श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय छत्तिसावा


पांडवांकडून समेटाचा प्रयत्‍न


श्रीगणेशाय नम: ॥
श्रीपांडुरंगपुरविहारा ॥ ब्रह्मानंद अत्युदारा ॥
पुंडलीकवरदा रुक्मिणीवरा ॥ जगवंद्या जगद्‌गुरो ॥ १ ॥
विद्वजनविश्रामधामा ॥ योगिजनमनोविहंगमा ॥
द्वारकाधीशा पुरुषोत्तमा ॥ नामरूपातीत तूं ॥ २ ॥
गोपीनयनाब्जविकासमित्रा ॥ विषकंठवंद्या शतपत्रनेत्रा ॥
कमलोद्भवजनका नीलगात्रा ॥ सुत्रामा महिमा नेणेचि ॥ ३ ॥
उद्धवहृदयाब्जमिलिंदा ॥ अक्रूरचित्तचातकजलदा ॥
क्षीराब्धिजामाता सुखकंदा ॥ द्विरदवरदा द्विजेंद्रवहना ॥ ४ ॥
आनकदुंदुभितपमहोदया ॥ पीतवसना कमलालया ॥
तुझी लीला पंढरीराया ॥ येधूनि पुढें वदवावी ॥ ५ ॥
विराटपर्व मागें संपलें ॥ येथून उद्योगपर्व रसागळें ॥
वैशंपायनें कथियेलें ॥ वेदव्यासप्रसादें ॥ ६ ॥
जनमेजयाऐसा श्रोता ॥ व्यासशिष्य मुख्य सरस वक्ता ॥
तेणें गाइली जे कथा ॥ तेचि आतां परिसिजे ॥ ७ ॥
प्राकृतभाषा हे आरुष ॥ म्हणोनि न ठेवावा दोष ॥
मूल भारतींचा सारांश ॥ अर्थ चतुरीं विलोकावा ॥ ८ ॥
बहुत बोलतां वाढेल ग्रंथ ॥ ध्वनित बोलतां न कळे अर्थ ॥
पाल्हाळ संकोच टाकून परिमित ॥ रस सुरस वर्णिला ॥ ९ ॥
आद्यंत न पाहतां अर्थ ॥ द्वेषें दोष ठेवी अकस्मात ॥
जाणिजे तों शतमूर्ख निश्चित ॥ नव्हे पंडित विवेकी ॥ १० ॥
केवढी खळ आहे आपुली बुद्धी ॥ महाचतुरांचे ग्रंथ निंदी ॥
नसतां दोष ठेवी कुबुद्धी ॥ तरी पडेल बंदीं यमाचे ॥ ११ ॥
श्रीधर विनवी पंडितां ॥ पुढें ऐकावी रसाळ कथा ॥
विराटपर्व संपतां ॥ कथा शेवटीं वर्णिली ॥ १२ ॥
विराटें आपुली कन्या ॥ उत्तरा दिधली अभिमन्या ॥
सर्व नृप आले लग्ना ॥ आणि पांडवां भेटावया ॥ १३ ॥
विराटनगरासमीप ग्राम ॥ उपलव्य जयाचें नाम ॥
पांडव नृपांसहित परम ॥ सुखें तेथें राहिले ॥ १४ ॥
ब्रह्मानंदें पंडुनंदन ॥ सभेस बैसले आनंदघन ॥
चतुर वृद्ध परम निपुण ॥ विराट द्रुपद बैसती ॥ १५ ॥
सात्यकी आणि रेवतीरमण ॥ निकट बैसती प्रीतींकरून ॥
श्रीरंग आणि फाल्गुन ॥ नेटोनि जवळीं बैसती ॥ १६ ॥
नकुल सहदेव भीमसेन ॥ हे धर्माचे पाठीसी विराजमान ॥
द्रौपदीचे पंच नंदन ॥ आणि अभिमन्यू पुढें शोभे ॥ १७ ॥
आणीकही राजे आप्त ॥ सभोंवते बैसले समस्त ॥
धष्टद्युम्न आणि विराटसुत ॥ राजकुमार विराजती ॥ १८ ॥
वाद्यें राहवून समस्त ॥ उगे राहिले एक मुहूर्त ॥
कोणीही न बोले तेथ ॥ पाहती तटस्थ उगेचि ॥ १९ ॥
श्रीरंगाचें वदन ॥ समस्त पाहती विलोकून ॥
यावरी जो जगज्जीवन ॥ बोलता जाहला तेधवां ॥ २० ॥
कौरवांचे अन्याय बहुत ॥ तुम्हीं देखिले ऐकिले समस्त ॥
पंडुरायाचें राज्य यथार्थ ॥ हें विख्यात जाणतां कीं ॥ २१ ॥
जेणें स्वसत्तावसनेंकरूनी ॥ पालाणिली हे कुंभिनी ॥
सर्वही राजे जिंकूनी ॥ शत मख आचरला ॥ २२ ॥
त्या पंडुनृपाचे हे सुत ॥ त्रिभुवनीं विख्यात बलायत ॥
भीमार्जुनांचे पुरुषार्थ ॥ देखिलें कीं समस्तीं ॥ २३ ॥
