प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

२० फेब्रुवारी

कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण ।


    Download mp3

आपले कर्तव्याला न विसरावे । भगवंताचे अनुसंधान राखावे ॥

व्यवहाराने योग्य ते कर्तव्य करीत जावे । बाकी रामावर सोपवावे ॥

कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण । यातच सिद्धीचे बीज जाण ॥

असा करावा संसार । जेणे राम न होईल दूर ॥

देहाने कर्तव्याची जागृति । त्यात ठेवावी भगवंताची स्मृति । कर्तव्यात असते मनाची शांति ॥

कर्तव्याचा कधी न पडावा विसर । हृदयी धरावा रघुवीर ॥

ऐसे वागेल जो जनी । त्याने जोडला चक्रपाणि ॥

उद्योगाशिवाय राहू नये । कर्तव्याला चुकू नये । पण त्यात रामाला विसरू नये ॥

ठेवावा रामावर विश्वास । कर्तव्याची जागृति ठेवून खास ॥

देहाचा विसर पण भगवंताचे ध्यान । हेच भक्तीचे लक्षण ॥

देह करावा रामार्पण । स्वतःचे कर्तेपण सोडून ॥

शास्त्री पंडित विद्वान झाला । भगवत्पदी न रंगला । व्यर्थ व्यर्थ त्याचे जिणे ॥

भगवंतापाशी राहावे रात्रंदिन । हाच सुखाचा उत्तम उपाय जाण ॥

रामाचे चरणी घ्यावी गति । हाच विचार आणावा चित्ती ॥

सुटावी प्रपंचाची आस । तेथे परमात्म्याचे प्रेम खास ॥

सर्व कर्मांत अधिष्ठान असावे देवाचे । तोच कल्याण करील साचे ॥

भले बुरे जे असेल काही । ते सोडावे रामापायी ॥

चित्त असावे रामापायी । देहाने खुशाल संसारात राही ॥

आपण व्हावे रामार्पण । सुखदुःखास न उरावे जाण ॥

धन्य त्याची जननी । ज्याने राम आणिला ध्यानी मनी ॥

रामाविण दुजे काही । आता सत्य उरले नाही ॥

भाव ठेवावा चित्तात । सुखे आयुष्य घालवावे त्याचे सान्निध्यात ॥

ज्याने जिणे केले रामार्पण । त्यासी व्यवहार हेच खरे योगसाधन ॥

'माझे सर्व ते रामाचे' । मानून जगात वागणे साचे ।

अशास नाही कष्ट फार । मागे पुढे रघुवीर ॥

आपण व्हावे मनाने रामाचे । राम जे करील तेच घडेल साचे ॥

चित्त ठेवावे रामापायी । दुजे मनात न आणावे काही ॥

आता न सोडावी हरीची कास । होऊन जावे त्याचे दास ॥

दास्यत्वाचे मुख्य लक्षण । मालकावाचून न दुसऱ्याची आठवण ॥

भगवंताचा दास झाला । जग मानत त्याला ॥

म्हणून आपण सर्व आहो रामाचे दास । हे उरी बाळगावे खास ॥

'एकच जगती माझा रघुपति' । याहून दुजा न करावा विचार । हाच ठेवावा निर्धार ॥

भाव ठेवता रामापायी । तो कधी कमी पडू देणार नाही ॥

मनाने जावे भगवंताला शरण । जो चुकवील दुःखाचे कारण ॥

राम माझी मातापिता । बंधु सोयरा सखा ।

तोच माझे सर्वस्वाचे ठिकाणी । याहून दुजा विचार मनात न आणी ॥


५१. आता सांभाळावे सर्वांनी आपण । रामाविण जाऊ न द्यावा क्षण ॥