॥ पञ्चदशी ॥
त्रयोदशः परिच्छेदः - ब्रह्मानन्दे अद्वैतानन्दः

योगानन्दः पुरोक्तो यः स आत्मानन्द इष्यताम् ।
कथं ब्रह्मत्वमेतस्य सद्वयस्येति चेच्छृणु ॥ १ ॥

आकाशादिस्वदेहान्तं तैत्तिरीयश्रुतीरितम् ।
जगन्नास्त्यन्यदानन्दादद्वैतब्रह्मता ततः ॥ २ ॥
आनन्दादेव तज्जातं तिष्ठत्यानन्द एव तत् ।
आनन्द एव लीनं चेत्युक्तानन्दात्कथं पृथक् ॥ ३ ॥

कुलालाद्घट उत्पन्नो भिन्नश्चेति न शङ्क्यताम् ।
मृद्वदेषः उपादानं न निमित्तं कुलालवत् ॥ ४ ॥

स्थितिर्लयश्च कुम्भस्य कुलाले स्तो न हि क्वचित् ।
दृष्टौ तौ मृदि तद्वत्स्यादुपादानं तयोः श्रुतेः ॥ ५ ॥


उपादानं त्रिधा भिन्नं विवर्ति परिणामि च ।
आरम्भकं च तत्रान्त्यौ न निरंशेऽवकाशिनौ ॥ ६ ॥
आरम्भवादिनोन्यस्मादन्यस्योत्पत्तिमूचिरे ।
तन्तोः पटस्य निष्पत्तेर्भिन्नौ तन्तुपटौ खलु ॥ ७ ॥
अवस्थान्तरतापत्तिरेकस्य परिणामिता ।
स्यात् क्षीरं दधि मृत्कुम्भः सुवर्णं कुण्डलं यथा ॥ ८ ॥
अवस्थान्तरभानं तु विवर्तो रज्जुसर्पवत् ।
निरंशेऽप्यस्त्यसौ व्योम्नि तलमालिन्यकल्पनात् ॥ ९ ॥

ततो निरंश आनन्दे विवर्तो जगदिष्यताम् ।
मायाशक्तिः कल्पिका स्यादैन्द्र जालिकशक्तिवत् ॥ १० ॥

या प्रकरणांत अद्वैतानंद म्हणजे काय व तो विवकोपासून कसा प्राप्त होतो, तें येथे संवादरूपाने सांगत. शि० -आपण ज्या आत्मानंदाचे विवेचन केलें, तो आणि योगानंद हे एकच म्हणता; परंतु मिथ्यात्मा व गौणात्मा असे त्यास प्रतियोगी असल्यामुळें सजातीयत्वादि भेद येऊ पाहतो. तेव्हां या द्वितीयानंदास ब्रह्मत्व कसें येईल ? ॥ १ ॥
गु० -हा आत्मानंद अद्वितीयच आहे. कारण तैत्तिरीय श्रुध्ये "तस्माद्वा एतस्मात् आत्मन आकाश"या वाक्याने आकाशापासून आमचे देहापर्यंत सर्व जग आत्मानंदातून निराळें नाहीं असें ठरतें. त्यावरून तो अद्वितीय ब्रह्मच म्हटला पाहिजे. ॥ २ ॥
शि० -पण ती श्रुति आत्म्याविषयी आहे अनंदाविषयी नाहीं. गु० -अरे आत्मा आणि आनंद यांत कांहीं भेद नाहीं. आनंदाविषयीचेच प्रमाण पाहिजे तर दुसरे आहे तें तुला सांगतो म्हणजे झाले कश्रुतींत असेही म्हटले आहे कीं, हें जग आनंदापासून झालें आहे, त्यांतच तें राहते व त्यांतच तें लीन होतें. म्हणून तें आनंदापासून भिन्न नाहीं. कारण कार्य हें कारणापासन भिन्न नसतें. ॥ ३ ॥
शि० -कारण कार्यापासन भिन्न नसतें असा जो आपण नियम केला, त्यास अपवाद आहे. कुलालापासून घट उत्पन्न होतो म्हणून कुलाल हा त्याचें कारण झालें पण तो घटापासून भिन्न आहे काय ? गु० - आमचा आनंद घटाचे उपादान कारण जसे माती, तसा जगाला उपदान कारण आहे. कुलालाप्रमाणे निमित्त कारण नव्हे. ॥ ४ ॥
शि० -कुलालच कां उपादान कारण म्हणूं नये. गु० -उपदान कारणाचे लक्षण हेंच कीं, तें स्थिति आणि लय या दोहोंस आधार असतें. घटाच्या स्थितिलयांस कुलाल आधार होत नसल्यामुळें उपादानाचें लक्षण त्यास लागू पडत नाहीं. परंतु घटाचे स्थितिलय मातीत होतात, म्हणून माती हें उपादान कारण घटाचें होय. त्याचपप्रमाणे जगाच्या स्थितिलयांस श्रुतींत सांगितल्याप्रमाणे आनंद हा आधार आहे म्हणून तो जगाचा उपादान म्हटला पाहिजे. ॥ ५ ॥
शि० -उपादान कारणाचें लक्षण समजले मग पुढें काय ? गु० -हे उपादान कारण तीन प्रकारचे आहे. विवर्ति परिणामि आणि आरंभक. यांपैकी शेवटच्या दोन प्रकारांला निरवयव वस्तूंत अवकाशच मिळत नाहीं. ॥ ६ ॥
शि० -त्या तिन्ही प्रकारांचे विवरण कृपा करून सांगा. गु० -आरंभवाद्यांचे मत असें आहे कीं एका कारणापासन निराळ्याच प्रकारचे कार्य उत्पन्न होते. यास उदाहरण तंतूपासून पट उत्पन्न होतो. येथें तंतु आणि पट भिन्न आहेत. ॥ '७ ॥
एका पदार्थाचे जे अवस्थांतर होतें, त्याला परिणाम म्हणतात. दूध, दही, माती, घट, सुवर्ण, कुंडल ॥ ८ ॥

आणि वस्तूची पूर्वावस्था न जातां अवस्थांतराचा जो भास होतो तोच विवर्त, जसा रज्जूवर सर्पाचा भास होतो. शि० -पण रज्जू सावयव आहे. गु० -हा विवर्त सावयवावर जसा घडतो, तसा निरवयवावरही घडतो. यास उदाहरण आकाशाचे. आकाशास वस्तुत: रंग कोणचाच नसून तें निळे दिसते. ॥ ९ ॥
शि०- मग तुमच्या आनंदाला कोणचा प्रकार लागू पडतो ? गु० -आनंदास विवर्त लागू पडतो. जसा रज्जूवर सर्प भासतो त्याप्रमाणें आनंदावर हे जग भासत आहे. शि० -तुमचा आनंद अद्वितीय आहे असें म्हणता. त्यावर जगाची कल्पना तरी कशी झाली ? गु० -मायेमुळें झाली. जशी ऐंद्रजालिक शक्तीला गंरधग्वनगरादिकांची कल्पना करतां येते, त्याप्रमाणें मायेमुळे जगाची कल्पना झाली. ॥ १० ॥


शक्तिः शक्तात्पृथङ्नास्ति तद्वद्दृष्टेर्न चाभिदा ।
प्रतिबन्धस्य दृष्टत्वाच्छक्त्यभावे तु कस्य सः ॥ ११ ॥


शक्तेः कार्यानुमेयत्वादकार्ये प्रतिबन्धनम् ।
ज्वलतोऽग्नेरदाहे स्यान्मन्त्रादि प्रतिबन्धता ॥ १२ ॥

देवात्मशक्तिं स्वगुणैर्निगूढां मुनयोऽविदन् ।
परास्य शक्तिर्विविधा क्रियाज्ञानबलात्मिका ॥ १३ ॥
इति वेदवचः प्राह वसिष्ठश्च तथाऽब्रवीत् ।
सर्वशक्तिपरं ब्रह्म नित्यमापूर्णमद्वयम् ॥ १४ ॥
यथोल्लसति शक्त्यासौ प्रकाशमधिगच्छति ।
चिच्छक्तिर्ब्रह्मणो राम शरीरेषूपलभ्यते ॥ १५ ॥
स्पन्दशक्तिश्च वातेषु दार्ढ्यशक्तिस्तथोपले ।
द्रवशक्तिस्तथाम्भःसु दाहशक्तिस्तथानले ॥ १६ ॥
शून्यशक्तिस्तथाकाशे नाशशक्तिर्विनाशिनि ।
यथाण्डान्तर्महासर्पो जगदस्ति तथात्मनि ॥ १७ ॥
फलपत्रलतापुष्पशाखाविटपमूलवान् ।
तनु बीजे यथा वृक्षस्तथेदं ब्रह्मणि स्थितम् ॥ १८ ॥
क्व चित्काश्चित्कदाचिच्च तस्मादुद्यन्ति शक्तयः ।
देशकालविचित्रत्वात्क्ष्मातलादिव शालयः ॥ १९ ॥
स आत्मा सर्वगो राम नित्योदितमहावपुः ।
यन्मनाङ्मननीं शक्तिं धत्ते तन्मन उच्यते ॥ २० ॥

शि० -मायेमुळे जर जगाची कल्पना झाली, तर तुमच्या आनंदाखेरीज दुसरी माया म्हणून एक आहेच, तेव्हां अर्थात द्वैत आलें. गु० -ज्या पदार्थाचे अमुक निरूपणच करतां येत नाहीं, तो मिथ्याच म्हटला पाहिजे. माया ही एक शक्ति आहे. ती जर आनंदापासून निराळी समजावी तर शक्त पदार्थांपासून शक्ति मुळींच निराळी नाहीं, असा आमचा अनुभव आहे. बरे निराळी नाहीं म्हणावी तर काही कारणांनी तिचा प्रतिबंध होतो. शक्ति जर निराळी नसेल तर प्रतिबंध कोणाला होईल. म्हणून ती अनिर्वचनीय आहे. ॥ ११ ॥
शि० -शक्ति मुळी अतींद्रिय पडली मग तिचा प्रतिबंध कसा ओळखावा ? गु० -शक्तीचें अनुमान कार्यावरून करावयाचें. तें कार्य बंद झालें म्हणजे प्रतिबंध झाला अस समजावे. यास उदाहरण अग्नीचे. अग्निशक्ति तिचे जें कार्य दाहकत्व त्यावरून समजावयाची. तें कार्य नाहींसें झालें म्हणजे शक्तीस मंत्रादिकांचा प्रतिबंध झाला असें समजावे. ॥ १२ ॥
याप्रमाणे याविषयीं उपनिषदांत प्रमाण आहे तें असें कीं, मोठमोठे मुनि परमात्म्याची शक्ति तिचे कार्यामध्ये झाकली असें ध्यान करून पाहते झाले. दुसरे एके ठिकाणी म्हटलें आहे कीं, ह्या परमात्मशक्तीचे स्वरूप क्रिया ज्ञान बलरूप आहे. ॥ १३
योगवासिष्ठांतही असेंच सांगितले आहे. वसिष्ठ म्हणतात हे रामा, हें परब्रह्म नित्य पूर्ण अद्वितीय असून सर्व शक्ति त्याच्याच आहेत. ॥ १४ ॥
त्या शक्तीच्या योगाने जेव्हां ब्रह्म प्रफुल्लित होतें, तेव्हां हे जग दिसूं लागतें. ती शक्ति जीवाचे ठायीं चेतनरूप आहे. ॥ १५ ॥

वायूत चलनरूप आहे. दगडांत दार्ढ्यरूप आहे. उदकांत द्रवरूप आहे. अग्नींत दाहरूप आहे. ॥ १६ ॥

आकाशांत शून्यरूप व विनाशी पदार्थात नाशरूप आहे. ज्याप्रमाणें लहानशा अंड्यामध्ये महासर्प गुप्तरूपाने असतो किंवा एका लहनशा बीजामध्ये फलपुष्पशाखामूलयुक्त वृक्ष असतो, त्याप्रमाणें हें सर्व जग ब्रह्माचेठायी मावले आहे. ॥ १७-१८ ॥


पृथ्वीच्या ज्याप्रमाणें अमुकच देशांत अमुक काळीं अमुकच प्रकारची धान्य फळें पिकतात, त्याप्रमाणें या ब्रह्मावर देशकालाप्रमाणें निरनिराळ्या शक्ति उत्पन्न होतात. ॥ १९ ॥
हे रामा, असा जो सर्वव्यापी आत्मा त्यापासून पूर्वी मनन शक्ति जी उत्पन्न झाली त्यास मन असें म्हणतात. ॥ २० ॥


आदौ मनस्तदनुबन्धविमोक्षदृष्टीः
     पश्चात्प्रपञ्चरचना भुवनाभिधाना ।
इत्यादिका स्थितिरियं हि गता प्रतिष्ठा-
     माख्यायिका सुभगबालजनोदितेव ॥ २१ ॥
बालस्य हि विनोदाय धात्री शक्ति शुभां कथाम् ।
क्वचित्सन्ति महाबाहो राजपुत्रास्त्रयः शुभाः ॥ २२ ॥
द्वौ न जातौ तथैकस्तु गर्भ एव न च स्थितः ।
वसन्ति ते धर्मयुक्ता अत्यन्तासति पत्तने ॥ २३ ॥
स्वकीयाच्छून्यनगरान्निर्गत्य विमलाशयाः ।
गच्छन्तो गगने वृक्षान् ददृशुः फलशालिनः ॥ २४ ॥
भविष्यन्नगरे तत्र राजपुत्रास्त्रयोऽपि ते ।
सुखमद्य स्थिता पुत्र मृगयाव्यवहारिणः ॥ २५ ॥
धात्र्यैवं कथिता राम बालकाख्यायिका शुभा ।
निश्चयं स ययौ बालो निर्विचारणया धिया ॥ २६ ॥
इयं संसार रचना विचारोज्झितचेतसाम् ।
बालकाख्यायिकेवेत्थमवस्थितिमुपागता ॥ २७ ॥
इत्यादिभिरुपाख्यानैर्मायाशक्तेस्तु विस्तरम् ।
वसिष्ठः कथयामास सैव शक्तिर्निरूप्यते ॥ २८ ॥
कार्यादाश्रयतः सैषा भवेच्छक्तिर्विलक्षणा ।
स्फोटाङ्गारौ दृश्यमानौ शक्तिस्तत्रानुमीयते ॥ २९ ॥
पृथुबुध्नोदराकारो घटः कार्योऽत्र मृत्तिका ।
शब्दादिभिः पञ्चगुणैर्युक्ता शक्तिस्त्वतद्विधा ॥ ३० ॥

आधी मन झाले. त्यानंतर बंधमोक्षांची कल्पना; त्यानंतर त्रिभुवनात्मक प्रपंचरचना अशी ही जगस्थिति लहान मुलांस सांगितलेल्या कहाणीप्रमाणे खोटी असून खऱ्यामध्यें मोडूं लागली. ॥ २१ ॥


ती कहाणी तुला सांगतो. एक दाई बाळाला त्याच्या विनोदाकरितां अशी एक कहाणी सांगू लागली कीं बाळा, तीन राजपुत्र होते. ॥ २२ ॥
त्यांपैकीं दोन मुळीच झाले नाहींत आणि तिसरा तर गर्भातच नव्हता. ते धर्माचरणांत चांगले असून एका नसणाऱ्या शहरी राहत होते. ॥ २३ ॥
एके दिवशीं आपल्या शून्य नगरांतून निरिच्छ मनाने बाहेर जात असतां आकाशामध्यें त्यांना फळांनी भरलेले असे कांहीं वृक्ष दृष्टीस पडले. ॥ २४ ॥
तेथें पुढें होणाऱ्या नगरींत ते तीनही रात्र आज शिकार करीत मौजेने राहिले आहेत. ॥ २५ ॥

हे रामा, याप्रमाणे दायीने सांगितलेली कथा ऐकून घेऊन अज्ञानामुळे ती खरी आहे असें बाळास वाटलें ॥ २६ ॥

त्या कहाणीप्रमाणें ही संसाररचनाही अविचारी लोकांस खरी वाटली आहे. ॥ २७ ॥

अशाच आणखी दुसऱ्या कथा सांगून वसिष्ठांनीं रामास मायाशाक्तीचा विस्तार दर्शविला. तिचेच निरूपण आतां आम्ही करतो. ॥ २८ ॥
ही मायाशक्ति जगद्‌रूप कार्यापासून आणि आश्रयरूप ब्रह्मापासून विलक्षण आहे. यास दृष्टांत अग्नीची शक्ति भाजून आलेल्या प्रत्यक्ष फोडापासून व प्रत्यक्ष निखार्‍यापासून भिन्न आहे असें अनुमान होतें. ॥ २९ ॥
दुसरें उदाहरण घटाचें. मोठा आणि वाटोळ्या आकाराचा जो घट तद्‌रूप कार्य प्रत्यक्ष असतें, आणि शब्दादि पांच गुणांनी युक्त मृत्तिका ही प्रत्यक्षच आहे. परंतु ज्या शक्तीनें हा घट झाला ती शक्ति दोहोंपासून निराळीच आहे. ॥ ३० ॥


न पृथ्वादिर्न शब्दादिः शक्तावस्तु यथा तथा ।
अत एव ह्यचिन्त्यैषा न निर्वचनमर्हति ॥ ३१ ॥
कार्योत्पत्तेः पुरा शक्तिर्निगूढा मृद्यवस्थिता ।
कुलालादिसहाय्येन विकाराकारतां व्रजेत् ॥ ३२ ॥
पृथ्व्यादि विकारान्तं स्पर्शादिं चापि मृत्तिकाम् ।
एकीकृत्य घटं प्राहुर्विचारविकला जनाः ॥ ३३ ॥
कुलालव्यापृतेः पूर्वो यावानंशः स नो घटः ।
पश्चात्तु पृथुबुध्नादिमत्त्वे युक्ता हि कुम्भता ॥ ३४ ॥

स घटो न मृदो भिन्नो वियोगे सत्यनीक्षणात् ।
नाप्यभिन्नः पुरा पिण्डदशायामनवेक्षणात् ॥ ३५ ॥
अतोऽनिर्वचनीयोऽयं शक्तिवत्तेन शक्तिजः ।
अव्यक्तव्ये शक्तिरुक्ता व्यक्तत्ये घटनामभृत् ॥ ३६ ॥
ऐन्द्रजालिकनिष्ठापि माया न व्यज्यते पुरा ।
पश्चाद्‌गन्धर्वसेनादिरूपेण व्यक्तिमाप्नुयात् ॥ ३७ ॥
एवं मायामयत्वेन विकारस्यानृतात्मताम् ।
विकाराधारमृद्वस्तुसत्यत्वं चाब्रवीच्छ्रुतिः ॥ ३८ ॥
वाङ्निष्पाद्यं नाममात्रं विकारो नास्य सत्यता ।
स्पर्शादि गुणयुक्ता तु सत्या केवलमृत्तिका ॥ ३९ ॥
व्यक्ताव्यक्ते तदाधार इति त्रिष्वाद्ययोर्द्वयोः ।
पर्यायः कालभेदेन तृतीयस्त्वनुगच्छति ॥ ४० ॥

पृथ्वादिक जो घटाचा आकार तोही ती नव्हे, आणि शब्दादि गुणयुक्त मृत्तिका जी घटाचा आश्रय तीही ती नव्हे; म्हणून ती कशी आहे हें सांगतां येत नाही याकरिता ती अचिंत्य असून अनिर्वचनीय आहे. ॥ ३१ ॥
ही शक्ति घटरूप कार्य होण्यापूवी मृत्तिकेमध्ये गुप्त असते. मग पुढे कुंभार, त्याचें चक्र इत्यादिकांच्या साहाय्याने आकाराप्रत पावते. ॥ ३२ ॥
शि० -कारणापासून शक्तीचे कार्य अगदी निराळें असून तो कार्यकारणभेद लोकांस कां समजत नाहीं ? गु०-मोठा आणि वाटोळा असा आकार आणि स्पर्शादि गुणांनी युक्त मृत्तिका, हे दोन्हीही एकवट करून अविवेकी लोक त्यास घट असें म्हणतात. ॥ ३३ ॥
शि० -ते अविवेकी कसे ? गु० -अविवेकी नव्हे तर काय ? कुंभाराचा हात लागण्यापूर्वी जो मृत्तिकेचा अंश तोच हात लागल्यानंतरही असतो, असें असून केवळ मोठ्या वाटोळ्या पोटाचा जो आकार त्याला घट म्हणणे हें अज्ञान नव्हे काय ? पूर्वी घट नसून एकाएकी मागून कोठून आला ? ॥ ३४ ॥
शि० -घट प्रत्यक्ष खरा असून तो खाटा कसा म्हणावा ? गु० -खोटा नव्हे तर काय ? मृत्तिकेपासून तो जर भिन्न केला, तर मुळींच दिसत नाहीं; म्हणून मृत्तिकेहून निराळा नाहीं. बरें मृत्तिकाच घट म्हणावी, तर पूर्वीचे पिडदशेंत तो मुळींच दिसते नाहीं. ॥ ३५ ॥
याकरितां शक्तीप्रमाणें हा घटही अनिर्वचनीयच आहे. तो शक्तीचे कार्य आहे. घटाच्या अव्यक्त स्थितीला शक्ति म्हणतात, आणि व्यक्त स्थितीला घट असें म्हणतात. ॥ ३६ ॥
लोकांमध्ये जी ऐंद्रजालिक माया दृष्टीस पडते, तीही पूर्वी दृष्टीस पडत नाहीं. मणीमंत्राचा प्रयोग झाल्यानंतर गंधर्वसेनादिरूपानें ती स्पष्ट होते. ॥ ३७ ॥
याप्रमाणें छांदोग्यश्रुतीत "वाचारंभणं विकारो नामधेयं मृत्तिकेत्येव सत्यं" या वाक्याने विकाराला मायामयत्वामुळें श्रुतींने खोटेपणा दिला, आणि विकाराला आधारभूत जी मृत्तिका ती खरी आहे असें सांगितले. ॥ ३८ ॥
वाणीनें उच्चार केलेला घट हा शब्द केवळ नाममात्र आहे. या नांवावाचून खरे स्वरूप कोणचेंच नाही; म्हणून घट असत्य झाला. परंतु स्पर्शादि गुणांनी युक्त अशी जी केवळ मृत्तिका ती मात्र सत्य आहे ॥ ३९ ॥
कारण शक्ति, तिचे कार्य घट आणि त्यास आधारभूत मृत्तिका या तिहींमध्ये पूर्वीची दोन, एकदा असणारी व एकदा नसणारी अशी कालभेदास पात्र आहेत. आणि तिसरी जी मृत्तिका ती कालत्रयीही नाश पावत नसल्यामुळें सत्य आहे ॥ ४० ॥


निस्तत्त्वं भासमानं च व्यक्तमुत्पत्तिनाशभाक् ।
तदुत्पत्तौ तस्य नाम वाचा निष्पाद्यते नृभिः ॥ ४१ ॥
व्यक्ते नष्टेऽपि नामैतन्नृवक्त्रेष्वनुवर्तते ।
तेन नाम्ना निरूप्यत्वाद्‌व्यक्तं तद्‌रूपमुच्यते ॥ ४२ ॥
निस्तत्त्वत्वाद्विनाशित्वाद्वाचारम्भणनामतः ।
व्यक्तस्य न तु तद्‌रूपं सत्यं किञ्चिन्मृदादिवत् ॥ ४३ ॥
व्यक्तकाले ततः पूर्वमूर्ध्वमप्येकरूपभाक् ।
स तत्त्वमविनाशं च सत्यं मृद्वस्तु कथ्यते ॥ ४४ ॥

व्यक्तं घटो विकारश्चेत्येतैर्नामभिरीरितः ।
अर्थश्चेदनृतः कस्मान्न मृद्बोधे निवर्तते ॥ ४५ ॥

निवृत्त एव यस्मात्ते तत्सत्यत्वमतिर्गता ।
ईदृङ्निवृत्तिरेवात्र बोधजा न त्वभासनम् ॥ ४६ ॥

पुमानधोमुखो नीरे भातोऽप्यस्ति न वस्तुतः ।
तटस्थमर्त्यवत्तस्मिन्नैवास्था कस्यचित्क्वचित् ॥ ४७ ॥

ईदृग्बोधे पुमर्थत्वं मतमद्वैतवादिनाम् ।
मृद्‌रूपस्य परित्यागाद्विवर्तत्वं घटे स्थितम् ॥ ४८ ॥


परिणामे पूर्वरूपं त्यजेत्तत्क्षीररूपवत् ।
मृत्सुवर्णे निवर्तेते घटकुण्डलयोर्न हि ॥ ४९ ॥

घटे भग्ने न मृद्‌भावः कपालानामवेक्षणात् ।
मैवं चूर्णेऽस्ति मृद्‌रूपं स्वर्णरूपं त्वतिस्फुटम् ॥ ५० ॥

शि० -मग एकून घट खोटाच तर ? गु० -यांत संशय काय ? जो पदार्थ स्वतः निस्तत्त्व असून व्यक्त झाल्यावर मात्र भासणारा, ज्याला उत्पत्ति व नाश आहेत व ज्याला कांहीं एका नावाने ओळखावयाचा, असा जो घट त्याला सत्य कोण म्हणेल ? ॥ ४१ ॥
घट शब्दान घटाचा व्यवहार असल्यामुळे घटाच स्वरूप शब्दात्मकच आहे, कारण व्यक्त कार्य नष्ट झाल्यावरही घट हें नांव मनुष्याचे तोंडांत तसेंच असतें. ॥ ४२ ॥
घटरूप कार्य निस्तत्त्व आहे, नाशवंत आहे आणि केवळ शब्दात्मक आहे. म्हणून हें घटाचे स्वरूप मृत्तिकेप्रमाणे सत्य म्हणतां येत नाहीं. ॥ ४३ ॥
शिं०-मग मृत्तिकेमध्यें तरी सत्यत्वाचे गूण कुठे आहेंत ? गु० -खर्‍याचें लक्षण म्हणजे हेंच कीं, त्यांत कांहीं तत्त्व असून कालत्रयीही त्याचा नाश होऊं नये. माती तशीच आहे. घट व्यक्त असतांनाही तीच आहे, घटापूर्वीही तीच आहे आणि घट फुटल्यानंतरही तीच आहे. म्हणून ती येथें सत्यच म्हटली पाहिजे. ॥ ४४ ॥
शि -व्यक्त, घट आणि विकार या तीन शब्दांनी दर्शविलेला जो घटपदार्थ, तो जर खोटा तुम्ही खोटां म्हणतां, तर शुक्तिकाज्ञानानें जसे रजत नाहीसे होते तसा मृत्तीकेच्या ज्ञानाने तोही कां नष्ट होत नाही ? गु० -अरे, ज्या अर्थीं घटाविषयीची सत्यत्वबुद्धि नष्ट झाली त्या अर्थीं तो घट नष्ट झाला असेंच समजले पाहिजे. ॥ ४५ ॥
शिष० -पण शुक्तिज्ञानानें रजत अगदीच नाहीसे होतें. गु० -त्याचें कारण हेंच कीं, तो रजतभ्रम निरुपाधिक आहे; परंतु येथें तसें नाहीं, येथील भ्रम सोपाधिक आहे. म्हणून अधिष्ठानज्ञानापासून होणारी जी निवृत्ति तिचा अर्थ त्या वस्तूचे आभान असें समजू नये. ती खोटी आहे असें समजले म्हणजे झाले. ॥ ४६॥
शि० -मला तुमचे म्हणणें नीट समजले नाहीं. गु० -याविषयी तुला एक दृष्टांत देतो म्हणजे समजेल कल्पना कर कीं, नदीतीरीं एक मनुष्य उभा असून त्याचें अधोमुख प्रतिबिंब आत पडलें आहे, ते जरी डोळ्याला दिसलें तरी त्या उम्या असलेल्या मनुष्याप्रमाणे पाण्यांत दिसलेल्या मनुष्याविषयी कोणाला कधीं तरी खरेपणा वाटेल काय ? ॥ ४७ ॥
शि ० - होय, मग एवढ्या ज्ञानाने पुरुषार्थसिद्धि झाली काय ? गु० -आमच्या अद्वैतवाद्यांचे मत असेंच आहे. अशा प्रकारच्या ज्ञानानेंच मोक्षप्राति होते. शि० -पण मृत्तिकेवर घट हा केवळ भासमात्र. आहे असें जर मानले तर तिच्या ज्ञानाने घटाविषयींची सत्यत्वबुद्धि नाहीशी व्हावी ती कोठे होते ? गु० -घटातील माती वजा केली असतां घटाचे स्वरूप काय राहिलें सांग. अशा विचाराने तो खोटा ठरतो ॥ ४८ ॥
शि० -पण घट हा विवर्ताचे उदाहरण नाहीं. तें परिणामाचे आहे. गु० -तें परिणामाचे नव्हे. कारण, परिणामांत पूर्वरूप जाऊन दुसरे रूप येते. जसें दुधाचे दही. परंतु कुंडलाची व सुवर्णांची गोष्ट तशी नाही. कुंडलातील सुवर्ण व घटांतील माती यांचें रूपांतर होत नाही. ॥ ४९ ॥
शि ० -पण घट फुटला असतां माती कोठे दिसते ? केवळ खापऱ्या मात्र दिसतात. गु० -नुसत्या फोडण्याने जरी माती दिसली नाहीं तरी पूड केली असतां ती दिसते. कुंडलाविषयी तर सांगावयास नको, सुवर्ण त्यांत स्पष्ट आहेच ॥ ५० ॥


क्षीरादौ परिणामोऽस्तु पुनस्तद्‌भाववर्जनात् ।
एतावता मृदादीनां दृष्टान्तत्वं न हीयते ॥ ५१ ॥

