॥ पञ्चदशी ॥
अष्टमः परिच्छेदः - कूटस्थदीपः

खादित्यदीपिते कुड्ये दर्पणादित्यदीप्तिवत् ।
कूटस्थभासितो देहो धीस्थजीवेन भास्यते ॥ १ ॥
ज्याप्रमाणें भिंतीवर आकाशांतील सूर्याचा एक प्रकाश पडला असून त्यावरच दुसरा आरशमधील प्रतिबिंबित सूर्याचा प्रकाश पडावा, त्याप्रमाणें हा देही दोन प्रकारच्या ज्ञानांनी प्रकाशीत झाला आहे. पूर्वी ब्रह्मज्ञानाचे योगाने प्रकाशित असून त्याजवर आणखी एक जीवाचा प्रकाश पडून तो विशेष स्पष्ट होतो. या दृष्टांतांत खऱ्या व खोट्या सूर्याचे दोन प्रकाश दर्शवून एक ब्रह्माचे सामान्य ज्ञान आणि दुसरें जीवाचे विशेष ज्ञान अशीं दोन ज्ञाने दर्शविली. येथें देहस्थानी भिंत, कूटस्थ स्थानी आकाशांतील सूर्य, जीवस्थानीं आरशांतील सूर्य, आणि बुद्धिस्थानीं आरसा अशीं दृष्टांताची योजना समजावी. ॥ १ ॥

अनेकदर्पणादित्यदीप्तीनां बहुसन्धिषु ।
इतरा व्यज्यते तासामभावेऽपि प्रकाशते ॥ २ ॥
अशा प्रकारच्या निरनिराळ्या आरशाची किरणे भिंतीवर पडली असतां मध्यंतरी, किंवा तीं सर्व किरणे आरसे काढून टाऊन नाहीशी केली असतां सर्वत्र आकाशांतील सूर्याचा सामान्य प्रकाश स्पष्ट दिसतो. ॥ २ ॥

चिदाभासविशिष्टानां तथाऽनेकधियामसौ ।
सन्धिं धियामभावं च भासयन् प्रविविच्यताम् ॥ ३ ॥
ज्याप्रमाणें वरील दृष्टांतांत विशेष प्रकाशापासून सामान्य प्रकाश निराळा स्पष्ट भासतो, त्याप्रमाणें चिदाभासयुक्त ज्या निरनिराळ्या बुद्धीच्या वृत्ती उठतात त्यांच्या मध्यंतरी किंवा त्यांच्या अभावीं कूटस्थ ज्ञानाचा प्रकाश स्पष्ट भासतो, तो वाचकांनी सूक्ष्म दृष्टीनें ध्यानांत आणावा. ॥ ३ ॥

घटैकाकारधीस्था चिद्घटमेवावभासयेत् ।
घटस्य ज्ञातता ब्रह्मचैतन्येनावभासते ॥ ४ ॥
ही देहातील गोष्ट झाली. आतां देहाबाहेरही ही दोन प्रकारची ज्ञाने तशींच अनुभवास येतात. ज्या वेळीं आम्हास घट समजतो त्या वेळीं केवळ घटापुरत्याच त्यागून असणाऱ्या बुद्धीतील चिदाभासास फक्त घटाचें मात्र ज्ञान होतें. हें चिदाभासज्ञान समजावे, आणि तो घट मीं जाणला ही गोष्ट ज्या ज्ञानाने समजते तें ब्रह्मज्ञान असे जाणावे. पहिले विशेष आणि दुसरे सामान्य आहे. ॥ ४ ॥

अज्ञातत्वेन ज्ञातोऽयं घटो बुद्ध्युदयात्पुरा ।
ब्रह्मणैवोपरिष्टात्तु ज्ञातत्वेनेत्यसौ भिदा ॥ ५ ॥
ब्रह्मज्ञानानें जर घट समजतो तर आणखी बुद्धि ती कशाला पाहजे असा कोणाचा प्रश्न असेल तर त्याचें समाधान हें कीं, बुद्धीवाचून घटाचे समजणे न समजणें हे भेद मुळींच संभवणार नाहींत. बुद्धि उत्पन्न होण्यापूर्वी या घटाचें ज्ञान ब्रह्मास होतें तें न समजून होतें; आणि तेंच बुद्धीचा उदय झाल्यावर ब्रह्माला त्या घटाच ज्ञान समजून झाले, एवढाच कायता भेद. ॥ ५ ॥

चिदाभासान्तधीवृत्तिर्ज्ञानं लोहान्तकुन्तवत् ।
जाड्यमज्ञानमेताभ्यां व्याप्तः कुम्भो द्विधोच्यते ॥ ६ ॥
एकाच घटाला ज्ञातत्व आणि अज्ञातत्व ही दोन्हीही कशी संभवतात, हें ध्यानांत येण्यास ज्ञान व अज्ञान या दोहींचे स्वरूप चांगले समजले पाहिजे. ज्या बुद्धिवृत्तीच्या शेवटीं चिदाभास असतो अशी जी, शेवटीं पोलाद असलेल्या भाल्यासारखी वृत्ति, तेच ज्ञान आणि ज्यात स्फूर्ति मुळींच नाहीं, तें अज्ञान. ह्या दोहोंनी पाळीपाळीनें घट व्याप्त होतो. ॥ ६ ॥

अज्ञातो ब्रह्मणा भास्यो ज्ञातः कुम्भस्तथा न किम् ।
ज्ञातत्वजननेनैव चिदाभासपरिक्षयः ॥ ७ ॥
येथें घटाची ज्ञातता ब्रह्माला कशी समजली अशी कोणी शंका घ्यावयास नको. अज्ञात कुंभ जसा ब्रह्माला तसा ज्ञात कुंभही ब्रह्मालाच समजतो असें म्हणण्यास कोणती नड आहे ? कारण घटाचें ज्ञातत्व उत्पन्न होतांच चिदाभासाचा क्षय होतो. तेव्हां चिदाभासास त्या घटाची ज्ञातता कशी समजेल ? ॥ ७ ॥

