शंकराचार्यकृत विवेकचडामणि

प्रस्तावना

उपनिषदे ही वेदाचा अंत म्हणजे शेवटचा भाग आहेत. म्हणून त्यांना वेदान्त म्हणतात. प्राचीन उपनिषदांत प्रामुख्याने तात्त्विक प्रश्नांची चर्चा आहे. पण या चर्चेत अनेकदा परस्परविरुद्ध वचने आलेली दिसतात. त्यांचा समन्वय करून सुसूत्र अर्थ सांगण्याचे प्रयत्न झाले. त्यातूनच उपनिषदातील तत्त्वज्ञानाचे म्हणजे वेदान्त तत्त्वज्ञानाचे निरनिराळे संप्रदाय उत्पन्न झाले. त्यांमध्ये 'केवलाद्वैत तत्त्वज्ञान' हा एक संप्रदाय होता. त्याचाच पुरस्कार व प्रचार आद्य शंकराचार्यांनी केला. आपल्या मताचा पुरस्कार करण्यासाठी शंकराचार्यांनी अनेक लहान-मोठे असे प्रकरणग्रंथ गद्य-पद्यांत लिहिले. त्यांत ' विवेकचूडामणि ' हा एक पद्यात लिहिलेला ग्रंथ आहे. केवलाद्वैताचे काही सिद्धान्त या ग्रंथात दृष्टांत व लौकिक उदाहरणे देऊन सविस्तर स्पष्ट करण्यात आलेले आहेत.


'विवेकचूडामणि' या शीर्षकाचा अर्थ

'विवेक' आणि 'चूडामणि' या दोन शब्दांचा समास होऊन 'विवेकचूडामणि' हा शब्द बनला आहे. विवेक म्हणजे दोन पदार्थांतील फरकाचे ज्ञान तसेच विचार असे अर्थ आहेत. उदा., 'आत्मा' आणि 'अनात्मा' यांतील फरकाचे ज्ञान म्हणजे आत्मानात्मविवेक होय. तसेच, विचार केल्याने ज्ञान होते असे मानले जात असल्याने 'विवेकात् जायते ज्ञानम्' असे म्हटले जाई. या दोन्ही अर्थांनी 'विवेक' हा मोक्षाला उपयोगी पडत असल्यामुळे 'विवेक' हा उत्तम आहे.

'चुडामणि' म्हणजे मस्तकावर धारण केले जाणारे रत्न. अर्थात् हे रत्न उत्कृष्ट ठरते. मग उत्तमत्व किंवा उत्कृष्टत्व हे विवेक आणि चूडामणि यांत समान असल्याने, 'विवेकचूडामणि' म्हणजे विवेकरूपी चूडामणि म्हणजे विवेकरूपी 'उत्कृष्ट ज्ञान' असा अर्थ होतो. केवलाद्वैत वेदान्तात विवेकाला महत्त्वाचे स्थान असल्याने, त्याचे चूडामणीशी ऐक्य सांगितले आहे. म्हणून विवेकचूडामणि म्हणजे चूडामणीप्रमाणे उस्कृष्ट/उत्तम ज्ञान अंतर्भूत असणारा ग्रंथ असा अर्थ होतो.


विवेकचूडामणीतील विषय

'विवेकचूडामणि' हा ग्रंथ संपूर्णपणे पद्यात आहे. त्यात एकूण ५८१ श्लोक आहेंत. बहुतेक श्लोक अनुष्टुभ या वृत्तात असले, तरी इतर अनेक वृत्ते शंकराचार्यांनी वापरलेली आहेत.

या ग्रंथातील विषय संक्षिप्तपणे पुढीलप्रमाणे सांगता येतील : केवलाद्वैत वेदान्त तत्त्वज्ञान जाणून घेण्यास योग्य असा अधिकारी; नित्यानित्यवस्तुविवेक, इत्यादी साधन-चतुष्टय; आत्मा/ब्रह्म हे एकमेव अंतिम सत्य तत्त्व, बाकी सर्व अनात्मा; हे जाणून घेण्यास गुरूकडे जाऊन ज्ञान प्राप्त करून घेणे आवश्यक; गुरूच्या उपदेशाप्रमाणे आचार झाल्यावर आत्मसाक्षात्कार; इहलोकीच विद्यमान जीवनात आत्मसाक्षात्कार ज्याला होतो, तो जीवमुक्त ब्रह्मवेत्ता; त्याचा लौकिक आचार कसा असतो; इत्यादी विषय कमी-जास्त तपशिलाने या ग्रंथात आढळून येतात.


विषयाची चौकट अथवा मांडणी

विवेकचूडामणि ग्रंथातील विषयाची मांडणी मजेदार आहे. पहिला श्लोक हा गुरूला व गोविंदाला वंदन करून मंगल साधतो.

श्लोक ५७९ सांगतो की, कोणी एक ब्रह्मवेत्ता गुरू/आचार्य आणि त्याच्याकडे आलेला शिष्य यांच्या संवादरूपाने या ग्रंथात 'आत्म्याचे स्वरूप' सांगितले आहे. आत्म्याच्या स्वरूपाखेरीज अनेक अन्य विषय या ग्रंथात आले आहेत, हे लक्षात असावे.

तसे पाहिल्यास, विवेकचूडामणि हा ग्रंथ संपूर्णपणे गुरू व शिष्य यांच्या संवादरूपात नाही. पहिल्या मंगलश्लोकानंतरचे श्लोक २-३६ हे विषयाची प्रस्तावना करणारे आहेत. नंतर श्लोक ३७-४९ हे गुरू व शिष्य यांचा संवादाला प्रास्ताविक आहेत. त्यानंतर गुरू व शिष्य यांचा संवाद श्लोक ५०-४७९ या श्लोकांत दिलेला आहे. गुरूचा उपदेश ऐकल्यावर शिष्याची स्थिती कशी झाली, हे श्लोक ४८०-४८१ मध्ये कथन केले आहे. त्यानंतर श्लोक ४८२- ५२० यांमध्ये आपली स्थिती कशी झाली, हे शिष्य वर्णन करून सांगतो. त्यानंतर गुरू पुन: शिष्याला श्लोक ५२९-५७६ मध्ये उपदेश करतो. त्यानंतर जीवमुक्त झालेला शिष्य गुरूला सोडून निघून जातो (श्लोक ५७७) आणि गुरूही पृथ्वीवर भ्रमण करू लागतो (श्लोक ५७८ ). त्यानंतर श्लोक ५७९ सांगतो की, येथे गुरूशिष्य संवादरूपात आत्मज्ञान सांगितले आहे. नंतरचे श्लोक ५८०-५८१ हे समारोपात्मक, उपसंहारवजा आहेत. त्यांतील अंतिम ५८१ या श्लोकात 'शांकर भारती' ('शंकराचे' शंकराचार्यांची वाणी!वचन/विवेचन) असा शब्द वापरून, प्रस्तुतचा विवेकचूडामणि ग्रंथ शंकराचार्यांनी रचला, असे सुचविलेले दिसते.


अध्यारोप आणि अपवाद यांची पार्श्वभूमी

विवेकचूडामणि हा ग्रंथ केवलाद्वैतवाद सांगणारा आहे. हा अद्वैतवाद समजावून सांगण्याची पद्धत अशी होती : प्रथम अध्यारोप आणि अपवाद सांगितला जाई. त्यानंतर ब्रह्म हे एकमेव अंतिम सत्य तत्त्व आहे, हे गुरू शिष्याला पटवून देई. त्यानंतर गुरू 'तत्त्वमसि' या वाक्याचा अर्थ समजावून सांगे. तो कळल्यावर 'मीच ब्रह्म आहे' अशी शिष्याची खात्री पटे आणि मग ब्रह्म हे सत्य आहे, जग हे मिथ्या आहे आणि जीव म्हणजे ब्रह्म आहे, हे तीन सिद्धान्त शिष्याला समजून येत.

पण प्रस्तुत ग्रंथात या पद्धतीने विषयाची मांडणी केलेली नाही, तर वाचकाला अध्यारोपप्रक्रिया माहीत आहे, असे गृहीत धरलेले आहे, आणि ते प्रारंभीच्या १९, २० आणि २८ या श्लोकावरून कळून येते. म्हणून ती प्रक्रिया पार्श्वभूमी म्हणून प्रथम जाणून घेणे आवश्यक ठरते. म्हणून ती प्रक्रिया येथे तपशीलवार वेदान्तसार या ग्रंथाच्या अधारे यापुढे दिली आहे.

अध्यारोप म्हणजे अध्यास. अध्यास म्हणजे 'जे जसे नाही, तसे ते वाटणे/मानणे ' उदा., जमिनीवर वेडीवाकडी पडलेली रडू ही अंधूक प्रकाशात साप वाटली. या उदाहरणात जी रडू साप नाही, ती साप वाटली. म्हणजे येथे रखूवर सर्पाचा अध्यासाअध्यारोप झाला. येथे रज्जु ही रज्जु म्हणून न कळल्याने म्हणजे रज्जुच्या अज्ञानाने सापाचा भास झाला. बरोबर असाच प्रकार ब्रह्म आणि जग यांच्या बाबतीत होतो. ब्रह्म हे न कळल्याने म्हणजे ब्रह्माच्या अज्ञानाने ब्रह्मावर जगाचा अध्यारोप म्हणजे अध्यास होतो. हा अध्यारोप काही विशिष्ट पद्धतीने आणि क्रमाने होतो आणि ब्रह्मावर जग दिसू लागते. ही सर्व प्रक्रिया पुढीलप्रमाणे घडते :

१) अज्ञानाची उपाधी : प्रथम ब्रह्माला अज्ञानाची उपाधी येते. उपाधी म्हणजे ती गोष्ट की जिच्यामुळे दुसऱ्या एखाद्या पदार्थाला मर्यादा आली, असे वाटते अथवा त्या पदार्थाचे स्वरूप बदलले आहे, असे भासते. उदा., घटामुळे आकाश हे मर्यादित होऊन लहान असे घटाकाश झाले, असे वाटते. येथे घटाने आकाशाला मर्यादा आली असे भासत असल्याने, घट ही आकाशाची उपाधी ठरते. तसेच पांढऱ्याशुभ्र स्फटिकाजवळ लाल रंगाचे फूल ठेवले की तो स्फटिक लाल रंगाचा वाटू लागतो. येथे लाल फुलाने स्फटिकाचे स्वरूप बदलले असे वाटत असल्याने, लाल फूल ही स्फटिकाची उपाधी होय. ब्रह्माला येणाऱ्या अज्ञान या उपाधीमुळे या दोन्ही गोष्टी घडतात.

ब्रह्माला ज्या अज्ञानाची उपाधी येते, ते अज्ञान सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांनी युक्त आहे. या अज्ञानाकडे व्यष्टी आणि समष्टी या दोन दृष्टिकोनांतून पाहता येते, व्यष्टी ही अनेक असते, तर व्यष्टींच्या समूहरूपाने असणारी समष्टी ही एकच असते. जसे, अनेक वृक्षांनी वन बनते. वनातील प्रत्येक वृक्ष ही व्यष्टी आहे; ते वृक्ष अनेक आहेत. या अनेक वृक्षांच्या समूहाने वन बनते, ते समष्टी आहे आणि ते एक आहे.

अज्ञानात जे तीन गुण आहेत, ते कमीजास्त होऊ शकतात. त्यांतील एखादा गुण प्रधान होऊन बाकीचे दोघे गौण होतात. अज्ञानसमष्टी ही शुद्ध सत्त्वगुण प्रधान असणारी असते. ही अज्ञान-समष्टी ब्रह्माला/शुद्ध चैतन्याला उपाधी म्हणून आली की त्या चैतन्याला ईश्वर असे नाव दिले जाते आणि हा ईश्वर सर्वज्ञ, सर्वेश्वर, अंतर्यामी आणि जगाचे कारण बनतो आणि या ईश्वराची उपाधी असणारी जी अज्ञानसमष्टी आहे, तिला कारणशरीर, आनंदमय कोश, सुषुप्ती आणि स्थूल-सूक्ष्म-प्रपंच-लय-स्थान असे म्हटले जाते.

अज्ञान-व्यष्टीमध्ये मलिन सत्त्वगुण प्रधान असतो. ही अज्ञान-व्यष्टी ब्रह्माला/शुद्ध चैतन्याला उपाधी म्हणून आली की त्या चैतन्याला प्राज्ञ अशी संज्ञा दिली जाते. हा प्राज्ञ अल्पज्ञ, अनीश्वर इत्यादी असतो आणि या प्राज्ञाची जी अज्ञान-व्यष्टी ही उपाधी, तिला कारणशरीर, आनंदमय कोश, सुषुप्ती आणि सूरूसूक्ष्म-शरीर-प्रपंच-लय-स्थान असे म्हटले जाते.

२) अज्ञानाच्या दोन शक्ती : ब्रह्माला उपाधी म्हणून येणाऱ्या अज्ञानाजवळ (१) आवरणशक्ती, आणि (२) विक्षेपशक्ती अशा दोन शक्ती आहेत. अज्ञान हे स्वतःच्या आवरणशक्तीने ब्रह्माला आवरण घालते आणि आवरण पडलेल्या ब्रह्मावर विक्षेपशक्तीने आकाश इत्यादी प्रपंच म्हणजे विश्व निर्माण करते. म्हणजे असे-तमोगुण प्रधान असणारे, विक्षेपशक्तीने युक्त असे अज्ञान ही उपाधी असणाऱ्या शुद्ध चैतन्यापासून आकाश, आकाशातून वायू, वायूपासून तेज, तेजापासून जल आणि जलामधून पृथ्वी या क्रमाने आकाश इत्यादी सूक्ष्म भूते उत्पन्न होतात. या तमोगुणप्रधान अज्ञानात सत्त्व आणि रज हे गुण कमी प्रमाणात का होईना असतातच आणि अज्ञानातील हे सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण आकाश इत्यादी सूक्ष्म भूतांत उतरतात. वेगळ्या शब्दांत सांगायचे झाल्यास चैतन्याच्या/ब्रह्माच्या/आत्म्याच्या अधिष्ठानावर तमःप्रधान अज्ञानातून आकाश इत्यादी सूक्ष्म भूते उत्पन्न होतात. ही सूक्ष्म भूते इंद्रियांना ग्राह्य नसल्याने, ती सूक्ष्म आहेत, असे म्हटले जाते. या सूक्ष्म भूतांत पंचीकरण प्रक्रिया झालेली नसल्याने त्यांना 'अपंचीकृत' भूते असे म्हणतात. या सूक्ष्म/अपंचीकृत आकाश इत्यादी भूतांपासून एका बाजूने सूक्ष्म शरीरे निर्माण होतात आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्यात पंचीकरण होऊन स्थूल अशी आकाश इत्यादी पाच महाभूते उत्पन्न होतात.

३) सूक्ष्म शरीरांची उत्पत्ती : आकाश इत्यादी सूक्ष्म भूतांत असणाऱ्या सत्त्व या गुणाच्या अंशापासून श्रोत्र, त्वचा, डोळा, जीभ आणि नाक ही पाच ज्ञानेंद्रिये उत्पन्न होतात. श्रोत्र इत्यादी इंद्रिये ही जगातील शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या विषयांच्या ज्ञानाची साधने असल्याने त्यांना ज्ञानेंद्रिये असे म्हटले जाते. आकाश इत्यादी सूक्ष्म भूतांतील रजोगुणाच्या अंशापासून वाचा, हात, पाय, गुद आणि उपस्थ निर्माण होतात. ही इंद्रिये कर्म करीत असल्याने त्यांना कर्मेंद्रिये असे म्हटले जाते.

आकाश इत्यादी सूक्ष्म भूतांतील सत्त्वगुणाच्या अंशाच्या परस्पर मिश्रणाने मन आणि बुद्धी हे उत्पन्न होतात.

प्राण, अपान, उदान, समान आणि व्यान हे पाच प्राण आकाश इत्यादी सूक्ष्म भूतांतील रजोगुणाच्या अंशाच्या परस्पर मिश्रणाने बनतात.

वर सांगितलेली पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच प्राण, मन आणि बुद्धी मिळून होणाऱ्या सतरा घटकांनी सूक्ष्म शरीर बनते.

सूक्ष्म शरीरातील काही घटकांनाच कोश असे नाव दिले जाते. पाच प्राण आणि पाच कर्मेंद्रिये यांच्या समूहाला प्राणमय कोश म्हणतात. पाच ज्ञानेंद्रिये व मन यांच्या समुदायाला मनोमय कोश ही संज्ञा दिली जाते. विज्ञानमय कोश या शब्दात विज्ञान म्हणजे बुद्धी असा अर्थ आहे. शरीर-समष्टी ही उपाधी असणाऱ्या चैतन्याला हिरण्यगर्भ अथवा सूत्रात्मा असे म्हणतात, तर सूक्ष्म शरीर-व्यष्टी ही उपाधी असणाऱ्या शुद्ध चैतन्याला तेजस असे नाव दिले जाते.

४) स्थूल महाभूतांची उत्पत्ती : आकाश इत्यादी सूक्ष्म भूतांत पंचीकरण प्रक्रिया घडली की आकाश इत्यादी पाच स्थूल महाभूते निर्माण होतात. पंचीकरण ही केवलाद्वैत वेदान्तातील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. आकाश इत्यादी पाच सूक्ष्म भूते एकमेकांत कोणत्या पद्धतीने मिसळतात आणि त्यांच्या संयोगाने स्थूल महाभूते उत्पन्न होतात, हे सांगण्याचे काम या पंचीकरण प्रक्रियेने होते. ५) पंचीकरण प्रक्रिया : ही पंचीकरण प्रक्रिया अशी सांगितली जाते -
(अ) आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी यांतील प्रत्येक सूक्ष्म भूत हे एक 'एकक' (unit)आहे, असे मानावयाचे.
(आ) मग प्रत्येक सूक्ष्म भूताचे दोन समान भाग करावयाचे. जसे, आकाश १ = १/२ आकाश + १/२ आकाश. वायू १ = १/२ वायु + १/२ वायू. तेज १ = १/२ तेज + १/२ तेज. जल १ = १/२ जल + १/२ जल. पृथ्वी १ = १/२ पृथ्वी + १/२ पृथ्वी.

(इ) नंतर प्रत्येक सूक्ष्म भूताच्या पहिल्या अर्ध्या भागाचे चार समान भाग करावयाचे. म्हणजेच १/२ भागाला ४ ने भागले की १/८ भाग होतो. त्यानुसार असे होते -

१/२ आकाश = १/८ आ + १/८ आ + १/८ आ + १/८ आ.
१/२ वायू      = १/८ वा + १/८ वा + १/८ वा + १/८ वा.
१/२ तेज      = १/८ ते + १/८ ते + १/८ ते + १/८ ते.
१/२ जल      = १/८ ज + १/८ ज + १८ ज + १/८ ज.
१/२ पृथ्वी    = १/८ पृ + १/८ पृ + १/८ पृ + १/८ पृ.

(ई) त्यानंतर प्रत्येक सूक्ष्म भूताचा उरलेला १/२ भाग हा स्वतःला सोडून इतर चार सूक्ष्म भूतांच्या प्रत्येक १/८ भागाशी जोडून द्यावयाचा. असे केले की त्यांच्या संयोगाने एकेक स्थूल महाभूत निर्माण होते. या स्थूल महाभूतालाच पंचीकरणाने बनलेले (पंचीकृत) स्थूल महाभूत म्हणतात. ही प्रक्रिया अशी घडते.

१/२ आ + १/८ वा + १८ ते + १/८ ज + १/८ पृ = पंचीकृत स्थूल आकाश १.
१/२ वा + १८ तै + १८ ज + १८ पृ + १/८ आ = पंचीकृत भूल वायू १.
१/२ तै + १८ ज + १/८ पृ ९१८ आ + १/८ वा = पंचीकृत भूल तेज १.
१/२ ज + १८ पृ + १/८ आ + १८ वा + १८ ते = पंचीकृत भूल जल १.
१/२ पृ + १८ आ + १८ वा + १/८ ते + १/८ ज = पंचीकृत स्थूल पृथ्वी १.

(उ) पंचीकृत भूतालाच स्थूल अथवा महाभूत म्हणतात.

(ऊ) प्रत्येक पंचीकृत भूतात पाचही सूक्ष्म भूतांचे अंश उतरतात तथापि, ज्या पंचीकृत भूतात ज्या सूक्ष्म भूतांचे अंश जास्त असतात त्या भूताचे नाव त्या पंचीकृत भूताला दिले जाते. जसे, वरील प्रक्रियेत पंचीकृत आकाश १ मध्ये सूक्ष्म आकाशाचे १/२ अंश हे इतर भूतांच्या अंशांपेक्षा जास्त आहेत. म्हणून त्याला पंचीकृत आकाश असे म्हटले जाते. याचप्रमाणे पंचीकृत वायू, इत्यादी अन्य भूतांच्या बाबतीत जाणावे.

