[ श्री रामदासस्वामिकृत् 'मनोबोध' ]

॥ मनाचे श्लोक ॥

॥ श्रीराम समर्थ ॥

    Download mp3

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥
मना सज्जना भक्तिपंथेची जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे ।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ।
पुढे वैखरी राम आधी वदावा ॥
सदाचार हा थोर सांडू नये तो ।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥
मना वासना दुष्ट कामा न ये रे ।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥
मना सर्वथा नीति सोडू नको हो ।
मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा ।
मना सत्य संकल्प जीवी धरावा ॥
मना कल्पना ते नको वीषयांची ।
विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥
नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू ।
नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥ ६ ॥
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे ।
मना बोलणे नीच सोशीत जावे ॥
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे ।
मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी ।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे ।
परी अंतरी सज्जना नीववावे ॥ ८ ॥
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे ।
अति स्वार्थबुद्धी न रे पाप सांचे ॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे ।
न होता मनासारिखे दुःख मोठे ॥ ९ ॥
सदा सर्वदा प्रीति रामी धरावी ।
सुखाची स्वये सांडि जीवी करावी ॥
देहेदुःख ते सूख मानीत जावे ।
विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ॥ १० ॥
जनीं सर्वसूखी असा कोण आहे ।
विचारे मना तूचि शोधूनि पाहे ॥
मना त्वाचि रे पूर्वसंचीत केले ।
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥
मना मानसी दुःख आणू नको रे ।
मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥
विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी ।
विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी ॥ १२ ॥
मना सांग पां रावणा काय जालें ।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडालें ॥
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगीं ।
बळे लागला काळ हा पाठिलागीं ॥ १३ ॥
जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला ।
परी शेवटी काळमूखी निमाला ॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले ।
कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥
मना पाहता सत्य हे मृत्युभूमी ।
जितां बोलती सर्वही जीव मी मी ॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती ।
अकस्मात सांडूनियां सर्व जाती ॥ १५ ॥
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।
अकस्मात तोही पुढे जात आहे ॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते ।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥ १६ ॥
मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते ।
अकस्मात होणार होऊन जाते ॥
घडे भोगणे सर्वही कर्मयोगे ।
मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥ १७ ॥
मना राघवेवीण आशा नको रे ।
मना मानवाची नको कीर्ति तू रे ॥
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे ।
तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे ॥ १८ ॥
मना सर्वथा सत्य सांडू नको रे ।
मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ॥
मना सत्य ते सत्य वाचे वदावे ।
मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावे ॥ १९ ॥
बहू हिंपुटी होईजे मायपोटी ।
नको रे मना यातना तेचि मोठी ॥
निरोधे पचे कोंडिले गर्भवासी ।
अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥
मना वासना चूकवी येरझारा ।
मना कामना सांडि रे द्रव्यदारा ॥
मना यातना थोर हे गर्भवासी ।
मना सज्जना भेटवी राघवासी ॥ २१ ॥
मना सज्जना हीत माझे करावे ।
रघूनायका दृढ चित्तीं धरावे ॥
महाराज तो स्वामि वायुसुताचा ।
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥ २२ ॥
न बोले मना राघवेवीण काही ।
जनी वाउगे बोलता सूख नाही ॥
घडीने घडी काळ आयुष्य नेतो ।
देहांती तुला कोण सोडूं पहातो ॥ २३ ॥
रघूनायकावीण वाया शिणावे ।
जनासारिखे व्यर्थ का वोसणावे ॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे ।
अहंता मनी पापिणी ते नसो दे ॥ २४ ॥
मना वीट मानू नको बोलण्याचा ।
पुढे मागुता राम जोडेल कैचा ॥
सुखाची घडी लोटता सूख आहे ।
पुढे सर्व जाईल काही न राहे ॥ २५ ॥
देहेरक्षणा कारणे यत्न केला ।
परी शेवटी काळ घेऊन गेला ।
करी रे मना भक्ति या राघवाची ।
पुढे अंतरी सोडि चिंता भवाची ॥ २६ ॥
भवाच्या भये काय भीतोस लंडी ।
धरी रे मना धीर धाकासि सांडी ॥
रघूनायकासारिखा स्वामि शीरी ।
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥ २७ ॥
दिनानाथ हा राम कोदंडधारी ।
पुढे देखता काळ पोटी थरारी ॥
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २८ ॥
पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे ।
बळे भक्तरीपूशिरी कांबि वाजे ॥
पुरी वाहिली सर्व जेणें विमानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २९ ॥
समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३० ॥
महासंकटी सोडिले देव जेणे ।
प्रतापे बळे आगळा सर्वगूणे ॥
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३१ ॥
अहल्या शिळा राघवे मुक्त केली ।
पदी लागता दिव्य होऊनि गेली ॥
जया वर्णिता शीणली वेदवाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३२ ॥
वसे मेरुमांदार हे सृष्टिलीळा ।
शशी सूर्य तारांगणे मेघमाळा ॥
चिरंजीव केले जनीं दास दोन्ही ।
नुपेक्षा कदा राम दासाभिमानी ॥ ३३ ॥
उपेक्षा कदा रामरूपी असेना ।
जिवा मानवा निश्चयो तो वसेना ॥
शिरी भार वाहेन बोले पुराणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३४ ॥
असे हो जया अंतरी भाव जैसा ।
वसे हो तया अंतरी देव तैसा ॥
अनन्यास रक्षीतसे चापपाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३५ ॥
सदा सर्वदा देव सन्नीध आहे ।
कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ॥
सुखानंद आनंद कैवल्यदानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥
सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा ।
उडी घालितो संकटी स्वामि तैसा ॥
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३७ ॥
मना प्रार्थना तूजला एक आहे ।
रघूनाथ थक्कीत होऊनि पाहे ॥
अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३८ ॥
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे ।
जयाचेनि योगे समाधान बाणे ॥
तयालागि हे सर्व चांचल्य दीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३९ ॥
मना पाविजे सर्वही सूख जेथे ।
अती आदरे ठेविजे लक्ष तेथे ॥
विविके कुडी कल्पना पालटीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० ॥
बहू हिंडता सौख्य होणार नाही ।
शिणावे परी नातुडे हीत काही ॥
विचारे बरे अंतरा बोधवीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४१ ॥
बहुतांपरी हेचि आता धरावे ।
रघूनायका आपुलेसे करावे ॥
दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४२ ॥
मना सज्जना एक जीवीं धरावे ।
जनीं आपुले हीत तूवां करावे ॥
रघूनायकावीण बोलो नको हो ।
सदा मानसी तो निजध्यास राहो ॥ ४३ ॥
मना रे जनीं मौनमुद्रा धरावी ।
कथा आदरे राघवाची करावी ॥
नसे राम ते धाम सोडूनि द्यावे ।
सुखालागि आरण्य सेवीत जावे ॥ ४४ ॥
जयाचेनि संगे समाधान भंगे ।
अहंता अकस्मात येऊनि लागे ॥
तये संगतीची जनीं कोण गोडी ।
जिये संगतीने मती राम सोडी ॥ ४५ ॥
मना जे घडी राघवेवीण गेली ।
जनीं आपुली ते तुवा हानि केली ॥
रघूनायकावीण तो शीण आहे ।
जनीं दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ॥ ४६ ॥
मनीं लोचनी श्रीहरी तोचि पाहे ।
जनीं जाणता भक्त होऊनि राहे ॥
गुणी प्रीति राखे क्रमू साधनाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४७ ॥
सदा देवकाजी झिजे देह ज्याचा ।
सदा रामनामे वदे नित्य साचा ॥
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४८ ॥
सदा बोलण्यासारिखे चालताहे ।
अनेकी सदा एक देवासि पाहे ॥
सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४९ ॥
नसे अंतरी कामकारी विकारी ।
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी ॥
निवाला मनीं लेश नाही तमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५० ॥
मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी ।
प्रपंचीक नाही जयाते उपाधी ॥
सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५१ ॥
क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे ।
न लिंपे कदा दंभ वादे विवादे ॥
करी सूखसंवाद जो ऊगमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५२ ॥
सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकी ।
सदा सर्वदा सत्यवादी विवेकी ॥
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५३ ॥
सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी ।
मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी ॥
चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५४ ॥
नसे मानसी नष्ट आशा दुराशा ।
वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा ॥
ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५४ ॥
दिनाचा दयाळू मनाचा मवाळू ।
स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू ॥
तया अंतरी क्रोध संताप कैचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५६ ॥
जगी होइजे धन्य या रामनामे ।
क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमें ॥
उदासीनता तत्त्वता सार आहे ।
सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ ५७ ॥
नको वासना वीषयी वृत्तिरूपे ।
पदार्थी जडे कामना पूर्वपापे ॥
सदा राम निष्काम चिंतीत जावा ।
मना कल्पनालेश तोहि नसावा ॥ ५८ ॥
मना कल्पना कल्पिता कल्पकोटी ।
नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी ॥
मनी कामना राम नाही जयाला ।
अती आदरे प्रीति नाही तयाला ॥ ५९ ॥
मना राम कल्पतरू कामधेनू ।
निधी सार चिंतामणी काय वानू ॥
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता ।
तया साम्यता कायसी कोण आता ॥ ६० ॥
उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे ।
तया अंतरी सर्वदा तेचि आहे ॥
जनीं सज्जनीं वाद हा वाढवावा ।
पुढे मागतां शोक जीवी धरावा ॥ ६१ ॥
निजध्यास तो सर्व तूटोनी गेला ।
बळे अंतरी शोक संताप ठेला ॥
सुखानंद आनंद भेदे बुडाला ।
मनीं निश्चयो सर्व खेदे उडाला ॥ ६२ ॥
घरी कामधेनू पुढे ताक मागे ।
हरीबोध सांडोनि वेवाद लागे ॥
करी सार चिंतामणी काचखंडे ।
तया मागता देत आहे उदंडे ॥ ६३ ॥
अती मूढ त्या दृढ बुद्धी असेना ।
अती काम त्या राम चित्ती वसेना ॥
अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा ।
अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा ॥ ६४ ॥
नको दैन्यवाणे जिणे भक्तिऊणे ।
अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणे ॥
धरी रे मना आदरे प्रीति रामी ।
नको वासना हेमधामी विरामी ॥ ६५ ॥
नव्हे सार संसार हा घोर आहे ।
मना सज्जना सत्य शोधूनि पाहे ॥
जनीं वीष खाता पुढे सूख कैचे ।
करी रे मना ध्यान या राघवाचे ॥ ६६ ॥
घनश्याम हा राम लावण्यरूपी ।
महाधीर गंभीर पूर्णप्रतापी ॥
करी संकटी सेवकांचा कुडावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ६७ ॥
बळे आगळा राम कोदंडधारी ।
महाकाळ विक्राळ तोही थरारी ॥
पुढे मानवा किंकरा कोण केवा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ६८ ॥
सुखानंदकारी निवारी भयाते ।
जनीं भक्तिभावे भजावे तयाते ॥
विवेके त्यजावा अनाचार हेवा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ६९ ॥
सदा रामनामे वदा पूर्णकामे ।
कदा बाधिजेना पदा नित्य नेमे ॥
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७० ॥
जयाचेनि नामे महादोष जाती ।
जयाचेनि नामे गती पाविजेती ॥
जयाचेनि नावे घडे पुण्यठेवा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७१ ॥
न वेचें कदा ग्रंथिचे अर्थ काही ।
मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ॥
महाघोर संसारशत्रू जिणावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७२ ॥
देहेदंडणेचे महादुःख आहे ।
महादुःख ते नाम घेता न राहे ॥
सदाशीव चिंतीतसे देवदेवा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७३ ॥
बहुतांपरी संकटे साधनांची ।
व्रते दान उद्यापने ती धनाची ॥
दिनाचा दयाळू मनी आठवावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७४ ॥
समस्तांमधे सार साचार आहे ।
कळेना तरी सर्व शोधून पाहे ॥
जिवा संशयो वाऊगा तो त्यजावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७५ ॥
नव्हे कर्म ना धर्म ना योग काही ।
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही ॥
म्हणे दास विश्वास नामी धरावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥
करी काम निष्काम या राघवाचे ।
करी रूप स्वरूप सर्वां जिवांचे ॥
करी छेद निर्द्वंद्व हे गूण गाता ।
हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होता ॥ ७७ ॥
अहो ज्या नरा रामविश्वास नाही ।
तया पामरा बाधिजे सर्व काही ॥
महाराज तो स्वामि कैवल्यदाता ।
वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥
मना पावना भावना राघवाची ।
धरी अंतरी सोडि चिंता भवाची ॥
भवाची जिवा मानवा भूलि ठेली ।
नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली ॥ ७९ ॥
धरा श्रीवरा त्या हरा अंतराते ।
तरा दुस्तरा त्या परा सागराते ॥
सरा वीसरा त्या भरा दुर्भराते ।
करा नीकरा त्या खरा मत्सराते ॥ ८० ॥
मना मत्सरे नाम सांडू नको हो ।
अती आदरे हा निजध्यास राहो ॥
समस्तांमधे नाम हे सार आहे ।
दुजी तूळणा तूळितांही न साहे ॥ ८१ ॥
बहू नाम या रामनामी तुळेना ।
अभाग्या नरा पामरा हे कळेना ॥
विषा औषधा घेतले पार्वतीशे ।
जिवा मानवा किंकरा कोण पूसे ॥ ८२ ॥
जेणे जाळिला काम तो राम ध्यातो ।
उमेसी अती आदरे गूण गातो ॥
बहु ज्ञ्य़ान वैराग्य सामर्थ्य जेथे ।
परी अंतरी नामविश्वास तेथे ॥ ८३ ॥
विठोने शिरी वाहिला देवराणा ।
तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा ॥
निवाला स्वये तापसी चंद्रमौळी ।
जिवा सोडवी राम हा अंतकाळी ॥ ८४ ॥
भजा राम विश्राम योगेश्वरांचा ।
जपू नेमिला नेम गौरीहराचा ॥
स्वये नीववी तापसी चंद्रमौळी ।
तुम्हां सोडवी राम हा अंतकाळी ॥ ८५ ॥
मुखी राम विश्राम तेथेचि आहे ।
सदानंद आनंद सेवूनि राहे ॥
तयावीण तो शीण संदेहकारी ।
निजधाम हे नाम शोकापहारी ॥ ८६ ॥
मुखी राम त्या काम बाधू शकेना ।
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ॥
हरीभक्त तो शक्त कामास मारी ।
जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८७ ॥
बहू चांगले नाम या राघवाचे ।
अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ॥
करी मूळ निर्मूळ घेतां भवाचें ।
जिवा मानवा हेचि कैवल्य साचे ॥ ८८ ॥
जनीं भोजनीं नाम वाचे वदावे ।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ॥
हरीचिंतने अन्न सेवीत जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९ ॥
न ये राम वाणी तया थोर हाणी ।
जनीं व्यर्थ प्राणी तया नाम काणी ॥
हरीनाम हे वेदशास्त्री पुराणी ।
बहू आगळे बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥
नको वीट मानू रघूनायकाचा ।
अती आदरे बोलिजे राम वाचा ॥
न वेचे मुखी सापडे रे फुकाचा ।
करी घोष त्या जानकीवल्लभाचा ॥ ९१ ॥
अती आदरे सर्वही नामघोषे ।
गिरीकंदरी जाईजे दूरि दोषे ॥
हरी तिष्ठतू तोषला नामघोषे ।
विशेषे हरा मानसी रामपीसे ॥ ९२ ॥
जगी पाहता देव हा अन्नदाता ।
तया लागली तत्त्वता सार चिंता ॥
तयाचे मुखी नाम घेता फुकाचे ।
मना सांग पा रे तुझे काय वेचे ॥ ९३ ॥
तिन्ही कोप जाळू शके कोप येता ।
निवाला हरू तो मुखे नाम घेता ॥
जपे आदरे पार्वती विश्वमाता ।
म्हणोनी म्हणा तेचि हे नाम आता ॥ ९४ ॥
अजामेळ पापी वदे पुत्रकामे ।
तया मुक्ति नारायणाचेनि नामे ॥
शुकाकारणे कुंटणी राम वाणी ।
मुखे बोलिता ख्याति जाली पुराणी ॥ ९५ ॥
महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी ।
जपे रामनामावळी नित्यकाळी ॥
पिता पापरूपी तया देखवेना ।
जनीं दैत्य तो नाम मूखे म्हणेना ॥ ९६ ॥
मुखी नाम नाही तया मुक्ति कैची ।
अहंतागुणे यातना ते फुकाची ॥
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा ।
म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ॥ ९७ ॥
हरीनाम नेमस्त पाषाण तारी ।
बहू तारिले मानव देहधारी ॥
तया रामनामी सदा जो विकल्पी ।
वदेना कदा जीव तो पापरूपी ॥ ९८ ॥
जगी धन्य वाराणसी पुण्यराशी ।
तयेमाजि आता गती पूर्वजांसी ॥
मुखे रामनामावळी नित्यकाळी ।
जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ॥ ९९ ॥
यथासांग रे कर्म तेही घडेना ।
घडे धर्म ते पुण्यगाठी पडेना ॥
दया पाहता सर्व भूती असेना ।
फुकाचे मुखी नाम तेही वसेना ॥ १०० ॥
जया नावडे नाम त्या यम जाची ।
विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ॥
म्हणोनी अती आदरे नाम घ्यावे ।
मुखे बोलता दोष जाती स्वभावे ॥ १०१ ॥

    Download mp3

अती लीनता सर्वभावे स्वभावे ।
जना सज्जनालागि संतोषवावे ॥
देहे कारणी सर्व लावीत जावे ।
सगूणी अती आदरेसी भजावे ॥ १०२ ॥
हरीकीर्तनी प्रीति रामी धरावी ।
देहेबुद्धि नीरूपणी वीसरावी ॥
परद्रव्य आणीक कांता परावी ।
यदर्थी मना सांडि जीवी करावी ॥ १०३ ॥
क्रियेवीण नानापरी बोलिजेते ।
परी चित्त दुश्चित्त ते लाजवीते ॥
मना कल्पना धीट सैराट धांवे ।
तया मानवा देव कैसेनि पावे ॥ १०४ ॥
विवेके क्रिया आपुली पालटावी ।
अती आदरे शुद्ध क्रीया धरावी ॥
जनीं बोलण्यासारिखे चाल बापा ।
मना कल्पना सोडि संसारतापा ॥ १०५ ॥
बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा ।
विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा ॥
दया सर्वभूती जया मानवाला ।
सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला ॥ १०६ ॥
मना कोप आरोपणा ते नसावी ।
मना बुद्धि हे साधुसंगी वसावी ॥
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी ।
मना होइ रे मोक्षभागी विभागी ॥ १०७ ॥
मना सर्वदा सज्जनाचेनि योगे ।
क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे ॥
क्रियेवीण वाचाळता ते निवारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०८ ॥
जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा ।
जनीं सूखसंवाद सूखे करावा ॥
जगी तोचि तो शोकसंतापहारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०९ ॥
तुटे वाद संवाद त्याते म्हणावे ।
विवेके अहंभाव याते जिणावे ॥
अहंतागुणे वाद नाना विकारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११०॥
हिताकारणे बोलणे सत्य आहे ।
हिताकारणे सर्व शोधूनि पाहे ॥
हिताकारणे बंड पाखांड वारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १११ ॥
जनीं सांगता ऐकता जन्म गेला ।
परी वादवेवाद तैसाचि ठेला ॥
उठे संशयो वाद हा दंभधारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११२ ॥
जनीं हीत पंडीत सांडीत गेले ।
अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले ॥
तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे ।
मना सर्व जाणीव सांडूनि राहे ॥ ११३ ॥
फुकाचे मुखी बोलता काय वेचे ।
दिसेंदीस अभ्यंतरी गर्व सांचे ॥
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ।
विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥ ११४ ॥
तुटे वाद संवाद तेथे करावा ।
विवेके अहंभाव हा पालटावा ॥
जनीं बोलण्यासारखे आचरावे ।
क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे ॥ ११५ ॥
बहू शापिता कष्टला अंबऋषी ।
तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी ॥
दिला क्षीरसिंधु तया ऊपमानी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११६ ॥
धुरू लेंकरु बापुडे दैन्यवाणे ।
कृपा भाकिता दीधली भेटि जेणे ॥
चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७ ॥
गजेंद्रू महासंकटी वास पाहे ।
तयाकारणे श्रीहरी धावताहे ॥
उडी घातली जाहला जीवदानी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११८ ॥
अजामेळ पापी तया अंत आला ।
कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला ॥
अनाथासि आधार हा चक्रपाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११९ ॥
विधीकारणे जाहला मत्स्य वेगी ।
धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी ॥
जना रक्षणाकारणे नीच योनी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२० ॥
महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला ।
म्हणोनी तयाकारणे सिंह जाला ॥
न ये ज्वाळ वीशाळ सन्नीध कोणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२१ ॥
कृपा भाकिता जाहला वज्रपाणी ।
तया कारणे वामनू चक्रपाणी ॥
द्विजांकारणे भार्गवू चापपाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२२ ॥
अहल्येसतीलागी आरण्यपंथे ।
कुडावा पुढे देव बंदी तयांतें ॥
बळे सोडिता घाव घाली निशाणी ।
नुपेक्षी कदा राम भक्ताभिमानी ॥ १२३ ॥
तये द्रौपदीकारणे लागवेगे ।
त्वरे धावतो सर्व सांडूनि मागे ॥
कळीलागि जाला असे बोध्य मौनी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२४ ॥
अनाथां दिनांकारणे जन्मताहे ।
कलंकी पुढे देव होणार आहे ॥
जया वर्णिता शीणली वेदवाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२५ ॥
जनांकारणे देव लीलावतारी ।
बहुतांपरी आदरे वेषधारी ॥
तया नेणती ते जन पापरूपी ।
दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी ॥ १२६ ॥
जगी धन्य तो राममूखे निवाला ।
कथा ऐकता सर्व तल्लीन जाला ॥
देहेभावना रामबोधे उडाली ।
मनोवासना रामरूपी बुडाली ॥ १२७ ॥
मना वासना वासुदेवी वसो दे ।
मना वासना कामसंगी नसो दे ॥
मना कल्पना वाउगी ते न कीजे ।
मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥
गतीकारणे संगती सज्जनाची ।
मती पालटे सूमती दुर्जनाची ॥
रतीनायिकेचा पती नष्ट आहे ।
म्हणोनी मनातीत होऊनी राहे ॥ १२९ ॥
मना अल्प संकल्प तोही नसावा ।
सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा ॥
जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा ।
रमाकांत एकांतकाळी भजावा ॥ १३० ॥
भजाया जनीं पाहता राम एकू ।
करी बाण एकू मुखी शब्द एकू ॥
क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू ।
