समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण    
स्कंध ३ रा - अध्याय ३ रा  
भगवंताच्या लीलांचे वर्णन -   
उद्धवजी म्हणाले -  
( इंद्रवज्रा ) 
माता-पित्यासी सुख द्यावयाला 
    आले मथूरीं बलदेव कृष्ण । 
सिंहासनीचा उचलोनि कंस 
    मारोनिया आपटिला धरेसी ॥ १ ॥ 
( अनुष्टुप् ) 
मुखे सांदिपनीच्या ते ऐकता वेद जाणिले । 
केला जिवंत तो पुत्र दक्षिणा द्यावयास त्या ॥ २ ॥ 
( इंद्रवज्रा ) 
रुक्मीणिच्या बोलविण्या प्रमाणे  
    तेणे वराया हरुनीच नेले । 
गरूड नेई कलशो सुधेचा 
    तैसी तियेला हरिनी वरीली ॥ ३ ॥ 
स्वयंवरी सात नथीविना जे 
    बैलास त्या वेसणि घातियेले । 
मारून शत्रूस तिथोनि कांही  
    सत्या तदा ती वरिली सुखानें ॥ ४ ॥ 
ती सत्यभामा करण्या प्रसन्न 
    स्वर्गा तुनी कल्पवृक्षासी आणी । 
इंद्रे तदा आक्रमणोहि केले । 
कांकी स्त्रियांचाचशिकार तो की ॥ ५ ॥ 
भौमासुरा कृष्ण वधी तदा ती 
    पृथ्वी तया प्रार्थित झाली तैसी । 
जे राज्य ते त्या भगदत्त याला 
    देवोनि केले सुखि त्या प्रजेला ॥ ६ ॥ 
ज्या राजकन्या हरिल्या असूरे 
    हा दीनबंधू बघता हरी त्या । 
प्रेमे नि लाजे चुर जाहल्या नी 
    दृष्टीकटाक्षे वरिले हरीला ॥ ७ ॥ 
( अनुष्टुप् ) 
भगवान योगमायेने पत्न्यानूसार तेवढी । 
धारिता जाहला रूपे मुहूर्ती लग्न लाविले ॥ ८ ॥ 
दावुनी आपुली लीला प्रत्येकीच्या कुशीत ते । 
दश् दशो जन्मिले पुत्र आपुल्या सम देखणे ॥ ९ ॥ 
काल मागध शाल्वांनी द्वारकापुरि घेरिता । 
स्वजना शक्तिदेवोनी शत्रुला ठार मारिले ॥ १० ॥ 
शंबरा द्विविदा मूरा बल्वला दंतवक्रला । 
बाणासुरास मारी तो स्वयं वा दुसर्या करें ॥ ११ ॥ 
पांडवी पक्ष घेवोनी भारभूत असे नर । 
उभयी पक्षिचे त्याने मारोनी भार हारिला ॥ १२ ॥ 
( इंद्रवज्रा ) 
त्या कर्ण दुःशासन नी शकूनी 
    मंत्री ययांची आयु नष्ट होता । 
भीमी गदेने जरि टांग जाता 
    मेला कुणी तो नच त्यास दुःख ॥ १३ ॥ 
"संहार झाला जरि खूप मोठा 
    भीष्मार्जुनो आणि भीमा कडोनी । 
प्रद्युम्न आदी कडुनीही दुष्ट 
    मेले तरी बाकि " करी विचार ॥ १४ ॥ 
प्राशोनि दारू मग लाल नेत्रे 
    आप्तात तेही लढतील नाशा । 
यांच्या विना ना दुसरा उपाय  
    संकल्प होताचि निघेन धामा ॥ १५ ॥ 
( अनुष्टुप् ) 
असे चिंतोनि कृष्णने धर्माते अभिषेकिले । 
सर्व संबधिता मोदे सन्माग हर्षतो दिला ॥ १६ ॥ 
पुंबीजे अभिमन्यूच्या उत्तरागर्भ राहिला । 
ब्रह्मास्त्रे मरता तोही कृष्णाने वाचवीयला ॥ १७ ॥ 
अश्वमेध असे तीन केले धर्मा कडोनिया । 
कृष्णभक्ते सवे बंधू आनंदे रक्षिली धरा ॥ १८ ॥ 
भगवान् जरि विश्वात्मा लोकाना वेद दाविता । 
द्वारकीं भोगतो भोग निष्काम सांख्य स्थापुनी ॥ १९ ॥ 
मधूर हासणे आणि स्नेहाळ पाहणे तसे । 
अमृतमय ती वाणी सौंदर्ये व्यापले जग ॥ २० ॥ 
यादवा दिधले सौख्य प्रियांना रजनी सुख । 
यथोचित विहाराने सर्वांना सुखची दिले ॥ २१ ॥ 
अनेक वर्षही त्याने गृहस्थाश्रम भोगिला । 
भोगिता भोग सामग्री वैराग्य धारिले तये ॥ २२ ॥ 
"भोगसामग्रि या सार्या ईश्वराधीन जीव हा" 
वैराग्य बोलता ऐसे भक्तांनी काया मानणे ॥ २३ ॥ 
यदु नी भोजवंशीच्या मुलांनी खेळता ऋषि । 
छेडिता "कुळिचा नाश" होईल ऋषि बोलले ॥ २४ 
कांही मास पुढे तेंव्हा वृष्णि भोज नि यादव । 
हर्षाने रथि बैसोनी प्रभास क्षेत्री पातले ॥ २५ ॥ 
तीर्थी स्नान करोनीया पितृ देव ऋषीस ही । 
तर्पिले दिधल्या गाई ब्राह्मणा दक्षिणा दिली ॥ २६ ॥ 
सोने आणीक शय्यादी मृगचर्म नि वस्त्रही । 
कांबळे पालख्या हत्ती रथ कन्या भुमी तशी ॥ २७ ॥ 
जीवितार्थ असे दान अन्नादी ब्राह्मणा दिले । 
ज्यांचे प्राण द्विज गाई त्यांनी पृथ्वीस वंदिले ॥ २८ ॥ 
 
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।  
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तिसरा अध्याय हा ॥ ३ ॥ ३ ॥ 
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ 
  
GO TOP 
  
 |