५) स्थूल देह उत्पत्ती : आकाश इत्यादी स्थूल महाभूतांच्या परस्पर संयोगाने सर्व अचेतन/जड ब्रह्मांडे बनतात. त्यांच्या विशिष्ट संयोगातूनच अंडज, स्वेदज, जारज आणि उद्भिज अशी चार प्रकारची स्थूल शरीरे उत्पन्न होतात आणि त्या शरीरांच्या वाढीला उपयुक्त असे अन, पाणी इत्यादी निर्माण होतात.

या स्थूल शरीरांची उपाधी ही शुद्ध चैतन्याला येते. स्थूल शरीर-समष्टी ही उपाधी असणाऱ्या चैतन्याला विराट/वैश्वानर असे नाव दिले जाते, तर स्थूल शरीर-व्यष्टी ही उपाधी असणाऱ्या चैतन्याला विश्व हे नाव देतात.

६) पाच कोश : मागे सांगितल्याप्रमाणे सूक्ष्म शरीरात तीन कोश असतात आणि कारणशरीर म्हणजे आनंदमय कोश असे म्हटले होते. आता, स्थूल शरीरालाच अन्नमय कोश असे म्हणतात. अशा प्रकारे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश असे पाच कोश सिद्ध होतात.

७) तीन अवस्था : कारण, सूक्ष्म आणि स्थूल शरीरांच्या समष्टी आणि व्यष्टी या उपाधी चैतन्याला येत असल्याने, या चैतन्याच्या संदर्भात जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अशा तीन अवस्था मानल्या जातात.

८) समष्टी आणि व्यष्टी शरीरांच्या उपाधिअंती शुद्ध चैतन्याला दिली जाणारी नावे, कोश आणि अवस्था हे कोष्टकाद्वारे पुढीलप्रमाणे सांगता येतात -

कोष्टक १ : समष्टी दृष्टिकोनातून

शरीर------कोश-----------अवस्था------चैतन्याला दिले जाणारे नाव -

कारण-----आनंदमय-------सुषुप्ती------ईश्वर
सूक्ष्म-------प्राणमय------- स्वप्न---------हिरण्यगर्भ/सूत्रात्मा
------------मनोमय
------------विज्ञानमय
स्थूल-------अन्नमय--------जागृती-------विराट्/वैश्वानर

कोष्टक २ : व्यष्टी दृष्टिकोनातून

शरीर------कोश-----------अवस्था------चैतन्याला दिले जाणारे नाव -

कारण-----आनंदमय-------सुषुप्ती------प्राज्ञ

सूक्ष्म-------प्राणमय------- स्वप्न---------तैजस
------------मनोमय
------------विज्ञानमय
स्थूल-------अन्नमय--------जागृती-------विश्व

अशी ही अध्यारोपाची सामान्य कल्पना आहे.


अपवाद

निर्गुण ब्रह्मावर/शुद्ध चैतन्यावर अध्यारोप/अध्यास होऊन लौकिक सृष्टी दिसू लागते/भासू लागते. पण अध्यारोप/अध्यास हा खोटा, कल्पित असल्याने दिसणारे सर्व दृश्य जग मिथ्या असून निर्गुण ब्रह्म/शुद्ध चैतन्य हे एकमेव एक अद्वितीय सत्य तत्त्व आहे. असे अपवादाच्याद्वारा सांगितले जाते.


काही वैशिष्ट्ये

अशा या विवेकचूडामणि ग्रंथाची काही वैशिष्ट्ये आहेत. ती आता सांगितली आहेत.

१) येथे अध्यारोप प्रक्रिया स्वतंत्रपणे सांगितली नाही.
२) पंचीकरण प्रक्रियेचा खुलासा नाही.
३) ब्रह्म, आत्मा, परमात्मा, परतत्त्व असे शब्द अंतिम सत्य तत्त्वाचा निर्देश करण्यास वापरले आहेत, तर देहाच्या उपाधीत सापडलेल्या परम तत्त्वासाठी प्रत्यग्, प्रत्यगात्मा असे शब्द वापरले आहेत.
४) आत्मा/ब्रह्म यांचा निर्देश करण्यास कधी कधी वस्तू असा शब्द वापरला आहे.
५) आत्मा/ब्रह्म यांचे वर्णन करताना अनेकदा अनेक शब्द अथवा शब्दसमूह यांची पुनरुक्ती झाली आहे.



वरील प्रस्तावना व श्लोकांवरील विवेचन श्री के. वा. आपटे यांच्या परवानगीने त्यांच्या 'विवेकचूडामणि' या ग्रंथावरून घेतले आहे.



GO TOP