॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीहरिविजय ॥

॥ अध्याय बाविसावा ॥

जरासंधाचा सतरा वेळा पराभव, कालयवनाचा मृत्यू


श्रीगणेशाय नमः ॥
जय जय श्रीकृष्ण सर्वसाक्षा । सर्वाद्यमूळ निर्विकल्पकल्पवृक्षा ।
तुझी करुं जातां विवक्षा । आदि कोणा न सांपडे ॥१॥
ऐसा आदिकारण तूं वृक्ष साचार । मुख्य कोंभ तो पयोब्धिजावर ।
द्वितीय शाखा पिनाकधर । कमलायन तृतीय शाखा ॥२॥
सकळ मुनीश्वरांचें मंडळ । या उपशाखा चालिल्या सबळ ।
ऋग्यजुःसामादि सुकोमळ । पत्रें तयांसी फुटलीं हीं ॥३॥
न्याय मीमांसा सांख्यशास्त्र । पातंजल व्याकरण वेदांत ।
षट्‌शास्त्रांचा हा निश्चित । मोहोर आला तयावरी ॥४॥
इंद्र अग्नि यम नैऋत । रसनायक समीर पौलस्तिसुत ।
शीतांशु चंडांशु भगणांसहित । पुष्पें त्यावरी साजिरीं ॥५॥
अष्टलोकपालां सहित । स्वर्गसुखें वायफुलें समस्त ।
सलोकतामुक्ति अद्‌भुत । फळें आलीं तयावरी ॥६॥
लागतां द्वैताचा प्रभंजन । तींही फळें पडती गळोन ।
निर्गुण सायुज्यता मोक्ष पूर्ण । पक्क फळ अक्षयी ॥७॥
तें फळ भक्षितां निर्धारीं । आपण होय ब्रह्मांडभरी ।
जेथें येणें जाणें द्वैत कुसरी । कल्पांतींही घडेना ॥८॥
ऐसा आदिवृक्ष ब्रह्मानंद । मोक्षदायक त्याचें पादारविंद ।
त्यामाजी श्रीधर मिलिंद । दिव्य आमोद भोगीतसे ॥९॥
निर्विकल्प वृक्ष सद्‌गुरुनाथ । तो अक्षयफळ दासांसी देत ।
तें सेवूनि जाहला तृप्त । तरी हरिविजयग्रंथ पुढें चाले ॥१०॥
मागें एकविसावा अध्याय जाहला पूर्ण । उद्धवें गोपींसी कथूनि ज्ञान ।
आला मथुरेसी परतोन । हरिदर्शन घेतलें ॥११॥
यावरी पुढें कथानुसंधान । तें ऐकोन पंडित विचक्षण ।
जें ऐकतां पापविपिन । होय दहन क्षणमात्रें ॥१२॥
मथुरेसी असतां रमानाथ । उग्रसेन हरिकृपें राज्य करीत ।
दुष्ट निंदक पळाले समस्त । कंसवध होतांचि ॥१३॥
जैसें तृण होतांचि दग्ध । त्यासरसा विझे जातवेद ।
कीं प्राण जातां करणें स्तब्ध । ठायीं ठायीं निचेतन ॥१४॥
तैसे कंसासी मारितां जाण । विराले समस्त दुर्जन ।
मथुरापुरींचे प्रजाजन । आनंदघन नांदती ॥१५॥
नाहीं आधि व्याधि मृत्यु आकांत । हरिकृपेनें सकळ भाग्यवंत ।
यथाकाळीं घन वर्षत । सदा फलित वृक्ष सर्व ॥१६॥
तों कंसाच्या दोघी स्त्रिया । अस्ति प्राप्ति नामें तयां ।
त्या सांगों गेल्या पितया । जरासंधासी तेधवां ॥१७॥
दोघी जणी अत्यंत दीन । भेटल्या जरासंधालागोन ।
पितयाच्या कंठीं मिठी घालोन । रुदन करिती आक्रोशें ॥१८॥
जरासंध घाबरला बहुत । म्हणे काय जाहला वृत्तांत ।
येरी भूमीसी पडती मूर्च्छागत । शब्द न फुटे बोलतां ॥१९॥
आक्रोशें बोलती तत्त्वतां । कृष्णें मारिलें तुझ्या जामाता ।
मुष्टिकचाणूरादि वीरां समस्तां । मृत्युपंथा पाठविलें ॥२०॥
परमपुरुषार्थीं कृष्ण-राम । केला मथुरेमाजी पराक्रम ।
उग्रसेन राज्यीं स्थापिला परम । सुख जाहलें लोकांसी ॥२१॥
ऐकतां श्रीकृष्णप्रताप । मागधासी चढला परम कोप ।
जैसा पाय पडतां खवळे सर्प । नेत्र आरक्त वटारिले ॥२२॥
केलें कन्यांचें समाधान । म्हणे मथुरा क्षणमात्रें जाळीन ।
यादवकुळ सकळ छेदीन । धरुनि आणीन राम-कृष्णां ॥२३॥
ऐसी जरासंधें होड बांधोनी । घाव तेव्हां घातला निशाणीं ।
तेणें दुमदुमली अवनी । तेवीस अक्षौहिणी दळ ज्याचें ॥२४॥
धडकला वाद्यांचा कल्लोळ । प्रतिध्वनीनें गाजलें निराळ ।
भयभीत ब्रह्मगोळ । चालिलें दळ मागधांचें ॥२५॥
भेरी धडकल्या शशिवदना ते क्षणीं । ऐकतां त्रास उपजे कर्णीं ।
रणतुरें खणखणती तेणें गगनीं । देवयानें डळमळती ॥२६॥
शृंगें बुरंगें पणव काहळ । गोमुखी चळका चौंडकी दुटाळ ।
मुखवातें सनया रसाळ । गर्जती ढोल गिडबिडी ॥२७॥
बावीस सहस्र छत्रपती । जेणें बंदीं घातले नृपती ।
ऐसा जरासंघ मागधपती । मथुरा घेऊं चालिला ॥२८॥
पदाति दळ पुढें जात । त्यांचे पायीं ब्रीदें झणाणत ।
पदीं त्यांच्या तोडर गर्जत । हांक फोडीत आवेशें ॥२९॥
नाना परींच्या कांसा घालूनी । यमदष्ट्रा खोविल्या जघनीं ।
हातीं कुंत असिलता घेऊनी । खेटकें अपार मस्तकावरी ॥३०॥
जैसा फुटे कल्पांतींचा सागर । तैसें पायदळ जात अपार ।
सडका पाश भिंडिमाळा थोर । घेऊनि पुढें धांवती ॥३१॥
बडगे चक्रें शिळा डांगा । घेऊनि बिलगती चमकती वेगा ।
धनुष्य-बाण सुरया उरगा । आकृती ऐशा सतेज ॥३२॥
लघु उल्हाटयंत्रें आधीं । घेऊनि पुढें धांवती खांदीं ।
उर्वी दणाणे चालतां पदीं । भूधर होय साशंक ॥३३॥
मुसळ गदा मुद्गर परिघ । शूळ शक्ति लोहकंदुक अभंग ।
पट्टिश बाण लोहवृश्चिक उरग । दशघ्न्या आणि शतघ्न्या ॥३४॥
लोहार्गळा त्रिशूळ कोयते कातिया । परशु तोमर कुठार घेऊनियां ।
धांवती पुढें लवलाह्या । मथुरापंथ लक्षूनि ॥३५॥
सवें चालिले तुरंगमांचे भार । चपळ नागर मनोहर ।
मित्ररथींचा जैसा रहंवर । बलाढ्य सुंदर तैसेचि ॥३६॥
कित्येक निघाले श्यामकर्ण । ऐका तयांचें लक्षण ।
काढिले क्षीरसागरीं धुवोन । तैसा वर्ण तयांचा ॥३७॥
डोळे आरक्त सुंदर । पुच्छें विद्रुमवर्ण खूर ।
समीराहूनि गति अपार । तिहीं लोकीं गमन तयां ॥३८॥
एक घोडे ढवळवर्ण विशाळ । एक नीळवर्ण अति निर्मळ ।
एक पिंवळेचि केवळ । आरबी चपल चौताळती ॥३९॥
एकाची माणिकाऐसी ज्योती । परी वीरां सांवरितां न थारती ।
ज्या तुरंगाची जैसी अंगकांती । तद्‌रूपवर्ण छाया दिसे ॥४०॥
सांवळे घोडे कित्येक । एक गर्जती सिंहमुख ।
एक चकोर परम चाळक । एक कुंकुमकेशरवर्ण ॥४१॥
एक चंदनवर्ण चांगले । एक चंद्रवर्ण सोज्ज्वळे ।
एक क्षीरवर्ण हंसाळे । चपळ चालती पुढें पुढें ॥४२॥
जंबुद्वीपींचें जांभूळवर्ण । श्वेतद्वीपींचे चंद्रवर्ण ।
क्रौंचद्वीपींचे पिंवळे पूर्ण । चितळे चित्रांगे साजिरे ॥४३॥
शाल्मलिद्वीपींचे बदीर । प्लक्षद्वीपींचे वर्णचकोर ।
कुशद्वीपींचे सोज्ज्वळ सुंदर । पुष्करींचे श्यामकर्ण ॥४४॥
परम रागीट कुमाईत । बदकश्याम स्थिर चालत ।
आरबी उदकावरी पळत । खूर न भिजे तयांचा ॥४५॥
नव खंडें छप्पन्न देश । तेथींचे वारु एकाहूनि एक विशेष ।
चित्रींचीं भांडारें आसमास । उघडिलीं जयापरी ॥४६॥
उचंबळला शृंगारसागर । ज्यांची सुपर्णा समान गति अपार ।
संकेत दावितां अणुमात्र । परचमूंत प्रवेशती ॥४७॥
चक्राकार वाजी वावरती । अश्वखर्गक्षत्रिय एकजाती ।
एकरूप होवोति वर्तती । सपक्ष उडती तुरंग एक ॥४८॥
रत्‍नजडित वरी पाखरा । चालतां दणाणे वसुंधरा ।
चरणीं नेपुरें मस्तकीं तुरा । रत्‍नजडित झळकतसे ॥४९॥
मुखीं रत्‍नजडित मोहाळी । चामरें रूळती तेजागळीं ।
नृत्य करिती भूमंडळीं । पाय पुढील न लागती ॥५०॥
हिंसती जेव्हां सबळबळें । तेणें बैसती दिग्गजांचे टाळे ।
कवच टोप घेऊनि बळागळे । वरी आरुढले राउत ॥५१॥
जैसी सौदामिनी अंबरीं । तैशा असिलता झळकती करीं ।
ऐसे अश्वभार ते अवसरीं । मथुरापंथें चालिले ॥५२॥
अश्वभारांमागें लिगटले । उन्मत्त नागभार उठावले ।
ऐरावतासम तुकेले । चौदंत आणि चपळत्वें ॥५३॥
सुवर्णाच्या शृंखळा । खळाळती विशाळा ।
वरी पाखरा घातल्या । कनकवर्ण सुरेख ॥५४॥
वरी रत्‍नजडित चवरडोल । ध्वज भेदीत गेले निराळ ।
फडकती अति तेजाळ । बोलाविती शत्रूंतें ॥५५॥
उर्वीवरी चामरें रुळती । घंटा गर्जतां दिशा दुमदुमती ।
गजाकर्षक स्कंधीं बैसती । अंकुश सतेज घेऊनियां ॥५६॥
तो जिकडे दावीं संकेत । तिकडे चौताळती गज उन्मत्त ।
झडप हाणोनि पर्वत । चुरा करिती मार्गींचे ॥५७॥
पुढें हिंसत चौताळती तुरंग । मागें सबळ किंकाटती मातंग ।
त्यांपाठीमागें रथ सवेग । घडघडाट चालिले ॥५८॥
रथांचीं रत्‍नजडित चक्रें । चपळेऐसीं चित्रविचित्रें ।
साटे घातले जे वज्रें । न फुटती सर्वथा ॥५९॥
मणिमय शोभतीं स्तंभ । वरील छत्र कनकवर्ण स्वयंभ ।
ध्वज भेदीत गेले नभ । भिन्नभिन्न स्वरुप पैं ॥६०॥
नाना शस्त्रांचे भार । रथीं रचिले अपार ।
सप्तशत चापें परिकर । भरले तूणीर बाणांनीं ॥६१॥
वरी आरुढलें महारथी । पुढें धुरे बैसले चतुर सारथी ।
जे संकटीं स्वामीसी रक्षिती । जीवित्व मानिती तृणासम ॥६२॥
पुढें जुंपिले सबळ घोडे । जे कां अनिळाहूनि वेगाढे ।
सारथी संकेत दावी जिकडे । जाती तिकडे चपळत्वें ॥६३॥
असो ऐसा तेवीस अक्षौहिणी । दळभार निघाला तेचि क्षणीं ।
वाद्यें वाजती तेणें धरणीं । उलों पाहे तेधवां ॥६४॥
मध्यभागीं जरासंध । दिव्य रथ परम सुबद्ध ।
वरी आरुढला भोंवते सनद्ध । महावीरीं वेष्टिला ॥६५॥
जैसा शक्रावरी वृत्रासुर । निघाला सहित दळभार ।
तैसा जरासंध प्रचंड वीर । मथुरेसमीप पातला ॥६६॥
रातोरातीं धांविन्नले । वेगें मथुरापुर वेढिलें ।
सैन्यसमुद्राचें पडिलें । वेष्टण भोंवतें अद्‌भुत ॥६७॥
लोक गजबजिले सकळ । म्हणती ओढवला प्रळयकाळ ।
जरासंध परम सबळ । करील निर्मूळ मथुरेचें ॥६८॥
पळावया नाहीं वाट । प्रजा करिती कलकलाट ।
महाद्वारें झांकिलीं सदट । न उघडती कोणातें ॥६९॥
कंस मारिला यदुवीरें । म्हणोनि हा आला मथुरे ।
जामाताच्या कैवारें । प्रळय थोर करील ॥७०॥
हुडा हुडा वीर चढती । परसैन्यातें विलोकिती ।
एक बोलती एकाप्रती । बरी गती न दिसे की ॥७१॥
कृष्ण आणि संकर्षण । दुर्गावरूनि विलोकिती सैन्य ।
हरीजवळी आला उग्रसेन । म्हणे कैसें आतां करावें ॥७२॥
सात्यकी उद्धव अक्रूर । म्हणती संकट आलें थोर ।
भोंवते अवघे दीनवक्‍त्र । यादवेंद्रें देखिले ॥७३॥
जो महाराज नरवीरपंचानन । जो यादवकुळमुकुटरत्‍न ।
जो पूर्णब्रह्म सनातन । इंदिराजीवन श्रीरंग ॥७४॥
जो विश्वपित्याचा जनक । जो सर्गस्थित्यंतकारक ।
अनंत ब्रह्मांडें देख । इच्छामात्रें घडी मोडी ॥७५॥
तेव्हां अद्‌भुत केलें सर्वेश्वरें । उर्ध्व विलोकिलें श्रीकरधरें ।
तों अकस्मात निराळपंथें त्वरें । दोन रथ उतरले ॥७६॥
ते वैकुंठींचे दिव्य रथ । सहस्र मित्रप्रभा भासत ।
कोणा न वर्णवे तेज अद्‌भुत । गरुडध्वज झळके वरी ॥७७॥
शारंग-शंख-चक्र-गदामंडित । रथीं असती आयुधें अद्‌भुत ।
दारुक सारथी देदीप्यवंत । शस्त्रास्त्रीं मिरवे जो कां ॥७८॥
वरी ठेविले अक्षय भाते । कोण वर्णील तुरंगमांतें ।
जे अश्व अमृतपानकर्ते । ऐका नामें तयांचीं ॥७९॥
शैब्य सुग्रीव अतिसुस्वरूप । तिजा बहालक चौथा मेघपुष्प ।
ऐका दुजिया रथाचा प्रताप । संकर्षण आरुढला जेथें ॥८०॥
तालध्वजमंडित रथ । चारी वारू चपळ श्वेत ।
नांगर मुसळ आयुधें समर्थ । तयावरी ठेविलीं ॥८१॥
दोनी रथ मथुरे उतरले । जैसे कां शशि-मित्र प्रकटले ।
दारुकें साष्टांग घातलें । श्रीकृष्णासी दंडवत ॥८२॥
सकळ पाहती जन डोळां । तत्काळ श्रीकृष्ण चतुर्भुज जाहला ।
चारी आयुधें घेतलीं ते वेळां । रथीं चढला यादवेंद्र ॥८३॥
देव सुमनांचे संभार । वरुनि वर्षती अपार ।
दुजे रथीं चढला भोगींद्र । हल मुसळ सांभाळिलें ॥८४॥
ऐसें देखोनि तये वेळे । उग्रसेनासी स्फुरण आलें ।
चतुरंग दळ सिद्ध जाहलें । निशानीं दिधले घाव वेगीं ॥८५॥
अपार यादवांचे भार । चहूंकडूनि उठावले समग्र ।
रथीं बैसले उद्धव अक्रूर । प्रतापशूर प्रचंड जे ॥८६॥
बळिभद्रें आणि घननीळें । सबळ बळें शंख त्राहाटिले ।
जरासंधाचें सैन्य दचकलें । वीर जाहले भयभीत ॥८७॥
तों वसुदेव निजभारेंसीं ते वेळीं । आला उग्रसेनाजवळी ।
एकचि घाई लागली । रणतुरांची ते वेळीं ॥८८॥
उल्हाटयंत्रांचे मार । दुर्गावरुनि होती अपार ।
परसैन्याचे यंत्रगोळ समग्र । दुर्गपरिघामाजी पडती ॥८९॥
उघडिलें मथुरेचें महाद्वार । सिंहनादें गर्जती अपार ।
यादव निघाले बाहेर । रामकृष्णांसमवेत ॥ पैं ॥९०॥
दोनी सैन्यां जाहला मेळ । धडकत वाद्यांचा कल्लोळ ।
डळमळीत उर्वीमंडळ । दिग्गज त्रास पावले ॥९१॥
जाहली एकचि रणधुमाळी । नारद नाचे अंतराळीं ।
म्हणे भली मांडली येथें कळी । वाजवी टाळी आनंदें ॥९२॥
उतरावया पृथ्वीचा भार । यालागीं अवतरला श्रीधर ।
तो विजयी हो कां निरंतर । सकळ सुरवर बोलती ॥९३॥
असो पायदळावरी पायदळ । लोटलें तेव्हां अति सबळ ।
तुरंगारुढ वीर सकळ । तेही मिसळले परस्परें ॥९४॥
गजांवरी गज लोटले । रथांशीं रथ झगटले ।
एकचि घनचक्र मांडलें । राम-कृष्ण पाहती ॥९५॥
जैशा जलदाचिया धारा । तैसे शर येती एकसरां ।
एक एकासी लागूनि चुरा । होवोनि पडती धरेवरी ॥९६॥
शिरें वीरांचीं उसळती देख । जैसे आकाशपंथें कंदुक ।
प्रेतें पडती असंख्य । गणना नाहीं अश्वांसी ॥९७॥
शोणिताचे पूर जात । माजी गजकलेवरें वाहत ।
रथ मोडले असंख्यात । नाहीं गणित अश्वांसी ॥९८॥
कृष्णबळें यादव अनिवार । केला परदळाचा संहार ।
उठावले जरासंधाचे वीर । शिशुपाळ आणि वक्रदंत ॥९९॥
कृष्णद्वेषी मिळाले अपार । त्यांत रुक्मिया आला भीमककुमर ।
महाभिमानी दुराचार । अतिनिंदक दुरात्मा ॥१००॥
त्यांनी अपार युद्ध केलें । यादवसैन्य माघारलें ।
ऐसें राम-कृष्णें देखिलें । रथ लोटिले तेधवां ॥१॥
जैसें वारणचक्र दारुण । त्यांत रिघती दोघे पंचानन ।
श्रीकृष्णें शार्ङ्‌ग चढवून । सोडिले बाण चपळत्वें ॥२॥
जैसें पूर्वीं श्रावणारिसुतें । जाऊनि वैश्रवणबंधुपुरीतें ।
किंपुरुषांसहित युद्ध तेथें । प्रतापवंतें केलें जेवीं ॥३॥
कंसांतक तैसाचि येत । परमप्रतापी रणपंडित ।
असंख्यात बाण सोडीत । नोहे गणित शेषातें ॥४॥
कीं कुंभोद्‌भव वसुदेवनंदन । रणसागर करुं पाहे प्राशन ।
कीं मागधसैन्य शुष्क विपिन । त्यासी कृशान श्रीरंग ॥५॥
कीं मागधवीर हेचि नग । त्यांवरि वज्रधर श्रीरंग ।
हस्तपक्ष छेदूनि सवेग । पाडी मंगळजननीवरी ॥६॥
तेवीस अक्षौहिणी दळ । त्यांत मुख्य मुख्य उरले सबळ ।
वरकड सैन्य समूळ । कृष्णें आणिलें बाणांवरी ॥७॥
मुकुटरांगावळी तुटोनी । कां गलटोप पडिले धरणीं ।
महावीर पाठी देऊनी । पळों लागले तेधवां ॥८॥
गुढारांसहित रित कुंजर । सैरा धावती अनिवार ।
ध्वजांसहित रथ अपार । शून्य पडिले मोडोनि ॥९॥
छत्रें चामरें पताका । तेथें केर पडिला देखा ।
अशुद्धनदीचा वाहे भडका । घायाळ जींत पोहती ॥११०॥
देखोनि पंडितांचें दिव्यज्ञान । पाखंडी पळती घेऊनि वदन ।
तैसे वीर पृष्ठ दावून । पळते झाले तेधवां ॥११॥
इकडे कृतांत दचके देख । ऐसी बळिभद्रें फोडिली हांक ।
जरासंधावरी एकाएक । रथासमवेत लोटला ॥१२॥
देखोनि बळरामाचा प्रताप । हरपला मागधाचा दारुण दर्प ।
जैसा शंकरापुढें कदर्प । दहनकाळीं शंकला ॥१३॥
मुसळ आणि नांगर । हातीं घेऊनि बळिभद्र ।
रथाखालीं उडी सत्वर । घालूनियां धांविन्नला ॥१४॥
नांगर घालूनि ओढी वीर । मुसळघायें करी चूर ।
झाला बहु वीरांचा संहार । जरासंध पहातसे ॥१५॥
धनुष्या चढवोनि गुण । जरासंधें सोडिले बाण ।
जैसा धारा वर्षे घन । शर निर्वाण सोडिले ॥१६॥
ते कृष्णाग्रजें न मानोनि ते वेळीं । धांव घेतली रथाजवळी ।
नांगर घालूनि तत्काळीं । जरासंध ओढिला ॥१७॥
मुसळघायें करावा चूर्ण । तों बोले जगज्जीवन ।
यासी न मारावें आपण । न्यावा बांधोनि रथासी ॥१८॥
तों देववाणी बोले आकाशीं । भीमाहातीं मरण यासी ।
मग वरुणपाश घालूनि वेगेंसीं । दृढ रथासी बांधिला ॥१९॥
जैसा मृगेंद्रें धरिला वारण । तैसा चालविला रथीं बांधोन ।
विजयी जाहले राम-कृष्ण । वृंदारक पुष्पें वर्षती ॥१२०॥
जरासंधाचे वीर ते वेळे । उरले ते अवघेचि पळाले ।
जैसें यजमानासी संकट ओढवलें । आश्रित पळती दश दिशां ॥२१॥
श्रीरंग म्हणे बळिरामातें । आतां सोडावें जरासंधातें ।
हा मेळवूनि आणील दैत्यांतें । मागुती त्यांतें संहारूं ॥२२॥
पृथ्वीवरील जे निंदक खळ । येथें तितुके आणील सकळ ।
ऐसें बोलतां घननीळ । सोडिला तत्काळ बळरामें ॥२३॥
मग अत्यंत करीत खेद । स्वस्थळा पातला जरासंध ।
म्हणे बावीस सहस्र रायां केला बंध । तो पुरुषार्थ व्यर्थ गेला ॥२४॥
मी सेवीन घोर अरण्य । तप करीन तेथें बैसोन ।
परी नगरासी जाऊनि वदन । काय दावूं लोकांतें ॥२५॥
तों रुक्मिया शिशुपाळ वक्रदंत । मार्गीं भेटले अकस्मात ।
मागधाचें समाधान करीत । तपसंकल्प करुं नको ॥२६॥
जय अथवा पराजय । महावीरांसी पडे हा समय ।
पुरुषें पुरुषार्थ सांडूं नये । करावा उपाय मागुती ॥२७॥
जों कायेंत असे प्राण । तों न सोडावी आंगवण ।
मागुती दळभार घेऊन । रामकृष्ण धरुनि आणूं ॥२८॥
ऐसें जरासंधासी वळविलें । मागुती तितुकेंचि दळ मेळविलें ।
सवेंचि मागधें धावणें केलें । मथुरेवरी पूर्ववत ॥२९॥
मागुती बळिरामें धांवोन । बांधिला वरुणपाश घालून ।
माधवें दिधला सोडून । पुढती उत्थान आणिक केलें ॥१३०॥
ऐसा सप्तदश वेळ । संग्राम माजला तुंबळ ।
सिंहावरी सिंह लोटले सबळ । तैसा फणींद्र धरी त्यातें ॥३१॥
सत्रा वेळ बळिरामें धरिला । तैसाचि श्रीरंगें सोडविला ।
तों नारदमुनि पातला । जरासंधाचे भेटीतें ॥३२॥
म्हणे तूं कष्टलासी सत्रा वेळ । तुज नाटोपे राम घननीळ ।
तरी काळयवन असे सबळ । त्यासी साह्य बोलाविजे ॥३३॥
यादवांचा पराभव संपूर्ण । काळयवनाहातीं असे जाण ।
त्यासी असे शंकरवरदान । तें वर्तमान ऐक तूं ॥३४॥
गर्गाचार्य महाऋषी । तो कुळगुरु होय यादवांसी ।
विद्यासंपन्न तेजोराशी । प्रतिसूर्य दूसरा ॥३५॥
एके यादवें आपुली कन्या । गर्गऋषीसी दिधली जाणा ।
परी ठाव नाहीं संताना । बहुत दिवस लोटले ॥३६॥
तों यादव विनोदी उदंड । म्हणे गर्गऋषि आहे षंढ ।
ऐसें ऐकतांचि प्रचंड । क्रोध आला मुनींतें ॥३७॥
म्हणे यादव तुम्ही उन्मत्त । ऐसा निर्मितों पुरुषार्थी सुत ।
त्यापुढें पराभव समस्त । होय तुमचा एकादांचि ॥३८॥
परम क्रोधावला ब्राह्मण । केलें हिमाचळीं अनुष्ठान ।
हिमनगजामात प्रसन्न । तत्काळचि जाहला ॥३९॥
येरु मागे वरदान । ऐसा पुत्र दे मजलागून ।
जो यादवांसी पराभवून । राज्य हिरोन घेईल ॥१४०॥
शिव म्हणे तूं करितां अनुष्ठान । म्लेंच्छस्त्री मागेल भोगदान ।
तिचें पोटीं पुत्र दारुण । महादुष्ट होईल तुझा ॥४१॥
ब्राह्मणस्त्रीचें पोटीं पुत्र । कदा नव्हे अपवित्र ।
यथा भूमि तथांकुर । होईल साचार द्विजवरा ॥४२॥
तो तुझा वीर्यनंदन । दुष्टक्षेत्रीं होय निर्माण ।
असो गर्ग करीत अनुष्ठान । महाविपिन सेविलें ॥४३॥
तों दुष्ट एक म्लेंच्छपती । त्यासी नव्हे पुत्रसंतती ।
तेणें स्त्री पाठविली गर्गाप्रती । शृंगारुनि एकांतीं ॥४४॥
तीस भोग दिधला जाण । तोचि हा म्लेंच्छ काळयवन ।
यासी तूं संगें घेऊन । मथुरेवरी जाईं कां ॥४५॥
ऐकतां जरासंध संतोषला । काळयवनापासीं गेला ।
सर्व वृत्तांत सांगितला । क्रोधावला काळयवन ॥४६॥
तीन कोटी म्लेंच्छ त्याचे । तेवीस अक्षौहिणी दळ मागाधाचें ।
रुक्मिया शिशुपाळ दैत्य साचे । साह्य झाले सत्वर ॥४७॥
ऐसी सेना मेळवूनि सवेग । रजनीमाजी क्रमिती मार्ग ।
सर्वांतरात्मा श्रीरंग । वर्तमान कळलें तें ॥४८॥
मग भक्तकैवारी रमाधव । समुद्रापासीं मागोनि ठाव ।
द्वारकानगर अपूर्व । विरिंचिहातीं रचविलें ॥४९॥
द्वारकेची रचना सांगतां समस्त । तरी हा अध्याय वाढेल बहुत ।
द्वारकावर्णन अद्‌भुत । पुढें कथन केलें असे पैं ॥१५०॥
असे जैसी वैकुंठनगरी । तैसीच द्वारका भूमीवरी ।
कमलोद्‌भवें निर्मिली ते अवसरीं । श्रीकृष्णाज्ञेकरुनियां ॥५१॥
जेणें इच्छामात्रें आणिले रथ । तेणेंचि द्वारका रचिली अद्‌भुत ।
तेथें नाना संपत्ती समस्त । कुबेरें आणूनि भरियेल्या ॥५२॥
तों रातोरातीं काळयवनें । मथुरेवरी मांडिलें धांवणें ।
तों मथुरेसी लोक निद्रेनें । आबालवृद्ध व्यापिले ॥५३॥
परम नाटकी पूतनारी । योगमाया घालोनि वरी ।
रजनीमाजीं द्वारकापुरीं । समस्त लोक पाठविले ॥५४॥
धनधान्यपशूंसमवेत । गज तुरंग रथ अद्‌भुत ।
सहकुटूंबें यादव समस्त । उग्रसेनही पाठविला ॥५५॥
दारुक सारथी रथ आयुधें । तींही पाठविलीं गोविंदें ।
बळिभद्रही परमानंदें । पाठविला तेधवां ॥५६॥
एक श्रीकृष्णावेगळें । मथुरेंत कोणी नाहीं उरलें ।
जैसें अयोध्यानगर पूर्वीं नेलें । रामचंद्रें वैकुंठीं ॥५७॥
द्वारकेमाजी लोक जागे जाहले । पाहती उगेचि चाकाटले ।
वस्तुजात तैसेंचि संचलें । परी नगर आपुलें नव्हेचि ॥५८॥
उद्धव अक्रूर उग्रसेन । वसुदेव देवकी संकर्षण ।
रोहिणी प्रजा सकळ ब्राह्मण । म्हणती हरिविंदान न कळेचि ॥५९॥
मथुरेच्या शतगुणें चांगलें । द्वारकानगर आम्हां दिधलें ।
असो इकडे काय वर्तलें । तेंचि ऐका भाविक हो ॥१६०॥
जरासंध आणि काळयवन । उगवला नसतां चंडकिरण ।
वेढा घातला मथुरेसी येऊन । पळेल कृष्ण म्हणोनियां ॥६१॥
जरासंध म्हणे बरें झालें । मज सत्रा वेळां इहीं गांजिलें ।
धरोनि आतांचि एक वेळे । संहारीन हरीसहित ॥६२॥
तों सवेंचि उगवला अर्क । नगरांत न दिसती लोक ।
उल्हाटयंत्रांचे मार अधिक । न होती दुर्गावरोनियां ॥६३॥
नगरद्वार उघडें भणभणित । एकलाचि उभा कृष्णनाथ ।
नाहीं शस्त्रास्त्रें रथ । वाट पाहत काळयवनाची ॥६४॥
आश्चर्य करिती समस्त । म्हणती गोवळा कपटी बहुत ।
यासीच धरावें त्वरित । मग लोक शोधावे ॥६५॥
काळयवनें कृष्ण लक्षिला । शस्त्रेंविरहित चरणीं देखिला ।
आपण रथाखालीं उतरला । शस्त्रें ठेवूनि समस्त ।६६॥
जरासंधासी म्हणे काळयवन । आतांचि कृष्ण आणितों धरुन ।
नेऊं रथासी बांधोन । सूड घेईन तुझा आतां ॥६७॥
यवनें भुजा पिटोनि सत्वर । सन्मुख लक्षिला श्रीधर ।
आवेशें धांव घेतली थोर । तें यदुवीर पाहतसे ॥६८॥
जवळी येतां काळयवन । जगद्वंद्य करी हास्यवदन ।
करावया गर्गवचन प्रमाण । नारायण चालिला ॥६९॥
जो इच्छाप्रमाणें घडी समस्त । तो काळयवनभेणें पळत ।
परी शिववचनासी मान देत । भक्तवत्सल म्हणोनियां ॥१७०॥
असो कायेंतूनि निघे प्राण । तो कदा नव्हे दृश्यमान ।
अवघ्या दळादेखतां कृष्ण । जाय निघोन क्षणमात्रें ॥७१॥
जैसी गगनीं झळके चपळा । तैसा हरि वेगें निघाला ।
काळयवन पाठीं लागला । दळभार राहिला दूरी पैं ॥७२॥
पुढें जात शेषनयन । समीरगती धांवे यवन ।
उल्लंघिलीं अरण्यें दारुण । महाकठिण पर्वत ॥७३॥
नर्मदा तापी गोदावरी । अनेक नद्या उल्लंघी मुरारी ।
भीमा उल्लंघूनि कृष्णातीरीं । कृष्ण वेगें पातला ॥७४॥
कृष्णावेणीसंगम सुरंग । ज्यासी म्हणती दक्षिणप्रयाग ।
तेथें उभा ठाकला श्रीरंग । तों भार्गवराम भेटला ॥७५॥
जाहलें दोघां क्षेमालिंगन । परशुराम पुसे हरीलागून ।
कोणीकडे जाहलें आगमन । कृष्णें वर्तमान सांगीतलें ॥७६॥
तों जवळी आला काळयवन । पुढें चालिला जगन्मोहन ।
पूर्ण ब्रह्म सनातन । त्यासी यवन धरुं पाहे ॥७७॥
वाटे जवळी सांपडला दिसे । परी दूरी बहुतचि असे ।
बहु धांव घेतली सायासें । परी नाटोपे श्रीरंग ॥७८॥
एक सद्‌भावावांचोन । कोणा नाटोपे जगज्जीवन ।
त्यासी काय धरील काळयवन । अतर्क्य पूर्ण वेदशास्त्रां ॥७९॥
काळयवन म्हणे रे भ्याडा । किती पळसील दडदडां ।
तुवां गोकुळीं केला पवाडा । तें मजपुढें न चलेचि ॥१८०॥
सत्रा वेळ मागधासीं । तूं मथुरेपुढें युद्ध करिसी ।
मजभेणें कां तूं पळसी । नपुंसक होसी गोवळ्या ॥८१॥
गौळणी बांधिती उखळासी । मज उशीर काय धरावयासी ।
तूं गोकुळीं चोरी करिसी । तेंचि पाहसी चहूंकडे ॥८२॥
कालिया आणि अघासुर । किरडे मारुनि जाहलासी थोर ।
अश्व मारिला केशी वीर । बकासुर पांखरुं ॥८३॥
वल्मीकतुल्य गोवर्धन । पुरुषार्थ भोगिसी उचलून ।
कंस मारिला कपटेंकरुन । आतां धरीन क्षणें तुज ॥८४॥
ऐसे उणे बोल बोलत । बोलां नाटोपे कृष्णनाथ ।
नाना तपें अनुष्ठान करीत । त्यांसी निश्चित न सांपडे ॥८५॥
दुग्धाहारी फळाहारी । नग्न मौनी जटाधारी ।
पंचाग्नि साधिती निराहारी । त्यांसी मुरारी नाटोपे ॥८६॥
एक करिती वेदशास्त्रपठन । करिती योगसाधन तीर्थाटन ।
नाना साधनीं करिती शीण । परी मनमोहन नाटोपे ॥८७॥
एका ढेंगेत ब्रह्मांड आटी । यवन धांवे त्याचिया पाठीं ।
व्यर्थ पळतां होती हिंपुटी । परी जगजेठी न सांपडे ॥८८॥
क्षण एक अवतारी सगुण । सवेंचि पाहतां तो निर्गुण ।
म्हणे त्रिविक्रम क्षणें वामन । त्यासी यवन धरील कोठें ॥८९॥
अद्‌भुत हरीचा वेग होये । तों काळयवन मागें राहे ।
मागुती हरि त्याची वाट पाहे । जवळी यावा म्हणोनियां ॥१९०॥
कंठींच्या तुलसी आणि सुमनहार । वाटेसी टाकीत जात श्रीधर ।
तोचि माग पाहूनि असुर । धांवे थोर वेगेंसीं ॥९१॥
पुढें पराशरपर्वत । त्यावरी चढे रमानाथ ।
तेथें व्यासपिता अनुष्ठान करीत । जगन्नाथ वंदी तया ॥९२॥
त्या पर्वतीं न दिसे कृष्ण । तों उष्णकाळ शुष्क विपिन ।
यवनें भोंवता लाविला अग्न । ऋषिजन तेणें आहाळती ॥९३॥
ऐसें श्रीकृष्णें जाणोनी । पर्वत दडपिला बळेंकरूनी ।
उदक वरी आलें उसळोनी । विझविला अग्नि क्षणमात्रें ॥९४॥
तेथूनि मग पश्चिमपंथें । धांव घेतली कृष्णनाथें ।
मार्ग दावूनि यवनातें । पुढें पुढें जात असे ॥९५॥
तों तेथें पर्वताचे दरीं । महाभयानक विवरीं ।
तेथें मुचुकुंदें बहुकाळवरी । निद्रा केली श्रमोनियां ॥९६॥
सूर्यवंशी राजा मांधात । हा मुचुकुंदनामें तयाचा सुत ।
तेणें स्वर्ग रक्षूनि समस्त । देव सुखी राखिले ॥९७॥
दैत्यांशीं युद्ध अद्‌भुत । केलें बहुकाळपर्यंत ।
पुढें स्कंद झाला शिवसुत । तेणें स्वर्गा रक्षिलें ॥९८॥
मुचुकुंद बहुत श्रमला । मग शचीवर प्रसन्न झाला ।
म्हणे वर मागें वहिला । अपेक्षित असेल जो ॥९९॥
येरु म्हणे श्रमलों प्रबळ । निद्रा करीन बहुकाळ ।
जो माझी निद्रासमाधि मोडील । तो भस्म होवों तेथेंचि ॥२००॥
माझे निद्रांतीं जगज्जीवन । भेटो अकस्मात येऊन ।
तथास्तु म्हणे सहस्रनयन । मग विवरीं जाऊनि निजला पैं ॥१॥
यालागीं त्याचि विवरांत । प्रवेशला वैकुंठनाथ ।
तें दुरूनि काळयवन देखत । म्हणे बरा येथें सांपडला ॥२॥
हरि विवरांत पुढें गेला । तों मुचुकुंद बहुकाळ निजला ।
आपुला पीतांबर काढिला । मग झांकिला तयावरी ॥३॥
आपण पुढें जाऊन । गुप्त पाहे जगज्जीवन ।
तों विवरांत प्रवेशला काळयवन । विलोकून पाह्हातसे ॥४॥
तों देखिला दिव्य पीतांबर । म्हणे येथेंचि निजला यादवेंद्र ।
म्हणोनि सबळ लत्ताप्रहार । हाणिता जाहला दुरात्मा ॥५॥
मुचुकुंद उठिला खडबडोन । क्रोधें पाहे विलोकून ।
तात्काळ तेथेंचि काळयवन । भस्म जाहला क्षणमात्रें ॥६॥
सूत्रधारी नारायण । ऐसा मारविला काळयवन ।
मुचुकुंद पाहे सावधान । तों पीतवसन देखिलें ॥७॥
तो सुवास न माये अंबरीं । मुचुकुंद सद्गदित अंतरीं ।
परतोनि पाहे तों मधुकैटभारीं । चतुर्भुज उभा असे ॥८॥
उदारवदन मनोहर । कर्णीं कुंडलें मकराकार ।
दिव्य मुकुट प्रभाकर । तेजें विवर उजळिलें ॥९॥
कौस्तुभ हृदयीं झळकत । वैजयंती आपाद डोलत ।
चतुर्भुज वैकुंठनाथ । पाहतां मन निवालें ॥२१०॥
ऐसा मुचुकंदें हरि देखिला । साष्टांग नमस्कार घातला ।
म्हणे पुराणपुरुषा भक्तवत्सला । तूं परब्रह्म केवळ भाससी ॥११॥
म्यां पूर्वीं बहुकाळवरी । स्वर्गा रक्षिलें नानापरी ।
श्रमोनियां विवराभीतरीं । निद्रा केली बहुकाळ ॥१२॥
तूं कोण मज सांगें निर्धार । मग सुहास्यवदन यादवेंद्र ।
म्हणे उतरावया भूमिभार । कृष्णावतार आठवा ॥१३॥
मुचुकुंदें धरिले दृढ चरण । दाटला अष्टभावेंकरून ।
म्हणे शचीवरें दिधलें वरदान । तें सकळ आजि जाहलें ॥१४॥
धन्य धन्य आजिचा सुदिन । देखिलें क्षीरसागरींचें निधान ।
परमपावन जाहले नयन । हरिवदन विलोकितां ॥१५॥
धन्य हें जाहलें शरीर । कृष्णें पांघुरविला पीतांबर ।
निरसोनि अज्ञानअंधकार । सावध केलें मजलागीं ॥१६॥
बहुतकाळ तमोमय यामिनी । भ्रांतीं मी पडिलों ये स्थानीं ।
श्रीकृष्ण उगवला वासरमणी । सरली रजनी अज्ञान ॥१७॥
कीं वैद्यराज रमारंग । कृपावलोकनें निरसोनि रोग ।
सावध करुनि निजांग । माझें मज दाविलें ॥१८॥
धन्य पंचाक्षरी यदुवीर । मजवरी झांकूनि पीतांबर ।
निद्राभूत हें अपस्मार । केलें दूर क्षणार्धें ॥१९॥
जय जय यदुकुळटिळका । कामांतकध्येया भक्तपाळका ।
अनंतब्रह्मांडचित्तचालका । कंसातका श्रीकृष्णा ॥२२०॥
गोपीमानस-राजहंसा । दारुणदुरितविपिनहुताशा ।
गोवर्धनोद्धारणा बालवेषा । शकटांतका श्रीहरे ॥२१॥
कमलशयना कमलालया । कमलनेत्रा कमलाप्रिया ।
कमलभूषणा कमलोद्‌भवआर्या । प्रतापसूर्या श्रीरंगा ॥२२॥
हे कृष्ण वृंदावन-विहारा । पुराणपुरुषा निर्विकारा ।
गोपीमनवसनगोरसचोरा । गोरक्षका गोविंदा ॥२३॥
हरि तुझिया स्वरूपावरून । कोटयनुकोटी मीनकेतन ।
सांडावे निंबलोण करुन । मज धन्य आजि केलें ॥२४॥
ऐकोनि मुचुकुंदस्तवन । संतोषला जगन्मोहन ।
वचन बोले प्रीतीकरुन । सुहास्यवदन जगदात्मा ॥२५॥
तूं बदरिकाश्रमीं राहें जाऊन । तेथें असे सत्यवतीहृदयरत्‍न ।
आणीकही विद्वज्जन । तये स्थानी वसताती ॥२६॥
संतसमागविण । कदा नव्हे निर्वाणज्ञान ।
तेथें करितां सारासार श्रवण । मन उन्मन होय तुझें ॥२७॥
मृगया करुं नको येथूनी । तूं होसील निर्वाणज्ञानी ।
माझी भक्ति दिन-यामिनी । विसंबूं नको सर्वथा ॥२८॥
माझिया वेदाची आज्ञा प्रमाण । वर्तावें सदा शिरीं वंदून ।
सखे करावे संतजन । गुरुसी शरण रिघावें ॥२९॥
हृदयीं धरिंजे दृढ बोध । न करावा भूतांचा विरोध ।
माझीं चरित्रें तीर्थमहिमा विशद । कदा उच्छेद न करावा ॥२३०॥
न करावें कोणाचें हेळण । वादविवाद द्यावा सोडून ।
सदा कीर्तन श्रवण मनन । निजध्यासीं राहिजे ॥३१॥
लोकांविरुद्ध न करावें कर्म । न आचरिजे कदा परधर्म ।
न बोलावें कोणाचें वर्म । सदा मम नाम स्मरावें ॥३२॥
प्रवृत्तिशास्त्रें नाना कुमतें । क्षुद्रसाधनें क्षुद्रदैवतें ।
नाना अनुष्ठानें नाना मतें । उपेक्षावीं मनींहूनि ॥३३॥
ऋषींचे आशीर्वाद घ्यावे । अनुचित कदा न बोलावें ।
आत्मरुप विश्व पहावें । शिरीं वंदावे गुरुचरण ॥३४॥
ऐसें सांगतां भगवंत । सादर ऐके मांधातृसुत ।
साष्टांग घातलें दंडवत । सद्गदित होय तेधवां ॥३५॥
आज्ञा घेऊनि ते वेळां । विवराबाहेरी निघाला ।
तों द्वापाराचा अंत ते वेळां । कलि जवळीं पुढें दिसे ॥३६॥
खुजीं झाडें खुजे लोक । पापचर्या दिसे अधिक ।
लोक देखिले परमनिंदक । मुचुकुंदभक्तें तेधवां ॥३७॥
न बोलेचि कोणासीं । पावला वेगें बदरिकाश्रमासी ।
संतसमागम अहर्निशीं । मुचुकुंदासी जाहला ॥३८॥
असो इकडे विवराबाहेर । निघाला वेगें यादवेंद्र ।
तों द्वारकेहूनि आला बळिभद्र । समाचाराकारणें ॥३९॥
तो जरासंध वैद्यपाळ । सवें काळयवनाचें म्लेंच्छदळ ।
पाठीलागीं आलें तत्काळ । तों रामघननीळ देखिले ॥२४०॥
म्हणती काय जाहला काळयवन । तो विवरीं गेला भस्म होवोन ।
मग क्रोधावले अवघे जन । म्हणती धरुन नेऊं दोघांतें ॥४१॥
तें देखोनि शेष-नारायण । पुढें चालिले दोघेजण ।
गोमंताचलावरी राम-कृष्ण । चढते जाहले तेधवां ॥४२॥
एकादश योजनें उंच पर्वत । त्यावरी जाहले दोघे गुप्त ।
तों जरासंधादि समस्त । वेढा घालिती पर्वता ॥४३॥
कृष्णद्वेषी परमदुर्जन । अग्नि लाविला चहूंकडून ।
अग्निशिखा भेदीत गगन । धूम्रें दाटल्या दशदिशा ॥४४॥
पक्षियांचे पाळे पळती । एक माजी आहाळूनि पडती ।
नाना जीवजाती आरडती । आकांत थोर ओढवला ॥४५॥
तों वैकुंठींहूनि सुपर्ण । आला हरिइच्छेनें धांवोन ।
केलें श्रीकृष्णासी नमन । हात जोडोन उभा ठाके ॥४६॥
मग गरुडावरी दोघेजण । बैसले शेष आणि नारायण ।
आकाशपंथें उड्डाण करुन । चालिले देखती सर्वही ॥४७॥
हरिवंशीं कथा आन । भीमक आला रथ घेऊन ।
त्या रथावरी रामकृष्ण । करवीरापासोन बैसले ॥४८॥
असो मथुरेकडे राम-कृष्ण । वेगें चालिले दोघेजण ।
दारुक आला रथ घेऊन । द्वारकेहून तेधवां ॥४९॥
त्या रथीं बैसोनि राम-हृषीकेशी । वेगें चालिले मथुरेसी ।
तों जरासंध पाठीशीं । चमूसहित पातला ॥२५०॥
ऐसें देखोनि नारायण । हातीं घेतलें सुदर्शन ।
जें सकळ शस्त्रांचा बाप पूर्ण । आज्ञा प्रमाण करावी ॥५१॥
जैसा लक्ष विजांचा एकचि भार । तैसें सुदर्शन आलें दुर्धर ।
मग पळती महावीर । जरासंध-चैद्यादि ॥५२॥
काळयवनाचें दळ । जरासंधाचेंही सकळ ।
सुदर्शनें संहारिलें तत्काळ । क्षणमात्र न लागतां ॥५३॥
मुख्य मुख्य राजे उरले । वरकड दळ संहारिलें ।
मग मथुरेंत राम-कृष्ण प्रवेशले । द्रव्य काढिलें उग्रसेनाचें ॥५४॥
भूमींत होतें जें भांडार । तेणें भरिले रथ-गज-रहंवर ।
द्वारकेसी चालविले समग्र । राम-कृष्णें रथ तेव्हां ॥५५॥
मागुती जरासंध धांविन्नला । म्हणे द्रव्य सांडीं सांडीं गोवळ्या ।
द्रव्य घेऊनि राम द्वारके गेला । कृष्णें मुरडिला रथ तेव्हां ॥५६॥
मागुती धनुष्य घेऊनी । युद्ध करीत चक्रपाणी ।
जरासंध पराभवोनी । मग गेले द्वारकेसी ॥५७॥
धनुष्य घेऊनि मुकुंदें । केली अष्टादश महायुद्धें ।
सत्रा वेळ मथुरेपुढें जगद्वंद्यें । युद्ध केलें निर्वाण ॥५८॥
असो द्वारकेसी आला यादवेंद्र । जाहला एकचि जयजयकार ।
तो सोहळा अपार । न वर्णवेचि सर्वथा ॥५९॥
तों आनर्तदेशाधिपती । रवैत नामें महानृपति ।
तो जाऊनि ब्रह्मयाप्रति । करी विनंति ते ऐका ॥२६०॥
म्हणे माझी कन्या रेवती । परमसुंदर त्रिजगतीं ।
तीस वर बरवा निश्चितीं । कोण असे सांग पां ॥६१॥
ब्रह्मा करी अनुष्ठान । राजा उभा कर जोडून ।
मग कमलासन बोले वचन । बळिरामासी देईं कन्या ॥६२॥
मग आपण येऊनि चतुरानन । जेथें राम कृष्ण उग्रसेन ।
गेला दळभारेंसीं घेऊन । आनर्तदेशाप्रती पैं ॥६३॥
विधिपूर्वक अतिप्रीतीं । बळिरामासी दिधली रेवती ।
चारी दिवस निश्चिती । सोहळा जाहला संपूर्ण ॥६४॥
मग अपार आंदण देऊन । बोळाविले राम-कृष्ण ।
समागमें रेवती घेऊन । द्वारकापुरीं प्रवेशले ॥६५॥
पुढें रुक्मिणीस्वयंवरकथा । सुरस असे परम तत्त्वतां ।
जे उणें आणील अमृता । ऐकिजे श्रोतीं सादर ॥६६॥
हरिवंशीं भागवतीं पाहीं । त्याचि कथा हरिविजयीं ।
आणि या ग्रंथाचा कर्ता सर्वही । पंढरीनाथ जाणिजे ॥६७॥
तोचि पाठीशीं उभा राहोनी । गोष्टी सांगे ज्या ज्या कानीं ।
तैशा म्यां लिहिल्या संतजनीं । जाणिजे हें तत्त्वतां ॥६८॥
हा हरिविजय वरद ग्रंथ । करवी आपण पंढरीनाथ ।
ये‍र्‍हवी श्रीधर मतिमंद बहुत । लोक सर्व जाणती ॥६९॥
नाहीं वाचिले संस्कृत । विभक्तिज्ञान नाहीं कळत ।
मूढाहातीं हा ग्रंथ । पंढरीनाथें करविला ॥२७०॥
जन म्हणती अद्‌भुत वक्ता । परी नेणती त्या हृदयस्था ।
अस्थींची मोळी शरीर पाहतां । त्यासी श्रीधर नाम ठेविलें ॥७१॥
कैंचा कोणाचा श्रीधर । सूत्रधारी रुक्मिणीवर ।
तो हालवी जैसें सूत्र । तैसींच नाचती चित्रें पैं ॥७२॥
वाजविता न पडोनि ठावा । म्हणती काय गोड वाजे पांवा ।
परी वाजविणार बरवा । लोक त्यातें नेणती ॥७३॥
पांवयाचे काष्ठासी छिद्र । तैसें देहासी नाम ठेवूनि श्रीधर ।
परी वाजविणार रुक्मिणीवर । भीमातीरविहारी जो ॥७४॥
ब्रह्मानंदा पुराणपुरुषा । श्रीमद्‌भीमातटविलासा ।
श्रीधरवरदायका परेशा । पुढें ग्रंथ चालविंजे ॥७५॥
इति श्रीहरिविजयग्रंथ । संमत हरिवंशभागवत ।
सदा परिसोत भाविक भक्त । द्वाविंशतितमाध्याय गोड हा ॥२७६॥
॥अध्याय बावीसावा समाप्त ॥ओंव्या २७६॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

गोकुळातील लोकांचा निरोप घेऊन उद्धव मथुरेस गेला. कितीतरी भेटवस्तू त्याने श्रीकृष्णाला दिल्या. खरवस, दही, लोणी, तूप, दुधाचे गोड पदार्थ, लोणची, फळे, नाना प्रकारच्या वस्तू- सारे पाहून कृष्णाला फार आनंद झाला. त्याला उद्धवाने गोपाळांची व गोपींची मनोवस्था सांगितली, आणि नंदयशोदा किती वाट पहात आहेत तेही सांगितले. कृष्णाचे मन आठवणींनी भरून आले. गोपींच्या भक्तिभावाचे वर्णन ऐकता ऐकता कृष्णही उद्धवाला आपण केलेले खेळ, कालियामर्दन, केशीचा वध, वगैरे पराक्रमही सांगू लागला. उद्धव म्हणाला- "मी त्यांचे ज्ञानोपदेशाने सांत्वन केले खरे, पण सगुण भक्तीची गोडी मला लागली आणि ज्ञानाला भक्तीची जोड मिळाली. नाही तर ते ज्ञान शुष्क कसे ठरते ते गोपींकडूनच मला कळले ! कृष्णा, कोणी कोणाला काय शिकविले ? मला तू उत्तम उपदेश असा परभारे केलास ना ? तुझी लीला आता माझ्या लक्षात आली !'

त्यांच्या दोघांच्या गोष्टी पुष्कळ वेळ चालल्या. चार महिने गोकुळात राहून उद्धवही 'गोपच' झाला होता.

मथुरेत आता उग्रसेनाचे राज्य चांगले चालले होते. प्रजा सुखी झाली. दुष्ट लोक तेथून गेले पण ते मगध देशाचा राजा जरासंध याला जाऊन मिळाले. कारण कंस हा जरासंधाचा जावई. अस्ति व प्राप्ति या जरासंधाच्या दोन मुली त्याने कंसाला दिल्या होत्या. त्या विधवा झाल्या. त्या जरासंधाकडे गेल्या. त्यांच्याबरोबर कंसाच्या पक्षाचे लोकही गेले कंसवधामुळे जरासंध चिडला ! त्याने मथुरेवर स्वारी करण्याचे ठरविले. मथुरा नगरी जाळून टाकण्याची त्याने प्रतिज्ञा केली. त्याने रामकृष्णांना धरुन आणण्याचे ठरविले. तेवीस अक्षौहिणी सैन्य जमविले. प्रचंड वाद्यघोष करीत चतुरंग दळ मगध नगरापासून निघाले. मथुरेत हेरांनी वृत्त आणले की जरासंधाची तेवीस अक्षौहिणी सेना मथुरेवर चाल करून येत आहे ! वृत्त कळताच मथुरेत गडबड उडाली ! सैन्य लढाईच्या तयारीत नव्हते. काय करावे याचा विचारच पडला. थोड्याच अवधीत मगधाचे सैन्य मथुरेभोवती वेढा देण्यास आले. त्याच्या कलकलाटाने, रणगर्जनांनी, मथुरेतील लोक घाबरून गेले. नगराची भक्कम महाद्वारे बंद करण्यात आली. कंसाचा सासरा आता सर्वांचा नायनाट करणार असे सर्वजण म्हणू लागले.

बलराम व कृष्ण यांच्याभोवती मुख्य मुख्य यादववीर जमले. सात्यकी, अक्रूर, उद्धव यांना पुढे पालून सारे कृष्णाला शरण आले. यादवांचे रक्षण करण्याचे ठरवून कृष्णाने व बलरामाने आपल्या मूळ स्वरुपाचे स्मरण केले आणि मूळ आयुधांना आवाहन केले. आकाशातून दोन दैदीप्यमान रथ मथुरेत उतरले. त्यांचे सोन्याचे कळस झगमगत होते, त्यावर गरुडचिन्हांकित ध्वज होते. रत्‍नांनी ते रथ चमकत होते. विष्णूचे शाङ्‌र्ग धनुष्य, शंख, गदा, सुदर्शन चक्र इत्यादि आयुधे त्या रथातच होती. एका रथात नांगर व मुसळ ही आयुधे होती. त्यावर तालवृक्षाचे चिन्ह असलेला ध्वज होता. दारुक नावाचा सारथी व शैब्य, सुग्रीव, बलाहक व मेघपुष्प हे चार शुभ्र अश्व, असा कृष्णाधा रथ होता. हलमुसळ युक्त ध्वज बलरामाचा होता. दोघे आपापल्या रथावर बसले. दोघांनी शंखांचा घोष केला.

मथुरेतून यादवांची सेना बाहेर धावली. चतुरंग सेनेतील वीर प्रतिपक्षाच्या तुल्यबल वीरांशी लढू लागले. हत्तींना हत्ती टकरा देऊ लागले, अश्ववीर अश्ववीराशी, पायदळ पायदळाशी व रथी रथीशी लढू लागले. रणगर्जना, शंखघोष, घे घे म्हणून आव्हाने, शस्त्रांच्या आघातांचा आवाज, मरतांना मारलेल्या किंकाळ्या यांबरोबरच रणवाद्यांच्या आवाजानेही रणांगण गाजू लागले. कोणी बाण मारीत होते, कोणी गदा हाणीत होते, कोणी पाश फेकून शत्रूला खेचून मारीत होते. कोणी मुसळे, कोणी तोमर, कोणी खड्गे, कोणी पट्टे, कोणी लोहगोल तर कोणी कुर्‍हाडी, कोयते, त्रिशूळ, भाले, अशी शस्त्रे मारीत होते, कोठे लोहवृश्चिक, कोठे दशघ्नी, शतघ्नी अशा तोफा तर कोठे साखळदंडांनी वीरांना जखडून मारले जात होते. उग्रसेन, बलराम, सात्यकी, कृष्ण व अनेक यादववीरांनी आपापल्या सैन्याचे चपल हालचाल करणारे छोटे गट करून जरासंधाच्या सैन्यात विजेच्या वेगाने धाडी घातल्या आणि पुष्कळ मोठा संहार केला. बलराम नांगराने दहाबारा सैनिकांना ओढीत होता आणि मुसळाने त्यांची डोकी कोडीत होता. कृष्णाचे सुदर्शन चक्र वीरांची, अश्वांची, हत्तींची मस्तके सपासप कापीत होते. हत्ती व घोडे यांच्या प्रेतांनी पायदळाला व रथींना हालचाल करणेही कठीण होऊ लागले. फार मोठा संहार झाला.

बलरामावर जरासंधाने चढाई केली. पण बलरामाने रथाखाली उडी घेतली. तो धावत गेला. रथातून जरासंधाला त्याने नांगराने खाली ओढले. तो त्याला मुसळाने ठार मारणार होता, पण त्यावेळी अशी आकाशवाणी झाली - "बलभद्रा ! जरासंधाला तू मारू नकोस ! त्याचा वध पांडवांपैकी जो भीम, त्याकडून होणार अशी नियती आहे."

बलरामाने आकाशवाणी ऐकली. त्याने जरासंधाला मारले नाही. त्याने त्याला पाशांनी रथाशी बांधले, आणि रथ मथुरेकडे चालविला. जरासंधाला पकडले असे कळताच त्याचे उरलेले सैन्य पराभूत झाले. शिशूपाल, वक्रदंत इत्यादी लोकांनी माघार घेतली. कृष्ण बलरामाला म्हणाला- "तू या जरासंधाला सोडून दे. त्याला जी चीड आहे त्यामुळे तो पुन्हा पुष्कळ दैत्य सेना जमवील आणि मथुरेवर चाल करून येईल. मग आपण भूमीचा भार उतरू"

बलरामाने जरासंधाचा अपमान केला आणि त्याला सोडून दिले ! तो फार दुःख करीतच गेला. त्याने बावीस हजार राजांना बंदीत टाकले होते, पण आज तरुण बलरामाकडून त्याला पराभव व अपमानास्पद जीवदान मिळाले ! त्याला रुक्मी, शिशुपाल, वक्रदंत इत्यादी वीरांनी धीर दिला आणि पुन्हा सैन्य जमवून मथुरेवर हल्ला करू असा विश्वास निर्माण केला.

आणि कंस वधाचा सूड घेण्याच्या इच्छेने जरासंधाने पुन्हा लक्षावधी सैन्य जमवून मथुरा नगरी पादाक्रांत करण्याचा प्रयत्‍न केला. पण कृष्ण व बलराम यांनी त्याचे सैन्य मारून त्याचा पराभव केला. त्यानंतर जरासंधाने वारंवार हल्ले केले पण प्रत्येक वेळी त्याचा पराभव झाला. सतरा वेळा प्रचंड सैन्याचा संहार करून रामकृष्णांनी मथुरेतील उग्रसेनाचे राज्य राखले । आणि अवताराचा हेतू तडीस नेला ! दैत्यच क्षत्रियरूपाने जन्मास आलेले होते. त्यांचा भूमातेला भार झाला होता !

इतके पराभव झाले तरी जरासंध निराश झाला नाही. त्याने कालयवन नावाच्या राजाला आपल्या मदतीला बोलावले. गर्ग मुनींची पूर्वी यादवांनी चेष्टा केली होती. तेव्हा त्या मुनींनी असा शाप दिला होता "यादवांनो ! मला असा एक पुत्र होईल की तो यादवांचा पूर्ण पराभव करील ! कालयवन हाच तो पुत्र. गर्ग मुनींपासून एका म्लेंच्छ स्त्रीच्या उदरी तो जन्मला होता. यादवांना तो भारी होता. यादवांचा त्याच्या हातून पराभव होईल हे जरासंधाला माहीत होते.

कालयवन आणि जरासंध यांनी मिळून मथुरेला वेढा दिला. फार मोठे सैन्य जमले होते. तीन कोटी यावनी सेना आली होती. त्यांपुढे आपल्या मथुरावासी लोकांचा धुव्वा उडेल हे समजून कृष्णाने सागराची प्रार्थना केली. "नवी नगरी निर्माण करायला तुझ्या जवळ जागा दे." सागराने जंबुद्धीपाच्या पश्चिम दिशेच्या किनार्‍याजवळ जागा दिली. कृष्णाने योगशक्तीने एकाच खांबावर तेथे मोठे नगर बसविले. यादवांना मोहनिद्रा आणून सर्वांना आकाशमार्गाने गुप्तपणे त्या नगरात नेले. त्या नगराचे नाव 'द्वारका' ठेवले. यादव सकाळी जागे झाले ते मुळी नव्या नगरांत ! आणि कृष्ण मात्र कुठेच दिसेना.

इकडे कृष्णाने मथुरेतील सर्वांना पाठवून दिल्यावर सर्व महाद्वारे उघडी टाकली. कालयवनाच्या सैन्यासमोरूनच तो पळून जाऊ लागला. एकही शस्त्र त्याने जवळ ठेवले नाही. त्याने स्मरण करताच ती प्रगट होऊ शकत होती ! कालयवनाला कळले, 'कृष्ण पळून जात आहे, एकटाच आहे, निःशस्त्र आहे ?' त्याला पकडायला कालयवनही धावला. कृष्णाने त्याला झुलवीत खूप दूर नेले. मधून मधून गुप्त होऊन मध्येच तो प्रगट होई. कित्येक पर्वत, दर्‍या व नद्या ओलांडल्या पण कृष्ण सापडेना. दक्षिण भारतात कृष्ण आला. कृष्णा व वेण्या नदीच्या संगमावर परशुराम त्यावेळी रहात होता. कृष्णाने त्याच्या आश्रमात जाऊन गुप्तपणे त्याची भेट घेतली. तेथून कृष्ण पश्चिम समुद्राच्या दिशेने गेला. पर्वताच्या एका गुहेत तो शिरला. इतका सारा वेळ आपण कालयवनाच्या दृष्टीच्या टप्यात रहावे अशी युक्ती मात्र कृष्णाने केली. कृष्ण गुहेत गेला हे पाहून कालयवनही त्या पर्वतावर चढून गेला.

ती गुहा पुरातन होती. तीत मांधात्याचा पुत्र मुचकुंद राजा विश्रांती घेत निजला होता. पूर्वी देवांच्या व दैत्यांच्या युद्धात तो देवांचा सेनापती होता. तो विजयी झाला. पण लढता लढता थकला. इंद्राने त्याला विश्रांती घेण्यास सांगितले, आणि वरदान दिले की "राजन् तुमची निदा जो भंग करील त्यावर तुमची दृष्टी पडतांच तो जळून भस्म होईल." त्रेतायुगापासून तो राजा चिरकाल निद्रा घेत होता. कृष्ण गुहेत शिरला आणि अंधारात सूक्ष्म रूपाने लपून बसला. त्या आधी त्याने आपला भरजरी शेला मुचकुंदाच्या अंगावर पांघरूण म्हणून घातला.

कालयवन धावत, धापा टाकीत गुहेत शिरला. बाहेरच्या प्रकाशातून एकदम गुहेतील मंद प्रकाशात येताच त्याला तो शेला दिसला. कृष्णच लपून झोपेचे सोंग करून पडला आहे असे त्याला वाटले. त्याने 'कृष्णाला' समजून मुचकुंदालाच जोराने लाथ मारली आणि म्हटले- " अरे पळपुट्या ! मला भिऊन इथे येऊन लपून बसला आहेस नाही का ? ऊठ ! चल, हो युद्धाला तयार ?'

आणि मुचकुंद एकदम जागा होऊन उठून बसला. त्याने डोळे उघडून पाहिले तो समोर धिप्पाड कृष्णवर्ण यवन राजा उभा ! पण त्याच्यावर नजर जातांच तो उभाच जळू लागला. त्याने एकच आरोळी ठोकली आणि तो गतप्राण झाला. चारपाच पळांतच कालयवनाच्या शरीराची राख झाली ! मुचकुंद भानावर आला. आपण फार काळ निजलो होतो असे त्याला जाणवले. इंद्राच्या वरदानाची त्याला आठवण झाली. आपल्या दृष्टिपातानेच हा कुणीतरी दुष्ट यवन जळून मेला असे त्याच्या लक्षात आले. आता त्याचे लक्ष गुहेत इतरत्र गेले, आपल्या अंगावरच्या दिव्य वस्त्राकडे गेले. मग गुहेच्या एका कोपर्‍यात दिव्य प्रकाश पडला असून तो मोठा होत आहे, त्या प्रकाशात शंखचक्रगदा-पद्य धारण केलेला श्रीविष्णू सर्व भूषणांनी युक्त असा उभा आहे असे दर्शन त्याला झाले ! त्यावेळी मुकुंदाने उठून विष्णूला वंदन केले. तेव्हा कृष्णाने आपले द्विभुज रूप धारण केले. मुकुंदाने त्याची अनेक प्रकारे स्तुती केली. कृष्णाने आपल्या अवताराची त्याला माहिती सांगितली व म्हटले- "राजर्षे ! आता तू बदरिकाश्रमात जाऊन तपश्चर्या कर ! द्वापर युगाचाही अंत जवळ आला आहे. लवकरच कलियुगाला प्रारंभ होईल. यापुढे कोणतेही हिंसाकर्म न करता तू मोक्षमार्गाची साधना कर. द्वापर युगान्तसमयी पृथ्वीवर दैत्य फार माजले असून मी पूर्ण वैष्णवी शक्तीने युक्त होऊन त्यांचा संहार करण्यासाठी अवतरलो आहे."

कृष्णाची आज्ञा मानून मुचकुंद गुहेच्या बाहेर आला. त्याला सर्व वृक्ष लहान, खुरटे दिसले. युगधर्माप्रमाणे वनस्पती खुरट्या झाल्या होत्या. माणसेही त्याला बुटकी दिसली. मुचकुंद चकित झाला. कृष्णाने त्याला सांगितल्याप्रमाणे तो बदरिकाश्रमास निघून गेला.

कृष्णामागोमाग बलरामही त्या पर्वतावर काही वेळाने येऊन पोहोचला. जरासंध, शिशुपाल व त्यांचे सैन्य उत्तर भारतातून दक्षिणेत ठिकठिकाणी मुक्काम करीत, बलरामाचा पाठलाग करीत आले. तेही त्या पर्वताच्या पायथ्यापर्यंत पोहोचले. एवढे दूर येताना त्या सैन्याचे फार हाल झाले. कित्येक सैनिक वाटेतच मरण पावले. जरासंधाला राम व कृष्ण त्या पर्वतावर दिसताच त्याने ओरडून विचारले "कालयवन कुठे गेला ?" तेव्हा कृष्णाने उत्तर दिले- "तो केहाच जळून मेला !" तेव्हा जरासंधाने संतप्त होऊन त्या पर्वतालाच चारी बाजूनी आग लावली ! म्हणजे राम व कृष्ण त्या आगीत जळून मरावेत. पण कृष्णाने गरुडाचे स्मरण केले आणि तो आकाशातून येऊन त्या पर्वतावर उतरला. त्यावर बसून राम व कृष्ण गगनमार्गे तेथून जे निसटले ते मथुरेच्या दिशेने गेले. गरूडामागोमाग जरासंध पुन्हा सैन्यासह उत्तरेकडे वळला आता मात्र त्याच्या सैन्याचा संहार कृष्णाने सुदर्शन चक्राने केला. जरासंध बलहीन होऊन कसाबसा मगधास गेला.

मथुरेत जाऊन कृष्णाने बलरामाबरोबर मथुरेतील सर्व धनसंपत्ती व यादवांच्या नित्योपयोगी वस्तू द्वारकेस नेल्या. जरासंधाने याही वेळी त्याना अडविले, पण रामकृष्णांनी त्याचा पराभव केला. द्वारकेत कृष्ण येताच सर्व यादवांना फारच आनंद झाला ! मथुरेतील अपार धन मिळताच यादवांनी उत्सव समारंभ केले.

आनर्त देशाचा राजा रैवत नावाचा होता. त्याची कन्या रेवती ही उपवर झाली होती. तिला योग्य वर कोणता असे रैवताने ब्रह्मदेवालाच विचारले. तेव्हा मथुरेतील कृष्णाचा अग्रज बलराम हाच योग्य वर आहे असे ब्रह्मदेवाने सांगितले. तेव्हा रेवती-बलराम विवाह मोठ्या थाटात झाला. बलरामाला रैवताने खूप संपत्ती आंदण म्हणून दिली ! रुक्मिणी-स्वयंवराची कथा यापुढील अध्यायात श्रवण करावी.
अध्याय २२ समाप्त.
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


GO TOP