समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध २ रा - अध्याय ७ वा

भगवंताच्या लीलावतारांच्या कथा -

ब्रह्मदेव म्हणाले -
(वसंततिलका)
जेंव्हा धरा प्रलयकालि बुडोनि गेली
    तेंव्हा तिला उचलण्यास वराह रूपा ।
घेऊनि दैत्य वधिला तुकडे करोनी
    कापीयले शचिवरे गिरिपंख जैसे ॥ १ ॥
आकूति आणि रुचिच्या उदरी पुन्हा तो
    सूयज्ञ नाम धरूनी स्वय जन्मला नी ।
ती दक्षिणा वरियली सुयमा म्हणुनी हरी तो ॥ २ ॥
पोटास कर्दममुनी अन देवहूती
    जन्मून ते कपिल नाम धरी हरी तो ।
झाल्या नऊ बहिणि त्या,अन बोधिली त्या
    मातेस उद्धरियले निजरूपि नेले ॥ ३ ॥
तो पुत्ररूप असणे भगवान् असेचि
    अत्री मनात स्मरता अवधूत झाला ।
बाहू सहस्र ययि अर्जुन उद्धरीला
नी भोग मोक्ष असल्या वरिल्याहि सिद्धी ॥ ४ ॥
पाहूनि घोर तप ते मजला प्रसन्न
    होऊनि तो सनकपुत्र सनंदनो नी ।
सनत् कुमार नि तसाचि सनतनोहि
    ते बोधिले ऋषि मुनी प्रलयोत्तरे की ॥ ५ ॥
ती धर्मपत्‍नि अन दक्ष सुताचि मूर्ती
    नारायणो नर तिच्या उदरासि आले ।
त्यांच्या तपास बघुनी तयि अप्सराही
    भानास त्या हरपल्या मग विघ्न कैसे ॥ ६ ॥
क्रोधासि जाळिती शिवापरि थोर संत
    पै क्रोध जाळि तनु त्यां नच कोणि जाळी ।
नारायणो नर ययां हृदयात जाता
    क्रोधास भीती गमली मग काम काय ॥ ७ ॥
उत्तनपाद पितया जवळी नि अंकी
    बैसू न दे सुरुचि ती ध्रुव बाळकाला ।
तो बाळ घोर तप आचरुनी पदाला
    गेला तयास ऋषि ते करितात फेर्‍या ॥ ८ ॥
वेनास शाप मिळता धन पौरूषो हे
    नष्टोनि जाय, तदि देह मथून त्या ।
जन्मास ये पृथु तये पृथिवीस धेनू
    देवूनि रूप मथिल्या सगळ्याहि वल्ली ॥ ९ ॥
नाभी सुदेवि उदरी ऋषभावतारी
    असक्ति सर्व त्यजुनी स्वरूप्र्र् निमाले ।
वेड्यापरीच हरि योग करून राही
    संबोधिती ऋषि तया अवधूत नामे ॥ १० ॥
माझ्याचि यज्ञि पुरुषी हयग्रीव रूप
    घेवूनि दिव्य तनु स्वर्ण प्रकाशदिव्य ।
तो छंद यज्ञ अन देव अशा रूपाचा
    उच्छवास सोडित तयीं तिच वेदवाणी ॥ ११ ॥
मत्स्यस्वरूप धरिले, मनुसत्यव्रतो
    आराधिता, पृथिविते तरण्यास नौका ।
झाला समस्त जिव सृष्टिसी रक्षिण्याला
    वेदास रक्षुनि तदा फिरला जळात ॥ १२ ॥
जेंव्हा सुधा मिळविण्यास सुरासुसांनी
    मंद्राचळां घुसळिले क्षिरसागरात ।
होऊनि कुर्म, धरिला गिरि पाठ भागी
    खाजें तयास मिळली सुख शांति निद्रा ॥ १३ ॥
जेंव्हा भयात बुडल्या सुर देवता त्या
    तेंव्हा नृसिंह स्वरुपा धरिले भयान ।
दाढा प्रचंड जबडा बघणे तसेचि
    हिरण्यकश्यपु वधी नखिं पोट फाडी ॥ १४ ॥
मोठ्या तळ्यात धरि नक्र जधी गजेंद्रा
    तेंव्हा थकूनि सुमना वरि फेकि हत्ती ।
हे आदि तू पुरूष स्वामी तुला नमी मी
    कल्याण तूचि करिसी वदला असा तो ॥ १५ ॥
ऐकोनि हाक हरि तो गरुडासवे ये
    ते चक्र सोडुनि तये वधिलाही नक्र ।
ऐसा कृपावश तये धरियेलि सोंड
    आणीक मोक्ष दिधला गजराज याला ॥ १६ ॥
अदीति पुत्र लघुही गुणि तो विशेष
    त्या वामने बळिचिया हरिलेहि गर्वा ।
तीन्ही पदात मिळता जग दक्षिणा ती
    "भिक्षू विना न हटती धनवान" दावी ॥ १७ ॥
राजा बळी धरिपदा अपुल्या शिरासी
    तेणे तयास मिळले मग इंद्रस्थान ।
शुके स्वयेंहि-गुरुने अडवोनि त्यासी
    नाही परी बदलला बळि देहार्पी ॥ १८ ॥
तो प्रेमभाव बघुनी तुज पावला तो
    घेऊनि हंस रुप ते तुज बोध केला ।
तो हाचि भागवतधर्म पुढे निघाला
    तो पावतोचि शरणागत त्यास नित्य ॥ १९ ॥
स्वायंभुवादि मनुच्याहि रुपात तेणे
    रक्षीयला मनुजवंश सुदर्शनाने ।
ती कीर्तिही पसरली नि त्रिलोक गाजे
    होताचि भार पृथिवीस पुन्हाहि जन्मे ॥ २० ॥
स्वनाम धन्य भगवान् धनवंतरी ने
    तेंव्हा बहू कठिण रोग निवारिले ते ।
देवां सुधा पिववुनी अमरत्व देई
    तो आयुवेद पुढती जगतास लाभे ॥ २१ ॥
जेंव्हा जगात द्विजद्वेष घडे स्वकर्मे ।
काटे असे परशुन् मग छेदितो तो
    तो होतसे परशुराम सक्रोधरूपी ॥ २२ ॥
आम्हा प्रबोध करण्या अवतार घेई
    इक्ष्वाकुळी भरत लक्ष्मणाच्या सहीत ।
आज्ञा म्हणोनि रिघला वनि राहण्याला
    त्यासी विरोध करिता वधि राक्षसांना ॥ २३ ॥
सीतावियोग घडता फिरला वनात
    जै शंकरे त्रिपुर जळियले विमान ।
तैसे तदा नयनिलाल दिसेहि राम
    ती तप्त दृष्टि बघता जळि जीव मेले ॥ २४ ॥
तो इंद्रवाह टकरे जधि रावणाच्या
    वक्षस्थलास तयि भग्नचि दात झाले ।
तो गर्व त्यास भवला समरांगणात
    एका शरेचि हरितो हरि प्राण गर्व ॥ २५ ॥
झुंडी जधी पृथिविते छळिती असूरी
    तै श्वेत-कृष्णकच तो अवतार घेई ।
लीला तदा घडवितो अतिरम्य ऐशा
    कोणा कळे न कधिही महिमा तयाची ॥ २६ ॥
तो बालरूप पुतना वधिली तयाने
    गाडा पदे उचलिला दुर फेकिलाही
भारी तरु उखडिले नवलाव केला
    तो-तोचि हे करु शके इतरा न शक्य ॥ २७ ॥
ते वीष मिश्रित जलो पिउनी नदीते
    मले स्थळीच सखये-शिशु-गोपबाळ ।
त्यांना सुधामयिकृपे जिवदान केले
    सापास हाकलुनिया जळ शुद्ध केले ॥ २८ ॥
लागे तृणास वनवा जधि तो महान
    गोपाळ नेत्र मिटता गिळिलाहि अग्नि ।
रक्षीयलेचि हरिने सगळ्या जिवांना
    ऐशा अतर्क्य घडवी नवलाव लीला ॥ २९ ॥
बांधी तयास जननी जधि दोरखंडे
    जोडास जोड करुनी नपुरे हरीला ।
कृष्णांमुखीं बघितले जधि येश्वदेने
    पाहूनि विश्व सगळे भयभीत झाली ॥ ३० ॥
सर्पो तसेचि वरुणासह देवतांच्या
    पाशातुनी निजपित्या करि मुक्त कृष्ण ।
गुफेत बंद करिता जधि गोपबाळे
    व्योमासुरे तयिहि श्रीहरि सोदवी तो ।
गोकूळवासि जन ते श्रमती दिनासी
    रात्रीस ते थकुनिया मग झोप घेती ।
त्यांना कुठे समय साधन योग घेण्या
    त्यांनाहि मोक्ष दिधला नवलाव पाही ॥ ३१ ॥
निष्पाप नारद पहा जधि कृष्णबोधे
    केले न इंद्रवना वज्रि गोप यांनी ।
क्रोधे करी शतमखो दगडीच वृष्टी
    संरक्षणा हरि धरी नखि गोगिरीला ॥ ३२ ॥
वृंदावनी विहरता मग चांदण्यात
    वंशीत गीत मधुरो करिता तयाने ।
प्रेमे विबद्ध बनुनी मग गोपि येती
    शंखाचुडे सतविता वधिले तयाला ॥ ३३ ॥
चाणूर धेनुक बको अन तो प्रलंब
    केशी नि कालयवनादिक कंस मामा ।
भौमासुरो द्विविदवानर दंतवक्त्र
    शाल्वो नि रुक्मि कुरु कैकय सृजयादी ॥ ३४ ॥
येती जधी धनुष घेउनिया लढाया
    भीमार्जुना सहमते वधिही तयांना ।
लीला करोनि असल्या हरि तो निघेही
    वैकुठधामी निज जे स्वयमेव एक ॥ ३५ ॥
हे कालचक्र कलिचे समजूत गेली
    आयू कमीच अन वेद नजाणि कोणी ।
प्रत्येक कल्प सरता उदरी सतीच्या
    येऊनि वेद कथितो मग व्यास रूपे ॥ ३६ ॥
देवास जे असुनि शत्रु नि वेद मार्गी
    राहूनिही नगर ग्राम करीत भ्रष्ट ।
बुद्धावतार धरुनी शिकवेल त्यांना
    तो वेष कांहि अगळा विलसेल लोकी ॥ ३७ ॥
पाखंडि ते तिन्हिहि वर्णि कलीस अंती
    होऊनि शुद्र करतील जगात राज्य ।
स्वाहा स्वधा हि नच ये स्वर कोठुनीही
    तैं कल्कि होऊनि पुढे करतील राज्य ॥ ३८ ॥
सर्गी तपी नि नऊ जन्म् प्रजापतींचे
    मी आणि त्या मरिचिसी हरि तोच रक्षी ।
तो धर्म विष्णु मनुदेव तसेचि राजे
    तो रुद्र क्रोध वश शेष लयासि होतो ॥ ३९ ॥
जैसे धुळीस कण ते न गणीच कोनी
    तैशा विभूति अवतार लिला कितेक ।
जेंव्हा त्रिविक्रमरुपा धरिले तयाने
    कंपीत विश्व गमले,मग शांत झाला ॥ ४० ॥
ही सृष्टि तो रचियतो अन संहरेही
    सामर्थ्य मी नि सनाकादिक जाणिती ना ।
गातो हजार मुखिचा गुण ते सदैव
    ना तो तयाहि उमगे भगवंत रूप ॥ ४१ ॥
जे भार ठेवूनि मनीं भगवंत रूपा
    सर्वस्व त्या पदि तया मग अर्पितात ।
जो श्वान पुत्र असला विसरूनि भाव
    भक्ती करी सतत त्यासचि देव पावे ॥ ४२ ॥
त्याची अशीच सगळी नवलाव माया
    जाणी अगोदरचि मी नि पुन्हा तुम्ही ती ।
पश्चात शंकर मनू ध्रुव दैत्यबाळ
    प्राचीनबर्हि ऋभु ते सगळे पुन्हा की ॥ ४३ ॥
इक्ष्वाकु नी पुरुरवा मुचकुंद गाधी
    मांधात नी जनक सौभरि अंबरीष ।
अलर्क नी सगर आदि दिलीप भीष्म
    तै तो शिबी रघु अनू बलि रंतिदेव ॥ ४४ ॥
अर्जून नी विदुर श्रूत पराशारादी
    सारस्वतादि शतधन्व बिभीषणादी ।
उत्तंक धन्व हनुमान नि उद्धवाते
    ते थोर रूप प्रभुचे कळले महंता ॥ ४५ ॥
ज्यांना मिळे गुरुकृपा भगवंत दीक्षा
    ते शूद्र भिल्ल अन हूण तशा स्त्रियाही ।
पापी असोत पशुपक्षिहि पार झाले
    ते संत साधु तरती तई काय शंका ॥ ४६ ॥
तो शांत नी अभयसा अन ज्ञानरूपी
    नाही तयास मळ तो मग भेद कैचा ।
तो सत्य नी असत पार शब्दांपरा तो
    माया तयास बघुनी तशि लाजते की ॥ ४७ ॥
ते रूपची परम शांत अनंत मोदी
    जे ब्रह्मरूप गमते तयि शोक नाही ।
तेथे समाहित मना करितात योगी
    तो इंद्र काय उकरी जळ प्राशिण्याला ॥ ४८ ॥
कर्मास तो फलहि देइ स्वभाव जैसा
    आणिक कर्म रचना करितो तसाचि ।
तत्वे निघोनि जधि जात तदाच मृत्यु
    आत्मा निघोनि जरि जाय न होत नष्ट ॥ ४९ ॥
( अनुष्टुप् )
संकल्पे निर्मितो विश्व षडैश्वर्य असा हरी ।
सर्व भाव तयाचे ते परी तो भिन्न त्याहुनी ॥ ५० ॥
बोधिले भगवंताने भगवंतचि नाम हे ।
विभूती थोडक्या ऐशा पुढे तू वाढवी तया ॥ ५१ ॥
जेथे लोकास लाभेल भक्तिचे रस अमृत ।
श्रीहरीए पावतो जेणे सांगावा बोध तो जगा ॥ ५२ ॥
भगवत् शक्तिमायेचे करिती गुण गान जे ।
अथवा ऐकती कानीं तया ना मोह ही कधी ॥ ५३ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सातवा अध्याय हा ॥ २ ॥ ७ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP