॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय एकूणसत्तरावा ॥
श्रीरामांना जानकी व पुत्रांची भेट

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥


दूषणारिपुत्रीं दोघीं जणी । नर वानर समरांगणीं ।
जीत बांधिलें कित्येक मेदिनीं । गतप्राण होवोनि ठेलें ॥१॥
अश्व गज वना आले । तेही गतप्राण होवोनि ठेले ।
किंचित घायाळ उरले । ते प्रवेशले अयोध्यापुरीं ॥२॥
भद्रासनीं जनकजामात । जैसा नभीं शोभे भास्वत ।
भोंवते ऋषी परम ज्ञानवंत । सुमंतादिक प्रधान ॥३॥
बैसले सभानायक । नगरपंडित पुराणिक ।
चहूं वेदांचे वेदपाठक । ज्योतिषी गायक गंधर्व ॥४॥
ऐसी सभा प्रसन्नवदन । एक करिती गायन ।
एक करिती शास्त्रव्याख्यान । एक जन रंजविती ॥५॥

घायाळ सैनिकांनी त्या कुमारांविषयी श्रीरामांन निवेदन केले :

येरीकडे रणींचे वीर । अशुद्धें डवरिलें जैसे गिरिवर ।
येवोनि श्रीरामासमोर । वृत्तांत सविस्तर सांगते झाले ॥६॥
म्हणती जी स्वामिनाथा । संग्रामाची परिसा कथा ।
शत्रुघ्नलक्ष्मणभरतां । दो कुमरीं बांधोनि नेलें ॥७॥
कपिवीर थोर थोर । तेही बंधन पावले समग्र ।
कित्येक घायीं झाले जर्जर । जिहीं रण सेविलें ॥८॥
वज्रदेही वायुकुमरा । बाणें उडाविलें अंबरा ।
मूर्च्छित पडतांचि फरफरां । पुच्छीं महावीरां ओढित नेलें ॥९॥
उरले कण्हत कुंथत । कित्येक मार्गी झाले प्रेत ।
किंचित उरले ते येथ । भाग्येंकरोनि पावलों ॥१०॥
वयें तरी संख्या रविकळा । रुप तरी मदनपुतळा ।
प्रतापें तरी या ब्रह्मगोळा । पालथें करिती स्वभावें ॥११॥
ऐसें दोघे वीरराणें । नेणों निर्माण केलें कोणें ।
दातारा त्यांचेनि स्मरणें । जीवें प्राणें न उरिजे ॥१२॥
धन्य धन्य त्यांची मातापिता । धन्य धन्य त्यांची प्रौढता ।
धन्य तयांसी विद्यादाता । कोण तत्वतां कळेना ॥१३॥
वय तरी दिसे लहान । करीं शोभती धनुष्यबाण ।
गौर श्याम सुंदर सगुण । श्रीरामजानकींसारिखे ॥१४॥
घायाळमुखींचि ऐकोनि कथा । हर्ष झाला श्रीरामचे चित्ता ।
खुणावोनि सद्‍गुरुसी बोलता । म्हणे सैन्य समर्था मारिले ॥१५॥

श्रीराम स्वतः युद्धाला निघाले :

दाशरथीं म्हणे सद्‍गुरुसी । आट केला जी सैन्यासी ।
आतां चलावें वेगेंसीं । म्हणोनो सभा विसर्जिली ॥१६॥
प्रधानां केला हाकारा । म्हणे पालाणा रथकुंजरां ।
आणि देशोदेशींचे नृपवरां । ऋषीश्वरां सवें घ्यावें ॥१७॥
रथीं आरुढोनि श्रीरघुपती । समीप वसिष्ठ दुसरे रथीं ।
शस्त्रसामग्रीसी नाहीं मिती । वेगें भूपती निघाला ॥१८॥
रथारुढ घनसावळां । दुसरे रथीं जवळा ।
विश्वामित्र तोही भूपाळा । समीप पृथक् रथीं बैसे ॥१९॥
आधींच राम घनसावळां । कोटिलावण्याचा पुतळा ।
कांसे पीतांबर पिंवळा । कौस्तुभमाळा वैजयंती ॥२०॥
अंगीं अहिप्रियांची उटी । तिलक मृगनाभींचा ललटीं ।
कर्णी कुंडले अतिगोमटीं । रवी कोटी प्रकाशले ॥२१॥
शुद्ध राजीवलोचन । मुकुटीं शोभती रत्नकिरण ।
हिरे माणिकें तेजें पूर्ण । ठायीं ठायीं शोभती ॥२२॥
ऐसा रथीं कौसल्यानंदन । करी घेतलें धनुष्यबाण ।
मस्तकीं छत्र नीळवर्ण । कनकदंडें ढाळिती ॥२३॥
पुढें तरी वेत्रपाणी । मदगज पुढारले आभारणीं ।
सैन्य निघालें कोदंडपाणी । तयामध्ये शोभत ॥२४॥
रथ चालिले घडघडाट । नादें तडडिलें अवनीचें पोट ।
गिरी पर्वत होती एकवट । ऐसें नगराबाहेर आले ॥२५॥

श्रीरामांना शुभशकुन :

शकुन झाले ते अवसरीं । बळकें घेवोनि कडेवरी ।
वनिता येत्या मानालंकारीं । पुढे देखिल्या ॥२६॥
कागपक्षी दक्षिणे गेले । नकुळ भरद्वाजीं डावलिलें ।
तास वामभागीं गेलें । उजवे झाले मृगगण ॥२७॥
अपसव्य गेल्या कुरंगिणी । दोघे गुरु संतोषलें मनीं ।
म्हणती स्तोत्रमंत्रध्वनीं । शब्द गगनीं न समाती ॥२८॥
कनकमृगारी म्हणे स्वमी । नेत्र लवती उल्हासें दोनी ।
दक्षिण बहु स्फुरत मनीं । आनंद थोर होतसे ॥२९॥
तरी कवण लाभ होईल । कोण सखा भेटेल ।
की युद्धीं जय होईल । हें मजप्रति सांगावे ॥३०॥
तंव सद्‍गुरु म्हणे अवनिजापती । महिमा न कळे श्रुति नेति नेति म्हणती ।
तो तूं सर्वात्मा मंगळमूर्तीं । आनंद चित्तीं अखंड तुझ्या ॥३१॥
ऐसें पथीं चालत । मार्ग क्रमोनियां त्वरित ।
आश्रम पावले वाल्मीक जेथ । तया स्थळासि पावले ॥३२॥

लवकुशांची प्रतिज्ञा व गुरुंचा आशीर्वाद :

येरीकडे कथानुसंधान । लहु कुश दोघे जण ।
मातेप्रति प्रतापवन । काय बोलते पैं झालें ॥३३॥
मातेसी म्हणती दोघे कुमर । युद्धा आला श्रीरघुवीर ।
सैन्य सज्जोनि अपार । बंधु सोडविण्याकारणें ॥३४॥
आतां यासीं युद्ध करुं । श्रीरामातें जीत धरुं ।
वरकड सैन्य जीवें मारुं । हाचि आमुचा निश्चय ॥३५॥
ऐसी प्रतिज्ञा करुन । शृंगारिले दोघे जण ।
करीं घेवोनि धनुष्य बाण । जानकीस प्रदक्षिण पैं केलें ॥३६॥
वंदोनियां श्रीगुरुसी । आज्ञा पुसोनी मातेसी ।
वाल्मीक म्हणे तयांसी । निर्वाण येथें करावें ॥३७॥
शंभु म्हणे दाक्षायणीसी । अपूर्व कथा परियेसीं ।
जें वर्तलें नाहीं सृष्टीसी । देखिलें ना ऐकिलें ॥३८॥
युद्ध पित्यापुत्रांसी जाण । सूर्यवंशीं होईल दारुण ।
तें पाहूं चला हो विंदान । वाल्मीकाचे आश्रमीं ॥३९॥
पुढें श्रीरामा पुत्रां होईल भेटी । ऐसी हे कथा सुरस मोठी ।
तव पार्वती म्हणे जी धूर्जटी । कोणे समयीं स्वामिया ॥४०॥
श्रीराम कोण कैंचा पुत्र । कोण वंश कोण गोत्र ।
तुम्ही जपतसां जो श्रीराममंत्र । तोचि कीं काय स्वामिया ॥४१॥
त्रिपुरारी म्हणे तोचि जाण । जयाचें आम्हीं अखंड ध्यान ।
तोचि श्रीराम ब्रह्म पूर्ण । कार्याकारणें अवतरला ॥४२॥
याहूनि सार दुसरें । नाहीं म्हणोनि म्यां धरिलें हरें ।
तंव गिरिजा म्हणे दातारें । पुढें कथा सांगावी ॥४३॥
पार्वती म्हणे महादेवो । चला विमानीं बैसों पाहों ।
मग तो योगियांचा रावो । चरित्र पाहूं तेथें आला ॥४४॥
श्रीरामा पुत्रां कैसी भेटी । पुत्रांसहित सीता गोरटी ।
श्रीरामीं ऐक्य ते कथाकसवटी । मजप्रती सांगावी ॥४५॥
तंव येरीकडे लहुकुश चालिले । सिंहनादें गर्जिन्नलें ।
शरकार्मुक टणत्कारिलें । तंव दोघे देखिले श्रीरामें ॥४६॥
अवलोकोनि दोघां जणां । विस्मित झाला रामराणा ।
कैसे धरिलें इतुकिया सैन्या । हे तरी दोघे बाळक ॥४७॥
सुंदर अति राजसे । याचें बाण रुतले कैसे ।
बंधु धरिले ते सरसे । हें आश्चर्य वाटतसे ॥४८॥
यांसी युद्ध आपण करणें । तें होय लौकिकीं लाजिरवाणें ।
युद्धीं आपण विमुख होणें । तरी सुटका नव्हे बंधूंसीं ॥४९॥
मग रथ प्रेरिला सामोरा । वेगळें केलें येरां वीरां ।
कोप आला श्रीरामचंद्रा । भेणें वसुंधरा थरारिली ॥५०॥
वरोनि सुधापानी पाहती । एकमेकां परस्परें बोलती ।
कोपलिया अवनिजापती । कैसे वांचती दोघे कुमर ॥५१॥
तंव गुरु बृहस्पती बोलत । दोघां भय नाहीं निभ्रांत ।
राया राघवाचे सुत । अति महाबळियाढे ॥५२॥
घटश्रोत्रारीनें धनुष्य वाहिलें । म्हणे सावध व्हा रे वहिले ।
तुम्हीं पुरुषार्थ थोर दाखविले । ते आतां कळले रणरंगीं ॥५३॥
कपटी वाल्मीक ऋषीश्वर । येणेंचि महा चालविलें वैर ।
येरवीं कैचें कोठील वीर । यांसी कोण गणिताहे ॥५४॥
सहोदर माझे धरोनि जाण । आणि वानरां केलें बंधन ।
यासी मूळ वाल्मीक ब्राह्मण । आतां लुटीन आश्रम याचा ॥५५॥
वाल्मीकीनें हे संग्रहिले । शस्त्रास्त्रविद्ये निपुण केले ।
चेष्टवोनि बंधू धरविले । या बाळकांकरोनी ॥५६॥
आतां बंधूंचे उसणें घेईन । तुम्हां दोघां धरुन नेईन ।
ऋषिआश्रम भंगीन । अवघे करीन निष्कंटक ॥५७॥
चापशरपाणीचें ऐकोनि वचन । कुश बोलता झाला जाण ।
तुमचा प्रताप दारुण । आम्हां श्रुत झालासे ॥५८॥
तो ऐकावा रघुराजें । घरच्या सांडोनियां भाजे ।
लोकीं यश मिरविजे । हेंचि आश्चर्य वाटतें ॥५९॥
बापुडी ताटका मारिली । रावणभगिनी विटंबिली ।
ऐसी तुमची कीर्ति ऐकिली । जगामध्यें प्रसिद्ध ॥६०॥
ऐसें तुम्हीं वडील दारुण । आम्हां दिसतसां पित्यासमान ।
यालागीं राखितों महिमान । आतां वाल्मीका शरण तुम्हीं यावें ॥६१॥
सद्‍गुरुसी न रिघतां शरण । कदा न तुटें देहबंधन ।
तया नरा अधःपतन । पापिया पूर्ण तो सृष्टीं ॥६२॥
माझा सद्‍गुरु प्रसिद्ध । जो कां विबुधादिकां वंद्य ।
तयाचा प्राप्त प्रसाद । त्याचेनि युद्ध करितो आम्ही ॥६३॥
मग बोलिला दूषणारी । आतां माझा यावा सांवरीं ।
नाहींतरी पळसी ऋषींभीतरीं । सांडोनियां धनुष्यबाण ॥६४॥

श्रीराम-कुश अस्त्र युद्ध :

ऐसें बोले श्रीरघुपती । धनुष्य चढवोनियां सीतीं ।
बाण सोडिले अमित क्षितीं । शर शरांतें प्रसवले ॥६५॥
बाणमय झालें भूमंडळ । अष्ट दिशा कुळाचळ ।
आणि जेवढा ब्रह्मांडगोळ । बाणें जळस्थळ कोंदलें ॥६६॥
ऐसें अद्‍भूत येतां बाण । वरचेवरी तोडिले कुशें जाण ।
उदय होतां रविकिरण । उडुगण लोपती आपसया ॥६७॥
बाण तोडिले देखोनि श्रीरामें । विष्णुशस्त्रा घेतलें नेमें ।
जपोनियां बीजें उत्तमें । कुशावरी मोकलिलें ॥६८॥
पृथ्वी झाली विष्णुमय । विष्णुमय झालें भुवनत्रय ।
शंख गदा चक्र अभय । चतुर्भुज प्रगटलें ॥६९॥
विष्णुमय देखोनि अवनी । कुशवीरें तये क्षणीं ।
लक्ष्मी‍अस्त्र लाविलें गुणीं । रमामय मेदिनीं पैं केली ॥७०॥
कमलामय अवघी सृष्टी । कमलामय नभाचें पोटीं ।
कमलामय पर्वतांच्या पृष्ठीं । कनकताटीं आरतिया ॥७१॥
त्या ओवांळिती विष्णूसी । शंभूसि पार्वती जैसी ।
कीं शची ओंवाळी वृत्रारीसी । ऐसें तेथें वर्तलें ॥७२॥
ओंवाळोनियां विष्णूसी । रमेसहित वैकुंठासी ।
गेले विष्णू देखोनि रामासी । अति आश्चर्य वाटलें ॥७३॥
मग बोले श्रीरामराणा । धन्य धन्य तुझा पुरुषार्थपणा ।
जेणें विद्या शिकवली तोही धन्य । यो भूगोळामाझारीं ॥७४॥
श्रीराम म्हणे कुशासी । मज निवविलें करोनि युद्धासी ।
नमस्कार तुझिया गुरुसी । तूं ब्रह्मबीज नव्हेसी निर्धारें ॥७५॥
कोण तुझा जनक जननी । हें मज सांगें त्वरेंकरोनी ।
तूं क्षत्रियाचा निश्चयोनी । मज मानसीं गमताहे ॥७६॥
तंव कुश बोले तये वेळीं । आम्ही काय जाणों कुळवल्ली ।
आणि सांगों नये काळीं । युद्धामाजी विचरतां ॥७७॥
जातिकुळी काय चाड तुम्हां । युद्ध करावें जी श्रीरामा ।
आतां पहा आमच्या पराक्रमा । आणि विद्या वाल्मीकाची ॥७८॥
तुमचा पराक्रम अति प्रसिद्ध । ठकोनि वाळीचा केला वध ।
सुग्रीवा देवोनि राजपद । अपकीर्तीतें जोडिलें ॥७९॥
सिद्धी नेला गुरुचा याग । तुमचा सहोदर निसुग ।
क्षणें क्षत्रीं क्षणें जोग । क्षणें तापसी जटाधारी ॥८०॥
तुमचा होता भरंवसा । त्या वीरीं धरिल होती आशा ।
युद्ध करितां झाली निराशा । श्रीराम सोडवी ना म्हणोनी ॥८१॥
आम्ही म्हणतो क्षत्री श्रीराम । तंव हा फिटला अवघा भ्रम ।
मागील यशाचा वीरधर्म । याचपरी कळला जी ॥८२॥
ऐसें कुश बोलतां । हासें आलें श्रीरघुनाथा ।
निका क्षत्री होसील आतां । तरी हा बाण सांभाळीं ॥८३॥
वीजाक्षर जपोनि राजीवनयनें । व्याघ्रास्त्र सोडिलें कोपें दारुणें ।
येरें सिंहास्त्र सोडोनि तत्क्षणें । व्याघ्रास्त्र अवघें निवारिलें ॥८४॥
सवेंचि क्कोपोनि श्रीरघुपती । शर सोडिले नेणों किती ।
कुशा आलिंगोनि रघुनाथभाती । प्रवेशती ते काळीं ॥८५ ॥
कुशाचे करींचे सुटती बाण । श्रीरामासी करिती नमन ।
सवेंचि येती परतोन । कुशाचे भातीं रिघती ॥८६॥
शर सोडी रामचंद्र । तयांचे कुशास अलंकार ।
पुत्राचे शर श्रीरघुवीर । ओंवाळीन नमस्कारिती ॥८७॥

