॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीरामविजय ॥

॥ अध्याय एकोणचाळिसावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
देवाधिदेव राजीवनेत्र ॥ पुराणपुरुष घनश्यामगात्र ॥
लीला दाखविली विचित्र ॥ भक्तजन तारावया ॥१॥
सौमित्र पडिला रणांगणीं ॥ श्रवणीं ऐकतां कोदंडपाणी ॥
शोकाकुलित पडिला धरणीं ॥ सुमंतें सांवरून उठविला ॥२॥
दळ घेऊन अपरिमित ॥ समागमें घेतला हनुमंत ॥
रणाप्रति धांविन्नला भरत ॥ पवनवेगें करूनियां ॥३॥
भरत आणि हनुमंत ॥ रण विलोकिती समस्त ॥
तंव ते सससावोनि सीतासुत ॥ दोघे पुढें पातले ॥४॥
हनुमंताचे कर्णीं समस्त ॥ भरत सांगे गुप्त मात ॥
म्हणे हे राघवाऐसे दिसत ॥ सीतासुत निश्चये ॥५॥
जानकी होती गर्भिणी ॥ तैसीच रामचंद्रे सोडिली वनीं ॥
हनुमंत म्हणे मजही मनीं ॥ ऐसेंच गमें निश्चयें ॥६॥
वैरागरावांचून रत्‍न ॥ सहसा न होय निर्माण ॥
हे जानकीचे नंदन ॥ मजही पूर्ण कळों आले ॥७॥
तों लहूसी म्हणे कुश वीर ॥ पैल ते नर आणि वानर ॥
हळूच करितात विचार ॥ तें तुज कांही समजलें ॥८॥
आम्हां दोघांसी युद्धी गोवूनी ॥ श्यामकर्ण न्यावा सोडोनि ॥
हेंच त्यांनीं धरिले मनीं ॥ सांगती कानीं एकमेकां ॥९॥
तरी तूं रक्षी श्यामकर्ण ॥ त्यांसीं युद्ध करितों मी निर्वाण ॥
ऐसें कुश वीर बोलोन ॥ सरसावून पुढें आला ॥१०॥
धनुष्यासी लावून बाण ॥ भरताप्रती बोले वचन ॥
तूं वडील काय लक्ष्मणाहून ॥ तुझें आंगवण थोर दिसतसे ॥११॥
तुझें नाम काय सांग सत्वर ॥ पिता तुझा कोठील नृपवर ॥
त्वां पूर्वी युद्ध दुर्धर ॥ कोणासीं केलें सांगपां ॥१२॥
माझे नाम पुससील ये क्षणीं ॥ तरी मी वीर कुशेंद्र चूडामणी ॥
या उपरी भरत तये क्षणी ॥ काय बोलता जाहला ॥१३॥
म्हणे लेकुरा तूं जाय येथोन ॥ तुज मी दिधले जीवदान ॥
भरतें मज सोडिलें म्हणोन ॥ सांग आपुले मातेसी ॥१४॥
मग कुश बोले हांसोन ॥ तुझें बंधू पडले दोघेजण ॥
त्यांचा सूड घ्यावया पूर्ण ॥ रामें पाठविलें तुम्हांसी ॥१५॥
युद्ध सांडूनि सांगसी गोष्टी ॥ बंधूचा सूड घेईं उठाउठी ॥
ना तरी आता रणीं दावून पाठी ॥ अयोध्येसीं पळें कां ॥१६॥
पाठमोऱ्यासी न मारीं जाण ॥ तज अभय दिधलें पूर्ण ॥
कोण तुझा आहे रघुनंदन ॥ त्यासी घेऊन येईं वेगें ॥१७॥
ऐसें बोलतां सीतानंदन ॥ भरतें चापासी लावूनि बाण ॥
आकर्णपर्यंत ओढून ॥ कुशावरी सोडिला ॥१८॥
सीतात्मजे शर टाकून ॥ मध्येंच तोडिला तो बाण ॥
सवेंच शरजाळ घालून ॥ कटक बहुत संहारिले ॥१९॥
भरत जे जे अस्त्र सोडित ॥ तें तें न मानी सीतासुत ॥
युद्धविद्या सरली समस्त ॥ सीतासुत नाटोपे ॥२०॥
भरतें प्रेरिलें कार्तवीर्यास्त्र ॥ सहस्रकरांचे प्रकटले वीर ॥
बाण सोती अनवार ॥ हांकें अंबर गाजविती ॥२१॥
ऐसें देखतां राघवकुमरें ॥ भार्गवास्त्र सोडिले त्वरें ॥
कार्तवीर्यास्त्र एकसरें ॥ गुप्त जाहले तेधवां ॥२२॥
मग भरते प्रेरिली कालरात्री ॥ तमें दाटली धरित्री ॥
तंव सीतापुत्रें ते अवसरी ॥ द्वादश सूर्य प्रकटविले ॥२३॥
त्या प्रकाशे ते वेळां ॥ विरिंचिगोळ तपों लागला ॥
भरत म्हणे हा कळिकाळा ॥ सर्वथाही नाटोपे ॥२४॥
भरतें सोडिले महिषासुर ॥ कुशें टाकिली शक्ति अनिवार ॥
भरतें सोडिलें त्र्यंबकास्त्र ॥ येरें भस्मासुरास्त्र सोडिलें ॥२५॥
मग कुशेंद्रें ते वेळां ॥ सूर्यमुख बाण काढिला ॥
जैसी मेघांतून निघे चपळा ॥ तैसा गेला त्वरेनें ॥२६॥
भरताचे हृदयीं येऊन ॥ खडतरला दिव्य बाण ॥
स्यंदनावरून उलथोन ॥ भरत खाली पडियेला ॥२७॥
दळ पूर्वीच आटिले समस्त ॥ ऐसें देखोनि हनुमंत ॥
घेऊन एक विशाळ पर्वत ॥ कुशेंद्रावरी धांविन्नला ॥२८॥
भोवंडून बळें भिरकाविला ॥ कुशें वज्रमुख बाण सोडिला ॥
अचळ फोडोन पिष्ट केला ॥ धुरोळा उडाला आकाशीं ॥२९॥
मारुतीचे हृदय लक्षून ॥ सोडिले तेव्हां वज्रबाण ॥
तो वज्रदेही परी मूर्च्छना येऊन ॥ धरणीवरी पडियेला ॥३०॥
इकडे बिभीषण आणि रघुनंदन ॥ विचार करीत बैसले पूर्ण ॥
बाळक हे कवणाचे कोण ॥ युद्ध निर्वाण करिताती ॥३१॥
तों अकस्मात आली मात ॥ रणीं पडला वीर भरत ॥
मूर्च्छना येऊनि हनुमंत ॥ रणांगणीं तळमळे ॥३२॥
बिभीषण म्हणे रघुनाथा ॥ आतां कासया यज्ञ करितां ॥
परमाश्चर्य तत्वतां ॥ जाऊनियां पहावें ॥३३॥
रघुवीर बोले तेव्हा वचन ॥ काळ कैसा परम कठिण ॥
बंधू पडिले तिघेजण ॥ कुलक्षय पूर्ण मांडला ॥३४॥
परम क्रोधावला रघुनंदन ॥ तोडोनि टाकिले यज्ञकंकण ॥
होमद्रव्यें उलंडून ॥ सीतारमण ऊठला ॥३५॥
हडबडली अयोध्या सर्व ॥ निशाणीं न घालितां घाव ॥
रथारूढ होऊनि सर्व ॥ पवनवेगें धांवले ॥३६॥
बिभीषण सुग्रीव जांबुवंत ॥ नळ नीळ शरभ वाळिसुत ॥
अयोध्येचे दळ समस्त परम वेगें धांवत ॥३७॥
वर्षाकाळीं गंगेचे पूर ॥ सागराप्रति जाती सत्वर ॥
तेवीं नरवानरांचे भार ॥ रणसिंधूजवळी पातले ॥३८॥
तिघे बंधू पडिले रणीं ॥ ते नयनीं विलोकी चापपाणी ॥
की नमस्कार घातले धरणीं ॥ तिघांही मिळूनि एकदांचि ॥३९॥
तुझे कन्येस गांजिले व्यर्थ ॥ म्हणोनि पृथ्वीस नमस्कार करित ॥
असो प्रेते देखोनि रघुनाथ ॥ मनीं परम क्षोभला ॥४०॥
दुरोनी मग देखिले नयनीं ॥ श्यामसुंदर बाळें ते क्षणीं ॥
एकाकडे एक पाहोनी ॥ गोष्टी करिती कौतुकें ॥४१॥
कौपीन मौंजी यज्ञोपवीत ॥ तेणें शोभती किशोर अद्‌भुत ॥
माथांची शिखा उडत ॥ दृष्टी नाणिती परदळातें ॥४२॥
असो वृक्ष पाषाण घेऊन ॥ धांवले एकदांचि वानरगण ॥
तों दोघेही धनुष्य चढवून ॥ सरसावून पुढें आले ॥४३॥
आश्चर्य करी रघुनंदन ॥ सोडिती बाणापाठीं बाण ॥
मृगेंद्राऐसें गर्जोन ॥ दोघे वचन बोलती ॥४४॥
घालिती असंभाव्य बाणजाळ ॥ जर्जर केलें वानरदळ ॥
शिळा वृक्ष फोडोनि सकळ ॥ परदळावरी टाकिती ॥४५॥
अनिवार बाळकांचा मार ॥ न सोसवती दारुण शर ॥
प्रेते पडली अपार ॥ उरले वानर पळती भयें ॥४६॥
हनुमंत भावी मनांत ॥ ऊर्ध्वपंथे उतरून अकस्मात ॥
पुच्छें बांधोन दोघे त्वरित ॥ राघवापासी आणावे ॥४७॥
उडों पाहे अंजनीकुमर ॥ तो कुशें टाकिला सबळ शर ॥
त्याच्या हृदयीं आदळोनि सत्वर ॥ बाण पृथ्वीवरी पडियेला ॥४८॥
कुश बोले गर्जोन ॥ मर्कटा उभा राहे एक क्षण ॥
त्वां विध्वंसिले अशोकवन ॥ तें येथें न चले सर्वथा ॥४९॥
टाकोन वृक्षपाषाण ॥ हें राक्षसयुद्ध नव्हे जाण ॥
तों नव्हे रे गिरिद्रोण ॥ उपटून बळें न्यावया ॥५०॥
गोवत्सपद जीवन ॥ पुरुषार्थ भोगिसी समुद्र उडोन ॥
रावणाचें नगर जाळिलें पूर्ण ॥ ते येथें न चलें आम्हांसी ॥५१॥
हा संग्रामसिंधु परम दुर्धर ॥ येथें जय न पावसी तूं वानर ॥
आमचे जननीसी अपार ॥ स्नेह तुझा लागलासे ॥५२॥
ते क्षणक्षणां आठवित ॥ म्हणोनि तुज रक्षिले येथ ॥
उगाच राहें निवांत ॥ अचळवत हनुमंता ॥५३॥
तों वृक्ष घेऊनि सत्वर ॥ पुढें धांविन्नला मित्रपुत्र ॥
बाणघातें तरुवर ॥ लहूनें तोडिला हातींचा ॥५४॥
म्हणे ऐक रे चंडांशुसुता ॥ तो मागील काळ राहिलां आतां ॥
तुम्ही पतितांसी तत्वतां ॥ लावीन शिक्षा आज येथें ॥५५॥
वाळी ज्येष्ठबंधू मारवून ॥ त्याचे स्त्रियेसीं करिसी गमन ॥
ज्याचे बळें कर्म केले पूर्ण ॥ त्याचं ज्ञान कळों आले ॥५६॥
तुम्हां मर्कटांसी कैचें ज्ञान ॥ परी तुज गुरु भेटला जाण ॥
उत्तम न्याय करून ॥ तारा तुज दिधली ॥५७॥
गुरु अपंथें चाले सदा ॥ मग कैंची शिष्यास मर्यादा ॥
असो प्रायश्चित एकदां ॥ घेईं आजि रणांगणीं ॥५८॥
मग घालून सहस्र बाण ॥ रणीं पाडिला सूर्यनंदन ॥
फणसफळावरी कंटक पूर्ण ॥ तैसेचि शर भेदले ॥५९॥
तंव पुढें धांवला जांबुवंत ॥ तयाप्रति कुश वीर बोलत ॥
म्हणे अस्वला तूं निर्बळ बहूत ॥ वृद्ध अत्यंत दृष्टिहीन ॥६०॥
सोडोनियां सहस्र बाण ॥ तोही पाडिला उलथोन ॥
तों घेऊनियां पाषाण ॥ नळ वानर धांविन्नला ॥६१॥
तयाप्रति लहू बोले वचन ॥ म्हणे हे नव्हे सेतुबंधन ॥
पांच बाण सोडून ॥ तोही पाडिला रणभूमीं ॥६२॥
तंव अंगद धांवला सकोप ॥ तयासी बोले रविकुलदीप ॥
रावणाचा सभामंडप ॥ नव्हे पामरा उचलावयाचा ॥६३॥
माझे पाठीसी रिघे येऊन ॥ तुझे पित्याचा मी सूड घेईन ॥
शत्रूची सेवा करितां पूर्ण ॥ लाज न वाटे मर्कटा ॥६४॥
तुझें मातेने केला व्यभिचार ॥ त्याचें प्रायश्चित देईन सत्वर ॥
ऐसें म्हणोनि पांच शर ॥ टाकोनि अंगद पाडिला ॥६५॥
असो अष्ट जुत्पती आणि हनुमंत ॥ रणीं पाडले वीर समस्त ॥
मग कोदंड चढवूनि त्वरित ॥ बाण लावीत राघव ॥६६॥
वेगें सोडिले दश बाण ॥ कुशें शत सोडिले निर्वाण ॥
सहस्र शर रघुनंदन ॥ टाकिता जाहला तयावरी ॥६७॥
कुशें लक्ष बाण सोडिले ॥ राघवें कोटी मोकलिले ॥
बाणमंडपें ते वेळे ॥ झांकुळलें सूर्यबिंब ॥६८॥
रघुपतीचा हस्तवेग बहुत ॥ त्याहूनि विशेष कुशवीर दावित ॥
बाणांचे तेव्हां गणित ॥ लेखित शेषांते न करवे ॥६९॥
अनिवार बाळकें दोनी ॥ नाटोपती रामासी रणीं ॥
यावरी कोदंडपाणी ॥ काय बोले तेधवां ॥७०॥
म्हणे ऋषिबाळक हो ऐका वचन ॥ तुम्हांस भातुकें देईन ॥
करावयासी दुग्धपान ॥ धेनु देईन सवत्स ॥७१॥
मी तुम्हांसी जाहलो प्रसन्न ॥ जें मागाल ते इच्छा पुरवीन ॥
सकळ दुःख दरिद्र हरून ॥ देईन दान वाजी गज ॥७२॥
मग ते देती प्रतिवचना ॥ आम्हांस मागावयास नसे वासना ॥
तूं मागें मनकामना ॥ पूर्ण करूं तुझी आम्हीं ॥७३॥
तुझी तूंच भोगी संपत्ति ॥ आम्ही ऐकिली तुझी कीर्ति ॥
शोधितां हे त्रिजगती ॥ निर्दय नाहीं तुजऐसा ॥७४॥
तुज साधु म्हणेल तरी कोण ॥ व्यर्थ वाळी मारिला कपटेंकरून ॥
जानकीसारिखें चिद्रत्‍न ॥ अन्यायाविण दवडिले ॥७५॥
निष्पाप जैसी भागीरथी ॥ तिजहून पवित्र सीतासती ॥
घोरवनीं टाकिली ही ख्याति ॥ तुज न शोभे राघवा ॥७६॥
ऐसें दोघेही बाळ बोलती ॥ प्रत्त्युत्तर देत रघुपती ॥
मनांत उपजे बहु प्रीती ॥ कीं दोघांप्रति आलिंगावें ॥७७॥
बाळभाषण ऐकोन ॥ वाटे तयांसी द्यावें चुंबन ॥
यापरी ते दोघेजण ॥ म्हणती बाण सोडी वेगीं ॥७८॥
तूं क्षत्रिय म्हणविसी पूर्ण ॥ गोष्टी सांगसी युद्ध टाकून ॥
लीलावतारी रघुनंदन ॥ काय बोले याउपरी ॥७९॥
तुम्ही दोघे कोणाचे कोण ॥ झालेत कोणे वंशीं निर्माण ॥
मातापितयांची नाम खूण ॥ सांग संपूर्ण आम्हांप्रति ॥८०॥
दोघांचे देव्हडेंचि ठाण ॥ दोघांची विद्या समसमान ॥
वेद शास्त्र पुराण रामायण ॥ कोण्या गुरूनें पढविलें ॥८१॥
धनुर्वेद मंत्रास्त्र ॥ कळा कौशल्य युक्ति विचित्र ॥
सद्‌गुरु कोण तुमचा पवित्र ॥ नाम त्याचें सांगा पां ॥८२॥
ऐसें बोलता रघुनाथ ॥ दोघे गदगदां हांसत ॥
रणी बंधु पडले समस्त ॥ त्यांचा खेद सांडिला येणें ॥८३॥
विद्या सरली तुझी सकळिक ॥ रणीं पुससी आतां सोयरिक ॥
कीं बंधु पडले हा धाक ॥ मनीं दचक बैसला तुझा ॥८४॥
तुज पुसावया काय कारण ॥ सोडीं वेगें निर्वाणबाण ॥
बंधूचा सूड घेईं पूर्ण ॥ मग सोयरिक पुसे सुखे ॥८५॥
म्हणती तूं अयोध्येचा नृपवर ॥ वधिले रावणादि असुर ॥
ती अवघी विद्या बाहेर ॥ काढीं आज पाहूं दे ॥८६॥
आम्हीं असों धाकुटें किशोर ॥ तूं पूर्वींचा जुनाट झुंजार ॥
धनुर्वेद पढविला समग्र ॥ गुरु वसिष्ठें तुजलागीं ॥८७॥
तुज एकपत्‍नीव्रत पूर्ण ॥ सत्कीर्ति जानकीतें सोडून ॥
अपकीर्ति कां वरिली दाटून ॥ हें तों दूषण जगीं जाहलें ॥८८॥
युद्ध केल्याविण सर्वथा ॥ आम्ही तुज न सोडूं आतां ॥
भय वाटत असेल चित्ता ॥ तरी पळून जाय अयोध्ये ॥८९॥
दारा कुटुंब तुज नाहीं ॥ आतां संन्यास घेऊन सुखें राही ॥
यावरी जनकाचा ज्येष्ठ जांवई ॥ काय बोलता जाहला ॥९०॥
तुम्ही सांगा आपले वर्तमान ॥ मग मी तुम्हांसी झुंजेन ॥
यावरी कुश बोले हांसोन ॥ ऐकें सावध होऊनि ॥९१॥
जानकी उदरकमळ शुद्ध ॥ त्यांत जन्मलों दोघे मिलिंद ॥
शत्रुकाष्ठें कोरून सुबुद्ध ॥ पिष्ठ करितो रणांगणीं ॥९२॥
वाल्मीकतात गुरु पूर्ण ॥ तेणें आमुचें केलें पाळण ॥
त्यानंतरें मौंजीबंधन ॥ करून वेद पढविले ॥९३॥
सकळ शास्त्रें रामचरित्र ॥ धनुर्वेद पढविला समग्र ॥
तो आमचे मातेचा तात पवित्र ॥ वाल्मीकऋषि जाण पां ॥९४॥
मातेचे कैवारेंकरूनी ॥ भार्गवें निःक्षत्री केली अवनी ॥
तैसेंच आम्ही धरली मनीं ॥ करूं अवनी निर्वीर ॥९५॥
कीं मातृकैवारें विनासुत ॥ उरग संहारी तेव्हां समस्त ॥
तैसेंच करणें आजि येथ ॥ आम्हासही निर्धारें ॥९६॥
त्वां सांडिली जैं सीता सती ॥ तैंच गळाली तुझी शक्ती ॥
अविवेक केला निश्चिती ॥ पुनः मागुती आवरेना ॥९७॥
ऐसें ऐकतां रामचंद्र ॥ सीता आठवूनि दयासमुद्र ॥
हृदय पिटून सर्वेश्वर ॥ धरणीवरी पडियेला ॥९८॥
मूर्च्छना सांवरूनि पुढती ॥ मागुती उठिला रघुपति ॥
पुढें बिभीषण मारुति ॥ तयांप्रति पुसतसे ॥९९॥
म्हणे हे कवणाचे नंदन ॥ मग ते बोलती विचारून ॥
तुमचीं प्रतिबिंबें परिपूर्ण ॥ जानकी उदरी जन्मलीं ॥१००॥
चार घटिका संपूर्ण ॥ निवांत राहिला रघुनंदन ॥
सीता सोडिली त्या दिवसापासून ॥ संपूर्ण दिवस मोजिले ॥१॥
द्वादश वर्षें तीन मास पूर्ण॥ गणित करी जानकीजीवन ॥
तों लहू कुश दोघेजण ॥ एकाप्रति एक बोलती ॥२॥
म्हणती वृक्षाआड बैसोन ॥ काय करितो रघुनंदन ॥
तों कुशें सोडिला एक बाण ॥ वृक्ष छेदोनि उडविला ॥३॥
हस्तकौशल्ये देखोन ॥ हास्य करी जगन्मोहन ॥
म्हणे हे आम्हांलागून ॥ वश नव्हेति कदापि ॥४॥
आतां युद्धचि करावें यथार्थ ॥ म्हणोनि उभा राहिला रघुनाथ ॥
जे जे बाण सोडित ॥ ते ते निष्फळ जात आकाशीं ॥५॥
विमानीं इंद्रादि सुरवर ॥ आश्चर्य करिती तेव्हां थोर ॥
म्हणती रामाचे सामर्थ्य अपार ॥ काय जाहलें ये समयीं ॥६॥
अकाळींचीं अभ्रे व्यर्थ पूर्ण ॥ तैसे निष्फळ जाती रामाचे बाण ॥
मग कुशें मोहनास्त्र संपूर्ण ॥ निजबाणी स्थापिलें ॥७॥
तो मोहनबाण येऊन ॥ रघुनाथ हृदयीं भेदला पूर्ण ॥
मोहें विलोकितां पुत्रवदन ॥ मूर्च्छा येऊन पडियेला ॥८॥
रघुनाथ पडतां भूमंडळी ॥ एकचि हाक चोहींकडे जाहली ॥
पर्वत घेऊनि ते वेळीं ॥ हनुमंत पुढें धांविन्नला ॥९॥
त्यावरी टाकोनिया वज्रबाण ॥ मूर्च्छागत पाडिला न लागतां क्षण ॥
तों गदा घेऊन बिभीषण ॥ हाक देत पुढें आला ॥११०॥
तों कृशें बाण सोडिला ॥ लंकापतीचे हृदयी बैसला ॥
तोही मूर्च्छित पडियेला ॥ नाहीं उरला कोणी तेथें ॥११॥
मग लहू कुश दोघेजण ॥ आले रामाजवळी धांवोन ॥
पिता पाहिला अवलोकून ॥ वंदिले चरण प्रेमभावें ॥१२॥
रघुपतीचा मुकुट काढिला ॥ कुशें आपुलें मस्तकीं घातला ॥
कुंडले कौस्तुभ कटी मेखळा ॥ सर्वही लेइला कुश तेव्हां ॥१३॥
सौमित्राची भूषणें काढोनी ॥ लहू लेइला तेच क्षणीं ॥
मग श्यामकर्ण घेउनी ॥ दिव्य रथी बैसले ॥१४॥
लहू म्हणे दादा परियेसी ॥ वानर धरून आश्रमासी ॥
नेऊन दाखवूं मातेसी ॥ खेळावयासी सर्वदा ॥१५॥
मग नळ नीळ सुग्रीव मारुती ॥ यांचीं पुच्छें धरून हाती ॥
जांबुवंत अंगद ते क्षितीं ॥ ओढीतचि चालविले ॥१६॥
अंगे खरडती भूमीवरी ॥ जांबुवंत म्हणे मारुति अवधारी ॥
ऊठ वेगें झडकरी ॥ युद्ध करूं चला यांशी ॥१७॥
मग म्हणे हनुमंत ॥ पुढें आहे बहुत कार्यार्थ ॥
त्रिभुवननाथ सीताकांत ॥ तोही मूर्च्छित पडियेला ॥१८॥
आतां मेलियाचे मीस घेऊन ॥ घेऊं जानकीचें दर्शन ॥
शक्तीचें सामर्थ्य दारुण ॥ केलें विंदान अतर्क्य हे ॥१९॥
असो आश्रमा आले किशोर ॥ रथाखालीं उतरले सत्वर ॥
अलंकार मंडित सुंदर ॥ आश्रमामाजी प्रवेशले ॥१२०॥
कुश सन्मुख देखिला ॥ जानकीस ऐसा भाव गमला ॥
की रघुनाथचि आला ॥ सरसाविला अंचल ॥२१॥
तंव ते दोघेही कुमार ॥ साष्टांग घालिती नमस्कार ॥
सीतेसि दाटला गहिवर ॥ नंदन हृदयी कवळिले ॥२२॥
सीतेचे कंठीं मिठी घालून ॥ दोघे सांगती वर्तमान ॥
रामासमवेत बंधू चौघेजण ॥ रणांगणीं पहुडविले ॥२३॥
ऐकतांच ऐसी मात ॥ सीता पडली मूर्च्छागत ॥
सवेंच उठली आक्रंदत ॥ हृदय पिटीत ते काळीं ॥२४॥
म्हणे त्रिभुवनेश्वर घनसांवळा ॥ तो रणी तुम्हां केंवि सांपडला ॥
अरे पितृवध कैसा केला ॥ जाणोनियां बाळ हो ॥२५॥
मत्स्ये कैसा सागर शोषिला ॥ जंबुकें मृगेंद्र कैसा धरिला ॥
दीपतेजें काळवंडला ॥ वासरमणि कैसा हो ॥२६॥
तृणप्रहारें भंगले वज्र ॥ कीं पतंगे गिळिला वैश्वानर ॥
सर्षपभारे भोगींद्र ॥ ग्रीवा कैशा दडपिल्या ॥२७॥
मक्षिकेचा पक्षवात सुटला ॥ तेणें मेरु कैसा उलथोनि पडिला ॥
मुंगीचे मुखवातें विदारिला प्रळयमेघ जैसा पां ॥२८॥
तंदुळभारें ऐरावत ॥ कैसा पडिला हो मूर्च्छित ॥
पुष्पप्रहारें अद्‌भुत ॥ पाताळीं कूर्म दुखावला ॥२९॥
तों कुश लहू तेव्हां बोलत ॥ माते ते पडले मूर्च्छागत ॥
आतां उठतील समस्त ॥ चिंता काही न करावी ॥१३०॥
आई आम्ही आणिलीं वानरें ॥ उड्या घेती बहुत सुंदरें ॥
वृक्षास बांधिली समग्रें ॥ पाहीं बाहेरी अंबे तूं ॥३१॥
मग जगन्माता येऊन पाहात ॥ तों हनुमंत नळ नीळ जांबुवंत ॥
वीर देखोनि समस्त ॥ आश्चर्य करी अंतरी ॥३२॥
म्हणे बाळकांचे सामर्थ्य दारुण ॥ महावीर आणिले धरून ॥
म्हणे यांस ओळखी देतां पूर्ण ॥ लज्जायमान होतील हे ॥३३॥
मग पुत्रांसी म्हणे ते अवसरीं ॥ अरे हे वानर ठेवूं नये घरीं ॥
सोडा जाऊं द्या वनांतरी ॥ आपुलिया स्वस्थाना ॥३४॥
मग भोवंडिले पुच्छें करून ॥ दूर दिधले भिकावून ॥
मग ते महावीर उठोन ॥ राघवाकडे पळाले ॥३५॥
रणीं सावध जाहला रघुवीर ॥ तों पळतचि आले वानर ॥
सांगती सर्व समाचार ॥ वाल्मीकाचे आश्रमींचा ॥३६॥
आम्ही मूर्च्छेचे मीस घेऊनि ॥ जाऊन पाहिली जनकनंदिनी ॥
श्यामकर्ण दोघांनी नेऊनि ॥ आश्रमांगणीं पूजिलासे ॥३७॥
तुमचा रथ अलंकार ॥ घेऊन गेले दोघे कुमर ॥
जैसा सुपर्णें जिंकिला श्रीधर ॥ तैसेंच पूर्ण येथे जाहलें ॥३८॥
कीं नंदीनें जिंकिला उमारमण ॥ आपुलेच फळभारेंकरून ॥
वृक्ष जाय कैसा मोडून ॥ तैसेंच येथ जाहलें ॥३९॥
सूर्यापासून जाहले आभाळ ॥ तेणें त्यास आच्छादिलें तत्काळ ॥
ऐसें बोलतां तमालनीळ ॥ उगाच राहिला क्षणभरी ॥१४०॥
तों इकडे वर्तला वृत्तांत ॥ रामासीं झुंजले सुत ॥
उपवनाजवळी बहुत ॥ अपार रण पडियेले ॥४१॥
समाचार ऐकोनि विपरीत ॥ तों पाताळाहून अकस्मात ॥
वाल्मीक मुनि आला धांवत ॥ आश्रमापासीं आपुलिया ॥४२॥
सीतेनें सांगितलें वर्तमान ॥ श्यामकर्ण आणिला धरून ॥
मग वाल्मीक मुनि हांसोन ॥ तेचि क्षणीं ऊठिला ॥४३॥
रणांगणाप्रति येऊन ॥ अद्‌भुत करणी केली पूर्ण ॥
कमंडलूचें उदक शिंपून ॥ दळ अवघें उठविलें ॥४४॥
लक्ष्मण भरत शत्रुघ्न ॥ आदिकरून थोर लहान ॥
निद्रिस्थापरी उठोन ॥ उभे केले तें काळीं ॥४५॥
यावरी वाल्मीकें येऊन ॥ श्रीरामासी दिधलें आलिंगन ॥
म्हणे राघवा तूं सर्वज्ञ ॥ कर्तृत्व पूर्ण तुझेंच हें ॥४६॥
सर्वांचा गर्व झाडावया ॥ लीला तुवां केली रघुराया ॥
येर्‍हवी सीता तुजपासूनियां ॥ दूर कोठें गेली पां ॥४७॥
अनंत ब्रह्मांडांचा कर्ता ॥ तो तूं पुराणपुरुष रघुनाथा ॥
लटकेंच बाहेर आतां ॥ नेणतपण धरिसी तूं ॥४८॥
श्रीराम म्हणे युद्ध करूनी ॥ दोघांस जिंकीन समरंगणी ॥
म्यां आपुली निर्वाण करणी ॥ दाविली नाही तयांते ॥४९॥
हांसोनि बोले वाल्मीक ऋषि ॥ हस्ताचा ढका लागला नेत्रासी ॥
तरी क्रोध करून मानसीं ॥ हस्त काय छेदावा ॥१५०॥
भोजन करितां न कळत ॥ जिव्हेसी रुतला दंत ॥
तरी कोणावरी क्षोभ तेथ ॥ करावा सांग राजेंद्रा ॥५१॥
कनक रुसे कांतीवरी ॥ रत्‍न प्रभा घालूं इच्छी बाहेरी ॥
काष्ठ घेऊन निर्धारी ॥ वृक्ष मारी आपुलीं फळे ॥५२॥
गूळ गोडीवरी रुसला ॥ प्रवाहासी गंगा धरी अबोला ॥
प्रभेवरी दीप कोपला ॥ तैसा मांडिला विचार येथें ॥५३॥
हे जगदात्म्या अयोध्यापति ॥ तुझ्या वीर्याची अगाध गति ॥
आत्मा वै पुत्र नामासि निश्चिती ॥ गर्जती श्रुति राघवा ॥५४॥
वाल्मीकाचे बोल ऐकोन ॥ जाहले राघवाचें समाधान ॥
ते दिवसीं सीतारमण ॥ राहिले तेथें परिवारेंसी ॥५५॥
कुश लहू भेटती रघुनंदना ॥ तो सोहळा पाहावया नयना ॥
सकळ राजयांसहित सेना ॥ त्वरेंकरून धांवती ॥५६॥
शत्रुघ्न सुमंत धांवती ॥ हेममय शिबिरें उभी करिती ॥
अयोध्याजन वेगें येती ॥ महोत्साह पहावया ॥५७॥
वसिष्ठादिक मुनीश्वर ॥ कौतुके पाहूं आले सत्वर ॥
हेमांबर सभेसी रघुवीर ॥ सकळांसहित बैसला ॥५८॥
नित्यनेम सारून रघुवीर ॥ नूतन वस्त्रें दिव्य अलंकार ॥
लेवोनियां श्रीरामचंद्र ॥ सभामंडपीं बैसला ॥५९॥
वाल्मीकें आश्रमाप्रति जाऊन ॥ लहू कुश आणि श्यामकर्ण ॥
राघवापाशीं आणून ॥ उभे केले तेधवां ॥१६०॥
इंद्रादि देवगण पाहती ॥ सर्व नृप सादर विलोकिती ॥
म्हणती केवळ रघुत्तमाच्या मूर्ती ॥ दोघे पुत्र दिसती हे ॥६१॥
श्यामसुंदर आकर्णनयन ॥ विशाळ भाळ सुहास्यवदन ॥
पुत्रांसहित रघुनंदन ॥ समसमान तिन्ही मूर्ती ॥६२॥
गर्जली तेव्हां आकाशवाणी ॥ राघवा तुझें पुत्र पाहे नयनीं ॥
जयजयकार करूनी ॥ मस्तक डोलविती सुरवर ॥६३॥
वस्त्रालंकारमंडित पूर्ण ॥ लहु कुश श्रीरामाजवळी येऊन ॥
हातीं तैसेंचि धनुष्यबाण ॥ घालिती लोटांगण पित्यासी ॥६४॥
जाहाला एकचि जयजयकार ॥ वृंदारक वर्षती सुमनसंभार ॥
रामास प्रार्थती नृपवर ॥ पुत्रांसी क्षेम देइंजे ॥६५॥
मग उठोनियां रघुनंदन ॥ हृदयीं धरिलें निजनंदन ॥
मस्तकीं करूनि अवघ्राण ॥ पुढें घेऊनि बैसला ॥६६॥
सकळवेदशास्त्रप्रवीण ॥ वाल्मीकें केलें दोघेजण ॥
पाठ शतकोटी रामायण ॥ बाळ म्हणोनि दाविती ॥६७॥
त्यावरी आरंभिलें गायन॥ अवतारचरित्रें गहन ॥
तीं ऐकतां रघुनंदन ॥ सप्रेम जाहला ते काळीं ॥६८॥
चवदा विद्या चौसष्टी कळा ॥ बाळांनी अभ्यासिल्या सकळा ॥
जैसा करतळींचा आंवळा ॥ अकळिल्या विद्या तैशाचि ॥६९॥
वाल्मीकास म्हणे रघुनाथ ॥ धन्य धन्य तुझें गुरुत्व ॥
विद्याभ्यास युद्ध अद्‌भुत ॥ बाळकांहातीं करविले ॥१७०॥
वाल्मीक वदे प्रत्त्युत्तर ॥ तुझें वीर्यसामर्थ्य परम तीव्र ॥
माझें गुरुत्व साचार ॥ काय करील नुसतेंचि ॥७१॥
