॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीहरिविजय ॥

॥ अध्याय पहिला ॥

संत्रस्त देव विष्णूकडे येतात -

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥
श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
श्रीरुक्मिणीपांडुरंगाभ्यां नमः ॥
ॐ नमोजी जगद्‌गुरु उदारा । श्रीमद्‌भीमातीरविहारा ।
पुराणपुरुषा दिगंबरा । ब्रह्मानंदा सुखाब्धे ॥१॥
तूं सकळश्रेष्‍ठ साचार । तूंचि आदि मायेचा निजवर ।
ब्रह्मा विष्णु महेश्वर । तिघे पुत्र निर्मिले ॥२॥
अनंत ब्रह्मांडें त्यांहातीं । तूंचि घडविसी जगत्पती ।
सकळ देव वर्तती । तुझिया सत्तेकरुनियां ॥३॥
तूंचि जाहलासी गजवदन । चतुर्दश विद्यांचें भुवन ।
महासिद्धि कर जोडून । सदा तिष्‍ठती तुजपुढें ॥४॥
जय अनंतकल्याणवरदमूर्ती । त्रैलोक्यभरित तुझी कीर्ती ।
सुरासुर तुज नमिती । श्रीगणपति दयार्णवा ॥५॥
अरुणसंध्यारागरत्‍नज्योती । कीं उगवला बाळगभस्ती ।
तैसी गणपति तुझी अंगकांती । आरक्तवर्ण दिसतसे ॥६॥
कीं शेंदुरें चर्चिला मंदाराचळ । परम तेज झळके सोज्ज्वळ ।
विशाळ उदर दोंदिल । माजी त्रिभुवन सांठवलें ॥७॥
दुग्धसमुद्रीं ओपिलें । कीं निर्दोष यश आकारलें ।
तैसें शुभ्र वस्त्र परिधान केलें । ध्यानीं मिरवलें भक्तांच्या ॥८॥
विनायकरिपूचें कटिसूत्र । तळपे विराजमान विचित्र ।
जांबूनद सुवर्ण पवित्र । त्याचे अळंकार सर्वांगी ॥९॥
जैसा पौर्णिमेचा नक्षत्रनाथ । तैसा एक दंत झळकत ।
कीं सौदामिनी लखलखित । मेघमंडळावेगळी ॥१०॥
परशु अंकुश इक्षुदंड । पाश गदा दंतखंड ।
पंकज आणि कोदंड । अष्‍ट हस्तीं आयुधें ॥११॥
गणपति तुझें नृत्य देखोन । सदाशिव सदा सुप्रसन्न ।
सकळ देव टाळ घेऊन । उभे राहती नृत्यकाळीं ॥१२॥
धिमकिटि धिमकिटि तकधा विचित्र । रागगौलता संगीतशास्‍त्र ।
नृत्यकळा देखोनि देवांचे नेत्र । पातीं हालवूं विसरले ॥१३॥
गंडस्थळींचा दिव्य आमोद । त्यावरी रुणझुणती षट्‌पद ।
सव्यभागीं देवांचे वृंद । वाम भागीं दानव पैं ॥१४॥
अष्‍टसिद्धि चामरें घेऊनी । वरी वारिती अनुदिनीं ।
शृंगी भृंगीं मृदंगी दोनी । वाद्यकळा दाविती ॥१५॥
सुरासुर पाहती नृत्यकौतुक । जेथें जेथें तुटे थाक ।
मान तुकाविती ब्रह्मादिक । तालसंकेत देखतां ॥१६॥
हस्तसंकेत दावी गणपती । तडित्प्राय मुद्रिका झळकती ।
सर्व अळंकारांची दीप्ती । पाहतां भुलती शशि-सूर्य ॥१७॥
ऐसा तूं महाराज गणनाथ । तुझें कोणा वर्णवे महत्त्व ।
आरंभिला हरिविजय ग्रंथ । पाववीं हा सिद्धीतें ॥१८॥
जैसा अर्भक छंद घेत । पिता कौतुकें लाड पुरवीत ।
तैसी येथें पदरचना समस्त । गजवदना पुरवीं तूं ॥१९॥
तुझें नाम घेतां गणपती । विघ्ने बारा वाटा पळती ।
जैसा प्रकटतां झंजामारुत । जलदजाल वितुळे पैं ॥२०॥
मृगेंद्र येतो ऐकतां कानीं । मातंगा पळतां थोडी मेदिनी ।
कीं हरिनामघोष ऐकतां कानीं । दूरी पळती भूतें प्रेतें ॥२१॥
कीं जागा देखोनि घरधनी । तस्कर पळती तेच क्षणीं ।
तैसें तुझें नाम घेतां वदनीं । विघ्नें पळति गजवदना ॥२२॥
देवा तुझें स्तवन न करवे । आकाशा गवसणी न घालवे ।
जलनिधि कैसा सांठवे । मुंगीचिया उदरांत ॥२३॥
पृथ्‍वीचें वजन न करी कोणी । मुष्‍टीं न माये वासरमणी ।
ब्रह्मांड विदारिता वायु बांधोनी । पालवीं कोणा आणवे ॥२४॥
ऐसा तूं सिद्धिविनायक । तुज दुसरा नसे नायक ।
तुझ्या कृपेनें सकळिक । शब्दब्रह्म आकळे ॥२५॥
आतां नमूं वागीश्वरी । परा पश्यंती मध्यमा वैखरी ।
चहूं वाचांची ईश्वरी । कमलोद्‌भवतनया जे ॥२६॥
अंबे तुझी कृपा जोडे । तरी मुकाही वेदशास्त्र पढे ।
तूं स्नेहें पाहसी पाषाणाकडे । तरी तो होय महामणी ॥२७॥
मात तुझेनि वरदानें । जन्मांधही पारखी रत्‍नें ।
रंक ते होती राणे । कृपेनें तुझ्या सरस्वती ॥२८॥
तूं कविमानसमांदुसरत्‍न । सकल मातृकांचें निजजीवन ।
अंबे तुझें चातुर्य देखोन । रमा उमा लज्जित ॥२९॥
तुझें सौंदर्य देखोनि गाढें । मन्मथ होवोनि राहिलें वेडें ।
अष्‍टनायिका तुजपुढें । अधोवदन पाहती ॥३०॥
तूं बोलसी जेव्हां वागीश्वरी । दंततेजें झळके धरित्री ।
तेथींचे खडे निर्धारीं । पद्मराग पैं होती ॥३१॥
अंबे तुझे जेथें उमटती चरण । तेथें लोळे वसंत येऊन ।
त्या सुवासा वेधून । भ्रमर तेथें रुंजती ॥३२॥
तुझ्या आंगींच्या सुवासेंकरुनी । दाही दिशा गेल्या भरोनी ।
परब्रह्मीं उठली जे ध्वनी । आदिजननी तेचि तूं ॥३३॥
तप्तसूर्या जैसें सुरंग । तैसें जननि तुझें सर्वांग ।
पंकजनेत्र सुरेख चांग । अधर बिंबासारिखे ॥३४॥
सरळ नासिका विशाळ भाळ । कर्णीं ताटंकांचा झळाळ ।
कीं शशि सूर्य निर्मळ । कर्णीं येऊन लागले ॥३५॥
कर्णीं मुक्तघोंस ढाळ देती । गंडस्थळीं दिसे प्रदीप्ती ।
कीं नक्षत्रपुंज एकत्र स्थिती । कर्णीं लागती शारदेच्या ॥३६॥
गळां मोतियांचे दिव्य हार । शुभ्र कंचुकी शुभ्र वस्त्र ।
आपादमस्तकावरी समग्र । दिव्य अलंकार झळकती ॥३७॥
