॥ पञ्चदशी ॥
द्वितीयः परिच्छेदः - भूतविवेकः

सदद्वैतं श्रुतं यत्तत्पञ्चभूतविवेकतः ।
बोद्धुं शक्यं ततो भूतपञ्चकं प्रविविच्यते ॥ १ ॥
जग उत्पन्न होण्याच्या पूर्वी जगास कारणीभूत जें सद्‌रूप अद्वितीय ब्रह्म श्रुतीत सांगितलें आहे, तें स्वतः वाणीस व मनास अगोचर असल्यामुळे त्याचा साक्षात् बोध होणे अशक्य आहे; याकरितां त्यास उपाधिभूत जी पंचभूते त्यांचे विवेचन केलें असतां अधिष्ठानाचा बोध चांगला होईल म्हणून आम्ही पंचभूतांचें येथे विवेचन करून दाखवितो. ॥१॥

शब्दस्पर्शौ रूपरसौ गन्धो भूतगुणा इमे ।
एकद्वित्रिचतुः पञ्चगुणा व्योमादिषु क्रमात् ॥ २ ॥
शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पंचभूतांचे गुण आहेत. यांचा क्रम असा कीं, आकाशाचा गुण केवळ शब्दमात्र, वायुचे शब्द आणि स्पर्श; अग्नीचे शब्द, स्पर्श आणि रूप; आपाचे शब्द, स्पर्श, रूप आणि रस; आणि पृथ्वीचे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध याप्रमाणें समजावे. ॥२॥

प्रतिध्वनिर्वियच्छब्दो वायौ वीसीति शब्दनम् ।
अनुष्णाशीतसंस्पर्शो वह्नो भुगुभुगुध्वनिः ॥ ३ ॥
आकाशाचा जो गुण शब्द म्हणून सांगितला तो प्रतिध्वनिरूप समजावा. वायूमधील शब्द सों सों सों असा जो होतो तो समजावा. त्याचा स्पर्श अनुष्ण आणि अशीत असतो. वन्हीचे ठायीं भुक् भुक् असा होणारा ध्वनि, ॥३॥

उष्णः स्पर्शः प्रभा रूपं जले बुलु बुलु ध्वनिः ।
शीतास्पर्शः शुक्लरूपं रसो माधुर्यमीरितम् ॥ ४ ॥
ऊष्ण स्पर्श आणि प्रभा रूप. जलाचे ठायीं बुल बुल ध्वनि, शीतस्पर्श, शुक्लरूप, आणि माधुर्य रस. ॥४॥

भूमौ कडकडाशब्दः काठिन्यं स्पर्श इष्यते ।
नीलादिकं चित्ररूपं मधुराम्लादिको रसः ॥ ५ ॥
भूमीचे ठायी कडकडा शब्द; कठिण स्पर्श, निळे हिरवे इत्यादि रूप, मधुर आम्लादिक रस आणि ॥५॥

सुरभीतरगन्धौ द्वौ गुणाः सम्यग्विवेचिताः ।
श्रोत्रं त्वक्चक्षुषि जिह्वा घ्राणं चेन्द्रियपञ्चकम् ॥ ६ ॥
चांगला आणि वाईट असे दोन गंध, याप्रमाणें आकाशापासून पृथ्वीपर्यंत त्या त्या भूतांचे गुण समजावे. आतां या पंचभूतांचीं कार्यें सांगतो. श्रोत्र, त्वचा, चक्षू, जिव्हा आणि घ्राण ही पांच ज्ञानेंद्रिये होत. ॥६॥

कर्णादिगोलकस्थं तच्छब्दादिग्राहकं क्रमात् ।
सौक्ष्म्यात्कार्यानुमेयं तत्प्रायो धावेद्बहिर्मुखम् ॥ ७ ॥
या इंद्रियांची स्थानें कर्णादिक छिद्रें होत. शब्दस्पर्द्शादिक जे वर सांगितलेले पंचभूतांचे गुण ते या श्रोत्रादिक इंद्रियांचे क्रमेंकरून विषय होत. हीं इंद्रिये अतिशय सूक्ष्म असल्यामळे त्यांच्या अस्तित्वाचे अनुमान कार्यावरून करावयाचें. हीं बहुतकरून बहिर्मुख आहेत. ॥७॥

कदाचित्पिहिते कर्णे श्रूयते शब्द आन्तरः ।
प्राणवायौ जाठराग्नौ जलपानेऽन्नभक्षणे ॥ ८ ॥
केव्हां केव्हा या इंद्रियांस शरीराच्या आंतील विषयही गोचर होतात. कान झांकले असतां प्राणवायु आणि जठराग्नींतील होणारा शब्द ऐकू येतो. जलपान व अन्नभक्षण करतांना शरीराच्या आंतील स्पर्श अनुभवास येतात. ॥८॥

व्याज्यान्ते ह्यान्तराः स्पर्शामीलने चान्तरं तमः ।
उद्गारे रसगन्धौ चेत्यक्षाणामान्तरग्रहः ॥ ९ ॥
डोळे झांकले असतां आंतील अंधकार दृष्टीस पडतो. आणि ढेंकर दिला असतां रस आणि गंध या दोन्ही विषयांचा अनुभव येतो. ॥९॥

पञ्चोक्त्यादानगमनविसर्गानन्दकाः क्रियाः ।
कृषिवाणिज्यसेवाद्याः पञ्चस्वन्तर्भवन्ति हि ॥ १० ॥
हें ज्ञानेंद्रियांचें विवेचन झाले. आतां कमेंद्रियें सांगतो. बोलणें, देणें, घेणें, चालणें, विसर्जन करणें आणि आनंद या पांच कर्मेंद्रियांच्या क्रिया आहेत. कृषि, वाणिज्य, सेवा इत्यादि कर्मांचा अंतर्भाव या पांच क्रियांतच होतो. ॥१०॥



वाक्पाणिपादपायूपस्थैरक्षैस्तत्क्रियाजनिः ।
मुखादिगोलकेष्वास्ते तत्कर्मेन्द्रियपञ्चकम् ॥ ११ ॥
या क्रिया वाचा, पाद, पाणी, पायु, आणि उपस्थ या पांच इंद्रियांपासून क्रमेंकरून उत्पन्न होतात. मुख, कर, चरण, गुद, शिश्न, ही वागादि कमेंद्रियांचीं क्रमेंकरून स्थानें होत. ॥११॥

मनो दशेन्द्रियाध्यक्षं हृत्पद्मगोलके स्थितम् ।
तच्चान्तःकरणं बाह्येष्वस्वातन्त्र्याद्विनेन्द्रियैः ॥ १२ ॥
मन हें या दहा इंद्रियांचा राजा आहे. हें हृदयकमलांत वास करते. यासच अंतःकरण असे म्हणतात. कारण इंद्रियांच्या साहाय्यावांचून बाह्यविषयांवर याला स्वतंत्रतेनें जातां येत नाहीं. ॥१२॥

अक्षेष्वर्थार्पितेष्वेतद्गुणदोषविचारकम् ।
सत्त्वं रजस्तमश्चास्य गुणा विक्रियते हि तैः ॥ १३ ॥
इंद्रिये विषयांवर गेली असतां हें मन गुणदोषाचा विचार करते. सत्व, रज आणि तम - असे मनाचे तीन गुण आहेत. त्यांच्या योगाने हें वारंवार विकार पावतें. ॥१३॥

वैराग्यं क्षान्तिरौदार्यमित्याद्याः सत्त्वसम्भवाः ।
कामक्रोधौ लोभयत्नावित्याद्या रजसोत्थिताः ॥ १४ ॥
वैराग्य (विषय नकोसे होणें), क्षमा, औदार्य इत्यादि प्रकार सत्त्वगुणाचे आहेत. काम क्रोध, लोभ, यत्‍न इत्यादि प्रकार रजेगुणाचे आहेत. ॥१४॥

आलस्यभ्रान्तितन्द्राद्या विकारास्तमसोत्थिताः ।
सात्त्विकैः पुण्यनिष्पत्तिः पापौत्पत्तिश्च राजसैः ॥ १५ ॥
आळस, भ्रांति, तंद्रा इत्यादि विकार तमोगुणाचे आहेत. सात्त्विक मनोविकारापासून पुण्यनिष्पत्ति होते, राजसापासून पाप निष्पत्ति होते. ॥१५॥

तामसैर्नोभयं किन्तु वृथायुःक्षपणं भवेत् ।
अत्राहम्प्रत्ययी कर्तेत्येवं लोकव्यवस्थितिः ॥ १६ ॥
तामसापासून कांहींच न होतां व्यर्थ आयुष्याचा क्षय मात्र होतो. येथें मी मी म्हणणारा कर्ता असें समजावे. ॥१६॥

स्पष्टशब्दादियुक्तेषु भौतिकत्वमतिस्फुटम् ।
अक्षादावपि तच्छास्त्रयुक्तिभ्यामवधार्यताम् ॥ १७ ॥
प्रत्यक्ष अनुभवास येणार्‍या शब्दस्पर्शादिक गुणांनी युक्त असे घटादि पदार्थ पंचभूतांचे बनलेले आहेत, हें उघड आहे. परंतु इंद्रिये देखील पंचभूतांचींच बनलीं आहेत असें कशावरून समजावे ? अशी शंका कोणीं घेऊं नये. ''अन्नमयं हि सोम्यमनः,'' ''आपोमयः प्राणः'' इत्यादि श्रुतिप्रमाणांवरून व अनुमानावरून त्यांचें भौतिकत्व सिद्ध होते. ॥१७॥

एकादशेन्द्रियैर्युक्त्या शास्त्रेणाप्यवगम्यते ।
यावत्किंचिद्‌भवेदेतदिदं शब्दोदितं जगत् ॥ १८ ॥
अकरा इंद्रियांसहित शास्त्र व युक्तीवरून जेवढें म्हणून जग नजरेस येते त्याचा बोध ''सदेव सोम्येदमग्र आसीत्'' या श्रुतीतील 'इदं' पदानें केला जातो. ॥१८॥

इदं सर्वं पुरा सृष्टेरेकमेवद्वितीयकम् ।
सदेवासीन्नामरूपे नास्तामित्यारुणेर्वचः ॥ १९ ॥
वरील श्रुतीचा अभिप्राय असा कीं, 'हे सर्व जग सृष्टीपूर्वी कांहीं नसून एकच अदितीय सद्‌रूप होतें; तेव्हां नामरूपें मुळींच नव्हती.' असें अरुणाचा पुत्र उद्दालक याचे वचन आहे. ''एकम्, एव, अद्वितीयं,'' याः तीन पदांनीं ' ब्रह्माचे ठायीं येऊ पहाणार्‍या भेदत्रयाचें निरसन केलें. ते भेद स्वगत, सजातीय आणि विजातीय असें तीन प्रकारचे आहेत. यास उदाहरणार्थ एक वृक्ष घेऊन त्यांत हे तीन भेद कसे होतात तें आम्ही दाखवितो. ॥१९॥

वृक्षस्य स्वगतो भेदः पत्रपुष्पफलादिभिः ।
वृक्षान्तरात्सजातीयो विजातीयः शिलादितः ॥ २० ॥
वृक्षाचीं पानें व पुष्पें यांपासून होणारा जो भेद तो स्वगत भेद होय; दोन निरनिराळ्या, वृक्षांमधील जो भेद तो सजातीय; आणि दगड, माती आणि वृक्ष यांमधील जो भेद तो विजातीय समजावा. ॥२०॥



तथा सद्वस्तुनो भेदत्रयं प्राप्तं निवार्यते ।
ऐक्यावधारणद्वैतप्रतिषेधैस्त्रिभिः क्रमात् ॥ २१ ॥
हे तीन भेद सद्‌वस्तूचे ठायीं मुळींच संभवत नाहीत असें दाखविण्याकरितां ऐक्य, अवधारणा, आणि द्वैतप्रतिनिषेध हे तीन अर्थ दाखविणार्‍या तीन पदांनीं श्रुतीनें वरील भेदत्रयाचें निवारण केलें. ॥२१॥

सतो नावयवाः शंक्यास्तदंशस्यानिरूपणात् ।
नामरूपे न तस्य अंशौ तयोरद्याप्यनुद्‌भवात् ॥ २२ ॥
तें असें कीं, सद्‌वस्तूला अवयवाची शंका मुळींच नसल्यामुळे स्वगत भेद संभवत नाहीं. नाम-रूपे त्याचे अंश आहेत असें कोणी म्हणेल तर सृष्टीपूर्वी त्यांचा उद्‌भवच नव्हता. ॥२२॥

नामरूपोद्‌भवस्यैव सृष्टित्वात्सृष्टितः पुरा ।
न तयोरुद्‌भवस्तस्मात्सन्निरंशं यथा वियत् ॥ २३ ॥
नामरूपें उद्‌भवणें यालाच सृष्टि म्हणतात, म्हणून सृष्टीच्या पूर्वी त्या नामरूपांचा उद्‌भव मुळीच नव्हता, हें उघड आहे. यास्तव, नामरूप हे सद्‌वस्तूचे अंश हें संभवत नाहीं. तस्मात सद्‌वस्तु निरंश असल्यामुळे स्वगतभेदशून्य आहे हे सिद्ध झाले. ॥२३॥

सदन्तरं सजातीयं न वैलक्षण्यवर्जनात् ।
नामरूपोपाधिभेदं विना नैव सतो भिदा ॥ २४ ॥
स्वगतभेदाप्रमाणेंच सजातीयभेदही सद्‌वस्तुचेठायीं ठरूं शकत नाहीं. कारण सजातीय भेदाला दुसरी एक सद्‌वस्तु पाहिजे. पण ती तर कोठे दिसत नाहीं. येथे कोणी अशी शंका घेतील कीं, घटसत्ता, पटसत्ता असे सद्‌वस्तूचे भेद अनेक दृष्टीस पडतात. परंतु हे भेद घटाकाश, मठाकाश इत्यादि आकाशभेदाप्रमाणें केवळ औपाधिक आहेत; वस्तुतः नव्हेत. याकरिता नामरूपसंबंधीं उपाधिभेदावांचून सद्‌वस्तूस वास्तविक सजातीयभेद नाहीं असें सिद्ध झालें. ॥२४॥

विजातीयमसत्तत्तु न खल्वस्तीति गम्यते ।
नास्यातः प्रतियोगित्वं विजातीयाद्‌भिदा कुतः ॥ २५ ॥
आतां तिसरा विजातीयभेद. तो सद्‌वस्तूस नाहीं असें सांगण्याची मुळींच जरूर नाहीं. कारण सताला विजातीय काय ते असत्, तें आहे असे मुळीच म्हणतां येत नाहीं. याकरिता यास दुसरे प्रतियोगी नसल्यामुळे विजातीय भेदाचा मुळीच संभव नाहीं. ॥२५॥

एकमेवाद्वितीयं सत्सिद्धमत्र तु केचन ।
विह्वला असदेवेदं पुरासीदित्यवर्णयन् ॥ २६ ॥
याप्रमाणें एकम्, एव आणि अद्वितीय या तीन पदांचा अर्थ झाला. परंतु कित्येक लोक भांबावून या श्रुतीचा अर्थ उलट करितात. ते म्हणतात कीं, सृष्टीपूर्वी कांहींच नव्हतें. ॥२६॥

