श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
पञ्चमः स्कन्धः
त्रयोदशोऽध्यायः


महिषसेनाधिपबाष्कलदुर्मुखनिपातनवर्णनम्

व्यास उवाच
इत्युक्त्वा तौ महाबाहू दैत्यौ बाष्कलदुर्मुखौ ।
जग्मतुर्मददिग्धाङ्गौ सर्वशस्त्रास्त्रकोविदौ ॥ १ ॥
तौ गत्वा समरे देवीमूचतुर्वचनं तदा ।
दानवौ च मदोन्मत्तौ मेघगम्भीरया गिरा ॥ २ ॥
देवि देवा जिता येन महिषेण महात्मना ।
वरय त्वं वरारोहे सर्वदैत्याधिपं नृपम् ॥ ३ ॥
स कृत्वा मानुषं रूपं सर्वलक्षणसंयुतम् ।
भूषितं भूषणैर्दिव्यैस्त्वामेष्यति रहः किल ॥ ४ ॥
त्रैलोक्यविभवं कामं त्वमेष्यसि शुचिस्मिते ।
महिषे परमं भावं कुरु कान्ते मनोगतम् ॥ ५ ॥
कृत्वा पतिं महावीरं संसारसुखमद्‌भुतम् ।
त्वं प्राप्स्यसि पिकालापे योषितां खलु वाञ्छितम् ॥ ६ ॥
देव्युवाच
जाल्म त्वं किं विजानासि नारीयं काममोहिता ।
मन्दबुद्धिबलात्यर्थं भजेयं महिषं शठम् ॥ ७ ॥
कुलशीलगुणैस्तुल्यं तं भजन्ति कुलस्त्रियः ।
अधिकं रूपचातुर्यबुद्धिशीलक्षमादिभिः ॥ ८ ॥
का नु कामातुरा नारी भजेच्च पशुरूपिणम् ।
पशूनामधमं नूनं महिषं देवरूपिणी ॥ ९ ॥
गच्छतं महिषं तूर्णं भूपं बाष्कलदुर्मुखौ ।
वदतं मद्वचो दैत्यं गजतुल्यं विषाणिनम् ॥ १० ॥
पातालं गच्छ वाभ्येत्य संग्रामं कुरु वा मया ।
रणे जाते सहस्राक्षो निर्भयः स्यादिति धुवम् ॥ ११ ॥
हत्वाहं त्वां गमिष्यामि नान्यथा गमनं मम ।
इत्थं ज्ञात्वा सुदुर्बुद्धे यथेच्छसि तथा कुरु ॥ १२ ॥
मामनिर्जित्य भूभागे न स्थानं ते कदाचन ।
भविष्यति चतुष्पाद दिवि वा गिरिकन्दरे ॥ १३ ॥
व्यास उवाच
इत्युक्तौ तौ तया दैत्यौ कोपाकुलितलोचनौ ।
धनुर्बाणधरौ वीरौ युद्धकामौ बभूवतुः ॥ १४ ॥
कृत्वा सुविपुलं नादं देवी सा निर्भया स्थिता ।
उभौ च चक्रतुस्तीव्रा बाणवृष्टिं कुरूद्वह ॥ १५ ॥
भगवत्यपि बाणौघान्मुमोच दानवौ प्रति ।
कृत्वातिमधुरं नादं देवकार्यार्थसिद्धये ॥ १६ ॥
तयोस्तु बाष्कलस्तूर्णं सम्मुखोऽभूद्‌ रणाङ्गणे ।
दुर्मुखः प्रेक्षकस्तत्र देवीमभिमुखः स्थितः ॥ १७ ॥
तयोर्युद्धमभूद्‌ घोरं देवीबाष्कलयोस्तदा ।
बाणासिपरिघाघातैर्भयदं मन्दचेतसाम् ॥ १८ ॥
ततः क्रुद्धा जगन्माता दृष्ट्वा तं युद्धदुर्मदम् ।
जघान पञ्चभिर्बाणैः कर्णाकृष्टैः शिलाशितैः ॥ १९ ॥
दानवोऽपि शरान्देव्याश्चिच्छेद निशितैः शरैः ।
सप्तभिस्ताडयामास देवीं सिंहोपरिस्थिताम् ॥ २० ॥
सापि तं दशभिस्तीक्ष्णैः सुपीतैः सायकैः खलम् ।
जघान तच्छरांश्छित्त्वा जहास च मुहुर्मुहुः ॥ २१ ॥
अर्धचन्द्रेण बाणेन चिच्छेद च शरासनम् ।
बाष्कलोऽपि गदां गृह्य देवीं हन्तुमुपाययौ ॥ २२ ॥
आगच्छन्तं गदापाणिं दानवं मदगर्वितम् ।
चण्डिका स्वगदापातैः पातयामास भूतले ॥ २३ ॥
बाष्कलः पतितो भूमौ मुहूर्तादुत्थितः पुनः ।
चिक्षेप च गदां सोऽपि चण्डिकां चण्डविक्रमः ॥ २४ ॥
तमागच्छन्तमालोक्य देवी शूलेन वक्षसि ।
जघान बाष्कलं क्रुद्धा पपात च ममार सः ॥ २५ ॥
पतिते बाष्कले सैन्यं भग्नं तस्य दुरात्मनः ।
जयेति च मुदा देवाश्चुक्रुशुर्गगने स्थिताः ॥ २६ ॥
तस्मिंश्च निहते दैत्ये दुर्मुखोऽतिबलान्वितः ।
आजगाम रणे देवीं क्रोधसंरक्तलोचनः ॥ २७ ॥
तिष्ठ तिष्ठाबले सोऽपि भाषमाणः पुनः पुनः ।
धनुर्बाणधरः श्रीमान्‌रथस्थः कवचावृतः ॥ २८ ॥
तमागच्छन्तमालोक्य देवी शङ्खमवादयत् ।
कोपयन्ती दानवं तं ज्याघोषञ्च चकार ह ॥ २९ ॥
सोऽपि बाणान्मुमोचाशु तीक्ष्णानाशीविषोपमान् ।
स्वबाणैस्तान्महामाया चिच्छेद च ननाद च ॥ ३० ॥
तयोः परस्परं युद्धं बभूव तुमुलं नृप ।
बाणशक्तिगदाघातैर्मुसलैस्तोमरैस्तथा ॥ ३१ ॥
रणभूमौ तदा जाता रुधिरौघवहा नदी ।
पतितानि तदा तीरे शिरांसि प्रबभुस्तदा ॥ ३२ ॥
यथा सन्तरणार्थाय यमकिङ्करनायकैः ।
तुम्बीफलानि नीतानि नवशिक्षापरैर्मुदा ॥ ३३ ॥
रणभूमिस्तदा घोरा बभूवातीव दुर्गमा ।
शरीरैः पतितैर्भूमौ खाद्यमानैर्वृकादिभिः ॥ ३४ ॥
गोमायुसारमेयाश्च काकाः कङ्का अयोमुखाः ।
गृध्रा श्येनाश्च खादन्ति शरीराणि दुरात्मनाम् ॥ ३५ ॥
ववौ वायुश्च दुर्गन्धो मृतानां देहसङ्गतः ।
अभूत्किलकिलाशब्दः खगानां पलभक्षिणाम् ॥ ३६ ॥
तदा चुकोप दुष्टात्मा दुर्मुखः कालमोहितः ।
देवीमुवाच गर्वेण कृत्वा चोर्ध्वकरं शुभम् ॥ ३७ ॥
गच्छ चण्डि हनिष्यामि त्वामद्यैव सुबालिशे ।
दैत्यं वा भज वामोरु महिषं मदगर्वितम् ॥ ३८ ॥
देव्युवाच
आसन्नमरणः कामं प्रलपस्यद्य मोहितः ।
अद्यैव त्वां हनिष्यामि यथायं बाष्कलो हतः ॥ ३९ ॥
गच्छ वा तिष्ठ वा मन्द मरणं यदि रोचते ।
हत्वा त्वां वै वधिष्यामि बालिशं महिषीसुतम् ॥ ४० ॥
तच्छ्रुत्वा वचनं तस्या दुर्मुखो मर्तुमुद्यतः ।
मुमोच बाणवृष्टिं तु चण्डिकां प्रति दारुणाम् ॥ ४१ ॥
सापि तां तरसा छित्त्वा बाणवृष्टिं शितैः शरैः ।
जघान दानवं कृद्धा वृत्रं वज्रधरो यथा ॥ ४२ ॥
तयोः परस्परं युद्धं सञ्जातं चातिकर्कशम् ।
भयदं कातराणाञ्च शूराणां बलवर्धनम् ॥ ४३ ॥
देवी चिच्छेद तरसा धनुस्तस्य करे स्थितम् ।
तथैव पञ्चभिर्बाणैर्बभञ्ज रथमुत्तमम् ॥ ४४ ॥
रथे भग्ने महाबाहुः पदातिर्दुर्मुखस्तदा ।
गदां गहीत्वा दुर्धर्षां जगाम चण्डिकां प्रति ॥ ४५ ॥
चकार स गदाघातं सिंहमौलौ महाबलः ।
न चचाल हरिः स्थानात्ताडितोऽपि महाबलः ॥ ४६ ॥
अम्बिका तं समालोक्य गदापाणिं पुरःस्थितम् ।
खड्गेन शितधारेण शिरश्चिच्छेद मौलिमत् ॥ ४७ ॥
छिन्ने च मस्तके भूमौ पपात दुर्मुखो मृतः ।
जयशब्दं तदा चक्रुर्मुदिता निर्जरा भृशम् ॥ ४८ ॥
तुष्टुवुस्तां तदा देवीं दुर्मुखे निहतेऽमराः ।
पुष्पवृष्टिं तथा चक्रुर्जयशब्दं नभःस्थिताः ॥ ४९ ॥
ऋषयः सिद्धगन्धर्वाः सविद्याधरकिन्नराः ।
जहृषुस्तं हतं दृष्ट्वा दानवं रणमस्तके ॥ ५० ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां पञ्चमस्कन्धे महिषसेनाधिप-
बाष्कलदुर्मुखनिपातनवर्णनं नाम त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥


बाष्कल व दुर्मुख यांचा वध -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

अशाप्रकारची भाषणे करून बाष्कल व दुर्मुख यांनी अंगाला कस्तुरीची उटी लावली व ते राजसभेतून निघून गेले. समरांगणात जाऊन त्यांनी भयंकर गर्जना केल्या व ते म्हणाले, "हे देवी, ज्या महापराक्रमी महिषाने प्रत्यक्ष देवांना पळवून लावले त्या दानवराजाला तू पती म्हणून वर. तो सर्वलक्षणसंपन्न व दिव्य अलंकारांनी भूषित असे मनुष्यरूप धारण करूनच तुझ्याशी रतिक्रीडा करील.

हे सुहास्यवदने, त्यामुळे तुला त्रैलोक्यात सुख प्राप्त होईल. म्हणून महिषासुरावरच तू प्रेम कर. हे मधुर वाग्‌विलासिनी, स्त्रियांना प्रिय असलेल्या सर्व संसारसुखाची प्राप्ती होईल."

देवी म्हणाली, "अरे दुष्टांनो, मी कामातूर आहे असे तुम्हाला वाटते काय ? मी त्या मूर्ख महिषाला का वरणार आहे ? कुल, शील, स्वरूपसंपन्नता, चातुर्य इत्यादी गुणांवरच स्त्रिया लुब्ध होतात. तो तुमचा राजा प्रत्यक्ष पशूपेक्षाही अधम आहे. असल्या महिषाला कोणती देवरूप स्त्री वरील ? तेव्हा हे मूर्ख मंत्र्यांनो, तुम्ही परत जा व राजाला सांगा. " तू सत्वर पाताळात जा अथवा युद्‌ध कर म्हणजे इंद्र निर्भय होईल. मी तुझा वधच करीन. तुझ्या वधाशिवाय मी परतणार नाही. तेव्हा सर्व विचार करूनच तू युद्धास तयार हो. हे पशू, माझा पराभव झाला तरच तुला या भूमीवर रहाता येईल."

याप्रमाणे तिचे भाषण ऐकताच दोन्ही दैत्य रागाने तप्त झाले. देवीने प्रचंड गर्जना केली व रणांगणात निश्चयाने उभी राहिली. दोघांनीही देवीवर बाणवृष्टी केली, पण देवकार्यासाठी तत्पर असलेल्या देवीने मधुर स्वर करीत बाणांचा प्रतिवर्षाव केला. इतक्यात बाष्कल देवीसमोर येऊन ठाकला. दुर्मुख प्रेक्षकासारखा त्यांचे युद्ध पहात होता. सामान्यांना भय उत्पन्न करणारी आयुधे दोघांनीही वापरली व घोर युद्ध झाले. युद्ध होऊन देवीने अति तीक्ष्ण बाण बाष्कलावर सोडले.

परंतु बाष्कलाने ते आपल्या बाणांनी तोडून उलट सात बाणांनी देवीला ताडन केले. तेव्हा तिनेही उत्कृष्ट तीक्ष्ण दहा बाणांनी त्याला वेधले व हसतमुखाने एका अर्ध-चंद्राकृती बाणाने त्याचे धनुष्य तोडून टाकले. तेव्हा बाष्कलाने हातात गदा घेतली व तो देवीकडे धावला. परंतु देवीने त्याला तत्काळ गदेचा प्रहार करून मूर्च्छित केले. पण लवकरच बाष्कल शुद्धीवर येऊन उठला. त्याने देवीजवळ जाऊन गदा तिच्या मस्तकावर फेकली. परंतु देवीने घाव चुकवून अचुकतेने बाष्कलाच्या वक्षावर शूलाने प्रहार केला. बाष्कल तत्काळ गतप्राण होऊन भूमीवर कोसळला. त्याच्या मृत्युमुळे दानवसैन्याची दाणादाण उडाली. आकाशातून देवांनी मात्र जयजयकार केला.

ते पाहून दुर्मुख रागाने बेभान होऊन संग्राम करण्याकरता धावला. त्याने अंगात कवच घातले व रथारूढ होऊन हातात धनुष्य बाण घेतला. तो म्हणाला, "हे अबले थांब." परंतु देवीने जोराने शंखनाद केला. त्यामुळे तो दानव अधिकच कोपला.

दुर्मुखाने भुजंगतुल्य तीक्ष्ण बाण त्वरेने देवीवर सोडले. परंतु ते सर्व तोडून टाकून त्या महामायेने प्रचंड गर्जना केली.

बाण, शक्ती, गदा, मुसल, तोमर यांच्या योगाने परस्पर तुमुल युद्ध झाले. तेव्हा रणांगणावर रक्ताची नदी उत्पन्न झाली. तिच्या तीरावर पडलेली मस्तके जणू काय यमाच्या नवशिक्या सेवकांसाठी तरून जाण्याकरता आत टाकलेले भोपळेच भासले. कित्येक शरीरे लांडगे खात होते, त्यामुळे त्या युद्धभुमीला एक प्रकारचे भयानक स्वरूप प्राप्त झाले. कोल्ही, कुत्री, काक, कंक, अधोमुख, गृध्र, श्येन वगैरे पक्षी त्या दुष्टांच्या शरीराचे लचके तोडत होते. मृतांच्या देहांचा खच झाल्यामुळे दुर्गंधी सुटली होती. मांसभक्षक पशु-पक्ष्यांचा आवाज सदैव चालूच होता. इतके असूनही दुर्मुख क्रुद्ध होऊन आपला हात वर करून देवीला म्हणाला, "हे पोरकट देवी, तू येथून त्वरित निघून जा, नाहीतर मी तुझा आजच वध करीन अथवा तुला जगायची इच्छा असेल तर महिषाची पत्‍नी हो."

देवी म्हणाली, "अरे मुर्खा, आज खरोखरच तुझा मृत्यु जवळ असल्यामुळे तू असे हे बोलतो आहेस. अरे, बालकाप्रमाणे आज मी तुझाही या युद्धात वध करीन किंवा तू रणातून निघून जा. नाहीतर तुलाही मृत्युलोकी पाठवून त्या महिषासुराच्याही मी पुढे वध करीन."

हे भाषण ऐकल्याबरोबर उन्मत्त दुर्मुखाने त्या रणचंडीवर प्रचंड बाणवृष्टी केली. परंतु देवीनेही अत्यंत सावधपणे तीक्ष्ण बाण सोडून दुर्मुखाचे बाण मोडून टाकले. वृत्रासुराचा वेध घेणार्‍या वज्रधारी इंद्राप्रमाणे त्या क्रुद्ध देवीने बाणांनी दानवाचा वेध केला. तेव्हा भित्र्यांना दहशत बसविणारे व शूरांना प्रोत्साहन देणारे असे भयंकर युद्ध त्या दोघांमध्ये झाले.

देवीने युद्धात कसब दाखवून दुर्मुखाचे धनुष्य तोडून टाकले व पाच बाणांतच त्याचा रथही तोडला. अखेर दुर्मुख पादचारी होऊन महाभयंकर गदा घेऊन देवी जगदंबेवर धावला. त्याने सिंहाच्या मस्तकी गदेचा भयंकर प्रहार केला. परंतु जबरदस्त प्रहार होऊनही सिंह जागचा हलला नाही.

शेवटी गदाधारी दुर्मुखावर अंबिकेने तीक्ष्ण धारेचे खङ्ग फेकून त्याचे मस्तक धडावेगळे केले. दुर्मुख मरून पडल्यावर आनंदाने देव जयजयकार करू लागले.

याप्रमाणे दोन महाभयंकर दैत्यांचा वध झाल्याने देवांनी पुष्प-वृष्टी केली. ऋषी, सिद्ध, गंधर्व, विद्याधर व किन्नर यांनाही अतिशय आनंद होऊन देवांसह सर्वजण देवीचा जयजयकार करू लागले.


अध्याय तेरावा समाप्त

GO TOP