आरुढली हंसासनी । दिव्य वीणा हातीं घेऊनी ।
आलाप करितां मधुर ध्वनी । सुरवर आयकोनि तटस्थ ॥३८॥
सुरासुर गण गंधर्व । सिद्ध चारण मुनिपुंगव ।
अंबे तुझ्या चरणीं भाव । धरिती सर्व आदरें ॥३९॥
श्रीधर निजभावेंकरुन । जननि तुज अनन्यशरण ।
माझ्या जिव्हाग्रीं राहोन । हरिविजयग्रंथ बोलवीं ॥४०॥
गणेशसरस्वतीचें स्तवन । वदविलें जेणें दयेंकरुन ।
तो ब्रह्मानंद श्रीगुरु पूर्ण । त्याचे चरण वंदुं आतां ॥४१॥
तो ब्रह्मानंद पिता निश्चितीं । सावित्री तयाची शक्ती ।
हीं तों आदिपुरुष मूळप्रकृति । माता पिता वंदिलीं ॥४२॥
ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम करुन । वानप्रस्थही आचरुन ।
संन्यासदीक्षा घेऊन । त्रिविध आश्रम त्यागिले ॥४३॥
पंढरीये भीमातटीं । समाधिस्थ वाळवंटीं ।
पूर्णज्ञानी जैसा धूर्जटी । तापसियांमाजी श्रेष्‍ठ ॥४४॥
ज्यासी बाळपणापासून । परनारी मातेसमान ।
परद्रव्य पाहे जैसें वमन । आनंदघनस्वरुप पैं ॥४५॥
कामादिक षड्‌वैरी । जेणें लोटोनि घातले बाहेरी ।
ज्याच्या कृपावलोकनें निर्धारीं । ज्ञान होय प्राणियां ॥४६॥
जें निस्सीम वेदांतज्ञान । तें ज्यास करतलामलक पूर्ण ।
वंदिले तयाचे चरण । ग्रंथारंभीं आदरें ॥४७॥
गुरुपद सर्वांत श्रेष्‍ठ । त्याहून नाहीं कोणी वरिष्‍ठ ।
कल्पवृक्ष म्हणावा विशिष्‍ट । तरी कल्पिलें पुरवी तो ॥४८॥
मातापितयांसमान । जरी म्हणावा सद्‌गुरु पूर्ण ।
ती उपमा येथें गौण । न घडे जाण सर्वथा ॥४९॥
ज्या ज्या जन्मा जाय प्राणी । तेथें मायबापें असती दोनी ।
परी सद्‌गुरु कैवल्यदानी । तो दुर्लभ सर्वदा ॥५०॥
जरी अनंत पुण्यांच्या राशी । तरीच भेटी सद्‌गुरुसी ।
नाहीं तरी व्यर्थ नरदेहासी । येऊनि सार्थक काय केलें ॥५१॥
श्रीगुरुवांचोनि होय ज्ञान । हें कालत्रयीं न घडे पूर्ण ।
आत्मज्ञानावांचून । सुटका नव्हे कल्पांतीं ॥५२॥
श्रीरामावतार परिपूर्ण । तोही धरी वसिष्‍ठाचे चरण ।
श्रीकृष्ण ब्रह्म सनातन । अनन्यशरण सांदीपना ॥५३॥
व्यास नारदासी शरण रिघे । इंद्र बृहस्पतीच्या पायां लागे ।
उमा शिवासी शरण रिघे । आत्मज्ञानप्राप्तीसी ॥५४॥
शुक नारद प्रल्हाद । वाल्मीक वसिष्‍ठादि ऋषिवृंद ।
इतुकेही गुरुपदकमळींचा आमोद । भ्रमर होऊनि सेविती ॥५५॥
उद्धवअर्जुनादिक भक्त । गुरुभजनीं रतले समस्त ।
अपरोक्षज्ञान प्राप्त । सद्‌गुरुवांचूनि न घडे ॥५६॥
दुग्धींच नवनीत असे । हें आबालवृद्ध जाणतसे ।
