| 
 
  ॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ 
 ॥ श्रीभावार्थरामायण ॥ 
 उत्तरकांड 
 ॥  अध्याय त्रेपन्नावा ॥  नृगराजाची कथा
 
 ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ 
 
श्रीराम धरणिजाकांत । लक्ष्मणवचनें हर्षयुक्त ।होवोनि स्वानंदे डुल्लत । कथा सांगत अनेका ॥१॥
 श्रीराम म्हणे लक्ष्मणा । तुज गेलें असतां वना ।
 मागें चार दिवस राजकारणा । मन नाहीं प्रवर्तलें ॥२॥
 तरी आतां नगरीचे जन । बोलावी शेटे महाजन ।
 आणि पुरोहित प्रधान । राजकारणालागूनी ॥३॥
 जो देशींचा भूपती । होवोनि न करी राजनीती ।
 तो जाईल अधःपातीं । नृगरायासारिखें होईल ॥४॥
 लक्ष्मण म्हणे श्रीरघुनाथा । नृग हा कोण कां अधःपाता ।
 गेला काय कारण सर्वथा । तें मजप्रति सांगिजे ॥५॥
 नृग कोण देशींचा भूपती । कोणाचा पुत्र रघुपती ।
 काय चुकला म्हणोनि अधःपातीं । कोणे कर्मे जी गेला ॥६॥
 ऐकोनि लक्ष्मणाचें वचन । श्रीराम सच्चिदानंदघन ।
 नृगरायाचें समूळ कथन । सांगता झाला संकळित ॥७॥
 ऐकें सौमित्रा पूर्वील कथन । नृगराय धर्मपरायण  ।
 ब्राह्मणभत्क करी प्रजापाळण । इक्ष्वाकुनंदन तो नृप ॥८॥
 नित्य गायी कोट्यनुकोटी । सवत्स ब्राह्मणां दे जगजेठी ।
 सुवर्णभूषणें शोभती पाठीं । नित्य वाटीं गायींतें ॥९॥
 पुष्करतीर्थींचा ब्राह्मण । अत्यंत दरिद्री अकिंचन ।
 उंच्छवृत्तीनें वेचीं कण । उदरपोषण तेणें करी ॥१०॥
 
एका ब्राह्मणाला मिळालेली गाय राजाच्या गृही गेली; राजाने ती दुसर्या ब्राह्मणाला दान दिली :
 
त्या ब्राह्मणें घेवोनि गोदान । स्वगृहीं नेतां मार्गीं जाण । चुकली धेनु पुनरपि भवन । राजियाचे पैं शिरली ॥११॥
 दुसरे दिवशीं राजियानें । सवेंचि केलीं कोटिगोदानें ।
 त्यांमध्ये धेनु आणिक्या ब्राह्मणें । संकल्पोनि घेतली ॥१२॥
 ब्राह्मणें घेवोनि धेनूसी । नेली आपल्या नगरासी ।
 तंव यरिकडे पुष्करवासी । स्वधेनूसी पाहता झाला ॥१३॥
 म्हणे मज रायानें धेनु दिधली । ते माझ्या प्रारब्धानें नेली ।
 तरी कोणे ठायीं असेल गेली । ती शोधून पाहूं पां ॥१४॥
 उपवासी तो द्विजवर । हिंडता झाला नगरें नगर ।
 उपवासी पीडिला एक संवत्सर । धेनूची शुद्वि न लभेचि ॥१५॥
 अत्यण्त क्लेशी होऊन । कनखलतीर्था आला जाण ।
 तंव ते धेनु विप्रगृहीं देखोन । बोलता झाला द्विजवर ॥१६॥
 
