| 
 
  ॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ 
 ॥ श्रीभावार्थरामायण ॥ 
 सुंदरकांड 
 ॥  अध्याय तिसावा ॥  असाळीवधाचे वर्णन
 
 ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ 
 
 सीतेच्या आज्ञेला प्रमाण मानून त्याप्रमाणे वर्तन
 
 हनुमंताचें युद्धकंदन । मुख्यत्वें वनविध्वंसन । घेवोनि सीतेचें आज्ञापन । फळभोजन मांडिलें ॥ १ ॥
 जोंवरी होय क्षुधाहरण । पडलीं फळें खाय वेंचोन ।
 घातली श्रीरामाची आण । फळें तोडोन न खावीं ॥ २ ॥
 जानकीआज्ञा वंदोनि शिरीं । वनाची करावया बोहरी ।
 हनुमान जाऊनियां दूरी । फळाहारीं बैसला ॥ ३ ॥
 काळाग्नि आव्हाहूनि जठरीं । मग बैसला फळाहारी ।
 वना आली महामारीं । वन संहारीं कपिपुच्छ ॥ ४ ॥
 सीतेची आज्ञा प्रमाण । घातली श्रीरामाची आण ।
 पुच्छें वृक्ष उपडोन । तळीं झाडोन फळें खाय ॥ ५ ॥
 पहिलें साकरेंचें टेंक । सव्यें सेवी पित्तशामक ।
 वृक्षउपाडा केला अनेक । भक्षोनि वृक्ष झुगारी ॥ ६ ॥
 हनुमान आपोशन न मोडी । बैसली बैसका न सोडी ।
 पुच्छ पुरवी नाना परवडी । वनीं वृक्ष उपडीं समूळ ॥ ७ ॥
 कपिभोजन धर्मस्थिती । पहिलें द्विजां घाली तृप्ती ।
 ते बैसविले दोहीं पंक्तीं । फळें अर्पीं अति प्रीतीं ॥ ८ ॥
 द्विजशेष सेवी हनुमंत । तेणें होवोनियां तृप्त ।
 धालेपणाचें ढेंकर देत । वनविघातें कपिपुच्छ ॥ ९ ॥
 अनुसंधानावांचून । हनुमान नेघे अवदान ।
 वनफळांचें भाग्य गहन । ब्रह्मार्पण कपिमुखें ॥ १० ॥
 पिकलीं फळें रामार्पण । जारसीं करी कृष्णार्पण ।
 हिरवीं करी ब्रह्मार्पण । सावधान प्रतिग्रासीं ॥ ११ ॥
 फळें खात गटगटां । मिटक्या देतसें मटमटां ।
 वांकुल्या दावी सुरश्रेष्ठा । दावी आंगोठा दैत्यांसी ॥ १२ ॥
 पिकलीं खाय आवडीकरीं । हिरवीं तोंडपालटावरीं ।
 पिंपळी मिरें कोशिंबिरी । लोणच्यावारीं खातसे ॥ १३ ॥
 अलवणता वाटे ज्यासीं । सामुद्रिक मेळवीं त्यासीं ।
 पुच्छ विध्वंसी वनासी । वृक्ष चौपासीं उपडोनि ॥ १४ ॥
 ताळ तमाळ वृक्ष सरळीं । खर्जुरी पोफळी नारिकेळी ।
 उपडोनि करी वडवाळी । रणकल्लोळीं हाणावया ॥ १५ ॥
 राक्षससैन्य आतुर्बळी । रणीं करितां रवंदळी ।
 हाणावया हातातळीं । करी वडवाळी वृक्षांच्या ॥ १६ ॥
 
 
वनकरांशी भांडण : 
 
