॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥

॥ अथ श्रीमद् भगवद्‌गीता ॥

॥ अथ एकादशोऽध्यायः - अध्याय अकरावा ॥


॥ विश्वरूपदर्शनयोगः ॥




[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



आतां यावरी एकादशीं । कथा आहे दोहीं रसीं ।
येथ पार्था विश्वरूपेंसीं । होईल भेटी ॥ १ ॥
आता यानंतर अकराव्या अध्यायामधे (शांत व अद्भुत या) दोन रसांनी भरलेली कथा आहे. या अध्यायात अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होणार आहे. ॥११-१॥

जेथ शांताचिया घरा । अद्भुत आला आहे पाहुणेरा ।
आणि येरांही रसां पांतिकरां । जाहला मानु ॥ २ ॥
या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणचारास आला आहे आणि इतर रसांनाही या दोन रसांच्या पंक्तीला बसण्याचा मान मिळाला आहे. ॥११-२॥

अहो वधुवरांचिये मिळणीं । जैशी वराडियां लुगडीं लेणीं ।
तैसे देशियेच्या सुखासनीं । मिरविले रस ॥ ३ ॥
अहो, नवरानवरीच्या लग्नसमारंभात ज्याप्रमाणे वर्‍हाडी लोकांनाही वस्त्रे व दागिने मिळातात त्याप्रमाणे इतर रसांचीही मराठी भाषारूप पालखीत मिरवणूक होऊन त्यांना शोभा आली आहे. ॥११-३॥

परी शांताद्‌भुत बरवे । जे डोळियांच्या अंजुळीं घ्यावें ।
जैसे हरिहर प्रेमभावें । आले खेंवा ॥ ४ ॥
परंतु शांत व अद्भुत हे दोन चांगले रस या अध्यायात इतके मुख्यत्वाने आहेत की ते डोळ्यांना उघड दिसतील. जसे विष्णु व शंकर हे एका योग्यतेचे देव प्रेमभावाने एकमेकांस भेटावयास यावे ॥११-४॥

ना तरी अंवसेच्या दिवशीं । भेटलीं बिंबें दोनी जैशीं ।
तेवीं एकवेळा रसीं । केला एथ ॥ ५ ॥
अथवा अमावास्येच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्यबिंब व चंद्रबिंब यांच्यात अंतर रहात नाही (कारण ती बिंबे एकाच दिशेला असतात) त्याप्रमाणे या अध्यायात हे दोन रस एकत्र आले आहेत. ॥११-५॥

मीनले गंगेयमुनेचे ओघ । तैसें रसां जाहलें प्रयाग ।
म्हणौनि सुस्नात होत जग । आघवें एथ ॥ ६ ॥
ज्या प्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना या दोन नद्यांचा संगम झाला आहे, त्याप्रमाणे या अध्यायात शांत व अद्भुत या दोन रसांचा मिलाफ होऊन अकरावा अध्याय हा प्रयागक्षेत्रच झाला आहे. म्हणून सर्व जग येथे स्नान करून पवित्र होते. ॥११-६॥

माजीं गीता सरस्वती गुप्त । आणि दोनी रस ते ओघ मूर्त ।
यालागीं त्रिवेणी हे उचित । फावली बापा ॥ ७ ॥
ज्याप्रमाणे प्रयागक्षेत्रात गंगा व यमुना या दोन नद्यांचे ओघ प्रगट दिसतात व त्या दोन ओघांच्या मध्ये जशी सरस्वती नदी गुप्त आहे, त्याप्रमाणे या अध्यायात शांत व अद्भुत हे दोन रस प्रगट आहेत व या दोन रसात गीता ही गुप्त सरस्वतीच आहे. म्हणून बाप हो, ही योग्य त्रिवेणी सर्वांना प्राप्त झाली आहे. ॥११-७॥

एथ श्रवणाचेनि द्वारें । तीर्थीं रिघतां सोपारें ।
ज्ञानदेवो म्हणे दातारें । माझेनि केलें ॥ ८ ॥
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला कारणीभूत करून माझे गुरु जे निवृत्तिनाथ त्यांनी श्रवणाच्या द्वारे या त्रिवेणी तीर्थामधे प्रवेश करणे सोपे केले आहे. ॥११-८॥

तीरें संस्कृताचीं गहनें । तोडोनि मर्हा ठियां शब्दसोपानें ।
रचिली धर्मनिधानें । श्रीनिवृत्तिदेवें ॥ ९ ॥
धर्माची खाण जे माझे गुरु निवृत्तीनाथ त्यांनी मला कारणीभूत करून संस्कृतभाषारूपी कठिण (उंच डगरीचे) किनारे फोडून मराठी भाषेतील शब्दरूपी पायर्‍यांचा घाट बांधला ॥११-९॥

म्हणौनि भलतेणें एथ सद्‍भावें नाहावें । प्रयागमाधव विश्वरूप पहावें ।
येतुलेनि संसारासि द्यावें । तिळोदक ॥ १० ॥
म्हणून या त्रिवेणीसंगमात हवे त्याने आस्तिक्यबुद्धीने स्नान करून जसे प्रयागक्षेत्रात माधवाचे दर्शन घेतात, तसे तेथे विश्वरूप माधवाचे दर्शन घ्यावे आणि एवढे करून संसाराला तिलांजली द्यावी. (संबंध सोडावा). ॥११-१०॥

हें असो ऐसें सावयव । एथ सासिन्नले आथी रसभाव ।
तेथ श्रवणसुखाची राणीव । जोडली जगा ॥ ११ ॥
हे रूपक पुरे. याप्रमाणे (नव) रसांचे मूर्तिमंत स्वरूप भराला आले आहे, कारण जगाला श्रवणसुखाचे राज्य प्राप्त झाले आहे. ॥११-११॥

जेथ शांताद्‌भुत रोकडे । आणि येरां रसां पडप जोडे ।
हें अल्पचि परी उघडें । कैवल्य एथ ॥ १२ ॥
ह्या अकराव्या अध्यायात शांत रस व अद्भुत रस हे मूर्तिमंत आहेतच पण इतर रसांनाही या अध्यायात शोभा प्राप्त झाली आहे. हे यांचे वर्णन थोडेच आहे. पण खरोखर या अध्यायात मोक्ष स्पष्ट झालेला आहे. ॥११-१२॥

तो हा अकरावा अध्यायो । जो देवाचा आपणपें विसंवता ठावो ।
परी अर्जुन सदैवांचा रावो । जो एथही पातला ॥ १३ ॥
तो हा अकरावा अध्याय आहे की जो देवाचे खास विश्रांतीचे ठिकाण आहे, पण अर्जुन हा दैववान पुरुषांचा राजा आहे, कारण तो येथेही प्राप्त झालेला आहे. ॥११-१३॥

एथ अर्जुनचि काय म्हणों पातला । आजि आवडतयाही सुकाळु जाहला ।
जे गीतार्थु हा आला । मर्‍हाठिये ॥ १४ ॥
येथे अर्जुन एकटाच प्राप्त झाला आहे असे काय म्हणावे ? तर गीतार्थ मराठी भाषेत असल्यामुळे आज वाटेल त्यालाही सुकाळ झाला आहे. ॥११-१४॥

याचिलागीं माझें । विनविलें आइकिजे ।
तरी अवधान दीजे । सज्जनीं तुम्ही ॥ १५ ॥
याचकरता मी जी विनंती करत आहे ती तुम्ही ऐकावी. ती इतकीच की तुम्ही संतांनी (मी कथा वर्णन करत आहे) इकडे लक्ष द्यावे. ॥११-१५॥

तेवींचि तुम्हां संतांचिये सभे । ऐसी सलगी कीर करूं न लभे ।
परी मानावें जी तुम्ही लोभें । अपत्या मज ॥ १६ ॥
तसेच तुम्हा संतांच्या सभेत अशी ही सलगी करणे माझ्यासारख्यास खरोखर योग्य नाही, पण मी जे तुमचे लेकरू त्या मला तुम्ही प्रेमाने मानावे ॥११-१६॥

अहो पुंसा आपणचि पढविजे । मग पढे तरी माथा तुकिजे ।
कां करविलेनि चोजें न रिझे । बाळका माय ॥ १७ ॥
अहो आपणच राघूला शिकवावे आणि शिकवल्याप्रमाणे तो बोलू लागला म्हणजे आपणच पसंतीने मान डोलवावी, किंवा मुलाकडून एखादी गोष्ट करवून घेऊन मग त्याने केलेल्या कृत्याच्या कौतुकाने आई आपल्या मनात मुलाविषयी संतुष्ट होत नाही काय ? ॥११-१७॥

तेवीं मी जें जें बोलें । तें प्रभु तुमचेंचि शिकविलें ।
म्हणौनि अवधारिजो आपुलें । आपण देवा ॥ १८ ॥
त्याप्रमाणे महाराज, मी जे जे प्रतिपादन करतो, ते ते तुम्ही शिकवलेले आहे. एवढ्याकरता अहो संतजनहो आपण शिकवलेले आपणच ऐकावे. ॥११-१८॥

हें सारस्वताचें गोड । तुम्हींचि लाविलें जी झाड ।
तरी आतां अवधानामृतें वाड । सिंपोनि कीजे ॥ १९ ॥
महाराज, हे ज्ञानाचे सुंदर झाड आपणच लावले आहे. तर आता यास आपण लक्ष देणे हेच कोणी एक अमृत ते शिंपून ते मोठे करावे ॥११-१९॥

मग हें रसभाव फुलीं फुलेल । नानार्थ फळभारें फळा येईल ।
तुमचेनि धर्में होईल । सुरवाडु जगा ॥ २० ॥
मग हे ज्ञानाचे झाड नवरस भावरूपी फुलांनी फुलेल आणि नाना प्रकारच्या अर्थरूपी फळभाराने फळास येईल. व तुम्ही लक्ष देणे रूप धर्म केलात म्हणजे जगास (श्रवणसुखाचा) लाभ होईल. ॥११-२०॥

या बोला संत रिझले । म्हणती तोषलों गा भलें केलें ।
आतां सांगैं जें बोलिलें । अर्जुनें तेथ ॥ २१ ॥
या बोलण्यावर संत खूष झाले व म्हणाले, ज्ञानोबा, आम्ही खूष झालो, तू फार चांगले केलेस. आता त्या प्रसंगी अर्जुनाने जो प्रश्न केला त्याचे व्याख्यान कर. ॥११-२१॥

तंव निवृत्तिदास म्हणे । जी कृष्णार्जुनांचें बोलणें ।
मी प्राकृत काय सांगों जाणें । परी सांगवा तुम्ही ॥ २२ ॥
तेव्हा निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणाले, महाराज, कृष्ण व अर्जुन या दोघांमधे झालेले भाषण माझ्यासारख्या सामान्य पुरुषाला सांगण्याचे काय ठाऊक ? परंतु ते माझ्याकडून सांगवून घेण्याचे काम तुम्ही केलेत तर होईल. ॥११-२२॥

अहो रानींचिया पालेखाइरा । नेवाणें करविले लंकेश्वरा ।
एकला अर्जुन परी अक्षौहिणी अकरा । न जिणेचि काई ? ॥ २३ ॥
अहो रानाताईल पाले खाणार्‍या वानरांकडून लंकेचा राजा जो रावण त्याचा पराभव केला जावा, अर्जुन एकटाच होता, पण त्याने अकरा अक्षौहिणी सौन्य जिंकले नाही काय ? ॥११-२३॥

म्हणौनि समर्थ जें जें करी । तें न हो न ये चराचरीं ।
तुम्ही संत तयापरी । बोलवा मातें ॥ २४ ॥
म्हणून समर्थ जे जे करील ते ते चराचरात होणार नाही असे नाही. त्याप्रमाणे तुम्ही संत समर्थ अहात, म्हणून तुम्ही जर मनात आणाल तर माझ्यासारख्या नेणत्याकडून गूढ गीतार्थ बोलवाल. (म्हणून कृपा करून तो मजकडून बोलवा. ॥११-२४॥

आतां बोलिजतसें आइका । हा गीताभाव निका ।
जो वैकुंठनायका- । मुखौनि निघाला ॥ २५ ॥
आता जो प्रत्यक्ष वैकुंठीचा राजा, श्रीकृष्ण त्याच्या मुखातून निघालेल्या गीतेचा चांगला अभिप्राय सांगतो तिकडे लक्ष द्यावे. ॥११-२५॥

बाप बाप ग्रंथ गीता । जो वेदीं प्रतिपाद्य देवता ।
तो श्रीकृष्ण वक्ता । जिये ग्रंथीं ॥ २६ ॥
धन्य धन्य गीताग्रंथ की ज्या गीताग्रंथाचा वक्ता, वेदांच्या प्रप्तिपादनाचा विषय जो कृष्ण परमात्मा तो आहे. ॥११-२६॥

तेथिंचे गौरव कैसें वानावें । जें श्रीशंभूचिये मती नागवे ।
तें आतां नमस्कारिजे जीवेंभावें । हेंचि भलें ॥ २७ ॥
त्या ठिकाणचा मोठेपणा कसा वर्णन करावा ? कारण जे गीतातत्व शिवाच्या बुद्धीला आकलन होत नाही त्याला आता सर्वभावाने नमस्कार करावा हेच बरे. ॥११-२७॥

मग आइका तो किरीटी । घालूनि विश्वरूपीं दिठी ।
पहिली कैसी गोठी । करिता जाहला ॥ २८ ॥
यानंतर तो अर्जुन विश्वरूपावर नजर ठेऊन पहिल्या प्रथम कसे बोलला ते ऐका. ॥११-२८॥

हें सर्वही सर्वेश्वरु । ऐसा प्रतीतिगत जो पतिकरु ।
तो बाहेरी होआवा गोचरु । लोचनांसी ॥ २९ ॥
हे सर्वही सर्वेश्वररूप आहे. अशा रूपाने अनुभवास पटलेला प्रियकर जो परमात्मा, तो आपल्यापुढे डोळ्याला प्रत्यक्ष दिसावा. ॥११-२९॥

हे जिवाआंतुली चाड । परी देवासि सांगतां सांकड ।
कां जें विश्वरूप गूढ । कैसेनि पुसावें ? ॥ ३० ॥
ही मनातील इच्छा खरी, परंतु ती देवास सांगतांना अडचण वाटते, कारण ज्याअर्थी देवाचे विश्वरूप गुप्त आहे, त्याअर्थी ते उघड करून दाखवा असे आपण कसे विचारावे ? ॥११-३०॥

म्हणे मागां कवणीं कहीं । जें पढियंतेनें पुसिलें नाहीं ।
ते सहसा कैसें काई । सांगा म्हणों ? ॥ ३१ ॥
अर्जुन मनात म्हणतो, पूर्वी कोणीही केव्हाच जे मोठ्या आवडत्यानेही विचारले नाही ते एकाएकी सांगा म्हणून कसे काय म्हणावे ? ॥११-३१॥

मी जरी सलगीचा चांगु । तरी काय आइसीहूनी अंतरंगु ।
परी तेही हा प्रसंगु । बिहाली पुसों ॥ ३२ ॥
मी जरी चांगला दाट परिचयाचा असलो तरी माते लक्ष्मीपेक्षा जवळचा आहे काय ? परंतु इतक्या जवळची असूनही ती देखील हा विषय विचारावयास भ्यायली. ॥११-३२॥

माझी आवडे तैसी सेवा जाहली । तरी काय होईल गरुडाचिया येतुली ?
परी तोही हें बोली । करीचिना ॥ ३३ ॥
माझी वाटेल तशी जरी सेवा झाली असली तरी ती गरुडाच्या सेवेच्या बरोबरीला येईल काय ? परंतु एवढी निकट सेवा केलेला जो गरुड तो देखील ह्या संबंधीची गोष्ट काढीतच नाही. ॥११-३३॥

मी काय सनकादिकांहूनि जवळां । परी तयांही नागवेचि हा चाळा ।
मी आवडेन काय प्रेमळां । गोकुळींचिया ऐसा ? ॥ ३४ ॥
मी सनकादिकांपेक्षा जास्त जवळचा आहे काय ? परंतु त्यांना देखील ही उठाठेव करता आली नाही. मी गोकुळामधील प्रेमळ गोपगोपिकांइतका आवडेन काय ? ॥११-३४॥

तयांतेंही लेकुरपणें झकविलें । एकाचे गर्भवासही साहिले ।
परी विश्वरूप हें राहविलें । न दावीच कवणा ॥ ३५ ॥
त्या गोकुळाच्या भाविक लोकांना सुद्धा आपण केवळ मूल आहोत असे दाखवून फसवले. एकाकरता (अंबरीष राजाकरता) दहा गर्भवास देखील सोसले. परंतु विश्वरूप हे गुप्त राखुन ठेवले. ते कोणाला दाखवले नाही. ॥११-३५॥

हा ठायवरी गुज । याचिये अंतरीचें हें निज ।
केवीं उराउरी मज । पुसों ये पां ? ॥ ३६ ॥
इतकी ही गुप्त गोष्ट याच्या अंतर्यामातील खास गोष्ट आहे, तेव्हा ती मला एकदम कशी विचारता येईल ? ॥११-३६॥

आणि न पुसेंचि जरी म्हणे । तरी विश्वरूप देखिलियाविणें ।
सुख नोहेचि परी जिणें । तेंही विपायें ॥ ३७ ॥
बरे, पुसू नये असे जरी म्हटले तर ते विश्वरूप पाहिल्यावाचून सुख होणार नाहीच, परंतु जगणे, ते देखील क्वचितच संभवणार आहे. ॥११-३७॥

म्हणौनि आतां पुसों अळुमाळसें । मग करूं देवा आवडे तैसें ।
येणें प्रवर्तला साध्वसें । पार्थु बोलों ॥ ३८ ॥
आणि पुसू नये असे जर म्हटले तर हे विश्वरूप पाहिल्यावाचून सुख तर होतच नाही परंतु जगणे देखील क्वचितच संभवणार आहे. तर आता थोडेसे विचारूया, मग देवाची मर्जी असेल तसे करू. अशा रीतीने अर्जुन भीत भीत बोलावयास लागला. ॥११-३८॥

परी तेंचि ऐसेनि भावें । जें एका दों उत्तरांसवें ।
दावी विश्वरूप आघवें । झाडा देउनी ॥ ३९ ॥
परंतु तेच त्याचे बोलणे अशा खुबीचे होते की एकदोन शब्दाबरोबरच देव आपला झाडा देऊन सर्व विश्वरूप दाखवील. ॥११-३९॥

अहो वांसरूं देखिलियाचिसाठीं । धेनु खडबडोनि मोहें उठी ।
मग स्तनामुखाचिये भेटी । काय पान्हा धरे ? ॥ ४० ॥
अहो वासरू पाहिले की लागलीच प्रेमाने गाय खडबडून उभी रहाते मग प्रत्यक्ष तिच्या स्तनाची व त्याच्या मुखाची गाठ पडल्यावर तिला पान्हा येणार नाही काय ? ॥११-४०॥

पाहा पां तया पांडवाचेनि नांवें । जो कृष्ण रानींही प्रतिपाळूं धावे ।
तयांतें अर्जुनें जंव पुसावें । तंव साहील काई ? ॥ ४१ ॥
पहा बरे. त्या पांडवांचे नाव ऐकल्याबरोबर जो कृष्ण त्यांचे रक्षण करण्याकरता रानातही धाव घेतो, त्याला अर्जुनाने विचारावे व मग आपण सांगावे एवढे तरी सहन होईल काय ? ॥११-४१॥

तो सहजेंचि स्नेहाचें अवतरण । आणि येरु स्नेहा घातलें आहे माजवण ।
ऐसिये मिळवणी वेगळेपण । उरे हेंचि बहु ॥ ४२ ॥
तो श्रीकृष्ण परमात्मा स्वभावत:च प्रेमाची मूर्ती असून त्या प्रेमास अर्जुन हा अंमल आणणारा उत्तेजक पदार्थ घातला आहे, अशा एक होण्याच्या वेळेस त्यांचे वेगळेपण राहिले हेच फार आहे. ॥११-४२॥

म्हणौनि अर्जुनाचिया बोलासरिसा । देव विश्वरूप होईल आपैसा ।
तोचि पहिला प्रसंगु ऐसा । ऐकिजे तरी ॥ ४३ ॥
म्हणून अर्जुनाच्या बोलण्यावर श्रीकृष्ण सहजच विश्वरूप धारण करील, तोच पहिला प्रसंग असा आहे तर तो ऐकावा. ॥११-४३॥

अर्जुन उवाच
मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितम् ।
यत्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम ॥ १ ॥
अर्जुन म्हणाला, माझ्यावर अनुग्रह करण्याकरता अध्यात्म नावाचे अत्यंत गुह्य असे जे भाषण तू बोललास त्याने माझा हा मोह नि:शेष नाहीसा झाला आहे. ॥११-१॥

मग पार्थु देवातें म्हणे । जी तुम्ही मजकारणें ।
वाच्य केलें जें न बोलणें । कृपानिधे ॥ ४४ ॥
ज्ञा - मग अर्जुन म्हणाला, हे कृपासागरा, जे बोलता यावयाचे नाही, ते तुम्ही माझ्याकरता बोललात. ॥११-४४॥

जैं महाभूतें ब्रह्मीं आटती । जीव महदादींचे ठाव फिटती ।
तैं जें देव होऊनि ठाकती । तें विसवणें शेषींचें ॥ ४५ ॥
ज्यावेळी पंचमहाभूते ब्रह्मामधे नाहीशी होतात व जीव आणि महत्तत्व वगैरे यांचा पत्ता नाहीसा होतो, त्यावेळी देवा, आपण जे ब्रह्मरूप होऊन रहाता ते शेवटचे विश्रांतीचे स्थान आहे. ॥११-४५॥

होतें हृदयाचिये परिवरीं । रोंविलें कृपणाचिये परी ।
शब्दब्रह्मासही चोरी । जयाची केली ॥ ४६ ॥
जी स्वरूपस्थिती वेदांनाही कळू न देता (आपण आपल्या) अंत:करणरूपी घरात कृपणासारखी पुरून ठेवली होती ॥११-४६॥

तें तुम्हीं आजि आपुलें । मजपुढां हियें फोडिलें ।
जया अध्यात्मा वोवाळिलें । ऐश्वर्य हरें ॥ ४७ ॥
आज ती तुम्ही आपल्या अंत:करणातील गुप्त गोष्त माझ्यापुढे प्रगट केली. (ही गोष्ट म्हणजे आपले स्वरूपज्ञान होय.) या अध्यात्मज्ञानावरून शंकराने आपले ऐश्वर्य ओवाळून टाकले आहे. ॥११-४७॥

ते वस्तु मज स्वामी । एकिहेळां दिधली तुम्ही ।
हें बोलों तरी आम्ही । तुज पावोनि कैंचे ॥ ४८ ॥
महाराज, अशी जी वस्तु, ती तुम्ही मला एका क्षणात दिलीत असे म्हणावे तर आम्ही तुम्हापासून वेगळे कोठे आहोत ? ॥११-४८॥

परी साचचि महामोहाचिये पुरीं । बुडालेया देखोनि सीसवरी ।
तुवां आपणपें घालोनि श्रीहरी । मग काढिलें मातें ॥ ४९ ॥
पण खरोखर मोहाच्या महापुरात डोक्यापर्यंत बुडतो आहे असे पाहून श्रीकृष्णा, तुम्ही आपण स्वत: उडी घालून मग मला बाहेर काढले. ॥११-४९॥

एक तूंवांचूनि कांहीं । विश्वीं दुजियाची भाष नाहीं ।
कीं आमुचें कर्म पाहीं । जे आम्हीं आथी म्हणों ॥ ५० ॥
एक तुझ्याशिवाय या अखिल विश्वामधे दुसर्‍याची काही वार्ता नाही. (अशी वास्तविक स्थिती असतांना) आमचे दुर्दैव पहा की आम्ही अभिमानाने आम्ही कोणीतरी एक आहोत असे समजतो. ॥११-५०॥

मी जगीं एक अर्जुनु । ऐसा देहीं वाहे अभिमानु ।
आणि कौरवांतें इयां स्वजनु । आपुलें म्हणें ॥ ५१ ॥
जगामधे मी एक अर्जुन आहे, असा देहाच्या ठिकाणी अभिमान बाळगतो. आणि या कौरवांना आपले भाऊबंद मानतो. ॥११-५१॥

याहीवरी यांतें मी मारीन । म्हणें तेणें पापें कें रिगेन ।
ऐसें देखत होतों दुःस्वप्न । तों चेवविला प्रभु ॥ ५२ ॥
यावर देखील यांना मी मारीन आणि पापाच्या योगाने मग मला देखील कोणती गती मिळेल असे म्हणत होतो. याप्रमाणे मी वाईट स्वप्न पहात होतो. त्या मला महाराज, आपण इतक्यात जागे केलेत. ॥११-५२॥

देवा गंधर्वनगरीची वस्ती । सोडूनि निघालों लक्ष्मीपती ।
होतों उदकाचिया आर्ती । रोहिणी पीत ॥ ५३ ॥
कृष्णा, गंधर्वनगराची वस्ती सोडून मी बाहेर पडलो. हे लक्ष्मीपते, श्रीकृष्णा, मी पाण्याच्या इच्छेने मृगजळ पीत होतो. ॥११-५३॥

जी किरडूं तरी कापडाचें । परी लहरी येत होतिया साचें ।
ऐसें वायां मरतया जीवाचें । श्रेय तुवां घेतलें ॥ ५४ ॥
महाराज, सर्प कापडाचाच होता, (पण त्यावर पाय पडून तो चावला असा भ्रम होऊन) विषाच्या लहरी मात्र खर्‍या येत होत्या. (आपण मरतो असे उगीचच वाटत होते). याप्रमाणे आपण मरतो असे भ्रमाने वाटणार्‍या जीवाला (मला) वाचवण्याचे तुम्ही पुण्य घेतले. ॥११-५४॥

आपुलें प्रतिबिंब नेणता । सिंह कुहां घालील देखोनि आतां ।
ऐसा धरिजे तेवीं अनंता । राखिलें मातें ॥ ५५ ॥
विहिरीत दिसणारी आपली पडछाया आहे हे न समजता आता सिंह आत उडी टाकणार, इतक्यात त्याला कोणी येऊन धरावे, याप्रमाणे हे अनंता, आपण माझे रक्षण केलेत. ॥११-५५॥

एर्‍हवीं माझा तरी येतुलेवरी । एथ निश्चय होता अवधारीं ।
जें आतांचि सातांही सागरीं । एकत्र मिळिजे ॥ ५६ ॥
ऐक बाकी माझा तर येथे इतका निश्चय झाला होता की आताच जरी सातही समुद्र एकवट झाले ॥११-५६॥

हें जगचि आघवें बुडावें । वरी आकाशहि तुटोनि पडावें ।
परी झुंजणें न घडावें । गोत्रजेशीं मज ॥ ५७ ॥
हा प्रलय जरी झाला अथवा आकाशही तुटून पडले (तरी चालेल) पण माझ्यावर माझ्या कुळाशी लढण्याचा प्रसंग न यावा. ॥११-५७॥

ऐसिया अहंकाराचिये वाढी । मियां आग्रहजळीं दिधली होती बुडी ।
चांगचि तूं जवळां एर्हीवीं काढी । कवणु मातें ॥ ५८ ॥
अशा अहंकाराच्या उत्कर्षाने मी आग्रहरूपी पाण्यात बुडी मारली होती. (प्राण गेला तरी बेहत्तर, पण मी गोत्रजांशी लढणार नाही असा माझा कृतनिश्चय होता). पण आपण चांगले होता म्हणून ठीक, नाहीतर मला यातून कोणी काढले असते ? ॥११-५८॥

नाथिलें आपण पां एक मानिलें । आणि नव्हतया नाम गोत्र ठेविलें ।
थोर पिसें होतें लागलें । परि राखिलें तुम्ही ॥ ५९ ॥
वास्तविक मी कोणी एक नसतांना खोटेच मी कोणी (अर्जुन) आहे असे मानले, आणि वास्तविक काही नाहीत असे जे कौरव त्यांना नातलग असे नाव ठेवले, याप्रमाणे मला मोठे वेड लागले होते. पण तुम्ही माझे रक्षण केलेत. ॥११-५९॥

मागां जळत काढिलें जोहरीं । तैं तें देहासीच भय अवधारीं ।
आतां हे जोहरवाहर दुसरी । चैतन्यासकट ॥ ६० ॥
ऐक. मागे (पूर्वी एकदा) जेव्हा आम्ही अग्नीत (लाक्षागृहात) जळण्याच्या बेतात होतो तेव्हा तू आम्हाला बाहेर कढलेस, तेव्हा काय ते एका स्थूल देहासच भय होते, पण आता या (मोहरूपी) दुसर्‍या अग्नीच्या पीडेपासून चैतन्यासकट देहाला भय होते. ॥११-६०॥

दुराग्रह हिरण्याक्षें । माझी बुद्धि वसुंधरा सूदली काखे ।
मग माहार्णव गवाक्षें । रिघोनि ठेला ॥ ६१ ॥
दुराग्रहरूपी हिरण्याक्ष दैत्याने, माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत घातली व मग तो मोहरूपी समुद्राच्या द्वाराने आत शिरून राहिला. ॥११-६१॥

तेथ तुझेनि गोसावीपणें । एकवेळ बुद्धीचिया ठाया येणें ।
हें दुसरें वराह होणें । पडिलें तुज ॥ ६२ ॥
देवा, आपल्या सामर्थ्याने पुन्हा एकवेळ माझी बुद्धी आपल्या मूळ ठिकाणाला आली. हे देवा, यावेळी तुम्हाला दुसर्‍यांदा वराह अवतार घ्यावा लागला. ॥११-६२॥

ऐसें अपार तुझें केलें । एकी वाचा काय मी बोलें ।
परी पांचही पालव मोकलिले । मजप्रती ॥ ६३ ॥
याप्रमाणे तुझी अनंत उपकाराची कृत्ये आहेत. त्यांचे मी एका वाचेने काय वर्णन करू ? परंतु (एवढे मात्र मी तुम्हाला सांगू शकतो की) तुम्ही आपले पंचप्राण मला अर्पण केले आहेत. ॥११-६३॥

तें कांहीं न वचेचि वायां । भलें यश फावलें देवराया ।
जे साद्यंत माया । निरसिली माझी ॥ ६४ ॥
देवा, ते आपले करणे काही एक व्यर्थ गेले नाही. हे आपल्याला चांगले यश प्राप्त झाले आहे. कारण की माझे अज्ञान समूळ नाहीसे झाले आहे. ॥११-६४॥

आजीं आनंदसरोवरींचीं कमळें । तैसे हे तुझे डोळे ।
आपुलिया प्रसादाचीं राउळें । जयालागीं करिती ॥ ६५ ॥
महाराज, आनंदरूप सरोवरातील कमळासारखे हे तुमचे डोळे आपल्या कृपाप्रसादाची घरे ज्याला करतील ॥११-६५॥

हां हो तयाही आणि मोहाची भेटी । हे कायसी पाबळी गोठी ? ।
केउती मृगजळाची वृष्टी । वडवानळेंसीं ? ॥ ६६ ॥
अहो महाराज, त्याला देखील आणि भ्रांतीने ग्रासावे ? ही दुबळी गोष्ट काय बोलावी ? वडवानळ (समुद्रात जलत असलेला अद्नी) समुद्राच्या पाण्याने विझला जात नाही. त्यावर मृगजळाच्या वृष्टीचा काय परिणाम होणार ? ॥११-६६॥

आणि मी तंव दातारा । ये कृपेचिये रिघोनि गाभारां ।
घेत आहें चारा । ब्रह्मरसाचा ॥ ६७ ॥
आणि तशात अहो श्रीकृष्णा, मी तर आपल्या या कृपेच्या गाभार्‍यात शिरून ब्रह्मरसाचे भोजन करत आहे. ॥११-६७॥

तेणें माझा जी मोह जाये । एथ विस्मो कांहीं आहे ? ।
तरी उद्धरलों कीं तुझे पाये । शिवतले आहाती ॥ ६८ ॥
महाराज त्या योगाने माझी भ्रांती नष्ट होईल यात काय आश्चर्य आहे ? पण माझी भ्रांती गेली इतकेच नव्हे तर माझा उद्धार झाला, हे तुमच्या पायांची शपथ घेऊन सांगतो. ॥११-६८॥

भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया ।
त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् ॥ २ ॥
हे कमलपत्राक्षा, भूतांची उत्पति व नाश आणि तसेच तुझे अपार माहात्म्यही मी तुझ्यापासून सविस्तर ऐकले. ॥११-२॥

पैं कमलायतडोळसा । सूर्यकोटितेजसा ।
मियां तुजपासोनि महेशा । परिसिलें आजीं ॥ ६९ ॥
ज्ञा - कमळासारखे मोठे डोळे आहेत व कोटिसूर्यासारखे तेज आहे अशा देवा, महेशा, मी आपल्यापासून आजच असे ऐकले आहे की ॥११-६९॥

इयें भूतें जयापरी होती । अथवा लया हन जैसेनि जाती ।
ते मजपुढां प्रकृती । विवंचिली देवें ॥ ७० ॥
हे सर्व प्राणी ज्या रीतीने प्रकृतीपासून उत्पन्न होतात अथवा उत्पन्न झालेली भूते ज्या रीतीने पुन: प्रकृतीमधे लय पावतात, ती प्रकृति देवाने मला सांगितली. ॥११-७०॥

आणि प्रकृती कीर उगाणा दिधला ।
वरि पुरुषाचाही ठावो दाविला ।
जयाचा महिमा पांघरोनि जाहला । धडौता वेदु ॥ ७१ ॥
आणि प्रकृतीच्या स्वरूपाचा खरोखर सर्व हिशोब दिला आणि ज्या परमेश्वराचा माहिमा पांघरून वेद सवस्त्र (सुशोभित) झाला, त्या परमेश्वराचेही ठिकाण तुम्ही दाखवले. ॥११-७१॥

जी शब्दराशी वाढे जिये । कां धर्माऐशिया रत्‍नांतें विये ।
ते एथिंचे प्रभेचे पाये । वोळगे म्हणौनि ॥ ७२ ॥
महाराज वेद वाढतो (उत्कर्ष पावतो) व जगतो (टिकतो) अथवा धर्मासारख्या रत्नाला प्रसवतो, ते सर्व या अपल्या स्वरूपसामर्थ्याचा आश्रय करतो म्हणून. ॥११-७२॥

ऐसें अगाध माहात्म्य । जें सकळमार्गैकगम्य ।
जें स्वात्मानुभवरम्य । तें इयापरी दाविलें ॥ ७३ ॥
असे आपले अपार माहात्म्य आहे. आपले माहात्म्य हे सर्व मार्गांनी जाणण्याचा एक विषय आहे. व जे आपल्या स्वत:च्य़ा आत्म्याच्या अनुभवामुळे रममाण होण्यास योग्य असे जे आपले माहात्म्य ते आपण मला याप्रमाणे दाखवले. ॥११-७३॥

जैसा केरु फिटलिया आभाळीं । दिठी रिगे सूर्यमंडळीं ।
कां हातें सारूनि बाबुळीं । जळ देखिजे ॥ ७४ ॥
ज्याप्रमाणे आकशातील ढग नाहीसे झाल्यावर दृष्टि सूर्यमंडळात प्रवेश करते अथवा पाण्यावरील गोंडाळ हाताने दूर करून ज्याप्रमाणे पाणी दाखवावे ॥११-७४॥

नातरी उकलतया सापाचे वेढे । जैसें चंदना खेंव देणें घडे ।
अथवा विवसी पळे मग चढे । निधान हातां ॥ ७५ ॥
अथवा सापाचे वेहे उकलले असता ज्याप्रमाणे चंदनाला भेटता येते, अथवा पिशाच दूर केल्यावर जसे पुरलेले द्रव्य हाती लागते ॥११-७५॥

तैसी प्रकृती हे आड होती । ते देवेंचि सारोनि परौती ।
मग परतत्त्व माझिये मती । शेजार केलें ॥ ७६ ॥
त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या आड अज्ञान होते ते देवांनीच दूर सारले. नंतर माझ्या बुद्धीला आपणच परब्रह्माचे शेजघर केले. (ब्रह्मस्वरूपी माझी बुद्धी स्थिर केली.) ॥११-७६॥

म्हणौनि इयेविषयींचा मज देवा । भरंवसा कीर जाहला जीवा ।
परी आणीक एक हेवा । उपनला असे ॥ ७७ ॥
म्हणून देवा, याविषयी माझ्या जीवाची खरोखर खात्री पटली, परंतु आणखी एक उत्कट इच्छा उत्पन्न झाली आहे. ॥११-७७॥

तो भिडां जरी म्हणों राहों । तरी आना कवणा पुसों जावों ।
काय तुजवांचोनि ठावो । जाणत आहों आम्ही ? ॥ ७८ ॥
आम्ही भिडेमुळे ती गोष्ट जर विचारावयाची राहूं दिली तर आम्ही दुसर्‍या कोणास विचारावयास जावे ? तुझ्यावाचून दुसरी विचारण्याची जागा आम्हास माहीत आहे का ? ॥११-७८॥

जळचरु जळाचा आभारु धरी । बाळक स्तनपानीं उपरोधु करी ।
तरी तया जिणया श्रीहरी । आन उपायो असे ? ॥ ७९ ॥
पाण्यात राहणार्‍या प्राण्यांनी जर पाण्याच्या उपकाराचे ओझे मानले, अथवा मुलाने स्तनपान करण्याविषयी आईची भीड धरली तर देवा, त्यास जगण्यास दुसरा उपाय आहे काय ? ॥११-७९॥

म्हणौनि भीड सांकडी न धरवे । जीवा आवडे तेंही तुजपुढां बोलावें ।
तंव राहें म्हणितलें देवें । चाड सांगैं ॥ ८० ॥
म्हणून भीड अथवा संकोच धरवत नाही. मनाला जे बरे वाटेल ते देखील तुझ्यापुढे बोलून दाखवावे. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, थांब तुझी इच्छा काय असेल ती सांग. ॥११-८०॥



[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



एवमेतद्यथाऽऽत्थ त्वमात्मानं परमेश्वर ।
द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम ॥ ३ ॥
हे परमेश्वरा, तू स्वत:विषयी हे जे सांगितलेस, त्याप्रमाणे हे पुरुषोत्तमा, हे तुझे ऐश्वर्य विश्वरूप (प्रत्यक्ष) पहाण्याची माझी इच्छा आहे. ॥११-३॥

मग बोलिला तो किरीटी । म्हणे तुम्हीं केली जे गोठी ।
तिया प्रतीतीची दिठी । निवाली माझी ॥ ८१ ॥
ज्ञा - मग तो अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही (मागे दहाव्या अध्यायात) जी गोष्ट सांगितलीत त्या योगाने माझ्या अनुभवाची दृष्टि शांत झाली. ॥११-८१॥

आतां जयाचेनि संकल्पें । हे लोकपरंपरा होय हारपे ।
जया ठायातें आपणपें । मी ऐसें म्हणसी ॥ ८२ ॥
आता ज्याच्या संकल्पाने ही लोकांची मालिका उत्पन्न होते व नाहीशी होते आणि ज्या स्थानास तू 'मी' असे म्हणतोस ॥११-८२॥

तें मुद्दल रूप तुझें । जेथूनि इयें द्विभुजें हन चतुर्भुजें ।
सुरकार्याचेनि व्याजें । घेवों घेवों येसी ॥ ८३ ॥
जेथून ही दोन हातांची अथवा चार हातांची रूपे देवाचे कार्य करण्याच्या निमित्ताने वारंवार घेऊन येतोस, ते तुझे मूळ स्वरूप होय. ॥११-८३॥

पैं जळशयनाचिया अवगणिया । कां मत्स्य कूर्म इया मिरवणिया ।
खेळु सरलिया तूं गुणिया । सांठविसी जेथ ॥ ८४ ॥
हा अवतारकृत्याचा खेळ संपल्यावर क्षीरसमुद्रात झोप घेण्याचे सोंग किंवा मत्स्य, कूर्म इत्यादिक अलंकार, यांना तू गारोडी जेथे (ज्या मूळ स्वरूपात) साठवतोस, ॥११-८४॥

उपनिषदें जें गाती । योगिये हृदयीं रिगोनि पाहाती ।
जयातें सनकादिक आहाती । पोटाळुनियां ॥ ८५ ॥
उपनिषदे ज्याचे वर्णन करतात, योगी लोक आपल्या हृदयात शिरून ज्याचा साक्षात्कार करून घेतात, ज्याला सनकादिक संत मिठी मारून राहिलेले आहेत, ॥११-८५॥

ऐसें अगाध जें तुझें । विश्वरूप कानीं ऐकिजे ।
तें देखावया चित्त माझें । उतावीळ देवा ॥ ८६ ॥
असे जे अमर्याद असलेले तुझे विश्वरूप कानांनी मी ऐकतो, ते पहाण्याकरता देवा, माझे चित्त फारच उत्कंठित झाले आहे. ॥११-८६॥

देवें फेडूनियां सांकड । लोभें पुसिली जरी चाड ।
तरी हेंचि एकीं वाड । आर्तीं जी मज ॥ ८७ ॥
माझा संकोच दूर करून प्रेमाने माझी इच्छा काय आहे असे ज्याअर्थी विचारले आहे, तर महाराज, मी असे सांगतो की हीच एक मला मोठी तीव्र इच्छा आहे. ॥११-८७॥

तुझें विश्वरूपपण आघवें । माझिये दिठीसि गोचर होआवें ।
ऐसी थोर आस जीवें । बांधोनि आहें ॥ ८८ ॥
तूच या विश्वात भरलेला आहेस, हे पूर्णपणे माझ्या या डोळ्यांना दिसावे, अशी मोठी इच्छा मी मनात बाळगून राहिलो आहे. ॥११-८८॥

मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो ।
योगेश्वर ततो मे त्वं दर्शयाऽत्मानमव्ययम् ॥ ४ ॥
हे प्रभो, ते मी पहाणे शक्य आहे असे जर तुला वाटत असेल तर हे योगेश्वरा, क्षयरहित असे स्वत:चे रूप तू मला दाखव. ॥११-४॥

परी आणीक एक एथ शारङ्गी । तुज विश्वरूपातें देखावयालागीं ।
पैं योग्यता माझिया आंगीं । असे कीं नाहीं ॥ ८९ ॥
ज्ञा - परंतु कृष्णा, आणखी एक गोष्ट आहे, ती ही की विश्वरूप जो तू त्या तुला पहाण्याकरता माझ्या अंगात योग्यता आहे की नाही ॥११-८९॥

हें आपलें आपण मी नेणें । तें कां नेणसी जरी देव म्हणे ।
तरी सरोगु काय जाणे । निदान रोगाचें ? ॥ ९० ॥
हे मला समजत नाही. हे का समजत नाही असे जर आपण म्हणाल, तर सांगा, रोग्यास आपल्या रोगाचे मूळ कारण समजते काय ? ॥११-९०॥

आणि जी आर्तीचेनि पडिभरें । आर्तु आपुली ठाकी पैं विसरे ।
जैसा तान्हेला म्हणे न पुरे । समुद्र मज ॥ ९१ ॥
महाराज, आणि इच्छेचा जोर झाला की उत्कंठित मनुष्य आपली योग्य विसरतो. ज्याप्रमाणे फार तहान लागलेल्या मनुष्यास, 'मला समुद्रही पुरणार नाही' असे वाटते ॥११-९१॥

ऐशा सचाडपणाचिये भुली । न सांभाळवे समस्या आपुली ।
यालागीं योग्यता जेवीं माउली । बालकाची जाणे ॥ ९२ ॥
त्याप्रमाणे तीव्र इच्छेच्या वेडाने मला माझ्या शक्तीचा अंदाज कळत नाही. म्हणून आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाची योग्यता जाणते, ॥११-९२॥

तयापरी श्रीजनार्दना । विचारिजो माझी संभावना ।
मग विश्वरूपदर्शना । उपक्रम कीजे ॥ ९३ ॥
त्याप्रमाणे हे जनार्दना, माझी योग्यता किती आहे याचा आपण विचार करा व मग विश्वरूप दाखवण्यास आरंभ करा. ॥११-९३॥

तरी ऐसी ते कृपा करा । एर्‍हवीं नव्हे हें म्हणा अवधारा ।
वायां पंचमालापें बधिरा । सुख केउतें देणें ? ॥ ९४ ॥
तरी माझ्या योग्यतेनुरूप कृपा करा. (एरवी माझी विश्वरूप पाहाण्याची योग्यता नसेल तर) तुला विश्वरूप दाखवणे शक्य नाही, असे स्पष्ट सांगा. पहा बहिर्‍या मनुष्याला पंचम स्वरातील गायनाने सुख देण्याचा व्यर्थ प्रयत्न कशाला करावयाचा ? ॥११-९४॥

एर्‍हवीं येकले बापियाचे तृषे । मेघ जगापुरतें काय न वर्षे ? ।
परी जहालीही वृष्टि उपखे । जर्‍ही खडकीं होय ॥ ९५ ॥
सहज पाहिले तर, मेघ हा एकट्या चातकाची तहान भागवण्याकरता पर्जन्यवृष्टी करतो, ती वृष्टी जगापुरती होत नाही काय ? परंतु तीच पर्जन्यवृष्टी खडकावर झाली तर वृष्टी होऊन सुद्धा व्यर्थ ठरते. ॥११-९५॥

चकोरा चंद्रामृत फावलें । येरा आण वाहूनि काय वारिलें ? ।
परी डोळ्यांवीण पाहलें । वायां जाय ॥ ९६ ॥
चकोर पक्ष्याला चंद्रामृत प्राप्त झाले, तेच चंद्रामृत इतर प्राण्यांना घेऊ नका, म्हणून शपथ घालून चंद्राने त्यांचे निवारण केले आहे काय ? परंतु परंतु जसे इतरांना अमृतसेवनाची दृष्टी (हातवटी) नसल्यामुळे त्यांच्या साठी चंद्रोदय होऊनही व्यर्थ जातो. ॥११-९६॥

म्हणौनि विश्वरूप तूं सहसा । दाविसी कीर हा भरंवसा ।
कां जे कडाडां आणि गहिंसा- । माजी नीत्य नवा तूं कीं ॥ ९७ ॥
म्हणून तू विश्वरूप मला एकदम दाखवशील ही मला खरोखर खात्री आहे. कारण की जाणत्यांत आणि नेणत्यांत तू नित्य नवा (उदार) आहेस. ॥११-९७॥

तुझें औदार्य जाणों स्वतंत्र । देतां न म्हणसी पात्रापात्र ।
पैं कैवल्या ऐसें पवित्र । जें वैरियांही दिधलें ॥ ९८ ॥
तुझा उदारपणा स्वतंत्र आहे. (याचकाच्या इच्छेवर अवलंबून नाही). द्यावयास लागलास म्हणजे हा योग्य अथवा अयोग्य अशी निवड तू करत नाहीस. मोक्षासारखी पवित्र वस्तु पण ती तू आपल्या शत्रूंना दिलीस. ॥११-९८॥

मोक्षु दुराराध्यु कीर होय । परी तोही आराधी तुझे पाय ।
म्हणौनि धाडिसी तेथ जाय । पाइकु जैसा ॥ ९९ ॥
खरोखर मोक्ष हा मिळण्यास फार कठिण आहे. परंतु तो देखील तुझ्याच चरणांची सेवा जो करतो व म्हणूनच तू धाडशील तेथे चाकराप्रमाणे जातो. ॥११-९९॥

तुवां सनकादिकांचेनि मानें । सायुज्यीं सौरसु दिधला पूतने ।
जे विषाचेनि स्तनपानें । मारूं आली ॥ १०० ॥
जी पूतना राक्षसी विषाचे स्तनपान करवून तुला मारावे म्हणून तुझ्याकडे आली होती, त्या पूतनेला तू सनकादिकांच्या बरोबरीने मोक्षाविषयी योग्य केलेस. ॥११-१००॥

हां गा राजसूय यागाचिया सभासदीं । देखतां त्रिभुवनाची मांदी ।
कैसा शतधा दुर्वाक्य शब्दीं । निस्तेजिलासी ॥ १०१ ॥
अहो, राजसूय यज्ञाच्या सभासदांत त्रिभुवनातील हजारो मंडळी पहात असतांना शेकडो प्रकारच्या वाईट शब्दांनी (शिशुपालाकडून) तुझा पाणउतारा झाला. ॥११-१०१॥

ऐशिया अपराधिया शिशुपाळा । आपणपें ठावो दिधला गोपाळा ।
आणि उत्तानचरणाचिया बाळा । काय ध्रुवपदीं चाड ? ॥ १०२ ॥
अशा अपराधी शिशुपालाला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी तू जागा दिलीस. आणि उत्तानपाद राजाच्या मुलाला (ध्रुवाला) अढळपदाची इच्छा होती काय ? ॥११-१०२॥

तो वना आला याचिलागीं । जे बैसावें पितयाचिया उत्संगीं ।
कीं तो चंद्रसूर्यादिकांपरिस जगीं । श्लाघ्यु केला ॥ १०३ ॥
तो एवढ्याकरता रानात आला होता की आपण आपल्या बापाच्या मांडीवर बसावे, परंतु त्याला या लोकामधे चंद्रसूर्यापेक्षाही प्रशंसनीय केलेस. ॥११-१०३॥

ऐसा वनवासिया सकळां । देतां एकचि तूं धसाळा ।
पुत्रा आळवितां अजामिळा । आपणपें देसी ॥ १०४ ॥
याप्रमाणे दु:खाने व्यापलेल्या सर्वांना देण्यात सढळ असे एक तुम्हीच अहात. मुलाला हाक मारत असतांना अजामिळाला आपली तद्रूपता दिलीत. ॥११-१०४॥

जेणें उरीं हाणितलासि पांपरा । तयाचा चरणु वाहासी दातारा ।
अझुनी वैरियांचिया कलेवरा । विसंबसीना ॥ १०५ ॥
हे उदार श्रीकृष्णा, ज्या भृगुने तुझ्या छातीवर लाथ हाणली, त्याच्या पावलांची खूण तू आपल्या छातीवर धारण करतोस. (शंखासूर) शत्रु असूनही तू अजून त्याच्या शरिरास विसंबत नाहीस. ॥११-१०५॥

ऐसा अपकारियां तुझा उपकारु । तूं अपात्रींही परी उदारु ।
दान म्हणौनि दारवंठेकरु । जाहलासी बळीचा ॥ १०६ ॥
याप्रमाणे तुझ्यावर अपकार करणार्‍या लोकांवर तू उपकार केले आहेस. तू वास्तविक योग्यता नसलेल्यांच्या ठिकाणीही आपले औदार्य दाखवले आहेस. दान मागून घेऊन तू बळीचा द्वारपाल झालास. ज्या गणिकेने तुला कधी पूजिले नाही अथवा ॥११-१०६॥

तूंतें आराधी ना आयकें । होती पुंसा बोलावित कौतुकें ।
तिये वैकुंठीं तुवां गणिके । सुरवाडु केला ॥ १०७ ॥
तुझे कधी गुणवर्णन ऐकले नाही व जी गणिका मरतेवेळी सहज आपल्या पाळलेल्या राघूस 'राघोबा राघोबा' म्हणून हाका मारत होती, त्या गणिकेस तू वैकुंठलोकामधे स्थान दिलेस. ॥११-१०७॥

ऐसीं पाहूनि वायाणीं मिषें । आपणपें देवों लागसी वानिवसें ।
तो तूं कां अनारिसें । मजलागीं करिसी ॥ १०८ ॥
वरील गणिकेस राघोबा म्हणण्याप्रमाणे व्यर्थ निमित्ते पाहून तू सहज निजपद अपात्र माणसांनाही देतोस, असा जो तू काही तरी निमित पाहून अपात्र माणसास निजपद देणारा तो तू मला वेगळे करशील काय ? ॥११-१०८॥

हां गा दुभतयाचेनि पवाडें । जे जगाचें फेडी सांकडें ।
तिये कामधेनूचे पाडे । काय भुकेले ठाती ? ॥ १०९ ॥
जी कामधेनु आपल्या दुभत्याच्या विपुलतेने सगळ्या जगाची अडचण दूर करते, त्या कामधेनूची वासरे भुकेली रहातील काय ? ॥११-१०९॥

म्हणौनि मियां जें विनविलें कांहीं । तें देव न दाखविती हें कीर नाहीं ।
परी देखावयालागीं देईं । पात्रता मज ॥ ११० ॥
म्हणून मी जी काही विनंती केली ती मान्य करून देव आपले विश्वरूप दाखवणार नाहीत असे खरोखर नाही, परंतु ते पहाण्याला लागणारी योग्यता मला द्यावी, ॥११-११०॥

तुझें विश्वरूप आकळे । ऐसे जरी जाणसी माझे डोळे ।
तरी आर्तीचे डोहळे । पुरवीं देवा ॥ १११ ॥
तुझ्या विश्वरूपाचे आकलन होईल असे माझे डोळे समर्थ आहेत असे जर तुला वाटत असेल तर हे श्रीकृष्णा, विश्वरूप पहाण्याच्या उत्कंठेचे हे डोहाळे पूर्ण करावेत. ॥११-१११॥

ऐसी ठायेंठावो विनंती । जंव करूं सरला सुभद्रापती ।
तंव तया षड्गुणचक्रवर्ती । साहवेचिना ॥ ११२ ॥
याप्रमाणे जशी पाहिजे तशी त्या वेळेला अर्जुन विनंती करील तेव्हा ती त्या ऐश्वर्यादि सहा गुणांच्या सार्वभौम राजा श्रीकृष्णाला सहन होणार नाही ॥११-११२॥

तो कृपापीयूषसजळु । आणि येरु जवळां आला वर्षाकाळु ।
नाना कृष्ण कोकिळु । अर्जुन वसंतु ॥ ११३ ॥
तो श्रीकृष्ण परमात्मा कृपारूपी अमृताने जलयुक्त मेघ होता आणि अर्जुन हा जवळ आलेला पावसाळा होता अथवा कृष्ण हा कोकिळ असून अर्जुन हा वसंतऋतु होता. ॥११-११३॥

नातरी चंद्रबिंब वाटोळें । देखोनि क्षीरसागर उचंबळे ।
तैसा दुणेंही वरी प्रेमबळें । उल्लसितु जाहला ॥ ११४ ॥
अथवा चंद्राचे गोल असलेले पूर्ण बिंब पाहून क्षीरसमुद्राला जसे भरते येते, त्याप्रमाणे प्रेमाला दुपटीपेक्षा अधिक जोर येऊन श्रीकृष्ण आनंदित झाला. ॥११-११४॥

मग तिये प्रसन्नतेचेनि आटोपें । गाजोनि म्हणितलें सकृपें ।
पार्था देख देख अमुपें । स्वरूपें माझीं ॥ ११५ ॥
मग त्या प्रसन्नपणाच्या आवेशात गर्जना करून कृपावंत श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना पहा, पहा, ही माझी अनंत स्वरूपे. ॥११-११५॥

एक विश्वरूप देखावें । ऐसा मनोरथु केला पांडवें ।
कीं विश्वरूपमय आघवें । करूनि घातलें ॥ ११६ ॥
ज्ञा - एकच विश्वरूप पहावे, असा मनोरथ अर्जुनाने केला इतक्यात देवाने सर्वच विश्वरूप करून ठेवले. ॥११-११६॥

बाप उदार देवो अपरिमितु । याचक स्वेच्छा सदोदितु ।
असे सहस्रवरी देतु । सर्वस्व आपुलें ॥ ११७ ॥
धन्य श्रीकृष्ण परमात्मा ! तो अमर्याद उदार आहे. तो नेहेमी याचकांच्या इच्छेच्या सहस्रपट सर्वस्व देतो. ॥११-११७॥

अहो शेषाचेहि डोळे चोरिले । वेद जयालागीं झकविले ।
लक्ष्मीयेही राहविलें । जिव्हार जें ॥ ११८ ॥
अहो जे दोन हजार डोळे असलेल्या शेषाच्या दृष्टीसही पडू दिले नाही, वेदांना ज्याचा पत्ता लागू दिला नाही (फार काय सांगावे ?) लक्ष्मी हे भगवंताचे कुटुंब खरे, पण तिलाही जे दाखवले नाही, असे जे भगवंताच्या जीवाचे गुह्य रूप विश्वरूप ॥११-११८॥

तें आतां प्रकटुनी अनेकधा । करीत विश्वरूपदर्शनाचा धांदा ।
बाप भाग्या अगाधा । पार्थाचिया ॥ ११९ ॥
ते विश्वरूप आता अनेक प्रकारांनी प्रगट करून देव विश्वरूप दाखवण्याचा व्यवहार करू लागले. अर्जुनाच्या अपार भाग्याची धन्य आहे. ॥११-११९॥

जो जागता स्वप्नावस्थे जाये । तो जेवीं स्वप्नींचें आघवें होये ।
तेवीं अनंत ब्रह्मकटाह आहे । आपणचि जाहला ॥ १२० ॥
जागा असलेला मनुष्य स्वप्नावस्थेत गेल्यावर तो जसा स्वप्नातील सर्व वस्तु आपणच बनून रहातो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपणच अनंत ब्रह्मांडे बनून राहिला आहे. ॥११-१२०॥

ते सहसा मुद्रा सोडिली । आणि स्थूळदृष्टीची जवनिका फेडिली ।
किंबहुना उघडिली । योगऋद्धी ॥ १२१ ॥
श्रीकृष्णांनी तेथील विश्वरूपाचा आकार एकदम प्रगट केला आणि स्थूल दृष्टीचा पडदा फाटला (दूर केला). फार काय सांगावे ? त्याने तो आकार म्हणजे आपले योगाचे वैभव प्रगट केले. ॥११-१२१॥

परी हा हें देखेल कीं नाहीं । ऐसी सेचि न करी कांहीं ।
एकसरां म्हणतसे पाहीं । स्नेहातुर ॥ १२२ ॥
परंतु हा अर्जुन हे विश्वरूप पाहू शकेल की नाही, हे देवांनी काही लक्षातच घेतले नाही, तर अर्जुनाच्या प्रेमामुळे उतावळे होऊन एकाएकी अर्जुनास 'पहा, पहा' असे म्हणावयास लागले. ॥११-१२२॥

श्रीभगवानुवाच
पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः ।
नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ॥ ५ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, नाना प्रकारची, नाना वर्णांची व नाना आकृतींची माझी शेकडो हजारो दिव्य रूपे पहा. ॥११-५॥

अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें । आणि तेंचि दावूं तरी काय दाविलें ।
आतां देखें आघवें भरिलें । माझ्याचि रूपीं ॥ १२३ ॥
अर्जुना तू एक विश्वरूप दाखवा, असे म्हटलेस, आणि आम्ही तेच एकच विश्वरूप) दाखवले तर त्यात काय मोठेसे दाखवले ? तर तू आता असे पहा की सर्व (विश्व) माझ्या स्वरूपात सामावलेले आहे. ॥११-१२३॥

एकें कृशें एकें स्थूळें । एकें र्‍हस्वें एकें विशाळें ।
पृथुतरें सरळें । अप्रांतें एकें ॥ १२४ ॥
काही रोडकी, काही लठ्ठ, काही ठेंगू, काही प्रशस्त, काही फारच विस्तृत, सडपातळ व काही अमर्याद, ॥११-१२४॥

एकें अनावरें प्रांजळें । सव्यापारें एकें निश्चळें ।
उदासीनें स्नेहाळें । तीव्रें एकें ॥ १२५ ॥
काही न आवरणारी व काही प्रामाणिक, काही सक्रिय व निष्क्रिय, काही उदासीन, प्रेमळ, काही कडक ॥११-१२५॥

एके घूर्णितें सावधें । असलगें एकें अगाधें ।
एकें उदारें अतिबद्धें । क्रुद्धें एकें ॥ १२६ ॥
काही धुंद, काही सावध, काही उघड व काही गूढ, काही उदार, काही कृपण, आणि रागावलेली काही ॥११-१२६॥

एकें शांतें सन्मदें । स्तब्धें एकें सानंदें ।
गर्जितें निःशब्दें । सौम्यें एकें ॥ १२७ ॥
काही सदाचरणी, काही सदा मदोन्मत्त, काही स्तब्ध, काही आनंदित, काही गर्जना करणारी, काही शब्दरहित व काही शांत ॥११-१२७॥

एकें साभिलाषें विरक्तें । उन्निद्रितें एकें निद्रितें ।
परितुष्टें एकें आर्तें । प्रसन्नें एकें ॥ १२८ ॥
काही आशाखॊर, आणि काही निराश, काही जागी झालेली व काही झोपलेली, काही सर्व बाजूंनी संतुष्ट, काही पीडित, आणि काही प्रसन्न. ॥११-१२८॥

एकें अशस्त्रें सशस्त्रें । एकें रौद्रें अतिमित्रें ।
भयानकें एकें पवित्रें । लयस्थें एकें ॥ १२९ ॥
काही बिनहत्यारी व काही हत्यारी, काही तामसी व काही अतिशय स्नेहाळू, व काही भयंकर, काही पवित्र आणि काही समाधीत असलेली ॥११-१२९॥

एकें जनलीलाविलासें । एकें पालनशीलें लालसें ।
एकें संहारकें सावेशें । साक्षिभूतें एकें ॥ १३० ॥
काही उत्पन्न करण्याच्या लीलेत क्रीडा करणारी, काही पालन करण्याचा स्वभाव असलेली. काही मोठ्या आवेशाने संहार करणारी, काही तटस्थ म्हणून राहिलेली, ॥११-१३०॥

एवं नानाविधें परी बहुवसें । आणि दिव्यतेजप्रकाशें ।
तेवींचि एकएका ऐसें । वर्णेंही नव्हे ॥ १३१ ॥
याप्रमाणे अनेक प्रकारचा परंतु पुष्कळ व दिव्य तेजाने प्रकाशरूप अशी ती रूपे होती. त्याचप्रमाणे वर्णाच्याही बाबतीत ती रूपे एकासारखी एक नव्हती. ॥११-१३१॥

एकें तातलें साडेपंधरें । तैसीं कपिलवर्णें अपारें ।
एकें सर्वांगीं जैसें सेंदुरें । डवरलें नभ ॥ १३२ ॥
काही तावून काढलेल्या उत्तम सोन्यासारखी, त्याचप्रमाणे पिंगट रंग असलेली, अनंतरूपे आणि काही ज्याप्रमाणे शेंदराने माखलेले आकाश असावे त्याप्रमाणे शेंदरी, ॥११-१३२॥

एकें सावियाचि चुळुकीं । जैसें ब्रह्मकटाह खचिलें माणिकीं ।
एकें अरुणोदयासारिखीं । कुंकुमवर्णें ॥ १३३ ॥
रत्नांनी ब्रह्मांड जडल्यामुले ते जसे चमकत असावे, तशा प्रकारची कित्येक रूपे स्वाभाविक सौंदर्याने चमकणारी होती व कित्येक अरुणोदयाच्या केशरी वर्णाप्रमाणे होती. ॥११-१३३॥

एकें शुद्धस्फटिकसोज्वळें । एकें इंद्रनीळसुनीळें ।
एकें अंजनवर्णें सकाळें । रक्तवर्णें एकें ॥ १३४ ॥
काही शुद्ध स्फटिकाप्रमाणे शुभ्र असलेली, काही इंद्रनील मण्याप्रमाणे चांगली निळी असलेली, काही काजळाच्या पर्वताप्रमाणे अतिशय काळी असलेली, काही तांबड्या रंगाची, ॥११-१३४॥

एकें लसत्कांचनसम पिंवळीं । एकें नवजलदश्यामळीं ।
एकें चांपेगौरीं केवळीं । हरितें एकें ॥ १३५ ॥
काही तेजस्वी सोन्याप्रमाने पिवळ्या रंगाची, काही नव्या मेघाप्रमाणे काळ्यासावळ्या वर्णांची, काही केवल चाफ्याप्रमाणे गोरी असलेली व काही हिरव्या रंगाची ॥११-१३५॥

एकें तप्तताम्रतांबडीं । एकें श्वेतचंद्र चोखडीं ।
ऐसीं नानावर्णें रूपडीं । देखें माझीं ॥ १३६ ॥
काही तापलेल्या तांब्यासारखी तांबडी, काही शुभ्र चंद्रासारखी शुद्ध, अशी ही माझी नाना रंगाची स्वरूपे पहा. ॥११-१३६॥

हे जैसे कां आनान वर्ण । तैसें आकृतींही अनारिसेपण ।
लाजा कंदर्प रिघाला शरण । तैसीं सुंदरें एकें ॥ १३७ ॥
हे ज्याप्रमाणे वेगवेगळे रंग आहेत, त्याप्रमाणे आकृतीही वेगवेगळ्या आहेत. कित्येक लाजेने मदनही शरण येईल, अशी सुंदर आहेत. ॥११-१३७॥

एकें अतिलावण्यसाकारें । एकें स्निग्धवपु मनोहरें ।
शृंगारश्रियेचीं भांडारें । उघडिली जैसीं ॥ १३८ ॥
काही रूपे अति सुंदर बांध्याची आहेत, काही तुळातुळित शरीराची, मनाला हरण करणारी आहेत, जणु काय श्रृंगारलक्ष्मीचे भांडारखानेच उघडले आहेत अशी आहेत. ॥११-१३८॥

एकें पीनावयवमांसाळें । एकें शुष्कें अति विक्राळें ।
एकें दीर्घकंठें विताळें । विकटें एकें ॥ १३९ ॥
काही पुष्ट अवयवाची व खूप मांस असलेली. काही वाळलेली, काही भयंकर, काही उंच मानेची, काही मोठ्या टाळूची व काही हिडीस रूपाची ॥११-१३९॥

एवं नानाविधाकृती । इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती ।
ययांच्या एकेकीं अंगप्रांतीं । देख पां जग ॥ १४० ॥
ह्याप्रमाणे अनेक प्रकारच्या आकृती आहेत. अर्जुना, ह्या आकृति पहावयास लागले तर त्यांना अंत नाही आणि त्यांच्या एक एका शरीरभागावर तू जग पहा. ॥११-१४०॥

पश्यादित्यान्वसून्रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा ।
बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत ॥ ६ ॥
आदित्य, वसु, रुद्र, अश्विन, आणि वायु पहा, हे भरतकुलोत्पन्ना, पूर्वी कधी न पाहिलेली अनेक आश्चर्ये अवलोकन कर. ॥११-६॥

जेथ उन्मीलन होत आहे दिठी । तेथ पसरती आदित्यांचिया सृष्टी ।
पुढती निमीलनीं मिठीं । देत आहाती ॥ १४१ ॥
ज्ञा - ज्या ठिकाणी (विश्वरूप भागवंताच्या) दृष्टि उघडतात, त्या ठिकाणी सूर्यांच्या सृष्ट्या पसरतात व जेथे त्या दृष्ट्या मिटतात तेथे त्या सूर्यांच्या सृष्ट्या मावळतात. ॥११-१४१॥

वदनींचिया वाफेसवें । होत ज्वाळामय आघवें ।
जेथ पावकादिक पावे । समूह वसूंचा ॥ १४२ ॥
तोंडाच्या वाफेबरोबर सर्व ज्वालामय होते, त्या ठिकाणी अग्नि आदिकरून वसूंचा समुदाय प्राप्त होतो. ॥११-१४२॥

आणि भ्रूलतांचे शेवट । कोपें मिळों पाहतीं एकवट ।
तेथ रुद्रगणांचे संघाट । अवतरत देखें ॥ १४३ ॥
आणि भिवयांची टोके रागाने एकत्र होऊ पहातात, त्या ठिकाणी रुद्रगणांचे समुदाय उत्पन्न होतात. पहा. ॥११-१४३॥

पैं सौम्यतेचा बोलावा । मिती नेणिजे अश्विनौदेवां ।
श्रोत्रीं होती पांडवा । अनेक वायु ॥ १४४ ॥
विश्वरूपाच्या सौम्यतेच्या ओलाव्यामधे अगणित अश्विनौदेव उत्पन्न होतात आणि अर्जुना विश्वरूपाच्या कानांच्या ठिकाणी अनेक वायु उत्पन्न होतात. ॥११-१४४॥

यापरी एकेकाचिये लीळे । जन्मती सुरसिद्धांचीं कुळें ।
ऐसीं अपारें आणि विशाळें । रूपें इयें पाहीं ॥ १४५ ॥
याप्रमाणे एका एका स्वरूपाच्या सहज खेळामधे देवांचे व सिद्धांचे समुदाय उत्पन्न होतात अशी अमर्याद व प्रचंड रूपे पहा. ॥११-१४५॥

जयांतें सांगावया वेद बोबडे । पहावया काळाचेंही आयुष्य थोकडें ।
धातयाही परी न सांपडे । ठाव जयांचा ॥ १४६ ॥
ज्या स्वरूपांचे वर्णन करण्यास वेद असमर्थ आहेत, जी स्वरूपे पहावयास काळाचेही आयुष्य थोडे आहे, आणि ब्रह्मदेव सर्वज्ञ खरा, पण त्यालाही ज्या स्वरूपांचा पत्ता लागत नाही ॥११-१४६॥

जयांतें देवत्रयी कधीं नायके । तियें इयें प्रत्यक्ष देख अनेकें ।
भोगीं आश्चर्याची कवतिकें । महासिद्धी ॥ १४७ ॥
ज्या स्वरूपांना तिन्ही देव कधीही ऐकत नाहीत अशी जी जी अनेक रूपे ती तू प्रत्यक्ष पहा आणि कौतुकाने आश्चर्याचे मोठे ऐश्वर्य भोग. ॥११-१४७॥

इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरम् ।
मम देहे गुडाकेश यच्चान्यद्दृष्टुमिच्छसि ॥ ७ ॥
हे अर्जुना, चराचरयुक्त सर्व जग व जर आणखी दुसरे पाहाण्याची तुझी इच्छा असेल तर येथे माझ्या शरीरामधे एका ठिकाणी स्थित आहे ते आता पहा. ॥११-७॥

इया मूर्तीचिया किरीटी । रोममूळीं देखें पां सृष्टी ।
सुरतरुतळवटीं । तृणांकुर जैसे ॥ १४८ ॥
ज्ञा - अर्जुना ज्याप्रमाणे कल्पतरूच्या बुडाशी गवताचे शेकडो अंकुर असतात, त्याप्रमाणे या विश्वमूर्तीच्या प्रत्येक केसाच्या बुडाशी सृष्ट्या पहा. ॥११-१४८॥

चंडवाताचेनि प्रकाशें । उडत परमाणु दिसती जैसे ।
भ्रमत ब्रह्मकटाह तैसें । अवयवसंधीं ॥ १४९ ॥
आणि ज्याप्रमाणे वार्‍याने उडणारे परमाणू प्रकाशात दिसतात, त्याप्रमाणे विश्वरूपाच्या सांध्यात अनेक ब्रह्मांडे वर खाली जातांना दिसतात. ॥११-१४९॥

एथ एकैकाचिया प्रदेशीं । विश्व देख विस्तारेंशी ।
आणि विश्वाही परौतें मानसीं । जरी देखावें वर्ते ॥ १५० ॥
या विश्वाच्या एका भागावर तू संपूर्ण विस्तारासह विश्व पहा आणि तुझ्या मनात जर विश्वाही पलीकडे पाहावे असे वाटत असेल ॥११-१५०॥

तरी इयेही विषयींचें कांहीं । एथ सर्वथा सांकडें नाहीं ।
सुखें आवडे तें माझिया देहीं । देखसी तूं ॥ १५१ ॥
तर त्याविषयीही येथे मुळीच तोटा नाही. तुला वाटेल ते तू माझ्या देहाच्या ठिकाणी पहा. ॥११-१५१॥

ऐसें विश्वमूर्ती तेणें । बोलिलें कारुण्यपूर्णें ।
तंव देखत आहे कीं नाहीं न म्हणे । निवांतुचि येरु ॥ १५२ ॥
याप्रमाणे करुणेने पूर्ण भरलेले असे ते विश्वरूपधारी परमात्मा बोलले. तेव्हा मी विश्वरूप पहात आहे की नाही असे काही न बोलता अर्जुन स्तब्धच राहिला. ॥११-१५२॥

एथ कां पां हा उगला ? । म्हणौनि श्रीकृष्णें जंव पाहिला ।
तंव आर्तीचें लेणें लेइला । तैसाचि आहे ॥ १५३ ॥
या प्रसंगी अर्जुन स्तब्ध का राहिला आहे म्हणून कृष्णाने ज्यावेळेस त्याच्याकडे पाहिले, तेव्हा तो इच्छेचा अलंकार घालून तसाच उत्कंठित असलेला असा आढळाला. ॥११-१५३॥

न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा ।
दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम् ॥ ८ ॥
केवळ या तुझ्या दृष्टीने मला पहाण्यास तू समर्थ नाहीस. याकरता मी तुला दिव्य दृष्टि देतो. आता माझे ईश्वरी सामर्थ्य पहा. ॥११-८॥

मग म्हणें उत्कंठे वोहट न पडे । अझुनी सुखाची सोय न सांपडे ।
परी दाविलें तें फुडें । नाकळेचि यया ॥ १५४ ॥
मग देव म्हणाले, अद्याप याची विश्वरूप पहाण्याची इच्छा कमी झालेली दिसत नाही व अद्याप याला सुखाचा मार्ग सापडला नाही, इतकेच नाही परंतु आम्ही विश्वरूप दाखवले ते याला मुळीच आकलन होत नाही. ॥११-१५४॥

हे बोलोनि देवो हांसिले । हांसोनि देखणियातें म्हणितलें ।
आम्हीं विश्वरूप तरी दाविलें । परी न देखसीच तूं ॥ १५५ ॥
असे बोलून देव हसले व हसून अर्जुनास म्हणाले, खूप पहाणारा आहेस ! आम्ही तुला विश्वरूप तर दाखवले परंतु तू ते पहात नाहीस. ॥११-१५५॥

यया बोला येरें विचक्षणें । म्हणितलें हां जी कवणासी तें उणें ? ।
तुम्ही बकाकरवीं चांदिणें । चरऊं पहा मा ॥ १५६ ॥
या श्रीकृष्णाच्या भाषणावर दूरदर्शी अर्जुन म्हणाला, महाराज, तर हा कमीपणा कोणाला आहे ? तुम्ही बगळ्याला चंद्रामृताचा उपभोग देऊ पहाता ना ? ॥११-१५६॥

हां हो उटोनियां आरिसा । आंधळिया दाऊं बैसा ।
बहिरियापुढें हृषीकेशा । गाणीव करा ॥ १५७ ॥
अहो महाराज, आपण आरसा घासून तो आंधळ्यास दाखवायला लागला अहात, किंवा हे श्रीकृष्णा, आपण बहिर्‍यापुढे गाणे सुरू केले आहे. ॥११-१५७॥

मकरंदकणाचा चारा । जाणतां घालूनि दर्दुरा ।
वायां धाडा शारङ्गधरा । कोपा कवणा ॥ १५८ ॥
पुष्पांतील सुगंधी कणांचा चारा जाणून बुजून चिखल खाणार्‍या बेडकापुढे टाकून श्रीकृष्णा, वाया का घालवीत अहात ? आणि मग रागावता कोणावर ? ॥११-१५८॥

जें अतींद्रिय म्हणौनि व्यवस्थिलें । केवळ ज्ञानदृष्टीचिया भागा फिटलें ।
तें तुम्हीं चर्मचक्षूंपुढें सूदलें । मी कैसेनि देखें ॥ १५९ ॥
जे विश्वरूप इंद्रियांस प्रत्यक्ष दिसणे शक्य नाही म्हणून शास्त्रद्वारा ठरले आहे व जे केवळ ज्ञानदृष्टीचाच विषय होणारे आहे, असे जे विश्वरूप ते तुम्ही माझ्या चर्मचक्षूंपुढे ठेवले तर मी त्याला कसे पाहू ? ॥११-१५९॥

परी हें तुमचें उणें न बोलावें । मीचि साहें तेंचि बरवें ।
एथ आथि म्हणितलें देवें । मानूं बापा ॥ १६० ॥
परंतु हा तुमचा कमीपणा बोलू नये. मीच सहन करावे हे बरे. या अर्जुनाच्या बोलण्यावर देव म्हणाले, होय बाबा, तू म्हणतोस ते मला मान्य आहे. ॥११-१६०॥

साच विश्वरूप जरी आम्ही दावावें । तरी आधीं देखावया सामर्थ्य कीं द्यावें ।
परी बोलत बोलत प्रेमभावें । धसाळ गेलों ॥ १६१ ॥
खरोखरच आम्हास जर स्वरूप दाखवायचे होते, तर तुला प्रथम ते पहाण्याचे सामर्थ्य द्यावयास पाहिजे होते. परंतु प्रेमामुळे बोलत बोलत विसरून गेलो. ॥११-१६१॥

काय जाहलें न वाहतां भुई पेरिजे । तरी तो वेलु विलया जाइजे ।
तरी आतां माझें निजरूप देखिजे । तें दृष्टी देवों तुज ॥ १६२ ॥
हे कसे झाले म्हणशील तर जमिनीची मशागत न करता तिच्यात बी पेरले आणि त्यास पाणी घातले तर तो पेरण्याचा व पाणी घालण्याचा वेळ फुकट जाईल. (त्याप्रमाणे तुला विश्वरूप पाहाण्याची दृष्टी न देता तुझ्यापुढे विश्वरूप मांडले तर ते मांडणे व्यर्थ जाणारच). परंतु आता माझे स्वत:चे स्वरूप पहाण्यास समर्थ असणारी दृष्टि मी तुला देतो. ॥११-१६२॥

मग तिया दृष्टी पांडवा । आमुचा ऐश्वर्ययोगु आघवा ।
देखोनियां अनुभवा । माजिवडा करीं ॥ १६३ ॥
ज्ञा - मग अर्जुना, त्य़ा दृष्टीने आमचा सर्व ऐश्वर्ययोग पाहून त्याला अनुभावामधे घालून ठेव. ॥११-१६३॥

ऐसें तेणें वेदांतवेद्यें । सकळ लोक आद्यें ।
बोलिलें आराध्यें । जगाचेनि ॥ १६४ ॥
वेदांताचा (उपनिषदांचा) जो जाणण्याचा विषय, सर्व लोकांचा जो मूळ पुरुष व जो सर्व जगाला पूजनीय असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो याप्रमाणे बोलता झाला (असे संजय म्हणाला). ॥११-१६४॥



[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



संजय उवाच
एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः ।
दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम् ॥ ९ ॥
संजय म्हणाला, हे राजा धृतराष्ट्रा, महायोगैश्वर्यसंपन्न हरि याप्रमाणे बोलून नंतर अर्जुनाला आपले ऐश्वर्ययुक्त उत्कृष्ट रूप दाखवता झाला. ॥११-९॥

पैं कौरवकुलचक्रवर्ती । मज हाचि विस्मयो पुढतपुढती ।
जे श्रियेहूनि त्रिजगतीं । सदैव असे कवणी ? ॥ १६५ ॥
ज्ञा - संजय म्हणाला, हे कौरवकुळातील सार्वभौम महाराजा, मला वारंवार हेच आश्चर्य वाटते की लक्ष्मीपेक्षा त्रैलोक्यामधे जास्त दैववान कोणी आहे का ? ॥११-१६५॥

ना तरी खुणेचें वानावयालागीं । श्रुतीवांचूनि दावा पां जगीं ।
ना सेवकपण तरी आंगीं । शेषाच्याचि आथी ॥ १६६ ॥
अथवा तत्वाची गोष्ट वर्णन करण्यात वेदांशिवाय जगात दुसरा कोण समर्थ आहे दाखवा बरे ? अथवा एकनिष्ठ सेवकपण जर पाहिले तर ते एक शेषाच्याच ठिकाणी आहे. ॥११-१६६॥

हां हो जयाचेनि सोसें । शिणत आठही पहार योगी जैसे ।
अनुसरलें गरुडाऐसें । कवण आहे ? ॥ १६७ ॥
अहो महाराज, ज्या परमात्म्याच्या प्राप्तीच्या इच्छेने योगी जसे आठही प्रहर शिणत असतात (तसे भगवंताकरता कश्ष्ट सोसणारे कोण आहेत ?) व गरुडासारखा देवास आपल्याला वाहून घेतलेला दुसरा कोण आहे ? ॥११-१६७॥

परी तें आघवेंचि एकीकडे ठेलें । सापें कृष्णसुख एकंदरें जाहलें ।
जिये दिवूनि जन्मले । पांडव हे ॥ १६८ ॥
परंतु हे सर्व एका बाजूला राहिले. प्रस्तुत ज्या दिवसापासून पांडव जन्मले, त्या दिवसापासून ते श्रीकृष्णापासून भक्ताला होणारे सुख त्यांच्याच ठिकाणी एकवटले. ॥११-१६८॥

परी पांचांही आंतु अर्जुना । श्रीकृष्ण सावियाचि जाहला अधीना ।
कामुक कां जैसा अंगना । आपैता कीजे ॥ १६९ ॥
परंतु पाचही पांडवांमधे श्रीकृष्ण हे सहजच अर्जुनाच्या स्वाधीन झाले. जसे एखाद्या विषयासक्त पुरुषाला स्त्री ही आपल्या आधीन करते, ॥११-१६९॥

पढविलें पाखरूं ऐसें न बोले । यापरी क्रीडामृगही तैसा न चले ।
कैसें दैव एथें सुरवाडलें । तें जाणों न ये ॥ १७० ॥
शिकवलेला पक्षीही असे बोलत नाही, याप्रमाणे करमणूकीकरता पाळालेला पशूही इतका हुकुमात रहात नाही, इतके अर्जुनाच्या स्वाधीन श्रीकृष्ण झाले. या अर्जुनाच्या ठिकाणी दैव कसे भरभराटीस आले आहे ते समजत नाही. ॥११-१७०॥

आजि हें परब्रह्म सगळें । भोगावया सदैव याचेचि डोळे ।
कैसे वाचेनि हन लळे । पाळीत असे ॥ १७१ ॥
या प्रसंगी संपूर्ण ब्रह्मवस्तूचा अनुभव घेण्याचे भाग्य याच्याच दृष्टीला लाभले आहे, पहा. श्रीकृष्ण अर्जुनाच्या बोलण्याचे लाड कसे पुरवत आहेत ! ॥११-१७१॥

हा कोपे कीं निवांतु साहे । हा रुसे तरी बुझावीत जाये ।
नवल पिसें लागलें आहे । पार्थाचें देवा ॥ १७२ ॥
अर्जुन रागावला की कृष्ण निवांतपणे सहन करतात असतात. एकूण कृष्णाला अर्जुनाचे आश्चर्यकारक वेड लागले आहे. ॥११-१७२॥

एर्‍हवीं विषय जिणोनि जन्मले । जे शुकादिक दादुले ।
ते विषयोचि वानितां जाहले । भाट ययाचें ॥ १७३ ॥
सहज विचार करून पाहिले तर विषयाला जिंकून जन्मास आलेले जे शुकादिक खरे खरे पुरुष, ते भगवंताच्या केवळ वैषयिक लीलांचेच वर्णन करणारे स्तुतिपाठक झाले. ॥११-१७३॥

हा योगियांचें समाधिधन । कीं होऊनि ठेले पार्थाआधीन ।
यालागीं विस्मयो माझें मन । करीतसे राया ॥ १७४ ॥
योगी ज्याचे सुख समाधीत भोगतात, असा हा योग्यांचे समाधीत भोगण्याचे ऐश्वर्य असून तो अर्जुनाच्या अगदी स्वाधीन झाला आहे. याकरता राजा धृतराष्ट्रा माझे मन आश्चर्य करते, ॥११-१७४॥

तेवींचि संजय म्हणे कायसा । विस्मयो एथें कौरवेशा ।
श्रीकृष्णें स्वीकारिजे तया ऐसा । भाग्योदय होय ॥ १७५ ॥
तसेच संजय म्हणतो, कौरवांच्या राजा, (धृतराष्ट्रा), याच्यात आश्चर्य ते काय ? कृष्ण ज्याचा स्वीकार करतात त्य़ाचा असा भाग्योदय होतो. ॥११-१७५॥

म्हणौनि तो देवांचा रावो । म्हणे पार्थाते तुज दृष्टि देवों ।
जया विश्वरूपाचा ठावो । देखसी तूं ॥ १७६ ॥
म्हणून 'अर्जुना, ज्या दृष्टीने तू संपूर्ण विश्वरूप पहशील ती दृष्टी मी तुला देतो' असा तो देवांचा राजा (श्रीकृष्ण परमात्मा) म्हणाला. ॥११-१७६॥

ऐसी श्रीमुखौनि अक्षरें । निघती ना जंव एकसरें ।
तंव अविद्येचे आंधारें । जावोंचि लागे ॥ १७७ ॥
अशी अक्षरे भागवंताच्या मुखातून निघतात न निघतात तोच अज्ञानांधकार एकदम जावयास लागला. ॥११-१७७॥

तीं अक्षरें नव्हती देखा । ब्रह्मसाम्राज्यदीपिका ।
अर्जुनालागीं चित्कळिका । उजळलिया श्रीकृष्णें ॥ १७८ ॥
('तुला दिव्य दृष्टि देतो' अशी भगवंताच्या मुखातून जी अक्षरे निघाली) ती अक्षरे नसून ब्रह्मसाम्राज्याला प्रकाशित करणा‍या ज्ञानरूप ज्योतीच अर्जुनाकरता कृष्णाने उजळल्या असे समजा. ॥११-१७८॥

मग दिव्यचक्षुप्रकाशु प्रगटला । तया ज्ञानदृष्टी फांटा फुटला ।
ययापरी दाविता जाहला । ऐश्वर्य आपुलें ॥ १७९ ॥
मग अर्जुनाच्या ठिकाणी दिव्यदृष्टि उत्पन्न झाली. व त्याच्या ज्ञानदृष्टीचे सामर्थ्य वाढले. याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपला ऐश्वर्ययोग दाखवता झाला. ॥११-१७९॥

हे अवतार जे सकळ । ते जिये समुद्रींचे कां कल्लोळ ।
विश्व हें मृगजळ । जया रश्मीस्तव दिसे ॥ १८० ॥
हे जे सर्व अवतार ते ज्या विश्वरूपरूपी समुद्रावरील लाटा आहेत आणि ज्या विश्वरूपरूपी किरणांमुळे विश्व हे मृगजळ भासते ॥११-१८०॥

जिये अनादिभूमिके निटे । चराचर हें चित्र उमटे ।
आपणपें श्रीवैकुंठें । दाविलें तया ॥ १८१ ॥
ज्या योग्य व अनादि भूमिकेवर हे स्थावर जंगमाचे चित्र उमटते, ते आपले विश्वरूप कृष्णाने अर्जुनाला (आपल्या ठिकाणी) दाखवले. ॥११-१८१॥

मागां बाळपणीं येणें श्रीपती । जैं एक वेळ खादली होती माती ।
तैं कोपोनियां हातीं । यशोदां धरिला ॥ १८२ ॥
पूर्वी बालपणी जेव्हा एक वेळ या श्रीकृष्णाने माती खाल्ली होती, तेव्हा यशोदेने त्याला रागावून हाताने धरले ॥११-१८२॥

मग भेणें भेणें जैसें । मुखीं झाडा द्यावयाचेनि मिसें ।
चवदाही भुवनें सावकाशें । दाविलीं तिये ॥ १८३ ॥
नंतर भीत भीत जसे काही तोंडातील झाडा देण्याच्या निमित्ताने श्रीकृष्णाने यशोदेला विस्तारासह चौदाही लोक आपल्या मुखात दाखवले. ॥११-१८३॥

ना तरी मधुवनीं ध्रुवासि केलें । जैसें कपोल शंखें शिवतलें ।
आणि वेदांचियेही मतीं ठेलें । तें लागला बोलों ॥ १८४ ॥
अथवा (तपश्चर्या करीत असतांना ध्रुवाच्या पुढे भगवान प्रगट झाल्यावर ध्रुवाच्या मनात भगवंताची स्तुती करावी असे आले. पण ती कशी करावी हे त्यास कळेना. तेव्हा) मधुवनामधे ध्रुवाला भगवंतांनी असे केले की आपला शंख त्याच्या गालास लावला, तेव्हा वेदांचीही बुद्धी जेथे कुंठित होते ते तो बोलायला लागला. ॥११-१८४॥

तैसा अनुग्रहो पैं राया । श्रीहरी केला धनंजया ।
आतां कवणेकडेही माया । ऐसी भाष नेणेंचि तो ॥ १८५ ॥
संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्रा, श्रीकृष्णाने अर्जुनावर त्याप्रमाणे अनुग्रह केला. त्यामुळे आता माया कोणीकडे आहे, ही भाषा देखील तो जाणेनासा झाला. ॥११-१८५॥

एकसरें ऐश्वर्यतेजें पाहलें । तया चमत्काराचें एकार्णव जाहलें ।
चित्त समाजीं बुडोनि ठेलें । विस्मयाचिया ॥ १८६ ॥
एकदम भगवंताचे स्वरूप ऐश्वर्याचे तेज प्रगट झाले. त्यामुळे जसे कल्पांताच्या वेळी जलमय होते, त्याप्रमाणे अर्जुनाला त्यावेळी सर्व चमत्कारमय झाले. आणि आश्चर्याच्या गर्दीत त्याचे चित्त बुडून गेले. ॥११-१८६॥

जैसा आब्रह्म पूर्णोदकीं । पव्हे मार्कंडेय एकाकीं ।
तैसा विश्वरूप कौतुकीं । पार्थु लोळे ॥ १८७ ॥
याप्रमाणे ब्रह्मलोकापर्यंत परिपूर्ण झालेल्या उदकात एकटाच मार्कंडेय ऋषी पोहत होता, त्याप्रमाणे विश्वरूपी आचर्यात अर्जुन लोळू लागला. ॥११-१८७॥

म्हणे केवढें गगन एथ होतें । तें कवणें नेलें पां केउतें ।
तीं चराचर महाभूतें । काय जाहलीं ? ॥ १८८ ॥
अर्जुन म्हणाला, एवढे मोठे येथे आकाश होते ते कोठे कोण घेऊन गेला ? ते स्थावर जंगम पदार्थ व महाभूते कोठे गेली ? ॥११-१८८॥

दिशांचे ठावही हारपले । आधोर्ध्व काय नेणों जाहले ।
चेइलिया स्वप्न तैसे गेले । लोकाकार ॥ १८९ ॥
पूर्वादिक दिशांचे मागमूसही राहिले नाहीत. वर खाली हे कोण जाणे कोठे गेले ? जागे झाल्यावर ज्याप्रमाणे स्वप्न नाहीसे होते, त्याप्रमाणे सृष्टीचा आकारही नाहीसा झाला. ॥११-१८९॥

नाना सूर्यतेजप्रतापें । सचंद्र तारांगण जैसें लोपे ।
तैसीं गिळिलीं विश्वरूपें । प्रपंचरचना ॥ १९० ॥
अथवा सूर्याच्या तेजाच्या सामर्थ्याने चंद्रासह सर्व नक्षत्रांचा समुदाय लोपून जातो, त्याप्रमाणे ह्या विश्वरूपाने ही सृष्टीची रचना गिळून टाकली. ॥११-१९०॥

तेव्हां मनासी मनपण न स्फुरे । बुद्धि आपणपें न सांवरें ।
इंद्रियांचे रश्मी माघारे । हृदयवरी भरले ॥ १९१ ॥
तेव्हा मनाला मनपण स्फुरेनासे झाले. (मनाचे संकल्प विकल्प करण्याचे बंद पडले). तसेच बुद्धि आपण आपल्याला सावरेनाशी झाली. (बुद्धी कोणत्याही गोष्टीविषयी निश्चय करेनाशी झाली). आणि इंद्रियांच्या वृत्ति (आश्चर्यचकित होऊन) माघारी परतून हृदयात साठवल्या. (इंद्रियवृत्ती अंतर्मुख झाल्या). ॥११-१९१॥

तेथ ताटस्थ्या ताटस्थ्य पडिलें । टकासी टक लागले ।
जैसें मोहनास्त्र घातलें । विचारजातां ॥ १९२ ॥
या स्थितीत स्तब्धपणाला स्तब्धता प्राप्त झाली आणि एकाग्रतेस एकाग्रता आली. जणु काय ज्ञानमात्राला मोहनास्त्रच घातले. ॥११-१९२॥

तैसा विस्मितु पाहे कोडें । तंव पुढां होतें चतुर्भुज रूपडें ।
तेंचि नानारूप चहूंकडे । मांडोनि ठेलें ॥ १९३ ॥
याप्रमाणे चकित होऊन कौतुकाने पाहू लागला तो पुढे चार भुजांचे स्वरूप होते तेच अनेक रूपे घेऊन चारही बाजूंना नटून राहिले. ॥११-१९३॥

जैसें वर्षाकाळींचे मेघौडे । कां महाप्रळयींचें तेज वाढे ।
तैसें आपणावीण कवणीकडे । नेदीचि उरों ॥ १९४ ॥
ज्याप्रमाणे वर्षाऋतूत येणारे मेघ किंवा महाप्रलयाच्या वेळचे तेज ही वाढून जिकडे तिकडे व्यापतात, त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाशिवाय (त्या विश्वरूपाने) कोणतीही बाजू शिल्लक राहू दिली नाही. ॥११-१९४॥

प्रथम स्वरूपसमाधान । पावोनि ठेला अर्जुन ।
सवेचि उघडी लोचन । तंव विश्वरूप देखें ॥ १९५ ॥
ज्ञा - (दिलेल्या दिव्य दृष्टीने) प्रथम विश्वरूप पाहिल्याबरोबर अर्जुनाच्या इच्छेची निवृत्ती झाल्यामुळे, त्याला समाधान झाले. ( व त्याने डोळे मिटून घेतले व पुन्हा) त्याच क्षणी डोळे उघडून पहातो तो विश्वरूप त्याच्या दृष्टीस पडले. ॥११-१९५॥

इहींचि दोहीं डोळां । पाहावें विश्वरूपा सकळा ।
तो श्रीकृष्णें सोहळा । पुरविला ऐसा ॥ १९६ ॥
याच दोन्ही डोळ्यांनी सर्व विश्वरूप पहावे अशी त्याची इच्छा होती. त्या इच्छेचा लळा श्रीकृष्णांनी याप्रमाणे पुरवला. ॥११-१९६॥

अनेकवक्त्रनयनमनेकाद्भुतदर्शनम् ।
अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् ॥ १० ॥
ज्यामधे अनेक मुखे व नयन होते, ज्यामधे अनेक आश्चर्यकारक देखावे होते, अनेक दिव्य अलंकारांनी युक्त, अनेक दिव्य आयुधे धारण केलेले - ॥११-१०॥

मग तेथ सैंघ देखे वदनें । जैसी रमानायकाचीं राजभुवनें ।
नाना प्रगटलीं निधानें । लावण्यश्रियेचीं ॥ १९७ ॥
मग तेथे त्याने अनेक मुखे पाहिली. ती मुखे जणु काय लक्ष्मीकांत श्रीकृष्ण यांच्या राजमंदिरासारखी होती. अथवा सौंदर्यलक्ष्मीची प्रगट झालेली भांडारेच होती. ॥११-१९७॥

कीं आनंदाची वनें सासिन्नलीं । जैसी सौंदर्या राणीव जोडली ।
तैसीं मनोहरें देखिलीं । हरीचीं वक्त्रें ॥ १९८ ॥
किंवा आनंदाचे बगीचेच बहराला आलेले किंवा जणुकाय सौंदर्याला राज्य प्राप्त झाले, तशी त्याने मन हरण करणारी श्रीकृष्णाची मुखे पाहिली. ॥११-१९८॥

तयांही माजीं एकैकें । सावियाचि भयानकें ।
काळरात्रीचीं कटकें । उठवलीं जैसीं ॥ १९९ ॥
त्यात देखील कित्येक मुखे जणुकाय प्रळयरात्रीच्या सैन्याने उठाव केला आहे अशी सहजच भयंकर होती. ॥११-१९९॥

कीं मृत्यूसीचि मुखें जाहलीं । हो कां जें भयाचीं दुर्गें पन्नासिलीं ।
कीं महाकुंडें उघडलीं । प्रळयानळाचीं ॥ २०० ॥
किंवा ही मृत्यूलाच तोंडे उत्पन्न झालेली आहेत अथवा जणुकाय भयाचे किल्लेच रचलेले आहेत अथवा प्रळायाग्नीची महाकुंडेच उघडली आहेत ॥११-२००॥

तैसीं अद्‌भुतें भयासुरें । तेथ वदनें देखिलीं वीरें ।
आणिकें असाधारणें साळंकारें । सौम्यें बहुतें ॥ २०१ ॥
अशी अद्भुत मुखे व भयंकर मुखे शूर अर्जुनाने तेथे विश्वरूपात पाहिली. आणखी कितीएक निरुपम अलंकारयुक्त अशी मुखे पाहिली व पुष्कळ सौम्य मुखे पाहिली. ॥११-२०१॥

पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें । परी वदनांचा शेवटु न टके ।
मग लोचन तें कवतिकें । लागला पाहों ॥ २०२ ॥
अर्जुनाने ती मुखे ज्ञानदृष्टीने पाहिली, परंतु मुखांचा अंत लागेना म्हणून ती मुखे पहाणे सोडून देऊन तो मग कौतुकाने विश्वरूपाचे डोळे पाहू लागला. ॥११-२०२॥

तंव नानावर्णें कमळवनें । विकासिलीं तैसे अर्जुनें ।
डोळे देखिले पालिंगनें । आदित्यांचीं ॥ २०३ ॥
तेव्हा जणु काय अनेक रंगांच्या कमळांचे बाग प्रफुल्लित झाले आहेत तसे ते विस्तृत व तेजाने सूर्याच्या समुदायासारखे असे डोळे अर्जुनाने पाहिले. ॥११-२०३॥

तेथेंचि कृष्णमेघांचिया दाटी- । माजीं कल्पांत विजूंचिया स्फुटी ।
तैसिया वन्हि पिंगळा दिठी । भ्रूभंगातळीं ॥ २०४ ॥
डोळे पहात होता, तेथेच काळ्या मेघांच्या गर्दीत प्रलयकाळची वीज चमकावी तशा अग्नीने पिंगट झालेल्या दृष्टी, चढवलेल्या भिवयांच्या खाली त्याने पाहिल्या. ॥११-२०४॥

हें एकैक आश्चर्य पाहतां । तिये एकेचि रूपीं पंडुसुता ।
दर्शनाची अनेकता । प्रतिफळली ॥ २०५ ॥
हे एक एक आश्चर्य पहात असता अर्जुनाला त्या एकाच विश्वरूपामधे दर्शनाची अनेकता फलद्रूप झाली. ॥११-२०५॥

मग म्हणे चरण ते कवणेकडे । केउते मुकुट कें दोर्दंडें ।
ऐसी वाढविताहे कोडें । चाड देखावयाची ॥ २०६ ॥
मग अर्जुन म्हणाला, विश्वरूपाचे पाय कोणीकडे आहेत ? मुकुट कोठे आहे ? व त्या बळकट भुजा कोठे आहेत ? अशी कौतुकाने तो पहाण्याची इच्छा वाढवीत आहे. ॥११-२०६॥

तेथ भाग्यनिधि पार्था । कां विफलत्व होईल मनोरथा ।
काय पिनाकपाणीचिया भातां । वायकांडीं आहाती ? ॥ २०७ ॥
तेथे अर्जुन दैवाचा ठेवा असल्याने त्याची इच्छा व्यर्थ का होईल ? पिनाक नावाचे धनुष्य हातात असलेल्या शंकरांच्या भात्यामधे निष्फळ बाण आहेत काय ? ॥११-२०७॥

ना तरी चतुराननाचिये वाचे । काय आहाती लटिकिया अक्षरांचे साचे ? ।
म्हणौनि साद्यंतपण अपारांचे । देखिलें तेणें ॥ २०८ ॥
अथवा ब्रह्मदेवाच्या जिव्हेवर खोट्या अक्षरांचे ठसे आहेत का ? म्हणून अर्जुनाने अमर्याद विश्वाचा आदि व अंत पाहिला. ॥११-२०८॥

जयाची सोय वेदां नाकळे । तयाचे सकळावयव एकेचि वेळे ।
अर्जुनाचे दोन्ही डोळे । भोगिते जाहले ॥ २०९ ॥
ज्या विश्वरूपाचा मार्ग वेदाला कळत नाही, त्या विश्वरूपाची सर्व अंगे अर्जुनाच्या दोन्ही डोळ्यात एकाच वेळेला पूर्णपणे पाहिली ॥११-२०९॥

चरणौनि मुकुटवरी । देखत विश्वरूपाची थोरी ।
जे नाना रत्‍नव अळंकारीं । मिरवत असे ॥ २१० ॥
जे विश्वरूप अनेक प्रकारच्या रत्नांच्या अलंकारांनी शोभत होते, त्या विश्वरूपाचा विस्तार अर्जुन पायांपासून मुकुटापर्यंत पाहू लागला. ॥११-२१०॥

परब्रह्म आपुलेनि आंगें । ल्यावया आपणचि जाहला अनेगें ।
तियें लेणीं मी सांगें । काइसयासारिखीं ॥ २११ ॥
जे अनेक अलंकार देव (परब्रह्म) आपल्या अंगावर घालण्याकरता आपण बनला, ते अलंकार कशा सारखे आहेत म्हणून सांगू ? ॥११-२११॥

जिये प्रभेचिये झळाळा । उजाळु चंद्रादित्यमंडळा ।
जे महातेजाचा जिव्हाळा । जेणें विश्व प्रगटे ॥ २१२ ॥
ज्या प्रभेच्या कांतीने चंद्रसूर्यमंडल प्रकाशित होतात व जी प्रभा महातेजाचे (प्रलयकाळाच्या तेजाचे) जीवन आहे व ज्या प्रभेने विश्व दिसावयास लागते ॥११-२१२॥

तो दिव्यतेज शृंगारु । कोणाचिये मतीसी होय गोचरु ।
देव आपणपेंचि लेइले ऐसें वीरु । देखत असे ॥ २१३ ॥
ते दिव्य तेज असलेले अलंकार कोणाच्या बुद्धीस विषय होतील ? असे दागिने देवाने स्वत:च आपल्या अंगावर धारण केले आहेत असे अर्जुन पहाता झाला. ॥११-२१३॥

मग तेथेंचि ज्ञानाचिया डोळां । पहात करपल्लवां जंव सरळा ।
तंव तोडित कल्पांतींचिया ज्वाळा । तैसीं शस्त्रें झळकत देखे ॥ २१४ ॥
देव आपणच अवयव, आपणच दागिने, आपणच हात, आपणच शस्त्र, आपणच जीव व आपणच देह वगैरे सर्व बनले होते. फार काय सांगावे ? सर्व स्थावर-जंगमात्मक विश्व देवानेच भरले आहे असे अर्जुनाने पाहिले. ॥११-२१४॥

आपण आंग आपण अलंकार । आपण हात आपण हतियार ।
आपण जीव आपण शरीर । देखें चराचर कोंदलें देवें ॥ २१५ ॥
मग तेथे (विश्वरूपात) ज्ञानदृष्टीने अर्जुन जेव्हा हाताचे सरळ पंजे पाहू लागला तेव्हा तेथे त्या हाताच्या पंजात प्रलयकाळच्या अग्नीच्या ज्वाळांना तोडणारी शस्त्रे झळकत असलेली त्याने पाहिली. ॥११-२१५॥

जयाचिया किरणांचे निखरपणें । नक्षत्रांचे होत फुटाणे ।
तेजें खिरडला वन्हि म्हणे । समुद्रीं रिघों ॥ २१६ ॥
ज्यांच्या (शस्त्रांच्या) किरणांच्या प्रखरपणाने नक्षत्रांचे फुटाणे होतात, व ज्यांच्या (शस्त्रांच्या) तेजाने मागे सरलेला अग्नि 'समुद्रात प्रवेश करावा' असे म्हणावयास लागला ॥११-२१६॥

मग कालकूटकल्लोळीं कवळिलें । नाना महाविजूंचें दांग उमटलें ।
तैसे अपार कर देखिले । उदितायुधीं ॥ २१७ ॥
मग काळकूट विषाच्या जणुकाय लाटाच बनल्या आहेत अथवा प्रलयकाळच्या विजेचे अरण्यच प्रगट झाले आहे तसे उगारलेल्या शस्त्रांसहित अगणित हात पाहिले. ॥११-२१७॥

दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् ।
सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम् ॥ ११ ॥
दिव्य पुष्पे व वस्त्रे धारण केलेले, दिव्य गंधांची ज्यास उटी केली होती, सर्व आश्चर्यांनी युक्त अनंत सर्वतोमुख व दिव्य असे ते रूप होते. ॥११-११॥

कीं भेणें तेथूनि काढिली दिठी । मग कंठमुगुट पहातसे किरीटी ।
तंव सुरतरूची सृष्टी । जयांपासोनि कां जाहली ॥ २१८ ॥
ज्ञा - त्या हातातील असंख्य शस्त्रांच्या भयाने तेथून दृष्टि काढून मग जेव्हा अर्जुन कंठ व मुकुट पहावयास लागला तेव्हा कल्पतरूची सृष्टी ज्यापासून झाली (असे कंठ व मुगुट त्याला दिसले). ॥११-२१८॥

जिये महासिद्धींचीं मूळपीठें । शिणली कमळा जेथ वावटे ।
तैसीं कुसुमें अति चोखटें । तुरंबिलीं देखिलीं ॥ २१९ ॥
जी फुले महासिद्धींची मूळ स्थाने आहेत व श्रम पावलेली लक्ष्मी जेथे विश्रांती पावते अशी अतिशुद्ध फुले मस्तकावर धारण केलेली त्याने पाहिली. ॥११-२१९॥

मुगुटावरी स्तबक । ठायीं ठायीं पूजाबंध अनेक ।
कंठीं रुळताति अलौकिक । माळादंड ॥ २२० ॥
मुगुटावर फुलांचे घोस होते, मस्तकावर ठिकठिकाणी निरनिराळ्या पूजा बांधल्या होत्या आणि गळ्यात अवर्णनीय फुलांचे हार शोभत होते. ॥११-२२०॥

स्वर्गें सूर्यतेज वेढिलें । जैसें पंधरेनें मेरूतें मढिलें ।
तैसें नितंबावरी गाढिलें । पीतांबरु झळके ॥ २२१ ॥
स्वर्गाने जसे सूर्यतेज वेढावे, किंवा जसे मेरुपर्वताला सोन्याने मढवावे त्याप्रमाणे कमरेच्या खालच्या भागावर कसलेला पितांबर चमकत होता. ॥११-२२१॥

श्रीमहादेवो कापुरें उटिला । कां कैलासु पारजें डवरिला ।
नाना क्षीरोदकें पांघरविला । क्षीरार्णवो जैसा ॥ २२२ ॥
श्रीशंकराला जशी कापराची उटी लावावी अथवा कैलासास जसा पार्‍याचा लेप द्यावा अथवा क्षीरसमुद्राला जसे क्षीरोदकाचे पांघरूण घालावे, ॥११-२२२॥

जैसी चंद्रमयाची घडी उपलविली । मग गगनाकरवीं बुंथी घेवविली ।
तैसीं चंदनपिंजरी देखिली । सर्वांगीं तेणें ॥ २२३ ॥
ज्याप्रमाणे चंद्राची घडी उकलून मग त्याचे पांघरूण आकाशाकडून घेववावे, त्याप्रमाणे पांढरोशुभ्र चंदनाची उटी विश्वरूपाच्या सर्व शरीरावर त्याने पाहिली. ॥११-२२३॥

जेणें स्वप्रकाशा कांतीं चढे । ब्रह्मानंदाचा निदाघु मोडे ।
जयाचेनि सौरभ्यें जीवित जोडे । वेदवतीये ॥ २२४ ॥
ज्याच्या योगाने स्वरूप प्रकाशाला तेज चढते व ब्रह्मानंदाची उष्णता नाहीशी होते व ज्याच्या सुवासाने पृथ्वीला जीवित म्हणजे अस्तित्व प्राप्त होते ॥११-२२४॥

जयाचे निर्लेप अनुलेपु करी । जे अनंगुही सर्वांगीं धरी ।
तया सुगंधाची थोरी । कवण वानी ? ॥ २२५ ॥
ज्या चंदनाची उटी ब्रह्मही आपल्या अंगास लावते व मदन देखील ज्यास आपल्या अंगावर धारण करतो त्या चंदनाच्या सुगंधाची थोरवी कोण वर्णन करील ? ॥११-२२५॥

ऐसी एकैक शृंगारशोभा । पाहतां अर्जुन जातसें क्षोभा ।
तेवींचि देवो बैसला कीं उभा । का शयालु हें नेणवें ॥ २२६ ॥
अशी एक एक शृंगाराची शोभा पहात असता अर्जुन भांबावला, त्याचप्रमाणे देव बसले आहेत की उभे आहेत, की निजले आहेत हे त्यास कळेना. ॥११-२२६॥

बाहेर दिठी उघडोनि पाहे । तंव आघवें मूर्तिमय देखत आहे ।
मग आतां न पाहें म्हणौनि उगा राहे । तरी आंतुही तैसेंचि ॥ २२७ ॥
दृष्टि उघडू्न तो बाहेर पाहू लागला, तरी सर्वच विश्वरूपमय आहे असे त्यास दिसू लागले. मग आता मी काही पहाणार नाही असा निश्चय करून तो उगीच राहिला (त्याने डोळे मिटून घेतले), तरी आतही त्याला तसेच विश्वरूप दिसले. ॥११-२२७॥

अनावरें मुखें समोर देखे । तयाभेणें पाठीमोरा जंव ठाके ।
तंव तयाहीकडे श्रीमुखें । करचरण तैसेचि ॥ २२८ ॥
अर्जुन आपल्यासमोर अगणित मुखे पहात होता, त्यांच्या भयाने जेव्हा तो त्यांच्याकडे पाठ करून उभा राहिला तेव्हा तिकडेही विश्वरूपाची मुखे, हात, पाय हे तसेच होते, असे त्यास दिसले. ॥११-२२८॥

अहो पाहतां कीर प्रतिभासे । एथ नवलावो काय असे ? ।
परि न पाहतांही दिसे । चोज आइका ॥ २२९ ॥
अहो पाहू लागले म्हणजे (खरोखर) दिसते, यात काही थोडे आश्चर्य आहे का ? परंतु हे आश्चर्य ऐका की विश्वरूपाचे बाबतीत न पहात असतांना सुद्धा (डोळे मिटून घेतले असतांनाही) विश्वरूप दिसत होते. ॥११-२२९॥

कैसें अनुग्रहाचें करणें । पार्थाचें पाहणें आणि न पाहणें ।
तयाही सकट नारायणें । व्यापूनि घेतलें ॥ २३० ॥
प्रभूच्या कृपेची करणी कशी अद्भुत आहे पहा. अर्जुनाचे पहाणे व न पहाणे हे सर्वच भगवंतांनी व्यापून टाकले. ॥११-२३०॥

म्हणौनि आश्चर्याच्या पुरीं एकीं । पडिला ठायेठाव थडीं ठाकी ।
तंव चमत्काराचिया आणिकीं । महार्णवीं पडे ॥ २३१ ॥
म्हणून आश्चर्याच्या एका पुरात पडला असता तो तात्काळ किनारा गाठी तो आणखी दुसर्‍या चमत्काराच्या मोठ्या समुद्रात पडे. ॥११-२३१॥

तैसा अर्जुनु असाधारणें । आपुलिया दर्शनाचेनि विंदाणें ।
कवळूनि घेतला तेणें । अनंतरूपें ॥ २३२ ॥
याप्रमाणे त्य़ा अनंतरूपाने अर्जुनाला आपल्या अलौकिक दर्शनाने व्यापून टाकले. ॥११-२३२॥

तो विश्वतोमुख स्वभावें । आणि तेचि दावावयालागीं पांडवें ।
प्रार्थिला आतां आघवें । होऊनि ठेला ॥ २३३ ॥
तो श्रीकृष्ण परमात्मा स्वाभाविक रीत्या विश्वतोमुख आहे आणि तेच त्याने (श्रीकृष्णाने) आपले स्वाभाविक रूप दाखवावे म्हणून अर्जुनाने प्रार्थना केली. म्हणून आता तो (श्रीकृष्ण परमात्मा) सर्व विश्वरूपाने बनून राहिला. ॥११-२३२॥

आणि दीपें कां सूर्यें प्रगटे । अथवा निमुटलिया देखावेंचि खुंटे ।
तैसी दिठी नव्हे जे वैकुंठें । दिधली आहे ॥ २३४ ॥
आणि श्रीकृष्णाने जी दृष्टि अर्जुनास दिली ती दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाने प्रकट होईल (तिला दिसेल) अथवा मिटली असता तिचे पहाण्याचेच बंद राहील, अशी नव्हती. ॥११-२३४॥

म्हणौनि किरीटीसि दोहीं परी । तें देखणें देखें अंधारी ।
हें संजयो हस्तिनापुरीं । सांगतसे राया ॥ २३५ ॥
म्हणून अर्जुनाला दोन्ही प्रकारांनी उजेडात अथवा अंधारात म्हणजे डोळे उघडले तरी व मिटले तरी ते विश्वरूप पहावेच लागले. हे संजय हस्तिनापुरात राजा धृतराष्ट्राला सांगता झाला. ॥११-२३५॥

म्हणे किंबहुना अवधारिलें । पार्थें विश्वरूप देखिलें ।
नाना आभरणीं भरलें । विश्वतोमुख ॥ २३६ ॥
संजय म्हणतो फार काय सांगावे ? अर्जुनाने नाना अलंकारांनी भरलेले व ज्यास सर्व बाजूंनी मुखे आहेत असे विश्वरूप पाहिले हे तुम्ही ऐकले काय ? ॥११-२३६॥

दिवि सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता ।
यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः ॥ १२ ॥
आकशामधे सहस्रावधी सूर्यांची प्रभा जर एकदम उत्पन्न झाली तर ती त्या महात्म्या श्रीहरीच्या प्रभे सारखी होईल ॥११-१२॥

तिये अंगप्रभेचा देवा । नवलावो काइसया ऐसा सांगावा ।
कल्पांतीं एकुचि मेळावा । द्वादशादित्यांचा होय ॥ २३७ ॥
ज्ञा - धृतराष्ट्र राजा, श्रीकृष्णाच्या त्या अंगकांतीची अथवा तेजाची अपूर्वता कशासारखी होती म्हणून सांगावी ? (पण काही कल्पना करता यावी म्हणून दृष्टांताने सांगण्याचा यत्न करतो). प्रलयकाळी बारा सूर्यांचा जो एकच मिलाफ होतो ॥११-२३७॥

तैसे ते दिव्यसूर्य सहस्रवरी । जरी उदयजती कां एकेचि अवसरीं ।
तर्‍ही तया तेजाची थोरी । उपमूं नये ॥ २३८ ॥
तसे ते हजारो दिव्य सूर्य एकाच वेळेला उगवले, तरी त्या (विश्वरूपाच्या) तेजाच्या प्रभावाच्या उपमेला ते येणार नाहीत. ॥११-२३८॥

आघवयाचि विजूंचा मेळावा कीजे । आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणिजे ।
तेवींचि दशकुही मेळविजे । महातेजांचा ॥ २३९ ॥
सर्व विजांचा समुदाय एकत्र केला व प्रलयकाळच्या अग्नीची सर्व साहित्ये गोळा केली तसेच दहाही महातेजे एकत्र मिळवली ॥११-२३९॥

तर्‍ही तिये अंगप्रभेचेनि पाडें । हें तेज कांहीं कांहीं होईल थोडें ।
आणि तया ऐसें कीर चोखडें । त्रिशुद्धी नोहे ॥ २४० ॥
तथापि सर्वांचे हे एकत्र केलेले तेज त्या विश्वरूपाच्या अंगकांतीच्या साम्यास काही अल्पस्वल्प मानाने आले तर येईल. पण त्यासारखे शुद्ध तर खास असणार नाही. ॥११-२४०॥

ऐसें महात्म्य या श्रीहरीचें सहज । फांकतसे सर्वांगीचें तेज ।
तें मुनिकृपा जी मज । दृष्ट जाहलें ॥ २४१ ॥
याप्रमाणे महात्मा जे हरी (श्रीकृष्ण), त्यांचे सर्व अंगीचे तेज स्वाभाविक रीतीने फाकत होते, हे व्यासमुनींच्या कृपेने महाराज मला दिसले. ॥११-२४१॥



[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



तत्रैकस्थं जगत्कृत्स्नम् प्रविभक्तमनेकधा ॥
अपश्यद्देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा ॥ १३ ॥
देव, पितर, मनुष्य इत्यादि) अनेक भिन्न) रूपांनी विभाग पावलेले हे सर्व जग त्यावेळी देवाधिदेवाच्या त्या शरीरामधे (एका बाजूला) एका ठिकाणी स्थित असे अर्जुनाने पाहिले. ॥११-१३॥

आणि तिये विश्वरूपीं एकीकडे । जग आघवें आपुलेनि पवाडें ।
जैसे महोदधीमाजीं बुडबुडे । सिनानें दिसती ॥ २४२ ॥
ज्ञा - आणि त्या विश्वरूपामध्ये एका बाजूला सर्व जग आपल्या विस्तारासह आहे. ज्याप्रमाणे महासागरामधे बुडबुडे अलग अलग दिसतात ॥११-२४२॥

कां आकाशीं गंधर्वनगर । भूतळीं पिपीलिका बांधे घर ।
नाना मेरुवरी सपूर । परमाणु बैसले ॥ २४३ ॥
अथवा आकाशामधे गंधर्वनगर (ढगांच्या आकारावर कल्पनेने कल्पिलेले शहर) भासावे किंवा जमिनीवर मुंगीने घर बांधावे अथवा मेरु पर्वतावर सूक्ष्म परमाणू पसरलेले असावेत ॥११-२४३॥

विश्व आघवेंचि तयापरी । तया देवचक्रवर्तीचिया शरीरीं ।
अर्जुन तिये अवसरीं । देखता जाहला ॥ २४४ ॥
त्याचप्रमाणे सर्वच विश्व देवांमधील सार्वभौमाच्या त्या शरीरामधे विश्वरूपात त्यावेळी अर्जुनाने पाहिले. ॥११-२४४॥

ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजयः ।
प्रणम्य शिरसा देवं कृताझ्जलिरभाषत ॥ १४ ॥
तेथे त्यावेळी) आपण विश्वाला पहाणारा एक निराळा व विश्व (पहाण्याचा विषय) एक निराळे असे थोडेसे द्वैत होते तेही नाहीसे झाले. व अंत:करण एकदम (त्या विश्वरूपात) विरघळून गेले. ॥११-२४५॥

तेथ एक विश्व एक आपण । ऐसें अळुमाळ होतें जें दुजेपण ।
तेंही आटोनि गेलें अंतःकरण । विरालें सहसा ॥ २४५ ॥
तेव्हा तो आश्चर्ययुक्त व रोमांचयुक्त झालेला अर्जुन आपल्या मस्तकाने देवाला वंदन करून हात जोडून म्हणाला - ॥११-१४॥

आंतु आनंदा चेइरें जाहलें । बाहेरि गात्रांचें बळ हारपोनि गेलें ।
आपाद पां गुंतलें । पुलकांचलें ॥ २४६ ॥
ज्ञा - अंत:करणात ब्रह्मानंद जागृत झाला. त्यामुळे बाहेर इंद्रिये ढिली पडली आणि मस्तकापासून पायांपर्यंत सर्व शरीरावर रोमांच उभे राहिले. ॥११-२४६॥

वार्षिये प्रथमदशे । वोहळलया शैलांचें सर्वांग जैसें ।
विरूढे कोमलांकुरीं तैसे । रोमांच जाहले ॥ २४७ ॥
पावसाळ्याचे आरंभी पर्वताच्या अंगावरून पाणी वाहून गेल्यावर त्या पर्वताच्या सर्व अंगावर जसे कोवळे गवताचे अंकूर उत्पन्न होतात, तसे अर्जुनाच्या शरीरावर रोमांच आले. ॥११-२४७॥

शिवतला चंद्रकरीं । सोमकांतु द्रावो धरी ।
तैसिया स्वेदकणिका शरीरीं । दाटलिया ॥ २४८ ॥
चंद्रकिरणांनी सपर्श केलेला चंद्रकांत मणी जसा पझरतो (त्यावर पाण्याचे बिंदू येतात) त्याप्रमाणे त्याच्या (अर्जुनाच्या) सर्व अंगावर घामाचे बिंदु दाट आले. ॥११-२४८॥

माजीं सापडलेनि अलिकुळें । जळावरी कमळकळिका जेवीं आंदोळे ।
तेवीं आंतुलिया सुखोर्मीचेनि बळें । बाहेरि कांपे ॥ २४९ ॥
कमळाच्या कळीमधे भुंग्याचा समुदाय सापडल्यामुळे ती कळी जशी पाण्यावर इकडून तिकडे आदळते त्याप्रमाणे अंत:करणातील सुखांच्या लाटांच्या वेगाने बाहेर त्याचे सर्व अंग थरथरत होते. ॥११-२९९॥

कर्पूरकर्दळीचीं गर्भपुटें । उकलतां कापुराचेनि कोंदाटें ।
पुलिका गळती तेवीं थेंबुटें । नेत्रौनि पडती ॥ २५० ॥
कापुराच्या विपुलतेने, कापुरकेळीच्या गाभ्याची सोपटे उकलून त्यातून कसे एकामागून एक असे कापराचे कण गळतात, त्याप्रमाणे त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळत होते. ॥११-२५०॥

उदयलेनि सुधाकरें । जैसा भरलाचि समुद्र भरे ।
तैसा वेळोवेळां उर्मिभरें । उचंबळत असे ॥ २५१ ॥
याप्रमाणे अष्टसात्विक भावात देखील एकमेकांत चढाओढ लागली होती त्या स्थितीत (अर्जुनाच्या) जीवाला ब्रह्मानंदाचे राज्य प्राप्त झाले. ॥११-२५१॥

ऐसा सात्त्विकांही आठां भावां । परस्परें वर्ततसे हेवा ।
तेथ ब्रह्मानंदाची जीवा । राणीव फावली ॥ २५२ ॥
भरलेल्या समुद्रासच चंद्रोदयाने जशा भरत्यांवर अरत्या येतात त्याप्रमाणे आनंदाच्या लहरीच्या वेगाने त्याचे अंत:करण वेळोवेळी उचंबळत होते. ॥११-२५१॥

तैसाचि तया सुखानुभवापाठीं । केला द्वैताचा सांभाळु दिठी ।
मग उसासौनि किरीटी । वास पाहिली ॥ २५३ ॥
तसेच त्या सुखाच्या अनुभवानंतर कृपादृष्टीने श्रीकृष्णाने द्वैताचा सांभाळ केला (म्हणजे देव व भक्त असे वेगळेपण ठेवले). म्हणून मग अर्जुनाने दीर्घ श्वासोच्छ्वास सोडून श्रीकृष्णाकडे पाहिले. ॥११-२५३॥

तेथ बैसला होता जिया सवा । तियाचिया कडे मस्तक खालविला देवा ।
जोडूनि करसंपुट बरवा । बोलतु असे ॥ २५४ ॥
आपण (अर्जुन) ज्या बाजूकडे तोंड करून बसला होता, त्याच बाजूला अर्जुनाने आपले मस्तक लववून देवास नमस्कार केला व आपले दोन्ही हात जोडून चांगल्या रीतीने बोलावयास लागला. ॥११-२५४॥

अर्जुन उवाच
पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूतविशेषसंघान् ॥
ब्रह्माणमीशं कमलासनस्थ मृषींश्चसर्वानुरगांश्च दिव्यान् ॥ १५ ॥
हे देवा, तुझ्या देहामधे (सर्व) देव, (स्थावरजंगमादि) भूतविशेषांचे सर्व समुदाय, ब्रह्मदेव, विष्णु, शंकर, सर्व ऋषि व दिव्य नाग मी पहात आहे. ॥११-१५॥

म्हणे जयजयाजी स्वामी । नवल कृपा केली तुम्हीं ।
जें हें विश्वरूप कीं आम्हीं । प्राकृत देखों ॥ २५५ ॥
ज्ञा - अर्जुन म्हणाला, हे प्रभो, तुमचा जयजयकार असो. आम्ही सामान्य असूनही हे विश्वरूप पहाण्यास समर्थ झालो, ही तुम्ही अद्भुत कृपाच केली. ॥११-२५५॥

परि साचचि भलें केलें गोसाविया । मज परितोषु जाहला साविया ।
जी देखलासि जो इया । सृष्टीसी तूं आश्रयो ॥ २५६ ॥
पण महाराज, आपण खरोखर चांगले केलेत. तू ह्या सर्व सृष्टीला आश्रय आहेस असे पाहिले आणि सहजच मला सामाधान वाटले. ॥११-२५६॥

देवा मंदराचेनि अंगलगें । ठायीं ठायीं श्वापदांचीं दांगें ।
तैसीं इयें तुझ्या देहीं अनेगें । देखतसें भुवनें ॥ २५७ ॥
देवा, मंदरपर्वताच्या आश्रयाने ज्याप्रमाणे ठिकठिकाणी हिंस्र पशूंची अरण्ये असतात, त्याप्रमाणे ह्या तुझ्या शरीरावर मी अनंत लोक पहात आहे. ॥११-२५७॥

अहो आकाशाचिये खोळे । दिसती ग्रहगणांचीं कुळें ।
कां महावृक्षीं अविसाळें । पक्षिजातीचीं ॥ २५८ ॥
महाराज, आकाशाच्या खोळेत ग्रहसमुदायांचे मेळे दिसतात किंवा विस्तीर्ण वृक्षांवर अनेक पक्ष्यांची घरटी असावीत ॥११-२५८॥

तयापरी श्रीहरी । तुझिया विश्वात्मकीं इये शरीरीं ।
स्वर्गु देखतसें अवधारीं । सुरगणेंसीं ॥ २५९ ॥
हे श्रीहरी, ऐक. त्याप्रमाणे तुझ्या ह्या विश्वरूप शरीराचे ठिकाणी देवसमुदायासह मला स्वर्ग दिसत आहे. ॥११-२५९॥

प्रभु महाभूतांचें पंचक । येथ देखत आहे अनेक ।
आणि भूतग्राम एकेक । भूतसृष्टीचें ॥ २६० ॥
महाराज, आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी पंचमहाभूतांच्या अनेक पंचकड्या मी पहात आहे. ॥११-२६०॥

जी सत्यलोकु तुजमाजीं आहे । देखिला चतुराननु हा नोहे ? ।
आणि येरीकडे जंव पाहें । तंव कैलासुही दिसे ॥ २६१ ॥
महाराज, सत्यलोक तुमच्या विश्वरूपात आहे. हा पाहिला, हा ब्रह्मदेव नव्हे काय ? आणि दुसरीकडे पहातो तो कैलासही दिसतो. ॥११-२६१॥

श्रीमहादेव भवानियेशीं । तुझ्या दिसतसे एके अंशीं ।
आणि तूंतेंही गा हृषीकेशी । तुजमाजीं देखे ॥ २६२ ॥
पार्वतीसहित श्रीशंकर तुझ्या एका भागात दिसत आहेत. आणि हे श्रीकृष्णा, तुलादेखील तुझ्या या विश्वरूपामधे मी पहात आहे. ॥११-२६२॥

पैं कश्यपादि ऋषिकुळें । इयें तुझिया स्वरूपीं सकळें ।
देखतसें पाताळें । पन्नगेंशीं ॥ २६३ ॥
कश्यपादि ऋषींचे समुदाय, हे सर्व तुझ्या स्वरूपात दृष्टीस पडतात. त्याचप्रमाणे सर्पासह सातही पाताळे तुझ्या स्वरूपात दृष्टीस पडत आहेत. ॥११-२६३॥

किंबहुना त्रैलोक्यपती । तुझिया एकेकाचि अवयवाचिये भिंती ।
इयें चतुर्दशभुवनें चित्राकृती । अंकुरलीं जाणों ॥ २६४ ॥
फार काय सांगावे ? हे त्रैलोक्याच्या राजा श्रीकृष्णा, तुझ्या शरीरावरील एक एक भाग हीच कोणी भिंत, तीवर हे चौदा लोक चित्राच्या आकृतीप्रमाणे स्पष्ट झालेले आहेत असे वाटते. ॥११-२६४॥

आणि तेथिंचे जे जे लोक । ते चित्ररचना जी अनेक ।
ऐसें देखतसे अलोकिक । गांभीर्य तुझें ॥ २६५ ॥
आणि त्या लोकातील जे जे तीच वेगवेगळी चितारलेली चित्रे होत. याप्रमाणे तुझी अलौकिक गंभीरता दृष्टीस पडत आहे. ॥११-२६५॥

अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनंतरूपम् ।
नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम् ॥ १६ ॥
मी तुला अनेक हात, उदरे, मुखे व नेत्र असलेला व सर्वत्र अंतरहित रूपे धारण करणारा व विश्वरूप असा पहात आहे. हे विश्वेश्वरा, तुझा आरंभ, मध्य अथवा अंत यापैकी मला काहीच दिसत नाही. ॥११-१६॥

त्या दिव्यचक्षूंचेनि पैसें । चहुंकडे जंव पाहात असें ।
तंव दोर्दंडीं कां जैसें । आकाश कोंभैलें ॥ २६६ ॥
ज्ञा - त्या दिव्य दृष्टीच्या बलाने मी जो चहुकडे पहात आहे, तो बळकट भुजांच्या ठिकाणी आकाश उत्पन्न झालेसे दिसते. ॥११-२६६॥

तैसे एकचि निरंतर । देवा देखत असें तुझे कर ।
करीत आघवेचि व्यापार । एकेचि काळीं ॥ २६७ ॥
त्याचप्रमाणे देवा, एकटे तुझे हातच एका वेळी सर्व व्यापार निरंतर करत आहेत असे मी पहातो. ॥११-२६७॥

मग महाशून्याचेनि पैसारें । उघडलीं ब्रह्मकटाहाचीं भांडारें ।
तैसीं देखतसें अपारें । उदरें तुझीं ॥ २६८ ॥
मग ब्रह्माच्या विस्ताराने जशी काही ब्रह्मांडाची भांडारेच उघडावीत तशी अमर्याद तुझी पोटे पहातो. ॥११-२६८॥

जी सहस्रशीर्षयाचें देखिलें । कोडीवरी होताति एकीवेळें ।
कीं परब्रह्मचि वदनफळें । मोडोनि आलें ॥ २६९ ॥
महाराज, आपली हजारो मस्तके आहेत (असे जे श्रुतीने वर्णन केले आहे) त्याचा अनुभव या विश्वरूपात एकाच वेळी कोटीपेक्षाही अधिक वेळा घेतला. अथवा परब्रह्मच मूखरूपी फळांनी दाट भरून आले असे दिसते. ॥११-२६९॥

तैसीं वक्त्रें जी जेउतीं तेउतीं । तुझीं देखितसे विश्वमूर्ती ।
आणि तयाचिपरी नेत्रपंक्ती । अनेका सैंघ ॥ २७० ॥
त्याचप्रमाणे हे विश्वरूपी परमेश्वरा (श्रीकृष्णा) मी जिकडे तिकडे तुझी तोंडे पहात आहे आणि त्याचप्रमाणे डोळ्यांच्याही अनेक पंक्तीच्या पंक्ती जिकडे तिकडे पहात आहे. ॥११-२७०॥

हें असो स्वर्ग पाताळ । कीं भूमी दिशा अंतराळ ।
हे विवक्षा ठेली सकळ । मूर्तिमय देखतसें ॥ २७१ ॥
हे असो. हा स्वर्ग, हे पाताळ, किंवा ही पृथ्वी व ह्या दिशा व हे आकाश असे बोलण्याची सोयच राहिली नाही. सर्वही विश्वरूपाने भरलेले मी पहात आहे. ॥११-२७१॥

हें तुजवीण एकादियाकडे । परमाणूहि एतुला कोडें ।
अवकाशु पाहतसें परि न सांपडे । ऐसें व्यापिलें तुवां ॥ २७२ ॥
तुझ्याशिवाय एकाद्याकडे परमाणूएवढी तरी जागा सापडेल म्हणून मी कौतुकाने शोधित आहे, पण सापडत नाही. असे तू सर्वत्र व्यापले आहेस. ॥११-२७२॥

इये नानापरी अपरिमितें । जेतुलीं साठविलीं होतीं महाभूतें ।
तेतुलाहि पवाडु तुवां अनंतें । कोंदला देखतसें ॥ २७३ ॥
या नाना प्रकारच्या प्राण्यांसहित जितकी महाभूते साठवली होती, तितकाही विस्तार तू जो अनंत त्या तुझ्याकडून पूर्ण भरलेला मी पहात आहे. ॥११-२७३॥

ऐसा कवणें ठायाहूनि तूं आलासी । एथ बैसलासि कीं उभा आहासि ।
आणि कवणिये मायेचिये पोटीं होतासी । तुझें ठाण केवढें ॥ २७४ ॥
असा तू कोणत्या ठिकाणाहून आलास ? तू येथे बसलेला आहेस की उभा आहेस ? आणि तू कोणत्या आईच्या पोटी होतास ? तुझी आकृती तरी केवढी आहे ? ॥११-२७४॥

तुझें रूप वय कैसें । तुजपैलीकडे काय असे ।
तूं काइसयावरी आहासि ऐसें । पाहिलें मियां ॥ २७५ ॥
तुझे रूप कसे, वय किती, तुझ्या पलीकडे काय आहे ? आणि तू कशावर बसलेला आहेस ? असे जेव्हा मी पाहू लागलो ॥११-२७५॥

तंव देखिलें जी आघवेंचि । तरि आतां तुज ठावो तूंचि ।
तूं कवणाचा नव्हेसि ऐसाचि । अनादि आयता ॥ २७६ ॥
तेव्हा महाराज, हे मी सर्वच विचार करून पाहिले. तर आता देवा तुझे ठिकाण तूच आहेस. तू कोणाचा नाहीस, तर तू अनादी व स्वत:सिद्ध असाच आहेस. ॥११-२७६॥

तूं उभा ना बैठा । दिघडु ना खुजटा ।
तुज तळीं वरी वैकुंठा । तूंचि आहासी ॥ २७७ ॥
तू उभा नाहीस, अथवा बसलेला नाहीस. तू उंच नाहीस अथवा ठेंगणा नाहीस. देवा, तुझ्या खाली व तुझ्यावर तूच आहेस. ॥११-२७७॥

तूं रूपें आपणयांचि ऐसा । देवा तुझी तूंचि वयसा ।
पाठीं पोट परेशा । तुझें तूं गा ॥ २७८ ॥
तू रूपाने आपल्यासारखाच आहेस. देवा, तुझे वय तूच आहेस व हे मायेच्या मालका श्रीकृष्णा, तुझी पाठ व पोट तूच आहेस. ॥११-२७८॥

किंबहुना आतां । तुझें तूंचि आघवें अनंता ।
हें पुढत पुढती पाहतां । देखिलें मियां ॥ २७९ ॥
आता फार काय सांगावे ? हे अनंता, तुझे सर्व तूच आहेस, मी वारंवार विचार केल्यावर हेच मला कळले. ॥११-२७९॥

परि या तुझिया रूपाआंतु । जी उणीव एक असे देखतु ।
जे आदि मध्य अंतु । तिन्हीं नाहीं ॥ २८० ॥
परंतु या तुझ्या रूपात जो एक कमीपणा मी पहात आहे, तो हा की अमूक ठिकाणी तुझा आरंभ झाला व अमूक ठिकाणी तुझा मध्य आहे अमूक ठिकाणी तुझा शेवट आहे, असे पाहू लागले असता हे तिन्ही तुझ्या ठिकाणी नाहीत. ॥११-२८०॥

एर्‍हवीं गिंवसिलें आघवां ठायीं । परि सोय न लाहेचि कहीं ।
म्हणौनि त्रिशुद्धी हे नाहीं । तिन्ही एथ ॥ २८१ ॥
खरे म्हटले तर तुझ्या विश्वरूपी मी हे (आदि, मध्य व अंत) सर्व ठिकाणी शोधले पण त्यांचा कोठेच पत्ता लागत नाही. म्हणून तुझ्या स्वरूपी हे तिन्ही निश्चयेकरून नाहीत. ॥११-२८१॥

एवं आदिमध्यांतरहिता । तूं विश्वेश्वरा अपरिमिता ।
देखिलासि जी तत्त्वतां । विश्वरूपा ॥ २८२ ॥
हे आरंभ मध्य व शेवट नसलेल्या अमर्याद त्रैलोक्यनायका, विश्वरूपा (श्रीकृष्णा) मी याप्रमाणे तुला खरोखरच पाहिले. ॥११-२८२॥

तुज महामूर्तीचिया आंगी । उमटलिया पृथक् मूर्ती अनेगी ।
लेइलासी वानेपरींची आंगीं । ऐसा आवडतु आहासी ॥ २८३ ॥
तू जो विश्वरूप, त्या तुझ्या शरीरावर अनेक निरनिराळ्या मूर्ती उमटल्या आहेत. म्हणून नाना प्रकारची वस्त्रे अंगावर तू धारण केली आहेस असे वाटते. ॥११-२८३॥

नाना पृथक् मूर्ती तिया द्रुमवल्ली । तुझिया स्वरूपमहाचळीं ।
दिव्यालंकार फुलीं फळीं । सासिन्नलिया ॥ २८४ ॥
अथवा दिव्य अलंकारर्प फळाफुलांनी अगदी दाट भरून आलेल्या, अशा या अनेक प्रकारच्या मूर्तिरूप वृक्षवेली, तुझ्या या विश्वरूप महापर्वतावर उत्पन्न झालेल्या आहेत. ॥११-२८४॥

हो कां जे महोदधीं तूं देवा । जाहलासि तरंगमूर्ती हेलावा ।
कीं तूं एक वृक्षु बरवा । मूर्तिफळीं फळलासी ॥ २८५ ॥
अथवा हे परमेश्वरा, तुझ्या स्वरूपावर दिसणार्‍या मूर्तिरूपी लाटांनी उसळणारा असा तू मोठा समुद्र आहेस किंवा तू एक चांगला वृक्ष असून मूर्तिरूपी फळांनी फळभारास आला आहेस. ॥११-२८५॥

जी भूतीं भूतळ मांडिलें । जैसें नक्षत्रीं गगन गुढलें ।
तैसें मूर्तिमय भरलें । देखतसें तुझें रूप ॥ २८६ ॥
महाराज, प्राण्यांनी जसा पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापला आहे, किंवा आकाश जसे नक्षत्रांनी व्यापलेले आहे, त्याप्रमाणे तुझे स्वरूप मूर्तींनी भरलेले आहे असे मी पहातो. ॥११-२८६॥

जी एकेकीच्या अंगप्रांतीं । होय जाय हें त्रिजगती ।
एवढियाही तुझ्या आंगीं मूर्ती । कीं रोमा जालिया ॥ २८७ ॥
महाराज, एक एका मूर्तीच्या अंगप्रदेशात हे त्रैलोक्य उत्पन्न होत आहे व लयाला जात आहे. अशा प्रचंड मूर्ती असूनही त्या तुझ्या (विश्वरूपाच्या) शरीराच्या रोमाच्या ठिकाणी झाल्या आहेत. ॥११-२८७॥

ऐसा पवाडु मांडूनि विश्वाचा । तूं कवण पां एथ कोणाचा ।
हें पाहिलें तंव आमुचा । सारथी तोचि तूं ॥ २८८ ॥
असा विश्वाचा पसारा मांडून येथे तू कोण ? तू कसा ? असा विचार करून पाहिले असता आमचा जो सारथी तोच तू आहेस. ॥११-२८८॥

तरी मज पाहतां मुकुंदा । तूं ऐसाचि व्यापकु सर्वदा ।
मग भक्तानुग्रहें तया मुग्धा । रूपातें धरिसी ॥ २८९ ॥
तर श्रीकृष्णा, विचार करून पाहिले तर मला असे वाटते की तू नेहेमी असाच व्यापक रूपाने असतोस, पण भक्तावर कृपा करण्याकरता तू सुंदर सगुण अवतार घेतोस. ॥११-२८९॥

कैसें चहूं भुजांचें सांवळें । पाहतां वोल्हावती मन डोळे ।
खेंव देऊं जाइजे तरी आकळे । दोहींचि बाहीं ॥ २९० ॥
तुझे श्यामसुंदर चतुर्भुज रूप कसे आहे की ज्याला पाहिले असता मन व डोळे शांत होतात व आलिंगन द्यावयास लागले तर दोन्ही हातांमधे कवटाळले जाते. ॥११-२९०॥

ऐसी मूर्ति कोडिसवाणी कृपा । करूनि होसी ना विश्वरूपा ।
कीं अमुचियाचि दिठी सलेपा । जें सामान्यत्वें देखिती ॥ २९१ ॥
हे विश्वरूपा देवा, तुम्ही भक्तांवर कृपा करून असे सुंदर रूप बनवता. परंतु आमच्याच दृष्टि मलीन आहेत, म्हणून त्या तुमच्या सगुण मूर्तीला सामान्यत्वाने पहातात, ॥११-२९१॥

तरी आतां दिठीचा विटाळु गेला । तुवां सहजें दिव्यचक्षू केला ।
म्हणौनि यथारूपें देखवला । महिमा तुझा ॥ २९२ ॥
तर आता तो दृष्टीचा दोष दूर झाला (कारण तू लीलेन मला ज्ञानदृष्टिवान बनवलेस. आणि म्हणूनच तुझा मोठेपणा जसा आहे तसा मी पाहू शकलो. ॥११-२९२॥

परी मकरतुंडामागिलेकडे । तोचि होतासि तूं एवढें ।
रूप जाहलासि हें फुडें । वोळखिलें मियां ॥ २९३ ॥
परंतु मकरतुंडाच्या मागल्या बाजूला जो तू बसलेला होतास तोच तू एवढे विश्वरूप बनला आहेस हे मी पक्के जाणले. ॥११-२९३॥

किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम् ।
पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्ताद्दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम् ॥ १७ ॥
मुकुट, गदा व सुदर्शन चक्र धारण करणारा, तेजाची राशी, सर्वत्र प्रभायुक्त, ज्याच्याकडे एकसारखे पहाणे देखील अशक्य आहे असा दीप्तिमान् अग्नी, सूर्य यांच्या प्रभेसारखी ज्याची प्रभा समन्ताद्भागी पसरलेली आहे असा व अमर्याद असा तुला मी पहात आहे. ॥११-१७॥

नोहे तोचि हा शिरीं ? । मुकुट लेइलासि श्रीहरी ।
परी आतांचें तेज आणि थोरी । नवल कीं बहु हें ॥ २९४ ॥
ज्ञा - हे श्रीकृष्णा, तोच हा मुगुट आपल्या मस्तकावर धारण केला आहेस, नाही का ? परंतु त्याचे आताचे तेज आणि मोठेपणा हे काही मोठे विलक्षण आहेत. ॥११-२९४॥

तेंचि हें वरिलियेचि हातीं । चक्र परिजितया आयती ।
सांवरितासि विश्वमूर्ती । ते न मोडे खूण ॥ २९५ ॥
हे विश्वमूर्ति देवा, तेच हे चक्र वरच्या हातात फिरवण्याच्या तयारीने तू सावरून धरीत आहेस, ती खूण नाहीशी झाली नाही. ॥११-२९५॥

येरीकडे तेचि हे नोहे गदा । आणि तळिलिया दोनी भुजा निरायुधा ।
वागोरे सांवरावया गोविंदा । संसरिलिया ॥ २९६ ॥
आणि दुसर्‍या हातात असलेली तीच ही गदा नव्हे काय ? आणि चक्र व गदा घेतलेल्या दोन्ही हातांच्या खालचे हात शस्त्रावाचून असून तेही श्रीकृष्णा घोड्यांचे लगाम सावरून धरण्याकरता सरसावले नाहीत काय ? ॥११-२९६॥

आणि तेणेंचि वेगें सहसा । माझिया मनोरथासरिसा ।
जाहलासि विश्वरूपा विश्वेशा । म्हणौनि जाणें ॥ २९७ ॥
आणि त्याच आवेशाने मी आपली इच्छा प्रदर्शित केल्याबरोबर, परमेश्वरा, तू एकाएकी विश्वरूप झालास असे मी जाणतो. ॥११-२९७॥

परी कायसें बा हें चोज । विस्मयो करावयाहि पाडू नाहीं मज ।
चित्त होऊनि जातसें निर्बुज । आश्चर्यें येणें ॥ २९८ ॥
परंतु नवल कसले आहे ? मला आश्चर्य करावयालाही अवकाश नाही. कारण या आश्चर्याने माझे चित्त गोंधळून जात आहे. ॥११-२९८॥

हें एथ आथि कां येथ नाहीं । ऐसें विवरों नये कांहीं ।
नवल अंगप्रभेची नवाई । कैसी कोंदलीं सैंघ ॥ २९९ ॥
हे विश्वरूप आहे की नाही अशा विचाराने नुसता श्वास सुद्धा घेता येत नाही. काय अंगप्रभेचा चमत्कार आश्चर्यकारक आहे, की ती कशी एकसारखी दाट भरलेली आहे. ॥११-२९९॥

एथ अग्नीचीही दिठी करपत । सूर्य खद्योतु तैसा हारपत ।
ऐसें तीव्रपण अद्‍भुत । तेजाचें यया ॥ ३०० ॥
येथे विश्वरूपाच्या तेजात दृष्टि करपून जाते व सूर्य काजव्यासारखे या तेजात मावळून जातात. असे त्या तेजाचे तीव्रपण अद्भुत आहे. ॥११-३००॥

हो कां महातेजाचिया महार्णवीं । बुडोनि गेली सृष्टी आघवी ।
कीं युगांतविजूंच्या पालवीं । झांकलें गगन ॥ ३०१ ॥
जणु काय या महातेजाच्या महासमुद्रात सर्व सृष्टि बुडून गेली आहे. अथवा आकाश तर प्रलयकालच्या विजेच्या पदराने झाकून गेले आहे. ॥११-३०१॥

नातरी संहारतेजाचिया ज्वाळा । तोडोनि माचू बांधला अंतराळां ।
आतां दिव्य ज्ञानाचिया डोळां । पाहवेना ॥ ३०२ ॥
अथवा प्रलयकालच्या तेजाच्या ज्वाला तोडून त्यांचा आकाशात मांडव बांधला आहे. आता असे ते विश्वरूपाचे तेज दिव्य ज्ञानदृष्टीनेही पहावत नाही. ॥११-३०२॥

उजाळु अधिकाधिक बहुवसु । धडाडीत आहे अतिदाहसु ।
पडत दिव्यचक्षुंसही त्रासु । न्याहाळितां ॥ ३०३ ॥
अधिकाधिक पुष्कळ प्रकाश अतिदाह करणारा असा पेटत आहे, म्हणून ते तेज पहाण्यास दिव्यचक्षूलाही त्रास पडतो. ॥११-३०३॥

हो कां जे महाप्रळयींचा भडाडु । होता काळाग्निरुद्राचिया ठायीं गूढु ।
तो तृतीयनयनाचा मढू । फुटला जैसा ॥ ३०४ ॥
अथवा महाप्रलयकाळच्या अग्नीचा भडभडाट, जो कालाग्निनामक रुद्राच्या ठिकाणी गुप्त होता, तो ज्याप्रमाणे शंकराच्या तृतीय नेत्राची (अग्नीची) कळी उमलावी त्याप्रमाणे पसरला आहे. ॥११-३०४॥

तैसें पसरलेनि प्रकाशें । सैंघ पांचवनिया ज्वाळांचे वळसे ।
पडतां ब्रह्मकटाह कोळिसे । होत आहाती ॥ ३०५ ॥
त्याप्रमाणे त्या पसरलेल्या प्रकाशामुळे पाच अग्नीच्या ज्वालांचे वेढे जिकडे तिकडे पडत असता ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत. ॥११-३०५॥

ऐसा अद्‌भुत तेजोराशी । जन्मा नवल म्यां देखिलासी ।
नाहीं व्याप्ती आणि कांतीसी । पारु जी तुझिये ॥ ३०६ ॥
अशा प्रकाशाच्या अपूर्व तेजाची जणू काय राशीच असे तुझे आश्चर्यकारक रूप माझ्या जन्मात मी आजच पाहिले. महाराज, आपल्या तेजाला व व्याप्तीला सीमा नाही. ॥११-३०६॥

त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानम् ।
त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे ॥ १८ ॥
वेदांकडून जाणण्याला योग्य असे अविनाशी ब्रह्म तू आहेस. या विश्वाचा अखेरचा आश्रय तू आहेस. अव्यय व शाश्वत अशा धर्माचा रक्षण करणारा आणि सनातन असा पुरुष तू आहेस असे मला वाटते. ॥११-१८॥

देवा तूं अक्षर । औटाविये मात्रेसि पर ।
श्रुती जयाचें घर । गिंवसीत आहाती ॥ ३०७ ॥
ज्ञा - देवा, आपण परब्रह्म आहात, आपण ॐकाराच्या साडेतीन मात्रांच्या पलीकडे अहात. व आपले ठिकाण वेद शोधित आहेत ॥११-३०७॥

जें आकाराचें आयतन । जें विश्वनिक्षेपैकनिधान ।
तें अव्यय तूं गहन । अविनाश जी ॥ ३०८ ॥
जे आकारमात्राचे घर, जे विश्वरूपी ठेव्याची एकच खाण, असे जे अविकार, गहन व अविनाश, ते महाराज आपण अहात. ॥११-३०८॥

तूं धर्माचा वोलावा । अनादिसिद्ध तूं नित्य नवा ।
जाणें मी सदतिसावा । पुरुष विशेष तूं ॥ ३०९ ॥
तू धर्माचा जिव्हाळा आहेस. तू मूळचाच सिद्ध आहेस व नित्य नवा आहेस. तू छत्तीस तत्वांहून निराळा असा सदतिसावा एक अलौकिक पुरुष आहेस. असे मी जाणतो ॥११-३०९॥

अनादिमध्यान्तमनन्तवीर्यं अनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् ।
पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् ॥ १९ ॥
ज्याला आदि नाही, मध्य नाही व अंत नाही, ज्याच्या पराक्रमाला अंत नाही, ज्याचे बाहु अनंत आहेत, चंद्र, सूर्य ज्याचे नेत्र आहेत, दीप्तिमान अग्नी ज्याचे मुख आहे व आपल्या तेजाने जो या विश्वाला जणुकाय गिळून टाकत आहे असा तुला मी पहात आहे. ॥११=१९॥

तूं आदिमध्यांतरहितु । स्वसामर्थ्यें तूं अनंतु ।
विश्वबाहु अपरिमितु । विश्वचरण तूं ॥ ३१० ॥
ज्ञा - तू आदि, मध्य व अंत रहित आहेस. स्वत:च्या सामर्थ्याने तू अनंत आहेस. तुला सर्वबाजूंनी असंख्य हात व पाय आहेत. (जगातील सर्व हात व पाय हे तुझे हात व पाय आहेत.) व तुझ्यास्वरूपाला मर्यादा नाही. ॥११-३१०॥

पैं चंद्र चंडांशु डोळां । दावितासि कोपप्रसाद लीळा ।
एकां रुससी तमाचिया डोळां । एकां पाळितोसि कृपादृष्टी ॥ ३११ ॥
आणि चंद्र व सूर्य या तुझ्या डोळ्यांनी तू कोपाच्या व कृपेच्या लीला दाखवत आहेस. तू कोणावर कोपकटाक्षाने रागावतोस व कोणाचा कृपादृष्टीने सांभाळ करतोस. ॥११-३११॥

जी एवंविधा तूंतें । मी देखतसें हें निरुतें ।
पेटलें प्रळयाग्नीचें उजितें । तैसें वक्त्र हें तुझें ॥ ३१२ ॥
देवा मी याप्रमाणे तुझे हे स्वरूप पहात आहे. पेटलेल्या प्रलयाच्या अग्नीचे तेज जसे असावे, तसे हे तुझे तोंड आहे. ॥११-३१२॥

वणिवेनि पेटले पर्वत । कवळूनि ज्वाळांचे उभड उठत ।
तैसी चाटीत दाढा दांत । जीभ लोळे ॥ ३१३ ॥
वणव्याने चोहोकडून पर्वत पेटला म्हणजे जसा ज्वालांचा भडका उडतो, त्याप्रमाणे दात व दाढ चाटीत असलेली जीभ लोळत आहे. ॥११-३१३॥

इये वदनींचिया उबा । आणि जी सर्वांगकांतीचिया प्रभा ।
विश्व तातलें अति क्षोभा । जात आहे ॥ ३१४ ॥
या तोंडाच्या उष्णतेने आणि सर्व शरीराच्या तेजाच्या प्रकाशाने संतप्त झालेले विश्व अतिशय खवळले आहे. ॥११-३१४॥

द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः ।
दृष्ट्वाऽद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् ॥ २० ॥
स्वर्ग व पृथ्वी यांच्यामधील हा सर्व प्रदेश तू एकट्याने व्यापला आहेस. सर्व दिशाही तू एकट्याने व्यापल्या आहेस. हे विश्वरूपा, हे तुझे अद्भुत व उग्र रूप पाहून त्रैलोक्य भयाने व्याकुळ झाले आहे. ॥११-२०॥

कां जे द्यौर्लोक आणि पाताळ । पृथिवी आणि अंतराळ ।
अथवा दशदिशा समाकुळ । दिशाचक्र ॥ ३१५ ॥
ज्ञा - किंवा जे भूलोक पाताळ, पृथ्वी, अंतरिक्ष अथवा दहा दिशा व सर्व क्षितीज ॥११-३१५॥

हें आघवेंचि तुंवा एकें । भरलें देखत आहे कौतुकें ।
परि गगनाहीसकट भयानकें । आप्लविजे जेवीं ॥ ३१६ ॥
वर सांगितलेले ते सर्व तू एकट्याने भरलेले आहे हे मी कौतुकाने पहात आहे. परंतु जसे एखाद्या भयंकर वस्तूने आकाशसह सर्व जग बुडवावे (तसे तुझ्या भयंकर स्वरुपाने वरील सर्व ठिकाणे व्यापलेली मी पहातो. ॥११-३१६॥

नातरी अद्भुकतरसाचिया कल्लोळीं । जाहली चवदाही भुवनांसि कडियाळीं ।
तैसें आश्चर्यचि मग मी आकळीं । काय एक ? ॥ ३१७ ॥
अथवा ज्याप्रमाणे अद्भुत रसाच्या लाटांनी चौदाहि भुवनांना वेढा पडावा, त्याप्रमाणे ही अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट आहे. मग मी कशाकशाचे आकलन करावे ? ॥११-३१७॥

नावरे व्याप्ती हे असाधारण । न साहवे रूपाचें उग्रपण ।
सुख दूरी गेलें परि प्राण । विपायें धरीजे ॥ ३१८ ॥
(तुझी विश्वरूपाची) व्यापकता विलक्षण असल्यामुळे तुझे आकलन होत नाही. व तुझी रूपाची प्रखरता सहन होत नाही. यामुळे सुख तर दूरच राहिले, परंतु जग हे आपले प्राण मोठ्या कष्टाने धरून राहिले आहे. ॥११-३१८॥

देवा ऐसें देखोनि तूंतें । नेणों कैसें आलें भयाचें भरितें ।
आतां दुःखकल्लोळीं झळंबतें । तिन्हीं भुवनें ॥ ३१९ ॥
देवा, तुला पाहून भयाची भरती कशी आली ते कळत नाही. प्रस्तुत दु:खांच्या लाटांत तिन्ही लोक गटांगळ्या खात आहेत. ॥११-३१९॥

एर्‍हवीं तुज महात्मयाचें देखणें । तरि भयदुःखासि कां मेळवणें ? ।
परि हें सुख नव्हेचि जेणें गुणें । तें जाणवत आहे मज ॥ ३२० ॥
सहज विचार करून पाहिले तर तू जो महात्मा त्याचे दर्शन झाले तर भय व दु:ख यांचा योग का व्हावा ? परंतु हे विश्वरूपाचे दर्शन, ज्या कारणामुळे सुखकारक होत नाही ते कारण मला कळून आले. ॥११-३२०॥

जंव तुझें रूप नोहे दिठें । तंव जगासि संसारिक गोमटें ।
आतां देखिलासि तरी विषयविटें । उपनला त्रासु ॥ ३२१ ॥
जोपर्यंत तुझे रूप दृष्टीस पडले नाही, तोपर्यंत जगास विषयसुख चांगले वाटते. आता ज्याअर्थी तुझ्या स्वरूपाचे दर्शन झाले त्याअर्थी विषयांचा वीट आल्यामुळे कंटाळा उत्पन्न झाला आहे. ॥११-३२१॥

तेवींचि तुज देखिलियासाठीं । काय सहसा तुज देवों येईल मिठी ।
आणि नेदीं तरी शोकसंकटीं । राहों केवीं ? ॥ ३२२ ॥
त्याचप्रमाणे तुला पाहिल्याबरोबर तुला एकदम आलिंगन देता येईल काय ? बरे आलिंगन जर न द्यावे तर या संकटात कसे रहावे ? ॥११-३२२॥

म्हणौनि मागां सरों तंव संसारु । आडवीत येतसे अनिवारु ।
आणि पुढां तूं तंव अनावरु । न येसि घेवों ॥ ३२३ ॥
म्हणून तुला मिठी न मारता मागे सरावे तर अनिवार असा हा जन्ममरणरूप संसार मागे सरण्याला आडवा येतो आणि पुढे असणारा तू तर अनावर असल्याकारणाने आकळता येत नाहीस. ॥११-३२३॥

ऐसा माझारलिया सांकडां । बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा ।
हा ध्वनि जी फुडा । चोजवला मज ॥ ३२४ ॥
याप्रमाणे मध्येच असलेल्या या संकटात सापडलेल्या बिचार्‍या त्रैलोक्याची होरपळ होत आहे. असा माझा खरोखर अभिप्राय झाला आहे. ॥११-३२४॥

जैसा आरंबळला आगीं । तो समुद्रा ये निवावयालागीं ।
तंव कल्लोळपाणियाचिया तरंगीं । आगळा बिहे ॥ ३२५ ॥
जसा अग्नीने पोळालेला (मनुष्य) थंड होण्याकरता समुद्राजवळ येतो, त्यावेळी खवळलेल्या पाण्याच्या लाटांनी जसा तो अधिकच भितो, ॥११-३२५॥

तैसें या जगासि जाहलें । तूंतें देखोनि तळमळित ठेलें ।
यामाजीं पैल भले । ज्ञानशूरांचे मेळावे ॥ ३२६ ॥
या जगाची तशी स्थिती झाली आहे. तुला पाहून (तुझ्या विश्वरूपाचे दर्शन झाल्यावर) ते तळमळत राहिले. यापैकी पलीकडे गेलेले जे ज्ञानसंपन्न देवांचे चांगले समुदाय आहेत ॥११-३२६॥



[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



अमी हि त्वां सुरसंघा विशन्ति केचिद्भीताः प्राञ्जलयो गृणन्ति ।
स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसङ्घाः स्तुवन्ति त्वां सुतिभिः पुष्कलाभिः ॥ २१ ॥
हे देवांचे समुदाय तुझ्यामधे प्रवेश करीत आहेत, कोणी भयभीत होत्साते अंजलि करून तुझे स्तवन करत आहेत. महर्षी व सिद्ध यांचे समुदाय 'स्वस्ति' असे म्हणून दीर्घ स्तोत्रांनी तुझी स्तुती करत आहेत. ॥११-२१॥

हे तुझेनि आंगिकें तेजें । जाळूनि सर्व कर्मांचीं बीजें ।
मिळत तुज आंतु सहजें । सद्‌भावेसीं ॥ ३२७ ॥
ज्ञा - हे ज्ञानसुरांचे (ज्ञनसंपन्न देवांचे ) समुदाय तुझ्या अंगच्या तेजाने सर्व कर्मांची बीजे (जी अज्ञान. वासना, वगैरे तू) जाळून, आपल्या चांगल्या भावनेच्या जोरावर तुझ्या स्वरूपात मिसळतात. ॥११-३२७॥

आणिक एक सावियाचि भयभीरु । सर्वस्वें धरूनि तुझी मोहरु ।
तुज प्रार्थिताति करु । जोडोनियां ॥ ३२८ ॥
आणखी कित्येक जे स्वभावत: भयभीत झालेले आहेत ते सर्व प्रकारांनी तुझ्या मार्गाचा आश्रय करून, हात जोडून, तुझी प्रार्थना करतात. ॥११-३२८॥

देवा अविद्यार्णवीं पडिलों । जी विषयवागुरें आंतुडलों ।
स्वर्गसंसाराचिया सांकडलों । दोहीं भागीं ॥ ३२९ ॥
(ती अशी की) हे देवा, आम्ही अज्ञानरूपी समुदात पडलो आहोत व महाराज, विषयरूपी जाळ्यात गुंतलो आहोत व स्वर्ग आणि संसार या दोहोंच्या कचाट्यात सापडलो आहोत. ॥११-३२९॥

ऐसें आमुचें सोडवणें । तुजवांचोनि कीजेल कवणें ? ।
तुज शरण गा सर्वप्राणें । म्हणत देवा ॥ ३३० ॥
असे जे आम्ही, त्या आमची मुक्तता तुझ्यावाचून कोण करील ? देवा आम्ही तुला सर्व प्राणांनी शरण आलो आहोत असे ते म्हणतात. ॥११-३३०॥

आणि महर्षी अथवा सिद्ध । कां विद्याधरसमूह विविध ।
हे बोलत तुज स्वस्तिवाद । करिती स्तवन ॥ ३३१ ॥
आणि महर्षी अथवा सिद्ध (कृतार्थ पुरुष) अथवा विद्याधरांचे नाना प्रकारचे समुदाय हे तुला 'कल्याण असो' असे म्हणतात आणि स्तुति करतात. ॥११-३३१॥

रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेऽश्विनौ मरुतश्चोश्मपाश्च ।
गन्धर्वयक्षासुरसिद्धसङ्घा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे ॥ २२ ॥
अकरा रुद्र, बारा आदित्य, अष्ट वसु, साध्य, विश्वेदेव, अश्विनीकुमार, वायु, पितर, गंधर्व, यक्ष, राक्षस यांचे समुदाय सर्व विस्मययुक्त झालेले तुझ्याकडे पहात आहेत. ॥११-२२॥

हे रुद्रादित्यांचे मेळावे । वसु हन साध्य आघवे ।
अश्विनौ देव विश्वेदेव विभवें । वायुही हे जी ॥ ३३२ ॥
ज्ञा - हे अकरा रुद्र व बारा आदित्य यांचे समुदाय, आठ वसु व साध्य नावाचे बारा देव हे सर्व, दोन अश्विनीकुमार, वैभवयुक्त विश्वेदेव आणि वायुदेवता देखील हे महाराज, ॥११-३३२॥

अवधारा पितर हन गंधर्व । पैल यक्षरक्षोगण सर्व ।
जी महेंद्रमुख्य देव । कां सिद्धादिक ॥ ३३३ ॥
ऐका, अग्नि आणि गंधर्व, पलीकडे असलेले यक्षांचे व राक्षसांचे सर्व समुदाय, महाराज, इंद्र ज्यामधे श्रेष्ठ आहे असे देव आणि सिद्ध आदि ॥११-३३३॥

हे आघवेचि आपुलालिया लोकीं । सोत्कंठित अवलोकीं ।
हे महामूर्ती दैविकी । पाहात आहाती ॥ ३३४ ॥
हे सर्व आपापल्या लोकात उत्कंठेने आपली दिव्य मूर्ति पहात आहेत हे पहा. ॥११-३३४॥

मग पाहात पाहात प्रतिक्षणीं । विस्मित होऊनि अंतःकरणीं ।
करित निजमुकटीं वोवाळणी । प्रभुजी तुज ॥ ३३५ ॥
मग पहात पहात प्रत्येक क्षणात मनामधे चकित होऊन हे देवा, ते तुला आपल्या मुकुटाने ओवाळत आहेत. ॥११-३३५॥

ते जय जय घोष कलरवें । स्वर्ग गाजविताती आघवे ।
ठेवित ललाटावरी बरवे । करसंपुट ॥ ३३६ ॥
त्या 'जय, जय' अशा घोषांच्या मंजुळ शब्दाने ते सर्व स्वर्गामधे गजर करतात व आपले दोन्ही हात चांगले जोडून मस्तकावर ठेवतात. (नमस्कार करतात) ॥११-३३६॥

तिये विनयद्रुमाचिये आरवीं । सुरवाडली सात्त्विकांची माधवी ।
म्हणौनि करसंपुटपल्लवीं । तूं होतासि फळ ॥ ३३७ ॥
त्या नम्रतारूपी वृक्षांच्या अरण्यामधे अष्ठ सात्विक भावरूपी वसंत ऋतु अनुकूल झाला म्हणून त्यांच्या करसंपुटरूपी पालवीला तू फल प्राप्त झाला आहेस. ॥११-३३७॥

रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहूरुपादम् ।
बहूदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाऽहम् ॥ २३ ॥
हे महाबाहो, अनंत मुखे व नेत्र असलेले अनंत बाहू, मांड्या व पाय असलेले, अनंत उदरे असलेले, अनंत दाढांच्या योगे भीषण असलेले तुझे प्रचंड रूप पाहून तसाच मी देखील व्याकुळ झालो आहे. ॥११-२३॥

जी लोचनां भाग्य उदेलें । मना सुखाचें सुयाणें पाहलें ।
जे अगाध तुझें देखिलें । विश्वरूप इहीं ॥ ३३८ ॥
महाराज, यांनी (देवांनी वगैरे) जे तुझे अगाध विश्वरूप पाहिले, ते त्यांच्या डोळ्यांचे भाग्य उदयाला आले आहे. अथवा त्यांच्या जीवाला सुखाचा सुकाळ उगवला (प्राप्त झाला). ॥११-३३८॥

हें लोकत्रयव्यापक रूपडें । पाहतां देवांही वचक पडे ।
याचें सन्मुखपण जोडें । भलतयाकडुनी ॥ ३३९ ॥
हे लोकाला व्यापणरे रूप पाहून देवांनाही दचक वाटतो. वाटेल तिकडून यास (रूपास) पाहिले असता हा समोर असा वाटतो. ॥११-३३९॥

ऐसें एकचि परी विचित्रें । आणि भयानकें वक्त्रें ।
बहुलोचन हे सशस्त्रें । अनंतभुजा ॥ ३४० ॥
ज्ञा - याप्रमाणे आपले एकच स्वरूप आहे, परंतु विचित्र आणि भयानक अशी त्याला मुखे, अनेक नेत्र व शस्त्र धारण केलेले असे अगणित हात आहेत. ॥११-३४०॥

अनंत चारु बाहु चरण । बहूदर आणि नानावर्ण ।
कैसें प्रतिवदनीं मातलेपण । आवेशाचें ॥ ३४१ ॥
या विश्वरूपास अगणित सुंदर पाय आहेत, अनेक पोटे आहेत आणि नाना प्रकारचे रंग आहेत व प्रत्येक मुखाच्या ठिकाणी क्षोभाचा मस्तपणा आहे. ॥११-३४१॥

हो कां महाकल्पाचिया अंतीं । तवकलेनि यमें जेउततेउतीं ।
प्रळयाग्नीचीं उजितीं । आंबुखिलीं जैसीं ॥ ३४२ ॥
अथवा महाप्रलयाच्या शेवटी जोर बांधलेल्या यमाने जशा काही जिकडे तिकडे प्रलयाद्ग्नीच्या आगट्याच पेटवल्या आहेत. ॥११-३४२॥

नातरी संहारत्रिपुरारीचीं यंत्रें । कीं प्रळयभैरवाचीं क्षेत्रें ।
नाना युगांतशक्तीचीं पात्रें । भूतखिचा वोढविलीं ॥ ३४३ ॥
अथवा संहार करणार्‍या श्रीशंकराचा तोफखाना किंवा प्रलयकाळच्या भैरवदेवांचे समुदाय उत्पन्न व्हावेत अगर भूतांच्या (प्राण्यांच्या) नाशासाठी युगांतशक्तीची पात्र पुढे सरसावली आहेत. ॥११-३४३॥

तैसीं जियेतियेकडे । तुझीं वक्त्रें जीं प्रचंडें ।
न समाती दरीमाजीं सिंव्हाडे । तैसे दशन दिसती रागीट ॥ ३४४ ॥
त्याप्रमाणे जिकडे तिकदे तुझी प्रचंड तोंडे मावत नाहीत आणि दरीमध्ये जसे सिंह तसे तुझ्या मुखात दात उग्र दिसत आहेत. ॥११-३४४॥

जैसें काळरात्रीचेनि अंधारें । उल्हासत निघतीं संहारखेंचरें ।
तैसिया वदनीं प्रळयरुधिरें । काटलिया दाढा ॥ ३४५ ॥
प्रलय कालच्या गडद रात्रीत नाश करणारी पिशाचे जशी उल्हासाने संचार करतात, त्याप्रमाणे प्रलयकाळच्या नाश पावणार्‍या प्राण्यांच्या रक्ताने या मुखातील दाढा भरलेल्या आहेत. असे दिसते. ॥११-३४५॥

हें असो काळें अवंतिलें रण । कां सर्व संहारें मातलें मरण ।
तैसें अतिभिंगुळवाणेंपण । वदनीं तुझिये ॥ ३४६ ॥
हे असो, काळाने जसे काय युद्धास आमंत्रण करावे, अथवा सर्वांच्या संहारकाली जसे मरण माजून रहाते, त्याप्रमाणे तुझ्या मुखात अत्यंत भयानकपणा आहे. ॥११-३४६॥

हे बापुडी लोकसृष्टी । मोटकीये विपाइली दिठी ।
आणि दुःखकालिंदीचिया तटीं । झाड होऊनि ठेली ॥ ३४७ ॥
त्या बिचार्‍या त्रैलोक्यावर जेव्हा थोडीशी नजर टाकली तेव्हा ते दु:खरूप कालिंदीच्या (यमुनेच्या) किनार्‍यावर झाड बनून राहिले (असे दिसले). ॥११-३४७॥

तुज महामृत्यूचिया सागरीं । आतां हे त्रैलोक्य जीविताची तरी ।
शोकदुर्वातलहरी । आंदोळत असे ॥ ३४८ ॥
तू जो महामृत्युरूप समुद्र, त्यात ही त्रैलोक्याच्या जीविताची नौका शोकरूप प्रतिकूल वार्‍याने उत्पन्न झालेल्या लाटांमुळे झोके खात आहे. ॥११-३४८॥

एथ कोपोनि जरी वैकुंठें । ऐसें हन म्हणिपैल अवचटें ।
जें तुज लोकांचें काई वाटे ? । तूं ध्यानसुख हें भोगीं ॥ ३४९ ॥
'तुला या लोकांचे काय वाटते ? तू माझ्या या ध्यानाचे सुख भोग म्हणजे झाले' अहो श्रीकृष्णा, असे जरी आपण आता एकाएकी रागावून बोललात तरी ॥११-३४९॥

तरी जी लोकांचें कीर साधारण । वायां आड सूतसे वोडण ।
केवीं सहसा म्हणे प्राण । माझेचि कांपती ॥ ३५० ॥
पण महाराज माझ्याच जीवास भीतीने कंप सुटला आहे, असे मी एकदम म्हणावे तरी कसे ? म्हणून जगाचे साधारण दु:ख उगीच आडपडद्यासारखे खरोखर मधे केले आहे. ॥११-३५०॥

ज्या मज संहाररुद्र वासिपे । ज्या मजभेणें मृत्यु लपे ।
तो मी एथें अहाळबाहळीं कांपें । ऐसें तुवां केलें ॥ ३५१ ॥
ज्या मला प्रलयकाळचा रुद्र देखील भितो, ज्या माझ्या भयाने मृत्यु लपून रहातो असा जो मी तो मी या ठिकाणी भयाने अत्यंत कापत आहे असे तू केले आहेस. ॥११-३५१॥

परि नवल बापा हे महामारी । इया नाम विश्वरूप जरी ।
हे भ्यासुरपणें हारी । भयासि आणी ॥ ३५२ ॥
परंतु हे पहा, ही महामारीच आहे, आणि यालाच जर विश्वरूप म्हणावयाचे, तर बापा, हे एक आश्चर्यच आहे. ही महामारी आपल्या विक्राळ स्वरूपाने (साक्षात) भयासही माघार घ्यावयास लावते. ॥११-३५२॥

नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ॥ २४ ॥
हे विष्णो, गगनाला स्पर्श करणारा, दीप्रिमान, अनेक रंगांनी युक्त, जबडा पसरलेला, दीप्तिमान व विशाल नेत्र असलेला, अशा तुला पाहून ज्याचा अंतरात्मा व्याकूळ झाला आहे असा मी धैर्य धारण करू शकत नाही व शांति देखील धरू शकत नाही. ॥११-२४॥

ठेलीं महाकाळेंसि हटेंतटें । तैसी कितीएकें मुखें रागिटें ।
इहीं वाढोनियां धाकुटें । आकाश केलें ॥ ३५३ ॥
ज्ञा - महाकाळाबरोबर ज्यांनी पैजेने बरोबरीचा सामना बांधला आहे, अशी कित्येक मुखे रागीट असून यांनी विस्ताराने आकाश लहान केले आहे. ॥११-३५३॥

गगनाचेंनि वाडपणें नाकळे । त्रिभुवनींचियाही वारिया न वेंटाळे ।
ययाचेनि वाफा आगी जळे । कैसें धडाडीत असे ॥ ३५४ ॥
आकाशाच्या मोठेपणास जी आकळली जात नाहीत आणि त्रिभुवनातील वार्‍यानेही जी मुखे वेष्टिली जात नाहीत, त्या मुखाच्या वाफेने अग्नि जळतो, या मुखातून अग्नीचे लोळ कसे काय बाहेर येत आहेत ॥११-३५४॥

तेवींचि एकसारिखें एक नोहे । एथ वर्णावर्णाचा भेदु आहे ।
हो कां जें प्रळयीं सावावो लाहे । वह्नी ययाचा ॥ ३५५ ॥
त्याचप्रमाणे एकसारखे एक मुख नसून त्यांच्यात रंगारंगांचा भेद आहे. फार काय सांगावे ? अशा या मुखांचे प्रळयकाळचा अग्नी सुद्धा सहाय्य घेतो. ॥११-३५५॥

जयाचिये आंगींची दीप्ती येवढी । जे त्रैलोक्य कीजे राखोंडी ।
कीं तयाही तोंडें आणि तोंडीं । दांत दाढा ॥ ३५६ ॥
ज्याच्या अंगाचे तेज एवढे आहे की ते त्रैलोक्याची राखुंडी करील, त्याला तोंडे आहेत व त्या तोंडात दात व दाढा अहेत. ॥११-३५६॥

कैसा वारया धनुर्वात चढला । समुद्र कीं महापुरीं पडिला ।
विषाग्नि मारा प्रवर्तला । वडवानळासी ॥ ३५७ ॥
पहा हे कसे झाले ? जसा वार्‍याला धनुर्वात व्हावा, समुद्र महापुरात पडावा किंवा विषग्नि वडवानळाचा नाश करण्यास प्रवृत्त व्हावा. ॥११-३५७॥

हळाहळ आगी पियालें । नवल मरण मारा प्रवर्तलें ।
तैसें संहारतेजा या जाहलें । वदन देखा ॥ ३५८ ॥
अग्नीने जसे हालाहल विष प्यावे अथवा आश्चर्य असे की मरण जसे मारण्यास तयार व्हावे, त्याप्रमाणे या संहारतेजाला मुख झाले आहे, असे समजा. ॥११-३५८॥

परी कोणें मानें विशाळ । जैसें तुटलिया अंतराळ ।
आकाशासि कव्हळ । पडोनि ठेलें ॥ ३५९ ॥
परंतु ती मुखे किती मोठी आहेत म्हणून म्हणाल, तर आकाश तुटून पडल्याने जशी आकाशास खिंड पडून रहाते, ॥११-३५९॥

नातरी काखे सूनि वसुंधरी । जैं हिरण्याक्षु रिगाला विवरीं ।
तैं उघडले हाटकेश्वरीं । जेवीं पाताळकुहर ॥ ३६० ॥
अथवा बगलेत पृथ्वी मारून जेव्हा हिरण्याक्ष दैत्य गुहेत शिरला तेव्हा हाटकेश्वराने जसे पाताळारूपी गुहेचे द्वार उघडले, ॥११-३६०॥

तैसा वक्त्रांचा विकाशु । माजीं जिव्हांचा आगळाचि आवेशु ।
विश्व न पुरे म्हणौनि घांसु । न भरीचि कोंडें ॥ ३६१ ॥
त्याप्रमाने तोंडे पसरलेली आहेत व त्यामधे जिभांचे अधिकच जोर दिसून येत आहेत. त्यांचा घासास विश्वानेही पूर्तता येणार नाही. म्हणून हे विश्वरूप या विश्वाच्या लीलेने घास घेत नाही. ॥११-३६१॥

आणि पाताळव्याळांचिया फूत्कारीं । गरळज्वाळा लागती अंबरीं ।
तैसी पसरलिये वदनदरी- । माजीं हे जिव्हा ॥ ३६२ ॥
आणि ज्याप्रमाणे पाताळातील सर्पांच्या फुत्काराने त्यांच्या विषाच्या ज्वाला आकाशात पसराव्यात, त्या ज्वालांप्रमाणे जिव्हा ही (प्रत्येक) वदनरूपी दरीत पसरली आहे. ॥११-३६२॥

काढूनि प्रळयविजूंचीं जुंबाडें । जैसें पन्नासिलें गगनाचे हुडे ।
तैसे आवाळुवांवरी आंकडे । धगधगीत दाढांचे ॥ ३६३ ॥
प्रलयकाळाच्या विजांचे समुदाय काढून जसे आकाशाचे बुरुज शृंगारावेत, तशी ओठाबाहेर तीक्ष्ण अशा दाढांची टोके दिसत आहेत. ॥११-३६३॥

आणि ललाटपटाचिये खोळे । कैसें भयातें भेडविताती डोळे ।
हो कां जे महामृत्यूचे उमाळे । कडवसां राहिले ॥ ३६४ ॥
आणि ललाटारूप वस्त्रांच्या खोळीत असलेले डोळे, हे जसे भयासच भेडसावित आहेत, अथवा ते डोळे, महामृत्यूचे लोटच असून (भिवयांच्या) अंधारात राहिले आहेत. ॥११-३६४॥

ऐसें वाऊनि भयाचें भोज । एथ काय निपजवूं पाहातोसि काज ।
तें नेणों परी मज । मरणभय आलें ॥ ३६५ ॥
असे हे महाभयाचे (मृत्यूचे) कौतुक धारण करून (म्हणजे आपल्या स्वरूपी दाखवून) या ठिकाणी तू काय कार्यसिद्धी करू पहातोस ते मला कळत नाही. परंतु मला मात्र मृत्यूचे भय वाटू लागले आहे. ॥११-३६५॥

देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे । केले तिये पावलों प्रतिफळें ।
बापा देखिलासि आतां डोळे । निवावे तैसे निवाले ॥ ३६६ ॥
अहो देवा, विश्वरूप पहाण्याचे डोहाळे झाले होते, त्याची पूर्ण फलप्राप्ती होऊन बापा, तुमचे विश्वरूप पाहिल्याने डोळे शांत व्हावे तसे झाले आहे. ॥११-३६६॥

अहो देहो पार्थिव कीर जाये । ययाची काकुळती कवणा आहे ।
परि आतां चैतन्य माझें विपायें । वांचे कीं न वांचे ॥ ३६७ ॥
अहो देवा, हा देह पृथ्वीचा बनला असल्याने तो तर निश्चयेकरून नाश पावणारच. त्याची काळजी कोणी केली आहे ? परंतु आता माझे चैतन्यच कदाचित वाचेल की नाही असे मला वाटू लागले आहे. ॥११-३६७॥

एर्‍हवीं भयास्तव आंग कांपे । नावेक आगळें तरी मन तापे ।
अथवा बुद्धिही वासिपे । अभिमानु विसरिजे ॥ ३६८ ॥
भयामुळे खरोखर अंग कापावयास लागते आणि तेच भय क्षणभर अधिक वाढले की मनाला ताप होतो अथवा बुद्धि दचकते आणि अभिमान विगलित होतो. ॥११-३६८॥

परी येतुलियाही वेगळा । जो केवळ आनंदैककळा ।
तया अंतरात्मयाही निश्चळा । शियारी आली ॥ ३६९ ॥
परंतु या सर्वांहून वेगळा, जो केवळ आनंदाचा अंश आहे असा जो अंतरात्मा, त्या शांत अंतरात्म्याला देखील भयाने शहारे आले. ॥११-३६९॥

बाप साक्षात्काराचा वेधु । कैसा देशधडी केला बोधु ।
हा गुरुशिष्यसंबंधु । विपायें नांदे ॥ ३७० ॥
काय आश्चर्य आहे ? विश्वरूपाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा काय छंद लागला होता ? त्या दर्शनाने माझे ज्ञान देशोधडी केले. असा गुरुशिष्यसंबंध क्वचितच असेल. ॥११-३७०॥

देवा तुझ्या ये दर्शनीं । जें वैकल्य उपजलें आहे अंतःकरणीं ।
तें सावरावयालागीं गंवसणी । धैर्याची करितसें ॥ ३७१ ॥
देवा, तुझ्या या दर्शनाने अंत:करणामधे जो विस्कळितपणा उत्पन्न झाला आहे तो विस्कळितपणा सावरण्याकरता मी धैर्याची गवसणी करत आहे. ॥११-३७१॥

तंव माझेनि नामें धैर्य हारपलें । कीं तयाहीवरी विश्वरूपदर्शन जाहलें ।
हें असो परि मज भलें आतुडविलें । उपदेशा इया ॥ ३७२ ॥
तो माझ्या नावाने धैर्य अगदीच नाहीसे झाले आणि त्यावर विश्वरूप दृष्टीस पडले, मग काय विचारता ? हे राहू द्या, परंतु मला उपदेशात चांगले गुरफटून टाकले. ॥११-३७२॥

जीव विसंवावयाचिया चाडा । सैंघ धांवाधांवी करितसे बापुडा ।
परि सोयही कवणेंकडां । न लभे एथ ॥ ३७३ ॥
विश्रांती घेण्याच्या इच्छेने बिचारा जीव धावाधाव करत आहे, परंतु या विश्वरूपात त्याला कोठेही आश्रय मिळात नाही. ॥११-३७३॥

ऐसें विश्वरूपाचिया महामारी । जीवित्व गेलें आहें चराचरीं ।
जी न बोलें तरि काय करीं । कैसेनि राहें ? ॥ ३७४ ॥
याप्रमाणे विश्वरूपाच्या महामारीने चराचरातील जीवित्व गेले आहे. महाराज, हे न बोलावे तर काय करावे ? व कसे रहावे ? ॥११-३७४॥

दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि ।
दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास ॥ २५ ॥
दाढांच्या योगाने विक्राळ आणि प्रलयकाळच्या अग्नीप्रमाणे (दिसणारी) तुझी मुखे पाहून (मी इतका गर्भगळित झालो आहे की) मला दिशाभूल झाली आहे, मला काही समाधान वाटत नाही, हे देवाधिदेवा, जगन्निवासा, (आता) प्रसन्न हो. ॥११-२५॥

पैं अखंड डोळ्यांपुढें । फुटलें जैसें महाभयाचें भांडें ।
तैशीं तुझीं मुखें वितंडें । पसरलीं देखें ॥ ३७५ ॥
ज्ञा - ज्याप्रमाणे महाभयाचे (मृत्यूचे) भांडे फुटावे, तशी तुझी विशाल तोंडे एकसारखी पसरलेली मी पहात आहे. हे ॥११-३७५॥

असो दांत दाढांची दाटी । न झांकवे मा दों दों वोठीं ।
सैंघ प्रळयशस्त्रांचिया दाट कांटी । लागलिया जैशा ॥ ३७६ ॥
असू दे, जशी प्रलयकाळच्या शस्त्रांची दाट कुंपणे एकसारखी लागावीत तशी दात व दाढांची गर्दी उडून गेली आहे. ती इतकी की प्रत्येक मुखातील दात व दाढा, ह्या त्या मुखाच्या दोन दोन ओठांनी देखील झाकल्या जात नाहीत. ॥११-३७६॥

जैसें तक्षका विष भरलें । हो कां जे काळरात्रीं भूत संचरलें ।
कीं आग्नेयास्त्र परजिलें । वज्राग्नि जैसें ॥ ३७७ ॥
तक्षक सर्प हा मूळचाच विषारी असून त्याच्या तोंडात जसे आणखी विष भरावे, किंवा अमावास्येची रात्र ही जशी पूर्ण काळोखामुळे मूळचीच भय उत्पन्न करणारी असून, तिच्यात आणखी पिशाचांचा संचार व्हावा किंवा वज्राग्नी हा जसा स्वभावत:च अत्यंत दाहक असून त्याने आणखी अग्न्यस्त्र धारण करावे. ॥११-३७७॥

तैशीं तुझीं वक्त्रें प्रचंडें । वरि आवेश हा बाहेरी वोसंडे ।
आले मरणरसाचे लोंढे । आम्हांवरी ॥ ३७८ ॥
त्याप्रमाणे तुझ्या विश्वरूपाची तोंडे मूळचीच भयंकर असून त्यात आणखी त्यांचा आवेश त्यात न मावता बाहेर वहात आहे. (तेव्हा) मला असे वाटते की तो वहात असलेला आवेश नसून ते जणु काय आमच्यावर मरणरसाचे लोंढेच आले आहेत. ॥११-३७८॥

संहारसमयींचा चंडानिळु । आणि महाकल्पांत प्रळयानळु ।
या दोहीं जैं होय मेळु । तैं काय एक न जळे ? ॥ ३७९ ॥
प्रलयकाळचा प्रचंड वारा व महाप्रळयकाळचा अग्नि, हे जेव्हा एकत्र होतात, तेव्हा काय एक जळणार नाही ? ॥११-३७९॥

तैसीं संहारकें तुझीं मुखें । देखोनि धीरु कां आम्हां पारुखे ? ।
आतां भुललों मी दिशा न देखें । आपणपें नेणें ॥ ३८० ॥
तशी तुझी संहार करणारी मुखे पाहून धैर्य तर आम्हास नाहीसे झाले आहे. आता मी वेडा झाल्यामुळे मला दिशा दिसत नाहीत, एवढेच नाही तर माझी मलाही ओळख नाही असे झाले आहे. ॥११-३८०॥

मोटकें विश्वरूप डोळां देखिलें । आणि सुखाचें अवर्षण पडिलें ।
आतां जापाणीं जापाणीं आपुलें । अस्ताव्यस्त हें ॥ ३८१ ॥
विश्वरूप डोळ्याने पाहिले नाही तोच सुखाचा दुष्काळ पडला. म्हणून आता तू आपले हे अस्ताव्यस्त रूप आवरून घे. ॥११-३८१॥

ऐसें करिसी म्हणौनि जरी जाणें । तरी हे गोष्टी सांगावीं कां मी म्हणें ।
आतां एक वेळ वांचवी जी प्राणें । या स्वरूपप्रळयापासोनि ॥ ३८२ ॥
तू असे करशील असे जर मला ठाऊक असते तर “ही गोष्ट मला सांगा' असे मी कशाला म्हटले असते ? आता या स्वरूपप्रलयापासून माझे प्राण एकवार वाचवा, महाराज. ॥११-३८२॥

जरी तूं गोसावी आमुचा अनंता । तरी सुईं वोडण माझिया जीविता ।
सांटवीं पसारा हा मागुता । महामारीचा ॥ ३८३ ॥
अहो श्रीकृष्णा, जर आपण आमचे मालक अहात तर माझ्या जीविताच्या आड ढाल घाला, म्हणजे हा विश्वरूपी महामारीचा पसारा पुन: आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी साठवा. ॥११-३८३॥

आइकें सकळ देवांचिया परदेवते । तुवां चैतन्यें गा विश्व वसतें ।
तें विसरलासी हें उपरतें । संहारूं आदरिलें ॥ ३८४ ॥
हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ अशा देवा, ऐक. तू जो चैतन्य, त्या तुझ्यामुळे सर्व विश्व वसते आहे. (म्हणजे विश्वाचे अस्तित्व तुझ्या सत्तेवर आहे) ते विसरलास व हे उलटे संहार करण्याचे काम आरंभले आहेस. ॥११-३८४॥

म्हणौनि वेगीं प्रसन्न होईं देवराया । संहरीं संहरीं आपुली माया ।
काढीं मातें महाभया- । पासोनियां ॥ ३८५ ॥
एवढ्याकरता हे देवातील राजा, श्रीकृष्णा, लवकर प्रसन्न हो व आपल्या मायासक्तीला आवर आवर आणि मला या मरणासारख्या मोठ्या भयातून बाहेर काढ. ॥११-३८५॥

हा ठायवरी पुढतपुढतीं । तूंतें म्हणिजे बहुवा काकुळती ।
ऐसा मी विश्वमूर्ती । भेडका जाहलों ॥ ३८६ ॥
इतके तुला मोठ्या दीनपणे वारंवार म्हणावे, असा मी विश्वरूपाच्या योगाने खरोखर भ्यायलो आहे. ॥११-३८६॥

जैं अमरावतीये आला धाडा । तैं म्यां एकलेनि केला उवेडा ।
जो मी काळाचियाही तोंडा । वासिपु न धरीं ॥ ३८७ ॥
ज्यावेळी अमरावतीवर राक्षसांचा हल्ला आला त्यावेळी मी एकट्याने तो परतवला व जो मी, साक्षात् काळ समोर आला तरी भय न धरणारा असा आहे, ॥११-३८७॥

परी तया आंतुल नव्हे हें देवा । एथ मृत्यूसही करूनि चढावा ।
तुवां आमुचाचि घोटू भरावा । या सकळ विश्वेंसीं ॥ ३८८ ॥
परंतु देवा, ही विश्वरूप गोष्ट त्यातली नव्हे. येथे (विश्वरूपात) तू मृत्यूवर ताण करून या सर्व विश्वासकट माझा देखील ग्रास करण्याचा दुर्घट प्रसंग आणला आहेस. ॥११-३८८॥

कैसा नव्हता प्रळयाचा वेळु । गोखा तूंचि मिनलासि काळु ।
बापुडा हा त्रिभुवनगोळु । अल्पायु जाहला ॥ ३८९ ॥
प्रलयाचा काळ नसतांना मध्येच कसा तू काळ प्राप्त झाला आहेस ? हे त्रैलोक्य बिचारे अल्पायुषी झाले असे वाटते. ॥११-३८९॥

अहा भाग्या विपरीता । विघ्न उठिलें शांत करितां ।
कटाकटा विश्व गेलें आतां । तूं लागलासि ग्रासूं ॥ ३९० ॥
अरेरे ! विपरीत देवा !! विश्वरूपदर्शनाने शांत व्हावे म्हणून खटपट केली, तो अकल्पित विघ्न उत्पन्न झाले. हाय ! हे त्रैलोक्य आता नाहीसे होत चालले ! तू हे आता गिळावयास लागलास ! ॥११- ३९०॥,

हें नव्हे मा रोकडें । सैंघ पसरूनियां तोंडें ।
कवळितासि चहूंकडे । सैन्यें इयें ॥ ३९१ ॥
एकसारखी तोंडे पसरून ही सैन्ये चाही बाजूंनी तू ग्रासीत आहेस, हे प्रत्यक्ष (दिसत) नाही काय? ॥११-३९१॥

अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः ।
भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथाऽसौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः ॥ २६ ॥
तसेच (राजांच्या समुदायांसहवर्तमान) है | धृतराष्ट्राचे सर्व पुत्र, भीष्म, द्रोण, तसाच कर्ण, त्याप्रमाणेच आमच्या पक्षाच्या देखील मुख्य योध्यांसह- ॥११-२६॥

नोहेति ? हे कौरवकुळींचे वीर । आंधळिया धृतराष्ट्राचे कुमर ।
हे गेले गेले सहपरिवार । तुझिया वदनीं ॥ ३९२ ॥
हे कौरवांच्या वंशांतील वीर, आंधळ्या धृतराष्ट्राचे पुत्र नव्हेत का ? अरे अरे, हे तर आपल्या परिवारासुद्धा तुझ्या तोंडात पूर्णपणे गेलेच म्हणावयाचे ! ॥११-३९२॥

आणि जे जे यांचेनि सावायें । आले देशोदेशींचे राये ।
तयांचें सांगावया जावों न लाहे । ऐसें सरकटित आहासी ॥ ३९३ ॥
आणि जे जे यांच्या मदतीकरिता देशोदेशीचे राजे आले आहेत, त्यांची वार्ताहि सांगू जाता येणार नाही, (कोणी उरणार नाही,) असा तू सर्वांचा सरसकट ग्रास करीत आहेस. ॥११-३९३॥

मदमुखाचिया संघटा । घेत आहासि घटघटां ।
आरणीं हन थाटा । देतासि मिठी ॥ ३९४ ॥
मदोन्मत्त हत्तीचे समुदाय तू घटाघट गिळीत असून, युद्धभूमीवरील सेनासमुदाय तू गिळून टाकीत आहेस. ॥११-३९४॥

जंत्रावरिचील मार । पदातींचे मोगर ।
मुखाआंत भार । हारपताति मा ॥ ३९५ ॥
तोफांवरून मारा करणारे लोक व पायांनी चालणारे पायदळ, यांच्या झंडीच्या झुंडी तुझ्या मुखात नाहीशा होत आहेत, नाही कां ? ॥११-३९५॥

कृतांताचिया जावळी । जें एकचि विश्वातें गिळी ।
तियें कोटीवरी सगळीं । गिळितासि शस्त्रें ॥ ३९६ ॥
जी शसे यमाची भावंडे आहेत व ज्या शस्त्रांपैकी एकच, सर्व विश्वाला गिळील अशी कोट्यवधि शस्त्रे तू गिळीत आहेस. ॥११-३९६॥

चतुरंगा परिवारा । संजोडियां रहंवरां ।
दांत न लाविसी मा परमेश्वरा । कसा तुष्टलासि बरवा ॥ ३९७ ॥
हत्ती, घोडे, रथ, पायदळ असा चतरंग सेनेचा परिवार व घोडे जोडलेले रथ यास परमेश्वरा, तू दात न लावता गिळीत आहेस व त्यायोगाने कसा चांगला संतुष्ट झाला आहेस बरे. ॥११-३९७॥

हां गा भीष्माऐसा कवणु । सत्यशौर्यनिपुणु ।
तोही आणि ब्राह्मण द्रोणु । ग्रासिलासि कटकटा ॥ ३९८ ॥
अहो, भीष्मांसारखा खरेपणात प्रसिद्ध आणि शौर्यात तरबेज असा दुसरा कोण आहे ? तो देखील आणि द्रोणाचार्य ब्राह्मणहि अरेरे, तू गिळलास. ॥११-३९८॥

अहा सहस्रकराचा कुमरु । एथ गेला गेला कर्णवीरु ।
आणि आमुचिया आघवयांचा केरु । फेडिला देखें ॥ ३९९ ॥
अहाहा ! सूर्याचा मुलगा जो वीर कर्ण, तो, आपल्या मुखात गेला हो गेला आणि आमच्याकडचे सर्व (योद्धे) तर तू केसासारखे नाहीसे केलेले मी पाहात आहे. ॥११-३९९॥

कटकटा धातया । कैसें जाहलें अनुग्रहा यया ।
मियां प्रार्थूनि जगा बापुडिया । आणिलें मरण ॥ ४०० ॥
हाय, हाय ! ब्रह्मदेवा, भगवंताच्या या अनुग्रहाने कसे झाले ? या विपरीत फलप्राप्तीच्या योगाने असे झाले की, मला आपले विश्वरूप दाखवा, अशी भगवंताची प्रार्थना करून या दीन जगास (स्थितिकाली) मी मरण आणले. ॥११-४००॥

मागां थोडिया बहुवा उपपत्ती । येणें सांगितलिया विभूती ।
तैसा नसेचि मा पुढती । बैसलों पुसों ॥ ४०१ ॥
आणि मागे देवाने थोड्याबहत युक्तीने विभूति सांगितल्या; परंतु त्या व्यापकपणासारखा देव मला दिसेना म्हणून विनंती करण्यास मी सरसावलो. ॥११-४०१॥

म्हणौनि भोग्य तें त्रिशुद्धी न चुके । आणि बुद्धिही होणारासारिखी ठाके ।
माझ्या कपाळीं पिटावें लोकें । तें लोटेल कांह्यां ॥ ४०२ ॥
म्हणून जे भोगावयाचे आहे, ते कधीहि चुकणार नाही आणि जसे होणार असेल, त्यासारखी बुद्धि होते. माझ्या प्रारब्धात लोकांनी मला दोष द्यावा असे असेल, ते कसे |चुकेल ? ॥११-४०२॥

पूर्वीं अमृतही हातां आलें । परी देव नसतीचि उगले ।
मग काळकूट उठविलें । शेवटीं जैसें ॥ ४०३ ॥
पूर्वी (समुद्रमंधनकाली) अमृत देखील देवांच्या हाती लागले (तेव्हा देवांनी गप्प बसावे की नाही?) परंतु देव स्तब्ध बसले नाहीत. मग शेवटी ज्याप्रमाणे कालकूट विष समुद्रमंथनापासून उत्पन्न केले; ॥११-४०३॥

परी तें एकबगीं थोडें । केलिया प्रतिकारामाजिवडें ।
आणि तिये अवसरीचें तें सांकडें । निस्तरविलें शंभू ॥ ४०४ ॥
परंतु ते एक प्रकाराने थोडे होते. कारण ती केलेली गोष्ट निराकारण करण्याजोग्या गोष्टींपैकी एक होती आणि त्या वेळचे ते संकट शंकराने निवारण केले. ॥११-४०४॥

आतां हा जळतां वारा कें वेंटाळे ? । कोणा हे विषा भरलें गगन गिळे ? ।
महाकाळेंसि कें खेळें ? । आंगवत असे ॥ ४०५ ॥
पण हलीचा जो हा विश्वरूपाचा प्रकार, हा प्रत्यक्ष पेटलेला वाराच आहे, तर तो कसा आवरेल ? विषाने भरलेले आकाश कोणास गिळता येईल काय ? महाकाळाबरोबर खेळता येईल, असे कोणाच्या अंगी सामर्थ्य आहे ? ॥११-४०५॥

ऐसा अर्जुन दुःखें शिणतु । शोचित असे जिवाआंतु ।
परी न देखें तो प्रस्तुतु । अभिप्राय देवाचा ॥ ४०६ ॥
याप्रमाणे अर्जुन दुःखाने कष्टी होऊन मनामध्ये शोक करीत होता. परंतु तो सांप्रत देवाचे मनोगत काय आहे, हे ओळखत नव्हता. ॥११-४०६॥

जे मी मारिता हे कौरव मरते । ऐसेनि वेंटाळिला होता मोहें बहुतें ।
तो फेडावयालागीं अनंतें । हें दाखविलें निज ॥ ४०७ ॥
कारण, मी अर्जुन मारणारा आणि हे कौरव माझ्या हातून मरणारे, अशा मोठ्या मोहाने तो घेरला होता, ती भुरळ दूर करण्याकरिता श्रीकृष्णाने हे विश्वरूपरूपी आपले खास स्वरूप त्याला दाखविले. ॥११-४०७॥

अरे कोण्ही कोणातें न मारी । एथ मीचि हो सर्व संहारीं ।
हें विश्वरूपव्याजें हरी । प्रकटित असे ॥ ४०८ ॥
'अर्जुना, वास्तविक कोणी कोणाला मारीत नाही. यात मी स्वतःच सर्वांचा नाश करतो.' हे तत्त्व विश्वरूपाच्या निमित्ताने श्रीकृष्ण उघड करून दाखवीत आहे. ॥११-४०८॥

परी वायांचि व्याकुलता । ते न चोजवेचि पंडुसुता ।
मग अहा कंपु नव्हता । वाढवित असे ॥ ४०९ ॥
परंतु ते अर्जुनास न कळल्यामुळे तो व्यर्थ शोकाकुल होऊन नसलेली भीति उगीच वाढवीत आहे. ॥११-४०९॥

वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि ।
केचिद्विलग्ना दशनान्तरेषु संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः ॥ २७ ॥
हे (अगोदर) भयानक व दाढांच्या योगाने (अधिक) भयानक अशा तुझ्या मुखांमध्ये त्वरेने शिरत आहेत. कोणी चूर्ण झालेल्या मस्तकांनी दातांमध्ये अडकलेले दिसतात. ॥११-२७॥

तेथ म्हणे पाहा हो एके वेळे । सासिकवचेंसि दोन्ही दळें ।
वदनीं गेलीं आभाळें । गगनीं कां जैसीं ॥ ४१० ॥
त्या प्रसंगात तो अर्जुन म्हणाला, 'अहो हे पहा. ज्याप्रमाणे ढग आकाशामध्ये नाहीसे व्हावेत त्याप्रमाणे तलवार व चिलखतासह दोन्हीकडील सैन्ये एकाच वेळेला तोंडात गेली आहेत.॥११- ४१०॥

कां महाकल्पाचिया शेवटीं । जैं कृतांतु कोपला होय सृष्टी ।
तैं एकविसांही स्वर्गां मिठी । पाताळासकट दे ॥ ४११ ॥
अथवा महाकल्पांताच्या अखेरीस ज्या वेळेला विश्वावर सर्वनाशक यमाचा रोष होतो, त्या वेळेला पाताळासह एकवीस स्वर्गाना तो ग्रासून टाकतो. ॥११-४११॥

नातरी उदासीनें दैवें । संचकाचीं वैभवें ।
जेथींचीं तेथ स्वभावें । विलया जाती ॥ ४१२ ॥
अथवा, प्रतिकूल देवाच्या योगाने कृपणाचे ठेवे सहजच जसे जेथच्या तेथे नाश पावतात, ॥११-४१२॥

तैसीं सासिन्नलीं सैन्यें एकवटें । इये मुखीं जाहलीं प्रविष्टें ।
परी एकही तोंडौनि न सुटे । कैसें कर्म देखा ॥ ४१३ ॥
त्याप्रमाणे एकत्र झालेली सैन्ये या तोंडामध्ये एकदम शिरली आहेत. परंतु कसे कर्म विपरीत आहे पहा की, त्यापैकी एक देखील तोंडाच्या सपाट्यातून सुटत नाही ! ॥११-४१३॥

अशोकाचे अंगवसे । चघळिले कर्‍हेनि जैसे ।
लोक वक्त्रामाजीं तैसे । वायां गेले ॥ ४१४ ॥
ज्याप्रमाणे उंटाने अशोक झाडाचे ढगळे चघळावेत, त्याप्रमाणे हे लोक तोंडामध्ये वाया गेलेले आहेत. ॥११-४१४॥



[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



परि सिसाळें मुकुटेंसीं । पडिली दाढांचे सांडसीं ।
पीठ होत कैसीं । दिसत आहाती ॥ ४१५ ॥
परंतु मुकुटासुद्धा मस्तके दाढांच्या चिमट्यात पडलेली कशी पीठ होतांना दिसत आहेत. ॥११-४१५॥

तियें रत्‍नें दांतांचिये सवडीं । कूट लागलें जिभेच्या बुडीं ।
कांहीं कांहीं आगरडीं । द्रंष्ट्रांचीं माखलीं ॥ ४१६ ॥
मुकुटांवरील काही रत्ने दातांच्या फटीत सांपडली आहेत; कित्येक रत्नांचे झालेले पीठ, जिभेच्या बुडास लागले असून कांही कांही दाढांचे अग्रभागहि त्या पिठाने माखून गेले आहेत. ॥११-४१६॥

हो कां जे विश्वरूपें काळें । ग्रासिलीं लोकांचीं शरीरें बळें ।
परि जीवित्व देहींचीं सिसाळें । अवश्य कीं राखिलीं ॥ ४१७ ॥
अथवा ज्याप्रमाणे विश्वरूपी काळाने लोकांची शरीरे व बळे जरी गासली तरी जीवांचे देहाचे उत्तम भाग जी लोकांची मस्तेके ती अवश्य राखली. ॥११-४१७॥

तैसीं शरीरामाजीं चोखडीं । इयें उत्तमांगें होतीं फुडीं ।
म्हणौनि महाकाळाचियाही तोंडीं । परि उरलीं शेखीं ॥ ४१८ ॥
त्याप्रमाणे मस्तके निश्चयेकरून शरीराचे उत्तम भाग होती, म्हणून ती महाकालाच्या (विश्वरूपी काळाच्या) तोंडात जरी गेली तरी पण शेवटी उरली. म्हणजे विश्वरूपी महाकालाच्याही तोंडात नाश पावली नाहीत. ॥११-४१८॥

मग म्हणे हें काई । जन्मलयां आन मोहरचि नाहीं ।
जग आपैसेंचि वदनडोहीं । संचारताहे ॥ ४१९ ॥
नंतर अर्जुन म्हाणावयास लागला हे काय ? जन्माला आलेल्या प्राण्याला दुसरी गतीच नाही. सर्व जग आपोआप विश्वरूपाच्या मुखरूपी डोहात जात आहे. ॥११-४१९॥

यया आपेंआप आघविया सृष्टी । लागलिया आहाति वदनाच्या वाटीं ।
आणि हा जेथिंचिया तेथ मिठी । देतसे उगला ॥ ४२० ॥
या सर्वच सृष्ट्या मुखाच्या वाटेस लागल्या असून हे विश्वरूप उगीच जागच्या जागीच त्यास गिळून टाकीत आहे. ॥११-४२०॥

ब्रह्मादिक समस्त । उंचा मुखामाजीं धांवत ।
येर सामान्य हे भरत । ऐलीच वदनीं ॥ ४२१ ॥
ब्रह्मदेव आदिकरून सर्व हे उंच असलेल्या मुखामधे वेगाने जात आहेत आणि बाकीचे जे साधारण प्रतीचे लोक आहेत, ते अलिकडील तोंडातच पडत आहेत. ॥११-४२१॥

आणीकही भूतजात । तें उपजलेचि ठायीं ग्रासित ।
परि याचिया मुखा निभ्रांत । न सुटेचि कांहीं ॥ ४२२ ॥
आणखी देखील जेवढे प्राणी आहेत, तेवढ्या सर्वांस उत्पन्न झालेल्या ठिकाणीच मुख गिळून टाकीत आहे, पण याच्या मुखातून खरोखर काहीच सुटत नाही. ॥११-४२२॥

यथा नदीनाम् बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति ।
तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति ॥ २८ ॥
ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक जलप्रवाह समुद्राकडेच तोंड करून गमन करत असतात, त्याप्रमाणे सर्व बाजूंनी जळत असलेल्या तुझ्या मुखामधे हे नरांमधील वीर प्रवेश करत आहेत. ॥११-२८॥

जैसे महानदीचे वोघ । वहिले ठाकिती समुद्राचें आंग ।
तैसें आघवाचिकडूनि जग । प्रवेशत मुखीं ॥ ४२३ ॥
ज्ञा - ज्याप्रमाणे मोठ्या नद्यांचे प्रवाह मोठ्या वेगाने समुद्रास येऊन मिळतात, त्याप्रमाणे (तितक्या वेगात) सर्व बाजूंनी हे जग त्याच्या मुखात शिरत आहे. ॥११-४२३॥

आयुष्यपंथें प्राणिगणी । करोनि अहोरात्रांची मोवणी ।
वेगें वक्त्रामिळणीं । साधिजत आहाती ॥ ४२४ ॥
आयुष्याच्या मार्गाने रात्रंदिवसाच्या पायर्‍या करून सर्व प्रकारच्या प्राण्यांचे समुदाय त्वरेने मुखात प्रवेश करण्याचे साधीत आहेत. ॥११-४२४॥

यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः ।
तथैव नाशाय विशन्ति लोका स्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः ॥ २९ ॥
अत्यंत वेगाने युक्त होत्साते पतंग ज्याप्रमाणे प्रदीप्त अग्नीमध्ये स्वत:च्या नाशाकरताच प्रवेश करतात, त्याप्रमाणेच हे प्राणी अत्यंत वेगाने युक्त होत्साते (स्वत:च्या) नाशासाठीच तुझ्या मुखांमधे प्रवेश करत आहेत. ॥११-२९॥

जळतया गिरीच्या गवखा- । माजीं घापती पतंगाचिया झाका ।
तैसे समग्र लोक देखा । इये वदनीं पडती ॥ ४२५ ॥
ज्ञा - पेट घेतलेले डोंगरांच्या दरीमधे ज्याप्रमाणे पतंगांचे समुदाय उड्या घालतात त्याप्रमाणे पहा, हे सर्व लोक या तोंडामधे येऊन पडत आहेत. ॥११-४२५॥

परि जेतुलें येथ प्रवेशलें । तें तातलिया लोहें पाणीचि पां गिळिलें ।
वहवटींहि पुसिलें । नामरूप तयांचें ॥ ४२६ ॥
परंतु लोखंड जसे पाण्याला शोषून टाकते, त्याप्रमाणे जेवढे म्हणून प्राणी या मुखात जात आहेत, तेवढ्यांचे वहिवाटीला सुद्धा नामरूप रहात नाही. ॥११-४२६॥

लेलिह्यसे ग्रसमानः समन्ताल्लोकान्समग्रान्वदनैर्ज्वद्भिः ।
तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो ॥ ३० ॥
जळत असणार्‍या मुखांनी सर्व लोकांना सर्व बाजूंनी गिळीत असणारा तू (अतितृप्तीमुळे) जिभा चाटीत आहेस. हे विष्णो, आपल्या तेजाने सर्व जग व्यापून तुझी प्रखर तेजे जगाला ताप देत आहेत. ॥११-३०॥

आणि येतुलाही आरोगण । करितां भुके नाहीं उणेपण ।
कैसें दीपन असाधारण । उदयलें यया ॥ ४२७ ॥
आणि इतकेही खाणे खात असता भूख काहीच कमी होत नाही. याच्या जठराग्नीला कितीतरी विशेष प्रखरता आली आहे. ॥११-४२७॥

जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । का भणगा दुकाळु पाहला ।
तैसा जिभांचा लळलळाटु देखिला । आवाळुवें चाटितां ॥ ४२८ ॥
जसा एखादा रोगी तापातून बरा व्हावा (म्हणजे त्याला खा खा सुटते) अथवा जसे एखाद्या भिकारी मनुष्याला दुष्काळ संपून सुकाळ आला म्हणजे खा खा सुटते, त्याप्रमाणे ओष्ठप्रांत चाटतांना जिभेची हलण्याची गडबड दिसते. ॥११-४२८॥

तैसें आहाराचे नांवें कांहीं । तोंडापासूनि उरलेंचि नाहीं ।
कैसी समसमीत नवाई । भुकेलेपणाची ॥ ४२९ ॥
ज्ञा - तसेच खाण्याचा जेवढा म्हणून पदार्थ आहे त्यापैकी तुझ्या तोंडापासून कशाचाच बचाव झाला नाही. खरमरित भूक लागलेल्या स्थितीची ही कशी अपूर्वता आहे ? ॥११-४२९॥

काय सागराचा घोंटु भरावा ? । कीं पर्वताचा घांसु करावा ? ।
ब्रह्मकटाहो घालावा । आघवाचि दाढे ॥ ४३० ॥
सर्व समुद्रच पिऊन टाकावा की काय किंवा पर्वतच गट्ट करावा की काय अथवा हे संपूर्ण विश्वच दाढेखाली घालावे की काय ॥११-४३०॥

दिशा सगळियाचि गिळाविया । चांदणिया चाटूनि घ्याविया ।
ऐसें वर्तत आहे साविया । लोलुप्य बा तुझें ॥ ४३१ ॥
सगळ्या दिशाच गिळून टाकाव्या अथवा चांदण्या चाटून पुसून घ्याव्यात, अशी ही देवा तुला साहाजिकच हाव दिसत आहे. ॥११-४३१॥

जैसा भोगीं कामु वाढे । कां इंधनें आगीसि हाकाक चढे ।
तैसी खातखातांचि तोंडें । खाखांतें ठेलीं ॥ ४३२ ॥
ज्याप्रमाणे विषयभोगाने भोगण्याची इच्छा वाढते, अथवा सर्पणाने अग्नीची खा खा होते, त्याप्रमाणे तुझी तोंडे सारखी खात असतानाही पुन्हा मुन्हा खा खा करीतच राहिली आहेत. ॥११-४३२॥

कैसें एकचि केवढें पसरलें । त्रिभुवन जिव्हाग्रीं आहे टेकलें ।
जैसें कां कवीठ घातलें । वडवानळीं ॥ ४३३ ॥
एकच तोंड पण कसे व केवढे पसरले आहे ? ज्याप्रमाणे वडवानळामधे कवठ घालावे त्याप्रमाणे हे तिन्ही लोक तुझ्या जिभेच्या टोकालाच लागलेले दिसतात. ॥११-४३३॥

ऐसीं अपार वदनें । आतां येतुलीं कैंचीं त्रिभुवनें ।
कां आहारु न मिळतां येणें मानें । वाढविलीं सैंघ ॥ ४३४ ॥
(एक तोंडाची अशी वाट झाली) अशी (आपल्या विश्वरूपात) असंख्य तोंडे आहेत. आता इतक्या मुखांना इतकी त्रिभुवने कोठली ? तेव्हा (ज्याच्या तेजाचा ताप) सहन करणे अशक्य आहे अशा तू त्यांना खायला न मिळता ती इतकी कशाला वाढवलीस ? ॥११-४३४॥

अगा हा लोकु बापुडा । जाहला वदनज्वाळां वरपडा ।
जैसी वणवेयाचिया वेढां । सांपडती मृगें ॥ ४३५ ॥
अहो, बिचारे जगत तुझ्या तोंडातून निघणार्‍या ज्वाळांच्या भडक्यात सापडले आहे. ज्याप्रमाणे वणव्याच्या वेढ्यात जनावरे सापडावीत ॥११-४३५॥

आतां तैसें यां विश्वा जाहालें । देव नव्हे हें कर्म आलें ।
कां जग चळचळां पांगिलें । काळजाळें ॥ ४३६ ॥
आता त्याप्रमाणे जगाला झाले आहे. हा (तारणारा) देव नाही तर हे सर्वांचे अनिष्ट कर्मच विश्वरूपाने ओढवले आहे. अथवा जगद्रूपी जलचरांना (विश्वरूप) हे काळरूपी जाळेच पसरले आहे. ॥११-४३६॥

आतां इये अंगप्रभेचिये वागुरे । कोणीकडूनि निगिजैल चराचरें ।
हीं वक्त्रें नोहेती जोहारें । वोडवलीं जगा ॥ ४३७ ॥
आता ह्या विश्वरूपाच्या शरीराचे तेज हेच कोणी एक (पारध्याचे) जाळे आहे. त्यातून स्थावरजंगमाला कोणत्या बाजूने निसटून जाता येईल ? (मला वाटते) ही तोंडे नाहीत तर ती पेटलेली लाखेची घरेच जगाला प्राप्त झाली आहेत. ॥११-४३७॥

आगी आपुलेनि दाहकपणें । कैसेनि पोळिजे तें नेणे ।
परी जया लागे तया प्राणें । सुटिकाची नाहीं ॥ ४३८ ॥
आपल्या आगीने आपण दुसर्‍याला कसे पोळतो हे अग्नीस जरी कळत नाही तथापि ज्याला अग्नीची आग लागते त्याचे प्राण वाचत नाहीत. ॥११-४३८॥

नातरी माझेनि तिखटपणें । कैसें निवटे हें शस्त्र कायि जाणें ।
कां आपुलियां मारा नेणें । विष जैसें ॥ ४३९ ॥
किंवा आपल्या तीक्ष्णपणाने (दुसर्‍याचा) कसा घात होतो हे हत्यार काय जाणते का ? किंवा ज्याप्रमाणे विषास आपण किती प्राणघातक आहोत याची खबरही नसते ॥११-४३९॥

तैसी तुज कांहीं । आपुलिया उग्रपणाची सेचि नाहीं ।
परी ऐलीकडिले मुखीं खाई । हो सरली जगाची ॥ ४४० ॥
त्याप्रमाणे तुला आपल्या स्वत:च्या उग्रपणाची बिलकूल आठवणच नाही. पण इकडे अलिकडल्या तोंडात सर्व जगाचा नाश होऊन राहिला आहे. ॥११-४४०॥

अगा आत्मा तूं एकु । सकळ विश्वव्यापकु ।
तरी कां आम्हां अंतकु । तैसा वोडवलासी ? ॥ ४४१ ॥
देवा, तू सर्व जगाला व्यापून असणारा जर एकच आत्मा आहेस, तर मग आम्हाला प्राण घेणार्‍या यमाप्रमाणे का झाला आहेस ? ॥११-४४१॥

तरी मियां सांडिली जीवित्वाची चाड । आणि तुवांही न धरावी भीड ।
मनीं आहे तें उघड । बोल पां सुखें ॥ ४४२ ॥
मी तर आपल्या जगण्याची आशाच सोडली आहे आणि तूही काही भीडभाड धरू नकोस. तुझ्या मनात जे काय आहे ते खुशाल स्पष्टपणे सांगून टाक. ॥११-४४२॥

किती वाढविसी या उग्ररूपा । आंगींचें भगवंतपण आठवीं बापा ।
नाहीं तरी कृपा । मजपुरती पाही ॥ ४४३ ॥
या उग्र रूपाला तू किती वाढवीत आहेस ? देवा, आपल्या स्वत:च्या अंगी असलेले भगवंतपण (पालन करण्याचा स्वभाव) आठव, नाही तर (तसे करण्याचे आपल्या मनात नसेल तर) माझ्यापुरती तरी कृपा कर. ॥११-४४३॥

आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद ।
विज्ञातुमिच्छामिभवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् ॥ ३१ ॥
हे उग्र रूप धारण केलेला तू कोण आहेस मला सांग. हे देवश्रेष्ठा मी तुला नमस्कार करतो. माझ्यावर अनुग्रह कर. अगोदर मी तुला पूर्णत्वाने जाणण्याची इच्छा करीत आहे, कारण तुझी ही प्रवृत्ति मला समजत नाही. ॥११-३१॥

तरी एक वेळ वेदवेद्या । जी त्रिभुवनैक आद्या ।
विनवणी विश्ववंद्या । आइकें माझी ॥ ४४४ ॥
परंतु वेदाकडून जाणले जाणार्‍या, त्रैलोक्याच्या मूळकारणा व सर्व जगाला नमस्कार करण्यास योग्य अशा हे श्रीकृष्णा, एक वेळ माझी विनंती ऐक. ॥११-४४४॥

ऐसें बोलोनि वीरें । चरण नमस्कारिलें शिरें ।
मग म्हणें तरी सर्वेश्वरें । अवधारिजो ॥ ४४५ ॥
ज्ञा - त्या शूर अर्जुनाने याप्रमाणे बोलून आपल्या मस्तकाने प्रभूच्या चरणास वंदन केले व मग म्हणाला, हे जगत्प्रभो श्रीकृष्णा आपण ऐकावे. ॥११-४४५॥

मियां होआवया समाधान । जी पुसिलें विश्वरूपध्यान ।
आणि एकेंचि काळें त्रिभुवन । गिळितुचि उठिलासी ॥ ४४६ ॥
माझे समाधान व्हावे म्हणून मी विश्वरूपाचे ध्यान विचारले आणि इतक्यात एकदम तू सर्व त्रैलोक्यसंहारच करीत सुटलास. ॥११-४४६॥

तरी तूं कोण कां येतुलीं । इयें भ्यासुरें मुखें कां मेळविलीं ।
आघवियाचि करीं परिजिलीं । शस्त्रें कांह्या ॥ ४४७ ॥
तेव्हा तू आहेस तरी कोण ? व इतकी ही भयंकर तोंडे कशाकरता तयार केली आहेस ? व या सर्वच हातात शस्त्रे कशाकरता धारण केली आहेस ? ॥११-४४७॥

जी जंव तंव रागीटपणें । वाढोनि गगना आणितोसि उणें ।
कां डोळे करूनि भिंगुळवाणे । भेडसावीत आहासी ॥ ४४८ ॥
जेव्हा तेव्हा रागीटपणे अधिक वाढून आकाशालाही कमीपणा आणीत आहेस. तू डोळे भयंकर वटारून आम्हाला भीती काय म्हणून दाखवीत आहेस ? ॥११-४४८॥

एथ कृतांतेंसि देवा । कासया किजतसे हेवा ।
हा आपुला तुवां सांगावा । अभिप्राय मज ॥ ४४९ ॥
देवा येथे सर्वनाश करणार्‍या काळाबरोबर स्पर्धा काय म्हणून केली जात आहे ? या करण्यात तुझा अभिप्राय काय आहे ? तो तू मला सांगावास. ॥११-४४९॥

या बोला म्हणे अनंतु । मी कोण हें आहासी पुसतु ।
आणि कायिसयालागीं असे वाढतु । उग्रतेसी ॥ ४५० ॥
अर्जुनाच्या या भाषणावर श्रीकृष्ण म्हणाले, मी कोण आहे आणि एवढ्या उग्रतेने कशाकरता वाढत आहे हेच तू विचारीत आहेस ना? ॥११-४५०॥

श्रीभगवानुवाच
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ॥
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥ ३२ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, लोकांचा संहार करणारा व त्यासाठी वृद्धि पावलेला मी काळ आहे. येथे मी लोकांचा संहार करण्यासाठी प्रवृत्त झालो आहे. तुझ्याकखेरीज दोन्ही पक्षांच्या प्रत्येक समुदायामध्ये जे योद्धे आहेत ते सर्व नाहीसे होतील ॥११-३२॥

तरी मी काळु गा हें फुडें । लोक संहारावयालागीं वाढें ।
सैंघ पसरिलीं आहातीं तोंडें । आतां ग्रासीन हें आघवें ॥ ४५१ ॥
ज्ञा - तर अरे मी काल आहे, हे पक्के समज. मी जगाचा नाश करण्याकरता मोठा होत आहे. माझी तोंडे चहूकडे पसरली आहेत व मी त्या तोंडांनी हे सर्व विश्व आता गिळून टाकीन. ॥११-४५१॥

एथ अर्जुन म्हणे कटकटा । उबगिलों मागिल्या संकटा ।
म्हणौनि आळविला तंव वोखटा । उवाइला हा ॥ ४५२ ॥
असे ऐकून अर्जुन म्हणाला हाय हाय, (हे सर्व सैन्यच्या सैन्यच विश्वरूपाच्या उग्र तोंडात जात आहे. अशा) या पहिल्या संकटाने मी त्रासलो म्हणून श्रीकृष्णाची प्रार्थना केली, त्यावर तो हा श्रीकृष्ण परमात्मा अनिष्ट रूपाने प्रगट झाला. ॥११-४५२॥

तेवींचि कठिण बोलें आसतुटी । अर्जुन होईल हिंपुटी ।
म्हणौनि सवेंचि म्हणे किरीटी । परि आन एक असे ॥ ४५३ ॥
त्यावर कठिण बोलण्याने अर्जुन निराश व कष्टी होईल म्हणून लागलीच श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, पण यात दुसरी आणखी एक गोष्ट आहे. ॥११-४५३॥

तरी आतांचिये संहारवाहरे । तुम्हीं पांडव असा बाहिरे ।
तेथ जातजातां धनुर्धरें । सांवरिले प्राण ॥ ४५४ ॥
तर आताच्या या संहाररूपी संकटाबाहेर फक्त तुम्ही पांडव अहात. असे भागवंत बोलले, त्या वेळी अर्जुनाने जाण्याच्या बेतात आलेले आपले प्राण सावरून धरले. ॥११-४५४॥

होता मरणमहामारीं गेला । तो मागुता सावधु जाहला ।
मग लागला बोला । चित्त देऊं ॥ ४५५ ॥
अर्जुन मरणरूप महामारीत सापडला होता. तो पुन्हा सावध होऊन श्रीकृष्णाच्या बोलण्याकदे लक्ष देऊ लागला. ॥११-४५५॥

ऐसें म्हणिजत आहे देवें । अर्जुना तुम्ही माझें हें जाणावें ।
येर जाण मी आघवें । सरलों ग्रासूं ॥ ४५६ ॥
अर्जुना, तुम्ही पांडव तेवढे माझे असल्यामुळे तुमच्या वाचून बाकी इतर सर्वांचा ग्रास करण्याला मी तयार झालो आहे. असे तू पक्के समज, असे देव त्यावेळी म्हणाले. ॥११-४५६॥

वज्रानळीं प्रचंडीं । जैसी घापे लोणियाची उंडी ।
तैसें जग हें माझिया तोंडीं । तुवां देखिलें जें ॥ ४५७ ॥
विजेच्या प्रचंड अग्नीमधे ज्याप्रमाणे लोण्याचा गोळा घालावा, त्याप्रमाणे हे जग तू माझ्या तोंडामधे हे पाहिलेस ॥११-४५७॥

तरी तयामाझारीं कांहीं । भरंवसेनि उणें नाहीं ।
इये वायांचि सैन्यें पाहीं । वल्गिजत आहाती ॥ ४५८ ॥
तर त्यामधे खात्रीपूर्वक काहीच शिल्लक रहाणार नाही. हे पहा या सैन्याकडून व्यर्थ बडबड केली जात आहे. ॥११-४५८॥

ऐसा चतुरंगाचिया संपदा । करित महाकाळेंसीं स्पर्धा ।
वांटिवेचिया मदा । वळंघले जे ॥ ४५९ ॥
हे जे सैन्याचे समुदाय जमवून शौर्यवृत्तीच्या बळाने गुरगुरत आहेत व हत्तींचे थवे आपली सैन्ये यमाच्या वरचढ आहेत असे त्यांचे जे वर्णन करीत आहेत ॥११-४५९॥

हे जे मिळोनियां मेळे । कुंथती वीरवृत्तीचेनि बळें ।
यमावरी गजदळें । वाखाणिजताती ॥ ४६० ॥
ती म्हणतात (ती सैन्ये अशी वल्गना करतात) की आम्ही प्रतिसृष्टी करू. शपथ वाहून (प्रतिज्ञेने मृत्यूला मारू आणि या विश्वाचा घोट भरू. ॥११-४६०॥

म्हणती सृष्टीवरी सृष्टी करूं । आण वाहूनि मृत्यूतें मारूं ।
आणि जगाचा भरूं । घोंटु यया ॥ ४६१ ॥
आम्ही ही सर्वच पृथ्वी गिळू व हे आकाश वरच्यावरच पेटवून भस्म करू, इतकेच काय, एवढ चंचल वारा, पण त्यास देखील आम्ही आपल्या बाणाने जागचे जागी जखडून टाकू. ॥११-४६१॥

पृथ्वी सगळीचि गिळूं । आकाश वरिच्यावरी जाळूं ।
कां बाणवरी खिळूं । वारयातें ॥ ४६२ ॥
पराक्रमाच्या मदावर स्वार झालेले जे सैनिक आहेत ते अशा या चतुरंगरूप संपत्तीच्या साह्याने महाकाळाबरोबर स्पर्धा करतात. ॥११-४६२॥

बोल हतियेराहूनि तिखट । दिसती अग्निपरिस दासट ।
मारकपणें काळकूट । महुर म्हणत ॥ ४६३ ॥
त्यांचे शब्द शस्त्रापेक्षा तीक्ष्ण व अग्नीपेक्षा दाहक आहेत असे वाटतात आणि या शब्दांच्या मारकपणाची काळकूट विषाशी तुलना केली तर काळकूट विषाला मधुर म्हणावे लागेल. ॥११-४६३॥

तरी हे गंधर्वनगरींचे उमाळे । जाण पोकळीचे पेंडवळें ।
अगा चित्रीव फळें । वीर हे देखें ॥ ४६४ ॥
(अशी जरी ते गर्वाने वल्गना करीत आहेत) तरी हे गंधर्वनगरीचे लोटच आहेत, किंवा पोकळीचे भेंडोळे आहेत, अथवा जशी चित्रांची रंगीत पोकळ फळे करतात त्याप्रमाणे हे वीर आहेत असे समज. ॥११-४६४॥

हां गा मृगजळाचा पूर आला । दळ नव्हे कापडाचा साप केला ।
इया शृंगारूनियां खाला । मांडिलिया पैं ॥ ४६५ ॥
हा सैन्य समुदाय म्हणजे मृगजळाचा पूर आलेला आहे. हे सैन्य नव्हे, तर कापडाचा साप केलेला आहे, अथवा हे सजवून मांडलेले भोत आहे. ॥११-४६५॥

तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून्भुंक्ष्व राज्यं समृद्धम् ।
मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥ ३३ ॥
म्हणून तू युद्धाला उभा रहा. यश संपादन कर. शत्रूंना जिंकून समृद्धियुक्त अशा राज्याचा उपभोग घे. हे सर्व मी पूर्वीच मारून टाकलेले आहेत. हे सव्यसाचिन् (तू) केवल निमित्तमात्र हो. ॥११-३३॥

येर चेष्टवितें जें बळ । तें मागांचि मियां ग्रासिलें सकळ ।
आतां कोल्हारिचे वेताळ । तैसे निर्जीव हे आहाती ॥ ४६६ ॥
(यांच्या बाह्य स्वरूपा) शिवाय ज्या सामर्थ्याने ते हालचाल करतात ते सर्व सामर्थ्य मी मागेच नाहीसे केले आहे. आता हे सर्व वीर मातीच्या चित्रातील वेताळासारखे जिवंत आहेत. ॥११-४६६॥

हालविती दोरी तुटली । तरी तियें खांबावरील बाहुलीं ।
भलतेणें लोटिलीं । उलथोनि पडती ॥ ४६७ ॥
खांबावरल्या बाहुल्यांना हालवणारी दोरी तुटली म्हणजे हवे त्याने त्या बाहुल्यास ढकलले असता त्या उलथून पडतात. ॥११-४६७॥

तैसा सैन्याचा यया बगा । मोडतां वेळू न लगेल पैं गा ।
म्हणौनि उठीं उठीं वेगां । शाहाणा होईं ॥ ४६८ ॥
ज्ञा - त्याप्रमाणे सैन्याचा हा आकार नाहीसा करण्याला काहीच वेळ लागणार नाही. एवढ्याकरता अर्जुना, शहाणा हो आणि लवकर उठ पाहू. ॥११-४६८॥

तुवां गोग्रहणाचेनि अवसरें । घातलें मोहनास्त्र एकसरें ।
मग विराटाचेनि महाभेडें उत्तरें । आसडूनि नागविलें ॥ ४६९ ॥
विराटराजाच्या गाई हरण करण्यास जेव्हा हे कौरव मत्स्यदेशात आले होते त्यावेळेस सरसकट सर्वांनाच तू मोहनास्त्र घातलेस, म्हणून विराटाच्या अतिशय भित्र्या अशा उत्तर नावाच्या मुलाने सुद्धा जशी सर्वांची वस्त्रे हिसकावून त्यांना नग्न केले ॥११-४६९॥

आतां हें त्याहूनि निपटारें जहालें । निवटीं आयितें रण पडिलें ।
घेईं यश रिपु जिंतिले । एकलेनि अर्जुनें ॥ ४७० ॥
आता हे त्यापेक्षाही तेजोहीन झालेले आहेत व आयता युद्धाचा प्रसंग आलेला आहे, तर तू त्यास मार व एकट्या अर्जुनाने शत्रू जिंकले असे यश मिळव. ॥११-४७०॥

आणि कोरडें यशचि नोहे । समग्र राज्यही आलें आहे ।
तूं निमित्तमात्रचि होयें । सव्यसाची ॥ ४७१ ॥
आणि यात केवळ रिकामे यशच मिळाणार आहे असे नाही तर संपूर्ण राज्य देखील त्यात आलेले आहे. अर्जुना, तू केवळ नावाला मात्र कारण हो. ॥११-४७१॥

द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णां तथान्यानपि योधवीरान् ।
मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्‍ना।न् ॥ ३४ ॥
द्रोण, भीष्म, जयद्रथ, कर्ण तसेच इतरही युद्धातले वीर मी मारलेले आहेत. त्यांना तू ठार कर. भिऊ नको. युद्ध कर. प्रतिपक्षीयांना तू जिंकशील. ॥११-३४॥

द्रोणाचा पाडु न करीं । भीष्माचें भय न धरीं ।
कैसेनि कर्णावरी । परजूं हें न म्हण ॥ ४७२ ॥
ज्ञा - द्रोणाची पर्वा करू नकोस. भीष्मांचे भय धरू नकोस. व कर्णावर शस्त्र कसे चालवू असे म्हणू नकोस. ॥११-४७२॥

कोण उपायो जयद्रथा कीजे । हें न चिंतूं चित्त तुझें ।
आणिकही आथि जे जे । नावाणिगे वीर ॥ ४७३ ॥
जयद्रथाकरता काय उपाय करावा, याविषयी तुझ्या बुद्धीला विचार करण्याचे काही कारण नाही. आणखी वरीलप्रमाणे जे नावाजलेले वीर आहेत ॥११-४७३॥

तेही एक एक आघवें । चित्रींचे सिंहाडे मानावे ।
जैसे वोलेनि हातें घ्यावें । पुसोनियां ॥ ४७४ ॥
ते देखील एक एक पाहिले तर सर्वच भिंतीवर काढलेल्या सिंहाच्या चित्रासारखे ओल्या हाताने पुसून घेण्यास योग्य आहेत असे समज. ॥११-४७४॥

यावरी पांडवा । काइसा युद्धाचा मेळावा ? ।
हा आभासु गा आघवा । येर ग्रासिलें मियां ॥ ४७५ ॥
अर्जुना, अशी वास्तविक स्थिती असतांना युद्धाचा समुदाय तो काय उरला आहे ? हा सर्व नुसता आभास पोकळ देखावा आहे. बाकी (बाहेरील देखाव्याशिवाय इतर बल, तेज वगैरे) सर्व मी नाहीसे केले आहे. ॥११-४७५॥

जेव्हां तुवां देखिले । हे माझिया वदनीं पडिले ।
तेव्हांचि यांचें आयुष्य सरलें । आतां रितीं सोपें ॥ ४७६ ॥
ज्यावेळेला तू हे सैनिक माझ्या तोंडात पडत असतांना पाहिलेस, त्याच वेळेला या सर्वांचे आयुष्य संपले असे समज. आत हे पोकळ सोपटाप्रमाणे राहिले आहेत. ॥११-४७६॥

म्हणौनि वहिला उठीं । मियां मारिले तूं निवटीं ।
न रिगे शोकसंकटीं । नाथिलिया ॥ ४७७ ॥
म्हणून लवकर उठ. मी यास आतून मारले आहे व तू यास बाहेरून मार. आणि नसत्या मिथ्या शोकसंकटात पडू नकोस. ॥११-४७७॥

आपणचि आडखिळा कीजे । तो कौतुकें जैसा विंधोनि पाडिजे ।
तैसें देखें गा तुझें । निमित्त आहे ॥ ४७८ ॥
आपणच निशाण उभे करावे व आपणच त्यास कौतुकाने बाण मारून ते खाली पाडावे (यात जसे बाण हे निमित्तमात्र आहेत त्याप्रमाणे या सर्वास मीच उत्पन्न केले व मीच मारले आहे) त्या बाणांप्रमाणे यात तू केवळ निमित्त आहेस असे समज, ॥११-४७८॥

बापा विरुद्ध जें जाहलें । तें उपजतांचि वाघें नेलें ।
आतां राज्येंशीं संचलें । यश तूं भोगीं ॥ ४७९ ॥
बाबा अर्जुना, तुझ्या हिताला विरुद्ध असे जे काही एक उत्पन्न झालेले होते ते उत्पन्न होताक्षणीच वाघाने नेले. (उत्पन्न झाल्याबरोबरच ते नाहीसे झाले). आता (वाटेतील काटा आयताच निघाल्यामुळे) तुला मिळालेल्या राज्यासह यश तू भोग. ॥११-४७९॥

सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगीं दुर्मद ।
ते वधिले विशद । सायासु न लागतां ॥ ४८० ॥
तुझे भाऊबंद स्वभावत:च गर्वाने फुगून गेले होते व जगामधे ते बलवान व मदोन्मत्त झाले होते. त्यास मुळीच आयास न लागता तू साफ नाहीसे केलेस. ॥११-४८०॥

ऐसिया इया गोष्टी । विश्वाच्या वाक्‌पटीं ।
लिहूनि घाली किरीटी । जगामाजीं ॥ ४८१ ॥
अर्जुना, या जगामधे अशा या सर्व गोष्टी सर्व जगताच्या वाचारूपी पटावर लिहून ठेव. ॥११-४८१॥

संजय उवाच
एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी ॥
नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गजदं भीतभीतः प्रणम्य ॥ ३५ ॥
संजय म्हणाला, श्रीकृष्णाचे हे भाषण ऐकून भयाने कापत असलेला व हात जोडलेला अर्जुन भयभीत होत्साता साष्टांग नमस्कार घालून पुन्हा श्रीकृष्णाला सगद्गदित वाणीने म्हणाला ॥११-३५॥

ऐसी आघवीचि हे कथा । तया अपूर्ण मनोरथा ।
संजयो सांगे कुरुनाथा । ज्ञानदेवो म्हणे ॥ ४८२ ॥
ज्ञा - ज्ञानेश्वर महाराज म्हणतात याप्रमाणे ही सर्व हकिकत त्या मनोरथ पूर्ण न झालेल्या कुरुदेशाच्या राजाला धृतराष्ट्राला संजय सांगत आहे. ॥११-४८२॥

मग सत्यलोकौनि गंगाजळ । सुटलिया वाजत खळाळ ।
तैशी वाचा विशाळ । बोलतां तया ॥ ४८३ ॥
मग ज्या प्रमाणे गंगेचे पाणी सत्यलोकापासून सुटले असता सारखे खळखळ वाजत चालते, त्याप्रमाणे तो श्रीकृष्ण बोलत असता गंभीर वाणीचा ओघ खळखळाटाने चालला होता ॥११-४८३॥

नातरी महामेघांचे उमाळे । घडघडीत एके वेळे ।
कां घुमघुमिला मंदराचळें । क्षीराब्धी जैसा ॥ ४८४ ॥
अथवा मोठमोठ्या मेघांचे लोट एकाच वेळेला उठले असता जसा गडगडाट व्हावा किंवा मंदर नावाच्या पर्वताने क्षीरसमुद्रामधे ज्याप्रमाणे मंथनाचा एकसारखा घुमावा ॥११-४८४॥

तैसें गंभीरें महानादें । हें वाक्य विश्वकंदें ।
बोलिलें अगाधें । अनंतरूपें ॥ ४८५ ॥
त्याप्रमाणे अगाध व अनंतरूपधारी, विश्वाचे कारण असलेल्या श्रीकृष्णाने गंभीर अशा मोठ्या शब्दाने भाषण केले. ॥११-४८५॥

तें अर्जुनें मोटकें ऐकिलें । आणि सुख कीं भय दुणावलें ।
हें नेणों परि कांपिन्नलें । सर्वांग तयाचें ॥ ४८६ ॥
ते अर्जुनाने थोडेसे ऐकले नाही, तोच सुखाचा म्हणा की भीतीचा म्हणा, दुप्पट जोर झाला, कशाचा हे आम्हास माहीत नाही, परंतु एवढे खरे की त्यामुळे त्याचे सर्व शरीर थरथर कापावयास लागले. ॥११-४८६॥

सखोलपणें वळली मोट । आणि तैसेचि जोडले करसंपुट ।
वेळोवेळां ललाट । चरणीं ठेवी ॥ ४८७ ॥
त्यास झालेले सुख अथवा भय थेट हृदयापर्यंत जाऊन भिडल्यामुळे तो आपल्या पायापर्यंत लवला आणि त्याच सपाट्यात कसे तरी करून त्याने हात जोडले आणि तो आपले मस्तक पुन्हा पुन्हा प्रभूच्या पायावर ठेऊ लागला. ॥११-४८७॥

तेवींचि कांहीं बोलों जाये । तंव गळा बुजालाचि ठाये ।
हें सुख कीं भय होये । हें विचारा तुम्हीं ॥ ४८८ ॥
याचप्रमाणे काही बोलण्याचा प्रयत्न करावा तो त्याचा कंठ भरून राही, हे सुख झाल्याचे लक्षण आहे की भीतीचे आहे याचा तुम्ही आपल्या मनातच विचार करून निर्णय घ्यावा. (असे ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना सांगतात). ॥११-४८८॥

परि तेव्हां देवाचेनि बोलें । अर्जुना हें ऐसें जाहलें ।
मियां पदांवरूनि देखिलें । श्लोकींचिया ॥ ४८९ ॥
परंतु त्यावेळी देवाने केलेले भाषण ऐकून अर्जुनाची ही अशी स्थिती झाली, हे श्लोकाच्या वरील (भीतभीत: प्रणम्य) या पदावरून जाणले. ॥११-४८९॥

मग तैसाचि भेणभेण । पुढती जोहारूनि चरण ।
मग म्हणे जी आपण । ऐसें बोलिलेती ॥ ४९० ॥
मग तसाच भीत भीत पुन्हा श्रीकृष्णाच्या चरणाला नमस्कार करून म्हणाला, महाराज, आपण असे बोललात . ॥११-४९०॥



[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



अर्जुन उवाच
स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च ॥
रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः ॥ ३६ ॥
हे हृषीकेशा, तुझ्या महात्म्याने जग हर्ष व प्रेम पावते हे योग्यच आहे. भयभीत राक्षस दशदिशा पळत आहेत. सर्व सिद्धांचे समुदाय तुला वंदन करत आहेत. ॥११-३६॥

ना तरी अर्जुना मी काळु । आणि ग्रासिजे तो माझा खेळु ।
हा बोलु तुझा कीर अढळु । मानूं आम्ही ॥ ४९१ ॥
ज्ञा - की 'अर्जुना, मी सर्वभक्षक काळ आहे आणि सर्वांचा नाश करणे ही तर माझी लीलाच आहे्', हे जे तुझे बोलणे ते आम्ही खरोखर खरे मानू. ॥११-४९१॥

परि तुवां जी काळें । आजि स्थितीचिये वेळे ।
ग्रासिजे हें न मिळे । विचारासी ॥ ४९२ ॥
परंतु हे परमेश्वरा, आपण जे काळ, त्यांनी आज स्थितिकाली पालन करण्याच्या वेळेसच जगाचा संहार करावा, हे माझ्या विचारांशी जुळत नाही. ॥११-४९२॥

कैसेनि आंगींचें तारुण्य काढावें ? । कैचें नव्हे तें वार्धक्य आणावें ? ।
म्हणौनि करूं म्हणसी तें नव्हे । बहुतकरुनी ॥ ४९३ ॥
शरीरात असलेले तारुण्य कसे नाहीसे करावे व नसलेले म्हातारपण कोठून आणावे ? (या गोष्टी करू म्हटले तर जशा व्हावयाच्या नाहीत त्याप्रमाणे) जरी तू या स्थितिकाली संहार करू म्हणतोस तरी ते बहुतकरून होणार नाही. ॥११-४९३॥

हां जी चौपाहारी न भरतां । कोणेही वेळे श्रीअनंता ।
काय माध्यान्हीं सविता । मावळतु आहे ? ॥ ४९४ ॥
अहो देवा, चार प्रहर दिवस भरला नसताच कोणत्या वेळी सूर्य माध्याह्नी मावळला आहे काय ? ॥११-४९४॥

पैं तुज अखंडिता काळा । तिन्ही आहाती जी वेळा ।
त्या तिन्ही परी सबळा । आपुलालिया समयीं ॥ ४९५ ॥
देवा अखंडित असे जे आपण काळ, त्या आपल्यास तिन्हीही वेळा आपापल्या समयास पूर्ण सामर्थ्यवान आहेत. ॥११-४९५॥

जे वेळीं हों लागे उत्पत्ती । ते वेळीं स्थिति प्रळयो हारपती ।
आणि स्थितिकाळीं न मिरविती । उत्पत्ति प्रळयो ॥ ४९६ ॥
ज्यावेळेस उत्पत्ती व्हावयास लागते, त्यावेळी स्थिती व प्रलय दोन्ही अवस्था नाहीशा होतात आणि स्थितीच्या वेळेस उत्पत्ति व प्रलय या दोन्हीही दिसत नाहीत. ॥११-४९६॥

पाठीं प्रळयाचिये वेळे । उत्पत्ति स्थिति मावळे ।
हें कायसेनही न ढळे । अनादि ऐसें ॥ ४९७ ॥
उत्पत्ती, स्थितीचे मागून येणार्‍या प्रळयाच्या वेळेला उत्पत्ती, स्थिती या दोहोंचा लोप होतो. ही व्यवस्था कशानेही बदलत नाही. असा हा क्रम अनादि कालापासूनचा आहे. ॥११-४९७॥

म्हणौनि आजि तंव भरें भोगें । स्थिति वर्तिजत आहे जगें ।
एथ ग्रसिसी तूं हें न लगे । माझ्या जीवीं ॥ ४९८ ॥
म्हणून तर आज स्थितिकाली जग हे भोगाच्या भरात वागत आहे. म्हणून या स्थितिकाली तू (कालरूप श्रीकृष्ण) त्याचा संहार करशील हे माझ्या मनाला पटत नाही. ॥११-४९८॥

तंव संकेतें देव बोले । अगा या दोन्ही सैन्यांसीचि मरण पुरलें ।
तें प्रत्यक्षचि तुज दाविलें । येर यथाकाळें जाण ॥ ४९९ ॥
तेव्हा खुणेने देव म्हणाले, अरे अर्जुना फक्त या दोन्ही सैन्यांचे आयुष्य संपले हे मी तुला प्रत्यक्ष दाखवले. यांच्याशिवाय इतर सर्व लोक आपापल्या योग्य काळी मरण पावतील ॥११-४९९॥

हा संकेतु जंव अनंता । वेळु लागला बोलतां ।
तंव अर्जुनें लोकु मागुता । देखिला यथास्थिति ॥ ५०० ॥
हा इशारा देण्यास देवाला जितका वेळ लागला तितक्या वेळात अर्जुनाने पुन्हा पूर्वीप्रमाणे सर्व लोक सुखरूप असलेले पाहिले ॥११-५००॥

मग म्हणतसे देवा । तूं सूत्रीं विश्वलाघवा ।
जग आला मा आघवा । पूर्वस्थिति पुढती ॥ ५०१ ॥
मग अर्जुन म्हणावयास लागला, देवा, या विश्वरूपी सोंगाचा तू सूत्रधार आहेस. हे सर्व जग पूर्वस्थितीला आले ना ? ॥११-५०१॥

परी पडिलिया दुःखसागरीं । तूं काढिसी कां जयापरी ।
ते कीर्ति तुझी श्रीहरी । आठवित असे ॥ ५०२ ॥
परंतु (या तुझ्या खेळात) दु:खसागरात पडलेल्या जीवांना तू ज्याप्रकारे बाहेर काढतोस ती तुझी कीर्ती, हे हरि मी आठवीत आहे. ॥११-५०२॥

कीर्ति आठवितां वेळोवेळां । भोगितसें महासुखाचा सोहळा ।
तेथ हर्षामृतकल्लोळा । वरी लोळत आहें ॥ ५०३ ॥
वारंवार आपली कीर्ती आठवीत असतांना आम्ही ब्रह्मसुखाचा सोहळा भोगतो व त्या भोगात हर्षरूप लाटांवर आम्ही लोळत आहोत. ॥११-५०३॥

देवा जियालेपणें जग । धरी तुझ्या ठायीं अनुराग ।
आणि दुष्टां तयां भंग । अधिकाधिक ॥ ५०४ ॥
अहो देवा, जग हे जगल्यामुळे तुझ्या ठिकाणी प्रीती धरीत आहे. आणि त्या दुष्टांना तुझ्यापासून अधिकाधिक नाश आहे. ॥११-५०४॥

पैं त्रिभुवनींचिया राक्षसां । महाभय तूं हृषीकेशा ।
म्हणौनि पळताती दाही दिशां । पैलीकडे ॥ ५०५ ॥
परंतु हे देवा, त्रिभुवनातील राक्षसांना तू महाभय (साक्षात मृत्यूच) आहेस. म्हणून ते भयाने (दहा) दिशांच्या पलीकडे पळून जातात. ॥११-५०५॥

येथ सुर नर सिद्ध किन्नर । किंबहुना चराचर ।
ते तुज देखोनि हर्षनिर्भर । नमस्कारित असती ॥ ५०६ ॥
बाकीचे सुर, सिद्ध, किन्नर फार काय सांगावे, हे स्थावर-जंगमात्मक हे जग आहे, ते सर्व तुला आनंदभरित होऊन नमस्कार करत आहे. ॥११-५०६॥

कस्माच्च ते न नमेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे ।
अनन्त देवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत् ॥ ३७ ॥
हे महात्मन्, अत्यंत महान्, महद्ब्रह्माचा देखील आदिकर्ता जो तू, त्या त्या तुला राक्षस इत्यादि का नमस्कार करत नाहीत ? हे अनंता, देवाधिदेवा, जगन्निवासा, तू अक्षर व सत् व असत् म्हणून जे आहे ते तू आहेस व त्याच्या अतीत जे आहे तेही तू आहेस. ॥११-३७॥

एथ गा कवणा कारणा । राक्षस हे नारायणा ।
न लगतीचि चरणा । पळते जाहले ॥ ५०७ ॥
ज्ञा - हे श्रीकृष्णा, येथे हे राक्षस कोणत्या कारणामुळे तुमच्या चरणाला शरण न येता दूर पळून गेले आहेत ? ॥११-५०७॥

आणि हें काय तूंतें पुसावें । येतुलें आम्हांसिही जाणवे ।
तरी सूर्योदयीं राहावें । कैसेनि तमें ? ॥ ५०८ ॥
आणि हे तुम्हाला तरी काय पुसायवचे आहे ? एवढे तर आमच्याही लक्षात येण्यासारखे आहे. तर हे पहा सूर्य उगवला असता अंधार कसा टिकाव धरणार ? ॥११-५०८॥

जी तूं प्रकाशाचा आगरु । आणि जाहला आम्हासि गोचरू ।
म्हणौनिया निशाचरां केरु । फिटला सहजें ॥ ५०९ ॥
तू आत्मप्रकाशाची खाण आहेस आणि आमच्यापुढे प्रत्यक्ष प्रगट झाला आहेस. म्हणून सहजच राक्षसांची दुर्दशा उडाली आहे. ॥११-५०९॥

हें येतुले दिवस आम्हां । कांहीं नेणवेचि श्रीरामा ।
आतां देखतसों महिमा । गंभीर तुझा ॥ ५१० ॥
इतके दिवस हे श्रीरामा, हे आमच्या काहीच समजण्यात आले नाही. हे तुझे अगाध सामर्थ्य आताच आमच्या नजरेस येत नाहे. ॥११-५१०॥

जेथूनि नाना सृष्टींचिया वोळी । पसरती भूतग्रामाचिया वेली ।
तया महद्ब्रह्मातें व्याली । दैविकी इच्छा ॥ ५११ ॥
ज्या महद्ब्रह्मापासून अनेक सृष्टींच्या पंक्ति व प्राणिमात्रांच्या समुदायरूप वेली उत्पन्न होत असतात, त्या महद्ब्रह्माला प्रभु आपली इच्छा प्रसवली आहे. ॥११-५११॥

देवो निःसीम तत्त्व सदोदितु । देवो निःसीम गुण अनंतु ।
देवो निःसीम साम्य सततु । नरेंद्र देवांचा ॥ ५१२ ॥
देवा, आपण अंतरहित असून आपल्या गुणांची गणती नाही, आपण अमर्याद तत्वरूप असून आपले अस्तित्व त्रिकालाबाधित आहे. आपण अखंड निष्प्रतिबंधपणे सर्वत्र व्याप्त अहात व आपण देवांचे राजे अहात. ॥११-५१२॥

जी तूं त्रिजगतिये वोलावा । अक्षर तूं सदाशिवा ।
तूंचि सदसत् देवा । तयाही अतीत तें तूं ॥ ५१३ ॥
हे नित्यकल्याणरूप देवा, महाराजा, तू त्रैलोक्याला आश्रय आहेस. तू अविनाशी आहेस, देवा, सत् व असत् तूच आहेस व त्या पलिकडे जे तेही तूच आहेस. ॥११-५१३॥

त्वमादिदेवः पुरुषः पुराणस्त्वमस्य विश्वस्य परं निधानम् ।
वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप ॥ ३८ ॥
तू आदिदेव, पुराणपुरुष आहेस. तू या विश्वाचे अखेरीचे स्थान आहेस. (म्हणजे प्रलयकाली विश्व तुझ्यामधे लीन होईल). तू सर्व जाणतोस. जाणण्याला अत्यंत योग्य तू आहेस. अत्यंत श्रेष्ठ असे आश्रयस्थान तू आहेस. हे अनंतरूपा तू हे विश्व विस्तारले आहेस. ॥११-३८॥

तूं प्रकृतिपुरुषांचिया आदी । जी महत्तत्वां तूंचि अवधी ।
स्वयें तूं अनादि । पुरातनु ॥ ५१४ ॥
ज्ञा - देवा, तू प्रकृती व पुरुषाचे मूळ आहेस. महतत्वांचा शेवटही तूच आहेस. तू जन्मरहित आहेस व तू सगळ्यांच्या पूर्वीचा आहेस. ॥११-५१४॥

तूं सकळ विश्वजीवन । जीवांसि तूंचि निधान ।
भूतभविष्याचें ज्ञान । तुझ्याचि हातीं ॥ ५१५ ॥
देवा, तू सर्व जगाचे जीवन आहेस आणि जीवांचा शेवटही तुझ्यातच होतो व भूतभविष्याचे ज्ञान तुझ्याच हाती आहे. ॥११-५१५॥

जी श्रुतीचियां लोचनां । स्वरूपसुख तूंचि अभिन्ना ।
त्रिभुवनाचिया आयतना । आयतन तूं ॥ ५१६ ॥
हे जीवांशी अभिन्न असणार्‍या देवा, श्रुतीच्या नेत्रास (ज्ञानास) गोचर होणारे असे जे स्वरूपसुख ते तू आहेस आणि त्रैलोक्याला आधारभूत जी माया त्या मायेला आधारही तूच आहेस. ॥११-५१६॥

म्हणौनि जी परम । तूंतें म्हणिजे महाधाम ।
कल्पांतीं महद्ब्रह्म । तुजमाजीं रिगे ॥ ५१७ ॥
म्हणून देवा, तुला श्रेष्ठ असे आश्रयस्थान म्हणतात आणि प्रलयकाळच्या शेवटी माया ही तुझ्या स्वरूपी लीन होते. ॥११-५१७॥

किंबहुना तुवां देवें । विश्व विस्तारिलें आहे आघवें ।
तरि अनंतरूपा वानावें । कवणें तूंतें ॥ ५१८ ॥
फार काय सांगावे ? देवा तुझ्याकडून सर्व विश्व विस्तारले गेले आहे. ज्या तुला अनंत रूपे आहेत त्या तुझे वर्णन कोणी करावे ? ॥११-५१८॥

वायुर्यमोग्निर्वरुणः शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च ।
नमो नमस्तेऽस्तुसहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥ ३९ ॥
वायु, यम, अग्नि, वरुण, चंद्र ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचाही पिता तू आहेस. तुला नमस्कार असो. सहस्रवधि नमस्कार असोत. पुन्हा पुन्हा तुला नमस्कार असो. ॥११-३९॥

नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व ।
अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः ॥ ४० ॥
हे सर्वत्र असणार्‍या प्रभो, पुढून, मागून, सर्व बाजूंनी तुला नमस्कार असो. सामर्थ्याला अंत नसलेला व पराक्रमाला इयत्ता नसलेला तू आहेस. तू सर्व व्यापतोस, तस्मात् सर्व तूच आहेस. ॥११-४०॥

जी काय एक तूं नव्हसी । कवणे ठायीं नससी ।
हें असो जैसा आहासी । तैसिया नमो ॥ ५१९ ॥
ज्ञा - देवा, काय काय एक तू नाहीस ? अरे, तू कोणत्या ठिकाणी नाहीस ? हे वर्णन करणे पुरे. तू जसा असशील तशा त्या तुला नमस्कार असो. ॥११-५१९॥

वायु तूं अनंता । यम तूं नियमिता ।
प्राणिगणीं वसता । अग्नि तो तूं ॥ ५२० ॥
हे अनंता तू वायु आहेस व जगाचे शासन करणारा यम तू आहेस. सर्व प्राण्यांच्या समुदायात असणारा जो अग्नी (जठराग्नी) तो तू आहेस. ॥११-५२०॥

वरुण तूं सोम । स्रष्टा तूं ब्रह्म ।
पितामहाचाही परम । आदि जनक तूं ॥ ५२१ ॥
देवा तू वरुण, चंद्र व जगत उत्पन्न करणारा ब्रह्मदेव आहेस व त्या ब्रह्मदेवाचा श्रेष्ठ असा आदिजनक तू आहेस. ॥११-५२१॥

आणिकही जें जें कांहीं । रूप आथि अथवा नाहीं ।
तया नमो तुज तैसयाही । जगन्नाथा ॥ ५२२ ॥
आणि हे जगन्नाथा आणखी जे जे म्हणून काही ज्याला रूप आहे अथवा नाही, ते सर्व तूच आहेस. म्हणून तशा त्या तुला मी नमस्कार करतो. ॥११-५२२॥

ऐसें सानुरागें चित्तें । नमन केलें पंडुसुतें ।
मग पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥ ५२३ ॥
अशा प्रीतियुक्त अंत:करणाने अर्जुनाने भगवंताची स्तुती केली मग पुन्हा प्रभो तुला नमस्कार असो असे दोन वेळा म्हणाला. ॥११-५२३॥

पाठीं तिये साद्यंते । न्याहाळी श्रीमूर्तीतें ।
आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥ ५२४ ॥
पुन्हा त्या श्रीमूर्तीला साद्यंत पाहिली आणि पुन्हा आपणास नमस्कार असो असे दोन वेळा म्हणाला. ॥११-५२४॥

पाहतां पाहतां प्रांतें । समाधान पावे चित्तें ।
आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥ ५२५ ॥
त्या मूर्तीचे एकेक अवयवाचे भाग पहाता पहातांना त्याच्या अंत:करणास समाधान वाटले आणि पुन्हा आपणास नमस्कार असो असे दोन वेळा म्हणाला. ॥११-५२५॥

इये चराचरीं जीं भूतें । सर्वत्र देखे तयांतें ।
आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥ ५२६ ॥
या सर्व स्थावर-जंगमात्मक जगामधे अखंडित जो प्रभु त्याला पाहिले आणि पुन्हा आपणास नमस्कार असो असे दोन वेळा म्हणाला. ॥११-५२६॥

ऐसीं रूपें तियें अद्‌भुतें । आश्चर्यें स्फुरती अनंतें ।
तंव तंव नमस्ते । नमस्तेचि म्हणे ॥ ५२७ ॥
अशी ती अनंत व अद्भुत रूपे जो जो आश्चर्यकारक रीतीने अर्जुनाच्या पुढे प्रगट होत होती, तो तो अर्जुन प्रभो, आपणास नमस्कार असो असे असे म्हणत होता. ॥११-५२७॥

आणिक स्तुतिही नाठवे । आणि निवांतुही न बैसवे ।
नेणें कैसा प्रेमभावें । गाजोंचि लागे ॥ ५२८ ॥
'नमस्ते नमस्ते' याहून दुसरी स्तुती त्याला आठवेना. आणि निवांतपणे रहावे हेही सहन होईना, कशा प्रेमभावाने तो अर्जुन 'नमस्ते नमस्ते' अशीच गर्जना करत होता ते कळत नाही. ॥११-५२८॥

किंबहुना इयापरी । नमन केलें सहस्रवरी ।
कीं पुढती म्हणे श्रीहरी । तुज सन्मुखा नमो ॥ ५२९ ॥
फार काय सांगावे याप्रमाणे अर्जुनाने हजारो नमस्कार केले व पुन्हा म्हणाला हे माझ्यासमोर असणार्‍या हरि, तुला नमस्कार असो. ॥११-५२९॥

देवासि पाठी पोट आथि कीं नाहीं । येणें उपयोगु आम्हां काई ।
तरि तुज पाठिमोरेयाही । नमो स्वामी ॥ ५३० ॥
देवाला पाठ पोट आहे की नाही, याचा विचार करून आम्हाला काय प्रयोजन आहे ? परंतु महाराज, पाठमोरा जो तू. त्या तुला नमस्कार असो. ॥११-५३०॥

उभा माझिये पाठीसीं । म्हणौनि पाठीमोरें म्हणावें तुम्हांसी ।
सन्मुख विन्मुख जगेंसीं । न घडें तुज ॥ ५३१ ॥
माझे पाठीमागे तू उभा आहेस म्हणून मी आपल्यास पाठमोरे असे म्हणतो. परंतु हे परमेश्वरा, जगाशी समोर अथवा पाठमोरे होणे, हे तुझ्या ठिकाणी संभवत नाही. (कारण जगद्रूप तूच आहेस). ॥११-५३१॥

आतां वेगळालिया अवयवां । नेणें रूप करूं देवा ।
म्हणौनि नमो तुज सर्वा । सर्वात्मका ॥ ५३२ ॥
आता वेगवेगळ्या अवयवांचे वर्णन करण्याचे देवा, मला कळत नाही. याकरता सर्व चराचर बनून सर्वांच्या आत आत्मरूपाने तूच आहेस, त्या तुला नमस्कार असो. ॥११-५३२॥

जी अनंतबळसंभ्रमा । तुज नमो अमित विक्रमा ।
सकळकाळीं समा । सर्वरूपा ॥ ५३३ ॥
देवा अनंत बलाच्या आवेशाचे तू ठिकाण आहेस व तुला पराक्रमाला मोजता येत नाही, तू तिन्ही काळी सारखा (एकरूप) असतोस आणि सर्व देवांच्या रूपाने तूच आहेस, त्या तुला नमस्कार असो. ॥११-५३३॥

आघविया आकाशीं जैसें । अवकाशचि होऊनि आकाश असे ।
तूं सर्वपणें तैसें । पातलासि सर्व ॥ ५३४ ॥
ज्याप्रमाणे सर्व पोकळीत आकाश हे पोकळी होऊन असते त्याप्रमाणे तू सर्वांना व्यापून सर्व झाला आहेस. ॥११-५३४॥

किंबहुना केवळ । सर्व हें तूंचि निखिळ ।
परी क्षीरार्णवीं कल्लोळ । पयाचे जैसे ॥ ५३५ ॥
फार काय सांगावे ? हे सर्व त्रिभुवन केवळ तूच आहेस. परंतु क्षीरसागरावर जशा क्षीराच्या लाटा असतात (त्याप्रमाणे त्रिभुवन हे तुझ्या ठिकाणी आहे). ॥११-५३५॥

म्हणौनिया देवा । तूं वेगळा नव्हसी सर्वां ।
हें आलें मज सद्‍भावा । आतां तूंचि सर्व ॥ ५३६ ॥
म्हणून हे देवा, तू या सर्व जगाहून वेगळा नाहीस, हे खरोखर माझ्या अनुभवाला आले आहे. तर आता देवा, सर्व तूच आहेस. ॥११-५३६॥

सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति ।
अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात्प्रणयेन वापि ॥ ४१ ॥
तुझा हा महिमा न जाणणार्‍या मी प्रमादामुळे अथवा प्रेमामुळे मित्र समजून तुच्छतापूर्वक अरे कृष्णा, अरे यादवा, अरे सख्या, इत्यादी जे तुला बोललो ॥११-४१॥

परि ऐसिया तूतें स्वामी । कहींच नेणों जी आम्ही ।
म्हणौनि सोयरे संबंधधर्मीं । राहाटलों तुजसीं ॥ ५३७ ॥
ज्ञा - परंतु तुझा एवढा मोठा महिमा असूनही हे प्रभो, आम्ही तुला केव्हाच जाणले नाही. आणि त्यामुळे आम्ही तुझ्याशी असलेले आप्तसंबंधाचेच नाते लक्षात घेऊन त्या दृष्टीने तुझ्याशी वागणूक ठेवली. ॥११-५३७॥

अहा थोर वाउर जाहलें । अमृतें संमार्जन म्यां केलें ।
वारिकें घेऊनि दिधलें । कामधेनूतें ॥ ५३८ ॥
अरे अरे ही फारच अनुचित गोष्ट झाली. की मी सड्याचे कामी अमृताचा उपयोग केला. आणि लहानसे शिंगरु घेऊन त्याचे मोबदल्यात कामधेनूच देऊन टाकली. ॥११-५३८॥

परिसाचा खडवाचि जोडला । कीं फोडोनि आम्ही गाडोरा घातला ।
कल्पतरू तोडोनि केला । कूंप शेता ॥ ५३९ ॥
तू म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष परीसाचा खडाच लाभला होतास. पण तो फोडून आम्ही त्याचा उपयोग पाया भरण्याच्या कामी केला. अथवा आम्ही कल्पवृक्ष तोडून त्याचे शेत राखण्याकरता कु्ंपण केले. ॥११-५३९॥

चिंतामणीची खाणी लागली । तेणें करें वोढाळें वोल्हांडिली ।
तैसी तुझी जवळिक धाडिली । सांगातीपणें ॥ ५४० ॥
मला तू म्हणजे चिंतामणी नामक रत्नांच्या खाणीचा लाभ झालास, परंतु या रत्नाचा उपयोग ओढाळ गुरांना हाकण्यासाठी केला. याच तर्‍हेने तुझी प्राप्ती झाली असताही ती प्राप्ती तू स्नेही म्हणून व्यर्थ घालवली. ॥११-५४०॥

हें आजिचेंचि पाहें पां रोकडें । कवण झुंज हें केवढें ।
एथ परब्रह्म तूं उघडें । सारथी केलासी ॥ ५४१ ॥
(मागच्या सर्व गोष्टी असू देत) आजचीच प्रत्यक्ष गोष्ट पहा की हे युद्ध कसले व काय किंमतीचे आहे ? पण तू मूर्तिमंत परब्रह्म असताही तुला या युद्धात मी सारथी केले आहे. ॥११-५४१॥

यया कौरवांचिया घरा । शिष्टाई धाडिलासि दातारा ।
ऐसा वणिजेसाठीं जगेश्वरा । विकलासि आम्हीं ॥ ५४२ ॥
हे दातारा, तडजोड करण्याकरता कौरवांच्या घरी आम्ही तुला पाठवले. अशा प्रकारे देवा, तू प्रत्यक्ष जागृत दैवत असूनही तुला आम्ही तडजोडीसारख्या सामान्य व्यवहाराकरता खर्ची घातले. ॥११-५४२॥

तूं योगियांचें समाधिसुख । कैसा जाणेचिना मी मूर्ख ।
उपरोधु जी सन्मुख । तुजसीं करूं ॥ ५४३ ॥
तू योग्यांचे समाधिसुख आहेस. मी कसा मूर्ख की हे मी जाणले नाही व तुझ्या तोंडावर तुला वर्मी लागेल असे भाषण बोलत होतो. ॥११-५४३॥

यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु ।
एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामहमप्रमेयम् ॥ ४२ ॥
आणि क्रीडा, शयन, आसन, (मंडाळीमध्ये बसणे), भोजन इत्यादी प्रसंगी तू एकटा असतांना किंवा (लोकांच्या) देखत तुझा उपहास करण्याकरता जो तुझा अपमान केला त्याबद्दल हे अप्रमेया (ज्याच्या प्रभावाचे अथवा स्वरूपाचे प्रमाण करता येत नाही) अच्युता मला क्षमा कर. ॥११-४२॥

तूं या विश्वाची अनादि आदी । बैससी जिये सभासदीं ।
तेथें सोयरीकीचिया संबंधीं । रळीं बोलों ॥ ५४४ ॥
ज्ञा - या विश्वाचे अनादि मूळ जो तू तो तू ज्या सभासदांमधे बसत होतास, तेथे जे शब्द नातलगांशी बोलत असतांना शोभतील त्या शब्दांनी आम्ही तुझ्याशी विनोद करीत होतो. ॥११-५४४॥

विपायें राउळा येवों । तरि तुझेनि अंगें मानु पावों ।
न मानिसी तरी जावों । रुसोनि सलगी ॥ ५४५ ॥
आम्ही केव्हा तरी तुझ्या घरी येत होतो, तेव्हा तू स्वत:च (आमचे आदरातिथ्य करून) आम्हास मान देत होतास व जरी तू आम्हास मान देत होतास तरी (सुद्धा) तुझ्याशी अति परिचय असल्यामुळे आम्ही उलट तुझ्यावरच रुसून जात होतो. ॥११-५४५॥

पायां लागोनि बुझावणी । तुझ्या ठायीं शारङ्गपाणी ।
पाहिजे ऐशी करणी । बहु केली आम्हीं ॥ ५४६ ॥
देवा तू पाया पडून आमची समजूत केली पाहिजे (असा आम्ही हट्ट करीत होतो) व या हट्टाप्रमाणे आम्ही तुझ्याशी अनेक गोष्टी केल्या. ॥११-५४६॥

सजणपणाचिया वाटा । तुजपुढें बैसें उफराटा ।
हा पाडु काय वैकुंठा ? । परि चुकलों आम्हीं ॥ ५४७ ॥
मी तुझा प्यारा मित्र या नात्याने तुझ्यापुढे पाठ करून बसत होतो. श्रीकृष्णा, ही काय आमची योग्यता होती ? पण महाराज, आम्ही चुकलो. ॥११-५४७॥

देवेंसि कोलकाठी धरूं । आखाडा झोंबीलोंबी करूं ।
सारी खेळतां आविष्करूं । निकरेंही भांडों ॥ ५४८ ॥
देवाशी दांडपट्टा खेळत होतो, आखाड्यात देवांशी कुस्ती करीत होतो व सोंगट्या खेळतांना देवाला धिक्कारून बोलत होतो व हातघाईवर येऊन देवाशी भांडत होतो. ॥११-५४८॥

चांग तें उराउरीं मागों । देवासि कीं बुद्धि सांगों ।
तेवींचि म्हणों काय लागों । तुझें आम्ही ॥ ५४९ ॥
जी चांगली वस्तु असेल, ती झटपट मागत होतो. तू देव सर्वज्ञ पण तुला देखील शहाणपणाच्या गोष्टी सांगत होतो, त्याच प्रमाणे 'आम्ही तुझे काय लागतो' असे म्हणत होतो. ॥११-५४९॥

ऐसा अपराधु हा आहे । जो त्रिभुवनीं न समाये ।
जी नेणतांचि कीं पाये । शिवतिले तुझे ॥ ५५० ॥
हा अपराध असा आहे की जो त्रिभुवनातही मावणार नाही, परंतु देवा, मी तुझ्या पायावर हात ठेऊन शपथ घेऊन सांगतो की हे अपराध आमच्या हातून नकळत अज्ञानामुळे झाले आहेत. ॥११-५५०॥

देवो बोनयाच्या अवसरीं । लोभें कीर आठवण करी ।
परी माझा निसुग गर्व अवधारीं । जे फुगूनचि बैसें ॥ ५५१ ॥
जेवणाच्या वेळी देव माझी खरोखर प्रेमाने आठवण करीत असे, पण माझा निर्लज्ज गर्व पहा की मी फुगूनच बसत असे. ॥११-५५१॥

देवाचिया भोगायतनीं । खेळतां आशंकेना मनीं ।
जी रिगोनियां शयनीं । सरिसा पहुडें ॥ ५५२ ॥
देवाच्या अंत:पुरात खेळतांना मनात शंका धरीत नव्हतो, इतकेच काय पण देवा, तुझ्या बिछान्यावर जाऊन तुझ्या शेजारी निजत होतो. ॥११-५५२॥

'कृष्ण’ म्हणौनि हाकारिजे । यादवपणें तूंतें लेखिजे ।
आपली आण घालिजे । जातां तुज ॥ ५५३ ॥
'कृष्णा' म्हणून तुला हाका मारीत होतो. तू एक यादव आहेस, असे तुला समजत होतो व तू जाण्यास निघालास की तुला आम्ही शपथ घालत होतो. ॥११-५५३॥

मज एकासनीं बैसणें । कां तुझा बोलु न मानणें ।
हें वोळखीचेनि दाटपणें । बहुत घडलें ॥ ५५४ ॥
मी तुझ्याबरोबर तुझ्याच आसनावर बसत होतो, अथवा तू सांगितलेली गोष्ट मानत नव्हतो, असल्या गोष्टी अतिपरिचयामुळे घडल्या. ॥११-५५४॥

म्हणौनि काय काय आतां । निवेदिजेल अनंता ।
मी राशि आहें समस्तां । अपराधांचि ॥ ५५५ ॥
म्हणून श्रीकृष्णा, आता काय एक म्हणून सांगावे ? मी सर्व अपराधांची रास आहे. ॥११-५५५॥

यालागीं पुढां अथवा पाठीं । जियें राहटलों बहुवें वोखटीं ।
तियें मायेचिया परी पोटीं । सामावीं प्रभो ॥ ५५६ ॥
म्हणून हे प्रभो, हे तुझ्या समक्ष अथवा तुझ्या पश्चात ज्या अनेक वाईट गोष्टी माझ्या हातून घडल्या असतील, त्या आई ज्याप्रमाणे मुलाचे सर्व अपराध पोटात घालते त्याप्रमाणे तू पोटात घालाव्यास. ॥११-५५६॥

जी कोण्ही एके वेळे । सरिता घेऊन येती खडुळें ।
तियें सामाविजेति सिंधुजळें । आन उपायो नाहीं ॥ ५५७ ॥
महाराज कोणत्याही एखाद्या वेळी जेव्हा नद्या गढूळ पाण्याचे लोट घेऊन येतात, तेव्हा समुद्राच्या पाण्याने त्या गढूळ लोटास आपल्या पोटात सामाविले पाहिजे, त्यास दुसरा उपाय नाही. ॥११-५५७॥

तैसी प्रीती कां प्रमादें । देवेंसीं मज विरुद्धें ।
बोलविलीं तियें मुकुंदें । उपसाहावीं जी ॥ ५५८ ॥
त्याप्रमाणे प्रीतीने अथवा चुकीने माझ्याकडून जी विरुद्ध भाषणे बोलली गेली, हे श्रीकृष्णा, ती तू सर्व सहन करावीस. ॥११-५५८॥

आणि देवाचेनि क्षमत्वें क्षमा । आधारु जाली आहे या भूतग्रामा ।
म्हणौनि जी पुरुषोत्तमा । विनवूं तें थोडें ॥ ५५९ ॥
आणि हे देवा, तुझ्याच क्षमावान् स्वभावामुळे क्षमा (पृथ्वी) या प्राणिमात्रास धारण करणारी झाली आहे. म्हणून श्रीकृष्णा तुझी विनंती करावी तितकी थोडीच आहे. ॥११-५५९॥

तरी आतां अप्रमेया । मज शरणागता आपुलिया ।
क्षमा कीजो जी यया । अपराधांसि ॥ ५६० ॥
तरी आता हे अगम्या श्रीकृष्णा, मी जो आपल्याला शरण आलो आहे, त्या मला या अपराधाची क्षमा करावी. ॥११-५६०॥

पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् ।
न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभावः ॥ ४३ ॥
ह्या चराचर जगाचा तू पिता आहेस, अत्यंत पूज्य व श्रेष्ठ असा या जगाचा गुरु आहेस. हे अप्रतिमभावा, स्वर्ग, मृत्यु, पाताळ या तिन्ही लोकांमध्ये देखील तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही, मग तुझ्यापेक्षा अधिक कोठून असणार ? ॥११-४३॥

जी जाणितलें मियां साचें । महिमान आतां देवाचें ।
जे देवो होय चराचराचें । जन्मस्थान ॥ ५६१ ॥
ज्ञा - महाराज, खरोखर आता मी तुझे माहात्म्य जाणले. हे परमात्मा, तू या स्थावर-जंगमात्मक जगाचे उत्पत्तिस्थान आहेस. ॥११-५६१॥

हरिहरादि समस्तां । देवा तूं परम देवता ।
वेदांतेंही पढविता । आदिगुरु तूं ॥ ५६२ ॥
देवा, विष्णु, शंकर इत्यादिक दैवतांचा तू श्रेष्ठ देव आहेस व वेदांनाही शहाणपणा शिकविणारा मूळगुरू तू आहेस. ॥११-५६२॥

गंभीर तूं श्रीरामा । नाना भूतैकसमा ।
सकळगुणीं अप्रतिमा । अद्वितीया ॥ ५६३ ॥
हे श्रीकृष्णा, तू फार गंभीर अंत:करणाचा आहेस व तू सर्व प्राण्यांशी सारखा आहेस. तू सर्व गुणांमधे बिनजोड आहेस व तुझ्यासारखे दुसरे कोणीही नाही. ॥११-५६३॥

तुजसी नाहीं सरिसें । हें प्रतिपादनचि कायसें ? ।
तुवां जालेनि आकाशें । सामाविलें जग ॥ ५६४ ॥
तुझ्या बरोबरीचे कोणी नाही, हे सांगावयास कशाला पाहिजे ? तुझ्यापासून झालेल्या आकाशात सर्व जग सामावले आहे. ॥११-५६४॥

तया तुझेनि पाडें दुजें । ऐसें बोलतांचि लाजिजे ।
तेथ अधिकाची कीजे । गोठी केवीं ॥ ५६५ ॥
त्या तुझ्या बरोबरीला दुसरा काही पदार्थ आहे असे बोलण्यातच लाज वाटावयास पाहिजे. अशा प्रसंगात तुझ्य़ाहून कोणी मोठे आहे असे म्हणण्याची गोष्टच कशाला पाहिजे. ॥११-५६५॥

म्हणौनि त्रिभुवनीं तूं एकु । तुजसरिखा ना अधिकु ।
तुझा महिमा अलौकिकु । नेणिजे वानूं ॥ ५६६ ॥
म्हणूनच या सर्व त्रिभुवनात नाव घेण्यासारखा तू एकच आहेस. तुझ्या तोडीचा दुसरा कोणी नाही व तुझ्यापेक्षा अधिक कोणी नाही. तुझे माहात्म्य लोकोत्तर आहे. त्याचे वर्णन कसे करावे ते समजत नाही. ॥११-५६६॥



[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यम् ।
पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम् ॥ ४४ ॥
यास्तव (जगताचा) स्वामी व स्तवन करण्याला योग्य अशा तुला, मी देह नमवून नमस्कार करून (तुझ्याकडून) अनुग्रह करवून घेतो. हे देवा, पिता ज्याप्रमाणे पुत्राचे, मित्र ज्याप्रमाणे मित्राचे, प्रियजन ज्याप्रमाणे प्रियजनांचे (अपराध सहन करतो) त्याप्रमाणे माझे अपराध सहन करण्याला तू योग्य आहेस. ॥११-४४॥

ऐसें अर्जुनें म्हणितलें । मग पुढती दंडवत घातलें ।
तेथें सात्त्विकाचें आलें । भरतें तया ॥ ५६७ ॥
ज्ञा - याप्रमाणे अर्जुनाने भाषण केले आणि नंतर देवास साष्टांग नमस्कार केला. त्यावेळी त्याच्यात अष्टसात्विक भाव भरून आले. ॥११-५६७॥

मग म्हणतसे प्रसीद प्रसीद । वाचा होतसे सद्‌गद ।
काढी जी अपराध- । समुद्रौनि मातें ॥ ५६८ ॥
मग त्याची वाचा सगद्गदित होऊन तो म्हणावयास लागला, “प्रसन्न हो प्रसन्न हो”. देवा मला अपराधरूपी समुद्रातून वर काढ. ॥११-५६८॥

तुज विश्वसुहृदातें कहीं । सोयरेपणें न मनूंचि पाहीं ।
तुज विश्वेश्वराचिया ठायीं । ऐश्वर्य केलें ॥ ५६९ ॥
तू सर्व जगाचा मित्र असून तू आमचा एक नातेवाईक आहेस असे समजून आम्ही तुला कधी मान दिला नाही. सगळ्या ईश्वरांचा (देवांचा) जो तू ईश्वर, त्या ठिकाणी (तुला सारथी करून) प्रभुत्व (धनीपणा) गाजवले. ॥११-५६९॥

तूं वर्णनीय परी लोभें । मातें वर्णिसी पां सभे ।
तरि मियां वल्गिजे क्षोभें । अधिकाधिक ॥ ५७० ॥
सर्वांकडून वर्णन करण्यास तूच एक योग्य आहेस. (तेव्हा वास्तविक पहाता मीच तुझे वर्णन करणे योग्य होते.) पण माझ्यावर तुझे प्रेम असल्यामुळे सभेमधे तू माझेच वर्णन करत होतास. (तेव्हा मी आपली स्वत:ची योग्यता समजून उगीच बसावे की नाही ? तरी तसे न करता) तेव्हा मी गर्वाने चढून जाऊन अधिकच बडबड करीत होतो. ॥११-५७०॥

आतां ऐसिया अपराधां । मर्यादा नाहीं मुकुंदा ।
म्हणौनि रक्ष रक्ष प्रमादा । पासोनियां ॥ ५७१ ॥
आता देवा, ह्या माझ्या हातून घडलेल्या अपराधांना मर्यादा नाही. याकरता माझ्यावर प्रसाद म्हणून माझ्या चुकांपासून माझे रक्षण करा. ॥११-५७१॥

जी हेंचि विनवावयालागीं । कैंची योग्यता माझिया आंगीं ।
परी अपत्य जैसें सलगी । बापेंसीं बोले ॥ ५७२ ॥
देवा, ही सुद्धा विनंती करण्याची योग्यता माझ्या अंगी कोठे आहे ? परंतु लहान मूल ज्याप्रमाणे आपल्या बापाशी सलगीने भाषण करते (त्याप्रमाणे मी तुमच्याशी सलगीने भाषण करत आहे.) ॥११-५७२॥

पुत्राचे अपराध । जरी जाहले अगाध ।
तरी पिता साहे निर्द्वंद्व । तैसें साहिजो जी ॥ ५७३ ॥
आपल्या मुलाच्या किती जरी चुका झाल्या तरी बाप ज्याप्रमाणे दुजेपणा सोडून त्या सहन करतो, त्याप्रमाणे अहो महाराज, माझे अपराध आपण सहन करा. ॥११-५७३॥

सख्याचें उद्धत । सखा साहे निवांत ।
तैसें तुवां समस्त । साहिजो जी ॥ ५७४ ॥
बरोबरीचा स्नेही, बरोबरीच्या स्नेह्याकडून उपमर्द झाला असता त्या विषयी काहीच मनात न आणता ते सहन अकरतो त्याप्रमाणे महाराज, मी केलेली सर्व अविचाराची कृत्ये आपण सहन करा. ॥११-५७४॥

प्रियाचिया ठायीं सन्मान । प्रिय न पाहें सर्वथा जाण ।
तेवीं उच्छिष्ट काढिलें आपण । ते क्षमा कीजो जी ॥ ५७५ ॥
असे पहा की स्नेह्याच्या ठिकाणी स्नेही सन्मानाची मुळीच इच्छा करीत नाही. त्याप्रमाणे आपण आमच्या घरी उच्छिष्ट काढले त्याची आपण क्षमा करावी. ॥११-५७५ ॥

नातरी प्राणाचें सोयरें भेटे । मग जीवें भूतलीं जियें संकटें ।
तियें निवेदितां न वाटे । संकोचु कांहीं ॥ ५७६ ॥
अथवा जिवलग स्नेह्याची गाठ पडल्यावर मग आपण भोगलेले जे संकटाचे सर्व प्रसंग, ते त्यास सांगावयास काही संकोच वाटत नाही, ॥११-५७६॥

कां उखितें आंगें जीवें । आपणपें दिधलें जिया मनोभावें ।
तिया कांतु मिनलिया न राहवें । हृदय जेवीं ॥ ५७७ ॥
अथवा ज्या पतिव्रतेने आपल्याला शरीराने व प्राणाने सर्वस्वी प्रेमपूर्वक पतीला अर्पण केले, तिची व पतीची भेट झाली असता ज्याप्रमाणे तिच्या मनातील कोणतीही गोष्ट पतीला सांगितल्यावाचून तिच्याने रहावत नाही. ॥११-५७७॥

तयापरी जी मियां । हें विनविलें तुमतें गोसाविया ।
आणि कांहीं एक म्हणावया । कारण असे ॥ ५७८ ॥
अहो महाराज, त्याप्रमाणे मी तुम्हास (माझे मागील अपराध क्षमा करण्याबद्दल विनंती केली व माझा आणखी एक सांगावयाचा काही हेतु आहे. ॥११-५७८॥

अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे ।
तदेव मे दर्शय देव रूपं प्रसीद देवेश जगन्निवास ॥ ४५ ॥
पूर्वी कधी न पाहिलेले हे तुझे विश्वरूप पाहून मी हर्ष पावलो आहे आणि भायाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून देवा, मला तेच पूर्वीचे रूप दाखव. हे देवाधिदेवा, हे जगन्निवासा, माझ्यावर अनुग्रह कर. ॥११-४५॥

तरी देवेंसीं सलगी केली । जे विश्वरूपाची आळी घेतली ।
ते मायबापें पुरविली । स्नेहाळाचेनि ॥ ५७९ ॥
ज्ञा - तरी मी विश्वरूप दर्शनाचा हट्ट घेतला, हा जो देवापाशी मी लडिवाळपणा केला तो माझा लडिवाळपणाचा हट्ट आपण जे प्रेमळ भक्तांचे मायबाप, त्या तुम्ही पुरवला. ॥११-५७९॥

सुरतरूंची झाडें । आंगणीं लावावीं कोडें ।
देयावें कामधेनुचें पाडें । खेळावया ॥ ५८० ॥
कल्पवृक्षांची झाडे अंगणामधेच कौतुकाने लाऊन द्यावीत अथवा कामधेनूचे वासरु खेळावयास आणून द्यावे, ॥११-५८०॥

मियां नक्षत्रीं डाव पाडावा । चंद्र चेंडुवालागीं आणावा ।
हा छंदु सिद्धी नेला आघवा । माउलिये तुवां ॥ ५८१ ॥
मी नक्षत्रांच्या फाशांनी डाव खेळावा, मला चेंडू म्हणून खेळावयास चंद्र द्यावा, हा माझा हट्ट माझ्या आई तू सिद्धीस नेलास. ॥११-५८१॥

जिया अमृतलेशालागीं सायास । तयाचा पाऊस केला चारी मास ।
पृथ्वी वाहून चासेचास । चिंतामणी पेरिले ॥ ५८२ ॥
ज्या अमृताच्या थेंबाकरता कष्ट पडतात, त्या अमृताचा पाऊस आपण चार महिने पाडलात व सर्वच पृथ्वी पेरणीस लायक करून तीमधे पाभरीच्या प्रत्येक तासात (फणांच्या रेषात) चिंतामणी नावाची रत्ने पेरलीत ॥११-५८२॥

ऐसा कृतकृत्य केला स्वामी । बहुवे लळा पाळिला तुम्हीं ।
दाविलें जें हरब्रह्मीं । नायकिजे कानीं ॥ ५८३ ॥
महाराज, याप्रमाणे मला आपण कृतकृत्य केलेत. तुम्ही माझे पुष्कळ लाड पुरवलेत व जे शंकर व ब्रह्मदेव यांनी कानांनी देखील ऐकले नाही, ते तुम्ही मला प्रत्यक्ष दाखवलेत. ॥११-५८३॥

मा देखावयाची केउती गोठी । जयाची उपनिषदां नाहीं भेटी ।
ते जिव्हारींची गांठी । मजलागीं सोडिली ॥ ५८४ ॥
मग ते त्यांना (प्रत्यक्ष) पहावयाची गोष्ट काय ? (कशाला पाहिजे ?) ज्याचे उपनिषदांना दर्शन झाले नाही, अशी आपल्या जीवातील गुह्य गोष्ट तुम्ही माझ्याकरता उघड केलीत. ॥११-५८४॥

जी कल्पादीलागोनि । आजिची घडी धरुनी ।
माझीं जेतुलीं हो‍उनी । गेलीं जन्में ॥ ५८५ ॥
महाराज, कल्पाच्या आरंभापासून तो आजची घटका धरून (एवढ्या काळात) माझे जितके जन्म होऊन गेले ॥११-५८५॥

तयां आघवियांचि आंतु । घरडोळी घेऊनि असें पाहतु ।
परि ही देखिली ऐकिली मातु । आतुडेचिना ॥ ५८६ ॥
त्या सर्व जन्मांचा झाडा घेऊन पहात आहे, पण ही सर्व गोष्ट (विश्वरूपाचे दर्शन) ऐकलेली किंवा पाहिलेली आढळतच नाही. ॥११-५८६॥

बुद्धीचें जाणणें । कहीं न वचेचि याचेनि आंगणें ।
हे सादही अंतःकरणें । करवेचिना ॥ ५८७ ॥
बुद्धीची जाणण्याची शक्ती कधी याच्या (विश्वरूपाच्या) अंगणात सुद्धा येत नाही व अंत:करणाला ही कल्पना सुद्धा करता येत नाही. ॥११-५८७॥

तेथ डोळ्यां देखी होआवी । ही गोठीचि कायसया करावी ।
किंबहुना पूर्वीं । दृष्ट ना श्रुत ॥ ५८८ ॥
अशा स्थितीत डोळ्यांना पहावयास मिळावे ही गोष्ट कशाला बोलावयास पाहिजे ? फार काय सांगावे? हे पूर्वी कोणीही पाहिले नाही अथवा ऐकले नाही. ॥११-५८८॥

तें हें विश्वरूप आपुलें । तुम्हीं मज डोळां दाविलें ।
तरी माझें मन झालें । हृष्ट देवा ॥ ५८९ ॥
ते हे आपले विश्वरूप तुम्ही माझ्या डोळ्यांना प्रत्यक्ष दाखवलेत, त्यामुळे देवा, माझे मन आनंदित झाले. ॥११-५८९॥

परि आतां ऐसी चाड जीवीं । जे तुजसीं गोठी करावी ।
जवळीक हे भोगावी । आलिंगावयासी ॥ ५९० ॥
परंतु आता अशी जीवामधे इच्छा आहे की तुझ्याशी गोष्टी कराव्यात व तुझे सांनिध्य भोगावे व तू मजकडून आलिंगिला जावास. ॥११-५९०॥

ते याचि रूपीं करूं म्हणिजे । तरि कोणे एके मुखेंसी चावळिजे ।
आणि कवणा खेंव देईजे । तुज लेख नाहीं ॥ ५९१ ॥
ह्या सर्व गोष्टी विश्वरूपाबरोबर करू म्हटले तर अनंत मुखांपैकी कोणत्या एका मुखाबरोबर बोलावे ? आणि तुझ्या विश्वरूपी शरीराला मर्यादा नसल्यामुळे कोणाला आलिंगन द्यावे ? ॥११-५९१॥

म्हणौनि वारियासवें धावणें । न ठके गगना खेंव देणें ।
जळकेली खेळणें । समुद्रीं केउतें ? ॥ ५९२ ॥
एवढ्याकरता वार्‍याबरोबर पळणे जुळणार नाही व आकाशाला आलिंगन देणे घडणार नाही व समुद्रामधे जलक्रिडा कशी खेळावी ? ॥११-५९२॥

यालागीं जी देवा । एथिंचें भय उपजतसे जीवा ।
म्हणौनि येतुला लळा पाळावा । जे पुरे हें आतां ॥ ५९३ ॥
याकरता हे श्रीकृष्णा, माझ्या मनात या विश्वरूपाविषयी भय उत्पन्न झाले आहे. आणि म्हणूनच एवढा हट्ट पुरवावा की आपण प्रगट केलेले विश्वरूप आता पुरे झाले. (ते परत आवरून घ्यावे). ॥११-५९३॥

पैं चराचर विनोदें पाहिजे । मग तेणें सुखें घरीं राहिजे ।
तैसें चतुर्भुज रूप तुझें । तो विसांवा आम्हां ॥ ५९४ ॥
स्थावर-जंगमात्मक जग मजेने हिंडून पहावे (व त्या हिंडण्यात बर्‍याचशा हालापेष्टा भोगल्यावर) घरी सुखाने विश्रांती घेत रहावे, त्याप्रमाणे (तुझे अफाट विश्वरूप पाहिल्यावर) तुझे शामसुंदर चतुर्भुज रूप हे आम्हास विश्रांतीची जागा आहे. ॥११-५९४॥

आम्हीं योगजात अभ्यासावें । तेणें याचि अनुभवा यावें ।
शास्त्रांतें आलोडावें । परि सिद्धांतु तो हाचि ॥ ५९५ ॥
आम्ही योगमात्राचा अभ्यास करावा व त्यायोगे याच अनुभावाला (तुझे शामसुंदर चतुर्भुजरूप ही जीवास विश्रांतीची जागा आहे अशा अनुभावाला) यावे. आम्ही शास्त्रांचा अभ्यास करावा, परंतु त्या शास्त्रांचा सिद्धांत हाच (चतुर्भुजरूप हीच विश्रांतीची जागा) आहे. ॥११-५९५॥

आम्हीं यजनें किजती सकळें । परि तियें फळावीं येणेंचि फळें ।
तीर्थें होतु सकळें । याचिलागीं ॥ ५९६ ॥
आम्ही सर्व यज्ञ जरावे परंतु त्याचे फळ हेच मिळावे. आमच्या तीर्थयात्रा याचकरता असोत. ॥११-५९६॥

आणीकही कांहीं जें जें । दान पुण्य आम्हीं कीजे ।
तया फळीं फळ तुझें । चतुर्भुज रूप ॥ ५९७ ॥
आणखी जे जे काही दानपुण्य आम्ही करू, त्याच्या फळाच्या ठिकाणी तुझे चतुर्भुजरूप हेच फळ होय. ॥११-५९७॥

ऐसी तेथिंची जीवा आवडी । म्हणौनि तेंचि देखावया लवडसवडी ।
वर्तत असे ते सांकडी । फेडीजे वेगीं ॥ ५९८ ॥
याप्रमाणे तेथीची (त्या चतुर्भुजरूपाची) आवड आहे. म्हणून तेच पहाण्याकरता लगबग आहे. ती अडचण (तळमळ) आपण दूर करा. ॥११-५९८॥

अगा जीवींचें जाणतेया । सकळ विश्ववसवितेया ।
प्रसन्न होईं पूजितया । देवांचिया देवा ॥ ५९९ ॥
हे अंत:करणातील सर्व गोष्टी जाणणार्‍या देवा, सर्व विश्व वसवणार्‍या देवा, व भजले जाणारे जे देव त्या देवांच्या देवा श्रीकृष्णा, मला प्रसन्न हो. ॥११-५९९॥

किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव ।
तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते ॥ ४६ ॥
किरीट धारण करणारा, गदा धारण करणारा, हातामधे चक्र असणारा अशाच तुला पहाण्याची माझी इच्छा आहे. हे सहस्रबाहो, हे विश्वरूपधारिन् तू पुन्हा तेच चतुर्भुज स्वरूप धारण कर. ॥११-४६॥

कैसें नीलोत्पलातें रांवित । आकाशाही रंगु लावित ।
तेजाची वोज दावित । इंद्रनीळा ॥ ६०० ॥
ज्ञा - त्या चतुर्भुज शामसुंदर रूपाचा नीलवर्ण कसा निळ्या कमळाला रंगवणारा, आकाशासही निळा रंग देणारा व इंद्रनील नावाच्या रत्नाला निळ्या रंगाची शुद्धता दाखवणारा आहे. ॥११-६००॥

जैसा परिमळ जाहला मरगजा । कां आनंदासि निघालिया भुजा ।
ज्याचे जानुवरी मकरध्वजा । जोडली बरव ॥ ६०१ ॥
ज्याप्रमाणे पाचूच्या रत्नास सुगंध प्राप्त व्हावा अथवा आनंदास हात फुटावेत, (त्याप्रमाणे भगवंताचे शरीर शोभत होते.) ज्याच्या गुडघ्यांचा आश्रय केल्यामुळे (ज्याचा मुलगा होऊन मांडीवर खेळल्यामुळे) मदनास सौंदर्य प्राप्त झाले ॥११-६०१॥

मस्तकीं मुकुटातें ठेविलें । कीं मुकुटा मुकुट मस्तक झालें ।
शृंगारा लेणें लाधलें । आंगाचेनि जया ॥ ६०२ ॥
प्रभूंनी मुगुटाला मस्तकावर ठेवल्याबरोबर त्या मुगुटाला भगवंताचे मस्तक मुगुट झाले (म्हणजे भगवंताच्या मस्तकाने मुगुटाला शोभा आणली) व ज्या भागवंताच्या शरीराने शृंगारास (वस्रे, अलंकार इत्यादिकांना) अलंकार (शोभा) प्राप्त झाला. ॥११-६०२॥

इंद्रधनुष्याचिये आडणी । माजीं मेघ गगनरंगणीं ।
तैसें आवरिलें शारङ्गपाणी । वैजयंतिया ॥ ६०३ ॥
आकाशमंडळात इंद्रधनुष्याच्या वर्तुळात जसा मेघ आवरलेला असतो, त्याप्रमाणे वैजयंती माळेने श्रीकृष्ण आवरले गेले. ॥११-६०३॥

आतां कवणी ते उदार गदा । असुरां देत कैवल्य पदा ।
कैसें चक्र हन गोविंदा । सौम्यतेजें मिरवे ॥ ६०४ ॥
कोण ती उदार गदा, की जी गदा असुरांना नेहेमी मोक्षपदाला देते ! गोविंदा तुमचे सुदर्शनचक्र खरोखर सौम्य तेजाने कसे शोभत आहे ! ॥११-६०४॥

किंबहुना स्वामी । तें देखावया उत्कंठित पां मी ।
म्हणौनि आतां तुम्हीं । तैसया होआवें ॥ ६०५ ॥
फार काय सांगावे ? महाराज, ते आपले चतुर्भुज रूप पहाण्यास मी उत्सुक आहे. म्हणून आता आपण (हे प्रचंड विश्वरूप आवरून, ते चतुर्भुज रूप धारण करावे. ॥११-६०५॥

हे विश्वरूपाचे सोहळे । भोगूनि निवाले जी डोळे ।
आतां होताति आधले । कृष्णमूर्तीलागीं ॥ ६०६ ॥
महाराज, हे विश्वरूपाचे सोहळे भोगून माझे डोळे शांत झाले. आता ते डोळे श्रीकृष्णमूर्ती पहाण्याकरता अत्यंत उत्सुक झाले आहेत. ॥११-६०६॥

तें साकार कृष्णरूपडें । वांचूनि पाहों नावडे ।
तें न देखतां थोडें । मानिताती हे ॥ ६०७ ॥
ह्या डोळ्यांना त्या सगुण श्रीकृष्णमूर्तीशिवाय इतर काही पहाणे आवडत नाही. ते सगुणस्वरूप यास पहावयास मिळाले नाही तर या विश्वरूपाची माझ्या डोळ्यांना काही किंमत वाटत नाही. ॥११-६०७॥

आम्हां भोगमोक्षाचिया ठायीं । श्रीमूर्तीवांचूनि नाहीं ।
म्हणौनि तैसाचि साकारु होईं । हें सांवरीं आतां ॥ ६०८ ॥
आम्हाला ऐहिक व पारलौकिक भोगाच्या ठिकाणी फार काय सांगावे, मोक्षाच्या ठिकाणी देखील शामसुंदर मूर्तीवाचून दुसरे काही नाही. म्हणून देवा, आता तू तसाच चतुर्भुज हो व हे विश्वरूप आटोप. ॥११-६०८॥

श्रीभगवानुवाच
मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् ।
तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् ॥ ४७ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, प्रसन्न होत्सात्या मी माझ्या ऐश्वर्याच्या सामर्थ्याने तुला हे माझे तेजोमय, विश्वात्मक, अनंत व आद्य असे श्रेष्ठ स्वरूप दाखवले. हे माझे (रूप) तुझ्याखेरीज पूर्वी कोणीही पाहिलेले नाही ॥११-४७॥

या अर्जुनाचिया बोला । विश्वरूपा विस्मयो जाहला ।
म्हणे ऐसा नाहीं देखिला । धसाळ कोणी ॥ ६०९ ॥
ज्ञा - अर्जुनाचे हे बोलणे ऐकून विश्वरूपधारी परमात्म्याला चमत्कार वाटला आणि तो म्हणाला, असा दुसरा कोणीच अविचारी पाहिला नाही. ॥११-६०९॥

कोण हे वस्तु पावला आहासी । तया लाभाचा तोषु न घेसी ।
मा भेणें काय नेणों बोलसी । हेकाडु ऐसा ॥ ६१० ॥
ही कोणती वस्तु तुला प्राप्त झाली आहे ! तिच्या प्राप्तीचा आनंद मानत नाहीस. उलट एककल्ली मनुष्यासारखा भिऊन काय बोलतोस ते कळत नाही. ॥११-६१०॥

आम्हीं सावियाचि जैं प्रसन्न होणें । तैं आंगचिवरी म्हणें देणें ।
वांचोनि जीव असे वेंचणें । कवणासि गा ॥ ६११ ॥
आम्ही जेव्हा सहजच प्रसन्न होतो, तेव्हा आपले शरीरापर्यंत सुद्धा भक्ताने जे म्हटलेले असेल ते त्यास देतो. पण याशिवाय अर्जुना कोणास आपला जीव अर्पण करणे अशी गोष्ट कोठे आहे काय ? ॥११-६११॥

तें हें तुझिये चाडे । आजि जिवाचेंचि दळवाडें ।
कामऊनियां येवढें । रचिलें ध्यान ॥ ६१२ ॥
आज तो माझा जीव सर्व एकत्र गोळा करून तुझ्या इच्छे करता हे एवढे विश्वरूप मूर्तीचे रूप तयार केले आहे. ॥११-६१२॥

ऐसी काय नेणों तुझिये आवडी । जाहली प्रसन्नता आमुची वेडी ।
म्हणौनि गौप्याचीही गुढी । उभविली जगीं ॥ ६१३ ॥
आमची प्रसन्नता तुझ्या आवडीमुळे वेडी झाली आहे की काय हे कळत नाही. म्हणून आम्ही गुप्त गोष्टीचा (विश्वरूपाचा) जगात ध्वज लावला. (जगात प्रसिद्ध केले) ॥११-६१३॥

तें हें अपारां अपार । स्वरूप माझें परात्पर ।
एथूनि ते अवतार । कृष्णादिक ॥ ६१४ ॥
ते हे माझे मायेपलीकडील स्वरूप अमर्याद वस्तूपेक्षा अमर्याद आहे व कृष्णादिक जे अवतार होतात ते येथूनच होतात. ॥११-६१४॥

हें ज्ञानतेजाचें निखिळ । विश्वात्मक केवळ ।
अनंत हे अढळ । आद्य सकळां ॥ ६१५ ॥
हे स्वरूप केवळ ज्ञानतेजाचेच बनलेले आहे व विश्व हे केवळ त्याचे स्वरूप आहे. या स्वरूपाला कधी अंत नाही व ते कधी ढळत नाही व ते सर्वांचे मूळ आहे. ॥११-६१५॥

हें तुजवांचोनि अर्जुना । पूर्वीं श्रुत दृष्ट नाहीं आना ।
जे जोगें नव्हे साधना । म्हणौनियां ॥ ६१६ ॥
अर्जुना, हे (विश्वरूप) तुझ्याशिवाय पूर्वी दुसर्‍या कोणी ऐकलेले किंवा पाहिलेले नाही. कारण हे कोणत्याही साधनांनी प्राप्त होण्यासारखे नाही. ॥११-६१६॥

न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः ।
एवं रूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर ॥ ४८ ॥
हे कुरुकुलश्रेष्ठा, वेदपठन, यज्ञयागादि, शास्त्रपठन, दान, श्रौतस्मार्तादि कर्मे अथवा उग्र तपश्चर्या यांनी देखील असे हे माझे रूप मनुष्यलोकांमधे तुझ्यासशिवाय दुसर्‍या कोणालाही दिसणे शक्य नाही. ॥११-४८॥

याची सोय पातले । आणि वेदीं मौनचि घेतलें ।
याज्ञिकी माघौते आले । स्वर्गौनियां ॥ ६१७ ॥
ज्ञा - वेद या विश्वरूपाला जाणण्याच्या मार्गाला लागले व ते चूप झाले आणि यज्ञ म्हणाशील तर त्याच्या प्राप्तीच्या मार्गाला लागले परंतु ते स्वर्गापासूनच माघारी आले. ॥११-६१७॥

साधकीं देखिला आयासु । म्हणौनि वाळिला योगाभ्यासु ।
आणि अध्ययनें सौरसु । नाहीं एथ ॥ ६१८ ॥
साधकांनी याच्या प्राप्तीचा त्रास पाहिला म्हणून त्यांनी योगाभ्यास टाकला आणि अध्ययनाने विश्वरूप पहाण्याची योग्यता येत नाही, ॥११-६१८॥

सीगेचीं सत्कर्मे । धाविन्नलीं संभ्रमें ।
तिहीं बहुतेकीं श्रमें । सत्यलोकु ठाकिला ॥ ६१९ ॥
पूर्ण आचरलेली सत्कर्मे मोठ्या उत्कंठेने विश्वरूपप्राप्तीकरता धावली व त्या बहुतेकांनी मोठ्या कष्टाने सत्यलोक गाठला. ॥११-६१९॥

तपीं ऐश्वर्य देखिलें । आणि उग्रपण उभयांचि सांडिलें ।
एक तपसाधन जें ठेलें । अपारांतरें ॥ ६२० ॥
तपांनी विश्वरूपाचे ऐश्वर्य पाहिले आणि आपला उग्रपणा उभ्याउभ्याच टाकून दिला. याप्रमाणे जे विश्वरूप, तप वगैरे साधनांपासून अमर्याद अंतरावर राहिले ॥११-६२०॥

तें हें तुवां अनायासें । विश्वरूप देखिलें जैसें ।
इये मनुष्यलोकीं तैसें । न फवेचि कवणा ॥ ६२१ ॥
असे जे विश्वरूप ते तू काही एक श्रम न पडता जसे पाहिलेस तसे या मनुष्यलोकात कोणासही पहावयास सापडणार नाही. ॥११-६२१॥

आजि ध्यानसंपत्तीलागीं । तूंचि एकु आथिला जगीं ।
हें परम भाग्य आंगीं । विरंचीही नाहीं ॥ ६२२ ॥
आज ध्यानरूप संपत्तीकरता जगात तूच एक संपन्न आहेस. असले श्रेष्ठ भाग्य ब्रह्मदेवाच्याही अंगी नाही. ॥११-६२२॥

मा ते व्यथा मा च विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्ममेदम् ।
व्यपेतभीः प्रीतमनाः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य ॥ ४९ ॥
हे माझे अशा प्रकारचे भयानक रूप पाहून तू व्याकुळ होऊ नकोस. तू भ्रांतचित्त होऊ नकोस. गतभय व प्रीतियुक्त अंत:करण होत्साता पुन: तू माझे पूर्वीचे रूप पहा. ॥११-४९॥

म्हणौनि विश्वरूपलाभें श्लाघ । एथिचें भय नेघ नेघ ।
हें वांचूनि अन्य चांग । न मनीं कांहीं ॥ ६२३ ॥
ज्ञा - म्हणून विश्वरूपप्राप्तीने तू आपल्यास धन्य मान व या विश्वरूपाची भीती बाळगू नकोस. या विश्वरूपावाचून काही चांगले मानू नकोस. ॥११-६२३॥

हां गा समुद्र अमृताचा भरला । आणि अवसांत वरपडा जाहला ।
मग कोणीही आथि वोसंडिला । बुडिजैल म्हणौनि ? ॥ ६२४ ॥
अरे अर्जुना, प्रत्यक्ष अमृताचा समुद्र भरलेला असला आणि अकस्मात कोणी तेथे प्राप्त झाला असता, मग आपण त्यात बुडून मरून जाऊ, म्हणून कोणीतरी त्याचा त्याग केला आहे काय ? ॥११-६२४॥

नातरी सोनयाचा डोंगरु । येसणा न चले हा थोरु ।
ऐसें म्हणौनि अव्हेरु । करणें घडे ? ॥ ६२५ ॥
अथवा एखादा मनुष्य सोन्याच्या डोंगराजवळ प्राप्त झाला असता हा एवढा मोठा सोन्याचा डोंगर आपल्याला नेता येत नाही असे म्हणून त्याचा त्याग करणे घडेल काय ? (तर नाही, तो मनुष्य आपल्याकडून जेवढे सोने नेववेल तितके नेत राहील). ॥११-६२५॥

दैवें चिंतामणी लेईजे । कीं हें ओझें म्हणौनि सांडिजे ? ।
कामधेनु दवडिजे । न पोसवे म्हणौनि ? ॥ ६२६ ॥
दैवयोगाने चिंतामणि नावाचे रत्न अंगावर धारण करावे व ते ओझे म्हणून ज्याप्रमाणे टाकून द्यावे, किंवा आपल्याला पोसवत नाही म्हणून ज्याप्रमाणे कामधेनू हाकून द्यावी ॥११-६२६॥

चंद्रमा आलिया घरा । म्हणिजे निगे करितोसि उबारा ।
पडिसायि पाडितोसि दिनकरा । परता सर ॥ ६२७ ॥
चंद्र आपल्या घरी आला असता 'तुझ्या योगाने उष्मा होतो' म्हणून त्याला ज्याप्रमाणे 'तू चालता हो असे म्हणावे अथवा 'तू सावली पाडतोस म्हणून पलीकडे जा' असे सूर्यास म्हणावे ॥११-६२७॥

तैसें ऐश्वर्य हें महातेज । आजि हातां आलें आहे सहज ।
कीं एथ तुज गजबज । होआवी कां ? ॥ ६२८ ॥
त्याप्रमाणे हे महातेजरूपी (विश्वरूपी) ऐश्वर्य आज तुझ्या हाती सहज आले असे असून येथे तुझी कासाविशी का व्हावी ? ॥११-६२८॥

परि नेणसीच गांवढिया । काय कोपों आतां धनंजया ।
आंग सांडोनि छाया । आलिंगितोसि मा ? ॥ ६२९ ॥
परंतु हे अडाण्या, तुला काही कळत नाही. अर्जुना, आता तुझ्यावर काय रागवायचे ? प्रत्यक्ष अंग सोडून तू सावलीला आलिंगन देतोस आहेस, नाही का ? ॥११-६२९॥

हें नव्हे जो मी साचें । एथ मन करूनियां काचें ।
प्रेम धरिसी अवगणियेचें । चतुर्भुज जें ॥ ६३० ॥
विश्वरूप हे माझे खरे रूप नाही काय ? पण त्या ठिकाणी मन अधीर करून क्षुल्लक असे जे चतुर्भुजरूप त्या ठिकाणी तू प्रेम धरतोस हे बरे नाही. ॥११-६३०॥

तरि अझुनिवरी पार्था । सांडीं सांडीं हे व्यवस्था ।
इयेविषयीं आस्था । करिसी झणें ॥ ६३१ ॥
तर अर्जुना, अजूनपर्यंत तरी हे तुझे ठरलेले मत (विश्वरूप हे भयंकर रूप आहे व चतुर्भुजरूप हे सुंदर रूप आहे) टाकून दे. या सगुणरूपाविषयी आस्था (प्रेम) कदाचित धरशील तर धरू नकोस. ॥११-६३१॥

हें रूप जरी घोर । विकृति आणि थोर ।
तरी कृतनिश्चयाचें घर । हेंचि करीं ॥ ६३२ ॥
हे विश्वरूप जरी भयंकर अक्राळ विक्राळ आणि अवाढव्य असे आहे तरी (चतुर्भुजरूपापेक्षा) हे विश्वरूप माझे खरे रूप असल्याकारणाने हेच उपासनेला योग्य आहे असा तू पक्का निश्चय कर. ॥११-६३२॥

कृपण चित्तवृत्ति जैसी । रोंवोनि घालीं ठेवयापासीं ।
मग नुसधेनि देहेंसीं । आपण असे ॥ ६३३ ॥
कंजूष मनुष्य आपले सर्व लक्ष ज्याप्रमाणे आपण पुरून ठेवलेल्या द्रव्याच्या साठ्यापाशी जखडलेले ठेवतो आणि मग केवळ देहाने आपले इतर सर्व व्यवहार करीत असतो. ॥११-६३३॥

कां अजातपक्षिया जवळा । जीव बैसवूनि अविसाळां ।
पक्षिणी अंतराळा- । माजीं जाय ॥ ६३४ ॥
किंवा पंख न फुटलेल्या पिलांचे जवळ त्या घरट्यात आपला सर्व जीव ठेऊन त्या पिलांची आई पक्षिण कशी आकाशात संचार करण्याकरता जाते ॥११-६३४॥

नाना गाय चरे डोंगरीं । परि चित्त बांधिलें वत्सें घरीं ।
प्रेम एथिंचें करीं । स्थानपती ॥ ६३५ ॥
अथवा गाय डोंगरात चरत असते, परंतु तिचे सर्व लक्ष घरी आपल्या वासरावर अडकून राहिलेले असते, त्याप्रमाणे या विश्वरूप ठिकाणाचे तू आपले प्रेम मालक कर. ॥११-६३५॥

येरें वरिचिलेनि चित्तें । बाह्य सख्य सुखापुरतें ।
भोगिजो कां श्रीमूर्तींतें । चतुर्भुज ॥ ६३६ ॥
बाकी बाह्य अंत:करणाने (वर वर बाह्यात्कारी) बाहेरच्या मैत्रीच्या सुखापुरता आमच्या चतुर्भुज शामसुंदर मूर्तीचा उपभोग घे. ॥११-६३६॥

परि पुढतपुढती पांडवा । हा एक बोलु न विसरावा ।
जे इये रूपींहूनि सद्‌भावा । नेदावें निघों ॥ ६३७ ॥
परंतु अर्जुना या विश्वरूपापासून आपल्या सद्भावास दुसरीकडे कोठे जाऊ देऊ नकोस. एवढे आमचे एक सांगणे तू विसरू नकोस, हेच तुला वारंवार सांगणे आहे. ॥११-६३७॥

हें कहीं नव्हतेंचि देखिलें । म्हणौनि भय जें तुज उपजलें ।
तें सांडीं एथ संचलें । असों दे प्रेम ॥ ६३८ ॥
हे विश्वरूप म्हणजे कधी न पाहिलेली गोष्ट, म्हणून तुला याचे भय उत्पन्न झाले आहे, ते भय टाक व या विश्वरूपाच्या ठिकाणी प्रेम साठवलेले राहू दे. ॥११-६३८॥

आतां करूं तुजयासारखें । ऐसें म्हणितलें विश्वतोमुखें ।
तरि मागील रूप सुखें । न्याहाळीं पां तूं ॥ ६३९ ॥
आता तुझ्या मह्णण्यासारखे करू. तर अर्जुना मागील सगुण रूप तू खुशाल पहा, असे सर्व बाजूंनी ज्याला मुखे आहेत असा विश्वरूप परमात्मा श्रीकृष्ण म्हणाला. ॥११-६३९॥

संजय उवाच
इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः ॥
आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा ॥ ५० ॥
संजय म्हणाला, असे वचन बोलून याप्रमाणे वासुदेवाने पुन्हा स्वत:चे (पूर्वीचे) रूप दाखवले. पुन: सौम्यस्वरूपधारी होऊन त्या महात्म्याने भयभीत अर्जुनाला धीर दिला. ॥११-५०॥

ऐसें वाक्य बोलतखेंवो । मागुता मनुष्य जाहला देवो ।
हें ना परि नवलावो । आवडीचा तिये ॥ ६४० ॥
महाराज (राजा धृतराष्ट्रा). असे वाक्य बोलताक्षणीच देव पुन्हा मनुष्य झाले, यात काही मोठेसे आश्चर्य नाही. परंतु श्रीकृष्णास अर्जुनाविषयीचे जे प्रेम होते त्या प्रेमाचेच मोठे आश्चर्य आहे. (असे संजय म्हणाला). ॥११-६४०॥

श्रीकृष्णचि कैवल्य उघडें । वरि सर्वस्व विश्वरूपायेवढें ।
हातीं दिधलें कीं नावडे । अर्जुनासि ॥ ६४१ ॥
श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म होतेच असे असूनसुद्धा त्या परब्रह्म श्रीकृष्णाने विश्वरूपाएवढे आपले सर्वस्व अर्जुनाच्या हाती दिले असे असून ते विश्वरूप अर्जुनाला आवडले नाही ॥११-६४१॥

वस्तु घेऊनि वाळिजे । जैसें रत्‍नाससि दूषण ठेविजे ।
नातरी कन्या पाहूनियां म्हणिजे । मना न ये हे ॥ ६४२ ॥
ज्याप्रमाणे एखाद्या वस्तूचा स्वीकार करून (मग ती वाईट म्हणून) टाकून द्यावी किंवा ज्याप्रमाणे अस्सल रत्नात काही तरी खोड काढीत बसावे, अथवा मुलीला पाहून मग ती आपल्याला पटत नाही असे ज्याप्रमाणे म्हणावे ॥११-६४२॥

तया विश्वरूपायेवढी दशा । करितां प्रीतीचा वाढू कैसा ।
सेल दीधलीसे उपदेशा । किरीटीसिं देवें ॥ ६४३ ॥
श्रीकृष्णांनी आपल्या चतुर्भुज सगुण देहाचा विश्वरूपाएवढा विस्तार केला. या गोष्टीवरून अर्जुनाविषयी श्रीकृष्णाच्या प्रेमाची वाढ कशी होती (हे स्पष्ट दिसते). अर्जुनाला देवांनी विश्वरूप दाखवले हा त्याला शेलका (अति उत्कृष्ट) उपदेश केला,. ॥११-६४३॥

मोडोनि भांगाराचा रवा । लेणें घडिलें आपलिया सवा ।
मग नावडे जरी जीवा । तरी आटिजे पुढती ॥ ६४४ ॥
सोन्याची लगड मोडून जसा त्याचा आपल्या इच्छेनुरूप दागिना कारावा व मग तो दागिना जर आपल्या मनाला आवडला नाही तर तो पुन्हा आटवून टाकावा, ॥११-६४४॥

तैसें शिष्याचिये प्रीती जाहलें । कृष्णत्व होतें तें विश्वरूप केलें ।
तें मना नयेचि मग आणिलें । कृष्णपण मागुतें ॥ ६४५ ॥
त्याप्रमाणे शिष्याच्या प्रीतीकरता वरील दृष्टांताप्रमाणे गोष्ट घडली. (कोणती म्हणाल तर) प्रथम सगुण श्रीकृष्णमूर्ती होती, याचे विश्वरूप केले, ते अर्जुनाच्या मनाला येईना, मग सगुण कृष्णरूप पुन्हा आणले. ॥११-६४५॥

हा ठाववरी शिष्याची निकसी । सहातें गुरु आहाती कवणे देशीं ? ।
परि नेणिजे आवडी कैशी । संजयो म्हणे ॥ ६४६ ॥
येथेपर्यंत शिष्याने दिलेला त्रास सहन करणारे गुरु कोणत्या देशात आहेत ? परंतु देवाचे अर्जुनाविषयी कसे प्रेम आहे, ते कळत नाही, असे संजय म्हणाला. ॥११-६४६॥



[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



मग विश्वरूप व्यापुनि भोंवतें । जें दिव्य तेज प्रगटलें होतें ।
तेंचि सामावलें मागुतें । कृष्णरूपीं तये ॥ ६४७ ॥
ज्ञा - मग श्रीकृष्णाने विश्वरूपाचा पसारा घालून आपल्या सभोवती जे अलौकिक योगाचे तेज प्रगट केले होते तेच त्याने उन्हा त्या सगुण कृष्णरूपात एकत्र करून साठवले. ॥११-६४७॥

जैसें त्वंपद हें आघवें । तत्पदीं सामावे ।
अथवा द्रुमाकारु सांठवे । बीजकणिके जेवीं ॥ ६४८ ॥
ज्याप्रमाणे 'त्वं' हे सर्वपद (अल्पज्ञ, अल्पशक्तिमान्, परतंत्र, परिच्छिन्न अशा जीवाचे लक्ष्य जे कूटस्थचैतन्य) 'तत्' पदाच्या अर्थामधे (सर्वज्ञ, सर्वशक्तिमान्, स्वतंत्र, विभु अशा ईश्वरतत्वाचे लक्ष्य जे ब्रह्म त्यात) सामावते. अथवा वृक्षाचा आकार जसा बीजाच्या कणात साठवतो. ॥११-६४८॥

नातरी स्वप्नसंभ्रमु जैसा । गिळी चेइली जीवदशा ।
श्रीकृष्णें योगु हा तैसा । संहारिला तो ॥ ६४९ ॥
अथवा जीवाची जागृतावस्था ही स्वप्नाच्या सर्व विस्ताराला ज्याप्रमाणे गिळते, त्याप्रमाणे तो योग विश्वरूपाचा विस्तार श्रीकृष्णांनी आपल्यात सामावून घेतला. ॥११-६४९॥

जैसी प्रभा हारपली बिंबीं । कीं जळदसंपत्ती नभीं ।
नाना भरतें सिंधुगर्भीं । रिगालें राया ॥ ६५० ॥
ज्याप्रमाणे सूर्यादिकांचे तेज हे सूर्यादिकांच्या बिंबात सामावते, किंवा मेघांचे समुदाय आकाशामधे लीन होतात, अथवा राजा धृतराष्ट्रा, समुद्राची भरती समुद्राच्या पोटात गदप होते ॥११-६५०॥

हो कां जे कृष्णाकृतीचिये मोडी । होती विश्वरूपपटाची घडी ।
ते अर्जुनाचिये आवडी । उकलूनि दाविली ॥ ६५१ ॥
त्याप्रमाणे कृष्णाकृतीच्या रूपाने जी विश्वरूपी वस्त्राची घडी होती, ती अर्जुनाच्या पसंती करता देवांनी उकलून दाखवली ॥११-६५१॥

तंव परिमाणा रंगु । तेणें देखिलें साविया चांगु ।
तेथ ग्राहकीये नव्हेचि लागु । म्हणौनि घडी केली पुढती ॥ ६५२ ॥
तेव्हा (एखादे वस्त्र विकत घेणारे गिर्‍हाइक जसे त्या वस्त्राची लांबी, रुंदी व रंग सहज पाहाते त्याप्रमाणे) अर्जुनाने या विश्वरूपी वस्त्राची लांबी, रुंदी व रंग सहज चांगली पाहिली, त्यावेळी अर्जुनाकडून वस्त्र घेतले जाण्याचा संभावही नाही, म्हणून देवांनी विश्वरूपी वस्त्राची सगुण कृष्णाकृतिरूपी पुन्हा घडी केली. ॥११-६५२॥

तैसें वाढीचेनि बहुवसपणें । रूपें विश्व जिंतिलें जेणें ।
तें सौम्य कोडिसवाणें । साकार जाहलें ॥ ६५३ ॥
त्याप्रमाणे आपल्या वाढीच्या अतिशय विस्ताराने ज्या कृष्णरूपाने विश्व जिंकले होते, ते विश्वरूपाने वाढलेले कृष्णरूप पुन्हा शांत सगुण व सुंदर असे झाले. ॥११-६५३॥

किंबहुना अनंतें । धरिलें धाकुटपण मागुतें ।
परि आश्वासिलें पार्थातें । बिहालियासी ॥ ६५४ ॥
फार काय सांगावे ? श्रीकृष्णाने पुन्हा मर्यादित सगु्ण रूप धारण केले, पण भ्यायलेल्या अर्जुनाला धीर दिला. ॥११-६५४॥

जो स्वप्नीं स्वर्गा गेला । तो अवसांत जैसा चेइला ।
तैसा विस्मयो जाहला । किरीटीसी ॥ ६५५ ॥
त्यावेळी स्वप्नात स्वर्गाला गेलेला मनुष्य जसा अकस्मात जागा व्हावा (म्हणजे तो जसा एकदम बदलेल्या परिस्थितीमुळे आश्चर्यचकित होतो) तसे अर्जुनास झाले. ॥११-६५५॥

नातरी गुरुकृपेसवें । वोसरलेया प्रपंचज्ञान आघवें ।
स्फुरे तत्त्व तेवीं पांडवें । श्रीमूर्ति देखिली ॥ ६५६ ॥
अथवा गुरुकृपा झाल्याबरोबर, प्रपंचाचे सर्व ज्ञान ओसरल्यावर कसे एक ब्रह्म स्फुरते, त्याप्रमाणे विश्वरूप ओसरल्यावर अर्जुनाने कृष्णमूर्ति पाहिली. ॥११-६५६॥

तया पांडवा ऐसें चित्तीं । आड विश्वरूपाची जवनिका होती ।
ते फिटोनि गेली परौती । हें भलें जाहलें ॥ ६५७ ॥
त्या अर्जुनाला मनात असे वाटले की (माझ्या आणि चतुर्भुज श्रीकृष्णमूर्तीच्या आड (मध्ये) जो विश्वरूपाचा पडदा होता, तो पलीकडे निघून गेला, हे चांगले झाले. ॥११-६५७॥

काय काळातें जिणोनि आला । कीं महावातु मागां सांडिला ।
आपुलिया बाही उतरला । सातही सिंधु ॥ ६५८ ॥
जसा काय काळाला जिंकून आला किंवा प्रचंड वार्‍यास मागे हटवले अथवा आपल्या हातांनी सात समुद्र पोहून उतरून आला. ॥११-६५८॥

ऐसा संतोष बहु चित्तें । घेइजत असे पंडुसुतें ।
विश्वरूपापाठीं कृष्णातें । देखोनियां ॥ ६५९ ॥
अर्जुनाने विश्वरूपानंतर कृष्णरूपाला पाहून आपल्या मनात असा फार आनंद मानला. ॥११-६५९॥

मग सूर्याचिया अस्तमानीं । मागुती तारा उगवती गगनीं ।
तैसी देखों लागला अवनीं । लोकांसहित ॥ ६६० ॥
मग सूर्य जसा मावळल्यावर आकाशात चांदण्या प्रगट होतात, त्याप्रमाणे अर्जुन हा पृथ्वी पहावयास लागला. ॥११-६६०॥

पाहे तंव तेंचि कुरुक्षेत्र । तैसेंचि देखे दोहीं भागीं गोत्र ।
वीर वर्षताती शस्त्रास्त्र । संघाटवरी ॥ ६६१ ॥
अर्जुन पहावयास लागला तो ते कुरुक्षेत्रच होते, दोन्ही बाजूंना नातलग मंडळी तशीच (पूर्वीप्रमाणे) उभी होती आणि वीर शस्त्रांचे व अस्त्रांचे समुदायांचे वर्षाव करत होते. ॥११-६६१॥

तया बाणांचिया मांडवाआंतु । तैसाचि रथु देखे निवांतु ।
धुरे बैसला लक्ष्मीकांतु । आपण तळीं ॥ ६६२ ॥
त्या बाणांच्या मांडवात रथ तसाच (पूर्वीप्रमाणेच) स्थिर होता व घोडे हाकण्याच्या ठिकाणी लक्ष्मीकांत श्रीकृष्ण विराजमान झालेले होते व आपण खाली होता. ॥११-६६२॥

अर्जुन उवाच
दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन ।
इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृउतिं गतः ॥ ५१ ॥
अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, हे तुझे सौम्य मानवरूप पाहून आता मन ठिकाणावर येऊन मी पूर्ववत् सावध झालो आहे. ॥११-५१॥

एवं मागील जैसें तैसें । तेणें देखिलें वीरविलासें ।
मग म्हणे जियालों ऐसें । जाहलें आतां ॥ ६६३ ॥
पराक्रम हाच ज्याचा खेळ आहे त्या अर्जुनाने याप्रमाणे पूर्वी जसे होते तसे पाहिले. मग श्रीकृष्णास म्ह्णाला, आता मी जगलो असे मला वाटते. ॥११-६६३॥

बुद्धीतें सांडोनि ज्ञान । भेणें वळघलें रान ।
अहंकारेंसी मन । देशोधडी जाहलें ॥ ६६४ ॥
माझे ज्ञान बुद्धीला सोडून भयाने रानोमाळ झाले होते आणि मन हे अहंकारासह परागंदा झाले होते. ॥११-६६४॥

इंद्रियें प्रवृत्ती भुललीं । वाचा प्राणा चुकली ।
ऐसें आपांपरी होती जाली । शरीरग्रामीं ॥ ६६५ ॥
इंद्रिये विषयांकडे धावण्याचे विसरली होती व वाचाही प्राणास मुकली होती. (बंद पडली होती). याप्रमाणे शरीररूपी गावात दुर्दशा उडाली होती. ॥११-६६५॥

तियें आघवींचि मागुतीं । जिवंत भेटलीं प्रकृती ।
आतां जिताणें श्रीमूर्ती । जाहलें मियां ॥ ६६६ ॥
ती बुद्धी, मन व इंद्रिये सर्वच पुन्हा टवटवित होऊन आपल्या मूळ पदावर आली. आता श्रीकृष्णा, यांना जिवंतपण प्राप्त झाले. (ही आपल्या स्वभावावर येऊन आपापली कामे करावयास लागली). ॥११-६६६॥

ऐसें सुख जीवीं घेतलें । मग श्रीकृष्णातें म्हणितलें ।
मियां तुमचें रूप देखिलें । मानुष हें ॥ ६६७ ॥
ज्ञा - असा त्याने मनात आनंद मानला व तो कृष्णास म्हणाला, महाराज, तुमचे हे मनुष्यरुप (एकदाचे) माझ्या दृष्टीस पडले. ॥११-६६७॥

हें रूप दाखवणें देवराया । कीं मज अपत्या चुकलिया ।
बुझावोनि तुवां माया । स्तनपान दिधलें ॥ ६६८ ॥
हे देवाधिदेवा, हे रूप दाखवणे म्हणजे मी जे चुकलेले मूल त्या मला तू जी माझी आई, तिने माझी समजूत घालून मला स्तनपानच दिले. ॥११-६६८॥

जी विश्वरूपाचिया सागरीं । होतों तरंग मवित वांवेवरी ।
तो इये निजमूर्तीच्या तीरीं । निगालों आतां ॥ ६६९ ॥
महाराज, विश्वरूपी समुद्रात जो मी हाताने लाटेमागून लाट आक्रमीत होतो, तो मी या आपल्या चतुर्भुजमूर्तिरूप किनार्‍यास आता लागलो. ॥११-६६९॥

आइकें द्वारकापुरसुहाडा । मज सुकतिया जी झाडा ।
हे भेटी नव्हे बहुडा । मेघाचा केला ॥ ६७० ॥
हे द्वारकेच्या राजा, ऐक, (विश्वरूपदर्शनानंतर या चतुर्भुजरूपाची भेट) ही भेट नव्हे. तर मी जे सुकावयास लागलेले झाड, त्या मला ही भेट म्हणजे मेघांचा वर्षावच होय. ॥११-६७०॥

जी सावियाची तृषा फुटला । तया मज अमृतसिंधु हा भेटला ।
आतां जिणयाचा जाहला । भरंवसा मज ॥ ६७१ ॥
तहानेने पीडलेला जो मी त्या मला हा चतुर्भुज श्रीकृष्ण म्हणजे अमृताचा सागरच अकस्मात् भेटला. आता माझा जगण्याविषयीचा संशय दूर झाला. ॥११-६७१॥

माझिया हृदयरंगणीं । होताहे हरिखलतांची लावणी ।
सुखेंसीं बुझावणी । जाहली मज ॥ ६७२ ॥
माझ्या हृदयदेशात आनंदाच्या वेलाची लावणी होत आहे. (आज) सुखाची व माझी गाठ पडत आहे. ॥११-६७२॥

श्रीभगवानुवाच
सुदुदर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम ।
देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शकाङ्क्षिणः ॥ ५२ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, महत्प्रयासाने दिसण्याला कठिण असे जे माझे हे रूप तू पाहिलेस, त्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी देव देखील उत्सुक आहेत. ॥११-५२॥

यया पार्थाचिया बोलासवें । हें काय म्हणितलें देवें ।
तुवां प्रेम ठेवूनि यावें । विश्वरूपीं कीं ॥ ६७३ ॥
ज्ञा - या अर्जुनाच्या भषणाबरोबर भगवंत म्हणाले, हे काय रे ? तू विश्वरूपाच्या ठिकाणी प्रेम ठेऊन सगुणाकडे ये. ॥११-६७३॥

मग इये श्रीमूर्ती । भेटावें सडिया आयती ।
ते शिकवण सुभद्रापती । विसरलासि मा ॥ ६७४ ॥
मग या सगुण मूर्तीला (विश्वरूपावर दृढ प्रेम ठेऊन नुसते रिकामे) नुसत्या देहसामग्रीने भेटावे. हे सुभद्रापते अर्जुना, ही जी तुला आम्ही मागे शिकवण दिली होती, ती विसरलास. ॥११-६७४॥

अगा आंधळिया अर्जुना । हाता आलिया मेरूही होय साना ।
ऐसा आथी मना । चुकीचा भावो ॥ ६७५ ॥
अरे अविचारी अर्जुना, एवढा मोठा मेरु (सोन्याचा पर्वत) पण तो एकदा का प्राप्त झाला म्हणजे त्याचे काही महत्व वाटत नाही, अशी जी मनाची समजूत असते, ती चुकीची आहे. ॥११-६७५॥

तरी विश्वात्मक रूपडें । जें दाविलें आम्ही तुजपुढें ।
तें शंभूही परि न जोडे । तपें करितां ॥ ६७६ ॥
तरी आम्ही तुझ्यापुढे जे विश्वरूप दाखवले ते शंकरालासुद्धा अनेक तपे केली तरी प्राप्त होत नाही. ॥११-६७६॥

आणि अष्टांगादिसंकटीं । योगी शिणताति किरीटी ।
परि अवसरु नाहीं भेटी । जयाचिये ॥ ६७७ ॥
अर्जुना, योगी हे अष्टांगयोगासारखी संकटे आचरण करून शिणतात, परंतु ज्या विश्वरूपाच्या भेटीचा प्रसंग त्यांना येत नाही ॥११-६७७॥

तें विश्वरूप एकादे वेळ । कैसेनि देखों अळुमाळ ।
ऐसें स्मरतां काळ । जातसे देवां ॥ ६७८ ॥
ते विश्वरूप एखादे वेळ तरी थोडेसे आम्ही केव्हा पाहू असे चिंतन करतांना देवांचा काळ जातो. ॥११-६७८॥

आशेचिये अंजुळी । ठेऊनि हृदयाचिया निडळीं ।
चातक निराळीं । लागले जैसे ॥ ६७९ ॥
आशारूप ओंजळ हृदयरूप कपाळावर ठेऊन चातक पक्षी जसे आकाशाकडे पहातात, ॥११-६७९॥

तैसे उत्कंठा निर्भर । होऊनियां सुरवर ।
घोकीत आठही पाहार । भेटी जयाची ॥ ६८० ॥
याप्रमाणे देव व मनुष्य हे विश्वरूपाच्या उत्कंठेने आतुर होऊन आठही प्रहर विश्वरूपाची भेट होईल काय म्हणून घोकत असतात. ॥११-६८०॥

परि विश्वरूपासारिखें । स्वप्नींही कोण्ही न देखे ।
तें प्रत्यक्ष तुवां सुखें । देखिलें हें ॥ ६८१ ॥
परंतु विश्वरूपासारखी गोष्ट कोणी स्वप्नात सुद्धा पाहिली नाही. असे हे विश्वरूप तू हे आज प्रत्यक्ष सुखाने पाहिलेस. ॥११-६८१॥

नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया ।
शक्यं एवंविधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा ॥ ५३ ॥
ज्याप्रकारे तू मला पाहिलेस, त्या प्रकारे वेदपठनाने, तपाने, दानाने अथवा यज्ञाने देखील मी कोणाला दिसणे शक्य नाही ॥११-५३॥

पैं उपायांसि वाटा । न वाहती एथ सुभटा ।
साहीसहित वोहटा । वाहिला वेदीं ॥ ६८२ ॥
ज्ञा - परंतु अर्जुना, या विश्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही साधनास मार्ग नाही. व सहा शास्त्रांसह वेद लाग न लागल्यामुळे या विश्वरूपापासून मागे हटले. ॥११-६८२॥

मज विश्वरूपाचिया मोहरा । चालावया धनुर्धरा ।
तपांचियाही संभारा । नव्हेचि लागु ॥ ६८३ ॥
मी जो विश्वरूप, त्या माझ्याकडे चालत येण्याला, अर्जुना तपांच्या सर्व समुदायालासुद्धा सामर्थ्य नाही. ॥११-६८३॥

आणि दानादि कीर कानडें । मी यज्ञींही तैसा न सांपडें ।
जैसेनि कां सुरवाडें । देखिला तुवां ॥ ६८४ ॥
आणि तू जशा विस्ताराने मला पाहिलास तसा मी दानांनी दिसण्यास खरोखर कठिण असून यज्ञानीही मी तसा पाहण्यास सापडत नाही. ॥११-६८४॥

तैसा मी एकीचि परि । आंतुडें गा अवधारीं ।
जरी भक्ति येऊनि वरी । चित्तातें गा ॥ ६८५ ॥
तू ज्या विस्ताराने मला पाहिलास तसा मी एकाच प्रकाराने पहावयास सापडतो व तो प्रकार म्हणजे जर भक्ति येऊन चित्ताला वरील तरच मी पहावयास सापडतो, हे लक्षात ठेव. ॥११-६८५॥

भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन ।
ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ॥ ५४ ॥
पण हे शत्रुनाशना अर्जुना, अशा स्वरूपाचा जो मी त्या मला अनन्य भक्तियोगाने जाणणे, पहाणे आणि मत्स्वरूपाने माझ्यामधे लीन होणे शक्य आहे. ॥११-५४॥

परि तेचि भक्ति ऐसी । पर्जन्याची सुटिका जैसी ।
धरावांचूनि अनारिसी । गतीचि नेणें ॥ ६८६ ॥
ज्ञा - परंतु तीच भक्ती अशी की पावसाच्या वृष्टीस पृथ्वीवाचून कशी निराळी गतीच ठाऊक नाही, तशी (म्हणजे त्या भक्तीला मजवाचून दुसरा विषयच नाही अशी) ॥११-६८६॥

कां सकळ जळसंपत्ती । घेऊनि समुद्रातें गिंवसिती ।
गंगा जैसी अनन्यगती । मिळालीचि मिळे ॥ ६८७ ॥
अथवा सर्व जलरूप संपत्ति घेऊन भागीरथी नदी जशी समुद्राचा शोध करीत करीत एकनिष्ठेने समुद्रास मिळाली असून पुन्हा पुन्हा मिळतच आहे ॥११-६८७॥

तैसें सर्वभावसंभारें । न धरत प्रेम एकसरें ।
मजमाजीं संचरे । मीचि होऊनि ॥ ६८८ ॥
त्याप्रमाणे सर्व भावांच्या समुदायासह अनावर प्रेम मद्रूप होऊन एकसारखे माझ्यामधे प्रवेश करते. ॥११-६८८॥

आणि तेवींचि मी ऐसा । थडिये माझारीं सरिसा ।
क्षीराब्धि कां जैसा । क्षीराचाचि ॥ ६८९ ॥
आणि क्षीरसमुद्र जसा काठास व मध्येही एकसारखा दूधमयच असतो, त्याचप्रमाणे मी सारखा सर्वव्यापी आहे. ॥११-६८९॥

तैसें मजलागुनि मुंगीवरी । किंबहुना चराचरीं ।
भजनासि कां दुसरी । परीचि नाहीं ॥ ६९० ॥
त्याप्रमाणे माझ्यापासून तो मुंगीपर्यंत फार काय सांगावे ? सर्व स्थावर-जंगमात्मक जगामधे भजनाला माझ्याशिवाय दुसरे काही आहे अशी शंकाच नाही. ॥११-६९०॥

तयाचि क्षणासवें । एवंविध मी जाणवें ।
जाणितला तरी स्वभावें । दृष्टही होय ॥ ६९१ ॥
(असे ज्यावेळी होईल) त्याचक्षणाबरोबर मी (भगवंत) विश्वरूप आहे असे कळेल. आणि असा मी समजल्यावर साहजिक रीतीने मी तसा (विश्वरूप) दिसेन. ॥११-६९१॥

मग इंधनीं अग्नि उद्दीपें । आणि इंधन हें भाष हारपे ।
तें अग्निचि होऊनि आरोपें । मूर्त जेवीं ॥ ६९२ ॥
मग काष्ठात (घर्षणाने) अग्नि उत्पन्न झाल्यावर काठ हा शब्द नाहीसा होऊन ते काष्ठच जसे मूर्तिमंत अग्नि होते. ॥११-६९२॥

कां उदय न कीजे तेजाकारें । तंव गगनचि होऊनि असे आंधारें ।
मग उदईलिया एकसरें । प्रकाशु होय ॥ ६९३ ॥
अथवा जोपर्यंत सूर्याने उदय केला नाही, तोपर्यंतच आकाश अंधार होऊन असते, मग सूर्योदय झाल्यावर ते आकाशच एकसारखे प्रकाश होते. ॥११-६९३॥

तैसें माझिये साक्षात्कारीं । सरे अहंकाराची वारी ।
अहंकारलोपीं अवधारीं । द्वैत जाय ॥ ६९४ ॥
त्याप्रमाणे माझे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर अहंकाराची येरझार संपते आणि अहंकाराचा नाश झाल्यावर द्वैत जाते हे लक्षात ठेव. ॥११-६९४॥

मग मी तो हें आघवें । एक मीचि आथी स्वभावें ।
किंबहुना सामावे । समरसें तो ॥ ६९५ ॥
मग मी, तो आणि सर्व विश्व हे एक मीच स्वभावत: आहे. फार काय सांगावे ? तो ऐक्यभावाने माझ्यामधे सामावला जातो. ॥११-६९५॥

मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः ॥
निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥ ५५ ॥
ॐ इति श्रीमद्भग्वद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगोनाम एकादशोऽध्यायः ॥ ११ ॥
हे पांडवा, जो मत्प्रीत्यर्थ कर्म करणारा, मीच ज्यांचे प्राप्तव्य आहे असा, माझा भक्त, संसारसंगरहित, कोणाहि भूतांशी वैर नसलेला असा तो (पुरुष) मजप्रत येतो. ॥११-५५.॥

जो मजचि एकालागीं । कर्में वाहातसे आंगीं ।
जया मीवांचोनि जगीं । गोमटें नाहीं ॥ ६९६ ॥
जो (भक्त) माझ्या एकट्याकरिताच शरीराने कर्मे आचरतो आणि ज्याला जगामध्ये माझ्यावाचून दुसरे काही चांगले नाही.॥११-६९६॥

दृष्टादृष्ट सकळ । जयाचें मीचि केवळ ।
जेणें जिणयाचें फळ । मजचि नाम ठेविलें ॥ ६९७ ॥
ज्याचा इहपरलोक, हे सर्व केवळ मीच होऊन राहिलो आहे व ज्याने आपले जगण्याचे प्रयोजन माझीच प्राप्ति होणे, हेच ठरविले आहे. ॥११-६९७॥

मग भूतें हे भाष विसरला । जे दिठी मीचि आहें सूदला ।
म्हणौनि निर्वैर जाहला । सर्वत्र भजे ॥ ६९८ ॥
तो भूते ही भाषा विसरला, कारण त्याच्या दृष्टीला माझ्याशिवाय दुसरा विषय नाही; म्हणून तो निर्वैर झाला. आता तो सर्व ठिकाणी मला ओळखून माझी भक्ति करतो. ॥११-६९८॥

ऐसा जो भक्तु होये । तयाचें त्रिधातुक हें जैं जाये ।
तैं मीचि हो‍उनि ठायें । पांडवा गा ॥ ६९९ ॥
अरे अर्जुना, असा जो भक्त आहे त्याचे हे शरीर ज्या वेळी पडते त्यावेळी तो मीच होऊन राहतो. ॥११-६९९॥

ऐसें जगदुदरदोंदिलें । तेणें करुणारसरसाळें ।
संजयो म्हणे बोलिलें । श्रीकृष्णदेवें ॥ ७०० ॥
जगत उदरामधे असल्यामुळे दोंदील व करुणेच्या रसाने रसाळ असे जे श्रीकृष्णदेव ते याप्रमाणे बोलले असे संजय धृतराष्ट्राला म्हणाला. ॥११-७००॥

ययावरी तो पंडुकुमरु । जाहला आनंदसंपदा थोरु ।
आणि कृष्णचरणचतुरु । एक तो जगीं ॥ ७०१ ॥
असे श्रीकृष्ण बोलल्यानंतर तो अर्जुन आनंदरूपी धनाने थोर झाला आणि श्रीकृष्णाच्या चरणांचे सेवन करण्यात जगामधे तोच एक चतुर होता. ॥११-७०१॥

तेणें देवाचिया दोनही मूर्ती । निकिया न्याहाळिलिया चित्तीं ।
तंव विश्वरूपाहूनि कृष्णाकृतीं । देखिला लाभु ॥ ७०२ ॥
त्याने देवाच्या दोन्ही मूर्ती चित्तामधे चांगल्या न्याहाळून पाहिल्या, तेव्हा विश्वरूपापेक्षा कृष्णाच्या रूपामध्ये फायदा आहे असे त्यास आढळून आले. ॥११-७०२॥

परि तयाचिये जाणिवे । मानु न कीजेचि देवें ।
जें व्यापकाहूनि नव्हे । एकदेशी ॥ ७०३ ॥
परंतु त्याच्या या समजुतीला देवाने मान दिला नाहीच, कारण व्यापक रूपापेक्षा एकदेशीरूप बरे नव्हे असे श्रीकृष्ण म्हणाले. ॥११-७०३॥

हेंचि समर्थावयालागीं । एक दोन चांगी ।
उपपत्ती शारङ्गी । दाविता जाहला ॥ ७०४ ॥
आणि हेच चतुर्भुजरूपापेक्षा विश्वरूप बरे ही गोष्ट) स्थापित करण्याकरता एक दोन चांगल्या युक्ती श्रीकृष्ण दाखवते झाले. ॥११-७०४॥

तिया ऐकोनि सुभद्राकांतु । चित्तीं आहे म्हणतु ।
तरि होय बरवें दोन्हीं आंतु । तें पुढती पुसों ॥ ७०५ ॥
त्या युक्ती ऐकून अर्जुन मनात म्हणतो, या दोनही रूपांमधे कोणते बरे आहे, ते देवाला आता यापुढे विचारू. ॥११-७०५॥

ऐसा आलोचु करूनि जीवीं । आतां पुसती वोज बरवी ।
आदरील ते परिसावी । पुढें कथा ॥ ७०६ ॥
याप्रमाणे मनात विचार करून आता तो प्रश्न विचारण्याचा चांगला प्रकार स्वीकारील, ती कथा पुढे आहे ती ऐकावी. ॥११-७०६॥

प्रांजळ ओंवीप्रबंधें । गोष्टी सांगिजेल विनोदें ।
तें परिसा आनंदें । ज्ञानदेवो म्हणे ॥ ७०७ ॥
निवृत्तिनाथांच्या पायांच्या कृपेने ती कथा सोप्या अशा ओवीछंदात मजेने सांगण्यात येईल असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ॥११-७०७॥

भरोनि सद्‌भावाची अंजुळी । मियां वोंवियाफुलें मोकळीं ।
अर्पिलीं अंघ्रियुगुलीं । विश्वरूपाच्या ॥ ७०८ ॥
मी शुद्ध भावनारूप ओंजळीत ओव्यारूपी मोकळी फुले भरून विश्वरूपाच्या दोन्ही पायांवर अर्पण केली (असे ज्ञानदेव म्हणतात). ॥११-७०८॥



इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां एकादशोऽध्यायः ॥




GO TOP