॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय चौदावा ॥
रावणसैन्याचा विध्वंस

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रावण आपल्या चतुरंग सैन्यासह अलकावती नगरीला पोचला :

पूर्वप्रसंगीं रावण । रथावरी आरूढोन ।
सवें सेना प्रधान । जेथें वैश्रवण तेथें आला ॥१॥
तदनंतरें विबुधारीं । चालिला अतिक्रोधेंकरीं ।
समवेत प्रधान साही भारी । ब्रह्मांड उलथिती पैं ऐसे ॥२॥
तयांची नांवे कोण कोण । मारीच महादेव प्रहस्त शुक सारण ।
सहावा धुम्राक्ष ऐसे जाण । संग्रामीं बळ दारूण ज्यांचें ॥३॥
जयांच्या पुरूषार्थापुढें । रावण कोणासी नातुडे ।
जैसे साही ऋतु गाढे । आपुलेनि काळे शोभती॥४॥
तेही साही प्रधान कैसे । क्रोधें सृष्टि जाळिती ऐसे ।
चालिले अति आवेशें । नद्या पर्वत उल्लंघिती ॥५॥
पुरें पाटणें ग्राम नगरें । लंघित वने उपवनें थोरें ।
एका मुहूर्तें अति त्वरें । कैलसप्रति येते झाले ॥६॥
अति पापिष्ठ रजनीचर । पावोनि कैलसपठार ।
वेढिते झाले अलकानगर । तें कुबेरदूतीं देखीलें ॥७॥
दूत म्हणती कुबेरबंधु । रावण आला करावया युद्ध ।
तेणें सांडोनि सुहृदसंबंधु । यासीं आम्हीं झगडों नये ॥८॥
राया जाणवूं हे मात । म्हणोनि दूत निघले त्वरित ।
शीघ्र वैश्रवणा जाणवित। लंकनाथ युद्धा आला ॥९॥

कुबेराची रावणाबरोबर युद्ध करण्याची सैन्याला आज्ञा :

ऐकोनि दूतांचें वचन । कुबेर झाला क्रोधायमान ।
वेगीं म्हणे सैन्यालागुन । करा म्हणे संग्राम ॥१०॥
ऐकोनि धनेशाची वचनावळी । वीर चालिले आर्तुबळी ।
जैसी सागराची नव्हाळी । तैसे ते काळीं चालिले ॥११॥
अश्वी चढले एक वीर । एकीं पालाणिले कुंजर ।
एकीं सज्जले रहंवर । पायांचे मोगर धांवती ॥१२॥
दोहीं सैन्यां झाली मिळणी । जैशा दोनी एक होती पुष्करिणी ।
वर्षती उभयतां बाणीं । वीरश्रेणी लक्षोनियां ॥१३॥

कुबेर सैन्याकडून स्वतःच्या सैन्याचा संहार
झालेला पाहून रावण स्वतः युद्ध करू लागला :

यक्षीं केला थोर मार । जैसा गगनीं वर्षे जळधर ।
रावणाचे प्रधान थोर थोर । रणीं घायाळ पाडिले ॥१४॥
आणीक राक्षस पडिले रणीं । हें दशमुखें देखोनि नयनीं ।
क्रोधें नेत्र आरक्त करूनी । परवीरांवरी लोटला ॥१५॥
गर्जना करोनी अत्यंत गाढी । पाताळीं शेष हडबडी ।
वराहाची दाढ तडतडी । कूर्म करी गाढ पृष्ठीतें ॥१६॥
गगनीं नक्षत्रें कळकळिती । शशिसूर्य चळचळां कांपती सुरासुर ।
ते काळीं प्रधानवीर । समस्त जाण एकवटले ॥१८॥
पुनरपि रणीं मिसळले । घोरांदर युद्ध करिते झाले ।
एकैक सहस्त्रेसीं भिडते झाले । रणमंडळीं ते काळीं ॥१९॥
गदा परिघ शक्ति तोमर । घेवोनियां दशशिर ।
करिता झाल विकट मार । परवीरांते देखोनी ॥२०॥

रावणाकडून यक्षसैन्याची दाणादाण :

रावण रणीं खवळला । कुबेरसैन्या मारिता झाला।
कित्येक वीरां निःपात केला। कित्येक निर्जीव केले रणभूमीं ॥२१॥
जेंवी वर्षे माधव । तेंवी सोडोनी शर सर्व ।
व्यथाभूत । करोनी सर्व । वीरां वीर आटिला ॥२२॥
यक्षनायकाचें सैन्य। रणमंडळीं होवोनी भग्न ।
जैसा वन्हि करी दहन । काष्ठांलागोन पर्वतीं ॥२३॥
मारूत वन्हीस समस्त प्रधानेसीं रावण । कुबेरसैन्या करूनि भग्न ।
कित्येक भग्नांग होऊन । समरांगणीं उलंडले ॥२५॥
कित्येक होटांसहित दांत । पडोनि रणीं कुंथत ।
एक भयंकरोनि जीव देत । एक तळमळित मस्तकघातें ॥२६॥
एकांचे तुटले कर । एकांचे फ़ुटलें शिर ।
एकांचे घायाळ शरीर । चेंदाचेंद होवोनि ठेली ॥२७॥
एकंसि भय अद्भुत । धवोंनि प्रेतमाजि लपत ।
एक ते फ़ळफ़ळां मूतत । राक्षसमार देखोनी ॥२८॥
एकांची गेली शस्त्रसंपत्ती । एक मेलीं मढीं होवोनी ठाती ।
ऐसी रावणें केली ख्याती । सीतापति अवधारिजे ॥२९॥
शेषसैन्य जें उरलें । तें हळुहळु संग्राम करितें झालें ।
त्यामध्यें कित्येक पळाले । नगरामाजि श्रीरामा ॥३०॥
यक्षसैन्या झाली भंगाणी । उरले वीर रणमेदिनीं ।
सांडोनीं प्रवेशले पुरी तत्क्षणीं । कुबेरा मात जाणविली॥३१॥

त्यामुळे संतप्त होऊन कुबेरने मारिचाला पाडले :

स्वसैन्य भंगले ऐकोन । कुबेर झाला क्रोधायमान ।
संयुगकटक बोलवून । तयतें संग्रमा पाठविलें ॥३२॥
संयुगकटकें रणभूमीसीं । मारीचास भेदिलें वर्मांगासीं ।
बणीं भेदोनियां त्यासी । रणभूमीसीं पाडीलें ॥३३॥
मुरारीनें मुर मारिला । षडाननें तारकासुर वधिला ।
शक्रें वृत्र निःपातिला । तैसा यक्षें मारिला मारीच ॥३४॥
मारीच पडला रणमेदिनीं । जैसा स्वर्गीहूनी पडे च्यवोनी ।
पुण्यक्षयें मृत्युलोकीं प्राणी । तैसा प्रधान पाडिला ॥३५॥
मारीच पडिला देखोन । रक्षसेंद्र कोपायमान ।
वर्षता झाला शर दारूण । संयुगकटका घायाळ केलें ॥३६॥

रावणाच्या भीतीने कुबेर पळुन गेला :

रक्तें डवरला यक्ष । दिसे जैसा वसंतिचा पळस ।
रण सांडोनी पुरीं प्रवेश । पाठी देवोनी पळाला ॥३७॥
पाठी लागले राक्षसगण । नगरद्वारासमीप येऊन ।
पुढें झाला रावण । तंव द्वरपाळें देखिलें ॥३८॥

कुबेरच्य द्वारपाळाने रावणासह सैन्याला पळवून लावले :

श्रीरामचंद्रा अवधारीं । रावण प्रवेशतां अलकपुरीं ।
समवेत राक्षस सुरारी । ते द्वारपाळनें निवारले ॥३९॥
द्वारपाळ तो कैसा म्हणसी । ज्यासि यम कांपे चळचळासीं ।
तेजें तरी सूर्यसद्दशी । रावणासीं भिडता झाला ॥४०॥
ते द्वारींचें तोरण तोडून । सूर्यभानुनामें द्वारपाळ जाण ।
झोडिता झाला राक्षसेंद्रालागून । रावण पळोन पैं गेला ॥४१॥
सूर्यभानु द्वारपाळ । रावणासि मारिता तत्काळ ।
ब्रह्मवचन होईल निष्फळ । म्हणोनि जीत सोडिला ॥४२॥
द्वारपाळमाराभेण । राक्षससैन्या दाणादाण ।
पळाले जीव घेवोन । पर्वत पाठारीं रिघाले ॥४३॥
एक विंवरीं प्रवेशले । एक गिरिकंदरीं रिघाले ।
एक नदी उतरोन गेले। आपुलिया स्वस्थळाप्रति ॥४४॥
एक वृक्षी वळंघले । एक वृक्षबुदात रिघाले ।
एक पर्वताकडे बैसले । धाक घेवोनि राक्षस ॥४५॥
रावणें देवोनि पाठी । तेथोनि पळाला उठाउठीं ।
पुढील कथा सुरस गोमटी । भवबंधच्छेदक ॥४६॥
एका विनवी जनार्दनी ।जनार्दनाची एकपणीं ।
सुरस कथा रामायण् । सावधान संती परिसावी ॥४७॥
स्वस्ति श्रीभावार्थामायणे उत्तरकांडे एकाकारटिकायां
रावणसैन्यभंगो नाम चतुर्दशोऽध्यायः॥१४॥ ओंव्या ॥४७॥

GO TOP