॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अयोध्याकाण्ड ॥

अध्याय ११ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

श्रवुनि राम मुनिवच संकुचती । भावभक्ति आनंदे तृप्ती ॥
मग रघुवीर मुनि-सुयश सुशोभन । बहुविध सकलां करिति निवेदन ॥
तो मोठा तो सबगुणगण-घर । ज्या मुनीश तुम्हिं देतां आदर ॥
मुनि रघुवीर परस्पर नमती । वचनाऽगोचर सुख अनुभवती ॥
कळत वृत्त हें प्रयागवासी । बटु तापस मुनि सिद्ध उदासी ॥
येति भरद्वाजाश्रमिं सादर । बघण्या दशरथ सुतांस सुंदर ॥
राम करिति नमना सर्वांना । मोद होइ जैं लाभ लोचनां ॥
आशीस् देति परम सुख मिळतां । जाती वाखाणित सुंदरता ॥

दो० :- राम करुनि विश्राम निशिं स्नान उदयिं तीर्थांत ॥
सिता बंधुजन सह मुदित नमुनि मुनिस निघतात ॥ १०८ ॥

मुनीचे वचन (स्तुती) ऐकून राम संकोचित झाले (पण) मुनीच्या भावभक्तीने व आनंदाने ते तृप्त झाले ॥ १ ॥ मग रघुवीराने मुनीचे सुंदर सुयश नाना प्रकारे सर्वांस निवेदन केले ॥ २ ॥ मुनीश तुम्ही ज्याला आदर देता तो मोठा (ठरतो) व तो सर्व गुणसमूहांचे घर बनतो ॥ ३ ॥ मुनी व रघुवीर एकमेकांना नमत (नमस्कार करत) आहेत व वाणीला अगोचर असणार्‍या सुखाचा अनुभव घेत आहेत ॥ ४ ॥ (भरद्वाजाश्रमात) दशरथनंदन रामलक्ष्मण आले आहेत हा समाचार कळताच प्रयागात राहणारे ब्रम्हचारी तपस्वी मुनी सिद्ध आणि संन्यासी ॥ ५ ॥ हे सगळे दशरथांच्या सुंदर पुत्रास पाहण्यासाठी भरद्वाजाश्रमात आले ॥ ६ ॥ रामचंद्रांनी सर्वांना नमस्कार केला त्या सर्वांना नेत्राचा लाभ मिळाला व आनंद झाला ॥ ७ ॥ त्यांना परम सुख मिळाले व त्यानी आशीर्वाद दिले व ते सुंदरतेची प्रशंसा करीत परत गेले ॥ ८ ॥ रामचंद्रांनी रात्री विश्रांती घेतली व उजाडल्यावर प्रयाग – तीर्थात स्नान इ. केले व भरद्वाज मुनींस आनंदाने नमन करुन सीता, लक्ष्मण व सेवक गुह यांच्यासह आनंदाने जाण्यास तयार झाले (निघाले) ॥ दो० १०८ ॥

राम मुनिस वदले प्रेमानें । जावें नाथ ! कवण मार्गानें ॥
मुनि मनिं विहसुनि रामा म्हणती । सुगम मार्ग सब तुम्हांस असती ॥
सवें द्यावया शिष्य बाहले । श्रवुनि मुदित पन्नास ठाकले ॥
प्रेम अपार रामिं सर्वांसी । सकल वदति पथ विदित अम्हांसी ॥
मुनिनें सवें चार बटु दिधले । जिहिं बहुजन्मिं सुकृत सब केलें ॥
प्रणमुनि ऋषी आज्ञेस पावले । प्रमुदित मन रघुराज चालले ॥
जाति यदा ते गांवावरुनी । नर नारी छबि बघति धाउनी ॥
होति सनाथ जन्म फल पाउनि । दुःखी फिरति सवें मन धाडुनि ॥

दो० :- विनवुनि बटुनां फिरविले जाति पूर्ण-मनकाम ॥
उतरुनि यमुना स्नान कृत जलिं शरीरशा श्याम ॥ १०९ ॥

