॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ उत्तराकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


अध्याय ११ वा



Download mp3

वायस वचना रुचिर ऐकिलें । गरुडे हर्षें पंख फुलविलें ॥
नयनिं नीर मनिं अतिशय हर्षित । श्रीरघुपति प्रताप हृदिं आणित ॥
स्मरुनि पूर्वमोहा पस्तावत । ब्रह्म अनादि मनुज मी समजत ? ॥
घडि घडि काक चरणिं शिर नमवी । प्रभु सम गणुनी प्रेम वाढवी ॥
गुरुविण भवनिधि कोणि न तरती । जरी विरिंचि शंकर सम असती ॥
संशय सर्प तात मज डसला । दुःखद लहरि कुतर्क वाधला ॥
तव रूपें गारुडि रघुनायक । मजला जगविति जनसुखदायक ॥
गेला तुमच्या कृपें मोह मम । रामरहस्य समजलें अनुपम ॥

दो० :- तया प्रशंसुनि बहुपरीं शिर नमि, जोडी हात ॥
वच विनीत सप्रेम मृदु गरुड पुन्हां वदतात ॥ ९३रा ॥
प्रभु ! अविवेकें माझिया पुसतो स्वामि तुम्हांस ॥
सांगा सादर कृपानिधि जाणुनि मज निज दास ॥ ९३म ॥

श्रीगरुडाची कृतज्ञता - काकभुशुंडीचे सुंदर भाषण ऐकले तेव्हा गरुडाने आनंदाने आपले पंख फुलविले ॥ १ ॥ त्याच्या डोळ्यात पाणी आले आणि मनात अतिशय हर्ष झाला व त्याने श्रीरघुवीराचा प्रताप हृदयात धारण केला ॥ २ ॥ पूर्वीच्या आपल्या मोहाचे स्मरण होऊन तो पश्चाताप करु लागला की अनादि ब्रह्माला मी मनुष्य समजलो. ॥ ३ ॥ त्याने वारंवार भुशुंडीच्या पायावर मस्तक नमविले व त्याला प्रभु रामचंद्रांसारखा जाणून त्याच्यावरील प्रेम वाढले ॥ ४ ॥ कोणीही गुरुशिवाय भवसागर तरुन जात नाहीत, अगदी ब्रह्मदेवासारखे वा शंकरांसारखे ॥ ५ ॥ (गरुड म्हणाला) तात ! मला संशयरुपी सर्प चावला होता व कुतर्क रुपी दु:खदायक लहरी पुष्कळ येत होत्या ॥ ६ ॥ सेवकास सुख देणार्‍या रघुनायक गारुडीने तुमच्यारुपाने मला जगविला. ॥ ७ ॥ तुमच्या कृपेने माझा मोह गेला व श्रीरामाचे अनुपम रहस्य मला कळले ॥ ८ ॥
गरुडाचे प्रश्न – भुशुंडींची नाना प्रकारे प्रशंसा करुन मस्तक नमविले व हात जोडून पुन्हा विनम्र वचन गरुड प्रेमाने बोलला. ॥ दो० ९३ रा ॥ हे प्रभो ! स्वामी ! माझ्या अविवेकाने मी आपल्याला काही विचारीत आहे. हे कृपासागरा ! मला आपला निजदास जाणुन आदरपूर्वक सांगा ॥ दो० ९३ म ॥

तुम्हि सर्वज्ञ तज्ञ तमपारहि । सुमति सुशील सरल आचार हि ॥
ज्ञानविरतिविज्ञान निवासहि । तुम्हिं रघुनाथाचे प्रिय दास हि ॥
कारण काय काय हा पावां । तात ! सकल मजला समजावा ॥
स्वामी ! रामचरित सर नामी । प्राप्त कुठें सांगा नभगामी ॥
श्रुत मी नाथ किं शंभूपासीं । नाश महाप्रलयिं न अपणासी ॥
मुधा वचन नहिं ईश्वर वदती । म्हणून संशया मम मनिं वसती ॥
अग जग जीव नाग नर निर्जर । नाथ ! सकल जग काल कवल तर ! ॥
अंड कटाह अमित लयकारी । काल सदा दुरतिक्रम भारी ॥

सो० :- व्यापी तुम्हां न काल अति कराल कारण कवण ॥
तें मज वदा कृपाल ज्ञानशक्ति कीं योगबल ॥ ९४रा ॥
दो० :- प्रभु ! तव आश्रमिं येता भ्रम मम मोह हि ठार ॥
नाथ ! कवण कारण, सकल सांगा प्रेमें फार ॥ ९४म ॥

तुम्ही सर्वज्ञ, तत्वाचे ज्ञाते आहात, मायारुपी तमाच्या अतीत आहांत ॥ १ ॥ वैराग्य ज्ञान व विज्ञान यांचे निवासस्थान आहांत आणि श्रीरघुनाथाचे प्रिय दासही आहांत ॥ २ ॥ (असे असता) हा काक देह तुम्हाला कसा मिळाला हे मला समजावून सांगा ॥ ३ ॥ स्वामी ! आपण आकाशगामी (पक्षी) असून हे सुंदर रामचरित मानस आपल्याला कुठे मिळाले ते सांगा ॥ ४ ॥ नाथ ! मी श्रीशंकरांकडून असे ऐकले आहे की महाप्रलयाचे वेळी सुद्धा तुमचा नाश होत नाही ॥ ५ ॥ शंकर कधीही असत्य बोलणार नाहीत पण माझ्या मनांत संशय निर्माण झाला आहे ॥ ६ ॥ (कारण) सर्व स्थावर जंगम जीव, नाग, मनुष्य, देव (त्रैलोक्य), सर्व जग हे काळाचे भक्ष्य आहे, नाथ ! ॥ ७ ॥ अनंत ब्रह्मांडाचा लय करणारा काळ सदा अत्यंत अनिवार्य आहे ॥ ८ ॥ (असे असता) अति कराल काल तुम्हाला व्यापीत नाही याचे कारण काय असेल ते कृपालु मला सांगावे, ज्ञानसामर्थ्य की योग बळ ? ॥ दो० ९४ रा ॥ हे प्रभु ! मी तुमच्या आश्रमभुमीत येताच माझा भ्रम व मोह नष्ट झाला, तरी नाथ ! याचे जे कारण असेल ते मला फार प्रेमाने सांगावे ॥ दो० ९४ म ॥

गरुड गिरेनें काक हर्षला । उमे ! परम अनुरागें वदला ॥
धन्य धन्य तव मति उरगारी ! । तुमचे प्रश्न मला प्रिय भारी ॥
प्रश्नें प्रेमळ रुचिर आपले, । बहु जन्मांचे स्मरण जाहले ॥
कथितो सकल कथा मम आतां । श्रुणु सादर मन् लाउन ताता ! ॥
व्रत जप तप मख शम दम दान । विरति विवेक योग विज्ञान ॥
सकलां फल रघुपतिपदिं प्रेमहि । त्याविण कोणि न पावे क्षेमहि ॥
रामभक्ति या तनुमधिं मिळली । यास्तव मम ममता अति जडली ॥
जिथें स्वार्थ निज काहिं साधतो । त्यावर कोणिहि ममता करतो ॥

सो० :- पन्नगारि अशि नीति श्रुति संमत सज्जन वदति ॥
अति नीचींही प्रीती करणें जाणुनि परम हित ॥ ९५रा ॥
सो० :- देती रेशिम कीट होति मनोहर वस्त्र मग ॥
कृमि पाळति जन नीट प्राणांसम, जरिं अशुचि अति ॥ ९५म ॥

गरुडांच्या प्रश्नांची उत्तरे – उमे ! गरुडाच्या भाषणाने भुशुंडीला हर्ष झाला आणि तो परम प्रेमाने म्हणाला ॥ १ ॥ हे उरगारी ! धन्य, धन्य आहे तुझी बुद्धी ! तुमचे प्रश्न मला फार आवडले ॥ २ ॥ तुमच्या प्रेमळ व सुंदर प्रश्नांमुळे मला माझ्या (अनेक पूर्व) जन्माचे स्मरण झाले ॥ ३ ॥ तात ! माझी ती सर्व कथा आता मी तुम्हांला सांगतो, तुम्ही आदराने मन लावून श्रवण करा. ॥ ४ ॥ व्रत, तप, जप, यज्ञ, शम, दम, दान, वैराग्य, ज्ञान आणि विज्ञान या सर्वांचे फळ रघुपती चरणी प्रेम हेच आहे. त्या शिवाय कोणीही कल्याण पावत नाही. ॥ ५-६ ॥ रामभक्ती या देहामध्ये मिळाली म्हणून यावर माझी अति ममता जडली आहे ॥ ७ ॥ जिथे काही स्वत:चा स्वार्थ साधतो त्यावर कोणीही ममता करतो ॥ ८ ॥ हे उरगारी ! श्रुतीना मान्य असलेली अशी नीती आहे आणि संतही म्हणतात की आपले परमहित होत असेल तर अति नीचावर सुद्धा प्रीती करावी. ॥ दो० ९५ रा ॥ रेशमाच्या किड्यांपासून रेशीम मिळते, त्याची नंतर मनोहर वस्त्रे होतात म्हणून अति अपवित्र असूनही हे रेशिमकिडे लोक अगदी प्राणांसारखे जपून पाळतात. ॥ दो० ९५ म ॥

स्वार्थ साच जगिं हाच जिवाचा । प्रेम रामपदि मनकृतिवाचां ॥
तें पावन तें सुभग शरीर । जें मिळुनी भजवें रघुवीर ॥
रामविमुख तनु विधिसम पावति । कवि कोविद ना तिला प्रशंसति ॥
रामभक्ति या तनुंत उपजली । स्वामि ! म्हणून ही प्रिय अति बनली ॥
त्यजीं न तन निज इच्छामरणी । तन विण, वेद भजन ना, वर्णी ॥
प्रथम मोह बहु छळी मलाही । रामविमुख, सुखनिद्रा नाहीं ॥
नाना जन्मिं कर्म कृत नाना । योग याग जप तपादि दानां ॥
योनि अशी जगिं नहि एका ही । जिथें खगेश ! भटकलो नाहीं ॥
सर्व कर्म मी करुन पाहिलें । सुख आतांसम कधिं न जाहलें ॥
स्मृति मज नाथ बहुत जन्मांची । मोह न मतिला, कृपा शिवाची ॥

दो० :- प्रथम जन्मचरिता अतां ऐका सांगुं खगेश ॥
श्रवणें प्रभुपदिं होइ रति तेणें टळती क्लेश ॥ ९६रा ॥
पूर्वकल्पिं एका प्रभो ! युग कलियुग मलमूल ॥
नर नारीहि अधर्मरत सब निगमां प्रतिकूल ॥ ९६म ॥

जीवाचा खरा स्वार्थ हाच आहे की मनाने, कृतीने व वाणीने श्रीरामचरणी प्रेम करावे. ॥ १॥ जे शरीर मिळून रामभजन करता येईल तेच पावन व सुंदर शरीर होय. ॥ २ ॥ राम विमुख असणारी तनु ब्रह्मदेवासारखी जरी मिळाली तरी कवी व पंडित तिची प्रशंसा करीत नाहीत ॥ ३ ॥ या काक तनूत रामभक्ती उत्पन्न झाली, म्हणून स्वामी ! ही तनु मला अत्यंत प्रिय आहे ॥ ४ ॥ माझे मरण जरी माझ्या इच्छेवर अवलंबून आहे तरी मी या तनुचा त्यागच करीत नाही, कारण की देहाशिवाय भजन करता येत नाही असे वेद वर्णन करतात ॥ ५ ॥ पूर्वी मोहाने (अज्ञानाने) मला सुद्धा फार छळले (कारण) त्यामुळे) मी रामविमुख राहीलो आणि कधी सुखाची झोप सुद्धा मिळाली नाही. ॥ ६ ॥ अनेक जन्मात मी नाना प्रकारची योग, यज्ञ, तप, जप, दान इ. अनेक कर्मे केली ॥ ७ ॥ हे खगेशा ! जगात अशी एकही योनी नाही की जिथे मी भटकलो नाही ॥ ८ ॥ मी सर्व प्रकारचे कर्म करुन पाहीले पण आताच्या सारखा सुखी मी कधीच झालो नाही. ॥ ९ ॥ नाथ ! मला पुष्कळ जन्मांची स्मृती आहे, कारण की शिवाच्या कृपेने बुद्धीला मोह झाला नाही. ॥ १० ॥ खगराज ! आता प्रथम जन्माचे चरित्र सांगतो ते ऐका त्याच्या श्रवणाने प्रभुचरणी रती (द्दढ प्रेम) उत्पन्न होईल, आणि तेणे करुन सर्व क्लेश टळतील ॥ दो० ९६ रा ॥ प्रभो ! पूर्वी एका कल्पांत पापाचे मूळ असणारे कलियुग होते तेव्हा पुरुष आणि स्त्रिया ही अधर्म परायण होत्या. आणि सर्वच वेदशास्त्र विरोधक होते ॥ दो० ९६ म. ॥

त्या कलियुगिं कोसल पुरिं जाउन । मी जन्मलो शूद्रतनु पाउनि ॥
शिवसेवक मनकर्में वाणीं । आन देवनिंदक अभिमानी ॥
धनमदमत्त परम वाचाळहि । उग्रबुद्धिं उरिं दंभ विशाळहि ॥
जरि वसलो रघुपति नृपधामीं । तरि न तदा ये महिमा ध्यानीं ॥
अतां अयोध्या प्रभाव अवगत । निगमागम पुराण हा सांगत ॥
जन्मिं कुण्याहि वसे कोसल पुरिं । राम परायण तो होइल तरि ॥
जीव अयोध्या प्रभाव जाणति । जैं उरिं राम धनुर्धर राहति ॥
तो कलिकाल कठिण उरगारी । पाप परायण सब नरनारी ॥

दो० :- ग्रस्त कलिमलें धर्म सब लुप्त सकल सद्‌ग्रंथ ॥
दांभिकिं निजमतिकल्पित प्रगटविले बहु पंथ ॥ ९७रा ॥
होति मोहवश लोक स ब ग्रासि लोभ शुभकर्म ॥
श्रुणु हरियाना ज्ञाननिधि सांगुं कांहिं कलिधर्म ॥ ९७म ॥

त्या कलियुगात मी अयोध्येत जाऊन शूद्र देहाने जन्मास आलो ॥ १ ॥ मनाने, कर्माने, वाणीने मी शिव उपासक झालो. पण अन्य देवांची निंदा करणारा व अभिमानी बनलो ॥ २ ॥ मी जरी रघुपतीच्या राजधानीत राहीलो तरी त्यावेळी अयोध्येचा महिमा माझ्या ध्यानात आला नाही. ॥ ३ ॥ आता अयोध्येचा प्रभाव मला कळला. वेद शास्त्रे व पुराणे महिमा सांगतात की ॥ ५ ॥ जो कोणत्याही जन्मात अयोध्येत वास करतो तो पुढे राम परायण झाल्याशिवाय राहणार नाही ॥ ६ ॥ जेव्हा धनुर्धारी राम हृदयात राहतात तेव्हा जीव अयोध्येचा प्रभाव जाणतात.
कलिधर्म - हे उरगारी ! तो कलिकाल फार कठीण होता सर्व स्त्रिया व पुरुष पाप करण्यातच तत्पर होते. ॥ ८ ॥ कलिमलाने सर्व धर्म ग्रासले, सदग्रंथ लुप्त झाले (कारण) दांभिकांनी आपल्या स्वत:च्या बुद्धीने कल्पिलेले पुष्कळ पंथ प्रगट केले ॥ दो० ९७ रा ॥ सगळे लोक मोहवश झाले व लोभाने शुभकर्मे ग्रासली हे हरियाना ! हे ज्ञान निधी ! कांही कलिधर्म सांगतो ऐक ॥ दो० ९७ म ॥

वर्ण धर्म ना आश्रम चारी । श्रुति विरोधरत सब नरनारी ॥
श्रुति विकती द्विज, भूप प्रजाशन । कोणि न मानि निगम अनुशासन ॥
तो च मार्ग जो ज्याला रुचतो । पंडित तो जो शेखि मिरवतो ॥
मिथ्यारंभ दंभरत जेही । त्यांस संत म्हणती सगळे ही ॥
तोच चतुर जो परधनहारी । सदाचारि जो दंभ बहु करी ॥
वदति असत्य, मस्करी जाणति । गुणवान् गणुनी तया प्रशंसिति ॥
त्यागी श्रुतिपथ निराचार जो । कलियुगिं तो ज्ञानी विरक्त तो ॥
ज्याचीं नखें जटाहि विशाला । तो प्रसिद्ध तापस कलिकालां ॥

दो० :- अशुभवेषभूषणधर भक्ष्याभक्ष्या खति ॥
ते योगी ते सिद्ध नर कलियुगिं पुजिले जाति ॥ ९८रा ॥
सो० :- परापकाराचार त्यां गौरव ते मान्य अति ॥
मनवचकृति शठ फार त्यां कलियुगिं वक्ते म्हणति ॥ ९८म ॥

कलियुगात चारी वर्ण धर्म रहात नाहीत की चारी आश्रम धर्म रहात नाहीत सर्व स्त्रीपुरुष वेदविरोध करण्यात तत्पर असतात. ॥ १ ॥ ब्राह्मण वेदांची विक्री करतात राजे लोक प्रजेला खाऊन टाकणारे होतात वेदशास्त्राची आज्ञा कोणी मानीत नाही ॥ २ ॥ ज्याला जो रुचेल तो त्याचा मार्ग, आणि जो पुष्कळ शेखी मिरवील बढाया मारील, तो पंडित ॥ ३ ॥ मिथ्यारंभार व दंभात जे तत्पर असतात त्यांनाच सगळे संत म्हणतात ॥ ४ ॥ जो परधन हरण करणारा असेल तोच चतुर शहाणा समजला जातो. जो पुष्कळ दंभ करतो त्यालाच सदाचारी म्हणतात. ॥ ५ ॥ जे असत्य भाषण व थट्टा मस्करी करण्यात कुशल असतात, त्यांनाच गुणवान समजून त्यांची प्रशंसा लोक करतात. ॥ ६ ॥ जो वेद मार्गाचा त्याग करतो आणि आचारहीन असतो त्यालाच कलियुगात मोठा विरक्त व त्यालाच मोठा ज्ञानी समजतात. ॥ ७ ॥ ज्याची नखे व जटा विशाल असतात तो कलिकालात मोठा तपस्वी म्हणून प्रसिद्ध होतो ॥ ८ ॥ जे अमंगल वेष व अमंगल भूषणे धारण करतात व भक्ष्य अभक्ष्य खातात ते कलियुगांत योगी सिद्ध पुरुष समजले जातात व पूज्य होतात. ॥ दो० ९८ रा ॥ दुसर्‍यांना अपकार करणारे असतात त्यांचा गौरव केला जातो व ते सन्मान्य समजले जातात जे मनाने वाणीने व कृतीने फार लबाड असतात ते कलियुगात वक्ते समजले जातात ॥ ९८ म ॥

नारि विवश नर सगळे स्वामी ! ।नाचति नटमर्कट सम नामी ॥
द्विजां शूद्र उपदिशती ज्ञाना । कंठिं जानवें, घेति कुदानां ॥
पुरुष कामरत लोभी क्रोधी । वेद विप्र सुर संत विरोधी ॥
त्यागुनि गुणमंदिर पति सुंदर । नारि अभागिनि भजति पुरुष पर ॥
सुवासिनी तों विना विभूषण । विधवांचे शृंगार तु नूतन ॥
अंध बधिर गुरु शिष्य वर्तती । एक न बघति न एक ऐकति ॥
हरति शिष्यधन शोक न हरती । ते गुरु दारुण नरकीं पडती ॥
मायबाप बालां बोलावति । उदर भरे तो धर्मच शिकवति ॥

दो० :- ब्रह्मज्ञान च नारिनर वदति दुजी नहिं बात ॥
कौडीलागीं लोभवश करति विप्रगुरुघात ॥ ९९रा ॥
शूद्र भांडती द्विजांसह आम्हिं किं कांही न्यून ॥
ब्रह्म जाणि तो विप्रवर बघतो संतापून ॥ ९९म ॥

अहो स्वामी ! (कलियुगात) सगळे पुरुष स्रियांना विशेष वश झालेले असतात व गारुड्याच्या (मदार्‍याच्या) माकडासारखे त्यांच्या कलाने नाचत असतात. ॥ १ ॥ शूद्र द्विजांनाच ज्ञानाचा उपदेश करतात व गळ्यात जानवे घालून कुदाने घेतात ॥ २ ॥ पुरुष कामरत, लोभी, व क्रोधी होतात आणि वेद, ब्राह्मण, देव व संत यांचे विरोधक असतात. ॥ ३ ॥ अभागिनी स्रिया सुंदर गुणमंदिर पतीचा त्याग करुन परपुरुषाचे सेवन करतात ॥ ४ ॥ सुवासिनी स्त्रिया भूषण – रहित होतात तर विधवांचे शृंगार मात्र नवनवीन होतात. ॥ ५ ॥ गुरु आणि शिष्य आंधळ्या बहिर्‍यासारखे वागतात. गुरु बघत नाही व शिष्य ऐकत नाही ॥ ६ ॥ जे गुरु शिष्यांचे धन हरण करतात, पण शोक हरण करीत नाहीत, ते भयानक नरकात पडतात ॥ ७ ॥ आईबाप आपल्या बालकांना जवळ घेऊन ज्याने पोट भरेल तोच धर्म शिकवितात (भक्तीचे संस्कार निर्माण करीत नाहीत) ॥ ८ ॥ स्त्रिया पुरुष ब्रह्मज्ञाना शिवाय दुसरी गोष्टच बोलत नाहीत पण एका कवडीसाठी ब्राह्मणाची किंवा गुरुचीही हत्या करतात ॥ दो० ९९ रा ॥ शूद्र ब्राह्मणांशी भांडतात की आम्ही काय तुमच्याहून कमी आहोत काय ? जो ब्रह्म जाणतो तो विप्रवर श्रेष्ठ असे म्हणून संतापून डोळे लाल करुन पाहतात. ॥ दो० ९९ म ॥

परवधु लंपट कपट शहाणे । लिप्त मोह ममता द्रोहानें ॥
ते अभेद वादी ज्ञानी नर । कलियुग चरित दृष्ट मी खगवर ॥
आपण पडले त्यांसहि पाडति । जे कुणि सन्मार्गां प्रतिपालति ॥
कल्प कल्प एकैका नर्की । पडति, दूषिती श्रुति जे तर्कीं ॥
वर्णाधम तेली कुंभारहि । श्वपच किरात कोळि कलवारहि ॥
स्त्री मरतां, गृहवित्त विनाशीं । मुंडुनि मुंड होती संन्यासी ॥
विप्रंकडुनि घेति पूजुनि ते । उभय लोक नाशिति निज हातें ॥
विप्र निरक्षर लोलुप कामी । निराचार शठ वृषली स्वामी ॥
शूद्र करिति जप व्रत तप नाना । बसुनि वरासनिं कथिति पुराणां ॥
सब नर करिति कल्पिताचारां । वदवे ना कीं अनिति अपारा ॥

दो० :- होति वर्ण संकर कलिं भिन्नसेतु सब लोक ॥
करिति पाप दुख पावती भय रुज वियोग शोक ॥ १००रा ॥
श्रुति संमत हरिभक्तिपथ संयुत विरति विरति विवेक ॥
तो न धरति नर मोहवश कल्पिति पंथ अनेक ॥ १००म ॥

जे परस्त्रीलंपट असतात जे मोह ममता व द्रोह यांनी लिडबिडलेले असतात पण अभेदवादी असतात तेच ज्ञानी पुरुष (असे समजतात) खगराजा ! असे कलियुगाचे चरित्र मी पाहीलेले आहे ॥ १-२ ॥ ते स्वत: पतित नष्ट झालेले असतातच पण जे कोणी कुठे सन्मार्गाचे प्रति पालन करीत असतात त्यांनाही धर्मभ्रष्ट करतात. ॥ ३ ॥ जे तर्क करुन श्रुतींना दोष देतात ते प्रत्येक नर्कात एकेक कल्प पडतात ॥ ४ ॥ तेली, कुंभार, चाण्डाल, भिल्ल, कोळी कलाल इ. जे वर्णाहून नीच असतात ते बायको मेली, घर संपत्ती इ. नष्ट झाले की मुंडक्याचे मुंडन करुन संन्यासी बनतात ॥ ५-६ ॥ ते ब्राह्मणांकडून आपली पूजा करवून घेतात. आणि आपल्या हातानी उभय लोकांचा विनाश करतात ॥ ७ ॥ ब्राह्मण वेदाध्यनरहित, विषयलोलुप, कामी, आचारभ्रष्ट, मूर्ख (स्वहित न जाणणारे), आणि शूद्रादि जातींच्या स्त्रियांचे पती झालेले असतात. ॥ ८ ॥ शूद्र नाना प्रकारे जप, व्रते, तप इ. करतात आणि व्यास पीठावर बसून पुराण सांगतात. ॥ ९ ॥ सर्व लोक आपल्या मनाने कल्पिलेला आचार करतात आणि इतकी अपार अनीती माजते की तिचे वर्णन करता येत नाही. ॥ १० ॥ कलियुगात सर्व लोक वेदमर्यादेपासून च्युत झाले व वर्णसंकर लोक झाले ते पापे करीत असतात, व त्यांचे फळ भय, रोग, वियोग, शोक इ. दु:खे भोगतात. ॥ १०० रा ॥ वेदसम्मत वैराग्य ज्ञानयुक्त हरिभक्तीचा जो मार्ग आहे तो मोहवश मनुष्य धरीत नाहीत आणि अनेक पंथ कल्पनेने काढतात ॥ १०० म ॥

छंद० :- बहु दाम सुसाजिति धाम यती । विषयीं हरली नुरली विरती ॥
तपसी धनवंत दरिद्र गृही । कलिकौतुक ये वदतां नच ही ॥
हकलून कुलीनहि नारि सती । गृहीं ठेविति दासि तजून गती ॥
पितरां सुत मानिति तोंवर ही । अबलानन जोंवर दृष्ट नही ॥
श्वशुरालय गोड गमे हि यदा । रिपुरूप कुटुंब ठरेहि तदा ॥
नृप पापपरायण धर्म नही । जन दंडविडंबित संतत ही ॥
धनवंत कुलीन मलीन अपी । द्विजचिन्हहि जानवं नग्न तपी ॥
नहि मानि पुराण न वेदहि जो । हरि सेवक संत खरा कलिं तो ॥
कविवृंद, उदार न ये श्रवणीं । गुणदूषक वृंद; न कोणि गुणी ॥
कलिं वार अनेक दुकाळ पडे । विण अन्न दुखी जनमृत्यु घडे ॥

दो० :- श्रुणु खगेश कलिं कपट हठ द्वेष दंभ पाखांड ॥
मान मोह मारादि मदव्याप्त सदा ब्रह्मांड ॥ १०१रा ॥
तामस धर्मां करति नर व्रत जप तप मख दान ॥
देव न वर्षी धरणीं, उप्त न उगवे जाण ॥ १०१म ॥

संन्यासी पुष्कळ पैसे जमवितात आणि पुष्कळ पैसा खर्च करुन बंगले उत्तम रीतीने सजवितात; आणि विषयांनी वैराग्य हरण केल्यामुळे वैराग्य राहीलेले नसते, तपस्वी धनवान झाले व गृहस्थ दरिद्री बनले ! कलियुगातील अशा आश्चर्याचे वर्णन करवत नाही ॥ १ ॥ कुलीन व सती स्त्रियांना हाकलून देतात व चांगल्या चालीचा त्याग करुन दासीला घरात आणून ठेवतात. जोपर्यंत बायकोचे तोंड पाहीलेले नसते तोपर्यंतच मुले आईबापांना विचारतात. ॥ २ ॥ सासुरवाड गोड वाटू लागले की कुटुंबातील माणसे वाटूं लागतात राजे पापपरायण झाले व त्यांच्या ठिकाणी धर्म राहीला नाही प्रजेला (निष्कारण डोईजड कर बसवून) प्रजेची सदा विटंबना करतात ॥ ३ ॥ श्रीमंत लोक पापी असले तरी कुलीन मानले जाऊ लागले ब्राह्मणाचे लक्षण फक्त जानवेच शिल्लक राहीले. नग्न – वस्त्रहीन राहणे हे तपाचे लक्षण मानले जाऊ लागले. जो वेद – पुराण मानीत नाही तो कलियुगात खरा हरिभक्त संत मानला जाऊ लागला ॥ ४ ॥ कवींचे थवेच्या थवे झाले दाता जगात ऐकू सुद्धा येईनासा झाला गुणांना दोष ठेवणारे पुष्कळ, पण गुणी कोणीच नाही कलियुगात वारंवार दुष्काळ पडतो आणि लोक अन्नावाचून दु:खी होऊन मरण पावतात. ॥ ५ ॥ खगेश ! ऐक कलियुगात कपट, हट्ट, द्वेष, दंभ, पाखंड, मान, मोह, काम, क्रोध, लोभ, यांनी सदा ब्रह्मांड व्यापलेले होते ॥ १०१ रा ॥ मनुष्य व्रत जप, तप, दान इ. धर्म तामसी पद्धतीने करतात इंद्र धरणीवर पाऊस पाडीत नाही व पेरलेले धान्य उगवत नाही ॥ १०१ म ॥

छंद० :- अबला कचभूषण भूक महा । धनहीन दुखी ममता बहु हा ! ॥
सुख वांछिति मूढ, न धर्मरति । मति थोडि, कठोर, न कोमल ती ॥
जन पीडित रोग, हि भोग नही । अभिमान विरोध अकारणही ॥
लघु जीवन संवत पंच दहा । प्रलयींहि विनाश न दर्प महा ॥
अति हाल सदा कलिनें मनुजा । नहिं मानिं कुणी अनुजा तनुजा ॥
नहि तोष विचार न शीतलता । सब जातिकुजातिंत याचकता ॥
इरषा परुषाक्षर लोलुपता । भरपूर वसे समता विगता ॥
सब लोक वियोग विशोकहत । वरणाश्रम धर्म अचार गत ॥
दम दान दया नहि जाणपणा । जडता परवंचनताति घना ॥
तनुपोषक सर्वहि नारि नर । भरले परनिंदक विश्वभर ॥

दो० :- व्यालारि ! श्रुणु कलि मल अवगुण आगार ॥
कलियुगगुण हि महान हा अनायास उद्धार ॥ १०२रा ॥
सत्यीं त्रेतीं द्वापरीं पूजा मख नी योग ॥
देती गति ती कलिं हरिनामें पावति लोक ॥ १०२म ॥

स्त्रियांचे केस हेच भूषण, प्रत्येक विषयांत अतृप्त, व धनहीन असून विषयसक्ती अत्यंत असल्याने सदा दु:खी व हाय ! हाय ! त्या सुखाची इच्छा करतात पण अशा मूढ असतात की धर्माची आवड मुळीच नाही, व अल्प बुद्धी असून ती कठोर, कोमल मुळीच नाही. ॥ १ ॥ मनुष्य रोग पीडीत असल्याने भोगही भोगवत नाहीत, आणि खोट्या अभिमानाने निष्कारण विरोध मात्र करीत असतात. जीवीत अगदी थोडे पाच दहा वर्षाचे पण घमेंड इतकी की जणू प्रलयाचे वेळी सुद्धा नाश नाही ॥ २ ॥ कलीने सदा माणसाचे हाल हाल केले जातात (तरी सुद्धा) कोणी कन्या की बहीण हा विचार करीत नाही. संतोष नाही, विचार नाही की शीतलता नाही सर्व जातीचे व कुजातीचे लोक भीक मागतात ॥ ३ ॥ ईर्षा, कठोर भाषण, व लोभीपणा हे दोष भरपूर झाले आणि समता नष्ट झाली सर्व लोक वियोगाने व विशोकाने मारले गेले आहेत. वर्णधर्म व आश्रम धर्म यांचे आचरण नाहीसे झाले ॥ ४ ॥ इंद्रिय, निग्रह, दान, दया आणि समजुतदारपणा कोणात नाहीत मूर्खपणा व दुसर्‍यांची फसवणूक यांना ऊत आला सर्व स्त्री पुरुष शरीर पोषक झाले आणि परनिंदा करणारे जगभर झाले ॥ ५ ॥ हे उरगारी ! ऐक कलिकाल पापांचे व अवगुणांचे घर आहे (परंतु) कलियुगाचा हा एक मोठा गुण आहे की, श्रमावाचून उद्धार होतो ॥ १०२ रा ॥ सत्य युगात – योग, त्रेता युगात यज्ञ, व द्वापर युगात पूजा यांनी जी गति मिळते तीच कलियुगात हरिनामाने लोकांना मिळते ॥ १०२ म ॥

कृतयुगिं सब योगी विज्ञानी । ध्यात हरिस भव तरती प्राणी ॥
त्रेतीं यज्ञ विविध नर करती । प्रभुस कर्म अर्पुनि भव तरती ॥
द्वापरिं करुनी रघुपति पूजा । नर भव तरति उपाय न दूजा ॥
कलियुगिं केवळ हरिगुण गाथा । भवठावा नर पावति गातां ॥
योग यज्ञ कलियुगिं ना ज्ञान हि ॥ एक अधार रामगुणगान हि ॥
त्यजुनि भरंवसा सब जे राम हि । भजति गाति गुणगण सप्रेम हि ॥
तेच तरति भव, संशय अल्प न । कलियुगिं नामप्रताप गुप्त न ॥
कलिचा एक पुनीत प्रतापहि । होई मानस पुण्य, पाप नहिं ॥

दो० :- कलियुग समयुग आन ना जर नर युत विश्वास ॥
गाइ रामगुणगण विमल तरे भव न सायास ॥ १०३रा ॥
प्रगट धर्मपद चार, हा एकच कलीं प्रधान ॥
येन केन विधि देतां दान करी कल्याण ॥ १०३म ॥

कृत युगात सर्व लोक योगी व विज्ञानी होतात आणि हरिचे ध्यान करीत सर्व प्राणी भवसागर तरतात ॥ १ ॥ त्रेता युगात मनुष्य अनेक प्रकारचे यज्ञ करतात आणि सर्व कर्मे प्रभूला समर्पण करुन भवसागर तरतात ॥ २ ॥ द्वापर युगात श्रीरघुनाथाच्या चरणाची पूजा करुन मनुष्य भवसागराचा ठाव पावतात. दुसरा आधारभूत उपाय नाही. ॥ ३ ॥ कलियुगात श्रीहरीच्या गुणकथांचे गान करुन मनुष्य भवसिंधु तरतात ॥ ४ ॥ कलियुगात योग, यज्ञ, ज्ञान यापैकी काहीही आधार नाही. श्रीरामाचे गुणगान गाणे हाच एक आधार आहे ॥ ५ ॥ सर्व भरवसा सोडून जो रामाला भजतो आणि प्रेमाने गुणगणांचे गान करतो तोच भवसागर तरतो यात मुळीच संशय नाही. नामाचा प्रताप कलियुगात गुप्त नाही प्रगट आहे. ॥ ६-७ ॥ कलीचा एक पवित्र प्रताप आहे की मानसिक पुण्य घडते, पण मानसिक पाप लागत नाही ॥ ८ ॥ कलियुगासारखे दुसरे युग नाही (कारण) जर मनुष्य विश्वासाने रामचंद्रांचे विमल गुणगण (चरित्र) गाईल तर प्रयत्ना वाचून भव तरुन जातो. ॥ १०३ रा ॥ धर्माचे चार चरण (सत्य, शौच, दया, दान) प्रसिद्ध आहेत, पण कलियुगात त्यातील एकच (दान) प्रधान आहे (कारण) कोणत्याही प्रकाराने दिलेले दान कल्याण करते. (देश, काल, पात्र यांचा विचार आवश्यक नाही.) ॥ दो०१०३ म ॥

होति हृदयिं युगधर्म जनांचे । प्रेरित मायेनें रामाचे ॥
शुद्ध सत्त्व समता विज्ञान । कृतमहिमा प्रसन्न मन जाण ॥
सत्त्व बहुत, रज जरा, कर्मरति । त्रेताधर्म सर्वपरिं सुख अति ॥
बहु रज, सत्त्व अल्पही तामस । द्वापर धर्म हर्षमय मानस ॥
राजस थोडा तामस भारी । कलिमहिमा विरोध दिशिं चारी ॥
बुध निज मनिं युग धर्म जाणती । त्यजुनि अधर्म धर्मरति करती ॥
कालधर्म ना बाधिति त्यासी । रघुपतिपदिं प्रीति अति ज्यासी ॥
नटकृत विकट कपट खगराया ! । नटसेवका न लागे माया ॥

दो० :- हरिमायाकृत दोषगुण विण हरिभजन न जात ॥
राम भजा कामां त्यजुनी हे चिंतुनी मनांत ॥ १०४रा ॥

श्रीरामाच्या मायेच्या प्रेरणेने सर्व लोकांच्या हृदयात युगधर्म उत्पन्न होत असतात. ॥ १ ॥ शुद्ध सत्वगुण, समता, विज्ञान, आणि सर्वदा मन प्रसन्न राहणे हा कृत युगाचा धर्म आहे. असे जाणावे ॥ २ ॥ सत्वगुण पुष्कळ रजोगुण जरासा असणे, कर्माची आवड आणि सर्व प्रकारे सुखी असणे हा त्रेतायुगाचा धर्म आहे ॥ ३ ॥ पुष्कळ रजोगुण, थोडा सत्वगुण व थोडा तमोगुण असणे आणि मानसिक हर्षभय वाटणे हा द्वापार युगाचा धर्म ॥ ४ ॥ तर तमोगुण पुष्कळ थोडा रजोगुण व चहूंकडे विरोध हा कलिचा महिमा होय. ॥ ५ ॥ शहाणे लोक आपल्या मनातील युगधर्म जाणून अधर्माचा त्याग करतात व धर्मावर प्रीती करतात. ॥ ६ ॥ ज्याचे रघुपतीचरणी अति प्रेम आहे, त्याला कालधर्म बाधा करु शकत नाही. ॥ ७ ॥ हे खगराया ! जादूगाराचे कपट पाहणार्‍यांना भयानक वाटते पण जादूगाराच्या सेवकाला त्याची माया बाधत नाही ॥ ८ ॥ श्रीहरीच्या मायेने निर्माण केलेले दोष आणि गुण हरिभजनावाचून जात नाहीत याचा मनात विचार करुन सर्व कामनांचा त्याग करुन श्रीरामाचे भजन करावे ॥ दो० १०४ रा ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP