प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

१७ मे

मी भगवंताचा आहे ही अखंड जाणीव ठेवावी.


    Download mp3

आपल्याला काही हवे असे वाटले आणि ते तसे झाले नाही, म्हणजे तळमळ लागते. परंतु सर्व परमात्माच करतो आहे असे मानले, म्हणजे काळजीचे कारण उरत नाही. आपण 'देव आहे' असे मानतो, पण आपला तो खरा विश्वास आहे का ? एकादा मनुष्य बुडायला लागला, म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी हा आपल्याला तारील असा त्याला विश्वास वाटतो, आणि तो त्याला धरून आपणही त्याच्या बरोबर बुडतो. म्हणून म्हणतो, 'देव आहे' असा आपला खरा विश्वास नसतो, आपण नुसते तोंडाने म्हणतो एवढेच ! नाही तर आपल्याला काळजी का वाटावी ? प्रत्यक्ष देव पुढे उभा राहिला तरी आपल्या मागची काळजी आणि सुखदुःखे संपणार नाहीत. याचे कारण म्हणजे, परमेश्वरावरचा आपला विश्वासच डळमळीत असतो. वास्तविक, परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यावर सुखदुःख मानण्याचे कारण नाही. परमेश्वर सर्वव्यापी आहे. तो जसा माझ्यात आहे, तसा दुसर्‍यातही आहे; म्हणून दुसर्‍याने काहीही केले तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचे कारण नाही. तरी अशी भावना ठेवून वागावे की, मी देवाचा आहे, तो माझा पाठिराखा आहे, आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्याने साधते. म्हणून मी आजपासून सतत नामस्मरण करीत राहणार असा निश्चय करावा, आणि त्या दृष्टीने प्रयत्‍न चालू ठेवावा. परमेश्वराला शरण जाऊन 'मला तसे वागण्याची बुद्धी द्यावी' म्हणून त्याची प्रार्थना करावी. मनाला पहिल्याने थोडी बळजबरी करावी लागेल. लहान मुलांना शाळेत जाण्याकरिता सुरुवातीला थोडी बळजबरी करावी लागते. मुलीला प्रथम सासरी पाठवितानाही तसेच करावे लागते. आपण थोडा तरी नियम करावा. उदाहरणार्थ, जेवायच्या आधी, रात्री निजताना, सकाळी उठताना नाम घ्यायचेच; भगवंताची आठवण करायचीच. असे केले तर ते आयुष्यात उपयोगी पडेल. प्रपंचाचा प्रयत्‍न आज जो चालू आहे तसाच करीत जावा, पण 'मला भगवंत हवा' असे म्हणत जावे. मनामध्ये भगवंताची आस ठेवावी, म्हणजे हळूहळू ती वाढत जाईल, आणि तिचे पर्यवसान ध्यासामध्ये होईल. समजा एखाद्या माणसाला घर बांधावयाचे आहे; 'मला घर बांधायचे आहे' असे तो म्हणत जातो, आणि त्यासाठी पैसे शिल्लक टाकतो. दागिने करायची वेळ आली तर ते नको म्हणतो, कारण पुढे घर बांधायचे आहे. हे जसे खरे, त्याचप्रमाणे 'भगवंत मला हवा आहे' असे नुसते म्हणत गेल्याने देखील मनुष्य निव्वळ प्रपंचातच गुरफटून न राहता, विषय बेताने भोगेल. खरा ध्यास लागल्यावर, ती वस्तू मिळाल्यावाचून चैन पडणारच नाही.


१३८. ज्याचा भगवंतावर विश्वास, त्याला समाधान खास !