श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय २ रा

पृषध्र इत्यादि मनूच्या पाच पुत्रांचा वंश -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - अशा प्रकारे जेव्हा सुद्युम्न वनात गेला, तेव्हा वैवस्वत मनूने पुत्रासाठी यमुनेच्या काठी शंभर वर्षेपर्यंत तपश्चर्या केली. त्यानंतर त्याने संतान प्राप्तीसाठी सर्वशक्तिमान भगवान श्रीहरींची प्रार्थना केली आणि आपल्याचसारखे दहा पुत्र प्राप्त केले. त्यांपैकी सर्वांन मोठा इक्ष्वाकू होता. (१-२)

त्या मनुपुत्रांपैकी एकाचे नाव पृषध्र होते. त्याला गुरू वसिष्ठांनी गाईंचे रक्षण करण्यासाठी नेमले. म्हणून तो रात्रीच्या वेळी अत्यंत सावधगिरीने वीरासनात बसून गाईंचे रक्षण करीत असे. एके दिवशी रात्री पाऊस पडत होता. त्यावेळी गाईंच्या गोठ्यात एक वाघ घुसला. त्याला भिऊन झोपलेल्या गाई उठून उभ्या राहिला. त्या गोशाळेमध्ये इकडे-तिकडे धावू लागल्या. बलवान वाघाने एका गाईपा पकडले. ती अत्यंत भयभीत होऊन हंबरू लागली. तिचा तो आक्रोश ऐकून पृषध्र गायीजवळ धावत गेला. रात्रीची वेळ आणि त्यात ढगांनी आच्छादिल्यामुळे तारेसुद्धा दिसत नव्हते. त्याने हातात तलवार घेऊन अजाणतेपणेच वाघ समजून वेगाने गाईचे शिर उडविले. तलवारीच्या टोकाने वाघाचासुद्धा कान तुटला. रस्त्यात रक्त गळत असलेल्या अवस्थेत तो अत्यंत भयभीत होऊन तिथून निघून गेला. शत्रुदमन पृषध्राला वाटले, वाघ मेला. परंतु सकाळी त्याने जेव्हा गाईलाच मारलेले पाहिले, तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले. पृषध्राने जाणून बुजून जरी अपराध केला नव्हता, तरीसुद्धा कुलपुरोहित वसिष्ठांनी त्याला शाप दिला की "या कर्मामुळे तू क्षत्रिय राहणार नाहीस. शूद्र होशील."

गुरुदेवांचा शाप पृषध्राने हात जोडून स्वीकारला आणि यानंतर त्याने मुनींना प्रिय असणारे नैष्टिक ब्रह्मचर्यव्रत धारण केले. सर्व प्राण्यांचा हेतुरहित हितैषी आणि सर्वांच्या समान भावनेने युक्त होऊन तो भक्तीमुळे परम विशुद्ध भगवान वासुदेवांचा अनन्य भक्त झाला. त्याची सर्वांविषयीची आसक्ति नाहीशी झाली. सर्व वृत्ती शांत झाल्या. इंद्रिये वश झाली. तो कधीही कोणताही संग्रह करीत नव्हता. दैववशात जे काही प्राप्त होत असे, त्यावरच तो आपला उदरनिर्वाह करीत असे. तो आत्मज्ञानाने संतुष्ट होता आपले चित्त परमात्म्यामध्ये स्थिर करून बहुतेक वेळ समाधिस्थच राहात असे. तो वेडा, आंधळा, अगर बहिरा असल्याप्रमाणे पृथ्वीवर संचार करीत असे. अशा प्रकारे राहात असलेल्या त्याने एकदा वनात भडकलेला वणवा पाहिला. मननशील पृषध्राने आपला देह त्या अग्नीत भस्म करून तो परब्रह्माला प्राप्त झाला (३-१४)

मनूचा सर्वांत लहान पुत्र कवी नावाचा होता. विषय भोगांबाबत तो अत्यंत निःस्पृह होता. राज्य सोडून तो आपल्या बंधूबरोबर वनात निघून गेला आणि स्वयंप्रकाश परमात्म्याला आपल्या हृदयसिंहासनावर विराजमान करून किशोर अवस्थेतच तो परम पदाला प्राप्त झाला. (१५)

मनुपुत्र करुषापासून कारुष नावाचे क्षत्रिय उत्पन्न झाले. ते मोठे ब्राह्मणभक्त, धर्मप्रेमी व उत्तरभागाचे रक्षण करणारे होते. धृष्टाचे धार्ष्ट नावाचे क्षत्रिय झाले. या शरीरानेच शेवटी ते ब्राह्मण झाले. नृगाचा पुत्र सुमती, त्याचा पुत्र भूतज्योती आणि भूतज्योतीचा पुत्र वसू होता. वसूचा पुत्र प्रतीक आणि प्रतीकाचा पुत्र ओघवान. ओघवानाच्या पुत्राचे नावसुद्धा ओघवानच होते. ओघवती नावाची त्यांना एक कन्या होती. तिचा विवाह सुदर्शनाशी झाला. मनुपुत्र नरिष्यन्तापासून चित्रसेन, त्याच्यापासून ऋक्ष, ऋक्षापासून मीढ्वान्, मीढ्वानापासून कूर्च आणि त्याच्यापासून इंद्रसेनाची उत्पत्ती झाली. इंद्रसेनापासून वीतिहोत्र, त्यापासून सत्यश्रवा, सत्यश्रवापासून उरुश्रवा आणि त्याच्यापासून देवदत्ताची उत्पत्ती झाली. (१६-२०)

देवदत्ताचा अग्निवेश्य नावाचा पुत्र झाला. तो स्वतः भगवान अग्निदेवच होता. तोच पुढे कानीन आणि महर्षी जारूकर्ण्य नावाने प्रसिद्ध झाला. परीक्षिता ! ब्राह्मणांचे आग्निवेश्यायन नावाचे गोत्र त्याच्यापासूनच चालत आले. अशा प्रकारे नरिष्यंताच्या वंशाचे मी वर्णन केले. आता दिष्टाचा वंश ऐक. (२१-२२)

दिष्टाच्या पुत्राचे नाव नाभाग होते. हा नाभाग दुसरा आहे. आपल्या कर्मांमुळे तो वैश्य झाला. त्याचा पुत्र झाला भलंदन आणि त्याचा वत्सप्रीती. वत्सप्रीतीचा प्रांशू आणि प्रांशूचा पुत्र प्रमती झाला. प्रमतीचा खनित्र, खनित्राचा चाक्षुष आणि त्याचा विविंशती. विविंशतीचा पुत्र रंभ आणि रंभाचा पुत्र खनिनेत्र. हे दोघेही धार्मिक होते. त्याचा पुत्र करंधम आणि करंधमाचा आवीक्षित. परीक्षिता ! आवीक्षिताचा पुत्र मरुत्त चक्रवर्ती राजा झाला. अंगिराचा पुत्र महायोगी संवर्त ऋषीने त्याच्याकडून यज्ञ करविला होता. मरुत्ताचा यज्ञ जसा झाला, तसा आणखी कोणाचाही झाला नाही. त्या यज्ञातील सर्व काही सोन्याचे असून जे काही होते ते अत्यंत सुंदर होते. त्या यज्ञामध्ये सोमपान करून इंद्र संतुष्ट झाला होता आणि भरपूर दक्षिणा मिळाल्याने ब्राह्मण तृप्त झाले होते. त्यात मरुद्‌गण अन्न वाढणारे आणि विश्वेदेव सभासद होते. (२३-२८)

मरुत्ताच्या पुत्राचे नाव दम होते. दमाचा राज्यवर्धन, त्यापासून सुधृती आणि सुधृतीला नर नावाचा पुत्र झाला. नरापासून केवल, केवलापासून बंधुमान, बंधुमानापासून वेगवान, वेगवानापासून बंधू आणि बंधूपासून राजा तृणबिंदूचा जन्म जाला. तृणबिंदू आदर्श गुणांचे भांडार होता. अप्सरांमधील श्रेष्ठ अलंबुषा देवीने त्याला वरले. तिच्यापासून त्याला अनेक पुत्र आणि इडविडा नावाची एक कन्या झाली. मुनिवर विश्रवाने आपले योगेश्वर पिता पुलस्त्य यांच्याकडून उत्तम विद्या प्राप्त करून घेऊन इडविडेपासून कुबेराला जन्म दिला. तृणबिंदूला विशाल, शून्यबंधू आणि धूमकेतू असे तीन पुत्र झाले. त्यांपैकी विशाल हा वंशधर झाला आणि त्याने वैशाली नावाचा नगरी वसविली. विशालाचा हेमचंद्र, हेमचंद्राचा धूम्राक्ष, धूम्राक्षाचा संयम आणि संयमाचे कृशाश्व व देवज असे दोन पुत्र झाले. कृशाश्वाच्या पुत्राचे नाव सोमदत्त होते, त्याने अश्वमेध यज्ञाने यज्ञपती भगवंतांची आराधना केली आणि योगेश्वर संतांचा आश्रय घेऊन उत्तम गती प्राप्त करून घेतली. सोमदत्ताचा पुत्र सुमती आणि सुमतीचा जनमेजय झाला. हे सर्व तृणबिंदूची कीर्ति वाढविणारे विशाल वंशातील राजे झाले. (२९-३६)

अध्याय दुसरा समाप्त

GO TOP