परी मंथनाविण कैसें । हातीं सांपडे सांग पां ॥५७॥
उगेंचि दुग्ध घुसळिलें । अवघा वेळ जरी शोधिलें ।
परी तें हातवटीवेगळें । नवनीत न सांपडे ॥५८॥
जेथें जेथें प्राणी बैसत । तेथें तेथें निधानें असती बहुत ।
परी अंजन नेत्रीं न घालितां सत्य । न सांपडती खणितांही ॥५९॥
नेत्र उत्तम सतेजपणीं । परी नुगवतां वासरमणी ।
जवळी पदार्थ असोनी । न दिसे नयनीं प्राणियां ॥६०॥
तैसें सदगुरुसी शरण न रिघतां । अपरोक्षज्ञान न लागे हाता ।
यालागीं ब्रह्मानंदासी तत्त्वतां। शरण अनन्य मी असें ॥६१॥
श्रीगुरुराया तूं समर्थ । हा हरिविजय आरंभिला ग्रंथ ।
शेवटासी पावो ययार्थ । तुझ्या वरेंकरुनियां ॥६२॥
तूं मेघ वर्षसी दयाळ । तरीच हें ग्रंथरोप वाढेल ।
साधकचातक तृप्त होतील । भक्तीची ओल बहु होय ॥६३॥
माता करी प्रतिपाळ । तों तों वाढों लागे बाळ ।
तुझ्या कृपेविण बोल । न बोलवे सर्वथा ॥६४॥
जोंवरी नाहीं वाजविता । तों पांवा न वाजे सर्वथा ।
सूत्रधार न हालवितां । काष्ठपुतळा नाचेना ॥६५॥
ऐसें ऐकोनि श्रीगुरुनाथ । म्हणे सिद्धी पावेल सकळ ग्रंथ ।
आतां वंदूं श्रोते संत । जे कृपावंत सर्वदा ॥६६॥
जे चातुर्यार्णवींचीं रत्‍नें । कीं शांतिभूमीचीं निधानें ।
की भक्तिवनींचीं सुमनें। विकासली साजिरीं ॥६७॥
कीं ते वैराग्यअंबरीचें दिनकर । कीं अक्षय विज्ञानानंदचंद्र ।
कीं अपरोक्षज्ञानसमुद्र । न लागे अंत कोणातें ॥६८॥
कीं ते प्रेमगंगेचे ओघ । कीं ते स्वानंदसुखाचे मेघ ।
अखंड धारा अमोघ । वर्षती मुमुक्षुचातकां ॥६९॥
कीं ते श्रवणामृताचे कुंभ । कीं ते कीर्तनाचे अचल स्वयंभ ।
कीं ते स्मरणाचे सुप्रभ । ध्वजचि पूर्ण उभारले ॥७०॥
कीं ते हरिपद्मींचे भ्रमर । कीं विवेकमेरुचीं शृंगें सुंदर ।
कीं ते क्षमेचें तरुवर । चिदाकाशीं उंचावले ॥७१॥
कीं ते मननजळींचे मीन । कीं ते भवगजावरी पंचानन ।
कीं परमार्थाचीं सदनें पूर्ण । निर्मळ शीतळ सर्वदा ॥७२॥
कीं ते दयेचें भांडार । की उपरतीचें माहेर ।
कीं कीर्तीचीं जहाजें थोर । भक्तिशीड फडकें वरी ॥७३॥
कीं ते परलोकींचें सोयरे सखे । कीं ते अंतकाळींचे पाठिराखे ।
वैकुंठनाथ ज्यांचे भाके । गुंतोनि तिष्ठे त्यांपाशी ॥७४॥
ऐसें ते महाराज संत । जे सकळांवरी कृपावंत ।
जे दीनवत्सल भेदरहित । आपपर नेणती जें ॥७५॥
देवांसमान म्हणावे संत । हे गोष्‍टीच असंमत ।
देव जैसी भक्ति देखती सत्य । होती तैसे प्रसन्न ॥७६॥
जे सेवा करिती बहुत । त्यांस उत्तम फळ देत ।
जे भजन न करिती यथार्थ । त्यांवरी देव कोपती ॥७७॥
त्यांसी दरिद्र आणोनी । प्राणियांसी पाडिती अधःपतनीं ।
तैसी नव्हे संतांची करणी । समसमान सर्वांतें ॥७८॥
सर्वांवरी दया समान । एक उत्तम एक हीन ।
हें न देखतीच संत पूर्ण । जन वन समान तयांसी ॥७९॥
एकाचें करावें कल्याण । न भजे त्यांचे अकल्याण ।
देवांचें कर्तृत्व पूर्ण । संत समान सर्वांतें ॥८०॥
जैसा कायेचा विचार होतसे । तैसी तैसी छाया दिसे ।
आपण बैसतां छाया बैसे । उठतां उभी ती होय ॥८१॥
जैसी काया तैसी छाया । याच प्रकारें देवांची क्रिया ।
तैसी नव्हे संतांची चर्या । समसमान सर्वांसी ॥८२॥
वरकड जनांसमान संत । ऐसी बोलतांचि मात ।
तो पावेल अधःपात । दुष्टबुद्धि दुरात्मा ॥८३॥
समुद्र आणि सौंदणी । तारांगण आणि वासरमणी ।
काचोटी आणि महामणी । मेरु मशक सम नव्हे ॥८४॥
थिल्लर आणि गोदावरी । राजा आणि दरिद्री ।
योगी आणि दुराचारी । कैसे समान होती पैं ।८५॥
कस्तुरी आणि कोळसा । केसरी आणि म्हैसा ।
मनुष्य आणि महेशा । कैसी साम्यता होईल ॥८६॥
सुपर्ण आणि वायस । पाषाण आणि परीस ।
बाभळ आणि सुरतरूस । समानत्व कदा नव्हेचि ॥८७॥
तैसे संत आणि इतर जन । जे लेखिती समसमान ।
ते नरदेहासी येऊन । पशू जैसे मूढ पैं ॥८८॥
असो ऐसा संतांचा महिमा । वर्णूं न शकती शिव ब्रह्मा ।
संतसंगाच्या सुखाची सीमा । न करवेचि कवणातें ॥८९॥
ते संत महाराज सज्जन । ग्रंथारंभीं तयांसी नमन ।
श्रीवेदव्यास जगद्‌भूषण । सत्यवतीसुत पैं ॥९०॥
ज्याचिया मुखकमळापासून । चिद्रस द्रवला परिपूर्ण ।
त्या वाङ्‌मय अमृतेंकरुन । त्रिजग जाण धालें हो ॥९१॥
कीं एकमुखाचा ब्रह्मदेव । कीं साक्षात्‌ द्विबाहु रमाधव ।
कीं भाललोचन शिव । स्वयमेव अवतरला ॥९२॥
तो महाराज कृष्णद्वैपायन । अवतरला लोकहितालागून ।
सदा निगमकमलविकास पूर्ण । व्यास चंडांशु देखतां ॥९३॥
जो वसिष्‍ठाचा पणतू होय । शक्तीचा पुत्र निःसंशय ।
त्या परशरसुताचें पाहें । महत्त्व कोणा वर्णवे ॥९४॥
ऐसा तो शुकतात पूर्ण । सत्यवतींचें हृदयरत्‍न ।
त्या जगद्‌गुरुचे चरण । प्रेमभावें वंदिले ॥९५॥
नमूं तो वाल्मीकि आतां । जो शतकोटिग्रंथकर्ता ।
जो नारदकृपेनें तत्त्वतां । श्रीरामकथा बोलिला ॥९६॥
ज्याच्या गोत्रीं जन्मलों स्पष्‍ट । नमूं तो स्वामी श्रीवसिष्‍ठ ।
ज्ञान ज्याचें अतिवरिष्‍ठ । शांतिक्षमेचा सागरु जो ॥९७॥
दर्भावरी जेणें पृथ्वी धरिली । रविसमान ज्याची शाटी मिरवली ।
कमंडलु ठेवूनि भूमंडळीं । कुंभोद्‌भव नेला साक्षीतें ॥९८॥
ही कथा सांगावी समस्त । तरी विशेष वाढेल ग्रंथ ।
ऐसा तो वसिष्‍ठमुनि समर्थ । नसे अंत ज्ञाना ज्याच्या ॥९९॥
जेणें उपदेशिला रघुनाथ । तो बृहद्वासिष्‍ठ श्रेष्‍ठ ग्रंथ ।
छत्तीस सहस्र श्लोक निश्चित । वाल्मीकिमुनिकृत पैं ॥१००॥
जो सूर्यवंशाचा आदिगुरु । जो ऋषींमाजी महामेरु ।
ज्याचें कुळीं व्यासमुनीश्वरु । रमानाथचि अवतरला ॥१०१॥
त्याच्या उदरीं चिद्रत्‍न । जन्मला शुक गुणनिधान ।
तेणें भागवताचें श्रवण । परीक्षितासी जाण करविलें ॥१०२॥
नमूं तो स्वामी शुक । जेणें जिंकिले अरि कामादिक ।
ज्याचें तपस्तेज अधिक । तमांतक दूसरा ॥१०३॥
शुक असतां शुद्धवनीं । छळूं आली रंभेची भगिनी ।
ती निस्तेज होऊनि ते क्षणीं । गेली लाजोनि स्वर्गातें ॥१०४॥
ज्याच्या मुखीं श्रीभागवत । प्रकटला दिव्य ग्रंथ ।
जेणें उद्धरिला अभिमन्युसुत । भागवतधर्म सांगोनियां ॥१०५॥
बहु पुराणें बहु ग्रंथ । त्यांत मुकुटरत्‍न भागवत ।
जैसा सकळांत मुख्य वैकुंठनाथ । तैसाचि ग्रंथ पूज्य हा ॥१०६॥
जैसा देवांमाजी सहस्रनयन । कीं द्विजांमाजी सुपर्ण ।
कीं तारागणांमाजी अत्रिनंदन । तैसें जाण भागवत ॥१०७॥
भोगियांमाजी धरणीधर । कीं तपियांत श्रेष्‍ठ पिनाकधर ।
कीं नवग्रहांमाजी दिनकर । श्रेष्‍ठ जैसा विराजे ॥१०८॥
कीं हरींमाजी हनुमंत । कीं बोलक्यांमाजी अंगिरासुत ।
कीं शास्त्रांमाजी वेदांत । मुख्य जैसें मान्य पैं ॥१०९॥
आश्रमांत चतुर्थाश्रम पूर्ण । कीं क्षेत्रांमाजी आनंदवन ।
कीं शस्त्रांमाजी सुदर्शन । तैसें जाण भागवत ॥११०॥
कीं वनचरांमाजी हरि थोर । कीं धनुर्धरांमाजी रघुवीर ।
कीं धातूंमाजी शातकुंभ सुंदर । तैसेंचि जाण भागवत ॥१११॥
त्याहीमाजी दशम । केवळ हरिलीला उत्तम ।
बोलिला व्याससुत परम । हृद्गत गुह्य जें कां ॥११२॥
दशम आणि हरिवंश । अनेक पुराणींच्या कथा विशेष ।
बोलिले कवि महापुरुष । श्रीकृष्णलीलामृत पैं ॥११३॥
तितुकियांचा जो मथितार्थ । तो हा हरिविजय ग्रंथ ।
दुजा नाहीं विपरीतार्थ । सत्य सत्य त्रिवाचा ॥११४॥
ऐका हो श्रोते सादर । संपलिया रामअवतार ।
पृथ्वीवरी दैत्य थोर । मागुती सैरा माजले ॥११५॥
कंस चाणूर मुष्टिक । अघ बक केशी प्रलंबादिक ।
शिशुपाळ वक्रदंत चैद्यनायक । जरासंध माजला ॥११६॥
जरासंधाच्या बंदिशाळे । बावीस सहस्र राजे पडिले ।
भौमासुर माजला बळें । लोक पीडिले चतुर्दश ॥११७॥
बाणासुर कालयवन । करिती पृथ्वीचें कंदन ।
गायी आणि ब्राह्मण । टाकिती मारुन दुरात्मे ॥११८॥
कौरव दुष्ट माजले । राक्षस पुन्हां जन्मले ।
कलींचे स्वरुप सगळें । दुर्योधन जन्मला ॥११९॥
कंस आणि कालयवन । मोडिती ब्राह्मणांचीं सदनें ।
जो करी विष्णुभजन । त्यासी मारुन टाकिती ॥१२०॥
न चाले अनुष्ठान तप । राहिले ऋषींचे ध्यान जप ।
वर्तूं लागलें थोर पाप । धरा कंप जाहला ॥१२१॥
गायीच्या स्वरुपें धरित्री । उभी ठाकली ब्रह्म्याच्या द्वारीं ।
हांक फोडोनि आक्रोश करी । बुडालें बुडालें म्हणतसे ॥१२२॥
मज न सोसवे दैत्यभार । पाप वर्तलें अपार ।
सकळ विष्णुभक्त द्विजवर । पीडिले फार दैत्यांनीं ॥१२३॥
ऐसी पृथ्वी आक्रंदतां । जवळी आला जगत्पिता ।
पृथ्वीस म्हणे तूं आतां । चिंता न करीं येथोनी ॥१२४॥
जैसे पर्जन्यकाळीं गंगेचे पूर । तैसे आले ऋषींचे भार ।
ब्रह्मयासी म्हणती विप्र । अनर्थ थोर मांडला ॥१२५॥
एक म्हणती कंसे गांजिलें । एक म्हणती कालयवनें पीडिलें ।
एक म्हणती यज्ञ मोडिले । भौमासुरें चांडाळें ॥१२६॥
एक म्हणती कन्या धरोनी । गेला भौमासुर घेऊनी ।
स्त्रिया भ्रष्टविल्या दैत्यांनीं । ऐसें पाप अवनीं वर्तत ॥१२७॥
अवघ्या प्रजा येऊन । ब्रह्म्यापुढें करिती रुदन ।
तो कोल्हाळ ऐकोन । विस्मित जाहला परमेष्‍ठी ॥१२८॥
देवांसमवेत सहस्रनयन । तोही आला न लागतां क्षण ।
वंदिले विष्णुपुत्राचे चरण । अतिप्रीतीं ते वेळीं ॥१२९॥
ब्रह्मा म्हणे सहस्रनेत्रा । आतां जावें क्षीरसागरा ।
गार्‍हाणें सांगावें जगदुध्दारा । तरीच कार्य साधेल ॥१३०॥
आतां देव ऋषि प्रजानन । सांगातें घेऊनि चतुरानन ।
क्षीरसागरा जाऊन । कैसें स्तवन करतील ॥१३१॥
कैसा क्षीरसागरींचा महिमा । कोणे रीतीं तेथें परमात्मा ।
शौनकादि विप्रोत्तमां । सूत सांगे कथा हेचि ॥१३२॥
परीक्षितीसी सांगे व्यासनंदन । जनमेजयासी सांगे वैशंपायन ।
तेंच प्राकृत भाषेंत पूर्ण । श्रीधर सांगे श्रोतयां ॥१३३॥
ब्रह्मानंदरूप तुम्ही श्रोते । कथा ऐका सावधचित्तें ।
जे ऐकतां समस्तें । कलिकिल्बिषें भस्म होती ॥१३४॥
इति हरिविजय ग्रंथ । सम्मत हरिवंश भागवत ।
चतुर संत श्रोते ऐकोत । प्रथमोऽध्याय गोड हा ॥१३५॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीगणेशाय नमः । श्रीहरीला वंदन असो. श्रीपांडुरंग हेच माझे सर्वस्व आहे. पांडुरंगा ! गणेश, सरस्वती, गुरू, सिद्धिविनायक, हे सारे देव म्हणजे तूच. आदिमाये, पांडुरंगा श्रीहरी तुम्ही सारे एक असून अनेक जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारे, सर्वत्र सदा वर्तमान आहात. मी सर्वव्यापी अशा लक्ष्मीनारायणांना शरण आहे. हरिविजय ग्रंथ लिहिण्यास तुम्हीच प्रेरक व संकल्प सिद्धीस नेणारे आहात ! आणि गुरुवाचून आत्मज्ञान नाही व आत्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही. त्या ब्रह्मानंद गुरूंच्या कृपेने व त्यांना वारंवार नमन करून हा ग्रंथ मी लिहीत आहे. चालते बोलते ईश्वरच असे संत ! त्यांनाही मी वंदन करीत आहे. व्यास, वाल्मीकी, वसिष्ठ, शुक, नारद या परम भक्तांना व ऋषींना मी वंदन करुन हा हरिविजय ग्रंथ शब्दबद्ध करीत आहे.

श्रीरामावतार समाप्त होऊन पुष्कळ काळानंतरची कथा आहे. द्वापर युगाचा अंत जवळ आला होता. राक्षस आता क्षत्रिय राजांच्या रूपाने अवतरले होते. महाबलिष्ठ झाले होते. दुष्टबुद्धीचे होते. साधूंना छळीत होते. आपसांतही लढाया वारंवार करीत. विष्णूचा व वैष्णवांचा तर फारच द्वेष करीत. यज्ञांचा विध्वंस करीत. हजारो राजांना बंदीत टाकणारा जरासंध तर यज्ञात माणसांचा बळी देई ! नरकासुराने सहस्रावधी कन्या बंदीत ठेवल्या होत्या. कंस, शिशुपाल, दंतवक्र, चाणूर, अघ, बक, केशी हे दैत्यच होते. मायाशक्ती साध्य केलेला शाल्व अजिंक्य होता. सर्वत्र हे लोक माजले होते. प्रजेचे रक्षण, पालन करण्याचे क्षात्र कर्तव्य विसरून राजे प्रजेचे हाल करीत. हे राजे जुगार खेळत, मनसोक्त मद्य पीत, गाई पळवून नेत, प्रजा दरिद्री झालेली होती. कारण राजे व त्यांचे हस्तकच मुळी प्रजांना लुटीत ! बाणासुर, कालयवन, दुर्योधनादि कौरव, यांच्यासारख्यांचा अनाचार वाढत होता. देवांची व ब्राह्मणांची छळणूक होत होती. या पापामुळे पृथ्वी त्रस्त झाली. गाईचे रूप घेऊन हंबरू लागली. ऋषीमुनींनी विष्णूला साकडे घातले. इंद्रही तिथे आला. त्यांनी ठरविले की आपण सर्वांनी विष्णूला शरण जावे. त्यानेच दुष्टांचे शासन व साधूंचे रक्षण करावे. आपले बळ कमी पडते. आपला इलाज चालत नाही.

सारे देव, ऋषी, ब्रह्मा, इंद्र आणि गोरूपाने पृथ्वी क्षीरसागरी विष्णूकडे गेली ! विष्णूला सारे शरण गेले. विष्णूचे त्यांनी दर्शन घेतले. त्याची स्तुती केली ! त्याचे वर्णन दुसर्‍या अध्यायात श्रवण करावे.
अध्याय १ समाप्त.
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


GO TOP