॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय पंधरावा ॥
कुबेराचा पराभव

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥


तदनंतर अवनिजापती । प्रीतीं सांगतसे अगस्ती।
म्हणे स्वामी ब्रह्मंडाच्या पंक्ती । उतरिसी रचिसी हेळामात्रें ॥१॥
तूं ईश्वराचा ईश्वर । तू सुरवरांचा आदिइंद्र।
तूंचि नटनाट्यलीलावतार । दावितोसी विनोदें ॥२॥
तूंचि प्रकृति आणि पुरुष । तूं ब्रह्मादिकांचा ईश ।
तूं अवतार अयोध्याधीश । तूं कथा आम्हांला पुसतोसी ॥३॥
आमच वाढवोनि मान ।आम्हंप्रती करितोसि प्रश्न ।
हेंचि आम्हं थोर भूशण । तूं परब्रह्म वंदिसी॥४॥
आतां अवधारीं धरणिजारमणा । यक्षेसीं संग्राम करतां रावणा ।
रक्षोगण आणिले रणांगणा। मग रावणा कय झालें॥५॥
द्वारपाळें तोरणावरी । झोडिलां रावणा पळे दूरी ।
तदनंतरे श्रीरामा अवधारीं । कथेचिया निरुपणा ॥६॥
यक्षगण मोडिले रणीं । शतसहस्त्र पाडिले मेदिनीं ।
धनाघक्षें देखोनि नयनीं। आपण संग्रामा निघाला॥७॥
तेथें मणिवरनामें यक्श्ःअ । प्रतापे अत्यंत दक्ष ।
सांगातें वीर सहस्त्र लक्ष । अतियोद्धे पराक्रमी ॥८॥
गदा मुद्गल शक्ति तोमर । शूळ मुसळ लहुडी चक्र ।
यक्ष करिते झाले मार । रणीं राक्षस लक्षोनी ॥९॥
तेव्हां प्रहस्तें काय केलें । रणी सहस्त्रातें मारिलें ।
गदा घेवोनि निवटिलें । महोदरें सहस्त्रातें ॥१०॥
श्रीरामां सावधान अवधारीं । मारीच राक्षस दुराचारी ।
निमेष न भरतां दोनी सहस्त्रवरी । रणीं यक्ष पाडिले ॥११॥
धृम्राक्षेसीं मणिभद्र र्ण । करिते झले दोघे जण ।धू
म्राक्षें मुसळ तोलुन । मणिभद्र वक्षः स्थळीं हाणिला ॥१२॥
लागतां मुसळाचा घावो । तेणें नुलंडेच महाबाहो ।
तदनंतरे मणिभद्रें गदा पहा हो । आवो साधोनि मारिली ॥१३॥
धुम्राक्षाच्या मस्तकावरी । गदा बैसली जैसी वीज शिखरीं ।
अचेतन धरणीवरी । पडला रक्त वाहतसे ॥१४॥
धुम्राक्ष रणीं पडिला । देखोनि रावण क्रोधा चढला ।
रणमेदिनीस धांवत झाला । युगांतींचा अग्नि जैसा ॥१५॥
रणीं मारिता झाला शक्तिकरूनी । मणिभद्र यक्षालागोनी ।
झळफळित गदा यक्षें घेवोनी । राक्षसेंद्रा हाणितली ॥१६॥
यक्षगदेच्या घाईं । रावणमुकुट पडिला भुईं ।
सवेंचि यक्ष पाठीसी पाहीं । रावणाच्या राहिला ॥१७॥
रावण गदाघातेंकरी । मुकुट पडलियाचें भय न धरी ।
मणिभद्र यक्ष पाठीसी निर्धारीं । उभा तिष्ठत राहिला ॥१८॥
राक्षसीं सिंहनाद केला। श्रीरामा पर्वत दुमदुमिला।
दुरोनि धनाधिपें देखिला । मणिभद्राचा पराक्रम ॥१९॥
मणिभद्र महाशूर । योद्ध्यांमाजी परम वीर ।
कुबेरें देखोनि सत्वर । काय बोलता पैं झाला ॥२०॥
म्हणे ब्राह्मणच्या शापोक्ती । रावणाची यशःकीर्ती ।
आणि ऐश्वर्यसंपत्ती । भस्म झालीं द्विजशापें ॥२१॥

रावणाची निंदा :

कुबेर दीर्घवचनें बोले । रावणें कुळा लांछन लाविलें ।
देवां द्विजां दुःख दिधलें । तें भोगी रे निजकर्म ॥२२॥
दुष्टा नष्टा चांडाळा । तुवं भक्षिलें ॠषिकुळा ।
देवांतें त्रास दिधला । तें भोगीं रे निजकर्म ॥२३॥
निरपराधें वनांतरीं । तुवां द्विज भक्षिले यष्टिवरी ।
तया पापाची सामग्री । तूं अधोरीं पडसील ॥२४॥
उपजोनियां ब्रह्मवंशीं । लाज लाविली कुळासी ।
तुजसारिखा पापिष्ठ सृष्ठींसी । म्यां नाहीं रे देखिला ॥२५॥
तूं झालासी नरकाचा पाहुणा । तुजविण नरक नाहीं दुणा ।
नरका जावें न लगे रावणा। नरकप्राय तूंचि तूं ॥२६॥जे
आवडीनें विष प्याला । तो परिपाकीं जण निमाला ।तै
सें रावणा झालें तुजला । ब्रह्मणाचे शापेंकरीं ॥२७॥
मूढ आरूढोनि वृक्षावरी ।बैसला ते फांदी कुठारेंकरी ।
तोडितां पडे भूमीवरी । तैसे रावणातुज झलें ॥२८॥
बाजगिराचें वानर जैसें । तो नचवी नाचे नाचे तैसे ।
तुझे प्रधान अजाण तैसे त्यांचेनि वचनें वर्तसी ॥२९॥
जो स्वधर्माचा त्याग करी । पापियाचें व्रत अंगीकारी ।
तयासी यमराज आपुले स्वपुरीं । यमपाशीं बांधोनि ने ॥३०॥
ज्येष्ठांतें न वंदिती । हेळान करोनि निर्भत्सिती ।
ते नर वंचिती परोपकार । यमाधीन पैं होती ॥३२॥
नाशवंत हा संसार । जाणोनि न करी भजनसार ।
मूढबुद्धि हा पामर । नरक घोर तो भोगी ॥३३॥

