श्रीमद् भागवत पुराण
स्कन्द दहावा
अध्याय अठ्ठ्याऐंशीवा

शिवाच्युतयोः स्वभाववैलक्षण्यं बटुरूपेण विष्णुना शम्भोर्वृकासुरभयाद् रक्षणं च -

शिवांचे संकटमोचन -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीराजोवाच -
( अनुष्टुप् )
देवासुरमनुष्येसु ये भजन्त्यशिवं शिवम् ।
प्रायस्ते धनिनो भोजा न तु लक्ष्म्याः पतिं हरिम् ॥ १ ॥
राजा परीक्षिताने विचारले -
( अनुष्टुप् )
शंकरे त्यागिले भोग परी दैत्य नि माणसे ।
देवता भजता त्याला सुख वैभव भोगिती ।
लक्ष्मीपतीस भजता सुख भोग न लाभती ॥ १ ॥

देवासुरमनुष्येषु - देव, दैत्य व मनुष्य ह्यांमधील - ये - जे कोणी - अशिवं शिवं भजन्ति - अमंगळ शंकराला भजतात - ते प्रायः धनिनः भोजाः (भवन्ति) - ते बहुधा श्रीमंत व विषयभोग भोगणारेच होतात - (ये) तु लक्ष्म्याः पतिं हरिम् (भजन्ति ते) न - पण जे लक्ष्मीपति श्रीहरीला भजतात ते तसे होत नाहीत. ॥१॥
राजाने म्हटले- सर्व भोगांचा त्याग केलेल्या शंकरांना जे देव, असुर किंवा मनुष्य भजतात ,ते बहुतेक धनसंपन्न होतात, पण लक्ष्मीपती विष्णूंची उपासना करणारे मात्र साधारणत: तसे नसतात. (१)


एतद् वेदितुमिच्छामः सन्देहोऽत्र महान् हि नः ।
विरुद्धशीलयोः प्रभ्वोः विरुद्धा भजतां गतिः ॥ २ ॥
स्वभाव वेगळा त्यांचा उलटे भक्तिचे फळ ।
लाभते, संशयो मोठा, कृपया जाणु इच्छितो ॥ २ ॥

विरुद्धशीलयोः प्रभ्वोः - विरुद्ध स्वभावांच्या समर्थ अशा देवतांचे - भजतां गतिः - सेवन करणार्‍यांची गति - विरुद्धा - विरुद्ध असते - हि - म्हणून - अत्र - ह्या बाबतीत - नः महान् संदेहः (अस्ति) - आम्हाला मोठा संशय आहे - एतत् वेदितुं इच्छामः - हे आम्हाला जाणण्याची इच्छा आहे ॥२॥
दोन्ही प्रभू एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाचे आहेत. परंतु त्यांच्या उपासकांना त्यांच्या स्वरूपाच्या विपरीत असे फळ मिळते. याविषयी माझ्या मनात मोठा संदेह आहे. मी आपल्याकडून याचे कारण जाणून घेऊ इच्छितो. (२)


श्रीशुक उवाच -
शिवः शक्तियुतः शश्वत् त्रिलिङ्गो गुणसंवृतः ।
वैकारिकस्तैजसश्च तामसश्चेत्यहं त्रिधा ॥ ३ ॥
अह्री शुकदेव म्हणाले -
शक्तियुक्त शिवो तैसे अहंकाराधिदैवत ।
वैकारिक तसे तैजस् तामसो भेद हे त्रय ॥ ३ ॥

शिवः - शंकर - शश्वत् शक्तियुक्तः - प्रकृतिरूपी शक्तीने युक्त - त्रिलिङ्गः - तीन लिंगांनी युक्त - गुणसंवृतः - गुणांनी वेष्टिलेला - वैकारिकः तैजसः च तामसः च इति त्रिधा अहं (अस्ति) - सात्त्विक व राजस आणि तामस असा जो तीन प्रकारचा अहंकार त्या अहंकारस्वरुपाचा आहे ॥३॥
श्रीशुक म्हणतात- शिव नेहमी आपल्या शक्तीने युक्त असतात. ते सत्त्वादी गुणांनी युक्त असून अहंकाराचे अधिष्ठाते आहेत. वैकारिक, तैजस आणि तामस असे अहंकाराचे तीन भेद आहेत. (३)


ततो विकारा अभवन् षोडशामीषु कञ्चन ।
उपधावन् विभूतीनां सर्वासामश्नुते गतिम् ॥ ४ ॥
अहंकारे तसे सोळा विकार घडती पुढे ।
एकाही त्या विकाराने भजता भोग लाभती ॥ ४ ॥

ततः षोडश विकारा अभवन् - त्या अहंकारापासून सोळा कार्यरूपी विकार झाले - अमीषु कंचन उपधावन् - या विकारांतील कोणा एकाची उपासना करणारा - सर्वासा विभूतीना गतिं अश्‍नुते - सर्व ऐश्वर्याचे स्थान भोगतो ॥४॥
या त्रिविध अहंकारापासून दहा इंद्रिये, पंचमहाभूते आणि एक मन असे सोळा पदर्थ उत्पन्न झाले. म्हणून या सर्वांच्या अधिष्ठात्या देवतांपैकी कोणाचीही उपासना केल्यावर त्या देवतेनुरूप ऐश्वर्याची प्राप्ती होते. (४)


हरिर्हि निर्गुणः साक्षात्पुत् पुरुषः प्रकृतेः परः ।
स सर्वदृग् उपद्रष्टा तं भजन्निर्गुणो भवेत् ॥ ५ ॥
हरि तो निर्गुणी साक्षात् पुरुषो प्रकृतीपरा ।
सर्वज्ञ साक्षि तो एक भजता निर्गुणो मिळे ॥ ५ ॥

हरिः हि निर्गुणः - श्रीकृष्ण तर निर्गुण - साक्षात् प्रकृतेः परः पुरुषः - प्रत्यक्ष मायेच्याहि पलीकडे असणारा पुरुष होय - सः सर्वदृक् उपद्रष्टा - तो सर्वांकडे पहाणारा व उपदेश करणारा आहे - तं भजन् निर्गुणः भवेत् - त्या श्रीकृष्णाचे भजन करणारा पुरुष निर्गुण होतो ॥५॥
परंतु श्रीहरी प्रकृतीपलीकडील स्वत: पुरुषोत्तम असून प्राकृत गुणरहित आहेत. ते सर्वज्ञ व सर्वांच्या अंत:करणाचे साक्षी आहेत. जो त्यांचे भजन करतो, तो स्वत:सुद्धा गुणातीत होतो. (५)


निवृत्तेष्वश्वमेधेषु राजा युष्मत्पितामहः ।
श्रृणन् भगवतो धर्मान् अपृच्छद् इदमच्युतम् ॥ ६ ॥
संपता अश्वमेधो तो ऐकता धर्मभाष्य ते ।
पुसला हाहि तै प्रश्न भगवंतासि तेधवा ॥ ६ ॥

युष्मत्पितामहः राजा - तुमचा आजोबा धर्मराजा - अश्वमेधेषु निवृत्तेषु - अश्वमेध यज्ञ समाप्त झाले असता - भगवतः धर्मान् श्रृण्वन् - श्रीकृष्णापासून धर्म श्रवण करण्याकरिता - इदं अच्युतं अपृच्छत् - हे श्रीकृष्णाला विचारता झाला ॥६॥
तुझे अजोबा धर्मराज युधिष्ठिर यांनी, अश्वमेध यज्ञ पूर्ण झाल्यावर, भगवंतांकडून विविध प्रकारच्या धर्मांचे वर्णन ऐकतेवेळी हाच प्रश्न विचारला होता. (६)


स आह भगवांस्तस्मै प्रीतः शुश्रूषवे प्रभुः ।
नृणां निःश्रेयसार्थाय योऽवतीर्णो यदोः कुले ॥ ७ ॥
समर्थ भगवान् कृष्ण कल्याणा अवतारले ।
धर्माची ऐकुनी शंका प्रसन्ने कृष्ण बोलले ॥ ७ ॥

यः - जो - नृणां निःश्रेयसार्थाय - मनुष्यांच्या कल्याणासाठी - यदोः कुले अवतीर्णः - यदुवंशात उत्पन्न झाला - सः भगवान् प्रभुः - तो भगवान श्रीकृष्ण - प्रीतः - प्रसन्न झालेला - शुश्रूषवे तस्मै आह - ऐकू इच्छिणार्‍या त्या धर्मराजाला म्हणाला ॥७॥
जे मनुष्यमात्रांच्या कल्याणासाठी यदुवंधांमध्ये अवतरले होते, त्या भगवंतांनी युधिष्ठिरांची ऐकण्याची इच्छा पाहून संतुष्ट होऊन असे उत्तर दिले होते. (७)


श्रीभगवानुवाच -
यस्याहं अनुगृह्णामि हरिष्ये तद्धनं शनैः ।
ततोऽधनं त्यजन्त्यस्य स्वजना दुःखदुःखितम् ॥ ८ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले -
ज्याला मी पावतो राजा त्याचे धन हिरावितो ।
न दुःख जाण ते त्याचे संबंधी तोडिती तया ॥ ८ ॥

अहं यस्य अनुगृह्‌णामि - मी ज्याच्यावर अनुग्रह करितो - तद्धनं शनैः हरिष्ये - त्याचे द्रव्य हळूहळू हरण करितो - ततः - नंतर - अस्य स्वजनाः - त्याचेच आप्तेष्ट लोक - दुःखदुःखितं अधनं (तं) - अत्यंत दुःखाने संतप्त झालेल्या त्या दरिद्री पुरुषाला - त्यजन्ति - सोडून देतात ॥८॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले- ज्याच्यावर मी कृपा करतो, त्याचे सर्व धन मी हळू हळू काढून घेतो. तो जेव्हा निर्धन होतो, तेव्हा त्याचे बांधव दु:खाकुल झालेल्या त्याला सोडून जातात. (८)


स यदा वितथोद्योगो निर्विण्णः स्याद् धनेहया ।
मत्परैः कृतमैत्रस्य करिष्ये मदनुग्रहम् ॥ ९ ॥
पुन्हा तो धन मेळाया लागता यश मी न दे ।
होता विरक्त ते चित्त भक्ताच्या येइ आश्रया ।
अहैतुक अशी त्याला कृपा मी वर्षितो तदा ॥ ९ ॥

यदा - ज्यावेळी - धनेहया - द्रव्याच्या इच्छेने - वितथोद्योगः - व्यर्थ गेले आहेत उद्योग ज्याचे असा - सः - तो - निर्विण्णः स्यात् - दुःखी होईल - (तदा) मत्परैः कृतमैत्रस्य (तस्य) - त्या वेळी माझी उपासना करणार्‍या वैष्णवांशी मैत्री केलेल्या भक्तावर - मदनुग्रहं करिष्ये - मी आपला अनुग्रह करितो ॥९॥
मग तो धन मिळवण्यासाठी उद्योग करू लागतो, तेव्हा मी त्याचे ते प्रयत्‍नसुद्धा निष्फळ करतो. त्यामुळे तो कंटाळून माझ्या भक्तांशी मैत्री करतो, तेव्हा मी त्याच्यावर कृपा करतो. (९)


तद्‌ब्रह्म परमं सूक्ष्मं चिन्मात्रं सदनन्तकम् ।
अतो मां सुदुराराध्यं हित्वान्यात् भजते जनः ॥ १० ॥
ततस्त आशुतोषेभ्यो लब्धराज्यश्रियोद्धताः ।
मत्ताः प्रमत्ता वरदान् विस्मरन्त्यवजानते ॥ ११ ॥
सच्चिदानंद ते ब्रह्म अनंत लाभते तया ।
कठीण भक्ति ही माझी सामान्य जन ते दुज्या ।
माझ्याचि देवतारूपा भजती हेतु ठेवुनी ॥ १० ॥
त्वरीत आशुतोषाने भक्ता समृद्धि लाभते ।
माजती नी तया देवा द्वेषिती विसरोनिया ॥ ११ ॥

तत् परमं सूक्ष्मं चिन्मात्रं सत् अनन्तकम् ब्रह्म - ते श्रेष्ठ, सूक्ष्म, चैतन्यरूप, सत्स्वरूप अविनाशी असे ब्रह्म आहे - अतः - म्हणून - सुदुराराध्यं मां हित्वा - प्रसन्न करून घेण्यास कठीण अशा मला सोडून - जनः अन्यान् भजते - लोक दुसर्‍या देवतांची उपासना करितात - ततः - नंतर - ते - ते लोक - आशुतोषेभ्यः लब्धराज्याश्रियोद्धताः - लवकर संतुष्ट होणार्‍या देवतांकडून मिळालेल्या राज्यैश्वर्याने उन्मत्त झालेले असे - मत्ताः प्रमत्ताः (भूत्वा) - मदोन्मत्त व असावध होऊन - वरदान् विस्मरन्ति अवजानते (च) - वर देणार्‍या देवतांना विसरतात व त्यांचा अपमान करितात ॥१०-११॥
माझ्या कॄपेने त्याला परम सूक्ष्म, अनंत, सच्चिदानंदस्वरूप अशा परब्रह्माची प्राप्ती होते. अशा प्रकारे माझी आराधना करणे अत्यंत कठीण आहे, हे जाणून लोक मला सोडून इतर देवतांची आराधना करतात. (१०) नंतर ते लवकर प्रसन्न होणार्‍या देवतांकडून राज्य, वैभव इत्यादी मिळवून उन्मत्त होतात आणि आपल्याला वर देणार्‍या देवतेलाही विसरतात. उलट त्यांची अवहेलना करतात. (११)


श्रीशुक उवाच -
शापप्रसादयोरीशा ब्रह्मविष्णुशिवादयः ।
सद्यः शापप्रसादोऽङ्ग शिवो ब्रह्मा न चाच्युतः ॥ १२ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
प्रसाद शाप ही शक्ती तिघांची सारखी परी ।
त्वरे ते पावती दोघे त्वरे विष्णु न पावतो ॥ १२ ॥

अङ्ग - हे परीक्षित राजा - ब्रह्मविष्णुशिवादयः - ब्रह्मदेव, विष्णु व शंकर इत्यादि देव - शापप्रसादयोः ईशाः (सन्ति) - शाप देण्यास व अनुग्रह करण्यास समर्थ आहेत - शिवः - शंकर - सद्यःशापप्रसादः (अस्ति) - शाप देणे किंवा अनुग्रह करणे ह्या दोन्ही क्रिया तत्काल करणारा आहे - ब्रह्मा च (तथा एव) - ब्रह्मदेव पण तसाच होय - अच्युतः न (तथा) - विष्णु तसा नाही ॥१२॥
श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! ब्रह्मदेव, विष्णू , महादेव इत्यादी देव शाप आणि वर देण्यास समर्थ आहेत; परंतु यांपैकी महादेव आणि ब्रह्मदेव लवकर वर किंवा शाप देतात. परंतु श्रीविष्णू तसे नाहीत. (१२)


अत्र चोदाहरन्ति इमं इतिहासं पुरातनम् ।
वृकासुराय गिरिशो वरं दत्त्वाप सङ्कटम् ॥ १३ ॥
संदर्भ सांगती थोर इतिहास जुना असा ।
वृकासुरे गिरीशाला संकटी टाकले पहा ॥ १३ ॥

अत्र च - ह्याविषयीहि - पुरातनं इमं इतिहासं - प्राचीनकाळचा हा इतिहास - उदाहरन्ति - सांगतात - गिरिशः - शंकर - वृकासुराय वरं दत्त्वा - वृकासुराला वर देऊन - संकटं आप - संकटात सापडाला ॥१३॥
याविषयी हा एक प्राचीन इतिहास सांगतात. एकदा वृकासुराला वर देऊन भगवान शंकर संकटात सापडले होते. (१३)


वृको नामासुरः पुत्रः शकुनेः पथि नारदम् ।
दृष्ट्वाऽऽशुतोषं पप्रच्छ देवेषु त्रिषु दुर्मतिः ॥ १४ ॥
पुत्र तो शकुनीचा नी बुद्धिने पापिची असा ।
नारदा पुसले त्याने त्वरित कोण पावतो ॥ १४ ॥

शकुनेः पुत्रः दुर्मतिः वृकः नाम असुरः - शकुनीचा पुत्र दुष्टबुद्धि वृक नामक दैत्य - पथि नारदं दृष्ट्वा - मार्गामध्ये नारदाला पाहून - त्रिषु देवेषु आशुतोषं पप्रच्छ - तिन्ही देवांमध्ये लवकर प्रसन्न होणारा देव कोण असे विचारिता झाला ॥१४॥
वृकासुर हा शकुनीचा पुत्र होता. तो दुष्ट होता. एके दिवशी वाटेत त्याने नारदांना पाहून विचारले, " तिन्ही देवांपैकी लवकर प्रसन्न होणारे कोण ? " (१४)


स आह देवं गिरिशं उपाधावाशु सिद्ध्यसि ।
योऽल्पाभ्यां गुणदोषाभ्यां आशु तुष्यति कुप्यति ॥ १५ ॥
देवर्षि वदले त्याला शंकरा पूजिणे पहा ।
त्वरीत पावतो तैसा क्रोधतो बहु सत्वरी ॥ १५ ॥

सः आह - नारद म्हणाला - गिरिशं देवं उपाधाव - शंकराची आराधना कर - आशु सिद्ध्यसि - लवकर सिद्धीला प्राप्त होशील - यः - जो - अल्पाभ्यां गुणदोषाभ्यां - थोड्याशा गुणाने व दोषाने - आशु तुष्यति कुप्यति (च) - लवकर संतुष्ट होतो व लवकर क्रुद्धहि होतो ॥१५॥
नारद म्हणाले- तू भगवान शंकरांची आराधना कर. त्यामुळे तुझी इच्छा लवकर पूर्ण होईल. ते थोड्याशा गुणांनी चटकन प्रसन्न होतात आणि थोड्याशा अपराधाने चटकन रागावतात. (१५)


दशास्यबाणयोस्तुष्टः स्तुवतोर्वन्दिनोरिव ।
ऐश्वर्यमतुलं दत्त्वा तत आप सुसङ्कटम् ॥ १६ ॥
बाणे नी रावणे केली बंदीच्या परि ती स्तुती ।
पावता दिधले राज्य कैलासा दैत्य हालवी ॥ १६ ॥

