श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
नवमः स्कन्धः
एकादशोऽध्यायः


गङ्‌गोपाख्यानवर्णनम्

नारद उवाच
श्रुतं पृथिव्युपाख्यानमतीव सुमनोहरम् ।
गङ्‌गोपाख्यानमधुना वद वेदविदांवर ॥ १ ॥
भारते भारतीशापात्सा जगाम सुरेश्वरी ।
विष्णुस्वरूपा परमा स्वयं विष्णुपदीति च ॥ २ ॥
कथं कुत्र युगे केन प्रार्थिता प्रेरिता पुरा ।
तत्क्रमं श्रोतुमिच्छामि पापघ्नं पुण्यदं शुभम् ॥ ३ ॥
श्रीनारायण उवाच
राजराजेश्वरः श्रीमान् सगरः सूर्यवंशजः ।
तस्य भार्या च वैदर्भी शैव्या च द्वे मनोहरे ॥ ४ ॥
तत्पत्‍न्यामेकपुत्रश्च बभूव सुमनोहरः ।
असमञ्ज इति ख्यातः शैव्यायां कुलवर्धनः ॥ ५ ॥
अन्या चाराधयामास शङ्‌करं पुत्रकामुकी ।
बभूव गर्भस्तस्याश्च हरस्य च वरेण ह ॥ ६ ॥
गते शताब्दे पूर्णे च मांसपिण्डं सुषाव सा ।
तद्‌ दृष्ट्वा सा शिवं ध्यात्वा रुरोदोच्चैः पुनः पुनः ॥ ७ ॥
शम्भुर्ब्राह्मणरूपेण तत्समीपं जगाम ह ।
चकार संविभज्यैतत्पिण्डं षष्टिसहस्रधा ॥ ८ ॥
सर्वे बभूवुः पुत्राश्च महाबलपराक्रमाः ।
ग्रीष्ममध्याह्नमार्तण्डप्रभामुष्टकलेवराः ॥ ९ ॥
कपिलस्य मुनेः शापाद्‌ बभूवुर्भस्मसाच्च ते ।
राजा रुरोद तच्छ्रुत्वा जगाम गहने वने ॥ १० ॥
तपश्चकारासमञ्जो गङ्‌गानयनकारणात् ।
लक्षवर्षं तपस्तप्त्वा ममार कालयोगतः ॥ ११ ॥
अंशुमांस्तस्य तनयो गङ्‌गानयनकारणात् ।
तपः कृत्वा लक्षवर्षं ममार कालयोगतः ॥ १२ ॥
भगीरथस्तस्य पुत्रो महाभागवतः सुधीः ।
वैष्णवो विष्णुभक्तश्च गुणवानजरामरः ॥ १३ ॥
तपः कृत्वा लक्षवर्षं गङ्‌गानयनकारणात् ।
ददर्श कृष्णं ग्रीष्मस्थसूर्यकोटिसमप्रभम् ॥ १४ ॥
द्विभुजं मुरलीहस्तं किशोरं गोपवेषिणम् ।
गोपालसुन्दरीरूपं भक्तानुग्रहरूपिणम् ॥ १५ ॥
स्वेच्छामयं परं ब्रह्म परिपूर्णतमं प्रभुम् ।
ब्रह्मविष्णुशिवाद्यैश्च स्तुतं मुनिगणैर्नुतम् ॥ १६ ॥
निर्लिप्तं साक्षिरूपं च निर्गुणं प्रकृतेः परम् ।
ईषद्धास्यप्रसन्नास्यं भक्तानुग्रहकारणम् ॥ १७ ॥
वह्निशुद्धांशुकाधानं रत्‍नभूषणभूषितम् ।
तुष्टाव दृष्ट्वा नृपतिः प्रणम्य च पुनः पुनः ॥ १८ ॥
लीलया च वरं प्राप वाञ्छितं वंशतारणम् ।
कृत्वा च स्तवनं दिव्यं पुलकाङ्‌कितविग्रहः ॥ १९ ॥
श्रीभगवानुवाच
भारतं भारतीशापाद्‌ गच्छ शीघ्रं सुरेश्वरि ।
सगरस्य सुतान्सर्वान्पूतान्कुरु ममाज्ञया ॥ २० ॥
त्वत्स्पर्शवायुना पूता यास्यन्ति मम मन्दिरम्।
बिभ्रतो मम मूर्तीश्च दिव्यस्यन्दनगामिनः ॥ २१ ॥
मत्पार्षदा भविष्यन्ति सर्वकालं निरामयाः ।
समुच्छिद्य कर्मभोगान् कृताञ्जन्मनि जन्मनि ॥ २२ ॥
कोटिजन्मार्जितं पापं भारते यत्कृतं नृभिः ।
गङ्‌गाया वातस्पर्शेन नश्यतीति श्रुतौ श्रुतम् ॥ २३ ॥
स्पर्शनाद्दर्शनाद्देव्याः पुण्यं दशगुणं ततः ।
मौसलस्नानमात्रेण सामान्यदिवसे नृणाम् ॥ २४ ॥
शतकोटिजन्मपापं नश्यतीति श्रुतौ श्रुतम् ।
यानि कानि च पापानि ब्रह्महत्यादिकानि च ॥ २५ ॥
जन्मसंख्यार्जितान्येव कामतोऽपि कृतानि च ।
तानि सर्वाणि नश्यन्ति मौसलस्नानतो नृणाम् ॥ २६ ॥
पुण्याहस्नानतः पुण्यं वेदा नैव वदन्ति च ।
किञ्चिद्वदन्ति ते विप्र फलमेव यथागमम् ॥ २७ ॥
ब्रह्मविष्णुशिवाद्याश्च सर्वं नैव वदन्ति च ।
सामान्यदिवसस्नानसङ्‌कल्पं शृणु सुन्दरि ॥ २८ ॥
पुण्यं दशगुणं चैव मौसलस्नानतः परम् ।
ततस्त्रिंशद्‌गुणं पुण्यं रविसंक्रमणे दिने ॥ २९ ॥
अमायां चापि तत्तुल्यं द्विगुणं दक्षिणायने ।
ततो दशगुणं पुण्यं नराणामुत्तरायणे ॥ ३० ॥
चातुर्मास्यां पौर्णमास्यामनन्तं पुण्यमेव च ।
अक्षयायां च तत्तुल्यं चैतद्वेदे निरूपितम् ॥ ३१ ॥
असंख्यपुण्यफलदमेतेषु स्नानदानकम् ।
सामान्यदिवसस्नानाद्दानाच्छतगुणं फलम् ॥ ३२ ॥
मन्वन्तराद्यायां तिथौ युगाद्यायां तथैव च ।
माघस्य सितसप्तम्यां भीष्माष्टम्यां तथैव च ॥ ३३ ॥
अथाप्यशोकाष्टम्यां च नवम्यां च तथा हरेः ।
ततोऽपि द्विगुणं पुण्यं नन्दायां तव दुर्लभम् ॥ ३४ ॥
दशहरादशम्यां तु युगाद्यादिसमं फलम् ।
नन्दासमं च वारुण्यां महत्पूर्वे चतुर्गुणम् ॥ ३५ ॥
ततश्चतुर्गुणं पुण्यं द्विमहत्पूर्वके सति ।
पुण्यं कोटिगुणं चैव सामान्यस्नानतोऽपि यत् ॥ ३६ ॥
चन्द्रोपरागसमये सूर्ये दशगुणं ततः ।
पुण्यमर्धोदये काले ततः शतगुणं फलम् ॥ ३७ ॥
इत्येवमुक्त्वा देवेशो विरराम तयोः पुरः ।
तमुवाच ततो गङ्‌गा भक्तिनम्राऽऽत्मकन्धरा ॥ ३८ ॥
गङ्‌गोवाच
यामि चेद्‍भारतं नाथ भारतीशापतः पुरा ।
तवाज्ञया च राजेन्द्र तपसा चैव साम्प्रतम् ॥ ३९ ॥
दास्यन्ति पापिनो मह्यं पापानि यानि कानि च ।
तानि मे केन नश्यन्ति तमुपायं वद प्रभो ॥ ४० ॥
कतिकालं परिमितं स्थितिर्मे तत्र भारते ।
कदा यास्यामि देवेश तद्विष्णोः परमं पदम् ॥ ४१ ॥
ममान्यद्वाञ्छितं यद्यत्सर्वं जानासि सर्ववित् ।
सर्वान्तरात्मन् सर्वज्ञ तदुपायं वद प्रभो ॥ ४२ ॥
श्रीभगवानुवाच
जानामि वाञ्छितं गङ्‌गे तव सर्वं सुरेश्वरि ।
पतिस्ते द्रवरूपाया लवणोदो भविष्यति ॥ ४३ ॥
स ममांशस्वरूपश्च त्वं च लक्ष्मीस्वरूपिणी ।
विदग्धाया विदग्धेन सङ्‌गमो गुणवान् भुवि ॥ ४४ ॥
यावत्यः सन्ति नद्यश्च भारत्याद्याश्च भारते ।
सौभाग्या त्वं च तास्वेव लवणोदस्य सौरते ॥ ४५ ॥
अद्यप्रभृति देवेशि कलेः पञ्चसहस्रकम् ।
वर्षं स्थितिस्ते भारत्याः शापेन भारते भुवि ॥ ४६ ॥
नित्यं त्वमब्धिना सार्धं करिष्यसि रहो रतिम् ।
त्वमेव रसिका देवि रसिकेन्द्रेण संयुता ॥ ४७ ॥
त्वां स्तोष्यन्ति च स्तोत्रेण भगीरथकृतेन च ।
भारतस्था जनाः सर्वे पूजयिष्यन्ति भक्तितः ॥ ४८ ॥
कण्वशाखोक्तध्यानेन ध्यात्वा त्वां पूजयिष्यति ।
यः स्तौति प्रणमेन्नित्यं सोऽश्वमेधफलं लभेत् ॥ ४९ ॥
गङ्‌गा गङ्‌गेति यो ब्रूयाद्योजनानां शतैरपि ।
मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति ॥ ५० ॥
सहस्रपापिनां स्नानाद्यत्पापं ते भविष्यति ।
प्रकृतेर्भक्तसंस्पर्शादेव तद्धि विनङ्‌क्ष्यति ॥ ५१ ॥
पापिनां तु सहस्राणां शवस्पर्शेन यत्त्वयि ।
तन्मन्त्रोपासकस्नानात्तदघं च विनङ्‌क्ष्यति ॥ ५२ ॥
तत्रैव त्वमधिष्ठानं करिष्यस्यघमोचनम् ।
सार्धं सरिद्‌‍भिः श्रेष्ठाभिः सरस्वत्यादिभिः शुभे ॥ ५३ ॥
तत्तु तीर्थं भवेत्सद्यो यत्र त्वद्‌गुणकीर्तनम् ।
त्वद्रेणुस्पर्शमात्रेण पूतो भवति पातकी ॥ ५४ ॥
रेणुप्रमाणवर्षं च देवीलोके वसेद्‌ ध्रुवम् ।
ज्ञानेन त्वयि ये भक्त्या मन्नामस्मृतिपूर्वकम् ॥ ५५ ॥
समुत्सृजन्ति प्राणांश्च ते गच्छन्ति हरेः पदम् ।
पार्षदप्रवरास्ते च भविष्यन्ति हरेश्चिरम् ॥ ५६ ॥
लयं प्राकृतिकं ते च द्रक्ष्यन्ति चाप्यसंख्यकम् ।
मृतस्य बहुपुण्येन तच्छवं त्वयि विन्यसेत् ॥ ५७ ॥
प्रयाति स च वैकुण्ठं यावदह्नः स्थितिस्त्वयि ।
कायव्यूहं ततः कृत्वा भोजयित्वा स्वकर्मकम् ॥ ५८ ॥
तस्मै ददामि सारूप्यं करोमि तं च पार्षदम् ।
अज्ञानी त्वज्जलस्पर्शाद्यदि प्राणान्समुत्सृजेत् ॥ ५९ ॥
तस्मै ददामि सालोक्यं करोमि तं च पार्षदम् ।
अन्यत्र वा त्यजेत्प्राणांस्त्वन्नामस्मृतिपूर्वकम् ॥ ६० ॥
तस्मै ददामि सालोक्यं यावद्वै ब्रह्मणो वयः ।
अन्यत्र वा त्यजेत्प्राणांस्त्वन्नामस्मृतिपूर्वकम् ॥ ६१ ॥
तस्मै ददामि सारूप्यमसंख्यं प्राकृतं लयम् ।
रत्‍नेन्द्रसारनिर्माणयानेन सह पार्षदैः ॥ ६२ ॥
सद्यः प्रयाति गोलोकं मम तुल्यो भवेद्‌ ध्रुवम् ।
तीर्थेऽप्यतीर्थे मरणे विशेषो नास्ति कश्चन ॥ ६३ ॥
मन्मन्त्रोपासकानां तु नित्यं नैवेद्यभोजिनाम् ।
पूतं कर्तुं सशक्तो हि लीलया भुवनत्रयम् ॥ ६४ ॥
रत्‍नेन्द्रसारयानेन गोलोकं सम्प्रयान्ति च ।
मद्‍भक्ता बान्धवा येषां तेऽपि पश्वादयोऽपि हि ॥ ६५ ॥
प्रयान्ति रत्‍नयानेन गोलोकं चातिदुर्लभम् ।
यत्र यत्र स्मृतास्ते च ज्ञानेन ज्ञानिनः सति ॥ ६६ ॥
जीवन्मुक्ताश्च ते पूता मद्‍भक्तेः संविधानतः ।
इत्युक्त्वा श्रीहरिस्तांश्च प्रत्युवाच भगीरथम् ॥ ६७ ॥
स्तुहि गङ्‌गामिमां भक्त्या पूजां च कुरु साम्प्रतम् ।
भगीरथस्तां तुष्टाव पूजयामास भक्तितः ॥ ६८ ॥
कौथुमोक्तेन ध्यानेन स्तोत्रेणापि पुनः पुनः ।
प्रणनाम च श्रीकृष्णं परमात्मानमीश्वरम् ॥ ६९ ॥
भगीरथश्च गङ्‌गा च सोऽन्तर्धानं चकार ह ।
नारद उवाच
केन ध्यानेन स्तोत्रेण केन पूजाक्रमेण च ॥ ७० ॥
पूजां चकार नृपतिर्वद वेदविदांवर ।
श्रीनारायण उवाच
स्नात्वा नित्यक्रियां कृत्वा धृत्वा धौते च वाससी ॥ ७१ ॥
सम्पूज्य देवषट्कं च संयतो भक्तिपूर्वकम् ।
गणेशं च दिनेशं च वह्निं विष्णुं शिवं शिवाम् ॥ ७२ ॥
सम्पूज्य देवषट्कं च सोऽधिकारी च पूजने ।
गणेशं विघ्ननाशाय आरोग्याय दिवाकरम् ॥ ७३ ॥
वह्निं शौचाय विष्णुं च लक्ष्यर्थं पूजयेन्नरः ।
शिवं ज्ञानाय ज्ञानेशं शिवां च मुक्तिसिद्धये ॥ ७४ ॥
सम्पूज्यैताँल्लभेत्प्राज्ञो विपरीतमतोऽन्यथा ।
दध्यावनेन ध्यानेन तद्ध्यानं शृणु नारद ॥ ७५ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां नवमस्कन्धे
गङ्‌गोपाख्यानवर्णनं नामैकादशोऽध्यायः ॥ ११ ॥