ती गाय मूळ ब्राह्मणाने ओळखून दुस-याजवळ मागितली :  
न्याहाळून पाहे धेनूसी । तंव ते ओळखिली निश्चयेसीं । मग साद करोनि तियेसी । शबळे येई म्हणोनियां ॥१७॥
 ऐकोनि ब्राह्मणाच्या वचनासी । धेनु लागली पाठीसीं ।
 तंव ते कनखलतीर्थवासी । चरित्र पाहत तियेचें ॥१८॥
 विप्राचिया पाठीं लागे । धेनु चालली मागें मागें ।
 तंव तो येरु बोलिला रागें । कोणाची धेनु नेतोसी ॥१९॥
 अगा धेनुचोरा कोठील वासी । माझी गाय चालवोनि नेसी ।
 तुज दंडीन राजसभेसीं । परस्परें कलहासी पेटले ॥२०॥
 परस्परें करिती वाद । परस्परे करिती संवाद ।
 एकमेकांसि वर्मांगशब्द । भेदोनियां बोलती ॥२१॥
 ऐसें भांडत भांडत दोघे जण । नृगरायाचें नगरा आले जाण ।
 अति रमले क्षुधेंकरुन । राजदर्शन नव्हे सहसा ॥२२॥
 
राजाचे दोन चार दिवस दर्शन न झाल्यामुळे ब्राह्मण राजाला शाप देतात :  
दोन चार दिवसपर्यंत । रायाचें दर्शन नव्हे प्राप्त । क्षोभले विप्र शाप देत । झाले नृगभूपतीसी  ॥२३॥
 क्रोधें अत्यंत तप्त होऊन । शाप  देते झाले ब्राह्मण ।
 म्हणती राया तुज कृकळपण । शीघ्रकाळें येईल ॥२४॥
 कार्याची उत्कंठा मोठी । म्हणोनि आलों तुझे भेटी ।
 तूं दर्शन नेदिसी शेवटीं । अवश्य सरड पैं होसी ॥२५॥
 बहुत सहस्त्र वर्षे शत । तू कृकळ होसील निश्चित ।
 विवरामाजीं होसील गुप्त । दुःखफळ भोगिसील ॥२६॥
 ऐकोनि विप्रांचा शाप । राजा झाला अति संतप्त ।
 मग ब्राह्मण बोलावोनि समीप । प्रार्थिता आपण पैं झाला ॥२७॥
 राजा म्हणे ब्राह्मणांसी । धेनूच्या प्रतिनिधी घ्या धेनूसी ।
 ब्राह्मण म्हणती राया परियेसीं । आणिका धेनूंचे कोण काम ॥२८॥
 
नृगराजाला उःशाप :  
मग राजा झाला शरण । स्वामी मज द्यावें उःशापवचन । मग ते ब्राह्मण गतक्रोध होऊन । वचन बोलत पैं झाले ॥२९॥
 यदुकुळीं उत्पन्नभूत । वासुदेवनामें विष्णू साक्षात ।
 जयाचें नाम स्मरतां जाण । महापातकां होतसे ॥३०॥
 लीलाविग्रही श्रीनारयण । अवतरेल यदुकुळीं जाण ।
 जयाची कथा परम पावन । शापापासून सोडवील ॥३१॥
 वासुदेव परमात्मा आपण । राया सोडवील शापापासून ।
 मग ते दोघेही ब्राह्मण । थोर सुख पावले ॥३२॥
 ते धेनु दोघीं जणीं । दिधली आणिका ब्राह्मणालागूनी ।
 पुढें काय वर्तलें चापशरपाणी । सावधान अवधारिजे ॥३३॥
 ऐसा रायासि शाप झाला । राजनीतीसी चुकला ।
 याकरणे लक्ष्मणा वहिला । कार्याकारणा न चुकिजे ॥३४॥
 राजा राजनीति न करी । एवढीं व्यसनें तयाचे शिरीं ।
 वाजवी सौमित्रा निर्धारीं । यदर्थीं संदेह न धरावा ॥३५॥
 एका जनार्दना शरण । पुढें गोड आहे निरुपण ।
 नृगरायाचें कथन । सावधान अवधारा ॥३६॥
 स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
 नृगराजकथनं नाम त्रिपंचाशत्तमोऽध्यायः ॥५३॥ ओंव्या ॥३६॥
 GO TOP 
 
 |