॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीहरिविजय ॥

॥ अध्याय एकोणतिसावा ॥

सुदामाच्या पोह्यांची मूठ -


श्रीगणेशाय नमः ॥
शोधितां त्रिभुवन समग्र । जें जें दिसे तें मायाविकार ।
तितुकियासी भय असे साचार । नाशवंत म्हणोनियां ॥१॥
भोग बहुत भोगितां । तेथें रोगाचें भय तत्त्वतां ।
सौख्य बहुवस वाढतां । दुःख सवेंचि उद्‌भवे ॥२॥
बहुसाल सांचितां धन । राज-चोरभय त्यालागून ।
विद्या होतां परिपूर्ण । वादक येऊन छळती हो ॥३॥
तपासी विघ्न करी शचीनाथ । रुपवंता योषिता छळित ।
मित्रत्व जाहलें बहु तेथ । भय होत अर्थसंबंधें ॥४॥
ज्ञान जों संपूर्ण होय । तेथें अभिमानाचें भय ।
सकळांमाजी निर्भय । हरीचे पाय असती ॥५॥
यालागीं अच्युतचरणउपासन । निर्भय असे परिपूर्ण ।
जें सकळ दुःखदरिद्रभंजन । निर्वाणपददायक ॥६॥
अठ्ठाविसाव्या अध्यायीं कथा सुबुद्ध । उखेनें वरिला अनिरुद्ध ।
वोहरें घेऊनि गोविंद । द्वारकेसी पावला ॥७॥
आधि व्याधि दुःख दरिद्र । दूर करणार यादवेंद्र ।
त्याचें भजनीं जे तत्पर । त्यांसी साचार नुपेक्षी तो ॥८॥
कालयवनाच्या राज्याभीतरी । हरिचरणोद्‌भव गंगेच्या तीरीं ।
कपिलानाम नगरीं । अवनीवरी विख्यात ॥९॥
तेथें सुदामदेव ब्राह्मण । अत्यंन्त दरिद्री अकिंचन ।
ज्याचे मुष्टिभर कण । संग्रह नाहीं सर्वथा ॥१०॥
नित्य करूनि कोरान्न । मेळवूनि आणी कण ।
त्यांमाजी अतिथिपूजा पंचग्रासकरून । यथान्याय करीतसे ॥११॥
ब्रह्मचारी यतीश्वर । उपवासी किंवा निराहार ।
नित्य दोनप्रहरां घेऊनि समाचार । सुदामा विप्र भोजन करी ॥१२॥
दुसरिया दिवसालागून । न उरे मुष्टीभर अन्न ।
बाळे पीडती क्षुधेकरून । न उरे अन्न तयांसी ॥१३॥
सुदामदेवाची गृहिणी । परम पतिव्रताशिरोमणी ।
सदा सादर पतिभजनीं । शुचिष्मंत सर्वदा ॥१४॥
उभयतांचें एक चित्त । गृहस्थाश्रमीं वर्तत ।
दोघांचे अंतरी दया बहुत । सदा हेत धर्मावरी ॥१५॥
ऐसी जे स्त्री धर्मानुकूल । तेचि पतिव्रता सती निर्मळ ।
त्या घरी राहे घननीळ । लक्ष्मीसहित सर्वदा ॥१६॥
भ्रताराचे भाग्य देखती । लटकीच प्रीति वरिवरी दाविती ।
ज्या ओढाळी अत्यंत करिती । भ्रताराशी वंचनार्थ ॥१७॥
एक तोंडाळ अत्यंत । एक खट्याळ मलिन बहुत ।
भ्रतार देखता क्षोभे मनांत । तिचा त्याग अवश्य कीजे ॥१८ ॥
अखंड जे क्रोधमुखी। दुर्भगा दुःशीला एकी ।
घरी सर्व असोनि जे दैन्य भाकी । तिचा त्याग अवश्य कीजे ॥१९॥
दर्पण घेऊनि हातीं । सदा दांत दाढा सोलिती।
पतिआधीं ज्या अन्न भक्षिती । त्यांचा त्याग अवश्य कीजे ॥२० ॥
करिती पतिची निंदा । परघरी ज्या वसती सदा ।
ज्यांच्या बोलासी नाही मर्यादा । त्यांचा त्याग अवश्य कीजे ॥२१॥
जार - जारिणींची संगती धरी । मना आवडे तेथें निद्रा करी ।
एकली ग्रामा चाले दुराचारी । तिचा त्याग अव कीजे ॥२२॥
चीरें आणि अलंकार । घेऊनि वेळोवेळां करी शृंगार ।
उदकी रूप पाहे वारंवार । तिचा त्याग अवश्य कीजे ॥२३॥
भलत्याशी एकान्तगोष्टी । जार न्याहाळी सदा दृष्टीं ।
सुख मानी पति होता कष्टी । तिचा त्याग अवश्य कीजे ॥२४॥
सदा उघडे पयोधर । सवेंचि हांसे झांकी पदर ।
निरिया सरसावी वारंवार । तिचा त्याग अवश्य कीजे ॥२५॥
दुष्ट स्त्रियेसीं करणें संसार । अज्ञान गुरु आणि मूर्ख पुत्र ।
यजमान कृपण कपटी मित्र । सुख अणुमात्र नसे तेथें ॥२६॥
धनी निर्धन षंढ भ्रतार । वक्ता तामसी श्रोता पामर ।
अंध सांगाती पंथ दूर । सुख अणुमात्र नसे तेथें ॥२७॥
राजा कोपिष्ठ अविचारी प्रधान । भांडारी तस्कर मोडकें सदन ।
शिष्य अभाविक गुरु मलिन । मग दुःख न्यून काय तेथें ॥२८॥
पैशुन्यवादियाचा विश्वास । पोहणाराविण धरी त्याची कांस ।
रोगिष्ट वैद्याचे औषधास । न ये यश कल्पांती ॥२९॥
खोटे नाणें मोडकें शस्त्र । अबद्ध पुस्तक अशुचि दानपत्र ।
पढला तरी समयीं नाठवे शास्त्र । त्यासी यश न ये कल्पांतीं ॥३०॥
असो सुदामदेवाची गृहिणी । परम पवित्र सर्वगुणी ।
दरिद्री पति निशिदिनीं। आज्ञा नुल्लंघी तयाची ॥३१॥
आधींच दरिद्रें पीडिलीं सबळ । त्यावरी पडिला दुष्काळ ।
सत्त्व टाकिती भाग्यवंत सकळ । चोर पुष्कळ सूटले ॥३२॥
लोक देशधडी जाहले । दुष्काळें राष्ट्र वोस पडिलें ।
सदनें टाकूनि लोक गेले । मार्ग न चले कोठेंही ॥३३॥
वोस पडिल्या आळ्या सकळिक । भरले आळीस जाती लोक ।
आपुली झोंपडी सोडूनि देख । सुदामाही चालिला ॥३४॥
तंव दरिद्रियासी ठाव तत्त्वतां । कोणीच न देती सर्वथा ।
जेथें जेथें घरपांग पाहतां । बाहेरी घालिती पिटोनी ॥३५॥
एकाचिया अंगणांत । राहिला स्त्रीपुत्रांसमवेत ।
अपत्यें अन्नाविण पीडती बहुत । कोरान्न न मिळे कोठेंही ॥३६॥
जरी तृणबीज मिळे किंचित । वैश्वदेवऔपासन करीत ।
त्याहीमाजी आला अतिथ । त्यासही देत विभाग पैं ॥३७॥
लेंकरें सुंदर सगुण । कृश जाहलीं दिसती दीन ।
डोळां उरलासे प्राण । पतिव्रतेचा तेधवां ॥३८॥
म्हणे मज जरी असतें माहेर । तरी लेंकरें धाडितें सत्वर ।
पतीसी म्हणे तुमचा मित्र । द्वारकाधीश असे कीं ॥३९॥
सुदामा म्हणे बाळपणीं । परम प्रीति करी चक्रपाणी ।
कृतान्तभगिनीतीरीं जाऊनी । गोरक्षण करीतसे ॥४०॥
त्याहीवरी गुरुगृहीं विद्याभ्यास । मी आणि राम हृषीकेश ।
लीलावतारी जगन्निवास । कर्तव्य अद्भुत तयाचें ॥४१॥
गुरुपुत्र मृत्यु पावला । कमलपत्राक्षें ते वेळां ।
तात्काळ माघारा आणिला । यमलोकासी जाऊनियां ॥४२॥
गृहींहूनि न जावा वैकुंठराणा । म्हणोनि सांदीपनें तत्क्षणा ।
मागितली गुरुदक्षिणा । न मिळे कोणा सर्वथा ॥४३॥
मृत्यू पावला दिवस बहुत । तो आणिला गुरुसुत ।
आज्ञा घेतां रमानाथ । गुरु सद्गद जाहला ॥४४॥
अवंतीनगरी होता सांदीपन । तेथें कृष्णपदांकतीर्थाभिधान ।
अद्यापि असे सकळ जन । करितां स्नान मुक्त होती ॥४५॥
त्या तीर्थासमीप उत्तम । अद्यापि आहे गुरूचा आश्रम ।
तेथें श्रीकृष्णमूर्ति सप्रेम । सांदीपनें स्थापिली ॥४६ ॥
तैंचा मित्र माझा जगज्जीवन । तो पतिव्रता बोले वचन ।
स्वामी अवश्य घ्यावें दर्शन । द्वारकेसी जाऊनियां ॥४७॥
विप्र म्हणे रिक्तहस्तें । कैसा भेदूं जगद्‌गुरूतें ।
देवाधिदेवा नृपश्रेष्ठातें । उणे तेथे काय असे ॥४८॥
मग पतिव्रता उठली ते क्षणीं । शेजारिणीचे येथें जाऊनी ।
मुष्टीभर पोहे उसणे आणूनी । विप्राहातीं देतसे ॥४९॥
स्वामी हाचि शकुन होये । उसणे मिळाले मुष्टि पोहे ।
ब्राह्मण उठिला लवलाहें । हर्ष न माये पोटांत ॥५०॥
मुष्टि पोहे बांधावयासी । वस्त्र धड नाहीं त्यापाशीं ।
जीर्ण चिंध्या पांघरावयासी । विप्राचे मानसीं लाज वाटे ॥५१॥
ठायी ठायीं गांठोडिया करूनी । पोहे बांधिले तेचि क्षणीं ।
जातां पतिव्रतेचिया नयनीं । अश्रु आले तेधवां ॥५२॥
म्हणे स्वामी तुम्हांविण । मी केवळ परदेशी अनाथ दीन ।
लवकरी यावें परतोन । म्हणोनि चरण धरियेले ॥५३ ॥
तृणबीज उसणें मागोनी। अपत्ये जगवीन दिवस दोनी ।
आपण हरिदर्शन घेऊनी । सत्वरचि परतावें ॥५४॥
असो वेगें निघाला ब्राह्मण । स्त्रियेचें समाधान करून ।
तों पुढें जाहलें उत्तम शकुन । सव्य जाती वायस ॥५५॥
पूर्ण कलश माथां घेऊनी । पुढें भेटल्या दिव्य कामिनी ।
असो चिंध्यांचे भार पांघरोनी । विप्र जात त्वरेनें ॥५६॥
मार्गीं जातां द्विजवर । मनीं करी नाना विचार ।
कृष्णाच्या द्वारीं देव समग्र । जोडोनि कर उभे राहती ॥५७॥
भर्ग मित्र विधि रोहिणीवर । गीष्पति धनपति त्रिदशेश्वर ।
हे हरीच्या द्वारीं तिष्ठती निरंतर । दाटी अपार राजयांची ॥५८॥
जातां कृष्णाच्या दर्शना । मुकुटीं मुकुट आदळती खणखणां ।
तेथें मज दीना ब्राह्मणा । प्रवेश कैसा होईल ॥५९॥
श्रीकृष्णललना चतुरा बहुत । माझा विनोद करितील समस्त ।
मी दुर्बळ तेथें बहुत । ब्राह्मण ऐसें चिंतीतसे ॥६०॥
वाटे जातां घडीघडी । पाहे पोह्यांची गांठोडी ।
मनांत म्हणे घरीं बाळें रोकडीं । उपवासी मरतील ॥६१॥
ऐसा त्वरेनें जातां विप्र । तंव समीप देखिलें द्वारकापुर ।
जें विरिंचीनें रचिलें नगर । ऐका सादर चतुर हो ॥६२॥
चोवीस योजनें सविस्तर । रमणीय दिसे द्वारकानगर ।
सप्त दुर्गें भोंवतीं परिकर । महाविशाळ प्रचंड ॥६३॥
सुवर्णमय दुर्गें दिसती । चरव्या झळकती शेषफणाकृती ।
रजनीमाजी वाटती । नक्षत्रें वरी जडियेलीं ॥६४॥
रत्‍नजडित चक्रें दिसती । जैसे पंक्तीनें बैसले गभस्ती ।
भोंवता खंदक सरितापती । असंभाव्य उचंबळे ॥६५॥
जैसे कनकाद्रीचे पुत्र पाहीं । तैसे हुडे झकळती ठायीं ठायीं ।
गिरिवर ते सर्वदाही । गर्जताती कृष्णनामें ॥६६॥
वरी ठेविलीं उल्हाटयंत्रें । शस्त्रें झळकताती अपारें ।
हुडोहुडीं मंगळतुरें । रात्रंदिवस गर्जती ॥६७॥
तंत वितंत घन सुस्वर । वाद्यें वाजती मनोहर ।
त्या नादें गोपुरें समग्र । दुमदुमती सर्वदा ॥६८॥
दुर्गावरुनि एक पंक्ती । कल्पवृक्ष दिव्य झळकती ।
चपळेऐसे ध्वज निश्चिती । लखलखती अपार ॥६९॥
महाद्वारें विशाळ झळकती । नवरत्‍नांचीं चक्रें वोप देती ।
ऐरावतारुढ अमरपती । येत जात संभ्रमेसीं ॥७०॥
मठ मंडप चौबार झळकती । मदालसा जडित विराजती ।
दामोदरें उंच लखलखती । सोळा सहस्र गोपिकांचीं ॥७१॥
शतखणी दामोदरें विशाळें । वाटे आकाशासी टेंकण दिधलें ।
कीं मित्ररथ अडखळे । निराळपंथ क्रमितां हो ॥७२॥
हिरेपाचूंचीं सोपानें । एकावरी एक विराजमानें ।
अवतारचरित्रें ओळीनें । भिंतीवरी जडियेलीं ॥७३॥
चर्यांवरी द्विज आणि श्वापदें । रत्‍नजडित नानाविधें ।
पाचूचे रावे विविध शब्दें । कृष्णलीला गर्जती ॥७४॥
रत्‍नजडित कळस वरी । अपार दिसती एकसरी ।
खणोखणीं पुतळ्या सुस्वरीं । गाती नाचती संगीत ॥७५॥
त्या सर्व अंगोळिका धरुनियां । गिरक्या घेती पुतळिया ।
सर्व अलंकारीं डौरलिया । सजीव त्या भासती ॥७६॥
घरोघरीं सजीव सरोवर । नाना तीर्थांची कारंजीं अपार ।
नीळरत्‍नांचे मयुर । धांवताती स्वइच्छें ॥७७॥
एकाहूनि एक विचित्रें । आळोआळीं सुंदर घरें ।
गृहीं गृहीं दामोदरें । प्रभाकरें लखलखती ॥७८॥
दामोदरांप्रति कळस । कळसांप्रति रत्‍नकुंभ विशेष ।
कुंभांप्रति रत्‍नें राजस । त्यांवरी हंस खेळती ॥७९॥
हंसाप्रति मुखीं मुक्तमाळा । भक्त भोगिती मुक्तसोहळा ।
सोहळा हाचि होत आगळा । कीर्तनीं लीला वर्णिर्ती ॥८०॥
कीर्तन ऐकतां होती सप्रेम । प्रेमरंगीं उभा मेघश्याम ।
मेघश्याम तेथें विश्राम । संतजन पावती ॥८१॥
संत तेथें पूर्णज्ञान । ज्ञान तेथें आनंदघन ।
आनंद तेथें समाधान । समाधानीं सुख असे ॥८२॥
सुख तेथेंचि समाधि । समाधि तेथें तुटे आधि ।
आधि तुटतां जीवउपाधि । न उरेचि कोठें शोधितां ॥८३॥
उपाधि तुटतां होइजे अभेद । अभेद तेथेंचि पूर्णबोध ।
बोध तेथें ब्रह्मानंद । परिपूर्ण ठसावला ॥८४॥
ऐसी द्वारका अद्‌भुत । विप्र जातसे विलोकित ।
घरोघरीं वेदध्वनीं बहुत । शास्त्रचर्चा करिताती ।८५॥
न्याय मीमांसा सांख्य अद्‌भुत । पातंजल व्याकरण वेदांत ।
घरोघरीं अष्टमहासिद्धि तिष्ठत । नवनिधींसहित पैं ॥८६॥
आळोआळीं देवालयें सुरंगें । दिव्य हिर्‍यांचीं विशाळ लिंगें ।
माणिकांचे गणेश आरक्तरंगें । बालसूर्यवत दिसती ॥८७॥
दोन्हीं सुरेख हाटवटिया । रत्‍ननिबद्ध वोवरिया ।
व्यवहारिक कस्तूरी घेऊनियां । यथान्यायें विकिताती ॥८८॥
घरोघरीं वृंदावनें । हिरियांचीं प्रकाशमानें ।
वरी तुलसी शोभे हिरवीं पानें । गरुडपाचूंचीं जेवीं जडलीं ॥८९॥
ऐसें तें द्वारकानगर । सर्वलक्षणयुक्त सुंदर ।
श्रीकृष्णसभेचें मणिमय द्वार । पावला विप्र तेथवरी ॥९०॥
द्वारपाळ पुसती तूं कोण । ब्राह्मण अवचितां बोले भिऊन ।
मी कृष्णाचा बंधु पूर्ण । ऐकोनि सर्व हांसती ॥९१॥
एक म्हणती आर्ष ब्राह्मण । एक म्हणती सत्य वचन ।
जगद्‌बंधु रमारमण । आश्चर्य यांत कोणतें ॥९२॥
आडकाठी नाहीं हरीचे द्वारीं । विप्र आंत गेला झडकरी ।
तों सुधर्मसभा देखिली एकसरी । जेथें मुरारी बैसला ॥९३॥
तेथें शुद्ध पाचूंचीं जोतीं । वरी हिरियांचे स्तंभ झळकती ।
माणिकांचीं उथाळीं शोभती । पाहतां भूलती शशि-सूर्य ॥९४॥
शातकुंभाचीं तुळवट । गरुडपाचूंच्या किलच्या सदट ।
ते सभेसी वैकुंठपीठ । प्रसन्नवदन बैसला ॥९५॥
किरीटकुंडलेंमंडित पूर्ण । सरळ नासिक आकर्ण नयन ।
मुख सुहास्य विराजमान । पाहतां मन तन्मय ॥९६॥
कौस्तुभ वैजयंती-वनमाळा । चतुर्भुज मेघसांवळा ।
पीतांबर झळके जैसी चपळा । कटीं मेखळा वरी विलसे ॥९७॥
चरणीं वांकी तोडर । जो दितिजदर्पहरण समरधीर ।
सनक-सनंदन-सनत्कुमार । भक्तसभाशोभित जो ॥९८॥
नारद-तुंबरादि प्रमुख । गाती सुस्वर अतिरसिक ।
उद्धव अक्रूर द्वयभागीं देख । लघु चीर उडविती ॥९९॥
वरुनि ओंवाळिजे कोटि कंदर्प । तैसें दिसे हरीचें जाज्वल्य स्वरूप ।
कीं अनंत चपळा सांडूनि तीव्र ताप । ऐक्यासी आलिया ॥१००॥
ऐसा सभामंडपीं द्वारकाधीश । विप्रें देखिला पुराणपुरुष ।
द्विजाच्या अंतरीं न मावे हर्ष । सप्रेम पुढें चालिला ॥१॥
हरीनें द्विज देखिला नयनीं । आसन सांडूनि चक्रपाणी ।
पुढें धांविन्नला ते क्षणीं । विप्राचे चरणीं मिठी घातली ॥२॥
द्विजें धरिले दोन्ही कर । आलिंगनीं मिसळला सत्वर ।
उभयतांचें नेत्रीं प्रेमपूर । न धरत लोटले तेधवां ॥३॥
सुदामा बाळपणींचा मित्र । अत्यंत हरीचें प्रीतिपात्र ।
म्हणूनि हृदयीं राजीवनेत्र । दृढ धरी न सोडीच पैं ॥४॥
ऐसें आलिंगन दोघांजणीं । दिधलें परी न पुरे धणी ।
मग हरीनें विप्र हातीं धरुनी । आपुलें आसनीं बैसविला ॥५॥
विप्राचें चरणप्रक्षालन । करी रुक्मिणीमनमोहन ।
म्हणे वाटेनें चालतां चरण । बहुत तुमचे भागले ॥६॥
पूजा करूनि सकळ । वाद्यगजरेंसीं घननीळ ।
विप्राचा हस्त धरूनि तत्काळ । सभा विसर्जूनि चालिला ॥७॥
रुक्मिणीच्या गृहाप्रति देख । चालिला जलजोद्‌भवाचा जनक ।
रत्‍नजडित डोल्हारा सुरेख । त्यावरी बैसती दोघेही ॥८॥
सुदामदेव ते अवसरीं । चिंध्यांचे भार सांवरी ।
पोह्याची गांठोडी झडकरी । चांचपोनि पाहतसे ॥९॥
दूतीप्रति म्हणे चक्रपाणी । सत्वर बोलावीं रुक्मिणी ।
येरी निघोनि तेचि क्षणीं । त्रिभुवनजननीजवळी आली ॥११०॥
तंव भ्रुसंकेतेंकरूनी । दूतीप्रति पुसे रुक्मिणी ।
येरी म्हणे शारंगपाणीं । बोलाविती आपणातें ॥११॥
पुसे हरीजवळी आहे कोण । येरी म्हणे एक दीन ब्राह्मण ।
चिंध्यांचे भार दरिद्री पूर्ण । त्यासी जगज्जीवन भेटले ॥१२॥
त्यासी न विसंबती क्षणभरी । बैसविला डोल्हारियावरी ।
ऐसें ऐकतां भीमककुमारी । उठे झडकरी तेधवां ॥१३॥
विद्युल्लता जैसी झळकत । तैसा अंचळ भूमीवर रुळत ।
हंसगती चमकत । हरीजवळी पातली ॥१४॥
हरिपदीं करूनि नमन । सवेंचि वंदिला तो ब्राह्मण ।
येरू देत आशीर्वचन । अनंत कल्याण तुजलागीं हो ॥१५॥
श्रीरंग म्हणे रुक्मिणीसी । जैसा बळिभद्र बंधु आम्हांसी ।
तैसाचि गुरुबंधु निश्चयेंसीं । सुदामदेव जाणिंजे ॥१६॥
येरी म्हणे जैसा गोरक्षक । तैसेंचि दिसतें याचें मुख ।
आपुला बंधु होय निःशंक । बाळपणींचा वाटतसे ॥१७॥
आजिपर्यंत हें रत्‍न । होतें कोठें ठेविलें झांकून ।
हरि म्हणे करीं पूजन । आपुल्या हस्तेंकरुनियां ॥१८॥
येरी म्हणे द्वारपाळांनीं येतां । पूजा केली असेल तत्त्वतां ।
हांसें आलें जगन्नाथा । म्हणे विनोद सर्वथा न कीजे ॥१९॥
रुक्मिणीनें उदक आणूनि । विप्रपद धुतले ते क्षणीं ।
म्हणे गुरें राखिलीं बाळपणीं । हिंडतां वनीं उलल्या टांचा ॥१२०॥
मग नापित आणूनी । श्मश्रुकर्म करविले ते क्षणीं ।
नेसावया उत्तम पडदणी । देती आणूनी तेधवां ॥२१॥
त्याच्या चिंध्या गोळा करुन । ग्रंथि बांधी जगज्जीवन ।
रुक्मिणीसी म्हणे मनमोहन । बहुत जतन करून ठेवी ॥२२॥
मार्जन जाहलिया सत्वर । द्विजासी दिधलीं वस्त्रें अलंकार ।
यादव भोजना बोलाविले समग्र । श्रीकरधरें तेधवां ॥२३॥
सोळा सहस्र गोपी नारी । बोलाविल्या त्या अवसरीं ।
ब्राह्मणाची वार्ता घरोघरीं । श्रुत जाहली तेधवां ॥२४॥
आश्चर्य करिती गोपिका । थोर लहान नाहीं वैकुंठनायका ।
दीनजनांचा पाठिराखा । ब्रीद साच हरीचें ॥२५॥
तत्काळ रुक्मिणीच्या सदना । आल्या सोळा सहस्र ललना ।
नमस्कारिती ब्राह्मणा । एक मृगनयना हांसती ॥२६॥
आशीर्वाद देतां भागला विप्र । गोपींची दाटी जाहली थोर ।
म्हणती भावोजी सत्वर । कंचुक्या आणा आम्हांतें ॥२७॥
एक म्हणती आशीर्वाद पाहीं । यांनीं फुकाचा दिधला नाहीं ।
येथें कुंचक्या कैंच्या कांहीं । पुरवितील तें कळेना ॥२८॥
छपन्न कोटी यादवांसहित । भोजना बैसला रमानाथ ।
तितुक्यांसी रुक्मिणी वाढीत । जैसी तळपत चपळा ते ॥२९॥
जैसें आंसांत चक्र फिरे । तैसी भीमकी वाढी त्वरें ।
चुडे झळकती एकसरें । उजेड पडे सर्वांवरी ॥१३०॥
जेथें वाढीत जगन्माता । देवांसी दुर्लभ तें अन्न तत्त्वतां ।
वर्णावें कासया आतां । व्यर्थ ग्रंथ कां वाढवूं ॥३१॥
असो भोजन झालिया ते क्षणीं । विडे दिधले त्रयोदशगुणी ।
मग श्रीकृष्ण म्हणे विप्रालागुनी । आम्हांसी वहिनीनें काय धाडिलें ॥३२॥
अष्ट नायिका जेवूनि सर्वही । हरीपाशीं आल्या पाहीं ।
भावोजीनें आणिलें असेल कांहीं । गांठोडें लवलाहीं आणिलें ॥३३॥
रुक्मिणी खूणगांठी दावीत । म्हणे बंधूची संपत्ति पहा त्वरित ।
श्रीकृष्ण स्वहस्तें सोडीत । गोपी पाहती भोंवत्या ॥३४॥
मग गांठोडिया सोडून सकळिक । पोहे घेत जगन्नायक ।
एक ग्रास मुखीं घेतला देख । तंव हस्त धरी रुक्मिणी ॥३५॥
मनांत तर्क करी रुक्मिणी । तीन ग्रास पोहे भक्षूनी ।
त्रिभुवनांचें राज्य यालागूनी । देईल आतां परमात्मा ॥३६॥
म्हणवूनि एक ग्रास घेतां गोविंदें । रुक्मिणीनें हस्त धरिला विनोदें ।
म्हणे भोंवतीं ललनांचीं वृंदें । त्यांसी प्रसाद देइंजे ॥३७॥
तों सत्यभामा म्हणे ते क्षणीं । आहों सोळा सहस्र जणी ।
एक एक दाणा मोडूनी । वांटितांही पुरेना ॥३८॥
म्हणे वो द्विजवरा एक ऐकावें । पुनरपि गांवासी परतोनि जावें ।
अवघ्यांपुरते पोहे आणावे । ऐशाचि ग्रंथी बांधोनियां ॥३९॥
पोहे न देतां निवाडें । नेदूं तुमचें गांठोडें ।
कालिंदी म्हणे कासया कोडें । इतुकें यांसी घालितां ॥१४०॥
इतुकेंचि करा सुदामदेवा । कंचुक्यांचा विचार पहावा ।
आम्हां अवघियां गौरवा । नाहींतरी गांवा जाऊं नेदूं ॥४१॥
तों जाबुवंती म्हणे ते क्षणीं । या चिंध्यांच्या तारा वेगळ्या करूनी ।
घ्या वांटूनि अवघ्याजणी । कांहीं मनीं रुसूं नका ॥४२॥
तों लक्ष्मणा म्हणे विप्रातें । कुंकुमचि द्यावें आम्हांतें ।
तों मित्रविंदा म्हणे द्विजातें । पहा वरतें आम्हांकडे ॥४३॥
आजिचा दिवस क्षमा केली जाणा । उदयीक पहा चोळ्यांची विचारणा ।
याज्ञजिती म्हणे वो ब्राह्मणा । गांठोडें ठेवा मजपाशीं ॥४४॥
मद्रावती म्हणे चोरुनी । धोतराच्या तारा जाईल घेऊनी ।
गांठोडयासी खूणगांठ देऊनी । माझ्याचि आधीन करावें ॥४५॥
तंव रेवती म्हणे यादवेंद्रा । या गांठोड्यावरी करावी खूणमुद्रा ।
बंधूचें ठेवणें जतन करा । ऐकतां श्रीधरा हास्य आलें ॥४६॥
मग श्रीकृष्णें गांठोडें बांधिलें । रुक्मिणीच्या स्वाधीन केलें ।
सत्यभामा म्हणे तंतु मोजिले । आहेत किती ते श्रीरंगा ॥४७॥
लज्जित खालीं पाहे विप्र । कोणासी नेदी प्रत्युत्तर ।
सत्यभामेसी म्हणे दामोदर । किती विनोद कराल गे ॥४८॥
हा बळिरामापरीस अधिक । सुदामा बंधु माझा देख ।
सभे बैसला जगन्नायक । सुदाम्यासी घेऊनियां ॥४९॥
वस्त्रें करोनि केशरी । मृगमदाचे ठसे त्यावरी ।
नेसल्या सोळा सहस्र नारी । वास अंबरीं न समाये ॥१५०॥
तों सभेसी आलीं कळापात्रें । श्रीची लीला वर्णिती विचित्रें ।
त्या गौरविल्या राजीवनेत्रें । वस्त्रें भूषणें देवोनियां ॥५१॥
सभारंग झालियावरी । सुदामदेवा धरूनि करीं ।
श्रीहरि प्रवेशले मंदिरीं । मंचकावरी निजविला ॥५२॥
ब्राह्मणासी आपुले हातें । रगडिलें श्रीकृष्णनाथें ।
हृदयीं धरिलें द्विजपदांतें । श्रीवत्सलांछन मिरवी जो ॥५३॥
ब्राह्मणसेवा नारायण । स्वयें करीतसे आपण ।
जो ब्राह्मणाचा करी अपमान । तो अनेक पतनें भोगील ॥५४॥
ब्राह्मणतीर्थ नित्य घेतां । महारोग जाती तत्त्वतां ।
जो पुरवी ब्राह्मणमनोरथां । रमानाथा आवडे तो ॥५५॥
धन धान्य वस्त्रें अलंकार । देवोनि सुखी करिती विप्र ।
त्यांचे मंदिरीं श्रीधर । राहे सदा सर्वदा ॥५६॥
समयीं आलिया ब्राह्मण । त्यासी अगत्य द्यावें भोजन ।
यथाशक्ति द्यावें दान । तेणें जगज्जीवन संतोषे ॥५७॥
नेणे कांहीं आचारविचार । एक ब्राह्मणभक्ति उदार ।
कंसारि त्याचा संसार । आपण अंगें गोड करी ॥५८॥
ब्राह्मणाचा अपमान । सत्पात्रीं नेदी कदा दान ।
वेश्येसी अर्पी अर्थ प्राण । तो वैरी पूर्ण श्रीहरीचा ॥५९॥
जयाचे मुखीं तृप्त जगन्नाथ । आणि हृदयीं मिरवी पदांकित ।
त्याचा जो अव्हेर करीत । तो वैरी पूर्ण श्रीहरीचा ॥१६०॥
नावडे श्रवण कीर्तन । सत्यमागम द्विजपूजन ।
ब्राह्मण देखतांचि विटे मन । तो वैरी पूर्ण श्रीहरीचा ॥६१॥
कीर्तनीं जाय तों निद्रा येत । सदा सर्वदा व्यसनासक्त ।
सत्यपात्र देखतांचि विन्मुख होत । तो वैरी पूर्ण श्रीहरीचा ॥६२॥
मी एक विष्णुभक्त बहुत । म्हणोनि शिवाची निंदा करीत ।
शिवभक्त येतां तिरस्कारीत । तो वैरी पूर्ण श्रीहरीचा ॥६३॥
मी शिवभक्त सदाचारी । म्हणोनि विष्णूची निंदा करीं ।
जो गुरुवचनीं विश्वास न धरी । तो वैरी पूर्ण श्रीहरीचा ॥६४॥
हें असो बोलणें बहुत । श्रीहरि सुदाम देवाचे पाय चुरीत ।
विप्र धरी हरीचे हस्त । म्हणे तूं रमानाथ जगद्‌गुरु ॥६५॥
हरि पहुडला मंदिरीं । मन्मथजननीचे सेजेवरी ।
निद्रा न येचि मुरारी । चिंता करी तेधवां ॥६६॥
म्हणे रुक्मिणी परियेसीं । सुदामयाचें कुटुंब उपवासी ।
अन्नाविण अहर्निशीं । पीडताती अपत्यें ॥६७॥
सेजे उठोनि गोविंद । जो जगद्‌गुरु मूलकंद ।
विश्वकर्म्यासी परमानंद । आज्ञा करीत तेधवां ॥६८॥
म्हणे द्वारकपुरी सुंदर । तसेंचि करीं सुदामपुर ।
सर्व संपदा भरोनि सत्वर । शीघ्र येईं रजनीमाजी ॥६९॥
ऐसें सुवर्णनगर चांगलें । तत्काळ तेणें रचिलें ।
सर्व संपदा भरिल्या ते वेळे । विचित्र केलें तेधवां ॥१७०॥
असो एक मासपर्यंत । सुदाम्यासी राहविलें तेथ ।
घरोघरीं विप्रासी नेत । पाहुणेर करावया ॥७१॥
सत्यभामादि समस्त नारी । नित्य सोहळा करिती घरोघरीं ।
विप्र अत्यंत चिंता करी । कुटुंबाची तेधवां ॥७२॥
हरीसी विनवी सुदामा । आतां आज्ञा द्यावी जी आम्हां ।
हरि म्हणे विप्रोत्तमा । अवश्य जावें आतांचि ॥७३॥
परी एक ऐका जी सुदामदेवा । हे अलंकार वस्त्रें फेडूनि ठेवा ।
चिंध्यांचें गांठोडें तेधवां । जवळी ठेविलें विप्राचे ॥७४॥
ब्राह्मणें चिंध्या घेऊनी । वस्त्रें अलंकार ठेविले तेचि क्षणीं ।
परम शीण पावला मनीं । म्हणे कर्माची करणी दुर्धर ॥७५॥
आम्हांसी भोगणें पूर्ण दरिद्र । त्यासी काय करील यादवेंद्र ।
शिवाआंगीं जडले फणिवर । परी समीर आहार चुकेना ॥७६॥
कीं शिवमस्तकीं मृगांक । परी न जाय त्याचा कलंक ।
माझें अदृष्ट पाठमोरें देख । कमलानायक काय करी ॥७७॥
घेऊनि चिंध्यांचे भार । दडदडां चाले विप्र ।
बाळवीत आला यदुवीर । नगराबाहेर बंधूसी ॥७८॥
विप्र सद्गद होऊनी । म्हणे जी रहावें आतां शारंगपाणी ।
मग श्रीकृष्णमूर्ति विलोकनी । अश्रु नयनीं आणिले ॥७९॥
आज्ञा घेऊनि त्वरित । वेगें विप्र असे जात ।
म्हणे जाहला असेल कुटुंबघात । एक मास लोटला ॥१८०॥
नगराजवळीं आला त्वरित । तों द्वारकावती समीप आली वाटत ।
दिव्य दामोदरें लखलखत । कळस झळकत चहूंकडे ॥८१॥
म्हणे रे जगदीशा चुकलों पंथ । कीं दृष्टि तरळते निश्चित ।
अहा कृष्णा मी जाहलों भ्रमित । आपआपणातें विसरलो ॥८२॥
वेडावला पाहे ब्राह्मण । कां मी द्वारकेसी आलों परतोन ।
तंव लोक येती गांवांतून । त्यांसी विप्र पुसतसे ॥८३॥
ग्रामाचें नाम सांगा झडकरी । लोक म्हणती हे सुदामपुरी ।
ब्राह्मण म्हणे अंतरीं । विनोद करिती माझा हे ॥८४॥
तों भेटले गोरक्षक समोर । त्यांसी पुसे हें कोणाचें खिल्लार ।
येरु म्हणती सुदामदेव विप्र । त्याचीं साचार गोधनें हीं ॥८५॥
मग ब्राह्मण चहूंकडे पाहे स्तब्ध । म्हणे हे अवघेचि करिती विनोद ।
तंव दळभार करुनि सिद्ध । प्रधान येती सामोरे ॥८६॥
गज तुरंग महारथ । देखोनि ब्राह्मण भयभीत ।
म्हणे माझें कुटुंब समस्त । काय जाहलें कळेना ॥८७॥
माझी झोंपडी होती ये स्थळीं । ती कोणीं मोडूनि टाकिली ।
माझी बाळें बहुतेक मेलीं । महादुष्काळेंकरुनियां ॥८८॥
तंव जवळीं आले प्रधान । करिती साष्टांग नमन ।
दिव्य देह पावला ब्राह्मण । जाहला सुलक्षण नृपवर ॥८९॥
दिव्य वस्त्रें अलंकार । प्रधान लेवविती सत्वर ।
पुढें होत वाद्यांचा गजर । तंव प्रजा समस्त नमस्कारिती ॥१९०॥
गजस्कंधीं बैसविला विप्र । मागें पुढें वेष्टित दळभार ।
मिरवित चालिला निजमंदिर । तंव पुढें पुत्र देखिले ॥९१॥
सुलक्षण अतिसुंदर । लेवविलीं वस्त्रें अलंकार ।
मनांत आनंदला विप्र । म्हणे श्रीधर तुष्टला ॥९२॥
तंव बाहेर आली ती ललना । जैसी स्वर्गाहूनि उतरली देवांगना ।
वेगें करी निंबलोणा । लागे चरणां पतीच्या ॥९३॥
प्रधानीं मुहूर्त पाहोनी । विप्र बैसविला सिंहासनीं ।
वरी छत्र धरियेलें ते क्षणीं । तो उत्साह पाहती जन ॥९४॥
जैसा परीस झगटतां तत्काळीं । लोह सुवर्ण होय ते वेळीं ।
तैसी सुदाम्याची दशा जाहली । पूर्ण वनमाळी तुष्टला ॥९५॥
ऐका नवल केलें गोपाळें । मुष्टिभर पोहे भक्षिले ।
इंद्रपदतुल्य राज्य दिधलें । सुदामयासी प्रीतीनें ॥९६॥
हरिविजयग्रंथ समग्र । हेंचि केवळ द्वारकापूर ।
रुक्मिणीसहित यादवेंद्र । नांदे तेथें सर्वदा ॥९७॥
नाना दृष्टांत परिकर । हेचि केवळ यादवभार ।
पूर्ण ब्रह्मानंद अतिउदार । श्रीधरवरद अभंग सदा ॥९८॥
इति श्रीहरिविजयग्रंथ । संमत हरिवंशभागवत ।
प्रेमळ भक्त सदा परिसोत । एकोनत्रिंशतितमाध्याय गोड हा ॥१९९॥
॥ अध्याय एकोणतिसावा समाप्त ॥ ओव्या १९९ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीकृष्ण भक्तवत्सल आहे. भक्तांची त्याने कधीही उपेक्षा केलेली नाही व तो उपेक्षा करीतही नाही. सुदामा नांवाचा त्याचा एक मित्र होता. सांदीपनींच्या आश्रमात तो कृष्णाबरोबरच शिकत होता. त्यावेळेपासून त्याचे मन कृष्णाकडे ओढ घेत असे. पण आश्रम सोडल्यापासून त्याची व कृष्णाची भेट झाली नव्हती.

तो कपिला नगरीत रहात असे. ते नगर कालयवनाच्या राज्यात होते. सुदामा गरीब होता. तो कोरडी भिक्षा मागून आपला आणि आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवीत असे. त्यातही कधी अतिथी आला तर त्याला आधी भोजन देऊन मग उरेल त्यात कुटुंब जेवत असे, मुलांना कधी कधी उपास पडत. ती रडून आकांत करीत. त्याचा उदरनिर्वाह कसातरी चालला होता. त्याची पत्‍नी साधी होती. दुदैवाने एकदा दुष्काळ पडला.

श्रीमंतांनाही पंचाईत पडली ! लोक गाव सोडून निघाले. सुदामा सुद्धा घरदार सोडून मुलांसह व पत्‍नीसह निघाला. गावोगाव हिंडत तो एका नगरात गेला. तिथे एका श्रीमंताच्या घराबाहेर त्याला आश्रयस्थान लाभले. मुलांची उपासमार होत होती. त्यांची अवस्था दयनीय झाली होती. पत्‍नी म्हणाली- "नाथ, मला माहेरचे कोणीच नाही, नाहीतर आपल्याला तिकडे आसरा मिळाला असता. तुम्ही असे कां करीत नाही ? तुम्ही रागावणार नसलात तर विचारते." सुदाम्याने तिला अभय दिले, तेव्हा ती म्हणाली- "तुम्ही कृष्णाकडे का जात नाही ? तो तुमचा मित्र आहे असे नेहमी सांगतां. तो तर राजा आहे, वैभवशाली आहे, त्याच्याजवळ काही मागितलेत तर तुम्हाला व मुलांना काही खायला तरी मिळेल. "

सुदामा म्हणाला- "तू म्हणतेस ते खरे आहे. कृष्णाने सांदीपनी ऋषीचा मृत पुत्रही जिवंत केला. त्याचे सामर्थ्य देवांपेक्षांही जास्त आहे. तो मला विसरला नसेल. पण त्याकडे जाण्यास मन घेत नाही. त्याने मला अशा स्थितीत पाहिले तर तो माझे स्वागत करील की धिक्कार करील याची कल्पना येत नाही. बरे, रिक्त हस्ताने कसे जावे बरे ?" सुदाम्याच्या स्त्रीने घरात जाऊन पाहिले. घरात धान्य सुद्धा नव्हते. शेजारच्या घरी तीं गेली. तिने थोडेसे पोहे उसने मागितले. ते आणून ती म्हणाली- "कृष्णाला हे मूठभर पोहे भेट म्हणून या. त्याला ते आवडतील. "

"हो ! आवडतील, कारण गोकुळात तो दह्यादुधाचे पोहेच खात होता ?" सुदामा म्हणाला. सुदाम्याने फाटक्या वस्त्रात मूठभर पोहे अनेक गाठी मारून, बांधून घेतले. तो द्वारकेला जाण्यास निघाला.

त्याची स्त्री म्हणाली- "लवकर परत या. दोनचार दिवस कसेतरी काढू ! पण तुमच्या मित्राकडून जरूर काहीतरी मदत मिळवूनच परत या."

घर सोडून सुदामा निघाला. त्याला वाटेत नवनवीन शुभशकुन होऊ लागले. तो विचार करू लागला- "कृष्णाच्या सभेत किंवा घरात आपल्याला प्रवेश तरी मिळेल का ? इंद्रादि देव सुद्धा त्याच्या भेटीसाठी उत्सुक असतात ! तिथे मला कोण विचारणार ? माझी दाद कोण घेणार ? माझी मुले ! ती घरी किती उपाशी असतील ! आणि द्वारकेत माझी चेष्टाच होईल ! कृष्णाच्या बायका फार चतुर व ज्ञानी आहेत असे लोक म्हणतात. त्या तर मला व माझ्या गबाळ्या वेषाला हसतील ! कशाला जायचे ? पण घरी काय खाणार ? कृष्णाला भेटायला जायलाचे हवे.

सुदामा जेव्हा द्वारकेजवळ आला तेव्हा त्याला ती नगरी सागरात असून प्रकाशात लखलखत आहे असे दिसले. समुद्रातून नगरीपर्यंत जाण्यासाठी एक मार्ग केलेला होता. नगरीभोवती दुर्ग असून त्या वैभवशाली नगरीचे रक्षण करणारे सैनिक जागरूक होते. तो महाद्वारापर्यंत पोहोचला.

" आपण कोण ? " द्वारपालांनी विचारले. "मी सुदामा. मी ब्राह्मण असून कृष्णाचा बालमित्र आहे. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात तो व मी एकत्र रहात होतो. आता मला फक्त त्याची भेट हवी आहे. चार शब्द त्याच्याजवळ बोलावेत, त्याला डोळे भरून पहावे, बसावे, सुखसंवाद करावा अशा इच्छेने मी आज आलो आहे."

द्वारपालांनी त्याला आत पाठविले. नगरातील शोभा पहात पहात तो यादवांच्या मुख्य सभागृहाजवळ आला. तो द्वारपालांजवळ आला. त्यांनी त्या दरिदी कृश ब्राह्मणाला पाहून विचारले- "तुम्ही कोण ? इथेच थांबा. काय काम आहे आपले ?" सुदामा उभा राहिला व म्हणाला- "मी कृष्णाचा गुरुबंधू आहे." द्वारपालांना आश्चर्य वाटले. त्यांनी सुदाम्याला अर्धवट ठरविला. एक द्वारपाल म्हणाला- "तसे म्हटले तर श्रीकृष्ण सार्‍या जगाचा बांधवच आहे. पण हा गुरुबंधू आहे म्हणतो." त्याला विचारून द्वारपालांना जेव्हा कळले की सुदामा सांदीपनी आश्रमात कृष्णाबरोबर शिकत होता, तेव्हा त्यांनी त्याला सभागृहात येऊ दिले.

ते सभागृह व विशाल सदन पहाता पहाता सुदामा थक्क झाला. पुढे पुढे जाता जाता त्याला यादवांच्या सभेत एका श्रेष्ठ आसनावर बसलेला श्रीकृष्ण दिसला.

त्याची व कृष्णाची दृष्टिभेट झाली. कृष्ण उठला. तो त्वरेने सुदाम्याजवळ आला आणि त्याच्या पाया पडला. सुदामा गहिवरला. कृष्णाने त्याला घट्ट मिठी मारली. प्रेमाची ऊर्मी उठली. त्यांनी पुष्कळ वेळ मिठी सोडलीच नाही. कृष्ण सुदाम्याला मुळीच विसरला नव्हता. कृष्णाचे प्रेम आताही सांदीपनीच्या आश्रमांतल्या इतकेच उत्कट होते ! "सुदामा ! माझ्या आसनावर बस, ये ?" असे म्हणून सुदाम्याला कृष्णाने आपल्या आसनावर बसविले. इतर यादव मंडळी सभेत होती ती कृष्णाने संकेत करताच निघून गेली होती. कृष्णाने सुदाम्याचे चरण क्षालन केले. पाय दाबले. त्याचे स्वागत करून मोठया मानाने रुक्मिणीच्या प्रासादात त्याला नेले.

सुदाम्याची वस्त्रे मळकी, फाटकी होती. कृष्णाची वस्त्रे उंची होती. एक कृश तर दुसरा बलिष्ठ, एक दरिद्री तर दुसरा श्रीमंत, एक विप्र तर दुसरा यदुकुळातला पण साक्षातू विष्णू ! सुदाम्याने वस्त्रात बांधून पोहें आणले होते ते चाचपून जागीच आहेत ना ते पाहिले.

दूतीने रुक्मिणीला आधीच सांगितले होते की श्रीकृष्ण एका दरिद्री कृश ब्राह्मणाला मोठ्या आदराने बरोबर घेऊन आत येत आहेत.

कृष्ण आत आला. रुक्मिणीला म्हणाला- "जसा माझा बलराम हा ज्येष्ठ बंधू तसाच हा दुसरा बंधू आहे."

रुक्मिणीने आदराने नमस्कार केला. ब्राह्मणाने सवयीप्रमाणे आशीर्वाद दिला. निर्धन ब्राह्मण मूर्तिमंत लक्ष्मीला आशीर्वाद देत होता- आणि तो आशीर्वाद लक्ष्मी ग्रहण करीत होती. पण नेहमीच्या आनंदी व विनोदी स्वभावात अनुसरून ती म्हणाली- " हे तुमचे बंधू शोभतातच. पूर्वी गोकुळातले गवळी तुमचे बंधूच होते ना ! तसेच हे दिसतात. पण मला सांगा, हे इतके दिवस कसे काय आले नाहीत ?" कृष्ण म्हणाला- "त्यांची कर्तव्ये त्याना आहेत. फार दिवसांनी आले आहेत, त्यांचे तू पूजन कर."

मग रूक्मिणीने त्याचे चरण सुगंधी गरम पाण्याने धुतले. त्याची श्मश्रू करवून घेतली. त्याला दासींच्या मदतीने मंगलस्नान घातले. नवी वस्त्रे व पुष्पे देऊन सन्मान केला. त्याचे जुने फाटके धोतर आणि उत्तरीय वस्त्र एका बाजूस नीट ठेवून दिले व कृष्णाला विनोदाने म्हटले- "नाथ ! ही वस्त्ररूपी ठेव मोठ्या मोलाची आहे. जपून ठेवू या." खरेच, सृष्टीतील सर्व वैभवे त्या सहजच गरीब ब्राह्मणाच्या फाटक्या वस्त्रापुढे गौण होती ! आणि लक्ष्मीच स्वतः हे म्हणत होती.

कृष्णाच्या सहस्रावधी स्त्रियांना हे नवल कळले. त्या सुदाम्याला पहायला आल्या, त्याचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांनी एकच गडबड केली, त्याला अगदी गोंधळून गेल्यासारखे झाले, तो दमला, थकला. त्या स्त्रिया म्हणू लागल्या- "विप्रवर्य ! नुसता शाब्दिक आशीर्वाद कशाला देता ? काहीतरी वस्त्र, सौभाग्यलेणीं, वगैरे द्या." सुदाम्याची मोठी चमत्कारिक परिस्थिती झाली. त्यात कृष्णाने त्याला सोडविले.

कृष्णाने त्याच्या जवळ भोजन घेतले. रुक्मिणीसह कृष्णाच्या पत्‍न्या आग्रहाने वाढीत होत्या. असे अन्न त्या ब्राह्मणाला कित्येक वर्षांत दृष्टीस पडलेले नव्हते. भोजन झाल्यावर कृष्ण म्हणाला- "सुदामन् मजसाठी वहिनींनी काहीतरी भेट, काहीतरी खाऊ पाठविला असणार. कुठे ठेवला आहेस ?"

रुक्मिणीने जी जुनी वस्त्रे ठेवली होती त्यातच पोहे बांधलेले होते रुक्मिणी जवळच उभी होती. सुदामा उठला आणि ती वस्त्रे आणण्यासाठी वळला. तेव्हा रुक्मिणीनेच त्याचे उपरणे आणून दिले त्याच्या गाठी सोडवीत त्याने भीतभीत कृष्णाला पोहे दाखविले. कृष्णाने जणू कधी पोहे खायलाच मिळाले नव्हते अशा तर्‍हेने त्यातील पोहे घेतले व घासभर खाल्ले. लक्ष्मीने पुरुषोत्तमाला आग्रहाने जेवायला घातल्यानंतर सुद्धा त्या पुरुषोत्तमाला मित्राने आणलेल्या पोह्यांची भूक होती. आणि दुसरा घास तो घेणार तोच रुक्मिणीने त्याचा हात धरला आणि आपल्या मुखांत ते पोहे घातले. सत्यभामा इत्यादी इतर सात स्त्रियांनीही चिमूट चिमूट पोहे घेतले. शिवाय त्या थट्टेने वस्त्रे मागूं लागल्या. आपसात म्हणू लागल्या- "आपण हे जुने धोतर व उपरणे घेऊ. त्याच्या धांदोड्या काहून घेऊ ! आपल्या पतिराजांना काय, ते आपल्या मायाशक्तीने त्यांची भरजरी वस्त्रे करतील ?"

कृष्णाने त्यांना आवरले. आता थट्टा पुरे असे म्हटले. त्याला मग यादवांच्या सभेत नेले. यादवांना सभेत बोलावले आणि कामकाज संपेपर्यंत सुदाम्याला जवळ बसवून एकीकडे आश्रमातील आठवणी काढल्या. उग्रसेन, वसुदेव, अक्रूर, उद्धव इत्यादीजवळ त्याची ओळख करून दिली. नंतर रात्री तर त्याने आपली शथ्या त्याला निजण्यासाठी दिली. स्वतः दुसर्‍या शय्येवर समीपच निजला. त्यापूर्वी कृष्णाने त्याचे पाय चेपले. सुदाम्याला गाढ झोप लागली. त्यावेळी कृष्णाने विश्वकर्म्याला गुप्तपणे बोलावले. सुदामा ज्या नगरीत रहात होता ती नगरी धनधान्याने समृद्ध करण्यास सांगितले- "ती सुवर्णनगरी कर. सुदाम्याला तेथील राजपद दिले आहे असे घोषित कर. त्याच्या पत्‍नीला व मुलांना पूर्ण वैभवसंपन्न कर." सुदाम्याची चिंता परस्पर नष्ट करून कृष्ण इकडे, जणू आपला काही संबंध नाही अशा प्रकारे निजला. दुसर्‍या दिवसापासून एक महिनाभर कृष्णाने द्वारकेतील अनेक यदुश्रेष्ठांच्या घरी सुदाम्याला रोज नेले व थाटात स्वागत आणि आतिथ्य करविले. पण सुदाम्याचे मन त्याच्या स्वतःच्या घरी धावत होते.

शेवटी त्याची चलबिचल पाहून कृष्णाने त्याला घरी जाण्यास अनुज्ञा दिली. पण त्याचे जुने धोतर व उपरणे त्याला परत दिले आणि द्वारकेतील वस्त्रप्रावरणे काढून ठेवण्यास सांगितले !

सुदामा काहीतरी मागण्यासाठी आला होता. पण काहीही न मागतां तसाच परत गेला ! त्याला काहीही मागण्याचे धाडसच झाले नाही. तो निस्पृहच राहिला. कृष्ण त्याला निरोप देण्यासाठी दूरपर्यंत गेला. डोळ्यांतून प्रेमाश्रू ओसंडत आहेत अशा अवस्थेत सुदामा निघाला.

तो जेव्हा आपल्या नगरीजधळ आला तेव्हा मात्र थक्क झाला. दुष्काळाचे एकही चिन्ह तेथे नव्हते. मोठमोठे प्रासाद दिसू लागले. महामार्ग दिसू लागले. संपन्न सुंदर नागरिक त्याच्या स्वागतासाठी आले. त्याला सन्मानाने नेऊन लोक त्याचा जयजयकार करू लागले.

त्या नगरीचा तो राजा आहे असे त्यांनी त्याला सांगितले. तो आपल्या घराकडे - श्रीमंत माणसाच्या ज्या घराच्या आश्रयाने त्याचे कुटुंब रहात होते - त्याकडे गेला तो त्या ठिकाणी राजवाडा दिसू लागला वैभवाने नटलेली त्याची पत्‍नी व मुले त्याच्या स्वागतासाठी पुढे आली !

सुदामा बावरून गेला. त्याने आपल्या स्वतःकडे पटकन् दृष्टी वळविली ! आपण सशक्त सुंदर कसे झालो तेच त्याला कळले नाही ! आणि राजाची वस्त्रे आपल्या अंगावर कशी आली याचा अचंबा करतां करता तो जेव्हा आपल्या राजवाड्यात प्रविष्ट झाला तेव्हा त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना ! सारा राजवाडा सोन्याचा व रत्‍नजडित होता !

त्याची मुले त्याला बिलगली ! सुदाम्याच्या नेत्रातून घळघळा अश्रू वाहू लागले. पोह्यांच्या पुरचुंडीवर अधाशासारखा तुटून पडणारा श्रीहरी त्याला आठवला ! त्या बदल्यात त्याने आपल्याला एवढे वैभवाच्या शिरावर चढविले हे पाहून त्याला वाटले- ' कृष्णा ! नाथांच्या नाथा ! तू अनंत हस्तांनी जे देतोस त्याची कल्पनाच आम्हा दीनांना करतां यावयाची नाही ?'

सुदाम्याला त्या नगरीच्या राजपदीं बसवून नागरिकांनी मोठा उत्सव साजरा केला ! सुदामा राजा झाला ! कृष्णाची आतिथ्यशीलता आणि औदार्य पाहून इंद्रादि देव नम्र झाले !
अध्याय एकोणतिसावा समाप्त ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


GO TOP