्‍हाड वर वाद्य घोष ऐकून ॥
स्वागति आणूं जाति हय गजरथ आदि सजून ॥ ३०४ ॥

सगुण ब्रह्मच ज्यांचा पुत्र आहे त्यांना मंगलकारक सर्व शकुन एकच वेळी होणे यात नवल ते काय ? ॥ १ ॥ रामासारखा वर व सीतेसारखी वधू आणि दशरथ जनकासारखे पुनीत व्याही आहेत ॥ २ ॥ हे ऐकून शकुंनांचा समुदाय आनंदाने नाचू लागला की आता विरंचीने आंम्हाला सत्य ठरविले ॥ ३ ॥ याप्रमाणे वरातीने प्रयाण केले (तेव्हा) घोडे, हत्ती गर्जू लागले व डंके पिटले गेले ॥ ४ ॥ सूर्यवंशाचे ध्वज दशरथ महाराज येत आहेत असे जाणून जनक राजाने सरितांवर तात्पुरते पूल बांधविले ॥ ५ ॥ मधे - मधे वस्ती करण्यासाठी चांगली निवासस्थाने तयार करविली आणि ती (इंद्रपुरी-इंद्राची राजधानी) अमरावती सारख्या संपदेने अगदी खचून - भरुन ठेवली ॥ ६ ॥ खाण्याचे व भोजनादिकांचे उत्तम पदार्थ गाद्या वगैरे झोपण्यासाठी उत्तम साधने व सुंदर वस्त्रे वगैरे सर्व गोष्टी सर्व वर्‍हाडांना आपापल्या मनाच्या आवडीप्रमाणे मिळाल्या ॥ ७ ॥ आपणास इष्ट वाटणारे सुख रोज नवनवे अवतरलेले पाहून सर्व वर्‍हाडी मंदिर (हृदयातील राम-मंदिर) भुलून गेले ॥ ८ ॥ श्रेष्ठ वर्‍हाड येत आहे असे जाणून वाद्यांचा घोष ऐकून स्वागती (स्वागत करण्यास जाणारी मंडळी) हत्ती, घोडे, रथ, पायदळ वगैरे सजवून वर्‍हाडास घेऊन येण्यासाठी निघाली. ॥ दो० ३०४ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP