| 
 
  ॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ 
 ॥ श्रीभावार्थरामायण ॥ 
 किष्किंधाकांड 
 ॥  अध्याय पाचवा ॥  वालीकडून सुग्रीवाचा पराभव
 
 ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ 
 
वालीच्या सामर्थ्याने सुग्रीवाला भीती  : 
 
पुढती वाळीच्या संत्रासीं । सुग्रीव सांगे श्रीरामापासीं ।हृतराज्य गुप्त वनवासी । तेथेंही आम्हांसी मारूं धांवे ॥१॥
 
 
 
तेनाहमपविद्धश्च हृतदारश्च राघव । तद्भयाश्च महीं कृत्स्नां विचरामि समंततः ॥१॥
 ऋष्यमूकं गिरिवरं भार्याहरणदुःखितः ।
 प्रविष्टोऽस्मि दुराधर्ष वालिनः कारणान्तरे ॥२॥
 
 
 
आम्हीं जावें जेथ जेथ । वाळी मागें धावें तेथ तेथ ।आमचा करावया जीवघात । वैर पोटांत दृढ धरिलें ॥२॥
 वालिभयें भयभीत । अहोरात्र असों गुप्त ।
 पाळती येवोनियां तेथ । शुद्धि सांगत वाळीसी ॥३॥
 
 
त्यामुळे सुग्रीव ऋषमूक पर्वताचा आश्रय घेतो  :
 
भयें भोंवतां दशदिशीं । नारदें सांगीतलें आम्हांसी ।जावोनि रहावें ऋषमूक पर्वतांसी । तेथें वाळीसी ऋषीशाप ॥४॥
 ऐक शापाचे कारण । दुंदभि बळें उन्मत्त पूर्ण ।
 वाळीपासीं येवोनि आपण । युद्ध दारूण मांडीलें ॥५॥
 
 
 
संगृहीत्वा विषाणाभ्यां दुंदुभिं गिरिसन्निभम् । पातयामास तं वाली क्षितौ पंचत्वमागतः ॥ ३ ॥
 चिक्षेप बलवान्वाली पादेनैकेन योजनम् ।
 तस्य वेगप्रविद्धस्य वाक्त्रात्क्षतजबिंदवः ॥ ४ ॥
 प्रपेतुर्मारुतोत्क्षिप्ता मतंगस्याश्रमं प्रति ।
 तान् दृष्ट्वा पतितांस्तत्र मुनिःशोणितदिप्रुषः ॥ ५ ॥
 उत्ससर्ज महाशापं क्षेप्तारं वालिनं प्रति ।
 इह तेनाप्रवेष्टव्यं प्रविष्टस्य वधो भवेत् ॥ ६ ॥
 
 
त्या संबंधी शापाचे मूळ कारण  :
 
वेगीं धरोनि दुंदुभीसी । वाळीनें आपटितां भूमीसीं ।घाये सांडवोनि प्राणांसी । पंचत्वासी पावविला ॥६॥
 वाळीनें वेगें वामपदेंसी । दुंदुभि उडविला आकाशीं ।
 मतंग ऋषीच्या आश्रमासी । रुधिर त्यापासीं पैं स्रवलें ॥७॥
 स्रवतां देखोनि रुधिरासी । कोप आला मतंगऋषीसी ।
 तेणें शापिलें वाळीसी । अति आक्रोशीं सक्रोध ॥८॥
 ज्याचिया आघातनिजशक्तीं । अशुद्ध स्रवे आश्रमाप्रती ।
 त्यासी रिघतां या पर्वतीं । मरण निश्चितीं पावेल ॥९॥
 पाय लावितां ऋष्यमूकासी । शापें मरण आहे वाळीसी ।
 नारद सांगोनि सुग्रीवासी । धाडी वस्तीसी ऋष्यमूका ॥१०॥
 ऋष्यमूकीं करितां वसती । होईल वालिमयाची निवृत्ती ।
 थोर पावाल यश कीर्ती । श्रीरघुपतिप्रसादें ॥११॥
 नारदवचनें ऋष्यमूकीं । निर्भय राहिलों निजसुखी ।
 वाळिभयाची धुकधकी । येथें निःशेकी असेना ॥१२॥
 शापभय घेवोनि पोटीं । वाळी ऋष्यमूक न पाहे दृष्टीं ।
 येथें यावयाची न करी गोष्टी । सुखसंतुष्टीं असों आम्ही ॥१३॥
 नारदवचनाची वचनोक्ती । आजि मज आली प्रतीती ।
 तूं भेटलासी कृपामूर्ती । आम्हीं त्रिजगतीं निजविजयी ॥१४॥
 
 
 
एतत्ते सर्वमाख्यातं विरोधे कारणं महत् । अनागसा मया प्राप्तं स्थानं निर्भयमात्मनः ॥७॥
 
 
वैराचे मुख्य कारण  : 
 
सर्व वैराचें कारण । मुख्य माझे दारहरण ।तें म्यां सांगितलें संपूर्ण । निर्भयस्थान ऋष्यमूकीं ॥१५॥
 माझी भार्या जे का रुमा । ते मज पंढियंती जैसा आत्मा ।
 ते सोडविल्या श्रीरामा । सुखसंभ्रमा पावेन ॥१६॥
 तारा निजपत्नी वाळीसी । तेणे सुख भोगावे तियेसीं ।
 रुमा माझी मज द्यावी गौरवेसीं । वैर दोघांसीं असेना ॥१७॥
 आम्हां दोघा व्यर्थ विरोध । स्रीहरणें वैरसंबंद ।
 सासामासीं करितां युद्ध । पडियेलें द्वंद्व स्रीलोभें ॥१८॥
 बहुत युद्ध त्यासीं आम्हांसीं । नेमस्त करितां सासामासी ।
 सुटका नव्हे निजपत्नीसी । उकसाबुकसीं स्फुंदत ॥१९॥
 देखोनि सुग्रीवाचें रुदन । श्रीराम काढी निर्वाणबाण ।
 घायें वाळीचा घेईन प्राण । सत्य जाण सुग्रीवा ॥२०॥
 वाळी सबळ बळवाहन । आतुर्बळी श्रीरघुनंदन ।
 दोघे जण समसमान । न्यून पूर्ण असेना ॥२१॥
 
 
वालीचा वध करण्याचे तीन पर्याय  : 
 
पैल दुंदभिकलेवर जाण । अंगें उचली जो आपण ।त्याचेनि हस्तें वालिमरण । मातंगी ऋषि भाषे ॥२२॥
 सप्तताड विषम वन । एकें बाणें करी जो छेदन ।
 त्याचेनि हस्तें वालिमरण । ऋषि भाषे मातंगी ॥२४॥
 
 
 
एवमुक्तवतस्तस्य सुग्रीवस्य महात्मनः । राघवो दुन्दुभेः कायं वामांगुष्ठेन चालयन् ॥८॥
 लीलयैव महावीर्यश्चिक्षेप दशयोजनम् ॥९॥
 
 
दुंदुभीचा मृत देह डाव्या पायाच्या अंगठ्याने रामांनी उडविला  : 
 
ऐकोनि सुग्रीवचहन । स्वयें श्रीराम हास्यवदन ।दुंदुभिकलेवर गिरिसमान । देखिलें आपण श्रीरामें ॥२५॥
 तें वामांगुष्ठें उचलोन । केलें त्रिवार तोलन ।
 स्वलीला सांडितां हेळसोन । दश योजन उडविलें ॥२६॥
 दुंदुभिकाय अति समर्थ । श्रीरामें उडविलें अंगुष्ठवत ।
 तरी सुग्रीव साशंकित । बोले भयभीत तें ऐका ॥२७॥
 
 
 
आर्दं समांसं प्रत्यग्रं क्षिप्तं कायं च वालिना । सांप्रतं लघु निर्मांसं क्षिप्तं कायं त्वयाद्य वै ॥१०॥
 नात्र शक्यं बलं ज्ञातुं तंव वा तस्य वाधिकम् ।
 तालानेतान्सुनिर्भिद्य भवेद्व्यक्तिर्बलाबले ॥११॥
 
 
परंतु शुष्क कलेवर उडविल्याने सुग्रीवाचे समाधान झाले नाही  : 
 
वाळींने मारोनि दुंदुभीसी । मांसरक्तसार्द्रासी ।पायें उडविलें आकाशीं । आम्हां सर्वांसी देखतां ॥२७॥
 आतां तुवां श्रीरघुनाथा । दुंदुभिकाय अति शुष्कता ।
 वाळून जाला अति लघुता । तो पदघातें उडविला ॥२८॥
 ऐसेंही आम्हां देखतां । लक्षेना बळाबळता ।
 विशाल ताड एकें बाणें छेदितां । तैं वाळिहंता तूं होसी ॥२९॥
 रामाने बाणाने केलेले सात तालवृक्षांचे छेदनः
 संदिग्ध वानरवचन । ऐकोनि श्रीरामें चढवोनि गुण ।
 गुणीं लाविला फणीबाण । तालच्छेदन करावया ॥३०॥
 विषम तालांची ताडस्थिती । शेषपृष्ठीवरी उत्पत्ती ।
 त्यांसी छेदावया श्रीरघपती । केली युक्ती ते ऐका ॥३१॥
 धनुष्य ओढोनी आपण । चेपिला लक्ष्मणाचा चरण ।
 तेणें चुकवितां अंग संपूर्ण । विषम ते सम ताड झाले ॥३२॥
 शेषावतार लक्ष्मण तेणें । अंग चुकवितां संपूर्ण ।
 विषम ताड झाले समान । श्रीरघुनंदनें छेदितां ॥३३॥
 