सौमित्र भरत शत्रुघ्न ॥ सुमंत सुग्रीव बिभीषण ॥
हनुमंतादि सकळ सैन्य ॥ सीता आणावया चालिलें ॥७२॥
आश्रमापुढें येऊन ॥ घालिती सारे लोटांगण ॥
वाल्मीकें बहुत प्रार्थोन ॥ सीता आणिली बाहेरी ॥७३॥
सकळही सद्रद होऊन ॥ धरिती जगन्मातेचे चरण ॥
पुढें ठेविलें सुखासन ॥ जानकीसी बैसावया ॥७४॥
सकलऋषिपत्‍न्यांची पूजा करूनी ॥ जानकी बैसली सुखासनीं ॥
समुद्रासी भेटावया मंदाकिनी ॥ वेगेंकरून चालली जैसी ॥७५॥
जवळी देखोनि रघुनाथा ॥ खालीं उतरली जगन्माता ॥
वाल्मीक येऊनी तत्वतां ॥ रघुनाथाप्रति बोलतसे ॥७६॥
पंचभूतें शशी आदित्य ॥ रामा तूं साक्षी आहेस हृदयस्थ ॥
निष्पाप जानकी निश्चित ॥ आदिमध्यावसानीं ॥७७॥
माझी धर्मकन्या जनककुमारी ॥ आजिवरी पाळिली म्यां माहेरी ॥
आतां दिधली तुमचे करी ॥ अर्धांगी बैसवीं इयेतें ॥७८॥
तंव ते वदनी आकाशवाणी ॥ सत्य सती हे जनकनंदिनी ॥
मग श्रीरामें आलिंगोनी ॥ अंकावरी बैसविली ॥७९॥
लागला वाद्यांचा गजर ॥ मग वाल्मीकास प्रार्थीं रघुवीर ॥
घऊनी सकळ ऋषीश्वर ॥ अयोध्येसी तुम्ही चला ॥१८०॥
पूर्ण करावया महायज्ञ ॥ सकळिकां मानलें ते वचन ॥
मग वाल्मीकादि मुनिजन ॥ दिव्य वहनीं बैसविले ॥८१॥
जानकीसहित रघुनंदन ॥ रथीं बैसला चंडकिरण ॥
दोघे दोहींकडे नंदन ॥ विराजमान शोभती ॥८२॥
मस्तकीं विराजती दिव्य छत्रें ॥ मित्रपत्रें अतिविचित्रें ॥
निजभक्त अपार चामरें ॥ रघूत्तमावरी ढाळिती ॥८३॥
मकरबिरुदें पुढें चालती ॥ भाट सूर्यवंश वाखाणिती ॥
परम गजरें रघुपती ॥ अयोध्यामाजी प्रवेशला ॥८४॥
कौसल्या सुमित्रा प्रेमेंकरूनी ॥ सीतेस आलिंगिती तये क्षणीं ॥
लहूकुशांवरूनी ॥ मूद ओंवाळी कौसल्या ॥८५॥
सामुग्री पूर्वींच सिद्ध होती ॥ यज्ञदीक्षा घेऊन रघुपती ॥
पूर्ण केली पूर्णाहुती ॥ यज्ञ समाप्ति पावला ॥८६॥
वस्त्रालंकार दक्षिणा अपार ॥ देऊन बोळविले ऋषीश्वर ॥
वर्णित रघुवीरचरित्र ॥ आपले आश्रमाप्रति गेले ॥८७॥
रायांस दिधली पाठवणी ॥ श्रीरामाची आज्ञा घेऊनी ॥
सीतेचा महिमा वर्णित वदनीं ॥ निजनगरप्रति गेले ॥८८॥
बिभीषण सुग्रीव प्राणसखे ॥ गौरवूनियां रघुनायकें ॥
आपुले स्वस्थळाप्रति सुखें ॥ पाठविले तये काळी ॥८९॥
जानकीकुमरांसमवेत ॥ अयोध्येचें राज्य करी रघुनाथ ॥
ही कथा श्रवण करितां बहुत ॥ अक्षय सुख पाविजे ॥१९०॥
परम संकटहरणी हे कथा ॥ विजयी होय श्रोता वक्ता ॥
पाहतां श्रीरामविजयग्रंथा ॥ सर्व चिंता हरे पैं ॥९१॥
यावरी कथा गोड बहुत ॥ लीला कैसी दावी रघुनाथ ॥
तो शेवटींचा अध्याय यथार्थ ॥ सादर आतां परिसिंजे ॥९२॥
चाळीस अध्याय अवघा ग्रंथ ॥ त्यांत उरला एक गोड बहुत ॥
जैसा मुकुटावरी मणी झळकत ॥ तैसा अध्याय पुढील असे ॥९३॥
ब्रह्मानंदा स्वामी समर्था ॥ श्रीधरवरदा पंढरीनाथा ॥
हा ग्रंथ वाची त्या भक्ता ॥ तूंच रक्षी निजांगें ॥९४॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥
सदा परिसोत भक्त चतुर ॥ एकोनचत्वारिंशत्तमोऽध्याय गोड ॥१९५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥




GO TOP