श्रीमद् भागवत पुराण
स्कन्द दहावा
अध्याय सत्त्याहत्तरावा

भगवता सौभसहितस्य शाल्वस्य विनाशः -

शाल्वाचा उद्धार -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
स तूपस्पृश्य सलिलं दंशितो धृतकार्मुकः ।
नय मां द्युमतः पार्श्वं वीरस्येत्याह सारथिम् ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
हात तोंड धुवोनीया कवचो धारिले असे ।
प्रद्युम्न वदला आता द्युमान् वीराशि ने पुन्हा ॥ १ ॥

सः - तो प्रद्युम्न सलिलं उपस्पृश्य - अंगावर उदक शिंपून दंशितः - सज्ज झालेला धृतकार्मुकः - घेतले आहे धनुष्य ज्याने असा वीरस्य द्युमतः पार्श्वं मां नय - पराक्रमी द्युमानाजवळ मला ने इति सारथिम् आह - असे सारथ्याला म्हणाला. ॥१॥
श्रीशुक म्हणतात- प्रद्युम्नाने हात-तोंड धुऊन कवच चढवून धनुष्य घेतले आणि तो सारथ्याला म्हणाला, "मला वीर द्युमानाकडे घेऊन चल." (१)


विधमन्तं स्वसैन्यानि द्युमन्तं रुक्मिणीसुतः ।
प्रतिहत्य प्रत्यविध्यन् नाराचैरष्टभिः स्मयन् ॥ २ ॥
त्यावेळी यादवी सेना द्यूमान् उद्द्वस्त तो करी ।
प्रद्युम्ने रोधिता हास्ये सोडिले आठ बाण ते ॥ २ ॥

रुक्मिणीसुतः - रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न स्वसैन्यानि विधमन्तं द्युमन्तं - आपल्या सैन्याचा नाश करणार्‍या द्युमानाला प्रतिहत्य - उलट प्रहार करून स्मयन् - मंदहास्य करीत अष्टभिः नाराचैः - आठ बाणांनी प्रत्यविध्यत् - ताडिता झाला. ॥२॥
द्युमान त्यावेळी यादवसेनेची धूळधाण करीत होता. प्रद्युम्नाने त्याचा प्रतिकार करून हसत हसत त्याच्यावर आठ बाण सोडले. (२)


चतुर्भिश्चतुरो वाहान् सूतमेकेन चाहनत् ।
द्वावाभ्यं धनुश्च केतुं च शरेणान्येन वै शिरः ॥ ३ ॥
अश्वां ध्वजां धनुष्याते एकेक बाण सोडुनी ।
छेदिले शिर ते त्याचे प्रद्युम्ने एकची सवे ॥ ३ ॥

चतुर्भिः चतुरः वाहान् - चार बाणांनी चार घोडयांना एकेन सूतं - एका बाणाने सारथ्याला द्वाभ्यां च - आणि दोन बाणांनी धनुः केतुं च - धनुष्याला आणि ध्वजाला अन्येन शरेण च शिरः वै अहनत् - आणि दुसर्‍या एका बाणाने शाल्वाच्या मस्तकाला ताडिता झाला. ॥३॥
चार बाणांनी त्याचे चार घोडे आणि एकेका बाणाने सारथी, धनुष्य, ध्वज आणि त्याचे मस्तक उडविले.(३)


गदसात्यकिसाम्बाद्या जघ्नुः सौभपतेर्बलम् ।
पेतुः समुद्रे सौभेयाः सर्वे संछिन्नकन्धराः ॥ ४ ॥
एवं यदूनां शाल्वानां निघ्नतामितरेतरम् ।
युद्धं त्रिणवरात्रं तद् अभूत् तुमुलमुल्बणम् ॥ ५ ॥
गदा सात्यकि नी सांब संहारी शाल्वसैनिका ।
विमानीं तुटती डोकी समुद्रीं पडती पहा ॥ ४ ॥
या परी यदु शाल्वाचे मारिती तै परस्परा ।
धुमश्चक्री अशी झाली सत्तावीस दिनी पहा ॥ ५ ॥

गजसात्यकिसाम्बाद्याः - गज, सात्यकि, सांब आदिकरून वीर सौभपतेः बलं जघ्नुः - शाल्वाच्या सैन्याला मारिते झाले सर्वे सौभेयाः - सौभ विमानात असलेले सर्व लोक संछिन्नकन्धराः - तुटल्या आहेत माना ज्यांच्या असे समुद्रे पेतुः - समुद्रात पडले एवं - याप्रमाणे इतरेतरं निघ्नतां - एकमेकांना मारणार्‍या यदूनां शाल्वानां - यादव व शाल्व यांचे तुमुलं उल्बणं तत् युद्धं - घनघोर व भयंकर असे ते युद्ध त्रिणवरात्रं अभूत् - सत्तावीस दिवसापर्यंत चालले. ॥४-५॥
इकडे गद, सात्यकी, सांब इत्यादी वीरसुद्धा शाल्वाच्या सेनेचा संहार करू लागले. सौभ विमानात बसलेल्या सैनिकांची मस्तके तुटून समुद्रात जाऊन पडत. (४) अशा प्रकारे यादव आणि शाल्वाचे सैनिक एकमेकांवर प्रहार करीत राहिले. असे हे अतिशय घनघोर आणि भयंकर युद्ध सत्तावीस दिवस चालले. (५)


इन्द्रप्रस्थं गतः कृष्ण आहूतो धर्मसूनुना ।
राजसूयेऽथ निवृत्ते शिशुपाले च संस्थिते ॥ ६ ॥
त्या वेळी धर्मराजाच्या इंद्रप्रस्थास कृष्ण ते ।
मुक्कामा असुनी यज्ञ पूर्ण तो जाहला असे ॥ ६ ॥