 
 
स गृहीत्वा धनुर्घोरं शरमेकं च राघवः । तालन्भित्वा गिरींश्चैव प्रविवेश रसातलम् ॥१२॥
 
 
 
धनुष्य वाहूनि दुर्धर । गुणीं लाविला अमोघ शर ।बाण सोडीतां श्रीरामचंद्र । जालें विचित्र तें ऐका ॥३४॥
 सप्ततालांते छेदूनीं । गिरीवरातें विदारूनी ।
 सप्तपाताळ भेदूनी । गेला निघोनि शषांगा ॥३५॥
 शेषाचे आंगीं तालमूलता । त्यांते झाला समूळ छेदिता ।
 परतोनि येवोनि श्रीरामहाता । रिघोनि भातां स्वस्थ राहे ॥३६॥
 
 
त्यामुळे सर्वांना विस्मय व आनंद  : 
 
श्रीरामें छेदिले विषम ताळ । तेणें सुग्रीवा सुखकल्लोळ ।जयजयकारें गर्जती सकळ । आम्ही सबळ श्रीरामें ॥३७॥
 भवभय ताडविषमता । श्रीरामदृष्टीं होय समता ।
 विषम ताड श्रीराम छेदिता । सुख समस्ता कपिकुळा ॥३८॥
 श्रीराम आम्हां सुखसंपत्ती । नीराम आम्हां निजविश्रांती ।
 श्रीराम आम्हां साह्यार्थी । निजसांगाती श्रीराम ॥३९॥
 श्रीराम आम्हां जिवलग सोयरा । श्रीराम निजात्मा वानरा ।
 श्रीराम स्वामी चराचरां । वंद्य सुरवरां श्रीराम ॥४०॥
 ऐसें बोलोनि आपण । सुग्रीवें घातलें लोटांगण ।
 श्रीरामें दिधले आलिंगन । समाधान जीवशिवां ॥४१॥
 
 
श्रीराम सुग्रीवास वालीला युद्धाचे आव्हान देण्यास सांगतात  : 
 
श्रीराम म्हणे सुग्रीवासी । पुढें जावोनि किष्किंधेसी ।वाळीतें पाचारीं युद्धासी । तुझे पाठीसीं मी असें ॥४२॥
 वाळी आलिया संग्रामासीं । बाणें निवटीन क्षणार्धेसी ।
 तूं तंव भिवों नको त्यासी । निःशंकतेसी युद्ध करीं ॥४३॥
 सुग्रीवा वाळीसीं युद्ध करितां । विसरूं नको मज रघुनाथा ।
 जयो पावसी सर्वथा । सत्वर वचन माथां वंदिलें ॥४४॥
 
 
सुग्रीवाचा भुभुःकार ऐकून वालीचे आगमन  : 
 
ऐसें सांगतां श्रीरघुवीर । सुग्रीवें केला भुभुःकार ।कौतुक पाहे श्रीरामचंद्र । वाळी वानर मी मारीन ॥४५॥
 वाळी बळिया अति बळी । मीही श्रीराम आतुर्बळी ।
 आजि वाळीची करीन होळी । रणखंदळी पाहे माझी ॥४६॥
 
 
 
एवमुक्त्वा तु सुग्रीवं शूरौ तौ नरवानरौ । जग्मतुःसहातौ शीघ्रं किष्किंधां वालिपालिताम् ॥१३॥
 ते सर्वे सहसा गत्वा रामसुग्रीवलक्ष्मणाः ।
 वृक्षैरात्मानमावृत्य ह्यतिन्गहने वने ॥१४॥
 
 
 
ऐसे बोलतां सुग्रीवासीं । सवेग उठिला सौमित्रेंसीं ।येवोनि किष्किंधाप्रदेशीं । वाळिवधासी उद्यत ॥४७॥
 एका सखा जिवलग सौमित्र । दुजा सुग्रीव सन्मित्र ।
 दोघे घेवोनि वेगवत्तर । श्रीरामचंद्र निघाला ॥४८॥
 एक जाले नरवानर । वानरवीरांचा संभार ।
 अवघे करिती जयजयकार । किष्किंधाद्वार ठाकिलें ॥४९॥
 श्रीराम सुग्रीव आणि सौमित्र । तिघे चालती एकत्र ।
 आनंदे गर्जती वानर । किष्किंधाद्वार पावले ॥५०॥
 जेंवी आत्मा देहाआंत । असोनि न देखती समस्त ।
 तेंवी श्रीराम त्या वानरांत । ठेविला अति गुप्त जनदृष्टीं ॥५१॥
 वालिसुग्रीवयुद्ध अतिदुर्धर । पहावया श्रीरामचंद्र ।
 वनीं वसोनि अगोचर । नरवानर न देखती ॥५२॥
 निकट न देखती नरवीर । देखों न शकती ऋषीश्वर ।
 त्यांसी केंवी देखे वाळी वानर । अगोचर श्रीराम ॥५३॥
 गोचरा न दिसे अगोचर । हें तंव मूळींचेंचि ब्रह्मसूत्र ।
 जवळी असतां श्रीरामचंद्र । नरवानर न देखती ॥५४॥
 असो हे कथा अति विस्तार । श्रीराम कोणा नव्हे गोचर ।
 साधु जाणती हा विचार । श्रीरामचंद्रगुह्य गुप्त ॥५५॥
 सुग्रीवें घालोनियां कांस । पाहोनि श्रीरामाची वास ।
 भुभुळकारें अति उल्लास । नांदे आकाश दुमदुमिलें ॥५६॥
 सुग्रीवाच्या गिरागजरें । दिवसा पडती नक्षत्रें ।
 डळमळिलीं मेरुशिखरें । गिरिकंदरें दुमदुमलीं ॥५७॥
 दिग्गजांची बैसलीं टाळीं । नादें गजबजिला वाळी ।
 ऐसा कोण आला बळी । प्रळयआरोळी देवोनी ॥५८॥
 दूत सांगती वाळीसी । सुग्रीव आलासे युद्धासी ।
 हें सामर्थ्य नाहीं त्यासी । शक्ती अनारिसी दिसतसे ॥५९॥
 त्यासी कोणी भेटला बळी । त्याचेनि देतो महा आरोळी ।
 ऐसें विचारोनि वाळी । कांस तत्काळीं घातली ॥६०॥
 आजिचें युद्ध अति संकटीं । विजयमाळा घातली कंठीं ।
 तरी धाकतसें पोटीं । आरोळी मोठी ऐकोनी ॥६१॥
 आजि मरणें कीं मारणें । दोहींचें वैर आजि छेदणें ।
 ऐसा निश्चय करोनि तेणें । युद्धा येणें क्रोधें ॥६२॥
 
 
 
श्रुत्वा तु निनदं भ्रातुः कुद्धो वाली महाबलः । निष्पपात सुसंरब्धो भास्करोऽस्ततटादिव ॥१५॥
 ततः सुतुमलं युद्धं वालिसुग्रीवयोरभूत् ।
 तलैरशनिकल्पैश्च वज्रकल्पैश्च मुष्टिभिः ॥
 जघ्नतुः समरेऽन्योन्यं भ्रातरौ क्रोधमूर्च्छितौ ॥१६॥
 
 
दोघांचे घनघोर युद्ध  : 
 
ऐकोनि सुग्रीवाची आरोळी । युद्धा क्रोधें आला वाळी ।दोघे भिडती क्रोधानळीं । महाबळी वानर ॥६३॥
 वालिसुग्रीव युद्धव्युपत्ती । ब्रह्मादि देव पाहूं येती ।
 नभ दाटलें विमानपंक्तीं । दोहींची शक्ती लक्षावया ॥६४॥
 समानबळ दोहीं वीरीं । युद्धव्युत्पत्ती दोघां पुरी ।
 कवणा जया कवरा हारी । पाहूं सुरवरीं येइजें ॥६५॥
 दोघां होतां दृष्टादृष्टी । क्रोपोद्भव उठिला पोटीं ।
 समबंधुत्वा पडिली तुटी । स्रीलोभासाठीं अपघात ॥६६॥
 जेंवी ग्रहणपर्वणीसीं । ग्रासूं धांवे राहू सूर्यासी ।
 तेंवी वाळी सुग्रीवासी । निर्दळावयासी धांवत ॥६७॥
 वाळी पर्वत हाणी दारुण । सुग्रीव मुष्टिघातें करी चूर्ण ।
 शाल ताल मानी कोण । रणमदें पूर्ण उन्मत्त ॥६८॥
 दोहींची अदट आंगवण । अंग घटलें करितां रण ।
 घाय हाणिती दारूण । भ्यांडांचें प्राण निघो पाहती ॥६९॥
 वज्रपाय कराभिघाता । निष्ठुर मुष्टि हाणिती माथां ।
 परस्परें तडवे देतां । अति निघाला पेटले ॥७०॥
 दंडीं मुंडपीं उरीं शिरीं । घाय हाणिती शिरोदरीं ।
 जानु हाणिती उरावरी । ताडिती कोंपरीं येरयेरां ॥७१॥
 दोघां जेत्यांचा आवांका । लाविती पुच्छांचा तडाका ।
 परस्परें हाणिती थडका । उठला धडका अंतराळीं ॥७२॥
 एका एका तळीं वरी । दोघे तळपती चक्रापरी ।
 दोघे उसळती गगनोदरीं । निराधारीं भिडती ॥७३॥
 घाय हाणिती महाबळीं । न्याहो उठिला पाताळीं ।
 कृतांताची बैसली दांतखिळी । देता आरोळी गर्जोनी ॥७४॥
 क्षण एक युद्ध पृथ्वीवरी । क्षण एक युद्ध गगनोदरीं ।
 युद्धमाघवता वानरीं । सुरासुरीं विस्मयो ॥७५॥
 बाप बळिये दोघे वानर । वीर धीर महाशूर ।
 दोघे योद्धे अति दुर्धर । येरयेरां नाटोपती ॥७६॥
 
 
 
धनुरादाय काकुत्स्थस्तावुभौ समुदैक्षत । अन्योन्यसदृशौ वीरावुभौ देवाविवाश्विनौ ॥१७॥
 यन्नावगच्छत्सुग्रीवं वालिनं वापि राघवः ।
 ततो न कृतवान्बुद्धिं मोक्तुमंतकरं शरम् ॥१८॥
 
 
दोघात कमालीचे साम्य असल्यामूळे श्रीरामास बाण सोडता येईना  : 
 
दोघे वीर रणप्रवीण । देखोनि वानरांचें रण ।संतोषला श्रीरघुनंदन । बळ समान दोहींचें ॥७७॥
 दोघे वानर अनन्य । सबळ बळें समसमान ।
 देखोनि श्रीरामें योजिला बाण । वाळी विंधोन मारावया ॥७८॥
 तंव वाळी सुग्रीव दोघे जण । ठाणमाण वर्णलक्षण ।
 रुपरेखा समसमान । कोणास बाण विंधावा ॥७९॥
 जैसे कां दोघे अश्विनौ देव । समरुप समानभाव ।
 तैसेचि वाळीसुग्रीव । समावयव सारिखे ॥८०॥
 श्रीराम सज्जूनियां बाण । स्वयें जाला विस्मयापन्न ।
 दोघांमाजी वाळी कोण । कोणासी आपण वधावें ॥८१॥
 न कळोनियां विंधूं जातां । अवचट जालिया सुग्रीवघाता ।
 तेव्हां मी जालों विश्वासंहता । भाकही वृथा होय माझी ॥८२॥
 बाण लागलिया अवचितां । श्रीरामें मारिलें शरणागता ।
 ऐसें निंद्यत्व बैसेल माथां । क्षोभ समस्तां पूर्वजांसी ॥८३॥
 मुख्य क्षोभेल हरिश्चंद्र । शिबी भगीरथ पृथु नरेंद्र ।
 काकुस्थ दिलीपादि नृपवर । वंसीचे समग्र क्षोभती ॥८४॥
 रुक्मांगद धर्मांगध । सूर्यवंशींचे वीर अगाध ।
 अवघे क्षोभती प्रबुद्ध । केलें विरुद्ध श्रीरामें ॥८५॥
 शरणागता वज्रपंजर । मिथ्या मिरवी श्रीरामचंद्र ।
 ऐसें निंदितील सर्वत्र । लागल्या शर सुग्रीवा ॥८६॥
 ऐसें विचारोनि जाण । श्रीराम न विंधीच बाण ।
 तंव वाळीनें केलें आन । जयो आपण पावावया ॥८७॥
 वीर्य धैर्य आंगवण । सबळ बळें दोघे समान ।
 वाळीनें जाणोनि आपण केलें विंदान । निजविजया ॥८८॥
 सुग्रीव नाटोपे निजबळें । वाळीस कळलें युद्धसमेळें ।
 मग दाखविलें वरदमाळे । जयकाळें विजयार्थीं ॥८९॥
 युद्ध करितां वर्षानुवर्षी । श्रम खेद नव्हे दोघांसी ।
 वाळी जाणोनि मानसीं । मग माळेसी प्रयोजी ॥९०॥
 
