| 
 
  ॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ 
 ॥ श्रीभावार्थरामायण ॥ 
 उत्तरकांड 
 ॥  अध्याय चाळिसावा ॥  वानरांचे स्वदेशी गमन
 
 ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ 
रामांकडून सुग्रीवाची प्रशंसा व त्याची पाठवणी :  
तदनंतर ऋक्ष वानर-राक्षस । अयोध्येसीं आनंदें बहुवस । क्रमिला तेथें एक मास । सुखउल्हास सर्वांसी ॥१॥
 वानररावो जो भूपती । तयाप्रति बोले श्रीरघुपती ।
 तुझे उपकार आठवितां चित्तीं । थोर सुख होतसे ॥२॥
 तुझेनि संगें वानर । मिळाले गा अपरंपार ।
 तुझेनि मज सीता सुंदर । प्राप्त झाली किष्किंधेशा ॥३॥
 तरी आतां आपुले नगरासी । वेगीं जावें किष्किंधेसी ।
 जे कां अटक देवां दैत्यांसी । काळाचें तिसी न चले कांहीं ॥४॥
 ऐसिया किष्किंधेप्रती । राज्य करीं गा वानरपती ।
 पाळीं प्रधान सेना संपत्तीं । निष्कंटक राज्य करीं ॥५॥
 
सुग्रीवाला उपदेश :  
महाबहो किष्किंधानाथा । परम प्रीतीने पाहें तारासुता । जैसा पिता तैसा चुलता । पुत्रत्वें पाळीं तयातें ॥६॥
 अंगद वीर धीर परम शूर । सज्ञान ज्ञाता विवेकी चतुर ।
 त्यावरी कृपा करीं अपार । हा गुणसागर अंगद ॥७॥
 हनुमंतातें परम प्रीतीं । तूं प्रधानत्वें पाहीं गा नृपती ।
 जयाची वानितां गुणकीर्तीं । दुसरा क्षितीं ऐसा नाहीं ॥८॥
 मारुतीची मारुतीस उपमा । आन नाहीं ग वानरोत्तमा ।
 याकारणें वर्णावया आम्हां । उत्कंठा होत नाहीं ॥९॥
 सुषेण तुझा श्वशुर । तारेचा पिता महाशूर ।
 आणीक तार वानर । परमधीर संग्रामीं ॥१०॥
 कुमुद महादुर्धर्ष । नीळ वानर रणकर्कश ।
 शतबळीनामा शूर बहुवस । नामेंच त्रास परवीरां ॥११॥
 मैंद द्विविद गंधमादन । गज गवाक्ष गवय शरभ जाण ।
 हेमकूट तपन ध्वज वैद्य सुषेण । प्रतपन केसरी तरु तराळ ॥१२॥
 नळ जो शिळातारक । विश्वकर्मा जयाचा जनक ।
 सेतुकार्या निपुण अधिक । राक्षसां धाक बहु त्याचा ॥१३॥
 जांबवंतादि ऋक्षगण । मजकारणें कष्टले दारुण ।
 मजलागीं इहीं त्यजिला प्राण । प्रिय पुत्र धन सांडोनी ॥१४॥
 या समस्तातें पाळीं प्रीति करुन । अन्यथा न करीं माझें वचन ।
 माझें स्वरुप सनातन । तेथें मन ठेवोनी ॥१५॥
 माझे स्वरुपीं ठेवोनि मनासी । राज्य करीं सुखसंतोषीं ।
 ऐसें आज्ञापोनि सुग्रीवासी । परम प्रीतीसी कारोनी ॥१६॥
 
सुग्रीवाची प्रशंसा व त्याला श्रीरामाचा निरोप :  
तदनंतर श्रीरघुपती । बिभीषणेंसीं अति युक्तीं । मधुराक्षरीं अक्षरपंक्ती । बोलता झाला श्रीराम ॥१७॥
 कीं चकोराचें देखोनि आर्त । हृदयीं जाणोनि अति क्षुधित ।
 तयासि इंदु सुधा देत । तैसा श्रीरघुनाथ बोलता झाला ॥१८॥
 श्रीराम म्हणे बिभीषणा । तूं आमुचा बंधु सुहृद प्राणा ।
 तुझे उपकार वर्णावया मज रघुनंदना । वाचे वळण पडतसे ॥१९॥
 अगा धर्मज्ञा लंकापती । राक्षसकुळीं तूं धर्ममूर्तीं ।
 आतां शीघ्र स्वपुरीप्रती । जाई जियेप्रती परिघ सागरु ॥२० ॥
 पूर्वी कुबेरापासून । हरिलें लंकाभवन ।
 बंधूसि देवोनि अपमान । अनुचित दारुण रावणें केलें ॥२१॥
 जरी स्वधर्मे राज्य करिता । सर्वभूतीं दया समता ।
 तयाच्या राज्या क्षयो कल्पांता । न येता तत्वता निर्धारें ॥२२॥
 जनकादिका केवळ मुक्त । आसोनि प्रपंचीं वर्तत ।
 जगत् ब्रह्मस्वरुप देखत । मुळींचें अन्वयेंकरोनी ॥२३॥
 तरीं तूं बिभीषणा अवधारीं । तूं राज्य ब्रह्मत्वें करीं ।
 अधर्माचा लेश पुरी । माजि प्रवेशों न घ्यावा ॥२४॥
 बंधु ज्येष्ठ तुझा कुबेर । तयाचा करावा आदर ।
 आणीक वृद्ध थोर थोर । ते ब्रह्मदृष्टीं पहावे ॥२५॥
 मज तुम्ही दोघे जण । परम प्रीतिमात्र पढियंते पूर्ण ।
 तुमचें मी अहर्निशीं स्मरण । मनामाजीं करीतसें ॥२६॥
 आतां तुम्हीं दोघे जण । स्वसैन्येंसीं करावे गमन ।
 सांडा हृदयीचें दुःख दारुण । परमानंदें पूर्ण पैं जावें ॥२७॥
 ऐकोनि श्रीरघुनाथाचें वचन । ऋक्ष वानर राक्षसगण ।
 म्हणते झाले धन्य धन्य । सूर्यवंशाभरण श्रीराम ॥२८॥
 समस्त म्हणती रावणारी । तुझिया वचनामृताची तरी ।
 भरली आमुच्या हृदयसागरीं । मर्यादेवेगळी मिसळली ॥२९॥
 तुझें वचन ब्रह्मलिखित । तूं विधात्याचा विधाता निश्चित ।
 तूं ब्रह्म सदोदित । श्रुतीतें अंत न कळे तुझा ॥३०॥
 
मारुतीची प्रार्थना :  
तदनंतर मारुती । स्वामीप्रति करी विनंती । म्हणे प्रसन्न झालेती रघुपती । तरी मी एक मागतसें ॥३१॥
 तुझी कृपा मजवरी । जरी आहे गा रावणारी ।
 तरी तुझी भक्ति मम हृदयाभीतरीं । चिरकाळ राहो दातारा ॥३२॥
 जंववरी तुझें चरित्र । भूमंडळीं राहे निश्चित ।
 तंववरी माझ्या शरीरांत । प्राण राहो दातारा ॥३३॥
 तुझें कथेचीं आर्ती । अखंड राहो माझ्या चित्तीं ।
 आणीक मी न मागें रघुपती । इतुकें देईं दातारा ॥३४॥
 ऐकोनि हनुमंतमुखींची गोष्टी । श्रीरामासि आनंद पोटीं ।
 धांवोनि खेंवा दिधली मिठी । पाठी थापटी श्रीराम ॥३५॥
 
रामांचे वरदान :  
श्रीराम म्हणे गा मारुती । संतोषलों तुझिये भक्ती । जे जे अपेक्षा तुझे चित्तीं । ते ते त्रिशुद्धी पावसी ॥३६॥
 लोकालोक जंवपर्यंत माझे चरित्र ।
 जोंपर्यंत जन स्वधर्मीं रत । तंवपर्यंत कथा असे ॥३७॥
 माझी कथा हे भूमंडळीं । तंववरी तुझे हृदयस्थळीं ।
 असतील जंव अंतराळीं । शशी सूर्य भ्रमण करित ॥३८॥
 दिव्य रत्नांचा हार । चंद्रासारिखा मनोहर ।
 श्रीरामें काढोनि सत्वर । हनुम्याकंठीं घातला ॥३९॥
 
रामांचा निरोप घेऊन जड अंतःकरणाने सर्वजण निघाले :  
हनुमान लागला पायीं । सवेंचि आलिंगिली दोहीं बाहीं । श्रीरामप्रदक्षिणा करोनि वज्रदेही । निजस्थळासी निघाला ॥४०॥
 सुग्रीवें करोनि प्रदक्षिण । अंगदासहित वंदोनि चरण ।
 निघते झाले स्वराज्या जाण । आज्ञा घेवोन रामाची ॥४१॥
 बिभीषणेंही तैसेच परी । नमस्कारिला निजबंधूचा अरी ।
 समस्तां अश्रु आले ते अवसरीं । सद्गदित कंठ पैं झाले ॥४२॥
 जैसें मूर्खाचें भ्रमे चित्त । भ्रांत होय न स्मरे हित ।
 तैसे श्रीरामवियोगें अति दुःखित । आपुलाले दिशे चालले ॥४३॥
 जैसा कृपणाचा जाय ठेवा । आणि भ्रांति उपजे त्याच्या जीवा ।
 तैसें समस्तां झालें तेव्हां  । श्रीरामाच्य वियोगें ॥४४॥
 श्रीरामसन्निधानेंकरुन । पावन झाले ऋक्षवानरगण ।
 बिभीषणादि राक्षस जाण । झाले पावन तिहीं लोकीं ॥४५॥
 एका जनार्दना शरण । वानरीं स्वदेशा केलें गमन ।
 मागें श्रीरामें  सभा विसर्जून । केलें मध्यान्हभोजन ॥४६॥
 स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
 समस्तवानरादिस्वदेशगमनं नाम चत्वारिंशोऽध्यायः ॥४०॥ ओंव्या ॥४६॥
 GO TOP 
 
 |