आरम्भवादिनः कार्ये मृदो द्वैगुण्यमापतेत् ।
रूपस्पर्शादयः प्रोक्ताः कार्य कारणयोः पृथक् ॥ ५२ ॥
मृत्सुवर्णमयश्चेति दृष्टान्तत्रयमारूणिः ।
प्राहातो वासयेत्कार्यानृतत्वं सर्ववस्तुषु ॥ ५३ ॥
कारणज्ञानतः कार्यविज्ञानं चापि सो वदत् ।
सत्यज्ञानेऽनृतज्ञां कथमत्रोपपद्यते ॥ ५४ ॥
समृत्कस्य विकारस्य कार्यता लोकदृष्टितः ।
वास्तवोऽत्र मृदंशोऽस्य बोधः कारणबोधतः ॥ ५५ ॥
अनृतांशो न बोद्धव्यस्तद्बोधानुपयोगतः ।
तत्त्वज्ञानं पुमर्थं स्यान्नानृतांशावबोधनम् ॥ ५६ ॥
तर्हि कारणविज्ञानात्कार्यज्ञामितीरिते ।
मृद्बोधान्मृत्तिका बुद्धेत्युक्तं स्यात्कोऽत्र विस्मयः ॥ ५७ ॥
सत्यं कार्येषु वस्त्वंशः कारणात्मेति जानतः ।
विस्मयो मास्त्विहाज्ञस्य विस्मयः केन वार्यते ॥ ५८ ॥
आरम्भी परिणामी च लौकिकश्चैककारणे ।
ज्ञाते सर्वमतिं श्रुत्वा प्राप्नुवन्त्येव विस्मयम् ॥ ५९ ॥
अद्वैतेऽभिमुखीकर्तुमेवात्रैकस्य बोधतः ।
सर्वबोधः श्रुतौ नैव नानात्वस्य विवक्षया ॥ ६० ॥

शि ० -तुम्ही परिणामाविषयी दूध, दही, कृतिका, घट आणि सुवर्णकुंडलें असे तीन दृष्टांत दिलेत, त्यापैकीं घट आणि कुंडले यांस जर विवर्तवाद लागू होतो, तर तो दूध, दह्याही कां लागू पडू नये ? गु० -दह्यास पुनः दुधाचे स्वरूप येत नाहीं, तशी घट कुंडलाची गोष्ट नाही कारण त्यांना पुनः पूर्वरूप येतें यावरून आम्ही जे दृष्टांत दिले ते बरोबर आहेत. ॥ ५१ ॥
शि ० -मृत्तिका आणि सुवर्ण यांस जसे परिणाम आणि विवर्त लागू पडतात तसा आरंभवादही कां न लागू पडावा ? गु० -आरंभवाद्यांचें मत असें आहे कीं, कार्याचे आणि कारणाचे स्पर्शादि गुण अगदीं पृथक् असतात; पण तसें द्वैगुण्य मृत्तिकेचे ठायीं दिसत नाही. ॥ ५२ ॥
वेदांमध्ये उद्दालकऋषींनी विवर्ताविषयी मृत्तिका, सुवर्ण आणि लोखंड असे तीन दृष्टांत दिले आहेत, त्यावरून कार्य खोटे आहे असा सिद्धांत होतो. तोच सर्व चराचर वस्तूंचे ठायीं लावून चांगला ठसवावा. ॥ ५३ ॥
शि० -कार्याचा खोटेपणा ठसवावा असें तरी कां सांगितले ? गु० -कारणाचे ज्ञान झालें म्हणजे कार्याचेंही ज्ञान होतें. शि० -कारण हें सत्य आहे आणि कार्य हें मिथ्या असें असून सत्याच्या ज्ञानाने मिथ्या ज्ञान होतें. असें म्हणण्यांत विरोध नाहीं काय ? ॥ ५४ ॥
गु० -विचारदृष्टीने पाहशील तर विरोध मुळींच नाही. मृत्तिकेसहित जो घटरूप विकार त्याला कार्य असें लोक म्हणतात. या कार्यात एक सत्यांश आहे आणि एक असत्यांश आहे. येथें मृत्तिका सत्यांश आहे, त्या अंशाचे ज्ञानकारण ज्ञानाने होतें. मग विरोध कसचा ? ॥ ५५
शि० -सत्यांश जसा समजतो तसा मिथ्यांशही समजेल. गु० -मिथ्यांशाचा मुळीच उपयोग नसल्यामुळे तो समजण्यास योग्य नाहीं. खऱ्या तत्त्वाचे जें ज्ञान तोच पुरुषार्थ. असत्यांश जाणून फळ काय ? ॥ ५६ ॥
शि० -तर कारणज्ञानापासून कार्यज्ञान होतें कसें म्हणणे म्हणजे मृत्तिकाज्ञानापासून मृत्तिकाज्ञान होतें असें म्हटल्याप्रमाणें आहे. यांत अधिक काय सांगितल्यासारखे झालें ? ॥ ५७ ॥
गु० -खरें, नवल नाहींच; पण तें कोणाला नाहीं ? कार्याचे ठायीं जो सत्यांश आहे, तो कारणस्वरूपीच आहे असें ज्यांना समजले, त्यांना कांहीं नवल नाहीं; पण अज्ञान्यांचे नवल कोठे जाईल ? ॥ ५८ ॥
कारणापासून कार्य भिन्न मानणारे जे आरंभवादी, पर्वूरूपाचा त्याग होऊन रूपांतर होतें असें मानणारे जे परिणामवादी आणि शास्त्र न जाणणारे सर्व लोक यांना कारणज्ञानापासून कार्यज्ञान होतें असें ऐकून विस्मय झालाच पाहिजे. ॥ ५९ ॥
शि० - एका कारणाच्या ज्ञानाने अनेक कार्यांचें ज्ञान हाते असा श्रुतीने सांगितलेला अर्थ एकीकडे ठेवून एवढ्या लांबलचक व्याख्यानाचे कारण काय ? गु० -श्रुतीचे अद्वैतपर तात्पर्य लोकांस समजत नाहीं म्हणन व्याख्यान केलें पाहिजे. अद्वैतमताचे ज्ञान शिष्यास व्हावें म्हणन छांदोग्य श्रुतींत कारणाच्या ज्ञानानें कार्याचें ज्ञान होते असें सांगितलें. अनेक कार्यांचे ज्ञान व्हावें हा कांहीं तिचा हेतु नाहीं. ॥ ६०


एकमृत्पिण्डविज्ञानात्सर्वमृण्मयधीर्यथा ।
तथैकब्रह्मबोधेन जगद्बुद्धिर्विभाव्यताम् ॥ ६१ ॥
सच्चित्सुखात्मकं ब्रह्म नामरूपात्मकं जगत् ।
तापनीये श्रुतं ब्रह्म सच्चिदानन्दलक्षणम् ॥ ६२ ॥

सद्‌रूपमारुणिः प्राह प्रज्ञानं ब्रह्म बह्वृचाः ।
सनत्कुमार आनन्दमेवमन्यत्र गम्यताम् ॥ ६३ ॥
विचिन्त्य सर्वरूपाणि कृत्वा नामानि तिष्ठति ।
अहं व्याकरवाणीमे नामरूपे इति श्रुतिः ॥ ६४ ॥
अव्याकृतं पुरा सृष्टेरूर्ध्वं व्याक्रीयते द्विधा ।
अचिन्त्यशक्तिर्मायैषा ब्रह्मण्यव्याकृताभिधा ॥ ६५ ॥
अविक्रियब्रह्मनिष्ठा विकारं यात्यनेकधा ।
मायां तु प्रकृतिं विद्यान्मायिनं तु महेश्वरम् ॥ ६६ ॥
आद्यो विकार आकाशः सोऽस्ति भात्यपि च प्रियः ।
अवकाशस्तस्य रूपं तन्मिथ्या न तु तत्त्रयम् ॥ ६७ ॥
न व्यक्तेः पूर्वमस्त्येव न पश्चाच्च विनाशतः ।
आदावन्ते च यन्नास्ति वर्तमानेऽपि तत्तथा ॥ ६८ ॥
अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
अव्यक्तनिधनान्येवेत्याह कृष्णोऽर्जुनं प्रति ॥ ६९ ॥
मृद्वत्ते सच्चिदानन्दा अनुगच्छन्ति सर्वदा ।
निराकाशे सदादीनामनुभूतिर्निजात्मनि ॥ ७० ॥

ज्याप्रमाणें मातीच्या पिंडाचे ज्ञान झाल्यावांचून कोणच्याही मृण्मय पदार्थीचे ज्ञान होत नाही, त्याप्रमाणें ब्रह्म पाहिल्यावांचून जग दिसतच नाहीं. ॥ ६१ ॥
शि० -ब्रह्मज्ञानापासून जगाचे ज्ञान होतें असा सिद्धांत करण्यापूर्वीं ब्रह्माचे व जगाचे स्वरूप समजलें पाहिजे. त्यावाचून तसा सिद्धांत कसा करतां येईल ? गु० -त्याचें स्वरूप तापनीय श्रुतींत वर्णिले आहे. ब्रह्म हें सच्चिदानंदरूप आहे आणि जगत् नामरूपात्मक आहे. ॥ ६२ ॥
आरुणीनें तद्‌रूचे वर्णन केले. बह्वृच यांनी प्रज्ञानं ब्रह्म या वाक्याने चिद्‌रूपाचे वर्णन केलें आहे आणि सनत्कुमारांनी आनंदरूपाचें वर्णन केलें, असेंच अन्य ठिकाणी पहावे. ॥ ६३ ॥
तसेंच जगाचें नामरूपस्वरूपही श्रुतीत वर्णिले आहे. "सर्व रूपाचे चिंतन करून त्यांस नावें ठेवून ईश्वर जगांत रहातो." अशा अर्थाची व "नामरूपें मींच केली आहेत " अशा अर्थाची श्रुतिआहे. ॥ ६४ ॥
सृष्टीचे पूर्वी जें अव्याकृत म्हणजे अव्यक्तरूप होतें तेंच सृष्टीनंतर दोन प्रकारांनीं व्यक्त झालें. ही जी अव्याकृत नांवाची अचिंत्य ब्रह्मशक्ति, तीच माया. ॥ ६५ ॥
क्रियारहित ने ब्रह्म त्याचेठायी असणारी शक्ति जी अनेक प्रकारें विकार पावते, त्या शक्तीस माया म्हणतात. तीच मूळ प्रकृति आणि ती ज्याच्या हातीं आहे तो महेश्वर. ॥ ६६ ॥
या मायोपाधिक ब्रह्माचा पहिला विकार आकाश आहे. तो अस्ति, भाति आणि प्रिय असा आहे. अवकाश हे त्याचें रूप आहे. तें मिथ्या आहे; पण पूर्वीची तीन रूपें सत्य आहेत. ॥ ६७ ॥
शि० -अवकाशरूपाला मिथ्यात्व कसें येतें ? गु० -अवकाश व्यक्त होण्यापूर्वी तो नव्हता, व पुढेही नाहीसा होतो. ज्यास शेंडाबुडखा नसून मध्येंच कांहींभासतें तेंही तसेच मिथ्या समनले पाहिजे. ॥ ६८ ॥
यास गीतावाक्य प्रमाण. कृष्णाने अर्जुनास असें सांगितलें आहे कीं, ही भूते जी दिसत आहेत तीं पूर्वींच अव्यक्त होतीं. शेवटीही अव्यक्तच होतात. तीं केवळ मध्यें मात्र व्यक्त आहेत ॥ ६९ ॥
शि० -अवकाशांत सच्चिदानंद खरे आहेत असें तुम्ही म्हणता याला प्रमाण काय ? गु० -घटामध्ये मृत्तिका जशी कालत्रयी असते तसें आकाशामध्यें सच्चिदानंदरूप एकसारखे आहे. ॥ ७० ॥


अवकाशे विस्मृतेऽथ तत्र किं भाति ते वद ।
शून्यमेवेति चेदस्तु नाम तादृग्विभाति हि ॥ ७१ ॥
तादृक्त्वादेव तत्सत्त्वमौदासीन्येन तत्सुखम् ।
आनुकूल्यप्रातिकूल्यहीनं यत्तन्निजं सुखम् ॥ ७२ ॥

आनुकूल्ये हर्षधीः स्यात्प्रातिकूल्ये तु दुःखधीः ।
द्वयाभावे निजानन्दो निजं दुःखं तु न क्वचित् ॥ ७३ ॥
निजानन्दे स्थिते हर्षशोकयोर्व्यत्ययः क्षणात् ।
मनसः क्षणिकत्वेन तयोर्मानसतेष्यताम् ॥ ७४ ॥
आकाशेऽप्येवमानन्दः सत्ताभाने तु संमते ।
वाय्वादिदेहपर्यन्तवस्तुष्वेवं विभाव्यताम् ॥ ७५ ॥
गतिस्पर्शौ वायुरूपं वह्नेर्दाहप्रकाशने ।
जलस्य द्रवता भूमेः काठिन्यं चेति निर्णयः ॥ ७६ ॥
असाधारण आकाशे ओषध्यन्न वपुःष्यपि ।
एवं विभाव्य मनसा तत्तद्‌रूपं यथोचितम् ॥ ७७ ॥
अनेकधा विभिन्नेषु नामरूपेषु चेकधा ।
तिष्ठन्ति सच्चिदानन्दा विसंवादः न कस्यचित् ॥ ७८ ॥
निस्तत्त्वे नामरूपे द्वे जन्मनाशयुते च ते ।
बुद्ध्या ब्रह्मणि वीक्षस्व समुद्रे बुद्बुदादिवत् ॥ ७९ ॥
सच्चिदानन्दरूपेऽस्मिन् पूर्णे ब्रह्मणि वीक्षिते ।
स्वयमेवावजानाति नामरूपे शनैः शनैः ॥ ८० ॥

शि० -आकाश वेगळे करून तें सच्चिदानंदरूप पहावे कोठे ? गु० -निराकाश जें तुझें स्वरूप ते पहा म्हणजे झाले. कारण आकाशाचेंही विस्मरण झालें असता काय भासते तें तूंच सांग. शि० -शून्य भासते. गु० -ते तरी भासतें ना ? जर भासते तर तें शून्य कसें ? ॥ ७१ ॥
ज्या अर्थीं भासते त्या अर्थीं तें आहें म्हटले पाहिजे. आणि ते तत्त्व उदासीन असल्यामुळें तें सुखरूप आहे असें सिद्ध होतें. शि० -सुखाला अनुकूलत्व पाहिजे आणि ते तर उदासीन आहे म्हणता, तेव्हा सुख कसें म्हणता येईल ? गु० -ते सुखच आहे. कारण खऱ्या सुखाचे लक्षण असें आहे कीं, जेथे आनुकूल्यही नाहीं आणि प्रातिकूल्यही नाही तें खरें सुख. ॥ ७२ ॥
अनुकूल गोष्ट झाली म्हणजे सुखरूप बुद्धि होते, आणि प्रतिकूल झाली म्हणजे दुःखरूप बुद्धि होते. ही दोन्हीही नसतांना जी स्थिति तोच निजानंद. शि० -तर मग त्या स्थितीला निजदुःख कां म्हणूं नये; गु० -दुःखाला निजरूपत्व आले असें आम्ही कोठेच ऐकले नाही. ॥ ७३
शि० - निजानंद एकसारखा आहे असें जर तुम्ही म्हणतां तर एकदा हर्ष, आणि एकदा शोक कां होतो १ गु० -हर्ष व शोक मनाचे आहेत आणि मन तर क्षणिक आहे; म्हणून हर्षशोकांनाही क्षणिकत्व आले. ॥ ७४ ॥
याकरितां आकाशाचेठायी आनंद आहे असें सिद्ध झालें. सत्ता आणि भान ही तर तूं कबूलच करितोस. याचप्रमाणे वायूपासून देहापर्यंत सर्व वस्तूंमध्यें आनंदाची व्याप्ति सिद्ध होते. ॥ ७५ ॥
वायूची रूपे दोन गति आणि स्पर्श. दाह आणि प्रकाश हे अग्नीचे रूप. जलाचे द्रवत्व आणि भूमीचे काठिन्य ॥ ७६ ॥

याचप्रमाणें सर्व आकार वनस्पति शरीरें यांची रूपे मनाने पृथक् पृथक् समजावयाची. ॥ ७७ ॥

याचप्रमाणे नामरूपे एकमेकांपासून जरी भिन्न झाली तरी त्यांत सच्चिदानंद रूप एकच आहे यात संशय नाहीं.॥ ७८॥

शि० -तर मग नामरूपे जी भासतात त्यांची व्यवस्था कशी ? गु० -भासेनात बापुडी. त्यांस जन्मनाश असल्यामुळें तीं मिथ्या आहेत असे आम्ही पूर्वीच सांगितलें आहे. समुद्रावर जसे बुडबुडे दिसतास, तशी ब्रह्माचेठायी तीं समजावी. ॥ ७९ ॥
सच्चिदानंदरूप पूर्ण ब्रह्म न्याहाळून पाहिले असतां नामरूपाची अवज्ञा आपोआप हळूहळू होते. ॥ ८० ॥


यावद्यावदवज्ञा स्यात्तावत्तावत्तदीक्षणम् ।
यावद्यावद्वीक्ष्यते तत्तावत्तावदुभे त्यजेत् ॥ ८१ ॥
तदभ्यासेन विद्यायां सुस्थितायामयं पुमान् ।
जीवन्नेव भवेन्मुक्तो वपुरस्तु यथा तथा ॥ ८२ ॥
तच्चिन्तनं तत्कथनमन्योन्यं तत्प्रबोधनम् ।
एतदेकपरत्वं च तदभ्यासं विदुर्बुधाः ॥ ८३ ॥
वासनानेककालिना दीर्घकालं निरन्तरम् ।
सादरं चाभ्यस्यमाने सर्वथैव निवर्तते ॥ ८४ ॥
मृच्छक्तिवत् ब्रह्मशक्तिरनेकाननृतान्सृजेत् ।
यद्वा जीवगता निद्रा स्वप्नश्चात्र निदर्शनम् ॥ ८५ ॥

निद्राशक्तिर्यथा जीवे दुर्घटस्वप्नकारिणी ।
ब्रह्मण्येषा तथा माया सृष्टिस्थित्यन्तकारिणी ॥ ८६ ॥
स्वप्ने वियद्गतिं पश्येत्स्वमूर्धच्छेदनं यथा ।
मुहूर्ते वत्सरौघं च मृतं पुत्रादिकं पुनः ॥ ८७ ॥
इदं युक्तमिदं नेति व्यवस्था तत्र दुर्लभा ।
यथा यथेक्ष्यते यद्यत्तत्तद्युक्तं तथा तथा ॥ ८८ ॥
ईदृशो महिमा दृष्टो निद्राशक्तेर्यदा तदा ।
मायाशक्तेरचिन्त्योऽयं महिमेति किमद्‌भुतम् ॥ ८९ ॥
शयाने पुरुषे निद्रा स्वप्नं बहुविधं सृजेत् ।
ब्रह्मण्येवं निर्विकारे विकारान्कल्पयत्यसौ ॥ ९० ॥

जसजशी नापरूपाची अवज्ञा होईल तसतसे अद्वैतदर्शन अधिक अधिक होत जाते, आणि जसजसे अद्वैत दर्शन अधिक अधिक स्पष्ट होत जातें, तसतशी नामरूपे भासेनातशी होतात. ॥ ८१॥
या आभ्यासाच्या योगाने ज्ञान दृढ झाले असतां मनुष्य जीवंत असताच मुक्त होतो. मग त्याचा देह असला तरी चिंता नाही. ॥ ८२ ॥

शि० -ब्रह्माभ्यास म्हणजे काय ? गु० -सदासर्वदा ब्रह्मतत्त्वाचेच चिंतन; त्याचेंच कथन; परस्पर त्याचाच बोध; असें जें एकपरत्व त्यास पंडित ब्रह्माध्यास असें म्हणतात. ॥ ८३ ॥
हा द्वैतसंस्कार फार दिवसांपासन चालत असल्यामुळे आस्थेने फार दिवस अभ्यास केला तरच त्याची अगदी निवृत्ति होते. ॥ ८४ ॥

शि० - एका ब्रह्मापासून हे अनेक आकार कसे उत्पन्न झाले ? गु० - एका ब्रह्मापासून जगदुत्पत्ति होणें जरी युक्तीस विरुद्ध आहे तरी मायेसहित ब्रह्मापासून ती होते असें म्हणण्यास कोणची नड आहे. मातीच्या शक्तीने जसे अनेक खोटे पदार्थ उत्पन्न होतात तसे ब्रह्मशक्तीपासून हे अनेक आकार उत्पन्न झाले किंवा यापेक्षाही चांगला दृष्टांत निद्रेचा आहे. ॥ ८५ ॥
जीवाचेठायी असणारी निद्रा जशी अघटित स्वप्नास उत्पन्न करते त्याप्रमाणें ही जगदुत्पत्ति ब्रह्माचेठायीं सृष्टि स्थिति लयरूपानें होते. ॥ ८६ ॥
स्वग्नामध्में मनुष्यास काय काय दिसतें आणि काय काय नाहीं याचा कांहीं नेम आहे काय ? मी आकाशांत उडत आहें. माझा शिरच्छेद केला असें भलतेच दिसते. व एका क्षणांत एक वर्ष गेल्यासारखे वाटतें. पुत्रमित्राचा वियोग होतो. पाहिजे तें दिसते. ॥ ८७ ॥
यांत युक्तायुक्त विचार म्हणून मुळींच नाहीं. अमुक गोष्ट योग्य म्हणता येत नाहीं व अमुक अयोग्यही म्हणता येत नाहीं. जें जें जसे जसें असतें तें तें योग्यच म्हटले पाहिजे. ॥ ८८ ॥
जर एवढ्याशा या निद्राशक्तीचा एवढा मोठा महिमा आहे, तर मायाशक्तीचा महिमा किती अचिंत्य असावा बरें ! ॥ ८९ ॥

पुरुष स्वस्थ निजला असतां निद्राशक्ति नाना प्रकारचे स्वप्न उत्पन्न करते. त्याप्रमाणें निर्विकार ब्रह्माचेठायी ही माया विकाराची कल्पना करते. ॥ ९० ॥


खानिलाग्निजलोर्व्यण्डलोकप्राणिशिलादिकाः ।
विकाराः प्राणिधीष्वन्तश्चिच्छाया प्रतिबिम्बति ॥ ९१ ॥

चेतनाचेतनेष्वेषु सच्चिदानन्दलक्षणम् ।
समानं ब्रह्म भिद्येते नामरूपे पृथक्पृथक् ॥ ९२ ॥
ब्रह्मण्येते नामरूपे पटे चित्रमिव स्थिते ।
उपेक्ष्य नामरूपे द्वे सच्चिदानन्दधीर्भवेत् ॥ ९३ ॥
जलस्थेऽधोमुखे स्वस्य देहे दृष्टेऽप्युपेक्ष्य तम् ।
तीरस्थ एव देहे स्वे तात्पर्यं स्याद्यथा तथा ॥ ९४ ॥
सहस्रशो मनोराज्ये वर्तमाने सदैव तत् ।
सर्वैरूपेक्ष्यते तद्वदुपेक्षा नामरूपयोः ॥ ९५ ॥
क्षणे क्षणे मनोराज्यं भवत्येवान्यथान्यथा ।
गतं गतं पुनर्नास्ति व्यवहारो बहिस्तथा ॥ ९६ ॥

न बाल्यं यौवने लभ्यं यौवनं स्थविरे तथा ।
मृतः पिता पुनर्नास्ति नायात्येव गतं दिनम् ॥ ९७ ॥
मनोराज्याद्विशेषः कः क्षणध्वंसिनि लौकिके ।
अतोऽस्मिन् भासमानेऽपि तत्सत्यत्वधियं त्यजेत् ॥ ९८ ॥
उपेक्षिते लौकिके धीर्निर्विघ्ना ब्रह्मचिन्तने ।
नटवत्कृत्रिमास्थायां निर्वहत्येव लौकिकम् ॥ ९९ ॥
प्रवहत्यपि नीरेऽधः स्थिरा प्रौढ शिला यथा ।
नामरूपान्यथात्वेऽपि कूटस्थं ब्रह्म नान्यथा ॥ १०० ॥
निश्छिद्रे दर्पणे भाति वस्तुगर्भं बृहद्वियत् ।
सच्चिद्‌घने तथा नानाजगद्‌गर्भमिदं वियत् ॥ १०१ ॥
अदृष्ट्वा दर्पणं नैव तदन्तस्थे क्षणं यथा ।
अमत्वा सच्चिदानन्दं नामरूपमतिः कुतः ॥ १०२ ॥

प्रथमं सच्चिदानन्दे भासमानेऽथ तावता ।
बुद्धिं नियम्य नैवोर्ध्वं धारयेन्नामरूपयोः ॥ १०३ ॥

एवं च निर्जगद्‌ब्रह्म सच्चिदानन्दलक्षणम् ।
अद्वैतानन्द एतस्मिन्विश्राम्यन्तु जनाश्चिरम् ॥ १०४ ॥
ब्रह्मानन्दाभिधे ग्रन्थे तृतीयेऽध्याय ईरितः ।
अद्वैतानन्द एव स्याज्जगन्मिथ्यात्वचिन्तया ॥ १०५ ॥
इति ब्रह्मानन्देऽद्वैतानन्दः समाप्तः ॥ १३ ॥

शि० -ते विकार कोणते ? गु० -आकाश, वायु, अग्नि, जल, पृथ्वी, ब्रह्मांड, लोक, प्राणी, शिला इत्यादि सष्टि. शि० -माया ही जड असून तिजपासून प्राणी कसे उत्पन्न झाले ? गु० -प्राण्याचे शरीराचेठायी असणारें अंतःकरण स्वच्छ असल्यामुळें त्यामध्यें एक चैतन्याचे प्रतिबिंब पडलें आहे. म्हणन तें चैतन्यासारखे दिसते परंतु ते वस्तुतः जडच आहे. ॥ ९१ ॥
शि० तर मग हा जड चेतन विभाग ब्रह्माचा नव्हे म्हणा. गु०-तो ब्रह्माचा कसा होईल ? सच्चिदानंद लक्षण ब्रह्म हें स्थावरजंगमीं सर्वत्र समान आहे. भेद काय तो नामरूपाचा. ॥ ९२ ॥
ज्याप्रमाणें पटावर चित्र असतें त्याप्रमाणें ब्रह्माचेठायीं ही नामरूपें आहेत. त्यांची उपेक्षा केली असतां तुझी बुद्धि सच्चिदानंदमय होईल. ॥ ९३ ॥
ज्याप्रमाणें पाण्यांत प्रतिबिंबित आपला देह दिसत असूनही त्याची उपेक्षा करून तीरावर असणारा जो खरा आपला देह त्याविषयी मात्र सत्यबुद्धि असते. ॥ ९४ ॥
किंवा नाना प्रकारचें मनोराज्य होत असून त्याची जशी मनुष्य उपेक्षा करतो, त्याप्रमाणें नामरूपाची उपेक्षा करावी. ॥ ९५ ॥

हा व्यवहार असा आहे कीं, आतां जें दृष्टीस पडते तें क्षणांत नाहीसे होते. आमचें मनोराज्य एका क्षणी जसें असतें, तसें दुसऱ्या क्षणी नाहीं. जी कल्पना एकदा झाली ती होऊनच गेली. पुनः ती व्हावयाची नाहीं हा जसा मनांतील व्यवहार तसाच बाह्य जगांतलाही समजावा. ॥ ९६ ॥
तरुणपणी बाळपण नाहीं, म्हातारपणीं तरुणपण नाहीं, गेलेला बाप पुनः येत नाही, आणि गेलेला दिवस गेलाच. ॥ ९७ ॥

ह्या क्षणभंगूर व्यवहारांत व मनोराज्यांत भेद मुळींच नाहीं. याकरितां तो जरी भासला तरी त्याविषयीची सत्य दृष्टि सोडून द्यावी. ॥ ९८ ॥
या व्यवहाराची उपेक्षा केली असतां बुद्धीला निर्विधपणें ब्रह्मचिंतन करतां येतें. शि० -मग ज्ञान्यांचा व्यवहार कसा व्हावा ? गु० -सोंगाड्या जशी वेषाप्रमाणें बतावणी करतो तसा ज्ञानी निर्वाहापुरता कसा तरी व्यवहार करूं शकतो. ॥ ९९ ॥
ज्याप्रमाणें पाण्याचा प्रवाह चालला असताही त्यांतील मोठी शिला स्थिर राहते, त्याप्रमाणें नामरूपांत कितीही भेद झाला तरी कूटस्थ ब्रह्म आहे तसेंच असतें. ॥ १०० ॥
शि० - अखंड ब्रह्माचे ठायीं अगदीं निराळ्या प्रकारचे जग कसें दिसते ? गु० -छिद्ररहित आरशामध्ये सर्व वस्तूस मावून घेणारें आकाश जसे दिसतें तसें, छिद्ररहित अखंड ब्रह्मामध्यें नानाप्रकारचें जगास मावून घेणारे आकाश दिसते. ॥ १०१ ॥
शि० -तर मग ब्रह्म मुळीच दिसत नसून केवळ जग मात्र कसें भासतें ? गु० -दर्पणाचा पृष्ठभाग जसा नजरेतून चुकून त्यांतील पदार्थ मात्र भासतात, त्याप्रमाणें सचिदानंद ब्रह्म भासत असूनही तें अदृश्य होऊन नामरूपाकडेच चित्त जातें; परंतु वास्तविक पाहता ब्रह्म आधीं भासल्यावाचून नामरूपें डोळ्यास भासणारच नाहींत असा नियम आहे. ॥ १०२ ॥
शि० -ती नामरूप पुढें असून ब्रह्म कसें पहावे ? गु० -कोणचाही पदार्थ पाहतांना आदि सच्चिदानंदाचा भास होऊन नंतर तो पदार्थ दृष्टीस पडतो. याकरितां जेव्हां जेव्हां तुझी जगाकडे दृष्टि जाते तेव्हां तेव्हां तो भास होतो न होतो इतक्यांतच बुद्धीस ओढून धरून तिला नामरूपाकडे जाऊं देऊं नये. ॥ १०३ ॥
या प्रकारचे हे सच्चिदानंदरूप जगद्‌रहित एकच ब्रह्म आहे असें सिद्ध झालें. यासच अद्वैतानद म्हणतात. यामध्ये सर्व लोक सर्वदा रममाण होतात. ॥ १०४ ॥
ब्रह्मानंद प्रकरणाच्या या तिसऱ्या अध्यायांत अद्वैतानंद आम्ही सांगितला. तो जगन्मिथ्यात्व चितनानें प्राप्त होतो. ॥ १०५ ॥ इति अद्वैतानंदः समाप्तः