मग्नस्याब्धौ यथाऽक्षाणि विह्वलानि तथाऽस्य धीः ।
अखण्डैकरसं श्रुत्वा निःप्रचारा बिभेत्यतः ॥ २७ ॥
ज्याप्रमाणे समुद्रांत बुडालेल्या मनुष्याचे डोळे भांबावून जातात, त्याप्रमाणें या मूढ लोकांची बुद्धि अखंड एकरसाचे श्रवण करून तिला आधार कांहींच न सांपडल्यामुळें भांबावून जाते. ॥२७॥

गौडाचार्या निर्विकल्पे समाधावन्ययोगिनाम् ।
साकारध्याननिष्ठानामत्यन्तं भयमूचिरे ॥ २८ ॥
हा अद्वैतविषयच तसा आहे. सगुण ब्रह्माचे ध्यान करणारे योगी निर्विकल्प समाधींत भांबावून जातात असें गौडापादाचार्यांनींही सांगितलें आहे. ॥२८॥

अस्पर्शयोगो नामैष दुर्दर्शः सर्वयोगिभिः ।
योगिनो बिभ्यति ह्यस्मादभये भयदर्शिनः ॥ २९ ॥
त्यांच्या वार्तिकांत असें सांगितले आहे कीं, हा अस्पर्श योगाख्य समाधि सगुण योग्यांना मोठा कठिण जातो. ज्याप्रमाणें निर्जन अरण्यांत मुले भितात, त्याप्रमाणें निर्विकल्प समाधींत वस्तुतः भय नसूनही योगी घाबरतात. ॥२९॥

भगवत्पूज्यपादाश्च शुष्कतर्कपटूनमून् ।
आहुर्माध्यमिकान्भ्रान्तानचिन्त्येऽस्मिन्सदात्मनि ॥ ३० ॥
हे शुष्कतर्कपटु जे माध्यमिक ते अचिंत्य ब्रह्मस्वरूपीं भांबावून जातात असे आचार्यांनीही म्हटले आहे. ॥३०॥



अनादृत्य श्रुतिं मौर्ख्यादिमे बौद्धस्तपस्विनः ।
आपेदिरे निरामत्वमनुमानैकचक्षुषः ॥ ३१ ॥
याविषयीं आचार्यांनी असे म्हटले आहे कीं, हे तमोगुणी बौद्ध मूर्खपणानें श्रुतीचा अनादर करून केवळ अनुमानाच्या दृष्टीनें शून्यत्व प्रतिपादन करतात. ॥३१॥

शून्यमासीदिति ब्रूषे सद्योगं वा सदात्मताम् ।
शून्यस्य न तु तद्युक्तमुभयं व्याह तत्त्वतः ॥ ३२ ॥
या शून्यवाद्यास आम्ही असे पुसतो कीं, सृष्टीपूर्वीं शून्य होते असे जें तू म्हणतोस तें काय शून्य सद्‌रूप आहे, कीं ते सत्तेने युक्त आहे ? या दोन्ही गोष्टी शून्यास संभवत नाहींत. ॥३२॥

न युक्तस्तमसा सूर्यो नापि चासौ तमोमयः ।
सच्छून्ययोर्विरोधित्वाच्छून्यमासीत्कथं वद ॥ ३३ ॥
सूर्य तमानें युक्तही नाहीं व तमाचा केलेलाही नाहीं. प्रकाश-तमाप्रमाणें सत्ता आणि शून्य ही एकमेकांची विरोधी आहेत. तेव्हां शून्य होतें असे कसे म्हणता येईल ? ॥३३॥

वियदादेर्नामरूपे मायया सति कल्पिते ।
शून्यस्य नामरूपे च तथा चेज्जीव्यतां चिरम् ॥ ३४ ॥
आतां तूं असे कदाचित् म्हणशील कीं, 'सद्‌रूप ब्रह्माचे ठायीं आकाशादि पंच भूतांना जशी मायेनें नामरूपें कल्पिलेलीं आहेत. तशीं शून्यालाही कल्पिली आहेत.' तर तें आम्हांला इष्टच आहे. ॥३४॥

सतोऽपि नामरूपे द्वे कल्पिते चेत्तदा वद ।
कुत्रेति निरधिष्ठानो न भ्रमः क्वचिदीक्ष्यते ॥ ३५ ॥
सतालाही नामरूपें कल्पिली अशी जर शंका घेशील. तर ती मात्र अगदी बरोबर नाही. कारण, सताला नामरूपें कल्पिली असें तूं म्हणतोस त्याजवर आम्ही असे विचारितों कीं, तीं नामरूपें कशावर कल्पिली, काय सतावर कीं असतावर कीं जगावर ? पहिला पक्ष मुळींच संवभत नाहीं. कारण कल्पना जी करावयाची ती एका पदार्थावर दुसर्‍या पदार्थाची केली पाहिजे. म्हणून सतावर सताचीच कल्पना म्हणणें योग्य नव्हे. असतावर मुळींच संभवत नाहीं. तिसरा पक्षही तसाच खंडित होतो. कारण सतापासून उत्पन्न झालेले जग सन्नामरूप कल्पनेस अधिष्ठान कसें होईल ? ॥३५॥

सदासीदिति शब्दार्थभेदे द्वैगुण्यमापतेत् ।
अभेदे पुनरुक्तिः स्यान्मैवं लोके तथेक्षणात् ॥ ३६ ॥
असतच होतें असे म्हणण्यास जसा व्याहृतिदोष येतो, तसा सत् होतें अशा वाक्यांतही एक दोष आमचे प्रतिपक्षी कदाचित् आणतील. तो हा कीं, सद् होते या दोन शब्दांच्या अर्थामध्ये भेद असेल तर अद्वैतहानी होते. आणि अभेद असेल तर पुनरुक्तीचा दोष येतो. ॥३६॥

कर्तव्यं कुरुते वाक्यं ब्रूते धार्यस्य धारणम् ।
इत्यादिवासनाविष्टं प्रत्यासीत्सदितीरणम् ॥ ३७ ॥
या पूर्वपक्षावर आमचें असें उत्तर आहे कीं, वरील अर्थामध्ये अभेदच घेतला पाहिजे. असा अर्थ केला असतां जो पुनरुक्तीचा दोष तुम्ही आणूं पाहतां तो येऊ शकत नाहीं. कारण अशा प्रकारचे प्रयोग लोकरूढींत असून ते दोषास पात्र होत नाहीत. जसें तो कर्तव्य करतो, तो बोलणें बोलतो, धरण्यास योग्य वस्तूचे धरणे असे म्हणण्याचा परिपाठ आहे. व अशीं वाक्यें ऐकण्याचा ज्यांना संस्कार झाला आगे अशा त्या श्वेतकेतूला उद्देशून ’सत् आसीत्’ असे म्हटले आहे. ॥ ३७ ॥

कालाभावे पुरेत्युक्तिः कालवासनयायुतम् ।
शिष्यं प्रत्येव तेनात्र द्वितीयं न हि शंक्यते ॥ ३८ ॥
अद्वितीय वस्तूचे ठिकाणी कालाचीही प्रवृत्ति होत नसताना ’अग्रे’ असा कालनिर्देश कसा केला ? यावर सांगतात - प्रलयावस्थेंत काल नसतांनाही ’सृष्ट्युत्पत्तीपूर्वी’ असे जे म्हटले आहे ते कालाच्या वासनेने युक्त असलेल्या शिष्याला उदेशून आहे. म्हणून त्यावेळी द्वैताच्या अस्तित्वाविषयी शंका घेतां येत नाही. ॥ ३८ ॥

चोद्यं वा परिहारो वा क्रियतां द्वैतभाषया ।
अद्वैतभाषया चोद्यं नास्ति नापि तदुत्तरम् ॥ ३९ ॥
अद्वैत सिद्धान्ताविषयी शंका घेणे व तिचे समाधान करणे ही दोन्हीं द्वैत भाषेने करावी. कारण अद्वैत भाषेनें प्रश्नकरतां येत नाही व तसेंच उत्तरही देतां येत नाही. ॥ ३९ ॥

अतस्तिमितगम्भीरं न तेजो न तमस्ततम् ।
अनाख्यमनभिव्यक्तं सत्किंचिदवशिष्यते ॥ ४० ॥
प्रलयकाली निश्चल व गंभीर, प्रकाशही नव्हे व अंधकारही नव्हे, पण सर्वव्यापी, बोलतां न येण्यासारखे, व अगदी अस्पष्ट असे कांही सत्तारूप अवशिष्ट राहते. हे बृहद्‌योगवसिष्ठांतील वसिष्ठांचे वचन आहे. त्यांनी रामाला प्रलयकालच्या अवस्थेचा बोध केला आहे. त्यावेळी काय असते हे शब्दांनी सांगता येत नाही. तो प्रकाश म्हणावा तर प्रकाशध्र्मरहित व तम म्हणावे तर तेंही नव्हे. असे काही अनिर्वाच्य पण सद्‌रूप, विद्यमान अस्तित्वरूप असते. ॥ ४० ॥



ननु भूम्यादिकं मा भूत्परमाण्वन्त नाशतः ।
कथं ते वियतोऽसत्त्वं बुद्धिमारोहतीति चेत् ॥ ४१ ॥
भूमि, उदक, तेज व वायु या चार द्रव्यांचा परमाणुपर्यंत नाश होत असल्यामुळें तीं मिथ्या असोत. पण आकाश मिथ्या आहे असें तुमच्या बुद्धीवर असें आरूढ होतें असें जर म्हणशील तर ऐक. ॥ ४१ ॥

अत्यन्तं निर्जगद्व्योम यथा ते बुद्धिमाश्रितम् ।
तथैव सन्निराकाशं कुतो नाश्रयते मतिम् ॥ ४२ ॥
सर्व जगाचा नाश झाल्यावर राहणाऱ्या आकाशाचे तुझी बुद्धि जसे ग्रहण करते, तसेंच आकाशरहित सत् वस्तूचे ती कां बरे ग्रहण करीत नाहीं ? ॥ ४२ ॥

निर्जगद्व्योम दृष्टं चेत्प्रकाशतमसी विना ।
क्व दृष्टं किंच ते पक्षे न प्रत्यक्षं वियत्खलु ॥ ४३ ॥
जगद्‌रहित आकाश भासते असें जर म्हणशील तर ते प्रकाश व अंधकार यावांचून कोठे दिसते ? को‍ठेच नाही ? मग तुमच्या मती आकाशाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाहीं कीं काय ? ॥ ४३ ॥

सद्वस्तु सिद्धन्त्वस्माभिर्निश्चितैरनुभूयते ।
तूष्णीं स्थितौ न शून्यत्वं शून्यबुद्धेस्तु वर्जनात् ॥ ४४ ॥
स्वस्थ (सर्व अंतर्बहिरिंद्रियांचा व्यापार बंद करून) बसले असतां आम्हां अनुभवी पुरुषांना अद्वितीय सद्‌वस्तूचा अनुभव येतो. त्या अवस्थेंत शून्याचा बुद्धीला भास होत नसल्यामुळे शून्यत्वाचा अनुभव कधींच येत नाहीं. ॥ ४४ ॥

सद्बुद्धिरपि चेन्नास्ति मास्त्वस्य स्वप्रभत्वतः ।
निर्मनस्कत्वसाक्षित्वात्सन्मात्रं सुगमं नृणाम् ॥ ४५ ॥
तुष्णीं स्थितींत सद्‌बुद्धिसुद्धां नसते असें जर म्हणशील तर ती नसेना. हे सत् स्वयंप्रकाश असल्यामुळे त्याला अतःकरण लीन झाल्याचेही ज्ञान होतें. त्यामुळें केवल सद्‌वस्तु सर्व साधकांना सुलभ आहे. ॥ ४५ ॥

मनोजृम्भनराहित्ये यथा साक्षी निराकुलः ।
मायाजृम्भणतः पूर्वं सत्तथैव निराकुलम् ॥ ४६ ॥
मन वृत्तिशून्य असतांना साक्षी चैतन्य जसे शांत असतें तसेच मायेचा उदय होण्यापूर्वी सत् स्वस्थ असतें. ॥ ४६ ॥

निस्तत्त्वा कार्यगम्यास्य शक्तिर्मायाग्निशक्तिवत् ।
न हि शक्ति क्वचित्कैश्चिद्बुद्ध्यते कारयतः पुरा ॥ ४७ ॥
अग्नीच्या शक्तिप्रमाणे ह्या सद्‌रूप आत्म्याची तत्त्वशून्य व कार्यावरूनच जाणतां येणारी अशी जी शक्ति तीच माया होय. कार्याच्या पूर्वी कोणालाही कधी शक्तीचे ज्ञान होत नाही. ॥ ४७ ॥

न सद्वस्तु सतः शक्तिर्न हि वह्नेः स्वशक्तिता ।
सद्विलक्षणतायान्तु शक्तेः किं तत्त्वमुच्यताम् ॥ ४८ ॥
सत्‌ची शक्ति सद्‌रूपच असणार नाहीं. कारण अग्निच अग्निची शक्ति नव्हे. मग सत्‌ची शक्ति सत्‌पेक्षां विलक्षण जर आहे, तर तिचे तत्त्व काय तें सांग पाहूं ॥ ४८ ॥

शून्यत्वमिति चेच्छून्यं मायाकार्यमितीरितम् ।
नशून्यं नापि सद्यादृक्तादृक्तत्त्वमिहेष्यताम् ॥ ४९ ॥
शून्य हेंच मायेचे तत्त्व असें जर म्हणशील तर शून्य मायेचे कार्य आहे. असें पूर्वी ( शून्यं चेत् जीव्यतां चिरं या वाक्यांत) सांगितलेच आहे. यास्तव शून्यही नव्हे व सत्‌ही नव्हे अशा प्रकारचे मायेचे कांही स्वरूप मानावें ॥ ४९ ॥

नासदासीन्नो सदासीत्तदानीं किन्त्वभूत्तमः ।
सद्योगात्तमसः सत्त्वं न स्वतस्तन्निषेधनात् ॥ ५० ॥
प्रलयकाळी असत् ( शून्य) नव्हतें व सत् ( विद्यमान असेंही कांहीं) नव्हते. तर तम होते. त्याचें सद्‌वस्तूच्या आश्रयानेच सत्त्व असतें. व श्रुतिस्मृतींत निषेध केला असल्यामुळे त्याचें स्वाभाविक सत्त्व नसते. ॥ ५० ॥



अतएव द्वितीयत्वं शून्यवन्नहि गण्यते ।
न लोके चैत्रतच्छक्त्योर्जीवितं गण्यते पृथक् ॥ ५१ ॥
म्हणूनच आम्ही त्या शक्तीची शून्याप्रमाणे निराळी गणना करीत नाहीं. लोकांत सुद्धां चैत्र नांवाचा मनुष्य व त्याची शक्ति या उभयतांना निरनिराळे वेतन लिहीत नाहीत. ॥ ५१ ॥

शक्त्याधिक्ये जीवितं चेद्वर्धते तत्र वृद्धिकृत् ।
न शक्तिः किन्तु तत्कार्यं युद्धकृष्यादिकं तथा ॥ ५२ ॥
शक्ति अधिक असली म्हणजे वेतन वाढते असें जर समजत असशील तर ते व्यर्थ आहे. कारण वेतनाची वृद्धि शक्ति करीत नसते तर युद्ध, शेतकी इत्यादि तिचीं कार्यें त्याची वृद्धि करतात ॥ ५२ ॥

सर्वथा शक्तिमात्रस्य न पृथग्गणना क्वचित् ।
शक्तिकार्यं तु नैवास्ति द्वितीयं शंक्यते कथम् ॥ ५३ ॥
तस्मात् शक्तिमात्राची गणना शक्तीपासून पृथक् करतां येत नाहीं, इतकें सिद्ध झालें. शक्तिकार्याची गणना पृथक् होऊं शकेल, पण ते मुळीच मिथ्या आहे. याकरिता ब्रह्माचेठायीं द्वैताचा संभव मुळीच नाहीं हे सिद्ध झालें, ॥५३॥

न कृत्स्नब्रह्मवृत्तिः सा शक्तिः किन्त्वेकदेशभाक् ।
घटशक्तिर्यथा भूमौ स्निग्धमृद्येव वर्तते ॥ ५४ ॥
ब्रह्माची शक्ति ब्रह्मास सर्वत्र न व्यापतां ती केवळ एकदेशी मात्र आहे. ज्याप्रमाणें घट होण्याची शक्ति चिकण मातींत मात्र असते. ॥५४॥

पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्ति स्वयं प्रभः ।
इत्येकदेशवृत्तित्वं मायाया वदति श्रुतिः ॥ ५५ ॥
माया ही ब्रह्मावर एकदेशीं व्याप्त आहे. एतद्विषयीं पुढील श्रुति प्रमाण आहे. ''या परमेश्वराचा एक पाद सर्व भूतांना व्यापून स्वतः त्रिपाद होत्सातां स्वयंप्रकाश होऊन रहातो.'' ॥५५॥

विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ।
इति कृष्णोर्जुनायाह जगतस्त्वेकदेशताम् ॥ ५६ ॥
याविषयी गीतेंतही प्रमाण आहे. भगवंतांनीं अर्जुनास असें सांगितले आहे कीं मी या सर्व जगास माझ्या एका अंशाने व्यापून राहिलों आहे. ॥५६॥

सभूमिं सर्वतो वृत्वा अत्यतिष्ठद्दशाङ्गुलम् ।
विकारावर्ति चात्रास्ति श्रुतिसूत्रकृतोर्वचः ॥ ५७ ॥
सर्व विश्व व्यापून परमेश्वर दशांगुळे उरला. अशीही एक श्रुति आहे; 'विकारवर्तिच' असे एक व्यासाचे सूत्र आहे. त्याचाही अभिप्राय हाच आहे. ॥५७॥

निरंशेऽप्यंशमारोप्य कृत्स्नेंऽशे वेति पृच्छतः ।
तद्‌भाषयोत्तरं ब्रूते श्रुतिः श्रोतुर्हितैषिणी ॥ ५८ ॥
निरंश ब्रह्माला अंश कसा ? अशी शंका येईल तर तिचे समाधान असें कीं, निरंशावर अंशाचा आरोप ठेवून माया ब्रह्माला सर्वत्र व्यापते किंवा अंशतः व्यापते असें विचारणारास उद्देशून त्याचें समाधान करण्याकरिता श्रुतीचे असें वचन आहे. ॥५८॥

सत्तत्त्वमाश्रिता शक्तिः कल्पयेत्सति विक्रियाः ।
वर्णाभित्तिगताभित्तौ चित्रं नानाविधं यथा ॥ ५९ ॥
सद्‌वस्तूचा आश्रय करून असणारी शक्ति सद्‌वस्तूचे ठायी नानाप्रकारच्या विकारांची कल्पना करते. ज्याप्रमाणें भिंतीवर काढलेल्या चित्रात नानाप्रकारचे वर्ण भासतात. ॥५९॥

आद्यो विकार आकाशः सोऽवकाशस्वभावान् ।
आकाशोऽस्तीति सत्तत्त्वमाकाशेऽप्यनुगच्छति ॥ ६० ॥
सद्‌वस्तूवरील पहिला विकार आकाश होय. त्याचें मुख्य स्वरूप अवकाश. 'आकाश आहे' या वाक्यावरून आहेपणा आकाशाचे ठायीं व्यापून आहे असे होतें. ॥६०॥



एकस्वभावं सत्तत्त्वमाकाशो द्विस्वभावकः ।
नावकाशः सति व्योम्नि स चैषोऽपि द्वयं स्थितम् ॥ ६१ ॥
आहेपणांत अवकाश नाहीं. केवळ अस्तित्वाचा एकच स्वभाव आहे. परंतु आकाशाचे ठायी एक आहेपणा व दुसरा अवकाश असे दोन स्वभाव आहेत. ॥६१॥

यद्वा प्रतिध्वनिर्व्योम्नो गुणो नासौ सतीक्ष्यते ।
व्योम्नि द्वौ सद्ध्वनी तेन सदेकं द्विगुणं वियत् ॥ ६२ ॥
अथवा आकाशाचा गुण प्रतिध्वनि हा आहे, तो सद्वस्तूचे ठायीं दिसत नाहीं. परंतु आकाशाचे ठायीं आहेपणा आणि प्रतिध्वनि असे दोन आहेत. म्हणून सत् एक स्वभाव आणि आकाश द्विस्वभाव आहे असे अर्थातच सिद्ध झाले. ॥६२ ॥

या शक्तिः कल्पयेद्व्योम सा सद्व्योम्नोरभिन्नताम् ।
आपाद्य धर्मधर्मित्वं व्यत्ययेनावकल्पयेत् ॥ ६३ ॥
याजवर अशी शंका आहे कीं, आकाश हें सद्‌वस्तूचे कार्य असून आकाशाची सत्ता असें म्हणण्याचा जो परिपाठ आहे, त्याजवरून सत्ता हा आकाशाचा धर्म आहे, असें होते तर हे विपरीत कसे ? तर याजवर आमचें असें समाधान आहे की, जी शक्ति आकाशाची कल्पना करते, तीच शक्ति सत्ता आणि आकाश या दोहोंचा अभेद कल्पून धर्माचा धर्मी आणि धर्मीचा धर्म करते. ॥६३॥

सतो व्योमत्वमापन्नं व्योम्नः सत्तान्तु लौकिकाः ।
तार्किकाश्चावगच्छन्ति मायाया उचितं हि तत् ॥ ६४ ॥
वास्तविक पहातां सत्तेचे आकाश असा व्यवहार असावा तो नसून आकाशाची सत्ता असा व्यवहार साधारण लोकांत व विद्वान लोकांत आढळतो हाही मायेचाच खेळ आहे. ॥६४॥

यद्यथा वर्तते तस्य तथात्वं भाति मानतः ।
अन्यथात्वं भ्रमेणेति न्यायोऽयं सर्वलौकिकः ॥ ६५ ॥
पदार्थ जशाचा तसा भासला असतां तें सत्यज्ञान होय. आणि जशाचा तसा न भासतां अन्यथा भासतो त्यासच भ्रम असें म्हणतात. ॥६५॥

एवं श्रुतिविचारात्प्राक्यद्यथा वस्तु भासते ।
विचारेण विपर्येति ततस्तच्चिन्त्यतां वियत् ॥ ६६ ॥
याप्रमाणें श्रुत्यर्थविचार करण्यापूर्वी जें सद्‌रूप ब्रह्म भ्रांतीनें गगनादिकांच्या रूपानें भासते, तेंच श्रुत्यर्थविचार झाल्यानंतर त्याचा गगनादि भाव जाऊन पूर्ववत् ब्रह्मच भासू लागतें. याजकीरतां आधीं आकाशाचें विवेचन करावे. ॥६६॥

भिन्ने वियत्सती शब्दभेदाद्बुद्धेश्च भेदतः ।
वाय्वादिष्वनुवृत्तं सन्न तु व्योमेति भेदधीः ॥ ६७ ॥
आकाश आणि सत् हे दोन शब्द जसे एकमेकांपासून भिन्न आहेत, तसेंच आकाशबुद्धि आणि सद्‌बुद्धि या दोनही एकमेकांपासून भिन्न आहेत. कारण पूर्वी वाय्वादिक भूतांचेठायी जशी सत्ता व्यापून आहे तसे आकाश नाहीं. म्हणून आकाशापासून सत्ता भिन्न आहे हें सिद्ध झाले. ॥६७॥

सद्वस्त्वधिकवृत्तित्वाद्धर्मि व्योम्नस्तु धर्मता ।
धिया सतः पृथक्कारे ब्रूहि व्योम किमात्मकम् ॥ ६८ ॥
आतां सद्‌वस्तूची व्याप्ति अधिक असल्यामुळें त्याला धर्मत्व येते. बुद्धीनें आकाशापासून सत्ता निराळी केली असतां आकाशाचे स्वरूप काय रहातें हें सांगता येणे अशक्य आहे. ॥६८॥

अवकाशात्मकं तच्चेदसत्तदिति चिन्त्यताम् ।
भिन्नं सतोऽसच्च नेति वक्षि चेद्व्याहतिस्तव ॥ ६९ ॥
कोणी म्हणेल की, तें अवकाशात्मक आहे. होय, पण तें सतापासून भिन्न असल्यावर असतच असले पाहिजे. तसें न म्हटल्यास व्याहतिदोष येतो. ॥६९॥

भातीति चेद्‌भातु नाम भूषणं मायिकस्य तत् ।
यदसद्‌भासमानन्तन्मिथ्या स्वप्नगजादिवत् ॥ ७० ॥
वास्तविक नसणारे जग भासते कसें अशी शंका घेण्याचें कारण नाहीं. असें भासणें हे मायेचें भूषणच आहे स्वप्नांत हत्ती घोडे भासतात म्हणून ते खरे काय ? जे नसून भासते त्यासच मिथ्या म्हणतात. ॥७०॥



जातिव्यक्तो देहिदेहौ गुणद्रव्ये यथा पृथक् ।
वियत्सतोस्तथैवास्तु पार्थक्यं कोऽत्र विस्मयः ॥ ७१ ॥
जाति, व्यक्ति देही, देह, गुण, आणि द्रव्य ही जशी एकमेकांपासून पृथक् आहेत तशींच सत्ता आणि आकाश ही एकमेकांपामून भिन्न आहेत. यांत नवल तें काय ? ॥७१॥

बुद्धोऽपि भेदो नो चित्ते निरुढिं याति चेत्तदा ।
अनैकाग्र्यात्संशयाद्वा रूढ्यभावोऽस्य ते वद ॥ ७२ ॥
हें मात्र खरे आहे कीं, हा भेद जरी समजला तरी तो चांगला चित्तांत ठसत नाहीं. यास कारणें दोन आहेत. एक चित्ताचें अनैकाग्र्य, दुसरें संशय. यांपैकी कोणचें कारण आहे याचा विचार करावा. ॥७२॥

अप्रमत्तो भव ध्यानादाद्येऽन्यस्मिन्विवेचनम् ।
कुरु प्रमाणयुक्तिभ्यां ततो रूढतमो भवेत् ॥ ७३ ॥
अनैकाग्र्य असेल तर ध्यानानें एकाग्रता करावी. आणि संशय असेल तर प्रमाण व युक्ति लढवून चांगलें निवेदन करावे. म्हणजे वर सांगितलेला भेद चित्तांत चांगला ठसेल. ॥७३॥

ध्यानान्मानाद्युक्तितोऽपि रूढे भेद वियत्सतोः ।
न कदाचिद्वियत्सत्यं सद्वस्तु छिद्रवन्न च ॥ ७४ ॥
ध्यान, प्रमाण आणि युक्ति यांच्या योगानें आकाश आणि सत्ता या दोहोंतील भेद एकदां मनांत चांगला ठसल्यावर पुनः आकाश सत्य व सद्वस्तु पोकळ असें कधींही वाटणार नाहीं. ॥७४॥

ज्ञस्य भाति सदा व्योम निस्तत्त्वोल्लेखपूर्वकम् ।
सद्वस्त्वपि विभात्यस्य निश्छिद्रत्वपुरःसरम् ॥ ७५ ॥
तत्त्ववेत्त्याला आकाश हे अगदीं निस्तत्त्व आणि सद्वस्तु ओतप्रोत दाट भरलेली अशी भासते. ॥७५॥

वासनायां विवृद्धायां वियत्सत्यत्ववादिनम् ।
सन्मात्राबोधयुक्तं च दृष्ट्वा विस्मयते बुधः ॥ ७६ ॥
हें ज्ञान एकदां दृढ झाले असतां आकाशाला खरें म्हणणारास व ज्याला सद्‌रूपाची व्यापकता समजली नाहीं अशा मनुष्यास पाहून तत्त्ववेत्त्याला मोठे आश्वर्य वाटेल. ॥७६॥

एवमाकाशमिथ्यात्वे सत्सत्यत्वे च वासिते ।
न्यायेनानेन वाय्वादेः सद्वस्तु प्रविविच्यताम् ॥ ७७ ॥
याप्रमाणे आकाशाचे मिथ्यात्व आणि सद्‌वस्तूचे सत्यत्व चांगलें ठसल्यावर याच न्यायाने वाय्वादिक भूतांपासून सद्‌वस्तूची निवड करावी ॥७७॥

सद्वस्तुन्येकदेशस्था माया तत्रैकदेशगम् ।
वियत्तत्राप्येकदेशगतो वायु प्रकल्पितः ॥ ७८ ॥
सद्‌वस्तूच्या एकदेशी माया, मायेच्या एकदेशीं आकाश व आकाशाच्या एकदेशी वायु कल्पिलेला आहे. ॥७८॥

शोषस्पर्शौ गतिर्वेगो वायुधर्मा इमे मताः ।
त्रयः स्वभावाः सन्मायाव्योम्नां ये तेऽपि वायुगाः ॥ ७९ ॥
शोष, स्पर्श, गति आणि वेग हे वायूचे धर्म आहेत. सत्ता माया आणि आकाश या तिहींचे जे तीन स्वभाव तेही वायुगतच आहेत. ॥७५॥

वायुरस्तीति सद्‌भावः सतो वायौ पृथक्कृते ।
निस्तत्त्वरूपता मायास्वभावो व्योमगो ध्वनिः ॥ ८० ॥
'वायु आहे' अशा व्यवहारास जो हेतुभूत तो वायूंतील सत्ताधर्म समजावा, आणि सत्तेपासून वायु पृथक् केला असतां जे त्याचें निःसत्त्व रूप रहाते तो मायाधर्म, आणि वायूंतील जो ध्वनि तो आकाशधर्म समजावा. ॥८०॥



सतोऽनुवृत्तिः सर्वत्र व्योम्नो नेति पुरोदितम् ।
व्योमानुवृत्तिरधुना कथं नव्याहतं वचः ॥ ८१ ॥
पूर्वी असें सांगितलें आहे की, सताची जशी सर्वत्र अनुवृत्ति आहे, तशी आकाशाची नाहीं. पण आतां आकाशाची व्याप्ति वायूमध्यें दाखवितां; तेव्हां पूर्वोत्तर विरोध येतो, अशी कोणी शंका घेईल, ॥८१॥