भरद्वाज मुनीना राम प्रेमाने म्हणाले की नाथ ! आम्ही कोणत्या मार्गाने जावे ॥ १ ॥ (तेव्हा) मुनी मनात मोठ्याने हसून रामचंद्रांस म्हणाले की तुम्हांला सगळे मार्ग सुगम (सोपे) आहेत ॥ २ ॥ रामचंद्रांबरोबर देण्यासाठी भरद्वाजांनी शिष्यांस बोलावले (आज्ञा) ऐकून (सुमारे) पन्नास शिष्य आनंदाने आले ॥ ३ ॥ सर्वांचे रामावर अपार प्रेम आहे व ते सर्व म्हणाले की रस्ता आम्हांला माहीती आहे ॥४ ॥ ज्यांनी पुष्कळ जन्मात सर्व (प्रकारचे) सुकृत केले होते अशा चार बटूंना मुनीने बरोबर दिले ॥ ५ ॥ भरद्वाज मुनींना प्रणाम करून व त्यांची आज्ञा घेऊन रघुराज प्रमुदित मनाने चालू लागले ॥ ६ ॥
-- प्रभु – वाल्मीकी – मिलन – प्रकरण – (१०९/७ ते १३२) –
(सीतेसह रामलक्ष्मण) एखाद्या गावाजवळून जाऊ लागले की तेथील स्त्रिया व पुरुष धावत येऊन त्या रुपाचे दर्शन घेऊ लागतात ॥ ७ ॥ (हे रामरुप पाहणारे सर्व लोक) जन्माचे फळ पावून सनाथ होऊ लागले पण (राम पुढे निघून गेले म्हणजे) आपले मन त्यांच्याबरोबर पाठवून लोक दु:खी कष्टी होऊन परततात (असे प्रत्येक गावी होऊ लागले) ॥ ८ ॥ रामचंद्रांनी विनंती करून बटूंना परत पाठवले व ते मनकामना पूर्ण होऊन परतले नंतर यमुना नदी ओलांडून आपल्या शरीरा प्रमाणे श्याम वर्ण असलेल्या यमुना जलांत सर्वांनी स्नान केले ॥ दो० १०९ ॥

तीरवासि नरनारी ऐकत । निज निज काजां विसरुनि धावत ॥
लक्ष्मण - राम - सिता - सुंदरते - । बघतां वानिति भाग्य-महत्ते ॥
वाटे अति लालसा मनासी । लाजति नांव गांव पुसण्यासी ॥
वयोवृद्ध त्यांमध्यें सुज्ञ जे । राम ओळखति युक्ति करुन ते ॥
वदति कथा सब ते सकलांसीं । पित्राज्ञें चालले वनवासी ॥
श्रवुनि विषादें सब पस्तावति । राणी राय न भलें आचरति ॥
त्या समयीं ये एक तपस्वी । सुंदर, लघु वय अति तेजस्वी ॥
कवि-अलक्ष्य-गति वेष विरागी । मन-कृति-वचनिं राम-अनुरागी ॥

दो० :- सजल नयन, तनुं पुलक, निज इष्ट देव जाणून ॥
दशा न वदवे धरणितळिं पडला दंड बनून ॥ ११० ॥