बन्दिनोः इव स्तुवतोः - स्तुतिपाठकाप्रमाणे स्तुति करणार्‍या - दशास्यबाणयोः तुष्टः - रावण व बाणासुर ह्यांवर संतुष्ट झालेला - अतुलं ऐश्वर्यं (तौ) दत्त्वा - अलोट ऐश्वर्य रावण व बाणासुर ह्यांना देऊन - ततः सुसंकट आप - त्यामुळे अत्यंत संकटात पडला ॥१६॥
रावणाने आणि बाणासुराने भाटांप्रमाणे त्यांची थोडीशी स्तुती केली, तेव्हा ते त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना अतुलनीय ऐश्वर्य दिले. नंतर रावणाने कैलास उचलल्यामुळे आणि बाणासुराच्या नगररक्षाणाचा भार घ्यावा लागल्याने ते संकटात सापडले होते. (१६)


इत्यादिष्टस्तमसुर उपाधावत् स्वगात्रतः ।
केदार आत्मक्रव्येण जुह्वानोऽग्निमुखं हरम् ॥ १७ ॥
वृकाने ऐकता गेला केदारेश्वरि नी तिथे ।
आपुले मास तोडोनी शंकरा आहुती दिल्या ॥ १७ ॥

इति आदिष्टः असुरः - याप्रमाणे उपदेशिलेला वृकासुर - केदारे - क्षेत्रात - स्वगात्रतः आत्मक्रव्येण - आपल्या शरीरातून काढिलेल्या स्वतःच्या मांसाने - अग्निमुखं हरं जुह्वानः - अग्नि आहे मुख ज्याचे अशा शंकराला उद्देशून हवन करीत - तम् उपाधावत् - त्या शंकराची उपासना करिता झाला ॥१७॥
हे ऐकून वृकासुर केदारक्षेत्री गेला आणि अग्नीला भगवान शंकरांचे मुख समजून आपल्या शरीराचे मांस तोडून अग्नीमध्ये हवन करून त्यांची आराधना करू लागला. (१७)


देवोपलब्धिमप्राप्य निर्वेदात्सप्तमेऽहनि ।
शिरोऽवृश्चत् स्वधितिना तत्तीर्थक्लिन्नमूर्धजम् ॥ १८ ॥
सहा दिन जधी झाले न पावे शंकरो तदा ।
सातव्या दिवशी डोके अर्पिण्या शस्त्र घेतले ॥ १८ ॥

देवोपलब्धिम् अप्राप्य - श्रीशंकराची प्राप्ति न झाल्याने - निर्वेदात् - निराशेने - सप्तमे अहनि - सातव्या दिवशी - तत्तीर्थक्लिन्नमूर्धजं शिरः - त्या तीर्थातील उदकाने ज्यावरील केस ओले झाले आहेत अशा मस्तकाला - स्वधितिना अवृश्चत् - आपल्या शस्त्राने तोडू लागला ॥१८॥
अशा प्रकारे सहा दिवस उपासना करूनसुद्धा शंकरांचे दर्शन झाले नाही, तेव्हा त्याला अतिशय दु:ख झाले. सातव्या दिवशी केदारतीर्थात स्नान करून त्याने आपले केस ओले झालेले मस्तक कु-हाडीने तोडून त्याचे हवन करावे, असे ठरविले. (१८)


( वंशस्था )
तदा महाकारुणिको स धूर्जटिः
     यथा वयं चाग्निरिवोत्थितोऽनलात् ।
निगृह्य दोर्भ्यां भुजयोर्न्यवारयत्
     तत्स्पर्शनाद्‌भूय उपस्कृताकृतिः ॥ १९ ॥
( इंद्रवज्रा )
तेंव्हा महादेव धरी कराला
     अग्नी मधोनी प्रगटोनि तैसा ।
वृकासुराचे जयि अंग होते
     तसेचि झाले शिव स्पर्शिता तो ॥ १९ ॥

तदा - त्यावेळी - महाकारुणिकः - अत्यंत दयाळु - च - आणि - अग्निः इव - अग्नीसारख्या तेजस्वी - सः धूर्जटिः - तो शंकर - अनलात् उत्थितः - अग्नीतून बाहेर आलेला असा - दोर्भ्यां भुजयोः निगृह्य - आपल्या बाहूंनी त्या असुराचे बाहु धरून - यथा वयं तथा - जसे आपण निवारण करितो तसे - न्यवारयत् - निवारता झाला - वृकः - वृकासुर - तत्स्पर्शनात् - त्या शंकराच्या स्पर्शाने - भूयः - पुनः - उपस्कृताकृतिः (अभवत्) - व्यवस्थित झाले आहे शरीर ज्याचे असा झाला ॥१९॥
जगामध्ये जसा एखादा दु:खाने आत्महत्या करू लागला, तर आपण त्याला वाचवितो, त्याप्रमाणे परम दयाळू भगवान शंकरांनी अग्निदेवाप्रमाणे अग्निकुंडात प्रगट होऊन आपल्या दोन्ही हातांनी त्याचे दोन्ही हात पकडले आणि त्याला अडविले. त्यांचा स्पर्श होताच वृकासुराचे शरीर जसेच्या तसे परिपूर्ण झाले. (१९)


तमाह चाङ्गालमलं वृणीष्व मे
     यथाभिकामं वितरामि ते वरम् ।
प्रीयेय तोयेन नृणां प्रपद्यतां
     अहो त्वयात्मा भृशमर्द्यते वृथा ॥ २० ॥
नी बोलले प्रीय वृकासुरा रे
     हे थांबवावे वर माग कांही ।
मी पावतो ते जळ अर्पिताही
     वृथा कशा पीडिशि तू तनू ही ॥ २० ॥

