॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ देविगीता ॥

॥ अथ प्रथमोऽध्यायः - अध्याय पहिला - देविस्तवनम् ॥

हिमालय उवाच -
योगं च भक्तिसहितं ज्ञानं च श्रुतिसंमतम् ।
वदस्व परमेशानि त्वमेवाहं यतो भवेः ॥
व्यास उवाच -
इति तस्य वचः श्रुत्वा प्रसन्नमुखपङ्कजा ।
वक्तुमारभताम्बा सा रहस्यं श्रुतिगूहितम् ॥
हिमालय म्हणाला, हे परमेश्वरि, ज्याच्या योगाने मी त्वद्‌रूप होईन असा श्रुतिसंमत व भक्तियुक्त योग मला सांग. व्यास म्हणाले, ह्याप्रमाणे त्याचे भाषण श्रवण करून तिचे मुखकमल प्रसन्न झाले व त्या अंबेनें श्रुतींतील गुप्त रहस्य सांगण्यास आरंभ केला.

देव्युवाच -
शृण्वन्तु निर्जराः सर्वे व्याहरन्त्या वचो मम ।
यस्य श्रवणमात्रेण मद्‌रूपत्वं प्रपद्यते ॥ १ ॥
देवी म्हणाली, भाषण करीत असलेल्या माझे वचन सर्व देवांनी ऐकावे. याच्या केवळ श्रवणानेच प्राण्याला मद्‌रूपाची प्राप्ति होते. १.

अहमेवास पूर्वं मे नान्यत्किञ्चिन्नगाधिप ।
तदात्मरूपं चित्संवित्परब्रह्मैकनामकम् ॥ २ ॥
हे पर्वतश्रेष्ठा, सृष्टीच्या पूर्वी त्रिविधभेदशून्य अशी मीच होते. दुसरे साकार किंवा निराकार असें कांहीं नव्हते. त्या माझ्या रूपालाच आत्मरूप, चित्, संवित्, परब्रह्म अशी नांवे आहेत. २.

अप्रतर्क्यमनिर्देश्यमनौपम्यमनामयम् ।
तस्य काचित्स्वतःसिद्धा शक्तिर्मायेति विश्रुता ॥ ३ ॥
त्या रूपाविषयी काहीं तर्क करतां येत नाहीं; त्याचा कसाही निर्देश करतां येत नाही; तदितर दुसरा पदार्थच नसल्यामुळे त्याला कशाचीही उपमा देता येत नाही व जनन, अस्तित्व इत्यादि सहा भावविकारांनी ते रहित असे आहे. त्याची स्वतःसिद्ध व निर्वचनीय अशी शक्ति माया या नावाने प्रसिद्ध आहे. ३.

न सती सा नासती सा नोभयात्मा विरोधतः ।
एतद्विलक्षणा काचिद्वस्तुभूताऽस्ति सर्वदा ॥ ४ ॥
ती सत् (कालत्रयीं बाध न पावणारी) नाहीं व असत् (वंध्यापुत्र, शशशंग, खपुष्प यांप्रमाणे) नाहीं व सदसदही नाही. कारण, एकच पदार्थ उभय स्वरूपाचा असणे अनुभवविरुद्ध आहे. सारांश, माया ही सर्वदा सत् , असत् व सदसत् यांहून अगदी निराळ्या लक्षणाची, अनिर्वचनीय व भावरूप अशी आहे. ४.

पावकस्योष्णतेवेयमुष्णांशोरिव दीधितिः ।
चन्द्रस्य चन्द्रिकेवेयं ममेयं सहजा ध्रुवा ॥ ५ ॥
अग्नीच्या उष्णतेप्रमाणे, सूर्याच्या किरणांप्रमाणे व चंद्राच्या चांदण्याप्रमाणे ही माझी मनाची शक्ति सहज अकृत्रिम व नित्य (मोक्षापर्यंत सतत रहाणारी) आहे. ५.

तस्यां कर्माणि जीवानां जीवाः कालाश्च सञ्चरे ।
अभेदेन विलीनाः स्युः सुषुप्तौ व्यवहारवत् ॥ ६ ॥
सुषुप्तींत जसा सर्व व्यवहार लीन होतो त्याप्रमाणे प्रलयकाली जीव, त्यांची कर्में व काल हीं या मायेमध्ये एकरूपानें लीन होतात. ६.

स्वशक्तेश्च समायोगादहं बीजात्मतां गता ।
स्वधारावरणात्तस्या दोषत्वं च समागतम् ॥ ७ ॥
ह्या जीवादिकांच्या योगाने विशिष्ट झालेल्या मायेच्या संसर्गामुळे मी निर्गुण असतांनाही जगाचे कारण होते. माझी शक्ति मला जरी मोहित करू शकत नाहीं तरी जीवांची अज्ञानसंज्ञक शक्ति त्यांना मोहित करते आणि स्वतःच्या आधारभूत अशा आत्म्याला आच्छादित करीत असत्यामुळेच तिच्या ठिकाणी दोषत्व येतें ( म्हणजे ती दोषी ठरते.) ७.

चैतन्यस्य समायोगान्निमित्तत्वं च कथ्यते ।
प्रपञ्चपरिणामाच्च समवायित्वमुच्यते ॥ ८ ॥
व्यवहारांतील कार्यांप्रमाणे या प्रपंचकार्याचे उपादानकारण निमित्तकारणाहून निराळे नाहीं, तर मायेच्या संसर्गाने चैतन्याच्या ठिकाणी निमित्तकारणता येते. म्हणजे मायेमध्ये प्रतिबिंबित झालेल्या चैतन्याभासाला घटकर्त्या कुंभाराप्रमाणे निमित्त कारण म्हणतात व प्रपंचरूपाने परिणाम पावल्यामुळे मायेला त्याचे उपादान कारण असे म्हणतात. ८

केचित्तां तप इत्याहुस्तमः केचिज्जडं परे ।
ज्ञानं माया प्रधानं च प्रकृतिं शक्तिमप्यजाम् ॥ ९ ॥
(अर्थात् या उभयतांनाही कारण होणार्‍या शुद्धचैतन्याला त्याचे विवर्तोपादान असें म्हणावे लागते ). कांहीं वैदिक शाखाध्यायी तिला तप असें म्हणतात; कोणी तम म्हणतात व अन्य जड असे म्हणतात, ज्ञान, माया, प्रधान, प्रकृति, शक्ति व अजा अशींही तिला नांवें आहेत. ९.

विमर्श इति तां प्राहुः शैवशास्त्रविशारदाः ।
अविद्यामितरे प्राहुर्वेदतत्त्वार्थचिन्तकाः ॥ १० ॥
शैवशास्त्रांत निपुण असणारे तिला विमर्श असे म्हणतात व इतर वेदाच्या तत्त्वार्थाचे चिंतन करणारे तिला अविद्या असेही नांव देतात. १०.

एवं नानाविधानि स्युर्नामानि निगमादिषु ।
तस्याजडत्वं दृश्यत्वाज्ज्ञाननाशात्ततोऽसती ॥ ११ ॥
सारांश, ह्याप्रमाणे वेदादिकांमध्ये तिची नानाप्रकारचीं नांवें प्रसिद्ध आहेत. दृश्यत्व हा धर्म तिच्या ठिकाणी असल्यामुळे ती जड व तिच्या अधिष्ठानाचे ज्ञान होताच तिचा बाध होत असल्यामुळे ती मिथ्या आहे. ११

चैतन्यस्य न दृश्यत्वं दृश्यत्वे जडमेव तत् ।
स्वप्रकाशं च चैतन्यं न परेण प्रकाशितम् ॥ १२ ॥
दृश्यत्व हा धर्म चैतन्याच्या ठिकाणीं नाहीं. कारण, ते जर दृश्य असते तर जड झाले असते. कारण, जें जें दृश्य तें तें जड असा न्याय आहे. तस्मात्, चैतन्य हे स्वयंप्रकाश व दुसर्‍या कोणाकडून प्रकाशित न होणारे असे आहे. १२.

अनवस्थादोषसत्त्वान्न स्वेनापि प्रकाशितम् ।
कर्मकर्तृविरोधः स्यात्तस्मात्तद्दीपवत्स्वयम् ॥ १३ ॥
प्रकाशमानमन्येषां भासकं विद्धि पर्वत ।
अत एव च नित्यत्वं सिद्धं संवित्तनोर्मम ॥ १४ ॥
ते स्वतःच स्वतःला प्रकाशित करते असे जर म्हणावे तर अनवस्थादोष येतो. म्हणून ते स्वत:कडून प्रकाशित होणारेंही नव्हे. शिवाय असे मानल्यास क्रियेचा जो कर्ता तेच कर्म असा कर्तृकर्मदोष येतो. यास्तव, पर्वता, हे चैतन्य दीपाप्रमाणे स्वयंप्रकाश व अन्य सर्वांचे भासक आहे. त्यामुळेच संविद्‌रूप म्हणजे ज्ञानरूप अशा माझे नित्यत्व (भूत, भविष्य व वर्तमान अथवा उत्पत्ति, स्थिति व लय या त्रिकालीं बाधित न होणे हा धर्म ) सिद्ध होते. १३-१४.

जाग्रत्स्वप्नसुषुप्त्यादौ दृश्यस्य व्यभिचारतः ।
संविदो व्यभिचारश्च नानुभूतोऽस्ति कर्हिचित् ॥ १५ ॥
जाग्रत्, स्वप्न व सुषुप्ति या तिन्ही अवस्थांत अनुभवास येणार्‍या पदार्थांचा व्यभिचार होतो. म्ह० एका अवस्थेतले पदार्थ दुसर्‍यांत नसतात, दुसर्‍यांतले तिसर्‍यांत नसतात इत्यादि प्रकार घडतो. पण चैतन्याचा असा व्यभिचार होत असल्याचे कधीच अनुभवास येत नाहीं. कारण, मी एक प्रहर जागृत होतों, नंतर मी निद्रित झालो, त्यानंतर मी अमुक अमुक स्वप्न पाहिले, इत्यादिप्रकारे अहंतेचा सर्व अवस्थांत सारखाच अनुभव येत असतो. १५.

यदि तस्याप्यनुभवतर्ह्ययं येन साक्षिणा ।
अनुभूतः स एवात्र शिष्टः संविद्वपुः पुरा ॥ १६ ॥
बरें, या संवित्‌चाही व्यभिचार अनुभवास येतो असे जरी म्हटले तरी ज्या साक्षीने त्याचा अनुभव घेतला तो ज्ञानरूप पुनः अवशिष्ट राहिलाच. तस्मात्, साक्षिज्ञान नित्य आहे असेच म्हणावे लागते. १६.

अत एव च नित्यत्वं प्रोक्तं सच्छास्त्रकोविदैः ।
आनन्दरूपता चास्याः परप्रेमास्पदत्वतः ॥ १७ ॥
एवढ्याच करितां सच्छास्त्रज्ञ पंडितांनी हा नित्य आहे असे सांगितले आहे. व्यवहारांतल्या इतर कोणत्याही पदार्थापेक्षा त्याविषयी प्राण्याला अधिक प्रेम वाटत असल्यामुळे हा परमप्रेमाचे स्थान आहे व १७.

मा न भूवं हि भूयासमिति प्रेमात्मनि स्थितम् ।
सर्वस्यान्यस्य मिथ्यात्वादसङ्‌गत्वं स्फुटं मम ॥ १८ ॥
हा परमप्रेमाचे स्थान असल्यामुळे आनंदरूपही आहे. कारण, मी कधीं नसावे असे नाही, तर सर्वदा असावेंच असे प्राण्याचे आत्म्याविषय प्रेम असते. इतर सर्व मिथ्या असल्यामुळे माझे असंगत्वही स्पष्ट होते. कारण, मिथ्या व सत्य यांचा संगसंसर्ग होणे शक्य नाहीं. १८.

अपरिच्छिन्नताप्येवमत एव मता मम ।
तच्च ज्ञानं नात्मधर्मो धर्मत्वे जडताऽऽत्मनः ॥ १९ ॥
त्यामुळे माझी अपरिच्छिन्नता, निःसीमता, अमर्यादपणा विद्वानांना मान्य आहे. ते स्वरूपज्ञान आत्म्याचा धर्म नव्हे. कारण, त्याचा हा धर्म आहे असे मानल्यास त्याच्या ठिकाणी जडता येईल. १९.

ज्ञानस्य जडशेषत्वं न दृष्टं न च संभवि ।
चिद्धर्मत्वं तथा नास्ति चितश्चिन्न हि भिद्यते ॥ २० ॥
बरें, हा चैतन्यरूप आत्मा जडाचाच भाग आहे असे म्हणावे तर चैतन्याचा चैतन्याशीच भेद होणे शक्य नसल्यामुळे ते त्याचा धर्म होत नाहीं. २०.

तस्मादात्मा ज्ञानरूपः सुखरूपश्च सर्वदा ।
सत्यः पूर्णोऽप्यसङ्‌गश्च द्वैतजालविवर्जितः ॥ २१ ॥
तस्मात्, आत्मा सर्वदा ज्ञानरूप व सुखरूप आहे. तो सत्य आहे, पूर्ण असूनही असंग आहे व सर्व द्वैतसमुदायशून्य आहे. २१.

स पुनः कामकर्मादियुक्तया स्वीयमायया ।
पूर्वानुभूतसंस्कारात्कालकर्मविपाकतः ॥ २२ ॥
अविवेकाच्च तत्त्वस्य सिसृक्षावान्प्रजायते ।
अबुद्धिपूर्वः सर्गोऽयं कथितस्ते नगाधिप ॥ २३ ॥
पुनरपि तो आत्मा पूर्व सृष्टीच्या अनुभवाचा संस्कार, कालामुळे होणारा कर्मांचा परिपाक (फलोन्मुखत्व) व तत्त्वाचा आविवेक यांच्या योगाने सृष्टि निर्माण करावी अशी इच्छा झाली असतां इच्छा, अदृष्टाख्य कर्म इत्यादिकांनी युक्त असलेली जी माया तिच्या योगाने स्वतःच उत्पन्न होतो. असो. हे पर्वतश्रेष्ठा, प्राणी सुषुप्तींतून जागृतींत जसे अबुद्धिपूर्वक येतात त्याचप्रमाणे अबुद्धिपूर्वक हा संसार कसा होतो ते मी तुला सांगितले आहे. २२-२३.

एतद्धि यन्मया प्रोक्तं मम रूपमलौकिकम् ।
अव्याकृतं तदव्यक्तं मायाशबलमित्यपि ॥ २४ ॥
प्रोच्यते सर्वशास्त्रेषु सर्वकारणकारणम् ।
तत्त्वानामादिभूतं च सच्चिदानन्दविग्रहम् ॥ २५ ॥
सर्वकर्मघनीभूतमिच्छाज्ञानक्रियाश्रयम् ।
ह्रीङ्‌कारमन्त्रवाच्यं तदादितत्त्वं तदुच्यते ॥ २६ ॥
हे माझे अलौकिक रूप मी तुला सांगितले त्याला अव्याकृत, अव्यक्त, मायाशबल, सर्व कारणांचें कारण, सर्व तत्त्वांचे उत्पत्तिस्थान, सच्चिदानंदरूप, सर्वकर्मघनीरूप, सर्वांच्या कर्माचा साक्षी आणि इच्छा, ज्ञान व क्रिया यांचा आश्रय (अधिष्ठान) असे सर्व शास्त्रांत म्हणतात, त्यालाच र्‍हींकारशब्दाचा वाच्यार्थ व आदितत्त्व असेही झटले आहे. २४-२६.

तस्मादाकाश उत्पन्नः शब्दतन्मात्ररूपकः ।
भवेत्स्पर्शात्मको वायुस्तेजो रूपात्मकं पुनः ॥ २७ ॥
त्या आदितत्त्वापासून शब्दतन्मात्ररूप सूक्ष्म अपंचीकृत आकाश झाले; त्याच्यापासून स्पर्शात्मक वायु, वायूपासून रूपात्मक तेज २७

जलं रसात्मकं पश्चात्ततो गन्धात्मिका धरा ।
शब्दैकगुण आकाशो वायुः स्पर्शरवान्वितः ॥ २८ ॥
शब्दस्पर्शरूपगुणं तेज इत्युच्यते बुधैः ।
शब्दस्पर्शरूपरसैरापो वेदगुणाः स्मृताः ॥ २९ ॥
शब्दस्पर्शरूपरसगन्धैः पञ्चगुणा धरा ।
तेभ्योऽभवन्महत्सूत्रं यल्लिङ्‌गं परिचक्षते ॥ ३० ॥
तेजापासून रसात्मक जल व शेवटीं जलापासून गंधात्मिका पृथ्वी झाली. आकाशाचा शब्द हा एकच गुण आहे. वायु, स्पर्श व शब्द या दोन गुणांनी युक्त असतो. तेज, शब्द स्पर्श व रूप या तीन गुणांनी युक्त आहे असे पंडित सांगतात. शब्द, स्पर्श, रूप व रस हे चार गुण उदकांत असतात असे वचन आहे आणि पृथ्वीचे शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध असे पांच गुण आहेत. त्या सूक्ष्म भूतांपासून व्यापक सूत्रात्मा झाला, त्याला लिंग अशी संज्ञा आहे. २८-३०.

सर्वात्मकं तत्सम्प्रोक्तं सूक्ष्मदेहोऽयमात्मनः ।
अव्यक्तं कारणो देहः स चोक्तः पूर्वमेव हि ॥ ३१ ॥
यस्मिञ्जगद्‌बीजरूपं स्थितं लिङ्‌गोद्‌भवो यतः ।
ततः स्थूलानि भूतानि पञ्चीकरणमार्गतः ॥ ३२ ॥
पञ्च सङ्ख्यानि जायन्ते तत्प्रकारस्त्वथोच्यते ।
पूर्वोक्तानि च भूतानि प्रत्येकं विभजेद्‌द्विधा ॥ ३३ ॥
ते सूत्र सर्वात्मक (सर्वप्राणरूप) आहे असे सांगितलेले असून हा आत्म्याचा सूक्ष्म देह आहे. ज्याच्यामध्ये जगत् बीजरूपाने रहाते व जेथून लिंगदेहाची उत्पत्ति होते ते पूर्वोक्त अव्यक्तच त्याचा कारण देह होय. पंचीकृत भूतांची उत्पत्ति झाल्यानंतर पांच स्थूलभूते निर्माण होतात. पण पंचीकरणाचा प्रकार प्रथम सांगतो. पूर्वोक्त सूक्ष्म भूतांचे प्रत्येकी दोन भाग करावे. ३१-३३;

एकैकं भागमेकस्य चतुर्धा विभजेद्‌गिरे ।
स्वस्वेतरद्वितीयांशे योजनात्पञ्च पञ्च ते ॥ ३४ ॥
नंतर त्यांतील प्रत्येकाच्या एक एक भागाचे, हे पर्वता, चार चार विभाग करावे व एका भूताच्या अर्धात त्याहून इतर चार भूतांचे चतुर्थांश मिळविले असतां ते पांच पांच होतात. ३४.

तत्कार्यं च विराड् देहः स्थूलदेहोऽयमात्मनः ।
पञ्चभूतस्थसत्त्वांशैः श्रोत्रादीनां समुद्‌भवः ॥ ३५ ॥
ज्ञानेन्द्रियाणां राजेन्द्र प्रत्येकं मीलितैस्तु तैः ।
अन्तःकरणमेकं स्याद्वृत्तिभेदाच्चतुर्विधम् ॥ ३६ ॥
त्या पंचीकृत भूतांचे विराटदेह हें कार्य आहे. हाच आत्म्याचा (परमेश्वरीचा) स्थूल देह होय. पांच भूतांच्या पृथक् सत्त्वांशापासून श्रोत्रादि ज्ञानेंद्रियांची उत्पत्ति होते व सर्वांच्या सत्त्वांशापासून एक अंत:करण निर्माण होते. वृत्तींच्या पृथकपणामुळे ते चार प्रकारचे झाले आहे. ३५-३६.

यदा तु सङ्‌कल्पविकल्पकृत्यं
     तदा भवेत्तन्मन इत्यभिख्यम् ।
स्याद्बुद्धिसंज्ञं च यदा प्रवेत्ति
     सुनिश्चितं संशयहीनरूपम् ॥ ३७ ॥
अनुसन्धानरूपं तच्चित्तं च परिकीर्तितम् ।
अहङ्‌कृत्याऽऽत्मवृत्या तु तदहङ्‌कारतां गतम् ॥ ३८ ॥
ज्या वेळी ते संकल्प व विकल्प करते तेव्हां त्याला मन अशी संज्ञा प्राप्त होते, ज्यावेळी ते दृढ़ निश्चयाने जाणते व त्याचे संशयरहित असे रूप असते, तेव्हा त्याला बुद्धि हें नांव देतात. जेव्हां तें चिंतन करू लागते तेव्हां त्याला चित्त असे झटलें आहे व अहंकाररूपाने जेव्हां तें 'अहं' असा अभिमान धरते तेव्हा त्यालाच अहंकार असें म्हणतात. ३७-३८.

तेषां रजोंऽशैर्जातानि क्रमात्कर्मेन्द्रियाणि च ।
प्रत्येकं मीलितैस्तैस्तु प्राणो भवति पञ्चधा ॥ ३९ ॥
पांच भूतांच्या निरनिराळ्या रजोगुणापासून क्रमानें पांच कर्मेंद्रियें व त्यांच्या रजोगुणसमूहापासून पांच प्रकारचा प्राण होतो. ३९.

हृदि प्राणो गुदेऽपानो नाभिस्थस्तु समानकः ।
कण्ठदेशेप्युदानः स्याद्‌व्यानः सर्वशरीरगः ॥ ४० ॥
प्राण हृदयामध्ये, अपान गुदामध्ये, समान नाभीमध्ये, उदान कंठामध्ये व व्यान सर्व शरीरामध्ये असतो. ४०.

ज्ञानेन्द्रियाणि पञ्चैव पञ्च कर्मेन्द्रियाणि च ।
प्राणादि पञ्चकं चैव धिया च सहितं मनः ॥ ४१ ॥
ज्ञानेंद्रियें, पांचही कर्मेंद्रियें, पांच प्राण व मनासहवर्तमान बुद्धि ४१

एतत्सूक्ष्मशरीरं स्यान्मम लिङ्‌गं यदुच्यते ।
तत्र या प्रकृतिः प्रोक्ता सा राजन्विविधा स्मृता ॥ ४२ ॥
ह्यांच्या समुदायाने माझे लिंग शरीर म्हणून ज्याला म्हणतात ते सूक्ष्म शरीर होते. आतां पूर्वी जी प्रकृति सांगितली ती, हे पर्वतराजा, दोन प्रकारची आहे, असे सांगितलेले आहे ४२.

सत्त्वात्मिका तु माया स्यादविद्या गुणमिश्रिता ।
स्वाश्रयं या तु संरक्षेत्सा मायेति निगद्यते ॥ ४३ ॥
जी सत्त्वरूप असते ती माया व रज व तम या गुणांनीं जी युक्त असते ती अविद्या होय. स्वतःचा आश्रय असें चैतन्य त्याला जी आच्छादित करीत नाहीं तिला माया असें म्हणतात. ४३.

तस्यां यत्प्रतिबिम्बं स्याद्‌बिम्बभूतस्य चेशितुः ।
स ईश्वरः समाख्यातः स्वाश्रयज्ञानवान् परः ॥ ४४ ॥
तिच्यामध्ये बिंबभूत (बिंबस्थानीय) नियंत्याचें जें प्रतिबिंब पडते त्याला ईश्वर अशी संज्ञा आहे, त्याला स्वत:च्या आश्रयभूत व्यापक ब्रह्माचें ज्ञान असते व म्हणूनच तो श्रेष्ठ, ४४.

सर्वज्ञः सर्वकर्ता च सर्वानुग्रहकारकः ।
अविद्यायां तु यत्किञ्चित्प्रतिबिंबं नगाधिप ॥ ४५ ॥
सर्वज्ञ, सर्वकर्ता व सर्वांवर अनुग्रह करणारा आहे. हे पर्वताधिपते, अविद्येपासून पडणारें जें प्रतिबिंब ४५

तदेव जीवसंज्ञं स्यात्सर्वदुःखाश्रयं पुनः ।
द्वयोरपीह सम्प्रोक्तं देहत्रयमविद्यया ॥ ४६ ॥
त्याचेच जीव हे नांव आहे, तेच सर्व दु:खाचे आश्रयस्थान होय. अविद्येमुळे या उभयतांनाही तीन देह असतात असे सांगितलेले आहे. ४६.

देहत्रयाभिमानाच्चाप्यभून्नामत्रयं पुनः ।
प्राज्ञस्तु कारणात्मा स्यात्सूक्ष्मदेही तु तैजसः ॥ ४७ ॥
या देहत्रयावर अभिमान ठेवल्यामुळे जीवभूत चैतन्याला तीन नांवें प्राप्त होतात. कारणदेहरूप होणार्‍यास प्राज्ञ, सूक्ष्म देहाभिमान्यास तैजस ४७

स्थूलदेही तु विश्वाख्यस्त्रिविधः परिकीर्तितः ।
एवमीशोऽपि सम्प्रोक्त ईशसूत्रविराट्पदैः ॥ ४८ ॥
व स्थूल देहात्मक होणार्‍यास विश्व अशी संज्ञा प्राप्त होते. सारांश, तो तीन प्रकारचा आहे असे सांगितलेले आहे, तसेच ईश्वर, सूत्र व विराट या शब्दांनीं ईशाचाही निर्देश केलेला आहे. ४८.

प्रथमो व्यष्टिरूपस्तु समष्ट्यात्मा परः स्मृतः ।
स हि सर्वेश्वरः साक्षाज्जीवानुग्रहकाम्यया ॥ ४९ ॥
करोति विविधं विश्वं नानाभोगाश्रयं पुनः ।
मच्छक्तिप्रेरितो नित्यं मयि राजन्प्रकल्पितः ॥ ५० ॥
जीव हा व्यष्टि (व्यक्ति) रूप व ईश्वर समष्टि ( समूह ) रूप आहे असे आप्तवचन आहे. माझ्या शक्तीने सतत प्रेरित होणारा व हे श्रेष्ठा, माझ्याच ठिकाणीं कल्पिलेला असा तो सर्वेश्वरच साक्षात् जीवावर अनुग्रह करण्याच्या इच्छेने नाना प्रकारच्या भोगांचे आश्रयस्थान असे हें विचित्र जग निर्माण करतो. ४९-५०.

इति श्रीदेवीभागवते देवीगीतायां प्रथमोऽध्यायः ॥
॥ पहिला अध्याय समाप्त ॥ १ ॥



GO TOP