धर्मसूनुना आहूतः कृष्णः - धर्मराजाने बोलावलेला श्रीकृष्ण इंद्रप्रस्थं गतः - इंद्रप्रस्थाला गेला होता अथ राजसूये निर्वृत्ते - मग राजसूय यज्ञ समाप्त झाला असता शिशुपाले च संस्थिते - व शिशुपाल मरण पावला असता. ॥६॥
त्यावेळी युधिष्ठिराच्या आमंत्रणावरून भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्थाला गेले होते. राजसूय यज्ञाची पूर्तता झाली होती आणो शिशुपालाचाही मृत्यू झाला होता. (६)


कुरुवृद्धाननुज्ञाप्य मुनींश्च ससुतां पृथाम् ।
निमित्तान्यतिघोराणि पश्यन् द्वावारवतीं ययौ ॥ ७ ॥
दुश्चिन्हे पाहिले कृष्णे वृद्धांना पुसले तसे ।
निघाले द्वारकेशी ते बोलता पांडवादिका ॥ ७ ॥

कुरुवृद्धान् अनुज्ञाप्य - ज्येष्ठ कौरवांची आज्ञा घेऊन मुनीन् ससुतां पृथां च (अनुज्ञाप्य) - ऋषि व पुत्रांसह कुंती ह्यांची अनुज्ञा घेऊन अतिघोराणि निमित्तानि पश्यन् - अत्यंत भयंकर दुश्चिन्हे पहात द्वारवतीं ययौ - द्वारकेला गेला. ॥७॥
तेथे श्रीकृष्णांनी मोठे भयानक अपशकुन होत असलेले पाहून कुरुवंशातील ज्येष्ठ, ऋषी, कुंती आणि पांडव यांचा निरोप घेऊन द्वारकेकडे प्रयाण केले. (७)


आह चाहमिहायात आर्यमिश्राभिसङ्‌गतः ।
राजन्याश्चैद्यपक्षीया नूनं हन्युः पुरीं मम ॥ ८ ॥
रामाच्या सह मी आलो तिथे त्या शिशुपालचे ।
पक्षीय सूड घेण्याते अवश्य पातले, स्मरे ॥ ८ ॥

आह च - आणि म्हणाला आर्यमिश्राभिसंगतः अहं - बलरामासह मी इह आगतः - येथे आलो चैद्यपक्षीयाः राजन्याः मम पुरीं नूनं हन्युः - शिशुपालाच्या पक्षांतील राजे खरोखर माझ्या द्वारकानगरीचा नाश करतील. ॥८॥
ते मनात म्हणू लागले की, मी वडिल बंधूसह येथे आलो. आता शिशुपालाच्या पक्षातील राजे द्वारकेवर निश्चितच आक्रमण करतील. (८)


वीक्ष्य तत्कदनं स्वानां निरूप्य पुररक्षणम् ।
सौभं च शाल्वराजं च दारुकं प्राह केशवः ॥ ९ ॥
रथं प्रापय मे सूत शाल्वस्यान्तिकमाशु वै ।
सम्भ्रमस्ते न कर्तव्यो मायावी सौभराडयम् ॥ १० ॥
पातले द्वारकेशी तो खरेचि युद्ध चालले ।
द्वारका रक्षिण्या रामां ठेवोनी सारथ्यां वदे ॥ ९ ॥
शीघ्र काढ रथा या त्या शाल्वाच्या पाशि ने मला ।
मोठा मायवितो आहे न भ्यावे तू मुळीच की ॥ १० ॥

केशवः - श्रीकृष्ण स्वानां तत् कदनं वीक्ष्य - स्वकीयांचा तो नाश पाहून पुररक्षणं (रामे) निरूप्य - नगररक्षणाचे काम बलरामावर सोपवून सौभं च शाल्वराजं च (वीक्ष्य) - सौभ विमान व शाल्वराजा ह्यांना पाहून दारुकं प्राह - दारुकाला म्हणाला सूत - हे दारुका शाल्वस्य अन्तिकं मे रथं आशु वै प्रापय - शाल्वाच्या जवळ माझा रथ लवकर खरोखर ने ते संभ्रमः न कर्तव्यः - तू धांदरटपणाने वागू नकोस अयं सौभराट् मायावी - हा शाल्व मोठा कपटी आहे. ॥९-१०॥
द्वारकेला पोहोचल्यावर ते युद्ध पाहून श्रीकृष्णांनी नगराचे रक्षण करण्याचे काम बलरामांच्याकडे सोपविले आणि सौभपती शाल्वाला पाहून आपला सारथी दारुक याला म्हटले. (९) "दारुका ! तू लवकर माझा रथ शाल्वाजवळ घेऊन चल. हा शाल्व अतिशय मायावी आहे, तरीसुद्धा तू भिऊ नकोस." (१०)


इत्युक्तश्चोदयामास रथमास्थाय दारुकः ।
विशन्तं ददृशुः सर्वे स्वे परे चारुणानुजम् ॥ ११ ॥
दारूक वंदुनी आज्ञा निघे शाल्वाकडे तदा ।
ध्वजचिन्ह गरूडाचे पाहता शाल्व ओळखी ॥ ११ ॥

इति उक्तः दारुकः - असे बोललेला दारुक रथं आस्थाय चोदयामास - रथात बसून घोडे हाकिता झाला स्वे परे च सर्वे - स्वकीय व शत्रुपक्षीय असे सर्व सैनिक विशन्तं अरुणानुजं ददृशुः - आत शिरणार्‍या गरुडाला पहाते झाले. ॥११॥
भगवंतांची अशी आज्ञा होताच दारुक गरुडध्वज रथावर आरूढ झाला आणि तो रथ शाल्वाकडे घेऊन चालला. दोन्ही सेनेतील सैनिकांनी युद्धभूमीवर प्रवेश करताना तो पाहिला. (११)


शाल्वश्च कृष्णमालोक्य हतप्रायबलेश्वरः ।
प्राहरत् कृष्णसूताय शक्तिं भीमरवां मृधे ॥ १२ ॥
तामापतन्तीं नभसि महोल्कामिव रंहसा ।
भासयन्तीं दिशः शौरिः सायकैः शतधाच्छिनत् ॥ १३ ॥
आता पर्यंत शाल्वाची सेना सर्वचि नष्टली ।
कृष्णाने पाहली शक्ती रथाशी येइ ती तशी ॥ १२ ॥
कडाडे वीजची जैशी दिशाही दीपल्या तदा ।
कृष्णाने मारिता बाण शतखंडचि जाहली ॥ १३ ॥

हतप्रायबलेश्वरः शाल्वः च - व ज्याचे बहुतेक सेनापति मेले आहेत असा शाल्व कृष्णं आलोक्य - श्रीकृष्णाला पाहून मृधे - युद्धात भीमरवां शक्तिं - भयंकर शब्द करणारी शक्ति कृष्णसूताय प्राहरत् - श्रीकृष्णाचा सारथी जो दारुक त्यावर फेकिता झाला. ॥१२॥ शौरिः - श्रीकृष्ण रहसा आपतन्तीं - वेगाने चालून येणार्‍या महोल्काम् इव दिशः भासयन्तीं - मोठया जळक्या कोलतीप्रमाणे दिशांना प्रकाशित करणार्‍या तां (शक्तिम्) - त्या शक्तीला सायकैः नभसि शतधा अच्छिनत् - बाणांनी आकाशातच शंभर ठिकाणी तोडिता झाला. ॥१३॥
आतापर्यंत शाल्वाची बहुतेक सेना नष्ट झाली होती. श्रीकृष्णांना पाहाताच त्याने त्यांच्या सारथ्यावर प्रचंड आवाज करणारी शक्ती फेकली. ती शक्ती एखाद्या उल्केसारखी आकाशातून वेगाने चालाली होती. तिच्या प्रकाशाने सर्व दिशा उजळून निघाल्या. ती सारथ्याकडे येत असलेली पाहुन श्रीकृष्णांनी आपल्या बाणांनी तिचे शेकडो तुकडे केले. (१२-१३)


तं च षोडशभिर्विद्ध्वा बाणैः सौभं च खे भ्रमत् ।
अविध्यच्छरसन्दोहैः खं सूर्य इव रश्मिभिः ॥ १४ ॥
सोळा ते बाण त्या शाल्वा विमाना मारिले तसे ।
असंख्य बाण सोडी जै सूर्याची किरणेचि ती ॥ १४ ॥

खे भ्रमत् सौभं च - आणि आकाशात फिरणारे सौभ विमान षोडशभिः बाणैः विद्धा - सोळा बाणांनी विदीर्ण करून शरसंदोहैः च - आणि बाणांच्या वर्षावांनी सूर्यः रश्मिभिः खम् इव - सूर्य किरणांनी जसा आकाशाला व्यापितो त्याप्रमाणे तं अविद्‌‍ध्यत् - त्या शाल्वाला ताडिता झाला. ॥१४॥
त्यानंतर त्यांनी शाल्वाला सोळा बाण मारले आणि आकाशातून फिरणारे विमानसुद्धा, सूर्याने आपल्या किरणांनी आकाश व्यापावे, त्याप्रमाणे असंख्य बाणांनी व्यापून टाकले. (१४)


शाल्वः शौरेस्तु दोः सव्यं शार्ङ्‌गं शार्ङ्‌गधन्वनः ।
बिभेद न्यपतद् हस्तात् शार्ङ्‌गमासीत् तदद्‌भुतम् ॥ १५ ॥
शाल्वाने मारिला बाण डाव्या बाजूस कृष्णच्या ।
अद्‌भूत घडले तेंव्हा ते शार्ङ्गधनुही सुटे ॥ १५ ॥

शाल्वः तु - शाल्व तर शार्ङ्‌‍गधन्वनः शौरेः - शार्ङ्‌गधनुष्य धारण करणार्‍या श्रीकृष्णाचा सशार्ङ‌‍गं सव्यं दोः - शार्ङ्‌गधनुष्यासह डावा हात बिभेद - भेदिता झाला (तदा कृष्णस्य) हस्तात् शार्ङ्‌ग न्यपतत् - त्यावेळी श्रीकृष्णाच्या हातांतून शार्ङ्‌ग धनुष्य खाली पडले तत् अद्‌भुतम् आसीत् - ती गोष्ट आश्चर्य करण्यासारखी झाली. ॥१५॥
शाल्वाने शार्ड्गधनुष्याने शोभून दिसणार्‍या श्रीकृष्णांच्या डाव्या हातावर बाण मारला. त्यामुळे शार्ड्ग.धनुष्य भगवंतांच्या हातातून गळून पडले. ही एक अद्भूत अशीच घटना घडली. (१५)


हाहाकारो महानासीद्‌ भूतानां तत्र पश्यताम् ।
निनद्य सौभराडुच्चैः इदमाह जनार्दनम् ॥ १६ ॥
आकाशी पृथिवीशी ती हाय हायचि जाहली ।
गर्जोनी शाल्व तो बोले भगवान् कृष्ण यास की ॥ १६ ॥

तत्र पश्यतां भूतानां - तेथे पहाणार्‍या प्राण्यांमध्ये महान् हाहाकारः आसीत् - मोठा हाहाकार उडाला सौभराट् उच्चैः निनद्य - शाल्व मोठयाने गर्जना करून इदं जनार्दनम् आह - याप्रमाणे श्रीकृष्णाला म्हणाला. ॥१६॥
जे लोक हे युद्ध पाहात होते, त्यांच्यात मोठा हाहाकार उडाला. तेव्हा शाल्व गर्जना करून श्रीकृष्णांना म्हणाला. (१६)


यत्त्वया मूढ नः सख्युः भ्रातुर्भार्या हृतेक्षताम् ।
प्रमत्तः स सभामध्ये त्वया व्यापादितः सखा ॥ १७ ॥
समक्ष आमुच्या तू तो हरिली रुक्मिणी तशी ।
वधिले शिशुपालाला असावधचि पाहुनी ॥ १७ ॥

यत् - ज्याअर्थी मूढ - हे मूर्खा नः ईक्षतां - आम्ही पहात असता सख्युः भ्रातुः (च) भार्या (त्वया) हृता - आमचा मित्र व तुझा आतेभाऊ अशा शिशुपालाची पत्‍नी तू हरण केली त्वया - तुझ्याकडून सभामध्ये - मयसभेत प्रमत्तः सखा सः - असावध असा तो माझा मित्र शिशुपाल व्यापादितः - मारिला गेला. ॥१७॥
अरे मूर्खा ! तू आमच्या देखतच आमचा भाऊ आणि मित्र असलेल्या शिशुपालाच्या भावी पत्‍नीला हिरावून घेतलेस आणि तो बेसावध असताना भर सभेत त्याला मारलेस. (१७)


तं त्वाद्य निशितैर्बाणैः अपराजितमानिनम् ।
नयाम्यपुनरावृत्तिं यदि तिष्ठेर्ममाग्रतः ॥ १८ ॥
अजेय मानिशी तू तो जर तू थांबलास तो ।
तीक्ष्ण बाणे तुला आज सदाचा झोपवीतसे ॥ १८ ॥

अपराजितमानिनम् तं त्वा - मला कोणीही जिंकणार नाही असा अभिमान बाळगणार्‍या त्या तुला अद्य - आज यदि मम अग्रतः तिष्ठेः - जर माझ्या पुढे उभा राहिलास तर निशितैः बाणैः - तीक्ष्ण बाणांनी अपुनरावृत्तिं नयामि - मृत्यूप्रत नेईन. ॥१८॥
तू स्वत:ला अजिंक्य समजतोस, हे मला माहित आहे. तू आज जर माझ्यासमोर थांबलास, तर मी तुला माझ्या तीक्ष्ण बाणांनी अशा ठिकाणी पाठवीन की, जेथून कोणी परत येत नाही. (१८)


श्रीभगवानुवाच -
वृथा त्वं कत्थसे मन्द न पश्यस्यन्तिकेऽन्तकम् ।
पौरुषं दर्शयन्ति स्म शूरा न बहुभाषिणः ॥ १९ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले -
नकोस बरळू मूर्खा पहा डोक्याशि मृत्यु तो ।
वीरतो वीरता दावी न करी व्यर्थ बोलणे ॥ १९ ॥

मन्द - हे मूर्खा शाल्वा त्वं वृथा कत्थसे - तू व्यर्थ बडबड करीत आहेस अन्तिके अन्तकम् न पश्यसि - जवळ आलेल्या मृत्यूला पहात नाहीस शूराः पौरुषं दर्शयन्ति - शूर पुरुष पराक्रम करून दाखवितात बहुभाषिणः न (दर्शयन्ति) स्म - पुष्कळ बडबड करणारे दाखवीत नाहीत. ॥१९॥
श्रीभगवान म्हणाले- "अरे निर्बुद्धा ! तू विनाकारणच बडबड करीत आहेस. तुझा मृत्यू तुझ्या डोक्यावर घिरट्या घालीत आहे, हे तुला माहीत नाही, खरे शूर आपले शौर्य दाखवितात, व्यर्थ बडबड करीत नाहीत." (१९)


इत्युक्त्वा भगवान् शाल्वं गदया भीमवेगया ।
तताड जत्रौ संरब्धः स चकम्पे वमन्नसृक् ॥ २० ॥
कृष्णाने क्रोधता वेगे खांद्याशी मारिली गदा ।
रक्त खांद्यातुनी वाहे शाल्व तो कांपु लागला ॥ २० ॥

इति उक्त्वा - असे म्हणून संरब्धः भगवान् - क्रोधाविष्ट श्रीकृष्ण भीमवेगया गदया - भयंकर वेगाच्या गदेने शाल्वं जत्रौ तताड - शाल्वाला खांद्याजवळ ताडिता झाला सः - तो शाल्व राजा असृक् वमन् चकम्पे - रक्त ओकत कापू लागला. ॥२०॥
असे म्हणून श्रीकृष्णांनी रागाने वेगवान अशा भयानक गदेने शाल्वाच्या खांद्यावर प्रहार केला. त्यामुळे तो रक्त ओकीत थरथर कापू लागला. (२०)


गदायां सन्निवृत्तायां शाल्वस्त्वन्तरधीयत ।
ततो मुहूर्त आगत्य पुरुषः शिरसाच्युतम् ।
देवक्या प्रहितोऽस्मीति नत्वा प्राह वचो रुदन् ॥ २१ ॥
परतोनि गदा आली शाल्व गुप्तचि जाहला ।
दो घडींनी वदे दूत देवकीचा निरोप की ॥ २१ ॥

गदायां सन्निवृत्तायां - गदा परत आली असता शाल्वः तु अन्तरधीयत - शाल्व तर गुप्त झाला ततः मुहूर्ते - नंतर दोन घटकांच्या अवधीत पुरुषः आगत्य - एक पुरुष येऊन देवक्या प्रहितः अस्मि इति - देवकीने पाठविलेला आहे असे म्हणून शिरसा अच्युतं नत्वा - मस्तकाने श्रीकृष्णाला नमस्कार करून रुदन् वचः प्राह - रडत रडत बोलू लागला. ॥२१॥
इकडे गदा जेव्हा भगवंतांकडे परत आली, तेव्हा शाल्व अदृश्य झाला. यानंतर थोड्याच वेळात एक मनुष्य श्रीकृष्णांकडे आला व मस्तक लववून त्यांना नमस्कार करून, रडत रडतच म्हणाला, "मला देवकींनी पाठविले आहे." (२१)


कृष्ण कृष्ण महाबाहो पिता ते पितृवत्सल ।
बद्ध्वापनीतः शाल्वेन सौनिकेन यथा पशुः ॥ २२ ॥
पितृप्रेमी हरी कृष्णा शाल्वाने पितयास त्या ।
नेलेसे बांध बांधोनी कसई ने पशुस जै ॥ २२ ॥

महाबाहो कृष्ण कृष्ण - हे आजानुबाहो, हे श्रीकृष्णा पितृवत्सल - पित्यावर प्रेम करणार्‍या हे श्रीकृष्णा शाल्वेन - शाल्वाने ते पिता - तुझा पिता वसुदेव यथा सौनिकेन पशुः (तथा) - जसा खाटिकाने पशु न्यावा तसा बद्धा अपनीतः - बांधून दूर नेला. ॥२२॥
त्यांनी सांगितले आहे की, पित्याबद्दल अत्यंत प्रेम असणार्‍या हे महाबाहो श्रीकृष्णा ! एखादा कसाई ज्याप्रमाणे पशूला बांधून नेतो, त्याप्रमाणे शाल्व तुझ्या पित्याला बांधून घेऊन गेला आहे. (२२)


निशम्य विप्रियं कृष्णो मानुषीं प्रकृतिं गतः ।
विमनस्को घृणी स्नेहाद् बभाषे प्राकृतो यथा ॥ २३ ॥
निरोप ऐकता ऐसा उदास कृष्ण जाहले ।
कारुण्यपूर्ण वाणीने प्रेमाने बोलु लागले ॥ २३ ॥

मानुषीं प्रकृतिं गतः कृष्णः - मनुष्यस्वभावाला प्राप्त झालेला श्रीकृष्ण विप्रियं निशम्य - अप्रिय गोष्ट ऐकून विमनस्कः घृणी - खिन्न व दयायुक्त झालेला यथा प्राकृतः (तथा) - जसा साधारण पुरुष बोलतो त्याप्रमाणे स्नेहात् बभाषे - प्रेमाने भाषण करिता झाला. ॥२३॥
ही दु:खद बातमी ऐकून श्रीकृष्ण सामन्य माणसाप्रमाणे झाले. त्यांच्या चेहर्‍यावर औदासीन्य दिसू लागले. सामान्य माणसाप्रमाणे ते व्याकूळ होऊन मनात प्रेम दाटून येऊन म्हणू लागले. (२३)


कथं राममसम्भ्रान्तं जित्वाजेयं सुरासुरैः ।
शाल्वेनाल्पीयसा नीतः पिता मे बलवान् विधिः ॥ २४ ॥
अहो माझ्या बळीरामा देवता दैत्य ना कुणी ।
जिंकिती शाल्व तो अल्प तरी हे घडले कसे ॥ २४ ॥

सुरासुरैः अजेयं - देवदैत्यांना जिंकता न येणार्‍या असंभ्रान्तं रामं जित्वा - सावधपणाने कार्य करणार्‍या बलरामाला जिंकून अल्पीयसा शाल्वेन - अल्पबलाच्या शाल्वाने मे पिता कथं नीतः - माझा पिता कसा नेला विधिः बलवान् (अस्ति) - दैव बलवत्तर आहे. ॥२४॥
अहो ! देवदानवांना अजिंक्य व नेहमी सावध असणार्‍या बलरामाला य:कश्चित् शाल्वाने जिंकून माझ्या वडिलांना कसे काय बांधून नेले ? प्रारब्ध बलवत्तर असते, हेच खरे ! (२४)


इति ब्रुवाणे गोविन्दे सौभराट् प्रत्युपस्थितः ।
वसुदेवमिवानीय कृष्णं चेदमुवाच सः ॥ २५ ॥
शाल्व तै रचुनी माया वसुदेवापरी कुणा ।
माणसा आणुनी तेथे कृष्णाला बोलु लागला ॥ २५ ॥

इति गोविन्दे ब्रुवाणे - असे श्रीकृष्ण बोलत असता सः सौभराट् - तो सौभपति शाल्व वसुदेवम् इव आनीय - वसुदेवासारखी एक वस्तु आणून प्रत्युपस्थितः - प्राप्त झाला कृष्णं च इदं उवाच - आणि श्रीकृष्णाला याप्रमाणे म्हणाला. ॥२५॥
श्रीकृष्ण असे म्हणत आहेत, तेवढ्यात वसुदेवासारख्याच एका पुरुषाला घेऊन शाल्व तेथे आला आणि श्रीकृष्णांना म्हणू लागला. (२५)


एष ते जनिता तातो यदर्थमिह जीवसि ।
वधिष्ये वीक्षतस्तेऽमुं ईशश्चेत् पाहि बालिश ॥ २६ ॥
पहा बाप तुझा मूर्खा जगसी तू जयास्तव ।
पहा मी संपवी कार्य वाचवी तू बळे यया ॥ २६ ॥

बालिश - हे मूर्ख कृष्णा यदर्थम् इह जीवसि - ज्याच्यासाठी तू जिवंत राहिला आहेस (सः) एषः ते जनिता तातः (अस्ति) - तो तुला उत्पन्न करणारा तुझा पिता वसुदेव आहे ते वीक्षतः अमुं वधिष्ये - तुझ्यासमक्ष ह्याला मारितो (त्वम्) ईशः चेत् पाहि - तू समर्थ असशील तर रक्षण कर. ॥२६॥
अरे मूर्खा ! पहा ! हाच तुला जन्म देणारा तुझा पिता आहे, ज्याच्यासाठी तू जगत आहेस. तुझ्या देखतच मी याला आता ठार मारतो. तुझ्या अंगात ताकद असेल, तर याला वाचव ! (२६)


एवं निर्भर्त्स्य मायावी खड्गेनानकदुन्दुभेः ।
उत्कृत्य शिर आदाय खस्थं सौभं समाविशत् ॥ २७ ॥
मायावी शाल्वने खोट्या वसुदेवास कापिले ।
विमानी बैसला जाता आकाशस्थ अशाच त्या ॥ २७ ॥

मायावी (सः) - कपटी शाल्व एवं निर्भर्त्स्य - याप्रमाणे निर्भर्त्सना करून खड्‌गेन आनकदुन्दुभेः शिर उत्कृत्य - तरवारीने वसुदेवाचे मस्तक तोडून आदाय - घेऊन स्वस्थं सौभं समाविशत् - आकाशात असलेल्या सौभ विमानात जाऊन बसला. ॥२७॥
मायावी शाल्वाने अशाप्रकारे श्रीकृष्णांची निर्भत्सना करून वसुदेवाचे मस्तक तलवारीने उडविले आणि ते घेऊन तो आकाशात सौभ विमानात जाऊन बसला. (२७)


( मिश्र )
ततो मुहूर्तं प्रकृतावुपप्लुतः
     स्वबोध आस्ते स्वजनानुषङ्‌गतः ।
महानुभावस्तदबुध्यदासुरीं
     मायां स शाल्वप्रसृतां मयोदिताम् ॥ २८ ॥
( इंद्रवज्रा )
ज्ञानस्वरूपी असुनीहि कृष्ण
     सामान्यसा तो द्वय त्या घडीला ।
शोकात गेला बुडुनी तदा की
     माया पुन्हा तो मनि आठवी ती ॥ २८ ॥

ततः - तेव्हा स्वबोधः महानुभावः - आत्मज्ञानाने युक्त असा मोठा पराक्रमी श्रीकृष्ण स्वजनानुषङ्‌गतः - आपल्या आप्तेष्टांच्या प्रेमामुळे मुहूर्तम् - थोडा वेळ प्रकृतौ उपप्लुत आस्ते - मनुष्यसभावात मग्न झाला तत् - त्यानंतर सः - तो श्रीकृष्ण शाल्वप्रसृतां मयोदितां आसुरीं मायां अबुद्‌ध्यत् - शाल्वाने उत्पन्न केलेली मयासुराची ही आसुरी माया आहे असे जाणता झाला. ॥२८॥
श्रीकृष्ण स्वत: सिद्ध ज्ञास्वरूप आणि महाप्रभावी असूनही पित्यावरील प्रेमामुळे क्षणभर सामान्य माणसाप्रमाणे दु:खसागरात बुडून गेले. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आले की, ही शाल्वाने पसरलेली माया आहे. ही त्याला मय दानवाने शिकविली होती. (२८)


न तत्र दूतं न पितुः कलेवरं
     प्रबुद्ध आजौ समपश्यदच्युतः ।
स्वाप्नं यथा चाम्बरचारिणं रिपुं
     सौभस्थमालोक्य निहन्तुमुद्यतः ॥ २९ ॥
सचेत होता बघताच कृष्ण
     न तेथ दूतो नच प्रेत कांही ।
ते स्वप्न जैसे जिरले मनीचे
     नी सिद्धला शत्रुला मारण्याला ॥ २९ ॥

प्रबुद्धः अच्युतः - ज्ञानी श्रीकृष्ण तत्र आजौ - त्या युद्धामध्ये दूतं - दूताला न समपश्यत् - पहाता झाला नाही पितुः कलेवरं न (अपश्यत्) - पित्याचे शरीर पहाता झाला नाही यथा स्वाप्नं (तथा) - जसा स्वप्नातील देखावा तसा अम्बरचारिणं सौभस्थं रिपुं आलोक्य - आकाशात संचार करणार्‍या सौभ विमानात बसलेल्या शत्रूला पाहून निहन्तुं उद्यतः - मारण्यास उद्युक्त झाला. ॥२९॥
श्रीकृष्णांनी सावध होऊन युद्धभूमीवर पाहिले, तर तेथे दूत नव्हता की पित्याचे ते शरीरही नव्हते. ते जसे एखादे स्वप्न होते. दुसरीकडे पाहिले, तर शाल्व विमानात बसून आकाशात फिरत आहे. तेव्हा ते त्याचा वध करण्यासाठी उद्युक्त झाले. (२९)


( अनुष्टुप् )
एवं वदन्ति राजर्षे ऋषयः के च नान्विताः ।
यत् स्ववाचो विरुध्येत नूनं ते न स्मरन्त्युत ॥ ३० ॥
( अनुष्टुप् )
पुरोगामी असे कोणी वदती ऋषि की तया ।
विषयी सांगणे ऐसे वचना विपरीत ते ॥ ३० ॥

राजर्षे - हे परीक्षित राजा के च ऋषयः न अन्विताः - कित्येक ऋषि पूर्वापरसंधानरहित असे एवं वदन्ति - असे म्हणतात उत - परंतु यत् स्ववाचः विरुद्‌ध्येत - जी आपली भाषणे विरोधी ठरतील (तत्) नूनं ते न स्मरन्ति - ती ते खरोखर स्मरत नाहीत. ॥३०॥
हे परीक्षिता ! मागचा पुढचा विचार न करणारे काही ऋषी अशा प्रकारची घटना घडल्याचे सांगतात. श्रीकृष्णांच्या बाबतीत असे म्हणणे हे ते ’मायापती’ असल्याचे जे पूर्वी वर्णन केले, त्याच्या विरोधी आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. (३०)


क्व शोकमोहौ स्नेहो वा भयं वा येऽज्ञसम्भवाः ।
क्व चाखण्डितविज्ञान ज्ञानैश्वर्यस्त्वखण्डितः ॥ ३१ ॥
कुठे शोक भयो मोह अज्ञान्या ठायि ते असे ।
ज्ञान विज्ञान ऐश्वर्य-पूर्ण श्रीकृष्ण तो कुठे ॥ ३१ ॥

ये अज्ञसंभवाः - जे अज्ञानी लोकांच्या मनात उत्पन्न होणारे शोकमोहौ स्नेहः वा भयं वा क्व - शोक, मोह, स्नेह किंवा भय हे विकार कोणीकडे च - आणि अखण्डितविज्ञानज्ञानैश्वर्यः तु अखण्डितः (सः) क्व - अव्याहत चालणारे आहे अनुभविक व शाब्दिक ज्ञानरूपी ऐश्वर्य ज्याचे असा अकुंठित गतीचा श्रीकृष्ण कोणीकडे. ॥३१॥
अज्ञानी लोकांच्या ठिकाणी असणारे शोक, मोह, स्नेह आणि भय हे कोठे ! आणि कोठे ते परिपूर्ण भगवान की ज्यांचे ज्ञान, विज्ञान आणि ऐश्वर्य अखंडित आहे ! (३१)


( मिश्र )
यत्पादसेवोर्जितयाऽऽत्मविद्यया
     हिन्वन्त्यनाद्यात्मविपर्ययग्रहम् ।
लभन्त आत्मीयमनन्तमैश्वरं
     कुतो नु मोहः परमस्य सद्गतेः ॥ ३२ ॥
( इंद्रवज्रा )
ते श्रेष्ठ ऐसे मुनि ज्यासि ध्याती
     विद्या तपाते मिळवोनि घेती ।
आणीक सारा तम जाळिती, तो
     मोहात कैसा मुळि कृष्ण गुंते ॥ ३२ ॥

यत्पादसेवोर्जितया आत्मविद्यया - ज्याच्या चरणसेवेने वाढलेल्या आत्मज्ञानाने अनाद्यात्मविपर्ययग्रहं हिन्वन्ति - अनादि अशा आत्म्याच्या विषयीच्या विपरीत कल्पनांचा नाश करितात (च) आत्मीयं अनन्तं परं ऐश्वरं लभन्ते - आणि आत्मसंबंधी अविनाशी व श्रेष्ठ असे परमेश्वराचे पद मिळवितात (तस्य) सद्‌गतेः कुतः नु मोहः - त्या साधूंचा आश्रय अशा श्रीकृष्णाला मोह कोठून असणार ? ॥३२॥
ज्यांच्या चरणकमलांची सेवा करून चांगल्या रीतीने प्राप्त झालेल्या आत्मविद्येने शरीर इत्यादींमध्ये आत्मबुद्धीस्वरूप अनादी अज्ञान नाहीसे करतात व आत्म्यासंबंधी अनंत ऐश्वर्य प्राप्त करून घेतात, त्या संतांचे परम गतिस्वरूप असणार्‍या श्रीकृष्णंच्या ठिकाणी मोह कसा असू शकेल बरे ? (३२)


तं शस्त्रपूगैः प्रहरन्तमोजसा
     शाल्वं शरैः शौरिरमोघविक्रमः ।
विद्ध्वाच्छिनद्‌ वर्म धनुः शिरोमणिं
     सौभं च शत्रोर्गदया रुरोज ह ॥ ३३ ॥
उत्साहुनी शाल्व तिरांस सोडी
     घायाळ त्यास करि कृष्ण तैसा ।
नी तोडिले ते धनु रत्‍न त्याचे
     विमान तोडी मग त्या गदेने ॥ ३३ ॥

अमोघविक्रमः शौरिः - ज्याचा पराक्रम निष्फळ होत नाही असा श्रीकृष्ण शस्त्रपूगैः ओजसा प्रहरन्तं तं शाल्वं - शस्त्रसमूहांनी वेगाने प्रहार करणार्‍या त्या शाल्वाला शरैः विद्‌ध्वा - बाणांनी वेधून शत्रोः वर्म धनुः शिरोमणिं (च) अच्छिनत् - शत्रूचे चिलखत, धनुष्य व मस्तकातील रत्‍न ही तोडिता झाला सौभं च गदया रुरोज ह - सौभ विमान गदेने फोडिता झाला. ॥३३॥
शाल्व श्रीकृष्णांच्यावर अतिशय त्वेषाने शस्त्रांचा वर्षाव करू लागला. अमोघ पराक्रम असलेल्या भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा आपल्या बाणांनी शाल्वाला घायाळ केले आणि त्याचे कवच, धनुष्य आणि डोक्यावरील मणी हे सर्व छिन्नभिन्न करून टाकले. त्याचबरोबर गदेच्या प्रहाराने त्याचे विमानही तोडून फोडून टाकले. (३३)


तत्कृष्णहस्तेरितया विचूर्णितं
     पपात तोये गदया सहस्रधा ।
विसृज्य तद्‌ भूतलमास्थितो गदां
     उद्यम्य शाल्वोऽच्युतमभ्यगाद् द्रुतम् ॥ ३४ ॥
गदा प्रहारे हरिच्या तदा ते
     विमान गेले तुटुनी समुद्रीं ।
नी शाल्व आला सगदा तदा नी
     कृष्णावरी तो मग झेप घेई ॥ ३४ ॥

कृष्णहस्तेरितया गदया - श्रीकृष्णाच्या हातून सुटलेल्या गदेने सहस्रधा विचुर्णितं तत् - हजार ठिकाणी चूर्ण झालेले ते सौभ विमान तोये पपात - पाण्यात पडले तत् विसृज्य - ते विमान सोडून भूतलं आस्थितः शाल्वः - भूमीवर उभा राहिलेला शाल्व गदां उद्यम्य - गदा उचलून द्रुतं अच्युतं अभ्यगात् - तत्काळ श्रीकृष्णाच्या अंगावर चालून गेला. ॥३४॥
श्रीकृष्णांनी फेकलेल्या गदेमुळे त्या विमानाचे हजारो तुकडे होऊन ते समुद्रात पडले. त्यापूर्वीच हातात गदा घेऊन शाल्वाने जमिनीवर उडी मारली आणि वेगाने त्याने श्रीकृष्णांवर झेप घेतली. (३४)


आधावतः सगदं तस्य बाहुं
     भल्लेन छित्त्वाथ रथाङ्‌गमद्‌भुतम् ।
वधाय शाल्वस्य लयार्कसन्निभं
     बिभ्रद् बभौ सार्क इवोदयाचलः ॥ ३५ ॥
कृष्णे तयाचा सगदेचि हात
     तोडीयला नी मग चक्र घेई ।
सूर्यापरी जे तळपे कराशी
     नभात जैसा रवि तो उदेला ॥ ३५ ॥

अथ - तेव्हा आधावतः तस्य - चालून येणार्‍या त्या शाल्वाचा सगदं बाहुं - गदायुक्त हात भल्लेन छिन्त्वा - भाल्याने तोडून शाल्वस्य वधाय - शाल्वाच्या वधासाठी लयार्कसन्निभं अद्‌भुतं रथाङ्‍गं बिभ्रत् (सः) - प्रलयकाळच्या सूर्याप्रमाणे प्रखर असे आश्चर्यकारक सुदर्शन चक्र धारण करणारा श्रीकृष्ण सार्कः उदयाचलः इव बभौ - सूर्याने युक्त अशा उदयाचलाप्रमाणे शोभला. ॥३५॥
शाल्व आक्रमण करीत आहे असे पाहाताच त्यांनी भाल्याने त्याचा हात गदेसह उखडून टाकला. नंतर त्याला मारण्यासाठी त्यांनी प्रलयकालीन सुर्याप्रमाणे तेजस्वी आणि अत्यंत अद्भूत असे सुदर्शन चक्र धारण केले. त्यावेळी ते सूर्य उगवत असलेल्या उदयाचलाप्रमाणे दिसत होते. (३५)


जहार तेनैव शिरः सकुण्डलं
     किरीटयुक्तं पुरुमायिनो हरिः ।
वज्रेण वृत्रस्य यथा पुरन्दरो
     बभूव हाहेति वचस्तदा नृणाम् ॥ ३६ ॥
कृष्णे तयाचे शिर तोडिले जे
     किरीटयुक्तो त‍इ शाल्व याचे ।
इंद्रे जसा वृत्रहि मारिला तै
     नी दैत्य सारे वदलेचि हाय ॥ ३६ ॥

हरिः - श्रीकृष्ण तेन एव - त्याच सुदर्शन चक्राने पुरुमायिनः - पुष्कळ माया दाखविणार्‍या शाल्वाचे सकुंडलं किरीटयुक्तं शिरः - कुंडले व मुकुट यांनी युक्त असे मस्तक यथा पुरन्दरः वज्रेण वृत्रस्य (शिरः चिच्छेद तथा) - जसा इंद्र वज्राने वृत्रासुराचे मस्तक छेदिता झाला त्याप्रमाणे जहार - हरण करिता झाला तदा नृणां हा हा इति वचः बभूव - त्यावेळी लोकांमध्ये ‘ठीक झाले, ठीक झाले’ असा शब्द झाला. ॥३६॥
ज्याप्रमाणे इंद्राने वज्राने वृत्रासुराचे मस्तक उडवले होते त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी त्या चक्राने परम मायावी शाल्वाचे किरीटकुंडलयुक्त डोके धडापासून वेगळे केले. त्यावेळी शाल्वाच्या सैनिकांत हाहाकार उडाला. (३६)


( अनुष्टुप् )
तस्मिन्निपतिते पापे सौभे च गदया हते ।
नेदुर्दुन्दुभयो राजन् दिवि देवगणेरिताः ।
सखीनां अपचितिं कुर्वन् दन्तवक्रो रुषाभ्यगात् ॥ ३७ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे
सौभवधो नाम सप्तसप्ततितमोऽध्यायः ॥ ७७ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
( अनुष्टुप् )
मेला पापी असा शाल्व विमान तुटले तसे ।
दंतवक्त्र तदा आला क्रोधोनी सूड घ्यावया ॥ ३७ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सत्त्याहत्तरावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

राजन् - हे परीक्षित राजा गदया तस्मिन् पापे निपतिते - गदेने तो पापी शाल्व पडला असता सौभे च हते - आणि सौभ नाश पावले असता देवगणेरिताः दुन्दुभयः - देवांच्या संघांनी वाजविलेल्या दुंदुभी दिवि नेदुः - आकाशात शब्द करू लागल्या (तदा) सखीनां अपचिति कुर्वन् दन्तवक्रः - मित्रांच्या ऋणांची फेड करणारा दंतवक्र रुषा अभ्यगात् - रागाने धावत आला. ॥३७॥ सत्त्याहत्तरावा अध्याय समाप्त
परीक्षिता ! पापी शाल्व जेव्हा मरण पावला आणि त्याच्या विमानाचासुद्धा गदेच्या प्रहाराने चक्काचूर झाला, तेव्हा देव आकाशात दुंदुभि वाजवू लागले. याचवेळी मित्रांच्या वधाचा बदला घेण्यासाठी दंतवक्त्र अत्यंत क्रुद्ध होऊन तेथे आला. (३७)


अध्याय सत्त्याहत्तरावा समाप्त

GO TOP