॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीहरिविजय ॥

॥ अध्याय सत्ताविसावा ॥

प्रद्युम्न-शंबरासुर कथा -


श्रीगणेशाय नमः ॥
श्रीकृष्णा रूक्मिणीनयनचकोरचंद्रा । आनंदसदना करूणासमुद्रा ।
हरि जांबुवंती प्राणवरा । दितिजसंहारा श्रीरंगा ॥१॥
सत्यभामामनरंजना । कलिंदीप्रिया दुर्जनभंजना ।
मित्रविंदाप्राणजीवना । केटभभंजना दयाब्धे ॥२॥
याज्ञजितीहृदयपद्मभ्रमरा । मद्रावतीलोचनानंदकरा ।
लक्ष्मणापति जगदुद्धारा । श्रीकरधरा मुरारे ॥३॥
अभिनवजलधरनीलवर्णा । कमलपत्राक्षा पीतवसना ।
मंगलदायका सुहास्यवदना । भोगींद्रशयना जगद्‌गुरू ॥४॥
हरि आनकदुंदुभिकुमारा । यदुकुलसरोजदिनकरा ।
जगद्वंद्या प्रतापशूरा । क्षराक्षरातीत तू ॥५॥
सगुणलीलाविग्रही पूर्ण । षड्‍गुणैश्वर्यसंपन्न ।
षोडश सहस्र गोपी आणून । एक्याचि लग्ने वरियेल्या ॥६॥
एकदा रूक्मिणीच्या मंदिरी । मिळाल्या सोळा सहस्र नारी ।
सत्यभामा मित्रकुमारी । इतरही वेगे पातल्या ॥७॥
आदिभवानी मूळप्रकृती । तिजसमीप जैशा अनंत शक्ती ।
तैशा भीमकीवेष्ठित युवती । षोडश सहस्र मिळाल्या ॥८॥
विलाससभेसी सकळिका । मिळाल्या चातुर्यचंपककलिका ।
त्यांमाजी भीमककन्यका । श्रेष्ठासनी बैसली ॥९॥
ते विलाससभेची अपूर्व स्थिती । विरिंचीने निर्मिली स्वहस्ती ।
तेथील प्रभा पाहतां गभस्ती । आणि उडुपति तटस्थ होती ॥१०॥
असो तेथे जगत्त्रयजननी । भीमकी शोभे लावण्यखाणी ।
तंव सत्यभामा हांसोनी । गोष्टी बोले ऐका ते ॥११॥
आमुचे सदनी शारंगपाणी । नित्य क्रमीत येऊनि रजनी ।
मजवरी प्रीति मनींहूनी । तैसी नाही इतरांकडे ॥१२॥
माझे घरी पारिजातक । आणूनि लावी वैकुंठनायक ।
एकांतगोष्टी सकळिक । मजचि सांगे जगदात्मा ॥१३॥
एक म्हणे लटिके तुझे बोल । मजवर प्रीति करी घननीळ ।
स्वमुखींचे तांबूल । मजलागी रात्री दिधले ॥१४॥
उदय पावे जो वासरमणी । गोष्टी सांगे शारंगपाणी ।
काल हे अलंकार घडोनि । स्वहस्ते मज लेवविले ॥१५॥
तंव एक खंजरीटनयनी । म्हणे असत्य बोलता मुळींहूनी ।
माझे मंदिरी कैवल्यदानी । आजि होते निर्धारी ॥१६॥
हरीचे मांडीवरी शिर ठेवूनी । मी निजले होते कौतुकेकरोनी ।
हे शीसफूल नवे घडोनि । कृष्णेंचि रात्री आणिले ॥१७॥
गोष्टी सांगितल्या आजि गहन । जो उदय पावे चंडकिरण ।
तुम्ही लटक्याचि वार्ता सांगोन । संपादणी करिता गे ॥१८॥
एक बोले गजगमना । मजविण न गमे कंसमर्दना ।
धणी न पुरे माझिया नयनां । हरिवदन विलोकिता ॥१९॥
कृष्णे मज सांगाते घेउन । आजि रात्री केले भोजन ।
हे पदक जडित नूतन । गळा घातले माझिया ॥२०॥
एक बोले नितंबिनी । रत्‍नजडित डोल्हारीं बैसोनी ।
सारीपाट अवघे रजनी । दोघेजणे खेळलो हो ॥२१॥
माझी वेणी आपुल्या हातें । गुंफिली रात्रीं कृष्णनाथें ।
अंजन सोगयाचे स्वहस्ते । कंसांतके रेखिले ॥२२॥
माझे कपाळी कस्तूरी रेखिली । हे रत्‍नमाळा गळा घातली ।
मजवरी प्रीति हरीची जडली । ऐसी नाही कोठेंही ॥२३॥
तो एक पद्मनेत्री बोले वचनी । वाउगें काय व्यर्थ बोलोन ।
म्यां रात्री स्वकरेकरून । हरीसी चंदन लाविला ॥२४॥
कस्तुरी टिळक कपाळी । म्यां आजि रेखिला हरीचे भाळी ।
सत्य की असत्य नेत्रकमळी । जाऊनिया पहा गे ॥२५॥
तों एक हंसगमना बोले । माझे मंदिरी हरि निजले ।
अवघी रात्र चरण चुरिले । आपुल्या हातेंकरूनियां ॥२६॥
एक बोले काय वचन । आजि माझ्या सदनीं गायन ।
करूनि मोहिलें माझें मन । ते सुख पूर्ण न वर्णवे ॥२७॥
एक म्हणे पयोधरेकरोनी । हरिचरण अवघे रजनी ।
म्यां निवविले साजणी । चक्रपाणी साक्ष असे ॥२८॥
ऐशा षोडश सहस्र युवती । बोलता कदाही न राहती ।
एकीसी एक उडविती । नि मिळती विचारा ॥२९॥
जैसी नाना शास्त्रे अनेक । घेऊनि उठती बहुत तर्क ।
एक कर्म स्थापिती मीमांसका । औपासन एक स्थापिती ॥३०॥
एक स्थापीतसे योग । दुजे म्हणे करावा याग ।
एक म्हणे स्वर्गभोग । लाभें ऐसें आचरावें ॥३१॥
एक न्याय स्थापिती कैसा । एक स्थापिती मीमांसा ।
पातंजलापरतें सहसा । साधन नाही एक म्हणे ॥३२॥
एक म्हणती इंद्र थोर । एक स्थापिती महेश्वर ।
एक म्हणती इंदिरावर । त्यापरता थोर नाहींच ॥३३॥
एक स्थापिती थोर गभस्ती । एक म्हणे भजावें शक्ती ।
एक म्हणती थोर गणपती । जीवेंभावें अर्चिजे ॥३४॥
ऐसी शास्त्रें खटपटती । एकाचें एक न मानिती ।
षोडश सहस्र युवती । तैशा जल्पती परस्परें ॥३५॥
जैसीं वनचरें अपारें । तैसीं बोलती इतर शास्त्रें ।
वेदांतसिंह गर्जतां गजरें । गर्भगळित सर्व होती ॥३६॥
जैसा देवांत वंद्य वैकुंठनाथ । तैसा सर्वांसी मान्य वेदांत ।
शस्त्रांत सुदर्शन लखलखित । नवग्रहांत मित्र जैसा ॥३७॥
की रत्‍नांमाजी कौस्तुभमणी । की नद्यांमाजी मंदाकिनी ।
की काद्रवेयकुळांत मुकुटमणी । भोगिनायक श्रेष्ठ तो ॥३८॥
तैसे शास्त्रांमाजी विख्यात । संत जाणती वेदांत ।
तेथींचे बोलणे मान्य बहुत । जन्ममरणमोचक जे ॥३९॥
असो नानामतांची बोलणीं । तैशा जल्पती इतर कामिनी ।
वेदांतशास्त्र जैसी रूक्मिणी । श्रेष्ठपणें बोलत ॥४०॥
ते आदिमाया मूळप्रकृती । की ते अनंतवल्ली स्वयंज्योती ।
जे इच्छामात्रें निश्चितीं । घडी मोडी ब्रह्मांड हे ॥४१॥
हे पुराणपुरूषाची ज्ञानकळा । काय बोलिली ते वेळां ।
म्हणे ऐका गे तुम्ही सकळा । व्यर्थ गलबला करूं नका ॥४२॥
तुमच्या सोळा सहस्र मंदिरी । व्यापक एकचि कंसारी ।
जैसे नाना घट-मठांतरी । एकचि अंबर व्यापक ॥४३॥
तैसा तुमच्या गे निजसदनीं । एकचि व्यापला चक्रपाणी ।
अनंत ब्रह्मांडें भरोनी । उरला असे परिपूर्ण ॥४४॥
सर्वव्यापक पूतनारी । समान नांदे सर्वां मंदिरी ।
हा निर्धार नेणोनि भेदकुसरी । का गे व्यर्थचि भांडता ॥४५॥
ऐसी निर्वाणगोष्ट रुक्मिणी । सांगता तन्मय जाहल्या कामिनी ।
पुढे बोलावया भेदवाणी । सहज खुंटली तेधवा ॥४६॥
ऐकता सद्‌गुरूचे वचन । साधक शिष्य निवती पूर्ण ।
तैसे रूक्मिणीच्या बोलें समाधान । सर्वांचेही जाहलें ॥४७॥
असो सत्यभामा बोले ते क्षणी । म्हणे ऐक वो भीमकनंदिनी ।
आधीं पुत्र झाला तुजलागोनी । तरी मी वेणी देईन तुज ॥४८॥
मज जरी पुत्र जाहला आधीं । तरी मज तू वेणी देई त्रिशुद्धी ।
ऐसे सत्यभामा बोलतां शब्दी । जगन्माता हांसली ॥४९॥
मग विडे वस्त्रें दिधली सकळा । आपुल्या निकेतना गेल्या अबला ।
तो नारदमुनि ते वेळां । सहज आला द्वारके ॥५०॥
मनी म्हणे नारदमुनी । बहुत आहेत कृष्णकामिनी ।
परी यांमाजी ज्ञानखाणी । निवडू आतां कोण ते ॥५१॥
एक्या गोपीच्या मंदिरी । नारद प्रवेशला ते अवसरीं ।
तिने पूजा करोनि निर्धारीं । मुनीश्वर तोषविला ॥५२॥
नारद पुसे तिजलागून । परपुरुषी जडलें तुझे मन ।
तव ते बोले क्रोधायमान । ब्रह्मपुत्रासी तेधवां ॥५३॥
म्हणे बरें हें तुमचें जी ध्यान । आम्हांसी कृष्णावेगळे नाहीं ज्ञान ।
म्हणता परपुरुषीं मन । नवल हेंचि वाटतें ॥५४॥
मग हांसिन्नला नारदमुनी । प्रवेशला दुसरे सदनीं ।
तीस पुसे परपुरुषीं कामिनी । तुझें मन आहे कीं ॥५५॥
ते म्हणे तुम्ही चळलेती । नसतेंचि पुसता आम्हांप्रती ।
सत्यभामेसमवेत युवती । याचि प्रकारें शोधिल्या ॥५६॥
जे ते लागे नारदाचे पाठीं । परी अर्थीं कोणि न घाली दृष्टी ।
जैसे संत बोलती निर्वाणगोष्टी । पाखंडी घेती कुतर्क ॥५७॥
ऐसा मुनि हिंडतां झाला हिंपुटी । रूक्मिणीच्या गृहा आला शेवटीं ।
तिने नारद देखतां दृष्टी । उठाउठी समोर येत ॥५८॥
करूनि नारदासी नमन । केलें षोडशोपचारें पूजन ।
नारदमुनि बोले वचन । परपुरुषी मन आहे कीं ॥५९॥
ऐसे नारदमुनि बोलतां । विचारूनि बोले जगन्माता ।
म्हणे परपुरुषाविण तत्त्वता । मज क्षणभरी न राहवे ॥६०॥
आसनीं भोजनीं शयनीं । परपुरुषासी न विसंबे नारदमुनी ।
परपुरूषासी न धरितां मनीं । मग जिणे व्यर्थ गेलें ॥६१॥
जो चहूं वाचांहूनि पर । जो वेदशास्त्रांसी अगोचर ।
तो हाचि स्वामी यादवेंद्र । परात्परसोयरा हो ॥६२॥
ऐकोनि नारद सुखावला । प्रेमे वंदिली रूक्मिणी बाळा ।
म्हणे तू हरीची ज्ञानकळा । तुझी लीला अगम्य ॥६३॥
तुझिया वो अपांगपातें । सकळ संत होती ज्ञाते ।
ऐसे स्तवोनि रूक्मिणीतें । नारद गेला स्वर्गासी ॥६४॥
तव सभा विसर्जूनि समस्त । रूक्मिणीच्या मंदिरा कृष्णनाथ ।
येता जाहला त्रिभुवनसमर्थ । विलाससभेसी एकांती ॥६५॥
मंदिरा आला वैकुंठनाथ । त्रिभुवनजननी ऐकतां त्वरित ।
उठोनि सामोरी प्रेमे येत । अंचळ रूळत चपळेऐसा ॥६६॥
पदसरोजीं मस्तक ठेवूनी । निंबलोण उतरी हरीवरूनी ।
विलाससभेसी नेऊनी । डोल्हारां बैसवी कृष्णाते ॥६७॥
जे अनंतशक्तींची स्वामिणी । जे त्रिभुवनपतीची पट्टराणी ।
जे प्रणवाची मूळपीठवासिनी । ज्ञानखाणी रूक्मिणी ते ॥६८॥
शतचारी परिचारिका सत्वर । पूजासामग्री देती परिकर ।
आपुल्या हातें यादवेंद्र । पूजी तेव्हां भीमकी ॥६९॥
आनकदुंदुभीचा महापुण्यमेरु । तोचि हा श्रीकृष्ण जगद्‌गुरू ।
जो मायाचक्रचाळक उदारु । कैवल्यज्ञानदायक ॥७०॥
शुभ्र लघुचीर हाती घेऊनी । हरीवरूनि वारीत रूक्मिणी ।
जिचिया पदनखांवरूनी । कोटि मकरध्वज ओंवाळिजे ॥७१॥
इच्छामात्रेंकरूनी । अनंत ब्रह्मांडे रची ते क्षणीं ।
ब्रह्मादिक बाळें निर्मूनी । निजोदरी पाळी जे ॥७२॥
जे त्रिभुवनलावण्यमांदुस । तप्तसुवर्णवर्णी डोळस ।
जिने वेधिले आदिपुरुषास । निजगुणें आपुलिया ॥७३॥
सहज बोलता जगन्माता । दंतप्रकाश पडे अवचिता ।
पाषाण ते हिरे तत्त्वतां । होती सतेज तत्काळ ॥७४॥
ब्रह्मांड भेदूनि विशेष । धावणें करी आंगींचा सुवास ।
आकार ग्रासूनि समरस । स्वस्वरूपीं होइजे ॥७५॥
सहज चालता हंसगती । पदतळमुद्रा जेथें उमटती ।
तेथे सुवासकमळें विकसती । धन्य क्षिती जाहलें म्हणे ॥७६॥
तया कमळावरी वसंत । भ्रमर होऊनि रुंजी घालीत ।
चालतां पदभूषणें गाजत । देखोनि मन्मथ नृत्य करी ॥७७॥
दिनपति आणि रोहिणीपती । काढिल्या तयांच्या अंतर्ज्योती ।
तैसी कर्णपुष्पें तळपती । डोल देती मुक्तघोंस ॥७८॥
आकर्ण विशाळ पद्मनयन । अंजन सोगयाचें विराजमान ।
तडित्प्राय झळके पीतवसन । शोभे मुक्तलग कंचुकी ॥७९॥
वज्रचूडेमंडित हस्त । अवतारमुद्रा दाही झळकत ।
पाचूचें पदक कंठी तळपत । मुक्ताहार पीतवर्ण दिसती ॥८०॥
असो ऐसी ते ज्ञानकळा सुंदर । हातीं घेऊनि लघुचीर ।
क्षीराब्धीची लहरी परिकर । उडवितां वस्त्र तैसें दिसे ॥८१॥
हस्त हालतां किंचित । पयोधर होती कंपित ।
हरिस्वरूप देखतां लज्जित । कृष्णमुख ते जाहले ॥८२॥
हरिकरप्रताप देखोनि निवाड । लपाले दिव्यकंचुकीआड ।
सुकुमार दोघे परम भ्याड । पल्लवें झांकी जगन्माता ॥८३॥
असो लघुचीर उडवितां रुक्मिणी । बोले हरीसी सुहास्यवदनी ।
तुम्हा योग्य मी नव्हे चक्रपाणी । चातुर्य कांही समजेना ॥८४॥
तुमची सेवा करूं नेणें सर्वथा । गुण नव्हती बरवे पाहतां ।
रूप तुमचें जगन्नाथा । सर्वांहूनि विशेष ॥८५॥
मी अत्यंत रूपहीन । तुमचेंही मजवरी नाहीं मन ।
आता गोपी अत्यंत तरूण । तयांसी भोग देइजे ॥८६॥
वरकड गोपी जैशा आवडती । तैसी इकडे नाहीं प्रीती ।
पट्टराणी नाम निश्चितीं । कोरडेंचि ठेविले ॥८७॥
जुने वस्त्र होतां निश्चित । दूरी करिती भाग्यवंत ।
यावरी भीमकजामात । मंदहास्यमुखें बोलतसे ॥८८॥
ऐसे काय बोलसी रूक्मिणी । कोण सुंदर आहे तुजहूनी ।
तू सकळ-चातुर्यखाणी । ऐशी शाहाणी कोण असे ॥८९॥
ज्याचें भाग्य परिपूर्ण । त्याकडे होय तुझे विलोकन ।
तुझें जेथें न होय आगमन । दरिद्रेकरूनि व्यापती ॥९०॥
तुवां नेणोनियां अबले । मज कासया वरिलें ।
तुझे रूप सर्वांहूनि आगळें । राजे भुलले पृथ्वीचे ॥९१॥
शिशुपाळ वक्रदंत भूपाळ । जरासंधादि बहुत नृपाळ ।
तुझ्या मनासी आवडेल त्यासी माळ । आतां तरी घाली का ॥९२॥
बाळपणींची सकळ कीर्ती । तुवा ऐकिली असेल निश्चितीं ।
गोपी उखळासी बांधिती । चोरी केली म्हणोनियां ॥९३॥
आम्ही रानचे रानवट गोवळ । परनारी भोगिल्या केवळ ।
सर्वे मेळवूनि गोपाळ । हुंबळी घातली तयांशी ॥९४॥
सकळ राजे आम्हांसी हांसती । छत्र सिंहासन नाहीं मजप्रती ।
याति कुळ धर्मकर्म-स्थिती । आंगीं नसे अणुमात्र ॥९५॥
पुरुषार्थी जरी म्हणती वीर । तरी काळयवनें पीडिलें थोर ।
दैवें लागले मुचुकंदविवर । म्हणोनियां बरें जाहले ॥९६॥
धुतली अर्जुनाची घोडीं । धर्माघरीं उच्छिष्टें काढीं ।
पार्थाचा सारथी हे प्रौढी । बरी न दिसे लोकांत ॥९७॥
बैसावया नाही वाहन । पक्ष्यावरी आरोहण ।
न मिळे कांही आंथरूण । सर्पावरी शयन करीं ॥९८॥
ऐकतां सद्‌भक्तांचे कीर्तन । नाचतों लाज सोडूनी ।
मी काळा तूं गोरीं सगुण । स्वरूपगांठी पडेना ॥९९॥
मज काम नाहीं निःशेष । असें एकाकी निःसंग उदास ।
सर्वां घटीं जैसा चंडांश । व्यापोनियां अलिप्त ॥१००॥
ऐसीं उदास वाक्ये ऐकोनी । मनीं गजबजली त्रिभुवनजननी ।
अश्रूधारा लोटल्या नयनीं । वाटे कल्पांत लोटला ॥१॥
रूक्मिणीसी कैसा समय वाटला । की अंगावरी पर्वत कोसळला ।
की वर्षल्या प्रळयचपळा । शब्दरूपें रूक्मिणीवरी ॥२॥
लघुचीर उडवितां अकस्मात । तैसीच पडली मूर्च्छागत ।
प्राण व्याकुळ जाहले समस्त । श्वासोच्छ्‍वास कोंडले ॥३॥
कोटिकंदर्पलावण्यसुंदर । जगदानंदकंद यदुवीर ।
डोल्हारियाखालीं उडी सत्वर । टाकोनियां पातला ॥४॥
मग श्रीहरि म्हणे ते वेळीं । कैंची आम्हांसी आठवली रळी ।
म्हणोनि रूक्मिणी हृदयी धरिली । आलिंगिली प्रीतीनें ॥५॥
मी सहज विनोदेंकरूनी । बोलिलों जाण रूक्मिणी ।
तुवां निकरचे लावण्यखाणी । केला बहुत आम्हांवरी ॥६॥
रूक्मिणीतुजविण एक क्षण । न गमे मज सर्वथा जाण ।
तूं आवडती जैसा प्राण । सत्य वचन सुकुमारे ॥७॥
दितिशूतांच्या भारेंकरूनी । पीडिली सर्व मंगळजननी ।
परममंगळकारके रूक्मिणी । अवतरलो म्हणोनि तुम्ही आम्ही ॥८॥
शृंगारसरोवरमराळिके । चराचरउदयचंपककळिके ।
परमकल्याणी भीमक-कन्यके । सुखदायके नत्र उघडीं ॥९॥
मग रुक्मिणीसी कडियेवरी । उचलूनि घेत मधुकैटभारी ।
निजविली डोल्हारियावरी । पूतनारि हालवीत ॥११०॥
विंजणा घेऊनि भगवंत । मंद समीर वरी घालीत ।
म्हणे शुभानने एक मात । मजशीं बोल ये क्षणी ॥११॥
कर्णीं कर्पूर तेव्हां श्रीधरें । शीतळ फुंकिला आपुल्या करे ।
मुखशशांककलंक यादवेंद्रें । पीतांबरे पूसिला ॥१२॥
मग नेत्र उघडोनि रूक्मिणी । दृढ लागली हरीच्या चरणी ।
म्हणे त्रिभुवननायका चक्रपाणी । तुझा महिमा न वर्णवे ॥१३॥
अनंतजन्मींचे सकृत । एकदांचि फळलें अद्‌भुत ।
तरीच अर्धांग पावलें सत्य । जगन्निवासा तूमचें ॥१४॥
मग बोले जगज्जीवन । वसुदेव देवकी दोघेंजण ।
त्यांची वाहतों यथार्थ आण । मज तू पूर्ण आवडसी ॥१५॥
माझे ठायीं तुझें अत्यंत मन । बाळपणीं तुवा सुदेव पाठवून ।
पद्मनेत्रे तुझ्या पत्रेंकरून । कौंडिण्यपुरा मी आलों ॥१६॥
ऐसें नानापरी बोलोन । केलें रूक्मिणीचें समाधान ।
लीलावतारी श्रीकृष्ण । ब्रह्मानंद अवतरला ॥१७॥
पूर्ण एकांत देखोन । रूक्मिणी हांसोनि बोले वचन ।
म्हणे मज नाही पुत्रसंतान । शून्य सदन दिसतसे ॥१८॥
ज्यांचे उदरीं नाहीं पुत्र । व्यर्थ गेला त्यांचा संसार ।
अंती प्राप्ति नाहीं परत्र । ऐसें शास्त्र बोलतसे ॥१९॥
परमचतुर सुंदर । मदना ऐसा व्हावा पुत्र ।
जो प्रचंड प्रतापशूर । ज्यासी जगत्‌त्रय धन्य म्हणे ॥१२०॥
जैसी वेदआज्ञा प्रमाण । तैसें वंदी मातृ-पितृवचन ।
निजांगे सेवा करी अनुदिन । तो पुत्र धन्य संसारी ॥२१॥
अपूर्व जे कां वस्त । आणूनि माता-पितयांसी अर्पिजेत ।
जोडली जोड न वंची सत्य । तो पुत्र धन्य संसारी ॥२२॥
माझीं माता-पिता वृद्ध केवळ । वांचोत ऐसीं बहुत काळ ।
मानी जैसी उमा-जाश्वनीळ । तो पुत्र धन्य संसारी ॥२३॥
मातापिता सद्‌‍गुरु देव । येथें समान ज्याचा भाव ।
नित्य नूतन आवडी स्वयमेव । तो पुत्र धन्य संसारी ॥२४॥
शुक्तीच्या पोटीं मुक्ताफळ । की रंभागर्भीं कर्पूर निर्मळ ।
कीं वैरागर हिरा तेजाळ । तो पुत्र धन्य संसारी ॥२५॥
धन्य त्या पुत्राची जननी । जिची कीर्ति मिरवे त्रिभुवनीं ।
