॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥

॥ अर्थात् श्रीमद् भगवद्‌गीतेवरील मराठी टीका ॥

। अथ षष्ठोऽध्यायः - अध्याय सहावा


आत्मसंयमयोगः




[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



मग रायातें म्हणे संजयो । तोचि अभिप्रावो अवधारिजो ।
कृष्ण सांगती आतां जो । योगरूप ॥६-१॥
मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला - कृष्ण जो पाचव्या अध्यायात दाखवलेला योगरूप अभिप्राय अर्जुनाला सांगतील तो ऐका. ॥६-१॥

सहजें ब्रह्मरसाचें पारणें । केलें अर्जुनालागीं नारायणें ।
कीं तेचि अवसरीं पाहुणे । पातलों आम्ही ॥६-२॥
श्रीकृष्णांनी अर्जुनास ब्रह्मज्ञानाचे पारणे (आजपर्यंतच्या अज्ञानरूपी उपासानंतर ज्ञानामृताची मेजवानी) केले, त्या समयी आम्ही सहजगत्या पाहुणे म्हणून प्राप्त झालो. ॥६-२॥

कैसी दैवाची आगळिक नेणिजे । जैसें तान्हेलिया तोय सेविजे ।
कीं तेंचि चवी करूनि पाहिजे । तंव अमृत आहे ॥६-३॥
आमचे दैव किती थोर आहे हे कळत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या तहानलेल्या पुरुषाने पाणी पिण्य़ास लागावे व पाण्याचा घोट घेऊन त्याची रुचि पहावी, तो त्यास ते पाणी नसून अमृत आहे असे समजावे. ॥६-३॥

तैसें आम्हां तुम्हां जाहलें । जे आडमुठीं तत्त्व फावलें ।
तंव धृतराष्ट्रें म्हणितलें । हें न पुसों तूतें ॥६-४॥
तसे आम्हाला व तुम्हाला झाले आहे. कारण मिळण्याचा संभव नसतांना ब्रह्मज्ञान आपणास मिळाले आहे. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला आम्ही तुला ही गोष्ट विचारीत नाही. ॥६-४॥

तया संजया येणें बोलें । रायाचें हृदय चोजवलें ।
जें अवसरीं आहे घेतलें । कुमारांचिया ॥६-५॥
या बोलण्याने त्या संजयाला धृतराष्ट्राचे हृदय मुलांविषयीच्या स्नेहाने या वेळी घेरले आहे असे कळून आले. ॥६-५॥

हें जाणोनि मनीं हांसिला । म्हणे म्हातारा मोहें नाशिला ।
एऱ्हवीं बोलु तरी भला जाहला । अवसरीं इये ॥६-६॥
हे लक्षात येऊन संजय मनात हसला व आपल्याशीच म्हणाला - हा म्हातारा मोहाने अगदीच बिघडून गेला आहे. येर्‍हवी या वेळेला प्रतिपादन तर फार चांगले झाले आहे. ॥६-६॥

परि तें तैसें कैसेनि होईल । जात्यंधु कैसें पाहेल ।
तेवींचि ये रुसें घेईल । म्हणौनि बिहे ॥६-७॥
पण ते तसे कसे होईल ? (पण धृतराष्ट्राला हे प्रतिपादन गोड कसे लागणार ?) जन्मांधाला उजाडेल कसे त्याचप्रमाणे (ही गोष्ट धृतराष्ट्रास उघड सांगितली तर) तो मनात रोष ठेवील म्हणून संजय उघड बोलण्यास भ्यायला. ॥६-७॥

परि आपण चित्तीं आपुला । निकियापरी संतोषला ।
जे तो संवादु फावला । कृष्णार्जुनांचा ॥६-८॥
पण तो मात्र आपल्याला कृष्ण व अर्जुन यांचा संवाद प्राप्त झाला म्हणून आपल्या मनात चांगल्या प्रकारे खूष झाला. ॥६-८॥

तेणें आनंदाचेनि धालेपणें । साभिप्राय अंतःकरणें ।
आतां आदरेंसीं बोलणें । घडेल तया ॥६-९॥
त्या तृप्तीने श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अभिप्राय मनामधे घेऊन तो संजय धृतराष्ट्रास आदराने सांगता होईल ॥६-९॥

तो गीतेमाजी षष्ठींचा । प्रसंगु असे आयणीचा ।
जैसा क्षीरार्णवीं अमृताचा । निवाडु जाहला ॥६-१०॥
ते संजयाचे बोलणे हाच गीतेच्या सहाव्या अध्यायाचा प्रसंग आहे. व तो जाणण्यास (चांगलीच बुद्धी पाहिजे. ज्याप्रमाणे क्षीरसमुद्रातून अमृताची निवड झाली ॥६-१०॥

तैसें गीतार्थाचें सार । जें विवेकसिंधूचें पार ।
नाना योगविभवभांडार । उघडलें कां ॥६-११॥
त्याप्रमाणे हा सहावा अध्याय गीतेचे सार आहे. हा अध्याय विचाररूपी समुद्राचा पलिकडचा किनारा आहे. अथवा हा अध्याय म्हणजे अष्टांगयोगाच्या ऐश्वर्याचे खुले केलेले कोठारच होय. ॥६-११॥

जें आदिप्रकृतीचें विसवणें । जें शब्दब्रह्मासि न बोलणें ।
जेथूनि गीतावल्लीचें ठाणें । प्ररोहो पावे ॥६-१२॥
जो मूळ मायेचे विश्रांतीस्थान आहे, ज्याचे वर्णन करण्यास वेद समर्थ नाहीत व ज्यात गीतारूपी वेलीच्या अंकुराचे स्वरूप वाढीला लागलेले आहे, ॥६-१२॥

तो अध्यावो सहावा । वरि साहित्याचिया बरवा ।
सांगिजैल म्हणौनि परिसावा । चित्त देउनी ॥६-१३॥
असा हा सहावा अध्याय असून त्यावर तो अलंकाराने सजवून सांगितला जाईल म्हणून लक्ष देऊन ऐकावा. ॥६-१३॥

माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके ।
ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ॥६-१४॥
माझे हे प्रतिपादन मराठी आहे खरं पण अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकेल, अशा तर्‍हेची रसभरित शब्दरचना मी करीन. ॥६-१४॥

जिये कोंवळिकेचेनि पाडें । दिसती नादींचें रंग थोडे ।
वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ॥६-१५॥
ज्या माझ्या अक्षरांच्या अरुवारपणाचे मानाने पाहिले असता, सुस्वरांचे निरनिराळे प्रकार कमी योग्यतेचे दिसतील व ज्या अक्षरांचा चित्ताकर्षकपणा सुवासाचे बल नाहीसे करील. ॥६-१५॥

ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।
बोले इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ॥६-१६॥
ऐका, रसाळपणाच्या लोभाने कानास जिभा उत्पन्न होतील व माझ्या शब्दांच्या योगाने इंद्रियांमधे परस्परांत भांडण लागेल. ॥६-१६॥

सहजें शब्दु तरी विषो श्रवणाचा । परि रसना म्हणे हा रसु आमुचा ।
घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल ॥६-१७॥
सहज विचार करून पाहिले तर शब्द हा केवळ कानांचा विषय आहे. परंतु जिव्हा म्हणेल हा शब्द माझा रसविषय आहे, नाकाला असे वाटेल की या शब्दाच्या योगाने मला सुवास मिळावा तर तो शब्दच अनुक्रमे रस व सुवास होईल. ॥६-१७॥

नवल बोलतीये रेखेची वाहणी । देखतां डोळयांही पुरों लागे धणी ।
ते म्हणती उघडली खाणी । रूपाची हे ॥६-१८॥
या बोलण्याच्या मर्यादेची पद्धत आश्चर्यकारक आहे. ही पाहिली असता डोळ्यांनाही तृप्ती मिळू लागेल व ते म्हणतील, ‘हे आम्हाला रूपविषयाचे कोठारच उघडले आहे. ॥६-१८॥

जेथ संपूर्ण पद उभारे । तेथ मनचि धांवे बाहिरें ।
बोलु भुजाही आविष्करें । आलिंगावया ॥६-१९॥
संपूर्ण पद जेथे पूर्ण होईल तेथे त्याच्या भेटीकरता अंत:करण बाहेर धाव घेईल व शब्दाला आलिंगन देण्यास बाहूही पुढे सरसावतील. ॥६-१९॥

ऐशीं इंद्रियें आपुलालिया भावीं । झोंबती परि तो सरिसेपणेंचि बुझावी ।
जैसा एकला जग चेववी । सहस्त्रकरु ॥६-२०॥
याप्रमाणे इंद्रिये आपापल्या इच्छेप्रमाणे माझ्या शब्दाला लगट करतील, पण तो शब्द सर्वांचे सारखे समाधान करेल. ज्याप्रमाणे सूर्य एकटाच सर्व जगाला जागे करतो ॥६-२०॥

तैसें शब्दाचें व्यापकपण । देखिजे असाधारण ।
पाहातयां भावज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ॥६-२१॥
त्याप्रमाणे शब्दाचे व्यापकपण असामान्य आहे, असे समजावे. याचा विचार करून अभिप्राय जाणणार्‍याला यात चिंतामणीसारखे गुण दिसून येतील ॥६-२१॥

हें असोतु या बोलांचीं ताटें भलीं । वरी कैवल्यरसें वोगरिलीं ।
ही प्रतिपत्ति मियां केली । निष्कामासी ॥६-२२॥
हे राहू द्या, असे शब्द हीच कोणी चांगली ताटे व त्यात मोक्षरूप पक्वान्ने वाढली आहेत. अशी ही ग्रंथरचनारूपी मेजवानी मी निष्काम संतांना केली आहे. ॥६-२२॥

आतां आत्मप्रभा नीच नवी । तेचि करूनि ठाणदिवी ।
जो इंद्रियांतें चोरूनि जेवी । तयासीचि फावे ॥६-२३॥
आता नित्य नवा आत्मप्रकाश हीच कोणी ठाणदिवी करून, जो इंद्रियांना न कळता उपभोग घेतो त्यालाच कैवल्यरूप पक्वान्नांचा लाभ होतो. ॥६-२३॥

येथ श्रवणाचेनि पांगें- । वीण श्रोतयां होआवें लागे ।
हे मनाचेनि निजांगें । भोगिजे गा ॥६-२४॥
या मेजवानीकरता श्रोत्यांना श्रवणेंद्रियांचा पंगिस्तपणा टाकावयास पाहिजे. ही मेजवानी मनाच्या अंतर्मुखतेने भोगावयाची आहे. ॥६-२४॥

आहाच बोलाची वालीफ फेडिजे । आणि ब्रह्माचियाचि आंगा घडिजे ।
मग सुखेंसी सुरवाडिजे । सुखाचि माजीं ॥६-२५॥
वरवर असलेली शब्दरूपी गवसणी काढून आत अर्थरूपी ब्रह्म आहे, त्याच्यशी तद्रूप व्हावे, नंतर सुखामधेच सुखाने रंगून जावे. ॥६-२५॥

ऐसें हळुवारपण जरी येईल । तरीच हें उपेगा जाईल ।
एऱ्हवीं आघवी गोठी होईल । मुकिया बहिरयाची ॥६-२६॥
याप्रमाणे चित्ताला जर सूक्ष्मपणा येईल, तर माझ्या निरूपणाचा उपयोग होईल. नाहीतर मुक्याबहिर्‍याच्या गोष्टीसारखा सर्व प्रकार होईल. ॥६-२६॥

परी तें असो आतां आघवें । नलगे श्रोतयांतें कडसावें ।
जे अधिकारिये एथ स्वभावें । निष्कामकामु ॥६-२७॥
परंतु ते आता सर्वच राहू दे. श्रोत्यांची निवड करण्याची जरुरी नाही. कारण या विषयात सहजच कामनाशून्य अंत:करणाचे लोकच अधिकारी आहेत. ॥६-२७॥

जिहीं आत्मबोधाचिया आवडी । केली स्वर्गसंसाराची कुरोंडी ।
तेवांचूनि एथींची गोडी । नेणती आणिक ॥६-२८॥
ज्यांनी आत्मज्ञानाच्या आवडीने (आत्मज्ञानावरून) संसार व स्वर्ग हा उतारा उतरून टाकला आहे, त्या लोकांवाचून दुसरे लोक या विषयाची गोडी समजत नाहीत. ॥६-२८॥

जैसा वायसीं चंद्र नोळखिजे । तैसा प्राकृतीं हा ग्रंथु नेणिजे ।
आणि तो हिमांशुचि जेविं खाजें । चकोराचें ॥६-२९॥
ज्याप्रमाणे कावळ्यांना चंद्राची ओळख नसते, त्याप्रमाणे विषयासक्त लोकांना हे प्रतिपादन समजणार नाही, आणि शीतल किरणांचा चंद्र, हाच ज्याप्रमाणे चकोरांचे आवडते खाद्य आहे, ॥६-२९॥

तैसा सज्ञानासी तरी हा ठावो । आणि अज्ञानासी आन गांवो ।
म्हणौनि बोलावया विषय पहा हो । विशेषु नाहीं ॥६-३०॥
त्याप्रमाणे ज्ञानवानांना हा ग्रंथ भोगण्याचा विषय आहे आणि अज्ञानांना तर हा ग्रंथ अगदी अनोळखीचे ठिकाण आहे, म्हणून पहा, ह्याविषयी फार बोलण्याचे कारण नाही. ॥६-३०॥

परी अनुवादलों मी प्रसंगें । तें सज्जनीं उपसाहावें लागे ।
आतां सांगेन काय श्रीरंगें । निरोपिलें जें ॥६-३१॥
परंतु वेळ आली म्हणून मी बोलून गेलो. ते संतानी क्षमा करणे उचित आहे. आता श्रीकृष्णांनी जे सांगितले ते सांगतो. ॥६-३१॥

तें बुद्धीही आकळितां सांकडें । म्हणौनि बोलीं विपायें सांपडे ।
परी श्रीनिवृत्तिकृपादीप उजियेडें । देखैन मी ॥६-३२॥
ते बुद्धीला देखील आकलन करण्यास कठिण आहे, म्हणून शब्दांनी ते क्वचितच सांगता येईल. तरीपण माझे गुरु निवृत्तिनाथ, यांच्या कृपारूपी दिव्याच्या उजेडाने मी ते पाहीन व सांगेन. ॥६-३२॥

जें दिठीही न पविजे । तें दिठीविण देखिजे ।
जरी अतींद्रिय लाहिजे । ज्ञानबळ ॥६-३३॥
जर अतींद्रिय ज्ञानाचे बळ प्राप्त होईल तर जे दृष्टीला दिसत नाही, ते डोळ्यांशिवाय पहाता येते. ॥६-३३॥

ना तरी जें धातुवादाही न जोडे । तें लोहींचि पंधरें सांपडे ।
जरी दैवयोगें चढे । परिसु हातां ॥६-३४॥
दैववशात जर परीस हाताला येईल तर किमयेच्या योगानेही प्राप्त न होणारे उत्तम सोने लोखंडातच मिळेल. ॥६-३४॥

तैसी गुरुकृपा होये । तरी करितां काय आपु नोहे ।
म्हणौनि तें अपार मातें आहे । ज्ञानदेवो म्हणे ॥६-३५॥
त्याप्रमाणे जर सद्गुरूची कृपा प्राप्त होईल तर प्रयत्न केला असता कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही ? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्यावर ती कृपा अलोट आहे. ॥६-३५॥

तेणें कारणें मी बोलेन । बोलीं अरूपाचें रूप दावीन ।
अतींद्रिय परी भोगवीन । इंद्रियांकरवीं ॥६-३६॥
त्या सद्गुरूकृपेच्या योगाने मी व्याख्यान करीन व म्हणून माझ्या व्याख्यानात अरूप ब्रह्माचे स्पष्ट रूप दाखवीन. आणि जरी ते ब्रह्म इंद्रियांना गोचर होण्यापलीकडचे आहे तरी त्याचाही अनुभव इंद्रियांना घेता येईल असे मी करीन. ॥६-३६॥

श्रीभगवानुवाच -
अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः ।
स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥६-१॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले - कर्मफलाचा आश्रय न करता, जो कर्तव्य असे कर्म करतो, तोच खरा संन्यासी व तोच योगी आहे. केवळ निरग्नि अथवा क्रियारहित मनुष्य संन्यासी अथवा योगी नव्हे. ॥६-१॥

आइका यश श्री औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ।
हे साही गुणवर्य । वसती जेथ ॥६-३७॥
ऐका, कीर्ती, लक्ष्मी, उदारता, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे सहा उच्चप्रतीचे गुण ज्याचे ठिकाणी असतात ॥६-३७॥

म्हणौनि तो भगवंतु । जो निःसंगाचा सांगातु ।
तो म्हणे पार्था दत्तचित्तु । होईं आतां ॥६-३८॥
म्हणून ज्यास भगवंत म्हणतात व जो सर्वसंग परित्याग केलेल्यांचा सोबती आहे तो श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना आता तू पूर्ण लक्ष दे. ॥६-३८॥

आइकें योगी आणि संन्यासी जनीं । हे एकचि सिनानें झणीं मानीं ।
एऱ्हवीं विचारिजती जंव दोन्ही । तंव एकचि ते ॥६-३९॥
अर्जुना ऐक. या जगात निष्काम कर्मयोगी आणि सांख्ययोगी हे दोन्ही एकच आहेत. ह्यांना कदाचित् तू वेगळे मानशील, पण तसे मानू नकोस. कारण सहज विचार करून पाहिले तर हे दोन्ही एकच आहेत. ॥६-३९॥

सांडिजे दुजया नामाचा आभासु । तरी योगु तोचि संन्यासु ।
पाहतां ब्रह्मीं नाहीं अवकाशु । दोहींमाजीं ॥६-४०॥
नावाच्या वेगळेपणामुळे भासणारा दुजेपणा टाकून दिला तर योग तोच संन्यास होय. तत्वत: पाहिले तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ह्या दोहोत अंतर रहात नाही. ॥६-४०॥

जैसें नामाचेनि अनारिसेपणें । एका पुरुषातें बोलावणें ।
कां दोहींमार्गीं जाणें । एकाचि ठाया ॥६-४१॥
ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नावांने एकाच पुरुषाला हाक मारतात किंवा दोन रस्त्यांनी एकच मुक्काम गाठतात ॥६-४१॥

नातरी एकचि उदक सहजें । परि सिनाना घटीं भरिजे ।
तैसें भिन्नत्व जाणिजे । योगसंन्यासांचें ॥६-४२॥
किंवा स्वभावत: पाणी जितके तितके एकच, परंतु ते वेगवेगळ्या घागरीतून भरावे म्हणजे ते जसे वेगवेगळे दिसते, त्याप्रमाणे योग व संन्यास ह्यांचा वेगवेगळेपणा फक्त दिसण्यापुरता आहे. ॥६-४२॥

आइकें सकळ संमतें जगीं । अर्जुना गा तोचि योगी ।
जो कर्में करूनि रागी । नोहेचि फळीं ॥६-४३॥
अर्जुना, ऐक, जो कर्माचे आचरण करून त्याच्या फलाविषयी आसक्त होत नाही, तोच ह्या जगामधे सर्वांना मान्य असलेला योगी होय. ॥६-४३॥

जैसी मही हे उद्भिजें । जनी अहंबुद्धीवीण सहजें ।
आणि तेथिंचीं तियें बीजें । अपेक्षीना ॥६-४४॥
ज्याप्रमाणे पृथ्वी ही अहंकारावाचून सहजच वृक्षादिकांना जन्म देते, आणि त्यांना येणार्‍या बीजाची (फलाची) अपेक्षा करत नाही ॥६-४४॥

तैसा अन्वयाचेनि आधारें । जातीचेनि अनुकारें ।
जें जेणें अवसरें । करणें पावे ॥६-४५॥
तसे कुलक्रमातील वहिवाटीप्रमाणे वर्णाश्रमधर्मातील आचारांना अनुसरून जे कर्म ज्या वेळेला करणे प्राप्त आहे ॥६-४५॥

तें तैसेंचि उचित करी । परी साटोपु नोहे शरीरीं ।
आणि बुद्धीही करोनि फळवेरी । जायेचिना ॥६-४६॥
ते त्याप्रमाणे यथास्थित करतो, परंतु त्यासंबंधी आपल्या ठिकाणी कर्तृत्वबुद्धी घेत नाही, आणि बुद्धीनेही फलापर्यंत जात नाही. (फलांची इच्छा करत नाही) ॥६-४६॥

ऐसा तोचि संन्यासी । पार्था गा परियेसीं ।
तोचि भरंवसेनिसीं । योगीश्वरु ॥६-४७॥
असा जो असेल तोच संन्यासी होय. अर्जुना ऐक, तोच खात्रीने योगीराज आहे असे समज. ॥६-४७॥

वांचूनि उचित कर्म प्रासंगिक । तयातें म्हणे हे सांडावें बद्धक ।
तरी टांकोटांकीं आणिक । मांडीचि तो ॥६-४८॥
याशिवाय नित्यनैमित्तिक कर्म करणे प्राप्त झाले तर त्या कर्माला तो म्हणतो, हे कर्म बंधन करणारे आहे, हे मी टाकीन. पण हे कर्म टाकले की लागलीच तो दुसरे कर्म करण्याचे आरंभतोच. ॥६-४८॥

जैसा क्षाळूनियां लेपु एकु । सवेंचि लाविजे आणिकु ।
तैसेनि आग्रहाचा पाइकु । विचंबे वायां ॥६-४९॥
जसा एक लेप धुवून टाकून लागलीच दुसरा लावाला, त्याप्रमाणे केवळ आग्रहाचा दास झालेला तो व्यर्थच कष्टात पडतो. ॥६-४९॥

गृहस्थाश्रमाचें वोझें । कपाळीं आधींचि आहे सहजें ।
कीं तेंचि संन्याससवा ठेविजे । सरिसें पुढती ॥६-५०॥
डोक्यावर अगोदरच स्वभावत: गृहस्थाश्रमाचे ओझे आहेच, ते टाकण्याकरता संन्यास घेतला तर त्याबरोबरच पुन: संन्यासाश्रमातील कर्मांचे ओझे तो डोक्यावर घेतो. ॥६-५०॥

म्हणौनि अग्निसेवा न सांडितां । कर्माची रेखा नोलांडितां ।
आहे योगसुख स्वभावता । आपणपांचि ॥६-५१॥
म्हणून अग्निसेवा न टाकता व कर्माचरणाची मर्यादा न उल्लंघता ज्ञानयोगाने सुख आपले ठिकाणी सहजच मिळाणारे आहे. ॥६-५१॥



[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



यं संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव ।
न ह्यसंन्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन ॥६-२॥
अर्जुना, ज्याला संन्यास म्हणतात तो योग आहे असे जाण. ज्याचा कर्मफलाविषयीचा संकल्प सुटला नाही असा कोणीही मनुष्य योगी होत नाही. ॥६-२॥

ऐकें संन्यासी तोचि योगी । ऐसी एकवाक्यतेची जगीं ।
गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरीं ॥६-५२॥
ऐक जो संन्यासी आहे तोच योगी आहे अशी आपली एकवाक्यता असल्याबद्दल अनेक शास्त्रांनी जी या जगात ध्वजा उभारून प्रसिद्ध केले आहे ॥६-५२॥

जेथ संन्यासिला संकल्पु तुटे । तेथचि योगाचें सार भेटे ।
ऐसें हें अनुभवाचेनि धटें । साचें जया ॥६-५३॥
ज्या ठिकाणी टाकून दिलेला संकल्प अजिबात नाहीसा होतो त्याच ठिकाणी योगाचे सर्वस्व (ब्रह्म) प्राप्त होते असे हे ज्याच्या अनुभवाच्या तराजूत खरे ठरून पटले आहे (तोच संन्यासी व तोच योगी होय). ॥६-५३॥

आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते ।
योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥६-३॥
योग प्राप्त व्हावा अशी इच्छा करणार्‍या मुनीला कर्म हे साधन आहे असे सांगितले आहे. योग प्राप्ती झाल्यानंतर त्यालाच शम हे साधन सांगितले आहे. ॥६-३॥

आतां योगाचळाचा निमथा । जरी ठाकावा आथि पार्था ।
तरी सोपाना या कर्मपथा । चुका झणी ॥६-५४॥
अर्जुना आता योगरूपी पर्वताच्या शिखरावर ज्या कोणास जाऊन पोहोचावयाचे असेल त्याने या कर्ममार्गरूपी पायर्‍यास चुकू नये. ॥६-५४॥

येणें यमनियमांचेनि तळवटें । रिगे आसनाचिये पाउलवाटें ।
येई प्राणायामाचेनि आडकंठें । वरौता गा ॥६-५५॥
(कर्ममार्गाने जाणारा) या नियमरूपी पायथ्यावरून आसनाच्या पायवाटेवर येतो आणि मग प्राणायामाच्या कड्याने योगरूपी डोंगराच्या मध्यभागावर पोहोचतो. ॥६-५५॥

मग प्रत्याहाराचा अधाडा । जो बुद्धीचियाही पायां निसरडा ।
जेथ हटिये सांडिती होडा । कडेलग ॥६-५६॥
नंतर प्रत्य़ाहाररूपी तुटलेला कडा लागतो. त्य़ा निसरड्या कड्यावर बुद्धीचेही पाय ठरत नाहीत. त्या प्रसंगात हटयोग्यांना शेवटी आपल्या प्रतिज्ञा सोडून द्याव्या लागतात. ॥६-५६॥

तरी अभ्यासाचेनि बळें । प्रत्याहारीं निराळें ।
नखीं लागेल ढाळें ढाळें । वैराग्याची ॥६-५७॥
तरी अभ्यासाच्या बळाने चढण्यास आधार न देणार्‍या प्रात्याहाररूपी कड्यावर वैराग्यरूपी नखी (घोरपडीसारखी) हळू हळू चिकटेल (आणि याप्रमाणे) चढावयास आश्रय मिळेल. ॥६-५७॥

ऐसा पवनाचेनि पाठारें । येतां धारणेचेनि पैसारें ।
क्रमी ध्यानाचें चवरें । सांपडे तंव ॥६-५८॥
याप्रमाणे प्राण व अपान या वायूंच्या वाहनावरून येऊन धारणेच्या प्रशस्त रस्त्याने ध्यानरूपी शिखर मागे टाकी पर्यंत तो चालतो. ॥६-५८॥

मग तया मार्गाची धांव । पुरेल प्रवृत्तीची हांव ।
जेथ साध्यसाधना खेंव । समरसें होय ॥६-५९॥
मग त्या धारणामार्गाची चाल पुरी होऊन अमूक एक गोष्ट करायची आहे अशा विषयीची इच्छा बंद पडून ज्या अवस्थेमधे ब्रह्मैक्य झाल्यामुळे साध्य व साधन यातील भेद नाहीसा होतो, ॥६-५९॥

जेथ पुढील पैसु पारुखे । मागील स्मरावें तें ठाके ।
ऐसिये सरिसीये भूमिके । समाधि राहे ॥६-६०॥
ज्या ठिकाणी पुढील प्रवृत्ति बंद पडून मागील कशाचेही स्मरण होत नाही अशा या ऐक्याच्या भूमिकेवर समाधि रहाते. ॥६-६०॥

येणें उपायें योगारूढु । जो निरवधि जाहला प्रौढु ।
तयाचिया चिन्हांचा निवाडु । सांगैन आइकें ॥६-६१॥
या उपायांनी जो योगनिष्णात अखंड परिपूर्ण झाला, त्याची चिन्हे तुला स्पष्ट तर्‍हेने सांगतो ऐक. ॥६-६१॥

यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते ।
सर्वसंकल्पसंन्यासी योगारूढस्तदोच्यते ॥६-४॥
विषयांचे ठिकाणी आणि कर्मांचे ठिकाणी जेव्हा आसक्त होत नाही आणि जेव्हा सर्व कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करतो तेव्हा त्याला योगारूढ असे म्हणतात. ॥६-४॥

तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा । नाहीं विषयांचिया येरझारा
जो आत्मबोधाचिया वोवरां । पहुडला असे ॥६-६२॥
तरी ज्याच्या इंद्रियरूपी घरात विषयांचे जाणे येणे होत नाही आणि जो आत्मज्ञानरूपी विश्रांतीच्या खोलीत स्वस्थ पडलेला असतो, ॥६-६२॥

जयाचें सुखदुःखाचेनि आंगें । झगटलें मानस चेवो नेघे ।
विषय पासींही आलियां से न रिगे । हें काय म्हणौनि ॥६-६३॥
ज्याच्या मनाला सुखदु:खांनी स्वत: धक्के दिले असतांना ते जागे होत नाहीत, विषय अगदी जवळ आले तरी हे काय आहे म्हणून ज्याला स्मरणच होत नाही ॥६-६३॥

इंद्रियें कर्माच्या ठायीं । वाढीनलीं परि कहीं ।
फळहेतूची चाड नाहीं । अंतःकरणीं ॥६-६४॥
ज्यांची इंद्रिये कर्मे करीत आली परंतु ज्यांच्या अंत:करणात फलाची इच्छा कधीही उत्पन्न झाली नाही, ॥६-६४॥

असतेनि देहें एतुला । जो चेतुचि दिसे निदेला ।
तोचि योगारूढु भला । वोळखें तूं ॥६-६५॥
जो देहधारी असून वरीलप्रमाणे असतो व जो जागृतीप्रमाणे सर्व व्यवहार करीत असूनही निद्रिस्ताप्रमाणे क्रियाशून्य असतो, तोच उत्तम प्रतीचा योगनिष्णात आहे असे तू समज. ॥६-६५॥

तेथ अर्जुन म्हणे अनंता । हें मज विस्मो बहु आइकतां ।
सांगे तया ऐसी योग्यता । कवणें दीजे ॥६-६६॥
त्यावेळी अर्जुन म्हणाला, कृष्णा, तुझे हे बोलणे ऐकून मला फार आश्चर्य वाटते. सांग त्याला अशी ही योग्यता कोण देतो ? ॥६-६६॥

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥६-५॥
आपला आपण उद्धार करावा, अवनती करू नये. आपण स्वत:च स्वत:चे मित्र आहोत व स्वत:च स्वत:चे शत्रू आहोत. ॥६-५॥

तंव हांसोनि श्रीकृष्ण म्हणे । तुझें नवल ना हें बोलणें ।
कवणासि काय दिजेल कवणें । अद्वैतीं इये ॥६-६७॥
तेव्हा कृष्ण हसून म्हणाले, तुझे हे बोलणे आश्चर्यकारक नाही काय ? या अद्वैतामधे येथे कोणाला कोणी काय द्यावयाचे आहे ? ॥६-६७॥

पैं व्यामोहाचिये शेजे । बळिया अविद्या निद्रितु होइजे ।
ते वेळी दुःस्वप्न हा भोगिजे । जन्ममृत्यूंचा ॥६-६८॥
अविवेकरूपी अंथरुणावर प्रबळ अविद्येच्या योगाने ज्यावेळेला जीव निजतो त्यावेळेला जन्ममरणरूपी वाईट स्वप्न अनुभवतो. ॥६-६८॥

पाठीं अवसांत ये चेवो । तैं तें अवघेंचि होय वावो ।
ऐसा उपजे नित्य सद्भावो । तोहि आपणपांचि ॥६-६९॥
नंतर ज्यावेळेला अकस्मात् जागृति येते त्या वेळेला ते स्वप्न वगैरे सर्वच व्यर्थ होते. अशा प्रकारचा आपल्या नित्य अस्तित्वाचा जो सहज प्रत्यय येतो तोही आपल्याच ठिकाणी आपल्याला येतो. ॥६-६९॥

म्हणौनि आपणचि आपणयां । घातु कीजतु असे धनंजया ।
चित्त देऊनि नाथिलिया । देहाभिमाना ॥६-७०॥
म्हणून अर्जुना, मिथ्या देहाभिमान, त्याकडे चित्त देऊन (देहच मी आहे असे चित्ताने मानून) आपणच आपला घात करतो. ॥६-७०॥

बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः ।
अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् ॥६-६॥
ज्याने स्वत: स्वत: जिंकले (म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतली) तो स्वत: स्वत:चा मित्र होय. ज्याचा स्वत:वर ताबा नाही (ज्याने आपल्या आत्मस्वरूपास जाणले नाही) तो स्वत: (स्वत:चेच ठिकाणी) शत्रुप्रमाणे शत्रुत्वाने वर्तन करतो. ॥६-६॥

हा विचारूनि अहंकारु सांडिजे । मग असतीचि वस्तु होईजे ।
तरी आपली स्वस्ति सहजें । आपण केली ॥६-७१॥
विचार करून अहंकार टाकावा आणि मग असलेले आपले स्वरूप ओळखून ब्रह्मरूप व्हावे, म्हणजे आपण आपले कल्याण केल्यासारखेच सहजच होईल. ॥६-७१॥

एऱ्हवीं कोशकीटकाचिया परी । तो आपणया आपण वैरी ।
जो आत्मबुद्धि शरीरीं । चारुस्थळीं ॥६-७२॥
नाहीतर शरीर हेच उत्तम समजून तेथे आत्मबुद्धी ठेवतो, तो कोसल्याप्रमाणे आपला आपणच शत्रु होतो. ॥६-७२॥

कैसे प्राप्तीचिये वेळे । निदैवा अंधळेपणाचे डोहळे ।
कीं असते आपुले डोळे । आपण झांकी ॥६-७३॥
ऐन लाभाच्या वेळेला करंट्याला आंधळेपणाचे डोहाळे कसे होतात पहा. तो आपले असलेले डोळे आपणच झाकून घेतो. ॥६-७३॥

कां कवण एकु भ्रमलेपणें । मी तो नव्हे गा चोरलों म्हणे ।
ऐसा नाथिला छंदु अंतःकरणें । घेऊनि ठाके ॥६-७४॥
किंवा कोणी एक मनुष्य वेड लागल्यामुळे पूर्वीचा जो मी तो मी आता नाही, मी चोरीला गेलो असे म्हणतो आणि आपल्या मनात असा नसताच आग्रह घेऊन बसतो. ॥६-७४॥

एऱ्हवीं होय तें तोचि आहे । परि काई कीजे बुद्धि तैशी नोहे ।
देखा स्वप्नींचेनि घायें । कीं मरे साचें ॥६-७५॥
खरा विचार करून पाहिले तर हल्ली तो जो आहे, तो पूर्वीचाच आहे, पण काय करावे ? त्याच्या बुद्धीला तसे वाटत नाही. पहा. स्वप्नातील तरवारीच्या वाराने कोणी खरोखर मरतो का ? ॥६-७५॥

जैशी ते शुकाचेनि आंगभारें । नळिका भोविन्नली एरी मोहरें ।
तेणें उडावें परी न पुरे । मनशंका ॥६-७६॥
पोपटाला धरण्याकरता बांधलेल्या नळीवर पोपट बसल्यामुळे जेव्हा पोपटाच्या वजनाने ती नलिका उलट बाजूला फिरते तेव्हा वास्तविक त्याने तेथून उडून जावे, परंतु ही नळी सोडली तर आपण पडू व मरू या त्याच्या मनातील शंकेचे समाधान होत नाही. ॥६-७६॥

वायांचि मान पिळी । अटुवें हियें आंवळी ।
टिटांतु नळी । धरूनि ठाके ॥६-७७॥
मग व्यर्थच मान इकडे तिकडे करतो व संकोचलेल्या छातीने नळीला आवळीत ती नळी चवड्यात धरून रहातो. ॥६-७७॥

म्हणे बांधला मी फुडा । ऐसिया भावनेचिया पडे खोडां ।
कीं मोकळिया पायांचा चवडा । गोंवी अधिकें ॥६-७८॥
मग मनात म्हणतो की मी खरोखरच बांधला गेलो आहे, अशा या कल्पनेच्या खोड्यात सापडतो आणि मग मोकळा असलेला आपल्या पायांचा चवडा अधिकच गुंतवतो. ॥६-७८॥

ऐसा काजेंवीण आंतुडला । तो सांग पां काय आणिकें बांधिला ।
मग न सोडीच जऱ्ही नेला । तोडूनि अर्धा ॥६-७९॥
याप्रमाणे विनाकारण अडकलेल्या त्या पोपटाला दुसर्‍या कोणी बांधले आहे काय ? अशा स्थितीत त्याला ओढून, अर्धा तोडून जरी नेला, तरी तो काही केल्या नळी सोडत नाही ॥६-७९॥

म्हणौनि आपणयां आपणचि रिपु । जेणें वाढविला हा संकल्पु ।
येर स्वयंबुद्धी म्हणे बापु । जो नाथिलें नेघे ॥६-८०॥
म्हणून ज्याने आपला संकल्प (देहाभिमान) वाढवला आहे, तो आपला आपणच शत्रु होय. श्रीकृष्ण म्हणतात दुसरा जो खोट्याचा मिथ्या देहाचा अभिमान घेत नाही, तो आत्मज्ञानी म्हणावा. ॥६-८०॥

जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः ।
शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥६-७॥
ज्याने आपले मन जिंकले आहे व जो अत्यंत शांत आहे, त्याचे ठिकाणी आत्मा हा आत्मभावाने रहातो. तो अनुभवाने परमात्मरूप बनतो. शीत अथवा उष्ण, सुख अथवा दु:ख, मान अथवा अपमान, यांच्या ठिकाणी तो शांत निश्चल असतो. ॥६-७॥

तया स्वांतःकरणजिता । सकळकामोपशांता ।
परमात्मा परौता । दुरी नाहीं ॥६-८१॥
अशा त्या पुरुषाने आपले अंत:करण जिंकल्यामुळे व त्याच्या सर्व इच्छा निवृत्त झाल्यामुळे त्याला परमात्मा कोठे लांब पलीकडे नाही.॥६-८१॥

जैसा किडाळाचा दोषु जाये । तरी पंधरें तेंचि होये ।
तैसें जीवा ब्रह्मत्व आहे । संकल्पलोपीं ॥६-८२॥
ज्याप्रमाणे हिणकस सोन्यातून मिसळलेल्या धातूचा दोष निघाला तर तेच शंभर नंबरी सोने होते त्याप्रमाणे अहंकाराचा नायनाट झाला असता जीवाला ब्रह्मत्व ठेवलेलेच आहे. ॥६-८२॥

हा घटाकारु जैसा । निमालिया तया अवकाशा ।
नलगे मिळों जाणें आकाशा । आना ठाया ॥६-८३॥
(घट फुटून) हा घटाचा आकार नाहीसा झाला असता त्यातील पोकळीस आकाशाला मिळण्याकरता ज्याप्रमाणे कोठे लांब जावे लगत नाही, ॥६-८३॥

तैसा देहाहंकारु नाथिला । हा समूळ जयाचा नाशिला ।
तोचि परमात्मा संचला । आधींचि आहे ॥६-८४॥
त्याप्रमाणे ज्याचा हा मिथ्या देहाहंकार कारणांसह नाहीसा झाला आहे, तो मूळचाच सर्वत्र भरलेला परमात्मा आहे ॥६-८४॥

आतां शीतोष्णाचिया वाहणी । तेथ सुखदुःखाची कडसणीं ।
इयें न समाती कांहीं बोलणीं । मानापमानांचीं ॥६-८५॥
आता थंड व उष्ण असे प्रकार, किंवा हे सुख व हे दु:ख अशी निवड, तसेच हा मान व हा अपमान अशी समजूत ह्या गोष्टी त्या पुरुषाच्या ठिकाणी मुळीच संभवत नाहीत. ॥६-८५॥

जे जिये वाटा सूर्यु जाये । तेउतें तेजाचें विश्व होये ।
तैसें तया पावे तें आहे । तोचि म्हणौनी ॥६-८६॥
कारण की सूर्य ज्या मार्गाने जातो तितका जगाचा भाग प्रकाशित होतो. त्याप्रमाणे त्याला जे जे प्राप्त होईल, ते त्य़ाचेच स्वरूप आहे. म्हणून (वर सांगितलेली द्वंद्वे त्याच्या ठिकाणी संभवत नाहीत. ॥६-८६॥

देखैं मेघौनि सुटती धारा । तिया न रुपती जैसिया सागरा ।
तैशीं शुभाशुभें योगीश्वरा । नव्हती आनें ॥६-८७॥
पहा मेघापासून ज्या पावसाच्या धारा पडतात, त्या ज्याप्रमाणे समुद्राला खोचत नाहीत, त्याप्रमाणे शुभाशुभें ही योगेश्वराच्या आत्मस्वरूपाहून भिन्न नसल्यामुळे, त्यास ती द्वंद्वे प्रतीत होत नाहीत. ॥६-८७॥

ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः ।
युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचनः ॥६-८॥
ज्ञान आणि विज्ञान यांच्या अनुभवाने ज्याचे चित्त समाधान पावले आहे (कारण विज्ञानाच्या निरासात खाली राहिलेले जे ज्ञान, तद्रूपच तो बनलेला आहे), जो निश्चल आहे, जितेंद्रिय आहे, मातीचे ढेकूळ, दगड अथवा सुवर्ण यांचे ठिकाणी ज्याची समदृष्टी आहे, जो अशा गुणांनी युक्त आहे, त्याला योगी म्हणतात. ॥६-८॥

जो हा विज्ञानात्मकु भावो । तया विवरितां जाहला वावो ।
मग लागला जंव पाहों । तंव ज्ञान तें तोचि ॥६-८८॥
अनुभवाला येणारे हे जे दृश्य जगत त्याचा विचार करता, ते त्याच्या दृष्टीने मिथ्या ठरले व मग आपण कोण आहो, असे जेव्हा तो पहावयास लागला तेव्हा ज्ञान तेच आपण आहोत असे त्यास कळले. ॥६-८८॥

आतां व्यापकु कीं एकदेशी । हे ऊहापोही जे ऐसी ।
ते करावी ठेली आपैशी । दुजेनवीण ॥६-८९॥
आता द्वैत नसल्यामुळे मी व्यापक आहे किंवा मर्यादित आहे अशी वाटाघाट करण्याचे त्याच्या ठिकाणी सहजच थांबते. ॥६-८९॥

ऐसा शरीरीचि परी कौतुकें । परब्रह्माचेनि पाडें तुकें ।
जेणें जिंतलीं एकें । इंद्रियें गा ॥६-९०॥
अशा रीतीने ज्या कोणी एकाने आपली इंद्रिये जिंकली आहेत, तो देहधारीच असतो, परंतु सहजच तो परब्रह्माच्या बरोबरीचा ठरतो. ॥६-९०॥

तो जितेंद्रियु सहजें । तोचि योगयुक्तु म्हणिजे ।
जेणे सानें थोर नेणिजे । कवणें काळीं ॥६-९१॥
तो सहजच जितेंद्रिय आहे आणि त्यालाच योगयुक्त म्हणावे व त्याला लहान-थोर असा भेद कोणत्याच वेळेला प्रतीत होत नाही. ॥६-९१॥

देखैं सोनयाचें निखळ । मेरुयेसणें ढिसाळ ।
आणि मातियेचें डिखळ । सरिसेंचि मानी ॥६-९२॥
पहा, शुद्ध सोन्याचा मेरुपर्वता एवढा ढीग आणि मातीचे ढेकूळ तो सारखेच मानतो. ॥६-९२॥

पाहतां पृथ्वीचें मोल थोडें । ऐसें अनर्घ्य रत्न चोखडें ।
देखें दगडाचेनि पाडें । निचाडु ऐसा ॥६-९३॥
पहावयास गेले तर पृथ्वीची किंमत ही काही नाही, असे शुद्ध अमूल्य रत्न (पण तो ते) दगडासारखे मानतो, असा तो निरीच्छ असतो. ॥६-९३॥

सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु ।
साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥६-९॥
हितचिंतक, मित्र, शत्रु, उदासीन, मध्यस्थ, (दोन्ही पक्षांचे हित इच्छिणारा), अप्रिय, नातलग, सज्जन, पापी, या सर्वांचे ठिकाणी समबुद्धी असलेला योगी सर्वांमधे श्रेष्ठ होय. ॥६-९॥

तेथ सुहृद आणि शत्रु । कां उदासु आणि मित्रु ।
हा भावभेदु विचित्रु । कल्पूं कैंचा ॥६-९४॥
त्याचे ठिकाणी हितचिंतक व शत्रु, किंवा उदास आणि मित्र अशा तर्‍हेच्या वेगवेगळ्या वृत्तींची कल्पना कोठून करावी ? ॥६-९४॥

तया बंधु कोण काह्याचा । द्वेषिया कवणु तयाचा ।
मीचि विश्व ऐसा जयाचा । बोधु जाहला ॥६-९५॥
मीच विश्व आहे, अशी प्रतीती ज्यास आली आहे त्य़ाला नातलग कोण आणि कशाचा ? व त्याला वैरी तरी कोण ? ॥६-९५॥

मग तयाचिये दिठी । अधमोत्तम असे किरीटी ? ।
काय परिसाचिये कसवटी । वानिया कीजे ? ॥६-९६॥
मग त्याच्या दृष्टीने, अर्जुना, वाईट-चांगले असेल काय ? परिसाच्या कसवटीवर घासले असता सोन्यात निरनिराळे प्रकार करता येतील काय ? ॥६-९६॥

ते जैशी निर्वाण वर्णुचि करी । तैशी जयाची बुद्धी चराचरीं ।
होय साम्याची उजरी । निरंतर ॥६-९७॥
ती परिसाची कसवटी ज्या प्रमाणे त्यास उत्तम रंगाचेच सोने करते त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीमधे चराचराविषयीच्या समतेचा निरंतर उदय होतो. ॥६-९७॥

जे ते विश्वालंकाराचें विसुरे । जरी आहाती आनानें आकारें ।
तरी घडले एकचि भांगारें । परब्रह्में ॥६-९८॥
कारण विश्वातील प्राणीरूप अलंकारांचे समुदाय जरी निरनिराळ्या आकाराचे आहेत तरी ते एक परब्रह्मरूप सोन्याचेच बनले आहेत. ॥६-९८॥

ऐसें जाणणें जें बरवें । तें फावलें तया आघवें ।
म्हणौनि आहाचवाहाच न झकवे । येणें आकारचित्रें ॥६-९९॥
असे जे उत्तम ज्ञान ते त्याला सर्व प्राप्त झाले, म्हणून तो वरवरच्या या नानाप्रकारच्या आकारांनी फसत नाही. ॥६-९९॥

घापे पटामाजि दृष्टी । दिसे तंतूंची सैंघ सृष्टी ।
परी तो एकवांचूनि गोठी । दुजी नाहीं ॥६-१००॥
वस्त्रावर दृष्टी टाकली असता त्य़ा वस्त्रामधे जिकडे तिकडे तंतूंचीच रचना दिसते, तरीही पण त्या वस्त्रात एका सुतावाचून दुसरी गोष्टच नाही. ॥६-१००॥

ऐसेनि प्रतीती हें गवसे । ऐसा अनुभव जयातें असे ।
तोचि समबुद्धि हे अनारिसें । नव्हे जाणें ॥६-१०१॥
अशा या तंतुपटन्यायाने हा वर सांगितलेला अनुभव येतो व असा ज्याचा अनुभव आहे तोच समबुद्धी होय, यात अन्यथा नाही असे समज, ॥६-१०१॥

जयाचें नांव तीर्थरावो । दर्शनें प्रशस्तीसि ठावो ।
जयाचेनि संगें ब्रह्मभावो । भ्रांतासही ॥६-१०२॥
ज्याचे नाव तीर्थराज आहे व ज्याचे दर्शन झाले असता समाधान होते व ज्याच्या संगतीने भ्रमलेल्यास ब्रह्मता मिळते ॥६-१०२॥

जयाचेनि बोलें धर्मु जिये । दिठी महासिद्धितें विये ।
देखैं स्वर्गसुखादि इयें । खेळु जयाचा ॥६-१०३॥
ज्याच्या बोलण्याने धर्म जगतो, ज्याची कृपा मोठाल्या सिद्धीला उत्पन्न करते, पहा स्वर्गसुखादिक ही ज्याचा खेळ आहेत, स्वर्गसुखादिक देणे हा ज्याचा हाताचा मळ आहे ॥६-१०३॥

विपायें जरी आठवला चित्ता । तरी दे आपुली योग्यता ।
हें असो तयातें प्रशंसितां । लाभु आथि ॥६-१०४॥
अशा पुरुषाचे नाव मनाला सहज जरी आठवले तरी तो आपली योग्यता देतो, ते राहू दे, त्याची स्तुती केली असता हित आहे. ॥६-१०४॥

पुढती अस्तवेना ऐसें । जया पाहलें अद्वैतदिवसें ।
मग आपणपांचि आपणु असे । अखंडित ॥६-१०५॥
पुन्हा मावळणार नाही अशा ऐक्यरूपी दिवसाने ज्याला उजाडले आहे व जो मग निरंतर आपण आपल्या ठिकाणीच (स्वात्मसुखात निमग्न) असतो. ॥६-१०५॥



[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः ।
एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥६-१०॥
अंत:करण व देह यांचे संयमन करून, निरिच्छ बनून, (अद्वैतानुभव आल्यामुळे) एकाकी व (अर्थात) अपरिग्रह झालेला योगी एकांतात नेहेमी आत्मानुभवात तल्लीन असतो. (तो आत्मरूप बनलेला एकाकी सहजच अपरिग्रही असतो). ॥६-१०॥

ऐसिया दृष्टी जो विवेकी । पार्था तो एकाकी ।
सहजें अपरिग्रही जो तिहीं लोकीं । तोचि म्हणौनि ॥६-१०६॥
अशा दृष्टीने जो विचारयुक्त आहे. अर्जुना, तो अद्वितीय आहे. कारण तिन्ही लोकात तोच आहे, म्हणून तो सहजच परिग्रहशून्य असतो. ॥६-१०६॥

ऐसियें असाधारणें । निष्पन्नाचीं लक्षणें ।
आपुलेनि बहुवसपणें । श्रीकृष्ण बोले ॥६-१०७॥
(ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) अशी प्राप्त पुरुषांची लोकोत्तर लक्षणे कृष्ण आपल्या सर्वज्ञतेने सांगतात. ॥६-१०७॥

जो ज्ञानियांचा बापु । देखणेयांचे दिठीचा दीपु ।
जया दादुलयाचा संकल्पु । विश्व रची ॥६-१०८॥
जो श्रीकृष्ण ज्ञान्यांचा वडील आहे, सर्व पहाणार्‍यांच्या दृष्टीचा जो प्रकाशक आहे व ज्या समर्थांचा संकल्प विश्वाची उभारणी करतो ॥६-१०८॥

प्रणवाचिये पेठे । जाहलें शब्दब्रह्म माजिठे ।
तें जयाचिया यशा धाकुटें । वेढूं न पुरे ॥६-१०९॥
ॐकाराच्या पेठेत तयार झालेले वेदरूपी वस्त्र हे ज्याच्या सहा गुणांपैकी एक जे यश, त्या यशाला अपुरे असल्यामुळे वेढू शकले नाही, (वेदाकडून ज्या श्रीकृष्णाच्या यशाचे संपूर्ण वर्णन झाले नाही) ॥६-१०९॥

जयाचेनि आंगिकें तेजें । आवो रविशशीचिये वणिजे ।
म्हणौनि जग हें वेशजे- । वीण असे तया ॥६-११०॥
ज्याच्या (श्रीकृष्णाच्या) अंगातील तेजाने सूर्य-चंद्रांच्या व्यापाराला जोर आहे, तर मग जग हे त्याच्यावाचून प्रकाशित आहे काय ? ॥६-११०॥

हां गा नामचि एक जयाचें । पाहतां गगनही दिसे टांचें ।
गुण एकैक काय तयाचे । आकळशील तूं ॥६-१११॥
(ज्ञानेश्वर महाराज आपल्या मनाला म्हणतात, हे मना) ज्या भगवंताच्या नामाचे माहात्म्य पाहिले असता त्याच्या पुढे आकाशही कमी दिसते. त्या भगवंताचे एक एक गुण तू कसे जाणशील ? ॥६-१११॥

म्हणौनि असो हें वानणें । सांगों नेणों कवणाचीं लक्षणें ।
दावावीं मिषें येणें । कां बोलिलों तें ॥६-११२॥
म्हणून हे वर्णन करणे पुरे. या संतांची लक्षणे सांगण्याच्या निमित्ताने देवाने कोणाची लक्षणे सांगितली व ती का सांगितली हे मला सांगता येत नाही. ॥६-११२॥

ऐकें द्वैताचा ठावोचि फेडी । ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी ।
तरी अर्जुना पढिये हे गोडी । नासेल हन ॥६-११३॥
(पण मला असे वाटते की) ऐक, द्वैताचा ठावठिकाणा नाहीसा करणारे असे जे आत्मज्ञान ते उघड उघड व्यक्त केले तर अर्जुन मला आवडतो ही प्रेमाची गोडी खरोखर नाहीशी होईल. ॥६-११३॥

म्हणौनि तें तैसे बोलणें । नव्हे सपातळ आड लावणें ।
केलें मनचि वेगळवाणें । भोगावया ॥६-११४॥
म्हणून भगवंत तसे बोलले नाहीत. (म्हणजे भगवंतांनी अर्जुनास ते ब्रह्म तू आहेस असा महावाक्याचा स्पष्ट बोध केला नाही). परंतु मध्ये असा बारीकसा पडदा ठेवला. (म्हणजे साधूच्या अद्वैतस्थितीच्या वर्णनाने अप्रत्यक्ष रीतीने महावाक्याचा बोध केला व अशा रीतीने देव व भक्त यांची मने प्रेमसुख भोगण्याकरता वेगळी ठेवली. ॥६-११४॥

जया सोऽहंभाव अटकु । मोक्षसुखालागोनि रंकु ।
तयाचिये दिठीचा झणें कळंकु । लागेल तुझिया प्रेमा ॥६-११५॥
जे ‘मी ब्रह्म आहे’ अशा बोधात अडकले आहेत व जे मोक्षसुखाकरता दीन झाले आहेत अशांच्या (मुमुक्षूंच्या) दृष्टीचा काळिमा तुझ्या प्रेमाला कदाचित् लागेल ॥६-११५॥

विपाये अहंभावो ययाचा जाईल । मी तेंचि हा जरी होईल ।
तरी मग काय कीजेल । एकलेया ॥६-११६॥
कदाचित् याचा मीपणा जाईल आणि हा जर मीच होईल, तर मग मी एकट्याने काय करावे ? ॥६-११६॥

दिठीची पाहतां निविजें । कां तोंड भरोनि बोलिजे ।
नातरी दाटूनि खेंव दीजे । ऐसें कवण आहे ? ॥६-११७॥
दृष्टीनेच पाहून शांत व्हावे किंवा तोंड भरून बोलावे अथवा कडकडून आलिंगन द्यावे असे दुसरे कोण आहे ? ॥६-११७॥

आपुलिया मना बरवी । असमाई गोठी जीवीं ।
ते कवणेंसि चावळावी । जरी ऐक्य जाहलें ॥६-११८॥
जी गोष्ट आपल्या मनाला चांगली वाटते आणि जी जिवात मावत नाही (म्हणजे कोणाला तरी सांगावीशी वाटते) अशी गोष्ट जर अर्जुनाचे आपणाशी ऐक्य झाले तर कोणास सांगावी ? ॥६-११८॥

इया काकुळती जनार्दनें । अन्योपदेशाचेनि हाताशनें ।
बोलामाजि मन मनें । आलिंगूं सरलें ॥६-११९॥
या प्रमाणे भगवंतांनी आपल्याविषयीची करुणा आपल्या मनात घेऊन. अन्योपदेशाच्या हातवटीने (साधूंच्या वर्णनाने) बोलण्यामधे, श्रीकृष्णांनी अर्जुनाचे अर्जुनत्व कायम ठेऊन आपल्या मनाने अर्जुनाच्या मनास आलिंगन दिले ॥६-११९॥

हें परिसतां जरी कानडें । तरी जाण पां पार्थ उघडें ।
कृष्णसुखाचेंचि रूपडें । वोतलें गा ॥६-१२०॥
हे ऐकण्यास जरी अवघड वाटले तरी (ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या मना) तू असे समज की अर्जुन हा श्रीकृष्णाच्या सुखाचीच ओतलेली उघड मूर्ति आहे. ॥६-१२०॥

हें असो वयसेचिये शेवटीं । जैसें एकचि विये वांझोटी ।
मग ते मोहाची त्रिपुटी । नाचों लागे ॥६-१२१॥
हे राहू द्या. ज्याप्रमाणे वयाच्या शेवटी (म्हातारपणी) एखाद्या वांझ स्त्रीला एकुलते एक मूल झाले असता त्या स्त्रीच्या रूपाने मग मूर्तिमंत मोहच वावरतो (मोहाने भरलेली स्त्री तिचे मूल व मोह) (तशी देवाची स्थिती झाली. ॥६-१२१॥

तैसें जाहलें श्रीअनंता । ऐसें तरी मी न म्हणतां ।
जरी तयाचा न देखतां । अतिशयो एथ ॥६-१२२॥
अर्जुनाविषयी देवाच्या प्रेमाचा अतिरेक जर मी पाहिला नसता तर मी असे (वांझोट्या बाईसारखे) देवाला झाले असे म्हटले नसते. ॥६-१२२॥

पाहा पां नवल कैसें चोज । कें उपदेशु केउतें झुंज ।
परी पुढें वालभाचें भोज । नाचत असे ॥६-१२३॥
आश्चर्य पहा, की भगवंताचे अर्जुनाचे ठिकाणी प्रेम कसे आहे ! कोठे उपदेश व कोणीकडे युद्ध ! (युद्धाचा प्रसंग ही अत्यंत विक्षेपाची जागा असल्यामुळे आत्मज्ञानाचा उपदेश करण्याला अगदी अयोग्य. परंतु अर्जुनाच्या प्रेमामुळे भगवंतांनी वेळेच्या योग्यतेकडे लक्ष न देता आत्मज्ञानाचा उपदेश केला). परंतु निश्चयेकरून श्रीकृष्ण ही अर्जुनाच्या प्रेमाची मूर्तीच अगर चित्रच नाचत आहे. ॥६-१२३॥

आवडी आणि लाजवी । व्यसन आणि शिणवी ।
पिसें आणि न भुलवी । तरी तेंचि काई ? ॥६-१२४॥
प्रेम आहे आणि ते लाज उत्पन्न करते तर ते प्रेम कसले ? तसेच व्यसन आहे आणि त्याने जर शीण होत नसेल तर ते व्यसन कसले ? वेड आहे परंतु ते जर भ्रम पाडत नसले तर ते वेड कसले ? ॥६-१२४॥

म्हणौनि भावार्थु तो ऐसा । अर्जुन मैत्रियेचा कुवासा ।
कीं सुखें श्रृंगारलिया मानसा । दर्पणु तो ॥६-१२५॥
म्हणून इतक्या बोलण्याचा अभिप्राय एवढाच की अर्जुन हा भगवंताच्या सख्य भक्तीचा आश्रय आहे. अथवा श्रृंगारलेल्या (भगवंताच्य़ा) मनाचा तो आरसाच आहे. ॥६-१२५॥

यापरी बाप पुण्यपवित्र । जगीं भक्तिबीजासि सुक्षेत्र ।
तो श्रीकृष्णकृपे पात्र । याचिलागीं ॥६-१२६॥
याप्रमाणे तो अर्जुन धन्य असून पुण्याने पावन आहे. या जगात भक्तिरूपी बी पेरण्यास तो चांगले शेत आहे आणि म्हणून कृष्णकृपेला तो पात्र झाला आहे. ॥६-१२६॥

हो कां आत्मनिवेदनातळींची । जे पीठिका होय सख्याची ।
पार्थु अधिष्ठात्री तेथिंची । मातृका गा ॥६-१२७॥
अथवा आत्मनिवेदनरूपी भक्तीच्या खालची जी सख्यभक्तीची भूमिका आहे त्यावरील अर्जुन ही मुख्य देवता आहे. ॥६-१२७॥

पासींचि गोसावी न वर्णिजे । मग पाइकाचा गुण घेईजे ।
ऐसा अर्जुनु तो सहजें । पढिये हरी ॥६-१२८॥
शेजारीच असलेल्या श्रेष्ठ प्रभूचे वर्णन न करता मग भक्ताच्या गुणांचे वर्णन करावे इतका अर्जुनच स्वाभाविक रीतीने देवास आवडतो ॥६-१२८॥

पाहां पां अनुरागें भजें । जे प्रियोत्तमें मानिजे ।
ते पतीहूनि काय न वानिजे । पतिव्रता ? ॥६-१२९॥
पहा जी नवर्‍याला प्रेमाने भजते व जिला नवरा मानतो त्या पतिव्रतेचे वर्णन तिच्या नवर्‍यापेक्षा देखील जास्त करावयास नको का ? ॥६-१२९॥

तैसा अर्जुनचि विशेषें स्तवावा । ऐसें आवडलें मज जीवा ।
जे तो त्रिभुवनींचिया दैवां । एकायतनु जाहला ॥६-१३०॥
त्याप्रमाणेच अर्जुनाचेच विशेष वर्णन करावे असेच माझ्या मनाला पसंत पडते. कारण त्रिभुवनातील सर्व भाग्य एका अर्जुनाच्याच ठिकाणी राहिले आहे. ॥६-१३०॥

जयाचिया आवडीचेनि पांगें । अमूर्तुही मूर्ती आवगें ।
पूर्णाहि परी लागे । अवस्था जयाची ॥६-१३१॥
ज्याच्या प्रेमाच्या स्वाधीन होऊन निराकार परमात्मा सगुणरूप घेतो व तो देव पूर्ण आहे परंतु त्याला देखील ज्याचा वेध लागतो ॥६-१३१॥

तंव श्रोते म्हणती दैव । कैसी बोलाची हवाव ।
काय नादातें हन बरव । जिणोनि आली ॥६-१३२॥
तेव्हा श्रोते म्हणतात काय आमचे भाग्य ? काय बोलण्याचा रंग आहे ? याच्या बोलण्याची शोभा नादब्रह्मास जिंकून आली की काय न कळे (म्हणजे याच्या बोलण्याच्या शोभेने नादब्रह्म फिके पडले) ॥६-१३२॥

हां हो नवल नोहे देशी । मऱ्हाटी बोलिजे तरी ऐशी ।
वाणें उमटताहे आकाशीं । साहित्य रंगाचे ॥६-१३३॥
अहो देशीभाषारूपी आकाशात अलंकाररूपी रंगाचे निरनिराळे प्रकार स्पष्ट होत आहेत अशी मराठी भाषा बोलता येते हे आश्चर्य नव्हे काय ? ॥६-१३३॥

कैसें उन्मेखचांदिणें तार । आणि भावार्थु पडे गार ।
हेचि श्लोकार्थ कुमुदिनी फार । साविया होती ॥६-१३४॥
ज्ञानरूपी चांदणे कसे स्वच्छ व टपोर पडले आहे. पहा, त्या व्याख्यानातला निरनिराळे अभिप्राय हाच चांदण्यांचा गारवा आहे आणि श्लोकांचा अर्थ हीच कोणी चंद्रविकासी कमळे सहज विकसित होत आहेत. ॥६-१३४॥

चाडचि निचाडां करी । ऐसी मनोरथीं ये थोरी ।
तेणें विवळले अंतरीं । तेथ डोलु आला ॥६-१३५॥
(ज्ञानेश्वर महाराजांचे) व्याख्यान ऐकण्याच्या इच्छेची थोरवी अशीच आहे की निरीच्छ पुरुषाला देखील हे व्याख्यान ऐकण्याची इच्छा होईल, असा श्रोत्यांच्या मनात व्याख्यानाविषयी प्रकाश पडल्यामुळे ते डोलू लागले. ॥६-१३५॥

तें निवृत्तिदासें जाणितलें । मग अवधान द्या म्हणितलें ।
नवल पांडवकुळीं पाहलें । कृष्णदिवसें ॥६-१३६॥
निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज यांनी ते जाणले व मग श्रोत्यांस म्हणाले, महाराज, लक्ष द्या. पांडवांच्या कुळामधे कृष्णरूपी अद्भुत दिवस उगवला आहे (कृष्णांनी त्यांच्यावर अद्भुत कृपा केली आहे).॥६-१३६॥

देवकीया उदरीं वाहिला । यशोदा सायासें पाळिला ।
कीं शेखीं उपेगा गेला । पांडवांसी ॥६-१३७॥
देवकीने त्याला वाढवले, यशोदेने त्याचे कष्टाने पालन केले, पण शेवटी तो पांडवांच्या उपयोगाला आला. ॥६-१३७॥

म्हणौनि बहुदिवस वोळगावा । कां अवसरु पाहोनि विनवावा ।
हाही सोसु तया सदैवा । पडेचिना ॥६-१३८॥
म्हणून पुष्कळ दिवस सेवा करावी किंवा वेळ पाहून विनंती करावी, एवढाही प्रयास त्या भाग्यवान अर्जुनास पडला नाही ॥६-१३८॥

हें असो कथा सांगें वेगीं । मग अर्जुन म्हणे सलगी ।
देवा इयें संतचिन्हें आंगीं । न ठकती माझ्या ॥६-१३९॥
श्रोते म्हणतात हे राहू दे, लवकर चालू विषय सांग. (यावर ज्ञानदेव म्हणतात) मग अर्जुन सलगीने म्हणाला, कृष्णा, ही संतांची लक्षणे माझ्या अंगात वसत नाहीत. ॥६-१३९॥

एऱ्हवीं या लक्षणांचिया निजसारा । मी अपाडें कीर अपुरा ।
परि तुमचेनि बोलें अवधारा । थोरावें जरी ॥६-१४०॥
येर्‍हवी या लक्षणांच्या तात्पर्याचा विचार केला तर मी खरोखर फारच अपुरा पडेन. परंतु ऐका, जर माझ्यात मोठेपणा आला तर तो तुमच्या बोलण्यानेच येईल. ॥६-१४०॥

जी तुम्ही चित्त देयाल । तरी ब्रह्म मियां होईजेल ।
काय जहालें अभ्यासिजेल । सांगाल जें ॥६-१४१॥
महाराज, तुम्ही लक्ष द्याल तर मी ब्रह्म होईन. आणि सांगाल तो अभ्यास करीन, न करायला काय झाले ? ॥६-१४१॥

हां हो नेणों कवणाची काहाणी । आइकोनि श्लाघिजत असों अंतःकरणीं ।
ऐसी जहालेपणाची शिरयाणी ।कायसी देवा ॥६-१४२॥
अहो देवा, आपण कोणाची गोष्ट सांगता हे कळत नाही. (परंतु) ती ऐकून मनात मी त्यांची स्तुती करत आहे. अशी लक्षणे ज्यांच्या अंगात सिद्ध असतील, त्य़ांचे महत्व कसे असेल बरे ? ॥६-१४२॥

हें आंगें म्यां होईजो का । येतुलें गोसावी आपुलेपणें कीजो कां ।
तंव हांसोनि श्रीकृष्ण हो कां । करूं म्हणती ॥६-१४३॥
ते मी स्वत: व्हावे येवढे प्रभु मी आपला आहे, असे समजून आपण करावे. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणतात, असे का तुझे म्हणणे आहे ? तर तसे करू बरे ! ॥६-१४३॥

देखा संतोषु एक न जोडे । तंवचि सुखाचें सैंघ सांकडें ।
मग जोडलिया कवणीकडे । अपुरें असे ? ॥६-१४४॥
पहा, जोपर्यंत एक समाधान प्राप्त झाले नाही, तोपर्यंत सुखाचा चोहिकडे दुष्काळ असतो. पण एकदा संतोष पूर्णपणे प्राप्त झाल्यावर मग सुखाला कोठे कमी आहे ? ॥६-१४४॥

तैसा सर्वेश्वरु बळिया सेवकें । म्हणौनि ब्रह्मही होय तो कौतुकें ।
परि कैसा भारें आतला पिकें । दैवाचेनि ॥६-१४५॥
त्याप्रमाणे सर्वशक्तिमान सर्वेश्वराचा अर्जुन सेवक आहे, म्हणून तो सहज ब्रह्मही होईल. पण अर्जुनाच्या दैवाच्या वजनाने दडपल्यामुळे श्रीकृष्ण कशाप्रकारे फलद्रूप झाला ते पहा. ॥६-१४५॥

जो जन्मसहस्रांचियासाठीं । इंद्रादिकांही महागु भेटी ।
तो आधीनु केतुला किरीटी । जे बोलुही न साहे ॥६-१४६॥
इंद्रादिकांना देखील हजारो जन्म घेतले तरी ज्याची भेट होणे दुर्मिळ तो अर्जुनाच्या किती स्वाधीन झाला आहे ! अर्जुनाचे प्रश्न करणेही त्याला सहन होत नाही (कारण अर्जुनाने प्रश्न करण्यापूर्वीच देवाची सांगण्याची तयारी असते.) ॥६-१४६॥

मग ऐका जें पांडवें । म्हणितलें म्यां ब्रह्म होआवें ।
तें अशेषही देवें । अवधारिलें ॥६-१४७॥
मग ऐका, अर्जुनाने ‘मी ब्रह्म व्हावे’ असे जे म्हटले ते श्रीकृष्णांनी पूर्णपणे ऐकले. ॥६-१४७॥

तेथ ऐसेंचि एक विचारिलें । जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले ।
परि उदरा वैराग्य आहे आलें । बुद्धीचिया ॥६-१४८॥
परंतु भगवंतांनी तेथे असा विचार केला की ज्य़ाअर्थी अर्जुनाला ब्रह्मत्वाचे डोहाळे लागले आहेत, त्या अर्थी याच्या पोटात वैराग्याचा गर्भ राहिला आहे. ॥६-१४८॥

एऱ्हवीं दिवस तरी अपुरे । परी वैराग्यवसंताचेनि भरें ।
जे सोऽहंभाव महुरे । मोडोनि आला ॥६-१४९॥
सहज विचार करून पाहिले तर ब्रह्म होण्याला यास दिवस कमी आहेत. परंतु वैराग्यरूपी वसंताच्या भराने ‘मी ब्रह्म आहे’ असा भावरूपी मोहोर दाट आला आहे. ॥६-१४९॥

म्हणौनि प्राप्तिफळीं फळतां । यासि वेळु न लगेल आतां ।
होय विरक्तु ऐसा अनंता । भरंवसा जाहला ॥६-१५०॥
म्हणून हे ब्रह्मप्राप्ती हे फळ येण्यास आता यास उशीर लागणार नाही, अशा रीतीने हा वैराग्यसंपन्न झाला आहे, अशी देवाची पूर्ण खात्री झाली. ॥६-१५०॥

म्हणे जें जें हा अधिष्ठील । तें आरंभींच यया फळेल ।
म्हणौनि सांगितला न वचेल । अभ्यासु वायां ॥६-१५१॥
(श्रीकृष्ण आपल्यापाशी) म्हणाले की हा अर्जुन ज्या ज्या कर्माचे आचरण करेल ते ते याला आरंभालाच फळास येईल. म्हणून याला सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही. ॥६-१५१॥

ऐसें विवरोनियां श्रीहरी । म्हणितलें तिये अवसरीं ।
अर्जुना हा अवधारीं । पंथराजु ॥६-१५२॥
(ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) श्रीकृष्णाने असा दूरवर विचार करून त्यावेळेला म्हटले, अर्जुना, हा सर्वोत्कृष्ट मार्ग ऐक. ॥६-१५२॥

तेथ प्रवृत्तितरूच्या बुडीं । दिसती निवृत्तिफळाचिया कोडी ।
जिये मार्गींचा कापडी । महेशु अजुनी ॥६-१५३॥
या मार्गामधे प्रावृत्तिरूपी झाडाच्या बुडालाच निवृत्तिरूपी कोट्यावधी फळे दिसत आहेत. (म्हणजे ज्या मार्गाचे आचरण करावयास लागले असता मोक्षरूपी फळ मिळते) व या मार्गाचे श्रीशंकर अद्यापपर्यंत यात्रेकरू आहेत. ॥६-१५३॥

पैल योगवृंदे वहिलीं । आडवीं आकाशीं निघालीं ।
कीं तेथ अनुभवाच्या पाउलीं । धोरणु पडिला ॥६-१५४॥
योग्यांचे समुदाय सुषुम्नेच्या संकोचित मार्गाने मूर्ध्नी आकाशाकडे सत्वर जावयास निघाले व असे योग्यांचे समुदाय अनुभवाच्या पाउलांनी जाता जाता तो मार्ग सुलभ झाला. ॥६-१५४॥

तिहीं आत्मबोधाचेनि उजुकारें । धांव घेतली एकसरें ।
कीं येर सकळ मार्ग निदसुरे । सांडूनियां ॥६-१५५॥
त्यांनी इतर सर्व अज्ञानाचे मार्ग टाकून आत्मज्ञानाच्या सरळ मार्गाने एकसारखी धाव घेतली. ॥६-१५५॥

पाठीं महर्षी येणें आले । साधकांचे सिद्ध जाहाले ।
आत्मविद थोरावले । येणेंचि पंथें ॥६-१५६॥
नंतर महर्षी याच मार्गाने साधकाचे सिद्ध झाले व याच मार्गाने आत्मज्ञानी पुरुष महत्व पावले. ॥६-१५६॥

हा मार्गु जैं देखिजे । तैं तहान भूक विसरिजे ।
रात्रिदिवसु नेणिजे । वाटे इये ॥६-१५७॥
या मार्गाची ओळख झाली असता तहानभुकेची आठवण रहात नाही. या रस्त्यावर रात्र व दिवस यांची कल्पना येत नाही. ॥६-१५७॥

चालतां पाऊल जेथ पडे । तेथ अपवर्गाची खाणी उघडे ।
आव्हांटलिया तरी जोडे । स्वर्गसुख ॥६-१५८॥
या मार्गाने जात असता जेथे जेथे पाऊल पडेल तेथे तेथे मोक्षाची खाणच उघडते. आणि या मार्गाचे आचरण करणारा जरी भलत्या मार्गाला लागला तथापि त्यास स्वर्गसुख मिळते. ॥६-१५८॥

निगिजे पूर्वींलिया मोहरा । कीं येइजे पश्चिमेचिया घरा ।
निश्चळपणें धनुर्धरा । चालणें एथिंचें ॥६-१५९॥
अर्जुना, (या मार्गात) पूर्वदिशेच्या मार्गाने निघून पश्चिम दिशेच्या घरास यावे असे आहे. या मार्गाचे चालणे स्थिरपणाने आहे. (मनाचा स्थिरपणा हेच या मार्गाचे चालणे आहे). ॥६-१५९॥

येणें मार्गें जया ठाया जाइजे । तो गांवो आपणचि होईजे ।
हें सांगों काय सहजें । जाणसी तूं ॥६-१६०॥
या मार्गाने ज्या मुक्कामास जायचे तो गावच आपण होतो, हे कशास सांगावयास पाहिजे ? तुला ते सहजच कळेल. ॥६-१६०॥

तेथ पार्थें म्हणितलें देवा । तरी तेंचि मग केव्हां ।
कां आर्तिसमुद्रौनि न काढावा । बुडतु जी मी ॥६-१६१॥
तेव्हा अर्जुन म्हणाला, कृष्णा, (तर मग) तेच तुम्ही केव्हा करणार ? मी उत्कंठारूप समुद्रात बुडत असतांना त्यातून तुम्ही मला का काढीत नाही ? ॥६-१६१॥

तंव श्रीकृष्ण म्हणती ऐसें । हें उत्सृंखळ बोलणें कायसें ।
आम्हीं सांगतसों आपैसें । वरि पुशिलें तुवां ॥६-१६२॥
तेव्हा कृष्ण म्हणाले, असे हे उतावीळपणाचे भाषण कशाकरता ? आम्ही आपण होऊन सांगत होतो, आणखी त्यात तू तेच विचारलेस. ॥६-१६२॥



[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः ।
नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ॥६-११॥
शुद्ध अशा स्थानी, अति उंच नाही, अति सखल नाही, असे दर्भावर अजिन (मृगादिकांचे चर्म) व त्यावर वस्त्र ठेवलेले असे आपले स्थिर आसन स्थापन करून ॥६-११॥

तरी विशेषें आतां बोलिजेल । परि तें अनुभवें उपेगा जाईल ।
म्हणौनि तैसें एक लागेल । स्थान पाहावें ॥६-१६३॥
तर आताच सविस्तर प्रतिपादन केले जाईल. परंतु त्याप्रमाणे अनुष्ठान करून अनुभाव घेतला तरच त्याचा उपयोग होईल. त्याकरता अभ्यासाला योग्य असे ठिकाण पहाणे जरुर आहे. ॥६-१६३॥

जेथ अराणुकेचेनि कोडें । बैसलिया उठों नावडे ।
वैराग्यासी दुणीव चढे । देखिलिया जें ॥६-१६४॥
ज्या ठिकाणी सहज बसले असता असे समाधान प्राप्त होते की तेथून उठावे असे वाटत नाही व जे पाहिल्याबरोबर वैराग्यास दुप्पट जोर येतो. ॥६-१६४॥

जो संतीं वसविला ठावो । संतोषासि सावावो ।
मना होय उत्सावो । धैर्याचा ॥६-१६५॥
जेथे संतांनी वास्तव्य केले आहे आणि ज्या ठिकाणी समाधानाला साहाय्य मिळून मनाला धैर्याचा उल्हास येतो ॥६-१६५॥

अभ्यासुचि आपणयातें करी । हृदयातें अनुभवु वरी ।
ऐसी रम्यपणाची थोरी । अखंड जेथ ॥६-१६६॥
जेथे अभ्यासच आपण आपल्याला साधकाकडून करवतो व अनुभव आपण होऊन साधकांच्या अंत:काणाला माळ घालतो याप्रमाणे जेथे रम्यपणाचे माहात्म्य निरंतर आहे. ॥६-१६६॥

जया आड जातां पार्था । तपश्चर्या मनोरथा ।
पाखांडियाही आस्था । समूळ होय ॥६-१६७॥
अर्जुना, ज्या स्थानावरून सहज गेले असता नास्तिकाला देखील तपश्चर्या करावी अशी पूर्णपणे मनापासून आस्था वाटते. ॥६-१६७॥

स्वभावें वाटे येतां । जरी वरपडा जाहला अवचितां ।
तरी सकामुही परि माघौता । निघों विसरे ॥६-१६८॥
सहज वाटेने येत असता जर कोणी अकस्मात् त्या ठिकाणी आला तर तो विषयासक्त जरी असला, तरीही तो परत माघारी जाण्याचे विसरतो. ॥६-१६८॥

ऐसेनि न राहतयातें राहावी । भ्रमतयातें बैसवी ।
थापटूनि चेववी । विरक्तीतें ॥६-१६९॥
याप्रमाणे जे स्थान न रहाणार्‍याला रहावयास लावते, व भटकणार्‍याला एके ठिकाणी बसवते आणि वैराग्याला थापटी मारून जागे करते ॥६-१६९॥

हें राज्य वर सांडिजे । मग निवांता एथेंचि असिजे ।
ऐसें श्रृंगारियांहि उपजे । देखतखेंवो ॥६-१७०॥
जे स्थान पाहिल्याबरोबर एखाद्या विलासी पुरुषाला सुद्धा असे वाटावे की या स्थानावरून राज्य ओवाळून टाकावे व येथेच स्वस्थपणे रहावे. ॥६-१७०॥

जें येणें मानें बरवंट । आणि तैसेंचि अतिचोखट ।
जेथ अधिष्ठान प्रगट । डोळां दिसे ॥६-१७१॥
जे स्थान इतके सुंदर आणि तसेच अतिशय पवित्र असून जेथे डोळ्याला ब्रह्म स्पष्ट दिसते ॥६-१७१॥

आणिकही एक पहावें । जें साधकीं वसतें होआवें ।
आणि जनाचेनि पायरवें । रुळेचिना ॥६-१७२॥
आणखीही त्या स्थानाचे लक्षण पहावे, ते हे की ज्या स्थानी राहिलेले साधक असावेत व जे स्थान लोकांच्या येण्याजाण्याने मळलेले (वहिवाटलेले) नसावे. ॥६-१७२॥

जेथ अमृताचेनि पाडें । मुळाहीसकट गोडें ।
जोडती दाटें झाडें । सदा फळतीं ॥६-१७३॥
जेथे अमृताच्या योग्यतेची मुळासकट गोड असलेली व नेहेमी फळणारी अशी दाट झाडे लागतात ॥६-१७३॥

पाउला पाउला उदकें । वर्षाकाळेंही अतिचोखें ।
निर्झरें का विशेखें । सुलभें जेथ ॥६-१७४॥
ज्या ठिकाणी पावलोपावली पाणी आहे, पण ते पावसाळ्यातही निर्मळ असते, व जेथे तर विशेष करून पाण्याचे झरे सहज आढळतात. ॥६-१७४॥

हा आतपुही आळुमाळु । जाणिजे तरी शीतळु ।
पवनु अति निश्चळु । मंदु झुळके ॥६-१७५॥
हे ऊन देखील जेथे सौम्य भासते आणि जेथे वारा अतिशय शांत असून त्याच्या मंद झुळुका येत असतात ॥६-१७५॥

बहुत करूनि निःशब्द । दाट न रिगे श्वापद ।
शुक हन षट्पद । तेउतें नाहीं ॥६-१७६॥
जे स्थान बहुतेक नि:शब्द असावे व ज्या ठिकाणी राघू आणि भ्रमर नसावेत, ॥६-१७६॥

पाणिलगें हंसें । दोनी चारी सारसें ।
कवणे एके वेळे बैसे । तरी कोकिळही हो ॥६-१७७॥
ज्या ठिकाणी पाण्याच्या संबंधाने असणारे हंस, दोन चार चक्रवाक, कोणी एखाद्या वेळेला कोकिळही असला तरी चालेल. ॥६-१७७॥

निरंतर नाहीं । तरी आलीं गेलीं कांहीं ।
होतु कां मयूरेंही । आम्ही ना न म्हणों ॥६-१७८॥
जेथे नेहेमी जरी नाही तरी येऊन जाऊन असणारे काही मोरही असले तरी त्यास आमची ना नाही. ॥६-१७८॥

परि आवश्यक पांडवा । ऐसा ठावो जोडावा ।
तेथ निगूढ मठ होआवा । कां शिवालय ॥६-१७९॥
परंतु अर्जुना असे स्थान जरुर शोधून ठेवावे. त्या ठिकाणी सहज दृष्टीस न पडणारा एखादा मठ अथवा शंकराचे देऊळ असावे. ॥६-१७९॥

दोहींमाजीं आवडे तें । जें मानलें होय चित्तें ।
बहुतकरूनि एकांते । बैसिजे गा ॥६-१८०॥
या दोहोमध्ये जे मनाला मानेल असे एक स्थान असावे. बहुतकरून एकांतात बसावे. ॥६-१८०॥

म्हणौनि तैसें तें जाणावें । मन राहतें पाहावें ।
राहील तेथ रचावें । आसन ऐसें ॥६-१८१॥
म्हणून ते स्थान तसे आहे की नाही हे समजून घ्यावे. आपले मन तेथे स्थिर रहाते की नाही ते पहावे आणि राहील तर तेथे आसन लावावे. ॥६-१८१॥

वरी चोखट मृगसेवडी । माजीं धूतवस्त्राची घडी ।
तळवटीं अमोडी । कुशांकुर ॥६-१८२॥
तळास साग्र दर्भ घालून त्यावर शुद्ध कृष्णाजिन घालून त्यावर धुतलेल्या वस्त्राची घडी घालावी. ॥६-१८२॥

सकोमळ सरिसे । सुबद्ध राहती आपैसे ।
एकपाडें तैसें । वोजा घालीं ॥६-१८३॥
ते दर्भ कोवळे असून सारखे व सहजच एकमेकाला लागलेले रहातील असे व्यवस्थेने घालावेत. ॥६-१८३॥

परि सावियाचि उंच होईल । तरी आंग हन डोलेल ।
नीच तरी पावेल । भूमिदोषु ॥६-१८४॥
परंतु ते आसन कदाचित उंच होईल तर शरीर कलंडेल आणि सखल होईल तर जमिनीचे (गारवा वगैरे दोष प्राप्त होतील. ॥६-१८४॥

म्हणौनि तैसें न करावें । समभावें धरावें ।
हें बहु असो होआवें । आसन ऐसें ॥६-१८५॥
म्हणून आसन उंच अथवा सखल होऊ देऊ नये, तर ते समांतर घालावे. आता हे फार वर्णन करणे पुरे. अशा प्रकारचे आसन असावे. ॥६-१८५॥

तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः ।
उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये ॥६-१२॥
त्या ठिकाणी मन एकाग्र करून आसनावर वसलेल्या आणि चित्त व इंद्रिये यांच्या क्रियांचे नियमन केलेल्या, अशा योग्याने अंत:करणाच्या शुद्धीसाठी योगाचा अभ्यास करावा. ॥६-१२॥

मग तेथ आपण । एकाग्र अंतःकरण ।
करूनि सद्गुरुस्मरण । अनुभविजे ॥६-१८६॥
मग तेथे आपण एकाग्र अंत:करण करून मनात सद्गुरूचे स्मरण करावे. ॥६-१८६॥

जेथ स्मरतेनि आदरें । सबाह्य सात्त्विकें भरे ।
जंव काठिण्य विरे । अहंभावाचें ॥६-१८७॥
त्या स्मरणाच्या आदराने अहंकाराचा कठिणपणा इतका नाहीसा होतो की तो स्मरण करणारा आत बाहेर सात्विक भावांनी व्याप्त होतो. ॥६-१८७॥

विषयांचा विसरु पडे । इंद्रियांची कसमस मोडे ।
मनाची घडी घडे । हृदयामाजीं ॥६-१८८॥
विषयांचा विसर पडतो, इंद्रियांची रग मोडते, अंत:करणाच्या ठिकाणी मनाची स्थिरता होते. ॥६-१८८॥

ऐसें ऐक्य हें सहजें । फावें तंव राहिजे ।
मग तेणेंचि बोधें बैसिजे । आसनावरी ॥६-१८९॥
याप्रमाणे ऐक्य प्राप्त होईपर्यंत थांबावे व मग त्याच ऐक्याच्या बोधाने आसनावर बसावे. ॥६-१८९॥

समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः ।
संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ॥६-१३॥
काया म्हणजे शरीराचा मधला भाग, मस्तक व मान ही सरळ आणि अचल धारण करणारा, निश्चल, स्वत:च्या नाकाच्या अग्रभागाकडे दृष्टि लावलेला व दिशांकडे न पहाणारा ॥६-१३॥

आतां आंगातें आंग वरी । पवनातें पवनु धरी ।
ऐसी अनुभवाची उजरी । होंचि लागे ॥६-१९०॥
आता आसनावर बसल्यानंतर अंगाला अंग आपण होऊन सावरून धरते, वायूच आपण होऊन आवरून धरतो, याप्रमाणे अनुभवाचा उदय होऊ लागतो. ॥६-१९०॥

प्रवृत्ति माघौति मोहरे । समाधि ऐलाडी उतरे ।
आघवें अभ्यासु सरे । बैसतखेंवो ॥६-१९१॥
प्रवृत्ति माघारी फिरते, समाधि अलीकडील तीराला येते, (आटोक्यात येते) व बसताक्षणीच सर्व अभ्यास संपतो. ॥६-१९१॥

मुद्रेची प्रौढी ऐशी । तेचि सांगिजेल आतां परियेसीं ।
तरी उरु या जघनासी । जडोनि घालीं ॥६-१९२॥
मुद्रेची थोरवी अशी आहे, तीच आता सांगतो ऐक. तर पोटर्‍याला चिकटून मांडी घालावी. ॥६-१९२॥

चरणतळें देव्हडीं । आधारद्रुमाच्या बुडीं ।
सुघटितें गाढीं । संचरीं पां ॥६-१९३॥
दोन्ही तळपाय वाकडे करून ते आधारचक्राखाली (गुदस्थानावर शिवणीपाशी) चांगले सुस्थिर रहातील असे बळकट बसवावेत. ॥६-१९३॥

सव्य तो तळीं ठेविजे । तेणें सिवणीमध्यें पीडिजे ।
वरी बैसे तो सहजें । वाम चरणु ॥६-१९४॥
(पण त्यात) उजव्या पायाची टाच खाली घालावी व तिने शिवण दाबावी, म्हणजे उजव्या पायावर स्वाभाविकच डावा पाय बसतो. ॥६-१९४॥

गुद मेंढ्राआंतौतीं । चारी अंगुळें निगुतीं ।
तेथ सार्ध सार्ध प्रांतीं । सांडूनियां ॥६-१९५॥
गुद व शिश्न यामधील बरोबर जी चार बोटे जागा आहे त्यापैकी दीड बोट वर व दीड बोट खाली जागा सोडून ॥६-१९५॥

माजी अंगुळ एक निगे । तेथ टांचेचेनि उत्तरभागें ।
नेहेटिजे वरि आंगें । पेललेनि ॥६-१९६॥
मध्ये जी एक बोटभर जागा रहाते तेथे उजव्या पायाच्या टाचेच्या उत्तर भागाने आपले आंग वर तोलून घट्ट दाबावे. ॥६-१९६॥

उचलिलें कां नेणिजे । तैसें पृष्ठांत उचलिजे ।
गुल्फद्वय धरिजे । तेणेंचि मानें ॥६-१९७॥
उचलला आहे की नाही हे कळे न कळे असा तर्‍हेने (थोड्या प्रमाणात) पाठीचा खालचा भाग उचलावा व त्याच प्रकारे दोन्ही घोटे उचलून धरावेत. ॥६-१९७॥

मग शरीर संचु पार्था । अशेषही सर्वथा ।
पार्ष्णीचा माथा । स्वयंभु होय ॥६-१९८॥
अर्जुना, मग हा सर्व शरीराचा आकार जसा काही अगदी खालच्या पायाच्या टाचेचा वरचा स्वयंभू भागच आहे असा होऊन जातो. ॥६-१९८॥

अर्जुना हें जाण । मूळबंधाचें लक्षण ।
वज्रासन गौण । नाम यासी ॥६-१९९॥
अर्जुना, हे मूळबंधाचे लक्षण आहे असे समज व याचेच वज्रासन असे गौण नाव आहे. ॥६-१९९॥

ऐसी आधारीं मुद्रा पडे । आणि आधींचा मार्गु मोडे ।
तेथ अपानु आंतुलेकडे । वोहोटों लागे ॥६-२००॥
याप्रमाणे आधारचक्रावर मूळबंध बरोबर लागला आणि खालचा मार्ग बंद पडला म्हणजे अपान वायु आतल्याआत संकोचित होऊ लागतो. ॥६-२००॥

तंव करसंपुट आपैसें । वाम चरणीं बैसे ।
तंव बाहुमूळीं दिसे । थोरीव आली ॥६-२०१॥
तेव्हा द्रोणाकार झालेली हस्तांजुळी सहजच डाव्या पावलावर बसते व त्यामुळे दोन्ही खांदे वर चढलेले दिसतात. ॥६-२०१॥

माजीं उभारलेनि दंडें । शिरकमळ होय गाढें ।
नेत्रद्वारींचीं कवाडें । लागूं पाहती ॥६-२०२॥
पाठीच्या उभ्या कण्याच्या योगाने वर चढलेल्या खांद्यात मस्तक घट्ट रहाते व डोळ्यांच्या पापण्या झाकावयास लागतात. ॥६-२०२॥

वरचिलें पातीं ढळतीं । तळींचीं तळीं पुंजाळती ।
तेथ अर्धोन्मीलित स्थिती । उपजे तया ॥६-२०३॥
वरच्या पापण्यास काही ढाळ होऊन खालच्या पापण्या खाली पसरतात, तेव्हा अर्धी उघडी अशी त्या डोळ्यांची स्थिती होते. ॥६-२०३॥

दिठी राहोनि आंतुलीकडे । बाहेर पाऊल घाली कोडें ।
ते ठायीं ठावो पडे । नासाग्रपीठीं ॥६-२०४॥
दृष्टी ही आतल्या आत डोळ्यातच रहाते, जर कौतुकाने बाहेर आलीच तर ती नेमकी नाकाच्या शेंड्यावरच पडते ॥६-२०४॥

ऐसें आंतुच्या आंतुचि रचे । बाहेरी मागुतें न वचे ।
म्हणौनि राहणें आधिये दिठीचें । तेथेंचि होय ॥६-२०५॥
अशी आतल्या आत दृष्टि रहाते, ती पुन्हा बाहेर येत नाही, म्हणून अर्ध्या दृष्टीचे रहाणे नाकाच्या शेंड्यावरच होते. ॥६-२०५॥

आतां दिशांची भेटी घ्यावी । कां रूपाची वास पहावी ।
हे चाड सरे आघवी । आपैसया ॥६-२०६॥
आता दिशांची गाठ घेण्याची (चोहोकडे पहाण्याची) अथवा रूप विषय पहाण्याची इच्छा आपोआपच नाहीशी होते. ॥६-२०६॥

मग कंठनाळ आटे । हनुवटी हडौती दाटे ।
ते गाढी होऊनि नेहटे । वक्षःस्थळीं ॥६-२०७॥
मग गळा आकुंचित होऊन गळ्याखालच्या खळगीत हनुवटी अडकून बसते, ती तेथे घट्ट बसून छातीवर दावून बसते. ॥६-२०७॥

माजीं घंटिका लोपे । वरी बंधु जो आरोपे ।
तो जालंधरु म्हणिपे । पंडुकुमरा ॥६-२०८॥
अर्जुना, त्यामधे कंठमणी (गळ्याची घाटी) अदृश्य होतो, असा जो बंध पडतो त्याला जालंधर बंध असे म्हणतात. ॥६-२०८॥

नाभीवरी पोखे । उदर हें थोके ।
अंतरीं फांके । हृदयकोशु ॥६-२०९॥
जो वोढियाणा बंधामधे बेंबीवर पुष्ट होतो, पोट खपाटीला जाते आणि हृदयकमल आत प्रफुल्लित होते ॥६-२०९॥

स्वाधिष्ठानावरिचिले कांठीं । नाभिस्थानातळवटीं ।
बंधु पडे किरीटी । वोढियाणा तो ॥६-२१०॥
अर्जुना, शिश्नावरील काठास व बेंबीच्या खालच्या भागास जो बंध पडतो त्याला वोढियाणा बंध असे म्हणतात. ॥६-२१०॥

ऐसी शरीराबाहेरलीकडे । अभ्यासाची पांखर पडे ।
तंव आंतु त्राय मोडे । मनोधर्माची ॥६-२११॥
याप्रमाणे शरीराच्या बाहेरच्या बाजूला अभ्यासाची छाया पसरते. तो आतल्या बाजूस मनाच्या चंचलतेचा जोर नाहीसा होतो. ॥६-२११॥

कल्पना निमे । प्रवृत्ती शमे ।
आंग मन विरमे । सावियाचि ॥६-२१२॥
कल्पना नाहीशी होते, मनाची बाह्य विषयांकडे धाव थांबते व सहजच आणि मन शांत होते. ॥६-२१२॥

क्षुधा काय जाहाली । निद्रा केउती गेली ।
हे आठवणही हारपली । न दिसे वेगां ॥६-२१३॥
भूक काय झाली, झोप कोठे गेली, याची आठवण देखील राहिली नाही. ॥६-२१३॥

जो मूळबंधें कोंडला । अपानु माघौता मुरडला ।
तो सवेंचि वरी सांकडला । धरी फुगूं ॥६-२१४॥
जो अपानवायु मूलबंध कोंडलेला असतो तो ऊर्ध्वगतीने माघारा फिरून सहजच वर अवघडल्यामुळे फुगवटा धरतो. ॥६-२१४॥

क्षोभलेपणें माजे । उवाइला ठायीं गाजे ।
मणिपूरेंसीं झुंजे । राहोनियां ॥६-२१५॥
खवळून तो अपानवायु मस्त होतो व पसरल्या ठिकाणी गुरगुरू लागतो व तेथेच राहून मणिपूर चक्राला धक्के देतो. ॥६-२१५॥

मग थावलिये वाहटुळी । सैंघ घेऊनि घर डहुळी ।
बाळपणींची कुहीटुळी । बाहेर घाली ॥६-२१६॥
मग ती अपान वायूची बळावलेली वाहुटळ सर्व शरीराच्या आत शोधन करून लहानपणीची पोटातील कुचकी घाण बाहेर घालते. ॥६-२१६॥

भीतरीं वळी न धरे । कोठ्यामाजीं संचरे ।
कफपित्तांचे थारे । उरों नेदी ॥६-२१७॥
त्या अपानवायूला आत वळण्याला कोठे जागा नसल्यामुळे, तो मग कोठ्यात प्रवेश करतो व तेथे असलेले कफ आणि पित यांचा थारा राहू देत नाही. ॥६-२१७॥

धातूंचे समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी ।
आंतली मज्जा काढी । अस्थिगत ॥६-२१८॥
सप्तधातूंचे समुद्र पालथे करतो, मेदाचे पर्वत फोडतो व हाडामधील मज्जा बाहेर काढतो. ॥६-२१८॥

नाडीतें सोडवी । गात्रांतें विघडवी ।
साधकातें भेडसावी । परी बिहावें ना ॥६-२१९॥
नाड्या खुल्या करतो, अवयव शिथील करतो व साधकाला भीती दाखवतो. परंतु त्याने भिऊ नये. ॥६-२१९॥



[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



प्रशांतात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थितः ।
मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः ॥६-१४॥
अंत:करण शांत असलेला, भीतिरहित, ब्रह्मचर्यव्रत पालन करणारा, माझे ठिकाणी चित्त ठेवणारा, मत्परायण व मनाचे संयमन केलेला असा होऊन (आसनावर) बसावे. ॥६-१४॥

व्याधीतें दावी । सवेंचि हरवी ।
आप पृथ्वी कालवी । एकवाट ॥६-२२०॥
रोगांना दाखवतो व लागलीच त्यांना नाहीसे करतो आणि शरीरात जे पृथ्वीचे आणि पाण्याचे अंश आहेत ते एकात एक कालवतो. ॥६-२२०॥

तंव येरीकडे धनुर्धरा । आसनाचा उबारा ।
शक्ति करी उजगरा । कुंडलिनीतें ॥६-२२१॥
अर्जुना, (कोंडलेला अपानवायु असे प्रकार करतो तो) दुसरीकडे वज्रासनाची उष्णता कुंडलिनी शक्तीला जागृत करते. ॥६-२२१॥

नागिणीचें पिलें । कुंकुमें नाहलें ।
वळण घेऊनि आलें । सेजे जैसें ॥६-२२२॥
केशराने न्हालेले नागाचे पिल्लु वेढे घेऊन निजावे ॥६-२२२॥

तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी ।
अधोमुख सर्पिणी । निदेली असे ॥६-२२३॥
याप्रमाणे नेमकी साडेतीन वेढ्याची ती कुंडलिनीरूपी नागीण खाली तोंड करून निजलेली आहे. ॥६-२२३॥

विद्युल्लतेची विडी । वन्हिज्वाळांची घडी ।
पंधरेयाची चोखडी । घोंटीव जैशी ॥६-२२४॥
ती नागीण जशी मूर्तिमंत बनवलेली वीजेची वाटोळी कडी, किंवा प्रत्यक्ष अग्नीच्या ज्वालेची घडी अथवा जणुकाय उत्तम सोन्याचे चकचकित वेढे, ॥६-२२४॥

तैशी सुबद्ध आटली । पुटीं होती दाटली ।
तें वज्रासनें चिमुटली । सावधु होय ॥६-२२५॥
याप्रमाणे व्यवस्थितपणे आकुंचित असलेली व नाभीजवळच्या संकोचित जाग्यात ती वज्रासनाने दाटून बसलेली चिमट्यामुळे जागी होते. ॥६-२२५॥

तेथ नक्षत्र जैसें उलंडलें । कीं सूर्याचें आसन मोडलें ।
तेजाचें बीज विरूढलें । अंकुरेंशीं ॥६-२२६॥
त्या ठिकाणी जसे नक्षत्र तुटून पडावे अथवा सूर्याने आपले जसे आसन सोडून खाली यावे किंवा प्रकाशरूप बीजासच अंकुर फुटावा ॥६-२२६॥

तैशी वेढियातें सोडिती । कवतिकें आंग मोडिती ।
कंदावरी शक्ती । उठली दिसे ॥६-२२७॥
त्याप्रमाणे वेढ्याला सोडीत असलेली व कौतुकाने अंग मोडीत असलेली ती कुंडलिनी शक्ति नाभीस्थानाखालील कंदावर उठलेली दिसते. ॥६-२२७॥

सहजें बहुतां दिवसांची भूक । वरी चेवविली तें होय मिष ।
मग आवेशें पसरी मुख । ऊर्ध्वा उजू ॥६-२२८॥
आधीच तिला पुष्कळ दिवसांची भूक लागलेली असते व तशात तिला जागे केल्याचे निमित्त होते. मग ती सरळ असे वरती तोंड पसरते. ॥६-२२८॥

तेथ हृदयकोशातळवटीं । जो पवनु भरे किरीटी ।
तया सगळेयाचि मिठी । देऊनि घाली ॥६-२२९॥
अर्जुना, हृदयकोशाखाली जो वारा भरलेला असतो त्या सगळ्या वायूस ती खाऊन टाकते. ॥६-२२९॥

मुखींच्या ज्वाळीं । तळीं वरी कवळी ।
मांसाची वडवाळी । आरोगूं लागे ॥६-२३०॥
मुखाच्या ज्वाळांनी ती खालीवर व्यापते आणि मांसाचे घास खावयास लागते. ॥६-२३०॥

जे जे ठाय समांस । तेथ आहाच जोडे घाउस ।
पाठी एकदोनी घांस । हियाही भरी ॥६-२३१॥
जे जे ठिकाण मांसल असेल त्या ठिकाणी वरच्यावरच मोठा लचका तोडते शिवाय हृदयाच्या ठिकाणचे सुद्धा एक दोन घास घेते. ॥६-२३१॥

मग तळवे तळहात शोधी । उर्ध्वींचे खंड भेदी ।
झाडा घे संधी । प्रत्यंगाचा ॥६-२३२॥
नंतर तळहात व तळपाय शोधून त्यातील रक्त, मांस वगैरे खाऊन) वरच्या भागाचे भेदन करते. व प्रत्येक अंगाच्या सांध्याचा झाडा घेते. ॥६-२३२॥

अधोभाग तरी न संडी । परि नखींचेंही सत्त्व काढी ।
त्वचा धुवूनि जडी । पांजरेशीं ॥६-२३३॥
आपला आश्रय तर सोडीत नाही, पण तेथेच राहून नखाचे देखील सत्व काढून घेते. व त्वचा धुवून पुसून त्या त्वचेला हाडांच्या सापळ्यास चिकटवून ठेवते. ॥६-२३३॥

अस्थींचे नळे निरपे । शिरांचे हीर वोरपे ।
तंव बाहेरी विरूढी करपे । रोमबीजांची ॥६-२३४॥
हाडांच्या नळ्या निरपून घेते व शिरांच्या काड्या ओरपून घेते. त्यावेळी बाहेरच्या केसांची वाढ होण्याची शक्ती जळून जाते. ॥६-२३४॥

मग सप्तधातूंच्या सागरीं । ताहानेली घोंट भरी ।
आणि सवेंचि उन्हाळा करी । खडखडीत ॥६-२३५॥
मग तहानेने पीडित अशी ती सप्तधातूंचा समुद्र एका घोटात पिऊन टाकते. व लागलीच शरीरात जिकडे तिकडे खडखडीत उन्हाळा करते. ॥६-२३५॥

नासापुटौनि वारा । जो जातसे अंगुळें बारा ।
तो गच्च धरूनि माघारा । आंतु घाली ॥६-२३६॥
दोन्ही नाकपुड्यातून बारा बोटे वहात असलेल्या वायूला गच्च धरून त्यास आत मागे घालते. ॥६-२३६॥

तेथ अध वरौतें आकुंचे । ऊर्ध्व तळौतें खांचे ।
तया खेंवामाजि चक्राचे । पदर उरती ॥६-२३७॥
तेव्हा खालचा अपानवायु वरती आकुंचित होतो आणि वरचा प्राणवायु खाली खचतो, त्या प्राणापानांच्या भेटीमधे षट्चक्रांचे नुसते पदर तेवढे उरतात. ॥६-२३७॥

एऱ्हवीं तरी दोन्ही तेव्हांचि मिळती । परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती ।
ते तयांतें म्हणे परौती । तुम्हीच कायसी येथे ॥६-२३९॥
येर्‍हवी तरी प्राण व अपान या दोहोंचा तेव्हाच मिलाफ झाला असता, परंतु कुंडलिनी तेथे क्षणभर क्षोभलेली असते. म्हणून ती त्यांना म्हणते, तुम्ही येथे कोण ? चालते व्हा.” ॥६-२३८॥

आइकें पार्थिव धातु आघवी । आरोगितां कांहीं नुरवी ।
आणि आपातें तंव ठेवी । पुसोनियां ॥६-२३९॥
अर्जुना ऐक. पृथ्वीसंबंधी सर्व धातु खाऊन काहीएक शिल्लक ठेवीत नाही आणि पाण्याचा भाग तर तेव्हाच चाटून पुसून टाकते. ॥६-२३९॥

ऐसी दोनी भूतें खाये । ते वेळीं संपूर्ण धाये ।
मग सौम्य होउनि राहे । सुषुम्नेपाशीं ॥६-२४०॥
याप्रमाणे पृथ्वी व जल ही दोन्ही भूते खाल्ल्यावर तिची संपूर्ण तृप्ती होते. आणि मग ती शांत होऊन सुषुम्नेजवळ रहाते. ॥६-२४०॥

तेथ तृप्तीचेनि संतोषें । गरळ जें वमी मुखें ।
तेणें तियेचेनि पीयूषें । प्राणु जिये ॥६-२४१॥
त्यावेळी तृप्त होऊन समाधान झाल्यावर ती तोंडाने जे गरळ ओकते त्या गरळरूपी अमृताच्या योगाने प्राणवायु जगतो. ॥६-२४१॥

तो अग्नि आंतूनि निघे । परी सबाह्य निववूंचि लागे ।
ते वेळीं कसु बांधिती आंगें । सांडिला पुढती ॥६-२४२॥
तो गरळरूपी अमृताचा अग्नी तिच्या तोंडातून निघतो खरा, परंतु तो अग्नी आत व बाहेर थंडच करू लागतो, त्यावेळेस सर्व गात्रांची गेलेली शक्ती पुन्हा येऊ लागते. ॥६-२४२॥

मार्ग मोडिती नाडीचे । नवविधपण वायूचें ।
जाय म्हणौनि शरीराचे । धर्मु नाहीं ॥६-२४३॥
नाड्यांचे वहाणे बंद पडते व वायूचे नऊ प्रकार जातात म्हणून शरीराचे धर्म रहात नाहीत. ॥६-२४३॥

इडा पिंगळा एकवटती । गांठी तिन्ही सुटती ।
साही पदर फुटती । चक्रांचे हे ॥६-२४४॥
इडा व पिंगळा ह्या दोन्ही नाड्या एक होतात आणि तिन्ही गांठी सुटून सहा चक्रांचेही पदर फुटतात. ॥६-२४४॥

मग शशी आणि भानु । ऐसा कल्पिजे जो अनुमानु ।
तो वातीवरी पवनु । गिंवसितां न दिसे ॥६-२४५॥
अनुमानिक कल्पनेने ठरवलेले डाव्या व उजव्या नाकपुडीतून वहाणारे चंद्रसूर्यरूपी वायु, नाकापुढे कापूस धरून पाहिले तरी दिसत नाहीत. ॥६-२४५॥

बुद्धीची पुळिका विरे । परिमळु घ्राणीं उरे ।
तोही शक्तीसवें संचरे । मध्यमेमाजीं ॥६-२४६॥
बुद्धीचा आकार (चैतन्यात) नाहीसा होतो व नाकामधे राहिलेली गंध घेण्याची जी शक्ति, ती कुंडलिनीबरोबर सुषुम्ना नाडीत शिरते. ॥६-२४६॥

तंव वरिलेकडोनि ढाळें । चंद्रामृताचें तळें ।
कानवडोनी मिळे । शक्तिमुखीं ॥६-२४७॥
तेव्हा वरच्या बाजूस हळू हळू चंद्रामृताचे तळे कलते होऊन ते चंद्रामृत कुंडलिनीच्या मुखात पडते. ॥६-२४७॥

तेणें नाळकें रस भरे । तो सर्वांगामाजीं संचरे ।
जेथिंचा तेथ मुरे । प्राणपवनु ॥६-२४८॥
त्या नळीने (कुंडलिनीने) रस भरतो, तो सर्वांगामधे संचार करतो व प्राणवायु जेथल्या तेथे मुरतो. ॥६-२४८॥

तातलिये मुसें । मेण निघोनि जाय जैसें ।
मग कोंदली राहे रसें । वोतलेनी ॥६-२४९॥
तापलेल्या मुशीतील मेण निघून गेल्यावर मग ती मूस जशी नुसत्या ओतलेल्या रसानेच भरून रहाते ॥६-२४९॥

तैसें पिंडाचेनि आकारें । ते कळाचि कां अवतरे ।
वरी त्वचेचेनि पदरे । पांघुरली असे ॥६-२५०॥
त्याप्रमाणे शरीराच्या आकाराने जणु काय त्वचेचा पदर पांघरलेले मूर्तिमंत तेजच प्रकट झालेले असते. ॥६-२५०॥

जैशी आभाळाची बुंथी । करूनि राहे गभस्ती ।
मग फिटलिया दीप्ति । धरूनि ये ॥६-२५१॥
सूर्यावर ढगांचे आवरण आले असता त्याचे तेज झाकलेले असते, पण ते ढगांचे आवरण निघून गेल्यावर मग त्याचे तेज जसे आवरून धरता येत नाही, ॥६-२५१॥

तैसा आहाचवरि कोरडा । त्वचेचा असे पातोडा ।
तो झडोनि जाय कोंडा । जैसा होय ॥६-२५२॥
त्याप्रमाणे वरवर असणारा कातड्याचा कोरडा पापुद्रा कोंड्यासारखा झडून जातो. ॥६-२५२॥

मग काश्मीरीचे स्वयंभ । कां रत्नबीजा निघाले कोंभ ।
अवयवकांतीची भांब । तैसी दिसे ॥६-२५३॥
मग जणु काय मूर्तिमंत स्फटिकच अथवा रत्नरूप बीजास निघालेला अंकुरच की काय अशी अवयवांच्या कांतीची शोभा दिसते. ॥६-२५३॥

नातरी संध्यारागींचे रंग । काढूनि वळिलें तें आंग ।
कीं अंतर्ज्योतीचें लिंग । निर्वाळिलें ॥६-२५४॥
अथवा संध्याकालाच्या आकाशरंगाचे रंग काढून बनवलेली किंवा प्रत्यगात्म्याचे शुद्ध लिंगच ॥६-२५४॥

कुंकुमाचें भरींव । सिद्धरसाचें वोतींव ।
मज पाहतां सावेव । शांतिचि ते ॥६-२५५॥
केशराचे पूर्ण भरलेले किंवा अमृताचे ओतलेले, अथवा ते पहातांना मला असे वाटते की ती मूर्तिमंत शांतीच आहे. ॥६-२५५॥

तें आनंदचित्रींचें लेप । नातरी महासुखाचें रूप ।
कीं संतोषतरूचें रोप । थांबलें जैसें ॥६-२५६॥
ते योग्याचे शरीर आनंदरूपी चित्राचा रंग अथवा ब्रह्मसुखाची प्रत्यक्ष मूर्तीच किंवा संतोषरूप झाडाचे जसे काही बळावलेले रोप आहे. ॥६-२५६॥

तो कनकचंपकाचा कळा । कीं अमृताचा पुतळा ।
नाना सासिन्नला मळा । कोंवळिकेचा ॥६-२५७॥
तो योगी सोनचाफ्याची मोठी कळी अथवा अमृताचा पुतळा किंवा नाजुकपणाचा भरास आलेला मळाच. ॥६-२५७॥

हो कां जे शारदियेचेनि वोलें । चंद्रबिंब पाल्हेलें ।
कां तेजचि मूर्त बैसलें । आसनावरी ॥६-२५८॥
किंवा शरदऋतूच्या ओलाव्याने टवटवीत झालेले चंद्रबिंबच अथवा आसनावर बसलेले मूर्तिमंत तेजच की काय ॥६-२५८॥

तैसें शरीर होये । जे वेळीं कुंडलिनी चंद्र पीये ।
मग देहाकृति बिहे । कृतांतु गा ॥६-२५९॥
ज्यावेळी कुंडलिनी चंद्रामृत पिते त्यावेळी शरीर असे होते. मग त्या देहाच्या आकाराला पाहून यम भितो. ॥६-२५९॥

वार्धक्य तरी बहुडे । तारुण्याची गांठी विघडे ।
लोपली उघडे । बाळदशा ॥६-२६०॥
म्हातारपण मागे फिरते, व तारुण्याचा वियोग होतो आणि गेलेली बाल्यावस्था परत येते. ॥६-२६०॥

वयसा तरी येतुलेवरी । एऱ्हवीं बळाचा बळार्थु करी ।
धैर्याची थोरी । निरुपमु ॥६-२६१॥
वय तर त्याचे इतके तथापि जेवढी बलवान पुरुष कृत्ये करू शकतो, तेवढी हा करतो. आणि ज्याच्या धैर्याच्या थोरवीला तर उपमा नाही ॥६-२६१॥

कनकद्रुमाच्या पालवीं । रत्नकळिका नित्य नवी ।
नखें तैसीं बरवीं । नवीं निघती ॥६-२६२॥
सोन्याच्या झाडाला पालवी फुटून जशी रत्नाची नित्य कळी यावी तशी चांगली नवी नखे येतात. ॥६-२६२॥

दांतही आन होती । परि अपाडें सानेजती ।
जैसी दुबाहीं बैसे पांती । हिरेयांची ॥६-२६३॥
दातही दुसरे नवे येतात. पण ते फार लहान होतात व ते असे दिसतात की जणुकाय दुतर्फा हिर्‍यांची रांगच बसली आहे. ॥६-२६३॥

माणिकुलियांचिया कणिया । सावियाचि अणुमानिया ।
तैसिया सर्वांगीं उधवती अणियां । रोमांचियां ॥६-२६४॥
ज्याप्रमाणे माणकाचे अणुएवढाले कण असावेत त्याप्रमाणे सहजच सर्व अंगावर केसांची अग्रे वर येतात. ॥६-२६४॥

करचरणतळें । जैसीं कां रातोत्पलें ।
पाखाळींव होती डोळे । काय सांगों ॥६-२६५॥
तळहात व तळपाय हे तांबड्या कमळाप्रमाणे असतात व डोळे किती स्वच्छ होतात हे काय सांगू ? ॥६-२६५॥

निडाराचेनि कोंदाटें । मोतियें नावरती संपुटें ।
मग शिवणी जैशी उतटे । शुक्तिपल्लवांची ॥६-२६६॥
परिपूर्ण दशेला येऊन गच्च भरल्यामुळे मोती शिंपेच्या गर्भात मावत नाहीत, म्हणून जसा शिंपेच्या दोन शकलांचा सांधा उकलतो ॥६-२६६॥

तैशीं पातियांचिये कवळिये न समाये । दिठी जाकळोनि निघों पाहे ।
आधिलीचि परी होये । गगना कवळिती ॥६-२६७॥
त्याप्रमाणे दृष्टी पापण्यांच्या कवळीत न मावता त्या कवळीला व्यापून बाहेर निघण्यास पहाते. दृष्टी पूर्वीचीच असते परंतु ती आकाश व्यापणारी होते. ॥६-२६७॥

आइके देह होय सोनियाचें । परि लाघव ये वायूचें ।
जे आप आणि पृथ्वीचे । अंशु नाहीं ॥६-२६८॥
अर्जुना ऐक, त्याचा देह सोन्याचा (सोन्यासारख्या कांतीचा) होतो, परंतु त्याला वायूसारखा हलकेपणा येतो. कारण की त्याच्यात पृथ्वीचे व पाण्याचे अंश नसतात. ॥६-२६८॥

मग समुद्रापैलीकडील देखे । स्वर्गींचा आलोचु आइके ।
मनोगत वोळखे । मुंगियेचें ॥६-२६९॥
मग तो समुद्राच्या पलीकडचे पहातो, स्वर्गातील विचार ऐकतो, व मुंगीच्या मनातील भाव ओळखतो. ॥६-२६९॥

पवनाचा वारिकां वळघे । चाले तरी उदकीं पाऊल न लागे ।
येणें येणें प्रसंगें । येती बहुता सिद्धि ॥६-२७०॥
वायुरूप घोड्यावर बसतो व पाण्यावर चालतो, पण पाण्यात पाऊल शिरत नाही. अशा अनेक प्रकारच्या सिद्धी त्य़ास प्रसंगानुरूप प्राप्त होतात, ॥६-२७०॥

आइकें प्राणाचा हातु धरूनी । गगनाची पाउटी करूनी ।
मध्यमेचेनि दादराहुनी । हृदया आली ॥६-२७१॥
अर्जुना ऐक. प्राणवायूचा हात धरून, आकाशाची पायरी करून, सुषुम्नारूप जिन्याने हृदयात आली. ॥६-२७१॥

ते कुंडलिनी जगदंबा । जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा ।
जया विश्वबीजाचिया कोंभा । साउली केली ॥६-२७२॥
जी कुंडलिनी जगाची आई आहे, ब्रह्मरूपी सार्वभौमाची शोभा आहे, व जिने विश्वाच्या बीजाच्या कोंभाला सावली केली आहे (आश्रय दिला आहे), ॥६-२७२॥

जे शून्यलिंगाची पिंडी । जे परमात्मया शिवाची करंडी ।
जे प्रणवाची उघडी । जन्मभूमी ॥६-२७३॥
जी निराकार परमात्म्याचे चिन्ह दाखवणारी पिंडी, जी परब्रह्मरूपी शिवाची संबळी व जी प्राणांची उघड उघड जन्मभूमी आहे ॥६-२७३॥

हें असो ते कुंडलिनी बाळी । हृदयाआंतु आली ।
अनुहताची बोली । चावळे ते ॥६-२७४॥
हे असो. ती कुंडलिनी हृदयात (अनाहत चक्रात) येते तेव्हा ती अनाहताच्या शब्दाने बोलते ॥६-२७४॥

शक्तीचिया आंगा लागलें । बुद्धीचें चैतन्य होतें जाहलें ।
तें तेणें आइकिलें । अळुमाळु ॥६-२७५॥
कुंडलिनीला चिकटून राहिलेले जे बुद्धीचे (जाणीवशक्तियुक्त) ज्ञान (तिच्याबरोबर) आले होते, त्याने (त्या ज्ञानाने) तो अनाहत शब्द किंचित ऐकला. ॥६-२७५॥

घोषाच्या कुंडीं । नादचित्रांचीं रूपडीं ।
प्रणवाचिया मोडी । रेखिलीं ऐसीं ॥६-२७६॥
घोषाच्या (परावाणीच्या) कुंडात नादचित्रांची (मध्यमारूपी) रुपडी ॐकाराच्या आकारासारखी रेखलेली असतात. ॥६-२७६॥

हेंचि कल्पावें तरी जाणिजे । परी कल्पितें कैचें आणिजे ।
तरी नेणों काय गाजे । तिये ठायीं ॥६-२७७॥
याची कल्पना करता येईल तर समजून घ्यावे. पण आता कल्पना करणारे मन कोठून आणावे ? तर त्या ठिकाणी काय वाजते, ते कळत नाही. ॥६-२७७॥

विसरोनि गेलों अर्जुना । जंव नाशु नाहीं पवना ।
तंव वाचा आथी गगना । म्हणौनि घुमे ॥६-२७८॥
अर्जुना, पण ते तसे नव्हे, विसरून सांगण्याचेच राहिले, ते काय म्हणशील तर जोपर्यंत वायूचा नाश झाला नाही तोपर्यंत हृदयाकाशात शब्द असतो, म्हणून तो अनाहत शब्द घुमतो असे समज. ॥६-२७८॥

तया अनाहताचेनि मेघें । आकाश दुमदुमों लागे ।
तंव ब्रह्मस्थानींचें बेगें । फिटले सहजे ॥६-२७९॥
मग त्या अनाहतरूप मेघाने आकाश दुमदुमायला लागते, तेव्हा ब्रह्मस्थानाचे द्वार आपोआप उघडते. ॥६-२७९॥

आइकें कमळगर्भाकारें । जें महदाकाश दुसरें ।
जेथ चैतन्य आधातुरें । करूनि असिजे ॥६-२८०॥
अर्जुना ऐक. कमळाच्या गर्भाच्या आकाराप्रमाणे जे मूर्ध्नि आकाश आहे ते दुसरे महाकाशच आहे, त्या मूर्ध्न्याकाशाचे ठिकाणी चैतन्य अर्धे भोजन करू अतृप्त असते. ॥६-२८०॥

तया हृदयाच्या परिवरीं । कुंडलिनिया परमेश्वरी ।
तेजाची शिदोरी । विनियोगिली ॥६-२८१॥
त्या चैतन्याला हृदयाकाशाच्या माजघरात असणारी कुंडलिनी देवी ही आपल्या तेजाची शिदोरी अर्पण करते.. (ती कशी तर) ॥६-२८१॥

बुद्धीचेनि शाकें । हातबोनें निकें ।
द्वैत तेथ न देखे । तैसें केलें ॥६-२८२॥
द्वैत ज्याला पहाणार नाही असा बुद्धीच्या भाजीसह हातात घेतलेला चांगला नैवेद्य अर्पण केला. ॥६-२८२॥

निजकांती हारविली । मग प्राणुचि केवळ जाहाली ।
ते वेळीं कैसी गमली । म्हणावी पां ? ॥६-२८३॥
याप्रमाणे आपले तेज अर्पण केल्यावर ती कुंडलिनी केवल प्राणवायुरूप होते, तेव्हा ती कशी भासते म्हणून म्हणाल तर ॥६-२८३॥

हो कां जे पवनाची पुतळी । पांघुरली होती सोनसळी ।
ते फेडूनियां वेगळी । ठेविली तिया ॥६-२८४॥
जशी एखादी वार्‍याची पुतळी असावी व तिने पितांबर नेसलेला असावा व मग तिने वस्त्र सोडून ठेवावे ॥६-२८४॥

नातरी वायूचेनि आंगें झगटली । दीपाची दिठी निवटली ।
कां लखलखोनि हारपली । वीजु गगनीं ॥६-२८५॥
अथवा वार्‍याची झुळुक लागून दिव्याची ज्योत नाहीशी व्हावी किंवा आकाशात वीज चमकून अदृश्य व्हावी ॥६-२८५॥

तैशी हृदयकमळवेऱ्हीं । दिसे जैशी सोनियाची सरी ।
नातरी प्रकाशजळाची झरी । वाहत आली ॥६-२८६॥
अथवा हृदयकमळापर्यंत जणुकाय सोन्याची सरी अथवा प्रकाशरूप जलाचा झरा जसा काही वहात आला आहे तशी ती दिसते. ॥६-२८६॥

मग ते हृदयभूमी पोकळे । जिराली कां एके वेळे ।
तैसें शक्तीचें रूप मावळे । शक्तीचिमाजीं ॥६-२८७॥
मग तो प्रकाशाचा झरा जसा हृदयाच्या पोकळ भूमीत एकदम जिरावा त्याप्रमाणे शक्तीचे रूप शक्तीमधेच मावळते. ॥६-२८७॥

तेव्हां तरी शक्तीचि म्हणिजे । एऱ्हवीं तो प्राणु केवळ जाणिजे ।
आतां नादुबिंदु नेणिजे । कळा ज्योती ॥६-२८८॥
तेव्हा तरी शक्तीच म्हणतात, पण वास्तविक तो प्राणवायूच आहे असे समज. आता त्यास नाद, बिंदु, कला, ज्योती एवढे चारही धर्म नसतात. ॥६-२८८॥

मनाचा हन मारु । कां पवनाचा आधारु ।
ध्यानाचा आदरु । नाहीं परी ॥६-२८९॥
मनाचा निग्रह करणे किंवा ध्यान करावेसे वाटणे हे प्रकार तेथे रहात नाहीत. ॥६-२८९॥

हे कल्पना घे सांडी । तें नाहीं इये परवडी ।
हे महाभूतांची फुडी । आटणी देखां ॥६-२९०॥
ही कल्पना घे, ती कल्पना टाक, हे प्रकार तेथे नाहीत. कारण ही स्थिती पंचमहाभूतांची पक्की आटणी आहे असे समज. ॥६-२९०॥

पिंडें पिंडाचा ग्रासु । तो हा नाथसंकेतींचा दंशु ।
परि दाऊनि गेला उद्देशु । श्रीमहाविष्णु ॥६-२९१॥
पिंडाने पिंडाचा ग्रास करणे (पंचमहाभूतांनी पंचमहाभूतांचा लय करावयाचा. हे आदिनाथ जे शंकर यांच्या अंतरंग खुणेचे मर्म आहे. परंतु हे मर्म श्रीविष्णु दाखवून गेले. ॥६-२९१॥

तया ध्वनिताचें केणें सोडुनि । यथार्थाची घडी झाडुनी ।
उपलविली म्यां जाणुनी । ग्राहीक श्रोते ॥६-२९२॥
वरच्या ओवीत सांगितलेल्या उद्देशरूपी सणंगाच्या गूढपणारूपी दोर्‍या सोडून, यथार्थाची घडी साफ करून (हे या मालाचे योग्य) गिर्‍हाईक आहेत असे समजून, त्यांच्या पुढे घडी उलगडून मी हे सणंग ठेवले आहेत (असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात). ॥६-२९२॥

ऐकें शक्तीचें तेज जेव्हां लोपे । तेथ देहाचें रूप हारपे ।
मग तो डोळ्यांमाजीं लपे । जगाचिया ॥६-२९३॥
अर्जुना, ऐक. कुंडलिनीचे तेज जेव्हा लय पावते, तेव्हा देहाचा आकार नाहीसा होतो, (देह वायुरूप होतो). तो याप्रमाणे सूक्ष्म झाल्यामुळे मग त्या योग्याला जगाच्या लोकांच्या) डोळ्यातच लपता येते. ॥६-२९३॥

एऱ्हवीं आधिलाचि ऐसें । सावयव तरी दिसे ।
परी वायूचें कां जैसें । वळिलें होय ॥६-२९४॥
वास्तविक तो देह पूर्वीप्रमाणेच सावयव असतो, परंतु आता तो देह जसा वायूचाच बनवलेला असावा असा होतो. ॥६-२९४॥

नातरी कर्दळीचा गाभा । बुंथी सांडोनी उभा ।
कां अवयवचि नभा । उदयला तो ॥६-२९५॥
अथवा केळीतील सोपटे काढून टाकून ती पोकळी जशी उभी करावी किंवा आकाशालाच अवयव उत्पन्न व्हावेत असा तो दिसतो. ॥६-२९५॥

तैसें होय शरीर । तैं तें म्हणिजे खेचर ।
हें पद होतां चमत्कार । पिंडजनीं ॥६-२९६॥
असे ज्यावेळेस शरीर होते, तेव्हा त्यास खेचर (गगनविहारी) असे म्हणतात. देहधारी लोकात असे रूप होणे म्हणजे मोठा चमत्कार आहे. ॥६-२९६॥

देखें साधकु निघोनि जाये । मागां पाउलांची वोळ राहे ।
तेथ ठायीं ठायीं होये । अणिमादिक ॥६-२९७॥
पहा साधक निघून गेल्यावर मागे जी पावलांची ओळ रहाते, तेथे ठिकठिकाणी आणिमादिक सिद्धी उत्पन्न होतात. (म्हणजे साधकाची जी जी भूमिका सिद्ध होईल त्या त्या ठिकाणी त्याला अणिमादिक सिद्धी प्राप्त होतात.). ॥६-२९७॥

परि तेणें काय काज आपणयां । अवधारीं ऐसा धनंजया ।
लोप आथी भूतत्रया । देहींचा देहीं ॥६-२९८॥
पण आपल्याला त्या सिद्धींशी काय काम आहे ? अर्जुना ऐक. देहाच्या आतच तीनही भूतांचा असा लोप होतो. ॥६-२९८॥

पृथ्वीतें आप विरवी । आपातें तेज जिरवी ।
तेजातें पवनु हरवी । हृदयामाजीं ॥६-२९९॥
पृथ्वीला पाणी नाहीसे करते, पाण्याला तेज नाहीसे करते व तेजाला वायु हृदयामधे नाहीसा करतो. ॥६-२९९॥

पाठीं आपण एकला उरे । परि शरीराचेनि अनुकारें ।
मग तोही निगे अंतरें । गगना मिळे ॥६-३००॥
नंतर प्राणवायु एकटा उरतो. पण तो शरीराच्या आकाराने असतो. मग तोही काही वेळाने निघून मूर्ध्निआकाशात शांत मिळतो. ॥६-३००॥

ते वेळीं कुंडलिनी हे भाष जाये । मग मारुत ऐसें नाम होये ।
परि शक्तिपण तें आहे । जंव न मिळे शिवीं ॥६-३०१॥
त्यावेळी कुंडलिनी ही भाषा जाते व तिला ‘मारुत्’ असे नाव मिळते. पण जोपर्यंत ती शिवाशी एकरूप होत नाही, तोपर्यंत तिचा शक्तिपणा असतोच. ॥६-३०१॥

मग जालंधर सांडी । ककारांत फोडी ।
गगनाचिये पाहाडीं । पैठी होय ॥६-३०२॥
मग ती प्राणवायुरूप शक्ती जालंदर बंधाचे उल्लंघन करून टाळ्यावरती नऊ इंद्रियांचे ऐक्य होण्याचे जे काकीमुख म्हणून स्थान आहे, त्याचा भेद करून मग मूर्ध्न्याकशरूपी पर्वतावर जाऊन रहाते. ॥६-३०२॥

ते ॐ काराचिये पाठी । पाय देत उठाउठी ।
पश्यंतीचिये पाउटी । मागां घाली ॥६-३०३॥
ती ॐकाराचे पाठीवर तात्काळ पाय देऊन पश्यंती वाणीची पायरी मागे टाकते. ॥६-३०३॥

पुढां तन्मात्रा अर्धवेरी । आकाशाच्या अंतरीं ।
भरती गमे सागरीं । सरिता जेवीं ॥६-३०४॥
पुढे समुद्रात कशा नद्या मिळालेल्या दिसतात, त्याप्रमाणे अर्धमात्रापर्यंतच्या ॐकाराच्या मात्रा मूर्ध्नि-आकाशात मिळतात. ॥६-३०४॥



[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः ।
शान्ति निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥६-१५॥
मनाचे नियमन केलेला व याप्रमाणे मनाला सदा युक्त करणारा योगी जिचे पर्यवसान मोक्षामधे आहे, अशी मत्स्वरूप शांती प्राप्त करून घेतो. ॥६-१५॥

मग ब्रह्मरंध्रीं स्थिरावोनी । सोऽहंभावाच्या बाह्या पसरुनी ।
परमात्मलिंगा धांवोनी । आंगा घडे ॥६-३०५॥
मग ब्रह्मरंध्राचे ठिकाणी स्वस्थ होऊन ‘ते ब्रह्म मी आहे’ या भावनारूप बाहू पसरून त्वरेने परब्रह्मरूपी लिंगाशी ऐक्य पावते. ॥६-३०५॥

तंव महाभूतांची जवनिका फिटे । मग दोहींसि होय झटें ।
तेथ गगनासकट आटे । समरसीं तिये ॥६-३०६॥
तेव्हा पंचमहाभूतांचा पडदा नाहीसा होतो व मग शक्ति आणि परमात्मा यांचे ऐक्य होते. त्या ऐक्यात मूर्ध्नि आकाशासकट सगळ्यांचा लय होतो. ॥६-३०६॥

पैं मेघाचेनि मुखीं निवडिला । समुद्र कां वोघीं पडिला ।
तो मागुता जैसा आला । आपणपयां ॥६-३०७॥
मेघांच्या द्वाराने समुद्रापासून वेगळे झालेले समुद्राचे पाणी नदीच्या ओघात पडून, नदीच्या रूपाने जसे पुन्हा समुद्रास मिळते, (तो समुद्रच नदीच्या रूपाने आपणास मिळतो) ॥६-३०७॥

तेवीं पिंडाचेनि मिषें । पदीं पद प्रवेशे ।
तें एकत्व होय तैसें । पंडुकुमरा ॥६-३०८॥
हे अर्जुना, याप्रमाणे शरीराच्या द्वारे जेव्हा शक्तिरूप टाकून शिवच शिवात मिळतो, तेव्हा ते एकत्व वरील समुद्राच्या ऐक्याप्रमाणे आहे. ॥६-३०८॥

आतां दुजें हन होतें । कीं एकचि हें आइतें ।
ऐशिये विवंचनेपुरतें । उरेचिना ॥६-३०९॥
आता द्वैत होते की हे स्वरूप स्वत:सिद्ध एकच होते असा विचार करण्यापुरतीही जागा उरत नाही. ॥६-३०९॥

गगनीं गगन लया जाये । ऐसें जें कांहीं आहे ।
तें अनुभवें जो होये । तो होऊनि ठाके ॥६-३१०॥
चिदाकाशात मूर्ध्निआकाशाचा लय होतो. अशी जी काही स्थिती आहे, ती अनुभवाने जो होईल त्यालाच ती स्थिती प्राप्त होईल. ॥६-३१०॥

म्हणौनि तेथिंची मातु । न चढेचि बोलाचा हातु ।
जेणें संवादाचिया गांवाआंतु । पैठी कीजे ॥६-३११॥
मागे सांगितल्याकारणाने त्या स्थितीची गोष्ट शब्दांनी सांगता येत नाही आणि शब्दांनी सांगता येईल तेव्हाच ती गोष्ट संवादाच्या गावात स्थापित करता येईल. (अर्थात शब्दांनी सांगताच येणार नाही तर तिजविषयी संवादही होणे शक्य नाही). ॥६-३११॥

अर्जुना एऱ्हवीं तरी । इया अभिप्रायाचा जे गर्व धरी ।
ते पाहें पां वैखरी । दुरी ठेली ॥६-३१२॥
अर्जुना सहज विचार करून पाहिले तरी हा अभिप्राय सांगण्याचा गर्व जी वैखरी धरते ती वाचा या ब्रह्मस्थितीपासून फार दूर राहिली. ॥६-३१२॥

भ्रूलता मागिलीकडे । तेथ मकाराचेंचि आंग न मांडे ।
सडेया प्राणा सांकडें । गगना येतां ॥६-३१३॥
भिवईच्या मागील बाजूस (आज्ञाचक्रात) मकाराचे स्वरूप रहात नाही, इतकेच नव्हे तर एकट्या प्राणवायूला गगनास येण्याला संकट पडते. ॥६-३१३॥

पाठीं तेथेंचि तो भेसळला । तैं शब्दाचा दिवो मावळला ।
मग तयाहि वरी आटु भविन्नला । आकाशाचा ॥६-३१४॥
नंतर तो प्राणवायु तेथेच (मूर्ध्निआकशात) मिळाला तेव्हा शब्दाचा दिवस मावळला. मग त्यानंतर आकाशाचाही लय झाला. ॥६-३१४॥

आतां महाशून्याचिया डोहीं । जेथ गगनसीचि थावो नाहीं ।
तेथ तागा लागेल काई । बोलाचा इया ? ॥६-३१५॥
आता परब्रह्मरूपी डोहात जेथे आकाशाचाच थांग लागत नाही तेथे शब्दरूपी (होडी ढकलण्याच्या) वेळूचा लाग लागेल काय ? ॥६-३१५॥

म्हणौनि आखरामाजीं सांपडे । कीं कानवरी जोडे ।
हे तैसें नव्हे फुडें । त्रिशुद्धी गा ॥६-३१६॥
या कारणास्तव ती ब्रह्मस्थिती अक्षरात सापडेल (शब्दांनी सांगता येईल)) अथवा कानांनी ऐकता येईल अशी खरोखर नाही, हे त्रिवार सत्य आहे. ॥६-३१६॥

जें कहीं दैवें । अनुभविलें फावे ।
तैं आपणचि हें ठाकावें । होऊनियां ॥६-३१७॥
जेव्हा कधीतरी दैवयोगाने ते अनुभवाला प्राप्त होईल तेव्हा आपणच होऊन रहावे असे ते आहे. ॥६-३१७॥

पुढती जाणणें तें नाहींचि । म्हणौनि असो किती हेंचि ।
बोलावें आतां वायांचि । धनुर्धरा ॥६-३१८॥
अर्जुना तद्रूप झाले म्हणजे त्यापुढे आता जाणणे काही उरले नाही. म्हणून आता हे राहू दे. हेच व्यर्थ किती बोलावे ? ॥६-३१८॥

ऐसें शब्दजात माघौतें सरे । तेथ संकल्पाचें आयुष्य पुरे ।
वाराही जेथ न शिरे । विचाराचा ॥६-३१९॥
याप्रमाणे शब्दामात्र जेथून माघारी फिरतो, जेथे संकल्पाचे आयुष्य संपते (संकल्प नाहीसा होतो व विचाराचा वाराही जेथे प्रवेश करू शकत नाही ॥६-३१९॥

जें उन्मनियेचें लावण्य । जें तुर्येचें तारुण्य ।
अनादि जें अगण्य । परमतत्त्व ॥६-३२०॥
जे परमात्मतत्व मनरहित अवस्थेचे सौंदर्य आहे व चौथ्या ज्ञानरूप अवस्थेचे तारुण्य आहे आणि जे नित्यसिद्ध व अमर्याद आहे. ॥६-३२०॥

जें विश्वाचें मूळ । जें योगद्रुमाचें फळ ।
जें आनंदाचें केवळ । चैतन्य गा ॥६-३२१॥
जे आकाराचे शेवट आहे, जे मोक्षाचे निश्चयाचे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आरंभ आणि शेवट ही नाहीशी झाली आहेत. ॥६-३२१॥

जें आकाराचा प्रांतु । जें मोक्षाचा एकांतु ।
जेथ आदि आणि अंतु । विरोनी गेले ॥६-३२२॥
जे त्रैलोक्याचे कारण आहे, जे अष्टांगयोगरूप वृक्षाचे फळ आहे व जे आनंदाची केवल जीवनकला आहे. ॥६-३२२॥

जें महाभूतांचें बीज । जें महातेजाचें तेज ।
एवं पार्था जें निज- । स्वरूप माझें ॥६-३२३॥
जे पंचमहाभूतांचे बीज आहे, जे सूर्याचे तेज आहे (ज्याच्यापासून सूर्याला तेज मिळते) याप्रमाणे अर्जुना, जे माझे खास स्वरूप आहे. ॥६-३२३॥

ते हे चतुर्भुज कोंभेली । जयाची शोभा रूपा आली ।
देखोनि नास्तिकीं नोकिलीं । भक्तवृंदें ॥६-३२४॥
नास्तिकांनी भक्तांचे समुदाय पराभव केलेले पाहून ज्याची (निर्गुणस्वरूपाची) शोभा व्यक्ततेला आली तीच ही आकाराला आलेली चतुर्भुज मूर्ति होय. ॥६-३२४॥

तें अनिर्वाच्य महासुख । पैं आपणचि जाहले जे पुरुष ।
जयांचे कां निष्कर्ष । प्राप्तिवेरीं ॥६-३२५॥
ज्या पुरुषांचे निश्चय प्राप्तीपर्यंत टिकतात ते पुरुष असे हे शब्दातीत उत्कृष्ट सुख आपणच बनतात. ॥६-३२५॥

आम्हीं साधन हें जें सांगितलें । तेंचि शरीरीं जिहीं केलें ।
ते आमुचेनि पाडें आले । निर्वाळलेया ॥६-३२६॥
आम्ही जे हे अष्टांगयोगरूपी साधन सांगितले, त्या साधनाची मूर्तीच आपले शरीर ज्यांनी केले, ते योगाभ्यासाने शुद्ध झाल्यावर आमच्या बरोबरीला आले. ॥६-३२६॥

परब्रह्माचेनि रसें । देहाकृतीचिये मुसें ।
वोतींव जाहले तैसे । दिसती आंगें ॥६-३२७॥
देहाकृतीच्या मुशीत परब्रह्मरस ओतून तयार केलेली जणुकाय मूर्तीच, ते शरीराने दिसतात. ॥६-३२७॥

जरी हे प्रतीति हन अंतरीं फांके । तरी विश्वचि हें अवघें झांके ।
तंव अर्जुन म्हणे निकें । साचचि जी हें ॥६-३२८॥
जर हा अनुभव अंत:करणात प्रकाशेल तर हे सर्व जग मावळेल. तेव्हा अर्जुन म्हणाला, ठीक. हे खरे आहे महाराज. ॥६-३२८॥

कां जें आपण आतां देवो । हा बोलिले जो उपावो ।
तो प्राप्तीचा ठावो । म्हणोनि घडे ॥६-३२९॥
कारण की आता देवा आपण जो हा उपाय सांगितला, तो ब्रह्मप्राप्तीचे ठिकाण आहे. म्हणून त्या उपायाने ब्रह्मप्राप्ती होते. ॥६-३२९॥

इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरंवसेनि ब्रह्मत्वा येती ।
हें सांगतियाची रीती । कळलें मज ॥६-३३०॥
याचा दृढनिश्चयाने जे अभ्यास करतात ते खात्रीने ब्रह्मत्वास प्राप्त होतात, हे आपल्या सांगण्याच्याच रीतीवरून मला समजले. ॥६-३३०॥

देवा गोठीचि हे ऐकतां । बोधु उपजतसे चित्ता ।
मा अनुभवें तल्लीनता । नोहेल केवीं ? ॥६-३३१॥
देवा, योगाचे हे वर्णनच केवल ऐकले असता चित्तात ज्ञान उत्पन्न होते तर मग अनुभवाने तल्लीनता कशी होणार नाही ? ॥६-३३१॥

म्हणौनि एथ कांहीं । अनारिसें नाहीं ।
परी नावभरी चित्त देईं । बोला एका ॥६-३३२॥
म्हणून तुझ्या सांगण्यात अन्यथा नाही, परंतु क्षणभर माझ्या एका बोलण्याकडे लक्ष दे. ॥६-३३२॥

आतां कृष्णा तुवां सांगितला योगु । तो मना तरी आला चांगु ।
परि न शकें करूं पांगु । योग्यतेचा ॥६-३३३॥
कृष्णा तू हा जो योग आता सांगितलास तो माझ्या मनाला तर चांगलाच पटला, परंतु माझ्या ठिकाणी अधिकाराची उणीव असल्यामुळे मी त्याचे अनुष्ठान करू शकत नाही. ॥६-३३३॥

सहजें आंगिक जेतुलें आहे । तेतुलियाची जरी सिद्धि जाये ।
तरी हाचि मार्गु सुखोपायें । अभ्यासीन ॥६-३३४॥
माझ्या अंगात स्वभावत: जितकी योग्यता आहे, तितक्याच योग्यतेने जर हा अभ्यास सिद्धीला जाईल तर याच मार्गाचा मी सुखाने अभ्यास करीन. ॥६-३३४॥

नातरी देवो जैसें सांगतील । तैसें आपणपें जरी न ठकेल ।
तरी योग्यतेवीण होईल । तेंचि पुसों ॥६-३३५॥
अथवा देव जसे सांगतील, तसे जर आपल्या हातून होणार नसेल तर योग्यतेशिवाय जे होण्याजोगे असेल तेच विचारू. ॥६-३३५॥

जीवींचिये ऐसी धारण । म्हणोनि पुसावया जाहलें कारण ।
मग म्हणे तरी आपण । चित्त देइजो ॥६-३३६॥
माझ्या मनाची अशी समजूत झाली म्हणून पुसण्याचे प्रयोजन पडले. म्हणून मी (अर्जुन) म्हणतो आपण इकडे लक्ष द्यावे. ॥६-३३६॥

हां हो जी अवधारिलें । जें हें साधन तुम्हीं निरूपिलें ।
तें आवडतयाहि अभ्यासिलें । फावों शके ? ॥६-३३७॥
अहो महाराज, ऐकले का ? तुम्ही जे साधन सांगितले त्याचे वाटेल त्याने अनुष्ठान केले तर ते साध्य होईल काय ? ॥६-३३७॥

कीं योग्यतेवीण नाहीं । ऐसें हन आहे कांहीं ।
तेथ श्रीकृष्ण म्हणती काई । धनुर्धरा ॥६-३३८॥
अथवा योग्यतेशिवाय प्राप्त होत नाही, असे काही येथे आहे का ? असे अर्जुनाने विचारले, तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, तू हे काय विचारतोस ? ॥६-३३८॥

हें काज कीर निर्वाण । परि आणिकही जें कांहीं साधारण ।
तेंही अधिकाराचे वोडवेविण । काय सिद्धि जाय ? ॥६-३३९॥
ही तर शेवटची (अत्यंत उच्च दर्जाची) गोष्ट आहे, पण इतर काही साधारण काम असते ते तरी अधिकाराच्या योग्यतेशिवाय सिद्धीस जाते काय ? ॥६-३३९॥

पैं योग्यता जे म्हणिजे । ते प्राप्तीची अधीन जाणिजे ।
कां जे योग्य होऊनि कीजे । तें आरंभिलें फळें ॥६-३४०॥
परंतु योग्यता जी म्हणावयाची, ती प्राप्तीच्या आधीन आहे असे जाणावे. कारण योग्य होऊन जे करावे ते आरंभीच फलदायी होते. ॥६-३४०॥

तरी तैसी एथ कांहीं । सावियाचि केणी नाहीं ।
आणि योग्यतेची काई । खाणी असे ? ॥६-३४१॥
तर तसा काही येथे योग्यता हा सहज बाजारात मिळाणारा माल नाही, आणि योग्य पुरुषांची काय खाण आहे का ? ॥६-३४१॥

नावेक विरक्तु । जाहला देहधर्मीं नियतु ।
तरि तोचि नव्हे व्यवस्थितु । अधिकारिया ? ॥६-३४२॥
थोडासा विरक्त असून देहाच्या गरजा ज्याने आवरल्या आहेत, तोच या कामी योग्य नाही का ? ॥६-३४२॥

येतुलालिये आयणीमाजिवडें । योग्यपण तूतेंही जोडे ।
ऐसें प्रसंगें सांकडें । फेडिलें तयाचें ॥६-३४३॥
एवढ्या युक्तीने एवढी योग्यता तुलाही प्राप्त होईल. (ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की) अशा त्याची अडचण देवांनीच ओघाने दूर केली. ॥६-३४३॥

मग म्हणे पार्था । ते हे ऐसी व्यवस्था ।
अनियतासि सर्वथा । योग्यता नाहीं ॥६-३४४॥
मग देव पुढे म्हणतात, अर्जुना, त्याची अशीही व्यवस्था आहे की जो अनियमित वागतो त्याची मुळीच योग्यता नाही. ॥६-३४४॥

नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः ।
न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥६-१६॥
हे अर्जुना, अति खाणारा, अथवा अगदीच न खाणारा किंवा अति झोप घेणारा अथवा अगदीच झोप न घेणारा असा जो असेल त्याला योग प्राप्त होणार नाही. ॥६-१६॥

जो रसनेंद्रियाचा अंकिला । कां निद्रेसी जीवें विकला ।
तो नाहींच एथ म्हणितला । अधिकारिया ॥६-३४५॥
जो जिव्हेच्या स्वाधीन आहे किंवा झोपेला मनापासून वाहिलेला आहे, तो योगाविषयी अधिकारी आहे असे म्हणता येत नाही. ॥६-३४५॥

अथवा आग्रहाचिये बांदोडी । क्षुधा तृषा कोंडी ।
आहारातें तोडी । मारूनियां ॥६-३४६॥
अथवा जो हट्टाच्या बंदिखान्यात भूक व तहान कोंडतो व भुकेला मारून आहार तोडतो ॥६-३४६॥

निद्रेचिया वाटा नवचे । ऐसा दृढिवेचेनि अवतरणें नाचे ।
तें शरीरचि नव्हे तयाचें । मा योगु कवणाचा ? ॥६-३४७॥
व जो निद्रेच्या वाट्यास जात नाही, याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी हट्टाचा पूर्ण संचार होऊन जो नाचतो, त्याचे ते शरीरच त्याच्या ताब्यात रहाणार नाही, तर मग योग कोण करणार ? ॥६-३४७॥

म्हणौनि अतिशयें विषयो सेवावा । तैसा विरोधु नोहावा ।
कां सर्वथा निरोधावा । हेंही नको ॥६-३४८॥
म्हणून विषयांचे अति सेवन करावे ही अशा प्रकारची विरोधी बुद्धी नसावी. किंवा वाजवीपेक्षा फाजिल नियमन करणे हेही कामाचे नाही. ॥६-३४८॥

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥६-१७॥
ज्याचे खाणे व हिंडणे नियमित आहे, जो सर्व कार्यामधे परिमित काम करतो, ज्याची निद्रा व जागर परिमित आहे, त्याला संसाररूपी दु:खाचा नाश करणारा हा योग साध्य होतो. ॥६-१७॥

आहार तरी सेविजे । परी युक्तीचेनि मापें मविजे ।
क्रियाजात आचरिजे । तयाचि स्थिती ॥६-३४९॥
अन्न तर सेवन करावे, परंतु नियमाच्या मोजलेले असावे. त्याचप्रमाणे इतर सर्व क्रिया कराव्यात. ॥६-३४९॥

मितला बोलीं बोलिजे । मितलिया पाउलीं चालिजे ।
निद्रेही मानु दीजे । अवसरें एकें ॥६-३५०॥
मोजके शब्द बोलावेत, नियमित पावलांनी चालावे व कोणा एका योग्य वेळेला झोपेलाही मान द्यावा. ॥६-३५०॥

जागणें जरी जाहलें । तरी होआवें तें मितलें ।
येतुलेनि धातुसाम्य संचलें । असेल सहजें ॥६-३५१॥
जागावयाचे झाले तरी तेही परिमितच असावे. एवढ्याने अनायासे कफवातादि सर्व धातूंची समता राहिल. ॥६-३५१॥

ऐसें युक्तीचेनि हातें । जें इंद्रियां वोपिजे भातें ।
तैं संतोषासी वाढतें । मनचि करी ॥६-३५२॥
अशा रीतीने नियमितपणाच्या द्वाराने विषय दिले असता मनच संतोषाला वाढवते. ॥६-३५२॥

बाहेर युक्तीची मुद्रा पडे । तव आंत आंत सुख वाढे ।
तेथें सहजेंचि योगु घडे । नाभ्यासितां ॥६-३५३॥
मग बाह्येंद्रियांना नियमितपणाचे वळण पडते आणि अंत:करणामधे सुख वाढते. अशा स्थितीत अभ्यासाचे कष्ट न पडता योगाचा अभ्यास सहजच होतो. ॥६-३५३॥

जैसें भाग्याचिया भडसें । उद्यमाचेनि मिसें ।
मग समृद्धिजात आपैसें । घर रिघे ॥६-३५४॥
ज्याप्रमाणे दैवाचा उदय झाला की उद्योगाच्या निमित्ताने सर्व ऐश्वर्य आपोआप घरी चालत येतात ॥६-३५४॥

यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते ।
निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ॥६-१८॥
जेव्हा नियमन केलेले चित्त आत्म्याचे ठिकाणी लय पावते आणि जेव्हा सर्व प्रकारच्या इच्छांविषयी साधक निरिच्छ होतो तेव्हा त्याला योग सिद्ध झाला असे म्हणातात. ॥६-१८॥

तैसा युक्तिमंतु कौतुकें । अभ्यासाचिया मोहरा ठाके ।
आणि आत्मसिद्धीचि पिके । अनुभवु तयाचा ॥६-३५५॥
त्याप्रमाणे नियमाने वागणारा पुरुष ज्यावेळेस लीलेने आपला मोर्चा योगाभ्यासाकडे वळवतो, त्याच वेळेला त्याचा अनुभव आत्मप्राप्तीरूपाने पिकतो. ॥६-३५५॥

म्हणोनि युक्ति हे पांडवा । घडे जया सदैवा ।
तो अपवर्गीचिये राणिवा । अळंकारिजे ॥६-३५६॥
म्हणून अर्जुना, हा नियमितपणा ज्या भाग्यवानाच्या हातून घडतो, तो पुरुष मोक्षाच्या राज्याने अलंकृत होतो. ॥६-३५६॥

युक्ति योगाचें आंग पावे । ऐसें प्रयाग जेथ होय बरवें ।
तेथ क्षेत्रसंन्यासें स्थिरावें । मानस जयाचें ॥६-३५७॥
नियमितपणा ज्या वेळेस योगाला जाऊन मिळतो व असा दोघांचा प्रयागरूप चांगला संगम जेथे होतो त्या ठिकाणी ज्याचे मन क्षेत्रसंन्यास करून स्थिर होते, ॥६-३५७॥

यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता ।
योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥६-१९॥
वायुरहित प्रदेशामधे असलेला दीप ज्याप्रमाणे चलन पावत नाही, तीच उपमा चित्ताचे नियमन केलेल्या व आत्मयोगाचे अनुष्ठान करणार्‍या योगी मनुष्यासंबंधाने जाणावी. ॥६-१९॥

तयातें योगयुक्त तूं म्हण । हेंही प्रसंगें जाण ।
तें दीपाचे उपलक्षण । निर्वातींचिया ॥६-३५८॥
त्याला तू योगयुक्त म्हण. त्या पुरुषाच्या मनाच्या स्थितीला निर्वात स्थलीच्या दीपाची उपमा योग्य होईल, हेही तू प्रसंगानुसार समज. ॥६-३५८॥

आतां तुझें मनोगत जाणोनी । कांहीं एक आम्ही म्हणौनि ।
तें निकें चित्त देउनी । परिसावें गा ॥६-३५९॥
आता तुझ्या मनातील अभिप्राय ओळखून तुला मी काही थोडे सांगतो, ते तू चांगले चित्त देऊन ऐक. ॥६-३५९॥

तूं प्राप्तीची चाड वाहसी । परी अभ्यासीं दक्षु नव्हसी ।
तें सांग पां काय बिहसी । दुवाडपणा ? ॥६-३६०॥
तू प्राप्तीची इच्छा बाळगतोस, परंतु अभ्यास करण्याविषयी तत्पर नाहीस. तर सांग बाबा, तू कठिणपणाला भितोस काय ? ॥६-३६०॥

तरी पार्था हें झणें । सायास घेशीं हो मनें ।
वायां बागूल इये दुर्जनें । इंद्रियें करिती ॥६-३६१॥
तरी अर्जुना यात कष्ट आहेत, असा तुझ्या मनाचा ग्रह कदाचित होऊन बसेल, तर तो तसा होऊ देऊ नकोस. ही दुष्ट इंद्रिये याचा उगाचच बाऊ करतात. ॥६-३६१॥

पाहें पां आयुष्यातें अढळ करी । जें सरतें जीवित वारी ।
तया औषधातें वैरी । काय जिव्हा न म्हणे ? ॥६-३६२॥
पहा बरे, आयुष्याला स्थिर करणारे व संपलेल्या जीविताला मागे आणणारे औषध त्याला जिव्हा शत्रू समजत नाही का ? ॥६-३६२॥

ऐसें हितासि जें जें निकें । तें सदाचि या इंद्रियां दुःखें ।
एऱ्हवीं सोपें योगासारिखें । कांहीं आहे ? ॥६-३६३॥
त्याप्रमाणे आपल्या हितास जे जे चांगले, ते या इंद्रियांना सदोदित दु:खकारक वाटते, येर्‍हवी योगासारखे सोपे काही आहे काय ? ॥६-३६३॥

म्हणौनि आसनाचिया गाढिका । जो आम्हीं अभ्यासु सांगितला निका ।
तेणें होईल तरी हो कां । निरोधु यया ॥६-३६४॥
म्हणून आसनाच्या बळकटपणापासून आरंभ करून जो आम्ही चांगला योगाभ्यास सांगितला त्यायोगाने इंद्रियांचा निरोध झाला तर होईल. ॥६-३६४॥

यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया ।
यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥६-२०॥
जेथे योगाच्या अभ्यासाने नियमन पावलेले चित्त विषयांपासून परावृत्त होते, जेथे साधक आपण आपल्याला पाहून आत्मस्वरूपी सुख पावतो ॥६-२०॥

एऱ्हवीं तरी येणें योगें । जैं इंद्रियां विंदाण लागे ।
तैं चित्त भेटों रिगे । आपणपेयां ॥६-३६५॥
एरवी तरी या योगामुळे ज्या वेळेला इंद्रियांचा निग्रह होतो, त्यावेळेला चित्त आपल्या चैतन्याच्या भेटीला निघते ॥६-३६५॥

परतोनि पाठिमोरें ठाके । आणि आपणियांतें आपण देखे ।
देखतखेवों वोळखे । म्हणे तत्त्व हें मी ॥६-३६६॥
ते ज्यावेळेला विषय सोडून परत अंतर्मुख होते आणि आपण आपल्या आत्मस्वरूपाला पहाते त्याचवेळी पाहिल्याबरोबर त्यास स्वस्वरूपाची ओळख पटते व ते तत्व मी आहे अशा समजुतीवर ते येते. ॥६-३६६॥

सुखमात्यन्तिकं यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् ।
वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥६-२१॥
हे सुख सर्वोत्कृष्ट आहे, जे केवळ बुद्धीने प्राप्त आहे, जे इंद्रियांना गोचर आहे, जे सुख भोगत असतांना तो योगी आपल्या स्वरूपापासून चलन पावत नाही, असे सुख योग्याच्या अनुभावाला येते. ॥६-२१॥

तिये ओळखीचिसरिसें । सुखाचिया साम्राज्यीं बैसे ।
मग आपणपां समरसें । विरोनि जाय ॥६-३६७॥
त्या ओळखीबरोबरच ते सुखाच्या साम्राज्यावर बसते आणि तेथे आत्म्याशी समरस झाल्यामुळे चित्ताचा चित्तपणा नाहीसा होतो ॥६-३६७॥

जयापरतें आणिक नाहीं । जयातें इंद्रियें नेणती कहीं ।
तें आपणचि आपुलिया ठायीं । होऊनि ठाके ॥६-३६८॥
व ज्याहून दुसरे काही नाही व ज्याला इंद्रिये केव्हाच जाणत नाहीत असे जे चैतन्य ते चैतन्य, मन आपण स्वत: आपल्या ठिकाणी होऊन रहाते. ॥६-३६८॥



[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः ।
यस्मिन्स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥६-२२॥
जे सुख मिळाले असता, त्यापेक्षा अधिक असा दुसरा काही लाभ आहे अशी कल्पना येत नाही व ज्या सुखामधे असतांना योगी मोठ्या दु:खाने देखील डगमगत नाही ॥६-२२॥

मग मेरूपासूनि थोरें । देह दुःखाचेनि डोंगरें ।
दाटिजो पां पडिभरें । चित्त न दटे ॥६-३६९॥
मग मेरूपेक्षा मोठ्या दु:खाच्या डोंगराने त्याचा देह जरी दडपला तरी पण त्या भाराने त्याचे चित्त दडपत नाही. ॥६-३६९॥

कां शस्त्रें वरी तोडिलिया । देह अग्निमाजीं पडलिया ।
चित्त महासुखीं पहुडलिया । चेवोचि नये ॥६-३७०॥
अथवा शस्त्राने त्याचा देह तोडला किंवा देह अग्नीमधे पडला तरी चित्त निरतिशय सुखात लीन झाल्यामुळे परत वृत्तीवर येत नाही. ॥६-३७०॥

ऐसें आपणपां रिगोनि ठाये । मग देहाची वासु न पाहे ।
आणिकचि सुख होऊनि जाये । म्हणूनि विसरे ॥६-३७१॥
याप्रमाणे चित्त आपल्यात प्रवेश करून राहिल्यावर मग देहाची वाट पहात नाही. (देह तादात्म्य घेत नाही). व अलौकिक सुखच बनल्यामुळे ते चित्त देहाला विसरते. ॥६-३७१॥

तं विद्याद् दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम् ।
स निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥६-२३॥
त्या दु:खाच्या संयोगाने विहीन अशा सुखाला योग ही संज्ञा आहे असे जाणावे. निश्चयपूर्वक व सोत्साह अंत:करणाने युक्त होऊन या योगाचे अनुष्ठान करावे. ॥६-२३॥

जया सुखाचिया गोडी । मग आर्तीची सेचि सोडी ।
संसाराचिया तोंडीं । गुंतलें जें ॥६-३७२॥
ज्या सुखाची चटक लगल्याने संसाराच्या तोंडात गुंतलेले जे मन ते विषयवासनेची आठवण देखील ठेवीत नाही. ॥६-३७२॥

जें योगाची बरव । संतोषाची राणिव ।
ज्ञानाची जाणीव । जयालागीं ॥६-३७३॥
जे सुख योगाचे सौभाग्य आहे, संतोषाचे राज्य आहे आणी ज्याच्याकरता ज्ञानाची समजूत करून घ्यावयाची असते, ॥६-३७३॥

तें अभ्यासिलेनि योगें । सावयव देखावें लागे ।
देखिलें तरी आंगें । होईजेल गा ॥६-३७४॥
ते सुख अभ्यासलेल्या योगाच्या द्वारा मूर्तिमंत पाहिले पाहिजे आणि पाहिल्यावर मग तो पहाणारा आपणच स्वत: सुखरूप होऊन जातो. ॥६-३७४॥

संकल्पप्रभवान्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः ।
मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः ॥६-२४॥
संकल्पापासून उत्पन्न होणार्‍या सर्व कामांना नि:शेष टाकून व सर्व इंद्रियांचे सर्व बाजूंनी मनाने नियमन करून ॥६-२४॥

तरि तोचि योगु बापा । एके परी आहे सोपा ।
जरी पुत्रशोकु संकल्पा । दाखविजे ॥६-३७५॥
पण बाबा अर्जुना एक प्रकाराने तो योग सोपा आहे. तो कसा म्हणशील तर संकल्पाला पुत्रशोक दाखवावा. (संकल्पाचा पुत्र जो काम म्हणजे विषयवासना ती नाहीशी करावी). ॥६-३७५॥

हां विषयातें निमालिया आइके । इंद्रियें नेमाचिया धारणीं देखे ।
तरी हियें घालूनि मुके । जीवित्वासी ॥६-३७६॥
हा संकल्प जर विषयवासना मेल्या असे ऐकेल व इंद्रिये नियमाच्या स्थितीत आहेत असे पाहील तर तो ऊर फुटून प्राणास मुकेल. ॥६-३७६॥

ऐसें वैराग्य हें करी । तरी संकल्पाची सरे वारी ।
सुखें धृतीचिया धवळारीं । बुद्धि नांदे ॥६-३७७॥
असे हे वैराग्याने केले तर संकल्पाची येरझार संपते व बुद्धी धैर्याच्या महालात सुखाने वास करते. ॥६-३७७॥

शनैः शनैरुपरमेद्बुद्ध्या धृतिगृहीतया ।
आत्मसंस्थं मनः कृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत् ॥६-२५॥
धैर्ययुक्त अशा बुद्धीने हळू हळू बाह्य प्रपंचापासून उपरम करावा. मनाला आत्म्याच्याच ठिकाणी स्थित करून, दुसर्‍या कशाचेही चिंतन करू नये. ॥६-२५॥

बुद्धी धैर्या होय वसौटा । मनातें अनुभवाचिया वाटा ।
हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभुवनीं ॥६-३७८॥
बुद्धी जर धैर्याला आश्रयस्थान झाली तर ती मनाला अनुभवाच्या वाटेने हळू हळू आत्मानुभवात कायमचे स्थिर करते. ॥६-३७८॥

याही एके परी । प्राप्ती आहे विचारीं ।
हें न ठके तरी सोपारी । आणिक ऐकें ॥६-३७९॥
याही एक तर्‍हेने ब्रह्मप्राप्ती आहे. याचा विचार कर आणि हे जर तुला साध्य होत नसेल तर आणखी एक सोपी युक्ती आहे ती ऐक. ॥६-३७९॥

यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरम् ।
ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥६-२६॥
चंचलवृत्तीमुळे अस्थिर असलेले मन आत्म्याकडून निघून ज्या ज्यामुळे बाहेर जाते त्या त्या पासून नियमन करून त्याला आत्म्याच्याच ताब्यात आणावे. ॥६-२६॥

आतां नियमुचि हा एकला । जीवें करावा आपुला ।
जैसा कृतनिश्चयाचिया बोला- । बाहेरा नोहे ॥६-३८०॥
आता तू जो निश्चय करशील त्याच्या हुकुमाच्या बाहेर जो नियम कधी जाणार नाही अशा प्रकारचा हा एकटा नियमच जिवाभावापासून तू आपलासा कर. ॥६-३८०॥

जरी येतुलेनि चित्त स्थिरावें । तरी काजा आलें स्वभावें ।
नाहीं तरी घालावें । मोकलुनी ॥६-३८१॥
जर एवढ्याने चित्त स्थिर झाले तर सहजच काम झाले. आणि जर येवढ्याने चित्त स्थिर झाले नाही तर त्याला मोकळे सोडून द्यावे. ॥६-३८१॥

मग मोकलिलें जेथ जाईल । तेथूनि नियमूचि घेउनि येईल ।
ऐसेनि स्थैर्यचि होईल । सावियाचि कीं ॥६-३८२॥
मग मोकळे सोडले असता ते जेथे जेथे जाईल तेथून नियमच त्यास परत घेऊन येईल. अशा रीतीने यालाही स्थैर्याची सवय होईल. ॥६-३८२॥

प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् ।
उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् ॥६-२७॥
याप्रमाणे अभ्यास केल्यावर ज्याच्या मनाला उत्तम शांती मिळाली आहे, ज्याचा रजोगुण नाश पावला आहे, जो पापपुण्य़ादिकांविरहित आहे व जो ब्रह्मस्वरूप झाला आहे अशा योग्याला श्रेष्ठ सुख प्राप्त होते. ॥६-२७॥

पाठीं केतुलेनि एके वेळे । तया स्थैर्याचेनि मेळें ।
आत्मस्वरूपाजवळें । येईल सहजें ॥६-३८३॥
नंतर काही वेळाने त्या स्थैर्याच्या योगाने मन सहज आत्मस्वरूपाजवळ येईल. ॥६-३८३॥

तयातें देखोनि आंगा घडेल । तेथ अद्वैतीं द्वैत बुडेल ।
आणि ऐक्यतेजें उघडेल । त्रैलोक्य हें ॥६-३८४॥
आणि मनाने त्या आत्मस्वरूपास पाहिल्यावर ते मन स्वत: आत्मरूप बनून जाईल. तेव्हा या अद्वैत स्वरूपात द्वैत नाहीसे होईल, आणि नंतर सर्व त्रैलोक्य ऐक्याच्या तेजाने प्रकाशित होईल. ॥६-३८४॥

आकाशीं दिसे दुसरें । तें अभ्र जैं विरे ।
तैं गगनचि कां भरे । विश्व जैसें ॥६-३८५॥
आकाशामधे निराळे दिसणारे जे मेघ, ते नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणे संपूर्ण विश्व पोकळीनेच भरलेले असते ॥६-३८५॥

तैसें चित्त लया जाये । आणि चैतन्यचि आघवें होये ।
ऐसी प्राप्ति सुखोपायें । आहे येणें ॥६-३८६॥
त्याप्रमाणे आत्मस्वरूपी चित्त लयाला गेले की संपूर्ण विश्वच चैतन्यमय होते. या सुलभ उपायाने अशी एवढी मोठी प्राप्ती होते. ॥६-३८६॥

युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः ।
सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते ॥६-२८॥
या प्रकारे मन सर्वदा आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करणारा योगी पापविरहित होतो व अनायासे ब्रह्मसाक्षात्काररूपी आत्यंतिक सुख भोगतो. ॥६-२८॥

या सोपिया योगस्थिती । उकलु देखिला गा बहुतीं ।
संकल्पाचिया संपत्ती । रुसोनियां ॥६-३८७॥
संकल्पाच्या संपत्तीचा म्हणजेच विषयवासनांचा त्याग करून पुष्कळांनी या सोप्या योगमार्गाचा उलगडा करून पाहिला आहे. (अनुभव घेतला आहे). ॥६-३८७॥

तें सुखाचेनि सांगातें । आलें परब्रह्मा आंतौतें ।
तेथ लवण जैसें जळातें । सांडूं नेणें ॥६-३८८॥
ते पुरुष अनायासे परब्रह्माच्या आत आले, ते कसे तर मीठ पाण्यास मिळाले असता पाण्यास सोडून जसे वेगळे रहात नाही ॥६-३८८॥

तैसें होय तिये मेळीं । मग सामरस्याचिया राउळीं ।
महासुखाची दिवाळी । जगेंसि दिसे ॥६-३८९॥
त्याप्रमाणे त्या योग्याचा जेव्हा परब्रह्माशी मिलाफ होतो तेव्हा वरील मीठ-पाणी यांच्या दृष्टांताप्रमाणे एकस्वरूपाची स्थिती होते. मग समरसतेच्या मंदिरात संपूर्ण जगासह त्याला महासुखाची दिवाळी दिसते. ॥६-३८९॥

ऐसें आपुले पायवरी । चालिजे आपुले पाठीवरी ।
हें पार्था नागवे तरी । आन ऐकें ॥६-३९०॥
आपल्या पायानी आपल्या पाठीवर चालण्यासारखे हे आहे. अर्जुना म्हणून जर ते तुला करता येणार नाही तर दुसरे सांगतो ऐक. ॥६-३९०॥

सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥६-२९॥
ज्याचे मन योगयुक्त झाले आहे, तो आपण प्राणिमात्रांचे ठिकाणी आहो व आपल्या ठिकाणी प्राणिमात्र आहेत असे पहातो. तो सर्व ठिकाणी समदृष्टी होतो. ॥६-२९॥

तरी मी तंव सकळ देहीं । असे एथ विचारु नाहीं ।
आणि तैसेंचि माझ्या ठायीं । सकळ असे ॥६-३९१॥
आणि मी तर सर्व देहांमधे आहे, यात वाटाघाट करण्यासारखे काही नाही आणि त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी हे सर्व आहे. ॥६-३९१॥

हें ऐसेंचि संचलें । परस्परें मिसळलें ।
बुद्धी घेपे एतुलें । होआवें गा ॥६-३९२॥
हे असेच बनलेले आहे व परस्पर मिसळलेले आहे, पण बुद्धीने एवढे ग्रहण मात्र केले पाहिजे. ॥६-३९२॥

यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति ।
तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥६-३०॥
जो मला सर्वत्र पहातो आणि माझ्या ठिकाणी सर्व पहातो, त्याला मी कधी दृष्टिआड होत नाही व तो मला कधी दृष्टिआड होत नाही. ॥६-३०॥

एऱ्हवीं तरी अर्जुना । जो एकवटलिया भावना ।
सर्वभूतीं अभिन्ना । मातें भजे ॥६-३९३॥
एरवी अर्जुना, जो ऐक्याच्या समजुतीने मी सर्व भूतात सारखा व्यापून राहिलेलो आहे असे जाणून मला भजतो ॥६-३९३॥

भूतांचेनि अनेकपणें । अनेक नोहे अंतःकरणें ।
केवळ एकत्वचि माझें जाणें । सर्वत्र जो ॥६-३९४॥
प्राण्याच्या भेदाने ज्याच्या अंत:करणात द्वैत उत्पन्न होत नाही आणि जो सर्व ठिकाणी माझे केवळ एकत्वच जाणतो ॥६-३९४॥

सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः ।
सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥६-३१॥
माझे एकत्व जाणून राहाणारा जो योगी सर्व भूतांचे ठायी असलेल्या मला सेवितो, तो देह, नाम इत्यादी सर्व प्रकारांनी युक्त असला तरी मत्स्वरूप झालेला असतो. ॥६-३१॥

मग तो एक हा मियां । बोलता दिसतसे वायां ।
एऱ्हवीं न बोलिजे तरी धनंजया । तो मीचि आहें ॥६-३९५॥
अर्जुना, मग तो माझ्याशी एकच आहे असे बोलणे व्यर्थ आहे. कारण असे जरी बोलले नाही तरी तो मीच आहे. ॥६-३९५॥

दीपा आणि प्रकाशा । एकवंकीचा पाडु जैसा ।
तो माझ्या ठायीं तैसा । मी तयामाजीं ॥६-३९६॥
दिवा व त्याचा प्रकाश हे जसे दोन्ही एकच आहेत, त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी ऐक्यतेने आहोत. ॥६-३९६॥

जैसा उदकाचेनि आयुष्यें रसु । कां गगनाचेनि मानें अवकाशु ।
तैसा माझेनि रूपें रूपसु । पुरुषु तो गा ॥६-३९७॥
ज्याप्रमाणे जेथपर्यंत पाणी आहे, तेथपर्यंत ओलावा आहे अथवा आकाशाच्या बरोबरीने पोकळी आहे, त्याप्रमाणे माझ्या रूपाने तो पुरुष रूपवान आहे. ॥६-३९७॥

जेणें ऐक्याचिये दिठी । सर्वत्र मातेंचि किरीटी ।
देखिला जैसा पटीं । तंतु एकु ॥६-३९८॥
अर्जुना, ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये केवळ एकच तंतु असतो, त्याप्रमाणे ज्याने अद्वैतबोधाने सर्व ठिकाणी केवळ मलाच पाहिले आहे. ॥६-३९८॥

कां स्वरूपें तरी बहुतें आहाती । परी तैसीं सोनीं बहुवें न होती ।
ऐसी ऐक्याचळाची स्थिती । केली जेणें ॥६-३९९॥
अथवा अलंकारांचे आकार जरी पुष्कळ असले तरी त्याप्रमाणे सोनी पुष्कळ नाहीत, अशी ऐक्यरूपी पर्वताची स्थिरता ज्याने केली आहे ॥६-३९९॥

नातरी वृक्षांचीं पानें जेतुलीं । तेतुलीं रोपें नाहीं लाविलीं ।
ऐसी अद्वैतदिवसें पाहली । रात्री जया ॥६-४००॥
अथवा झाडाची जितकी पाने आहेत, तितकी रोपे लावलेली नाहीत, अशा अद्वैतदिवसाने ज्यास द्वैताची रात्र उजाडली ॥६-४००॥

तो पंचात्मकीं सांपडे । तरी मग सांग पां कैसेनि अडे ? ।
जो प्रतीतीचेनि पाडें । मजसीं तुके ॥६-४०१॥
अशा रीतीने जो अनुभवाच्या योग्यतेने माझ्या बरोबरीचा ठरतो, तो पंचमहाभूतात्मक शरीरात जरी असला तरी मग सांग बरे, तो देहतादात्म्य घेऊन त्यात कसा अडकून राहील ? ॥६-४०१॥

माझें व्यापकपण आघवें । गवसलें तयाचेनि अनुभवें ।
तरी न म्हणतां स्वभावें । व्यापकु जाहला ॥६-४०२॥
माझे सर्व व्यापकपण त्याच्या अनुभवाने कवटाळले तर त्याला व्यापक असे जरी म्हटले नाही तरी तो सहज व्यापक आहे. ॥६-४०२॥

आतां शरीरीं तरी आहे । परी शरीराचा तो नोहे ।
ऐसें बोलवरी होये । तें करूं ये काई ॥६-४०३॥
आता तो देहधारी जरी आहे, तरी तो देहाचे तादात्म्य घेत नाही, अशी ही त्याची स्थिती शब्दांनी सांगता येईल असे करता येईल काय ? ॥६-४०३॥

आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।
सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥६-३२॥
सर्व ठिकाणी जो आपल्यासारखे पहातो, सुख अथवा दु:ख हेही जो आपल्यासारखे पहातो, तो योगी हे अर्जुना अत्यंत श्रेष्ठ अवस्थेला पोचलेला आहे असे जाणावे. ॥६-३२॥

म्हणौनि असो तें विशेषें । आपणपेयांसारिखें ।
जो चराचर देखे । अखंडित ॥६-४०४॥
म्हणून त्याचे विशेष वर्णन करणे राहू दे. अथवा जो तत्त्ववेत्ता सर्व चराचर आपणासारखेच निरंतर पहातो, ॥६-४०४॥

सुखदुःखादि वर्में । कां शुभाशुभें कर्में ।
दोनी ऐसीं मनोधर्में । नेणेचि जो ॥६-४०५॥
सुखदु:खादी वर्मे अथवा पुण्यपापादी कर्मे अशी ही द्वंद्वे जो मनाने समजतच नाही ॥६-४०५॥

हें सम विषम भाव । आणिकही विचित्र जें सर्व ।
तें मानी जैसे अवयव । आपुले होती ॥६-४०६॥
हे समविषमभाव बरे वाईट आणखीही सर्व निरनिराळ्या प्रकारच्या वस्तु, ह्या जसे काही आपले अवयव आहेत, असे जो समजतो ॥६-४०६॥

हें एकैक काय सांगावें । जया त्रैलोक्यचि आघवें ।
मी ऐसें स्वभावें । बोधा आलें ॥६-४०७॥
हे वेगवेगळे काय सांगावयाचे आहे ? ज्याला सर्व त्रैलोक्यच आपण आहोत असे ज्ञान सहजच प्राप्त झाले आहे. ॥६-४०७॥

तयाही देह एकु कीर आथी । लौकिकीं सुखदुःखी तयातें म्हणती ।
परी आम्हांतें ऐसी प्रतीती । परब्रह्मचि हा ॥६-४०८॥
त्यालाही देह आहे खरा आणि लोकात त्याला सुखीदु:खीही म्हणतात, परंतु आमचा अनुभव असाच आहे की तो परब्रह्म आहे. ॥६-४०८॥

म्हणौनि आपणपां विश्व देखिजे । आणि आपण विश्व होईजे ।
ऐसें साम्यचि एक उपासिजे । पांडवा गा ॥६-४०९॥
म्हणून आपल्या ठिकाणी जगत् पहावे आणि आपण जगत व्हावे अशा एका साम्याचीच हे अर्जुना, तू उपासना कर. ॥६-४०९॥

हें तूतें बहुतीं प्रसंगीं । आम्ही म्हणों याचिलागीं ।
जे साम्यापरौती जगीं । प्राप्ति नाहीं ॥६-४१०॥
तू समदृष्टी ठेव, असे आम्ही एवढ्याकरताच तुला पुष्कळ प्रसंगी म्हणत आलो, कारण साम्यापलिकडे या जगात दुसरा लाभ नाही. ॥६-४१०॥

अर्जुन उवाच -
योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन ।
एतस्याहं न पश्यामि चंचलत्वात्स्थितिं स्थिराम् ॥६-३३॥
अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, तू जो हा समदर्शनाचा योग सांगितलास, त्य़ा योगाची, मन हे चंचल असल्यामुळे कायमची स्थिती होईल असे मला वाटत नाही. ॥६-३३॥

तंव अर्जुन म्हणे देवा । तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा ।
परी न पुरों जी स्वभावा । मनाचिया ॥६-४११॥
यावर अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही आमच्या विषयीच्या कळकळीने खरोखर सांगत अहात, परंतु महाराज, या मनाच्या स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही. ॥६-४११॥

हें मन कैसें केवढें । ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडें ।
एऱ्हवीं राहाटावया थोडें । त्रैलोक्य यया ॥६-४१२॥
हे मन कसे व केवढे आहे, याचा पत्ता लावू असे म्हटले तर सापडत नाही. एरवी या मनाला वावरण्याला हे सर्व त्रैलोक्य अपुरे पडते. ॥६-४१२॥

म्हणौनि ऐसें कैसें घडेल । जे मर्कट समाधी येईल ।
कां राहा म्हणतलिया राहेल । महावातु ? ॥६-४१३॥
म्हणून हे असे कसे होईल की माकडाला समाधि लागेल ? किंवा सोसाट्याचा वारा थांब म्हटल्याबरोबर थांबेल काय ? ॥६-४१३॥

चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम् ।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥६-३४॥
हे कृष्णा मन चंचल, क्षोभक, बलयुक्त व वळवण्यास कठीण आहे. त्याचा निग्रह करणे वायूच्या निग्रहासारखेच अतिशय कठीण आहे. असे मला वाटते. ॥६-३४॥

जें बुद्धीतें सळी । निश्चयातें टाळी ।
धैर्येसीं हातफळी । मिळऊनि जाय ॥६-४१४॥
जे मन बुद्धीला छळते, बुद्धीने केलेला निश्चय सिद्धीस जाऊ देत नाही आणि सात्विक धैर्याच्या हातावर हात मारून पळून जाते ॥६-४१४॥

जें विवेकातें भुलवी । संतोषासी चाड लावी ।
बैसिजे तरी हिंडवी । दाही दिशा ॥६-४१५॥
जे सारासार बुद्धीला भ्रमात पडते, संतोषाला आशा उत्पन्न करते आणि आपण एके ठिकाणी राहिलो तरी आपणाला दाही दिशांना फिरवते. ॥६-४१५॥

जें निरोधलें घे उवावो । जया संयमुचि होय सावावो ।
तें मन आपुला स्वभावो । सांडील काई ? ॥६-४१६॥
ज्याला आवरले असता ते जास्त उसळते, ज्याला निरोधच साह्य होतो, ते मन आपला स्वभाव टाकील काय ? ॥६-४१६॥

म्हणौनि मन एक निश्चळ राहेल । मग आम्हांसि साम्य होईल ।
हें विशेषेंही न घडेल । याचिलागीं ॥६-४१७॥
म्हणून हे मन एक निश्चल राहील आणि मग आम्हाला साम्यावस्था प्राप्त होईल हे एवढ्यासाठी फार करून घडणार नाही. ॥६-४१७॥

श्रीभगवानुवाच -
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥६-३५॥
श्रीकृष्ण म्हणाले, हे धैर्यशाली अर्जुना, मन हे नि:संशय चंचल असून निग्रह करण्यास अत्यंत कठिण आहे. परंतु अर्जुना सतत अभ्यासाने व वैराग्याने याचा निग्रह करता येतो. ॥६-३५॥

तंव कृष्ण म्हणती साचचि । बोलत आहासि तें तैसेंचि ।
यया मनाचा कीर चपळचि । स्वभावो गा ॥६-४१८॥
तेव्हा कृष्ण म्हणाले, खरोखर तू म्हणत आहेस तसेच आहे. या मनाचा स्वभाव खरोखर चपलच आहे. ॥६-४१८॥

परि वैराग्याचेनि आधारें । जरी लाविलें अभ्यासाचिये मोहरें ।
तरी केतुलेनि एके अवसरें । स्थिरावेल ॥६-४१९॥
परंतु वैराग्याच्या जोरावर मन जर अभ्यासाकडे वळवले तर काही वेळाने ते स्थिर होईल. ॥६-४१९॥

कां जें यया मनाचें एक निकें । जें देखिलें गोडीचिया ठाया सोके ।
म्हणौनि अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाइजे ॥६-४२० ॥
कारण की या मनाची एक गोष्ट चांगली आहे, ती ही की ते अनुभवलेल्या गोडीच्या ठिकाणी सवकते. म्हणून त्याला कौतुकाने आत्मानुभवसुखच वारंवार दाखवीत जावे. ॥६-४२०॥

असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः ।
वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥६-३६॥
विरक्ती व अभ्यास यांच्या अभावी ज्याचे अंत:करण स्वाधीन नाही, त्याला योग प्राप्त होणे अत्यंत कठिण आहे, हे मलाही पटते, परंतु ज्याचे अंत:करण स्वाधीन आहे त्याने वर सांगितलेल्या उपायांनी प्रयत्न केला असता त्याला योग प्राप्त होणे शक्य आहे. ॥६-३६॥

एऱ्हवीं विरक्ति जयांसि नाहीं । जे अभ्यासीं न रिघती कहीं ।
तयां नाकळे हें आम्हीही । न मनूं कायी ॥६-४२१॥
एरवी ज्यांना वैराग्य नाही, जे केव्हाच अभ्यासात शिरत नाहीत. त्यांना मन आवरत नाही ही गोष्ट आम्हाला कबूल नाही काय ? ॥६-४२१॥

परि यमनियमांचिया वाटा न वचिजे । कहीं वैराग्याची से न करिजे ।
केवळ विषयजळीं ठाकिजे । बुडी देउनी ॥६-४२२॥
परंतु यम नियमांच्या वाटेने गेले नाही, वैराग्याची केव्हाही आठवण केली नाही व केवळ विषयरूपी पाण्यामधे बुडी मारून राहिले ॥६-४२२॥

यया जालिया मानसा कहीं । युक्तीची कांबी लागली नाहीं ।
तरी निश्चळ होईल काई । कैसेनि सांगें ? ॥६-४२३॥
व आपल्या मनाला उत्पन्न झाल्यापासून कधीही युक्तीचा चिमटा जर लावलाच नाही तर ते स्थिर कसे होईल ? सांग बरे. ॥६-४२३॥

म्हणौनि मनाचा निग्रहो होये । ऐसा उपाय जो आहे ।
तो आरंभीं मग नोहे । कैसा पाहों ॥६-४२४॥
म्हणून मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे तो करण्याला आरंभ कर. मग निग्रह कसा होत नाही ते पाहू. ॥६-४२४॥

तरी योगसाधन जितुकें । कें अवघेंचि काय लटिकें ? ।
परि आपणयां अभ्यासूं न ठाके । हेंचि म्हण ॥६-४२५॥
तर योगसाधन जेवढे आहे, ते सर्वच खोटे आहे काय ? परंतु आपल्या हातून अभ्यास होत नाही असे म्हण. ॥६-४२५॥

आंगीं योगाचें होय बळ । तरी मन केतुलें चपळ ? ।
काय महदादि हें सकळ । आपु नोहे ? ॥६-४२६॥
अंगामधे योगाचे सामर्थ्य असेल, तर त्यापुढे मनाची चपलता ती किती आहे ? हे महतत्वादी सर्व आपल्या स्वाधीन होणार नाही काय ? ॥६-४२६॥

अर्जुन उवाच -
अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः ।
अप्राप्य योगसंसिद्धि कां गतिं कृष्ण गच्छति ॥६-३७॥
अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, मनुष्य श्रद्धेने युक्त असला, पण त्याचे मन काही कलाने योगापासून चलित झाल्याने त्याचा प्रयत्न सुटला व त्यामुळे त्याला योगसिद्धी प्राप्त झाली नाही तर तो कोणत्या गतीला जातो ? ॥६-३७॥

तेथ अर्जुन म्हणे निकें । देवो बोलती तें न चुके ।
साचचि योगबळेंसीं न तुके । मनोबळ ॥६-४२७॥
त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, फार चांगले. देव म्हणतात त्यात काही चूक नाही. खरोखर योगाच्या सामर्थ्याबरोबर मनाच्या सामर्थ्याची तुलना करता येणार नाही. ॥६-४२७॥

तरी तोचि योगु कैसा केवीं जाणों । आम्ही येतुले दिवस याची मातुही नेणों ।
म्हणौनि मनातें जी म्हणों । अनावर ॥६-४२८॥
परंतु तोच योग कसा आहे व त्याचे ज्ञान कसे करून घ्यावयाचे ? ह्याची इतके दिवस आम्हाला वार्ताही नव्हती. म्हणून महाराज, आम्ही म्हणत होतो की हे मन अनावर आहे. ॥६-४२८॥

हा आतां अघवेया जन्मा । तुझेनि प्रसादें पुरुषोत्तमा ।
योगपरिचयो आम्हां । जाहला आजी ॥६-४२९॥
कृष्णा, ह्या सार्‍या जन्मात तुझ्या प्रसादाच्या योगाने ही आता सांप्रत आम्हाला योगाची ओळख झाली. ॥६-४२९॥

परि आणिक एक गोसांविया । मज संशयो असे साविया ।
तो तूं वांचूनि फेडावया । समर्थु नाहीं ॥६-४३०॥
परंतु महाराज, या प्रसंगी, मला आणखी एक संशय आलेला आहे. तो दूर करण्यास तुझ्यावाचून कोणी समर्थ नाही. ॥६-४३०॥

म्हणौनि सांगें गोविंदा । कवण एकु मोक्षपदा ।
झोंबत होता श्रद्धा । उपायेंविण ॥६-४३१॥
म्हणून देवा, सांगा, कोणी एक योग्य खटपटीशिवाय केवळ श्रद्धेच्या बळावर मोक्षपद काबीज करायला पहात होता. ॥६-४३१॥

इंद्रियग्रामोनि निघाला । आस्थेचिया वाटे लागला ।
आत्मसिद्धिचिया पुढिला । नगरा यावया ॥६-४३२॥
पुढले गाव जे आत्मसिद्धी, त्या गावाला येण्याकरता तो इंद्रियरूपी गावाहून निघून आस्थेच्या वाटेला लागला. ॥६-४३२॥



[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



कच्चिन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति ।
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि ॥६-३८॥
हे वीर्यशाली श्रीकृष्णा, इंद्रियसुख व मोक्ष या दोहींपासून भ्रष्ट झालेला तो ब्रह्मप्राप्तीच्या मार्गामधे आधारहीन व मतिहीन होत्साता, इतर ढगांपासून वेगळ्या झालेल्या ढगाप्रमाणे नाश पावतो की काय ? ॥६-३८॥

तंव आत्मसिद्धि न ठकेचि । आणि मागुतें न येववेचि ।
ऐसा अस्तु गेला माझारींचि । आयुष्यभानु ॥६-४३३॥
आता तो आत्मसिद्धीच्या गावालाही पोहोचला नाही आणि त्यास परतही येववत नाही असा मध्येच असतांना त्याचा आयुष्यरूपी सूर्य अस्ताला गेला, ॥६-४३३॥

जैसें अकाळीं आभाळ । अळुमाळु सपातळ ।
विपायें आलें केवळ । वसे ना वर्षे ॥६-४३४ ॥
भलत्यावेळी विरळ असे थोडे नुसते चुकून ढग आले तर ते टिकत नाहीत व वर्षावही करत नाहीत. ॥६-४३४॥

एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः ।
त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते ॥६-३९॥
हे कृष्णा ही माझी शंका पूर्णतेने नाहीशी करण्याला तुझ्याखेरीज दुसरा कोणीही समर्थ आढळत नाही. ॥६-३९॥

तैसीं दोन्ही दुरावलीं । जे प्राप्ती तंव अलग ठेली ।
आणि अप्राप्तीही सांडवली । श्रद्धा तया ॥६-४३५॥
त्याप्रमाणे विषयासक्तता व मोक्ष ही दोन्ही त्यास दूर राहिली अशी की आत्मसिद्धीची प्राप्ती तर दूरच राहिली आणि दुसरे आपल्यास आत्मप्राप्ती होणार नाही अशी आशाही त्याला श्रद्धा असल्यामुळे सोडता येत नाही. ॥६-४३५॥

ऐसा दोंला अंतरला कां जी । जो श्रद्धेच्या समाजीं ।
बुडाला तया हो जी । कवण गति ? ॥६-४३६॥
याप्रमाणे जो पुरुष उशीरामुळे फसला व जो आत्मप्राप्तीविषयी पूर्ण श्रद्धा असतांना मेला त्याला अहो महाराज, कोणती गती प्राप्त होते ते सांगा. ॥६-४३६॥

श्रीभगवानुवाच -
पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते ।
न हि कल्याणकृत्कश्चिद्दुर्गतिं तात गच्छति ॥६-४०॥
श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, इहलोकी अथवा परलोकी कोठेही त्याचा नाश होत नाही. कारण बाबा शुभकर्म करणारा कोणीही दुर्गतीला जात नाही. ॥६-४०॥

तंव कृष्ण म्हणती पार्था । जया मोक्षसुखीं आस्था ।
तया मोक्षावांचूनि अन्यथा । गती आहे गा ? ॥६-४३७॥
तेव्हा कृष्ण म्हणाले, अर्जुना, ज्याला मोक्षसुखाची उत्कट इच्छा आहे, त्याला मोक्षाशिवाय दुसरी गती आहे काय ? ॥६-४३७॥

परि एतुलें हेंचि एक घडे । जें माझारीं विसवावें पडे ।
तेंही परी ऐसेनि सुरवाडें । जो देवां नाहीं ॥६-४३८॥
पण एवढेच एक होते की मध्ये विसावा घ्यावा लागतो. पण तो विसावा घेणेही असे सुखकर असते की जे इंद्रांदि देवांनाही नाही. ॥६-४३८॥

एऱ्हवीं अभ्यासाचा उचलता । पाउलीं जरी चालता ।
तरी दिवसाआधीं ठाकिता । सोऽहंसिद्धीतें ॥६-४३९॥
वास्तविक अभ्यासाच्या जलद पावलाने जर तो चालता तर मरणकाळापूर्वीच ब्रह्मसिद्धीस येऊन मिळता ॥६-४३९॥

परि तेतुला वेगु नव्हेचि । म्हणौनि विसांवा तरी निकाचि ।
पाठीं मोक्षु तंव तैसाचि । ठेविला असे ॥६-४४०॥
पण तितक्या वेगाने अभ्यास न झाल्यामुळे विसावा घेणे योग्यच होते व नंतर मोक्ष त्याच्याकरता ठेवलेलाच आहे. ॥६-४४०॥

प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः ।
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥६-४१॥
पुण्यकर्मीयांच्या लोकाला जाऊन तेथे पुष्कळ वर्षे वास केल्यावर शुद्धाचरणी व धनवान अशा कुळामधे तो योगभ्रष्ट जन्म पावतो. ॥४-४१॥

ऐकें कवतिक हें कैसें । जें शतमखा लोक सायासें ।
तें तो पावे अनायासें । कैवल्यकामु ॥६-४४१॥
ऐक कसा चमत्कार होतो तो, शंभर यज्ञ करणार्‍य़ास कष्टाने जी स्थिती प्राप्त होते ती त्या मोक्षाची इच्छा करणारास श्रमावाचून मिळते. ॥६-४४१॥

मग तेथिंचे जे अमोघ । अलौकिक भोग ।
भोगितांही सांग । कांटाळे मन ॥६-४४२॥
मग त्या ठिकाणाचे जे दिव्य व निष्फळ न होणारे भोग ते यथास्थित भोगीत असताही त्याच्या मनास कंटाळा येतो. ॥६-४४२॥

हा अंतरायो अवचितां । कां वोढवला भगवंता ? ।
ऐसा दिविभोग भोगितां । अनुतापी नित्य ॥६-४४३॥
देवा, हे विघ्न आमच्यावर का कोसळले’ असा स्वर्गातील भोग भोगीत असता तो सारखा पश्चात्ताप करत असतो. ॥६-४४३॥

पाठीं जन्में संसारीं । परि सकळ धर्माचिया माहेरीं ।
लांबा उगवे आगरीं । विभवश्रियेचा ॥६-४४४॥
नंतर तो मनुष्यलोकात जन्मतो, पण सर्वधर्मांचे वसतिस्थान आणि वैभवरूप लक्ष्मीचे जे कुलरूपी शेत त्यामध्ये भातगोट्याचे रोपाप्रमाणे वाढतो. ॥६-४४४॥

जयातें नीतिपंथें चालिजे । सत्यधूत बोलिजे ।
देखावें तें देखिजे । शास्त्रदृष्टीं ॥६-४४५॥
जे कुल नीतीच्या मार्गाने चालते, सत्याने पवित्र झालेले बोलते आणि जे पहाणे असेल ते शास्त्रदृष्टीने पाहाते ॥६-४४५॥

वेद तो जागेश्वरु । जया व्यवसाय निजाचारु ।
सारासार विचारु । मंत्री जया ॥६-४४६॥
ज्या कुळात वेद हे जागृत दैवत असते, शास्त्रविहित आचरण हाच ज्याचा व्यापार आहे व सारासार विचार हाच ज्याचा सल्लामसलत देणारा प्रधान आहे ॥६-४४६॥

जयाच्या कुळीं चिंता । जाली ईश्वराची पतिव्रता ।
जयातें गृहदेवता । आदि ऋद्धि ॥६-४४७॥
ज्या कुळामधे चिंता ईश्वराचीच एकनिष्ठ पत्नी झालेली असते आणि ऋध्यादिक या ज्याच्या घरातील देवता आहेत ॥६-४४७॥

ऐसी निजपुण्याची जोडी । वाढिन्नली सर्वसुखाची कुळवाडी ।
तिये जन्मे तो सुरवाडी । योगच्युतु ॥६-४४८॥
अशा रीतीने ज्या कुळात आपल्या पुण्याईच्या कमाईने सर्व सुखाचा व्यापार वाढला आहे त्या कुळात तो योगभ्रष्ट सुखाने जन्म घेतो. ॥६-४४८॥

अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् ।
एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम् ॥६-४२॥
अथवा बुद्धिमान अशा योगी लोकांच्या कुळामधे तो जन्म पावतो. अशा तर्‍हेचा हा जन्म या जगामध्ये फार दुर्लभ आहे. ॥६-४२॥

अथवा ज्ञानाग्निहोत्री । जे परब्रह्मण्यश्रोत्री ।
महासुखक्षेत्रीं । आदिवंत ॥६-४४९॥
अथवा जे अग्नीमधे हवन करतात आणि जे ब्रह्मनिष्ठ व वेदसंपन्न असतात व जे ब्रह्मसुखरुपी शेताचे मिरासदार असतात, ॥६-४४९॥

जे सिद्धांताचिया सिंहासनीं । राज्य करिती त्रिभुवनीं ।
जे कूजती कोकिल वनीं । संतोषाच्या ॥६-४५०॥
जे (एकमेवाद्वितीय ब्रह्म) या सिद्धांताच्या सिंहासनावर बसून त्रैलोक्यात राज्य करतात व हे संतोषाच्या वनात शब्द करणारे कोकिळ आहेत ॥६-४५०॥

जे विवेकद्रुमाचे मुळीं । बैसले आहाति नित्य फळीं ।
तया योगियांचिया कुळीं । जन्म पावे ॥६-४५१॥
जे विवेकरूप गावाच्या मुख्य ठिकाणी असलेल्या ब्रह्मरूप फळाचे नित्य सेवन करीत राहिले आहेत त्या योग्याच्या कुळात त्यास जन्म मिळतो. ॥६-४५१॥

तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् ।
यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥६-४३॥
त्या ठिकाणी पूर्वदेहीच्या संस्काराने आलेला बुद्धियोग त्याला प्राप्त होतो. हे कुरुनंदना, त्यापुढे तो पुन्हा योगसिद्धीसाठी प्रयत्न करतो. ॥६-४३॥

मोटकी देहाकृति उमटे । आणि निजज्ञानाची पाहांट फुटे ।
सूर्यापुढें प्रगटे । प्रकाशु जैसा ॥६-४५२॥
अल्प वयातच त्याच्या ठिकाणी स्वरूपज्ञानाचा उदय होतो. ज्याप्रमाणे सूर्य उगवण्यापूर्वी अरुणोदयाचा प्रकाश होतो ॥६-४५२॥

तैसी दशेची वाट न पाहतां । वयसेचिया गांवा न येतां ।
बाळपणींच सर्वज्ञता । वरी तयातें ॥६-४५३॥
त्याप्रमाणे योग्य अवस्थेची वाट न पहाता, प्रौढ वयरूपी गावाला पोहोचण्यापूर्वीच, अगोदरच लहानपणीच सर्वज्ञता त्याला माळ घालते. ॥६-४५३॥

तिये सिद्धप्रज्ञेचेनि लाभें । मनचि सारस्वतें दुभे ।
मग सकळ शास्त्रे स्वयंभें । निघती मुखें ॥६-४५४॥
पूर्वजन्मात तयार झालेली बुद्धी त्याला अनुकूल असल्यामुळे त्याचे मनच सर्व विद्यांना प्रसवते आणि मग सर्व शास्त्रे आपोआप त्याच्या मुखातून निघतात. ॥६-४५४॥

ऐसें जे जन्म । जयालागीं देव सकाम ।
स्वर्गीं ठेले जप होम । करिती सदा ॥६-४५५॥
ज्याकरता देव कामनायुक्त होऊन स्वर्गात नेहेमी जप, होम इत्यादिक करत राहिले आहेत असा जो जन्म ॥६-४५५॥

अमरीं भाट होईजे । मग मृत्युलोकातें वानिजे ।
ऐसें जन्म पार्था गा जे । तें तो पावे ॥६-४५६॥
व देवांनी भाट होऊन मृत्युलोकाचे वर्णन करावे असा जो जन्म, अर्जुना, त्याला प्राप्त होतो. ॥६-४५६॥

पूर्वाभ्यासेन तेनैव ऱ्हियते ह्यवशोऽपि सः ।
जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ॥६-४४॥
योगमार्गाचा अवलंब करण्यास जरी तो समर्थ नसला तरी तो पूर्वजन्माचा योगाभ्यास त्याला आपल्याकडे ओढतो. फार कशाला ? योगसंबधी जिज्ञासु असूनही शब्दब्रह्माचे अतिक्रमण करतो. (वेदरहस्याचे गूढ अभिप्राय अथवा समाधीचा अनुभव हे याच स्थितीत त्याला सहज साध्य होतात.) ॥६-४४॥

आणि मागील जे सद्बुद्धि । जेथ जीवित्वा जाहाली होती अवधि ।
मग तेचि पुढती निरवधि । नवी लाहे ॥६-४५७॥
आणि मागल्या जन्मांची चांगली बुद्धी, जी त्याला मागील जन्माचा शेवट होण्याच्या वेळी प्राप्त झाली होती तीच चांगली बुद्धी मग या जन्मी त्याला सतत नवी प्राप्त होते. ॥६-४५७॥

तेथ सदैवा आणि पायाळा । वरी दिव्यांजन होय डोळां ।
मग देखे जैसी अवलीळा । पाताळधनें ॥६-४५८॥
एखादा भाग्यवान पुरुष पायाळू असून त्याला डोळ्यात घालण्याला दिव्यांजन मिळाल्यानंतर, तो जसा पाताळातील द्रव्य सहज पहातो ॥६-४५८॥

तैसें दुर्भेद जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाय ।
तेथ सौरसेंवीण जाय । बुद्धि तयाची ॥६-४५९॥
त्याप्रमाणे ज्या सिद्धांतात बुद्धीचा प्रवेश होत नाही अथवा जे सिद्धांत केवल गुरूकडून खरोखर कळावयाचे असतात, त्या सिद्धांतात त्याची बुद्धी यत्नावाचून प्रवेश करते. ॥६-४५९॥

बळियें इंद्रियें येती मना । मन एकवटे पवना ।
पवन सहजें गगना । मिळोंचि लागे ॥६-४६०॥
बलवान इंद्रिये मनाच्या स्वाधीन होतात, मन प्राणवायूशी एक होते आणि प्राणवायु अनायासे मूर्ध्निआकाशास मिळू लागतो. ॥६-४६०॥

ऐसें नेणों काय अपैसें । तयातेंचि कीजे अभ्यासें ।
समाधि घर पुसे । मानसाचें ॥६-४६१॥
असे सहजच कसे काय होते ते समजत नाही. अभ्यास त्याला आपोआप येतो व समाधि त्याच्या मनातील घर विचारीत येते. ॥६-४६१॥

जाणिजे योगपीठीचा भैरवु । काय हा आरंभरंभेचा गौरवु ।
कीं वैराग्यसिद्धीचा अनुभवु । रूपा आला ॥६-४६२॥
हा योगभ्रष्ट पुरुष योगरूपी आसनावरील जणुकाय भैरवदेवच अथवा योगारंभरूपी केळीची शोभाच किंवा जणु काय वैराग्याच्या पूर्णतेचा अनुभवच आकाराला आलेला आहे. ॥६-४६२॥

हा संसारु उमाणितें माप । कां अष्टांगसामग्रीचें द्वीप ।
जैसें परिमळेंचि धरिजे रूप । चंदनाचें ॥६-४६३॥
हा पुरुष म्हणजे संसार मोजण्याचे मापच किंवा अष्टांगयोगाची सामुग्री दाखवणारा जणू दिवाच होय. ॥६-४६३॥

तैसा संतोषाचा काय घडिला । कीं सिद्धिभांडारींहूनि काढिला ।
दिसे तेणें मानें रूढला । साधकदशे ॥६-४६४॥
त्याप्रमाणे हा पुरुष जसा काही संतोषाचाच बनवलेला अथवा सिद्धांच्या समुदायातून काढलेला असावा इतक्या योग्यतेचा साधकदशेतच तयार झालेला दिसतो. ॥६-४६४॥

जे वर्षशतांचिया कोडी । जन्मसहस्रांचिया आडी ।
लंघितां पातला थडी । आत्मसिद्धीची ॥६-४६५॥
कारण कोट्यावधी शतवर्षात हजारो जन्मांचे प्रतिबंध उल्लंघन करून तो आत्मसिद्धीच्या किनार्‍याला येऊन पोचला. ॥६-४६५॥

म्हणौनि साधनजात आघवें । अनुसरे तया स्वभावें ।
मग आयतिये बैसे राणिवे । विवेकाचिये ॥६-४६६॥
म्हणून सर्व साधन मात्र आपोआप त्याच्यामागे येतात. नंतर तो आयताच विवेकाच्या राज्यावर बसतो. ॥६-४६६॥

पाठीं विचारितया वेगां । तो विवेकुही ठाके मागां ।
मग अविचारणीय तें आंगा । घडोनि जाय ॥६-४६७॥
नंतर विचाराच्या वेगामुळे तो विवेकही मागे रहातो आणि मग विचारांच्या आवाक्याबाहेरचे जे स्वरूप ते तो स्वत: बनतो. ॥६-४६७॥

तेथ मनाचें मेहुडें विरे । पवनाचें पवनपण सरे ।
आपणपां आपण मुरे । आकाशही ॥६-४६८॥
त्या ठिकाणी मनरूपी मेघ नाहीसा होतो व वार्‍याचा वारेपणा (चंचलपणा) संपतो आणि त्याचप्रमाणे आकाशदेखील आपण आपल्यातच मुरते. ॥६-४६८॥

प्रणवाचा माथा बुडे । येतुलेनि अनिर्वाच्य सुख जोडे ।
म्हणौनि आधींचि बोलु बहुडे । तयालागीं ॥६-४६९॥
तो ॐकाराच्या अर्धमात्रेत लीन व्हावा, इतके त्याला शब्दातीत सुख मिळते. म्हणून त्याच्याविषयी शब्द अगोदरच परत फिरतो. (शब्दाने ह्याचे वर्णन करता येत नाही.) ॥६-४६९॥

ऐसी ब्रह्मींची स्थिती । जे सकळां गतींसी गती ।
तया अमूर्ताची मूर्ति । होऊनि ठाके ॥६-४७०॥
तात्पर्य अशी जी ब्रह्माची स्थिती जी सगळ्या गतींची गती आहे, त्या निराकार ब्रह्मस्थितीची हा मूर्ती होऊन रहातो. ॥६-४७०॥

प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः ।
अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ॥६-४५॥
आणि नंतर प्रयत्नपूर्वक योगमार्गाचे ठिकाणी झटल्यावर तो योगी पापापासून शुद्ध होऊन अनेक जन्मांनी योगसिद्धी प्राप्त झाल्यावर अत्यंत श्रेष्ठ अशा गतीला म्हणजे मोक्षाला जातो. ॥६-४५॥

तेणें बहुतीं जन्मीं मागिलीं । विक्षेपांचीं पाणिवळें झाडिलीं ।
म्हणौनि उपजतखेंवो बुडाली । लग्नघटिका ॥६-४७१॥
त्याने मागील अनेक जन्मात विक्षेपरूपी केरकचरा काढून टाकला म्हणून या जन्मी उपजताक्षणीच लग्नघटका बुडाली. (त्याचा कर्मक्षय होऊन ब्रह्माशी ऐक्य होण्याची वेळ प्राप्त झाली). ॥६-४७१॥

आणि तद्रूपतेसीं लग्न । लागोनि ठेलें अभिन्न ।
जैसे लोपलें अभ्र गगन । होऊनि ठाके ॥४७२॥
आणि ज्याप्रमाणे ढग नाहीसा झाला की तो आकाशाशी एकरूप होतो, त्याप्रमाणे ब्रह्मरूपाशी त्याचे अभिन्नतेने लग्न लागते. ॥६-४७२॥

तैसें विश्व जेथ होये । मागौतें जेथ लया जाये ।
तें विद्यमानेंचि देहें । जाहला तो गा ॥६-४७३॥
त्याचप्रमाणे हे अर्जुना, ज्या स्वरूपापासून विश्व उत्पन्न होते व फिरून ते विश्व ज्या स्वरूपी लीन होते, ते स्वरूप तो हल्लीच्या देहानेच होतो. ॥६-४७३॥

जया लाभाचिया आशा । करूनि धैर्यबाहूंचा भरंवसा ।
घालीत षट्कर्मांचा धारसां । कर्मनिष्ठ ॥६-४७४॥
ज्या वस्तूच्या प्राप्तीच्या आशेने, धैर्यरूपी बाहूंचा विश्वास धरून, कर्मनिष्ठ लोक षट्कर्मांच्या प्रवाहामधे उडी टाकतात ॥६-४७४॥

कां जिये एक वस्तूलांगीं । बाणोनि ज्ञानाची वज्रांगी ।
झुंजत प्रपंचेंशीं समरंगीं । ज्ञानिये गा ॥६-४७५॥
अथवा ज्या एका वस्तुकरता ज्ञानी लोक ज्ञानाचे चिलखत अंगात घालून समरांगणामधे संसाराशी लढतात ॥६-४७५॥

अथवा निलागें निसरडा । तपोदुर्गाचा आडकडा ।
झोंबती तपिये चाडा । जयाचिया ॥६-४७६॥
अथवा तपी लोक ज्या स्वरूपप्राप्तीच्या इच्छेने तपरूपी तुटलेल्या निराधार व निसरड्या कड्यावर चढण्याचा प्रयत्न करतात ॥६-४७६॥

जें भजतियां भज्य । याज्ञिकांचें याज्य ।
एवं जें पूज्य । सकळां सदा ॥६-४७७॥
ते स्वरूप भजन करणार्‍या लोकांचा भजनाचा विषय आहे, जे स्वरूप यज्ञ करणार्‍या लोकांच्या यज्ञाचा विषय आहे, याप्रमाणे जे स्वरूप सर्वांना सर्वकाळी पूज्य आहे, ॥६-४७७॥

तेंचि तो आपण । स्वयें जाहला निर्वाण ।
जें साधकांचें कारण । सिद्ध तत्त्व ॥६-४७८॥
जे स्वरूप शेवटची गती आहे, साधकांचे साध्य आहे व जे एकच सिद्धतत्व आहे, ते स्वरूप तो योगी आपण स्वत: होतो. ॥६-४७८॥

तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः ।
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ॥६-४६॥
तपस्वी, ज्ञानी व कर्मी ह्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे असे माझे मत आहे. म्हणून हे अर्जुना तू योगी हो. ॥६-४६॥

म्हणौनि कर्मनिष्ठा वंद्यु । तो ज्ञानियांसि वेद्यु ।
तापसांचा आद्यु । तपोनाथु ॥६-४७९॥
म्हणून तो पुरुष कर्मनिष्ठांना पूज्य आहे. ज्ञानी पुरुषास जाणण्यास तो योग्य आहे आणि तपस्वी लोकांमधे तो मूळ तपोनाथ आहे. ॥६-४७९॥

पैं जीवपरमात्मसंगमा । जयाचें येणें जाहलें मनोधर्मा ।
तो शरीरीचि परी महिमा । ऐशी पावे ॥६-४८०॥
जीव परमात्म्याच्या ऐक्याच्या ठिकाणी ज्याच्या मनाच्या वृत्तीचे येणे झाले, तो जरी देहधारी असला तरी त्याला असला महिमा प्राप्त होतो. ॥६-४८०॥

म्हणौनि याकारणें । तूंतें मी सदा म्हणें ।
योगी होईं अंतःकरणें । पंडुकुमरा ॥६-४८१॥
म्हणून याकारणास्तव हे अर्जुना, तू मनाने योगी हो असे मी तुला नेहेमी म्हणतो. ॥६-४८१॥

योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना ।
श्रद्धावान्भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥६-४७॥
जे अंत:करण माझ्या ठिकाणी मुरलेले आहे अशा अंत:करणाने युक्त होऊन (मद्रूप होऊन) जो श्रद्धाशील मनुष्य माझी त्रिपुटीरहित भक्ती करतो, तो सर्व प्रकारच्या योग्यांपेक्षा श्रेष्ठ प्रकारचा योगी मला वाटतो. ॥६-४७॥

अगा योगी जो म्हणिजे । तो देवांचा देवो जाणिजे ।
आणि सुख सर्वस्व माझें । चैतन्य तो ॥६-४८२॥
अर्जुना, योगी जो म्हणतात, तो देवांचा देव जाणावा. आणि माझे सुखसर्वस्व व माझा आत्मा तो आहे. ॥६-४८२॥

तेथ भजता भजन भजावें । हें भक्तिसाधन जें आघवें ।
तो मीचि जाहलों अनुभवें । अखंडित ॥६-४८३॥
ज्या पुरुषाला भजन करणारा, भजन व भज्य अशी भक्तिसाधनांची जी त्रिपुटी, ती सर्व अनुभवाने सदोदित मद्रूपच आहे. ॥६-४८३॥

मग तया आम्हां प्रीतीचें । स्वरूप बोलीं निर्वचे ।
ऐसें नव्हे गा तो साचें । सुभद्रापती ॥६-४८४॥
मग त्याच्या आमच्या प्रेमाचे स्वरूप शब्दाने सांगता येईल, अर्जुना, असा तो खरोखर नाही. ॥६-४८४॥

तया एकवटलिया प्रेमा । जरी पाडें पाहिजे उपमा ।
तरी मी देह तो आत्मा । हेंचि होय ॥६-४८५॥
त्या ऐक्यभावाच्या प्रेमाला जर योग्य उपमा हवी असेल तर मी देह व तो आत्मा ही होय. ॥६-४८५॥

ऐसे भक्तचकोरचंद्रें । त्रिभुवनैकनरेंद्रें ।
बोलिलें गुणसमुद्रें । संजयो म्हणे ॥६-४८६॥
या प्रमाणे तेथे भक्तरूपी चकोरांचे चंद्र, त्रैलोक्याचे एकच राजे, गुणांचे समुद्र असे जे श्रीकृष्णपरमात्मा, ते असे बोलले असे संजय म्हणाला. ॥६-४८६॥

तेथ आदिलापासूनि पार्था । ऐकिजे ऐसीचि आस्था ।
दुणावली हें यदुनाथा । भावों सरलें ॥६-४८७॥
तेथे भगवंताचे बोलणे ऐकावे अशी जी अर्जुनाला तीव्र इच्छा झाली होती ती पहिल्यापेक्षा दुप्पट झाली. असे भगवंताला कळून आले. ॥६-४८७॥

कीं सावियाचि मनीं संतोषला । जे बोला आरिसा जोडला ।
तेणें हरिखें आतां उपलवला । निरूपील ॥६-४८८॥
त्यामुळे त्याच्या मनात सहजच संतोष उत्पन्न झाला. कारण त्याच्या बोलण्याचे यथार्थ ग्रहण करणारा अर्जुनरूपी आरसा त्याला प्राप्त झाला होता. त्या आनंदाच्या योगाने अंत:करण प्रफुल्लित झालेला श्रीकृष्ण आता सविस्तर सांगेल ॥६-४८८॥

तो प्रसंगु आहे पुढां । जेथ शांतु दिसेल उघडा ।
तो पालविजेल मुडा । प्रमेयबीजाचा ॥६-४८९॥
तो प्रसंग पुढे आहे. जेथे शांत रस स्पष्ट दिसेल असे जे प्रतिपाद्य विषयरूपी बीजाचे साठवण ते मोकळे करून विस्तृत तर्‍हेने श्रोत्यांच्या मनात पेरण्यात येईल. ॥६-४८९॥

जें सात्त्विकाचेनि वडपें । गेलें आध्यात्मिक खरपें ।
सहजें निडारले वाफे । चतुरचित्ताचे ॥६-४९०॥
कारण की सर्वगुणाच्या दृष्टीने मानसिकतारूपी डिखळे विरघळून योग्य चित्ताचे वाफे सहज तयार झाले. ॥६-४९०॥

वरी अवधानाचा वाफसा । लाधला सोनया ऐसा ।
म्हणौनि पेरावया धिंवसा । श्रीनिवृत्तीसी ॥६-४९१॥
आणखी सोन्यासारखा अवधानरूपी वापसा मिळाला. म्हणून श्रीनिवृत्तिनाथांना पेरण्याची इच्छा झाली. ॥६-४९१॥

ज्ञानदेव म्हणे मी चाडें । सद्गुरूंनीं केलें कोडें ।
माथां हात ठेविला तें फुडें । बीजचि वाइलें ॥६-४९२॥
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सद्गुरूंनी कौतुकाने मला चाडे केले व माझ्या मस्तकावर हात ठेवला, ते उघड उघड बीजच घातले. ॥६-४९२॥

म्हणौनि येणें मुखें जें जें निगे । तें संतांच्या हृदयीं साचचि लागे ।
हें असो सांगों श्रीरंगें । बोलिलें जें ॥६-४९३॥
म्हणून या माझ्या मुखातून जे निघेल ते संतांच्या मनाला खरोखर पटेल. श्रोते म्हणतात, हे रूपक राहू दे. श्रीकृष्ण परमात्मा जे काही म्हणाले ते तू सांग. ॥६-४९३॥

परी तें मनाच्या कानीं ऐकावें । बोल बुद्धीच्या डोळां देखावें ।
हे सांटोवाटीं घ्यावें । चित्ताचिया ॥६-४९४॥
असे म्हटल्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते मी सांगतो. पण ते मनाच्या कानाने ऐकले पाहिजे. माझे शब्द बुद्धीच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजेत. हे माझे शब्द चित्त देऊन त्याचा मोबदला घेतले पाहिजेत. ॥६-४९४॥

अवधानाचेनि हातें । नेयावें हृदयांआतौतें ।
हे रिझवितील आयणीतें । सज्जनांचिये ॥६-४९५॥
हे शब्द अवधानाच्या द्वारा मनाच्या आत न्यावेत. हे शब्द सज्जनांच्या बुद्धीला समाधान देतील. ॥६-४९५॥

हे स्वहितातें निवविती । परिणामातें जीवविती ।
सुखाची वाहविती । लाखोली जीवां ॥६-४९६॥
हे शब्द आत्महिताला स्थिर करतील. पूर्ण अवस्थेला जगवितील आणि जीवाला सुखाची लाखोली वाहवतील. ॥६-४९६॥

आतां अर्जुनेंसीं श्रीमुकुंदें । नागर बोलिजेल विनोदें ।
तें वोंवियेचेनि प्रबंधें । सांगेन मी ॥६-४९७॥
आता अर्जुनाशी श्रीकृष्ण चांगले कौतुकाने बोलले ते त्यांचे बोलणे मी ओवी छंदाने सांगेन. ॥६-४९७॥



इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां षष्ठोऽध्यायः ॥




GO TOP