हिडिंब बक किर्मीर ॥ कीचक मारिले समग्र ॥
त्या भीमास हे धार्तराष्ट्र ॥ मारितां अशक्य काय असे ॥ २४ ॥
खांडववन देऊन समग्र ॥ सुखी केला वैश्वानर ॥
निर्जरांसहित निर्जरेंद्र ॥ केला जर्जर समरांगणीं ॥ २५ ॥
निवातकवचांचा पुशिला ठाव ॥ शेवटीं कौरव पळविले सर्व ॥
गोग्रहणकालीं अभिनव ॥ पुरुषार्थ केला धनंजयें ॥ २६ ॥
ऐसा अंगीं पुरुषार्थ ॥ परी यांहीं रक्षिलें सत्य ॥
वनवास आणि अज्ञात ॥ त्रयोदश वर्षें क्रमियेलीं ॥ २७ ॥
अजातशत्रु धर्मनृपति ॥ केवळ भोळा चक्रवर्ती ॥
त्यास जिंकून कपटद्यूतीं ॥ गांजिली सती द्रौपदी ॥ २८ ॥
तरी दुर्योधनाचा समाचार ॥ घ्यावया आतां काय उशीर ॥
राज्यविभाग समग्र ॥ देतो किंवा नाहीं तों ॥ २९ ॥
नाहीं तरी तुम्ही आम्ही आप्त ॥ पांडवांचे आहों समस्त ॥
युद्ध करून अद्‌भुत ॥ कौरव दुष्ट संहारावे ॥ ३० ॥
मातेचिया कैवारें ॥ अवनी निःक्षत्रिय केली परशुधरें ॥
आतां द्रौपदीचे मिषें समग्रें ॥ कौरव सपक्ष आटती ॥ ३१ ॥
पंडूचे पंच कुलदीपक सुढाळ ॥ मम स्नेहें भरित तेजाळ ॥
त्यांवरी पडतां कौरवपतंग सकळ ॥ भस्म होती सपक्ष ते ॥ ३२ ॥
कीं उगवले पंचादित्य ॥ तेथें कायसे कौरव खद्योत ॥
त्रयोदश वर्षें रजनींत ॥ झगमगीत होते पैं ॥ ३३ ॥
पंच पांडव कुठार तीक्ष्ण ॥ मी धर्ता स्वसत्तेंकरून ॥
छेदीन कौरववृक्ष दारुण ॥ शाखांउपशाखांसमवेत ॥ ३४ ॥
कीं हे पांडव पंच प्रलयाग्न ॥ मी साह्य सबळ प्रभंजन ॥
कौरव शुष्ककटंकविपिनं ॥ जाळीन क्षण न लागतां ॥ ३५ ॥
यावरी बोले रोहिणीसुत ॥ होय धर्मदुर्योधनांचें हित ॥
तों प्रकार करावा बहुत ॥ दीजे राज्य अर्ध वांटूनी ॥ ३६ ॥
तरी एक शिष्ट द्यावा पाठवून ॥ त्यांचें करी समाधान ॥
विदुर कृपाचार्य भीष्म द्रोण ॥ तेथें वडील आहेत ॥ ३७ ॥
युद्ध न करावें साचार ॥ साम करावें हा निर्धार ॥
धर्में द्यूत घेऊन समग्र ॥ राज्य आपुलें हारविलें ॥ ३८ ॥
शकुनीचा अन्याय काय तेथ ॥ तों सात्यकी बोले क्रोधयुक्त ॥
म्हणे कृष्णाग्रजा तूं यथार्थ ॥ दुर्जनांचा पाठिराखा ॥ ३९ ॥
धर्मराज भोळा अत्यंत ॥ दुर्जनीं कपटें जिकिलें सत्य ॥
उद्यां कौरव रणीं मारून समस्त ॥ धर्मापुढें पहुडवीन ॥ ४० ॥
महापुरूषार्थी पंच वीर ॥ हे प्रतिपांडव पंच कुमार ॥
हा प्रत्युर्जन सौभद्र ॥ यापुढें समरीं कोण तगे ॥ ४१ ॥
क्षत्रियधर्म हा साचार ॥ कीं दुर्जन संहारावे समग्र ॥
दृष्टीं देखतां मारकविखार ॥ तोंड आधीं ठेचावें ॥ ४२ ॥
कीं वृश्चिक दृष्टीं देखोन ॥ पादरक्षेनें करिजे चूर्ण ॥
परपीडक संहारून ॥ आधीं टाकावे धर्म हा ॥ ४३ ॥
धर्में यावरी तत्त्वतां ॥ कदा न धरावी नम्रता ॥
राज्य न देतां समस्तां ॥ मृत्युनगरा धाडावे ॥ ४४ ॥
राज्य घ्यावें हिरोन ॥ अथवा आपले वेंचावे प्राण ॥
मग काय व्यर्थ वांचोन ॥ षंढवत संसारीं ॥ ४५ ॥
धर्मा ऐक माझें उत्तर ॥ धाकटे अथवा वडील वीर ॥
त्यांस सांगोन पाठवीं नमस्कार ॥ वचनें नम्र बोलावीं ॥ ४६ ॥
आपल्या सामर्थ्यवैभवेंकरून ॥ शत्रू विभांडावे संपूर्ण ॥
इतुकें नव्हे तरी कृष्णवदन ॥ करून जावें वनांतरीं ॥ ४७ ॥
पुरूषलक्षण हेंचि परम ॥ जो कुडींत आहे आत्माराम ॥
तोंवरी पुरूषार्थाचा संभ्रम ॥ ब्रह्मांडभरी दाविजे ॥ ४८ ॥
यावरी द्रौपदी बोले वचन ॥ परम पापात्मा दुर्योधन ॥
त्याशीं गेलियाही प्राण ॥ मृदु वचन न बोलावें ॥ ४९ ॥
वृक व्याघ्र विखार पाहें ॥ यांशीं मृदु बोलोनि साध्य काये ॥
पत्रे पाठवूनि सकळ राये ॥ सत्वर आधीं बोलावा ॥ ५० ॥
त्वरा करा आतां बहुत ॥ भगदत्तादि राजे समस्त ॥
छप्पन्न देशींचे नृपनाथ ॥ बोलावा सत्वर त्वां आधीं ॥ ५१ ॥
चतुःसमुद्रपर्यंत ॥ सप्तद्वीप नव खंडांत ॥
वसती राजे समस्त ॥ आधीं येथें बोलावा ॥ ५२ ॥
सहस्त्र कामें सोडून ॥ आधीं पत्रें पाठवा लिहून ॥
दुर्योधन प्रार्थून ॥ नेईल आधीं एकादा ॥ ५३ ॥
पांचालराज बोलिला तेव्हां ॥ आमचा पुरोहित चतुर बरवा ॥
तों पुढें पाठवावा ॥ कुंजरपुरासी ये वेळे ॥ ५४ ॥
श्रीरंग म्हणे राया सुजाणा ॥ ॥ बोलिलासी उत्तम वचना ॥
एक शिष्ट पाठवून आणा मना ॥ अंतर त्यांचें कैसें असे ॥ ५५ ॥
साम भेद दंड करून ॥ शत्रू करावे आपणाधीन ॥
ओळखून पराचें चिन्ह ॥ चतुरें तैसेंच वर्तावें ॥ ५६ ॥
मंत्रे आकर्षिजे विषधर ॥ उदकें शांतवीं वैश्वानर ॥
वेदांतज्ञानें भवसमुद्र ॥ उतरून जावें पैलपारा ॥ ५७ ॥
काम क्रोध शत्रू समग्र ॥ ते विवेकीं जिंकावे साचार ॥
भक्तिबळें ईश्वर ॥ आपणाधीन करावा ॥ ५८ ॥
शमदमबळेंकरून ॥ मनोजय करिती सज्ञान ॥
व्युत्पत्तीच्या बळें गहन ॥ अर्थ काढिती पंडित ॥ ५९ ॥
पाषाणाखालीं सांपडे हस्त ॥ तों युक्तीने काढावा अकस्मात ॥
बळेकरून ओढितां तेथ ॥ व्यथा प्राप्त होय पैं ॥ ६० ॥
तैसा आधीं साम करून ॥ वश करावा सुयोधना ॥
समयोचित जाणे चिन्ह ॥ ऐसा शिष्ट पाठवावा ॥ ६१ ॥
सभेस बैसतां जाऊन ॥ दिसे जैसा वाचस्पतिसमान ॥
सरस्वती ज्यासी प्रसन्न ॥ समयोचित शब्द देत ॥ ६२ ॥
वेद शास्त्र पुराण ॥ हें ज्यास करतलामलकवत्‌ पूर्ण ॥
तेजस्वी जैसा चंडकिरण ॥ सभास्थानीं तेविं दिसे ॥ ६३ ॥
जरी वरी शत्रू लोटले समस्त ॥ त्या समयीं जैसा वैवस्वत ॥
कीं दुसरा कलशोद्भव सत्य ॥ शत्रुसागर प्राशावया ॥ ६४ ॥
हृदय निर्मळ कापट्यरहित ॥ भोळा जैसा उमाकांत ॥
श्रेष्ठत्वें सभेत मिरवत ॥ शचीनाथ जयापरी ॥ ६५ ॥
वारणचक्रांत रिघोन ॥ आपलें कार्य साधी पंचानन ॥
कीं एकलाचि जाऊन सुपर्ण ॥ अमृत घेऊन जेविं आला ॥ ६६ ॥
कीं एकला जाऊन गुरुपुत्र ॥ साधून ये संजीवनीमंत्र ॥
कीं सागर उतरूनि रुद्रावतार ॥ शुद्धि करूनि परतला ॥ ६७ ॥
तैसेंच कार्य साधून ॥ सत्वर येई जो परतोन ॥
ऐसा पाठवावा निवडून ॥ शीघ्रकाळेंच तत्त्वतां ॥ ६८ ॥
आम्ही आलों येथें लग्ना ॥ जातों आपुलिया स्वस्थाना ॥
बोलावू पाठवा महीरत्‍ना ॥ आम्हांसहित सर्वांसी ॥ ६९ ॥
मग बैसोन आपुल्या रथी ॥ द्वारकेस गेले रुक्मिणीपती ॥
इकडे सर्व रायांस धर्मनृपति ॥ पाठवी बोलावू तेधवां ॥ ७० ॥
धर्माचीं पत्रे घेऊनी ॥ अपार हेर धांवती ते क्षणीं ॥
देशोदेशीं जाऊनी ॥ निघा म्हणती सत्वर ॥ ७१ ॥
दुर्योधनें पत्रे पाठवून सत्वर ॥ राजे आणिले छत्रधर ॥
दळे मिळाली अपार ॥ कुंजरपुराभोंवतीं ॥ ७२ ॥
पांडवप्रिय जे कां नृपती ॥ ते विराटनगराप्रति जाती ॥
त्यांस सामोरा जाऊन प्रीतीं ॥ धर्म आणी अत्यादरें ॥ ७३ ॥
द्रुपद म्हणे उपाध्यायालागून ॥ चवर्‍यायशीं योगींत दिव्यरत्‍न ॥
नरदेह परम पावन ॥ श्रेष्ठ ब्राह्मण त्यांत तूंची ॥ ७४ ॥
त्याहीवरी तूं ब्रह्मवेत्ता वेदज्ञ ॥ बुद्धीनें कविगुरूंसमान ॥
तुज साह्य तेथें पूर्ण ॥ विदुर असे धर्मात्मा ॥ ७५ ॥
तोंवरी आम्हीं दळे ॥ येथें मेळवितों सकळें ॥
मग शिष्यांसहित ते वेळे ॥ विप्र गेला गजपुरा ॥ ७६ ॥
द्वारकेसी सुभद्रापती ॥ पाठवी सत्वर धर्मनृपति ॥
दुर्योधन समीरगतीं ॥ त्याही पुढें धांवत ॥ ७७ ॥
कापट्यनिधि सुयोधन ॥ त्वरें प्रवेशला कृष्णसदन ॥
तें जाणोन शतपत्रनयन ॥ निद्रा करीत निजशेजे ॥ ७८ ॥
तों तेथें आला दुर्योधन ॥ म्हणे हा गोवळा छत्रहीन ॥
मी याचे पायथां बैसेन ॥ हें कालत्रयीं घडेना ॥ ७९ ॥
उशाकडे जाऊन सत्वर ॥ बैसला तों दुष्ट गांधार ॥
तों सवेच पातला सुभद्रावर ॥ तंव तों पायथां बैसला ॥ ८० ॥
ध्वज वज्र ऊर्ध्वरेखा समवेत ॥ जे तळवे सुंदर अति आरक्त ॥
सनकादिक जे हृदयीं ध्यात ॥ विलोकित पार्थ प्रीतीनें ॥ ८१ ॥
कोण वर्णी चरणरजांची थोरी ॥ उद्धरिली कमलोद्भवकुमारी ॥
केली कुब्जा दिव्य नारी ॥ स्पर्शोनियां चरणरजें ॥ ८२ ॥
वृंदावनींचे तृणपाषाण ॥ उद्धरिले चरणीं चालोन ॥
बळिराज नेऊन ॥ रसातळी स्थापिला ॥ ८३ ॥
तेच तळवे आरक्त ॥ पार्थ स्वहस्तें तळहातित ॥
तों सत्वर उठोनि भगवंत ॥ विजयाकडे पाहूं लागला ॥ ८४ ॥
म्हणे कां आलासी सखया पार्था ॥ येरू म्हणे विश्वव्यापका समर्था ॥
तूं गुरु देव माता पिता ॥ पाठीराखा आमुचा ॥ ८५ ॥
सेना मिळाली संपूर्ण ॥ परि दीपाविण जैसें सदन ॥
जळाविण जेविं अन्न ॥ तैसें तुजविण दिसतसे ॥ ८६ ॥
मग बोले दुर्योधन ॥ मी आधीं बैसलों येऊन ॥
म्हणे वृष्णिकुलभूषण ॥ म्यां अर्जुन देखिला आधीं ॥ ८७ ॥
मज नाहीं युद्ध करणें ॥ अथवा समरीं शस्त्र धरणें ॥
फुकट नेऊन काय पाळणें ॥ अर्जुनेंही आम्हांसी ॥ ८८ ॥
माझे नारायणगण बहुत ॥ सेना आहे अपरमित ॥
पार्था दुर्योधना सांग यथार्थ ॥ दोहींत काय आवडे तें ॥ ८९ ॥
पार्थ म्हणे तूं शस्त्र न धरीं ॥ अथवा समरीं युद्ध न करीं ॥
तूं कृपादृष्टीनें मुरारी ॥ विलोकून पाहें आम्हांतें ॥ ९० ॥
दुरून पाहे कूर्मीण ॥ तेणें पिलियां होत अमृतपान ॥
तूं नुसताच येऊन ॥ उभा राहें श्रीरंगा ॥ ९१ ॥
दुर्योधन म्हणे जगज्जीवना ॥ देई आम्हांस अवघी सेना ॥
तुज निःशस्त्रिया नेऊनि जाणा ॥ काय कारण सांग पां ॥ ९२ ॥
जाहले जें वर्तमान ॥ बलरामासी सांगे दुर्योधन ॥
तूं श्रीगुरु माझा येऊन ॥ करीं साह्य सर्वही ॥ ९३ ॥
बलराम म्हणे ऐक निवाडें ॥ कृष्ण परब्रह्म जाण तिकडे ॥
त्यास टाकून मज तुम्हांकडे ॥ येतां नये निश्चयेंशी ॥ ९४ ॥
तरी मी इकडे ना तिकडे पाहें ॥ न होई कदा मी कोणासी साह्य ॥
तरी दुर्योधना तूं जाई लवलाहें ॥ क्षात्रधर्म युद्ध करीं ॥ ९५ ॥
एक अक्षौहिणी दळासहित ॥ कृतवर्मा यादव विख्यात ॥
तों नेईं तूं साह्यार्थ ॥ युद्ध अद्‌भुत करावें ॥ ९६ ॥
असो कृतवर्म्यासहित दळ घेऊन ॥ गजपुरा गेला दुर्योधन ॥
इकडे धनंजयास बोले मनमोहन ॥ तूं कां मज घेतलें ॥ ९७ ॥
पार्थ म्हणे जगत्पति ॥ तूं बैस माझे मनोरथीं ॥
तुजऐसा असतां सारथी ॥ शिक्षा लावीन कृतांता ॥ ९८ ॥
रथीं बैसोनि पार्थ रुक्मिणीकांत ॥ गेले धर्मास भेटावया त्वरित ॥
इकडे शल्यासी बोलावूं निश्चित ॥ धर्मरायें पाठविलें ॥ ९९ ॥
अर्धयोजन रुंद पृतना ॥ मागे जातां होय गर्जना ॥
तों माद्रीचा बंधु पंडुनंदनां ॥ साह्य चालिला वेगेंशी ॥ १०० ॥
तिकडे शल्य जातो जाणोन ॥ गुप्तरूपें दुर्योधन ॥
चतुर सेवक पाठवून ॥ उपचार मार्गीं समर्पीं ॥ १०१ ॥
वस्तीस अगणित सुंदरें ॥ मार्गी निर्मिलीं चंदनागारें ॥
सुगंध उदकें मनोहरें ॥ अष्टभोग ठायीं ठायीं ॥ १०२ ॥
ते अष्टभोग कोण कोण ॥ ऐका तयांची नामखूण ॥
सुगंध वनिता वस्त्र गायन ॥ तांबूल भोजन अनुक्रमें ॥ १०३ ॥
शय्या आणि दीपक ॥ अष्टभोग हेचि सम्यक ॥
षड्रस अन्नें सुरेख ॥ अनुक्रमें समर्पिलीं ॥ १०४ ॥
सुयोधनाचे प्रधान ॥ शल्यापुढें राबती प्रीतीकरून ॥
समयोचित समर्पिती आणून ॥ जाहला प्रसन्न शल्य तेव्हां ॥ १०५ ॥
म्हणे मागाल तें देईन ॥ तों गुप्तरूपें प्रकटे दुर्योधन ॥
म्हणे हे माझी सेवा संपूर्ण ॥ होई तूं प्रसन्न मजलागीं ॥ १०६ ॥
मज सहाय होऊनि देई यश ॥ मग तों शल्य म्हणे अवश्य ॥
दुर्योधना तूं जाई नगरास ॥ मी धर्मास भेटोन येतों पैं ॥ १०७ ॥
दुर्योधन बोले नम्र वचन ॥ सांभाळी आपलें वरदान ॥
शल्यें अवश्य म्हणोन ॥ उपलव्याप्रति आला ॥ १०८ ॥
तेथें उतरून सावकाश ॥ शिबिरें उभविलीं आसमास ॥
तेथें स्नानसंध्या कर्म सुरस ॥ सारूनियां ते वेळे ॥ १०९ ॥
पांडवांप्रति भेटोन ॥ दिधलें परम समाधान ॥
म्हणे तुम्ही वनवास भोगून ॥ परम कष्ट पावलां ॥ ११० ॥
धर्मा तूं परम पावन ॥ नलहरिश्चंद्रांसमान ॥
असो तुझिया पत्रावरून ॥ सेनेसहित येत होतों ॥ १११ ॥
मज दुर्योधनें ठकवून ॥ गोवून केलें आपणाधीन ॥
मग अजातशत्रु बोले वचन ॥ अवश्य जाईं मातुला ॥ ११२ ॥
परी इतुकें देई मजलागून ॥ तूं अश्वहृदय जाणसी संपूर्ण ॥
तरी तूं कर्णाचें सारथ्य करून ॥ तेजोभंग करीं त्याचा ॥ ११३ ॥
आमुचा प्रताप वर्णी ॥ करीं तयाची तेजोहानी ॥
हें अयोग्य परी ये क्षणीं ॥ अंगीकारीं आम्हांकरितां ॥ ११४ ॥
अवश्य म्हणे शल्य वीर ॥ रणीं त्याचा मोडीन धीर ॥
बलक्षीण करून समग्र ॥ यश येईल तुम्हांतें ॥ ११५ ॥
सर्वोपचारीं तोषविला ॥ शल्य गजपुराप्रति गेला ॥
इकडे पांडवांकडे आला ॥ सात्यकी निजदळांशीं ॥ ११६ ॥
धर्माभोंवतें ते क्षणीं ॥ दळ मिळालें सात अक्षौहिणी ॥
तिकडे एकादशाक्षौहिणी वाहिनी ॥ दुर्योधनें मेळविली ॥ ११७ ॥
सकळ यादवांसहित ॥ कृतवर्मा आला तेथ ॥
सौबल कांबोज जयद्रथ ॥ यवनमंडळी पातली ॥ ११८ ॥
पर्वतीय राजे अपार ॥ सेनेसहित आले सत्वर ॥
असो द्रुपदाचा पुरोहित विप्र ॥ सत्वर भेटला दुर्योधना ॥ ११९ ॥
त्याचा करून सन्मान ॥ दुर्योधन पुसे वर्तमान ॥
विप्र म्हणे मजलागून ॥ द्रुपदरायें धाडिलें ॥ १२० ॥
तुम्ही राज्य करितां विशेष ॥ पांडवांस कां वनवास ॥
अनर्थ करून बहुवस ॥ त्यांस बाहेर घातलें ॥ १२१ ॥
तरी तुम्हीं मैत्री करून ॥ कलह टाकावा वारून ॥
परम महाबळी अर्जुन ॥ साह्य भगवान तयासी ॥ १२२ ॥
अकरा अक्षौहिणी दळ संपूर्ण ॥ न होय एका अर्जुनासमान ॥
बलाधिक्य तों भीमसेन ॥ रणीं कृतांत सबळ जो ॥ १२३ ॥
ऐसें पांडव बलवंत होती ॥ तुम्हांस मैत्री करूं इच्छिती ॥
धन्य धन्य तेच जगतीं ॥ बंधू तुमचे निर्धारे ॥ १२४ ॥
यावरी बोले सूर्यनंदन ॥ पांडव गेले प्रतिज्ञा बोलून ॥
मूर्ख हो तें खरें करून ॥ दाखवा आधीं म्हणावें ॥ १२५ ॥
एक पाऊलमात्र मेदिनी ॥ नेदूं तयांस ये क्षणीं ॥
त्यांसी सांगा जाऊनी ॥ भय सांडूनि युद्धासी या ॥ १२६ ॥
विराटनगरीं गुप्त राहिले ॥ परी आम्हीं तेव्हांच ओळखिले ॥
पुन: वनवास करा वहिले ॥ मग या बळें युद्धासी ॥ १२७ ॥
अथवा याचकवृत्ति धरून ॥ या आधीं आम्हांस शरण ॥
मग एकादा ग्राम देऊन ॥ करूं रक्षण तुमचें पैं ॥ १२८ ॥
गंगात्मज बोले वचना ॥ गोग्रहणीं एकल्या अर्जुना ॥
कां रे जिकिलें नाहीं कर्णा ॥ आतां वल्गना करितोसी ॥ १२९ ॥
शस्त्रें अस्त्रें सांडून ॥ आलासी गजपुरीं पळोन ॥
भीमें कीचक टाकिले मारून ॥ तूंच मनीं आठवीं कीं ॥ १३० ॥
अनिवार अर्जुनाचे बाण ॥ घेतील जेव्हां तुमचा प्राण ॥
तेव्हां आठवाल आमुचें वचन ॥ कलेवरत्याग करितां ॥ १३१ ॥
कौरवांची आज्ञा घेऊन ॥ गेला द्रुपदाचा ब्राह्मण ॥
पांचालरायास वर्तमान ॥ जाहले तेंचि सांगितलें ॥ १३२ ॥
इकडे धृतराष्ट्र बोले ते अवसरीं ॥ संजया तूं जाई तेथवरी ॥
माझा आशीर्वाद सांगोन लौकरी ॥ अंतर त्यांचें शोधी कां ॥ १३३ ॥
मैत्री करावया इच्छिती ॥ किंवा समरभूमीसी भिडती ॥
ते आहेत पुण्यवंत सुमती ॥ स्नेह वाढविती सर्वांशी ॥ १३४ ॥
ते पंचही प्रलयाग्न ॥ क्षणांत जाळिती शत्रुकानन ॥
यादवकुलपंचानन ॥ त्यांस साह्य सर्वस्वें ॥ १३५ ॥
बहु तपें पुण्य थोर ॥ प्रतिशंकर युधिष्ठिर ॥
क्रोधदृष्टीनेंच समग्र ॥ भस्म करील शत्रुतें ॥ १३६ ॥
तरी संजया तूं जाऊन ॥ बोलें धर्मासी नम्रवचन ॥
मग चालिला तों रथीं बैसोन ॥ उपलव्यास पावला ॥ १३७ ॥
पांचही कौतेय अनुक्रमेंकरून ॥ संजयास देती आलिंगन ॥
म्हणती वृद्ध सुखी कीं अवघे जण ॥ पुत्रपौत्रांसमवेत ॥ १३८ ॥
संजय म्हणे सुखी अवघे जण ॥ राये तुम्हांसी सांगितलें आशीर्वचन ॥
पांडव म्हणती रात्रंदिन ॥ त्यांचे चरण स्मरतों आम्ही ॥ १३९ ॥
हस्तनापुरींचे विप्र ॥ सुखी कीं पुसे युधिष्ठिर ॥
ब्राह्मणांचे मान समग्र ॥ दुर्योधन रक्षितो कीं ॥ १४० ॥
वृद्ध आणि गुरु यांचें सेवन ॥ सदा करितो कीं मनांतून ॥
दान याग मित्ररक्षण ॥ प्रजापालन करितो कीं ॥ १४१ ॥
पांडवांपासून पापाचरण ॥ घडलें म्हणती कीं नाहीं जन ॥
भीमार्जुनांचा पराक्रम पूर्ण ॥ दुर्योधन स्मरतो कीं ॥ १४२ ॥
गंधर्वांहातींचा सोडवून ॥ चुकविला मरणापासून ॥
तें आठवितो कीं सुयोधन ॥ उपकार मनीं मानितो कीं ॥ १४३ ॥
संजय म्हणे धर्मात्मजा ॥ सोमवंशविजयध्वजा ॥
नागपुरीच्या सर्व प्रजा ॥ तुज कल्याण चिंतिती ॥ १४४ ॥
प्रज्ञाचक्षु आदिकरूनी ॥ द्रोण भीष्मादिकांचे मनीं ॥
दृढ मैत्री साधूनी ॥ अर्ध राज्य द्यावें तुम्हां ॥ १४५ ॥
युयुधान विराट दुपद ॥ समस्तही ऐका नृपवृंद ॥
उभयपक्षीं कल्याण आनंद ॥ तेंच सर्व करा तुम्ही ॥ १४६ ॥
स्वर्धुनीतनय भारद्वाज शारद्वत ॥ साम करावें सर्वांचें मनोगत ॥
यावरी युधिष्ठिर बोलत ॥ हेंच मनीं माझिया ॥ १४७ ॥
परी प्रज्ञाचक्षु राजेश्वर ॥ पुत्रलोभें भ्रमला थोर ॥
सद्‌बुद्धीपासून भ्रष्टला ज्येष्ठ पुत्र ॥ तयासी विचार न सांगे ॥ १४८ ॥
दुर्योधनाचे मनीं ॥ आपण भोगावी सर्व कुंभिनी ॥
त्याचिया गर्वाहून ठेंगणी ॥ वाढी झाली मेरूची ॥ १४९ ॥
परी हरिध्वज नयनीं ॥ देखिला नाहीं जो रणमेदिनीं ॥
खगवरध्वज स्यंदनीं ॥ पुढें आरूढला नाहीं जों ॥ १५० ॥
तोवरीच हे वल्गना ॥ बोलतां गोड वाटे सुयोधना ॥
गदेसहित जों भीमसेना ॥ रणांगणीं न देखिला ॥ १५१ ॥
संजया सांग जाऊनि त्वरित ॥ सत्वर हें पाकशासनप्रस्थ ॥
पंडुरायाचें राज्य समस्त ॥ परी आम्हीं गजपुर दिलें तूतें ॥ १५२ ॥
त्यावरी वैकुंठींचा वेल्हाळ ॥ रुक्मिणीमानससरोवरमराळ ॥
भक्तकामकल्पद्रुम तमालनीळ ॥ मेघगंभीर गिरा बोले ॥ १५३ ॥
क्षत्रियधर्म आचरून ॥ राज्य घ्यावें पराक्रमेकरून ॥
तरी इह परत्र कीर्ति पूर्ण ॥ दुमदुमेल धर्मराजा ॥ १५४ ॥
क्षत्रियधर्म आचरतां जाण ॥ जरी पावला समरीं मरण ॥
तरी उत्तमलोक पावोन ॥ कीर्ति होय त्रिभुवनीं ॥ १५५ ॥
संजया जाऊन सांग सत्वर ॥ दे पांडवांस राज्य समग्र ॥
मग ते तुज देतील गजपुरा ॥ बंधु म्हणोनि प्रीतीनें ॥ १५६ ॥
मरण त्याचें जवळी आलें ॥ तरीच तेणें दळ मेळविलें ॥
नायके वृद्धांचे शिकविलें ॥ अवश्य काळ चुकेना ॥ १५७ ॥
कपटद्यूत खेळले जे वेळीं ॥ दुःशासन धांवून पांचाळी ॥
केशीं धरून सभेसी नेली ॥ दीन अनाथ जैशी कां ॥ १५८ ॥
कौरवजन परम दुर्जन ॥ कर्णादिकीं सोडिले शब्दबाण ॥
ते घाय अजूनि जाण ॥ नाहीं मिळाले संजया ॥ १५९ ॥
दुर्योधन शकुनि दुःशासन ॥ यांच्या रक्त भूलिंगास होईल स्नपन ॥
कर्णाचें शिर जाईल उठोन ॥ घाय मिळतील तेव्हां ते ॥ १६० ॥
पांच पांडव प्रलयानळ ॥ त्यांस नांव ठेविलें षंढतीळ ॥
पांचाळीची वस्त्रें हिरून सकळ ॥ सभेंत वल्कलें नेसविलीं ॥ १६१ ॥
असो सर्वांस विचारून ॥ संजय चालिला तेथून ॥
धर्मराज बोले वचन ॥ वृद्धास नमन सांग माझें ॥ १६२ ॥
भीष्म द्रोण शारद्वत ॥ गजपुरींचे विप्र प्रतिआदित्य ॥
प्रज्ञाचक्षु विदुरादि समस्त ॥ सांग नमन माझें सर्वां ॥ १६३ ॥
कुंती गांधारी माता ॥ यांचिया चरणावरी माझा माथा ॥
आम्ही सुखी आहों सांग समस्तां ॥ श्रीकृष्णदयेंकरूनियां ॥ १६४ ॥
धृतराष्ट्राचे चरण ॥ वंदून सांग इतकें वचन ॥
पंचग्राम देई आम्हांलागून ॥ नामाभिधानें ऐक पां ॥ १६५ ॥
अविस्थळ वृकस्थळ जयंत ॥ वारुणावत आणि शक्रप्रस्थ ॥
इतके देऊन समस्त ॥ कलहमूळ खडी कां ॥ १६६ ॥
मग वस्त्राभरणीं ते वेळां ॥ संजय धर्में गौरविला ॥
निजरथीं बैसोन पावला ॥ गजपुरा तत्काळ ॥ १६७ ॥
धृतराष्ट्रास भेटोन ॥ झालें तें सांगे वर्तमान ॥
यावरी समस्त द्विजगृहांसी जाऊन ॥ धर्मवचनें निरोपी ॥ १६८ ॥
मागुती धृतराष्ट्राजवळी येऊन ॥ संजय बोले हितवचन ॥
म्हणे आप्त दूरी दवडून ॥ अनाप्त जवळी केले तुवां ॥ १६९ ॥
चिंतामणि भिरकावून ॥ घेतले खांदां जड पाषाण ॥
अमृतघट उल्लंघून ॥ पिइजे धूण जैसें पां ॥ १७० ॥
पूज्य मूर्ति ओसंडून ॥ गुरवाचे जैसे धरिले चरण ॥
राजकुमार वर टाकून ॥ नवरी वरी मृदंगिया ॥ १७१ ॥
पाडून देवळाचे शिखर ॥ भोंवतें घातलें आवार ॥
नागवून यात्रा समग्र ॥ अन्नसत्र घातलें ॥ १७२ ॥
फणस टाकून रसाळ ॥ प्रीतीनें घेतलें कनकफळ ॥
मुक्ताफळ टाकून तेजाळ ॥ गुंज जैशी घेतली ॥ १७३ ॥
गार घेऊन टाकिला हिरा ॥ तम घेऊन दवडिलें दिनकरा ॥
पांच भिरकावून सत्वरा ॥ कांच जवळी रक्षिली ॥ १७४ ॥
परीस टाकून घेतला खडा ॥ पंडित देऊन आणिला वेडा ॥
कल्पवृक्ष देऊन रोकडा ॥ पलांडु घेतला जैसा कां ॥ १७५ ॥
निजसुख देऊन घेतलें दुःख ॥ मृगमद टाकून घेतली राख ॥
चंदन टाकून सुरेख ॥ गोमय जैसे घेतलें ॥ १७६ ॥
तैसें राया केलें साचार ॥ वना धाडून पंडुकुमार ॥
कैंचे मेळवून नृपवर ॥ आप्त परम मानिले ॥ १७७ ॥
ऐक धृतराष्ट्रा नृपती ॥ सर्वही लोक तुज निंदिती ॥
यापरी संजयाच्या वचनोक्ती ॥ उपेक्षित वृद्ध तों ॥ १७८ ॥
मग दूत पाठवून सत्वर ॥ अंधे बोलाविला विदुर ॥
म्हणे संजय वचन निष्टुर ॥ बोलतो पहा मजलागीं ॥ १७९ ॥
त्याचीं वचनें ऐक साचार ॥ त्यासी द्यावें प्रत्युत्तर ॥
मग करावा विचार ॥ सामभेदेंकरोनी ॥ १८० ॥
विदुरा हित सांगें मजप्रती ॥ आहे कैशी उत्तम नीती ॥
मज न गमे निश्चितीं ॥ चिंतानलीं पडियेलों ॥ १८१ ॥
यावरी तों विदुर ॥ वर्षेल ज्ञानाचा सागर ॥
तें ब्रह्मानंद श्रीधर ॥ वर्णील सार अभंग ॥ १८२ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ उद्योगपर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ छत्तिसाव्यांत कथियेला ॥ १८३ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे उद्योगपर्वणि षट्‌त्रिंशत्तमोऽध्यायः ॥ ३६ ॥
अध्याय छत्तिसावा समाप्त


GO TOP