युद्ध होईल निश्चित । ऐसें जाणोनि हनुमंत । शिळा पाषाण वृक्ष पर्वत । आणिले तेथ युद्धार्थी ॥ १७ ॥
 वृक्ष उपडितां कपींद्रें । जागीं जालीं वनकरें ।
 म्हणती मारा रे मारा रे । वन वांनरें भंगिलें ॥ १८ ॥
 बोंब उठिली एकसरीं । वन भंगिलें चौफेरीं ।
 शस्त्र घेवोनि वनकरीं । वानरावरी लोटले ॥ १९ ॥
 एक तळपती वोडणखांडें । एक विंधती लक्षोनि कांडें ।
 एक हाणिती गोफणगुंडे । एक ते धोंडें टाकिती ॥ २० ॥
 वन उपडिलें माकडें । सांगतां रावो मानील कुंडें ।
 यासी धरावें रोकडें । रावणापुढें न्यावया ॥ २१ ॥
 पुच्छ लांब आहे विशेष । टपोनि धरा म्हणती एक ।
 एक म्हणती आवश्यक । घालूनि झडप धरूं यासी ॥ २२ ॥
 ऐसी वनकरांची मात । ऐकोनियां हनुमंत ।
 त्यांचा करावया घात । मग कृतांत क्षोभला ॥ २३ ॥
 हाणितां पुच्छाचा पैं साट । त्यांची शस्त्रें करोनि पीठ ।
 अवघे कवळोनि एकवट । बांधिली मोट वनकरांची ॥ २४ ॥
 चौदा सहस्त्र वनकरां । पुच्छें बांधोनियां भारा ।
 निक्षेपिलें पैं सागरा । मत्स्यमकरां आहारार्थ ॥ २५ ॥
 राक्षसीं आटिती सीतेसी । तुवां संवाद केला ज्यासीं ।
 तेणें मारोनि वनकरांसीं । केला वनासीं विध्वंस ॥ २६ ॥
 एकीं सुटला अधोवात । एकी फळफळां मूतत ।
 एकी चळचळां कांपत । मूर्च्छागत पैं एकी ॥ २७ ॥
 द्वंद्वा पिटला वानरू । तुज धरू चिरूं मारूं ।
 तुझ्या रक्ताचा घोट भरूं । गटका करूं सगळाचि ॥ २८ ॥
 सीता गांजिता सुंदरी । हनुमान गुरूगुरी तयांवरी ।
 भेणें पळाल्या निशाचरी । आपांपरीं ते ऐका ॥ २९ ॥
 भेणें पळाली देहस्मृती । नेसणीं गळालीं नाठवें चित्तीं ।
 नागव्या जावोनि रावणाप्रती । मग सांगती वनबोंब ॥ ३० ॥
 कैचें नेणो आलें वानर । वन विध्वंसिले परिकर ।
 चौदा सहस्त्र वनकर । पुच्छें समग्र मारिले ॥ ३१ ॥
 
 
किंकरांची योजना व त्यांचा संहार : 
 
भरंवशाचे निधडे वीर । ऐशीं सहस्त्र किंकर । रावणें धाडिले सत्वर । आणा वानरा बांधोनि ॥ ३२ ॥
 रणीं रगडोनि मारावी धूर । ऐसे ऐशीं सहस्त्र किंकर ।
 शस्त्रें वर्षती अपार । शेखीं वानर बूजिला ॥ ३३ ॥
 हनुमान विचारी पोटांत । मज न रूतती शस्त्रघात ।
 साहोनियां शस्त्रसंपात । काय समस्त करितील ॥ ३४ ॥
 हनुमान निश्चळ शस्त्रांतळी । तंव किंकरीं पिटिली टाळीं ।
 वानरें केली रणरांगोळी । महाबळी आम्ही रणमारें ॥ ३५ ॥
 घायीं तुटला निवटला । बाणीं तृणप्राय केला ।
 ऐकोनि किंकरांच्या बोला । कपि कोपला रणरागें ॥ ३६ ॥
 कपि पुच्छासीं सांगे गोष्टी । आजि निर्दाळू राक्षसकोटी ।
 हाणितां पुच्छाच्या आघाटीं । जीवा साटी किंकरां ॥ ३७ ॥
 लागता पुच्छाचा आघात । त्यांच्या शस्त्रां करोनि भस्मांत ।
 किंकर मारिले समस्त । कपि गर्जत जयरामें ॥ ३८ ॥
 मी तंव श्रीरामाचा दूत । सीता शुद्धीसी आलो हनुमंत ।
 सीता सांपडली येथ । आला अंत राक्षसा ॥ ३९ ॥
 राक्षसां करोनि रगडा । झाडीन इंद्रजिताचा पादाडा ।
 रावण गांजोनियां गाढा । राम रोकडा आणीन ॥ ४० ॥
 ऐकतां हनुमंताची मात । बोंब उठली लंकेआंत ।
 ऐकोनि किंकरांचा घात । लंकानाथ दचकला ॥ ४१ ॥
 
