॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ 
   
॥ श्रीभावार्थरामायण ॥ 
  
उत्तरकांड 
  
॥  अध्याय तेविसावा ॥   
वाली- रावणाचे सख्य 
  
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥  
रणी धरोनि रावण । सहस्त्रार्जुनें केलें बंधन । 
तेथें पुलस्ति मुनि येऊन । मागोनि दशानन सोडविला ॥१॥  
पुलस्ति गेला स्वर्गासी । मागें रावण विचरे अवनीसीं ।  
जे जे राजे जे जे देशीं । त्या त्या स्थाळासी आपण जाये ॥२॥ 
तयांते जिंती रावण । राक्षस अथवा राजे जाण ।  
अथवा देव सिद्ध चारण । अधिक बळ ऐकोन संग्राम करी ॥३॥ 
रावणाचे किष्किंधेला आगमन :  
तदनंतरे लंकानाथ । हिंडत असतां प्रधानांसमवेत ।  
तंव पुढें किष्किंधेचा प्रांत । देखोनि त्वरित तेथे आला ॥४॥ 
तें किष्किंधा नगरी कैसी । दुसरी अमरावती ऐसी ।  
पुरंदरात्मज पाळी जियेसी । वर्णना तिसी न करवे ॥५॥ 
भोंवती नाना परीची वनें । सरोवरें भरलीं शीतळ जीवनें । 
देखोनि मार्गस्थांचीं मनें । थोर विश्रांति पावती ॥६॥ 
पंपासरोवराचे तीरीं । ब्रह्मयानें वसवली नगरी ।  
इंद्रादिकां अटक भारी । तेथें राज्य करी शक्रसुत ॥७॥ 
देवां वाळी दैत्यां वाळीं । सिद्ध चारण कांपती चळीं ।  
इंद्रवरदमाळा जवळी । बळें वाळी अजिंक्य देवां ॥८॥ 
ऐसा वाळीच्या पुरासी । रावण आला दशशिसी ।  
नगरद्वारीं प्रवेशता प्रधानासी । वाळीचिया देखिलें ॥९॥  
रावणाचे वालीला आव्हान :  
रावण म्हणे गा मंत्रिया तारा । जाणवीं आपुलिये वानरेश्वरा ।  
युद्धकारणें दशशिरा । येथें येणें पैं झालें ॥१०॥  
जरी सामर्थ्य असेल तुम्हांसी । तरी युद्ध करावें मजसीं ।  
नाहीं तरी शरण रावणासी । शीघ्रकाळेसीं पैं यावें ॥११॥  
समुद्रस्नानाहून वाली येईपर्यंत धीर धरण्याची रावणाला सूचना :  
ऐसें रावणाचें वचन । तार-प्रधानें ऐकोनि जाण ।  
प्रत्युत्तर छळणेंकरुन । तयाप्रती बोलतसे ॥१२॥ 
तारापतिवाळीसीं रण । करूं इच्छितोसी रावण । 
तरी धीअ धरीं एक क्षण । शक्रसुत येईल आतां ॥१३॥ 
राजा वाळी तो स्नानासी । गेला असे समुद्रासीं ।  
संध्या सारोनि तुम्हांपासीं । येईल युद्धासी करावया ॥१४॥  
सहजस्थितीं किष्किंधानाथ । नित्य चतुःसमुद्रीं स्नानसंध्या करीत ।  
तो ये तंवपर्यंत । स्वस्थचित्तें असावें ॥१५॥ 
वाळिच्या अचाट सामर्थ्याचे रावणाकडे वर्णन :  
ऐकें लंकेशा सावधान । तुवां जरी केले अमृतपान । 
तरी वाळिहस्तें तुझा प्राण । क्षणार्धे जाण जाईल ॥१६॥  
जरी तूं झालासी वज्रशरीरी । तरी वाळीपुढें तुझी नुरेचि उरी ।  
निमेषामाजि समुद्र चारी । स्नान करोनि जो येतो ॥१७॥  
देवां दानवां मागतां रण । तिहीं पाठविला वाळीपासीं जाण ।  
तो दुदुभि समरांगण । वानरेसीं करुं पाहे ॥१८॥  
ऐसा दुंदुभि समर्थ । वाळिने मारिला निमेषांत ।  
पैल पडिलासे कलेवरपर्वत । मंदराचळ दुसरा ॥१९॥  
जरी तुज प्रसन्न त्रिपुरारी । तुवां जिंतिले राजे पृथ्वीवरी । 
तरी वाळिदर्शनें तुझी उरी । नुरे निर्धारीं जाणतों मी ॥२०॥  
अथवा तांतडी असेल तुझे पाटीं । तरी जाय दक्षिण-समुद्राचे तटीं । 
रायासीं तुज होईल भेटी । संग्रामीं सुखी करील ॥२१॥  
दक्षिणसागरीं करोनि स्नान । बैसलासे कपि दुसरा भान ।  
तेजें अत्यंत विराजमान । देखोनि मन निवेल तुझें ॥२२॥ 
वालीशी युद्ध करण्यासाठी रावण समुद्रावर गेला :  
वाळी आहे समुद्रतीरीं । ऐसे ऐकोनि सुरारी ।  
चालिला जैसा कज्जळगिरी । बहु क्रोधेंकरीं उंचबळत ॥२३॥  
दुरोनि देखिला ताराकांत । ध्यानस्थ बैसला जैसा पुण्यपंडित ।  
तयासी धरावया निशाचरनाथ । पुष्पकावरोनि उतरला ॥२४॥  
बक जैसा गंगातीरीं । हळुच पावलीं मत्स्य धरी ।  
सांचोळ नव्हतां तस्कर घरीं । लक्ष्मीवंताचे पैं रिघे ॥२५॥  
तैसा रावण हळुच पाउलीं । चालिला पापी धरावया वाळी ।  
तंव तो शक्रसुत नेत्रकमळीं । रावणातें अवलोकी ॥२६॥ 
रावण आपल्या वीस हातांनी वालीला  पकडण्यासाठी जाताच वालीनेच त्याला काखेत पकडले :  
विसांही भुजींकरुन । धरु गेला जों रावण ।  
तंव वाळीनें हात उचलोन । कांखेतळीं दडपिला ॥२७॥  
दहा शिरें लंकानाथा । कांखेखालें झाला दडपिता ।  
पुनरपि तो समुद्रीं तत्वतां । स्नानकरणें जाता झाला ॥२८॥  
रावण असोनि कांखेतळीं । करितां समुद्रीं आंघोळी ।  
नाकी तोंडी क्षारजळीं । कासावीस रुदन करी ॥२९॥  
वाळी अवलोकी नावेक । तंव दहा तोंडें काळें मुख ।  
दाही मस्तकीं मुकुट देख । भुजा विंशति लोंबती ॥३०॥  
शरीर दीर्घ लंबायमान । कांखेतून लोंबती चरण । 
जैसा खगेश्वर पन्नग धरुन । नेतसे तैसा वाळीही ॥३१॥  
ऐसा चहूं समुद्रीं संध्यातर्पण । करोनि अमरेशनंदन ।  
श्रमरहित वीर जाण । नगरप्रांतालागोन पैं आला ॥३२॥  
म्हणे म्यां घालोनि काखेतळीं । केलिया समुद्रीं आंघोळी । 
तरी कोण दशा तया झाली । विचारोनी भलीं पाहों पां ॥३३॥  
समुद्रस्नानाने कासावीस झालेल्या रावणाची वालीकडून सुटका :  
ऐसें विचारुन ताराकांत । मग दोन्ही उचलिले हात ।  
तंव कांखेतून लंकानाथ । सुटोनि पुढें पडियेला ॥३४॥  