धरा जानकीनायकाचा विवेकू ॥ १३१ ॥
विचारूनि बोले विवंचूनि चाले ।
तयाचेनि संतप्त तेही निवाले ॥
बरे शोधल्यावीण बोलो नको हो ।
जनीं चालणे शुद्ध नेमस्त राहो ॥ १३२ ॥
हरीभक्त वीरक्त विज्ञ्यान राशी ।
जेणे मानसी स्थापिले निश्चयासी ॥
तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे ।
तया भाषणे नष्ट संदेह मोडे ॥ १३३ ॥
नसे गर्व आंगी सदा वीतरागी ।
क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी ॥
नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा ।
इही लक्षणी जाणिजे योगिराणा ॥ १३४ ॥
धरी रे मना संगती सज्जनाची ।
जेणे वृत्ति हे पालटे दुर्जनाची ॥
बळे भाव सद्‍बुद्धि सन्मार्ग लागे ।
महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे ॥ १३५ ॥
भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे ।
भयातीत ते संत आनंत पाहे ॥
जया पाहता द्वैत काही दिसेना ।
भय मानसी सर्वथाही असेना ॥ १३६ ॥
जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले ।
परी जीव अज्ञान तैसेचि ठेले ॥
देहेबुद्धिचे कर्म खोटे टळेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३७ ॥
भ्रमे नाढळे वित्त ते गुप्त जाले ।
जिवा जन्मदारिद्र ठाकूनि आले ॥
देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३८ ॥
पुढे पाहता सर्वही कोंदलेसे ।
अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे ॥
अभावे कदा पुण्य गाठी पडेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३९ ॥
जयाचे तया चूकले प्राप्त नाही ।
गुणे गोविले जाहले दुःख देही ॥
गुणावेगळी वृत्ति तेही वळेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १४० ॥
म्हणे दास सायास त्याचे करावे ।
जनीं जाणता पाय त्याचे धरावे ॥
गुरू अंजनेवीण ते आकळेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १४१ ॥
कळेना कळेना कळेना ढळेना ।
ढळे नाढळे संशयोही ढळेना ॥
गळेना गळेना अहंता गळेना ।
बळे आकळेना मिळेना मिळेना ॥ १४२ ॥
अविद्यागुणे मानवा ऊमजेना ।
भ्रमे चूकले हीत ते आकळेना ॥
परीक्षेविणे बांधले दृढ नाणे ।
परी सत्य मिथ्या असे कोण जाणे ॥ १४३ ॥
जगीं पाहतां साच ते काय आहे ।
अती आदरे सत्य शोधून पाहे ॥
पुढे पाहतां पाहतां देव जोडे ।
भ्रम भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥ १४४ ॥
सदा वीषयो चिंतिता जीव जाला ।
अहंभाव अज्ञान जन्मास आला ॥
विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ।
जिवा ऊगमी जन्म नाही स्वभावे ॥ १४५ ॥
दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी ।
अकस्मात आकारले काळ मोडी ॥
पुढे सर्व जाईल काही न राहे ।
मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ १४६ ॥
फुटेना तुटेना चळेना ढळेना ।
सदा संचले मीपणे ते कळेना ॥
तया एकरूपासि दूजे न साहे ।
मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ १४७ ॥
निराकार आधार ब्रह्मादिकांचा ।
जया सांगता शीणली वेदवाचा ॥
विवेके तदाकार होऊनि राहे ।
मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ १४८ ॥
जगीं पाहतां चर्मचक्षीं न लक्षे ।
जगीं पाहतां ज्ञानचक्षीं निरक्षे ॥
जनीं पाहता पाहणे जात आहे ।
मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ १४९ ॥
नसे पीत ना श्वेत ना श्याम काही ।
नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही ॥
म्हणे दास विश्वासता मुक्ति लाहे ।
मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ १५० ॥
खरे शोधितां शोधितां शोधिताहे ।
मना बोधितां बोधितां बोधिताहे ॥
परी सर्वही सज्जनाचेनि योगे ।
बरा निश्चयो पाविजे सानुरागे ॥ १५१ ॥
बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा ।
परी अंतरी पाहिजे तो निवाडा ॥
मना सार साचार ते वेगळे रे ।
समस्तांमधे एक ते आगळे रे ॥ १५२ ॥
नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने ।
समाधान काही नव्हे तानमाने ॥
नव्हे योगयागे नव्हे भोगत्यागे ।
समाधान ते सज्जनाचेनि योगे ॥ १५३ ॥
महावाक्य तत्त्वादिके पंचकर्णे ।
खुणे पाविजे संतसंगे विवर्णे ॥
द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो ।
तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो ॥ १५४ ॥
दिसेना जनीं तेची शोधूनि पाहे ।
बरे पाहता गूज तेथेचि आहे ॥
करी घेऊ जाता कदा आढळेना ।
जनीं सर्व कोंदाटले ते कळेना ॥ १५५ ॥
म्हणे जाणता तो जनीं मूर्ख पाहे ।
अतर्कासि तर्की असा कोण आहे ॥
जनीं मीपणे पाहता पाहवेना ।
तया लक्षिता वेगळे राहवेना ॥ १५६ ॥
बहू शास्त्र धुंडाळिता वाड आहे ।
जया निश्चयो येक तोही न साहे ॥
मती भांडती शास्त्रबोधे विरोधे ।
गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे ॥ १५७ ॥
श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे ।
स्मृती वेद वेदांतवाक्ये विचित्रे ॥
स्वये शेष मौनावला स्थीर पाहे ।
मना सर्व जाणीव सांडून राहे ॥ १५८ ॥
जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची ।
तया भोजनाची रुची प्राप्त कैची ॥
अहंभाव ज्या मानसीचा विरेना ।
तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना ॥ १५९ ॥
नको रे मना वाद हा खेदकारी ।
नको रे मना भेद नाना विकारी ॥
नको रे मना शीकवू पूढिलांसी ।
अहंभाव जो राहिला तूजपासी ॥ १६० ॥
अहंतागुणे सर्वही दुःख होते ।
मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते ॥
सुखी राहता सर्वही सूख आहे ।
अहंता तुझी तुंची शोधून पाहे ॥ १६१ ॥
अहंतागुणे नीति सांडी विवेकी ।
अनीतीबळे श्लाघ्यता सर्व लोकी ॥
परी अंतरी सर्वही साक्ष येते ।
प्रमाणांतरे बुद्धि सांडूनि जाते ॥ १६२ ॥
देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला ।
देहातीत ते हीत सांडीत गेला ॥
देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६३ ॥
मने कल्पिला वीषयो सोडवावा ।
मने देव निर्गूण तो ओळखावा ॥
मने कल्पिता कल्पना ते सरावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६४ ॥
देहादीक प्रपंच हा चिंतियेला ।
परी अंतरी लोभ निश्चित ठेला ॥
हरीचिंतने मुक्तिकांता वरावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६५ ॥
अहंकार विस्तारला या देहाचा ।
स्त्रियापुत्रमित्रादिकें मोह त्यांचा ॥
बळे भ्रांति हे जन्मचिंता हरावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६६ ॥
बरा निश्चयो शाश्वताचा करावा ।
म्हणे दास संदेह तो वीसरावा ॥
घडीने घडी सार्थकाची करावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६७ ॥
करी वृत्ती जो संत तो संत जाणा ।
दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा ॥
उपाधी देहेबुद्धीते वाढवीते ।
परी सज्जना केवि बाधू शके ते ॥ १६८ ॥
नसे अंत आनंत संता पुसावा ।
अहंकारविस्तार हा नीरसावा ॥
गुणेंवीण निर्गूण तो आठवावा ।
देहेबुद्धिचा आठवू नाठवावा ॥ १६९ ॥
देहेबुद्धि हे ज्ञानबोधे त्यजावी ।
विवेके तये वस्तुची भेटी घ्यावी ॥
तदाकार हे वृत्ति नाही स्वभावे ।
म्हणोनि सदा तेचि शोधीत जावे ॥ १७० ॥
असे सार साचार ते चोरलेसे ।
इही लोचनी पाहता दृश्य भासे ॥
निराभास निर्गूण ते आकळेना ।
अहंतागुणे कल्पिताही कळेना ॥ १७१ ॥
स्फुरे वीषयी कल्पना ते अविद्या ।
स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या ॥
मुळी कल्पना दो रुपे तेचि जाली ।
विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली ॥ १७२ ॥
स्वरूपी उदेला अहंकार राहो ।
तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो ॥
दिशा पाहता ते निशा वाढताहे ।
विवेके विचारे विवंचूनि पाहे ॥ १७३ ॥
जया चक्षुने लक्षिता लक्षवेना ।
भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना ॥
क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो ।
दयादक्ष तो साक्षिने पक्ष घेतो ॥ १७४ ॥
विधी निर्मितां लीहितो सर्व भाळी ।
परी लीहिता कोण त्याचे कपाळी ॥
हरू जाळितो लोक संहारकाळी ।
परी शेवटी शंकरा कोण जाळी ॥ १७५ ॥
जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा ।
असंख्यात संख्या करी कोण शक्रा ॥
जगी देव धुंडाळिता आढळेना ।
जगी मुख्य तो कोण कैसा कळेना ॥ १७६ ॥
तुटेना फुटेना कदा देवराणा ।
चळेना ढळेना कदा दैन्यवाणा ॥
कळेना कळेना कदा लोचनासी ।
वसेना दिसेना जगी मीपणासी ॥ १७७ ॥
जया मानला देव तो पूजिताहे ।
परी देव शोधूनि कोणी न पाहे ॥
जगी पाहता देव कोट्यानुकोटी ।
जया मानली भक्ति जे तेचि मोठी ॥ १७८ ॥
तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले ।
तया देवरायासि कोणी न बोले ॥
जगी थोरला देव तो चोरलासे ।
गुरूवीण तो सर्वथाही न दीसे ॥ १७९ ॥
गुरु पाहतां पाहतां लक्ष कोटी ।
बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी ॥
मनी कामना चेटके धातमाता ।
जनीं व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता ॥ १८० ॥
नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदू ।
नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू ॥
नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू ।
जनीं ज्ञानिया तोचि साधू अगाधू ॥ १८१ ॥
नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी ।
क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी ॥
मुखे बोलिल्यासारखे चालताहे ।
मना सद्‍गुरू तोचि शोधूनि पाहे ॥ १८२ ॥
जनीं भक्त ज्ञानी विवेकी विरागी ।
कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी ॥
प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे ।
तयाचेनि योगे समाधान बाणे ॥ १८३ ॥
नव्हे तेंचि जाले नसे तेंचि आले ।
कळों लागले सज्जनाचेनि बोले ॥
अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे ।
मना संत आनंत शोधीत जावे ॥ १८४ ॥
लपावे अती आदरे रामरूपी ।
भयातीत निश्चीत ये स्वस्वरूपी ॥
कदा तो जनीं पाहताही दिसेना ।
सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना ॥ १८५ ॥
सदा सर्वदा राम सन्नीध आहे ।
मना सज्जना सत्य शोधून पाहे ॥
अखंडीत भेटी रघूराजयोगू ।
मना सांडि रे मीपणाचा वियोगू ॥ १८६ ॥
भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे ।
परी सर्वही स्वस्वरूपी न साहे ॥
मना भासले सर्व काही पहावे ।
परी संग सोडूनि सूखी रहावे ॥ १८७ ॥
देहेभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे ।
विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे ॥
विरक्तीबळे निंद्य सर्वै त्यजावे ।
परी संग सोडूनि सूखे रहावे ॥ १८८ ॥
मही निर्मिली देव तो ओळखावा ।
जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा ॥
तया निर्गुणालागी गूणी पहावे ।
परी संग सोडूनि सूखी रहावे ॥ १८९ ॥
नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता ।
परेहून पर्ता न लिंपे विवर्ता ॥
तया निर्विकल्पासि कल्पीत जावे ।
परी संग सोडूनि सूखी रहावे ॥ १९० ॥
देहेबुद्धिचा निश्चयो ज्या ढळेना ।
तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना ॥
परब्रह्म ते मीपणे आकळेना ।
मनी शून्य अज्ञान हे मावळेना ॥ १९१ ॥
मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे ।
दुजेवीण ते ध्यान सर्वोत्तमाचे ॥
तया खूण ते हीन दृष्टांत पाहे ।
तेथे संग निःसंग दोन्ही न साहे ॥ १९२ ॥
नव्हे जाणता नेणता देवराणा ।
न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा ॥
नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा ।
श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ॥ १९३ ॥
वसे हृदयी देव तो कोण कैसा ।
पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा ॥
देहे टाकिता देव कोठे रहातो ।
परी मागुता ठाव कोठे पहातो ॥ १९४ ॥
वसे हृदयी देव तो जाण ऐसा ।
नभाचेपरी व्यापकू जाण तैसा ॥
सदा संचला येत ना जात काही ।
तयावीण कोठे रिता ठाव नाही ॥ १९५ ॥
नभी वावरे जो अणूरेणु काही ।
रिता ठाव या राघवेवीण नाही ॥
तया पाहता पाहता तेंचि जाले ।
तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले ॥ १९६ ॥
नभासारिखे रूप या राघवाचे ।
मनी चिंतिता मूळ तूटे भवाचे ॥
तया पाहता देहबुद्धि उरेना ।
सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना ॥ १९७ ॥
नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे ।
रघूनायका ऊपमा ते न साहे ॥
दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावे ।
तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे ॥ १९८ ॥
अती जीर्ण विस्तीर्ण तें रूप आहे ।
तेथे तर्क संपर्क तोही न साहे ॥
अती गूढ ते दृश्य तत्काळ सोपे ।
दुजेवीण जे खूण स्वामिप्रतापे ॥ १९९ ॥
कळे आकळे रूप ते ज्ञान होता ।
तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था ॥
मना उन्मनी शब्द कुंठीत राहे ।
तो गे तोचि तो राम सर्वत्र पाहे ॥ २०० ॥
कदा ओळखीमाजि दूजे दिसेना ।
मनी मानसी द्वैत काही वसेना ॥
बहूतां दिसां आपली भेटि जाली ।
विदेहीपणे सर्व काया निवाली ॥ २०१ ॥
मना गूज रे तूज हे प्राप्त झाले ।
परी अंतरी पाहिजे यत्न केले ॥
सदा श्रवणे पाविजे निश्चयासी ।
धरी सज्जनसंगती धन्य होसी ॥ २०२ ॥
मना सर्वही संग सोडूनि द्यावा ।
अती आदरे सज्जनाचा धरावा ॥
जयाचेनि संगे महादुःख भंगे ।
जनीं साधनेवीण सन्मार्ग लागे ॥ २०३ ॥
मना संग हा सर्वसंगास तोडी ।
मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी ॥
मना संग हा साधकां शीघ्र सोडी ।
मना संग हा द्वैत निःशेष मोडी ॥ २०४ ॥
मनाची शते ऐकता दोष जाती ।
मतीमंद ते साधना योग्य होती ॥
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी ।
म्हणे दास विश्वासता मुक्ति भोगी ॥ २०५ ॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

GO TOP

samartha