 
जंबुमाळीचा वध : 
 
प्रहस्तसुत आतुर्बळी । रागें धाडिला जंबुमाळी । कपि बांधोनि गळसमेळीं । मजजवळी आणावा ॥ ४२ ॥
 जरी येसी कपि न मारून । तरी तुझे मस्तका मूत्रवपन ।
 शेखीं नासिका छेदीन । खरारोहण विटंब ॥ ४३ ॥
 जंबुमाळी क्रोधायमान । वर्षला शरधारा दारूण ।
 पृथ्वी आकाश व्यापून । शरीं संपूर्ण कोंदलें ॥ ४४ ॥
 माझ्या आंगीं बाण न रूपती । शंका न मानीच मारूती ।
 रामनामाच्या आवृत्तीं । निःशंकस्थिति विचरत ॥ ४५ ॥
 पंचक्रोश शिळा प्रचंड । वानरें हाणितली वितंड ।
 जंबु धनुर्वाडा अखंड । केली शतखंड बाणें एकें ॥ ४६ ॥
 कपि हाणितां वृक्षघाय । तोही केला तिळप्राय ।
 हनुमान म्हणे धन्य माय । योद्धा होय जगजेठी ॥ ४७ ॥
 माझे शिळाघाय वृक्षसमेळीं । निवारोनि महाबळी ।
 योद्धा होय राक्षसकुळीं । जंबुमाळी महावीर ॥ ४८ ॥
 अर्धचंद्रबाणसमेळीं । कपींद्र विंधिला कपाळीं ।
 बाण हिसळोनि ते वेळीं । लागला निढळीं जंबूच्या ॥ ४९ ॥
 लागतां बाणाचा आघात । जंबुमाळी पडे मूर्च्छित ।
 हनुमान गदगदां हांसत । विपरीतार्थ येथें जाला ॥ ५० ॥
 मज न रूपती तुझे बाण । तुझाचि घेवों पाहाती प्राण ।
 आतां कायसें रे रण । जाय परतोन मी न मारीं ॥ ५१ ॥
 ऐकोनि कपीचें वचन । जंबु विचारी आपण ।
 परतलिया दंडील रावण । करूं निर्वाण युद्ध यासीं ॥ ५२ ॥
 वनचामुंडावरददत्त । परिघ टाकिला घंटायुक्त ।
 करावया हनुमंताचा घात । रागें सोडित राक्षस ॥ ५३ ॥
 माझे परिघाचा घात । आजि निमाला हनुमंत ।
 कैसेनि राखे रघुनाथ । रणपुरूषार्थ पाहों याचा ॥ ५४ ॥
 परिघ येतां आंगापासीं । हनुमान उडाला आकांशी ।
 वरदसामर्थ्यशक्ति कैसी । लावी परिघासी कपिपाठीं ॥ ५५ ॥
 सवेग जातां हनुमंतासी । परिघ न संडी पाठिलागासी ।
 विस्मयो करी कपि मानसीं । शस्त्राची ऐसी निजशक्ति ॥ ५६ ॥
 विचारीं पडतां वानर । स्वर्गी उठिला हाहाकार ।
 परिघ सुटला दुर्धर । आजि कपींद्र वांचेना ॥ ५७ ॥
 ऐशा ऐकतां गोष्टी । परिघ येतां देखोनि पाठीं ।
 कपिपुच्छें घातली आठी । चेपिली घांटी वनदेवतेची ॥ ५८ ॥
 देवता म्हणे श्रीरामभक्ता । तुज मी शरण आलें आतां ।
 शस्त्रदेवता समस्ता । शरणागता तुज होती ॥ ५९ ॥
 शस्त्रशक्ति भूतशक्ती । मंत्रतंत्रयंत्रशक्ती ।
 अवघ्या शरण तुज येती । मज मारूती वांचविल्या ॥ ६० ॥
 सोडूनि पुच्छाचे बंधन । शस्त्रदेवता वांचवून ।
 शक्तिमंडळा लोटांगण । घाली आपण हनुमंत ॥ ६१ ॥
 मारूं नये शरणागता । म्हणोनि वांचविली शस्त्रदेवता ।
 भूतीं देखोनि रघुनाथा । शक्ति समस्ता वंदिल्या ॥ ६२ ॥
 उदो म्हणोनि समस्त शक्ती । हनुमंतातें ओंवाळिती ।
 राक्षसां विमुख आम्ही समस्ती । साह्य युद्धार्थी श्रीरामा ॥ ६३ ॥
 सीता आमुची आदिशक्ती । तिसी गांजितो लंकापती ।
 रणीं राक्षसां लावोनि ख्याती । आम्ही युद्धार्थीं तुज साह्य ॥ ६४ ॥
 हनुमान म्हणे पुच्छा जगजेठीं । युद्धीं माझी राखोनि पाठी ।
 साह्य शक्ती कोट्यनुकोटी । पुच्छासाठीं मज जाल्या ॥ ६५ ॥
 करोनि पुच्छाची पैं स्तुती । युद्धा परतला मारूती ।
 परिघ देखोन त्याचे हातीं । जंबूचे चित्तीं चळकांप ॥ ६६ ॥
 माझा परिघ हा तत्वतां । गेला हनुमंताचे हाता ।
 रावणाच्या अधर्मता । शस्त्रदेवता क्षोभलिया ॥ ६७ ॥
 ऐसें जंबु जंव विचारीं । तंव परिघ वाजिंनला शिरीं ।
 रथसारथीचीं चकचुरी । जंबुची उरी नुरेचि ॥ ६८ ॥
 रथ वारू ना सारथी । ना त्याचें शिर ना त्या अस्थी ।
 पाहतां त्याची न दिसे व्यक्ती । नेले अव्यक्तीं वानरें ॥ ६९ ॥
 
 
अखयाकुमाराचा वध : 
 
हनुमंतें जंबुमाळी । घायें केली रवंदळी । बोंब गेली रावणाजवळी । क्रोधानळीं भयभीत ॥ ७० ॥
 मारावया पैं वानर । प्रधानपुत्र दश सहस्त्र ।
 रागें धाडी दशशिर । महावीर रणयोद्धें ॥ ७१ ॥
 ध्वज पताका रणप्रयुक्तीं । पुढें वाजंत्री वाजती ।
 मागें माता शंख करिती । पुत्रसंतती निमाली ॥ ७२ ॥
 प्रधानपुत्र गजभारीं । येतां देखोनि महागजरीं ।
 हनुमान गर्जे भुभुःकारीं । पुच्छ अंबरीं तळपत ॥ ७३ ॥
 पुच्छें कळवळोनि समस्त । हनुमान करी पर्वतघात ।
 घायें निमाले समस्त । जाला प्राणांत समकाळें ॥ ७४ ॥
 प्रधानपुत्रां केला घात । ऐकोनि धाके लंकानाथ ।
 आतुर्बळी हनुमंत । काळकृतांत रणमारें ॥ ७५ ॥
 रावण पडिला चिंतावर्तीं । रणीं नाटोपे मारूती ।
 वीर मारोनि भद्रजाती । लाविली ख्याती राक्षसां ॥ ७६ ॥
 रणकर्कश रणरगडे । पांच सेनानी निधडे ।
 कपीसी मारावया रोकडे । धाडी वेगाढे युद्धासीं ॥ ७७ ॥
 चौघे राहोनि चहूं दिशांसीं । एक राहोनि आकाशीं ।
 मारावया हनुमंतासी । विकट विन्यासीं विंधिती ॥ ७८ ॥
 कपिपुच्छ महाबळी । त्यांचे शस्त्रा करोनि होळी ।
 पांच जणांतें आकळी । पुच्छसमेळी कवळोन ॥ ७९ ॥
 स्वयें योगिया आपण । जेंवी निरोधी पंच प्राण ।
 तेंवी कपिपुच्छें पांच जण । आकळोन राखिले ॥ ८० ॥
 विवेकवैराग्यसंपन्न । पंचविषयां करिती दमन ।
 तेंवी कपिपुच्छें पांच जण । निर्बंधून राखिले ॥ ८१ ॥
 पंचभूतांची निवृत्ती । गेलिया सुख पावे परमार्थीं ।
 पांचही मारोनि पर्वतघातीं । सुखें मारूती सुखावे ॥ ८२ ॥
 एकेचि घाये कपी आपण । घेतला पांचांचाही प्राण ।
 ऐकोनि दचकला रावण । सेना प्रधान कांपती ॥ ८३ ॥
 रावणा कोप आला दुर्धर । रणीं मारावया वानर ।
 स्वयें धाडिला अखया कुमर । रणचतुर दिव्यमारें ॥ ८४ ॥
 अखया जाणे रणकंदनार्थ । शस्त्रीं अस्त्रीं अतर्क्य घात ।
 निरालंबी चढवोनि रथ । मारी हनुमंत साटोपे ॥ ८५ ॥
 आज्ञा देता दशानना । तुरें वाजती निशाणां ।
 अखया आला अशोकवना । रथछत्रसेनागजदळें ॥ ८६ ॥
 अखया शरसंपातीं । रणीं आच्छादिला मारूती ।
 वीर सिंहनाद करिती । मारिला म्हणती वानर ॥ ८७ ॥
 अखयाविजयाची नवायी । वाजंत्र्यांची लागली एकचि घायी ।
 ह्नुमंतें तिये समयी । केलें कायी तें ऐका ॥ ८८ ॥
 भोंवता पुच्छाचा पैं साट । त्याचीं शस्त्रें करोनि पिष्ट ।
 सैन्य मारिलें समसगट । अखया उद्भट त्रासिला ॥ ८९ ॥
 पुच्छें आकळितां अखयासी । रथ उडविला आकाशीं ।
 धरितां न धरवे हनुमंतासी । लघुलाघवेंसीं तळपत ॥ ९० ॥
 हनुमान अखया दोन्ही वीर । युद्ध करिती निराधार ।
 विस्मयो करिती सुरवर । चक्राकारपरिभ्रमती ॥ ९१ ॥
 क्षणैक क्षितीं क्षणैक अंबरीं । क्षणैक रथ दिसे सागरीं ।
 क्षणैक दिसे त्रिकूटावरी । अखया भारी लाघवी ॥ ९२ ॥
 पुच्छ कोपोनि लागें पाठीं । रथ पळतां दिक्पुटीं ।
 पुच्छें बांधोनि कडकडाटीं । रागें आपटी भूतळीं ॥ ९३ ॥
 रथ आपटितांचि क्षिती । वोडणखांडें घेवोनि हातीं ।
 अखया उसळोनि लघुगती । मारूं मारूती धाविंनला ॥ ९४ ॥
 मारावया हनुमंत । वोडणखड्गेंसीं तळपत ।
 कपीचा करावया घात । गगनाआंत उसळला ॥ ९५ ॥
 अखया उडतां आकाशीं । हनुमंतें धरिला पायांसीं ।
 गरगरां भोंवंडितां त्यासी । देहभावासी विसरला ॥ ९६ ॥
 खड्ग पडिलें मातेचे वाडां । मुकुट पडिला रावणापुढां ।
 ओडण पडिलें लंकेच्या कडां । केला नितोडा बळाचा ॥ ९७ ॥
 आपटितांचि शिळातळीं । निधा उठिला पाताळीं ।
 दिग्गजांची बैसलीं टाळी । झाली रांगोळी हाडांची ॥ ९८ ॥
 करितां अखया समाप्ती । हनुमंताची अगाध किर्ती ।
 स्वर्गीं सुरवर वानिती । वानिती क्षितीं ऋषीश्वर ॥ ९९ ॥
 मुकुट पडतांचि पुढें । वार्ता ऐकतां रावण रडे ।
 म्हणे म्यांच केले कुडें । पुत्र कां पुढे ढाडिला ॥ १०० ॥
 
 
रावणाचा शोकावेग व स्वतः  जाण्याची तयारी : 
 
वानरें अखया पाडिला धरणीं । बोंब आली वनींहूनी । रावण धुळी घाली वदनीं । पडिला धरणीं मूर्च्छित ॥ १०१ ॥
 पुत्रशोकें कंपायमान । क्रोधें झाला सावधान ।
 माझें जें अशोकवन । शोकस्थान तें झालें ॥ १०२ ॥
 रणीं मर्दिलें वानरें । वीरीं घेतलें घायवारें ।
 अखयाचेनि कैवारें । धाडावया दुसरें दिसेना ॥ १०३ ॥
 घ्यावया अखयाच्या सुडासी । मीच जाईन वनासी ।
 वानरा मारीन निश्चयेंसीं । कास सरसी घातली ॥ १०४ ॥
 म्यां मारिलिया तो वानरे । अखयाचा सूड पावला खरें ।
 मज मारिलिया निर्धारें । सीता सुंदरी निर्मुक्त ॥ १०५ ॥
 ऐसा करोनि विचार । युद्धा निघाला दशशिर ।
 तंव वेगें धांविला ज्येष्ठ कुमर । महावीर इंद्रजित ॥ १०६ ॥
 
 
इंद्रजिताची इच्छा : 
 
म्हणे एकलें वनचर । केवळ जें कां पालेखाइर । त्यावरी जाणें लंकेश्वर । श्रेष्ठ विचार हा नोहे ॥ १०७ ॥
 वीरीं घेतला रणधाक । म्हणोनि जाणें दशमुख ।
 मी तंव घरगुती सेवक । अवश्यक मज धाडीं ॥ १०८ ॥
 वाहतों सदाशिवाची आण । शिवतों स्वामी तुझें चरण ।
 वानरा रणीं न मारून । गळां बांधोन आणीन ॥ १०९ ॥
 निराहारी ब्रह्मचारी । तो इंद्रजितातें मारी ।
 इंद्रजित न मारवे कपीच्या करीं । हा फळाहारी यथेष्ट ॥ ११० ॥
 ऐसें विचारोनि रावण । इंद्रजितासी दिधलें आज्ञापन ।
 रणीं वानरां गांजून । गळां बांधोन आणावें ॥ १११ ॥
 इंद्रजित युद्धा निघतां वेळीं । निशाणें त्राहाटिली तें काळीं ।
 कंगल टोप राघावळी । केली आरोळी महावीरीं ॥ ११२ ॥
 शायसीं प्रयुत मत्तहस्ती । कोट्यनुकोटी महारथी ।
 अनिवार नेणों किती । वीर पदाती असंख्यात ॥ ११३ ॥
 वीरां कवचें रत्नखचित । शस्त्रें सैन्य लखलखित ।
 पाखरा तेजीं झळकत । वीर गर्जत सिंहनादें ॥ ११४ ॥
 तडक फुटले एकसरें । भिंडिमाळांचे पांगोरे ।
 खाखाइलीं रणतुरें । निजगजरें चालिले ॥ ११५ ॥
 
 
इंद्रजिताला झालेले अपशकुन, ब्रह्मदेवाचे भविष्य
 
इंद्रजित निघतां उल्हासेंसीं । नग्न कुमारी शिंके पाठीसीं । आशंका पडली इंद्रजितासी । रावणासी चळकांप ॥ ११६ ॥
 चिन्ह पुसतां ब्रह्मयासी । भविष्य कळलें तयासीं ।
 तोही तैसांचि सांगे त्यासी । अति गुह्यासीं गुह्योक्ति ॥ ११७ ॥
 युद्ध करितां वानरांसीं । अपेश यशी यश अपेशीं ।
 इंद्रजित बांधोनि कपीसी । तुजपासीं आणील ॥ ११८ ॥
 ऐकोनि ब्रह्मयाचें वचन । जयजयकारें स्वयें गर्जोन ।
 इंद्रजितें केलें नमन । पुढील कथन अवधारा ॥ ११९ ॥
 येतां देखोनि इंद्रजित । आनंदें नाचे हनुमंत ।
 पुरवावया युद्धमनोरथ । श्रीरघुनाथ तुष्टला ॥ १२० ॥
 पुच्छ नाचवीत रणीं । चौफेरेंसीं सैन्य आकळोनि ।
 रणीं मारोनि वीरश्रेणीं । रूधिरें धरणीं न्हाणीन ॥ १२१ ॥
 कपिपुच्छ विचक्षण । भूतां दिधलें आमंत्रण ।
 मांसभक्षण रूधिरपान । रणभोजन करावें ॥ १२२ ॥
 वधोनि राक्षसांच्या कोडी । ज्याचे पोटीं जे आवडी ।
 ते ते पुरवीन परवडी । वाढावाढी रणमारें ॥ १२३ ॥
 आतांचि हे भाजीभाकरी । तुम्हीं करावी न्याहारी ।
 पुढें श्रीराम नरकेसरी । पंचधारीं निववील ॥ १२४ ॥
 
 
असाळीचे विदारण : 
 
इंद्रजित येता सहदळीं । पुढें धांविंनली असाळी । जेणें मारिला अखया बळी । त्याची होळी मी करीन ॥। १२५ ॥
 ठाकोनि आली अशोकवन । पुढां हनुमंतें लक्षोन ।
 विकट वटारिले नयन । विक्राळ वदन पसरोनी ॥ १२६ ॥
 एक जाभाडें भूतळीं । दुजें लाविलें नभोमंडळीं ।
 कराळ विक्राळ दांताळी । जिव्हा काळी लवथवित ॥ १२७ ॥
 अणुप्रमाण होवोनि तेथ । जिव्हा दांतां नातळत ।
 वेगीं रिघाला घशांत । गेला उदरांत मारूती ॥ १२८ ॥
 मुखीं रिघाला मारूती । नातळेचि जिव्हादांतीं ।
 असाळी विस्मयो मानी चित्ती । ठकिलें निश्चितीं वानरें ॥ १२९ ॥
 गोड कडु कीं खारट । आंबट तिखट कीं तुरट ।
 कांहीं चवी न कळे स्पष्ट । अहा कटकट राक्षसीं ॥ १३० ॥
 कपि न मरेचि माझे हातीं । वानर गेला अतर्क्यगती ।
 पुढें काय करील ख्याती । जीवीं धाकली असाळी ॥ १३१ ॥
 इंद्रजितासीं करावया रण । हनुमंतांसीं आवडी पूर्ण ।
 तिच्या उदरीं न राहे एक क्षण । केलें विंदाण तें ऐका ॥ १३२ ॥
 काळीज उपडोनि सदेंठ । बेंबीपासी फाडोनि पोट ।
 हनुमान रिघोनियां स्पष्ट । केला उद्भटा भुभुःकार ॥ १३३ ॥
 असाळियें गिळीला हनुमंत । कथा विस्तारिली लोकाआंत ।
 चुकला इंद्रजिताचा अनर्थ । युद्धकंदनार्थ सैन्याचा ॥ १३४ ॥
 पूर्वींच गिळीती वानर । तरी कां मरता अखया कुमर ।
 वनकर किंकर प्रधान पुत्र । जंबुवीर वांचता ॥ १३५ ॥
 रावणा हरिखें सांगे दूत । असाळियें गिळीला हनुमंत ।
 सवेंच दुसरी बोंब सांगत । केला निःपात असाळीचा ॥ १३६ ॥
 क्रौंचां मारिली पडलंकां । विटंबिली शूर्पणखा ।
 आतां मारिली असाळिका । कोण कोण दुःखा मी सोसूं ॥ १३७ ॥
 जो रिघोनि उदरांआत । करी राक्षसिणींचा निःपात ।
 तो इंद्रजिताचा करील घात । चळीं कांपत रावण ॥ १३८ ॥
 एकाजनार्दना शरण । जालें असाळीनिर्दळण ।
 पुढें इंद्रजितहनुमद्रण । सावधान अवधारा ॥ १३९ ॥
 स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
 ब्रह्मलिखितहनुमन्नसाळीवधो नाम त्रिंशत्तमोऽध्यायः ॥ ३० ॥
 ॥ ओव्यां १३९ ॥ श्लोक - ॥ एवं संख्या १३९ ॥
 
 
 
 GO TOP 
 
 |