प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

२४ नोव्हेंबर

उत्कट भावनेने भगवंताची उपासना करावी.


    Download mp3

विस्तव माहीत नसला, तरी तो हाताला चुकूनही लागला तरी हात भाजतो; किंवा हा परीस आहे हे माहीत नसूनही, लोखंडाचा घण त्यावर मारला तरी त्याचे सोने व्हायचे रहात नाही. त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय नुसते भक्तीने जरी भगवंताकडे गेले तरी काम होते. परंतु दुसर्‍या विषयांची आसक्ति जोवर आपल्याला सुटत नाही, तोवर मनापासून भगवद्‌भक्ति होत नाही. जिथे उत्कट भावना आहे तिथे सगुण मूर्तीला मनुष्यधर्म प्राप्त होतील. उपासक देहाला विसरला की उपास्यमूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. शिवाय, जे इतर लोक थोडे तन्मय झाले आहेत, त्यांनादेखील तो अनुभवाला येईल. परंतु उपासकाची किंवा भक्ताची भावना नेहमी उत्कट राहीलच असा नेम नाही. म्हणून अशा उपासकाला मूर्तीमधल्या चैतन्याचा अनुभव येऊन देखील पारमार्थिकदृष्ट्या फायदा होईलच असे निश्चित नाही.

एका मुलाने काही खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापट मारली. त्याबरोबर त्या मुलाने मोठे भोकाड पसरले आणि त्या बाईला शिव्या देऊ लागला. ते ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला चांगलाच झोडपला. परंतु आईच्या हातचा इतका मार खाऊनसुद्धा तो मुलगा फार ओरडला नाही, आणि त्याने आईला उलट शिव्यापण दिल्या नाहीत. हे जसे खरे, त्याप्रमाणे आपल्यावर येणारी संकटे ही भगवंताने आणली आहेत अशी निष्ठा असेल, तर आपल्याला त्यांचा त्रास होईल, पण त्यांनी आपली शांति बिघडणार नाही. भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांति बिघडते. ज्या दातांनी सिंह मोठाले प्राणी मारतो त्याच दातांनी तो आपल्या पिल्लांना इजा न करता उचलतो, हे लक्षात असू द्यावे. आपण निःपक्षपाती बुद्धीने विचार केला तर भगवंताचे सान्निध्य लाभले त्यालाच निर्भयता आणि निर्वासनता येईल. प्रत्येक माणसाला आधार लागतो. पण आपण अपूर्णाचा आधार धरल्यामुळे आपल्याला निर्भयता येत नाही; यासाठी भगवंताचा आधार धरावा. बुद्धीने निश्चय करावा आणि मन भगवंताकडे लावावे, की इंद्रिये तिकडे बळजबरीने जातीलच, राम उपाधिरहित आणि त्याचे नामही उपाधिरहित आहे. म्हणून, ज्याप्रमाणे खडक किंवा वाळू पाण्याशी मिसळत नाहीत, साखर किंवा मीठच विरघळते आणि समरस होते, तद्वत् रामाशी त्याचे नामच समरस होते.


३२९. सर्व सृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे.