श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय साठावा


बभ्रुवाहनाची कथा


श्रीगणेशाय नम: ॥
जैमिनि म्हणे राजेंद्रा ॥ जनमेजया चातुर्यचंद्रा ॥
श्यामकर्ण आला मणिपुरा ॥ तंव अपूर्व वर्तलें ॥ १ ॥
तेथें बभ्रुवाहन राज्य करी ॥ परमपुण्य सदाचारी ॥
श्रीकृष्णभक्ति नगरीं ॥ सकळ लोकां लाविली ॥ २ ॥
प्रजा सुखरूप बोलती ॥ दंड एक छत्रा अमित्राप्रती ॥
बंध सुमनास निश्चितीं ॥ हार सुंदर गुंफितां ॥ ३ ॥
खेळता सारंगपट मार ॥ अवर्षण नाहीं दुष्काळ दरिद्र ॥
आनंदभरित लोक समग्र ॥ आधि व्याधि कांहीं नसे ॥ ४ ॥
आळोआळीं सुंदर मंदिरे ॥ मंदिरांप्रति सुवर्णगोपुरें ॥
गोपुरांप्रति एकसरें ॥ चर्या बहुत झळकती ॥ ५ ॥
चर्यांप्रति मुक्त हंस ॥ परमहंसीं आशापाश ॥
हंस तेथें परमहंस ॥ तुटोन गेले सकलही ॥ ६ ॥
निराशा तेथेंच ज्ञान ॥ ज्ञान तेथें समाधान ॥
समाधान तेथें गहन ॥ सुख सर्व वसतसे ॥ ७ ॥
सुख तेथें संतजन ॥ संत तेथें हरिकीर्तन ॥
कीर्तन तेथें जगज्जीवन ॥ आनंदघन सर्वदा ॥ ८ ॥
असत्य नाहींच मुळींहून ॥ लोक बोलती गीर्वाण ॥
शास्त्रश्रवण वेदाध्ययन ॥ घरोघरीं होतसे ॥ ९ ॥
नगरींचे वीर समग्र ॥ रणशूर आणि दानशूर ॥
पाठिमोरे अणुमात्र ॥ दोहीं गोष्टींसी न होती ॥ १० ॥
सर्व राजे लहान थोर ॥ बभ्रुवाहनास देती करभार ॥
आश्चर्य करी सुभद्रावर ॥ पराक्रम त्याचा ऐकतां ॥ ११ ॥
हंसध्वज म्हणे अर्जुना ॥ आम्ही करभार देतों बभ्रुवाहना ॥
त्यास मातेसमान परललना ॥ नगरीं आला हेच त्याची ॥ १२ ॥
तो गृध्र येऊन अकस्मात ॥ पार्थाचे मुकुटीं बैसत ॥
अपशकुन देखोन चित्त ॥ खेद पावलें सर्वांचें ॥ १३ ॥
तो सेवकांनीं घोडा धरिला ॥ बभ्रुवाहनासमीप आणिला ॥
सभेस तो महाराज बैसला ॥ सकल नृपांसमवेत ॥ १४ ॥
दहा सहस्त्र स्तंभ ॥ सभेसी मणिमय सुप्रभ ॥
नीळयाचीं उथाळीं स्वयंभ ॥ तुळवट कार्तस्वराचे ॥ १५ ॥
दांडे पाचूचे झळकत ॥ किलचा आरक्त मणिमंडित ॥
असो तो चित्रांगीचा सुत ॥ पार्थवीर्यें जन्मला ॥ १६ ॥
पार्थें पूर्वी तीर्थें केलीं ॥ आदिपर्वी हे कथा कथियेली ॥
उलूपी चित्रांगी वरिली ॥ सुभद्रावरें पूर्वीच ॥ १७ ॥
अश्वोत्तमाचे भाळीं ॥ पत्र लिहिलें तें वाची तये वेळीं ॥
बभ्रुवाहन चित्रांगीजवळी ॥ वर्तमान सांगत ॥ १८ ॥
ती म्हणे तुझा पिता अर्जुन ॥ तेणें सोडिला हा श्यामकर्ण ॥
तरी तूं त्याजवरी शस्त्र धरून ॥ उभा ठाकों नकोचि ॥ १९ ॥
घोडा आणि सर्व राज्य घेऊन ॥ जाऊन देई पितयालागून ॥
दृढभावें धरीं चरण ॥ थोरपणा सांडूनियां ॥ २० ॥
मग सर्व संपत्तीशीं बभ्रुवाहन ॥ चरणचालीं चालिला शरण ॥
पार्थ पिता देखोन ॥ साष्टांग नमन करी तेव्हां ॥ २१ ॥
म्हणे मी तुझा नंदन ॥ चित्रांगीउदरीं जाहलों निर्माण ॥
सर्व राजे विनविती पूर्ण ॥ पुत्रास भेटे पार्थवीरा ॥ २२ ॥
याएवढा नाहीं पुरुषार्थी ॥ नृप सर्व शरण येती ॥
ऐसा वीर दुजा क्षितीं ॥ पुन: न होय सर्वथा ॥ २३ ॥
पार्थचरणीं ठेविलें भाळ जाण ॥ ते न काढीच बभ्रुवाहन ॥
अर्जुने क्रोधेंकरून ॥ लत्ता हाणोनि लोटिला ॥ २४ ॥
तूं कदा नव्हे माझा सुत ॥ अतिनिर्बळ षंढ भयभीत ॥
कीं जारकर्में निश्चित ॥ उपजविला चित्रांगीनें ॥ २५ ॥
घोडा धरून कैसा सोडिला ॥ अरे माझा अभिमन्यु पुत्र भला ॥
जेणें अद्‍भुत पराक्रम केला ॥ दोहीं दळांदेखतां ॥ २६ ॥
तो पुत्र माझा सिंह देख ॥ तूं कैंचा जाहलासी जंबुक ॥
तूं नाचणारीचा सुत सम्यक ॥ तूंही नटवा होईं आतां ॥ २७ ॥
शस्त्रें टाकीं ये अवसरीं ॥ नृत्य करून पोट भरीं ॥
तूं नव्हेसी क्षत्रिय निर्धारीं ॥ मज निश्चये कळों आलें ॥ २८ ॥
ऐसें ऐकतां बभ्रुवाहन ॥ क्षोभला जैसा प्रलयाग्न ॥
म्हणे तुझें सर्व सोशीन ॥ परी एक गोष्टी न सोसवे ॥ २९ ॥
माझे मातेस जारीण ॥ बोलिलासी स्वमुखेंकरून ॥
तरी घे हातीं धनुष्यबाण ॥ क्षत्रियत्व माझें पाहें आतां ॥ ३० ॥
तुझिया गर्वाचीं कवचें पूर्ण ॥ आजि समरांगणीं करीन चूर्ण ॥
अरे मी जरी असेन बभ्रुवाहन ॥ तरी शिर उडवीन तुझें आतां ॥ ३१ ॥
इंद्र रुद्र आणि द्रोण ॥ यापाशी विद्या शिकलासी जाण ॥
तिचा झाडा दे आजि संपूर्ण ॥ येथें रणयज्ञ करितों मी ॥ ३२ ॥
घोडा नेऊन ते अवसरीं ॥ मागुतीं बांधिला मणिपुरीं ॥
साठकोटी रथ ज्याचे भारीं ॥ आठ अर्बुद अश्वोत्तम ॥ ३३ ॥
दशकोटी गज सबळ ॥ दोन खर्व पायदळ ॥
मग तो चित्रांगीचा बाळ ॥ रथावरी आरूढला ॥ ३४ ॥
म्हणे रे पार्था सावधान ॥ सांभाळी आले माझे बाण ॥
तुझे देहींचे पंच प्राण ॥ आजि काढीन बाहेरी ॥ ३५ ॥
मी कृतांत बभ्रुवाहन ॥ आजि तुज समरीं रक्षील कोण ॥
तुज सांगातें नृप संपूर्ण ॥ त्यांचा झाडीन गर्व आतां ॥ ३६ ॥
तो बाण सोडीत ते वेळां ॥ अनुशाल्व पुढें धांविन्नला ॥
बभ्रुवाहनें जर्जर केला ॥ शंभर बाणीं सक्रोधें ॥ ३७ ॥
सूत आणि स्यंदन ॥ अनुशाल्वाचा केला चूर्ण ॥
बाणजाळ दोघे जण ॥ असंभाव्य वर्षती ॥ ३८ ॥
अनुशाल्व योद्धा वीर ॥ परी बभ्रुवाहनें केला जर्जर ॥
हातींचे गळाले चापशर ॥ मूर्च्छना येऊनि पडियेला ॥ ३९ ॥
यावरी धांवला प्रद्युम्न ॥ सोडी बाणापाठीं बाण ॥
नानाशस्त्रें टाकून ॥ निःशंक भिडती समरांगणीं ॥ ४० ॥
होत युद्धाचें घनचक्र ॥ दोन्ही सेना पडल्या अपार ॥
मोठे माजलें रण भयंकर ॥ रक्ताचे पूर वाहती ॥ ४१ ॥
भूतावळी रक्त पिती ॥ तृप्त होऊन रणीं नाचती ॥
अस्थींचे दुर्ग रचिती ॥ मग भांडती परस्परें ॥ ४२ ॥
परस्परें शिरें भिरकाविती ॥ मूर्च्छना येऊन भूतें पडती ॥
बभ्रुवाहनें केली ख्याती ॥ सेना सर्व संहारिली ॥ ४३ ॥
बभ्रुवाहनें सोडिला बाण ॥ तो भेदीत गेला वारण ॥
सवेंच अश्व रथ छेदून ॥ पदातियांस मारित ॥ ४४ ॥
माजलें बहुतचि रण ॥ तों पुढें धांवला मेघवर्ण ॥
दोघांचें युद्ध दारुण ॥ शक्रारिसौमित्रांसारिखें ॥ ४५ ॥
भ्याड घायाळ पळती ॥ त्यांस ठाव नेदी कोठे क्षिती ॥
एक गजकलेवरांत दडती ॥ तेथें भेदिती सायक ॥ ४६ ॥
समरीं पडले जे वीर ॥ ते विमानारूढ होती सत्वर ॥
त्यांसी देवांगना करिती भ्रतार ॥ घेऊन जाती आत्मसदना ॥ ४७ ॥
भिऊन जे मेले रणीं ॥ त्यांस वरिती यक्षिणी ॥
पार्थाची संपदा हरूनी ॥ नेववीत बभ्रुवाहन ॥ ४८ ॥
कित्येक वीर धरूनि जीवंत ॥ बभ्रुवाहनें पाठविले नगरांत ॥
पूर्वी लवकुशें रघुनाथ ॥ ऐसाच जिंकिला समरांगणीं ॥ ४९ ॥
लवकुशांची कथा निश्चितीं ॥ वर्णिली रामविजयग्रंथीं ॥
तेचि पहावी पंडितीं ॥ अति सुरस जी कथा ॥ ५० ॥
तीन अध्याय जाण ॥ रामविजयीं लवकुशाख्यान ॥
तेथील कथा श्रोतीं परिसोन ॥ परमसुख पाविजे ॥ ५१ ॥
असो यावरी तो हंसध्वज ॥ स्वसेनेशीं धांवला भूभुज ॥
पांच सहस्त्र सेना सतेज ॥ बभ्रुवाहनाची मारिली ॥ ५२ ॥
पार्थसुते तीन बाणीं ॥ हंसध्वज पाडिला रणकुंभिनीं ॥
अत्यंत मूर्च्छा येउनी ॥ निश्चेष्टित राहिला ॥ ५३ ॥
मग सुवेग धांवला सत्वर ॥ तेणें माजविलें रण थोर ॥
दहा सहस्त्र कुंजर ॥ रणमेदिनीं पाडिले ॥ ५४ ॥
बभ्रुवाहनाचे अनिवार शर ॥ छेदिलें सुवेगाचें तत्काल शिर ॥
शिर धावोन आदळले सत्वर ॥ पार्थसुताचे वक्षःस्थलीं ॥ ५५ ॥
बभ्रुवाहनासी आली मूर्च्छना ॥ सवेच सावध जाहला त्या क्षणां ॥
तों वृषकेत वीरराणा ॥ समरांगणीं आलासे ॥ ५६ ॥
दोघे युद्ध करिती अनिवार ॥ जैसे मेरु आणि मंदार ॥
वर्मे लक्षूनि भेदिती शर ॥ हांकें अंबर गाजविती ॥ ५७ ॥
जैसे शिखी पिच्छे पसरिती ॥ तैसे वीर दोघे दिसती ॥
दोघांचें कौशल्य पाहती ॥ देव विमानीं बैसोनि ॥ ५८ ॥
जीवंतचि वीर धरून ॥ नगरांत पाठवी बभ्रुवाहन ॥
त्यांचे घाय बांधविती येऊन ॥ उलूपी आणि चित्रांगी ॥ ५९ ॥
भ्रताराचे वीर म्हणून ॥ करिती साक्षेपें पालन ॥
कृष्णपुत्र जो प्रद्युम्न ॥ तोही धरून आणिला ॥ ६० ॥
शिबिरासहित सर्व संपत्ति ॥ लुटून आणिली नगराप्रति ॥
पार्थ म्हणे पुढें गति ॥ बरवी कांहीं न दिसे ॥ ६१ ॥
वृषकेतास म्हणे पार्थ ॥ तूं तरी गजपुरास जाई त्वरित ॥
तुज होतां विपरीत ॥ धर्म कुंती प्राण देती ॥ ६२ ॥
आतां अश्वमेध राहिले ॥ असिपत्रव्रत व्यर्थ गेलें ॥
माझें सामर्थ्य बुडालें ॥ मृत्युचिह्नें जाणवती ॥ ६३ ॥
वृषकेत म्हणे जी ताता ॥ मी गजपुरा न जाई तत्त्वतां ॥
पश्चिमे उगवेल सविता ॥ परी हे गोष्टी न घडेचि ॥ ६४ ॥
आज मी झुंजेन निर्वाण ॥ घेईन बभ्रुवाहनाचा प्राण ॥
म्हणोनि लोटिला स्यंदन ॥ क्रोधें वचन बोलत ॥ ६५ ॥
म्हणे बभ्रुवाहना राहें स्थिर ॥ समरी साहें माझे शर ॥
मग तीन बाणीं कर्णपुत्र ॥ पार्थसुतें भेदिला ॥ ६६ ॥
हृदय त्याचें लक्षून ॥ वृषकेतें सोडिले सहा बाण ॥
सवेंच छेदून स्यंदन ॥ चूर्ण केला समरभूमी ॥ ६७ ॥
यावरी अस्त्रजाळ ॥ सोडिते जाहले वीर सकळ ॥
नानाशस्त्रें तेजाळ ॥ टाकिताती परस्परें ॥ ६८ ॥
ग्रीवा डोलवी पार्थसुत ॥ धन्य योद्धा वृषकेत ॥
मग शक्ति टाकितां अद्भुत ॥ कर्णसुतें छेदिली ती ॥ ६९ ॥
कौतुक पाहे अर्जुन ॥ एकाचे एक उडविती स्यंदन ॥
रथासहित कर्णनंदन ॥ उडवून धाडिला सूर्यलोका ॥ ७० ॥
दोन दिवस सूर्यलोकांत ॥ अंबरींच होता भ्रमत ॥
तिसरे दिवशीं वृषकेत ॥ भूमीवरि पडियेला ॥ ७१ ॥
बभ्रुवाहनासहित वृषकेतें ॥ रथ उडविला गगनपंथे ॥
तो उडी टाकून पार्थसुतें ॥ वृषकेतावरी कोसळला ॥ ७२ ॥
पार्थ कौतुक मानी चित्तीं ॥ म्हणे धन्य वीर त्रिजगतीं ॥
हें युद्ध न भूतो न भविष्यती ॥ ऐकिलें ना देखिलें ॥ ७३ ॥
अंतरिक्षयुद्ध करिती ॥ सवेंच उतरती रणक्षितीं ॥
छप्पन्न देशींच्या युद्धगती ॥ दोघे दाविती परस्परें ॥ ७४ ॥
ऐसें युद्ध आसमास ॥ दोघांचें जाहले पांच दिवस ॥
टाकावया श्वासोच्छास ॥ एक निमेषच न फावेचि ॥ ७५ ॥
यावरी बभ्रुवाहनें एक बाण ॥ सोडिला निर्वाणींचा दारुण ॥
वृषकेताचें शिर जाण ॥ आकाशपथें उडविलें ॥ ७६ ॥
सवेंच शिर परतलें ॥ पार्थसुताचे हृदयीं आदळले ॥
मागुती कंदुकाऐसें उडालें ॥ पडिलें पार्थपदाजवळी ॥ ७७ ॥
शिर कृष्णाचें स्मरण करित ॥ कबंध रणीं चौताळत ॥
शिर नसतां एकशत ॥ वीर पाडिले रणांगणीं ॥ ७८ ॥
हातीं घेऊन रथचक्र ॥ शिराविण फिरे कलेवर ॥
वीर मारून अपार ॥ मग गडबडे भूमीवरी ॥ ७९ ॥
शोकार्णवीं पार्थ निमग्न ॥ शिर तें हृदयीं आलिंगून ॥
वृषकेताचे आठवून गुण ॥ आक्रोश करूं लागला ॥ ८० ॥
अहा कर्णा कैसें केलें ॥ बंधुत्व कळू नाहीं दिधलें ॥
आमुचें ऋण फेडिलें ॥ पुत्ररूपेंकरूनियां ॥ ८१ ॥
अरे वृषकेता वेल्हाळा ॥ कर्णजा माझिया लघुबाळा ॥
वत्साराजसा ये वेळां ॥ मज टाकूनियां गेलासी ॥ ८२ ॥
अरे तूं दुसरा प्रतिकर्ण ॥ आम्ही पांचही सुखी तुज देखोन ॥
तुज पाहोन अभिमन्य ॥ मी विसरलों वृषकेता ॥ ८३ ॥
आतां कुंती धर्म देतील प्राण ॥ राहिला अश्वमेध महायज्ञ ॥
अरे तुवां अनुशाल्व जिंकून ॥ पायीं धरून आणिला ॥ ८४ ॥
अरे यौवनाश्व तूं जिकिला ॥ श्यामकर्ण तो आणिला ॥
कीं मजवरी रुसोन वेल्हाळा ॥ माझिया बाळा गेलासी ॥ ८५ ॥
तुजवरी पांचाळीचे मन ॥ ती ऐकतां त्यागील प्राण ॥
तुझें शिर हरिस्मरण ॥ करीत अजून नवल हें ॥ ८६ ॥
वक्षःस्थळ पिटीत अर्जुन ॥ आतां चौघे बंधू देतील प्राण ॥
माझा कुलदीपक प्रभाघन ॥ आजि विझाला या ठायीं ॥ ८७ ॥
कुलक्षय जाहला निश्चयेशीं ॥ म्हणे हे कृष्णा द्वारकावासी ॥
यादवेंद्रा काय जाहलासी ॥ गुंतलासी कोणे कार्या ॥ ८८ ॥
आम्हांस प्राप्त हे अवस्था ॥ कां उपेक्षिलें मज अनाथा ॥
दुःखें मूर्च्छना आली पार्था ॥ निश्चेष्टित पडियेला ॥ ८९ ॥
त्यास धनुष्यकोटीकरून ॥ येऊन डवची बभ्रुवाहन ॥
म्हणे वेश्येचा मी नंदन ॥ कीं पतिव्रतेचा तें पाहें ॥ ९० ॥
दीन स्त्रियेऐसा व्यर्थ ॥ पडलासी कां येथें रडत ॥
तुवां युद्ध केलें पूर्वी अद्‌भुत ॥ तें मज दावीं क्षणभरीं ॥ ९१ ॥
तूं जुनाट झुंजार म्हणविसी ॥ ऊठ विद्या दावीं कैशी ॥
लाज सोडून रणीं रडसी ॥ दुजया लाविसी दूषणें ॥ ९२ ॥
मग उठोन सुभद्रापती ॥ सत्वर चढला आपुले रथीं ॥
मेघधारा वर्षती ॥ तैसे सायक सोडिले ॥ ९३ ॥
सर्वांगीं खिळिला बभ्रुवाहन ॥ पृतना संहारिली संपूर्ण ॥
शिरें आकाशपंथे उडोन ॥ मणिपुरामाजी पडती ॥ ९४ ॥
आकाश व्यापिलें बाणीं ॥ धुळी न माये दिशांचे वदनीं ॥
पार्थे वीर पाडिले धरणीं ॥ लेख त्यांचा न करवे ॥ ९५ ॥
दोन्ही हातांचें समसंधान ॥ अलातचक्रवत् दिसे सायकासन ॥
टाकूनियां वज्रबाण ॥ कोट पाडिला मणिपुराचा ॥ ९६ ॥
गोपुरें खळखळा रिचवती ॥ ग्राम सांडून स्त्रिया पळती ॥
बभ्रुवाहन भावी चित्तीं ॥ धन्य क्षितीं किरीटी वीर ॥ ९७ ॥
यावरी बभ्रुवाहन ॥ सोडी लक्षांचे लक्ष बाण ॥
छत्र पाडिलें छेदून ॥ रथ उडविला निराळीं ॥ ९८ ॥
हनुमंतासमवेत रथ ॥ आकाशपंथें असे भ्रमत ॥
मग खालीं उतरोनि पार्थ ॥ शस्त्रें सोडी बहुतचि ॥ ९९ ॥
एक काळ एक कृतांत ॥ समरीं तैसे दोघे दिसत ॥
पार्थ तो आपुला सुत ॥ शरपंथीं खिळियेला ॥ १०० ॥
एक रमारमण एक उमारमण ॥ एक शीतकर एक उष्णकिरण ॥
तो बोले बभ्रुवाहन ॥ अति तीक्ष्ण तेधवां ॥ १०१ ॥
म्हणे माझे मातेस ठेविलें दूषण ॥ पापिया तुझें न पहावें वदन ॥
त्वां पूर्वी कुलक्षय करून ॥ आप्त गोत्रज मारिले ॥ १०२ ॥
तूं करीं आतां कृष्णस्मरण ॥ तुझें शिर टाकितों छेदून ॥
तूं अधर्में मारिला कर्ण ॥ रथचक्र उपटितां ॥ १०३ ॥
पहा बंधु माझा वृषकेत ॥ बाळे केवढा केला पुरूषार्थ ॥
तो गंगेच्या शापें पार्थ ॥ मोह पावला रणांगणीं ॥ १०४ ॥
बभ्रुवाहनें सोडिला अर्धचंद्र शर ॥ उडविलें पार्थाचें शिर ॥
ज्वाला बाणजाळीं साचार ॥ नीलध्वजाची दारा जे ॥ १०५ ॥
पार्थ पडतां रणीं ॥ थरथरां कांपली कुंभिनी ॥
वृषकेताच्या शिराजवळी ते क्षणीं ॥ शिर पडलें पार्थाचें ॥ १०६ ॥
किरीटकुंडलें मंडित ॥ चंद्रसूर्यांऐशीं शिरें दिसत ॥
बभ्रुवाहन जयवंत ॥ वाद्यें वाजवित परतला ॥ १०७ ॥
परम उत्साह करित ॥ प्रवेशला मणिपुरांत ॥
उलूपी चित्रांगीस मात ॥ वर्तली ते सर्व श्रुत करी ॥ १०८ ॥
दोघींनीं काढिले अलंकार ॥ शिरें भूमीवरी टाकिती सत्वर ॥
आठवूनि पार्थ वीर ॥ दीर्घ हांका फोडिती ॥ १०९ ॥
अहा कृष्णा श्रीकृष्णमित्रा ॥ अहा कृष्णा कोमलगात्रा ॥
तूं अनिवार ब्रह्मादिशक्रां ॥ आज कैसा रणीं पडिलासी ॥ ११० ॥
गोग्रहणींचा पुरुषार्थ ॥ एकट्याने कौरव जिकिले समस्त ॥
निवातकवच दैत्य ॥ त्यांचा अंत केला तुंवा ॥ १११ ॥
तुझा सारथि इंदिरावरा ॥ ध्वजीं बुभुःकारे महारुद्र ॥
अकरा अक्षौहिणी दळ समग्र ॥ तुवां आटिलें रणांगणीं ॥ ११२ ॥
अहा महाराज सुभद्रापती ॥ ब्रह्मांडभरी तुझी कीर्ती ॥
सर्व सोडून रणक्षितीं ॥ शयन केलें कैसें तुवां ॥ ११३ ॥
खद्योतें पाडिला गभस्ती ॥ तंदुळभारें मेला हस्ती ॥
कल्पांतींचे सौदामिनीप्रती ॥ शलभें कैसें गिळियेलें ॥ ११४ ॥
मशकें केवि गिळिला पर्वत ॥ मुंगीने प्राशिला सरितानाथ ॥
चित्रींच्या सर्पें अकस्मात ॥ अरुणानुज केवि गिळियेला ॥ ११५ ॥
मक्षिकेनें पक्षवातेंकरूनि ॥ केवि विझविला दावाग्नि ॥
भोगींद्रासी आणूनि ॥ मंडूकें केवि भक्षिलें ॥ ११६ ॥
मातेचा कोलाहल ऐकून ॥ धांवोन आला बभ्रुवाहन ॥
तो मंगळसूत्रे तोडून ॥ अलंकार सर्व काढिले ॥ ११७ ॥
जाहला तो सांगितला वृत्तांत ॥ माझा अन्याय सांगें येथ ॥
तुज दूषण ठेवून लात ॥ मज मारिली पितयानें ॥ ११८ ॥
तंव त्या बोलती ते समयीं ॥ अरे पितृघातक्या परता होई ॥
धिक् पुरुषार्थ तुझा सर्वही ॥ वदन न दावीं काळमुख्या ॥ ११९ ॥
बभ्रुवाहन म्हणे साचार ॥ माता हो घ्या तुम्ही अलंकार ॥
तंव त्या म्हणती खदिरांगार ॥ लेववीं आतां यावरी ॥ १२० ॥
अरे आमुचा पति पडला रणीं ॥ आम्हांस नेई तये स्थानीं ॥
मग दोघी येऊनि रणांगणीं ॥ प्रेत कवळूनि शोक करिती ॥ १२१ ॥
पार्थाचिये चरणीं ॥ शिरें ठेवूनि बोलती वाणी ॥
हे नाथ ऊठ ये क्षणीं ॥ टाकूनियां आम्हां जासी कां ॥ १२२ ॥
ऊठ राया यंत्र भेदीं बाणीं ॥ ऊठ द्रुपदा आणीं धरूनी ॥
गायी नेल्या कौरवांनीं ॥ रथीं बैसोन धावे कां ॥ १२३ ॥
गंधर्वी नेले बंधू समस्त ॥ सोडवीं लौकरी धांव त्वरित ॥
अरे बभ्रुवाहना तूं नांव केलें अद्‌भुत ॥ पितृघात करूनियां ॥ १२४ ॥
परशुरामें वधिली माता ॥ तुवां केलें दोघांचिया घाता ॥
अरे तूं यज्ञघातकर्ता ॥ नष्टा पतित पितृघ्ना ॥ १२५ ॥
आतां द्रौपदी आणि चौघे सहोदर ॥ प्राण देतील ऐकतां समाचार ॥
मातेचा खेद देखोन अपार ॥ पार्थकुमार गहिंवरला ॥ १२६ ॥
मज उभयलोक अंतरले ॥ माझें जन्म व्यर्थ गेलें ॥
तो उलूपी म्हणे ते वेळे ॥ उपाय एक येथें असे ॥ १२७ ॥
माझा पिता सहस्रवदन ॥ अमृतसंजीवनमणि पूर्ण ॥
त्यापाशी आहे तो आणून ॥ पार्थवृषकेतां जीववावे ॥ १२८ ॥
परी सर्प तेथें अनिवार ॥ कठिण कार्य असे फार ॥
कुंती आली नाहीं जो सत्वर ॥ आधीं साधीं कार्य हें ॥ १२९ ॥
हिमनगजामातें तो मणी ॥ दिधला असे सर्पांलागूनी ॥
सर्प पडती जे मरोनी ॥ स्पर्शतां मणि उठती ते ॥ १३० ॥
मग बभ्रुवाहन बोलत ॥ यांचीं शरीरें रक्षा शिरांसहित ॥
उलूपी म्हणे पुत्रा तेथ ॥ तुज प्रवेश कदा नव्हे ॥ १३१ ॥
सर्प घेतील तुझा प्राण ॥ तरी मी करितें कांहीं यत्‍न ॥
मग पुंडरीकनामा सर्प तेथून ॥ उलूपी पाठवी तयातें ॥ १३२ ॥
आपुलें मंगलसूत्र गेलें तुटोन ॥ हें दाखवीं जनकासी नेऊन ॥
मग तो पुंडरीक निघाला तेथून ॥ शेषमदिरीं पातला ॥ १३३ ॥
तो पाहतां पातालभुवन ॥ वाटे अमरपद न्यून ॥
रत्‍नमय सर्व पाषाण ॥ भूमि संपूर्ण कनकाची ॥ १३४ ॥
नानावृक्षीं समानत्व ॥ जेथें हाटकेश्वर मुख्य दैवत ॥
हाटकनदी सदा वाहत ॥ प्रकाशे तेथें शेषमणि ॥ १३५ ॥
तेथें सूर्याचे नाहीं किरण ॥ सहस्त्रयोजनें विस्तीर्ण ॥
असो तो पुंडरीक वर्तमान ॥ भोगींद्राप्रति सांगत ॥ १३६ ॥
कन्येचे कंठसूत्र तुटलें ॥ तें शेषानें दृष्टीनें पाहिले ॥
सभेसी सर्व सर्प बैसले ॥ श्रुत जाहलें वर्तमान ॥ १३७ ॥
मणि द्यावया सहस्रवदन ॥ सिद्ध जाहला हें जाणोन ॥
धृतराष्ट्रनामा सर्प वचन ॥ क्रोधेंकरून बोलत ॥ १३८ ॥
अमृतमणि मृत्युलोकास ॥ गेलिया गेलें सर्व यश ॥
मागुती मणि आम्हांस ॥ सहसा न मिळेचि ॥ १३९ ॥
जरी गरुडें नेला हिरोन ॥ तरी मग कैसें वर्तमान ॥
मातंगऋषीच्या शापेकरून ॥ गरुड नये पाताळा ॥ १४० ॥
आणि मनुष्य गर्विष्ठ होती ॥ ते आम्हांस कदा न मानिती ॥
आमुचे मस्तकींचे मणि हिरोन नेती ॥ ललना करिती कंठहार ॥ १४१ ॥
मग आम्हांस घेऊन भिकारी ॥ भीक मागती दारोदारीं ॥
शेष म्हणे कोपेल मुरारी ॥ मणि न देतां तत्त्वतां ॥ १४२ ॥
परमप्रतापी स्वामी श्रीधर ॥ कालिया मर्दून वधिला अघासुर ॥
तरी मणिवर देऊन इंदिरावर ॥ तोषवून मित्र करावा ॥ १४३ ॥
तो धृतराष्ट्र बोले वचन ॥ कृष्णचि त्यास देईल प्राणदान ॥
परी मणि न देऊं गेलिया प्राण ॥ सत्य जाण भोगींद्रा ॥ १४४ ॥
मग नकुळाहातीं जाणा ॥ शेष सांगून पाठवी बभ्रुवाहना ॥
मी मणि देतों परि येथें विघ्ना ॥ सर्प सर्व करिताती ॥ १४५ ॥
तो पुंडरीक सर्प येऊन ॥ बोले उलूपीचित्रांगीलागून ॥
तुम्ही सुखें आतां द्या अग्न ॥ मणि कदा येत नाहीं ॥ १४६ ॥
यावरी तो बभ्रुवाहन ॥ क्षोभला जैसा प्रलयकृशान ॥
बाणाच्या गळां पत्र बांधोन ॥ पातालभवना पाठविला ॥ १४७ ॥
सर्प पत्र पाहती उकलोन ॥ लिहिलें मणि द्यावा पाठवून ॥
नाहीं तरी तुम्हांस संहारीन ॥ करीन सर्वस्वें निर्वंश ॥ १४८ ॥
शेष म्हणे सर्प हो अवधारा ॥ आतां बभ्रुवाहनाशीं युद्ध करा ॥
अरे धृतराष्ट्रा पामरा ॥ वंशक्षय मांडिला तुवां ॥ १४९ ॥
मग सर्पभार सिद्ध जाहले ॥ रथगजअश्वावरी आरूढले ॥
विवरमार्गे पृथ्वीवरी आले ॥ युद्ध मांडले सबळ तेथें ॥ १५० ॥
आकाशीं सधन मंडले ॥ तेवि दाटलीं चहूंकडे सर्पकुळें ॥
बभ्रुवाहनाचें कटक वेढिलें ॥ संहारिलें बहुसाल ॥ १५१ ॥
भांडत धृतराष्ट्र विखार ॥ सेना संहारिली एकवीस सहस्त्र ॥
मग श्वेतवाहनपुत्र ॥ छेदीत विखार ऊठिला ॥ १५२ ॥
तडतडां तुटती तेथें फणी ॥ नक्षत्रांऐसे रिचवती मणी ॥
मग अस्त्रे चहूंकडूनी ॥ मयूर गरुड नकुळादि ॥ १५३ ॥
मधुमेघ सोडून अमूप ॥ आधीं न्हाणिले सर्व सर्प ॥
यावरी तीक्ष्ण तेजोरूप ॥ पिपीलिकास्त्र सोडिलें ॥ १५४ ॥
तडतडां पिलीलिका तोडिती ॥ मयूर नकुळ खंडून भक्षिती ॥
त्यांत गरुड संहारिती ॥ चडफडती सर्व सर्प ॥ १५५ ॥
बभ्रुवाहनाचे चरण ॥ सर्प धरिती धांवोन ॥
कित्येक शेषास जाऊन ॥ वर्तमान सांगती ॥ १५६ ॥
शेष गदगदां हांसत ॥ आतां कां रे पळता भयभीत ॥
मग अमृतमणि पाठवित ॥ वरी उचित छत्रकुंडलें ॥ १५७ ॥
शेष स्वयें येऊन ॥ बभ्रुवाहनाचें करी समाधान ॥
मणि दिधला देखोन ॥ धृतराष्ट्र सर्प चडफडे ॥ १५८ ॥
आपुल्या पुत्रांस सांगे बुद्धी ॥ नामें तयांची दुःस्वभाव दुर्बुद्धी ॥
म्हणे पार्थवृषकेतांचीं शिरें आधीं ॥ बकदाल्भ्यवनीं लपवावीं ॥ १५९ ॥
ते गुप्तरूपें शिरें घेऊनी ॥ लपविती तत्काळ थोर वनीं ॥
उलूपी चित्रांगी दोघी जणी ॥ हाहाकार करिती तेव्हां ॥ १६० ॥
शिरें नेलीं जाणोन ॥ दुःखें रडे बभ्रुवाहन ॥
म्हणे नासले कार्य संपूर्ण ॥ केले प्रयत्न व्यर्थ गेले ॥ १६१ ॥
इकडे कुंतीनें देखिलें स्वप्न ॥ पार्थ वृषकेत तेल लावून ॥
उष्ट्रावरी बैसोन ॥ दक्षिणदिशेप्रति गेले ॥ १६२ ॥
कुंतीनें हरीपाशीं सांगतां स्वप्न ॥ त्यावरी बोले जगज्जीवन ॥
वृषकेत आणि अर्जुन ॥ मृत्यु पावले निःसंशय ॥ १६३ ॥
मग गरुडारूढ होऊन श्रीधर ॥ सवें कुंती आणि वृकोदर ॥
देवकी यशोदा सुंदर ॥ वहनीं बैसोनि चालिल्या ॥ १६४ ॥
निमेष न लागतां ते काळीं ॥ येतीं जाहलीं मणिपुराजवळी ॥
चित्रांगी उलूपी देखिली ॥ हांक जाहली एकचि ॥ १६५ ॥
अर्जुनाचे शिबिर भणभणित ॥ त्यास दहासहस्त्र स्तंभ जडित ॥
तैसेचि कळस झळकत ॥ भगणांस हिणाविती ॥ १६६ ॥
पार्थास हृदयीं धरून ॥ शोक करी जगन्मोहन ॥
आल्या समयाचा भाव पूर्ण ॥ पद्यजजनक दाखवित ॥ १६७ ॥
वृषकेतास हृदयीं धरून ॥ कुंती शोकार्णवीं निमग्न ॥
बभ्रुवाहन दीनवदन ॥ धरी चरण वृकोदराचे ॥ १६८ ॥
म्हणे म्यां केलें पितृहनन ॥ मजवरी गदा घालीं उचलोन ॥
म्यां मणि आणिला प्रयत्‍नेंकरून ॥ शिरें नेलीं कोणीं न कळेचि ॥ १६९ ॥
म्हणे परमात्म्या विश्वंभरा ॥ सुदर्शनें छेदीं माझिया शिरा ॥
मजकडे न पाहें कुंती मुरहरा ॥ दुःख म्यां दिधलें सकळांसी ॥ १७० ॥
शेष म्हणे चक्रपाणी ॥ म्यां मणि दिधला आणूनी ॥
परी शिरें लपविलीं दुर्जनीं ॥ मज न कळे कोठे तीं ॥ १७१ ॥
मग बोले शेषशयन ॥ मी बालब्रह्मचारी असेन ॥
तरी दोघे दुर्जन मरोन ॥ शिरें येती आपणचि ॥ १७२ ॥
तो बकदाल्भ्यवनीं ॥ दोघे सर्प पडले मरोनी ॥
आकाशपंथे शिरें येऊनी ॥ कृष्णाजवळी पडिलीं ॥ १७३ ॥
आपल्या हातेंकरून ॥ मणि स्पर्शवी जगज्जीवन ॥
आधीं वृषकेत उठवून ॥ सवेंचि पार्थ उठविला ॥ १७४ ॥
दोघे करिती कृष्णस्मरणा ॥ म्हणती उभा रे उभा बभ्रुवाहना ॥
यावरी वैकुंठींचा राणा ॥ आलिंगित दोघांतें ॥ १७५ ॥
कुंती भीम सर्व धांवोन ॥ आलिंगिती वृषकेत अर्जुन ॥
सुमनें वर्षती सुरगण ॥ जयजयकार प्रवर्तला ॥ १७६ ॥
मग मणिस्पर्शेंकरून ॥ अवघेच उठविलें सैन्य ॥
जेविं हनुमंतें सौमित्रालागी द्रोणाद्रि आणून ॥ वानरसैन्य उठविलें ॥ १७७ ॥
जैसे वराचे प्रसंगेकरूनी ॥ वर्‍हाडी पावती लुगडीं लेणीं ॥
तैशी पार्थानिमित्त वाहिनी ॥ उठविली सर्व तेधवां ॥ १७८ ॥
बभ्रुवाहनास कुंती ॥ हृदयीं धरून जाहली आलिंगिती ॥
यावरी मणिपुरांत प्रवेशती ॥ सभेस बैसती सर्वही ॥ १७९ ॥
श्रीकृष्ण म्हणे धनंजया ॥ पूर्वस्मरण करूनियां ॥
पुत्र आला घे राया ॥ आलिंगी आतां तो ॥ १८० ॥
सूर्य कोपला किरणांवरी ॥ समुद्र लहरींशीं दावा करी ॥
अमृत मधुरता बाहेरी ॥ आपली घालूं इच्छितसे ॥ १८१ ॥
आपल्या शाखांशी अबोला ॥ कल्पवृक्षें जेविं धरिला ॥
चंद्रे कलांचा त्याग केला ॥ मेरु कोपला शिखरांवरी ॥ १८२ ॥
बभ्रुवाहन खालीं पाहतो ॥ प्राण आतां त्यागूं इच्छितो ॥
महावीर हातींचा जातो ॥ हृदयीं त्यास आलिंगीं ॥ १८३ ॥
भीम हांसोनि बोलिला ॥ धर्मन्यायें तो येथें झुंजला ॥
आणि श्रीरंग पाहतां डोळा ॥ सर्वही पापें दूर गेलीं ॥ १८४ ॥
आम्ही आपले वडील मारून ॥ श्रीकृष्णकृपेनें जाहलों पावन ॥
मग बभ्रुवाहन आणि अर्जुन ॥ कृष्णें धरून भेटविले ॥ १८५ ॥
पांच दिवस राहिले तेथ ॥ उत्साह जाहला अत्यद्भुत ॥
अलंकार वस्त्रें सर्वांस देत ॥ शेष जात स्वस्थळा ॥ १८६ ॥
उलूपी चित्रांगी दोघी जणी ॥ सर्व संपत्ति धनधान्य घेऊनी ॥
चालिल्या गजपुरालागूनी ॥ आपुलिया स्वधामा ॥ १८७ ॥
यशोदा देवकी कुंती ॥ भीमासमवेत गजपुराप्रती ॥
ब्रह्मानंदें तेव्हां जाती ॥ नाहीं मिति सुखातें ॥ १८८ ॥
पुढें जाणोन कठिण ॥ पार्थासवें गेला जगज्जीवन ॥
रसाळ कथा करितां श्रवण ॥ चिंता दारुण दूर होय ॥ १८९ ॥
हें बभ्रुवाहनाचें आख्यान ॥ शत्रुनाशक पुण्यपरायण ॥
आणि होय आयुष्यवर्धन ॥ श्रवण पठण करितांचि ॥ १९० ॥
आणि सर्पभय कदाही ॥ सर्वथा नोहे त्याचे गृहीं ॥
ऐशी ही फळश्रुति पाहीं ॥ जैमिनिभाषित सत्य पैं ॥ १९१ ॥
पांडुरंगपुरविलासिया ॥ ब्रह्मानंदा यतिवर्या ॥
श्रीधरवरदा पंढरीराया ॥ कथा सुरस बोलवीं पुढें ॥ १९२ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ अश्वमेध जैमिनिकृत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ साठाव्यांत कथियेला ॥ १९३ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे अश्वमेधपर्वणि षष्टितमोऽध्यायः ॥ ६० ॥
अध्याय साठावा समाप्त


GO TOP