गंगेचे महात्म्य -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्री नारदमुनी म्हणाले, "हे वेदवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या नारायणमुने, आपण सांगितलेले पृथ्वीचे आख्यान मी ऐकले. आता हे ऋषीश्रेष्ठा, त्या गंगेविषयी आपण मला निवेदन करा. सरस्वतीच्या शापामुळे विष्णुस्वरूपा असूनही ती सुरेश्वरी भारतात कशी आली ? तिची प्रार्थना कुणी व कोणत्या युगात प्रथम केली ? तिला प्रेरणा कोणी दिली ? वगैरेसंबंधी ऐकण्याची मला तीव्र इच्छा झाली आहे. हे श्रेष्ठा, आपण माझी इच्छा पूर्ण करा."

नारायण मुनी म्हणाले, "हे नारदा, सूर्यवंशात सागर नावाचा अतिश्रेष्ठ राजा उत्पन्न झाला होता. त्याला वैदर्भी व शैब्या या नावाच्या दोन भार्या होत्या. शैब्येच्या पोटी असमंजा नावाचा सुंदर व कुलवृद्धी करणारा सर्वश्रेष्ठ असा पुत्र जन्माला आला.

वैदर्भीने पुत्रप्राप्तीसाठी शंकराची आराधना केली. त्याच्या कृपाप्रसादाने तिलाही गर्भ राहिला. शंभर वर्षे त्या स्थितीत गेल्यावर तिने एका मांसाच्या गोळ्याला जन्म दिला. ते पाहून ती शंकराचे ध्यान करू लागली. ती सदैव मोठमोठयाने रडू लागली. तेव्हा शंकर द्विजरूप घेऊन तिच्याजवळ आला. त्याने त्या मांसाच्या गोळ्याचे साठ हजार भाग केले. ते सर्व पुत्ररूप झाले व सर्वजण अतिबलाढय असे झाले.

त्यांची अंगकांती ग्रीष्म ऋतूतील सूर्यप्रभेप्रमाणे तेजस्वी होती. पण कपिल मुनींचा शाप झाल्यामुळे त्या राजपुत्रांचे भस्म झाले, हे श्रवण करताच राजाला अनिवार दुःख होऊन तो रडतच वनात गेला. तेव्हा गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी असमंजा उग्र तप करू लागला. एक लाख वर्षे तपश्चर्या केल्यावर तो मृत्यु पावला. नंतर त्याचा पुत्र अंशुमान यानेही गंगेला आणण्यासाठी एक लाख वर्षे तपश्चर्या करून मृत्यू पावला. पुढे अंशुमानचा पुत्र भगीरथ हा अत्यंत सदगुणी, बुद्धिमान व भगवद्‍भक्त होता. तो विष्णूचा एकनिष्ठ भक्त होता. त्यामुळे तो मरण व जरारहित झाला. त्यानेही गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी लाख वर्षे तप केले. अखेर ग्रीष्मामध्ये असलेल्या सूर्याप्रमाणे कोटिसूर्य इतकी तेजस्वी अंगकांती असलेल्या श्रीकृष्णाने त्याला दर्शन दिले.

ते द्विभुज, मुरलीधर, बालरूपधारी, गोपवेष धारण केलेले, गोपाल सुंदरीरूप, भक्तांचा अनुग्रह करणारे, स्वेच्छामय, परब्रह्म, परिपूर्ण, प्रभु, ब्रह्मा, विष्णू, महेश इत्यादींनी स्तुती केलेले, मुनीवर्यांनी स्तवन केलेले, निर्लेप, साक्षीरूप, निर्गुण व प्रकृतीच्या पलीकडे असलेले, हसतमुख प्रसन्नचित्त, भक्तानुग्रही, अग्निवस्त्र परिधान केलेले, रत्नलंकारांनी विभूषित असे स्वरूप भगीरथाला दिसले. तो अत्यंत आनंदित झाला. त्याने भगवान श्रीकृष्णाला वारंवार वंदन केले. त्याने मुक्तकंठाने त्याची स्तुती केली, त्यामुळे भगवान प्रसन्न झाला व त्याला देवाने इष्ट पुत्रप्राप्तीचा वर दिला.

भगवान गंगेला म्हणाले, "हे सुरेश्वरी, तुला सरस्वतीचा शाप झाला आहे म्हणून तू सत्वर भारतवर्षांत जाऊन सागरपुत्रांचा उद्धार कर. तुझ्या स्पर्शामुळे त्या सागरपुत्रांना पावित्र्य मिळून ते माझ्या लोकात पोहोचतील. ते नित्य माझी स्तुती गाणारे, स्वानंदरूप पार्षद होतील."

कोटी जन्म घेऊन केलेली पापेही तुझ्या स्पर्शाने पावन होतील असे श्रुतीत सांगितले आहे. त्या गंगादेवीला स्पर्श केल्याने अथवा तिचे दर्शन घेतल्याने दहापट पुण्य मिळते. इतर दिवशीही संकल्पाशिवाय तिचे स्नान केले तरी शंभर कोटी जन्मांचे पाप नाहीसे होते. ब्रह्महत्येसारखी घोर पापेही तिच्या संकल्पस्नानामुळे नष्ट होतील. पुण्य दिवशी स्नान केल्यास केवढे प्रचंड पुण्य लाभते हे वेदही सांगू शकत नाहीत.

हे ब्राह्मणश्रेष्ठा नारदा, शास्त्राला अनुसरून हे वेद काही फल सांगत असतात. पण त्याचे पूर्ण फळ मात्र बुद्धीलाही अगम्य आहे. ब्रह्मा, विष्णु, महेश वगैरे देवसुद्धा हे सांगण्यास असमर्थ आहेत.

भगवान विष्णू गंगेला म्हणाले, "हे सुंदरी आता इतर दिवशी स्नानाचा संकल्प कसा करायचा ते ऐक. ह्या स्नानामुळे संकल्परहित स्नानापेक्षा कितीतरी पटीने अधिक पुण्य मिळते. अमावस्येलाहि तेवढेच पुण्य प्राप्त होते.

दक्षिणायनात दुप्पट फल मिळते, उत्तरायणात दसपट मिळते. चातुर्मासातील पौर्णिमेला स्नान घडल्यास अनंत पुण्य मिळतात. तितकेच अक्षयनवमीसही मिळते. ह्या दिवशी केलेले स्नान, दान असंख्य पुण्ये मिळवून देणारे आहे. सामान्य दिवशी केलेल्या स्नानापेक्षा व दानापेक्षा शतपट अधिक फल मिळते.

मन्वंतराची आद्यतिथी, युगाहितिथी, माघ शुक्ल सप्तमी, भीमाष्टमी, अशोकाष्टमी, रामनवमी इत्यादि तिथींना गंगास्नान केले तर दुर्लभ पुण्य प्राप्त होते. दशहरातील दशमीस तर गायुप्रमाणे फल मिळते. वारुणीस नंदेसारखे, महावारुणीस त्यापेक्षा चौपट इतके पुण्य लाभते. महामहावारुणीस त्याहीपेक्षा चारपटीने अधिक पुण्य मिळते.

चंद्रग्रहणाचे वेळी स्नान केल्यास सामान्य दिवसापेक्षा कोटीपटीने अधिक पुण्य मिळते. सुर्यग्रहणाचे दिवशी त्यापेक्षा दसपट अधिक पुण्यलाभ होतो. अर्धोदयकाली तर त्यापेक्षा अधिक शंभरपट पुण्य मिळते."
असे भगवानाने गंगेला सांगितले. त्यावेळी भगीरथ त्यांच्यापुढे नम्रतेने उभा होता. तेव्हा भक्तीमुळे गंगा अगदी नम्र होऊन गेली होती. ती सत्वर भगवान विष्णूला म्हणाली, "हे नाथ, सरस्वतीचा शाप व आपली आज्ञा तसेच या राजेंद्राची तपश्चर्या यामुळे मी भारत वर्षात गेले तर पापी लोक आपली सर्वच पापे मला अर्पण करतील. मग हे देवेश्वरा, मी स्वीकारलेली पापे कशामुळे नाश पावतील ? हे प्रभो, मला त्या पापनाशासाठी उपाय सांगा. तसेच भारतवर्षात मी किती काल रहावे ? मी पुनः आपल्या परमस्थानी केव्हा येणार ?

हे देवेश्वरा, आपण तर माझे मनोरथ जाणीतच आहात. तेथे मला कोणता पती लाभणार हे आपण सांगा. हे सर्व सर्वज्ञा, हे अंतर्यामी, हे सर्व विशेषज्ञावान् आपण सर्व जाणत आहात. म्हणून हे प्रभो, पुनः विष्णुलोकी येण्याचा उपाय मला निवेदन करा."

श्री भगवान गंगेला उद्देशून उतरले, "हे सुरेश्वरी गंगे, मी तुझे मनोरथ ओळखतो. तुझा पती द्रवरूप असा लवणोद समुद्र असेल. तो खार्‍या पाण्याचा सागर आहे. तो माझेच अंशरूपाने आहे. तू लक्ष्मीरूपाने आहेस. तेव्हा विरही स्त्री-पुरुषांचा भूलोकी समागम होणेच श्रेयस्कर आहे. भारतवर्षात सरस्वती वगैर अनेक नद्या असल्या तरी सागराशी क्रीडेसाठी तूच मुख्य होशील.

हे महादेवी, आजपासून कलीची पाच हजार वर्षेपर्यंत तू भारतलोकी वास्तव्य कर. समुद्रासह तुला एकांत लाभून क्रीडा करता येईल. हे देवी, समुद्र रसिकश्रेष्ठ व तू रसिका आहेस. भारतवर्षात राहणारे सर्व लोक या भगीरथाने केलेल्या स्तुतीस्तोत्रांनी तुझी आराधना करतील. कण्वशाखेत सांगितल्याप्रमाणे तुझे ध्यान व पूजन करतील. जो तुझी नित्य स्तुती करील व तुला नमस्कार करील, त्याला अश्वमेध यज्ञाचे पुण्य लाभेल. जो शंभर योजने दूर असूनही 'गंगा गंगा' असे म्हणेल तोही सर्व पापांपासून मुक्त होईल व विष्णुलोकी प्राप्त होईल. सर्वांच्या स्पर्शाने तुला लाभलेली पापे भुवनेश्वरीच्या स्पर्शाने नाहीशी होतील.

हजारो पापी, शवें यामुळे तुझ्या ठिकाणी जरी पातके साठली तरी भुवनेश्वरीचे मंत्रोपासक तुझ्यात स्नान करताच ती पापे नाहीशी होतील. हे शुभे, तू सरस्वती वगैरे नद्यांसह त्या भक्तांचे व उपासकांचे अधिष्ठान हो. जेथे भुवनेश्वरीची कीर्तने होतील ते ठिकाण तत्क्षणीच तीर्थ होईल. तुझ्या किंचित बिंदुस्पशनिही पातकी पावन होतील. माझे स्मरण करीत जे तुझ्या स्थानी प्राणत्याग करतील त्यांना विष्णुलोक लाभेल. ते श्रीहरीचे पार्षद होतील. ते असंख्य प्रकृतिप्रलय प्रत्यक्ष पाहतील. विष्णुलोकी त्यांचा कधीही नाश होणार नाही. पुष्कळ पुण्य केलेल्या पुरुषाचे शव तुझ्या पात्रात टाकल्यास तो पुरुष वैकुंठास जाईल. त्याला अनेक प्रकारचे देह देऊन मी पुढे त्याला कर्माप्रमाणे भोग भोगवीन. त्यांना मी पार्षद करीन.

अज्ञानी पुरुष तुझ्या जलस्पशनि प्राण सोडतील तर त्यांनाही मी हा लोक देऊन पार्षद करीन. तुझे नामस्मरण करीत कोणीही कुठेही प्राण सोडला तरी असंख्य प्रकृतीप्रलय होईपर्यंत मी त्याला वैकुंठात ठेवीन. शेवटी उत्तमोत्तम रत्ने व अलंकारांनी युक्त होऊन तो गोलोकास जाईल व तो खरोखरच माझ्यासारखा होईल. माझ्या मंत्राची उपासना करणारे, नैवेद्य खाणारे जर तीर्थाचे स्थानी मृत्यु पावतील तेही वैकुंठलोकी येतील. त्यांना कोठेही मरण आले तरी ते मजप्रत येऊन मिळतील.

माझ्या भक्तांचे आप्तस्वकीय आहेत तेही रत्नवहानात बसून सत्वर गोलोकी प्राप्त होतील. हे साध्वी, ज्ञानी ज्ञानाच्या योगाने जेथे माझे स्मरण करतात, माझी भक्ती उत्तम प्रकारे करतात ते जीवनमुक्त होतात."

अशाप्रकारे गंगेला तिचे महात्म्य सांगून भगवान श्रीहरी भगीरथास म्हणाले,

" हे राजा, आता तू या गंगेची स्तुती कर. तिचे यथाविधी पूजन कर."

भगीरथाने अत्यंत एकाग्र चित्ताने गंगेची स्तुती केली व दृढ भावाने तिचे पूजन केले. कौस्तुभशाखेत सांगितलेल्या ध्यानाप्रमाणे व स्तोत्रांनी त्याने वारंवार तिचे स्तवन केले. तसेच स्तोत्रे गाऊन त्याने श्रीकृष्णाला प्रणाम केला व गंगेलाही त्याने नमस्कार केला. तेव्हा तो भगवान गुप्त झाला.

नारदांनी श्रीनारायण मुनींना विचारले, "हे वेदांतश्रेष्ठा, राजाने त्या गंगेची स्तुती कोणत्या स्तोत्रांनी केली ? तिचे पूजन कसे केले ?"

श्री नारायण मुनी उत्तरले, "हे नारदा, स्नानादि नित्य कर्मे आटोपून त्याने धूतवस्त्र परिधान केले. अत्यंत भक्तियुक्त मनाने त्याने सहा देवांची पूजा केली. गणेश, सूर्य, अग्निहोत्रातील अग्नी, विष्णु, शिव व देवी या सहा देवांची यथाविधी पूजा केली. विघ्नांचा नाश व्हावा म्हणून गणेशाची आराधना केली. आरोग्यासाठी सूर्याची, शुद्धीसाठी अग्नीची, संपत्तीकरता विष्णूची पूजा करतात. ज्ञानाचा ईश्वर म्हणून शंकर पुजावा. मुक्ती व सिद्धी प्राप्त होण्यासाठी देवीची पूजा करावी, अशी यथायोग्य दैवतांची पूजा केली असता कल्याण होते. अशाप्रकारे विधीपूर्वक पूजा न केल्यास अकल्याण होते."


अध्याय अकरावा समाप्त

GO TOP