(दोन परम सुंदर कुमार व एक परम सुंदर सुकुमारी येत आहेत ही बातमी) यमुनेच्या तीरावरील गांवच्या लोकांस कळतांच, कानी पडताच, सर्व स्त्रीपुरुष आपाअपले कामकाज विसरुन धावत येऊ लागले ॥ १ ॥ लक्ष्मण राम व सीता यांचे सौदर्य पाहून सर्व आपल्या भाग्याची महती गाऊं लागले ॥ २ ॥ नांव, गांव वगैरे विचारण्याची अति प्रबल इच्छा मनात उत्पन्न झाली, पण विचारण्यास संकोच वाटू लागला ॥ ३ ॥ त्या लोकांत जे वयोवृद्ध व शहाणे (सुज्ञ चतुर) होते त्यांनी युक्ती प्रयुक्ती करुन रामचंद्रांस जाणले (ओळखले) ॥ ४ ॥ मग त्यांनी सर्व कथा बाकीच्या सर्वांना सांगीतली (व म्हणाले की) पित्याच्या आज्ञेने (राम) वनात जात आहेत ॥ ५ ॥ हे ऐकून सर्व दु:खी होऊन पश्चाताप करुं लागतात व म्हणतात की राणी व राजा यांनी हे चांगले नाही केले ॥ ६ ॥ तुलसीदासांचा स्वानुभव सगुण साक्षात्काराचा तापस – प्रकरण – त्याच वेळी एक तपस्वी आला होता ॥ ७ ॥ त्याची गती कवीला सुद्धा अलक्ष्य होती (तो कोण हे कवीलाही कळले नाही) वैराग्याचा वेष असून, मनाने – कर्माने व वाणीने तो रामप्रेमी होता ॥ ८ ॥ (राम) आपले इष्टदेव आहेत हे जाणून (ओळखून) त्याचे नेत्र अश्रूंनी डबडबले, अंगावर रोमांच उभे राहीले व तो एखाद्या दंडासारखा धरणीतळावर पडला त्यावेळची त्याची दशा वर्णन करणे शक्य नाही॥ दो० ११० ॥

प्रेमें राम धरिति उरिं पुलकत । परम रंक जणुं परीस पावत ॥
जणूं प्रेम परमार्थ उभयहि । भेटति तनुधर म्हणति सर्वही ॥
मग लक्ष्मण-पायां तो पडला । प्रेमभरानें धरुनि उठविला ॥
मग सीतापदरज धरि शीर्षा । जननि गणुनि शिशु दे आशीषा ॥
करि निषादपति तया दंडवत । रामस्नेहि गणुनि मुद भेटत ॥
पीत नेत्रपुटिं रूप-सुधेला । मुदित मिळत मिष्टान्न भुकेला ॥
माय बाप ते वद सखि कैसे । जे धाडिति वनि बालक ऐसे ॥
राम-सिता-लक्ष्मण-छवि बघती । स्नेह-विकल नर नारी बनती ॥

दो० :- मग रघुवीर अनेक-विध शिकवण देति सख्यास ॥
रामाज्ञा शिरिं धरुनि तो करि भवना गमनास ॥ १११ ॥

परम रंकाला परिसाचा लाभ व्हावा त्याप्रमाणेच जणू रामप्रेमाने पुलकित होऊन त्यानी त्यास हृदयाशी धरला ॥ १ ॥ सर्व म्हणतील – म्हणाले – की जणूं प्रेम आणि परमार्थ शरीरधारी होऊन एकमेकांस भेटले ॥ २ ॥ नंतर तो लक्ष्मणाच्या पाया पडला (तेव्हा) लक्ष्मणाला प्रेमाचे भरते आले व त्याला उठविला ॥ ३ ॥ मग त्याने जननी समजून सीतेच्या पायांची धूळ मस्तकावर धारण केली व सीतेने त्यास शिशु समजून आशीर्वाद दिला ॥ ४ ॥ (मग) निषादराजाने त्याला दंडवत केला तेव्हा रामस्नेही जाणून त्यास भेटत असता तापसाला आनंद झाला ॥ ५ ॥ तो तपस्वी नेत्ररुपी ओष्ठ – पुटांनी राम – रुपामृताचे पान करीत असा आनंदित झाला की भूक लागलेला मनुष्य मिष्टान्न मिळाल्याने आनंदित होतो ॥ ६ ॥ (स्त्रिया म्हणतात) सखी ! ज्यांनी अशा बालकांस वनांत धाडले ते आईबाप आहेत तरी कसे ? ॥ ७ ॥ रामलक्ष्मण व सीता यांचे रुप पाहून पुरुष व स्त्रिया स्नेहाने व्याकुळ होऊ लागतात ॥ ८ ॥ मग रघुवीराने आपला सखा निषादराज गुह याला नाना प्रकारे शिकवण दिली (समजूत घातली व उपदेश केला) तेव्हा त्याने रामाज्ञा शिरसामान्य करून घरी जाण्य़ासाठी गमन केले ॥ दो० १११ ॥

सिता राम लक्ष्मण कर जुळती । पुन्हां नमन यमुनेला करती ॥
बंधु मुदित सीतेसह निघती । रवि तनुजेची वर्णित महती ॥
पथिं जातां बहु पथिक भेटती । भावां बघुनीं प्रेमें म्हणती ॥
राजचिन्ह सब अंगीं तुमचे । बघुनि दुःख अति हृदयिं आमचें ॥
अनवाणी चालतां हि वाटे । आम्हां ज्योतिष खोटें वाटे ॥
पथ दुर्गम गिरि कानन भारी । त्यांत सवें नारी सुकुमारी ॥
करि केसरि वृक बघवेना वन । येउं सवें जर द्या अनुशासन ॥
जेथें जाणें तिथें पोचवुनि । येउं परत शिर तुम्हांस नमवुनि ॥

दो० :- प्रेमें विनवित असें, जल नेत्रिं, गात्र पुलकीत ॥
कृपासिंधु त्यां फिरविती मृदु वचनें सुवििनीत ॥ ११२ ॥

गुह परत गेल्यावर सीताराम व लक्ष्मण यांनी पुन्हा यमुनेला प्रणाम केला ॥ १ ॥ व सीतेसह दोघे बंधू आनंदाने पुढे चालू लागले जाताना रविकन्या यमुनेचे माहात्म्य वर्णन करीत चालले ॥ २ ॥ रस्त्याने जात असता त्यांना अनेक वाटसरू भेटले व ते या दोन भावांना पाहून प्रेमाने म्हणाले की -॥ ३ ॥ तुमच्या शरीरावर सर्व राजचिन्हे आहेत, ती पाहून आमच्या हृदयास फारच दु:ख होत आहे (सर्व सामुद्रिक राजचिन्हे तुमच्या अंगावर असून) तुम्ही अनवाणी पायी चालत वाटेने जात आहांत (हे पाहून) आंम्हास वाटते की सामुद्रिक ज्योतिष खोटे असले पाहीजे ॥ ५ ॥ मार्ग फारच दुर्गम, डोंगर (मोठाले) व अरण्य घनदाट, आणि त्यांतही तुमच्याबरोबर अति सुकुमार स्त्री आहे ॥ ६ ॥ हत्ती, सिंह, लांडगे, असल्याने वनाकडे बघवत सुद्धा नाही (म्हणून) जर आपण अनुज्ञा दिलीत तर आम्ही आपल्याबरोबर (वाटाडे, सोबत व संरक्षक म्हणून) येतो. ॥ ७ ॥ तुम्हांला जिथे जाणे असेल तिथे (कुशल) पोचवून व तुम्हाला (सेवकांप्रमाणे) नमन करुन आम्ही परत येऊं ॥ ८ ॥ (हे वाटसरु ज्योतिषी) याप्रमाणे विनवीत असता त्यांच्या नेत्रांतून अश्रू गळूं लागले व देह रोमांचित झाले. कृपासिंधु रामचंद्रांनी मृदु व अति नम्र वचने बोलून त्यांस परत पाठवले ॥ दो० ११२ ॥

जे पुर गांव पथीं त्या असती । त्या अहि-सुर-पुर सेर्षा स्तवती ॥
सुकृति कवण घडिं वसवी पावन । धन्य पुण्यमय परम सुशोभन ॥
चालत राम जिथें पदिं जाती । त्यां समान अमरावति ना ती ॥
पुण्यपुंज पथ-निकट निवासी । तयां प्रशंसिति सुरपुरवासी ॥
डोळे भरुन बघति जे रामा । सीता लक्ष्मण सह घनशामा ॥
ज्या सरिं सरितिं राम अवगाहति । तयां देव-सर-सरिता वानति ॥
प्रभु ज्या तरुतळिं जाउनि बसति । तया कल्पतरु महान म्हणती ॥
राम-पदांबुज-पराग लागत । भूमि भूरि निज भाग्या मानत ॥

दो० :- छाय करिति घन विबुध सुम वर्षोनी स्तवितात ॥
निरखत गिरि वन विहग मृग मार्गि राम जातात ॥ ११३ ॥

जी खेडी व गांवे (रामचंद्रांच्या) वाटेत आहेत त्यांची नाग व देव नगरे ईर्षापूर्वक स्तुती करु लागले की ॥ १ ॥ कोणत्या पुण्य पुरुषाने व कोणत्या पावन मुहूर्तावर बसविली असतील बरें ! ही सर्व धन्य आहेत, पुण्यमय आहेत व फार शोभत आहेत ॥ २ ॥ राम जिथे पायी चालत जात आहेत त्या स्थानांसारखी अमरावती (इंद्रपुरी) सुद्धा नाही ॥ ३ ॥ रामचंद्राच्या मार्गाच्या जवळ राहणारे लोक पुण्यराशी आहेत (अशी) त्याची प्रशंसा सुरपुरीत राहणारे लोक सुद्धा करतात (कारण की) हे लोक सीता व लक्ष्मण यांच्यासह घनश्याम रामास डोळे भरुन पाहतात. ॥ ५ ॥ ज्या तलावात किंवा नद्यांत रामचंद्रांनी स्नान केले किंवा त्यात प्रवेश केला त्यांची देवांचे तलाव व देवसरिता प्रशंसा करु लागतात ॥ ६ ॥ प्रभु ज्या ज्या झाडांखाली बसतात त्यांना कल्पतरु (आपल्यापेक्षा) मोठे श्रेष्ठ म्हणू लागले ॥ ७ ॥ रामचरण कमलांच्या परागांचा (धुळीचा) स्पर्श झाल्याने (ती ती) भूमी आपले भाग्य अत्यंत थोर आहे असे मानू लागली. ॥ ८ ॥ मेघ छाया करु लागले विबुध (देव) पुष्पवृष्टी करुन प्रभुची स्तुती करु लागले (पण तिकडे लक्ष न देता) राम पर्वत, पक्षी, पशू वगैरेंचे निरिक्षण करीत मार्गाने जात आहेत ॥ दो० ११३ ॥

लक्ष्मण सीते सहित रघुपती । जैं जैं गांवा वरुनी जाती ॥
ऐकत बाल वृद्ध नारी नर । जाति काज गृह विसरुनि सत्वर ॥
राम-सिेता-लक्ष्मण-छवि बघती । मिळे नयनफळ सौख्य पावती ॥
सजल विलोचन पुलक शरीरां । सर्वहि मग्न बघत युगवीरां ॥
दशा तयांची नाहिं वर्णवत । सुरमणिरास रंक जणुं पावत ॥
बाहुनि दे शिकवण कोणा कुणि । लोचन-लाभ लुटा ज या क्षणिं ॥
रामा बघत कुणी अनुरागति । निरखत संगें जाऊं लागति ॥
कोणि नेत्रपथिं छवि उरि आणुनी । होति शिथिल-तन-मन-वरवचनीं ॥

दो० :- एक बघुनि वट छाय भलि मृदु तृण पल्लव घालि ॥
श्रम घडिभर हरणें म्हणे जाल अतां किं सकाळिं ॥ ११४ ॥

