| 
 
  ॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ 
 ॥ श्रीभावार्थरामायण ॥ 
 उत्तरकांड 
 ॥  अध्याय एकावन्नावा ॥  लक्ष्मण-सुमंत-संवाद
 
 ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ 
 
तदनंतर सारथि सुमंत । सौमित्राप्रति ऋषिभाषित । सांगता झाला आनंदित । जें ऐकिलें पूर्वी होतें ॥१॥
 
दुर्वासांचे दशरथाकडे आगमन :  
पूर्वी दुर्वास महाऋषी । अत्रिपुत्र अनसूयेच्या कुसीं । जन्म पावला तपःसामर्थ्येसीं । तो दशरथभेटीसी अयोध्ये आला ॥२॥
 राजा वसिष्ठ सामोरे गेले । अति सन्मानें दुर्वासा आणिलें ।
 अर्घ्यपाद्यादिकीं पूजन केलें । भोजन झालें तयावरी ॥३॥
 वसिष्ठाचा आश्रम पुनीत । तेथें ऋषी वसावयार्थ ।
 ठाव दिधला हर्षयुक्त । मुनींसमीप राहविला ॥४॥
 जो दुर्वास महामुनी । तापसांमाजि शिरोमणी ।
 जयाच्या शापें शाड्.र्गपाणी । निजस्त्रियेसीं दुरावला ॥५॥
 ऐसा तो दुर्वास ऋषी । वसिष्ठाश्रमीं एक वर्षीं ।
 राहिला असतां दशरथ सूर्यवंशी । वसिष्ठगृहासि पैं आला ॥६॥
 श्रीगुरूसी नमस्कार केला । सवेचि दुर्वास वंदिला ।
 दशरथ म्हणे दयाळा । कथा एकी सांगिजे ॥७॥
 
राजाच्या प्रश्नावरुन दुर्वासांनी श्रीराम-सीता विरहाचे कारण सांगितले :  
माझीं जीं पुत्रसंतानें । तयांची सांगावीं लक्षणें । तयांचे आयुष्य तेजें गहनें । ते वर्तमान सांगावें ॥८॥
 मध्यान्हीं गेला आदित्य । ते समयीं कोणी नाहीं तेथ ।
 वसिष्ठ दुर्वास दशरथ । चवथा तेथ मी सारथि ॥९॥
 अत्रिपुत्र महाऋषी । ऐकोनी दशरथवचनासी ।
 होवोनियां अतिसंतोषी । कथा एक सांगतसे ॥ १०॥
 दुर्वास म्हणे भूपाळा । प्रौढा प्रबुद्धा धर्मशीळा ।
 ऐक इतिहास तुज प्रांजळा । ये काळीं मी सांगेन ॥११॥
 पूर्वी देवां दैत्यां युद्धकाळीं । असुरांसीं युद्ध करितां वनमाळी ।
 दैत्य पळाले भृगुआश्रमाजवळी । पुलोमेनें पाठीं घातले ॥१२॥
 पुलोमेनें दैत्य पाठीसी घातले । हे श्रीविष्णूसी कळलें ।
 करी चक्र घेवोनि मारिलें । पुलोमेसी ते काळीं ॥१३॥
 शिर तुटोनि पडिलें भूमीसी । सवेंचि आश्रमा आला ऋषी ।
 म्हणे कोणें माझिया स्त्रियासी । आश्रमासीं मारिलें ॥१४॥
 
भृगूचा विष्णूंना शाप :  
ऐसें अकृत्य गेला करुन । तो मनुष्यलोकीं जन्मेल जाण । ऐसा शाप ऋषि देवोन । मग ध्यानस्त पैं झाला ॥१५॥
 ध्यानीं आव्हानूनी मूर्ती । तिणें सांगितलें तुझी सती ।
 विष्णूनें मारिली निश्चितीं । चक्रेकरोनि ऋषिवर्या ॥१६॥
 हरीनें स्त्रियेसी मारिलें । ऐसें ऋषीलागोनि कळलें ।
 पुनरपि शाप तया काळें । मागुता दुसरा पैं दिधला ॥१७॥
 माझे स्त्रियेतें मज विघडलें । तोही ऐसेंच पावेल कोणे काळें ।
 ऐसें ऋषीच्या मुखे निघालें । वचन ते काळीं ॥१८॥
 सवेंचि ऋषि धर्मपरायण । म्हणे मी शाप वदलों तप वेंचून ।
 तरी आतां करुं विष्णूपूजन । जेणें भगवान संतोषे ॥१९॥
 षोडशोपचारीं करोनि पूजा । ऋषि म्हणे जी गरुडध्वजा ।
 थोर अन्याय झाला माझा । जें तुज म्यां शापिलें ॥२०॥
 हरि म्हणे भविष्य प्रमाण । तें ऋषिवर्या न चुके जाण ।
 यालागीं खेदें खिन्न आपण । न व्हावें जी कोणेविशीं ॥२१॥
 
दुर्वासांनी श्रीरामाचे भविष्य सांगितले :  
दुर्वास म्हणे राया दशरथा । ऐसी हे असे पूर्वकथा । तो विष्णु तुझा पुत्र होवोनि तत्वतां । श्रीरामरुपें अवतरला ॥२२॥
 तो श्रीलक्ष्मीनारयण । घेतलें श्रीरामाचें नामाभिधान ।
 पाठीचा शेष तो लक्ष्मण । भरत शत्रुघ्न तदंश ॥२३॥
 गहा सहस्त्र वर्षेवरी । राज्य करील अयोध्यानगरीं ।
 तयाची भार्या रावण वैरी । दंडकारण्य़ी हरील ॥२४॥
 पुनरपि वना जाईल । दोघा पुत्रां जन्मवील ।
 अयोध्येचें राज्य करील । सत्य जाण राजेंद्रा ॥२५॥
 ऐसें तुझ्या पुत्राचें कथन । दशरथा होईल सत्य जाण ।
 कोणा न सांगावें हें वचन । हृदयीं गुप्त राखावें ॥२६॥
 ऐसी सौमित्रा पूर्वकथा । ऋषिमुखीं ऐकिली तत्वतां ।
 ते निरुपली तुज आतां । शोकशमनाकारणें ॥२७॥
 ऐसें हे पूर्वकथन । सारथियामुखें ऐकोन ।
 शोक सोडोनि लक्ष्मण । मार्ग क्रमिता पैं झाला ॥२८॥
 तंव सूर्य गेला अस्तमानीं । प्राप्त झालीसे रजनी ।
 केशिन्या नामें नगरीसि येऊनी । वस्तीसी तेथें राहिले ॥२९॥
 केशिन्येसि क्रमोनि रजनी । प्रभात होतांच दोघे जणीं ।
 रथारुढ होवोनी । अयोध्याभवनीं प्रवेशले ॥३०॥
 एका विनवी जनार्दना । पुढील गोड निरुपणा ।
 संवाद होईल श्रीराम लक्ष्मणां । तो सावध श्रोतीं ऐकिजे ॥३१॥
 स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
 लक्ष्मणसारथिसंवादो नाम एकपंचाशत्तमोऽध्यायः ॥५१॥ ओंव्या ॥३१॥
 GO TOP 
 
 |