वाळी म्हणे तूं कोणाचा कोण । दक्षिणसमुद्रीं यावया काय कारण ।  
मज धरीत होतासि किंनिमित्त जाण । समूळ कथन सांग आतां ॥३५॥  
वाळी हांसोन ते काळीं । विस्मयो पूर्ण हृदयकमळीं ।  
तंव राक्षसेंद्र बद्धांजळी । विनविता झाला ते समयीं ॥३६॥  
शुक्रसुता तुझ्या बळाची थोरी । उपमा देवों तरी य त्रिभुवामाझारी ।  
वीर देखिले परी तुझी सरी । कल्पांतीं ते न पावती ॥३७॥  
म्यां आपुलेनि बळें मही । जिंतिलि चतुःसमुद्र पाहीं ।  
परी तुझ्या बळा समता नाहीं । माझ्या दृष्टीं पडिली आजवरी ॥३८॥  
रावणाची शरणागती व वालीजवळ मैत्रीची इच्छा :  
मी आलों युद्धकारणें । त्वां मज धरोनि चतुःसमुद्रीं स्ननें ।  
केलीं आतां मज रक्षणें । जीवदान झणें देवोनी ॥३९॥  
श्रम न पावतां वाळी । तुवां मज घालोनि कांखेतळीं ।  
केल्या समुद्रीं आंघोळी । तू आतुर्बळी त्रिभुवनीं ॥४०॥  
आतां वानरेशा अवधारीं । तुवां मजसीं करावी मैत्री ।  
आम्हां तुम्हां साक्षी अग्नि धरित्री । आणि साक्षी द्विजदेव ॥४१॥  
माझे स्त्रीं पुत्र ऐश्वर्य । आणिकही जे पदार्थ  तव सर्व ।  
तुज मज वेगळीकभाव । नाहीं गौरव हा मैत्रीचा ॥४२॥  
तुमचें आमचें इष्टपण । हें त्रैलोक्यीं होय भूषण ।  
मी तुझा मित्र हे देवगण । थोर भयातें पावती ॥४३॥  
परस्परांचे सख्य :  
मिळोनियां दोघी जणीं । मित्रत्व करूं साक्षी अग्नी ।  
मग प्रवेशले किष्किंधा भवनीं । राक्षसेश्वर आणि हरिपुंगव ॥४४॥  
अमरेंद्रसुत पौलस्तितनयो । एक होऊनी वीर-बाहो ।  
किष्किंधा प्रवेशले सोमसूर्यो । मंडळीं पहा हो गगनाचिये ॥४५॥  
कीं सिंह प्रवेशे पर्वतदरीं । कीं व्याघ्र वसे झाळीभीतरीं ।  
कीं गुहेसी वसिजे योगीश्वरीं । तयापरी नगरीं स्थिरावले ॥४६॥  
एकमासपर्यंत राघवारी । राहिला होता किष्किंधापुरी ।  
मग प्रधानांसमवेत सुरारी । त्रैलोक्यीं विचरता झाला पैं ॥४७॥  
ऐसे पूर्वी थोर थोर । ते रावणें केले किंकर ।  
तया रावणातें कपीश्वर । कांखे असोनि हिंडिन्नला ॥४८॥  
ऐसा शक्रसुताचा पराक्रम । देवां दानवां दुर्घट परम ।  
तया निर्दाळिता तो तूं श्रीराम । पूर्णब्रह्म अवतार ॥४९॥  
पतंग जैसा दीपावरी । बुडोनि मरे स्नेहाभीतरीं ।  
तैसे तुवां आपुले वैरी । रणसागरीं मारिले ॥५०॥  
एका जनार्दना शरण । श्रीराम कथा भवतारण ।  
पुढील कथानुसंधान । तें निरुपण अति गोड ॥५१॥  
स्वस्ति श्रीभावार्थरामयणे उत्तरकांडे एकाकारटीकायां  रावणवाळिमित्रत्वं नाम त्रयोविंशतितमोऽध्यायः ॥२३॥ ओंव्या ॥५१॥  
GO TOP 
  
 |