| 
 
  ॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ 
 ॥ श्रीभावार्थरामायण ॥ 
 उत्तरकांड 
 ॥  अध्याय बाहत्तरावा ॥  मूळकासुराचा वध
 
 ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ 
श्रीरामभेटीला बिभीषण निघाला, अयोध्येचे वर्णन :  
रणीं बिभीषण पडिला । तो प्रधानें सावध केला । जैसा नदीस बुडतां काढिला । थडीचिया जनीं हो ॥१॥
 रावणानुज होवोनि सावधान । प्रधानांप्रति बोले वचन ।
 आतां कर्तव्य काय आपण । इये समयीं करावें ॥२॥
 प्रधान म्हणती राजाधिराजा । शरण जावें श्रीरघुराजा ।
 सिंहाचे प्रसादें अजा । गजमस्तकीं आरुढली ॥३॥
 गदापाणि म्हणे धन्य जिणें । आजि राघवासि भेटणें ।
 हाचि निश्चय करोनी मनें । प्रधानांसीं निघाला ॥४॥
 चवघांचिया समवेत । बिभीषण मार्गी जात ।
 म्हणे आजि भेटेल गरुडध्वज । क्षेम देईल उचलोनि भुज ।
 सांगेन जीवींचें निजगुण । अधोक्षज देखिलिया ॥६॥
 नेत्रां होईल पारणें । धणीवरी सुख घेईन मनें ।
 पूर्णिमा देखोनि चकोर वदनें । चंद्राकारणें पसरिती जैसें ॥७॥
 ऐसा मार्ग क्रमित मेदिनीं । उल्लास न माये अंतःकरणीं ।
 तंव पुढें देखिली राजधानी । रघूमत्तरायाची ॥८॥
 सुवर्णकळाश रत्नजडित । पताका अंबरीं रामनामांकित ।
 काळ धाकें न राहे तेथ । पुरी साकेत शोभे ऐसी ॥९॥
 अयोध्यानगरींचे जन । करिती श्रीरामकीर्तन ।
 घरोघरीं वेदाध्ययन । पुराण व्याख्यान ठायीं ठायीं ॥१०॥
 जनीं अयोध्येसीं वसतां । नेणती जन्ममरणवार्ता ।
 नाहीं दरिद्राची कथा । नित्य स्मरतां रामनाम ॥११॥
 शरयुतीर अति पावन । सेवितां राहिले मुनिजन ।
 पायवाट स्वर्गा गमन । करावयालागूनी ॥१२॥
 अयोध्येचें स्मरणमात्रें । मोक्ष वोळंगे पाणियातें ।
 इतर इजसमान नव्हेत तीर्थे । काशीआदि करोनी ॥१३॥
 काशी हृदयीं परम कृपण । मरणांतीं मुक्ति दे दान ।
 अयोध्या ईहूनि उदार गहन । स्मरणें पावन मोक्ष दे ॥१४॥
 यालागीं वाल्मीकासि कवीश्वरीं । वर्णिली अयोध्या प्रथम पुरी ।
 मोक्षदानी अति उदारी । निजथोरी जियेची ॥१५॥
 
श्रीरामांची भेट व त्यांना निवेदन :  
ऐसिये अयोध्येमाजी रघुनाथ । राज्य करी बंधूसमवेत । तेथें बिभीषण शरणागत । राजसदना उजू आला ॥१६॥
 भद्रासनीं रविवंशभूषण । दक्षिणे वसिष्ठ ब्रह्म पूर्ण ।
 परिवेष्टीइइत बंधू आदि लक्ष्मण । सेवे सावधान तिष्ठती ॥१७॥
 दुरोनी देखिला श्रीरघुनाथ । बिभीषणें घातला दंडवत ।
 जोडले करीं प्राणिपात । श्रीरामासि पैं केला ॥१८॥
 श्रीरामें उठोनि ते समयीं । शरणागता धरोनि हॄदयीं ।
 आलिंगिला गोहीं बाहीं । जेंवी माता बाळका ॥१९॥
 बैसकेस दे रत्नजडित पट । देवोनि बैसवला निकट ।
 म्हणे शरणागता बहुत कष्ट । झालें ऐसें दिसतसे ॥२०॥
 चंद्राच्या तुटतीं जेंवीं कळा । तेंवी तुझे देखोनि मुखकमळा ।
 वोहट पडिला हर्षकळा । आनंदजिव्हाळा न देखों ॥२१॥
 जीवनेंवीण वल्ली । सुकोन शुष्क जाहली ।
 जैसी हृदयींची काजळी । दिसतसे मुखावरी ॥२२॥
 कोण हृदयींची चिंता । ते मज निवेदी पौलस्तिसुता ।
 श्रीरामाची देखोनि मुखावरी । सुखा झालें बिभीषणा ॥२३॥
 पौलस्ति म्हणे कलमोद्भवजनका  । स्वर्गगमनपुरीच्या नायका ।
 दिनमणिकुळदीपका ।  अपूर्व एक देखिलें ॥२४॥
 वारीमृणालाचा तंतु । त्यामाजि गुंतला ऐरावतु ।
 मशकें भूगोळ मुखांतुं । दंतदाढा रगडिला ॥२५॥
 मर्कटें समुद्र शोषिला । मृगजळीं वंध्यापुत्र बुडाला ।
 जंबुकें सिंह विदारिला । सशानें भेडसाविला शार्दूळ ॥२६॥
 छायेनें पुरुष गिळोन । उरगें गरुडावरी केलें आरोहण ।
 पिपीलिकेचा जो नंदन । तेणें मेरु उपटिला ॥२७॥
 ऐसें वर्तलें नृपचूडामणी । जंबुकें सिंहाचा कवळ नेला हिरोनी ।
 ऐसें झालें मजलागूनी । देवाधिदेवा विधिजनका ॥२८॥
 ऐसियासि ऐका वृत्तांत । कुंभकर्णाचा जो मूळक सुत ।
 तेणें प्रसन्न करोनी उमाकांत । अद्भूत वर पावला ॥२९॥
 वरदबळेंकरुन । युद्ध केले अति दारुण ।
 समस्त मारोनी राक्षससैन्य । माझें राज्य हरितलें ॥३०॥
 श्रीराम म्हणे गा गदापाणी । केली रावणकुळा खंडणी ।
 पुत्रासहित रणीं । निद्राप्रिय मारिला ॥३१॥
 हा तैं काय नव्हता । किंवा अन्यत्र स्थळीं गेला होता ।
 याची सांगे समूळ कथा । जे ऐकतां सुख होय ॥३२॥
 
रामांना मूळकासुराची कथा निवेदिली :  
ऐसें बोलिलें नलिनीदळानेत्रें । तें परिसोनि बिभीषणें पवित्रें । सांगों आदरिलें चरित्र । निजाग्रजसुताचें ॥३३॥
 गदापाणि म्हणे कनकमृगारी । याचे मातेचिया उदरीं ।
 पूर्वी पुत्रद्वय जन्मलें सुरारीं । माजी रणपंडित ॥३४॥
 कुंभ निकुंभ नामें प्रसिद्ध । काळावरी जयांचे बिरुद ।
 तयांमागें अतिमंद । पित्याचे मूळीं लागला ॥३५॥
 जन्मता सांडिला बाहेरी । निशा राक्षसीनें वाढविला घरीं ।
 याचे मुळें सर्वां बोहरी ।  देवाधिदेवें श्रीरामें केली ॥३६॥
 सर्व कुळाचा झाला नाश । कुंभकर्णस्त्रियेनें नगरास ।
 आणोनि वाढविला कोणास । कळों नाहीं दिधलें ॥३७॥
 जेंवी पुरिला अग्निहोत्रींचा वन्ही । प्रकट परी न देखे कोणी ।
 ऐसा वाढला लंकाभुवनीं । पुढें तपा निघाला ॥३८॥
 प्रसन्न करोनि चंद्रमौळी । वर मागितला तये वेळीं ।
 अमर करीं भूमंडळीं । देवीं दैत्यीं न मारावें ॥३९॥
 मानवादि गंधर्व विद्याधर । किंपुरुष चारण असुर ।
 पक्षी श्वापदें जीव क्रूर । मज वधीं तत्पर न व्हावें ॥४०॥
 होय म्हणोनि अंधकरिपु । म्हणे मनींचा सिद्ध संकल्पु ।
 या इतुकियांचें हातें वपु । मरण न पवे संग्रामीं ॥४१॥
 मग उपदेशून मंत्रावळी । कैलासा गेला इंदुमौळी ।
 मागें मूळकासुरें भूमंडळीं । आम्हां दुःख दीधलें ॥४२॥
 शरणागत ऐसें बोलिल्यावरी । स्वामीची मनोदेवता आश्चर्य करी ।
 क्षण एक निवांत दूषणारी । निजासनीं बैसला ॥४३॥
 
त्याच्या मरणाचा उपाय वसिष्ठांनी सांगितला :  
क्षणैक ध्यानस्थ गौतमश्वशुर । मग बोलता झाला उत्तर । याचे वधाचा प्रकार । समस्तां प्रति पुसतसे ॥४४॥
 तंव वसिष्ठ म्हणे श्रीरघुनाथा । याची ऐसी मरणाची कथा ।
 यासी वधील जनकदुहिता । नारदें मज सांगितलें ॥४५॥
 सद्गुरूमुखींचें ऐसें वचन । श्रीरामचंद्रें परिसोन ।
 प्रधान पाचारिले सज्ञान । सुमंतादि थोर ॥४६॥
 आज्ञा केली श्रीरघुवीरें । सुग्रीवादि येवोनि वानरें ।
 सेना सज्जोनि वाद्यें तुरें । नानापरींची वाजिन्नलीं ॥४७॥
 जानकीस पुरुषवेश दिधला । अलंकारभूषणीं मिरविला ।
 तंव बिभीषण बोलता झाला । पारणें कीजे राजेंद्रा ॥४८॥
 आजि कार्तिकद्वादशी । पारणें सारोनि प्रयाणासि ।
 मग करावें लंकेसीं । राक्षसवधाकारणें ॥४९॥
 तंवा बोलिला श्रीरघुनंदन । आणीं मूळकासुर मारुन ।
 मग करुं भोजन । हे प्रतिज्ञा निश्चित ॥५०॥
 तुज राज्य दिधल्यावीण शरणागता । आम्हां भोजनीं नाहीं अर्हता ।
 ऐसें वदोनि श्रीरघुनाथा । स्फुरणें बाहु वाढत ॥५१॥
 
सीता पुरुषवेशाने निघाली :  
पुरुषवेश सालंकारीं । शृंगारिली जानकी सुंदरी । निजधनुष्य घेवोनि करीं । अश्वावरी बैसविली ॥५२॥
 प्रधान सेना सैनिक । परिवेष्टित कपिकटक ।
 मध्ये शोभे रघुनायक । जानकी सम्यक पृष्ठभागीं ॥५३॥
 मग श्रीरामें काय केलें । पुष्पकासि पाचारिलें ।
 त्यावरी बैसोनि सहदळें । लंकापुर पावले ॥५४॥
 ऐसें चालतां निजभारीं । पंचघटिका भरता पुरीं ।
 प्रवेशला जैसे पुष्पावरी । षट्पद बहुसाल ॥५५॥
 तडागाचे निकट पाळीं । पक्षी जैसे पावती सकुळीं ।
 तैसा निजसैन्येंसीं आतुर्बळी । लंकाप्रदेशीं पावला ॥५६॥
 देखोनियां निजलंका । लतामृग चढले तवका ।
 शिळा पाषाण तरु अनेका । करी घेवोनि चालिले ॥५७॥
 त्रिकूट वेढिला वानरीं । देखोनियां सुरारीं ।
 आश्चर्य करी ते अवसरीं । दडोनि राहिला निजगृहीं ॥५८॥
 
मूळकासुराला अपशकुन, युद्धाला प्रारंभ :  
वार्ता ऐकोनि मूळकासुर । कीचित सेना सज्जोनि सत्वर । पश्चिमद्वारें चालिला थोर । अपशकुन पैं झाले ॥५९॥
 निजरथाच्या ध्वजावरी । वायस येवोनि शब्द करी ।
 पुढें एक द्विज मोकळे शिरीं । मार्गीं येतां देखिला ॥६०॥
 अशुद्धाचा शिरवा पडे । रथींचा वारु चालतां अडे ।
 आंख मोडोनि दुखंडें । धुरेचीं पैं होती ॥६१॥
 सारथि उलंडला धरणीं । मूळकासुरें उडी टाकोनी ।
 दुसरे रथीं आरुढोनी । संग्रामासी निघाला ॥६२॥
 अपशकुनें भयभीत सैन्य । तयासि अभय देवोन ।
 करिता झाला तुंबळ रण । वानरेसीं भिडोनियां ॥६३॥
 वानर टाकितें झाले शिळा । राक्षस तोडिती शरजाळा ।
 अद्भूत संग्राम मांडला । वीरें वीर पडखळिले ॥६४॥
 तंव हनुमंतें रुद्रावेशें । सोडिलीं पर्वताचीं शिसें ।
 देखोनि तोडिलीं रजनीचरेशें । उपरी काय आरंभिलें ॥६५॥
 ईशानदत्त वरद बाण । कार्मुकीं योजिलें मंत्र जपून ।
 ते वानरसेनेवरी येतां रघुनंदन । देखोनि धनुष्य घेतलें ॥६६॥
 कार्मुकीं बाण रघुराजें । योजिला जपोनि मंत्रबीजें ।
 जयाचेनि निजदिव्यतेजें । दशदिशांमाजि बिंबती ॥६७॥
 ऐसे श्रीरामाचे शर । यमदंडकाहूनि कठोर ।
 सुटले तेणें अंबर । व्यापिलें दिसे ते समयीं ॥६८॥
 बाणें बाणा निवारिलें । आकाश निर्मळ जाहलें ।
 वर्षाकाळ गेलिया आगमन केलें । शरदऋतूनें पैं जैसें ॥६९॥
 देखोनि श्रीराघवाचें संधान । राक्षसें आश्चर्य मानोन ।
 काय बोलता झाला वचन । बिभीषणासी परियेसा ॥७०॥
 अगा ये पूर्वजा बिभीषणा । तुवां साह्य आणिलें श्रीरघुनंदना ।
 तरी मज त्याची नाहीं गणना । शिवप्रसादेंकरोनि ॥७१॥
 माझा मृत्यु यांचेनि हस्ते । नाहीं जाण तूं निभ्रांतें ।
 साटोप धरोनि युद्धातें । वृथा मरावया आलेती ॥७२॥
 पूर्वी श्रीरामें कपट केलें । छळोनि वालीसी वधिलें ।
 ते मत येथें काहीं न चाले । मज मूळकासमोर ॥७३॥
 ऐसे राक्षसाचे वचनीं । श्रीरघुराजें विचारोनि मनीं ।
 धनुष्यीं बाण लावोनी । पुढारला पैं होय ॥७४॥
 मूळकासुरा हटकोन । श्रीराम करिता झाला संधान ।
 मागें जानकी सरसावोन । पाठीसीं उभी राहिली ॥७५॥
 
सीतेची शंकरांना प्रार्थना :  
श्रीराम मूळकासुर परस्परें । युद्धीं भिडती आवेशें थोरें । मागोनी जानकीनें त्वरें । धनुष्या हात घातला ॥७६॥
 शितीं लावोनि श्रीरामदत्त बाण । वोढी काढोनि आकर्ण ।
 मनीं स्मरोनि श्रीरामचरण । काय आठविती पैं झाली ॥७७॥
 म्हणो अहो जी सदाशिवा । म्यां जरी एकाग्रचित्तें सेवा ।
 करोनि भजलें असेन राघवां । तरी हा बाण मूळका वधों ॥७८॥
 माझा पिता विदेही जनक । राज्यराष्ट्रापाळक ।
 सत्य असेल तरी ह अचुक । राक्षसा बाण भेदील ॥७९॥
 श्रीराम एकपत्नीव्रतधारी । हें सत्य असेल जरी ।
 तरी त्या माझ्या निजशिरीं । कुंभकर्णपुत्र मरेल ॥८०॥
 अनसूया जे पतिव्रता । तिणें मज अनुग्रहिलें वनीं वसतां ।
 तियेचें प्रसादें राक्षससुता । मरण होवो या शरें ॥८१॥
 वसिष्ठ सद्गुरू ब्रह्म पूर्ण । जरी एकबुद्धीं केलें असेल भजन ।
 लक्ष्मण शेषावतार सत्य जाण । तरी येणें बाणें मरण राक्षस पावो ॥८२॥
 ऐसें भावोनियां मानसीं । शर सोडिला घोषीं आकाशीं ।
 प्रळय झाला दिग्गजांसी । चंद्रसूर्ये भूमि सेविली ॥८३॥
 नक्षत्रें खचली पृथ्वीवरी । पर्वत उलंडले सागरीं ।
 मर्यादा सांडूं पाहती भारी । संकट येवोनि पडिलें वीरां ॥८४॥
 वानरदळीं केला गजर । राक्षससैन्यीं हाहाकार ।
 नभोमार्गे शर । मूळकासुरावर येवों सरला ॥८५॥
 
मूळकासुराचा वध :  
राक्षसपुत्र करी निवारण । तंव अकास्मात येवोनि बाण । शिर छेदोनि रणीं जाण । सीतेच्या भातां निघाला ॥८६॥
 मूळकासुर पडिला रणीं । जेंवी पर्वत खचे मेदिनीं ।
 उरले सैन्य वानरगणीं । शिळावरीं कूट केलें ॥८७॥
 जेंवी तडागीं तुंबळा । फुटतां पसरे चहूंकडे जळ ।
 तेंवी कुंभकर्णपुत्राचें दळ । दशदिशा लंघितें झालें ॥८८॥
 जानकीचेनि हस्तें जाण । मूळकासुर पावला मरण ।
 ऐसें देखोनि सुरगण । पुष्पवर्षाव करिता झाला ॥८९॥
 विजयी झाला श्रीरघुनाथ । विजयी कपि आनंदभरित ।
 विजयी बिभीषण शरणागत । निजराज्यीं स्थापिला ॥९०॥
 याउपरी पुष्पकविमानीं । बैसोनि जानकीसह कोदंडपाणी ।
 बंधुवर्गेसीं अयोध्याभवनीं । प्रवेशता पैं झाला ॥९१॥
 वानरां आज्ञा देऊन । निजस्थाना पाठविलें जाण ।
 यापरी वर्तलें तें सावधान । श्रोतृजन परिसोत ॥९२॥
 म्हणाल हें मूळीचें नव्हे निरुपण । वाल्मीकें कथिलें जाण ।
 तरी हे कथा अप्रमाण । ऐसें संतीं न म्हणावें ॥९३॥
 वाल्मीकें शतकोटि केलें । तें एक महेशें पाहिलें ।
 भागत्रय करोनि वाटिलें । हे प्रसिद्ध जाणतां ॥९४॥
 मृत्युलोकीं जो भाग । तो युगानुयुगीं झाला भंग ।
 काही एक उर्वरित कथाभाग । लोकोद्धारण राहिला ॥९५॥
 याकारणें वाल्मीक ऋषी । वदला नाहीं कथा ऐसी ।
 म्हणातां कुष्ठ लागे वाचेसीं । ऐसें पंडित जाणती ॥९६॥
 अबद्ध सुबद्ध रामायण । श्रीरामाचें चरित्र गहन ।
 श्रवणें भवदोषखंडन । सादरें जरी ऐकिजे ॥९७॥
 पक्षियाचे उच्चारें गणिका । विमानीं बैसोनि वैकुंठलोका ।
 गेली हा तुम्हांसि ठाऊका । नाममहिमा रामाचा ॥९८॥
 श्रीरामाकथासागर । याचा कोणा कळेल पार ।
 भोक्ता एक श्रीशंकर । जेणें शतकोटि विभागिलें ॥९९॥
 एका जनार्दना शरण । जानकीसहित श्रीरघुनंदन ।
 अयोध्येसी सुखसंपन्न । येवोनि राज्यभार चालवीत ॥१००॥
 स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
 मूळकासुरवधो नाम द्विसप्ततितमोऽध्यायः ॥७२॥ ओंव्या ॥१००॥
 GO TOP 
 
 |