प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

२० सप्टेंबर

प्रपंचाची आठवण । हेंच दुःखाचें कारण ॥


    Download mp3

आपण रामापाशी मागावे एक । 'तुझे इच्छेने सर्व जगत चालते देख ।

त्यातील मी एक पामर । रामा, तुला कसा झालो जड ? ॥

रामा, अन्यायाच्या कोटी । तूच माय घाली पोटी ॥

मातेलागी आले शरण । त्याला नाही दिले मरण ।

ऐसे ऐकिले आजवर । कृपा करी तू रघुवीर ॥

दाता राम हे जाणून चित्ती । म्हणून आलो दाराप्रति ॥

आता रामा नको पाहू अंत । तुजवीण शून्य वाटे जगत ॥

ज्याचा ज्याचा मी केला स्वार्थ । ते ते झाले दुःखाला कारण ।

आता, रामा, कोठे जाऊ । तुला टाकून कोठे राहू? ॥

ऐसे कोठे पाहावे स्थान । जेथे होईल समाधान ? ॥

आता असो नसो भाव । मी रामा ! तुझा झालो देख ॥

आता कसे तरी करी । मी पडलो तुझ्या दारी ॥

आता लौकिकाची चाड । नाही मला त्याची आवड ।

हे ठसावे चित्ती । कृपा करी रघुपति ॥

आता मनास येई तसे करी । माझे मीपण हिरोनि जाई ॥


जोवर देहाची संगति । तोवर मी-माझे ही वृत्ति ।

राहील अभिमानाला धरून । तेथे न राहे कधी अनुसंधान ॥

काळोख अत्यंत मातला । घालवायला उपाय न दुजा सुचला ॥

होता सूर्याचे आगमन । काळोख जाईल स्वतः आपण ॥

प्रपंचातील संकटे अनिवार । माझ्या बोलण्याचा करावा विचार । आता कष्टी न व्हावे फार ॥

प्रपंचाची आठवण । हेच दुःखाचे कारण ॥

तेच घोकीत बसल्याने । न होई आनंदरूप स्मरण ॥

सुखदुःखाची उत्पत्ति । आपलेपणात आहे निश्चित ॥

स्वार्थ म्हणजेच आपलेपण । म्हणून माझे मीच दुःखाला कारण ॥

आपण आपलेपणाने वागत गेले । सुखदुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले ॥

अमुक व्हावे, अमुक होऊ नये, । याचे कसे होईल, त्याचे कसे होईल, ।

ही चित्ताची अस्वस्थता । याचे नाव चिंता ॥

सुखदुःखे चित्ताची न राहे स्थिरता । तीच त्याची खरी अवस्था ॥

सुखदुःख परिस्थितीवर नसते । आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते ॥

ज्यात एकाला सुख वाटते । तेच दुसर्‍याला दुःखाला कारण होते ॥

दुःखाचे मूळ कारण । जगत सत्य मानले आपण ॥

देहाने कष्ट केले फार । त्यातील फळाचा घेऊन आधार ॥

फळ नाही हाती आले । दुःखाला कारण ते झाले ॥

आपले चित्त झाले विषयाधीन । नाही दुःखास दुसरे कारण ॥

मागील गोष्टींची आठवण । पुढील गोष्टींचे चिंतन ।

हेच दुःखाला खरे कारण । याला एकच उपाय जाण ।

अखंड असावे अनुसंधान ॥ प्रपंच न मानावा सुखाचा । तो असावा कर्तव्याचा ॥

वृत्ति होऊ द्यावी स्थिर । चित्ती भजावा रघुवीर ॥


२६४. रामा, सुखदुःख दोन्ही । केले अर्पण तुझे चरणी ॥
आता मनास येई तैसे ठेवी । याविण दुजे न मागणे काही ॥