तेचि सर्व ऐश्वर्याची खाणी । पुत्र ऐसा प्रसवे जो ॥२६॥
इतरा सूकरी खरी शुनी देखा । अपवित्र पुत्र त्या निपुत्रिका ।
पुढें भोगिती त्या अनेक नरकां । नाही सुटका तयांसी ॥२७॥
जो माता-पितयांसी घाली बाहेरी । श्वशुरवर्गासी सांठवी घरीं ।
जो स्त्रीलंपट दुराचारी । त्याच्या भारें दुःखी धरा ॥२८॥
व्यर्थ काय करावे बहु सुत । जैसे एकदांचि पडिले जंत ।
जे परम अविचारी उन्मत्त । त्यांच्या भारें दुःखी धरा ॥२९॥
दारा-कुमारां सर्व देत । माता-पितयासी दरिद्र भोगवीत ।
कुशब्दवाणी हृदय भेदीत । त्याच्या भारें दुःखी धरा ॥१३०॥
आपुलीच वस्तु पिता मागे । त्यावरी डोळे फिरवी रागें ।
म्हणे मी तुमचें काय ऋण लागें । त्याच्या भारें दुःखी धरा ॥३१॥
पिता सांगे हिताव बोध । म्हणे हा सन्निपातला वृद्ध ।
हृदय उले ऐसा बोले शब्द । त्याच्या भारें दुःखी धरा ॥३२॥
म्हणे पिता माझा मूर्ख । मी त्याहूनि चतुर अधिक ।
मातेसी म्हणे करंटी देख । त्याच्या भारें दुःखी धरा ॥३३॥
माता पिता दोघेंजण । मेली करितां अन्न अन्न ।
मग करू धावे गयावर्जन । त्याच्या भारें दुःखी धरा ॥३४॥
असतां न बोले धड वचन । करविलें नाहीं उदकपान ।
मग लोकांसी दावी करूनि तर्पण । त्याच्या भारें दुःखी धरा ॥३५॥
पूर्वी केला अपमान । मग श्राद्धीं करीत शतभोजन ।
लटकेंचि लोकां दावी रडून । त्याच्या भारें दुःखी धरा ॥३६॥
म्हणोनि सर्वगुणीं संपन्न । पुत्र व्हावा जैसा मदन ।
ऐकतां ऐसें भगवान । तपालागी चालिला ॥३७॥
बळिभद्र उग्रसेन । दोघांसी म्हणे नगरी करा जतन ।
मग हिमाचळीं जाऊन । मांडिले अनुष्ठान पुत्रइच्छे ॥३८॥
एक संवत्सरपर्यंत । निराहार तप करीत ।
आराधिला उमाकांत । पंचवदन विरूपाक्ष जो ॥३९॥
तपांती येऊनि कर्पूरगौर । भेटी दिल्ही पुरस्कार ।
म्हणे श्रीरंगा माग वर । इच्छित मनी असेल तो ॥१४०॥
सुकुमार तू रुक्मिणीवर । श्रम जाहला बहु थोर ।
एवढा किंनिमित्त निर्धार । तप कासया मांडिले ॥४१॥
तू वैकुंठनाथ जगदुद्धार । तुज मी हृदयीं ध्यातो निरंतर ।
कासया तप मांडिलें दुर्धर । द्वारकाधीशा यदुपति ॥४२॥
हरि म्हणे पंचवदना । विरूपाक्षा त्रिपुरच्छेदना ।
उमावल्लभा नागभूषणा । वरदान देईं मज आतां ॥४३॥
केवळ जैसा मकरध्वज । ऐसा पुत्र देईं सतेज ।
ऐकोनि म्हणे कैलासराज । उदरा येईल मदनचि ॥४४॥
पूर्वी म्यां जो दग्ध केला । तो अनंग होऊनि राहिला ।
तो तुझिया उदरी घननीळा । पुत्र होईल प्रद्युम्न ॥४५॥
शिवे शापावया काय कारण । ते कथा ऐका भक्तजन ।
पूर्वी दक्षाच्या यागीं जाण । देह समर्पिला पार्वतीनें ॥४६॥
मग तो दक्ष शिवें मारिला । त्यावरी निःसंग शिव एकला ।
बहुतकाळ तप आचरला । हिमाचळी जाऊनियां ॥४७॥
पार्वती हिमाचळाचे पोटीं । पुनः अवतरली ते गोरटी ।
तिने आराधिला धूर्जटी । वर व्हावा म्हणोनियां ॥४८॥
नारद म्हणे हिमाद्रीप्रती । जे शिवप्रिया जाण पार्वती ।
हे त्यासीचि देईं मागुती । निश्चयेंसी नगोत्तमा ॥४९॥
तें हिमाद्रीसी मानलें वचन । मग येउनि सरोजासन ।
शिवगौरींचें लाविले लग्न । सर्व देव मिळोनियां ॥१५०॥
तंव पुढें जाहला तारकासुर । जो त्रैलोक्यासी अनिवार ।
सकळ देव करिती विचार । केवीं संहार होय याचा ॥५१॥
मग बृहस्पति बोलत । शिवासी होइल जेव्हां सुत ।
त्याच्या हातें पावेल मृत्य । तारकासुर निर्धारें ॥५२॥
तरी शिव असे व्रतस्थ । कामत्यागे तप करीत ।
त्यासी काम उद्‌भवेल सत्य । तरीच सुत होय पै ॥५३॥
मग देवीं पाठविला मदन । वेगी भुलवीं पंचवदन ।
यावरी तो हिमाचळीं येऊन । पार्वतीजवळ राहिला ॥५४॥
जेथें शिव करी अनुष्ठान । वसंते शृंगारिलें तें वन ।
पार्वती कामासहित येउन । शिवाजवळी उभी ठाके ॥५५॥
मदन शिवाच्या हृदयीं भरला । तेणे ध्यानासि विक्षेप केला ।
क्रोधें तृतीय नेत्र उघडिला । प्रळय वाटला सकळांसी ॥५६॥
आंतूनि निघाला प्रळयाग्न । जाळूनि भस्म केला मदन ।
मग शिव पाहे विचारून । पंचबाण व्यर्थ जाळिला ॥५७॥
हा कार्यासी देवीं पाठविला । म्यां व्यर्थ जाळूनि भस्म केला ।
तों मदनस्त्री ते वेळां । रति आली धांवूनि ॥५८॥
शिवापुढे रति सुंदरी । करूणस्वरें शोक करी ।
शिव म्हणे कृष्णाच्या उदरीं । पति तुझा जन्मेल ॥५९॥
मग ते रति अरण्यांत । पतीलागीं शोक करीत ।
मृगयेसि आला शंबर दैत्य । रती तेथें देखिली ॥१६०॥
म्हणे कोणाची तूं सुंदरी । एकली हिंडसी वनांतरी ।
तू माझी कन्या निर्धारीं । चाल माझिया मंदिरा ॥६१॥
असो शंबराचिया घरीं । रति नित्य स्वयंपाक करी ।
शंबर तिचा विश्वास धरी । आपुली कन्या म्हणोनियां ॥६२॥
इकडे हरि द्वारकेसी आला । पुढे रुक्मिणीसी गर्भ राहिला ।
तों सत्यभामेसी धाक उपजला । पुत्र होईल म्हणोनियां ॥६३॥
मी बोललें वेणीचा पण । तो आता आम्हांवरी येईल परतोन ।
जैसा आपुल्या सदनीं अग्न । आपणचि लावी मूर्खपणें ॥६४॥
तव नव मास भरतां पूर्ण । प्रसूत जाहली रूक्मिणी जाण ।
पोटासी आला पंचबाण । स्वरूपलावण्य कोण वर्णी ॥६५॥
प्रद्युम्न उपजला जेव्हां । एकचि वाद्यघोष लागला तेव्हां ।
भांडार फोडूनि याचकां सर्वां । द्रव्य अपार वाटिलें ॥६६॥
द्वारी मंडप उभविले । श्रीकृष्णे पुत्रमुख पाहिलें ।
मदनस्वरूप देखिले । उपमा न चले दूसरी ॥६७॥
शिववरेंकरून । पोटासी आला पंचबाण ।
शिवें अनंग केला जाळून । तो हा प्रद्युम्न मूर्तिमंत ॥६८॥
असो पांचऎ दिवशी श्रीकृष्ण । देवीचा नवस करावया पूर्ण ।
शक्तिवनासी जगज्जीवन । यादवांसहित गेला हो ॥६९॥
नारद सत्यभामेचा सदना आला । तिने सर्व समाचार श्रूत केला ।
म्हणे रुक्मिणीसीपुत्र जाहला । कैसे करावे सांग पा ॥१७०॥
म्हणे म्यां वेणीचा केला पण । मग हांसे कमलोद्‌भवनंदन ।
ज्यासि भूत भविष्य वर्तमान । सर्व ज्ञान ठाऊकें ॥७१॥
सत्यभामेसी म्हणे मुनीश्वर । मदनशत्रू असे शंबर ।
त्यासी हे वर्तमान समग्र । श्रुत करूं जाऊनियां ॥७२॥
मग शंबराचिये मंदिरासि । नारद पावला वेगेंसी ।
म्हणे तुझा मृत्यु द्वारकेसी । जन्मला असे जाण पां ॥७३॥
विषवल्लीचा मोड लहान । आहे तों टाकावा खुडोन ।
लहान म्हणो नये कृशान । आधीं विझवून टाकावा ॥७४॥
परम कपटी शंबर । द्वारावतिये आला सत्वर ।
रूक्मिणीच्या मंदिरात तस्कर । गुप्तरूपे प्रवेशला ॥७५॥
सूत्रधारी यादवेंद्र । करावया दैत्यांचा संहार ।
तेणें हें रचिलें मायाचरित्र । म्हणोनि शंबर प्रवेशला ॥७६॥
असो शंबरे उचलोनि बाळ । घेऊन गेला तात्काळ ।
परम सुंदर वेल्हाळ । जो भीमकीउदरी जन्मला ॥७७॥
दैत्य समुद्रतीरा आला सत्वर । चरणी धरिला पंचशर ।
शंबर परम दुराचार । भवंडोनि सागरीं टाकिला ॥७८॥
ते रुक्मिणीचे गर्भरत्‍न । मत्स्यें गिळिलें न लगतां क्षण ।
द्वारकेसी काय जाहलें वर्तमान । भीमकी जागी जाहली ॥७९॥
पुढे न दिसेचि कुमर । जाहला एकचि हाहाकार ।
भीमकी शोक करी अपार । द्वारकानगर गजबजिले ॥१८०॥
तों शक्ति पूजोनि सत्वर । द्वारकेसी आला यदुकुलदिनकर ।
कुमर नेला तें कारण समग्र । अंतरी कळलें तेधवां ॥८१॥
देवाधिदेव यादवराय । सकळ जाण त्याचा गुरु होय ।
परी लीलावेष अभिप्राय । ठायीं ठायीं संपादी ॥८२॥
असो ॠक्मिणीचिया मंदिरा प्रती । येता जाहला वैकुंठपती ।
तंव ते शोक करितसे लोकरीती । सकळ स्थिती जाणोनिया ॥८३॥
बहुत तपे व्रताचरण । करिता देखिले पुत्रनिधान ।
पूर्वकर्माचें फळ पूर्ण । प्राप्त जाहलें हें दिसे ॥८४॥
अहा हारपलें दिव्य रत्‍न । माझे चोरूनि नेलें निधान ।
वंशवल्लीचें रोप उपडोन । कोणीं नेलें कळेना ॥८५॥
यदुकुळीं दिव्य दीप लाविला । सवेंचि कोण्या दुष्टें विझविला ।
पयोधरी पान्हा फुटला । पाजूं कोणा ये वेळे ॥८६॥
श्रीरंग म्हणे ॠक्मिणी । तू शोक सांडी ये क्षणी ।
पुन्हा पुत्र देखसी नयनीं । द्वादश वर्षानंतरे ॥८७॥
असो इकडे सागरी पंचशर । टाकोनि गेला शंबर ।
मत्स्ये गिळिला कृष्णकुमार । तेथें श्रीधर रक्षी तया ॥८८॥
जो अनंत ब्रह्मांडें रक्षिता । त्यासि पुत्र रक्षावया काय अशक्यता ।
जो मायाचक्रचाळिता । मायेपरता विश्वंभर ॥८९॥
शुक्र-शोणितांचे पुतळे । जननीजठरीं कोणें रक्षिले ।
नेत्र कर्णादि अवयव कोरिले । ठायींचे ठायीं कोणें हो ॥१९०॥
जठराग्नि अन्न भस्म करी वेगें । परी त्या गर्भासी धक्का न लागे ।
तेथें उदरनिर्वाह श्रीरंगे । केला कैसा नेणे कोणीं ॥९१॥
उपजलियावरी बाहेरी । जननीच्या वक्षःस्थळाभीतरी ।
दुग्धरस निर्माण करी श्रीहरी । कोणेपरी कळेना ॥९२॥
नवछिद्र वपु भग्न । माजी वायुरूपे वसे प्राण ।
तो कदा न निघे मर्यादेविण । ऐसें करणें हरीचें ॥९३॥
शरीरीं कैसा घातला प्राण । जातां कदा नव्हे दृश्यमान ।
सकळ करणांचा चाळक पूर्ण । याविण कोण दूसरा ॥९४॥
ऐसा जो सर्वनियंता । तेणे मत्स्योदरीं रक्षिलें मन्मथा ।
मत्स्यघ्नें तो अवचिता । जाळें घालोनि धरियेला ॥९५॥
परम तेजस्वी दिसे मीन । अंतरी वसे मीनकेतन ।
मनीं भावी मत्स्यघ्न । हा रायासी नेऊन मत्स्य द्यावा ॥९६॥
मग तात्काळ तो मत्स्य नेऊनी । शंबरासी दिधला ते क्षणीं ।
दैत्य आश्चर्य करी मनी । मीन देखोनि तेधवां ॥९७॥
मग रतीजवळी ते वेळे । मत्स्य पाठविला पाकशाळे ।
मत्स्यकलेवर तिनें चिरिलें । आंतूनि निघालें दिव्य बाळ ॥९८॥
जैसा बालसूर्य प्रकटला । तैसा स्वकांत रतीनें देखिला ।
हर्षें निर्भर झाली बाला । म्हणे कैसें करूं आतां ॥९९॥
शंबरासी कळतां मात । तो मनीं मानील विपरीत ।
तव नारदमुनि अकस्मात । गुप्तपणें प्रवेशला ॥२००॥
रतीसी म्हणे सावधान । तुझा भ्रतार हा ओळखें मदन ।
यासी करी तूं बहुत जतन । कृष्णनंदन हा असे ॥१॥
नारदें रतीसी दिधला मंत्र । म्हणे हा तुजचि दिसेल किशोर ।
वरकडांसी नव्हे गोचर । ऐसा वर दीधला ॥२॥
कामधेनु नित्य येऊन । यासी करवील स्तनपान ।
ऐसें सांगोनि चतुर्मुखनंदन । स्वर्गपंथे पैं गेला ॥३॥
मग तो आपुला भ्रतार निश्चिती । पाळणां घालोनि हालवी रती ।
जैसा शुक्लपक्षी रोहिणीपती । वाढे तैसा त्वरेनें ॥४॥
द्वादश वर्षेपर्यंत । रतीने वाढविला मन्मथ ।
नारद क्षणक्षणां येत । सांभाळीत कृष्णसुता ॥५॥
नारदें सुदिन पाहोन । तत्काळ लाविले गांधर्वलग्न ।
आपुल्या हातें शेस भरून । रतिमदनां ऐक्य केलें ॥६॥
ऐसा कांही काळ लोटला । रतीसी तत्काळ गर्भ राहिला ।
तो शब्द बाहेरी प्रकटला । कर्णीं आला दैत्याच्या ॥७॥
रतीने गुप्त पुरुष आणूनी । भोगिता जाहली गर्भिणी ।
शंबराच्या मनीं क्रोधाग्नी । परम पेटला तेधवा ॥८॥
मंत्रास्त्र धनुष्य बाण । नारदें मदनासी दिधले आणून ।
शंबरे दळभारेंसी सिद्ध होऊन । रतिमंदिर वेढिलें ॥९॥
रति जाहली भयभीत । म्हणे स्वामी आता कैसा वृत्तांत ।
तुम्ही एकले दैत्य अद्‌भुत । थोर अनर्थ ओढवला ॥२१०॥
तव यदुकुलवर्धन कुमार । प्रचंडप्रतापी रणधीर ।
रतीसी म्हणे चिंता अणुमात्र । शुभवदने करूं नको ॥११॥
पर्वताच्या दरीमधून । जैसा अकस्मात निघे पंचानन ।
द्वाराची अर्गळा हातीं कवळून । हांक देत प्रकटला ॥१२॥
काळेचि काय फोडिली हांक । ऐकता दचकले दैत्यकटक ।
शुष्क वनांत पावक । भीमकीतनुज प्रकटला ॥१३॥
पवनगती फिरे पंचशर । अर्गळाघातें करी वीरांचा चूर ।
जैसे बहुत अजांचे भार । एकला व्याघ्र विभांडी ॥१४॥
शंबर म्हणे रे तस्करा । का हिंडतोसी सैरावैरा ।
ऐसे ऐकतांचि सत्वरा । धनुष्य सज्जिले पंचबाणे ॥१५॥
वर्म लक्षूनिया शंबर । सोडी शरापाठी शर ।
परी नाटोपे पंचशर । पंचवक्त्रशत्रू तो ॥१६॥
केलें बहुत शस्त्रांचे प्रेरण । तृणाऐसें भस्म करी मदन ।
युद्ध केले सप्त दिन । सेना संपूर्ण आटिली ॥१७॥
आधीच कृष्णाचे वीर्य विशेष । त्याहीवरी नारदाचा उपदेश ।
दैत्यप्राण घ्यावया निःशेष । दिव्य बाण घेतला ॥१८॥
धनुष्य ओढूनि आकर्ण । पंचशरे सोडिला बाण ।
शंबराचें शिर छेदून । आकाशपंथे उडविले ॥१९॥
जाहला एकचि जयजयकार । वृंदारक वर्षती पुष्पसंभार ।
जयवंत जाहला कृष्णकुमर । वाद्यगजर लागले ॥२२०॥
संगे घेऊनि दळभार । दिव्य रथी आरूढे कृष्णकुमर ।
रतीसी रथी बेसवोनि सत्वर । द्वारावतिये चालिला ॥२१॥
द्वारकेजवळी आला मदन । वाद्यगजरें गाजे गगन ।
पुढे पाठविले बंदीजन । श्रीकृष्णासी सांगावया ॥२२॥
श्रीकृष्णासी सांगती हेर । विजयी होऊनि तुमचा कुमर ।
भेटावया आला सत्वर । रतीसहित श्रीकृष्ण ॥२३॥
उग्रसेन उद्धव अक्रूर । भोगींद्र आणि यादवेंद्र ।
सहित प्रजा दळभार । आले बाहेर भेटावया ॥२४॥
जैसा कृष्ण तैसा प्रद्युम्न । किरीटकुंडले घनश्यामवर्ण ।
चतुर्भुज पीतवसन । दुसरा श्रीकृष्ण लोक म्हणती ॥२५॥
प्रद्युम्नें साष्टांग नमस्कार घातला । सप्रेम श्रीकृष्णासी भेटला ।
उग्रसेन-वसुदेवें आलिंगिला । बळिभद्रादि सर्व यादवीं ॥२६॥
नारदें तत्काळ येऊन । सांगितले सर्व वर्तमान ।
मग रतीसी हातीं धरून । भीमकीसदना चालिला ॥२७॥
रूक्मिणीच्या घरीं गोपिका । मिळाल्या सकळ कृष्णनायिका ।
तों रतिसहित मदन देखा । समीप देखिला समस्तीं ॥२८॥
गोपींसि कैसें भासत । की नूतन स्त्री घेऊनि कृष्णनाथ ।
आला भाविती समस्त । रूक्मिणीसी वाटे तैसेंचि ॥२९॥
भीमकी सरसावी अंचळ । तों मदनें धरिलें चरणकमळ ।
श्रीकृष्णही आला तत्काळ । घननीळ मग बोले ॥२३०॥
पुत्रासी भेटे रुक्मिणी । अश्रू लोटले तिचे नयनीम् ।
पान्हा फुटला निजस्तनीं । हृदयीं धरिलें मदनातें ॥३१॥
सासूसासरियां ते वेळे । समस्तांसी रतीनें नमस्कारिलें ।
मग दिव्य मंडप उभे केले । भीमकीचे द्वारी तेधवां ॥३२॥
भांडार फोडिलें बहुत । याचक सुखी केले समस्त ।
तो नवमास भरतां प्रसूत । रति जाहली संभ्रमें ॥३३॥
बाळ जाहला सुकुमार । अनिरूद्ध नाम ठेवी यदुवीर ।
तोही घनश्याम सुंदर । मदनावतार दूसरा ॥३४॥
श्रीकृष्ण मदन अनिरूद्ध । तिघांचे एकचि रूप प्रसिद्ध ।
ऐसा द्वारकेमाजी ब्रह्मानंद । आनंदकंद नांदतसे ॥३५॥
सोळा सहस्र कृष्णनायिका । तितुक्यांसही पुत्र जाहले देखा ।
दहा पुत्र एक कन्यका । समसमान सर्वांते ॥३६॥
एक लक्ष साठ सहस्र । श्रीकृष्णासी जाहले पुत्र ।
द्वारकेशी सोहळा निरंतर । पुत्रोत्साह होतसे ॥३७॥
तितुक्या पुत्रांची मौजीबंधने । करूनियां नारायणें ।
देशोदेशींचे नृप कन्यारत्‍नें । आणोनि देती तयांसी ॥३८॥
सोळा सहस्र कुमारी । तितुक्यांसी वर पाहोनि देत मुरारी ।
नित्य सोहळा घरोघरी । नानाप्रकारें होतसे ॥३९॥
कुटुंबवत्सल जगज्जीवन । नित्य नित्य सोहळा नूतन ।
इंद्रादि देव संपूर्ण । त्रिकाळ येती दर्शना ॥२४०॥
पूर्णावतार श्रीरंग । जो क्षीराब्धिजाहृदयपद्मभृंग ।
पूर्ण ब्रह्मानंद निःसंग । द्वारावतिये पातला ॥४१॥
हरिविजयग्रंथ हाचि कस्तुरी । सुवासे निजभक्तांसी तृप्त करी ।
परम सभाग्य ते वंदिती शिरीं । अहोरात्र न विसंबिती ॥४२॥
निंदक सदा वटवटती पामर । जे परम अपवित्र दुर्दुर ।
परदोषकर्दमीं लोळणार । कस्तूरी साचार नावडे त्यां ॥४३॥
या मृगमदाचे भोक्ते भाग्यवंत । ज्या घरी दैवी संपत्ति विराजित ।
त्यांसी हरिविजयग्रंथ आवडत । काया-वाचा-मनेंसीं ॥४४॥
ब्रह्मानंदा भक्तवत्सला । मन्मथजनका तमालनीळा ।
श्रीधरवरदा अतिनिर्मळा । अभंगा अढळा जगद्‌गुरो ॥४५॥
इति श्रीहरिविजयग्रंथ । संमत हरिवंश भागवत ।
प्रेमळ पंडित परिसोत । सप्तविंशतितमाध्याय गोड हा ॥२४६॥
॥ अध्याय सत्ताविसावा समाप्त ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीकृष्ण प्रत्येक स्त्रीच्या सदनात वेगळे रूप धारण करून रहात होता, त्यामुळे तो केवळ आपल्याजवळच रहातो असे प्रत्येकीला वाटत असे. त्या एकमेकींजवळ वाद घालीत असत. "कृष्ण माझ्याकडे आज अमुक करीत होता" असे एक म्हणे तर 'त्याचवेळी तो माझ्याकडे अमुक करीत होता' असे म्हणून दुसरी तिच्याजवळ भांडत बसे. रुक्मिणी मग त्यांची समजूत घाली. "कृष्ण सृष्टीत सर्वत्र भरलेला आहे. तो प्रत्येक वस्तुत आहे. तुमच्या प्रत्येकीच्या जवळ तो आहेच, पण इतर सर्व प्राणिमात्रांच्या अंतःकरणातही आहे." तिच्या बोलण्यामुळे त्यांना कृष्णाच्या मायेचे कोडे पडत असे.

सत्यभामेने एकदा रुक्मिणीजवळ पैज मारली. "रुक्मिणी, तुला जर आधी पुत्र झाला तर मी तुला वेणी वस्त्रे देईन, आणि मला जर तुझ्या आधी पुत्र प्राप्त झाला तर तू मला तसेच दिले पाहिजे ?" रुक्मिणीने ती पैज मान्य केली.

एकदा नारदांनी कृष्णाच्या स्त्रियांची मती किती विशाल आहे ते तपासण्याचे ठरविले. ते प्रत्येकीच्या सदनात गेले आणि स्वागताचा स्वीकार करून इतर काहीतरी बोलणी करून म्हणाले- "नारायण ! नारायण ! आम्ही ओळखले बरे ! तुझे मन परपुरूषावर गेले आहे हे लक्षात आले आहे माझ्या !" ती स्त्री चकित होई, रागाने म्हणे- "मुनिवर्य ! असे भलतेसलते काय बोलता ? माझे मन कृष्णाशिवाय दुसर्‍या कोणावरही जाणे शक्य नाही." आणि नारद म्हणत असत - "होय का ! असेल असेल, माझी कल्पना चुकीची असेल. माझे बोलणे मनावर घेऊ नकोस."

रुक्मिणीला सुद्धा नारद तसेच म्हणाले. तेव्हा तिने मात्र त्यांना योग्य उत्तर दिले. "देवर्षे ! तुमचे वचन सत्य आहे. परात्पर पुरुष ! नुसता परपुरुष नव्हे ! त्या पुरुषोत्तम श्रीकृष्णावरच माझे मन आहे ! मी त्याला कालत्रयी ही विसरत नाही ! तो तर वेदशास्त्रांनाही 'पर' आहे, पलीकडचा आहे. "

नारदाना आनंद झाला. ते म्हणाले- "रुक्मिणी तू धन्य आहेस ! तू कृपा करशील तरच हरीची खरी ओळख पटेल. "

रुक्मिणी आणि कृष्ण एकदा आनंदाने झोपाळ्यावर बसून गोष्टी बोलत होते. रुक्मिणी कृष्णाला म्हणाली- ' मधुसूदना, खरे पाहाता मी तुमच्या मानाने अगदी नगण्य आहे ! मला सेवाधर्मही कळत नाही. तुमच्या सौंदर्याला तुलनाच नाही, आणि मला तर सौंदर्यच नाही. त्या गोपी किती श्रेष्ठ ! त्यांच्यासारखी भक्ती मला लाभेल का ? छे ! मी नांवाची पट्टराणी, माझी प्रीती म्हणजे नुसती बतावणी ! तुम्हाला मी शोभत नाही, तुम्हाला गोपीच शोभेल. एखादी तरुण गोपी पहा आणि तिच्याजवळच संसार करा ?'

कृष्ण म्हणाला- "वा ! वा ! रुक्मिणी ! बोलण्यातही तू चतुर आहेस ! सुंदर आहेस ! तू ज्याच्याकडे पहाशील तो धन्य ! तू शिशुपाल व जरासंध यांच्या सारख्या राजांना सोडून मला कां वरिलेस ? मी तर गांवढळ गवई ! माझी तिथली कीर्ती सुद्धा काही चांगली नव्हती ! मला सिंहासन, छत्र, वाहन, असे कोणतेच वैभव नाही. मी गरूडावर बसतो, शेषशायी म्हणजे सापावर झोपतो, समुद्रात माझे निवासस्थान आहे ! मी गोरा सुद्धा नाही ! भक्तांसंगे मी नाचतो, मला त्यात काही लाज वाटत नाही. मी एकटा एक असतो. बरोबरीचा मित्र मला कोणी नाही ! तू मला कशाला पसंत केलेस ते कळत नाही."

रुक्मिणीला ते ऐकवेना. ती मूर्च्छित पडली. आपण रुक्मिणीची चेष्टा केली हे योग्य केले नाही असे कृष्णाला वाटू लागले. त्याने उपचार करून तिला सावध केले, ती लगेच उठून बसली आणि त्याच्या चरणांना मिठी मारून म्हणाली - "हे त्रिभुवनललामा ! मी तुझ्या थोरवीचे काय वर्णन करूं ? पण एक विचारते- पुत्रप्राप्तिाविना स्त्रीचा जन्म व्यर्थ आहे ! निपुत्रिक मनुष्याला सद्‌गती प्राप्त होत नाही. मला पुत्र व्हावा अशी फार इच्छा आहे ! मदनासारखा सुंदर मुलगा झाला तर माझ्याइतकी सुखी मीच !"

"प्रिये ! तुझी मनोकामना मी पूर्ण करीन. त्यासाठी मी शिवाची आराधना करायला जाईन. एक वर्षभर मला आराधना करावी लागेल." कृष्ण म्हणाला. बलरामाला व उग्रसेनाला त्याने आपला बेत सांगितला. त्यांनी द्वारकेचे रक्षण करण्याचे ठरविले. कृष्ण हिमालयात गेला. एक वर्ष तो निराहार राहिला. त्याने शिवाची भक्ती केली. शिव प्रसन्न झाला. कृष्णाला तो म्हणाला- "तुझे मनोगत मला कळले आहे. रुक्मिणीच्या पुत्राच्या रूपाने मी प्रत्यक्ष मदनालाच पुन्हा सदेह करणार आहे. त्याचा मी पूर्वी क्रोधाने भस्म करून टाकले, रतीला त्याच्या विरहाचे दुःख फार भोगावे लागले आहे. तुझी व रूक्मिणीची इच्छा पूर्ण होईल व मदनालाही पुनर्जन्म मिळेल."

तारकासुराचा वध करण्यासाठी शंकराच्या तेजापासून निर्माण झालेला पुत्र देवांना हवा होता. उमा ही पूर्वजन्मींची सती शंकराची पत्‍नी होती. पण शंकर उदासीन होता. त्याच्या मनात उमेविषयी प्रेम निर्माण करण्याचे कार्य मदनाने देवांसाठी केले पण शंकराने रागावून मदनाला तृतीय नेत्रातील वन्हीने जाळून टाकले. मदनाची स्त्री रती ही मदनासाठी झुरत राहिली. तिने शंबर नांवाच्या असुराच्या ताब्यात नाइलाजाने दासीपणा स्वीकारला. केव्हातरी मदनाची व आपली भेट होईल अशी तिला फार आशा वाटत होती. मदनाचा पुनर्जन्म रुक्मिणीचा पुत्र म्हणून झाल्यावर रतीची व त्याची पुनर्भेट कशी होणार होती ?

कृष्ण द्वारका नगरीला परत आला. रुक्मिणी गरोदर झाली. तिला अतिशय सुंदर पुत्र झाला. त्याला प्रद्युम्न असे नांव ठेवण्यात आले. सत्यभामेने जी पैज मारली होती तीत ती हरली. तिला मत्सर वाटत होता. नारदमुनी जेव्हा तिच्या सदनात आले तेव्हा तिने आपली मनोव्यथा त्यांना सांगितली. नारद म्हणाले- " भामे ! शंबर नांवाचा असुर आहे. त्याने मदनाची स्त्री रती हिला दासी बनविले आहे. तो मदनाचा वैरी आहे. प्रद्युम्न हाच पूर्वजन्मींचा मदन आहे हे त्याला कळले तर तो प्रद्युम्नाचा प्राण घेण्याचा प्रयत्‍न करील."

सत्यभामेला असे सांगून नारद शंबरासुराकडे गेले. त्याला त्यांनी सांगितले- "मदन हाच द्वारकेत कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्माला आला आहे." तेव्हा त्या राक्षसाने सूक्ष्म रूप धारण केले. तो द्वारकेत गेला. प्रद्युम्न तेव्हा निद्रिस्त होता. त्याला शंबराने उचलले. गगनांत नेले. मग समुद्रात नेऊन टाकले. त्यावेळी तो बालक नेमका एका मोठ्या माशाने गिळला आणि त्यावेळेसच एका कोळ्याने टाकलेल्या जाळ्यात तोच मासा सापडला ! एवढा मोठा मासा आपण राजा शंबर याला दिला तर तो प्रसन्न होऊन आपल्याला पारितोषिक देईल अशा आशेने कोळ्याने तो मासा राजाला भेट म्हणून पाठविला. त्याने तो मासा तसाच बल्लवाला स्वयंपाकासाठी दिला. तेथे तो मासा चिरला, तो काय, त्यात जिवंत सुंदर बालक ! दासदासींना फारच नवल वाटले. रती ही तिथेच दासी होती. तिला त्या बालकाबद्दल फार आकर्षण वाटले. मनोमन तिला तो मदनच आहे वाटत होते. तेवढ्यात फक्त तिलाच दिसतील अशा स्वरूपात नारद तेथे आले. त्यांनी तिला म्हटले- ' तू ज्याची वाट पहात होतीस तो तुझा पती मदनच ह्या बालकाच्या रूपाने येथे आला आहे. तू त्याचे संगोपन कर. हाच प्रद्युम्न. कृष्ण व रुक्मिणी यांचा हा पुत्र. तुला मी एक मंत्र शिकवतो. तो म्हटलास की या बालकाच्या ठिकाणी मदनच तुला दिसू लागेल, पण इतरांना तो बालकच फक्त दिसेल. तो तुझ्यासाठी तरूण व मूळ रूपातील मदन होईल. श्रीकृष्णाच्या कृपेनेच विदेह झालेला मदन सदेह होऊन आला आहे !"

द्वारकेत काय घडले ? पाळण्यातून बालक नाहीसा झाला म्हणून रुक्मिणी रडू लागली. मदनासारखा पुत्र ! शिवप्रसादाने लाभलेला ! आणि असे काय घडले ? तो नाहीसा कसा झाला ? कोणी काहीच सांगू शकले नाही. कृष्णाला मात्र प्रद्युम्न कोठे आहे ते माहीत होते. त्याने रुक्मिणीचे सांत्वन केले. 'प्रिये, तुला प्रद्युम्न पुन्हा भेटेल, चिंता करू नको' असे त्याने सांगितले.

तिकडे रतीचा व प्रद्युम्नरूप मदनाचा नारदांनी विवाह घडवून आणला, पण ते इतर कोणालाही कळले नाही, बारा बर्षे प्रद्युम्न रतीच्या संगतीत राहिला. रती गर्भवती झाली. अंतःपुरात सर्वत्र तिच्या नांवाचा बभ्रा झाला. रतीच्या पतीचे नांव कोणालाच माहीत नव्हते. शंबराला कळले तेव्हा त्याने या गुप्त शत्रूचा निःपात करण्यासाठी सेना जमविली. तिकडे नारदांनी प्रद्युम्नाला दिव्य शस्त्रे व अस्त्रे दिली ! त्यांचे प्रयोगही शिकविले. तेव्हा प्रद्युम्न स्वतःच अंतःपूरातून बाहेर पडला. त्याने शंबराला आव्हान दिले, त्याच्याशी घनघोर युद्ध केले. त्याचा शिरच्छेद केला.

शंबरवधामुळे देवांना आनंद झाला. नारदांनी प्रद्युम्नाला रतीसह द्वारकेत जाण्यास सांगितले. ते स्वतः पुढे गेले. रुक्मिणीसह सर्व स्त्रियांना तो प्रद्युम्न कृष्णासारखाच भासला. त्या लज्जित झाल्या. नारदांनी रुक्मिणीला तिच्या हरवलेल्या पुत्राची आठवण करून दिली. तोच हा प्रद्युम्न व पूर्वजन्मींची मदनस्त्री रति तीच ही रती असा दोघांचा सर्वांना परिचय करून दिला. द्वारकेत आनंदाचा सोहळा झाला.

पुढे रती प्रसूत होऊन तिला पुत्र झाला. त्याचे सौंदर्य तर अधिकच होते. त्याचे नांव अनिरुद्ध !

कृष्णांच्या प्रत्येक स्त्रीला दहा मुलगे व एक मुलगी अशी संतानप्राप्ती झाली ! त्या सर्व पुत्रांचे व कन्यांचे यथाकाल विवाह झाले. यादबवंशातील तरुणांचे भारतातील अनेक राजवंशीयांबरोबर नातेसंबंध प्रस्थापित झाले. कृष्ण आदर्श गृहस्थाश्रमी होता. त्याच्या द्वारकेत आनंदाचे समारंभ झाले नाहीत असा एकही दिवस जात नव्हता !
॥ अध्याय सत्ताविसावा समाप्त ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


GO TOP