श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
पञ्चमः स्कन्धः
एकादशोऽध्यायः


ताम्रकृतं देवीं प्रति विस्रंसनवचनवर्णनम्

व्यास उवाच
इति तस्य वचः श्रुत्वा महिषो मदविह्वलः ।
मन्त्रिवृद्धान् समाहूय राजा वचनमब्रवीत् ॥ १ ॥
राजोवाच
मन्त्रिणः किं च कर्तव्यं विश्रब्धं ब्रूत मा चिरम् ।
आगता देवविहिता मायेयं शाम्बरीव किम् ॥ २ ॥
कार्येऽस्मिन्निपुणा यूयमुपायेषु विचक्षणाः ।
सामादिषु च कर्तव्यः कोऽत्र मह्यं ब्रुवन्तु च ॥ ३ ॥
मन्त्रिण ऊचुः
सत्यं सदैव वक्तव्यं प्रियञ्च नृपसत्तम ।
कार्यं हितकरं नूनं विचार्य विबुधैः किल ॥ ४ ॥
सत्यं च हितकृद्‌राजन्प्रियं चाहितकृद्‌भवेत् ।
यथौषधं नृणां लोके ह्यप्रियं रोगनाशनम् ॥ ५ ॥
सत्यस्य श्रोता मन्ता च दुर्लभः पृथिवीपते ।
वक्तापि दुर्लभः कामं बहवश्चाटुभाषकाः ॥ ६ ॥
कथं ब्रूमोऽत्र नृपते विचारे गहने त्विह ।
शुभं वाप्यशुभं वापि को वेत्ति भुवनत्रये ॥ ७ ॥
राजोवाच
स्वस्वमत्यनुसारेण ब्रुवन्त्वद्य पृथक्पृथक् ।
येषां हि यादृशो भावस्तच्छ्रुत्वा चिन्तयाम्यहम् ॥ ८ ॥
बहूनां मतमाज्ञाय विचार्य च पुनः पुनः ।
यच्छ्रेयस्तद्धि कर्तव्यं कार्यं कार्यविचक्षणैः ॥ ९ ॥
व्यास उवाच
तस्यैवं वचनं श्रुत्वा विरूपाक्षो महाबलः ।
उवाच तरसा वाक्यं रञ्जयन्पृथिवीपतिम् ॥ १० ॥
विरूपाक्ष उवाच
राजन्नारी वराकीयं सा ब्रूते मदगर्विता ।
विभीषिकामात्रमिदं ज्ञातव्यं वचनं त्वया ॥ ११ ॥
को बिभेति स्त्रियो वाक्यैर्दुरुक्तै रणदुर्मदैः ।
अनृतं साहसं चेति जानन्नारीविचेष्टितम् ॥ १२ ॥
जित्वा त्रिभुवनं राजन्नद्य कान्ताभयेन वै ।
दीनत्वेऽप्ययशो नूनं वीरस्य भुवने भवेत् ॥ १३ ॥
तस्माद्याम्यहमेकाकी युद्धाय चण्डिकां प्रति ।
हनिष्ये तां महाराज निर्भयो भव साम्प्रतम् ॥ १४ ॥
सेनावृतोऽहं गत्वा तां शस्त्रास्त्रैर्विविधैः किल ।
निषूदयामि दुर्मर्षां चण्डिकां चण्डविक्रमाम् ॥ १५ ॥
बद्ध्वा सर्पमयैः पाशैरानयिष्ये तवान्तिकम् ।
वशगा तु सदा ते स्यात्पश्य राजन् बलं मम ॥ १६ ॥
व्यास उवाच
विरूपाक्षवचः श्रुत्वा दुर्धरो वाक्यमब्रवीत् ।
सत्यमुक्तं वचो राजन् विरूपाक्षेण धीमता ॥ १७ ॥
ममापि वचनं श्लक्ष्णं श्रोतव्यं धीमता त्वया ।
कामातुरैषा सुदती लक्ष्यतेऽप्यनुमानतः ॥ १८ ॥
भवत्येवंविधा कामं नायिका रूपगर्विता ।
भीषयित्वा वरारोहा त्वां वशे कर्तुमिच्छति ॥ १९ ॥
हावोऽयं मानिनीनां वै तं वेत्ति रसवित्तमः ।
वक्रोक्तिरेषा कामिन्याः प्रियं प्रति परायणम् ॥ २० ॥
वेत्ति कोऽपि नरः कामं कामशास्त्रविचक्षणः ।
यदुक्तं नाम बाणैस्त्वा वधिष्ये रणमूर्धनि ॥ २१ ॥
हेतुगर्भमिदं वाक्यं ज्ञातव्यं हेतुवित्तमैः ।
बाणास्तु मानिनीनां वै कटाक्षा एव विश्रुताः ॥ २२ ॥
पुष्पाञ्जलिमयाश्चान्ये व्यंग्यानि वचनानि च ।
का शक्तिरन्यबाणानां प्रेरणे त्वयि पार्थिव ॥ २३ ॥
तादृशीनां न सा शक्तिर्ब्रह्मविष्णुहरादिषु ।
ययोक्तं नेत्रबाणैस्त्वां हनिष्ये मन्द पार्थिवम् ॥ २४ ॥
विपरीतं परिज्ञातं तेनारसविदा किल ।
पातयिष्यामि शय्यायां रणमय्यां पतिं तव ॥ २५ ॥
विपरीतरतिकीडाभाषणं ज्ञेयमेव तत् ।
करिष्ये विगतप्राणं यदुक्तं वचनं तया ॥ २६ ॥
वीर्यं प्राणा इति प्रोक्तं तद्विहीनं न चान्यथा ।
व्यंग्याधिक्येन वाक्येन वरयत्युत्तमा नृप ॥ २७ ॥
तद्वै विचारतो ज्ञेयं रसग्रन्थविचक्षणैः ।
इति ज्ञात्वा महाराज कर्तव्यं रससंयुतम् ॥ २८ ॥
सामदानद्वयं तस्या नान्योपायोऽस्ति भूपते ।
रुष्टा वा गर्विता वापि वशगा मानिनी भवेत् ॥ २९ ॥
तादृशैर्मधुरैर्वाक्यैरानयिष्ये तवान्तिकम् ।
किं बहूक्तेन मे राजन् कर्तव्या वशवर्तिनी ॥ ३० ॥
गत्वा मयाधुनैवेयं किङ्करीव सदैव ते ।
व्यास उवाव
इत्थं निशम्य तद्वाक्यं ताम्रस्तत्त्वविचक्षणः ॥ ३१ ॥
उवाच वचनं राजन्निशामय मयोदितम् ।
हेतुमद्धर्मसहितं रसयुक्तं नयान्वितम् ॥ ३२ ॥
नैषा कामातुरा बाला नानुरक्ता विचक्षणा ।
व्यंग्यानि नैव वाक्यानि तयोक्तानि तु मानद ॥ ३३ ॥
चित्रमत्र महाबाहो यदेका वरवर्णिनी ।
निरालम्बा समायाति चित्ररूपा मनोहरा ॥ ३४ ॥
अष्टादशभुजा नारी न श्रुता न च वीक्षिता ।
केनापि त्रिषु लोकेषु पराक्रमवती शुभा ॥ ३५ ॥
आयुधान्यपि तावन्ति धृतानि बलवन्ति च ।
विपरीतमिदं मन्ये सर्वं कालकृतं नृप ॥ ३६ ॥
स्वप्नानि दुर्निमित्तानि मया दृष्टानि वै निशि ।
तेन जानाम्यहं नूनं वैशसं समुपागतम् ॥ ३७ ॥
कृष्णाम्बरधरा नारी रुदती च गृहाङ्गणे ।
दृष्टा स्वप्नेऽप्युषःकाले चिन्तितव्यस्तदत्ययः ॥ ३८ ॥
विकृताः पक्षिणो रात्रौ रोरुवन्ति गृहे गृहे ।
उत्पाता विविधा राजन् प्रभवन्ति गृहे गृहे ॥ ३९ ॥
तेन जानाम्यहं नूनं कारणं किञ्चिदेव हि ।
यत्त्वां प्रार्थयते बाला युद्धाय कृतनिश्चया ॥ ४० ॥
नैषास्ति मानुषी नो वा गान्धर्वी न तथासुरी ।
देवैः कृतेयं ज्ञातव्या माया मोहकरी विभो ॥ ४१ ॥
कातरत्वं न कर्तव्यं ममैतन्मतमित्यलम् ।
कर्तव्यं सर्वथा युद्धं यद्‌भाव्यं तद्‌भविष्यति ॥ ४२ ॥
को वेद दैवकर्तव्यं शुभं वाप्यशुभं तथा ।
अवलम्ब्य धिया धैर्यं स्थातव्यं वै विचक्षणैः ॥ ४३ ॥
जीवितं मरणं पुंसां दैवाधीनं नराधिप ।
कोऽपि नैवान्यथा कर्तुं समर्थो भुवनत्रये ॥ ४४ ॥
महिष उवाच
गच्छ ताम्र महाभाग युद्धाय कृतनिश्चयः ।
तामानय वरारोहां जित्वा धर्मेण मानिनीम् ॥ ४५ ॥
न भवेद्वशगा नारी संग्रामे यदि सा तव ।
हन्तव्या नान्यथा कामं माननीया प्रयत्‍नतः ॥ ४६ ॥
वीरस्त्वमसि सर्वज्ञ कामशास्त्रविशारदः ।
येन केनाप्युपायेन जेतव्या वरवर्णिनी ॥ ४७ ॥
त्वरन्वीर महाबाहो सैन्येन महता वृतः ।
तत्र गत्वा त्वया ज्ञेया विचार्य च पुनः पुनः ॥ ४८ ॥
किमर्थमागता चेयं ज्ञातव्यं तद्धि कारणम् ।
कामाद्वा वैरभावाच्च माया कस्येयमित्युत ॥ ४९ ॥
आदौ तन्निश्चयं कृत्वा ज्ञातव्यं तच्चिकीर्षितम् ।
पश्चाद्युद्धं प्रकर्तव्यं यथायोग्यं यथाबलम् ॥ ५० ॥
कातरत्वं न कर्तव्यं निर्दयत्वं तथा न च ।
यादृशं हि मनस्तस्याः कर्तव्यं तादृशं त्वया ॥ ५१ ॥
व्यास उवाच
इति तद्‌भाषितं श्रुत्वा ताम्रः कालवशं गतः ।
निर्गतः सैन्यसंयुक्तः प्रणम्य महिषं नृपम् ॥ ५२ ॥
गच्छन्मार्गे दुरात्मासौ शकुनान्वीक्ष्य दारुणान् ।
विस्मयञ्च भयं प्राप यममार्गप्रदर्शकान् ॥ ५३ ॥
सगत्वा तां समालोक्य देवीं सिंहोपरिस्थिताम् ।
स्तूयमानां सुरैः सर्वैः सर्वायुधविभूषिताम् ॥ ५४ ॥
तामुवाच विनीतः सन् वाक्यं मधुरया गिरा ।
सामभावं समाश्रित्य विनयावनतः स्थितः ॥ ५५ ॥
देवि दैत्येश्वरः शृङ्गी त्वद्‌रूपगुणमोहितः ।
स्पृहां करोति महिषस्त्वत्पाणिग्रहणाय च ॥ ५६ ॥
भावं कुरु विशालाक्षि तस्मिन्नमरदुर्जये ।
पतिं तं प्राप्य मृद्वङ्‌गि नन्दने विहराद्‌भुते ॥ ५७ ॥
सर्वाङ्गसुन्दरं देहं प्राप्य सर्वसुखास्पदम् ।
सुखं सर्वात्मना ग्राह्यं दुःखं हेयमिति स्थितिः ॥ ५८ ॥
करभोरु किमर्थं ते गृहीतान्यायुधान्यलम् ।
पुष्पकन्दुकयोग्यास्ते कराः कमलकोमलाः ॥ ५९ ॥
भ्रूचापे विद्यमानेऽपि धनुषा किं प्रयोजनम् ।
कटाक्षा विशिखाः सन्ति किं बाणैर्निष्प्रयोजनैः ॥ ६० ॥
संसारे दुःखदं युद्धं न कर्तव्यं विजानता ।
लोभासक्ताः प्रकुर्वन्ति संग्रामञ्च परस्परम् ॥ ६१ ॥
पुष्पैरपि न योद्धव्यं किं पुनर्निशितैः शरैः ।
भेदनं निजगात्राणां कस्य तज्जायते मुदे ॥ ६२ ॥
तस्मात्त्वमपि तन्वङ्‌गि प्रसादं कर्तुमर्हसि ।
भर्तारं भज मे नाथं देवदानवपूजितम् ॥ ६३ ॥
स तेऽत्र वाञ्छितं सर्वं करिष्यति मनोरथम् ।
त्वं पट्टमहिषी राज्ञः सर्वथा नात्र संशयः ॥ ६४ ॥
वचनं कुरु मे देवि प्राप्स्यसे सुखमुत्तमम् ।
संग्रामे जयसन्देहः कष्टं प्राप्य न संशयः ॥ ६५ ॥
जानासि राजनीतिं त्वं यथावद्वरवर्णिनि ।
भुंक्ष्व राज्यसुखं पूर्णं वर्षाणामयुतायुतम् ॥ ६६ ॥
पुत्रस्ते भविता कान्तः सोऽपि राजा भविष्यति ।
यौवने क्रीडयित्वान्ते वार्धक्ये सुखमाप्स्यसि ॥ ६७ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां पञ्चमस्कन्धे
ताम्रकृतं देवीं प्रति विस्रंसनवचनवर्णनं नामैकादशोऽध्यायः ॥ ११ ॥


ताम्रसुराचा देवीला उपदेश -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मंत्री म्हणाले, "हे असुरश्रेष्ठा, पुरुषाने सत्य व योग्य असेच बोलावे. केवळ प्रिय वाटेल ते बोलू नये. ज्यात हित आहे असेच विचारी पुरुषाने वागावे. हे राजा, राजाला प्रिय असेच भाषण करणे परिणामी अहितकारक ठरण्याची शक्यता असते. औषध जरी अप्रिय असले तरी ते रोगनाशक आहे. म्हणून सेवन करावे लागते. सत्य भाषणाचे तसेच आहे. फक्त प्रिय भाषण करणारे अनेक पुरुष आढळतात, पण सत्याचा भोक्ता व हितचिंतक मिळणे दुरापास्त आहे. तेव्हा या प्रसंगी आम्ही काय सांगावे ? कोणते काम शुभ व अशुभ आहे हे जाणणारा या जगात कुणीही नाही."

महिषासुर म्हणाला, "तुम्हाला जे योग्य वाटेल, जे आपल्या बुद्धीला पटेल, ते सांगण्याची सर्वांना मुभा आहे. मी संपूर्णपणे नंतर विचार करीन. कारण श्रेष्ठ पुरुष विचारपूर्वक सर्व काही निर्णय घेत असतो. तेच श्रेयस्कर होय."

त्याचे भाषण ऐकून महाबलाढ्य विरुपाक्ष राजाला प्रसन्न करून घेण्याच्या उद्देशाने म्हणाला, "हे राजा, एक यःकश्चित् स्त्री मदोन्मत्त होऊन बोलत आहे. ते तिचे नाममात्र भाषण ऐकून भिऊन जाण्याचे कारण नाही. साहसाच्या गोष्टी करणार्‍या दुर्गुणी स्त्रीचे चरित्र कोण जाणू शकेल ? कोणता पुरुष स्त्रीच्या असल्या भाषणांनी भिऊन जाईल ? आपण त्रिभुवन जिंकले आहे. तस्मात् स्त्रीला भिऊन जाण्याने आपली अपकीर्तीच होईल. म्हणून हवे तर मी एकटाच त्या चंडिकेकडे जाऊन तिचा वध करतो. आपण निर्धास्त रहा.

मी सैन्य घेऊन जाईन आणि पराक्रमाच्या वल्गना करणार्‍या त्या स्त्रीचा वध करीन अथवा सर्पमय पाशांनी बांधून आपणापुढे हजर करीन. ती सर्वदा तुझ्या अधीन होऊन राहील असे करीन. हे राजा, माझे सामर्थ्य एकदा पहाच.

विरुपाक्षाचे भाषण ऐकून दुर्धर नावाचा दैत्य म्हणाला, "हे राजा, विरुपाक्षाने सत्य व योग्य असेच भाषण केले आहे. तू विचारी आहेस तेव्हा माझेही भाषण श्रवण कर. उत्तम दंतांनी सुशोभित असलेली ती स्त्री एकंदर आविर्भावावरून काममोहित असावी. रूपाचा गर्व बाळगणारी स्त्री अशीच असते. मला वाटते, ती सुंदरी प्रथम तुला भय दाखवून नंतर तुला वश करण्याची इच्छा करीत असावी. मानिनी स्त्रियांचा आविर्भाव असाच असतो. रसिक पुरुषालाच ह्याची चांगली जाण असते. काममोहिनीची वक्रभाषा शेवटी पुरुषाच्या सुखाला कारण होते.

’बाणांनी मी संग्रामामध्ये तुझा वध करीन.' हे भाषण हेतुगर्भ असून जाण असणार्‍यांनाच त्याचा आतील गर्भितार्थ समजू शकेल. कारण कामिनीचे कटाक्ष हेच त्यांचे बाण आहेत. म्हणून इतर बाण तुझ्यावर सोडण्याचे तिला कोठून सामर्थ्य असणार ? प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णु व महेश यांना जी शक्ती नाही ती केवळ स्त्रीच्या ठिकाणी कशी असेल ? हे राजा, तिने उच्चारलेले एक वाक्य अत्यंच सूचक आहे. ती म्हणाली, 'अरे मूर्खा, नेत्रकटाक्षांनीदेखील मी तुझ्या राजाचा वध करीन.' हे ऐकून त्या अरसिक सचिवाची काही तरी विपरीत समजूत झाली. ' तुझ्या राजाला मी रणशय्येवर पाडीन. ' हे वाक्य तर रतिक्रीडेसंबंधीचेच असले पाहिजे. 'मी त्याला गतप्राण करीन.' असे म्हणणे म्हणजे मी त्याला वीर्यहीन करीन असा अर्थ आहे. तेव्हा अशाप्रकारे भाषण करून ती स्त्री तुझा स्वीकार करीत आहे, असेच तिला सुचवायचे आहे. पण शृंगार रसाच्याबाबतीत परिपूर्ण असलेल्या पुरुषांनाच ही भाषा कळेल. तेव्हा महाराज, शृंगार रसाला योग्य असाच निर्णय आपण घ्यावा.

यावेळी साम, दान हाच उपाय योग्य आहे. अन्य उपाय योग्य नव्हे. ही स्त्री रागावलेली असो अथवा गर्वाने भारलेली असो, तुला खास वश होईल. अत्यंत मधुर भाषण करून मी तिला वश करून तुझ्याकडे आणीन. पण हे राजा, आता बोलण्यापेक्षा तिला मोहित करून मी तुजकडे आणतो. मी आताच जाऊन तिला तुझ्या आधीन होईल, असे करतो."

हे भाषण ऐकल्यावर विचारी ताम्र नावाचा दैत्य म्हणाला, "हे राजा, मी आता हेतुगर्भ, धर्मशील, न्याय्य भाषण करणार आहे. ही बाला कामातुर झालेली नाही. ती तुझ्यावर मोहितही झालेली नाही. तिची भाषणे त्या मनोवृत्तीची नव्हेत. बलाढ्य राजा, अभिनव असे रूप धारण करून ती कोणाचेही सहाय्य न घेता एकटी युद्धाला आव्हान देत आहे हे आश्चर्यकारक आहे. अठरा हातांनी युक्त असलेली पराक्रमी स्त्री अस्तित्वात असलेली आजपर्यंत कोणाच्या ऐकिवातसुद्धा नाही. इतकेच काय, पण तिने अति भयंकर अशी आयुधे अठराही हातात धारण केली आहेत.

हे राजा, कालानेच हा अनिष्टकारक प्रसंग घडवून आणला आहे. काल रात्री मला काही दुःस्वप्ने पहावी लागली. त्यावरून आपला नाश जवळ आला आहे असे मला वाटते. पहाटेसच स्वप्नामध्ये कृष्णवस्त्रे परिधान केलेली स्त्री अंगणात रडत बसलेली मी पाहिली. रात्री विकृत पक्षी घरोघर एकसारखे आवाज करीत असतात. हे राजा, सांप्रत राज्यात अशुभ सूचक अशा घटना घडत आहे.

यावरून असे दिसते की ती यौवन तुला ज्याअर्थी युद्धार्थ आव्हान करीत आहे, त्याअर्थी खरोखरच काहीतरी विपरीत घडेल. हे दैत्यराज, ती मनुष्य, गंधर्व वा असुर योनीतील नाही. देवांनीच ही मोहमायी माया निर्माण केली असावी. हे जरी खरे असले तरी भित्रेपणा दाखवू नये असे माझे मत आहे. युद्धच करावे. दैवात असेल तसे होईल. तेव्हा विचारपूर्वक धैर्याचा अवलंब करणे हेच समंजस पुरुषाचे लक्षण आहे.

हे महाराजा, जन्म वा मरण दैवाधीन आहे. दैवावर विश्वास ठेवूनच प्रत्येकाने वागले पाहिजे.

अशा तर्‍हेचे ताम्रसुराच्या योग्य असे भाषण ऐकून महिषासुर म्हणाला, "भाग्यवान ताम्रा, तू युद्धाच्या निश्चयाने जाऊन धर्मशीलतेनेच त्या मानिनीला जिंकून येथे आण. जर त्या स्त्रीला तू जिंकू शकला नाहीस तर तिचा वध कर. प्रयत्‍न करून तिला शक्यतो सन्मानाने वागव. तू शूर आहेस व कामशास्त्रातही निपूण आहेस. तेव्हा तू कोणत्याही उपायांनी तिला वश करून घे.

हे शूर पुरुषा, तू मोठे सैन्य बरोबर घे. प्रथम विचारपूर्वक तू तिचा उद्देश समजवून घे. ती शत्रुभावनेने आली आहे की कामवासनेने आली आहे ? तसेच ही कोणाची माया आहे हेही समजून घे. आपल्या बळाचा योग्य तसा उपयोग कर. भित्रेपणा वा निर्भयपणा दाखविता उपयोगी नाही."

याप्रमाणे राजाचे भाषण ऐकून ताम्र महिषाला प्रणाम करून मोठे सैन्य घेऊन बाहेर पडला. पण रस्त्यात त्याला अपशकून दिसू लागले. विस्मयकारक गोष्टी पाहून त्याच्या मनात भय उत्पन्न झाले. तरीही सर्व देव स्तवन करीत असलेल्या व आयुधांनी भूषित असलेल्या सिंहारूढ देवीजवळ तो गेला. तिला प्रथम वंदन करून तो म्हणाला,

" हे देवी, तुझ्या रूपाने मोहित झालेला दैत्यराज तीक्ष्ण शृंगयुक्त महिषासुर तुझ्या प्राप्तीची इच्छा करीत आहे. हे सुंदरी, देवांनाही अजिंक्य असलेल्या महिषासुराबरोबर तू क्रीडा कर व नंदनवनाची प्राप्ती करून घे. सर्वांगसुंदर पती प्राप्त झाला असता दु:खाचा त्याग करून सुखाचा उपभोग सर्व उपायांनी घ्यावा असा सिद्धांत आहे.

हे कोमलांगी, तू आयुधे का बरे धारण केली आहेस ? तुझे कमलासारखे कर फक्त पुष्पांनाच योग्य आहेत. ही भिवयांची धनुष्ये कटाक्ष बाणांसाठीच निर्माण झाली असता तू हे लोहाचे बाण का घ्यावेत ?

वास्तविक या जगात शहाण्या पुरुषाने कधीही दु:खद असे युद्ध करू नये. प्राणी लोभाने एकमेकांशी युद्ध प्रवृत्त होतात. प्रत्यक्ष नाजुक पुष्पांनीही युद्ध करू नये. शरीरे जखमांनी छिन्नविच्छिन्न करण्यात कुणाला आनंद होत असतो ? तेव्हा हे चारूगात्री, कृपा करून देवांनांही पूज्य असलेल्या माझ्या राजाचा तू पती म्हणून स्वीकार कर ! तो तुझ्या सर्व मनकामना पूर्ण करील. तूच त्याची पट्टराणी होण्यास योग्य आहेस.

हे त्रिभुवन सुंदरी, तू जर माझे म्हणणे ऐकलेस तर तुला सर्व सुखे प्राप्त होतील. युद्ध करून जयापराजयाची निश्चिती नसते. तेव्हा वृथा श्रमण्यात काय अर्थ आहे ? तू राजनीतिज्ञ आहेस. तू आयुष्यभर त्या राज्यसुखाचा उपभोग घे. तुला सुंदर पुत्र प्राप्त होईल. या यौवनावस्थेत तुला राजासह क्रीडा करण्याची संधी मिळेल व अखेर वृद्धापकाळी सुख प्राप्त होईल.


अध्याय अकरावा समाप्त

GO TOP