आभासहीनया बुद्ध्या ज्ञातत्वं नैव जन्यते ।
तादृग्बुद्धेर्विशेषः को मृदादेः स्याद्विकारिणः ॥ ८ ॥
घटाची अज्ञातता जशी अज्ञानाने उत्पन्न होते तशी घटाची ज्ञातता उत्पन्न होण्यास केवळ बुद्धीचेच साधन बस आहे. त्यांत आणखी चिदाभास कशाला पाहिजे अशी शंका घेऊं नये. कारण नुसति बुद्धि आणि माति या दोहोंमध्ये जाड्यत्वाचे संबधाने कांहींच भेद नाही. म्हणून ज्ञातता उत्पन्न होण्यास चिदाभासाची अवश्यकता आहे. ॥ ८ ॥

ज्ञात इत्युच्यते कुम्भो मृदा लिप्तो न कुत्रचित् ।
धीमात्रव्याप्तकुम्भस्य ज्ञातत्वं नेष्यते तथा ॥ ९ ॥
जसा केवळ मातीने सारविलेला घट ज्ञात म्हणजे जाणला असें म्हणतां येत नाहीं, त्याप्रमाणें चिदाभासरहित केवळ बुद्धीने व्यापलेला घट जाणला असें म्हणतां येणार नाहीं. ॥ ९ ॥

ज्ञातत्वं नाम कुम्भेऽतश्चिदाभासफलोदयः ।
न फलं ब्रह्मचैतन्यं मानात्प्रागपि सत्वतः ॥ १० ॥
याकरिता चिदाभासरूप फलाची जी उत्पत्ति तेंच कुंभाचे ज्ञातत्व. तें ज्ञातत्व उत्पन्न करणें हे काहीं ब्रह्माचे काम नव्हे. कारण घट स्फुरण होण्यापूर्वीही ब्रह्म होतेंच. ॥ १० ॥



परागर्थप्रमेयेषु या फलत्वेन संमता ।
संवित्सैवेह मेयोऽर्थो वेदान्तोक्ति प्रमाणतः ॥ ११ ॥
घटादीक पदार्थांचे ज्ञान होतांना ज्या ज्ञानाचा उपयोग होतो तेंच ज्ञान आमच्या वेदांत शास्त्रांत चिदाभास शब्दाने प्रसिद्ध आहे असें सुरेश्वराचार्यांचे वार्तिक आहे. ॥ ११ ॥

इति वार्तिककारेण चित्सदृश्यं विवक्षितम् ।
ब्रह्मचित्फलयोर्भेदः सहस्र्यां विश्रुतो यतः ॥ १२ ॥
या वार्तिकात जसे चिदाभासालाच घट ज्ञानाचे प्रमाणफलत्व दिलें आहे, व शंकराचार्यांच्या उपदेशसाहस्री नामक ग्रंथांतही ब्रह्म आणि चिदाभास यांचा भेद तसाच वर्णिला आहे. ॥ १२ ॥

आभास उदितस्तस्माज्ज्ञातत्वं जनयेद्घटे ।
तत्पुनःर्ब्रह्मणाभास्यमज्ञातत्ववदेव हि ॥ १३ ॥
याकरितां चिदाभास उत्पन्न होतांच घटाचें ज्ञातत्व उत्पन्न होतें म्हणजे घट समजतो. आणि तें ज्ञातत्व पूर्वींच्या अज्ञातत्वाप्रमाणें ब्रह्मालाच समजते. ॥ १३ ॥

धीवृत्त्याभासकुम्भानां समूहो भास्यते चिता ।
कुम्भमात्रफलत्वात्स एक आभासतः स्फुरेत् ॥ १४ ॥
म्हणजे धीवृत्ति, चिदाभास आणि घट या तिहींचा समुदाय ब्रह्माला समजतो. आणि चिदाभासाचें काम केवळ घट स्फुरण करणें असें असल्यामुळे त्याला घट मात्र समजतो. ॥ १४ ॥

चैतन्यं द्विगुणं कुम्भे ज्ञातत्वेन स्फुरेत्यतः ।
अन्येऽनुव्यवसायाख्यमाहुरेतद्यथोदितम् ॥ १५ ॥
एवंच असें सिद्ध झाले की, घटज्ञान होतांना त्याजवर दोन प्रकारच्या ज्ञानाचे व्यापार घडतात. हें जें आम्ही घटाची ज्ञातता समजणारे ब्रह्मज्ञान सांगितलें त्याला नैय्यायिक अनुव्यवसायाख्य म्हणतात. ॥ १५ ॥

घटोऽयमित्यसावुक्तिराभासस्य प्रसादतः ।
विज्ञातो घट इत्युक्तिर्ब्रह्मानुग्रहतो भवेत् ॥ १६ ॥
दोनही ज्ञानें साधारण व्यवहारातील भाषणावरूनही समजून येतात. जेव्हां एकाद्याच्या मुखांतून हा घट असा उद्गार निघतो तेव्हां तो चिदाभास ज्ञानामुळे निघाला असें समजावे, आणि जेव्हां हा घट मला समजला असें तो म्हणतो तेव्हां तें ब्रह्मज्ञानाचे लक्षण समजावे. ॥ १६ ॥

आभासब्रह्मणी देहाद्‌बहिर्यद्वद्विवेचिते ।
तद्वदाभासकूटस्थौ विविच्येतां वपुष्यपि ॥ १७ ॥
एथवर देहाबाहेर ब्रह्मज्ञान आणि चिदाभासज्ञान या दोहोंमधील भेद दाखवला. आतां तसाच भेद देहाचे आंतही कूटस्थ आणि चिदाभास या दोहोंचे विवेचन करून दाखवू. ॥ १७ ॥

अहंवृत्तौ चिदाभासः कामक्रोधादिकासु च ।
संव्याप्य वर्तते तप्ते लोहे वह्निर्यथा तथा ॥ १८ ॥
ज्याप्रमाणें तापलेल्या लोखंडांत अग्नि ओतप्रोत व्यापून असतो त्याप्रमाणें अहं वृत्तींत व दुसऱ्या कामकोधादिक वृत्तींमध्ये चिदाभासही व्यापून असतो ॥ १८ ॥

स्वमात्रं भासयेत्तप्तं लोहं नान्यत्कदाचन ।
एवमाभाससहिता वृत्तयः स्वस्वभासिकाः ॥ १९ ॥
आणि तें तापलेले लोखंड जसे आपल्याला मात्र भासवितें तशा त्या आभासासहवर्तमान वृत्तीही आपल्यालाच भासवितात. ॥ १९ ॥

क्रमाद्विच्छिद्य विच्छिद्य जायन्ते वृत्तयोऽखिलाः ।
सर्वा अपि विलीयन्ते सुप्तिमूर्च्छासमाधिषु ॥ २० ॥
या सर्व वृत्ति क्रमाने एका मागून एक अशा उत्पन्न होतात व सुषुप्ति, मूर्च्छा समाधि या अवस्थांमध्ये त्या सर्व लीन होतात. ॥ २० ॥



सन्धयोऽखिलवृत्तीनामभावाश्चावभासिताः ।
निर्विकारेण येनासौ कूटस्थ इति चोच्यते ॥ २१ ॥
या ज्या एका मागून एक वृत्ति निघतात त्यामधील संधी आणि त्या लीन झाल्यावर त्यांचा अभाव ज्या निर्विकार चैतन्याचे योगाने समजतात, त्याला कूटस्थ असें म्हणतात. ॥ २१ ॥

घटे द्विगुणचैतन्यं यथा बाह्ये तथान्तरे ।
वृत्तिष्वपि ततस्तत्र वैशद्यं सन्धितोऽधिकम् ॥ २२ ॥
ज्याप्रमाणें बाहेर घटाचेठायी एक घट मात्र समजविणारें चिदाभासज्ञान आणि दुसरें घटाची ज्ञातता समजविणारें ब्रह्मज्ञान अशी दोन ज्ञाने आहेत, त्याप्रमाणें शरीरांचे आतल्या बाजूसही दोन चैतन्ये आहेत; म्हणजे एक कूटस्थज्ञान आणि दुसरें चिदाभासज्ञान. त्यामुळें मधील संधीपेक्षां वृत्ती अधिक स्पष्ट भासतात ॥ २२ ॥

ज्ञातताज्ञातते न स्तो घटवद्वृत्तिषु क्वचित् ।
स्वस्य स्वेनागृहीतत्वात् ताभिश्चाज्ञाननाशनात् ॥ २३ ॥
आतां घटाचेठायीं एकदा अज्ञातता आणि एकदा ज्ञातता या जशा संभवतात तशा वृत्तीचेठायीं मात्र त्या संभवत नाहींत. कारण, त्या स्वप्रकाशक असल्यामुळें तेथें ज्ञानव्याप्तीची गरजच नाहीं. आणि येथें ज्ञानव्याप्तीची गरज नाहीं तेथें अज्ञानाचाही संभव नाही. ॥ २३ ॥

द्विगुणीकृतचैतन्ये जन्मनाशानुभूतितः ।
अकूटस्थं तदन्यत्तु कूटस्थमविकारितः ॥ २४ ॥
ही जी देहाच्या आंतील दोन चैतन्ये सांगितली तीं दोनही जरी स्वप्रकाशक असली तरी त्यांपैकीं एकास जन्मनाश आहेत असा अनुभव असल्यामुळें तें कूटस्थ नव्हे, आणि दुसरे अविकारी असें प्रत्यक्ष समजल्यामुळें तें कूटस्थ होय. ॥ २४ ॥

अन्तःकरणतद्वृत्तिसाक्षीत्यादावनेकधा ।
कूटस्थः एव सर्वत्र पूर्वाचार्यैर्विनिश्चितः ॥ २५ ॥
हें सांगणे आमचे पदरचे नव्हे. अंतःकरण तद्‌वृत्ति साक्षी चैतन्य विग्रह इत्यादि वचनांहींकरून पूर्वाचार्यांनी कूटस्थाचा निवाडा असाच केला आहे. ॥ २५ ॥

आत्माभासाश्च याश्चैवं मुखाभासाश्रया यथा ।
गम्यन्ते शास्त्रयुक्तिभ्यामित्याभासश्च वर्णितः ॥ २६ ॥
ज्याप्रमाणें मुख, आरसा व त्यांत पडलेले प्रतिबिंब या तीन वस्तु जगांत दृष्टीस पडतात, त्याप्रमाणें कूटस्थ चिदाभास आणि बुद्धि या तीन वस्तु देहांत समजाव्या. अशा रीतीनें वर्णन चिदाभासाचेही केलें आहे. ॥ २६ ॥

बुद्ध्यवच्छिन्नकूटस्थो लोकान्तरगमागमौ ।
कर्तुं शक्तो घटाकाश इवाभासेन किं वद ॥ २७ ॥
आतां असा एक पूर्व पक्ष आहे कीं, जसें घटद्वारा घटावच्छिन्न आकाशास जाणें येणे संभवते, तसा बुद्ध्यवच्छि कूटस्थालाही लोकांतरी जाणें येणे संभवते. मग आणखी चिदाभासाची निराळी कल्पना कशाला पाहिजे. ॥ २७ ॥

शृण्वसङ्गः परिच्छेदमात्राज्जीवो भवेन्न हि ।
अन्यथा घटकुड्याद्यैरवच्छिन्नस्य जीवता ॥ २८ ॥
याजवर आमचे असें उत्तर आहे कीं, केवळ षरिच्छेदानेच हा असंग कूटस्थ जीव होऊं शकत नाहीं. कारण, तसें जर होईल तर काष्ठपाषाणांहीं करून आच्छादिलेला कूटस्थ सर्वत्र असल्यामुळें सर्व जड पदार्थांत असलेत्या कूटस्थास जीव म्हणावें लागेल. ॥ २८ ॥

न कुड्यसादृशी बुद्धिः स्वच्छत्वादिति चेत्तथा ।
अस्तु नाम परिच्छेदे किं स्वाच्छ्येन भवेत्तव ॥ २९ ॥
तर आतां याजवरही अशी एक कोटी आहे कीं बुद्धि ही लकलकीत आहे पण भिंत तशी नाहीं. म्हणून भिंत आणि बुद्धि एकच म्हणणें बरोबर नाहीं. याजवर आमचे असें उत्तर कीं, स्वच्छत्वाच्या सबंधाने त्या दोहोंमध्ये जरी भेद आहे तरी परिच्छेदाच्या सबंधाने तीं दोन्हीही एकच आहेत. ॥ २९ ॥

प्रस्थेन दारुजन्येन कांस्यजन्येन वा न हि ।
विक्रेतुस्तण्डुलादिनां परिमाणं विशिष्यते ॥ ३० ॥
यास दृष्टांत धान्य मोजण्याची दोन मापे आहेत. एक लांकडाचें व दुसरें कांशाचें. या दोन्ही मापांनीं तंदुलादिक धान्ये मोजली असतां या मापामुळे धान्यांत मुळीच फरक नाहीं. ॥ ३० ॥



परिमाणविशेषेऽपि प्रतिबिम्बो विशिष्यते ।
कांस्ये यदि तदा बुद्धावप्याभासो भवेद्बलात् ॥ ३१ ॥
तर कांशाच्या मापाने मापांत जरी फेर पडला नाहीं तरी तें लकलकीत असल्यामुळें त्यांत प्रतिबिंब पडते एवड्गा भेद आहे. त्याप्रमाणें बुद्धीमध्येही ती स्वच्छ असल्यामुळ चिदाभासही तिजबरोबर असलाच पाहिजे. ॥ ३१ ॥

ईषद्‌भासनमाभासः प्रतिबिम्बस्तथाविधः ।
बिम्बलक्षणहीनः सन् बिम्बवद्‌भासते स हि ॥ ३२ ॥
प्रतिबिंब आणि आभास हे दोन्ही एकच आहेत. कारण, आभास म्हणजे नसून कांहीं वेळ भासणे, आणि प्रतिबिंब म्हणजे जें विंबलक्षणरहित असून चित्रासारखे भासते. ॥ ३२ ॥

ससङ्गत्वविकाराभ्यां बिम्बलक्षणहीनता ।
स्फूर्तिरूपत्वमेतस्य बिम्बवद्‌भासनं विदुः ॥ ३३ ॥
हें लक्षण चिदाभासास बरोबर लागू पडते. चिदाभास ससंग आणि विकारी असल्यामुळ बिंब जें ब्रह्म त्याच्या लक्षणाचा एथें अभाव झाला आणि चिदाभास स्फुरणरूप असल्यामुळे ते त्यावें बिंबाप्रमाणें भासणे होय. ॥ ३३ ॥

न हि धीभावभावित्वादाभासोऽस्ति धियः पृथक् ।
इति चेदल्पमेवोक्तं धीरप्येवं स्वदेहतः ॥ ३४ ॥
येथवर चिदाभास अवश्य आहे इतकें सिद्ध झालें. आतां कोणी म्हणेल बुद्धीच्या कल्पनेवर त्याची कल्पना जर अवलंबून आहे तर बुद्धीपासून चिदाभास निराळा घेण्याचे कारण नाहीं; तर त्यास आम्ही असें म्हणतो कीं, इतक्यावरच कां थांबावे ? त्या दृष्टीने पाहिले असतां देहापासूनही बुद्धि निराळी नाहीं असें म्हणावें लागेल. ॥ ३४ ॥

देहे मृतेऽपि बुद्धिश्चेच्छास्त्रादस्ति तथा सति ।
बुद्धेरन्यश्चिदाभासः प्रवेशश्रुतिषु श्रुतः ॥ ३५ ॥
यावर प्रतिवाद्याचें उत्तर येवढेंच कीं, देह नष्ट झाला तरी बुद्धि मागें राहते असें शास्त्रांत प्रमाण आहे. तर त्यावर आमचेही तसेंच उत्तर आहे कीं, जसे त्याविषयीं शास्त्रांत प्रमाण आहे, तसें बुद्धीपासून चिदाभास निराळा आहे अशाविषयीही प्रवेश श्रुतीत प्रमाण आहे. ॥ ३५ ॥

धीयुक्तस्य प्रवेशश्चेन्नैतरेये धियः पृथक् ।
आत्मा प्रवेशं सङ्कल्प्य प्रविष्ट इति गीयते ॥ ३६ ॥
हा जो चिदाभासाचा प्रवेश श्रुतीमध्यें सांगितला आहे तो बुद्धिसहित प्रवेश अशी कोणी शंका घेण्याचे कारण नाहीं, कारण ऐतरेय श्रुतींत बुद्धीपासून निराळा असा जो आत्मा तो प्रवेश करता झाला असें स्पष्ट सांगितलें आहे ॥ ३६ ॥

कथं न्विदं साक्षदेहं मदृते स्यादितीरणात् ।
विदार्य मूर्ध्नः सीमानं प्रविष्टः संसरत्ययम् ॥ ३७ ॥
त्या प्रवेश श्रुतीचा अर्थ असा आहे कीं, देहेंद्रियांसहवर्तमान हें जडजात मजवांचून कसें टिकेल, असा विचार मनांत आणून हा जीवात्मा कपालत्रयाचा मध्यभाग चिरून आंत प्रविष्ट होऊन संसार करतो. ॥ ३७ ॥

कथं प्रविष्टोऽसङ्गश्चेत्सृष्टिर्वास्य कथं वद ।
मायिकत्वं तयोस्तुल्यं विनाशश्च समस्तयोः ॥ ३८ ॥
आतां परमात्मा असंग असून त्यानें प्रवेश कसा केला अशी कोणाची शंका असेल, तर त्यास आम्ही .असें विचारतो कीं, त्यानें सृष्टि तरी कशी केली ? त्यानें सृष्टि मायेचे योगाने केली, तर प्रवेश तसाच केलाअसें म्हणण्यास कोणती हरकत आहे? दोन्ही गोष्टीस मायिकत्व आणि नाश ही समानच आहेत ॥ ३८ ॥

समुप्त्यायैव भूतेभ्यस्तान्येवानुविनश्यति ।
विस्पष्टमिति मैत्रेय्यै याज्ञवल्क्य उवाच हि ॥ ३९ ॥
औपाधिक रूपाला नाश आहे एतद्विषयी श्रुतीमध्ये याज्ञवल्क्यांनी मैत्रेयीस स्पष्ट सांगितलें आहे. तें असें कीं, परमात्मा या पंचभूतात्मक शरीरापासून निघून जाऊन त्याबरोबर नाश पावतो ॥ ३९ ॥

अविनाश्ययमात्मेति कूटस्थः प्रविवेचितः ।
मात्रासंसर्ग इत्येवमसङ्गत्वस्य कीर्तनात् ॥ ४० ॥
त्याप्रमाणेंच हा आत्मा अविनाशी आहे. त्याचा देहादिकाशी मुळींच संसर्ग नाहीं असें कूटस्थाचे वर्णन श्रुतीमध्ये केलें आहे ॥ ४० ॥



जीवापेतं वाव किल शरीरं म्रियते न सः ।
इत्यत्र न विमोक्षोऽर्थः किन्तु लोकान्तरे गतिः ॥ ४१ ॥
तर मग ''जीवापेतं वावकिल'' श्रुतीवरून शरीर मेले तरी जीव मरत नाहीं असें दिसते. तेव्हां आमच्या बोलण्यास विरोध येतो असें कोणी म्हणेल तर त्यास श्रुतीचा भाव समजला नाहीं असें स्पष्ट दिसते. कारण श्रुतीचा अर्थ जीवाचा अत्यंत नाश होतोच असें नाहीं; तर त्याचा अर्थ असा कीं, जीव हें शरीर सोडून लोकांतरास जातो म्हणजे शरीराबरोबरच याचा नाश होत नाही. ॥ ४१ ॥

नाहं ब्रह्मेति बुध्येत स विनाशीति चेन्न तत् ।
सामानाधिकरण्यस्य बाधायामपि सम्भवात् ॥ ४२ ॥
यावर अशी एक शंका आहे कीं, जीव जर विनाशी आहे तर अहंब्रह्म असें तादात्म्यज्ञान त्याला कसें होईल. कारण विनाशी आणि अविनाशी यांमध्ये विरोध आहे. तर याचे समाधान हेंच की-डोहोंपैकी एकाची बाधा झाली असताही सामानाधिकरण्य होऊं शकते ॥ ४२ ॥

योऽयं स्थाणुः पुमानेष पुंधिया स्थाणुधीरिव ।
ब्रह्मास्मीति धिया शेषाप्यहंबुद्धिर्निवर्तते ॥ ४३ ॥
बाधा सामानाधिकरण्याने वाक्यार्थ कसा होतो एतद्विषयीं वार्तिककारांनी दृष्टांतपृर्वक सांगितलें आहे. एक मनष्य मार्गाने जात असतां त्याच्यापुढे एक पुरुष उभा होता, तो खुंट आहे असें त्यास वाटलें. पुढें जवळ येऊन जो पाहतो तो त्याची स्थाणु-बुद्धि जाऊन पुरुषबुद्धि झाली. त्याचप्रमाणें मी ब्रह्म असें ज्ञान होतांच मी जीव हें ज्ञान नष्ट होतें. ॥ ४३ ॥

नैष्कर्म्यसिद्धावप्येवमाचार्यैः स्पष्टमीरितम् ।
सामानाधिकरण्यस्य बाधार्थत्वं ततोऽस्तु तत् ॥ ४४ ॥
नैप्कर्म्य सिद्धिनामक ग्रंथामध्ये आचार्यांनी सामानाधिकरण्यामध्यें बाधेचा संभव आहे, असें स्पष्ट सांगितलें आहे. त्यावरून ब्रह्मास्मि या वाक्यालाही तो नियम लाग करण्यास कोणचीच हरकत दिसत नाहीं. ॥ ४४ ॥

सर्वं ब्रह्मेति जगता सामानाधिकरण्यवत् ।
अहं ब्रह्मेति जीवेन सामानाधिकृतिर्भवेत् ॥ ४५ ॥
श्रुतीमध्ये "सर्वं ब्रह्म" या वाक्याने ब्रह्म आणि जग या दोहोंचे सामानाधिकरण्य म्हणजे ऐक्य होतें. तसेंच अहंब्रह्म या वाक्याने जीव आणि ब्रह्म यांचें ऐक्य होतें ॥ ४५ ॥

सामानाधिकरण्यस्य बाधार्थत्वं निराकृतम् ।
प्रयत्‍नतो विवरणे कूटस्थत्य विवक्षया ॥ ४६ ॥
विवरण नामक ग्रंथामध्ये आचार्यांनी सामानाधिकरण्यामध्ये बाधा करण्याची गरज नाहीं असें म्हटले आहे, तें केवळ अहं शब्दाचा अर्थ कूटस्थ असें समजून म्हटलें आहे ॥ ४६ ॥

शोधितस्त्वंपदार्थो यः कूटस्थो ब्रह्मरूपताम् ।
तस्य वक्तुं विवरणे तथोक्तमितरत्र च ॥ ४७ ॥
म्हणजे बुद्ध्यादिकांपासून विवेचन केलेला जो त्वंपदवाच्य कूटस्थ त्याला ब्रह्माचीं सत्यत्वादि लक्षणें लागतात म्हणून कूटस्थच ब्रह्म आहे असें विवरणांत व दुसऱ्या ग्रंथांत ठरविलें आहे. ॥ ४७ ॥

देहेन्द्रियादि युक्तस्य जीवाभास भ्रमस्य या ।
अधिष्ठानचितिः सैषा कूटस्थात्र विवक्षिता ॥ ४८ ॥
देहेंद्रियातियुक्त जो चिदाभास तो ज्या अधिष्ठान चैतन्यावर आम्हाला भ्रमाने दिसतो, त्या चैतन्याला कूटस्थ असें आम्ही नांव ठेवले. ॥ ४८ ॥

जगद्‌भ्रमस्य सर्वस्य यदधिष्ठानमीरितम् ।
त्रय्यन्तेषु तदत्र स्याद्‌ब्रह्मशब्दविवक्षितम् ॥ ४९ ॥
आणि ज्या अधिष्ठानावर भ्रमानें सर्व जग दिसत आहे त्या अधिष्ठानास वेदांतांत ब्रह्म असें नांव ठेवले आहे. ॥ ४९ ॥

एतस्मिन्नेव चैतन्ये जगदारोप्यते यदा ।
तदा तदेकदेशस्य जीवाभासस्य का कथा ॥ ५० ॥
ह्या ब्रह्मचैतन्यावर सर्व जगाचा आरोप जर आहे तर त्या जगाचा एक अंश जो जीवाभास त्याचाही आरोप असलाच पाहिजे. ॥ ५० ॥



जगत्तदेकदेशाख्यसमारोप्यस्य भेदतः ।
तत्त्वंपदार्थौ भिन्नौ स्तो वस्तुतस्त्वेकता चितेः ॥ ५१ ॥
जग आणि जीव या दोन उपाधींमध्ये भेद असला तरी त्यांचें अधिष्ठान जें ब्रह्मचैतन्य तें एकच आहे. ॥ ५१ ॥

कर्तृत्वादीन्बुद्धिधर्मान् स्फूर्त्याख्यां चात्मरूपताम् ।
दधद्विभाति पुरत आभासोऽतो भ्रमो भवेत् ॥ ५२ ॥
भ्रमामध्ये कांहीं अधिष्ठानाचे व कांहीं आरोप्याचे असे दोहोंचेही धर्म भासले पाहिजेत. हें भ्रमाचे लक्षण चिदाभासाबरोबर लागू पडते तें कसें ? तर कर्तृत्वादि बुद्धिधर्म आणि स्फुरणरूप आत्म्याचा धर्म हे दोन्ही त्याचेमध्यें आहेत. म्हणून चिदाभास हा भ्रम आहे. ॥ ५२ ॥

का बुद्धिः कोऽयमाभासः को वात्रात्मा जगत्कथम् ।
इत्यनिर्णयतो मोहः सोऽयं संसार इष्यते ॥ ५३ ॥
या भ्रमाला कारण हेंच कीं, बुद्धि म्हणजे काय ? चिदाभास कशाला म्हणावें ? आत्म्याचे स्वरूप कोणतें ? आणि त्यामध्ये जग कसें झालें ? या प्रश्नांचा उलगडा न होणें तोच मोह; आणि यालाच संसार असें म्हणतात. ॥ ५३ ॥

बुद्ध्यादीनां स्वरूपं यो विविनक्ति स तत्त्ववित् ।
स एव मुक्त इत्येवं वेदान्तेषु विनिश्चयः ॥ ५४ ॥
वर सांगितले जें बुद्ध्यादिकांचे स्वरूप त्याचें विवेचन ज्याने उत्तम केले तोच तत्त्ववेत्ता आणि तोच मुक्त असा वेदांताचा ठराव आहे. ॥ ५४ ॥

एवं च सति बन्धः स्यात्कस्येत्यादिकुतर्कजाः ।
विडम्बना दृढं खण्ड्याः खण्डनोक्तिप्रकारतः ॥ ५५ ॥
असें असून बंधमोक्ष कोणाला ? इत्यादिक तार्किक लोक पुष्कळ तर्क करतात. ते इतके आम्हाला पोरकट वाटतात कीं, त्याची उत्तरे देत बसणे हें केवळ व्यर्थ वेळ घालविणे आहे. त्यांचें तोड हर्षमिश्राचार्यांनी आपल्या खंडनग्रंथांत चांगले बंद करून टाकले आहे. ॥ ५५ ॥

वृत्तेः साक्षितया वृत्तिप्रागभावस्य च स्थितः ।
बुभुत्सायां तथाज्ञोऽऽस्मीत्याभासाज्ञानवस्तुनः ॥ ५६ ॥
हें कूटस्थ विवेचन शैव पुराणांत केलेले दृष्टीस पडतें. तेथें असें म्हटले आहे कीं, हा कूटस्थ सर्वकाळी सारखा आहे. मनाच्या वृत्ती असतांना तो त्या वृत्तींचा साक्षी होऊन असतो. वृत्ती उत्पन्न होण्यापूर्वी त्यांच्या प्रागभावाचा साक्षी होऊन असतो. मुमुक्षु-दशेंत जिज्ञासेचा साक्षी होऊन असतो. आणि अज्ञान-दशेंत मी नेणता आहें या अज्ञानाचा साक्षी होऊन राहतो. ॥ ५६ ॥

असत्यालम्बनत्वेन सत्यः सर्वजडस्य तु ।
साधकत्वेन चिद्‌रूपः सदा प्रेमास्पदत्वतः ॥ ५७ ॥
आनन्दरूपः सर्वार्थसाधकत्वेन हेतुना ।
सर्व सम्बन्धवत्त्वेन सम्पूर्णः शिवसंज्ञितः ॥ ५८ ॥
तो साक्षी सचिदानंदरूप आहे. त्याची सिद्धता अशी - जे असत्यांचे अधिष्ठान असतें तें सत्य. हा साक्षी असत्य जगाचे अधिष्ठान आहे म्हणून तो सद्‌रूप आहे. जो जडास भासविणारा तो चिद्‌रूप साक्षी. जडास भासवितो म्हणून तो चिद्‌रपू आहे. ज्यावर सदा सर्वदां प्रेम जडलेले असतें तो आनंदरूप. साक्षीवर नेहमी आमचे प्रेम आहे म्हणून तो आनंदरूप. आणि ज्याच्या योगाने सर्व पदार्थांची सिद्धि होऊन ज्याचा सर्व पदार्थांशी संबंध असतो तो पूर्ण. आमचा साक्षीही तसाच आहे म्हणून तोही पूर्ण आहे. ( याप्रमाणे आत्मा हा सच्चिदानंद परिपूर्ण शिवरूपी आहे हें सिद्ध झालें.) ॥ ५७-५८ ॥

इति शैवपुराणेषु कूटस्थः प्रविवेचितः ।
जीवेशत्वादिरहितः केवलः स्वप्रभः शिवः ॥ ५९ ॥
याप्रमाणे शैव पुराणामध्ये जीवेश कल्पनारहित स्वयंप्रकाश शिवस्वरूपी कूटस्थाचे विवेचन केलें आहे. ॥ ५९ ॥

मायाभासेन जीवेशौ करोतीति श्रुतत्वतः ।
मायिकावेव जीवेशौ स्वच्छौ तौ काचकुम्भवत् ॥ ६० ॥
माया ही प्रतिबिंबाच्या योगानें जीव आणि ईश या दोघांना करते, असें श्रुतींत सांगितलें. आहे. त्यावरून ते दोघेही मायिक ठरतात. त्यामध्ये आणि देहादिकांमध्यें अंतर म्हणून इतकेंच कीं, ते स्वच्छ आहेत आणि देहादिक मळीण आहेत. कीं जसे कांचेचा घट आणि मातीचा घट.॥ ६०॥



अन्नजन्यं मनोदेहात्स्वच्छं यद्वत्तथैव तौ ।
मायिकावपि सर्वस्मादन्यस्मात्स्वच्छतां गतौ ॥ ६१ ॥
ज्याप्रमाणें मन आणि देह ही दोन्ही अन्नापासून झालेलीं असून मन स्वच्छ आहे आणि देह मलीन आहे, त्याप्रमाणें जीव आणि ईश हें मायिक असूनही इतर पदार्थापेक्षा ते स्वच्छ आहेत. ॥ ६१ ॥

चिद्‌रूपत्वं च सम्भाव्यं चित्त्वेनैव प्रकाशनात् ।
सर्वकल्पनशक्ताया मायाया दुष्करं न हि ॥ ६२ ॥
त्यांत चैतन्यही आमच्या अनुभवास येतें म्हणून तें चिद्‌रूप आहे, हें कसें म्हणून कोणी विचारू नये. कारण, पाहिजे ती कल्पना करण्यास समर्थ अशी जी माया तिला कोणती गोष्ट अशक्य आहे. ॥ ६२ ॥

अस्मन्निद्राऽपि जीवेशौ चेतनौ स्वप्नगौ सृजेत् ।
महामाया सृजत्येतावित्याश्चर्यं किमत्र ते ॥ ६३ ॥
किंबहुना आमची निद्रा देखील स्वप्नाचेठायी चेतनरूप जीवेश उत्पन्न करील मग ती महामाया त्यांस करते यांत आश्चर्य तें काय ? ॥ ६३ ॥

सर्वज्ञत्वादिकं चेशे कल्पयित्वा प्रदर्शयेत् ।
धर्मिणं कल्पयेद्याऽस्याः को भारो धर्मकल्पने ॥ ६४ ॥
त्या ईशाचेठायी सर्वज्ञत्वादि धर्मांची कल्पनाही ती मायाच करते. कारण जिने धर्मीची कल्पना केली तिला धर्माचे कल्पनेचे श्रम कितीसे होणार ? ॥ ६४ ॥

कूटस्थेऽप्यतिशङ्‌का स्यादिति चेन्माऽतिशंक्यताम् ।
कूटास्थमायिकत्वे तु प्रमाणं न हि वर्तते ॥ ६५ ॥
एथे कूटस्थ हा कल्पित आहे अशी फाजील शंका कोणी घेऊं नये. कारण, त्याविषयी श्रुतीमध्ये प्रमाण कोठेही आढळत नाहीं. ॥ ६५ ॥

वस्तुत्वं घोषयन्त्यस्य वेदान्ताः सकला अपि ।
सपत्‍नरूपं वस्त्वन्यन्न सहन्तेऽत्र किंचन ॥ ६६ ॥
कूकथ हीच खरी वस्तू असा वेदांतांत जिकडे तिकडे डांगोरा वाजत आहे. त्यावांचन दुसऱ्या कोणत्याही पदार्थास सत्यता देणे म्हटलें म्हणजे वेदांतास अगदीं खपत नाहीं. ॥ ६६ ॥

श्रुत्यर्थं विशदीकुर्मो न तर्कान्वच्मि किंचन ।
तेन तार्किकशंकानामत्र कोऽवसरो वद ॥ ६७ ॥
आम्हीं एथें केवळ श्रुत्यर्थ स्पष्ट करून दाखविण्याचे काम पत्करले आहे. आमच्या पदरच्या तर्काने आम्ही कांहींच बोलत नाहीं म्हणून तार्किकांच्या शंकेस जागाच राहिली नाही. ॥ ६७ ॥

तस्मात्कुतर्कं सन्त्यज्य मुमुक्षुः श्रुतिमाश्रयेत् ।
श्रुतौ तु मायाजीवेशौ करोतीति प्रदर्शितम् ॥ ६८ ॥
याकरितां कुतर्क टाकून देऊन मुमुक्षूनें श्रुतीचाच आश्रय करावा. आतां श्रुती तर असें सांगते कीं, माया ही जीव आणि ईश यांना करते. ॥ ६८ ॥

ईक्षणादिप्रवेशान्ता सृष्टिरीशकृता भवेत् ।
जाग्रदादिविमोक्षान्तः संसारो जीवकर्तृकः ॥ ६९ ॥
आरंभी ईक्षण आणि शेवटीं प्रवेश आहे जिच्या अशी सृष्टि ईश्वराने केली, आणि आरंभी जाग्रदवस्था आणि अंती मोक्ष असा संसार जीवाने केला आहे. ॥ ६९ ॥

असङ्ग एव कूटस्थः सर्वदा नास्य कश्चन ।
भवत्यतिशयस्तेन मनस्येवं विचार्यताम् ॥ ७० ॥
आणि कूटस्थ अगदीं असंग आहे. त्यांत कमीजास्तपणा कधींही होत नाहीं. तर मनुष्यानें याचा विचार चांगला मनामध्ये करावा. ॥ ७० ॥



न निरोधो न चोत्पत्तिर्न बद्धो न च साधकः ।
न मुमुक्षुर्न वै मुक्त इत्येषा परमार्थता ॥ ७१ ॥
कूटस्थास जन्ममरणादि भाव नाहींत याविषयी श्रुतिप्रमाण असें आहे कीं, त्यास निरोध नाहीं; उत्पत्ति नाहीं; तो बद्धही नाहीं; साधकही नाहीं; तो मुमुक्षुही नव्हे; मुक्तही नव्हे; असें जें समजणे तोच परमार्थ. ॥ ७१ ॥

अवाङ्‌मनसगम्यं तं श्रुतिर्बोधयितुं सदा ।
जीवमीशं जगद्वापि समाश्रित्य प्रबोधयेत् ॥ ७२ ॥
जीव ईश आणि जग यांचें जें श्रुतीने प्रतिपादन केलें आहे, तें केवळ आत्म्याचा बोध व्हावा म्हणून. कारण, तो वाणी व मनास अगम्य असल्यामुळें जीवादिकांस घेऊन त्याचें वर्णन केल्याशिवाय त्याचा यथार्थ बोध व्हावयाचा नाहीच. ॥ ७२ ॥

यया यया भवेत्पुंसां व्युत्पत्तिः प्रत्यगात्मनि ।
सा सैव प्रक्रियेह स्यात् साध्वीत्याचार्यभाषितम् ॥ ७३ ॥
आतां श्रुतीमध्यें जें निरनिराळे सांगणे आढळतें, तें केवळ निरनिराळ्या विद्यार्थ्यांस त्याच्या त्याच्या समजुतीप्रमाणे निरनिराळी प्रक्रिया सांगितली आहे. ती आपापल्या ठिकाणी चांगलीच आहे असें आचार्यांनी म्हटले आहे. ॥ ७३ ॥

श्रुतितात्पर्यमखिलमबुद्धा भ्राम्यते जडः ।
विवेकी त्वखिलं बुद्ध्वा तिष्ठत्यानन्दवारिधौ ॥ ७४ ॥
सर्व श्रुतीचे तात्पर्य न समजल्यामळें मूढास भ्राण्ति होते; परंतु विचारी मनुष्याची गोष्ट तशी नाहीं. तो तें तात्पर्य चांगले जाणून आनंदाच्या डोहांत बुडी देऊन बसतो. ॥ ७४ ॥

मायामेघो जगन्नीरं वर्षत्वेष यथा तथा ।
चिदाकाशस्य नो हानिर्न वा लाभ इति स्थितिः ॥ ७५ ॥
त्या विचारी मनुष्याचा निश्चय असा बाणून गेलेला असतो कीं, हा मायारूप मेघ जगद्‌रूप पाण्याचा पाहिजे तितका वर्षाव करो. त्यापासून या ब्रह्माकाशाला लाभ किंवा हानि मुळीच नाहीं. ॥ ७५ ॥

इमं कूटस्थदीपं योऽनुसन्धत्ते निरन्तरम् ।
स्वयं कूटस्थरूपेण दीप्यतेऽसौ निरन्तरम् ॥ ७६ ॥
इति कूटस्थदीपोनाम अष्टमः परिच्छेदः ॥ ८ ॥
आतां याची फलश्रुती सागन हे प्रकरण आटपतों. जो मनुष्य या कूटस्थ दीपाचे निरंतर अनुसंधान करतो तो स्वतः कूटस्थच बनून जाऊन निरंतर प्रकाशतो. ॥ ७६ ॥
कूटस्थदीप समाप्त.