|
| कुम्भकर्णवधं श्रुत्वा रावणस्य विलापः - 
 | कुंभकर्णाच्या वधाचा समाचार ऐकून रावणाचा विलाप - | 
| कुंभकर्णं हतं दृष्ट्वा राघवेण महात्मना । राक्षसा राक्षसेन्द्राय रावणाय न्यवेदयन् ॥ १ ॥
 
 | महात्मा राघवद्वारा कुंभकर्ण मारला गेल्याचे पाहून राक्षसांनी आपला राजा रावण याच्या जवळ जाऊन त्यास म्हटले- ॥१॥ | 
| राजन् स कालसंकाशः संयुक्तः कालकर्मणा । विद्राव्य वानरीं सेनां भक्षयित्वा च वानरान् ॥ २ ॥
 
 | महाराज ! काळाप्रमाणे भयंकर पराक्रमी कुंभकर्ण वानरसेनेला पळवून तसेच बर्याचशा वानरांना आपला आहार बनवून स्वतः ही काळाच्या मुखात निघून गेले. ॥२॥ | 
| प्रतपित्वा मुहूर्तं च प्रशान्तो राम तेजसा । कायेनार्धप्रविष्टेन समुद्रं भीमदर्शनम् ॥ ३ ॥
 
 निकृत्तनासाकर्णेन विक्षरद् रुधिरेण च ।
 रुद्ध्वा द्वारं शरीरेण लङ्कायाः पर्वतोपमः ॥ ४ ॥
 
 कुंभकर्णस्तव भ्राता काकुत्स्थशरपीडितः ।
 अगण्डभूतो विवृतो दावदग्ध इव द्रुमः ॥ ५ ॥
 
 | ते एक मुहूर्तपर्यंत आपल्या प्रतापाने चमकून अंती श्रीरामांच्या तेजाने शांत झाले. त्यांचे धड, भयानक दिसून येणार्या समुद्रात घुसले आणि मस्तक, नाक -कान कापले गेल्याने रक्त वाहावत लंकेच्या द्वारावर पडले आहे. त्या शरीराद्वारा आपले भाऊ पर्वताकार कुंभकर्ण लंकेचे द्वार अडवून पडले आहेत. ते श्रीरामांच्या बाणांनी पीडित होऊन हात, पाय आणि मस्तकरहित नंग - धडंग धडाच्या रूपामध्ये परिणत होऊन दावानलाने दग्ध झालेल्या वृक्षाप्रमाणे नष्ट झाले आहेत. ॥३-५॥ | 
| श्रुत्वा विनिहतं संख्ये कुंभकर्णं महाबलम् । रावणः शोकसन्तप्तो मुमोह च पपात च ॥ ६ ॥
 
 | महाबली कुंभकर्ण युद्धस्थलात मारला गेला हे ऐकून रावण शोकाने संतप्त आणि मूर्च्छित झाला आणि तात्काळ पृथ्वीवर पडला. ॥६॥ | 
| पितृव्यं निहतं श्रुत्वा देवान्तकनरान्तकौ । त्रिशिराश्चातिकायश्च रुरुदुः शोकपीडिताः ॥ ७ ॥
 
 | आपल्या चुलत्याच्या निधनाचा समाचार ऐकून देवांतक, नरांतक, त्रिशिरा आणि अतिकाय दुःखाने पीडित होऊन स्फुंदून स्फुंदून रडू लागले. ॥७॥ | 
| भ्रातरं निहतं श्रुत्वा रामेणाक्लिष्टकर्मणा । महोदरमहापार्श्वौ शोकाक्रान्तौ बभूवतुः ॥ ८ ॥
 