(शंकरः) तं च आह - आणि शंकर त्या असुराला म्हणाला - अंग - हे असुरा - अलं अलं - पुरे कर, पुरे कर - मे यथाभिकामं वरं वृणीष्व - माझ्यापासून जो तुला पाहिजे असेल तो वर माग - ते वितरामि - तुला देतो - यत् - ज्याअर्थी - प्रपद्यतांन नृणां - शरण येणार्‍या मनुष्यांच्या - तोयेन प्रीयेय - पाण्यानेहि संतुष्ट होतो - अहो - अरे - त्वया आत्मा वृथा भृशं अर्द्यते - तुझ्याकडून शरीर विनाकारण अत्यंत पीडिले जाते आहे. ॥२०॥
भगवान शंकर वृकासुराला म्हणाले- वत्सा ! थांब. थांब. मी तुला पाहिजे तो वर देतो. माग. मला फक्त पाणी अर्पण केल्यानेही मी माझ्या शरणगत भक्तांवर संतुष्ट होतो. अरे ! तू विनाकारण शरीराला का कष्ट देतोस ? (२०)


( अनुष्टुप् )
देवं स वव्रे पापीयान् वरं भूतभयावहम् ।
यस्य यस्य करं शीर्ष्णि धास्ये स म्रियतामिति ॥ २१ ॥
( अनुष्टुप् )
पापी वृकासुरे तेंव्हा भयान वर घेतला ।
ठेवी मी हात ज्या डोई होवो तो भस्मची तसा ॥ २१ ॥

पापीयान् सः - पापी वृकासुर - यस्य यस्य शीर्ष्णि - ज्याच्या ज्याच्या मस्तकावर - करं धास्ये - मी हात ठेवीन - सः म्रियताम् - तो मरावा - इति भूतभयावहं वरं - असा सर्व प्राण्यांना भीती उत्पन्न करणारा वर - देवं वव्रे - देवाजवळ मागता झाला. ॥२१॥
अत्यंत पापी अशा त्याने सर्व प्राण्यांना भयभीत करणारा असा वर मागितला की , "मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन, तो मरून जावा." (२१)


तच्छ्रुत्वा भगवान् रुद्रो दुर्मना इव भारत ।
ओंम् इति प्रहसंस्तस्मै ददेऽहेरमृतं यथा ॥ २२ ॥
ऐकता वर हा त्याचा शिवाने आनमानिले ।
परी हासोनिया बोले तथास्तु वर हा तुझा ।
पाजावे अमृतो सर्पा तसाचि वर जाहला ॥ २२ ॥

भारत - हे परीक्षित राजा - तत् श्रुत्वा - ते ऐकून - भगवान् रुद्रः - भगवान शंकर - दुर्मनाः इव (भूत्वा) - खिन्न झाल्याप्रमाणे होऊन - प्रहसन् - हसत हसत - यथा अहेः अमृतं - जसे सर्पाला अमृत तसे - ॐ इति तस्मै (वरं) ददे - बरे आहे असे म्हणून त्याला वर देता झाला. ॥२२॥
परीक्षिता ! त्याची ही विनंती ऐकून भ्गवान रुद्र सुरुवातीला थोडेसे नाराज झाले, पण नंतर हसून म्हणाले, " ठिक आहे." असे म्हणून या वराने त्यांनी जणू सापाला अमृत पाजले. (२२)


स तद्वरपरीक्षार्थं शम्भोर्मूर्ध्नि किलासुरः ।
स्वहस्तं धातुमारेभे सोऽबिभ्यत् स्वकृताच्छिवः ॥ २३ ॥
इच्छी पारवतीला दैत्य शंकरामाथि हात हा ।
ठेवण्या धावला तेंव्हा भ्याले शंकर ते मनीं ॥ २३ ॥

इति उक्तः सः असुरः - याप्रमाणे बोलला गेलेला तो वृकासुर - नूनं गौरीहरणलालसः (अभवत्) - खरोखर पार्वतीचे हरण करण्याविषयी उत्कंठित झाला - सः असुरः किल - तो वृकासुर खरोखर - तद्वरपरीक्षार्थं - त्या वराची परीक्षा पहाण्यासाठी - शंभोः मूर्ध्नि - शंकराच्या मस्तकावर - स्वहस्तं धातुम् आरेभे - आपला हात ठेवावयास लागला - सः शिवः स्वकृतात् अबिभ्यत् - तो शंकर आपल्या स्वतःच्या कृत्यामुळे भिऊन गेला. ॥२३॥
भगवान शंकर असे म्हणाल्यावर वृकासुराच्या मनात पार्वतीदेवींचे हरण करण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि त्या वराची परीक्षा घेण्यासाठी तो असुर त्यांच्याच मस्तकावर हात ठेवण्याचा प्रयत्‍न करू लागला. तेव्हा आपण दिलेल्या वराने शंकर भयभीत झाले. (२३)


तेनोपसृष्टः संत्रस्तः पराधावन् सवेपथुः ।
यावदन्तं दिवो भूमेः कष्ठानामुदगादुदक् ॥ २४ ॥
भयाने कांपुनी पृथ्वी स्वर्गी नी दाहिही दिशा ।
पळाले परि हा येई गेले उत्तरि शेवटी ॥ २४ ॥

तेन उपसृष्टः (सः) - त्याने पीडिलेला तो शंकर - संत्रस्तः - त्रास पावलेला असा - सवेपथुः - कापत कापत - पराधावत् - धावू लागला - यावत् दिवः भूमेः काष्ठानां अन्तं - स्वर्ग, पृथ्वी, दिशा ह्यांचा शेवट होईपर्यंत - उदक् उदगात् - उत्तर दिशेकडे धावत सुटला. ॥२४॥
तो त्यांच्या पाठलाग करू लागला आणि ते त्याला भिऊन कापत कापत पळू लागले. ते पृथ्वी, स्वर्ग आणि दिशांच्या शेवटापर्यंत पळत गेले. तरीसुद्धा तो पाठलाग करीत असल्याचे पाहून ते उत्तरेकडे गेले. (२४)


अजानन्तः प्रतिविधिं तूष्णीमासन् सुरेश्वराः ।
ततो वैकुण्ठमगमद्‌ भास्वरं तमसः परम् ॥ २५ ॥
संकटा पाहुनी घोर देवता गप्प बैसल्या ।
वैकुंठी पातले अंती प्रकाशमय त्या अशा ॥ २५ ॥

सुरेश्वराः - मोठमोठे देव - प्रतिविधिं अजानन्तः - प्रतिकार जाणत नसल्यामुळे - तूष्णीम् आसन् - स्वस्थ बसले - ततः - नंतर - तमसः परं भास्वरं वैकुण्ठं अगमत् - अंधकाराच्या पलीकडे असलेल्या तेजस्वी वैकुण्ठास गेला. ॥२५॥
मोठमोठे देव हे संकट टाळण्याचा काही उपाय न सुचल्याने स्तब्ध राहिले. शेवटी ते अंधाराच्या पलीकडे असलेल्या प्रकाशमय अशा वैकुंठलोकी गेले. (२५)


यत्र नारायणः साक्षात् न्यासिनां परमा गतिः ।
शान्तानां न्यस्तदण्डानां यतो नावर्तते गतः ॥ २६ ॥
नारायण तिथे राही संन्याशा गति जी मिळे ।
शांत भाव असा तेथे न जन्म तेथल्या कुणा ॥ २६ ॥

यत्र - जेथे - शान्तानां न्यस्तदण्डानां - शांत व तीन्ही दंड ज्यांनी सोडिले आहेत अशा - न्यासिनां परमा गतिः - सर्वसंगपरित्यागी साधूंचा उत्तम आश्रय असा - साक्षात् नारायणः (वसति) - प्रत्यक्ष नारायण रहातो - यतः गतः न आवर्तते - जेथे गेलेला मनुष्य परत येत नाही. ॥२६॥
जगताला अभय देऊन स्वत: शांत असणार्‍या संन्यांशांचे एकमेव आश्रयस्थान असलेले नारायण जेथे निवास करताता व जेथे गेल्यावर जीवाला परत पृथ्वीतलावर यावे लागत नाही, त्या वैकुंठात श्रीशंकर गेले. (२६)


तं तथा व्यसनं दृष्ट्वा भगवान् वृजिनार्दनः ।
दूरात् प्रत्युदियाद्‌ भूत्वा बटुको योगमायया ॥ २७ ॥
संकटा पाहुनी विष्णु योगमाया करोनिया ।
ब्रह्मचारी असा झाला निवांत चालला पुढे ॥ २७ ॥

वृजिनार्दनः भगवान् - पापाचा नाश करणारा श्रीविष्णु - तथाव्यसनं तं दृष्ट्वा - तशा रीतीचे आहे संकट ज्याचे अशा त्या शंकराला पाहून - योगमायया बटुकः भूत्वा - योगमायेने लहान मुलाचे रूप घेऊन - दूरात् प्रत्युदियात् - दुरून प्रकट झाला. ॥२७॥
भक्तांचे भय नाहीसे करणार्‍या भगवंतांनी पाहिले की, शंकर मोठ्या संकटात सापडले आहेत. तेव्हा ते आपल्या योगमायेने ब्रह्मचार्‍याचे रूप घेऊन दुरूनच वृकासुराकडे येऊ लागले. (२७)


मेखलाजिनदण्डाक्षैः तेजसाग्निरिव ज्वलन् ।
अभिवादयामास च तं कुशपाणिर्विनीतवत् ॥ २८ ॥
मेखळा मृगचर्मी नी दंड रुद्राक्ष धारुनी ।
कुश ते घेतले हाती पाहता त्या वृकासुरा ।
नम्रताभाव दावोनी वंदिला दैत्य तेधवा ॥ २८ ॥

च - आणि - मेखलाजिनदण्डाक्षैः - कडदोरा, चर्म व दंड आणि रुद्राक्ष यांनी - तेजसा अग्निः इव ज्वलन् - तेजस्वीपणामुळे अग्नीसारखा प्रकाशणारा - कुशपाणिः (सः) - हातात दर्भ घेतलेला तो बटु - विनीतवत् तं अभिवादयामास - नम्र पुरुषाप्रमाणे त्या असुराला नमस्कार करिता झाला. ॥२८॥
त्यांच्या कमरेला मुंज गवताची दोरी, हरिणाजिन, एका हातात दंड आणि दुसर्‍या हातात रुद्राक्षांची माळ होती. त्यांचे तेज धगधगत्या आगीसारखे होते. त्यांनी हातात कुश घेतले होते. वृकासुराला त्यांनी नम्रतेचा बहाणा करून नमस्कार केला. (२८)


श्रीभगवानुवाच -
शाकुनेय भवान् व्यक्तं श्रान्तः किं दूरमागतः ।
क्षणं विश्रम्यतां पुंस आत्मायं सर्वकामधुक् ॥ २९ ॥
वेषधारी भगवान् म्हणाले -
शकुनीनंदना फार थकले दिसता असे ।
दुरून पातले काय ? विश्रांती थोडिशीच घ्या ।
सुखाचे मूळ हा देह त्याला पीडा न द्या अशी ॥ २९ ॥

शाकुनेय - हे शकुनिपुत्रा वृका - भवान् व्यक्तं श्रान्तः - तू खरोखर दमला आहेस - दूरं आगतः किम् - लांबून आलास काय - क्षणं विश्रम्यतां - क्षणभर विश्रान्ति घ्यावी - पुंसः अयं आत्मा - पुरुषाचा हा देह - सर्वकामधुक् - सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे. ॥२९॥
श्रीभगवान म्हणाले- शकुनिनंदना ! तू अत्यंत थकलेला आहेस, हे स्पष्टच दिसत आहे. तू फार लांबून आलास काय? थोडीशी विश्रांती तर घे ! पहा. हे शरीरच सर्व सुखे उपभोगण्याचे साधन आहे. (२९)


यदि नः श्रवणायालं युष्मद्व्यवसितं विभो ।
भण्यतां प्रायशः पुम्भिः धृतैः स्वार्थान् समीहते ॥ ३० ॥
समर्थ तुम्हि तो आहा इच्छिता काय ते मनी ।
सहाय्य घेउनी लोक आपुले कार्य साधिती ॥ ३० ॥

विभो - हे समर्थ वृकासुरा - युष्मद्‌व्यवसितं - तुमचे योजिलेले कार्य - यदि नः श्रवणाय अलं - जर आम्हाला ऐकण्यास योग्य असेल - भण्यतां - सांगावे - प्रायशः - बहुधा - धृतैः पुम्भिः - हातांशी धरिलेल्या पुरुषांच्या सहाय्याने - स्वार्थान् समीहते - आपले इष्ट साधू इच्छितो. ॥३०॥
हे समर्थ गृहस्था ! यावेळी तू काय करू इच्छितोस ? मला सांगण्यासारखे असेल तर सांग. कारण या जगामध्ये असे दिसते की, लोक सहायकांच्या द्वारा आपली कामे करून घेतात. (३०)


श्रीशुक उवाच -
एवं भगवता पृष्टो वचसामृतवर्षिणा ।
गतक्लमोऽब्रवीत्तस्मै यथापूर्वमनुष्ठितम् ॥ ३१ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
सुधावृष्टी असे गोड भगवान् बोलले तदा ।
थांबता थकवा गेला सर्व हेतु तो बोलला ॥ ३१ ॥

भगवता - श्रीकृष्णाने - अमृतवर्षिणा वचसा - अमृताचा वर्षाव करणार्‍या भाषणाने - एवं पृष्टः - याप्रमाणे विचारिला गेलेला - गतक्लमः - गेलेला आहे थकवा ज्याचा असा - यथा पूर्वं अनुष्ठितं (तथा) तस्मै अब्रवीत् - पूर्वी जसे केले होते तसे त्याला सांगता झाला. ॥३१॥
श्रीशुक म्हणतात- भगवंतांनी अमृतमधुर वाणीने असे विचारल्यावर थकवा दूर झालेल्या त्याने आपली तपश्चर्या, वरप्राप्ती व शंकरांचा पाठलाग, हे सर्व पहिल्यापासून सांगितले. (३१)


श्रीभगवानुवाच -
एवं चेत्तर्हि तद्वाक्यं न वयं श्रद्दधीमहि ।
यो दक्षशापात् पैशाच्यं प्राप्तः प्रेतपिशाचराट् ॥ ३२ ॥
श्री भगवान् म्हणाले -
असे कां मजला नाही विश्वास त्या शिवावरी ।
दक्षाने शापिता झाला भूतराजा असाच की ॥ ३२ ॥

एवं चेत् तर्हि - असे असेल तर - वयं तद्वाक्यं न श्रद्दधीमहि - आम्ही त्या शंकराच्या भाषणावर मुळीच विश्वास ठेवीत नाही - यः - जो - दक्षशापात् - दक्षाच्या शापामुळे - पैशाच्यं प्राप्तः - पिशाचपणाला प्राप्त झालेला असा - प्रेतपिशाचराट् (अभवत्) - प्रेतांचा व पिशांचाचा राजा झाला आहे. ॥३२॥
श्रीभगवान म्हणाले- असे असले तरी आम्ही त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवीत नाही. कारण दक्ष प्रजापतीच्या शापाने तो पिशाच झाला आहे आणि स्वत: तो प्रेतपिशाच्चांचा राजा आहे. (३२)


यदि वस्तत्र विश्रम्भो दानवेन्द्र जगद्‌गुरौ ।
तर्ह्यङ्गाशु स्वशिरसि हस्तं न्यस्य प्रतीयताम् ॥ ३३ ॥
दैत्येंद्रा मानिसी त्याला आजही तू जगद्‌गुरू ।
आपुल्या शिरि तू ठेवी हात नी पाहि सत्य ते ॥ ३३ ॥

दानवेन्द्र - हे दैत्यांच्या राजा - यदि तत्र जगद्‍गुरौ वः विश्रम्भः (स्यात्) - जर त्या शंकरावर तुमचा विश्वास असेल - तर्हि - तर - अङग - हे वृका - आशु स्वशिरसि हस्तं न्यस्य प्रतीयताम् - लवकर आपल्याच मस्तकावर हात ठेवून अनुभव घ्यावा. ॥३३॥
हे दानवराज ! जर तू त्या जगद्‌गुरुवर विश्वास ठेवीत असशील, तर लगेच स्वत:च्या डोक्यावर हात ठेवून परीक्षा कर. (३३)


यद्यसत्यं वचः शम्भोः कथञ्चिद् दानवर्षभ ।
तदैनं जह्यसद्वाचं न यद्वक्तानृतं पुनः ॥ ३४ ॥
असत्य ठरता त्याला ठारची मारणे पहा ।
पुन्हा न कधि तो तेणे बोलेल हे असत्य की ॥ ३४ ॥

दानवर्षभ - हे दानवश्रेष्ठा वृका - यदि कथंचित् शंभोः वचः असत्यं (भवेत्) - जर कदाचित शंकराचे भाषण खोटे ठरेल - तदा असद्वाचं एनं जहि - तर खोटे बोलणार्‍या ह्या शंकराला ठार कर - यत् पुनः (सः) अनृतं न वक्ता - जेणेकरून पुनः तो खोटे बोलणार नाही. ॥३४॥
हे दानवश्रेष्ठा ! शंकराचे म्हणणे जर कोणत्याही प्रकारे खोटे ठरले, तर त्या खोटे बोलणार्‍याला मारून टाक. ज्यामुळे तो पुन्हा कधीही खोटे बोलणार नाही. (३४)


इत्थं भगवतश्चित्रैः वचोभिः स सुपेशलैः ।
भिन्नधीर्विस्मृतः शीर्ष्णि स्वहस्तं कुमतिर्न्यधात् ॥ ३५ ॥
गोड हे बोलता विष्णु विवेक संपला असे ।
दुर्बुद्ध्याने चुकोनीया स्वशिरीं हात ठेविला ॥ ३५ ॥

इत्थं - याप्रमाणे - भगवतः - श्रीविष्णूच्या - चित्रैः सुपेशलैः वचोभिः - आश्चर्यजनक अत्यंत मोहक भाषणांनी - भिन्नधीः कुमतिः सः - भ्रंश पावली आहे बुद्धि ज्याची असा तो दुष्ट बुद्धीचा वृकासुर - विस्मृतः शीर्ष्णि स्वहस्तं व्यधात् - भान विसरून मस्तकावर स्वतःचा हात ठेवता झाला. ॥३५॥
भगवंतांच्या अशा अतिशय गोड वाणीमुळे त्याची विवेकबुद्धी नाहीशी झाली. आणि त्या मूर्खाने वर विसरून स्वत:च्याच डोक्यावर हात ठेवला. (३५)


अथापतद्‌ भिन्नशिराः व्रजाहत इव क्षणात् ।
जयशब्दो नमःशब्दः साधुशब्दोऽभवद् दिवि ॥ ३६ ॥
क्षणात भस्म तो झाला जणूं वीज पडे शिरीं ।
अहो जय् जय् नमो साधु आकाशी देव बोलले ॥ ३६ ॥

अथ - तेव्हा - भिन्नशिराः - फुटले आहे मस्तक ज्याचे असा तो - वज्राहतः इव - वज्राने ताडिल्याप्रमाणे - क्षणात् अपतत् - क्षणामध्ये पडला - दिवि - आकाशात - जयशब्दः नमःशब्दः साधुशब्दः अभवत् - जयजयकार असो, नमस्कार असो, चांगले झाले, असा मोठा ध्वनि उत्पन्न झाला. ॥३६॥
त्याच क्षणी त्याचे डोके फुटले आणि तो डोक्यावर वज्र पडल्यासारखा जमिनीवर कोसळला. त्यावेळी आकाशात देव जयजयकार , नमस्कार आणि वाहवा ! वाहवा ! असा घोष करू लागले. (३६)


मुमुचुः पुष्पवर्षाणि हते पापे वृकासुरे ।
देवर्षिपितृगन्धर्वा मोचितः सङ्कटाच्छिवः ॥ ३७ ॥
पाप्याच्या मृत्युने देव ऋषि नी पितरे तसे ।
गंधर्वे वर्षिली पुष्पे शिवजी सुटले असे ॥ ३७ ॥

पापे वृकासुरे हते - पापी वृकासुर मारिला गेला असता - देवर्षिपितृगन्धर्वाः - देव, ऋषी, पितर व गंधर्व - पुष्पवर्षाणि मुमुचुः - फुलांचा वर्षाव करिते झाले - एवं शिवः संकटात् मोचितः - याप्रमाणे शिव संकटमुक्त केला गेला. ॥३७॥
पापी वृकासुर मेल्याबरोबर देवता, ऋषी, पितर आणि गंधर्व भगवंतांवर पुष्पवर्षाव करू लागले. अशा रीतीने शंकर त्या संकटातून मुक्त झाले. (३७)


मुक्तं गिरिशमभ्याह भगवान् पुरुषोत्तमः ।
अहो देव महादेव पापोऽयं स्वेन पाप्मना ॥ ३८ ॥
हतः को नु महत्स्वीश जन्तुर्वै कृतकिल्बिषः ।
क्षेमी स्यात् किमु विश्वेशे कृतागस्को जगद्‌गुरौ ॥ ३९ ॥
मुक्त तो शंकरा विष्णु वदले हर्ष हा पहा ।
पापाने निघला काटा पाप्याचा आज हा असा ॥ ३८ ॥
थोरांच्या अपराधाने क्षेम राहील कोण तो ।
विश्वेश्वर गुरू तुम्ही अपराधी जगेल कां ? ॥ ३९ ॥

पुरुषोत्तमः भगवान् - पुरुषश्रेष्ठ श्रीविष्णु - मुक्तं गिरीशं अभ्याह - संकटातून मुक्त झालेल्या शंकराला म्हणाला - अहो देव महादेव - हे देवाधिदेवा शंकरा - अयं पापः स्वेन पाप्मना हतः - हा पापी दानव स्वतःच्या पापकृत्यानेच मारला गेला - ईश - हे शंकरा - महत्सु कृतकिल्बिषः कः नु जन्तुः - मोठयांच्या ठिकाणी केला आहे अपराध ज्याने असा कोणता बरे प्राणी - क्षेमी स्यात् - खरोखर कल्याणसंपन्न होईल - विश्वेशे जगद्‌गुरौ (त्वयि) कृतागस्कः किमु - मग विश्वाचा अधिपति व जगाचा गुरु अशा तुझा अपराध करणारा कसा सुखी होईल ? ॥३८-३९॥
भगवान पुरुषोत्तम भयमुक्त झालेल्या भगवान शंकरांना म्हणाले की, " देवाधिदेवा ! या दुष्टाला त्याच्या पापांनीच नष्ट केले. हे परमेश्वरा ! महापुरुषांचा अपराध करणारा कोणता दळभद्री प्राणी सुखात राहिल? आपण तर स्वत: जगद्‌गुरु विश्वेश्वर आहात ! मग आपल्य बाबतीत काय सांगावे ! (३८-३९)


( वंशस्था )
य एवमव्याकृतशक्त्युदन्वतः
परस्य साक्षात् परमात्मनो हरेः ।
गिरित्रमोक्षं कथयेच्छृणोति वा
विमुच्यते संसृतिभिस्तथारिभिः ॥ ४० ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे
रुद्रमोक्षणं नाम अष्टाशीतितमोऽध्यायः ॥ ८८ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
( इंद्रवज्रा )
शक्ती हरीची नच थांग लागे
     जेथे न जाते मन वाणि हेही ।
जे ऐकती या हरिच्या लिलेसी
     त्यां शत्रुचे ते भय ना उरे की ॥ ४० ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अठ्ठ्याऐंशिवा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

यः - जो - एवं - याप्रमाणे - अव्याकृतशक्त्युदन्वतः - विकृतिरहित शक्तीचा समुद्रच अशा - परस्य परमात्मनः हरेः - परब्रह्म परमात्मस्वरूपी अशा श्रीविष्णूचे - साक्षात् गिरित्रमोक्षं - प्रत्यक्ष शंकराला संकटातून सोडविल्याचे वृत्त - कथयेत् शृणोति वा - कथन करील किंवा श्रवण करील - (सः) संसृतिभिः तथा अरिभिः विमुच्यते - तो संसारापासून तसाच शत्रूंपासून मुक्त होतो. ॥४०॥ अठ्ठ्याऐंशीवा अध्याय समाप्त
अनंत शक्तींचे समुद्रच अशा साक्षात परमात्मा श्रीहरींची शंकरांना संकटातून सोडाविण्याची ही लीला जो कोणी दुसर्‍यांना सांगतो किंवा स्वत: ऐकतो, तो संसारबंधनातून व शत्रूभयापासून मुक्त होतो. (४०)


अध्याय अठ्ठ्याऐंशीवा समाप्त

GO TOP