प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

२३ मे

देवाकरिता स्वतःला विसरावे.


    Download mp3

तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही ? हल्ली आपण आपल्याला विसरतो, पण ते विषयाकरिता विसरतो. स्वतःला विसरावे, पण ते विषयाकरिता विसरू नये. एखादे वेळेस असे होते की, एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपले आपल्यालाच समजत नाही. अशा वेळी देह भानावर नसतो हेच खरे. त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजे होते. थोडक्यात म्हणजे, आपण जेव्हा विषयाच्या आधीन होतो, तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो. त्याचप्रमाणे क्रोधाचे होते. विषयासाठी देहभान विसरणे हे केव्हाही वाईटच; परंतु देवाकरिता जर आपण आपल्याला विसरलो, तर ते फारच उत्तम. भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावे. आपण आता तसे करतो का ? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागावतो; ते खरे भजन होत नाही. म्हणून भजन करावे आणि तशी सवय ठेवावी, म्हणजे देहभाव विसरता ये‍ईल. संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा; म्हणजेच, विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा. स्वतःची आठवण ठेवून प्रंपच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही.

व्यवहारात काम, क्रोध, लोभ वगैरे सर्व काही असावे, पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता, त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावे; म्हणजे देहभाव आपोआप नष्ट हो‍ऊन जाईल. हे सर्व साधायला, परमेश्वराला शरण जाणे हा एकच सोपामार्ग आहे; आणि त्याकरिता नामस्मरणात राहणे हेच साधन आहे. कोणी बारा अन बारा चोवीस वर्षे साधनात राहूनही काही काम झाले नाही असे म्हणतात, आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात; तेव्हा अशा लोकांतच अर्थ नसतो, की गुरूत काही नसते ? तर आपले आपणच याला कारणीभूत असतो हे पक्के समजावे. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का ? त्याप्रमाणे, विषय बरोबर घेऊन गुरूकडे गेलो, तर गुरूची खरी भेट होईल का ? ती शक्य नाही. याकरिता, ते सांगतील ते साधन आधी करावे म्हणजे चित्त शुद्ध होते, आणि ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते. म्हणून आपण त्यांच्याजवळ खरे समाधान मागावे. आणि ते मिळाल्यावर आणखी काय मिळवायचे राहते ? मग तो ज्या स्थितीत ठेवील त्यातच समाधान होते. देहभोगाची अशा वेळी काहीच किंमत राहात नाही, आणि मग त्याला कंटाळण्याचेही कारण उरत नाही.


१४४. परमात्म्याचे स्मरण । यातच विषयाचे विस्मरण ॥