रावणने संतपून पुन्हा युद्धास सुरुवात केली :

ऐकोनि वैश्रवणाचें वचन । कोपें आरक्त पूर्ण नयन ।
कुबेराप्रति दशानन ।संग्रामासी मिसळला ॥३४॥
प्रधान विमुख झाले होते । तेही घेतले सांगातें ।
भग्न झाला रावणपुनरपि तेथें संग्रामाते करिता झाला ॥३५॥
मणिभद्रें भग्न केला । माथींचा मुकुट पाडिला ।
तो रावण नाहीं श्रांतला । नाहीं श्रमला संग्रामीं ॥३६॥
श्रीराम म्हणे जी अगस्ती । संग्राम करितां मणिभद्राप्रती ।
शिरींचा मुकुट पाडिला क्षितीं । श्रम कां चित्तीं नाहीं झाला ॥३७॥
अगस्ति म्हणे श्रीरामा । यासि वर देता ब्रह्मा ।
वरबळें पुरूषोत्तमा । यक्ष गंधर्व न गणीच ॥३८॥
हा रावण पुढतीं । युद्ध करी बंधुप्रती ।
तें अवधारीं धरणिजापती । आश्चर्य थोर होईल ॥३९॥
येरीकडे कुबेर जाण । अग्न्यस्त्र सोडिले दारूण ।
राक्षस झाले कंपायमान । अग्नि जाळितो उरीं शिरीं ॥४०॥
जैसा पळयींचा अग्नी । पसरे त्रैलोक्य व्यापूनी ।
तैसी कुबेरास्त्रापासूनीं । अग्निमयी रणभूमी ॥४१॥
रावणें वरूणास्त्र घातलें । क्षणामाजी अग्नीतें शांत केलें ।
पृथ्वी परिपूर्ण झाली जळें । सरोवर नद्या भरियेल्या ॥४२॥
रावणें राक्षसी माव केली । अदृश्य झाला तये काळीं ।
मागून बंधुचे हृदयकमळीं । येवोनि गदा हाणितली ॥४३॥
दशग्रीव कपटी क्रूर । दुरात्मा महा मावकार ।
समरांगणीं सत्वर । अदृश्य झाला ते काळीं ॥४४॥
अदृश्य येवोनि तये काळीं । धनेशाचें हृदयकमळीं ।
गदा हाणितली तेणें भूमंडळीं । पाडिला जैसा पर्वत ॥४५॥
वसंतीं पलाश आरक्त । पुष्पीं फळी वन शोभत ।
तैसा कुबेर रूधिरांकित । रणमेदिनीं उलंडला ॥४६॥
अशोक वृक्ष मूळेंसीं । उलंडोनि पडे भूमीसीं ।
तैसा कुबेर रणभूमीसीं । पडला तरू पैं जैसा ॥४७॥
तदनंतरें प्रधान मिळोन । नंदनवनास कुबेर नेऊन ।
परस्परीं विचारून । उपचार करिते झाले ते काळीं ॥४८॥
आरोग्य व्हावया शरीरीं । जैसा धन्वंतरी उपचार करी ।
तैसे प्रधानीं थोरथोरीं । उपचार कुबेरीं मांडिले ॥४९॥

कुबेराचा पराभव करून रावणाने पुष्पक विमान नेले :

येरिकडे श्रीरामा । रावण तो पापकर्मा ।
मग प्रवर्तला अधर्मा । पुष्पक विमाना हरिता झाला ॥५० ॥
पुष्पक विमानाची स्थिती । ऐक योगियांच्या ध्येयमूर्ती ।
चिंतिल्या स्थळासी शीघ्रगती । मनोवेगेंकरोनि जाय ॥५१॥
मनोवेगातें सांडोनि मागें । विमान जाय अति वेगें ।
म्हणोनि कामग ऐसें निजांगें । ज्ञातें पंडीत बोलती ॥५२॥
तया विमानावरी । आरूढोनि श्रीरामा तुझा वैरी ।
आनंदें गर्जत ते अवसरीं । कैलासाप्रती चालिला ॥५३॥
कुबेरातें जिंतोनि राक्षस । येता झाला कैलासास ।
पुढील कथा अति सुरस । सावध श्रोतीं परिसिजे ॥५४॥
वाल्मीकाच्या ग्रंथाधारें । संताचेनि कृपाभरें ।
कथा चालिली पुढारें । गोड निरूपण पैं आहे ॥५५॥
एका विनवी संतजनां । तुमच्या प्रसादाचा पान्हा ।
तेणें वदलों बोबड्या वचना । बाळपणा लक्षोनि ॥५६॥
एका जनार्दना शरण । पुढें रम्य सुरस गहन ।
कथा ऐका रामायण । दत्तचित्त होवोनी ॥५७॥
स्वस्ति श्रीभावार्थ - रामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
वैश्रवणभंगो नाम पंचदशोऽध्यायः ॥१५॥ ओंव्या ॥५८॥

GO TOP