युद्ध थांबविण्याचा ऋषींचा रामांना आदेश :

ऐसें देखोनि सकळ ऋषी । आश्चर्य करिती मानसीं ।
ते समयीं विश्वामित्र रायसी । बोलता झाला कांहींएक ॥८८॥
ऋषि म्हणे श्रीरघुनाथा । संग्राम नको करुं आतां ।
येरु म्हणे जी ताता । बंधू कैसेनि सुटतील ॥८९॥
बंधु आणि अश्व वानर । त्यांचें सुटकेचा कोण प्रकार ।
तंव वसिष्ठ ऋषीश्वर । हास्यवदनें बोलला ॥९०॥
वसिष्ठ म्हणे वाल्मीकासी । बोलवोनि आणा या ठायासी ।
तो सांगेल निश्चयेंसीं । त्या कार्यासी करावें ॥९१॥
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । श्रीरामें ठेविलें धनुष्यबाण ।
वाल्मीक ऋषि पाचारुन । सभास्थानीं बैसविला ॥९२॥

वाल्मीकींचें आगमन आणि सर्वांची मुक्तता :

वाल्मीकें खुणाविलें कुमरा । सोडविलें भरत शत्रुघ्नादि वीरां ।
अश्व सोडोनियां वनचरां । समस्तांतें मुक्त केलें ॥९३॥
वाल्मीक ऋषि म्हणे श्रीरामासी । हे तुह्जें दोघे पुत्र परियेसी ।
येरु म्हणे ठाव नाहीं भार्येसी । पुत्र कोणाचे ॥९४॥
आधीं असलिया स्त्रीरत्न । तंव देखावें पुत्रनिधान ।
ते समयीं ब्रह्मनंदन । नारद जाण तेथे आला ॥९५॥
हांसोनिया नारद मुनी । लटिकें वैराग्य चापशरपाणी ।
म्हणे श्रीरामालागूनी । आम्हां मूढांसी दाविसी ॥९६॥
तंव कुंभोद्भव म्हणे श्रीरामा । पुराणपुरुषा मेघश्यामा ।
पुत्र तुझें हे पुरुषोत्तमा । हें सौमित्रा पुसावें ॥९७॥
राजीवनेत्रें सौ‍मित्रातें । पुसों आदरिलें भावार्थे ।
तंव येरु गहिंवरोनि चित्तें । सद्‍गदकंठ दाटला ॥९८॥
सौ‍मित्र होवोनि सावधान । बोलता झाला पूर्वकथन ।
स्वामीनें आज्ञा देवोन । सीता वना पाठविली ॥९९॥
ते नेवोनियां वनवासीं । सोडितां जानकी मजसीं ।
बोलिली गर्भिणी तीनमासी । सौ‍मित्रा तुम्हीं जाणावें ॥१००॥
अवनिजेचें ऐकोनि वचन । मग राखिलें तिचे प्राण ।
हृदयीं थोर दुःख पावोन । स्वामिचरणाजवळी आलों ॥१॥
या‍उपरी वाल्मीकें बोललें । माझे शिष्य वनफळां गेले ।
तिहीं सीतेसी देखिलें । आक्रंदता वनवासीं ॥२॥
तदुपरी आश्रमा आणिली । आम्ही जानकी ओळखिली ।
सवेंचि मजसीं बोलिली । म्हणे मुनि मी गर्भवती ॥३॥
माझे आश्रमीं पूर्ण दिवस । क्रमोनि भरले नवमास ।
प्रसूतिकाळीं लहु कुश । पुत्र दोघे जन्मले ॥४॥
पुत्र झाले सुलक्षण । दिवसेंदिवस थोर होवोन ।
धनुर्विद्या अभ्यासून । सीतेसहित होते येथें ॥५॥

वाल्मीकींनी श्रीरामांची लव-कुश,सीतेची भेट करवून दिली :

सीतेसहित पुत्र निपुण केले । आतां सांभाळिजे आपुले ।
म्हणोनि दोघां भेटविलें । श्रीरामासी ते समयीं ॥६॥
श्रीराघवें दिधलें आलिंगन । सजळ दोनी झाले नयन ।
क्षण एक तटस्थ होवोन । मग मांडिये बैसविलें ॥७॥
आनंद झाला श्रीरामासी । देखोनियां लहुकुशांसी ।
पुनरपि चंबन देवोनि त्यांसी । करें कुरवाळी मस्तक ॥८॥
भरत शत्रुघ्न लक्ष्मण । आणि सकल वानरसैन्य ।
लंकाधिपती बिभीषण । समस्त तयांसि भेटविले ॥९॥
हनुमंत सुग्रीव जांबवंत । आनंदें लहुकुश भेटत ।
आणि ऋषी वसिष्ठासि महंत । तयां नमस्कार केला पुत्रीं ॥११०॥
नारद म्हणें वाल्मीकासी । वेगीं आणवीं जानकीसी ।
मोतियांचा चौक वसिष्ठ ऋषी । घालिता झाला ते वेळीं ॥११॥
आणविली जनकबाळा । आसवें आलीं तिच्या डोळां ।
येरी लागली चरणकमळा । वसिष्ठादि ऋषींचें ॥१२॥
मग नमस्कारोनि श्रीरघुपती । वामांगीं बैसली सीता सती ।
ऋषी जयजयकारें गर्जती । विजयी रघुपती तिहीं लोकीं ॥१३॥
जैसा कैलासीं त्रिपुरारी । अर्धांगीं घेवोनियां बैसे गौरी ।
गणेश आणि तारकारी । दक्षिणांगीं शोभत ॥१४॥
ऐसा झाला महोत्सव । भार्यापुत्रांसहित देवाधिदेव ।
विजयी झाला ऋषिसमुदाव । जयजयकारें गर्जिन्नलें ॥१५॥
देव करिताती स्तुती । नानापरींची वाद्यें वाजती ।
विमानी होत्या सुरांच्या पंक्ती । पुष्पवर्षाव तिहीं केला ॥१६॥
मग लक्ष्मणभरतशत्रुघ्नांसी । गहिंवर न धरवे मानसीं ।
सत्वर उठोनि जानकीसी । साष्टांगेंसीं नमस्कारिलें ॥१७॥
मग पाहोनियां सुमुहूर्त । रथ पालाणिले त्वरित ।
रथीं बैसोनि ऋषी समस्त । अयोध्यापंथें निघाले ॥१८॥
समस्त परिवारेंसीं जाण । रथीं आरुढलें श्रीराम जाण ।
एके दिवशीं अयोध्याभवन । निजसैन्येसीं प्रवेशले ॥१९॥
भवनीं प्रवेशली सीता । कौसल्यादिकरोनि समस्ता ।
जानकीस आलिंगन झाल्या देत्या । म्हणती कष्टली सीता वनवासीं ॥१२०॥
कौसल्या आरती घेवोनि करीं । तिघां जणातें लोण उतरी ।
हर्ष न समाये अंबरीं । लहुकुशातें देखोनी ॥२१॥
येरीकडे श्रीरामराणा । आज्ञा देवोनि समस्त जनां ।
पाठविले निजस्थानां । ऋषी राजे सकळिक ॥२२॥
आज्ञा देवोनि कपिगणांतें । पाठविले निजस्थानांतें ।
बिभीषणें नमस्कारोनि राघवातें । निजनगरातें निघाला ॥२३॥
बंधुभार्यापुत्रांसहित । अयोध्येसी श्रीरघुनाथ ।
राज्य करितां सुखें स्वस्थ । पुढील चरित्र अवधारा ॥२४॥
एका जनार्दना शरण । पुढील कथा अति पावन ।
जिचें करितां स्मरण । भवबंधन स्वप्नीं नाहीं ॥१२५॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
श्रीरामजानकीपुत्रदर्शनं नाम एकोनसप्ततितमोऽध्यायः ॥६९॥ ओंव्या ॥१२५॥

GO TOP