 
 
एतस्मिन्नंतरे भग्नः सुग्रीवस्तेन वालिना । अपश्यद्राघवं नाथमृष्यमूकं ययौ जवात् ॥१९॥
 
 
बहुतकालपर्यंत युद्ध झाल्याने सुग्रीव सुवर्ण-माळेपुढे मूर्च्छित  : 
 
होता विरदमालादर्शन । सुग्रीवशक्ति झाली क्षीण ।भोंवडी येवोनि पडे आपण । मूर्च्छित पूर्ण ऋष्यमूकीं ॥९१॥
 
 
कष्टाने ऋष्यमूक पर्वतात पडला  : 
 
रणीं मूर्च्छित पडतां पहा हो । सुग्रीवें सांभाळिला आवो ।उडोनि ऋष्यमूकीं पहा हो । पडे माहबाहो मूर्च्छित ॥९२॥
 करावया सुग्रीवाचा अंत । वाळी रिघों न शकें ऋष्यमूकांत ।
 वाळी निजविजयें गर्जत । व्यर्थ रघुनाथ साह्य केला ॥९३॥
 
 
सुग्रीव उद्विग्न व त्याचा रामांवर आरोप  : 
 
धरोनि श्रीरामांचें बळ । मगसीं करूं आलासी सळ ।युद्धीं केलासी विकळ । व्यर्थ तळमळ कां करिसी ॥९४॥
 मजसीं करावया संग्राम । सन्मुख राहों न शके राम ।
 सांडी स्रीराज्याचा भ्रम । व्यर्थ श्रम करूं नको ॥९५॥
 सुग्रीवा दिधलें रे जीवदान । न मारीं ऋक्षराजाची आण ।
 ऐसें वाळी गर्जोन । गेला निघोन किष्किंधे ॥९६॥
 विजयाच्या जयजयकारीं । वाळी प्रवेशला नगरीं ।
 सुग्रीव ऋष्यमूकामाझारीं दुःखेंकरीं विलपत ॥९७॥
 
 
 
अपश्यद्राघवं नाथमृष्यमूकं प्रदुद्रुवें । क्लांतो रुधिरसिक्तांगः प्रहारैर्जर्जरीकृतः ॥२०॥
 राघवोऽपि सह भ्रात्रा सह चैव हनूमंता ।
 तदेव वनमागच्छत्सुग्रीवो यत्र वानरः ॥२१॥
 
 
वानरांचा संभ्रम  : 
 
सुग्रीव पडतांचि मूर्च्छित । वानर झाले हाहाभूत ।वाळिभयें भयभीत । वानरें पळत ऋष्यमूकीं ॥९८॥
 वाळिच्या घायीं जर्जरीभूत । रक्तें न्हाणिला धगधगीत ।
 सुग्रीव अति दुःखें विलपत । साह्य रघुनाथ नव्हेचि ॥९९॥
 वाळिवधाचा आक्रम । श्रीरामें दावोनि पराक्रम ।
 करविला युद्धधर्म । अति दुर्गम वाळीसी ॥१००॥
 
 
सुग्रीवाचा शोक आणि श्रीरामास दूषण  : 
 
वाळी वधावया तत्काळ । धरोनि श्रीरामांचे बळ ।निःशंक युद्ध केलें तुंबळ । अति सबळ वाळीसीं ॥१०१॥
 श्रीरामबळाचा निजनेट । युद्ध केलें कडकडाट ।
 श्रीरामें पाहिला माझा शेवट । घायवंट जंव पडें ॥१०२॥
 वालीनें केला जर्जरीभूत । तरी साह्य नव्हे श्रीरघुनाथ ।
 दैवें आलों ऋष्यमूकांत । येर्हवीं प्राणांत पावतों ॥१०३॥
 पडतों ऋष्यमूकाबाहेरी । तरी वाळी मारिता क्षणामाझारीं ।
 श्रीराम होवोनि साहाकारी । रणद्वारीं गांजिलो ॥१०४॥
 श्रीरामाचें साह्यबळ । रणरंगी जालें विफळ ।
 सुकली कृपेची पैं ओल । पायीं सखोल गांजिलो ॥१०५॥
 श्रीरामें हारविली निजकांता । तो मज साह्य होईल आतां ।
 वृथा बोलणें श्रीरघुनाथा । मज तत्वतां मानलें ॥१०६॥
 श्रीराम सत्य सर्वज्ञ । राज्य त्यजोनि आला वना ।
 तोही माझिया संरक्षणा । मिथ्याप्रतिज्ञ होवोनि ठेला ॥१०७॥
 ऐसा सुग्रीव विलपत । तंव लक्ष्मणहनुमंतांसमवेत ।
 तेथें आला श्रीरघुनाथ । कृपावंत कृपाळू ॥१०८॥
 
 
 
आह्यायस्वेति मामुक्त्वा दर्शयित्वा च विक्रमम् । वैरिणा घातयित्वां मां किंत्विदानीं करिष्यसि ॥२२॥
 
 
 
स्वमुखें सांगे श्रीरघूनाथ । वाळीसी पाचारीं युद्धार्थ ।दृष्टीं पडतांचि करीन घात । तुझा कार्यार्थ साधीन ॥१०९॥
 ऐसें बोलोनि आपण । वाळीसीं मज लाविलें रण ।
 घायी माझा निघतां प्राण । साह्य संपूर्ण नव्हेचि ॥११०॥
 आतां येवोनियां येथ । काय साधिसी कार्यार्थ ।
 वाळी गेला नगरांत । निजविजरार्थ साधोनी ॥१११॥
 वाळीनें करितां अति निर्वाण । नाहीं ढळलों अणुप्रमाण ।
 वरदमाळा दावितां जाण । मूर्च्छापन्न मी पडिलों ॥११२॥
 दैवें पडिलें ऋष्यमूकांत । येर्हवीं वाळी करिता माझा घात ।
 साह्य नव्हसीच मूर्च्छित । दुःखाभिभूत मज केलें ॥११३॥
 मी मूर्च्छित होतां विमुख । पाठीसीं घालोनि निःशंक ।
 वाळीसीं नव्हसीच सन्मुख । परम दुःख मज दिधलें ॥११४॥
 साह्य होवोनियां करावें सुखी । श्रीराम सत्यवादी तिहीं लोकीं ।
 तुवां मज केलें परम दुःखी । तेही लटकी कीर्ति केली ॥११५॥
 सुग्रीव देखोनि दुःखाभिभूत । कळवळला श्रीरघुनाथ ।
 त्याचें ऐकोनि रुदित । स्वयें बोलत कृपाळु ॥११६॥
 
 
 
सुग्रीव श्रूयतां तात क्रोधश्च व्यपनीयताम् । कारणं येन बाणोऽयं न मया विनियोजितः ॥२३॥
 अलंकारेण वेषेण प्रमाणेन गतेन च ।
 त्वं च सुग्रीव वाली च सदृशौ स्थः परस्परम् ॥२४॥
 
 
रामाने कारणाचे स्पष्टीकरण करून सुग्रीवाची खात्री केली  : 
 
क्रोध सांडोनि सावधान । सुग्रीवा ऐकें माझें वचन ।साह्य न व्हावयाचें कारण । झालें विंदान परियेसी ॥११७॥
 गुणीं लावोनियां बाण । वाळिचा म्यां घ्यावा प्राण ।
 तंव तुम्ही बंधु दोघे जण । समसमान भासलेती ॥११८॥
 वस्रें अलंकार आभरण । रुपरेखा समसमान ।
 न कळे वाळीचें निजचिन्ह । यालागीं बाण न विंधींच ॥११९॥
 न कळोनि बाण विंधितां । जरी तुज मागता अवचितां ।
 तरी श्रीरामें मारिलें शरणागता । निजजघन्यता तिहीं लोकीं ॥१२०॥
 अवचटें तुज लागल्या बाण । मग म्या त्यजावा कीं आपुला प्राण ।
 ऐसें जाणोनियां आपण । शरसंधान न करीचं ॥१२१॥
 तुझेनि कैवारें एकाएक । वाळीसीं युद्ध करिता देख ।
 तेथेंही थोर आहे अटक । जरी सन्मुख वरदमाळा ॥१२२॥
 जो जो युद्ध करी संमुख । वरदमाळा करी विमुख ।
 मज नाहीं होणें पराङ्मुख । ते मज अटक युद्धार्थी ॥१२३॥
 युद्ध न करावया हेंचि कारण । साह्य व्हावे तंव दोघे समान ।
 यालागीं मीं न विंधींच बाण । सत्य जाण सुग्रीवा ॥१२४॥
 व्यर्थ कां होसी खेदयुक्त । हा तुझा प्रारब्धयोग निश्चित ।
 आणि वाळीचें काहीं आयुष्यप्राप्त । तेणें पदार्थ ऐसा घडला ॥१२५॥
 घायें घ्यावया वाळीचा प्राण । आतां मी घेतों धनुष्यबाण ।
 मज मारितां न लगे क्षण । युद्धाक्रमण करीं वाळीसीं ॥१२६॥
 
 
सुग्रीवाचे समाधान व वालीशी युद्धाची ईर्ष्या  : 
 
सुग्रीव म्हणे नाहीं शक्तीं । केंवी मी पाचारूं युद्धार्थीं ।कृपेनें आलिंगी श्रीरघुपती । अमृतहस्तीं स्पर्शिला ॥१२७॥
 आलिंगनमिषें जाण । दिघली निजशक्ती संपूर्ण ।
 पहिल्यापेंक्षां शतगुण । आंगवण सुग्रीवा ॥१२८॥
 सुग्रीव पाहे सावधान । अंगीं न देघे घाय ना वण ।
 पुरती बाणली आंगवण । वाळीसीं कण करावया ॥१२९॥
 सुग्री उठे ते काळीं । प्रतापें बोले श्रीरामाजवळी ।
 आजि मी लोळवीन वाळी । रणकल्लोळीं विचरुनी ॥१३०॥
 ऐसें बोलोनि श्रीरामाजवळी । वेगीं उठिला तत्काळीं ।
 युद्ध करावया बळी । उडे अंबरीं सुग्रीव ॥३१॥
 
 
या वेळी राम खुणेसाठी सुग्रीवाच्या गळ्यांत गजकमलमाला घालतात  : 
 
श्रीरामें पाचारोनि त्यासी । समरुपता तुम्हां दोघांसी ।युद्धी ओळखावया सुग्रीवासी । घालवी त्यासी गजमाळा ॥१३२॥
 
 
 
गजपुष्पीमिमां फुल्लामुत्पाट्य शुभलक्षणाम् । कंठे कुरु त्वं सौमित्रे सुग्रीवस्य महात्मनः ॥२५॥
 
 
 
गजकमळमाळा सुलक्षण । श्रीरामें निर्मोनियां आपण ।सुग्रीवकंठीं घातली संपूर्ण । ओळखण रणरंगी ॥१३३॥
 गजांतलक्ष्मी यावयासी । गजकमळमाळ घातली त्यासीं ।
 तेचि ओळखण रणभूमीसीं । वालिवधासी मुख्य मूळ ॥१३४॥
 श्रीरामाज्ञा अति समर्थ । माळा न तुटे युद्धाआंत ।
 लागतां वीराचे आघात । भंगातीत राममाळा ॥१३५॥
 लक्ष्मण विंदोनीं महाबळी । कमळांच्या अष्टदळीं ।
 सबाह्य लिहिल्या नामावळी । आर्तुबळी तेणें जाला ॥१३६॥
 गुणेंवीण निजकमळा । निर्गुणगुंती गुंफिली माळा ।
 घालितां सुग्रीवाच्या गळां । कळिकाळा नावरे ॥१३७॥
 सुग्रीवकंठी घालितां माळ । हरिकला वानरांचा पाळ ।
 नळ नीळ तार तरळ । सैन्य सकळ समुदावा ॥१३८॥
 
 
सुग्रीवाचे उड्डाण व भुभुःकार, वालीला आव्हान  : 
 
श्रीराम सौमित्र हनुमंत । सुग्रीव वानरांसमवेत ।आले किष्किंधेपर्यंत । हर्षयुक्त उल्लासें ॥१३९॥
 अति आक्रोशें महाथोर । सुग्रीव करी भुभुःकार ।
 ऐकोनि कोपला वाळी वानर । युद्ध दुर्धर करूं पाहे ॥१४०॥
 दोघे बंधु क्रोधयुक्त । युद्ध करिती अत्यद्भुत ।
 वाळी वधील श्रीरघुनाथ । तोही गुह्यार्थ अवधारा ॥१४१॥
 एकाजनार्दना शरण । पुढें गोड निरूपण ।
 श्रीरामें वाळीउद्धरण । संसारतरण श्रीरामें ॥१४२॥
 श्रीरामनामें द्वयअक्षर । क्षराक्षरातित पर ।
 रामनाम स्मरे निरंतर । पावन नर तिहीं लोकीं ॥१४३॥
 रामनाम पडतां एकाएक । तोहीं तिहीं लोकीं अलोकिक ।
 एकाजनार्दनीं होत एक । नित्य निष्टंक श्रीराम ॥१४४॥
 स्वस्ति श्रीभावार्थरामायणे किष्किंधाकांडे एकाकारटीकायां
 सुग्रीव भंगो नाम पंचमोऽध्यायः ॥५॥
 ॥ओंव्या  १४४ ॥ श्लोक २५ ॥ एवं १६९ ॥
 
 
 
 GO TOP 
 
 |