|
| हनुमता चैत्यप्रासादस्य विध्वंसस्तद् रक्षकाणां वधश्च - 
 | हनुमन्ताकडून चैत्यप्रासादाचा विध्वंस आणि त्याच्या रक्षकांचा वध - | 
| ततः स किङ्करान् हत्वा हनुमान् ध्यानमास्थितः । वनं भग्नं मया चैत्यप्रासादो न विनाशितः ॥ १ ॥
 
 | त्यानन्तर किंकर नामक राक्षसांचा वध केल्यावर हनुमान स्वतःशीच विचार करू लागले की मी वनाचा तर विध्वंस केला आहे, परन्तु राक्षसांच्या कुलदेवतेचे देवालय असणार्या या चैत्य प्रासादाला मी नष्ट केलेले नाही. ॥१॥ | 
| तस्मात् प्रासादमद्यैवमिमं विध्वंसयाम्यहम् । इति सञ्चिन्त्य हनुमान् मनसादर्शयन् बलम् ॥ २ ॥
 
 चैत्यप्रासादमाप्लुत्य मेरुशृङ्गमिवोन्नतम् ।
 आरुरोह हरिश्रेष्ठो हनुमान् मारुतात्मजः ॥ ३ ॥
 
 | म्हणून आज मी त्या चैत्यप्रासादाचाही विध्वंस करून टाकतो. या प्रमाणे मनातल्या मनात विचार करून पवनपुत्र वानरश्रेष्ठ हनुमान आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन करीत मेरूपर्वताच्या शिखराप्रमाणे उंच अशा त्या चैत्य प्रासादावर उडी मारून चढले. ॥२-३॥ | 
| आरुह्य गिरिसङ्काशं प्रासादं हरियूथपः । बभौ स सुमहातेजाः प्रतिसूर्य इवोदितः ॥ ४ ॥
 
 | त्या पर्वताकार उंच प्रासादावर चढलेले ते महातेजस्वी वानरयूथपति हनुमान नुकत्याच उदय पावलेल्या प्रतिसूर्याप्रमाणे शोभू लागले. (यावरून सूर्योदय झाल्याचे सूचित केले आहे) ॥४॥ | 
| संप्रधृष्य तु दुर्धर्षचैत्यप्रासादमुन्नतम् । हनुमान् प्रज्वलंल्लक्ष्म्या पारियात्रोपमोऽभवत् ॥ ५ ॥
 
 | त्या उंच प्रासादावर आक्रमण केल्यावर दुर्धर्षवीर हनुमान आपल्या सहज शोभेने, कान्तीने झळकत असता परियात्र पर्वताप्रमाणे भासू लागले. ॥५॥ | 
| स भूत्वा सुमहाकायः प्रभावान् मारुतात्मजः । धृष्टमास्फोटयामास लङ्कां शब्देन पूरयन् ॥ ६ ॥
 
 | परियात्र पर्वताप्रमाणे विशाल देह धारण केल्यानन्तर त्या तेजस्वी पवनपुत्र हनुमन्तानी ध्वनीने लंकेला दणाणून टाकीत निर्भयपणे दंड ठोकले आणि त्या प्रासादाची मोडतोड करण्यास आरंभ केला. ॥६॥ | 
| तस्यास्फोटितशब्देन महता श्रोत्रघातिना । पेतुर्विहङ्गमास्तत्र चैत्यपालाश्च मोहिताः ॥ ७ ॥
 
 | कानठळ्या बसविणार्या अशा त्या त्यांच्या दंड ठोकण्याच्या प्रचंड ध्वनीने पक्षी खाली पडले आणि प्रासाद रक्षकांना मूर्च्छा आली. ॥७॥ | 
| अस्त्रविज्जयतां रामो लक्ष्मणश्च महाबलः । राजा जयति सुग्रीवो राघवेणाभिपालितः ॥ ८ ॥
 
 दासोऽहं कोसलेन्द्रस्य रामस्याक्लिष्टकर्मणः ।
 हनुमाञ्शत्रुसैन्यानां निहन्ता मारुतात्मजः ॥ ९ ॥
 
 न रावणसहस्रं मे युद्धे प्रतिबलं भवेत् ।
 शिलाभिश्च प्रहरतः पादपैश्च सहस्रशः ॥ १० ॥
 
 धर्शयित्वा पुरीं लङ्कामभिवाद्य च मैथिलीम् ।
 समृद्धार्थो गमिष्यामि मिषतां सर्वरक्षसाम् ॥ ११ ॥
 
 | त्यावेळी हनुमन्तानी पुन्हा अशी घोषणा केली - अस्त्रवेत्ता भगवान श्रीराम आणि महाबली लक्ष्मणांचा विजय असो. श्रीराघवाकडून संरक्षण मिळालेल्या राजा सुग्रीवाचाही विजय असो. मी कोसलदेशाधिपती महापराक्रमी श्रीरामांचा दास वायुपुत्र हनुमान आहे आणि मी शत्रू सैन्याचा नाश करणारा आहे. हजारो शिलांनी आणि वृक्षांनी मी युद्धामध्ये प्रहार करू लागलो असता सहस्त्र रावणही माझ्या समोर टिकून राहण्यास समर्थ होणार नाहीत. आता मी सर्व राक्षसांच्या समक्ष लङ्कानगरीचा विध्वंस करून आणि मैथिलीला अभिवादन करून, कार्य सिद्धिस गेल्यावर येथून परत निघून जाईन. ॥८-११॥ | 
| एवमुक्त्वा महाकायः चैत्यस्थो हरियूथपः । ननाद भीमनिर्ह्रादो रक्षसां जनयन् भयम् ॥। १२ ॥
 
 | असे म्हणून चैत्यप्रासादावर उभे असलेले ते विशालदेही वानरयूथपति हनुमान राक्षसांच्या मनात भय उत्पन्न करण्याकरितां भयानक आवाजात गर्जना करू लागले. ॥१२॥ | 
| तेन नादेन महता चैत्यपालाः शतं ययुः । गृहीत्वा विविधानस्त्रान् प्रासान् खड्गान् परश्वधान् ॥ १३ ॥
 
 | तो प्रचंड ध्वनि ऐकून नाना प्रकारची अस्त्रे घेऊन शेकडो प्रासाद रक्षक प्रास, खङ्ग आणि परशु आदि घेऊन तेथे आले. ॥१३॥ | 
| विसृजन्तो महाकाया मारुतिं पर्यवारयन् । ते गदाभिर्विचित्राभिः परिघैः काञ्चनाङ्गदैः ॥ १४ ॥
 
 आजग्मुर्वानरश्रेष्ठं बाणैश्चादित्यसन्निभैः ।
 
 | आणि त्या विशाल देह असलेल्या राक्षसांनी त्या सर्व अस्त्रांचा प्रहार करीत तेथे पवनपुत्र हनुमानास घेरले. सुवर्णाच्या पट्ट्यांनी जखडून टाकलेले परीघ विचित्र गदा आणि सूर्यासारखे तेजस्वी बाण हातात घेऊन ते राक्षस वानरश्रेष्ठ हनुमानावर चढाई करून आले. ॥१४ १/२॥ | 
| आवर्त इव गङ्गायास्तोयस्य विपुलो महान् ॥ १५ ॥ 
 परिक्षिप्य हरिश्रेष्ठं स बभौ रक्षसां गणः ।
 
 | वानरश्रेष्ठ हनुमन्ताला चारी बाजूनी वेढून उभा असलेला तो राक्षसांचा महान समुदाय गंगेच्या जळामधील मोठ मोठ्या अगाध भोवर्यांप्रमाणे दिसू लागला. ॥१५ १/२॥ | 
| ततो वातात्मजः क्रुद्धो भीमरूपं समास्थितः ॥ १६ ॥ 
 प्रासादस्य महांस्तस्य स्तम्भं हेमपरिष्कृतम् ।
 उत्पाटयित्वा वेगेन हनुमान् मारुतात्मजः ॥ १७ ॥
 
 ततस्तं भ्रामयामास शताधारं महाबलः ।
 तत्र चाग्निः समभवत् प्रासादश्चाप्यदह्यत ॥ १८ ॥
 
 | तेव्हा राक्षसांना याप्रकारे आक्रमण करतांना पाहून पवनपुत्र हनुमन्तानी कुपित होऊन अत्यन्त भयंकर रूप धारण केले. त्या महावीराने त्या प्रासादाच्या एका सुवर्णजडित खांबास जोराने उपटून, शंभर आर्यांनी युक्त असा तो खांब जोरजोराने आणि वेगाने गरगर फिरविण्यास सुरूवात केली. फिरवता फिरवता दुसर्या खांबाशी घर्षण होऊ लागल्यामुळे तेथे अग्नि उत्पन्न झाला आणि त्यामुळे तो प्रासाद जळू लागला. ॥१६-१८॥ | 
| दह्यमानं ततो दृष्ट्वा प्रासादं हरियूथपः । स राक्षसशतं हत्वा वज्रेणेन्द्र इवासुरान् ॥ १९ ॥
 
 अन्तरिक्षस्थितः श्रीमानिदं वचनमब्रवीत् ।
 
 | प्रासाद जळू लागल्याचे पाहून वानरयूथपति हनुमन्तानी वज्राने असुरांचा संहार करणार्या इन्द्राप्रमाणे त्या खांबानेच शेकडो राक्षसांना मारून टाकले आणि आकाशात स्थित होऊन ते तेजस्वी वीर याप्रमाणे बोलले- ॥१९ १/२॥ | 
| मादृशानां सहस्राणि विसृष्टानि महात्मनाम् ॥ २० ॥ 
 बलिनां वानरेन्द्राणां सुग्रीववशवर्तिनाम् ।
 
 | राक्षसांनो ! सुग्रीवाच्या आज्ञेत वागणारे माझ्यासारखे असे हजारो विशालकाय बलवान वानरश्रेष्ठ सर्व बाजूस धाडले गेले आहेत. ॥२० १/२॥ | 
| अटन्ति वसुधां कृत्स्नां वयमन्ये च वानराः ॥ २१ ॥ 
 दशनागबलाः केचित् केचिद् दशगुणोत्तराः ।
 केचिन्नागसहस्रस्य बभूवुस्तुल्यविक्रमाः ॥ २२ ॥
 
 | आम्ही आणि इतरही वानर मिळून सर्व पृथ्वी हिंडत आहोत. आम्हापैकी काहीना दहा हत्तींचे बळ आहे. काही त्यांच्यापेक्षाही बलाढ्य आहेत, त्याच्यान्त शंभर हत्तींचे बळ आहे. तर कित्येक वानर असे आहेत की ते हजारो हत्तींप्रमाणे बल आणि पराक्रमाने संपन्न आहेत. ॥२१-२२॥ | 
| सन्ति चौघबलाः केचित् सन्ति वायुबलोपमाः । अप्रमेयबलाः केचित् तत्रासन् हरियूथपाः ॥ २३ ॥
 
 | कांहीचे बळ जलाच्या प्रवाहासारखे असह्य आहे. कित्येक तर वायुच्या समान बलवान आहेत आणि कित्येक वानर यूथपति आपल्या ठिकाणी असीम बळ धारण करणारे आहेत. ॥२३॥ | 
| ईदृग्विधैस्तु हरिभिर्वृतो दन्तनखायुधैः । शतैः शतसहस्रैश्च कोटीभिश्चायुतैरपि ॥ २४ ॥
 
 आगमिष्यति सुग्रीवः सर्वेषां वो निषूदनः ।
 
 | दात आणि नखे हीच ज्यांची आयुधे आहेत असे अनन्त बलशाली शेकडो, हजारो, लाखो, करोडो वानर बरोबर घेऊन वानरराज सुग्रीव येथे येईल. ते सर्व तुम्हां सर्व निशाचरांचा संहार करण्यास समर्थ आहेत. ॥२४ १/२॥ | 
| नेयमस्ति पुरी लङ्का न यूयं न च रावणः । यस्य त्विक्ष्वाकुवीरेण बद्धं वैरं महात्मना ॥ २५ ॥
 
 | आता तर ही लङ्कापुरी राहाणार नाही, तुम्हीही राहाणार नाही आणि ज्याने इक्ष्वाकुवंशीय वीर महात्मा श्रीरामांशी वैर बान्धले आहे, तो रावणही राहू शकणार नाही. ॥२५॥ | 
| इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे त्रिचत्वारिंशः सर्गः ॥ ४३ ॥ 
 | याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा त्रेचाळिसावा सर्ग पूर्ण झाला. ॥ ४३ ॥ | 
|