छिद्रानुवृत्तिर्नेतीति पूर्वोक्तिरधुना त्वियम् ।
शब्दानुवृत्तिरेवोक्ता वचसो व्याहतिः कुतः ॥ ८२ ॥
तर त्याचें समाधान हेंच कीं, पूर्वी आम्ही जी व्याप्ती निवारिली, ती अवकाशलक्षण स्वरूपाची आणि आतां जी आम्ही सांगत आहों, ती केवळ शब्दरूप धर्माची म्हणून पूर्वोत्तर विरोध येत नाहीं. ॥८२॥

ननु सद्वस्तुपार्थक्यादसत्त्वं चेत्तदा कथम् ।
अव्यक्तमायावैषम्यादमायामयतापि नो ॥ ८३ ॥
याजवरही असा एक पूर्वपक्ष आहे कीं, वायूंतून सत्ता निराळी काढली असतां बाकी राहिलेलें वायूचें रूप निस्तत्त्व जसे आहे तसेंच अव्यक्त मायेपासून तें भिन्न असल्यामुळे त्यास मायाही म्हणतां येत नाहीं. ॥८३॥

निस्तत्त्वरूपतैवात्र मायात्वस्य प्रयोजिका ।
सा शक्तिकार्ययोस्तुल्या व्यक्ताव्यक्तत्वभेदिनोः ॥ ८४ ॥
तर याजवर आमचे अस समाधान आहे कीं, माया ही अव्यक्तच असली पाहिजे असें कांहीं नाहीं. निस्तत्त्वरूप हेंच मायेचें रूप, ते असलें म्हणजे झालें. माया व्यक्त असो, किंवा अव्यक्त असो, त्या दोहींलाही हें निस्तत्त्वरूप साधारणच आहे. ॥८४॥

सदसत्त्वविवेकस्य प्रस्तुतत्त्वात्सचिन्त्यताम् ।
असतोऽवान्तरो भेद आस्तां तच्चिन्तयात्र किम् ॥ ८५ ॥
परंतु प्रस्तुत या विचाराची जरूर नाहीं. तूर्त सत् कोणचें आणि असत् कोणचें याचा विवेक करणे आमचें काम आहे. असताचे जे अवांतर भेद आहेत त्यांचे काही येथें प्रयोजन नाहीं. ॥८५॥

सद्वस्तुब्रह्मशिष्टोंऽशोवायुर्मिथ्या यथा वियत् ।
वासयित्वा चिरं वायोर्मिथ्यात्वं मरुतं त्यजेत् ॥ ८६ ॥
याकरिता वायूचे ठायीं जो सत्तारूप अंश आहे, तो वजा जातां बाकी उरलेला जो वायूचा अंश तो आकाशाप्रभाणे मिथ्या आहे. हें वायूचे मिथ्यात्व चित्तामध्ये ठसवून बुद्धीनें वायूचा त्याग करावा. ॥८६॥

चिन्तयेद्वह्निमप्येवं मरुतो न्यूनवर्तिनम् ।
ब्रह्माण्डावरणेष्वेषां न्यूनाधिकविचारणा ॥ ८७ ॥
याचप्रमाणें वायूपेक्षां न्यूनदेशी असणारा जा वन्हि त्याचें चिंतन करावे, म्हणजे सत्तारूप अंश वजा केला असतो अवशिष्ट वन्हि मिथ्या आहे असा दृढ निश्चय करावा. हा न्यूनाधिक विचार बह्मांडावरणाचेठायीं दृष्टीस पडतो. ॥८७॥

वायोर्दशांशतोन्यूनोवह्निर्वायौ प्रकल्पितः ।
पुराणोक्तं तारतम्यं दशांशैर्भूतपञ्चके ॥ ८८ ॥
वायूच्या दहाव्या हिश्शानें वायूच्या ठायीं अग्नि असतो हें पंचभूतांचें एकाहून एक दशांशेंकरून न्यूनत्व पुराणांत सांगितलें आहे. ॥८८॥

वह्निरुष्णप्रकाशात्मा पूर्वानुगतिरत्र च ।
अस्ति वह्निः सनिस्तत्त्वः शब्दवान्स्पर्शवानपि ॥ ८९ ॥
वन्हीचें स्वरूप उष्ण प्रकाशात्मक आहे. वन्हि आहे यांत सत्तारूप धर्म आला तो एकीकडे सारून, वन्हि निराळा केला असतां तो निस्तत्त्व शब्दवान् आणि स्पर्शवान् आहे असे दिसेल. ॥८९॥

सन्मयाव्योमवाय्वंशैर्युक्तस्याग्नेर्निजो गुणः ।
रूपं तत्र सतः सर्वमन्यद्बुद्ध्या विविच्यताम् ॥ ९० ॥
याप्रमाणें सत्ता, माया, आकाश व वायु या सर्व अंशांहींकरून युक्त जो अग्नि त्याचें स्वतःचा गुण रूप होय; त्याची निवड बुद्धीनें करावी. ॥९०॥



सतो विवेचिते वह्नौ मिथ्यात्वे सति वासिते ।
आपो दशांशतो न्यूनाः कल्पिता इति चिन्तयेत् ॥ ९१ ॥
सत्तेपासून अग्नीची निवड करून त्याचें मिथ्यात्व चित्तांत ठसलें असतां उदक हें अग्नीहून दशांशानें कमी आहे असें कल्पावें. ॥९१ ॥

सन्त्यापोऽमूः शून्यतत्त्वाः सशबदस्पर्शसंयुताः ।
रूपवत्योऽन्यधर्मानुवृत्या स्वीयो रसो गुणः ॥ ९२ ॥
पाणी आहे या व्यवहारास कारणीभत जी सत्ता ती वेगळी करून पाहिलें असतां बाकी राहिलेले उदक हें अगदी निस्तत्त्व आहे. यांत शब्द, स्पर्श, रूप हे तीन गुण बाकीच्या भूतांचे असून रस हा पाण्याचा स्वकीय गुण आहे. ॥९२॥

सतो विवेचितास्वप्सु तन्मिथ्यात्वे च वासिते ।
भूमिर्दशांशतो न्यूना कल्पिताप्स्विति चिन्तयेत् ॥ ९३ ॥
सत्तेपासून पाणी पृथक् करून त्याचेंही मिथ्यात्व चित्तांत ठसले असतां त्याहून दशांशानें कमी असणारी जी पृथ्वी तिचें चिंतन करावे. ॥९३॥

अस्ति भूस्तत्त्वशून्यास्याः शब्दस्पर्शौ स्वरूपकौ ।
रसश्च परतो नैजो गन्धः सत्ता विविच्यताम् ॥ ९४ ॥
पृथ्वी आहे या व्यवहारास कारणीभूत जी सत्ता ती निराळी करून बाकी राहिलेली पृथ्वी निस्तत्व आहे. शब्द, स्पर्श, रूप आणि रस हे चार गुण तिजमध्यें इतर भूतांचे असून गंध हा तिचा स्वकीय गुण आहे. ॥९४ ॥

पृथक्कृतायां सत्तायां भूमिर्मिथ्यावशिष्यते ।
भूमेर्दशांशतो न्यूनं ब्रह्माण्डं भूमिमध्यगम् ॥ ९५ ॥
तिजपासून सत्ता निराळी करून तिचें मिथ्यात्त्व चांगले ठसल्यानंतर तिजहून दशांशाने कमी असे तिच्या मध्यभागीं असणारे ब्रह्मांड, ॥९५ ॥

ब्रह्माण्डमध्ये तिष्ठन्ति भुवनानि चतुर्दश ।
भुवनेषु वसन्त्येषु प्राणिदेहा यथायथम् ॥ ९६ ॥
व त्या ब्रह्मांडांत चतुर्दश भुवनें आहेत. त्या भुवनांमध्यें प्राण्यांचे देह आहेत. ॥९६॥

ब्रह्माण्डलोकदेहेषु सद्वस्तुनि पृथक्कृते ।
असन्तोऽण्डादयो भान्तु तद्‌भानेऽपीह का क्षतिः ॥ ९७ ॥
या सर्वाहून सद्‌वस्तू वेगळी केली असतां बाकीचे अंडादिक मिथ्या ठरतात. तीं डोळयांस जरी भासली तरी तीं मिथ्याच समजावीं. ॥९७॥

भूतभौतिकमायानामसमत्वेऽत्यन्तवासिते ।
सद्वस्त्वद्वैतमित्येषा धीर्विपर्येति न क्वचित् ॥ ९८ ॥
पंचभूते व त्यांपासून झालेली बह्मांडें व या दोहोंस कारणीभूत जी मायाशक्ति यांचें मिथ्यात्व विवेक व ध्यान यांच्या योगानें एकदी चित्तांत चांगलें ठसले असतां सद्‌वस्तूच अद्वैत आहे असा निश्चय चित्तांतून कधींही ढळणार नाहीं. ॥९८॥

सदद्वैतात्पृथग्भूते द्वैते भूम्यादिरूपिणि ।
तत्तदर्थक्रिया लोके यथा दृष्टा तथैव सा ॥ ९९ ॥
सद्‌रूपापासून वेगळी केलेली भूम्यादिक द्वैतसृष्टि मिथ्या ठरली असतां तत्त्ववेत्त्याचा व्यवहार अगदी बंद पडेल अशी शंका कोणी घेऊं नये. पदार्थ मिथ्या ठरल्यानें व्यवहार बंद पडतो असें समजणें ही मोठी चूक आहे. ज्या ज्या कामाकरिता जी जी क्रिया पाहिजे, ती ती क्रिया यथास्थित चालण्यास जगन्मिथ्यात्वामुळें मुळींच नड येत नाहीं. ॥९९॥

सांख्यकाणादबौद्धाद्यैर्जगद्‌भेदो यथा यथा ।
उत्प्रेक्ष्यतेऽनेकयुक्त्या भवत्वेष तथा तथा ॥ १०० ॥
सांख्य, कणाद, बौद्ध आदिकरून जे वादी होऊन गेले, त्यांनीं निरनिराळ्या रीतीनें जसजसें भेदाचे प्रतिपादन केलें आहे, त्या सर्वांचे खंडन करण्याचें आमचें काम नाहीं. त्यांचें मत तूर्त आहे तसेंच असूं दे. ॥१०० ॥




अवज्ञातं सदद्वैतं निःशंकैरन्यवादिभिः ।
एवं का क्षतिर्रस्माकं तद्द्वैतमवजानताम् ॥ १०१ ॥
आम्ही येथें केवळ व्यावहारिक भेदाचा मात्र निरास करतों. इतर वाद्यांनीं जर आमच्या सद्‌रूप अद्वैत ब्रह्माची निशंकपणें अवज्ञा केली तर आम्हांलाही त्यांच्या द्वैताचा अनादर करण्यास कोणाची भीति आहे ? ॥१०१॥

द्वैतावज्ञा सुस्थिता चेदद्वैता धीः स्थिरा भवेत् ।
स्थैर्ये तस्याः पुमानेष जीवन्मुक्त इतीर्यते ॥ १०२ ॥
त्यांच्या अद्वैताच्या अनादराप्रमाणे आम्ही केलेला द्वैताचा अनादर निष्फळ नाहीं. हा द्वैताचा अनादर एकदां चित्तांत चांगला ठसला असतां अद्वैतबुद्धि स्थिर होते, व ती स्थिर झाली असतां मनुष्य जीवन्मुक्त होतो. ॥१०२॥

एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥ १०३ ॥
याविषयीं गीतावाक्य प्रमाण आहे. भगवंतांनी अर्जुनास असें म्हटलें आहे की, है अर्जुना, या अद्वैतबुद्धीला ब्राह्मीस्थिति असें म्हणतात. ही प्राप्त झाली असतां प्राणी मोह पावत नाहीं; व या स्थितींत असल्यावर अंतकाळीं ब्रह्मप्रासि होते. ॥१०३॥

सदद्वैतेऽनृतद्वैते यदन्योऽन्यैक्यवीक्षणम् ।
तस्यान्तकालस्तद्‌भेदबुद्धिरेव न चेतरः ॥ १०४ ॥
येथें अंतकाळ या शब्दाचा अर्थ असा की, सद्‌रूप अद्वैत ब्रह्म आणि असद्‌रूप द्वैत ह्या दोन्हींचें भ्रमेंकरून जें ऐक्यज्ञान त्याचा जो अंतकाल तो समजावा. तो अंतकाल म्हटला म्हणजे द्वैत व अद्वैत या दोहोमधील भेंदबुद्धि होय. ॥१०४॥

यद्वान्तकालः प्राणस्य वियोगोस्तु प्रसिद्धितः ।
तस्मिन्कालेऽपि न भ्रान्तेर्गतायाः पुनरागमः ॥ १०५ ॥
अथवा अंतकाल या शब्दाचा जो लोकप्रसिद्ध अर्थ तो घेतला तरी चालेल. प्राणोत्क्रमणकालींही एकदां गेलेली भ्रांति पुनः परत येत नाही. ॥१०५॥

नीरोग उपविष्टो वा रुग्णो वा विलुठन्भुवि ।
मूर्च्छितो वा त्यजेदेष प्राणान्भ्रान्तिर्न सर्वथा ॥ १०६ ॥
हा मनुष्य रोगी असो, निरोगी असो, बसला असो, भुईवर लोळत पडला असो, प्राणत्यागकाली मूर्च्छित पडो, कसाही असो; तेथे भ्रांतीची शंकाच नाहीं. ॥१०६॥

दिने दिने स्वप्नसुप्त्योरधीते विस्मृतेऽप्ययम् ।
परेद्युर्नानधीतः स्यात्तत्त्वविद्या न नश्यति ॥ १०७ ॥
ज्याप्रमाणे प्रति दिवशीं केलेले वेदपठण स्वप्न व निद्रा यांमध्ये जरी विसरलें तरी दुसरे दिवशी आठवते, त्याप्रमाणें एकदां झालेलें ज्ञान नष्ट होत नाहीं. ॥१०७॥

प्रमाणोत्पादिता विद्या प्रमाणं प्रबलं विना ।
न नश्यति न वेदान्तात्प्रबलं मानमीक्षते ॥ १०८ ॥
शिवाय प्रमाणापासून उत्पन्न झालेलें ज्ञान दुसर्‍या प्रबल प्रमाणावांचून नाशपावत नाही. वेदांतापेक्षां तर दुसरें प्रमाणच नाहीं. ॥१०८॥

तस्माद्वेदान्तसंसिद्धं सदद्वैतं न बाध्यते ।
अन्तकालेऽप्यतो भूतविवेकान्निर्वृतिः स्थिता ॥ १०९ ॥
इति भूतविवेकनाम द्वितीयः परिच्छेदः ॥ २ ॥
तस्मात वेदांत प्रमाणांनीं सिद्ध केलेले जें अद्वैत तें कधींही बाधित होत नाहीं. म्हणून भूतविवेकापासून अंतकालीं मोक्षप्रासि होते. ॥१०९॥
भूतविवेक समाप्त.