प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

२२ एप्रिल

सत्समागम हा सर्व साधनांचा राजा !


    Download mp3

मनुष्यजन्माला येणे, संतांची भेट होणे, आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणे, या तिन्ही गोष्टी फार दुर्घट आहेत. म्हणूनच संतसमागमासारखा लाभ नाही असे म्हणतात. सत्समागम म्हणजे सर्व साधनांचा राजा होय. काही मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात, मग मिळवायचे कुठे राहते ? संत बनणे व्यावहारिक दृष्ट्या काही सुखाचे नसते. एखाद्या स्नानसंध्याशील आणि सदाचरणी माणसाच्या अंगावर तेज दिसते, कारण देहाला धरून झालेल्या कर्माचे ते तेज असते; पण एखाद्या सत्पुरुषाच्या देहावर बाहेर तसे तेज दिसणारही नाही. आत वावरणार्‍या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो. देहाच्या आधाराने भोगण्याची या जगामधली जी सुखे आहेत, त्यांचे मार्ग सत्पुरुषापेक्षा आपण प्रापंचिक लोक जास्त जाणतो, परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचे टिकणारे, आणि देहाला विसरून आणि देवाला स्मरून जे मिळवायचे, असे भगवंताचे सुख आहे. ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे. विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे. हा संतसंगतीचा परिणाम. असा जो असेल तोच संत, नव्हे प्रत्यक्ष भगवंत होय. अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. संत आपल्याला सत्यस्वरूपाची ओळख करून देतात. सत्पुरुषाने आखून दिलेल्या मार्गाने कायावाचामनाने जे कर्म केले जाते ते पौरुषच होय.

आगगाडीत बसणारी सर्व माणसे, मग ती कोणत्याही क्लासमध्ये बसणारी असोत, इतकेच नव्हे तर बिनतिकिटाची माणसेदेखील, गाडीबरोबर सरळ म्हणजे शेवटच्या स्टेशनापर्यंत जाऊन पोहोचतात; त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोहोचतात. त्यांच्यामधली बिनतिकिटाची, म्हणजे दुष्ट, पापी, दुराचारी, त्याज्य, आणि अयोग्य, अशी माणसेसुद्धा तरून जातात; मात्र कोणीही गाडी तेवढी सोडता कामा नये. हाच सत्संगतीचा महिमा. परमार्थ साधण्यासाठी सत्संगती फार उपयोगी पडते. ही संगती तीन प्रकारची असते : एक, संताचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास; दोन, संताने सांगितलेल्या मंत्राचा सहवास; आणि तीन, संताच्या विचारांची संगत. संगतीचा परिणाम नकळत होतो, म्हणून सत्संगती धरावी. आपण ज्याकरिता जन्माला आलो ते कारण फक्त संतच उमगले; म्हणून त्यांना शरण जावे. संत स्वतः समाधान मिळवून ते दुसर्‍याला देतात, हे त्यांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत !


११३. संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले, म्हणजे संताची प्रचीती आली असे समजावे.