 | अनायासेही महान कर्म करणार्या श्रीरामांच्या द्वारा भाऊ कुंभकर्ण मारले गेले, हे ऐकून त्याचे सावत्र भाऊ महोदर आणि महापार्श्व शोकाने व्याकुळ झाले. ॥८॥ | 
| ततः कृच्छ्रात् समासाद्य संज्ञां राक्षसपुङ्गवः । कुंभकर्णवधाद् दीनो विललापाकुलेंद्रियः ॥ ९ ॥
 
 | त्यानंतर मोठ्या कष्टाने शुद्धिवर आल्यावर राक्षसराज रावण कुंभकर्णाच्या वधाने दुःखी होऊन विलाप करू लागला. त्याची सर्व इंद्रिये शोकाने व्याकुळ झाली होती. ॥९॥ | 
| हा वीर रिपुदर्पघ्न कुंभकर्ण महाबल । त्वं मां विहाय वै दैवाद् यातोऽसि यमसादनम् ॥ १० ॥
 
 | (तो रडत रडत म्हणू लागला - ) हा वीरा ! हा महाबली कुंभकर्ण ! तू शत्रूंच्या दर्पाचे दलन करणारा होतास; परंतु दुर्भाग्यवश मला असाहय सोडून यमलोकास निघून गेलास. ॥१०॥ | 
| मम शल्यमनुद्धृत्य बान्धवानां महाबल । शत्रुसैन्यं प्रताप्यैकः क्व मां सन्त्यज्य गच्छसि ॥ ११ ॥
 
 | महाबली वीरा ! तू माझा तसेच या बंधु-बांधवांचा कण्टक दूर न करताच शत्रुसेनेला संतप्त करून मला सोडून, एकटा कोठे निघून जात आहेस ? ॥११॥ | 
| इदानीं खल्वहं नास्मि यस्य मे पतितो भुजः । दक्षिणोऽयं समाश्रित्य न बिभेमि सुरासुरात् ॥ १२ ॥
 
 | यासमयी मी निश्चितच असून नसल्यासारखाच आहे; कारण की माझा उजवा हात कुंभकर्ण धराशायी झाला आहे; ज्याच्या भरवशावर मी देवता आणि असुर कोणालाही घाबरत नव्हतो. ॥१२॥ | 
| कथमेवंविधो वीरो देवदानवदर्पहा । कालाग्निरुद्रप्रतिमो ह्यद्य राघवेण रणे हतः ॥ १३ ॥
 
 | देवता आणि दानवांचा दर्प चूर करणारा असा वीर, जो कालाग्निसमान प्रतीत होत होता; आज रामाच्या हाताने कसा मारला गेला ? ॥१३॥ | 
| यस्य ते वज्रनिष्पेषो न कुर्याद् व्यसनं सदा । स कथं रामबाणार्तः प्रसुप्तोऽसि महीतले ॥ १४ ॥
 
 | हे बंधो ! तुला तर वज्राचा प्रहारही कधी कष्ट पोहोचवू शकत नव्हता. तोच तू आज रामाच्या बाणांनी पीडित होऊन भूतलावर कसा झोपून राहिला आहेस ? ॥१४॥ | 
| एते देवगणाः सार्धं ऋष्टिभिर्गगने स्थिताः । निहतं त्वां रणे दृष्ट्वा निनदन्ति प्रहर्षिताः ॥ १५ ॥
 
 | आज समरांगणात तुला मारला गेलेला पाहून आकाशात उभे असलेल्या या ऋषिंसहित देवता हर्षनाद करत आहेत. ॥१५॥ | 
| ध्रुवमद्यैव संहृष्टा लब्धलक्षाः प्लवंगमाः । आरोक्ष्यन्तीह दुर्गाणि लङ्काद्वाराणि सर्वशः ॥ १६ ॥
 
 | निश्चितच आता अवसर मिळताच हर्षाने भरलेले वानर आजच लंकेच्या समस्त दुर्गम द्वारांवर चढतील. ॥१६॥ | 
| राज्येन नास्ति मे कार्यं किं करिष्यामि सीतया । कुंभकर्णविहीनस्य जीविते नास्ति मे मतिः ॥ १७ ॥
 
 | आता मला राज्याशी काही प्रयोजन नाही. सीतेला घेऊनही मी काय करणार आहे ? कुंभकर्णाशिवाय जगावे हे माझ्या मनास मान्य नाही. ॥१७॥ | 
| यद्यहं भ्रातृहन्तारं न हन्मि युधि राघवम् । ननु मे मरणं श्रेयो न चेदं व्यर्थजीवितम् ॥ १८ ॥
 
 | जर मी युद्धस्थळावर आपल्या भावाचा वध करणार्या राघवाला मारू शकत नसलो तर मी मरून जाणेच चांगले आहे. या निरर्थक जीवनाला सुरक्षित ठेवणे कदापि योग्य नाही. ॥१८॥ | 
| अद्यैव तं गमिष्यामि देशं यत्रानुजो मम । नहि भ्रातॄन् समुत्सृज्य क्षणं जीवितुमुत्सहे ॥ १९ ॥
 
 | मी आजच जेथे माझा लहान भाऊ कुंभकर्ण गेला आहे त्या देशास जाईन. मी आपल्या भावांना सोडून क्षणभरही जिवंत राहू शकत नाही. ॥१९॥ | 
| देवा हि मां हसिष्यन्ति दृष्ट्वा पूर्वापकारिणम् । कथमिन्द्रं जयिष्यामि कुंभकर्ण हते त्वयि ॥ २० ॥
 
 | मी पूर्वी देवतांवर अपकार केला होता. आता त्या मला पाहून हसतील. हा कुंभकर्णा ! तू मारला गेल्यावर आता मी इंद्राला कसा जिंकू शकेन ? ॥२०॥ | 
| तदिदं मामनुप्राप्तं विभीषणवचः शुभम् । यदज्ञानान्मया तस्य न गृहीतं महात्मनः ॥ २१ ॥
 
 | मी महात्मा विभीषणाने सांगितलेल्या ज्या उत्तम गोष्टींचा अज्ञानवश स्वीकार केला नव्हता, त्या माझ्यावर आज प्रत्यक्ष रूपाने घटित होत राहिल्या आहेत. ॥२१॥ | 
| विभीषणवचस्तावत् कुंभकर्णप्रहस्तयोः । विनाशोऽयं समुत्पन्नो मां व्रीडयति दारुणः ॥ २२ ॥
 
 | जेव्हापासून कुंभकर्ण आणि प्रहस्ताचा हा दारूण विनाश झाला आहे तेव्हापासून विभीषणाचे बोलणे आठवून मला लज्जित करत आहे. ॥२२॥ | 
| तस्यायं कर्मणः प्राप्तो विपाको मम शोकदः । यन्मया धार्मिकः श्रीमान् स निरस्तो विभीषणः ॥ २३ ॥
 
 | मी धर्मपरायण श्रीमान् विभीषणाला जे घरातून घालवून दिले होते, त्याच कर्माचा हा शोकदायक परिणाम आता मला भोगावा लागत आहे. ॥२३॥ | 
| इति बहुविधमाकुलान्तरात्मा कृपणमतीव विलप्य कुंभकर्णम् ।
 न्यपतदपि दशाननो भृशार्तः
 तमनुजमिन्द्ररिपुं हतं विदित्वा ॥ २४ ॥
 
 | याप्रकारे विविध प्रकारे दीनतापूर्वक अत्यंत विलाप करून व्याकुळचित्त झालेला दशमुख रावण आपला लहान भाऊ इंद्रशत्रु कुंभकर्णाच्या वधाचे स्मरण करून फारच व्यथित होऊन परत पृथ्वीवर कोसळला. ॥२४॥ | 
| त्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे अष्टषष्टितमः सर्गः ॥ ६८ ॥ 
 | याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा अडुसष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६८॥ | 
|