श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
तृतीयः स्कन्धः
एकादशोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


सत्यव्रताख्यानवर्णनम्

लोमश उवाच
न वेदाध्ययनं किञ्चिज्जानाति न जपं तथा ।
ध्यानं न देवतानाञ्च न चैवाराधनं तथा ॥ १ ॥
नासनं वेद विप्रोऽसो प्राणायामं तथा पुनः ।
प्रत्याहारं तु नो वेद भूतशुद्धिञ्च कारणम् ॥ २ ॥
न मन्त्रकीलकं जाप्यं गायत्रीञ्च न वेद सः ।
शौचं स्नानविधिञ्चैव तथाचमनकं पुनः ॥ ३ ॥
प्राणाग्निहोत्रं नो वेद बलिदानं न चातिथिम् ।
न सन्ध्यां समिधो होमं विवेद च तथा मुनिः ॥ ४ ॥
सोऽकरोत्प्रातरुत्थाय यत्किञ्चिद्दन्तधावनम् ।
स्नानं च शूद्रवत्तत्र गंगायां मन्त्रवर्जितम् ॥ ५ ॥
फलान्यादाय वन्यानि मध्यान्हेऽपि यदृच्छया ।
भक्ष्याभक्ष्यपरिज्ञानं न जानाति शठस्तथा ॥ ६ ॥
सत्यं ब्रूते स्थितस्तत्र नानृतं वदते पुनः ।
जनैः सत्यतपा नाम कृतमस्य द्विजस्य वै ॥ ७ ॥
नाहितं कस्यचित्कुर्यान्न तथाऽविहितं क्वचित् ।
सुखं स्वपिति तत्रैव निर्भयश्‍चिन्तयन्निति ॥ ८ ॥
कदा मे मरणं भावि दुःखं जीवामि कानने ।
जीवितं धिक्च मूर्खस्य तरसा मरणं ध्रुवम् ॥ ९ ॥
दैवेनाहं कृतो मूर्खो नान्योऽत्र कारणं मम ।
प्राप्य चैवोत्तमं जन्म वृथा जातं ममाधुना ॥ १० ॥
यथा वन्ध्या सुरूपा च यथा वा निष्फलो द्रुमः ।
अदुग्धदोहा धेनुश्‍च तथाऽहं निष्फलः कृतः ॥ ११ ॥
किं नु निन्दाम्यहं दैवं नूनं कर्म ममेदृशम् ।
न दत्तं पुस्तकं कृत्वा ब्राह्मणाय महात्मने ॥ १२ ॥
न वै विद्या मया दत्ता पूर्वजन्मनि निर्मला ।
तेनाहं कर्मयोगेन शठोऽस्मि च द्विजाधमः ॥ १३ ॥
न च तीर्थे तपस्तप्तं सेविता न च साधवः ।
न द्विजाः पूजिता द्रव्यैस्तेन जातोऽस्मि दुष्टधीः ॥ १४ ॥
वर्तन्ते मुनिपुत्राश्‍च वेदशास्त्रार्थपारगाः ।
अहं सुमूढः सञ्जातो दैवयोगेन केनचित् ॥ १५ ॥
न जानामि तपस्तप्तुं किं करोमि सुसाधनम् ।
मिथ्यायं मेऽत्र सङ्कल्पो न मे भाग्यं शुभं किल ॥ १६ ॥
दैवमेव परं मन्ये धिक्पौरुषमनर्थकम् ।
वृथा श्रमकृतं कार्यं दैवाद्‌भवति सर्वथा ॥ १७ ॥
ब्रह्मा विष्णुश्च रुद्रश्च शक्राद्याः किल देवताः ।
कालस्य वशगाः सर्वे कालो हि दुरतिक्रमः ॥ १८ ॥
एवंविधान्वितर्कांस्तु कुर्वाणोऽहर्निशं द्विजः ।
स्थितस्तत्राश्रमे तीरे जान्हव्याः पावने स्थले ॥ १९ ॥
विरक्तः स तु सञ्जातः स्थितस्तत्राश्रमे द्विजः ।
कालातिवाहनं शान्तश्‍चकार विजने वने ॥ २० ॥
एवं स्थितस्य तु वने विमलोदके वै
     वर्षाणि तत्र नवपञ्च गतानि कामम् ।
नाराधनं न च जपं न विवेद मन्त्रं
     कालातिवाहनमसौ कृतवान् वने वै ॥ २१ ॥
जानाति तस्य विततं व्रतमेव लोकः
     सत्यं वदत्यपि मुनिः किल नामजातम् ।
जातं यशश्‍च सकलेषु जनेषु कामं
     सत्यव्रतोऽयमनिशं न मृषाभिभाषी ॥ २२ ॥
तत्रैकदा तु मृगयां रममाण एव
     प्राप्तो निषादनिशठो धृतचापबाणः ।
क्रीडन् वनेऽतिविपुले यमतुल्यदेहः
     क्रूराकृतिर्हननकर्मणि चातिदक्षः ॥ २३ ॥
तेनातिकृष्टेन शरेण विद्धः
     कोलः किरातेन धनुर्धरेण ।
पलायमानो भयविह्वलश्‍च
     मुनेः समीपं विद्रुतो जगाम ॥ २४ ॥
विकंपमानो रुधिरार्द्रदेहो
     यदा जगामाश्रममण्डलं वै ।
कालस्तदातीव दयार्द्रभावं
     प्राप्तो मुनिस्तत्र समीक्ष्य दीनम् ॥ २५ ॥
अग्रे व्रजन्तं रुधिरार्द्रदेहं
     दृष्ट्वा मुनिः सूकरमाशु विद्धम् ।
दयाभिवेशादतिकम्पमानः
     सारस्वतं बीजमथोच्चचार ॥ २६ ॥
अज्ञातपूर्वं च तथाश्रुतञ्च
     दैवान्मुखे वै समुपागतञ्च ।
न ज्ञातवान्बीजमसौ विमूढो
     ममज्ज शोके स मुनिर्महात्मा ॥ २७ ॥
कोलः प्रविश्याश्रममण्डलं तद्
     गतो निकुञ्जे प्रविलीय गूढम् ।
अप्राप्तमार्गो दृढनिर्विण्णचेताः
     प्रवेपमानः शरपीडितत्वात् ॥ २८ ॥
ततः क्षणादाकरणान्तकृष्टं
     चापं दधानोऽतिकरालदेहः ।
प्राप्तस्तदन्ते स च मृग्यमाणो
     निषादराजः किल काल एव ॥ २९ ॥
दृष्ट्वा मुनिं तत्र कुशासने स्थितं
     नाम्ना तु सत्यव्रतमद्वितीयम् ।
व्याधः प्रणम्य प्रमुखे स्थितोऽसौ
     पप्रच्छ कोलः क्व गतो द्विजेश ॥ ३० ॥
जानामि तेऽहं सुव्रतं प्रसिद्धं
     तेनाद्य पृच्छे मम बाणविद्धः ।
क्षुधार्दितं मे सकलं कुटुम्बं
     विभर्तुकामः किल आगतोऽस्मि ॥ ३१ ॥
वृत्तिर्ममैषा विहिता विधात्रा
     नान्याऽस्ति विप्रेन्द्र ऋतं ब्रवीमि ।
भर्तव्यमेवेह कुटुम्बमञ्जसा
     केनाप्युपायेन शुभाशुभेन ॥ ३२ ॥
सत्यं ब्रवीत्वद्य सत्यव्रतोऽसि
     क्षुधातुरो वर्तते पोष्यवर्गः ।
क्वासो गतः सूकरो बाणविद्धः
     पृच्छाम्यहं वाडव ब्रूहि तूर्णम् ॥ ३३ ॥
तेनेति पृष्टः स मुनिर्महात्मा
     वितर्कमग्नः प्रबभूव कामम् ।
सत्यव्रतं मेऽद्य भवेन्न भग्नं
     न दृष्ट इत्युच्चरितेन किं वै ॥ ३४ ॥
गतोऽत्र कोलः शरविद्धदेहः
     कथं ब्रवीम्यद्य मृषाऽमृषा वा ।
क्षुधार्दितोऽयं परिपृच्छतीव
     दृष्ट्वा हनिष्यत्यपि सूकरं वै ॥ ३५ ॥
सत्यं न सत्यं खलु यत्र हिंसा
     दयान्वितं चानृतमेव सत्यम् ।
हितं नराणां भवतीह येन
     तदेव सत्यं न तथाऽन्यथैव ॥ ३६ ॥
हितं कथं स्यादुभयोर्विरुद्धयो-
     स्तदुत्तरं किं न यथा मृषा वचः ।
विचारयन्वाडव धर्मसङ्कटे
     न प्राप वक्तुं वचनं यथोचितम् ॥ ३७ ॥
बाणाहतं वीक्ष्य दयान्वितञ्च
     कोलं तदन्ते समुदाहृतं वचः ।
तेन प्रसन्ना निजबीजतः शिवा
     विद्यां दुरापां प्रददौ च तस्मै ॥ ३८ ॥
बीजोच्चारणतो देव्या विद्या प्रस्फुरिताखिला ।
वाल्मीकेश्‍च यथापूर्वं तथा स ह्यभवत्कविः ॥ ३९ ॥
तमुवाच द्विजो व्याधं सम्मुखस्थं धनुर्धरम् ।
सत्यकामस्तु धर्मात्मा श्लोकमेकं दयापरः ॥ ४० ॥
या पश्यति न सा ब्रूते या ब्रूते सा न पश्यति ।
अहो व्याध स्वकार्यार्थिन् किं पृच्छसि पुनः पुनः ॥ ४१ ॥
इत्युक्तस्तु तदा तेन गतोऽसौ पशुहा पुनः ।
निराशः सूकरे तस्मिन्परावृत्तो निजालये ॥ ४२ ॥
ब्राह्मणस्तु कविर्जातः प्राचेतस इवापरः ।
प्रसिद्धः सर्वलोकेषु नाम्ना सत्यव्रतो द्विजः ॥ ४३ ॥
सारस्वतं ततो बीजं जजाप विधिपूर्वकम् ।
पण्डितश्‍चातिविख्यातो द्विजोऽसौ धरणीतले ॥ ४४ ॥
प्रतिपर्वसु गायन्ति ब्राह्मणा यद्यशः सदा ।
आख्यानं चातिविस्तीर्ण स्तुवन्ति मुनयः किल ॥ ४५ ॥
तच्छ्रुत्वा सदनं तस्य समागम्य तदाश्रमे ।
येन त्यक्तः पुरा तेन गृहं नीतोऽतिमानितः ॥ ४६ ॥
तस्माद्‌राजन्सदा सेव्या पूजनीया च भक्तितः ।
आदिशक्तिः परा देवी जगतां कारणं हि सा ॥ ४७ ॥
तस्या यज्ञं महाराज कुरु वेदविधानतः ।
सर्वकामप्रदं नित्यं निश्‍चयं कथितं पुरा ॥ ४८ ॥
स्मृता सम्पूजिता भक्त्या ध्याता चोच्चारिता स्तुता ।
ददाति वाञ्छितानर्थान्कार्यदा तेन कीर्त्यते ॥ ४९ ॥
अनुभावमिदं राजन् कर्तव्यं सर्वथा बुधैः ।
दृष्ट्वा रोगयुतान्दीनान्क्षुधितान्निर्धनाञ्छठान् ॥ ५० ॥
जनानार्तांस्तथा मूर्खान्पीडितान्वैरिभिः सदा ।
दासानाज्ञाकरान्क्षुद्रान्विकलान्विह्वलानथ ॥ ५१ ॥
अतृप्तान्भोजने भोगे सदार्तानजितेन्द्रियान् ।
तृष्णाधिकानशक्तांश्‍च सदाधिपरिपीडितान् ॥ ५२ ॥
तथा विभवसम्पन्नान् पुत्रपौत्रविवर्धनान् ।
पुष्टदेहांश्‍च सम्भोगैः संयुतान्वेदवादिनः ॥ ५३ ॥
राजलक्ष्म्या युताञ्छूरान्वशीकृतजनानथ ।
स्वजनैरवियुक्तांश्‍च सर्वलक्षणलक्षितान् ॥ ५४ ॥
व्यतिरेकान्वयाभ्यां च विचेतव्यं विचक्षणैः ।
एभिर्न पूजिता देवी सर्वार्थफलदा शिवा ॥ ५५ ॥
समाराधिता च तथा नृभिरेभिः सदाम्बिका ।
यतोऽमी सुखिनः सर्वे संसारेऽस्मिन्न संशयः ॥ ५६ ॥
व्यास उवाच
इति राजञ्छ्रुतं तत्र मया मुनिसमागमे ।
लोमशस्य मुखात्कामं देवीमाहात्म्यमुत्तमम् ॥ ५७ ॥
इति सञ्चिन्त्य राजेन्द्र कर्तव्यं च सदार्चनम् ।
भक्त्या परमया देव्याः प्रीत्या च पुरुषर्षभ ॥ ५८ ॥
इति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
तृतीयस्कन्धे सत्यव्रताख्यानवर्णनं नामैकादशोऽध्यायः ॥ ११ ॥


उतथ्याला ( सत्यव्रताला ) विद्याप्राप्ती

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

लोमेश म्हणतात, "वेदाध्ययन, जप, देवतांचे ध्यान व आराधन ह्यापैकी त्याला काहीएक माहीत नसून आसन, प्राणायाम, प्रत्याहार, भूतशुद्धि व आचमन ह्यातीलही त्याला काही ठाऊक नव्हते. मंत्र, कीलक, जाप्य, गायत्री, शौच, स्नानविधि व आचमन ह्यातीलही त्याला काही ठाऊक नव्हते. प्राणग्निहोत्र, बलिदान, अतिथी, संध्या व समिधांचा होम ह्यापैकी त्या मुनीला कशाचीच ओळख नव्हती.

प्रातःकाली उठून तो दात घाशीत असे व गंगेमध्ये शूद्राप्रमाणे मंत्ररहित स्नान करीत असे. माध्यान्हसमयी सहज प्राप्त होणारी वनातील फळे आणून तो सेवन करीत असे. परंतु तो शठ भक्ष्याभक्ष्य मुळीच जाणत नसे. तथापि त्या ठिकाणी राहून तो कधीही असत्य भाषण न करता सत्य भाषणच करीत असे. ह्यामुळे लोकांनी त्या द्विजाचे नाव सत्यव्रत किंवा सत्यवान असे ठेविले होते. तो कोणाचे हित अथवा अहित करीत नसे आणि पुढे सांगितल्याप्रमाणे चिंतन करीत तो निर्भयपणे रात्री खुशाल निद्रा घेत असे.

तो मुनि म्हणत असे, मला मरण केव्हा बरे येणार आहे ! वनामध्ये माझे वास्तव्य दुःखाने होत आहे. धिक्कार असो मज मूर्खाच्या जीविताला ! मूर्ख राहून जगण्यापेक्षा तडकाफडकी मरण येणे निःसंशय चांगले. दैवाने मला मूर्ख केले आहे. माझ्या मूर्खत्वाचे कारण दैवाशिवाय इतर कोणीही नसावे. उत्तम जन्म प्राप्त होऊन सांप्रत हा माझा जन्म मूढपणामुळे व्यर्थ झाला आहे. रूपवती वंध्येप्रमाणे किंवा निष्फळ वृक्षाप्रमाणे अथवा दूध न देणार्‍या धेनूप्रमाणे दैवाने मला निष्फळ केले आहे. परंतु मी दैवाची तरी का बरे निंदा करावी ? खरोखर माझे कर्मच अशा प्रकारचे आहे. पुस्तक लिहून महात्म्या ब्राह्मणाला मी दिले नाही आणि पूर्वजन्मी मी कोणाला निर्मल विद्याही दिलेली नाही. त्या कर्माच्या योगाने मी शठ व अधम द्विज झालो आहे. तीर्थाचे ठिकाणी मी तप केले नाही. साधूंची सेवा माझ्या हातून घडली नाही आणि द्रव्यद्वारा द्विजपूजनही मी केलेले नाही. त्यामुळे मी मूढमति उत्पन्न झालो आहे. वेदशास्त्रातील रहस्यामध्ये पारंगत असे माझ्या बरोबरीचे मुनिपुत्र आहेत. परंतु काही दैवयोगामुळे मी मात्र अति मूढ जन्मलो आहे. तपश्चर्या कशी करावी हे मला ठाऊक नाही. तस्मात् मी आता कोणत्या बरे चांगल्या साधनाचे अवलंबन करू ? किंवा खरोखर माझे दैवच नीट नसल्यामुळे हा माझा पश्चातापही व्यर्थच आहे. निरुपयोगी असलेल्या त्या पौरुषाला धिक्कार असो !

दैवच श्रेष्ठ असे मला वाटते. पौरुषाने केलेले कार्य दैवाने सर्वथा व्यर्थ होऊन जाते. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर व इंद्रप्रभूति देव हे सुद्धा खरोखर सर्व कालाधीन आहेत व कालाचे उल्लंघन होणे दुर्घट आहे असे मला वाटते."

ह्याप्रमाणे रात्रंदिवस तर्क करीत करीत तो ब्राह्मण जान्हवीचे तीरावरील पवित्र स्थळी असलेल्या त्या आश्रमामध्ये राहिला. तो द्विज काही दिवसांनी अतिशय विरक्त झाला आणि शांतपणे राहून त्या निर्जन वनामध्ये आपले आयुष्याचे दिवस घालवू लागला. निर्मल उदकाने युक्त असलेल्या त्या वनामध्ये ह्याप्रमाणे तो द्विज राहू लागला असता खरोखर त्याची एकंदर चवदा वर्षे लोटली. पूजन, जप व मंत्र ह्यापैकी काहीएक न जाणता वनामध्ये त्याने आपल्या आयुष्याचा काळ व्यर्थ घालविला.

हा मुनि सत्य भाषण करीत असल्यामुळे ह्याचे तेवढेच प्रसिद्ध व्रत लोक जाणीत होते. त्यामुळेच खरोखर त्याला सत्यव्रत हे नाव पडले होते. इतकेच नव्हे तर "हा सतत सत्य भाषणच करीत असून कधीही अनृत भाषण करीत नाही."अशी खरोखर सर्व लोकांमध्ये त्याची कीर्ती झाली होती.

एकदा कोणी एक मृगयेमध्येच रममाण होणारा शठ निषाद, हा राहात होता त्या अति विपुल वनामध्ये मृगया करीत करीत प्राप्त झाला. त्याचा देह यमासारखा असून मुद्रा क्रूर होती. हातामध्ये त्याने धनुष्य व बाण धारण केले होते आणि प्राणिवध करण्याविषयी तो अतिशय तत्पर होता. त्या धनुर्धर भिल्लाने अतिशय आकर्ण करून मारलेला बाण एका वराहाला लागला असता भयाने विव्हल होऊन तो वराह पळू लागला व पळता पळता त्या मुनीचे समीप आला.

ज्याचे शरीर रक्ताने भरून गेलेले आहे असा तो वराह कापत कापत जेव्हा आश्रमामध्ये आला तेव्हा त्याची दीन मुद्रा अवलोकन करून त्या उतथ्यमुनीचे अंतःकरण दयेने आर्द्र झाले. जोराने विद्ध झाल्यामुळे रक्ताने ज्याचे शरीर भिजून गेले आहे असा तो वराह पुढे पळत असलेला अवलोकन करिताक्षणी उतथ्य दयेच्या आवेशामुळे थरथर कापू लागला.

' ऐ ऐ ' ह्या सारस्वत बीजाचा त्याने स्वाभाविकच उच्चार केला. पूर्वी कधीही श्रुत व ज्ञान नसलेले ते सारस्वत बीज सुदैवाने त्यावेळी त्याच्या मुखामध्ये आले. परंतु तो महात्मा मुनि अत्यंत मोहित होऊन शोकसागरामध्ये मग्न झाला होता. त्यामुळे किंवा अज्ञानपणामुळे त्याच्या ते ध्यानी आले नाही.

इतक्यात आश्रमामध्ये प्रवेश करून तो वराह एका झाडीमध्ये दडला व सुटून जाण्यास मार्ग न सापडल्यामुळे तो अतिशय खिन्न झाला. तो बाणप्रहरांनी पीडित झाल्यामुळे थरथर कापू लागला. तदनंतर कानापर्यंत ओढिलेले धनुष्य व अतिशय उग्र देह धारण करणारा आणि खरोखर कालाप्रमाणे असलेला तो निषादराज वराहाला शोधीत शोधीत एका क्षणामध्ये त्या सत्यव्रत ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या मुनीजवळ आला. त्या अद्वितीय मुनीला दर्भासनावर बसला असल्याचे त्याने पाहिले. तेव्हा संमुख होऊन व्याधाने त्यास प्रणाम केला व तो त्याला म्हणाला, "हे द्विजराज, वराह कोणीकडे गेला ?

मी आपले प्रसिद्ध व उत्कृष्ट सत्य व्रत जाणीत आहे. म्हणून माझ्या बाणाने विद्ध झालेला वराह कोठे गेला हे आपणाला विचारीत आहे. माझे सर्व कुटुंब क्षुधाने व्याकुल झाले आहे. त्याचे पोषण व्हावे एतदर्थ खरोखर शिकार करण्याकरिता मी येथे आलो आहे. हे विप्रश्रेष्ठा, विधात्याने हेच माझ्या उपजीविकेचे साधन नेमलेले आहे. दुसरे साधन नाही हे मी आपणाला सत्य सांगत आहे. कोणत्या तरी बर्‍यावाईट उपायाने मला कसे तरी कुटुंबपोषण केलेच पाहिजे.

हे द्विज, तू सत्यव्रत आहेस. ह्यास्तव मी तुला आता पुनः सत्य सांगतो की पोष्यवर्ग क्षुधेने व्याकुल झालेला आहे. तस्मात् बाण लागलेला तो वराह कोणीकडे गेला हे मी आपणाला विचारीत आहे. हे विप्रा, मला आपण सत्वर सांगा."

ह्याप्रमाणे त्याने विचारला असता तो महात्मा मुनि खरोखर वितर्कांमध्ये मग्न होऊन गेला व विचार करू लागला, वराह माझ्या दृष्टीस पडला नाही असे म्हटल्याने माझे सत्यव्रत तप भग्न होणार नाही ना ? शरीराला बाण लागलेला वराह इकडे गेला असे मी आज खरे तरी कसे बोलावे ? अथवा असत्य भाषण तरी कसे करावे ? ज्याअर्थी हा क्षुधेने व्याकुल होऊन विचारीत आहे त्या अर्थी वराह दृष्टीस पडताक्षणी हा त्याचा वध करीलच.

ज्या यथार्थ भाषणाने हिंसा होत असेल ते सत्य नसून दयेने युक्त असलेले अनृत भाषणच सत्य होय. ज्याच्या योगाने प्राणिमात्राचे हित होत असेल तेच सत्य होय, ज्याच्या योगाने अकल्याण होत असेल तर सत्यच नव्हे. तस्मात् परस्पर विरुद्ध असलेल्या ह्या उभयतांचे हित व्हावे कसे ? आणि ज्यात असत्य भाषण नाही असे उत्तर तरी मी काय द्यावे ? "

ह्याप्रमाणे धर्माच्या अडचणीसंबंधाने तो उतथ्य विचार करू लागला असता, हे विप्रा जमदग्ने, योग्य उत्तर काय द्यावे हे त्याला काहीएक सुचेना.

हे जमदग्ने, बाणाने विद्ध आणि म्हणूनच दयेला पात्र असा वराह दृष्टीस पडल्यावर त्या उतथ्याच्या मुखातून ' ऐ ऐ ' असा उच्चार आला. तो स्वतःच्या बीजाचा उच्चार झाला असे समजून कल्याणी देवी प्रसन्न झाली तिने त्याला दुर्लभ विद्या दिली. देवीच्या बीजाचा उच्चार झाल्यामुळे त्याला संपूर्ण विद्येची स्फूर्ति झाली. पूर्वी होऊन गेलेल्या वाल्मीकीप्रमाणे तो उतथ्य कवि झाला.

नंतर धनुष्य घेऊन संमुख स्थित असलेल्या व्याधाला अनुलक्षून त्या धर्मात्म्या व दयाळू सत्यकाम द्विजाने सांगितले की, "जी पहात आहे तिला बोलता येत नाही व जिला बोलता येत आहे तिला दिसत नाही. तस्मात् हे स्वकार्यसाधु व्याधा, फिरून फिरून तू का बरे विचारीत आहेस ? "

ह्याप्रमाणे तेथे येऊन विचारीत असलेल्या व्याधाला त्याने सांगितले असता तो पशुघातकी व्याध त्या वराहाविषयी निराश झाला आणि आपल्या घरी परत गेला.

इकडे तो ब्राह्मण उतथ्य दुसरा वाल्मिकीच की काय असा कवि झाला आणि सत्यव्रत ह्या नावाने सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध झाला. तदनंतर सारस्वत बीजाचा त्याने यथाविधी जप केला असता तो द्विज भूतलावर अतिविख्यात पंडित झाला. प्रत्येक पर्वाचे पहिल्या दिवशी ब्राह्मण सर्वदा त्याची कीर्ती गात असतात. मुनीजनहो ते त्या अतिविस्तृत आख्यानाची प्रशंसा करीत असतात.

ते वृत्त श्रवण केल्यानंतर ज्या पित्याने त्याचा प्रथम त्याग केला होता तो त्याच आश्रमामध्ये त्याच्या पर्णकुटिकेत आला आणि मोठ्या मानाने त्याला घरी घेऊन गेला. म्हणून हे राजा, परा देवी जी आदिशक्ती तिचेच सर्वदा भक्तिने सेवन व पूजन केले पाहिजे. कारण तीच जगताच्या उत्पत्तीचे कारण आहे. हे महाराज, वैदिक अनुष्ठानाने तू तिचे यजन कर. तिचे यजन सर्वदा सर्व मनोरथ परिपूर्ण करणारे आहे असा सिद्धांत पूर्वीच कथन केला आहे. भक्तिने तिचे स्मरण, पूजन, ध्यान, नामोच्चारण अथवा स्तवन केले असता ती इच्छित प्राप्त करून देते. म्हणून तिला कामप्रदा असे म्हणतात.

हे राजा, असे पुढे दर्शविलेले अनुमान विचारी लोकांना सर्वथा करणे अवश्य आहे. रोगी, दीन, क्षुधित, निर्धन, शठ, आर्तजन, मूर्ख, शत्रूंनी सर्वदा पीडित, दास, आज्ञांकित, क्षूद्र, विकल, विव्हल, अधाशी, भोगाविषयी वखवखलेले, अजितेंद्रिय, लोभाविष्ट, अशक्त, सर्वदा काळजीने झुरणारे असे लोक दृष्टीस पडले असता त्याचप्रमाणे वैभवसंपन्न, पुत्रपौत्रांनी वंशवृद्धी करणारे, पुष्ट, संभोगयुक्त, वेदवेत्ते, राजश्रीविराजित, शूर, ज्यांनी लोक आपलेसे करून घेतले आहेत, स्वजनांशी ज्यांचा वियोग होत नाही व सर्वलक्षणसंपन्न असे लोक दृष्टीस पडले असता असे अनुमान करावे.

पहिले सर्व मनोरथ सफल करणार्‍या कल्याणी देवीचे पूजन केले नाही असे दुःखी आहेत आणि दुसरे सर्वदा अंबिकेचे पूजन केलेले आहेत, कारण ते सर्व ह्या संसारामध्ये सुखी आहेत. असे अन्वयव्यतिरेक प्रमाणाने विचारी लोकांनी निःसंशय समजावे.

व्यास म्हणाले, "हे राजा, त्या ठिकाणी मुनिसमाजामध्ये लोमेशाच्या मुखातून ह्याप्रमाणे देवीचे उत्कृष्ट माहात्म्य खरोखर मी श्रवण केले आहे. हे पुरुषश्रेष्ठा, हे राजेंद्रा ह्याचा विचार करून परमभक्तीने व आनंदाने सर्वदा देवीचे पूजन कर.



अध्याय अकरावा समाप्त

GO TOP