सीता व लक्ष्मण यासह रघुपती ज्या ज्यावेळी एखाद्या गावाजवळून निघतात ॥ १ ॥ त्या त्यावेळी ते कळताच बालकांपासून वृद्धापर्यत स्त्रिया व पुरुष आपापले घर व घरकाम विसरुन (रामादि तिघांना पाहण्यासाठी) त्वरेने निघतात ॥ २ ॥ राम – लक्ष्मण व सीता यांचे रुप निरखून पाहतात, त्यांना नेत्रफळ मिळते व ते सुखी होतात ॥ ३ ॥ नेत्र अश्रुंनी भरतात, अंगावर रोमांच उभे राहतात व सर्व या दोन वीरांना बघत प्रेममग्न होतात (असे गावोगावी चालते) ॥ ४ ॥ त्यांची प्रेमदशा वर्णन करून सांगणे शक्य नाही, पण जणूं काय रंकांना सुरमणींची (चिंतामणींची) रास सापडावी तसे त्यांस झाले ॥ ५ ॥ कोणी कोणाला बोलावून उपदेश करतात की जा, या क्षणी जा, व नयनलाभ लुटा ॥ ६ ॥ कोणी रामाला पाहून त्यांच्याकडे निरखून बघत बघत त्यांच्या मागो माग जाऊं लागतात ॥ ७ ॥ कोणी नयन मार्गाने रामचंद्रांना हृदयात आणून शरीराने – मनाने व श्रेष्ठ वाणीने शिथिल होतात (शरीर – मन व चारी वाणी यांची कार्ये बंद पडतात) ॥ ८ ॥ कोणी वडाची सुंदर दाट छाया पाहून कोमल तृण पल्लव तिथे पसरुन विनविले की घटकाभर विश्रांती घ्यावी, मग वाटल्यास आज जावे नाहीतर सकाळी जाल ॥ दो० ११४ ॥

एक कलशभर पाणि आणती । भरणें चूळ नाथ ! मृदु म्हणती ॥
प्रीति बघुनि अति परिसुनी वाक्‌प्रिय । राम कृपालु सुशीलहि अतिशय ॥
जाणुनि मनीं श्रमित सीतेसी । घडिभर थांबति वटछायेसी ॥
मुदित नारिनर देखति शोभे । अनुपमरूपिं नयन मन लोभे ॥
टकमक सब शोभति चौफेरहि । रामचंद्र-मुख-चंद चकोरहि ॥
तरुण-तमालवर्ण तनु शोभत । देखत कोटि-मदन-मन मोहत ॥
दामिनि-भा लक्ष्मण अति सुंदर । नख-शिख सुभग मनातें रुचिकर ॥
मुनिपट कटिं कसले तूणीरहि । धृत कर-कमलिं रुचिर धनु तीरहि ॥

दो० :- जटा-मुकुट मस्तकिं सुभग उर-भुज-नयन विशाल ॥
शरत्पर्व-विधु-वदनिं वर लसे स्वेदकण-जाल ॥ ११५ ॥

कोणी कळशीभर पाणी आणून विनवितात, की नाथ जरा चूळ भरा ‘ हात ’पाय धुवून पाणी प्यावे ॥ १ ॥ त्यांची ती अति प्रीती पाहून व प्रेमळ वाणी ऐकून अति कृपाळू व अतिशय सुशील ॥ २ ॥ रामचंद्रांनी मनात आणले की सीतेला श्रम ही झालेले आहेत व ते त्या वडाच्या छायेला घटकाभर थांबले – बसले ॥ ३ ॥ स्त्रिया व पुरुष आनंदित होऊन शोभा पाहू लागले व त्या अनुपम रुपावर त्यांचे नेत्र व मन लुब्ध झाले ॥ ४ ॥ ते सर्व लोक प्रभुच्या चारीही बाजूंनी टक लावून बघत असलेले शोभत आहेत रामचंद्रांचे मुख चंद्र आहे व ते बघणारे (सर्व) चकोर आहेत ! ॥ ५ ॥ तरुण तमाल वृक्षाप्रमाणे शाम शरीर शोभायमान दिसत असून त्यास पाहून कोटी – अनंत मदनांचे मन मोहित होते ॥ ६ ॥ वीजेच्या वर्णासारखे लक्ष्मण अति सुंदर व तेजस्वी असून नखशिखांत (सर्वंत्र) मनोहर असल्याने मनाला आवडतात ॥ ७ ॥ दोघांनी मुनीवस्त्रे परिधान केली असून कमरेला तूणीर = भाते कसलेले आहेत व हातात सुंदर धनुष्य – बाण घेतले आहेत ॥ ८ ॥ दोघांच्याही मस्तकावर सुंदर जटामुकुट असून छाती बाहू व नेत्र विशाल व सुंदर आहेत शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चंद्रासारखे (प्रत्येकाचे) मुख सुंदर असून त्यावर घामाच्या बिंदूचे जाळे शोभून दिसत आहे ॥ दो० ११५ ॥

ना वर्णवे मनोहर जोडी । शोभा बहुत बुद्धि मम थोडी ॥
लक्ष्मण-राम-सिता सुंदरते । बगति चित्त-मन-मति लावुन ते ॥
प्रेम-पिपासू थक्क नारि नर । जणूं मृगी मृग बघुनि दीप वर ॥
ग्राम नारि जाती सीते-प्रति । स्नेहें अति पुसण्या संकोचति ॥
घडि घडिं सकल करिति पदिं नमना । सहज सरल मृदु वदल्या वचनां ॥
राजकुमारी ! विनंति करितों । स्त्रीस्वभाव, पुसण्या घाबरतों ॥
स्वामिनि ! अविनय तरी क्षमावा । ग्राम्य गणुनि ना रोष धरावा ॥
राजकुमर युग सहज सुशोभन । यद् द्युतिनें द्युति मरकत कांचन ॥

दो० :- श्यामल गौर किशोर वर सुंदर सुषमा-क्षेत्र ॥
शरद-शर्वरीनाथ मुख शरत्सरोरुह नेत्र ॥ ११६ ॥

या राम – लक्ष्मण मनोहर जोडीचे वर्णन करवत नाही कारण ती शोभा अपार असून माझी बुद्धी अल्प आहे. ॥ १ ॥ ते राम – लक्ष्मण – सीता यांचे सौंदर्य चित्त – मन – बुद्धी लावून पहात आहेत ॥ २ ॥ प्रेमाची तहान लागलेली ही सर्व स्त्री – पुरुष मंडळी (रुप पाहता पाहता) अशी तटस्थ – थक्क झाली आहेत की जणू मोठा दिवा पाहून मृगी आणि मृगच ! ॥ ३ ॥ खेडेगांवातील स्त्रिया सीतेच्या जवळ अत्यंत स्नेहाने जातात पण अत्यंत स्नेहामुळे विचारण्यास संकोच वाटतो. ॥ ४ ॥ तेव्हा त्या सगळ्या वारंवार सीतेच्या पायांना वंदन करुन सरळ व मृदु शब्दांनी म्हणतात ॥ ५ ॥ राजकुमारी ! आम्ही काही विनंती करणार आहोत. पण स्त्री – स्वभाव असल्याने विचारण्यास भीती वाटते ॥ ६ ॥ तरी हे स्वामिनी ! आमच्या उद्धटपणा क्षमा करावा व आम्ही गावंढळ आहोत हे जाणून मनांत रोष धरु नये ॥ ७ ॥ दोघे राजकुमार सहज सुंदर असून यांच्या कांतीनेच मरकत व सोने यांची कांती आहे. (यांच्या पासूनच मरकत व सोने यांनी आपली कांती घेतली आहे) ॥ ८ ॥ सावळे व गोरे, उत्तम किशोर वयाचे, सुंदर व परम शोभेचे निवासस्थान, शरद ऋतूतील पौर्णीमेच्या चंद्रासारखे मुख, व शरदांतील कमलांसारखे डोळे असणारे व कोटी मनोजांना (मदनांना) लाजविणारे हे दोघे तुमचे कोण आहेत, हे सर्व हे सुमुखि ! आपण आम्हाला सारे सांगा हं ! ॥ दो० ११६ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP